(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • जीवनाचा खरा आनंद

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा ।।धृ।।

    बालपणाची रम्यता मजा केली खेळ खेळता
    निरोप देता बालपणाला नाद गेला खेळण्याचा ।।१।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    तारुण्याचे सुख आगळे मादकतेने शरिर भारले
    बहर ओसरु लागला दूर सारतां घट प्रेमाचा ।।२।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    प्रौढत्वाची शानच न्यारी श्रेष्ठतेची ठरे भरारी
    येतां दुबळेपणा शरिराला उबग येई संसाराचा ।।३।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    जीवनातील प्रत्येक पायरी मजलागी आनंदी करी
    परी त्या क्षणिक सुखाला संबंध होता देहाचा ।।४।।

    केव्हां मिळेल मजला आनंद जीवनाचा

    आहे सारे प्रभूचे भाव अर्पा मनाचे
    समर्पण करा देहाचे त्याग करा सर्वस्वाचा ।।५।।

    तेव्हांच मिळेल खरा आनंद जीवनाचा

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • अर्पण

    मी माझे सर्वस्व तुला अर्पण करून
    तुमचा निरोप घेईल

    मुलांनो, मी माझी विनम्रता गिळंकृत केली आहे
    मी माझी बनावट संपत्ती तुमच्या नांवे वारस ठेऊन जात आहे

    मी महाज्ञानी आहे
    मी नेहमीच गांभीर्य पांघरून फिरतो
    मला प्रत्येक भेटणारा माणूस मूर्ख वाटतो
    मी ही मुर्खता तुला स्वाधीन करून जात आहे

    मी तुला माझे भरजरी वस्त्र,
    माझे भाषा वैभव
    आणि माझा अहंकार
    तुला अर्पण करून निरोप घेईल

    मी कचरा पेटीत फेकून दिली आहे
    सारी सहजता आणि तरलता
    मी गंभीर राहील त्या क्षणा पर्यंत
    जो पर्यंत माझा सन्मान होत राहील

    जरा कुठे माझ्या विरोधात सूर निघतील
    तेव्हा पहा माझी मानसिकता, आक्रास्ताळेपणा
    आणि शारीरिक हिंसा

    माझ्या आत दडला आहे हिंस्त्र पशु आहे व
    बाहेर मी एक आदर्श पुरुष आहे,
    माझ्या मुलांनो तुम्हाला
    अर्पण करील माझा हा दुटप्पीपणा

    मी छता वरून लाँच झालेले
    रॉकेट आहे
    का मोडक्या झोपडीतून
    हवेत फेकलेला भाला आहे,
    मी काय होतो या पेक्षा
    जास्त महत्वाचे आहे की
    मी काय झालो आहे,
    जे काही असेल ते
    अर्पण करून निरोप घेईल

    गल्लीत बलात्कार असो, दंगल असो
    मी तुला माझा शेळपटपणा अर्पण करून
    शिकवून जाईल
    कसे शेपूट घालून
    दार खिडकी बंद करून घरात रहावे,

    शेजारील घरात गरीब मुले भुकेने मरत आहेत
    तू मात्र गिळत रहा शिरापुरी भजे, सुका मेवा
    मी तुला ही अव्वल निष्ठुरता
    अर्पण करून निरोप घेईल

    तुला पावलो- पावली दिसतील
    अर्धनग्न मळकट पिचलेली
    असंख्य बालके आणि बाया
    तू त्याकडे दुर्लक्ष करीत
    तुझी किमती बनारस साडी
    आणि पॅन्ट सावरीत
    अलगद निघून जा
    मी तुला ही महान बेफिकीरी निर्लज्ज-परंपरा अर्पण करून निरोप घेईल

    माझे साहित्य जगात वाचले जाते
    अनेक भाषेत माझ्या पुस्तकांचा
    अनुवाद झाला आहे
    या अहंकाराच्या दुनियेत फुगून जाईल
    आणि हीच हवा तुझ्या डोक्यात भरून
    मी तुझा निरोप घेईल

    माझे जे जे काही आहे
    ते ते तुला अर्पण करून
    तुमचा निरोप घेईल

    -- मूळ हिंदी कविता-
    ~अनामिका अनु
    मराठी अनुवाद- विजय नगरकर

  • चंद्राचे कायम स्वरूप

    ठेवून पाऊल चंद्रावरी अभिमान तुला वाटला /
    मान उंचावूनी आपुली वर्णन करीता झाला //

    चंद्र आहे ओबड धोबड तेथे सारे खडकाळ असे /
    झाडे झुडपे पशु पक्षी हवा पाणी कांही नसे //

    नमुने आणले दगड मातीचे चंद्रावरी तू जाऊन /
    शुष्क आहे वातावरण असेच केले वर्णन //

    बघितले बाह्य रूप ह्या रजनीकांताचे /
    थोटका पडलास तू शोध घेण्या अंतरीचे //

    तेच आहे मधुर चांदणे चंद्रातील शितलतेचे /
    आजही वाटतो आल्हाद बघता रूप पौर्णिमेचे //

    चंद्र आहे कवीची स्फूर्ती बालकाचे तोच गीत /
    प्रेमिका देण्या आनंद मग्न तो सदोदित //

    चंद्र आहे मुकुट मणी निसर्गाच्या सौंदर्याचा /
    ऐकून त्याचे बाह्य रूप आनंद कमी न होई त्याचा //
    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

    bknagapurkar@ gmail.com

  • प्रदूषण (९)- कैन्सर ट्रेन

    शेतात टाकले
    विषाक्त रसायने
    तिकीट कैंसर ट्रेनचे
    एडवान्स काढले.

