१ - राजहंस
बाकावर एकटा तो
मागे गरीब बसतो
तरी राजहंस आहे
श्रेष्ठ बुद्धीत असतो
२ - शहामृग
आहे पंख भव्य दिव्य
नाही उडताच येत
देती दिलासा हे पाय
धावण्यास बळ देत
३ - गिधाड
तोंड वेंगाडती सारे
नाव ऐकताच माझे
स्वच्छ ठेवी परिसर
अरे मित्र आम्ही तुझे
-- सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
विसरून गेलो सारे कांहीं,
आठवत नाही मला,
रचली होती एक कविता,
त्याच प्रसंगाला ।।१।।
जल्लोषांत होतो आम्हीं,
दिवस घातला आनंदी,
खिन्नतेचा विचार त्या दिनीं,
शिवला नाही कधीं ।।२।।
नाच गावूनी खाणेंपिणें,
सारे केले त्या दिवशीं,
बेहोशीच्या काळामध्यें,
कविंता मजला सुचली कशी ।।३।।
छोटे होवून गेले काव्य,
अमर राहिले आतां ते,
प्रसंग जरी तो मरून गेला,
कविता जिवंत राहते ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कृष्ण कमळ-
माणसाला वाटत राहतं
पाखरं त्यांना घाबरतात
म्हणून पिकात
बुझगावणं उभारतात
अाळशी माणसाच्या
सवयी त्यांना माहीत होतात
बुझगावण्याच्या अंगाखांद्यावर
पाखरं मस्त खेळत राहतात.
छानपैकी दोस्ती करतात....
-- श्रीकांत पेटकर
मदमत्त मुजोर टगे भरले सभोवताली
फुटके नशीब माझे गुंडांचिया हवाली ।।
दिनरात राबतां मी, दो घास फक्त हातीं
खेचून घेत तेही उपरेच शक्तिशाली ।।
काळोख मिट्ट, तरि ना मागूं धजे दिवा मी
घर पेटवून द्याया चहुंवर खड्या मशाली ।।
माझ्यामुळेच ज्यांचा जगिं मान वाढताहे
दाबून ओठ, करतो त्यांचीच मी हमाली ।।
मधुनीच हात स्फुरती, पण हाय रे नशीबा !
नाही कणा, बसे मी घालून मान खाली ।।
तक्रार कुठे नेऊ ? मी दाद कुणां मागू ?
चढवून सभ्य बुरखे, सारे उभे मवाली ।।
-- सुभाष स. नाईक
मुंबई.
M- 9869002126.
जगण्यात मौज आहे,
सुखदुःखाची फौज आहे,
रिवाजांचे शासन आहे,
रीतींचे आसन आहे,
आश्वासनांचे नभ आहे,
निराशांचा पाऊस आहे,
क्वचित आशेचा किरण आहे,
कल्पनांचे साम्राज्य आहे,
वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे,
संताहून हळवे कुठे मन आहे,
देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे,
अत्याचाराचा विळखा आहे,
कधी प्रेमाचा झरा आहे, जिव्हाळ्याचा शब्द बोलका,
मुके प्रेम कधी थोर आहे,--!!
आभाळाहून मोठे मन आहे, विहिरीत कोंडलेले कधी सान आहे,
सुदैव कधी जादूगार आहे,
कधी दुःख मोठे प्रहार आहे,--
जीव कधी कसानुसा आहे,
कधी कधी त्याला भरवसा आहे, दुनियेत कधी ईश्वराचा वास आहे मध्येच कधी, राक्षसी भास आहे,--!
*जगण्यात मौज आहे,
सुखदु:खांची फौज आहे*---!!!
हिमगौरी कर्वे.©
कशांत दडले समाधान ते
शोधत असतो सदैव आम्ही
धडपड सारी व्यर्थ होऊनी
प्रयत्न ठरती कुचकामी
बाह्य जगातील वस्तू पासूनी
देह मिळवितो सदैव सुख
क्षणीकतेच्या गुणधर्माने
निराशपणाचे राहते दुःख
'समाधान' ही वृत्ती असूनी
सुख दुःखातही दिसून येती
चित्त तुमचे जागृत असतां
समाधान ते सदैव मिळते
सावधतेने प्रसंग टिपता
समाधान ते येईल हाती
सुख दुःखाला दुर सारता
अंतरभागी समाधान दिसती
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
मजला नव्हते ज्ञान कशाचे, पद्यामधल्या काव्य रसाचे ।
कोठून येते सारी शक्ती, काव्य रचना करूनी जाती ।।
अवचितपणे विचार येतो, भावनेशी सांगड घालीतो ।
शब्दांचे बंधन पडूनी, पद्यरूप जातो देऊनी ।।
सतत वाटते शंका मनी, हे न माझे, परि येई कोठूनी ।
असेल कुणी महान विभूती, माझे कडूनी करवून घेती ।।
तळमळ आता एक लागली, जाणून घ्यावी शक्ती आगळी ।
अर्पीन माझे प्राण त्याला, स्फूर्ती देवता जो मज झाला ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti