आता साहेबांनी या गोष्टींचा विचार करून सक्रीय राजकारणातुन निवृत्ती घेऊन पूर्णवेळ इतिहासाच्या अभ्यासाला द्यावा म्हणजे आजवर जसे राजकारणात राहून शेतकऱ्यांचे भले केले तसे आता तुमच्या अभ्यासामुळे इतिहास संशोधकांचा देखील फायदा होईल.
कथा, कादंबरी, नाटक,कविता… साहित्य प्रकार कुठलाही असो त्यातील शब्द हेच महत्वाचं हत्यार असतं. या हत्याराला वाक्यांची दमदार मूठ लावली की साहित्यातली शब्दकळा फुलू लागते. प्रतिभावान लेखक कवी मग एक ओघवती भाषशैली निर्माण करतो आणि आपण त्यात गुंतून जातो. मात्र चित्रपटात फक्त अशी भाषा असून चालत नाही कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे. चित्रपटात कथा कादंबरी सारखे हवे तितके वा हवे तसे वर्णन पडद्यावर दाखविणे शक्य नसते. अशावेळी अभिनेत्याने म्हटलेले संवाद आणि कॅमेऱ्याने टिपलेल्या हालचाली या चित्रपट कथेला पूढे नेत रहातात. चांगले संवाद हा चिपटाचा प्राण असतो. कारण आपण ते ऐकत असतो, बाकी तर डोळ्यानां दिसतच असतं……..आपल्या चित्रपटसृष्टीत एक मोठी समस्या आहे ती म्हणजे कलावंताना फारच लवकर “टाईपड्” केले जाते. मग या प्रभावातून बाहेर यायचे कसे? हा मोठा प्रश्न असतो. शेवटी चित्रपट व्यवसायाचा अंतीम घटक प्रेक्षकच असतो. यामुळे अनेकदा अनेक कलावंताची अभिनय क्षमता असूनही त्याच त्याच भूमिका कराव्या लागतात.
“बाई” आणि “मास्तर”…तसे सामान्य वाटणारे हे दोन शब्द आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. मात्र हे शब्द जेव्हा या अभिनेत्याच्या मुखातून बाहेर पडत तेव्हा या शब्दांची भयावह सूचकता लक्षात येत असे. ओठांची विशिष्ट हालचाल करून डोळ्यांचा तिरपा कटाक्ष समोर फेकत काहीशा बसक्या पण घोगऱ्या आवाजात जेव्हा निळू भाऊ हे शब्द उच्चारत तेव्हा हा माणूस किती पाताळयंत्री असेल याची कल्पना प्रेक्षकानां येत असे. मला तरी आज पर्यंत त्यांच्या सारखी बेरकी नजर असणारा दुसरा कलावंत डोळ्या समोर येत नाही. खरं तर तमाशा प्रधान मराठी चित्रपटातील खलनायकाची छबी पण टाईपड् झालेली होतीच. तेच ते गुरगरने, भुवया उंचावून बोलणे, मिशीवर ताव देत संवाद म्हणणे यात खलनायक अडकून पडला होता. मात्र अनंत माने यांच्या १९६८ मधील ‘एक गाव बारा भानगडी’ या तमाशापटाने एक नवा खलनायक दिला “झेल्या अण्णा”. किडकिडीत अंगकाठी, हातात धोतराचा सोगा धरून चालण्याची एक खास ढब, अंगात जाकिट अन् डोक्यावरची कपाळवर झुकलेली तिरकस टोपी. मग थेटरात होणारी काहीशी मस्तवाल एंट्री….. चित्रपटाच्या सलामीच्या दृष्यात दिसणारा हा माणूस नेमका कसा असेल याचा थांगपत्ताच लागत नाही. किंबहूना हा माणूस खल नायक असू शकेल याच्या सुतराम शक्यता वाटत नाही. त्यातील दादा साळवी, बर्ची बहाद्दर वा गुलाब मोकाशी यांच्या समोर निळू भाऊ खूपच किडकिडीत दिसले पण शेवटी बाजी मारली झेल्या अण्णाने. लोक नाट्यातुन रंगभूमि गाजवणाऱ्या कलावंताची ही पहिलीच दमदार एंट्री होती. ‘झेले अण्णा’ या नावाला निळू भाऊ व्यतिरिक्त कुणी कलावंत इतका चपखल बसू शकला असता काय?
निळू भाऊनी मराठी चित्रपटातील जुना खलनायक मोडून एक नवीनच खलनायक जन्माला घतला. त्याचे शिक्षण मॅट्रीक पर्यंतच झाले होते. गार्डनिंगचा कोर्सही केला होता. तरूणपणी पूण्यातील ‘आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज’च्या उद्यानात माळी म्हणून काम केले. याच काळात त्यांचा राष्ट्रसेवा दलाशी संपर्क आला. याच काळात त्यांना वाचनाची गोडी लागली. राष्ट्रसेवा दलाचे कला पथक हे त्यावेळी चळवळीचे मूख्य शस्त्र होते. या कला पथकात त्यांना त्यांच्या आवडीचा अभिनय करण्यास वाव होता. याच काळात त्यांनी उद्यान नावाचे एक नाटक लिहले.
नंतर १९५७ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हे वगनाट्य लिहले. या वगनाट्यात त्यांनी पहिल्यांदाच अभिनयाची चूणूक दाखविली. नंतर पुलंच्या ‘’पूढारी पाहिजे’’ या नाटकातील रोगें या व्यक्तीरेखेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नतंर ‘कथा अकलेच्या कांद्याची’ हे वगनाट्य आले आणि मग ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचले. दोन हजाराच्यावर प्रयोग झालेल्या या वगनाट्यातील भूमिकेने त्यांना चित्रपटसृष्टीची दारे खुली करून दिली.
गावोगाव हे वगनाट्य सादर करतानां निळूभाऊना आलेल्या अनुभवामुळे त्यांचा अभिनय एकीकडे समृद्ध होत गेला तर दुसरीकडे सेवादलातील संस्कारामुळे सामाजिक जाणीवेचा पिंड पोसला जाऊ लागला. उतर आयुष्यातील त्यांनी केलेल्या सामाजिक कामाचा मूळ स्त्रोत हा असा होता. १९७२ मध्ये खळबळ उडवून देणाऱ्या ‘सखाराम बाईडंर’ने त्यांना प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर नाव लौकीक मिळवून दिला. समिक्षकांनी देखील निळूभाऊच्या आशयाचे स्वागत केले. नंतरच्या चित्रपटातील व्यस्ततेमुळे रंगभूमीवरील जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सूर्यास्त त्यांची काहीशी मोजकीच पण दर्जेदार नाटके आली आणि त्यांच्या अभिनयाने गाजली. सत्ताधऱ्यांचा माज आणि रगेल व रंगेलपणा निळूभाऊनी असा काही उभा केला की प्रत्यक्षात ही असेच असतील का? असा सभ्रंम निर्माण व्हावा. अर्थात सत्याची किनार असलेल्या बहुतांश अशा व्यक्तीरेखा काल्पनीकच असतात. त्यांचा खलपणा त्या शिवाय स्पष्टपणे लक्षात येत नाही. हे करतानां त्यानी राजकारणी सत्ताधिशांचे खरे पैलूही नजरे समोर आणून दिले. स्त्री लंपटपणा तर ते असे अभिनीत करायचे की कधी एकदा नायक याला झोडपून काढतो याची प्रेक्षक वाट बघायचे. राम नगरकरांनी एकदा त्यांच्या विषयी आठवण सांगताना म्हटले होते की- त्यांना एकदा त्यांचे मित्र घरी जेवायला घेऊन गेले. जेवण वगैरे पार पडले. त्यांची ओळख करून द्यावी म्हणून ते बायको मुलींना बोलवायला आत गेले तर सगळेच रागात !!!! आई तर म्हणाली- कोणत्या घाणेरड्या माणसाला घरी बोलावले तू…. ‘मेला किती वाईट आहे तो तुला माहित तरी आहे का?’ ही तर त्यांच्रा कामाख्ची पावती होती. असाच प्रसंग प्राणने देखिल एका मुलाखती प्रसंगी सांगितला होता. निळू भाऊ मला मराठी चित्रपटातले प्राणच वाटतात. निळूभाऊनी ग्रामीण जीवन खूप जवळून अनुभवले असल्यामुळे त्यांचे निरीक्षणही सूक्ष्म होते. या निरिक्षणांचा चपखल वापर ते आपल्या व्यक्तीरेखेत करीत असत.
निळूभाऊनां अशा प्रकारच्या खलनायकानं बऱ्याच अंशी लपेटून घेतेले खरे पण त्यातही त्यांचा वेगळपणे ठसठशीतदिसत असे. अजब तुझे सरकार, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, पटली रे पटली, पिंजरा, पैज, पैजेचा विडा, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, शापित, सर्वसाक्षी, सहकारसम्राट, सामना, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, थापाड्या अशा विविध चित्रपटातुन विविध भूमिका साकारल्या..विनोदी बाजही त्यांनी सुंदर साकारला. “पिंजरा” मध्ये तर डॉ. लागूशी टककर होती…त्यातल्या “मास्तर” एका शब्दाने त्यांनी काय काय सांगितलं होतं. यातील निळू भाऊच्या सोंगाड्याने प्रत्यक्षातल्या लोक कलावंताचे दु:ख अत्यंत प्रभावीपणे अधोरेखीत केले. मास्तच्या हातात दारूची बाटली सोपवतानांचा त्यांचा अभिनय मन हेलावून टाकणारा होता. “सामना” मध्येही दोघांचा सामना असाच रंगला. सत्ता आणि बुद्धीचा यात जबरदस्त सामना होता. यातला हिंदू धोंडेराव पाटील हा मस्तवाल व मुजोर बागायतदार निळूभाऊनी असा विलक्षण उभा केली की पूढे अनेकजण या व्यक्तीरेखेच्या प्रभावाखाली आले. याच भूमिकेसाठी त्यांना राज्य शासनाचा उत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला होता. १९८२ आलेल्या “शापित” मधली छोटी पण प्रभावी भूमिका लक्ष वेधून घेते. “सिंहासन” मधला पत्रकार त्यांच्या सर्व भूमिकेपेक्षा सर्वस्वी वेगळा होता. कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सासके अशा हिंदीतही केलेल्या मोजक्याच भूमिका लक्षवेधी ठरल्या. कुली मध्ये अमिताभ समोर तितक्याच ताकदीने ते उभे राहिले.
पडद्यावरचा हा खलपुरूष व्यक्तीगत आणि सामाजिक जीवनात मात्र आदर्श नायक होता. सेवा दलाच्या संस्कारामुळे ही जाणीव त्यांनी आयुष्याच्या अखेर पर्यंत निष्ठेने जपली. रंगभूमीवरील कलावंताचा उत्तरार्ध अत्यंत क्लेशदायक असतो हे ओळखून त्यांनी व डॉ. लागू यांनी मिळून एक मोठा निधी संकलीत करून या कलावंताना दिलासा दिला.अंधश्रद्धा निर्मल्न समितीच्या कार्यात ते आवर्जून सहभागी होत. अभिनेते म्हणून दिग्दर्शकांच्या सर्व सूचना पाळणाऱ्या निळू भाऊचे स्वत:चे ही असे एक स्वंतत्र मत आणि विचारधारा होती. आणि त्यावर ते आयुष्यभर ठाम पण राहिले. त्यांचा हा गूण आभावानेच अभिनेते वा कलावंतात आढळून येतो. अतुल कुलकर्णी सारखा अभिनेता सोडता सध्या मला तरी अशी स्वत:ची ठाम वैचारिक भूमिका असलेला अभिनेता दिसत नाही. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी १३ जुलै २००९ रोजी पहाटे २ च्या सुमारास आपल्या सलग ४० वर्षांच्या कला प्रवासाला त्यांनी शेवटचा प्रणाम केला. त्यांची कन्या गार्गी आता त्यांचा वसा पूढे नेत आहे.
दासू भगत (१३ जुलै २०१७)
“माणसाचं मन हे सर्जन व सृजनशील असलं की प्रयोशीलता ही उदयास येते आणि त्यातून निर्मिती होते दर्जेदार कृतीची, नृत्या सारख्या कलेत सतत नवनवीन प्रयोग करुन, समृद्धीच्या शिखरावर नेऊ पहाणार्या युवा नृत्य दिग्दर्शक जितेंद्र निकम चा प्रवास.”
आपल्या मुलांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन, पुढे एखादी सरकारी अथवा निमसरकारी सेवेत नोकरी असं काहीसं चित्रसर्वसाधारण मराठी कुटुंबामध्ये पहायला मिळतं, पण काही मुलं याला अपवाद असतात, जितेंद्र निकम सारखे आपण एक नृत्यकार म्हणून कारकीर्द घडवू शकतो, आणि या कलेत नवीनता, प्रयोगशील आणि सातत्य ठेऊन ही कला सोप्या पद्धतीनं लोकांपर्यंत नेऊन ज्ञान आणि रंजनता प्रदान करु शकतो, असं महाविद्यालयीन जीवनामध्ये जितेंद्रला वाटू लागलं, आणि मग नृत्याचा क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा निश्चय केला. त्याआधी महाविद्यालयीन स्तरावर नाटकांमधून भूमिका ही केल्या, यात उल्लेख करण्याजोगी “तळीराम” ही “एकच प्याला” या नाटकातील व्यक्तीरेखा. नाटकांमध्ये कामाचा अनुभव नृत्यात ही उपयोगी आला. कारण “थेट परफॉर्मन्स” हे सूत्र दोन्हीकडे लागू पडतं.
आत्तापर्यंत जितेंद्रनी “वेस्टर्न फ्री स्टाईल”, “बॉलीवुड”, “हीप हॉप”, “क्युबन साल्सा”, “शास्त्रीय” तसंच “लोकनृत्याचं” शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतलं आहे. इतकच नाहीतर जगातील कोणत्याही नृत्य प्रकारामध्ये वैविध्यता कशी दाखवता येईल याचा कटाक्ष तो पाळतो. केवळ स्वत: नृत्याचं प्रशिक्षण घेऊन तिथेच न थांबता, नृत्य कला टिकून रहावी यासाठी त्यांनी मुंबई, ठाणे, कल्याण या भागात नामवंत शाळांमधून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास सुरुवात केली.
गेल्या ६ वर्षांपासून शिक्षक म्हणून वावरत असताना देखील, अनेक व्यावसायिक सोहळ्यांमधून आपल्या सहकार्यांना प्रशिक्षण देऊन प्रेक्षकांना स्मरणात रहातील असे नृत्य अविष्कार सादर करण्याचा त्याचा मानस राहिला आहे. कधी “डान्स-कम-ड्रामा” कधी “पारंपारिक” तर कधी “पाश्चिमात्य” शैलीची अदाकारी, हे सर्व परफॉर्मन्स किमान एकदातरी “वन्स मोर” ची मागणी करणारे, “पण याचं सारं श्रेय माझ्या टीमला जातं”. असं जितेंद्र नमूद करतो.
खरंतर कलेचं क्षेत्र जिथे बरीचशी स्पर्धा, आणि आर्थिकरित्या अस्थिरता पहायला मिळते, अशातच पूर्णवेळ कारकीर्द घडवायची हे भलंमोठं आवाहनच पण त्यासाठी अनेक वाटा निर्माण होताहेत; कोरियोग्राफर, नृत्यप्रशिक्षक, रियालिटी शो यामुळे आता बर्याच गोष्टी या क्षेत्रात सोप्या होत असून, भारतातील नृत्य प्रकारांना ही जागतिक व्यासपीठ मिळाल्याचं जितेंद्र सांगतो.
राष्ट्रीय स्तरांवर होणार्या नृत्याच्या मोठ्या सोहळ्यांमध्ये आणि स्पर्धांमध्ये ही जितेंद्र निकम नी सहभाग नोंदवला आहे. तसंच दूरचित्रवाणी वाहिन्यांवरुन २०० पेक्षा ही अधिक परफॉर्मन्स दिले असून, त्याव्यतिरिक्त ५ “म्युझिकल व्हिडिओ” मध्ये सुद्धा नृत्य सादर केलं आहे.
दूरचित्रवाणी, चित्रपट आणि स्टेज शोज या मध्ये “लाईव्ह परफॉर्मन्स” हा सर्वात आव्हानात्मक आहे, कारण जे होईल ती अखेरची असते, पण त्यामध्ये नवीन प्रयोग हीकरता येऊ शकतात असं जितेंद्रच्या नृत्याच्या अनुभवांमधून त्याच्याशी बोलताना लक्षात येतं. म्हणून प्रत्येक “स्टेज शोज” मधून काहीतरी नवीन,रंजक देण्याचा त्याचा प्रयत्न राहिला आहे.
सध्या अनेक हिंदी व मराठी सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शनात व्यग्र असलेल्या जितेंद्र निकम एका गोष्टीकडे लक्ष वेधलो ते म्हणजे, या क्षेत्रात मराठी मुलांची या क्षेत्रासाठी असलेली अनास्था; अर्थात प्रमाण तुलनेनं कमी असल्याचं त्याचं म्हणणं आहे, पण हळू हळू मुलांमध्ये परिवर्तन होतय, या क्षेत्राकडे लोकांची पहाण्याची दृष्टी बदलते आहे, जे नृत्याच्या भवितव्यासाठी सकारात्मक नांदीच म्हणावी लागेल.
आतापर्यंतच्या कारकीर्दीत जितेंद्र निकम ला अनेक सन्मान आणिपुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे, यामध्ये वयाच्या अवघ्या विशीत नृत्य कलेत निपुणता मिळवून स्वत:चीवेगळी ओळख प्रस्थापित करुन, एक आदर्श शिक्षक आणि गुणी तरुण म्हणून नावलौकिक मिळवलेल्या जितेंद्र निकम ला “हॅटस् ऑफ”, आणि सदीच्छा ही !
रेडिओ सिलोन, विविध भारती व ऑल इंडिया रेडिओ या आकाशवाणी केंद्रानी आपल्या देशातील संगीताची विशेषत: चित्रपट संगीताची जेवढी भूक भागवली असेल तेवढी आजतागयत कोणत्याही रेडिओ केंद्राने भागवली असेल असे मला तरी वाटत नाही. एक संपूर्ण पिढी या संगीतावर पोसलेली आढळून येईल. मी तर धाडसाने असे म्हणेन की या संगीताने आमच्या काळातील पिढीला कधीही आत्महत्येचा विचार मनात येऊ दिला नाही. मन,मेंदू व हृदयावरील सर्व ताण दूर सारण्याची क्षमता या संगीतात होती व आहे. भारतीय संगीत, मग ते लोकसंगीत असो की शास्त्रीय संगीत असो की नाट्य वा चित्रपट संगीत आमची खूप मोठी मानसिक भूक आहे ही !!!! आता तर संगीत ग्लोबल झालेय, जगातील सर्व संगीताचा खजिना स्टिव्ह जॉब्ज नावाच्या अवलियाने आमच्या थेट घरी हातात दिला आहे. यातुन किती मोत्याचे दाणे वेचता येतील तेवढे वेचत रहा..असो….
आताचे मला माहित नाही पण ५० ते ७० च्या दशकात मी सकाळी ७ ते ८ या वेळात न चूकता रेडिओ सिलोन एकत असे. सर्व जुनी गाणी आणि शेवटी के.एल. सैगलचे गाणे. सैगलचे गाणे लागले म्हणजे शंभर टक्के आठ वाजले….घडी बघायची गरज नाही. याच स्टेशनवर आठवड्यातून एक दिवस कव्वालीचां कार्यक्रम असे. आणि हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी एक धून वाजविली जाई. हा वाद्यमेळ इतका अप्रतिम की कानात दिवसभर रूंजी घालत असे. शालेय जीवनात जुने चित्रपट बघण्याच्या व्यसनाने माझा इतका ताबा घेतला आहे की आजतागायत मला दुसरे व्यसन लागलेच नाही. माझ्या शहरात मार्निंग वा मॅटनी शो मध्ये जुने चित्रपट दाखवले जात शिवाय या शोचा तिकीट दरही कमी असे. जुन्या चित्रपटाचे व्यसन लागण्याचे खरे कारण त्यातील गाणी हेच होते. अनेकदा चित्रपट खूपच भिकार असे पण गाणे सर्व पैसे वसूल करून देत. तर एकदा ‘बरसात की रात’ हा सिनेमा मॅटनीत लागला आणि मी “श्याम टॉकीज” कडे धूम पळालो. पाण्याच्या टाकी सारखीच सिनेमाची टाकी असते असा पूर्वी माझा समज होता. पण टॉकीज या शब्दाचा खरा अर्थ खूपच उशीरा समजला. मूळ इंग्रजी शब्द Talkie म्हणजे बोलणारा असा आहे. म्हणजे चित्रपट ज्या दिवशी पासून बोलू लागले तेव्हा पासून ते बोलपट झाले. ज्या हॉल मध्ये असे चित्रपट दाखवतात त्याला टॉकीज म्हणायचे.
