March 8, 2022
October 15, 2012
उठा उठा हो सकळजन
स्वागत करु या रविउदयाचे
फूलून जाते जीवन ज्याने
त्या सूर्य आगमनाचे //धृ//
उषाराणीची चाहूल येता
चंद्रतारका ढळल्या आतां
चराचराना जागे करण्या
चाळवी निद्रा हलके हाता
वंदन करु या लिन होऊनी
चरण स्पर्शुनी उषाराणीचे //१//
स्वागत करुया रविउदयाचे
रंगबेरंगी सुमने फुलली
वाऱ्यासंगे डोलू लागली
दरवळूनी तो सुगंध सारा
वातावरणी धुंदी आणली
मकरंदापरि चंचल होऊनी
स्वाद घेवूया त्याच फुलांचे //२//
स्वागत करुया रविउदयाचे
पक्षी येती किलबील करिती
उठा उठा ते सांगुन जाती
कुजबुज करिती राघू मैना
ताना मारित कोकीळ गाती
कुक्कुटाची ती बांग तुतारी
आरंभ करिती पक्षीगीतांचे //३//
स्वागत करुया रविउदयाचे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
February 5, 2021
सध्या सगळ्यांचे स्टेटस रंगीत दिसतात,
पण आयुष्य मात्र काळं-पांढरंच असतं.
चेहऱ्यावर हसू, डोळ्यांत स्वप्नांची झळाळी,
मनात मात्र दडलेली असते वेदनांची कहाणी.
फिल्टर लावून क्षण सुंदर करता येतात,
पण नशिबावर फिल्टर कधीच लावता येत नाही.
क्षणभराच्या पोस्टला हजारो लाईक्स मिळतात,
पण दुःखाच्या क्षणी हात मोजकेच पुढे येतात.
दिसतं सगळं उजळ, आकर्षक, झगमगणारं,
पण वास्तव मात्र शांत, कठीण आणि संघर्षमय असतं.
रंग पडद्यावर नाही, तर माणुसकीत असतात.
खरी श्रीमंती पैशात नाही, तर नात्यांत असते.
म्हणून स्टेटस रंगवण्यापेक्षा मन रंगवा,
दिखावा मिरवण्यापेक्षा माणुसकी जपा.
कारण...
स्टेटसचे रंग काही क्षणांचे असतात,
पण चांगल्या कर्मांचे रंग आयुष्यभर टिकतात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
July 7, 2026
बड्या धेंड्याचा देहान्त जाहला,
राजकारणी खुर्च्याचा त्राता निवर्तला,
जनसागर अवघा शोकसागरात बुडाला
अश्रूंचा (कोरड्या) अन् पूर लोटला
का कोण जाणे कुणास कसला
पत्ताच नव्हता शोक कशाला?
शोकग्रस्त जीवांनी गच्च भरले
तरीही राजमहाल अपुरे पडले
हार वाहिले, पुष्पचक्र अर्पिले
तरी बरेच काहीसे अजूनी उरले
एकाकी तू असा निजलास का रे
कुणी न तुजला वारस का रे
शोक न कुणाचा, पाठिंब्याचा
हुद्याचा वा मुद्याचा
एकही न कसले फूल बिचारे
तुजवर पडले; काय अरेरे!!
अहा रे त्याचे जीवनही प्यारे, मरणही न्यारे
तूच अभागी मग असा कसा रे
तुला सजविले, मरणही बिचारे
प्रमाद एकच घडला तवहाती रे
असशील वेचले, देशासाठी प्राणा रे
कधी न इच्छिलेस तू अभाग्या
मोल तुझे अधिकार हुद्यात रे
हो जागाही नगण्य तुझ्या चिरनिद्रेतून
हसतमुखाने; आश्चर्य लपवून
हो सामील या मिरवणुकीत
जबरदस्तीच्या तीनतेराच्या दुखवट्यात
हा दोष न कुणाच्या माथी रे
देश अपुला हुद्दासत्ताक रे
तुला न मिळावा हा मान उपेक्षिता
फुका खपलास भूमिसाठी या करंट्या
जरी न केले त्याने काही देशासाठी रे
हुद्दा त्याचा होता फार मोठा रे
असता जर तो तुझ्याही जवळी
तो मान मग तुलाही मिळता रे
अनमोल तुझ्या कार्यापेक्षा
होता विचार हुद्याचा तुझ्या रे
हुद्याचा तो मान वेड्या रे
तुझा न् माझा नव्हता रे
घडले दोन मृत्यू: मात्र एक फरकाचा
होता एक व्यक्तीचा दुसरा मात्र हुद्याचा
-यतीन सामंत
September 18, 2022
भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
मातेहूनही ती मोठी,
भाषा देतसे अधिक वेलांटी,!
ती आहे सृजनांत ,
सर्वांची काळी आई,
तिच्या कुशीतून जन्म घेतो,
आपण सारे, पक्षी, प्राणी, --!
ती करते जसे संगोपन,
जिवांचे नित्य जतन,
म्हणूनच तिला रोज करावा,
नेमाने आपण प्रणाम,---!
काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
जीवनातील संजीवनी,
तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!
जोडीदार आभाळाची,
विशाल त्यांचा संसार
लेकुरे उदंड जाहली,
गोकुळ सगळा परिवार,--!
माती पोटी जन्मते बीज,
आणि विशाल वृक्ष होती,
कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
हीच बिजे मातीत रुजती,--!
फळे-फुले रसरशीत,
कधी पिकून पडती,
त्यातूनच पुन्हा जन्मती
मातीतून परत वरती,--!
मानवी शरीर पार्थिव,
मातीतच शेवट अंत,
तिच्यातून असे जन्म,
तिच्यात एकरूप परत,---!!
© हिमगौरी कर्वे.
March 1, 2020
शब्दभावनांची झाली उधळण
August 31, 2021
भरवशाची घेऊन शिदोरी, पाऊलवाट ती चालत होता
कुणीतरी आहे मार्गदर्शक, ह्यापरी तो अजाण होता
बरसत होती दया त्याची, जात असता एक मार्गानी
आत्मविश्वास डळमळला, बघूनी वाटेमधल्या अडचणी
संशय घेता त्याचे वरती, राग येई त्याच कारणें
विश्वासाला बसतां धक्का, आवडेल कसे त्यास राहणे
ओढून घेई मृत्युचि आपला, अकारण तो त्यास दुरावूनी
जागृत होता पुनरपि विश्वास, संशय जाई दूर पळूनी
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
January 1, 2019
ज्याच्यासाठीं व्याकूळ झाली, उभी अयोध्या नगरी,
कां धाडिला राम वनीं ? कैकयीला भरत विचारी ।।धृ।।
आम्ही बंधू चौघेजण,
झालो एका पिंडातून,
कसा येईल भाव परका ?
असतां एकची जीव, चार शरीरीं
कैकयीला भरत विचारी ।।१।।
वचनपूर्ती ब्रीद ज्याचे,
आदर्श जीवन रघूवंशाचे,
कसली शंका मनांत होती ?
पारख ना केलीस, त्या हिऱ्याची परी,
कैकयीला भरत विचारी ।।२।।
सर्व जणांचे प्राण होता,
जगणे कठीण झाले आतां,
रोष कशाला घेसी त्याचे,
अकारण ते आपल्या शिरावरी ?
कैकयीला भरत विचारी ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
April 17, 2021
किती खाल्ला मार, किती खाल्या शिव्या याची गणतीच नव्हती.
एकच गोष्ट सतत कानी पडत होती.
उनाड आहे, बावळट आहे, धडपड्या आहे, तडफड्या आहे, मूर्ख कुठचा.
भडीमार होत होता आईकडून शब्दांचा..
आम्ही होतो बालपणीच गांधीवादी.
एका गालांत कुणी मारली तर दुसरा गाल पुढे करणारे.
मुकाट्यानें मान वर न करता सारे शब्द पचविणारे.
खेळणें, कुदणें, उड्या मारणें,
त्यातच ढोपर, कोपर, हातपाय फुटून जाणें, भळभळा रक्त वाहायचे.
पण सांगा रडून कुणाला ?
कारण ते असायचे स्वतःच्याच प्रतापाचे...
निमुटपणें बाजूस बसून, सहन करायचे
आणि कुणास समजू नाहीं म्हणून माती टाकायचे.
भरत होत्या साऱ्या जखमा हलक हलके.
न भरून कसे चालायचे ?
मस्तीची रग, खेळातील धडपड आणि स्वत:च डॉक्टर बनून जखामाबद्दल वाटणारी मायेची कढ.
सारे तुटून पडायचे, घाव बरे करण्यासाठी.
... संध्याकाळची वेळ, सूर्य अस्ताला चाललेला.
किती घटका राहील्या होत्या त्याला डुबण्यासाठी !
विचार करितो मी. शांत बसून पंचाहत्तरीच्या काठी.
हातपाय खाजवितो, कुरवाळीतो सुरकुतलेल्या कातड्याकडे बघतो.
मध्येच नजर खिळून राहते ती जखमांच्या वणावर.
कितीतरी लहान मोठ्या आकाराची.
ज्यावर दिसत होती चित्रे आठवणीची.
प्रत्येक वणावर होता एक इतिहास, एक घटना, एक जबरदस्त प्रसंग.
कोडगे बनून केलेली मस्ती, आईचा मार, शिव्या आणि बाबांचा राग.
पण आज सारे काही मनाला आनंदीत करून टाकणारे.
शरिरावरले वण बनले होते एक जीवन आलबंम.
नेत होते भूतकाळांत.
जो होता निश्चित आणि उपभोगलेला.
त्यात भविष्यकाळाची अनिश्चितता नव्हती कि वर्तमान काळाची क्षणिकता.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
September 25, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti