होता एक गरीब बिचारा ।
किडूक मिडूक ते जगण्या चारा ।।
कौलारु जुनी पडवी निवारा ।
जन्म दरिद्री दिसे पसारा ।।
परिस्थितीनें गेला गंजूनी ।
आर्थिक विवंचना पाठी लागूनी ।।
शरीर जर्जर झाले रोगांनी ।
जगण्याची आशा उरे न मनीं ।।
अवचित घटना एके दिनीं ।
धन सापडे जमिनीतूनी ।।
मोहरांचा तो होता रांजण ।
गेले सारे दारिद्य निघूनी ।।
जन्मभर ते त्याने भोगले ।
घरांत लक्ष्मी, परी सोसले ।।
अज्ञानातची हे घडले ।
असून पाण्यांत तरी तहानेले ।।
शोधा ईश्वरी गुप्त धनाचा सांठा ।
लपला आहे अंतर्यामीं मोठा ।।
नसेल तेथे आनंदा तोटा ।
मिळतील सदैव यश वाटा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
पहिला पाऊस मुठीत पकडण्याचा निरर्थक प्रयत्न करत होतो … मुठीत सापडला पण ! निसटलाही अगदी तिच्यासारखा …
दिन दिन दिवाळी...
गायी म्हशी ओवाळी...
वसु बारसला ।।१।।
दिन दिन दिवाळी...
आरोग्य सांभाळी...
धन त्रयोदशीला ।।२।।
दिन दिन दिवाळी...
दुःखाला पिटाळी...
नरक चतुर्दशीला ।।३।।
दिन दिन दिवाळी...
लक्ष्मीला सांभाळी...
अश्विन अमावस्येला ।।४।।
दिन दिन दिवाळी...
नववर्षाची नवाळी...
बळी प्रतिपदेला ।।५।।
दिन दिन दिवाळी...
भावाला ओवाळी...
यम द्वितियेला (भाऊबीज) ।।६।।
पांडूरंगाचे दर्शन घेण्या, गेला पंढरपूरी ।
चुकली नाही कधीही, आषाढी कार्तिक वारी ।।
आजपरी शरीर दुबळे साथ देईना ।
मन तजेले दर्शन घेण्या हट्ट सोडीना ।।
आधार घेऊनी आज कुणाचा गेला पंढरपूरी ।
भरून आले डोळे त्याचे बघता शिखर मंदिरी ।।
आशा नव्हती थोडी देखील दर्शन मिळण्या तेथे ।
अंगणीत जमले भक्त गण नाचत सारे होते ।।
चार दिवस पडून होता विठ्ठल विठ्ठल गजरी ।
फिरणे नाही मागे अशी मनीची तयारी ।।
गेला नाही कण अन्नाचा चार दिवस पोटी ।
ध्यास लागला मनी एकची त्याच्याच भेटीसाठी ।।
टाळ मृदुंग विठ्ठल नामी एक रूप झाला ।
नाचत नाचत प्रभू चरणी येऊन तो पडला ।।
विलीन झाला अनंतात तो फिरूनी नाही उठला ।
देह सोडूनी पांडूरंगी चरणी वैकूंठी गेला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
जीवन काय आहे,
मला जे वाटत असे,
ते समजून घ्या तुम्हीं,
प्रभूमय ते कसे ।।१।।
मृत्यूचा तो विचार,
कधी न येई मनी,
मृत्यू आहे निश्चित,
माहित हे असूनी ।।२।।
भीती आम्हां देहाची,
कारण ते नाशवंत,
न वाटे मरूत आम्ही,
आत्मा असूनी भगवंत ।।३।।
आत्मा आहेची अमर,
मरणाची नसे भीती,
जी भीती वाटते,
ती असते देहाची ।।४।।
आत्मा नसे कुणी,
तो तर प्रभूच आहे,
साकारलेला सर्वत्र,
बाहेर व अंतरी राहे ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हपालेल्या निष्ठूर काळा, समाधानी तू कसा होशील
बळी घेण्याचे सत्र तुझे ते, केंव्हां बरे तू थांबवशील ?...१,
नित्य तुला तें भक्ष्य लागते, वेध घेई तू टिपूनी त्याचा
मिस्कीलतेने हासत जातो, गर्व होई तो स्वकृत्याचा....२,
अवचित कशी ही भूक वाढली, मात करूनी त्या वेळेवरी
सुडानें तूं पेटूनी जावूनी, बळी घेतले गरीबांचे परी....३,
काळ येई परि वेळ न आली, म्हणून सदा तूं हताश होतो
वेळेची ही ढिलाइ बघूनी, तांडव नृत्य ते करितो...४,
शांत होऊ दे क्रोध तुझा तो, बळी कुणाचा राग कुणावरी
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं, जाण ठेव मनी याची तरी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
ती आणि तो
खरे चर्चेचा विषय असतात
अर्थात दुसऱ्याच्या दृष्टीने
त्यांना विचारा..
ते सहजतेने म्हणजे ईझींली घेतात
पण.....हा पण महत्वाचा असतो
जेव्हा ब्रेंक अप होतो तेव्हा मात्र
चर्चा सुरु होतात..
त्या दोघांच्या मनात देखील
ब्रेंक अप हा शब्द इतका रूढ होतो
त्यातला तो किवा ती
कधीकधी
ह्या शब्दापार असतात....
काहीच वाटत नाही
आणि मग दोघांच्या बाबतीत शेवटी कधीतरी
फक्त व्यवहार उरतो
जो लग्न नावाच्या
मांडवाखाली उरकला जातो........
-- सतीश चाफेकर.
झालाही असेल कदाचित जन्म एका स्त्रिचा पुरूषापासून
पण विश्वातील तो एक पुरूष सोडला तर
समग्र पुरूष जातीला जन्म स्त्रियांनीच दिला...
स्त्रिला जन्म देताना पुरूषाला
वेदना झाल्या असतील – नसतील ही पण
पुरूषांना जन्म देताना स्त्रियांना होणार्या वेदना
पुरूष वर्षानुवर्षे पाहतच आला...
स्त्रियांनी पुरूषांना फक्त जन्मच दिला नाही
तर खायला दाणा, राहायला आसरा, प्रेम,
जिव्हाळा आणि संस्कारही दिला...
पुरूषांनी स्त्रियांना आपल्या मनात,
हृद्यात आणि प्रसंगी देव्हार्यातही बसविला
पण आपल्या बरोबरीला कधीच उभा नाही केला...
आजही का करावा लागतोय संघर्ष स्त्रिला
आपल्याच अस्तित्वासाठी परूषांसोबत
तीच कारक असताना पुरूषांच्या अस्तित्वाला...
का करावी लागतेय पुरूषांना व्यक्त आपली कृतज्ञता
स्त्रियांच्या प्रती फक्त जागतिक महिला दिनाला...
समग्र विश्वाची मालकीन असणारी स्त्रीच
का शोधतेय एक निमित्त
स्वतःची ओळख जगाला सांगायला...
जागतिक महिला दिन
खरं म्ह्णजे साजरा करण्याची
गरजच का भासावी जगाला...
कवी – निलेश बामणे.
Copyright © 2025 | Marathisrushti