जीवन गंगा वहाते
फुलवित सारी जीवने
पडेल प्रवाहीं कुणी
लागते त्याला वाहणे ।।१।।
काही काळ वाहतो देह,
डुबून जाणे अंतीम,
कसा वाहतो केंव्हा डुबतो
प्रवाही वेगाचे हे काम ।।२।।
बुडूनी जाती देह प्रवाही,
कर्मे आतील तरंगती ।
वाहत वाहत नदी किनारी,
स्थीर होऊन काठी राहती ।।३।।
देह क्षणाचा जरी,
कर्मे राहती निरंतर ।
कर्तृत्वाच्या कल्पतरूची,
आठवण काढती इतर ।।४।।
त्या कर्माच्या राही आठवणी,
मार्गदर्शक बनती इतरा ।
डुबणाऱ्या देहाकडूनी,
सावध राहूनी कर्म करा ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मैत्र बनून आलीस जीवनी
न्हवते कधी ध्यानी-मनी
गुंफून स्नेहाचे धागे रेशमी
व्यापलीस तू , माझी अवनी !
कधी राग, कधी लोभ
कधी चिडू, कधी गोडू
कैरीची लज्जत, हापुसी गोडवा
दिलास मैत्रीला,आयाम नवा !
शांत सुखी जीवन सागरी
आली कैक तुफानी वादळे
भिरभिरती नौका सांभाळत
उभी तू, जणू दैवी सुकाणू !
नाही कसला गर्व, तुला
निरागस स्नेहाचा, तू झरा
सर्वांच्या मदतीला तुझा हात
जणू समाजसेवा हेच तुझे व्रत !
घर, मैत्री, नाती, सेवा
सर्वांचा तू अतूट दुवा
प्रणाम माझा, तुझ्या चरणी
नकळत माझ्या डोळ्यात पाणी !
© अरविंद टोळ्ये
९८२२०४७०८०
निसर्ग भगवंताचे रूप
स्पर्श दिव्य अनामिक
लाभता या स्पंदनांना
आत्मिक शांती सात्विक....
अविष्कार पंचभुतांचे
सदा सर्वदा सौख्यदायक
नक्षत्रे अलंकार सृष्टिचे
लोचनी उमले नंदनवन....
क्षण सारेच भारावलेले
स्वानुभूतिच आनंदघन
दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ
मनमनांतर पावन पावन....
सृजनता ही अलौकिक
झुळझुळते तृप्त जीवन
निर्मोही, भाव परस्पर
निरंतर कृतकृत्य जीवन....
--वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र.१९२
८/८/२०२२
लिहिले आजवर खूप, काही राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
रोज सकाळी घाईत चेहरा पाहून जाई
थकून येतो बाळ जेव्हा झोपून जाई
असाच झालो मोठा डोळे सांगून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
कष्ठ उपसले आईची त्या कदर होती
लाड पुरवले बापाने ती उधार होती
हात फिरवला जेव्हा डोई कळून आले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
असा घडवला हात हाता घेऊन त्याने
राखले ना काही टाकले देऊन त्याने
आठव येता डोळा पाणी साचून आले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
बघतो जेव्हा गर्दीत बाबा कुठेच नसतो
कधी अचानक डोळा पाणी होऊन दिसतो
पाठीवरची थाप घेण्याचे राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
मी कमी तो कवितेत माझ्या बोलत आहे
सपाट जागी नसला वळणा चालत आहे
कवितेस माझ्या उंच भरारी देऊन गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
एकटक तो बघतो काही बोलत नाही
चुकले तरीही आधीसारखे सांगत नाही
छापू आपण पुस्तक तसेच राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
लिहिले आजवर खूप काही राहून गेले
बापावरती लिहायचे, थोडे राहून गेले ...
-काव्यप्रसाद
प्रसाद गोठणकर
जीवनातील रगाड्यातून-
वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.
मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ' जीवमय ( प्राणमय ) live cells ' अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ' मृत dead cells ' संबोधीत.
हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.
यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.
नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.
मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
त्याची एकता करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी
हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन
आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी
तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही
दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले
दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे
मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा
ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो
राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना
हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
परवलीचाच शब्द आता
हे माझे अन तेही माझे
स्वार्थाचा हव्यास आगळा
जे आहे ते सारे माझे
खरे कुणाचे काही नसते
तसे जगणेच ठरते ओझे
प्रेमभाव एक बाजार आता
नाते एक कर्तव्याचे ओझे
सत्य केवळ श्वास क्षणाचा
अंती कळते रिक्तपण माझे
जेंव्हा होई जीव कासाविस
विसरूनी जाते तुझे माझे
********
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०८
२७/११/२०२२
चकित झाले गोकूळवासी
बघून बाललीला
सांगा कोण आहे तरी कृष्ण ?
विचारी यशोदेला ।।१।।
प्रासादातील मोदक खातां
तोंड ते उघडले
मुखामध्ये मोदक नसूनी
ब्रह्मांड ते दिसले ।।२।।
उच्छाद मांडूनी कालीयाने
पाणी केले दुषित
मर्दन करण्यासाठीं त्याचे
उडी टाकी डोहात ।।३।।
पूतना असूनी राक्षसिण
स्तनांत होते विष
स्तनपान करुनी त्यानें
तीला केले कासाविस ।।४।।
खोड्या बघूनी यशोदेनें
उखळाला बांधले
उखळासहीत झाडे पाडूनी
चकीत त्यानीं केले ।।५।।
अनेक अशा लीला करुनी
अचंब्यात पाडले
बालमुर्ति तो ईश असूनी
सर्वांस गुंगविले ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाङ्गमय निर्मितीला प्राचीन परंपरा आहे. अनेक प्रकारचे वाङ्गमय सर्वश्रुत आहे..कुठल्याही राष्ट्राची आद्य ओळख म्हणजे तेथील संस्कारीत साहित्य . प्राचीन संस्कृत साहित्य म्हणजे भारतभूमिचा विशाल , अथांग सागर असलेला साहित्यसंस्कारीत वारसा आहे . या साहित्य संस्कारांची शास्रीय , प्रतिभावंत परंपरेची महनीयता ही आद्य कवी व्यासांच्या समर काव्यापासून मानली जाते . अशा सहित्यश्रुंखलेची व्याप्ती प्रचंड आहे . संस्कृत भाषा तर सर्व भाषांची जननी आहे . आणी तिचे श्रेष्ठत्वही अबाधित आहे . मनुस्मृती पासून जर विचार केला तर त्याचे जीवनातील अनन्यसाधारण महत्व आपल्या लक्षात येते .
आपले प्राचिन ग्रन्थ रामायण , महाभारत , देखील महाकाव्ये आहेत. महाकवी वाल्मिकी , यांच्या नंतर महर्षी व्यासच संतश्रेष्ठ कवी झाले आणी त्यांच्या काव्याला आर्षकाव्य म्हणतात. महर्षी व्यासमुनी यांचेकडून एकही विषय लिहायचा राहिला नाही की ज्याला त्यांनी स्पर्श केला नाही . म्हणूनच " व्यासोच्छीष्टम जगत सर्वम असे म्हटले जाते .
संस्कृत कवी , कवीकुलचुडामणी महाकवी कालीदासाची साहित्य संपदा ही विलक्षण , उत्तुंग , प्रासादिक , वाङ्ममय आहे . त्या बरोबरच महाकवी अश्वघोष , पंडित कवी भारवी आचार्य कवी भट्टी राजकवी माघ राजकवी हर्ष * हे ही महाकवी होऊन गेले आहेत. या सर्वांबद्दल मी माझ्या महाकवी कालीदासादी वाङ्ममय या पुस्तकात सारांशरूप व्यक्त केले आहे .
साहित्य हे वैश्विक आहे.थोडक्या म्हणजे अल्प शब्दात आपल्या अंतरातील सारा भावकल्लोळ व्यक्त करणं म्हणजे कवीता . तर अत्यंत अल्प मनभाव किंवा एखादी छोटिशी घटना व्याप्त (विस्तृत्व) स्वरुपात शब्दबद्ध करणे म्हणजे लेखन मग ते ललित असेल कथा असेल कादंबरी म्हणजे साहित्य . पण साहित्यातील असणाऱ्या सर्व प्रकारात सर्वश्रेष्ठ प्रकार म्हणजे काव्य !
साहित्य ही तपश्चर्या आहे !
काव्य हाच साहित्यातील सर्वश्रेष्ठ प्रकार आहे .
कवीता करता येत नसते ..तर कवीता जन्मावी लागते .
साहित्यकला मानवी जीवनातील मंजुळ रुणझुणणारी बिरुदं आहेत . त्याचा नाद सातत्यांन निनादित राहावा या साठी आपण साहित्य सरस्वतीची निस्पृह तपश्चर्या करावी .
कारण साऱ्या ब्रह्मांडात सदैव चैतन्य प्रफुल्लित करणारा तोच एकमेव मूलमंत्र आहे असं मला वाटत ...!
आचार्य अत्रे यांनी आपल्या आयुष्याबद्दल लिहिले आहे की ..
" काय मौज आहे ! आयुष्य म्हणजे !...
प्रचंड मौज तीला अंतच नाही !!
