गुंतवणा-या परंपरा अन्
पंचांग मला दिसत नाही,
केला उपवास नाही तरी
देव माझा रुसत नाही .....
तिथी, वार-मुहुर्ताच्या
अडगळीत मी फसत नाही,
एक दिसाच्या भक्तीसाठी
देव माझा रुसत नाही .......
दलालांच्या जोखडात
कधीच ईश्वर बसत नाही,
दिला छेद परंपरेला तर
देव माझा रुसत नाही .......
तो असतो आमच्यात
आम्हालाच पटत नाही,
दुध तुपाच्या नैवद्यासाठी
देव माझा रुसत नाही .......
नसलो जरी नास्तिक मी
आस्तिक तेवढा दिसत नाही,
घेतलं नाही दर्शन तरी
देव माझा रुसत नाही .....
बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी
रात्र पडूनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १
बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे
लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २
अगणित बघुनी संख्यावरी प्रसन्न झाले मन
किती वेळ तो निघूनी गेला राहिले नाहीं भान ३
शितलेतेच्या वातावरणीं शांत झोप लागली
नयन उघडतां बघितले मी पहांट ती झाली ४
गेल्या निघूनी सर्व तारका आकाशाला सोडूनी
शोधूं लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५
चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली
सुचवित होती मिष्कीलपणें का तारकांच खाली ? ६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रावण नव्हता कुणी राजा, ती होती व्यक्ति ।
व्यक्तीचा तो इतिहास नव्हता, ती होती प्रवृत्ति....१,
आजही दिसती कित्येक आम्हा, रावण या जीवनीं ।
कशी रंगेल जीवन कथा, रावणा वांचूनी...२,
विरोधात्मक बुद्धी तुमची, अडथळे आणते ।
क्रोध, लोभ, अहंकार गुणांनी, प्रवाहाला रोकते...३,
सद्गुणांचा पाया खोलवर, जेवढा तो गेलेला ।
रावण वृत्ति हार जाईल, त्याच मग वेळेला....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दरवळता , भक्तीभाव अंतरी..
देवत्वाचा साक्षात्कार व्हावा..
बीजांकुर , सृजनाचा रुजता..
जीवनाचा गर्भितार्थ कळावा..।।१।।
शब्दांशब्दांमधुनी रंग हसावा..
श्वासाश्वासातूनी , तो गंधावा..
सुखदुःखाच्या आसवातुनही..
मंजुळ वेणूचा आनंद लुटावा..।।२।।
रानफुलातुनही भ्रमर गुंतता..
मंद प्रीतीचीच झुळूक यावी..
पर्णापर्णातुनी फुटता पालवी..
मम हृदयी आत्माराम हसावा..।।३।।
शब्द अबोली अन गहीवरता..
गंधचंदनी मना स्पर्शूनी जावा..
तृषार्थ व्हावे या अशा जीवनी..
आत्मरंगी आत्माराम भुलावा..।।४।।
वि.ग.सातपुते.(भावकवी.)
9766544908
रचना क्र. ६३
१२ - ५ - २०२१
कुणी म्हणावे श्रेष्ठ कुणाला । मानव हा आत्मस्तुती करतो ।
कुणा न येती भाषा बोली । हीच गोम हा जाणून घेतो ।।
निसर्गाने उधळण केली । अनेक गुणांची ।
मानवाच्या हाती लागली । 'कला' कल्पकतेची ।।
विचारांच्या झेपामधूनी । आकाश पातळ गाठले ।
प्रगतीच्या ह्या छलांगानी । श्रेष्ठत्व ठरविले ।।
दुर्बल केले इतर प्राणी । आणि त्यांच्या कलेला ।
विचारांना प्राधान्य देऊनी । ज्ञानी तो समजला ।।
मानवा लाभले विचार कल्पना । त्यातून आले शब्द भांडार ।
स्वतःला श्रेष्ठ समजत । गाजू लागला अधिकार ।।
आधार न घेता शस्त्र अस्त्राचा । सिंह बनला जंगल राजा ।
युक्ती चपलाई आणि विश्वास । हीच त्याची लक्षणे समजा ।।
घारीच्या द्दष्टीतील तीक्ष्णता । आणि सर्पचपळता ना अंगी आली ।
कोळी विनतो कलात्मक जाळे । श्वान शोधी स्वासांनी जे हरवले ।।
नृत्य बघा तुम्ही मोराचे । आणि आवाज ऐका कोकीळेचे ।
उलट्या सुलट्या मर्कट लीला । करमणूकीत परि मानव हरला ।।
आकाशातील भरारी पक्षांची । जात इंद्रधनुष्याखाली जेव्हां ।
दुर्बलतेची जाणीव देतो । मानवाला निसर्ग तेंव्हां ।।
सर्व कला विखुरल्या गेल्या । प्राणी जगतामाजी ।
हास्तगत त्या केल्या त्यांनी । हीच मानवी नाराजी ।।
जर कंठ फुटला, वाणी मिळाली । जिव्हां चलली प्राणी जगती ।
मानव होईल निर्वासित । आणि पळून जाईल मंगळावरती ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
शक्यता अजिबात का नाही ?
देव अस्तित्वात का नाही ?
मोकळा असतो बर्यापैकी
वेळ जाता जात का नाही !
चांगली ही, छान तीही पण..
पण तरी ती बात का नाही ?
काय आपण बोललो होतो
हे तुझ्या लक्षात का नाही ?
लागला बाजार सौख्यांचा
एकही स्वस्तात का नाही ?
पिंजर्याच्या आतला पक्षी
खात किंवा गात का नाही ?
एवढे उपकार कर बाबा
हे तुझ्या हातात का नाही
-- ॐकार जोशी
(९ डिसेंबर २०१८)
संथ झुळझुळणारी सरिता
किनारी जलझरे वाळवंटी
विराट! वटवृक्ष पारावरती
साक्ष आजही अनादीकाली.
अदृश्य घुटमळणारे आत्मे
भिरभिरती मोक्षमुक्तीसाठी
कर्मकांडांत, गुंतलेले जीव
कल्लोळ तो मायापाशांचा
काहूर! अंतरात आठवांचे
अंती तिलांजली आत्म्याला
प्रघात! सारेच केविलवाणे
अखंडित झुळझुळते सरिता
संस्कार सारेच मोक्षासाठी
भावकल्पनांच्याच श्रद्धा!
केवळ, सांत्वन मनामनांचे
अखंड प्रवाहपतीत सरिता
जन्मी! उलघाल जीवाची
धडपड सारी केविलवाणी
दोर प्रारब्धाचा दयाघनाचा
सत्य! श्वासांची पराधिनता
-- वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र. ५.
५ - १ - २०२२.
आम्ही साहित्यिक आहोत
रमू सदैव लेखणीत
लिखाणात भाव असोत
चलाख शब्द पेरणीत
सौ.माणिक शुरजोशी
आघात होवूनी परिस्थितीचे, सही सलामत सुटत असे
संकटाची चाहूल लागूनी, परिणाम शून्य तो ठरत असे...१
दु:खाची ती चटकती उन्हे, संरक्षणाची छत्री येई
कोणती तरी अदृष्य शक्ती, त्यास वाचवोनी निघून जाई....२
दूर सारूनी षडरिपूला, मनावरती ताबा मिळवी
प्रेमभाव तो अंगी करूनी, तपशक्तीला सतत वाढवी...३
तपोबलाचे बनूनी कवच, फिरत होते अवती भवती
दु:खाचे ते वार झेलूनी, रक्षण त्याचे सदैव करिती.....
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७०८५०
चला, आठवणींच्या गावा जाऊ, स्मृतींचे हिंदोळे झुलवत
पुन्हा एकदा लहान होऊ,
हाती हात मिळवत,--!!!
आठवांचे गावच रमणीय,---!!!!
किती नांदती सगेसोयरे,
हासुन आपले स्वागत करती,
त्यात बालपणीचे वडीलधारे,--!!!
शाळेतील शिक्षकांच्या हाती,
मुळीच लागायचे नाही,
त्यांनी केलेल्या कठोर शिक्षा, काहीच आठवायचे नाही,
आठवावा तो निरागसपणा,
निष्पाप कोवळे ते वय ,
अशावेळी हमखास येते,
मैत्रिणींची खूप सय,
कधी लुटूपुटूची भातुकली,
त्यातले खोटेच रुसवे-फुगवे,
आज डोळे गहिंवरती,--!!!!
पण वाहून ना जाती त्या सयी,
लग्न बाहुला-बाहुलीचे,
सासूने मागता हुंडा,
ठाम राहून नकार देत,
मुलगी परतवणे घरां,
बरोबर येई मग सासू,
हीच मुलगी करायची,
दोन तोळे जास्त घालू,
समजूत अशी काढायची,--!!!!
आट्यापाट्या लपंडाव लगोरी, किती त्यांच्या आहारी जाणे,
वेळ काळ विसरत सगळे,
त्यावरून बोलणी खाणे, बालपणीची ही धुंदी,,---!!!!
अजूनही गेली नाही,
भोंडल्याची खरी मज्जा,
आजच्या मुलीला कळत नाही,
पाच दहा पैसे परंतु,
कधी हाती ना लागले,
त्यासाठी किती सायास कित्येकाना पटवावे लागले,--!!!
हिरव्या लाल गाभुळल्या चिंचा, आवळे जाम आणिक बोरे,
त्यांची किंमत सांगा आज,
थोडी आठवून बघा बरे,--!!!
मे महिन्याच्या सुट्टीत कसा,
घरात घालायचा धिंगाणा,
जो येईल तो ओरडे,
पण विचारलेच नाही कुणा,--!!!
पापड पापड्या कुरडया,
पदार्थांची रेलचेल असे,
कामाच्या सांगून नावाखाली, पळवापळवी" ठरलेली असे,
वेळ येता आजोबांचा,
मिळे खंबीर पाठिंबा ,
त्यांच्या प्रेमापुढे गप्प सगळे,
हिंमत"" व्हायची नाही कुणा,--!!!
किती अशा आठवणी,
शब्दच अपुरे पडती,
*स्वप्नातील हे गाव ठरते,
डोळे उघडून बघा भोवती*,--!!!
हिमगौरी कर्वे©
Copyright © 2025 | Marathisrushti