तर या चित्रपटाच्या क्लायमॅक्स मध्ये दोन कव्वालांच्या कव्वालीची स्पर्धा असते. ही कव्वाली सुरू होण्यापूर्वी एक सुंदर धून सुरू होते….धून ऐकली आणि मला अफाट आनंद झाला…..का? तर रेडिओवर जी धून कव्वाली कार्यक्रमाच्या आगोदर मी ऐकत असे ती समोरच्या चित्रपटात वाजत होती. यातील केवळ या एका कव्वालीने हा चित्रपट अजरामर झाला. चित्रपटात इतक्या दीर्घ लांबीची ही पहिलीच कव्वाली होती. “ना तो काँरवा की तलाश है”…….साहिरची गीत रचना तर मन्नाडे, रफी, आशा भोसले, कमल बारोट, सुधा मल्होत्रा,एस.डी.बातीश, बंदे हसन असे जादूई आवाज या कव्वालीत होते. चित्रपट संगीतातील मैलाचा दगड म्हणून आजही ही कव्वाली ओळखली जाते. या चित्रपटाच्या संगीताने ज्या संगीतकाराने आपले स्थान भक्कम केले ते म्हणजे रोशनलाल नागरथ अर्थात संगीतकार रोशन…..कव्वालीचे बादशहा म्हणून ते आजही ओळखले जातात. रोशन म्हणजे चमचमणारा….आपल्या संगीतमय तेजाने रोशनने अख्खी चित्रपटसृष्टी प्रकाशमय केली.
१४ जुलै १९१७ हा त्यांचा जन्म दिवस… पंजाबातील गुजरनवाला गावातला जे आता पाकिस्तान मध्ये आहे. लहान वयातच रोशनजीने संगीत साधना सुरू केली होती. नंतर पूढच्या संगीत शिक्षणासाठी ते लखनौला आले. येथील आताचे पं. भातखंडे म्युझिक इनस्टिट्यूट जे पूर्वी मॅरीस कॉलेज होते त्याचे प्राचार्य पं. एस.एन. रतनजनकर होते जे रोशनचे पहिले संगीत गुरू. रोशन यांचे आवडते वाद्य म्हणजे ऐसराज किंवा दिलरूबा….अतिशय सुंदर वाजवायचे. या वाद्याच्या बळावरच १९४० च्या सुरूवातीला ऑल इंडिया रेडिओ दिल्लीचे कायर्क्रम निर्माते ख्वाजा खुर्शीद अन्वर यांनी सर्वप्रथम रोशन यांना स्टाफ आर्टीस्टची नोकरी दिली. प्रतिभावान कलावंताना त्यांच्यातील प्रतिभा एका जागी कधीच स्वस्थ बसू देत नाही. ते नेहमीच मोठी स्वप्ने पाहात असतात. मुंबई ही तर अशा सर्व स्वप्ने बघणाऱ्या कलावंताचे माहेरघरच !!!!! ख्वाजा खुर्शीद अन्वर आणि रोशन मग १९४८ मध्ये मुंबईला आले. वर्षभरांच्या प्रयत्ना नंतर किदार शर्मा यांनी रोशन यांना पहिला चित्रपट दिला “नेकी और बदी” किदार शर्मा त्यावेळी चित्रपटसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक होते. त्यांच्या “निल कमल” या चित्रपटात राज कपूर यांना नायकाची पहिली संधी देखील त्यांनीच दिली. याच चित्रपटात अवघी १४ वर्षांची मधूबाला नायिकेच्या भूमिकेत होती. रोशनचा “नेकी और बदी” हा पहिला चित्रपट फ्लाप झाला. मग ते संगीत वादकाच्या भूमिकेतच संधीची वाट बघत राहिले. ही ‘संधी’ म्हणजे एक अजब रसायन असतं. ती प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी येऊन आवाज देते पण खूपच हळू आवाजात. तो आवाज ज्याला ऐकता येतो तो त्या संधीचं सोनं करतो. रोशनजीला पूढच्याच वर्षी ही संधी आवाज देणार होती.
१९५० मध्ये किदार शर्मा यांनी पून्हा रोशन यानां संधी दिली. पहिल्या चित्रपटात फारशी कामगिरी पार न पाडलेले रोशन यानां पुन्हा संधी दिली गेली कारण त्यांच्यातल्या प्रतिभेवर किदार शर्मा यांचा पूर्ण विश्वास होता. मोठ्या मनांची माणसे होती….चित्रपट होता “बावरे नैन” या चित्रपटाने मात्र रोशनजीचा संगीत सितारा चमकू लागला. या चित्रपटातले दरबारी कानडा रागात बांधलेले “तेरे दुनिया मे दिल लगता नही” हे मुकेशचे गाणे अफाट लोकप्रिय झाले. या गाण्याने मुकेशही गायक म्हणून सर्वत्र पोहचला तर राज कपूरचे नावही दुमदुमले. यातील तलत मेहमूदचे “खयालो मे किसी के..” हे गाणे पण तुफान लोकप्रिय झाले. ‘बडे आरमान से रखा है बलम’ हे “मल्हार” चित्रपटातले गाणेही धूम करून गेले., याच काळातील “नौबहार” चित्रपटातील ‘येरी मै तो प्रेम दिवानी मेरा दर्द ना जाने कोए’ या लताजीच्या गाण्याने रोशन क्लसिकल गाणे अत्यंत ताकदीने तयार करू शकतात यावरही शिक्कामोर्तब् झाले. एखादा कलावंत त्याच्या कला कतृत्वाने भले कितीही मोठा असू दे पण व्यक्तीगत माणूस म्हणून त्याच्यातील गूण समोर येऊ लागले की त्याची उंची अधिक मोठी होऊ लागते. त्या काळातील बहुतांशी कलावंतात हा गूण आढळत असे. म्हणून इतर नवख्या कलावंतानां ते आग्रहाने संधी देत. इंदीवर आणि आनंद बक्षी या दोन तरूणांना रोशनजीने प्रथम संधी दिली जे नंतर या चित्रपटसृष्टीतले नामवंत गीतकार झाले. १९५९ मध्ये आनंद बक्षीनां रोशनजीने पहिली संधी दिली तो चित्रपट होता “सीआयडी गर्ल” पण तो फारसा लक्षात घेण्याजोगा नव्हता मात्र या दोघांचा १९६६ मधला “देवर” हिट झाला.
१९६०चे दशक मात्र रोशनजीने आपल्या कर्णमधूर संगीताने गाजवून सोडले. या काळातील त्यांचे प्रत्येक गाणे म्हणजे रत्नजडीत हारातील एकेक रत्नच होते…………निगाहे मिलाने को जी चाहता है (दिलही तो है), दुनिया करे सवाल तो हम (बहू बेगम), मन रे तू काहे ना धीर धरे (चित्रलेखा),पाँव छु लेने दो फुलोंके व जो वादा किया है (ताज महल), दिल जो न कह सका (भिगी रात), एरी आली पिया बिन (रागरंग), सारी सारी रात तेरी याद सताए (अजिबस शुक्रिया), लागा चुनरीमे दाग (दिलही तो है), रहे ना रहे हम महका करेंगे (ममता), स्वप्न झरे शूल से…काँरवा निकल गया गुबार देखते रहे (नयी उमर की नयी फसल), रहते थे कभी जिनके दिलमे (ममता), आप ने याद दिलाया तो मुझे याद आया (आरती), संसारसे भागे फिरते हो (चित्रलेखा), बहुत दिया देनेवाले ने तुझको आँचल ही न समाए तो क्या कीजे (सुरत और सिरत), छुपा लो यूँ दिल मे प्यार मेरा(ममता), फूल गेंदवा ना मारो सखी(दूज का चाँद), शराबी शराबी ये सावन का मौसम(नूर जहाँ), जिंदगी भर नही भूलेगी वह बरसात की रात(बरसात की रात),जो बात तुझमे है वो तस्वीर मे नही(ताज महल),हम इंतजार करेंगे कयामत तक(बहू बेगम), मिले ना फूल तो काँटो से, ओह रे ताल मिले नदी के जलमे(अनोखी रात),ऐ माँ तेरी सुरतसे अलग भगवान की सुरत क्या होगी(दादी माँ), बहारो ने मेरा चमन लूट कर (देवर)…………..ही यादी खूप मोठी आहे.
रोशनजीचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य म्हणजे वाद्यांचा कमी पण अत्यंत चपखल वापर. शंकर-जयकिशन वा लक्ष्मीकांत-प्यारेलाला सारखे ग्रेंजर त्यांच्या संगीतात नसे पण दोन अंतऱ्याच्या मधली जागा जी वाद्ये भरून काढत ती लाजबाब असत. त्यांनी लावलेल्या चाली इतक्या सुंदर असत की गायकांची संपूर्ण प्रतिभा पणाला लागत असे. ना तो कारवाँ की तलाश है… ही खूप मोठी कव्वाली. या कव्वालीत दोन भाग आहेत. रेडिओत कधी पहिला तर कधी दुसरा असे आलटून पालटून लावले जाई. दुसऱ्या भागापूर्वी (ये इश्क इश्क है इश्क….)रफीची एक अत्यंत सुरेल अप्रतिम तान आहे..तर शेवटी “ खाक को बुत और बुत को देवता करता है इश्क, इंतिहा ये है के बन्दे को खुदा करता है इश्क” या ओळी गातानां रफी इतका उंच पोहचतो की त्याला तोड नाही. साहिरने तर अख्ख्या प्रेमाचा इतिहासच यात रेखाटलाय. मात्र मला सगळ्यात मोठे आश्चर्य आणि वेदना आहे ती याची की या माणसाला जवळपास २० वर्षे हृदयाचा अत्यंत गंभीर त्रास होता आणि तरीही हा माणूस काळजात झिरपणारी गाणी तयार करत होता.!!!! हे बळ कुठून मिळते? संगीत ज्याचा श्वास असतो तोच हे करू जाणे. या हृदयाच्या आजाराने वयाच्या अवघ्या ५० व्या वर्षी रोशनवर अशी झडप घातली की गाणे समेवर येण्या आगोदरच संपविले.
नवीन पिढी रोशनजी ना ओळखते ती राकेश रोशन व राजेश रोशन यांचे वडील आणि ऋतिक रोशन यांचे आजोबा म्हणून. नातवाला आजही रोशन या नावाची किती निकड आहे हे रोशनजीच्या कतृत्वा वरून दिसून येते. १९६८ सालाची गोष्ट आहे जेव्हा रोशन “अनोखी रात” या चित्रपटाचे संगीत तयार करीत होते. सर्व गाणी रेकॉर्ड झाली होती पण एक गाणे रेकॉर्ड व्हायचे बाकी होते. चाल तयार होती पण गाणे रेकॉर्ड होण्यापूर्वीच रोशन गेले. शेवटी त्यांच्या पत्नीने ही जबाबदारी स्वत:कडे घेतली. गायीका लताजीसह चित्रपटसृष्टीतले त्या काळचे असंख्य दिग्गज संगीतकार पण स्टुडिओत हजर झाले. लताजी माईक समोर उभ्या राहिल्या. डोळ्यात अश्रू, चेहऱ्यावर वेदना…… गाण्याची रेकॉर्डिंग सुरू झाली. गाणे संपले तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांच्या कडा ओलसर झालेल्या. तिथे हजर असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात या महान संगीतकारा बद्दलचे भाव स्पष्ट दिसत होते…..आजही तुम्ही जर “खुशी-खुशी कर दो विदा, तुम्हारी बेटी राज करेगी... “ हे गाणे ऐकाल तर मी खात्रीने सांगतो की तुमच्याही डोळ्यात तेच भाव असतील जे ४९ वर्षापूर्वी स्टुडिओत हजर असलेल्या सर्वांच्या डोळ्यात होते.
दासू भगत (१४ जुलै २०१७)
इंटरनेटच्या प्रसारामुळे ‘हे विश्वची माझे घर’ ही संकल्पना प्रत्यक्षात आली असली तरी या जगाला एका कुटुंबाप्रमाणे बनवण्याचे श्रेय जाते ते फेसबुकला. या सोशल नेटवर्किंग साइटचा वापर करणा-यांची संख्या १८० कोटींहून अधिक असल्याने फेसुबक म्हणजे १८० कोटींहून अधिक लोकांचे एक कुटुंबच बनले आहे.
आज ४ फेब्रुवारी रोजी या सोशल नेटवर्किंग साइटला १३ वर्षे पूर्ण होत असताना फेसबुक वापरणारे त्याकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहत असतात. कोणाला ते विरंगुळ्याचे साधन वाटते तर कोणाला ते जास्तीत जास्त लोक जोडणारे आणि काळाच्या ओघात विसर पडलेल्या मित्रमैत्रिणींना पुन्हा जवळ आणणारे साधन वाटते. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना मार्कने आपले वर्गमित्र डस्टिन मोस्कोविट्ज, एड्युअर्डो सार्विन आणि ख्रिस ह्युजेस यांच्या सोबत फेसबुकची स्थापना केली. ४ फेब्रुवारी २००४ रोजी आपल्या हार्वर्ड वसतीगृह खोलीत झुकेरबर्ग, फेसबुक सुरू केली आहे. विशेष म्हणजे मार्क झुकरबर्ग हा हार्वर्ड विद्यापीठाचा ड्रॉप आउट आहे. पण या फेसबुकची ताकद ओळखून मार्क झुकरबर्गने त्यामध्ये वेळोवेळी कल्पक बदल केले आणि त्यामुळे या सोशल नेटवर्किंग साइटची लोकप्रियता वाढतच गेली. इंटरनेटमुळे जग ख-या अर्थाने जवळ आले असले तरी फेसबुकमुळे जग घट्ट जोडले गेले हे मान्य करावेच लागेल. गेल्या काही वर्षात या सोशल नेटवर्किंग साइटने जी लोकप्रियता मिळवली, तशी लोकप्रियता दुस-या कोणत्याही नेटवर्किंग साइटला मिळालेली नाही. सध्या फेसबुकला ट्विटर आणि तशाच प्रकारच्या इतर नेटवर्किंग साइट्सकडून स्पर्धा निर्माण झाली असली आणि फेसबुकच्या आधीही तशा प्रकारच्या वेबसाइट्स निर्माण झाल्या असल्या तरीही सोशल नेटवर्किंग ही संकल्पना लोकांमध्ये इतक्या जास्त प्रमाणात रुजवणारी फेसबुक ही पहिली वेबसाइट आहे आणि या वेबसाइटची वाटचाल थक्क करणारी आहे. एकुण १२ देशात फेसबुकची कार्यालयं आहेत. फेसबुकला मिळणाऱ्या जहिरातींमुळे फेसबुकला विनामुल्य सेवा देणं शक्य झालं आहे. झुकरबर्ग चा साधेपणाच हे त्याचे वैशिष्ट्य ठरले आहे. १८ मे २०१२ ला फेसबुकने सामान्य माणसाठी फेसबुकचे शेअर्स काढले आणि या शेअर्स नी बाजारात धुमाकूळ घातला. या शेअर्स मुळे फेसबुकला करोडोचा फायदा झाला. फेसबुकच्या कर्मचाऱ्यांची संख्या स्थापना झाली तेव्हा ४ होती आता ती १२ हजार ६०० च्या वर आहे.
कॅलिफोर्नियातल्या ‘मेन्लो पार्क’ इथं फेसबुकचं मुख्य कार्यालय आहे. गेल्या दोन वर्षात , फेसबुकने प्रचंड प्रतिष्ठा प्राप्त केले आहे. असा सामान्यातला असामान्य मार्क झुकरबर्ग आजच्या तरुण पिढीसाठी खराखुरा आयडल आहे. कंपनीत मार्क झुकेरबर्गची भागीदारी २४ टक्के, एसेल पार्टनरची १० टक्के, डिजिटल स्काय टेक्नॉलॉजीची १० टक्के, डस्टिन मोस्कोव्हिट्झची ६ टक्के, इडुअर्डो सॅव्हेरिनची ५ टक्के, सिएन पार्करची 4 टक्के, पीटर थिएलची ३ टक्के, ग्रेलॉक पार्टनर्सची १ ते २ टक्के, मायक्रोसॉफ्टची १.३ टक्के, ली का शिंगची ०.७५ टक्के व इंटरपब्लिक ग्रुपची ०.५ टक्के भागीदारी आहे. २४ ऑक्टोबर २००७ रोजी बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने फेसबुकमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी फेसबुकचे १.६ टक्के समभाग २४ कोटी डॉलरला विकत घेतले. याशिवाय माजी कर्मचारी व सेलेब्रिटिजचीही भागीदारी आहे. फेसबुकला सर्वाधिक महसूल जाहिरातींद्वारे मिळतो. मायक्रोसॉफ्ट फेसबुकची एक्क्लुसिव्ह पार्टनर असून ती कंपनीसाठी बॅनर अॅ डव्हर्टायझिंग करते. २००६ मध्ये कंपनीचा महसूल जवळपास ५२ अब्ज डॉलर होता. पुढील वर्षी १८८ टक्के वाढीसह तो १५० अब्ज डॉलरवर पोहोचला. २०१६ मध्ये महसूल २७६ अब्ज डॉलर आहे. २००८ साली इंग्लंडमधील १०२ वर्षे वयाच्या इव्ही बिन यांनी फेसबुकवर अकाउंट उघडले होते. त्यानंतर अनेक ज्येष्ठ नागरिकांनी फेसबुकवर अकाउंट उघडले. बिन या ट्विटरच्या सर्वाधिक वयाच्या उपयोगकर्ता होत्या. फेसबुकवर त्यांचे ४ हजार ९६२ मित्र, तर ट्विटरवर ५६ हजारांहून अधिक पाठीराखे होते. जुलै २०१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला. फेसबुकवर त्यांच्या सन्मानार्थ अनेक फॅन पेजेस बनवण्यात आले.
फेसबुकवर एका उपयोगकर्त्याचे सरासरी १३० मित्र असतात आणि तो दर महिन्यास किमान ८ लोकांना मैत्रीचे आवाहन करतो.
१ ऑक्टोबर २०१० रोजी डेव्हिड फिन्चर दिग्दर्शित ‘द सोशल नेटवर्क’ चित्रपट प्रदर्शित झाला. तो मार्क झुकेरबर्ग व फेसबुकवर आधारित आहे.
२२ फेब्रुवारी २०११ रोजी इजिप्तमध्ये एका मुलाचे नाव फेसबुक ठेवण्यात आले, कारण इजिप्तच्या क्रांतीत फेसबुकचा महत्त्वाचा वाटा होता.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
दुसर्या वर्गातील लोकाल र्पवासी शिकालेले असूनही विचिर्त वागतात त्याचे हे उपरोधिक
वर्णन आहे.
माझे सुख
माझे सुख…… रुसले आहे माझ्यावर.
आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.
ग्रामीण जीवन आठवणी
आकाशाला भिडणारे प्रेम
आता कानाला भिडले
हृदयात शिरणारे प्रेम
मोबाईल मध्ये घुसले...
माझ्या चारोळ्या वाचा
सहन करू नका
नाही आवडल्या तरी
छान म्हणू नका...
वाटत नाही कोणाला
मी प्रेमवेडा आहे...
कारण प्रेमाने मला
बोलताच येत नाही...
माझी कविता रोज
तरुण होत गेली
माझे तारुण्य रोज
थोडे चोरत गेली...
.
माझी कविता काळापलीकडे
कधीच जात नाही
तरी कोणतीच बंधने
काळाची जुमानत नाही...
Copyright © 2025 | Marathisrushti