कुणी असे कोणी तसे,
कित्येक काही ठरवतात,
मध्येच काय मग बिनसते,
सगळेच डाव मोडतात,--!!!
कोण येते आणिक आपुली,
जादू करुनी जाते,--
नाम तिचे असते नियती,
नियत ते परास्त करते,--!!!
ठरवून गोष्टी बिघडती,
आकस्मिक बसतात धक्के,
एकदम मग कोण कसे,
माणसास कळून चुके, --!!!
राजकारण,अनीतीअन्याय,
किती गोष्टींचे आपण बळी,
सत्तालोलूप मदांधांमुळे,
जनता चिरडली जाई खरी,--!!!
पैसा एक मुख्य कारण,
नाती सडती त्यामुळे,
प्रेमातही कठोर व्यवहार,
केला जातो त्या कारणे,--!!!
नियती गालात हसते,--
जेव्हा सुख एखादे पदरी,
थोडे थांब ती म्हणते, -
दाखवते तुज किमया सारी,-!!!
- व्यक्तिगत, सामाजिक,
आर्थिक अशी किती संकटे, मनुष्यमात्र तिच्यापुढे भोगी,
करत करत सारखी दुष्कर्मे,---!!!
अहंता, स्वार्थ, भांडणे,
किती तिचे सेवक असती, बघता-बघता ताबा घेऊन,
तुम्हाला लोळवून टाकती,--!!!
प्रेम, माया, जिव्हाळा, आपुलकी ज्यांना कधीच कळत नाही,
नियती तिथे फासे टाकी,
कोपर्यात बसून गंमतपाही--!!!
हिमगौरी कर्वे.©

का रमाकृष्ण ना कोणी वदले?.....
राधे कृष्ण राधे कृष्ण, मी ही मनापासून वदले
हरि सोबत तु असतानाही, रमाकृष्ण ना कोणी वदले .....
ना तुझे नाव माझे झाले, ना तुझे मन माझे झाले
रंग मलाही सावळा लागला, तरी रमा कृष्ण ना कोणी वदले ....
तुझी राधेवरची ती माया, का रे एकदाच सारे घडले
मी अर्धांगिनी रुक्मिणी, तुझी वाट पाहुनी थकले .....
तुझी संपूर्ण मी होऊनही, अपूर्ण काहीसे राहीले
संगम मनाने केला मनाशी, तरी मनोरमा नाही बनले ....
स्वर गुणगुणनारी ती, बासरी एकदाच तिच्याशी हसले
जे तुला कधी न कळले, ते सारेच तिने जाणिले ....
हरि बनुनी येउनी जा, एकदा रमेचे होऊनी जा
जाता जाता वृंदावनात, रमाला राधा बनवूनी जा ....
-- स्वाती पवार
आज कुणाच काय भरवसा
रडते जीवन ढसाढसा // धृ //
प्रेम दिसेना जगांत कोठे
ह्रदया मधले सरले साठे
ओढ कुणाची कुणा न वाटे
ओरड करुनी कंठ न दाटे
सुकुनी गेला घसा
रडते जीवन ढसाढसा - – - १
बाप ना भाऊ इथे कुणाचा
लोप पावला कढ रक्ताचा
मायमाउली सहज विसरते
काळ तिचा तो नऊ मासाचा
फुटला नात्याचा आरसा
रडते जीवन ढसाढसा – - – 2
सुरक्षतेचे कवच दिसेना
शब्दावरी विश्वास बसेना
दुर्मिळ झाली त्याग भावना
कदर कुणाची कुणी करेना
इथे लागतो केवळ पैसा
रडते जीवन ढसाढसा – - – ३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
शेतकरी राजा
आहे जगाचा आधार
भुकेचा भार
त्याच्यावरी ..... १
पुण्यवान राजा
खळगी भरवी पोटाची
सार्या जगताची
एकटाच ..... २
गाळूनी घाम
त्यानं फुलवलं रानं
पिकविलं सोनं
शेतामध्ये .... ३
शेताच्या बांधाला
खातो चटणी भाकर
लागते साखर
घामामध्ये ....४
धरणीचा लेक
करी काळ्याईची सेवा
पिकवितो मेवा
जगासाठी. .... ५
करी परोपकार
ह्या सार्या जगावरी
स्वर्ग भूवरी
उतरितो ..... ६
-- कवीराज - महेश पुंड
तुझी पावलं माझ्या दारावरून जाताना
मी पुसली नाही कधी तुझी पाऊलवाट
नि ठरवलं नव्हतं येणं
कधीच त्यांच्यामागून |
मस्त रंगले होते मी माझ्यातच
माझं काही मला खरंच द्यायचं नव्हतं
पण तुझी पावलं थबकली माझ्या दारात
तेव्हा देऊन बसले सारंच मंत्रमुग्धेप्रमाणं
माझे प्राण...माझे श्वास.....माझं जगणं...
आता दूर गेलास तर
माझे प्राण नसतील माझ्याजवळ संपवण्यासाठीसुध्दा
एखादा श्वासही तुझ्याकडून उसना घ्यायला हवा !
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
एकटाच बसलो होतो, खोलीमध्यें शांत
करमणूक करीत होते, दुरदर्शन आत..१,
दूरीवरील व्यक्ती बघूनी, शब्द त्याचे ऐके
केवळ चावी फिरवितां क्षणी, दृष्य दुजे देखे...२,
जगामधली सर्व ठिकाणें, खोलीत अदृष्य तीं
साधनांचा उपयोग करीता, जाण त्याची येती....३,
वातावरण निसर्गाने, व्यापले सर्व जगी
सुक्ष्मापासूनी अनंततेचे, गुण एकाचे अंगी....४,
तेथे आहे जे येथेही, व्यापूनी सर्व स्थळी
ब्रह्माडांची व्यापकता, बिंदूत एका सगळी....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जगामंदी व्हावी थोर
मनी अशी एक आशा
मातीच्या गंधाने शोभे
मराठी जी मातृभाषा
डंका तिचा वाजतील
मराठमोळी लेकरं
बोल तिचे घुमतील
साताही समुद्रापार
सदैव तिच्या रक्षणा
तत्पर आपण राहू
तिच्या या सामर्थ्याने
नभदिशा धुंद पाहू
अभिजात सहवास
लाभे अनादिकाळाने
चंद्र, सूर्य, तारे नभी
येतील पुन्हा नव्याने
जोडतो मनांत तारा
सह्यगिरीवरी वारा
तिचे गुणगाण गाऊ
तिची आरतीही करा
असा तिचा लाभे लळा
मायलेकरू जिव्हाळा
नम्र असे माझा माथा
जसा पुरात लव्हाळा
विठ्ठल जाधव
शिरूरकासार,जि.बीड
सं. ९४२१४४२९९५
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदेव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात सामवतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडित ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मीलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभु मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जीवंतपणीच तुम्हीं प्रभुमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti