मातेच्या उदरांत असतां,
जाण असते त्या जीवाला,
प्रभूचाच मी अंश आहे,
सांगत असतो तो सर्वाला ।।१।।
सो s हं चा निनाद सतत,
कानास आमच्या ऐकूं येतो,
'तो' मीच आहे शब्दाने,
आत्म्याचेच अस्तित्व सांगतो ।।२।।
मातेच्या उदरांतूनी बाहेरी,
पडतां स्वतंत्र जन्म मिळे,
नाश पावूनी साऱ्या स्मृति,
स्वत:सहित विसरे सगळे ।।३।।
आतां त्याचा निनाद ‘को..हं’,
प्रश्न युक्त तो भरला असे,
“मी कोण आहे ?” विचारी सर्वां,
उलघडा त्यास होत नसे ।।४।।
जाणून घेण्या स्वत: विषयीं,
सारे आयुष्य खर्च करती
पुनरपि येतां स्मृति त्याला,
प्रभूमय हे सारे भासती ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार
सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां १
वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी
मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां २
न कळला ईश I न उमगले आयुष्य
दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे ३
अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट
प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता दाखवी ४
तैसा गुरू तुमचा I पडदा फाडी अज्ञानाचा
मार्ग दाखवी जीवनाचा । आनंद मिळण्यासाठी ५
गुरूविना नाही ज्ञान I दूर करी तुमचे अज्ञान
ज्ञान ज्योत देई पेटून । तुमच्या ज्ञानदिपाची ६
ओळखावा आत्माराम I जाणावा ज्ञानराम
समजावे मनोराम I आपल्या देहातील ७
गुरू असता देहमंदिरी I कां फिरतोस दारोदारी
करावी श्रद्धा प्रभूवरी I आत्म गुरूसी जाणोनी ८
गुरू भेटणे कठीण I जाणील त्यासी कोण
जवळी तुमच्या असून I कां शोधतासी ९
तुमचा गुरू अंतर्मनी I महत्व त्याचे जानोणी
घ्यावे त्यास ओळखूनी । हेची तुमचे यश १०
जाणावे आत्मज्ञान I करावे स्वचिंतन
तोच गुरू असून । उद्धारूनी नेई ११
ज्याचा गुरू त्याचे जवळ I मग का दवडसी वेळ
शोधण्यास जाई काळ I निरर्थक १२
आयुष्य आहे थोडे I चित्त द्यावे प्रभूकडे
जीवनाचे उकलेल कोडे I त्याच्या आशिर्वादे १३
जीवनाचे मर्म I जाणावे हा धर्म
त्याचप्रमाणे करावे कर्म I आयुष्य सार्थकी होणेसी १४
गुरूसी करावे वश I समजोनी त्यास ईश
घ्यावा त्याचा उपदेश I जीवनाचा १५
एकदा अंतर गुरू लाभता I उपदेश त्याचा मिळता
मार्गदर्शन सतत होता I तुमच्या जीवनाचे १६
श्रेष्ठ गुरू अंतरीचा I परि विवेक पाहीजे मनाचा
सराव करावा एकाग्रतेचा I उपदेश त्याचा घेण्या १७
अंतरज्ञान मिळे कठीण I करावे लागते बहुत चिंतन
श्रद्धा प्रभूवर ठेवून I ध्यान करावे १८
एकाग्रतेचे चिंतन I लागता प्रभूध्यान
विचार रहीत करावे मन I प्रकाश पडेल अंतरमनी १९
आंतरमनातील प्रकाश I चेतना देईल सावकाश
आनंदी करील आयुष्य I गुरू बनोनी तुमचा २०
रोज करावे ध्यान I मनी एकाग्र भाव आणून
जाता बाह्य जगाला विसरून I नियमाने २१
योगाचे आसते सामर्थ्य I जीवनाचा दाखवी अर्थ
न जाई प्रयत्न व्यर्थ I विश्वास ठेवावा प्रभूवर २२
गुरू तुमच्या अंतरी I शोधता त्यासी बाहेरी
हिच शोकांतिका खरी I तुमच्या जीवनाची २३
सारे जीवन वाया जाई I जीवन तत्व ध्यानी न येई
पश्चातापूनी उपयोग नाही I शेवटचे क्षणी २४
चार दिवसांचे जीवन I सार्थकी लागावे म्हणून
पाया त्याचा आत्मज्ञान I समजोनी घ्यावा २५
संशय मनी न यावा I ध्यानयोग सिद्ध करावा
तोच आपुला गुरू समजावा । अंतरात्मा २६
गुरू नसतो कुणी व्यक्ती I अंतर्मनातील ती शक्ती
आत्मा त्यास संबोधती । विद्वान जन २७
जागृत अंतरात्मा । तोच होय परमात्मा
श्रम न येई कामा । शोधता देहाबाहेरी २८
तुमचा गुरू तुमचेपाशी । परी तुम्ही वाट चुकलासी
जाणोनी घ्यावे गुरूसी । आत्मचिंतनाने २९
प्रत्येक ती व्यक्ती । तिच्यातील सुप्त शक्ती
सूचना देत असती । जिवन मार्गाच्या ३०
जागृती आसवे चित्ती । चेतवावी सुप्त शक्ती
मार्ग तयांना दिसती । ज्ञान प्रकाशाने ३१
एकाग्र ज्याचे मन । न होत चुका त्याचे कडून
संसार सागर जाय पोहून, केव्हांही ३२
असावा आत्मविश्वास । मिळेल त्यासी यश
मदत करी ईश । तयांना
आत्मबल महान । मार्ग त्यासी दिसून
यश करी संपादून । जीवनाचे ३४
इच्छा तेथे मार्ग असती । अंतरगुरू मार्ग दाखविती
श्रद्धा ठेवावी त्याचे वरती । ध्येय गाठण्यासाठी ३५
आपण चुका करिती । दोष प्रभूसी देती
नशीबास नावे ठेवती । अज्ञानामुळे ३६
निर्णयाचे बहूत क्षण । सुख - दु:खे त्यावरी अवलंबून
जीवन होई कठीण । चूक तुमची घडता ३७
चूक होते विचारांची । परिस्थिती जाणण्याची
चाहूल न येती संकटाची । तुम्हांसी ३८
भावना आणि विचार । यांची मर्यादा असणार
नियती तिला न कळणार । हाच आहे निसर्ग ३९
आपण जगतो विचाराने । आपल्यातील भावनेने
परंतु जगावे आत्मज्ञानाने । हाच यशाचा मार्ग ४०
आत्म्याचे सामर्थ्य श्रेष्ठ । त्यास कळे इष्ट
अंश प्रभूचा स्पष्ट । असे तो एक ४१
म्हणून जाणावे आत्मज्ञान । जावे त्यास शरण
अंशात्मक परमात्मा समजून । चिंतन करावे त्याचे ४२
निर्णय कधी न चुकती । जेव्हां तो आत्मा देती
योग्य निर्णय आनंदती । तुम्हां लागी ४३
आत्मज्ञान हाचगुरू । सुप्त शक्ती जागृत करू
निर्णय त्याचे शिरी धरू । हाच करावा संकल्प ४४
एकाग्र होता मन । लागेल तुमचे ध्यान
निर्णय तोच देईन । तुमच्यातील सुप्त शक्ती ४५
प्रसंग येता तुमचे वरी । एकाग्र चित्ती विचारी
आत्मगुरू निर्णय करी । तुमचे साठी ४६
आत्म्त्याचा निर्णय । समाधान देय
चुका न होय । कधीही ४७
जीवानाचे सार । समजता ईश्वर
आत्मज्ञान गुरूवर । विश्वास ठेवावा ४८
आत्मज्ञान गुरू । चिंतन त्याचे करू
मार्ग तोच धरू I जीवन यशासाठी ४९
आत्मज्ञान असे महान II घ्यावे समजोनI सर्वांनी ५०
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
राम : ( सीताहरण झाल्यानंतर रामांचा विलाप) –
हे खग, मृग, हे तरुवर श्रेणी, हे अंबर अवनी
पाहिलीत कां सांगा कोणी सीता मृगनयनी ? १
मम सीता सौंदर्यखनी ।।
लावण्याची अनुपम मूर्ती
फिके तिजपुढे कांचन, मोती
पूर्णेंदूसम आभा वदनीं, घाली मज मोहिनी ।। २
जिला वराया धनू भंगलें
जनकसुतेनें हृदय जिंकलें
नभिंची ती दामिनी, जाहली रामाची स्वामिनी ।। ३
गर्भरेशमी वस्त्र त्यागुनी
वल्कल ल्याली राजनंदिनी
दिसे शोभुनी अधिक त्यांमधें दीप्त अप्सरेहुनी ।। ४
पर्णकुटी प्रासाद कराया
तिला आगळी अवगत माया
भेटे रात्रंदिनीं अयोध्या तिच्यामुळें विपिनीं ।। ५
एकलाच मज येउं देइना
हट्टच धरला संगें येण्यां
कैसी लपली आतां, लोटुन मला एकटेपणीं ? ६
तिजविण राघव निरर्थ आहे
जीवन तिच्यामुळे सार्थ आहे
व्यापुन टाकी अस्तित्वा माझी जीवनसंगिनी ।। ७
ज़ळे पालवी भाग्यद्रुमाची
नुरे पाकळी सुखकुसुमाची
वेरहवेदनाकाट्यांनी झालो घायाळ मनीं ।। ८
मरस्थलासम जीवन भासे
क्षणाक्षणाला ऊष्ण उसासे
क्लेशआतपीं सुकून गेलें नयनींचें पाणी ।। ९
अस्तित्वाचा स्रोत आटला
कंठीं व्याकुळ प्राण दाटला
फुंक चेतना ईशा, देउन सीता-संजीवनी ।। १०
- सुभाष स. नाईक
स्फुर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं ।
चटकन कागदावरी लिहीली शब्द येतां ध्यानी ।।
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार ।
कौतूकाची येई भावना बघुनी शब्द भांडार ।।
पुर्ण करुनी कविता टिपूनी घेतली वहीत ।
काव्य रचना परत वाचतां मग्न झालो आनंदात ।।
फेकूनी दिला कागद ज्यावरी रचिली कविता ।
विचारांत होतो धुंद कृत्य केले मी अजाणतां ।।
अघटित घटना झाली काव्य स्फुर्ति गेली निघूनी ।
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनीं ।।
चूक मनां उमगली अपमान केला अजाणतां ।
शारदा कागदावरी अवतरली बनोनी एक कविता ।।
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजलीं केले अर्पण ।।
पुनरपि सुचले काव्य लिहूं लागलो कविता ।
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरतां ।।
अनावधाने झाला मजकडूनी अपमान ।
प्रायश्चित्त घेतां गेला शारदेचा राग निघून ।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
नववधू
नवासाज
लालेलाल
रंगी आज
खुले रंग
मेहंदीचा
प्रेमभाव
हा प्रीतीचा
हाती चुडा
भरला गं
येई आता
साजण गं
सलज्जता
वाढलीच
हाती हात
गुंफलीच
गौरवर्णी
हातावरी
मेहंदिची
नक्षी खरी
जाई आता
सासरला
गुंती मन
माहेराला
मनातुनी
बावरली
सख्या भेटी
आतुरली
मालत्यांनी
ओटी भरा
लेक जाई
तिच्या घरा
सौ.माणिक शुरजोशी
नाशिक
ओठावरले गीत माझे, आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता, ओठ कसे हे सुकून गेले....।। धृ ।।
आकाशातील थवे पाहूनी,
चंचल माझी नजर झाली
भिर भिरणाऱ्या दृष्टी पटावर
असंख्य चित्रे उमटूनी गेली
चित्र बघूनी नाचे मन जे
पाषाणा परी स्थिर कां झाले....१
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
झूळझूळ वाहे सरीता पाणी
पाण्यावरती दिसे तरंग
हलके हलके भिजवी अंग
पुलकीत करी रोम रोम जे
थंड आज परि होता दिसले....२
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले,
सारे कांहीं तसेच आहे
सभोवतालचा निसर्ग ठेवा
अंतर्मनही माझे आपले
लुटीत असे जो सुखद मेवा
परि दोन्हीमधले अंतर ते
आज भासते दूर जाहले...३
ओठावरले गीत माझे आज कसे हे रुकून गेले
गीतामधले शब्द रूकता ओठ कसे हे सुकून गेले
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
स्वातंत्र्यदिनी मातृभूचे आक्रंदन
घामेजले शरीर, भडका दिशांत झाला
दूषित भूमी झाली, वारा विषारी झाला
तोडुनी वृक्षराई, डोंगर उजाड केला
निसर्ग कोपूनिया दुष्काळ माथी आला
स्वातंत्र्यतेज आमुचे, सारे दूषित झाले
आम्हीच हे स्वहस्ते, ऐसे अघोर केले
ऐशा कुकर्मी आज,जनताच त्रस्त सारी
स्वातंत्र्य हे कशाचे? ना संपली गुलामी
सारे विषारी अन्न,भाजीत विष मिळते
पाणी नदीतले ही, सारे अशुद्ध झाले
ही स्वैरता अघोरी, कैसा विकास झाला
स्वातंत्र्य भोगताना, हा सर्व घात झाला
संस्कारहीनतेसी, येथे मिळे प्रतिष्ठा
ढोंगीच तज्ञ बनती, तज्ञां मिळे उपेक्षा
सेंद्रिय नासवोनी, करतात रोज हत्या
ही लादली गुलामी,कैसी स्वतंत्र जनता
ही आजची अवस्था नाही उगाच झाली
सात्विक वारशाची आम्हीच हानी केली
स्वातंत्र्य गर्जताना, स्वार्थां जतन केले
आम्हीच मातृभूला, ऐसे उजाड केले
स्वैराचारी जमते जनता
एकच त्यांचा असतो गलका
मोफत सारे द्या द्या म्हणती
धोंडे मारत दंगे करती
कर्जे घेऊनी फेड न करती
स्वैराचारे व्यसने करती
राष्ट्रहिताचा विचार सोडूनी
संविधान हे सहजी मोडिती
जनसेवेची करूनी चेष्टा
उपभोगिती जे सदैव सत्ता
निवृत्तीचे वेतन घेती
पुन्हा पुन्हा जरी निवडून येती
या स्वैरतेस आज देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
तोंडात एक भाषा, पोटात देशद्रोह
राष्ट्रास तोडणारे , ऐसे अभद्र भाव
निसर्ग आणि भूमी,केली उजाड ऐशा
ढोंगीजनांस आता, देण्यास तीव्रधक्का
येणार कोण बोला, येणार कोण बोला
रचनाकार : देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने.
मोबाईल : ९८८१३७३५८५
एकत्र येऊं सारेजण
विसरुन जाऊ भेदभाव
जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //धृ//
ऐष आरामांत राहून
देह झाला मलीन
शरीर सुखासाठी करती
नाना खटपटी
आज आहे सण होळीचा
नष्ट करा ऐहिक भाव
जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //१//
मन असे चंचल भारी
सर्व दिशेने घेई भरारी
राग लोभ अहंकार
मनाचे तर हे विकार
टाकता मलीनता मनाची
पेटलेल्या होळीकडे, घे धांव
जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //२//
विसरुनी चाललो मानवता
प्रत्येक बघतो स्वार्थता
विश्वासाचे आपले नाते
विसरुन गेले सारे ते
निस्वार्थी बुद्धीने आतां
जाणा इतर मनाचे ठाव
जाळून टाकू होळीमध्यें
दुष्ट असतील ते स्वभाव //३//
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लासिक चित्रपटात या चित्रपटाचा समावेश होतो. मोहम्मद सादिक दिग्दर्शित या चित्रपटात गुरुदत्त आणि वहिदा रहेमान यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Copyright © 2025 | Marathisrushti