हवी कशाला चिंता आता
जिथे सावरणारी साथ आहे
रोज निरनिराळी आव्हाने
तुझे चैतन्य, सामर्थ्य आहे
जरी विरोध पावलोपावली
सत्यार्थी! मी निश्चिन्त आहे
आकांत जीवनी जरी माजला
तुझीच, कृपावंती साथ आहे
जपाव्या कोमलांगी भावनां
ती सुखाची फुलवात आहे
सांगा साध्य कोणते जीवनी
मूल्य मानवतेचे जपणे आहे
कसला, कुठला दुजा भाव
सत्य! क्षणभंगुर जीव आहे
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ८२.
१५ - ३ - २०२२.
पहाटेच्या दवात भिजलेली एक वाट,
क्षितिजापर्यंत पसरलेली नामाची प्रभात.
खांद्यावर भगवी पताका, ओठी विठ्ठलनाम,
पाऊलोपाऊली उमलत जाते जीवनाचे गूढ धाम.
ही वाट केवळ पंढरीकडे वळत नाही,
ती माणसाला माणसाशी जोडत राहते.
हातात हात, नजरेत विश्वास,
मनामनांतील अंतर हळू हळू कमी होतं जाते.
टाळांच्या नादात केवळ लय नसते,
ती काळजाच्या ठोक्यांची भाषा असते.
मृदंगाच्या प्रत्येक स्पंदनातून
संतविचारांचा नवा सूर जन्म घेतो.
इथे पुस्तकांची पाने उघडत नाहीत,
उघडतात अंतःकरणाची कवाडे.
इथे अक्षरांपेक्षा माणसे वाचावी लागतात,
आणि शब्दांपेक्षा अश्रू समजून घ्यावे लागतात.
पायांवरील फोड सांगतात कष्टाचे सौंदर्य,
घामाचे थेंब शिकवतात संयमाचे ऐश्वर्य.
दुःखाच्या वाटेवर चालतानाच
सुखाचा अर्थ उलगडत जातो.
दिंडीत चालताना जातपात नाहीशी होते,
अहंकार धुळीत मिसळतो.
उरते फक्त एकच ओळख
"मी वारकरी... विठ्ठल माझा."
चंद्रभागेच्या वाळूत
काळही क्षणभर नतमस्तक होतो.
विटेवरच्या सावळ्या मूर्तीकडे पाहताना
डोळे भरून येतात,
आणि अंतर्मनात प्रकाश उगवतो.
वारी म्हणजे चालतं-बोलतं विद्यापीठ
अनुभव हा गुरु,
जीवन हे पाठ्यपुस्तक,
भक्ती ही परीक्षा,
आणि पदवी मिळते माणूस झाल्याची.
जो ही वाट एकदा मनापासून चालतो,
तो पंढरीहून कधीच पूर्वीसारखा परतत नाही.
त्याच्या पावलांनी अंतर जिंकलेले नसते,
त्याच्या अंतःकरणाने विश्व कवटाळलेले असते.
विठ्ठल भेटतो विटेवर नव्हे,
तर माणसाच्या माणूसपणात.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
मध्य रात्र झाली होती, सारे होते शांत ।
रस्त्यावरती तुरळक व्यक्ती, वाटला एकांत ।।
एक गाडी मंदिरीं थांबली, त्याच शांत वेळीं ।
सूटामधली व्यक्ती कुणी एक, आली दारा जवळी ।।
सारे होते नशिबात त्याच्या, धन संपत्तीचे सुख ।
दिवस घालवी मग्न राहूनी, कार्ये पुढती अनेक ।।
तर्कज्ञान तीव्र असूनी, आगळा बाह्य चेहरा ।
परि अंर्तमन सांगत होते, सत्यास शोध जरा ।।
केव्हां केव्हां विजय होई, सुप्त त्या विचारांचा ।
संकोचल्या मनीं गाभारा बघे , रात्री मंदिराचा ।।
डॉ, भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गोपी :
तेजस नीलमण्यांचा मळा
राजस वनमाळी सांवळा ।।
नयनमनोहर रूप सांवळें
मनीं उतरलें कैसें, न कळे
न होइ तृप्ती, बघण्यां होती नयनिं प्राण गोळा ।।
नील कमलदल, भ्रमरपुंजही
श्यामल यमुना, श्यामला मही
नीलमेघ जलभरले, तैसा हा घनश्याम निळा ।।
मोरपीस शोभतें शिरावर
श्यामल तनुस खुलवी पीतांबर
कटीं बासरी, करीं घोंगडी, तुलसीमाळ गळा ।।
किति सांगूं श्रीहरिचें कौतुक
शब्दशब्द मज बनवी भावुक
जन्मजन्मिंचें पुण्य म्हणुन, हरि बघते नजडोळां ।।
खचितच आहे मंदबुद्धि मी
साती लोकीं मोद शोधि मी
आनंदाचा कंद पुढे , मग जगिं कां धांडोळा ?
- - -
- सुभाष स. नाईक
M- 9869002126
आपलंच मन , आपलेच "विचार" ,
पण त्याचेही असतात अनेक प्रकार .... आजूबाजूच्या गोष्टींसारखे ...
वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!
काही विचार “पिंपळपाना” सारखे ..
मनाच्या पुस्तकात वर्षानुवर्षे जपून ठेवत ; त्याची जाळी करण्यात मजा असते !!
काही विचार “फुलपाखरा” सारखे ..
वेळीच कोषातून बाहेर काढत ; मुक्तपणे व्यक्त करण्यात मजा असते !!
काही विचार “नो एंट्री” सारखे ..
चुकीचं आहे याची कल्पना असूनही ; “कधीतरी” हळूच जाण्यात मजा असते !!
काही विचार “वाळवी” सारखे ..
मनाला पोखरून काढायच्या आत ; ताबडतोब नष्ट करण्यात मजा असते !!
काही विचार “छोट्याश्या रोपट्या” सारखे ..
छान खतपाणी घालून संगोपन करत ; हळूहळू फुलवण्यात मजा असते !!
काही विचार “फुग्या” सारखे ..
उगाच फुगवता फुगवता फाटकन फुटून ; भानावर येण्यात मजा असते !!
काही विचार “उतू जाणाऱ्या दुधा” सारखे ..
कितीही लक्ष ठेवलं तरी शेवटच्या क्षणी ; धावत जाऊन गॅस बंद करण्यात मजा असते !!
काही विचार “पहाटेच्या कोंबड्या” सारखे ..
झाकून ठेवले कितीही तरी ; शेवटी आरवण्यातच मजा असते !!
काही विचार “पहिल्या पावसा” सारखे ..
सोबत छत्री असूनही ; चिंब भिजण्यात मजा असते !!
काही विचार “समुद्राच्या लाटे” सारखे ..
आपली ईच्छा असो वा नसो ; उसळत्या प्रवाहासोबत ढकलले जाण्यात मजा असते !!
काही विचार “चकव्या” सारखे ..
कितीही दूर गेलो तरी ; पुन्हा पुन्हा तिथेच गुरफटण्यात मजा असते !!
काही विचार “हिमानगा” सारखे ..
इतरांना फक्त टोक दाखवत ; आपल्या अंतरंगात बरंच काही दडवण्यात मजा असते !!
काही विचार “फूलटॉस बॉल” सारखे ..
आल्या आल्या लगेचच ; चेंडू सीमापार करण्यात मजा असते !!
काही विचार “डोंबाऱ्यांच्या खेळा” सारखे ..
तारेवरची कसरत करत कसंबसं ; सावकाशपणे निभावून नेण्यात मजा असते !!
काही विचार “वातकुक्कुट यंत्रा” सारखे ..
ज्या दिशेला वारा वाहील ; त्या दिशेला भरकटण्यात मजा असते !!
काही विचार “झाडांच्या मुळा” सारखे ..
आली संकटं कितीही तरी न डगमगता ; ठाम ठेवण्यात मजा असते !!
काही विचार “ऋतूं” सारखे ..
वेगवेगळ्या परिस्थितीनुसार रंग बदलत ; निसर्गचक्र सुरळीत ठेवण्यात मजा असते !!
काही विचार “सिग्नल” सारखे ..
थोडं थांबून योग्य मार्ग निवडत ; पुढचा प्रवास करण्यात मजा असते !!
काही विचार “कापरा” सारखे ..
कितीही आपल्याच जवळ ठेवावेसे वाटले ; तरी उडून दरवळण्यात मजा असते !!
काही विचार या “वरच्या प्रकरांच्या यादी” सारखे ..
एकापुढे एक कितीही सुचत असले ; तरी योग्य वेळी थांबण्यात मजा असते !!
आपलंच मन , आपलेच "विचार" ,
पण त्याचेही असतात अनेक प्रकार .... आजूबाजूच्या गोष्टींसारखे ...
वेगवेगळे प्रकार समजून घेत ; त्यातली गंमत अनुभवण्यात मजा असते !!
©️ क्षितिज दाते , ठाणे
आवडल्यास शेअर करायला माझी काहीच हरकत नाही ..
काहीतरी आहे असे जे
तुझ्यात मुरले आंत आहे
राख तू होशील तेव्हा ते
जाईल म्हटले जात आहे।।
तुझ्यात मुरले आंत काही
वेगळेच हमखास आहे
नावडो आवडो कुणालाही
त्यानेच जीवन खास आहे ।।
वेगळेच हमखास त्याने
पोसलेला पिंड आहे
तरीच ना? हरघडी नव्याने
लढवतोस तू खिंड आहे।।
पिंड असूदे नसूदे न्यारा
'अंतरंग' वेगळा आहे
जगण्याच्या तुझ्या कलेला
त्याचाच रंग सगळा आहे ।।
-- मी मानसी
मानसी कावले
मानवता जागवली जाते
नसानसात जिथे
संस्कृती फोफावली जाते
आदर्श घडतात तिथे (१)
-- सौ.माणिक शुरजोशी
हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला
विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला.... ।। धृ ।।
खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,
पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी
सैल कर तू पाश आपला...१,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी
कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी
नकोस देऊ वाव शंकेला...२,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,
ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,
जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे
आठवण करीता येईन भेटीला...३,
हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
काय आणि कसे बोलतो,
त्यांना माहीत नव्हते,
सहजपणे सुचणारे,
संभाषण ते असते ।।१।।
शिक्षण नव्हते कांहीं,
अभ्यासाचा तो अभाव,
परि मौलिक शब्दांनी,
दुजावरी पडे प्रभाव ।।२।।
जे कांहीं वदती थोडे,
अनुभवी सारे वाटे,
या आत्म्याच्या बोलामध्ये,
ईश्वरी सत्य उमटे ।।३।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti