(User Level: User is not logged in.)

अवर्गिकृत

Sort By:

  • ही आवडते मज…..

    एप्रिल-मे हे सर्वांचे आवडते महिने! मुलांना शाळेला सुट्टी म्हणून-तर आई-बाबांना मुलांना सुट्टी म्हणून. खरंतर सगळेच रिलॅक्स! मौजमजा, सहली, मामाचागाव इत्यादीमध्ये सुट्टी कधी संपते ते कळतही नाही. मे संपून जून सुरू झाला की मंडळी भानावर येतात. चिमणीपाखरं आपापल्या घरट्याकडे परततात. नकळत शाळेची घंटा साद घालू लागते, मुलांना आणि पालकांनाही! हल्ली तर बाळ जन्माला येण्यापूर्वीच त्याची शाळा ठरते. शाळेचे तास जेवढे अधिक, डोनेशन जेवढे जास्त तेवढी शाळा दर्जेदार हे समीकरण पक्के होत आहे. आपल्या स्टेटसनुसार जास्तीत जास्त चांगली शाळा निवडली जाते. त्यामुळेच तर दोन वर्षाचे बोबडे बोल 'ए फॉर अॅपल'ने सुरू होतात आणि ट्विंकल ट्विंकलने चमकतात. ड्रॉईंग, क्राफ्ट ही तर मम्मीची आर्ट असते. अपटूडेट युनिफॉर्म, नेकटाय, आयकार्ड, शूज सगळे कसे टापटीप असते. त्या निष्पाप चेहऱ्यावर उत्सुकता असो वा नसो, मात्र सारे घरदार त्याच्या शाळेची पूर्वतयारी एन्जॉय करीत असते. आईबाबा आपल्या लाडक्यासोबत मनाने पुन्हा एकदा शाळेत प्रवेश घेत असतात. खरच त्यांनाही प्रवेश परीक्षा द्यावीच लागते. त्यांच्या ज्ञानाबरोबर तिजोरीचा अंदाज घेऊनच अॅडमिशनचे मिशन पूर्ण होते. युनिफॉर्मच्या दुकानासमोरची रांग पाहून लक्षात येते नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात होत आहे. लग्नसराईत जसे वधुवरांपेक्षा यजमानांची धावपळ अधिक तशीच धावपळ आणि टेन्शन आता सुध्दा आईबाबांना असते. नवी कोरी वह्यापुस्तके, पाठीवरच्या ओझ्याचा भाग बनतात. पाटी अाण श्रीगणेशा दोन्ही आऊटडेटेड झाले असल्याने वह्या पुस्तकांनाच यथासांग कव्हरचा युनिफॉर्म आणि नामदर्शक लेबल लावले जातात. मात्र शाळेच्या गेटमध्ये मम्मीचा हात घट्ट धरून भोकाड पसरण्याची परंपरा आजही नकळत जपली जाते. तिचाही जीव क्षणभर गलबलतो. मात्र काही दिवसातच चित्र पालटते. स्वत:च्या हाताने खाणे, शर्टला लटकवलेल्या रुमालाने नाक- तोंड पुसणे, स्वत:च्या वस्तू सांभाळणे या सगळ्या गोष्टींचे प्रशिक्षण शिशू वर्गात पूर्ण होते. खरंतर बाललीलांनी भरलेले बालपण शिस्तीच्या कोंदणात बसविण्याचे कामच या बालवर्गांमधून केले जाते. नंतरच्या काळात हीच पाखरे एकमेकांच्या संगतीत इतकी रमतात की शाळा आणि घर यातले अंतर मिटून जाते. मग मात्र दरवर्षी एप्रिलमध्येही मनातल्या शाळेला सुट्टी नसते. भातुकलीच्या खेळातही शाळेचा वर्ग भरतो. जूनमध्ये शाळा सुरू होण्याआधीच मन शाळेकडे धाव घेते. सगळ्या नव्या कोऱ्या वस्तू घेऊन पहिल्या दिवशी शाळेत पोहोचणे यात खूप मोठे सुख असते. तर नवा वर्ग, नवी जागा, नव्या बाई यांची अनामिक ओढ लागते. नव्या वह्या-पुस्तकांचा सुवास सुखावत असतो. त्याच मित्रमैत्रिणींना पुन्हा नव्याने भेटण्याची उत्सुकता असते. सुट्टीतल्या गमती जमती मनात साठलेल्या असतात. खरंतर हा रेशीमकिडा घराच्या रेशमी कोशातून सुरवंट हेाऊन बाहेर पडत असतो. पुढे या सुरवंटाच्या पंखात बळ येते आणि ते फुलपाखरू स्वच्छंद विहार करू लागते. पण हा सगळा प्रवास मात्र जून ते एप्रिल या शैक्षणिक वर्षाच्या मार्गावरून होत असतो. शाळा आणि बालपण हातात हात घालून फुलपाखराच्या पंखात रंग भरतात. त्याला उडण्याची उर्मी देतात. आकाशाला गवसणी घालण्याचे स्वप्न देतात. सर्वात महत्वाचे म्हणजे आयुष्याच्या इमारतीचा पाया मजबूत करतात. आत्मविश्वास, माणुसपणा, संस्कार, जीवनावरची निष्ठा या सगळ्यांची रुजवण करतात. म्हणूनच तर जीवनाच्या दगदगीत 'माझी शाळा 'कधीही विसरली जात नाही. हृदयाच्या कप्प्यात ती अत्तराच्या कुपीसारखी जपली जाते. नकळत कधी उघडली जाते, तेव्हा शाळेच्या आपारातल्या आठवणींचा सुगंध मनाला सुखावतो. हल्ली 25-30 वर्षामागचे वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन आपल्या जीवनातील ती सोनेरी पाने पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न करतात. एकपकारे यामध्ये शाळेविषयीची कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि पुन्हा एकदा मन उड्या मारीत शाळेत जाऊन पोहोचते. तो वर्ग, तो बेंच, तो फळा, ती खिडकी सगळे बोलू लागतात आणि नकळत हसता हसता डोळ्यांच्या कडा पाणावतात. अशावेळी त्या शाळेलाही कृतकृत्य वाटत असेल ना? 'बालपणाचा काळ सुखाचा' ही उक्ती शालेय जीवनाशिवाय पूर्ण होत नाही. जसे कॉलेज म्हणजे तारुण्य तसे शाळा म्हणजे बालपण. बोबडे बोल ते अस्खलित वक्तृत्व, वेड्यावाकड्या रेघोट्या, ते डौलदार लेखन, आईचा हात सोडून शाळेतला प्रवेश, ते आयुष्याच्या खुल्या प्रांगणात दमदार प्रवेश करणारी पावले. हा सारा प्रवास म्हणजे 'माझी शाळा' असते. कदाचित त्यामुळेच तर सुट्टी इतकीच दरवर्षी शाळा सुरू होण्याची वाट पाहिली जाते. खूप अभ्यास करण्याचा संकल्पकरूनही दरवर्षी शाळा आणि विद्यार्थी यांची पुनर्भेट होत असते. दरवर्षी तोच नवा उत्साह शाळेला चिरतरुण करीत असतो. तेच नवचैतन्याचे दिवस कालपरवापासून सुरू झाले आहेत. तुमच्या आमच्या मनातली 'आपली शाळा' आपल्याला आजही खुणावतेय ना? म्हणूनच नवीन शैक्षणिक वर्षासाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

    ही आवडते मज मनापासुनी शाळा, लाविते लळा ही जशी माऊली बाळा

    ("ठाणे वैभव" च्या सौजन्याने)

    -- नूतन बांदेकर

  • कर्णपिशाच्च.. (बेवड्याची डायरी – भाग ३८ वा)

    आम्ही भाजी निवडत असताना माॅनीटर भाजी निवडण्यास टाळाटाळ करणाऱ्या मंडळींकडे लक्ष ठेवत होता ..काही जण नुसतेच समूहात बसून हातात एखादी गवार शेंग घेवून अथवा मेथीची काडी घेवून गप्पा मारत बसले होते ...माॅनीटरचे लक्ष जाताच ते भाजी निवडतोय असे भासवत ..भाजी निवडता निवडता तोंडे सुरूच होती सगळ्यांची ..हास्यविनोद सुरु होते ..एकदोन टवाळ लोक गुपचूप वार्डातील जरा ' मंद ' असलेल्या लोकांना लसणाची पाकळी फेकून मारत होते .. कामचुकार लोक सारखे उठून बाथरूम ..संडासकडे जावून टाईमपास करत होते ..त्या सगळ्यांना वारंवार माॅनीटर हाकलत होता ..मी बराच वेळ मांडी घालून बसल्याने जरा पायाला मुंग्या आल्यासारखे वाटले म्हणून उठून उभा राहिलो ..मग बाथरूम कडे गेलो ..

    एकदम शेवटच्या बाथरूम मध्ये गेलो ..मला आश्चर्याचा धक्काच बसला ..इथे एक जण कोपऱ्यात दडून बसला होता ..बहुधा माॅनीटरच्या नजरेतून तो सुटला होता ..मला पाहून तो उठून उभा राहिला ..त्याचा चेहरा भेदरल्या सारखा झाला होता ..डोळे स्थिर नव्हते ..' अरे इथे काय बसलास ? चल कि तिकडे भाजी निवडायला ' असे म्हणालो त्याला तर त्याने कानावर हात ठेवले आणि पुन्हा खाली बसला ..काय प्रकार आहे ते समजेना ..मी बाहेर जावून माॅनीटरला तो प्रकार सांगितला ..माॅनीटरने त्याला हाताला धरून बाहेर आणले ..हा सुमारे पंचविशीचा युवक होता ..तो येथे दाखल होऊन जेमतेम चार पाच दिवस झालेले ..खूपच अशक्त वाटत होता ..तसेच चालताना जरा लंगडल्या सारखा चाले ..तो आल्यापासून सारखी तळपायाची आगआग होते म्हणून तक्रार करत असे ..त्याला डॉक्टरनी तपासून औषध गोळ्या लिहून दिल्या होत्या ..दारूचा दुष्परिणाम म्हणून त्याच्या पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये मध्ये समस्या निर्माण होऊन तेथे आगआग होते असे डॉक्टरांचे म्हणणे पडले होते ....

    त्याला चालताना खूप त्रास होई म्हणून तो जास्तीत जास्त वेळ बसून राही किवा पलंगावर झोपून राही ..आजचा त्याचा हा बाथरूम मध्ये लपून बसण्याचा प्रकार अजबच वाटला मला ..माॅनीटरने जेव्हा त्याची थोडी प्रेमाने विचारपूस केली तेव्हा म्हणाला ..कानात खूप आवाज येत आहेत माझ्या ..शिव्या देण्याचे ..रागावल्याचे ..खूप आरडा ओरडा ..गोंधळ ..गाड्यांचे ..होर्नचे आवाज ...या आवाजानं घाबरून तो लपून बसला होता बाथरूममध्ये .. माॅनीटरने त्याला धीर दिला ..मग एक गोळी आणून दिली ..ती गोळी घेवून त्याला झोपण्यास सांगितले ...हा देखील एक दारूचा दुष्परिणाम आहे हे मला समजले ..हा तरुण मानसिक रुग्ण बनला होता ..दारूचा दुष्परिणाम त्याच्या मेंदूवर होऊन त्याला असे आवाज कानात ऐकू येत होते ..त्याने दारू सेवन न करता आता व्यवस्थित दीर्घकाळ उपचार घेतले पाहिजेत असे माॅनीटरचे म्हणणे पडले ..

    इथे आल्यापासून दारू आणि मादक पदार्थांच्या दुष्परिणामांचे एक एक भयानक प्रकार माझ्या समोर यते होते ..दारूमुळे केवळ लिव्हर खराब होते असे मी ऐकून होतो .परंतु मेंदू ...त्वचा ..डोळे ...शरीरांतर्गत असणाऱ्या रक्तवाहिन्या ..किडनी ..हृदय ..अश्या शरीराच्या प्रत्येक महत्वाच्या भागावर वेगवेगळे दुष्परिणाम होतात हे समजल्यावर ..बरे झाले आपण इथे उपचार घेण्यास आलो ही भावना अधिक दृढ होत गेली माझी ...एकाच्या लघवी आणि संडास या बद्दलच्या संवेदना क्षीण झालेल्या होत्या ..तो एकदम उठून पळत पळत बाथरुमला जात असे ..किवा कधी कधी त्याला लघवी अथवा संडास येतेय हे कळत नसे..तो अशा वेळी कपडे खराब करी ..मग सगळे झाल्यावर ते त्याच्या आणि आमच्याही ध्यानात येई ..तो ओशाळून जाई खूप ..त्याला औषध सुरु होते ..त्याच्या तपासण्याही झाल्या होत्या ..त्याला मेंदूच्या क्रिया सुरळीत करण्यासाठी इंजेक्शन्स सुरु होती ..

    दाखल झाल्यावर एकाच्या त्वचेची सालपटे निघू लागली होती.. साप जसा कात टाकतो तशीच ..दारूच्या सेवनामुळे त्याच्या अंगावरची त्वचा पूर्ण निकामी होऊन आता आतून नवीन त्वचा निर्माण होऊन जुनी त्वचा हळू हळू निघून जात होती म्हणे ..याला गमतीने वार्डातील लोक ' अजगर ' म्हणत असत ..एकाच्या पित्ताशयात समस्या निर्माण झाल्याने .. अचानक त्याचे पोट दुखू लागे ..अगदी गडबडा लोळे तो पोटदुखीने मग त्याला गोळी दिल्यावर बरे वाटे ..एकाचे पोट खूप वाढलेले ..अगदी दिवस भरत आलेल्या बाईसारखे ..हातापायाच्या काड्या झालेल्या ..त्याला म्हणे जलोदर झालेला होता ..लिव्हरचे कार्य खूपच बिघडलेले होते त्याच्या ..त्यालाही नियमित औषधे सुरु होती ..त्याच्या खाण्यात जरा वातूळ पदार्थ आला की त्याचेही पोट दुखे खूप ..एकदोन जण क्षयरोगाची लागण होता होता थोडक्यात वाचलेले ..तर सुमारे पाच सहा लोक दारूमुळे अपघात होऊन पायाचे अथवा हाताचे हाड जायबंदी होऊन शस्त्रक्रिया झालेले..कंबरदुखी ..पाठदुखी अशी दुखणी सुरु झालेलेही बरेच लोक होते ..

    मी असा विमनस्क विचार करत असताना ..मला सरांनी बोलावले आहे असा निरोप आला म्हणून बाहेर ऑफिसात गेलो ..सरांनी नेहमीप्रमाणे हसतमुखाने स्वागत केले ..मला वाटले बहुतेक परवा घरी जाण्यासाठी अलकाकडे हट्ट केला ..अन्नत्याग केला म्हणून बोलावले असावे..सरांनी माझी डायरी मागितली ज्यात मी रोज दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहित होतो ..सर काळजीपूर्वक सगळी उतारे वाचत होते ..वाचून झाल्यावर मग म्हणाले ..' विजयभाऊ तुम्ही छान लिहिता उत्तरे ..अगदी मनापासून ..एकंदरीत आपण येथे उपचारांना आलो ते फार बरे झाले असाच सूर आहे तुमच्या लिखाणाचा ..' सरांनी केलेली तारीफ ऐकून बरे वाटले मला ..पुढे ते म्हणाले ..इथे राहत असताना अनेकदा तुम्हाला लवकर बाहेर पडावे असे वाटेल ..कंटाळा येईल इथल्या दिनक्रमाचा ..मात्र तरीही मनाला समजवावे लागते की माझ्या सुरक्षित भविष्यकाळासाठी ही काही दिवस येथे राहणे ही एक गुंतवणूक आहे ..त्याचे फायदे नक्कीच मिळतील तुम्हाला ..मी होकारार्थी मान हलवून हसलो ..मग त्यांनी विषय काढलाच परवाचा ' परवा वाहिनी भेटीला आल्या होत्या ना ..काय म्हणत होत्या ..आनंद झाला असेल न त्यांना तुमची तब्येत सुधारत आहे हे पाहून ? " खरे तर मी हट्ट केला होता अलकाकडे हे सरांना ठाऊक होते .. त्यांनीच कितीही हट्ट केला ..धमक्या दिल्या ..तक्रारी केल्या तरी दुर्लक्ष करावे हे अलकाला सांगून तिला धीर देवून मन घट्ट करण्यास सुचवले होते तिला ..मी ओशाळून खाली मान घातली ..नुसताच बसून राहिलो ..

    सर म्हणाले " एकंदरीत तुमची चूक तुम्हाला उमजलेली दिसतेय तर ..छान झाले तुम्ही पत्नीच्या भावना समजून घेतल्या ते ..तुम्हाला येथे शिक्षा म्हणून ..अद्दल घडावी म्हणून ..अथवा त्रास व्हावा म्हणून येथे दाखल केले गेले नसून ..तुमचे शारिरीक आरोग्य ..मानसिक आरोग्य सुधारावे ..तुमच्या व्यक्तिमत्वाला लागलेले हे व्यसनाधीनतेचे ग्रहण कायमचे सुटावे म्हणून उपचारांसाठी येथे ठेवले आहे हा विचार सतत मनात असू द्या ..म्हणजे वेळोवेळी मनात येणारे नकारात्मक विचार तुम्हाला हाकलता येतील " मी नुसताच मान डोलवत होतो ..सरांनी मला शुभेच्छा दिल्या आणि जाण्याची जाण्याची खुण केली .वार्डात परत येताच नेहमीप्रमाणे शेरकर काका आलेच जवळ ...त्यांना कुतूहल होते सर मला काय म्हणाले याबद्दल ..मी सांगितले सरांनी वहीची तारीफ केली..मला अजिबात रागावले नाहीत परवाच्या प्रकाराबद्दल ..यावर ते म्हणाले .. " आपले सर ' मीठी छुरी ' आहेत ..अजिबात त्रास न होऊ देता ऑपरेशन करतात " ..मग मिस्कील हसून मला टाळी दिली .

    ( बाकी पुढील भागात )

    -- तुषार पांडुरंग नातू

    " मैत्री ' व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्र , नागपूर
    संपर्क..रवी पाध्ये - ९३७३१०६५२१ ..तुषार नातू - ९८५०३४५७८५

  • निसर्गरम्य अंबोळगड

    निळाशार, अथांग, स्वच्छ आणि वर्दळी पासून मुक्त, नितांत सुंदर समुद्र किनारा लाभलेलं रत्नागिरीतलं पर्यटन ठिकाण म्हणजे अंबोळगड. दोन-तीन दिवस लागून सुट्टी असल्यास आणि फक्कड ठिकाणाच्या शोधात असाक तर अंबोळगड व त्याचा आसपासच्या परिसरात किमान एकदा तरी भेट द्यायलाच हवी

  • सुखकर्ता दुखहर्ता ः आरती

    सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।। नुरवी, पुरवी प्रेम कृपा जयाची।।

  • वाघाला पहायचंय, चला बोरला …

    वर्धा जिल्हा जसा गांधीजी आणि विनोबा भावे यांच्या नावाने ओळखला जातो तसाच तो येथील वन वैविध्यामुळे ओळखला जातो. यात प्रमुख आहे तो बोर अभयारण्य प्रकल्प.बोरला जायचे ठरविले अन तयारीला लागलो.

  • Evergreen ‘दादर’

    कवयित्री - सौ.अलका वढावकर
    आवाज - माधुरी लोणकर

  • ऋजू स्वभावाचा बिहाग

    खरतर संगीतात अनेक भावना आढळतात पण त्या भावनांचा शास्त्राशी संबंध जोडला तर हाताशी तसे फारसे लागत नाही. काहीवेळा असेच वाटते, केवळ काही स्वरांच्या साद्धर्म्याने विचार केला तर, काही भावना मनाशी येऊ शकतात तरीही, अखेर शास्त्रकाट्यावर तपासणी करता, सूर आणि भावना, याचे नेमके नाते जोडता येत नाही, हेच खरे. मग प्रश्न पडतो, राग आणि समय, किंवा राग आणि भावना, याला काय आधार आहे? हे सगळे केवळ "संकेत" असेच मानायचे का? तसे मानले तर, हे "संकेत" निर्माण करण्यामागे काय उद्दिष्ट असावे? आज वर्षानुवर्षे, बहुतेक रागांचे समय, त्याला लगडलेल्या भावना, याचा आपल्या मनावर परिणाम झालेला असतो, त्या परिणामाचा कार्यकारण भाव आणि संगती कशी लावायची? की पुन्हा कोऱ्या पाटीवर नव्याने धुळाक्षरे शिकायची? या प्रश्नांची उत्तरे तशी सोपी नाहीत पण, विचार करायला नक्की लावणारी आहेत.
    मी, जेंव्हा "बिहाग" रागाला, "ऋजू" भावनेची जोड देतो तेंव्हा , माझ्या मनात पारंपारिक संकेत आणि त्याला जोडून आलेले विचार, याचेच प्राबल्य असते.आपल्याला बरेचवेळा, मी, कवी सुधार मोघ्यांच्या एका कवितेत वाचलेल्या ओळी आठवतात.
    "शब्दांना नसते सुख, शब्दांना दु:खही नसते;
    जे वाहतात ओझे, ते तुमचे माझे असते"!!
    स्वरांच्या बाबतीत असाच विचार करणे योग्य आहे का? खरेतर स्वर म्हणजे निसर्गातील ध्वनी. त्यांना आपण, शास्त्राची जोड दिली आणि त्याला अभिजात स्वरूप प्रदान केले. याचाच वेगळा अर्थ, त्या स्वरांचे नैसर्गिकत्व कायम राखणे, हाच उद्देश असू शकतो. त्यावर मानवी भावनांचे आरोपण करणे, अन्यायकारक असू शकते. असे झाले तरी देखील, स्वरांच्या सान्निध्यात वावरताना, आपल्या मनात भावनांचे तरंग उमटत असतात, अगदी अनाहूतपणे, ही देखील वस्तुस्थिती आहे.
    आरोही स्वरांत, "रिषभ" आणि "धैवत" वर्जित असल्याने, "औडव" जातीचा राग तर पुढे अवरोहात हे दोन्ही वर्जित स्वर अस्पष्टपणे लावले जातात. पूर्वीच्या संदर्भात बघायला गेलो तर, या रागात, "मध्यम" फक्त शुद्ध स्वरूपात लावला जायचा परंतु आधुनिक काळात, "तीव्र मध्यम" उपयोगात आणला जातो. अर्थात, जेंव्हा हा स्वर लावला जोतो, तेंव्हा हा राह लखलखून समोर येतो. आरोहात "ग म प नी सां" ही स्वरसंगती या रागाची ठेवण दर्शवते. बहुतेक स्वर "शुध्द" स्वरूपात लावत असल्याने, या रागाला "ऋजू" स्वरूप प्राप्त झाले. आक्रमकता, या रागाच्या स्वभावाशी फटकून वागते. वास्तविक, "गंधार" आणि "निषाद" हे "वादी - संवादी" असले तरी देखील, "मध्यम" स्वराचा प्रयोग हेच वैशिष्ट्य मानले जाते. आता आपण, शास्त्राच्या अधिक आहारी न जाता, त्याच्या "ललित" स्वरूपाकडे वळूया.
    उस्ताद रशीद खान यांनी गायलेली "मरे मन अटकाओ रे अली" ही बिहाग रागातली चीज ऐकण्यासारखी आहे . मुळात, या गायकाचा अत्यंत मृदू आवाज, त्यामुळे उपरिनिर्दिष्ट भावना, इथे अतिशय सुंदररीत्या सादर झाली आहे. स्वर उच्चारताना, त्याचा "स्वभाव" ओळखून, गायला गेला तर होणारे गायन, अधिक प्रभावी ठरते. रशीद खान, इथेच नव्हे तर एकुणातच "मंद्र सप्तक" किंवा "शुद्ध स्वरी सप्तक" गायन करतात. याचा एक परिणाम असा होतो, रसिकाला स्वराची "ओळख" करून घेता येते. ताना घेताना देखील, अति दीर्घ स्वरूपाच्या ताना टाळून, गायची पद्धत आहे, प्रसंगी तान खंडित करून, दोन भागात तान, पूर्ण करण्याचा विचार दिसतो.सुरवातीला लावलेला अति खर्ज आणि त्यातून पुढे आवाजात आलेला मोकळेपणा, यामुळे ही रचना अधिक वेधक होते. कधीकधी तर, बंदिश, भावगीताशी दुरान्वये का होईना, पण नाते सांगते की काय? असा भास निर्माण करण्याइतकी जवळीक साधली जाते. या मागे अर्थात, जे रसिक, शास्त्रापासून दूर असतात, त्यांना देखील रंजक वाटावे, हा स्पष्ट विचार दिसतो. असे करताना देखील, आपण "बंदिश" गात आहोत, याचे भान कुठेही सुटलेले दिसत नाही आणि खरेच ही तारेवरची कसरत आहे.
    "बोलिये सुरिली बोलियां
    खट्टी मिठी आंखो से रसिली बोलियां".
    "गृहप्रवेश" चित्रपटात या रागावर आधारित अतिशय सुंदर गाणे आहे. "बोलिये सुरिली बोलीया" हेच ते गाणे. संगीतकार जयदेव यांची निर्मिती आहे. या संगीतकाराच्या बहुतांशी रचना या "गायकी" ढंगाच्या असतात आणि त्यामुळे गाताना, फार जपून, विचार करून गाव्या लागतात. रचनेतच, अनेक गुंतागुंतीच्या रचना करून, गायक/गायिकेच्या गळ्याची परीक्षा बघणाऱ्या असतात. गाण्यात, सरळ, स्पष्ट असा केरवा ताल आहे पण, ताल अत्यंत "धीमा" ठेवलेला. त्यामुळे कविता आणि गायन, याचा आपल्याला सुरेख आस्वाद घेता येतो.
    गाणे जरा बारकाईने ऐकले तर ध्यानात येईल, गाण्यात काही ठिकाणी "बिहाग" दिसत नाही!! विशेषत: गाण्याचा पहिला अंतरा झाल्यानंतर, गाण्याची सुरवात ऐकताना, असे आढळून येते. हा संगीतकार किती कुशाग्र बुद्धिमत्तेचा होता, याचे हे एक उत्तम उदाहरण. गाण्यात, राग सादर करणे किब=नवा त्या रागाच्या सावलीत गाणे तयार करणे, यात तशी "निर्मिती" आढळत नाही कारण, गाण्याच्या चालीचा "नकाशा" तुमच्या समोर असतो आणि त्यानुरूप गाणे तयार करायचे, इतकेच तुमच्या हाती असते परंतु, प्रत्येक रागात, अनेक छटांच्या शक्यता आढळत असतात आणि हाताशी असलेल्या कवितेनुरूप, रागातील एखादी छटा, कवितेच्या आशयाशी जुळते आणि त्या छटेनुसार, पुढे चालीचा वेगवेगळ्या लयीच्या अंगाने विस्तार करायचा, ही या संगीतकाराची खरी खासियत होती आणि तीच इथे दिसून येते.
    "तेरे सूर और मेरे गीत,
    दोनो मिलकर बनेगी प्रीत".
    "गुंज उठी शहनाई" या चित्रपटात, खऱ्या अर्थात, "बिहाग" राहाची "ओळख" देणारे गाणे आपल्याला ऐकायला मिळते. "तेरे सूर और मेरे गीत", हेच ते गाणे. मघाशी, मी या रागाचा स्वभाव "ऋजूतेशी" जोडला होता आणि या गाण्याच्या चाल्लीतून, नेमका तोच भाव दृग्गोचर होतो. संगीतकार वसंत देसायांची ही अजरामर कृती. लताबाईंच्या पहिल्याच आलापात हा राग समोर येतो. किती अप्रतिम लडिवाळ हरकत गायिकेच्या गळ्यातून निघाली आहे. या गाण्याची आणखी एक गंमत इथे मांडायची आहे. गाण्याच्या प्रत्येक कडव्यानंतर जे संगीत असते, ती खास ऐकण्यासारखे आहे. बासरीचे सूर सुरवातीला खंडित स्वरूपात येतात परंतु एका विविक्षित क्षणी त्याच बासरीच्या सुराने, लयीचे संपूर्ण "वर्तुळ" पूर्ण केले जाते. हा प्रकार वाटतो तितका सोपा नाही. गाणे "दादरा" या प्रचलित तालात बांधले आहे, गाण्याचा स्वभाव उत्फुल्ल आहे परंतु गाणे कुठेही आपली संयतशील मर्यादा सोडून भिरकटत नाही,
    सगळे गाणे, एका सुंदर बंधनात बांधले आहे पण तरीही बंधनातीत आहे. लताबाईंची सुंदर गायकी आणि मुळात, गाण्यच्या चालीत असलेला "अश्रुत" गोडवा, यामुळे हे गाणे कधीही ऐकायला सुंदर वाटते.
    "कोई गाता मैं सो जाता,
    संस्कृती के विस्तृत सागर में
    सपनो की नौका के अंदर
    दुख सुख की लहेरो में उठ गिर,
    बहाता जाता".
    काही वर्षापूर्वी "आलाप" नावाचा चित्रपट आला होता. त्यात, बिहाग रागाशी नाते सांगणारे एक गाणे आढळले. "कोई गाता मै सो जाता". याची चाल ऐकतानाच अवघड आणि गायकी ढंगाची आहे, हे जाणवते. संगीतकार जयदेवने या गाण्याची "तर्ज" बांधली आहे. राग संगीताच्या असंख्य छटा कशा असतात, हे इथे बघता येईल. वरती, याच संगीतकाराने अगदी वेगळ्या धाटणीची चाल निर्माण केली आहे आणि इथे संपूर्ण वेगळी चाल!!
    या गाण्यात मात्र, "तीव्र मध्यम" लागलेला दिसतो, जो मी वरती उद्मेखून मांडला आहे तरीही, हे गाणे, बिहाग रागाचे लक्षणगीत म्हणून मानणे कठीण आहे, इतके "तीरोभाव" या गाण्यात दिसतात.
    या गाण्याची मजा म्हणजे, गाण्यात हा राग दिसत आहे, असे वाटत असताना, चाल वेगळे वळण घेते आणि ऐकणाऱ्याला आश्चर्यचकित करते. पहिल्या ओळीत राग सापडतो पण, लगेच पहिला अंतरा वेगळ्या सुरावर सुरु होतो, तिथेच चाल थोडी रेंगाळते आणि अंतरा संपत असताना, आपल्याला बिहाग परत भेटतो!! या गाण्यात अगदी दोष(च) काढायचा झाल्यास, गायक येशुदास याचे शब्दोच्चार. कित्येकवेळा, त्याच्या आवाजातील "दाक्षिणात्य" हेल बरेचवेळा कानाला खटकतात. अन्यथा हे गाणे अतिशय सुंदर आहे.
    हे गाणे म्हणजे एक सुंदर कविता आहे - हरिवंश राय बच्चन यांची. वास्तविक हा कवी कधीही चित्रपटासाठी गाणी लिहिणारा नव्हता पण तरीही संगीतकार जयदेव यांनी, या कवितेतून गाण्याची शक्यता ओळखली आणि त्याला सूर अर्पण केले.
    "तुज साठी शंकरा
    भिल्लीण मी झाले".
    आपल्या मराठीत देखील या रागावर आधारलेली काही गाणी ऐकायला मिळतात. "चिमुकला पाहुणा" या चित्रपटात, असेच "गायकी" ढंगाचे अप्रतिम गाणे ऐकायला मिळते. "तुज साठी शंकरा" हे, संगीतकार स्नेहल भाटकर यांनी बनवलेले गाणे ऐका. ईश्वराची आळवणी आहे पण तरीही गाण्यात जबरदस्त गायकी आहे. पहिलीच ओळ बघा, "तुज" शब्द तसा खर्जात लावलेला आहे पण क्षणात "शंकरा" शब्दावर वरच्या सुरांत केलेली आलापी ऐकताना, आपण दिपून जातो आणि ही करामत लताबाईंची. खरतर, या गायिकेच्या गळ्याला कुठे "अटकाव" आहे, हा संशोधनाचा(च) विषय आहे. लयीची कितीही अवघड वळणे असू देत, गळ्यावर अशा काही पद्धतीने तोलून घेतली जातात आणि आपल्या समोर सादर होतात, की ऐकताना अविश्वसनीय वाटावे!!
    खरेतर, बिहाग रागापासून, काही ठिकाणी फटकून, चाल वळणे घेत पुढे सरकते, इतकी की, काही ठिकाणी "मारुबिहाग" रागाची सावली आढळते. अर्थात, "मारुबिहाग" राग हा, "बिहाग" रागाच्या कुटुंबातला असल्याने, तसा फार फरक पडत नाही.
    "पास रहते हुवे भी तुझसे बहुत दूर है हम,
    किसे दर्द सुनाते है की मजबूर है हम,
    तेरे प्यार मे दिलदार जो है मेरा हाल-ए-दिलदार
    कोई देखे या ना देखे अल्ला देख रहा है".
    "मेरे महेबूब" या चित्रपटातील हे गाणे आहे. संगीतकार नौशाद यांची चाल आहे तर शकील बदायुनी यांची शब्दकळा आहे. खरेतर केवळ "बिहाग" रागाची संपूर्ण ओळख म्हणून या गाण्याची निवड करणे अवघड आहे पण चालीत रागाच्या भरपूर छटा आढळतात. अतिशय जलद लयीतील गाणे आहे, अर्थात चित्रपटातील नृत्यगीत असल्याने द्रुत लय असणे साहजिक ठरते. गाण्यात तसे फार काही असामान्य नाही तसेच गाण्यात नेहमीचा केरवा ताल वापरला आहे. असे असून देखील लताबाईंच्या वेधक गायकीने आपले लक्ष या गाण्याकडे वेधले जाते.
    "मन हो राम रंगी रंगले,
    आत्म रंगी रंगले
    मन विश्वरंगी रंगले".
    भीमसेन जोशी यांनी अजरामर केलेली ही रचना. गोविंदराव टेंबे यांची शब्दकळा आहे. हे गाणे मात्र निखालस बिहाग रागाची ओळख करून देते, अगदी पहिल्या सुरापासून. पंडितजींचा जोमदार पण तरीही प्रसंगी हळवा होणारा आवाज असल्याने, गाण्याचा परिणाम आपल्या मनावर लगेच आणि दीर्घकाळ होतो. भजन गायकीला मैफिलीत मानाचे स्थान मिळवून देण्यात ज्या शास्त्रीय संगीत गायकांचा महत्वाचा वाटा आहे त्यात पंडित भीमसेन जोशी यांचे स्थान फार वरच्या क्रमांकाने ठेवावे लागेल.
    -- अनिल गोविलकर

  • मराठीचा पहिला ग्रंथ ‘विवेकसिंधू’ आजही उपेक्षाग्रस्त

    मराठीतला पहिला ग्रंथ कोणता असा प्रश्न विचारला की पहिले उत्तर असते “ज्ञानेश्वरी”. मात्र ज्ञानेश्वरीच्याही आधी १०० वर्षांपूर्वी मराठीतला पहिला ग्रंथ लिहिला गेला तो होता “विवेकसिंधू” आणि त्याचे लेखक होते “मुकुंदराज”. ज्ञानेश्‍वरीच्या मोठेपणाला आव्हान देण्याचे कारण नाही. परंतु ज्ञानेश्‍वरी मराठीचा आद्यग्रंथ नक्कीच नाही असे मुकुंदराजांच्या अनुयायांचे म्हणणे आहे.

    मराठी जगतेय की मरतेय यावर तावातावाने चर्चा करणार्‍या आणि मराठीचे पालकत्व स्वीकारणार्‍या किती जणांना विवेकसिंधू व त्याचे लेखनकर्ते मुकुंदराज माहीत तरी आहेत का, असा प्रश्न मुकुंदराजांचे अनुयायी विचारतात.

    भाषिक आक्रमणाच्या या काळात मराठीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासह तिच्या विकासासाठी साहित्य संमेलने वगैरेंची नितांत गरज आहे. परंतु अशी संमेलने साजरी करताना ज्यांनी या महाराष्ट्राला मराठी दिली त्या मुकुंदराजांचा उल्लेख कुठेच दिसत नाही, ही मोठीच शोकांतिका आहे.

    महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरपासून केवळ ७० किलोमिटरवर असलेल्या अंभोरा या पाच नद्यांच्या संगमस्थळावर मराठीचा पहिला शब्द कागदावर उतरला. पण किती मराठी सारस्वतांना हे माहीत आहे, याचाही विचार झाला पाहिजे आणि जर माहिती नसेल तर मुकुंदराजांची ही दिव्य साहित्यकृती का उपेक्षित राहिली याचे उत्तरही मराठीच्या उद्धारकांनी दिले पाहिजे.

    महाराष्ट्रातील बहुसंख्यांची भाषा असलेल्या मराठीत समाजाला दिशा देणारा ग्रंथ असायला हवा, अशी हरिहरनाथांची अपेक्षा होती. ती त्यांनी त्यांचे शिष्य रघुनाथांकडे व्यक्त केली. रघुनाथांनी या पुण्यकार्यासाठी त्यांचे शिष्योत्तम मुकुंदराजांना निवडले आणि शके १११० मध्ये विवेकसिंधू प्रत्यक्ष साकार झाले.

    मुकुंदराजांनी आपल्या गुरूंच्या म्हणजे रघुनाथांच्या समाधीस्थळी अंभोर्‍यात बसून विवेकसिंधू लिहिला. ज्ञानेश्‍वरी इसवी सनाच्या बाराव्या शतकात आली. म्हणजे ज्ञानेश्‍वरीच्या शंभर वर्षाआधी मुकुंदराजांनी विवेकसिंधू लिहिला. स्वत: ज्ञानेश्‍वरांनी त्यांचे गुरू आणि वडीलबंधू निवृत्तीनाथांना विवेकसिंधूबद्दल सांगितले व तसाच ग्रंथ पुन्हा लिहिण्याची इच्छा प्रकट केली होती, असे संदर्भ इतिहासात आढळतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की विवेकसिंधू हा ज्ञानेश्‍वरीच्या आधी आलेला ग्रंथ आहे. परंतु ज्ञानेश्‍वरीच्या तुलनेत तो वाचक, समीक्षकापर्यंत पोहचू शकला नाही. म्हणूनच आजही श्री क्षेत्र अंभोर्‍यात मुकुंदराजांचे स्मारक बनू शकले नाही.

    अंभोरा येथे पाच नद्यांचे संगम होत असल्याने रोज हजारो भाविक येतात. परंतु त्यांना या ठिकाणचे मराठीविषयक माहात्म्य माहीतच नाही.

    स्मारक झाले की मराठीचा विकास होईल, असे अजिबात नाही. परंतु महाराष्ट्राला मराठीचा पहिला ग्रंथ कोणता व तो कोणी लिहिला हे कळायलाच हवे, तरच हे मराठीचे उपेक्षित जन्मस्थळ आपले हरवलेले वैभव परत मिळवू शकेल.

    -- दिपक पुरोहित

  • पिपली लाईव्ह (वात्रटिका)

    पिपली लाईव्ह

    जिकडे तिकडे लाईव्ह,

    जिकडे तिकडे ’पिपली’ आहे.

    गिधाडांची नजर तर

    शिकारीवरच टपली आहे.

    ” सर्वात आधी,सर्वात प्रथम”

    असे ढोल बडवल्या जातात.

    दाखवायला काही नसेल तर

    बातम्यासुद्धा घडविल्या जातात.

  • मला न पटलेली कथा

    अनेक कथा प्रसंग पौराणिक घटनाक्रमांकांत सांगीतल्या गेल्या आहेत. वर्णन केल्या गेल्या. रोमांचित अदभूत रम्य, चमत्कारानी भरलेल्या अविट गोडी निर्माण केल्या गेलेल्या आहेत. पुन्हा पुन्हा ऐकाव्या, सांगाव्या, बघाव्या अशी जादू त्यानी निर्माण केली आहे. सत्य असत्य इतिहासीक असावी कां ?