    टीप : रोज बठिंडा पंजाब येथून एक ट्रेन बीकानेर, राजस्थानला जाते. त्या ट्रेनचे नावच लोकांनी कैंसर ट्रेन ठेवले आहे. या ट्रेन मध्ये कैंसरग्रस्त शेतकरीच असतात.बीकानेर येथे कैंसरचे मोठे हॉस्पिटल आहे. आता बठिंडायेथे हि कैंसर हॉस्पिटल निर्माणाधीन आहे.

  • घे भरारी उंच तू

    शिखरासही जिंक तू
    घे भरारी उंच तू
    घे भरारी उंच तू......
    येतील वादळे
    भयान अती ते
    भेद त्या वादळाला
    आहेच रे अजिंक्य तू
    घे भरारी उंच तू
    घे भरारी उंच तू......
    घेऊन वारे पंखामध्ये
    सामावून घे जग तुझ्यात
    बनून यारा आसमंत तू
    घे भरारी उंच तू
    घे भरारी उंच तू.......
    अंधारी वाटा तुला
    आल्या कधी कुठेही
    हो अंधाराचाही अंत तू
    घे भरारी उंच तू
    घे भरारी उंच तू.....
    तुफान अडवण्याची
    ताकद तुझ्यातच आहे
    घे गरुड झेप तू
    घे भरारी उंच तू
    घे भरारी उंच तू

    कवी - महेश सुखदेव पुंड
    तामसवाडी,ता- नेवासा ,जि - अहमदनगर
    मो - 8459043090

  • वाटेवरील वळणावर वळण

    वाटेवरील वळणावर वळण
    तू घेऊ नको
    ओल्या भावनेत डोकावून
    तू थांबू नको
    मनातल्या मनात मोहरुन
    तू जाऊ नको
    भाव व्याकुळ स्वप्नांत
    तू येऊ नको
    हृदयस्थ हृदयात जीव
    तू लावू नको
    आरक्त डोळ्यांत तुला
    तू शोधू नको
    शब्दातल्या शब्दांचे चांदणे
    तू लेवू नको
    मधाळ मधाचे जाळे
    तू वेढू नको
    भावनेतल्या भावनांचे भाव
    तू व्यापू नको
    स्पर्श मलमली होता
    तू लाजू नको
    लाजणाऱ्या लाज गाली
    तू पाहू नको
    गंधाळल्या वाटेवर त्या
    तू दूर नको
    -- स्वाती ठोंबरे.
  • या मनाचे त्या मनाला

    या मनाचे त्या मनाला
    शब्द सारे भाव उलगडते
    काव्यांत जीव व्याकुळ
    कवितेचे लेणे कवीला लाभाते..
    या हृदयाचे त्या हृदयाला
    शब्द सारे बंदिस्त होते
    बहरतो कवी कवितेत आल्हाद
    कवीचे मन वेगळे जरा असते..
    या अंतरीचे त्या अंतराला
    शब्दसाज कवितेत गुंफून राहते
    मरेल कवी या दुनियेतून जरी
    कवीच्या कवितेचे नक्षत्र अमर होते..
    -- स्वाती ठोंबरे.
  • स्वप्नातली अपूरी इच्छा

    दुपारचे ते भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
    झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,

    वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
    स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,

    पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
    घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,

    खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
    खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,

    आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
    टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,

    येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
    बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,

    उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
    हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,

    क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
    खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०

  • अगम्य

    अगाध लीला अनामिकाची
    अतर्क्य अगम्य ब्रह्मांड सारे
    सुख दुःखांची उन , सावली
    जीवनी प्रारब्धाचे भोग सारे....

    शिशुशैशवी जीणे निरागस
    प्रगल्भ मनी , हव्यास सारे
    स्वार्थी मनीषा , सारेच माझे
    मृगजळा पाठी धावती सारे....

    भावभावनांचे शुष्क कंगोरे
    इथे प्रीतभाव सुकलेले सारे
    मनामनात मौन साशंकतेचे
    संपले विश्वासाचे नाते सारे....

    कधीकधी वाटते सुर जुळले
    क्षणार्धात हरवूनी जाते सारे
    जरी वाटले , निश्चिंती जगावे
    तरी कर्म भोगावे लागते सारे....

    संसाराची , कसरत विलक्षण
    मोहपाशी मन गुंतन जाते सारे
    काय मिळविले , काय हरविले
    विचारात , जगणेच सरते सारे....
    *********

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २७७

    २९/१०/२०२२

  • छत्रपती शिवाजी महाराज

    छत्रपती शिवाजी महाराज

    विचारावे कोणी मला

    आणि मी सांगावे

    माझा आदर्श कोण ?

    छत्रपती शिवाजी महाराज

    आणखी कोण ?

    इतिहासातील आवडती तुझी

    थोर व्यक्ती कोण ?

    देवतुल्य शिवराय आणखी कोण ?

    इतिहास भिनलाय

    माझ्या नसानसात

    मराठ्यांच्या शौर्याचा

    त्यांच्या चातुर्याचा आणि

    धर्मावरील प्रेमाचा...

    शिवराय नसते तर ?

    मी ही नसतो नाही ?

    हा प्रश्न नाही तर

    एक विचार आहे...

    महाराष्टाला ज्याने

    अस्मिता दिली

    हिंदुत्वाला ज्याने

    संजीवनी दिली

    हिंदूंना ज्याने

    अभिमान दिला

    ते माझे राजे

    छत्रपती शिवाजी महाराज...

    मी त्यांना रोज मनात स्मरावे

    हृदयात जपावे आणि

    वर्तनात उतरून दाखवावे

    त्यांच्या जयंती दिनी

    फक्त करावी याची उजळणी...

    हीच आहे माझी त्यांच्या

    पवित्र चरणी

    पुष्पांजली...

    कवी - निलेश बामणे