या अशा सांजवेळी,
बाहुपाशी, घे जवळी,
रात्र उतरून आली खाली,
तुजविण जिवाची काहिली,
हुरहुरते मन अशा समयी,
तुझ्यासाठी,आंत तुटते काही
जीव कांतर कांतर होई,
आत्मा तरसे मिलनासाठी,
लौकिक सुखे भोवताली,
जीव कसा जळे त्यातही,
तरसवे मज विरहाग्नी,
तुझ्या शपथांची येतां स्मृती,
उले काळीज माझे किती,
तुला कल्पनाही नाही,
प्रेमाचीच लागे कसोटी,
ताटातुटीचीव्यथा ही,
कोरडेपण तुझे मजसी,
सारखे आत खात राही,
रुक्षतेचे तुझ्या काटे सलती,
टोच बोंच कशी कायम राही,
वरून वरून चित्रे देखणी,
नशीब फरांटे मारत राही,
घायाळ तनी बंबाळ मनी,
एकच छळे मज मूर्ती,--!!!
हिमगौरी कर्वे.©
वर्णती जयगाथा ऋषि व्यास
स्वयं गजानन बसला पुढती लिखित रूप देण्यांस ।। १
नाम कृष्णद्वैपायन यांचें
ज्येष्ठ पुत्र हे सत्यवतीचे
ज्ञानानें अभिधान मिळालें
‘वेदव्यास’ हें त्यांस ।। २
ऋषिवर ज्याचे स्वत:च साक्षी
कुरु नामक ख्यातकीर्त वंशीं
घटित-अघटितातून मूर्त
‘जय’ नांवाचा इतिहास ।। ३
पर्वांमधुनी घटना-वर्णन
घडे तर्क्य-अतर्क्य प्रदर्शन
पिढ्यापिढ्यांचा, संबंधांचा
एक अखंड प्रवास ।। ४
धृतराष्ट्राचे सुत, शत-कौरव
पंडूचे पुत्र, पांच-पांडव
राज्यावर अधिकार कुणाचा
हें कारण कलहास ।। ५
राज्यासाठी बंधु भांडले
सत्तेसाठी रक्त सांडलें
भावांच्या वादातुन झाला
कुरुवंशाचा र्हास ।। ६
युधिष्ठिराचे जरी सत्वगुण,
परंतु अभिमानी दुर्योधन
पूर्ण हस्तिनापुर-राज्याचा
धरीतसे हव्यास ।। ७
वैरातुन लाक्षागृह जळलें
दुष्ट-हेतु नीचांचे कळले
सुप्त द्वेष उघड्यावर येउन
भस्म करी स्नेहास ।। ८
राज्य मिळे दोहोंस विभागुन
मिळे पांडवांना खांडववन
दिलें मयानें, अमरपुरीसम
रूप इंद्रप्रस्थास ।। ९
द्यूत घडे कपटी चालींचें
वस्त्रहरण मग पांचालीचें
द्यूतातुन आला भाळीं
अज्ञातवास-वनवास ।। १०
कणही भूमि न देती कौरव
समेट घडवूं शके न केशव
अटळच जें, तें टाळायाचा
झाला व्यर्थ, प्रयास ।। ११
कौरव, पांडव, नृपती नाना
अक्षहौणी अठरांची सेना
एका वा दुसर्या पक्षातुन
झाले सिद्ध रणास ।। १२
कुरुक्षेत्रावर आप्त-गुरूजन
बघुन संभ्रमित होई अर्जुन
गीता सांगुन, बोध द्यावया
लागे श्रीकृष्णास ।। १३
मित्र-बंधु लागले लढाया
स्वकीयांस लागले वधाया
कुरुक्षेत्रावर पडली चहुंवर
हताहतांची रास ।। १४
दिवस अष्टदश, युद्ध चालले
लाखो मेले, विश्व हालले
हरलेले, शोकाकुल सारे,
विजयी सर्व, उदास ।। १५
प्रलयंकारी युद्ध भयंकर
नच दुसरें होईल धरेवर
असा पराक्रम महारथींचा,
ऐसा महा-विनाश ।। १६
झाला येथें अंत युगाचा
नाश जाहला ज्ञात-जगाचा
काळानेंही क्षणभर थांबुन
सोडियला निश्वास ।। १७
या धरतीवर, युगांयुगांतिल
पिढ्या शेकडो येतिल-जातिल
त्या सर्वांनी धडा शिकावा
हा व्यासांचा ध्यास ।। १८
- - -
(माझ्या, ‘गा जयगाथा पंडुसुतांची’ या
आगामी गीत-संग्रहातून )
-
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik
-विजय कुवळेकर
रेडा ऱ्हायला गाभन आनिक म्हशीनं खाल्ली हाय
आक्रित आक्रित घडतंय समदं करायचं आता काय ?
सांगा करायचं आता काय ? ||
सखे म्हनाले," तुम्हास्नी न्हाई ठाऊक आमची पावर"
"येवढं हाय तर " म्हनलं " हिंमतीनं गुंडान्ला घाला आवर"
"कुनाला सांगतोस,बेट्या" म्हनाले ; धरून सुऱ्याचा नेम
"करीन" म्हनाले," तुमच्यासारख्या घुंगुरट्यांचा गेम "
दमच भरला त्यांनी; म्हनाले," परत बोलायचं नाय" || १ ||
डासानं मारला मानूस तेव्हा बॉस म्हनाले,"बास ,
"समद्यान्ला लावतो कामाला ह्यावर इलाज काढतो खास "
भूतदयेचा पुळकावाल्या बाबाला झाला त्रास
"खबरदार जर कराल " म्हनाला," पर्यावरनाचा ऱ्हास "
काय बी पेटूदे .. आगीवर ह्यांची पोळी भाजायची हाय || २ ||
तंबाखू चोळत ग्यानबा बसला ...चुन्यात मिसळला कात
कोन मारतोय डोळा कुनाला... कुनाची रंगते रात
कुनाचा पायपोस कुनाच्या पायात...कुनाला कुनाची साथ
खरी कळावी कशी कुनाला पडद्यामागची बात
समदेच करत्यात कसं येड्याला दे माय धरनी ठाय || ३ ||
-विजय कुवळेकर
जव्हार ( ठाणे ) ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात Medical Superintendent म्हणून कार्यारात होतो. रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली की दोन दिवसापूर्वी ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता, ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली. सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले.
अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती. त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे, नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता दोष त्या नवबालीकेचा ? जन्मताच तिला तिच्या जन्मदात्या आईने तिला टाकून दिले. जगात जगण्यासाठी लढण्याचा संदेश देवून, ती माय मावूली निघून गेली. तिच्या सर्वतो वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले गेले. मुल वाढू लागले. शुश्रुषा करणाऱ्यानी तिचे नाव दुर्गा ठेवले. कुणाचे प्रारब्ध् कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्या लहान बालिकेच्या ललाटी जे निसर्गाने लिहिले तेच तिला मिळणार. हे सत्य आहे.
एक दिवस एक प्रौढ जोडपे रुग्णालयात आले. त्यांना मुलबाळ नव्हते. त्या मुलीला ते दत्तक घेवू इच्छित होते. स्थानिक श्रीमंत शेतकरी कुटुंब घरदार व स्वत: गेली दहा वर्षे अमेरिकेत New Jersey येते मोठ्या कंपनीत अधिकारी होते. भारतात दर दोन वर्षांनी येत असे. चर्चा झाली. त्यांनी कायदेशीर अर्ज केला. सर्व संबंधित शासकीय यंत्रने मार्फत परवानग्या मिळाल्या. मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. तीच मुलगी करोडो रुपयाच्या संपत्तीची कायदेशीर मालक बनली. ह्याला काय म्हणावे? निसर्गाची एक विचित्र परंतु आकर्षक खेळी. हृदह्याला भिडणारी जीवनकथा.
सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला. दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो, Washington येथील President’s White House बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते कल्पनातीत होते.
डॉ. भगवान नागापूरकर
9004079850
bknagapurkar@gmail.com
या बाई या
बकुळीच्या झाडाखाली
फुले वेचू या ।
ऊन पडले
पानफुल दिसे कसे
गोडगोडुले ।
गोडगोडुले
मोतियांचे दाणे कोणी
खाली पाडले? ।
रान हालले
पहाटेस शुक्रदेव
गाणे बोलले ।
वळून बघतां गतकाळाला, चकीत झाले मन ।
घटना घडल्या जीवनामध्यें, राही त्यांची आठवण ।।
चालत असतां पाऊल वाट, जीवन रेषे वरची ।
स्वप्न रंगवी मनांत तेंव्हा, भावी आयुष्याची ।।
परिस्थितीच्या भोवऱ्यामध्यें, पुरता गुरफटलो ।
फिरणाऱ्या त्या वर्तुळातूनी, बाहेर येवूं न शकलो ।।
कल्पिले होते नियतीनें, तेच घडविले तिनें ।
भंग पावले स्वप्नचि सारे, तिच्याच लहरीनें ।।
असेच घडते जीवनीं सदा, अघटीत-अवचित ।
समजूनी त्यासी ईश्वरी इच्छा, स्वीकारी आनंदात ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मागत होता प्रभूला हात जोडूनी कांही
भक्तिभाव बघूनी त्याचे मिळत ते जाई
एका मागून एक मिळे मागणी होता त्याची
निराश करणे न लगे इच्छा होता भक्ताची
जे जे बघे भोवती घेतले होते मागुनी
कशांत दडले सुख उमज येईना मनीं
देरे बुद्धि देवा मजला योग्य मागण्यासाठी
समाधानी मी होईन तुझ्या कृपे पोटी
ज्ञान झाले गंमतीचे सांगे सोड मागणे
न मागतां मिळाले जे आनंदी केले जगणे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८४०
ये रे ये रे पोष्टमणा
माहेरच्या आण डाकें
मना लागे हुरहुर
वरण होई फिके-फिके
वाटेकडे तुझ्या डोळे लावून
लावून, मला चष्मा लागे
चित्त न लागे स्वयंपाकात
भातातही खडे लागे
पायातली काढून हाणू कारे
सुंदर तुझ्या ह्या थोबड्यावरती
लक्ष न देताच जातोस मेल्या
दारावरुन माझ्या पुढती
काय मेले लफडे तुझे
शेजारच्या टवळी संगे
रोज-रोज कार्डे द्याया
तिच्या घरी, कोण सांगे?
ये रे ये रे पोष्टमणा
खबर घेऊन गावाहून
अगोबाई, नादात तुझ्या
भाजी गेली की रे करपून
आई माझी म्हातारी
असेल वळीत वाती
किंवा आजोळी आलेल्या
असेल खेळवित नाती
बाबा माझे मोठे शास्त्री
असतील सांगत शास्तर
निरोप त्यांचा पोचव ना रे
आणून माझ्या पोत्तर
मी न शिकले तरी
भाऊ माझा शाळेत प्यूण
हुशार शिकलेला
दुजा कचेरी कारकूण
बहिणी माझ्या साळू, काळू
चमेली, ढमेली, नि मैना
असतील दमलेल्या संसारी
कळीव की रे त्यांची दैना
लगबगे पोष्टमणा
माहेरच्या आण डाके
मनात रे माझ्या कशी
पाल का रे चुकचुके?
-- यतीन सामंत
ऋणानुबंध या कवितासंग्रहातून
(1976)
आली दारात वरात
गुलमोहर फुलला,
लक्षुमीच्या स्वागताला
सडा फुलांचा घातला ।
आली दारात वरात
दारी तोरण हिंदोळे
पैंजणांच्या चाहुलीने
मोर मण्यांचे जाहले ।
आली दारात वरात
लिंबलोण आणा कुणी
दृष्ट लागू नये तिला
सून माझी बहुगुणी ।
आली दारात वरात
दार आडवी बहीण
म्हणे - अडविते आज
उद्या पाठीशी घालीन ।
आली दारात वरात
पूस डोळे सूनबाई
उंबर्याच्या पलिकडे
उभी आहे एक आई ।
आली दारात वरात
माप दारी कलंडले
शकुनाच्या पावलाने
अमाप सुख घरी आले ।
आली दारात वरात
पायघड्या अंथरल्या
कुंकवाच्या पावलांच्या
वेली देव्हार्याशी गेल्या ।
आली दारात वरात
भाणोसं भरा ग कुणी ।
नको वाजवूस ठेव
काढी हलक्या हातानी ।
आली घरात वरात
साखरेची वाटी भरा ।
भरभरोनी गोडवा
असा लाभू दे संसारा ।
Copyright © 2025 | Marathisrushti