पण कोणाला ?...
जो बघेल त्याला !...जो भोगेल त्याला .!
डोळ्यांना ढांपणे बांधून घाण्याभोवती फ़िरणाऱ्या बैलांना कुठली आली मौज ?...
त्यांना आयुष्य म्हणजे काळोख आणी कंटाळा..!
आयुष्य म्हणजे मानेवरचं जोखड़ !!
"तात्पर्य ! जीवनातील रसोक्तर्षाला स्पर्श करताना किंवा त्याचा आस्वाद घेताना बैल बनू नका ..!!!
.... *निदान ऑस्करचा नयनरम्य सोहळा अनुभवताना तरी.. सौन्दर्य उधळणारी धुंद रात्र पहा...!..सौंदर्य उधळणारी रात्र पहा..!!!!
लेखन हे अभिजात मुक्त स्वातंत्र्य आहे ..! फक्त त्या लेखनाला सुसंस्कृत संस्कारांची प्रबोधात्मक सुंदर अशी झालर असावी ..की जे लिखाण वास्तववादी आणी वाचनीय असेल.
लेखन ,साहित्य हे वैश्विक आहेच ! त्याला कुठल्याही भाषेचे बंधन नाही ..! सर्व लेखन साहित्यातील मौलिक विचारांचे प्रकटीकरण , सादरीकरण यातील वास्तवी वैचारिकता हाच मुळ गाभा असतो . शब्दान्ना शब्द जोडून केवळ लिहिणे म्हणजे साहित्य किंवा काव्य नसते... नव्हे.. अभ्यासक ,आश्वासक , आदर्शवत , असं लिहिणं ही एक तपश्चर्या आहे ..लेखनात खुप विविधता आहे ,प्रत्येक लेखक किंवा कवी यांचा स्वतंत्र बाज आहे , विशिष्ठ घाट आहे . तो किति समृद्ध आहे याचा विचार करुन त्याचा दर्जा समजतो ....
प्रत्येकाची लेखनशैली ही प्रतिभावंत असतेच , ती आपण सर्वानीच समजून उमजून घेतली पाहिजे ........
तसं पाहिलं तर प्रत्येक व्यक्ती ही साहित्यिक ( कवी/लेखक)असु शकते ..कारण प्रत्येक जीवनच एक स्वतंत्र कादंबरी आहे ! कथा आहे! कवीता आहे ! फक्त मुक्त व्यक्त होण्याची गरज असते ..हे ज्याला जमते ते लिहितात हेच सत्य आहे .जीवन जगताना सहवासात वाटयाला आलेले अनुभव ,दृष्टांत , आपल्याला जेंव्हा जेंव्हा अंतर्मुख करतात विचारशक्ती जागृत करतात ते भावविचार शब्दरूपाने आपण कुठल्या नां कुठल्या रूपांन .कुणी कथेच्या, तर कुणी कवीतेच्या , गीतांच्या किंवा लेखनाच्या माध्यमातून व्यक्त करतो ..लिहितो त्यातूनच साहित्य निर्मिती होत असते !..घन आशय सर्वारथाने अल्प मर्यादित स्वरुपात व्यक्त करणं म्हणजे कवीता / गीत . तर छोटा ( सुक्ष्म) आशय हा विस्तृत पद्धतीने मांडणं म्हणजे कथा / कादंबरी / साहित्य असते हे तर सर्वश्रुत प्रकार आहेत ......
शब्दमनभाव सुर ताल यांचे थवे जीवनात सातत्याने श्रावणी घनमेघा सारखे येत असतात . बरसतात ...अगदी टपटप गारांच्या वादळी पाऊसासारखे ...
त्याच शब्दमनभाव,कल्लोळाच्या स्फटिक गारा कवी , लेखकांनी अधिरतेने क्षणाचाही विलंब न लावता वेचायला हव्यात ...अन त्याचा आनंद ,आस्वाद स्वतःही घ्यावा आणी इतरांनाही देत रहावा . लिहित जावे ..! लिहित जावे ..! शब्दानच्यावर कधीही अन्याय करु नये ..ही शब्दभावनांची गंगोत्री आहे . तिच्यात प्रसन्नतेंन डुंबलं पाहिजे मग अंतरमन जीवनाच्या चिदानंदात तन्मयतेंन कृतार्थ झाल्याची जाणीव होते हे मात्र खरं ! प्रत्येक कवी/लेखकाच्या बाबतीत हेच घडत असते...साहित्यिकाचा जन्म होत असतो ......जाणकारांनी नवोदितांना कमी न लेखता सदैव मार्गदर्शन करीत रहावे ....ही एक छोटी अपेक्षा !
वाचकाने साहित्यिकाचे अंतरमन जाणुन घ्यावे लागते , एका वाचनात किंवा श्रवणात ते अंतरमन वाचका पर्यन्त पोहोचते असे नाही ....बा .सी मर्ढेकर - चित्रे - ग्रेस यांचे साहित्य वाचकांना गुढ किंवा दुर्बोध कां वाटते हे यावरून लक्षात येते.
" केशवसुत यांनी म्हटल्या प्रमाणे साहित्य ( काव्य/लेखन) हे आकाशाची वीज असते !........
तर गोविंदाग्रजांनी म्हटल्या प्रमाणे अशी वीज ज्या झाडावर पड़ते ते झाड़ हसत हसत मरण स्वीकारते.
... लेखन हे कधीच ठरवून होत नसतं ! अंतरातून वास्तव असा भावनिक विचार जन्मावा लागतो. त्याला विषयाचे बंधन नसते ..!
Poetry is a spontaneous overflow of powerful feelings recollected in tranquility.
- William Wordsworth
( From the 'Preface' to the 'Lyrical Ballads', 1798).
अहो जिचा जन्मच काळजात होतो आणी वाचल्यावर जी थेट काळजात जाऊन विराजते ती कविता...
शंभर शब्दांचा अर्थ अगदी एका ओळीत अगदी सहजपणे सांगून जाते ती कविता.
मूक मनांचे संवाद हे अंतरी पाझरत असतात ..त्या निर्मळ पाझरांची मंद झूळझुळणारी अशी परस्पर हॄदयांतील सप्तसुरांची सपमर्पित अशी नादमधुरता, अवीट प्रीतगंधी सात्विक भावनांची जाणीव करुन देतात . ...हे वास्तव फक्त जाणले पाहीजे ....मग त्यातून सुंदर अभिजात नवरसरंगी भावनोत्कट काव्य जन्मते.
शब्द हे देवदान असते !
जेंव्हा ओंजळीत पड़ते ,तेंव्हा पटकन झेलावे , तो क्षण परत कधी येत नसतो ..!!
फुल उमलतांना आवाज नसतो पण सुगंध व सौंदर्य त्याच्या बरोबर येत असते. तसे कवितेचे असते. भावनांचा सुगंध व शब्दांचे सौदर्य घेऊन जन्मते.
अनेक ज्येष्ठ कवी/ कवयित्री होऊन गेलेत. त्यांच्या सहज सुलभ रचना आजही जनसामान्यांच्या ओठावर आहेत. हे सर्वांनाच मान्य करावे लागेल..
काळजातून प्रसवलेले शब्द हे अंती सहृदयी व्यक्तीच्या काळजाला स्पर्श करतात ही वास्तवता आहे.. हे आपण सारस्वतांनी नाकारून चालणार नाही.
उमेचे रमेचे जसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माऊली पाउलांस * गदिमा
म्हणतात तर..
ज्येष्ठ कवीवर्य कै. लोककवी मनमोहन नातू म्हणतात.
उसे असावे गरुड पिसांचे
पिसे असावे ज्ञानेशाचे
बुडू बुडू घागर बुडूनी जावी
आणी तीरावर छाटी दिसावी
तर
शव कवीचे जाळू नका हो..
जन्मभरी तो जळतच होता
फुले तयावर उधळू नका हो..
जन्मभरी तो जळतच होता.
अशा अनेक रचना आहेत. त्याचा आपण आस्वाद घेऊन वाचन , मनन , चिंतन ,करून लिखाण केले पाहिजे .आत्ममुख होवून आपण लिहिले पाहिजे असे मला वाटते.
मराठी भाषेतील साहित्य खूपच सुंदर आहे .
काही शब्द हे द्वयअर्थी असतात ..हे सर्वश्रुत आहे .परंतु आपल्या वैचारिक प्रबोधनात्मक लेखनामध्ये कधिकधी तुलनात्मक सूचक शब्द वापरताना त्या शब्दाचा शक्यतो विपरीत अर्थ कुणी काढू नये म्हणून त्यासाठी समानार्थी शब्दांचा विचारपूर्वक उपयोग करावा , ते सहज शक्य ,सुलभ असते...अशा पूरक शब्दासाठी मराठी भाषा समृद्ध आहे ...उत्तम विचार संस्कारप्रचुत उत्तम सार्थ शब्दांनी काव्य तसेच लेखन अधीक परिणामकारक होत असते. काव्यातील शब्दलालित्य हे मनभावणांर असाव ....असं मला वाटतं !!! नमस्कार ..
विगसा..
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,
वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,
पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,
खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,
आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,
येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,
उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,
क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti