लग्न जुळविणे हा हल्ली एक धंदा झालेला आहे. लग्न जुळविण्याच्या नावाखाली कित्येकांनी पैसे कमावण्याचे नवनवीन मार्ग शोधून काढलेले आहेत. सध्या लग्न जुळविणारी, मंडळे, संस्था, वेबसाइट्स यांना पेव फुटला आहे. या अशा लग्न जुळविणार्या सर्व माध्यमांची मदत घेऊनही जर एखाद्याचे दोन-तीन वर्षे लग्न जुळत नसेल तर वेगवेगळ्या पन्नास व्यक्तींना भेटून त्यांनी नक्की काय साध्य केलेले असतं ?
मला तर वाटत फक्त डेटींगचा आनंद उपभोगलेला असतो. सध्या बहुसंख्य तरुण- तरुणी आपला जोडीदार स्वतः शोधण्यासाठी, मिळविण्यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना हवा तसा जोडीदार जवळ्पास सहज नाही सापडला की ही लोक या लग्न जुळविणार्या मंडळांची, संस्थांची अथवा वेबसाईटची मदत घेतात. पालकही आपला वेळ आणि इगो सांभाळण्यासाठी व आपल्या नातेवाईकंची मदत घेण्यापेक्षा हे सोयीचे आहे म्ह्णून लग्न जुळविणार्या या माध्यमांची मदत घेतात. या माध्यमातून लग्न जुळवण्यासाठी लग्नासाठी इच्छुक तरुण- तरुणींची भेट घडवून आणली जाते ज्यामुळे विषमलिंगी व्यक्तीच्या सहवासासाठी आसुसलेली ही लोक या माध्यमातून तो सहवास मिळवून आनांदी होतात, मग तो सहवास आणखी व्यक्तींकडून मिळविण्याची हुक्की त्यांच्या मनात निर्माण होते. त्यामुळेच या अशा लोकांची लग्न जुळवणे या माध्यमांना वर्षानुवर्षे शक्य होत नाही. पण त्यातही त्यांचे नुकसान होत नाही उलट फायदाच होतो त्यामुळे ते ही या गोष्टीकडे सोयिस्करपणे कानाडोळा करतात.
लग्न जुळविणार्या माध्यमातून तरूण- तरुणी चर्चेसाठी भेटतात तेंव्हा त्यांच्यात चर्चा होतात, गप्पा- गोष्टी होतात तेव्हा आजची ओपन माईंडेड असलेली पिढी समोरच्यासमोर कोणताही आडपडदा न ठेवता आपलं हृद्य अगदी खोलून ठेवते. त्यांच्या या मोकळेपणाचा फायदा घेणारेही कमी नसतात. त्यामुळे लग्नासाठीची बोलणी राहतात बाजूला आणि एक वेगळ्याप्रकारचे नातेसंबंध निर्माण व्हायला सुरूवात होते. हे नातेसंबंध नैतिकतेच्या सिमा ओलांडण्यापलिकडेही जाऊ शकतात. एकमेकांना समजून घेण्याच्या नावाखाली सहा-सहा महिने मोबाईल, फेसबुक आणि इतर सोशल नेटवर्कींग साईट्सच्या माध्यमातून चॅटींग करत राहतात अगदी मोकळेपणाने खुलेआम. सहा-महिन्याच्या चॅटींग – डेटींग नंतर पत्रिका जुळत नाही, विचार जुळत नाही अथवा लाईफ स्टाईल जुळत नाही अशी फालतू कारणे देऊन हा कार्याक्रम आटोपता घेतला जातो. पालकांना वाटत राहत आपल्या मुलांची लग्ने जुळत नाही पण मुळात त्यांच्या त्या मुलांना लग्न जुळविण्यात फारसा रस नसतो त्यांना रस असतो त्या माध्यमातून मिळणार्या डेटींगचा आनंद घेण्यात.
सर्वच लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स लग्न जुळविण्याचा फक्त व्यावसाय करतात असं नाही म्ह्णता येणार पण काय असतं सुक्या बरोबर कधी- कधी ओलं ही जळत. लग्न जुळण्यापूर्वी समोरच्या व्यक्तीला आपल्या बद्दल किती माहिती द्यावी याचाही विचार व्हायला हवा. लग्न जुळविणार्या माध्यमांचाही ते ज्यांची लग्ने जुळवत आहेत त्यांच्या हालचालीवर बारीक लक्ष असायला हवे कारण मनापासून लग्न करण्यास इच्छुक असणार्या तरूण- तरूणींच्या मनावर या विनाकारण मिळालेल्या नकाराचा विपरीत परिणाम होऊ शकतो. लग्न जुळविण्यासाठी किती भेटींची गरज आहे हे अगोदरच निश्चित करायला हवे. फालतू कारणे देऊन जर कोणी लग्नासाठी नकार देत असेल तर अशांना बाजुला सारायला हवे.
लग्न जुळविणारी मंडळे, संस्था, वेबसाईट्स, लोकांना सहाय्यकच होत आहेत. पण त्यांना ही सामाजिक भान असायला हवे बदलत्या परिस्थितीचा आणि मानसिकतेचा विचार करता सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी काही ठोस पावले उचलायला हवीत. नाहीतर काही दिवसांनी त्यांनाच प्रश्न पडल्यावाचून राहणार नाही की आपली ही लग्न जुळविणारी माध्यमे डेटींगचे अड्डे तर झालेले नाहीत ना ?
-- निलेश बामणे,
202 / बी, जलधारा एस.आर.ए.गृहनिर्माण संस्था मर्यादीत, ओमकार डेव्हलपर्स, गणेश मंदीर समोर, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375
May 3, 2016
०५ ऑगस्ट म्हणजे हिंदूस्थानचा स्वातंत्र्य दिवस यावर्षी ५८ वा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत. पण ५८वा स्वातंत्र्यदिन साजरा करत असताना आपण ज्या देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत आहोत त्या देशाचा नकाशा नीट, व्यवस्थित पाहिला आहे का? जो नकाशा आपले राज्यकर्ते आपणांस दाखवितात तसा तो १९४७ साली होता का? जो नकाशा आपले राज्यकर्ते पुन्हा पुन्हा आपल्याला दाखवितात आणि आपणही त्याला हाच माझा देशाचा नकाशा आहे. असे म्हणू लागलो. पण प्रत्यक्षात तो तसा होता का? नाही.
August 15, 2005
प्रास्ताविक : मे ११, २०१६ च्या लोकसत्ता मुंबई आवृत्तीमध्ये ‘संस्कृतीसंवाद’ या सदरात प्रा. शेषराव मोरे यांचा , ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ या शीर्षकाचा विचारप्रवर्तक लेख प्रसिद्ध झाला आहे. शेषराव मोरे हे व्यासंगी विद्वान आहेत. त्यांची बहुतेक पुस्तकें मी वाचलेली आहेत. बावीसएक वर्षांपूर्वी मी बडोदा येथें वास्तव्यास असतांना मोरे तिथे भाषणासाठी आले होते, व कांहीं तास त्यांच्याबरोबर घालवण्याचा योग मला मिळाला होता. त्या वेळी घेतलेली त्यांची कांहीं पुस्तकें माझ्या संग्रहात मानाच्या स्थानीं आहेत. मला व्यक्तिश: शेषराव मोरे यांच्याबद्दल आदर आहे.
शेषराव मोरे यांचा प्रस्तुतचा लेख उत्तम आहे, माहितीपूर्ण आहे, विचारांना चालना देणारा आहे. त्यांचा मूळ मुद्दा मान्य करण्यासारखा आहे. परंतु, त्यातील कांहीं डीटेल्सबद्दल, कांहीं भिन्न माहिती उपलब्ध असल्यामुळे, व / किंवा भिन्न मत असल्यामुळे, मी माझा प्रस्तुत लेख लिहायला उद्युक्त झालो.
भाग – (१) –(अ)
‘आर्य’ भारतात बाहेरून आले कां ? -
मोरे म्हणतात की आर्य भारतात बाहेरून आले.
• पहिलें म्हणजे, ‘आर्य’ नांवाचा कुठलाच जनसमूह कधीच नव्हता. पुरातन वाङ्मयात ‘आर्य’ हें अभिधान सुसंस्कृत व्यक्तीला लावण्यात येत असे. रामायणातील सीता रामाला ‘आर्य’ किंवा ‘आर्यपुत्र’ म्हणते ; आणि मंदोदरीही रावणास अशा प्रकारेंच संबोधित करते.
• चाणक्याचा उल्लेखही ‘आर्य चाणक्य’ असा केला जातो.
• तथागत गौतम बुद्धही त्याच्या अनुयायांना उद्देशून ‘अरिय’ (म्हणजे, आर्य) हें विशेषण लावतो, व त्याच्या धर्माबद्दल, त्याच्या मार्गाबद्दल सांगतांना, ‘ अरिय धम्म’, ‘अरिय मग्ग’ अशे शब्द वापरतो.
(इथें बुद्धाचा एकेरी उल्लेख केवळ लेखनसोयीसाठीच केलेला आहे).
• जैन परंपरेतही, जैन कुणाला म्हणावे याबद्दल महत्वाची चर्चा दिसून येते. उदा. क्षेत्रार्य, जात्यार्य, कुलार्य, कर्मार्य, शिल्पार्य, भाषार्य, ज्ञानार्य, दर्शनार्य, चारित्र्यार्य, असे शब्द त्यांनी वापरले आहेत.
(दोन्हींचा संदर्भ : ‘संस्कृत आणि प्राकृत भाषा’ , लेखक : डॉ.माधव मुरलीधर देशपांडे ) .
जैनांच्या प्रार्थनेच्या ५ ‘नमोकार’ मंत्रांपैकी एक आहे – ‘णमो आयरियाणं ’. याचें संस्कृत होईल, ‘नमो आर्यानम्’. (‘नमो आचार्यानम्’ असाही अर्थ दिला जातो ). त्याआधीचे मंत्र ‘णमो अरिहंताणं’, ‘णमो सिद्धाणं’ असे आहेत. म्हणजेच, अमुक प्रकारच्या व्यक्तीला नमन, असे ते मंत्र आहेत ( अर्हंत, सिद्ध ). त्यामुळे, हें स्पष्ट आहे की, येथें ‘आर्य’ म्हणजे एखादा ‘वंश’ असा अर्थ खचितच नाहीं ; तर आर्य म्हणजे अमुक गुण असलेली व्यक्ती (जसें की, सुसंस्कृत, ज्ञानी), असाच अर्थ अभिप्रेत आहे.
• १९ व्या शतकातील युरोपीय इंडोलॉजिस्टनी ‘आर्य’ हा वंश होता व त्या वंशाच्या टोळ्या दक्षिण_रशिया / मध्य_आशिया या भागातून भारतात आल्या, असा सिद्धांत (चुकीचा) मांडला. (अखेरीस, ‘गुलाम’ असलेल्या हिंदुस्थानात पुरातन, प्रगत, असें जें जें असेल तें बाहेरूनच आलेलें असणार, अशी त्यांची मनोवृत्तीच होती.)
‘आर्य’ व भारत यांच्यातील संबंधाविषयी, जगात दोन सिद्धांत आहेत. एक म्हणजे, १८व्या-१९ व्या शतकापासून अस्तित्वात असलेला सिद्धांत, म्हणजेच, ‘आर्यांचे भारताबाहेरून आगमन’ ( व, २०व्या शतकात, त्या सिद्दांतात झालेलें addition , की ‘त्यांनी सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थलांचा, आक्रमण करून विध्वंस केला’) . पण हा सिद्धांत आतां कालबाह्य झालेला आहे. सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांमध्ये उत्खनन केल्यानंतर तेथें आक्रमणाच्या कांहीं खुणा सापडल्या नाहींत. म्हणून मग, ज्या विद्वानांना ‘आर्य बाहेरून भारतात आले’ हा सिद्धांत मान्य होता, त्यांनी गेल्या कांहीं दशकांमध्ये असा सिद्धांत मांडला की, आर्यांचें आगमन भारतात बाहेरूनच झालें, पण येथें आल्यावर , त्यांचे स्थानिक संस्कृतीशी peaceful integration झाले. हाही सिद्धांत challenge केला गेलेला आहे. पहिलें म्हणजे, सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या कांहीं स्थळांमध्ये (लोथल वगैरे) यज्ञकुंडें सापडल्यानें , ही संस्कृती व वैदिक संस्कृती एकच आहेत, असें मत पुढें आलें आहे. तसेंच , या संस्कृतीचा विस्तारही, (जो आधी केवळ सिंधुनदीजवळील स्थानांमध्येंच आहे, असें वाटत होतें, तो), पूर्वेस गंगा-खोरें व बिहारपर्यंत सापडल्यामुळे, व या संस्कृतीची भारतात शेकडो, किंबहुना हजारच्या वर स्थळें सापडल्यामुळे तर, आर्य हे मूळचे भारतातीलच होते, असें मत आतां मांडलें जाऊं लागलें आहे.
[ टीप : अर्थात, त्या काळाच्या भारताची व्याप्ती म्हणजे, दक्षिण-आशिया भाग (म्हणजेच, ‘ब्रिटिश इंडिया’) अधिक आजचा अफगाणिस्तान, अशी होती. म्हणून, आपण आतां प्रस्तुत लेखात जेव्हां ‘भारत’ म्हणूं, तेव्हां वरील व्याप्ती अभिप्रेत असेल ] .
• श्रीकांत तलगेरी त्यांच्या अभ्यासपूर्ण पुस्तकांमध्ये, ( ‘The Aryan Invasion Theory ..’ ; आणि ‘The Rigveda & The Avesta ..’), ऋग्वेदाच्या आधारानें दाखवून देतात की वैदिक संस्कृतीचा उगम हा, गंगा-सरस्वती खोर्यात झाला, (यमुना तेव्हां सरस्वतीची उपनदी होती) , व तेथून ते पश्चिमेकडे पसरले. संजीव सान्याल, त्यांच्या ‘Land of Seven Rivers’ या पुस्तकात , पीटर अंडरहिल् यांच्या, genetics शी संबंधित रिसर्चची माहिती देऊन सांगतात की, ही संस्कृती मूळची भारतातीलच आहे. सान्याल यांचें स्वत:चेंही तेंच मत आहे.
• इतरत्र ही माहितीही आलेली आहे की, विविध उत्खननांमध्ये मिळालेल्या पुरातन कालातील हाडांचा जेनेटिक अभ्यास केल्यावर असें आढळून आलें की, त्यांत ‘आर्य’ आणि ‘द्रविड’असे भिन्न वंशगट नव्हतेच, व सर्व हाडें एकाच वंशगटाची होती.
• या सर्वांवरून दिसून येईल की
(१) ‘आर्यां’चें तथाकथित, भारताबाहेरून भारतात आगमन ; तसेंच
(२) आर्य-द्रविड भिन्न वंश ;
या दोन्ही गोष्टी निकालात निघालेल्या आहेत.
• विंध्याच्या दक्षिणेला असलेल्या भूभागांचा ‘द्रविड’ असा उल्लेख होत असला, तरी तें वंशाचें द्योतक नसून, भूभागाचें द्योतक आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे. उदा. पंच-‘द्रविडां’मध्ये महाराष्ट्राचाही समावेश होतो. राजतरंगिणीमध्ये खालील ‘द्रविड’ वर्णलेले आहेत : गुर्जर, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, व द्रविड (म्हणजे, तमीळनाडु आणि केरळ) .
मराठी भाषेत जरी दाक्षिणात्य भाषांपासून कांहीं शब्द आलेले आहेत, तरी (वांशिक दृष्टीचा प्रश्नच उठत नाहीं, पण, ) भाषिक दृष्टीनेंही महाराष्ट्रीय लोक स्वत:चा समावेश ‘द्रविडां’मध्ये करतील काय ? उत्तर उघड आहे.
संस्कृत ही देवतांची (deities) भाषा ? ; लोकसमूहांच्या विविध भाषा : द्वविड भाषाकुल -
वेदकाळीं , किंवा प्राग्-वैदिक काळीही, या भाषेला ‘संस्कृत’ हें नामानिधान नव्हतें. तिला ‘छांदस्’ किंवा ‘देववाणी’ किंवा ‘दैवी वाक्’ म्हणत. (हल्लीच्या काळच्या संशोधकांनी व लेखकांनी, हिचें संस्कृतहून भिन्नत्व दाखवण्यासाठी, हिला Proto-Sanskrit किंवा आर्ष-संस्कृत असें नांव दिलेलें आहे). पण हें ध्यानात घ्यावें लागेल की, त्या काळात आणि त्या संदर्भात, ‘देव’ म्हणजे ‘Deity’ किंवा ‘ईश्वर’ असा अर्थ नसून ‘देव’ हें एक जनसमूहाचें , एका टोळीचें (Clan) नांव होतें . [ तसें नसतें तर, अवेस्तामध्ये, ‘देव’ म्हणजे ‘Demon’ किंवा ‘चोर’ असा अर्थ झाला नसता] .
• त्या काळी अन्य भाषाही होत्याच. रोमिला थापर, Egbert Richter-Ushanas, व अन्य लेखक सांगतात की, त्या काळीं ‘मृध्र वाक्’ किंवा ‘आसुरी वाक्’, ही भाषा, असुर, द्स्यू वगैरेंची भाषा होती. ‘त्या व इतर सर्व भाषांना द्रविड-भाषाकुल म्हटलें आहे’, असें मोरे म्हणतात. पण , तें पूर्णपणें बरोबर नाहीं. उदा. त्या काळात ‘Astro-Asiatic’ (आदिवासी, मुंडा) गटाच्या भाषाही होत्या.आणि, त्या भाषेतील शब्दही आर्ष-संस्कृतमध्ये आलेले आहेत, खासकरून शेतीविषयक शब्द. उदा. ‘लाङ्गल’ (म्हणजे नांगर) हा शब्द मुंडा भाषेतून आलेला आहे.
• ऋग्वेदात असुर हा शब्द अनेकदा आलेला आहेच, पण अनेक संशोधक ‘असुर’ या शब्दाचा, पुरातन इराण, असीरिया इत्यादींशी जोडतात, आणि तें योग्यच वाटतें. ( उदा. पारशांचे दैवत ‘अहुर मज़्द’, यातील अहुर म्हणजे असुर. असीरियन्समध्ये तर राजांच्या नांवात असुर शब्द आहे, जसें ‘असुरबनीपाल’ ). त्यामुळे, ‘आसुरी वाक्’ म्हणजे ‘द्रविड भाषाकुल’ हें प्रतिपादन योग्य दिसत नाहीं.
• ‘संस्कृत’ व ‘प्राकृत’ (भाषा) हे शब्द , नंतरच्या काळातील पाणिनी, कात्यायन व पतंजलीला परिचित नाहींत. ते ‘संस्कृत’चा केवळ ‘भाषा’ असाच उल्लेख करतात. वैदिक संस्कृतला पाणिनी ‘छांदस्’ असें म्हणतो. ( या गोष्टीचा पुढेही उल्लेख केलेला आहे. पण यातून जाणून घेण्याची मुख्य गोष्ट ही की, ‘संस्कृत’ हें या भाषेचें नामाभिधान, नंतरच्या काळातील आहे ) . पतंजलि, अयोग्य उच्चार असलेल्या शब्दांना / भाषेला, ‘अपशब्द’ , ‘म्लेच्छशब्द’ म्हणतो. याचा अर्थ स्पष्ट आहे की, कांहीं लोकांचे भाषिक उच्चार व्यवस्थित / स्पष्ट / परिपूर्ण नव्हते. असे लोक म्हणजे समाजातील कांहीं थरांमधील लोक ; तसेंच, असे लोक ज्यांची बोलीभाषा भिन्न होती.
( पुढे चालू )
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 25, 2016
धंद्यापेक्षा सामाजिक बांधीलकीशी वचनबद्ध असलेल्या देशोन्नतीसाठी शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा केवळ बातम्यांचा विषय कधीच नव्हता. त्यामुळेच विदर्भ किंवा मराठवाड्यात शेतकऱ्यांची आत्महत्या ही बातमीही नव्हती अगदी तेव्हापासून शेतकऱ्यांसमोर मांडून ठेवलेल्या संभाव्य संकटाची जाणीव होऊन ‘देशोन्नती’ने या प्रश्नावर जनजागरण करायला सुरुवात केली होती. मी स्वत: देशोन्नतीच्या माध्यमातून आणि व्यत्ति*श: या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा करीत होतो.
November 5, 2006
आज सरकार प्राथमिक शिक्षणावर जवळपास 9 हजार आणि माध्यमिक -उच्च माध्यमिक शिक्षणावर 22 हजार कोटी वर्षाला खर्च करत आहे. यापैकी बहुतांश पैसा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होतो. हा एवढा प्रचंड खर्च करून शेवटी विद्यार्थ्यांच्या नशिबी सुशिक्षित बेरोजगाराचा शिक्का कपाळी मारून घेणेच येत असेल तर संपूर्ण व्यवस्थेचे पुनर्विलोकन आवश्यक ठरते.
May 15, 2005
आधुनिक काळात जगाची विभागणी प्रामुख्याने तीन गटात केली जाते. विकसित, विकसनशील आणि अविकसित. विकसित राष्ट्रांची संख्या विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांच्या तुलनेत नगण्य असली तरी संपूर्ण जगावर प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरित्या या मुठभर राष्ट्रांचेच वर्चस्व आहे, हे तथ्य नाकारता येणार नाही.
July 13, 2003
उच्चशिक्षीत लोक फक्त स्वतः पुरता हा विषय मिटवून मोकळे होतात आणि समाजातील खालच्या वर्गात या अशा प्रथा तश्याच सुरू राहतात. आपल्या देशातील एक वर्ग पुरोगामी होतोय आणि एक वर्ग सनातनी होत चाललाय. एक वर्ग संस्कृती मानायला तयार नाही आणि एक वर्ग संस्कृती सोडायला तयार नाही. या दोन्ही वर्गाना आनंदी ठेवण्याच महान कार्य सध्याच्या टी.व्ही. वरील मालिका करीत आहेत.
January 7, 2014
हल्ली वेद मानणार्यांवर ब्राह्मणवादाचा आरोप करण्याची FASHION च झालीय. जो तो उठतो आणि स्वत:ची पातळी, अभ्यास वगैरे काहीही न बघता असले बिनबुडाचे आरोप करीत सुटतोय. कदाचित तो त्यांचा स्वत:ला “पुरोगामी” ठरविण्याचा मार्ग असावा. पण माझ्यासारख्या संशोधकासाठी मात्र त्यांच्या आरोपात किती तथ्य आहे हे शोधणे, आणि तथ्य नसेल तर सत्य काय ते सर्वांसमोर मांडणे क्रमप्राप्त ठरते, म्हणून हा लेखनप्रपंच.
February 6, 2019
28रविवार, ऑक्टोबर 2007
छोट्या पडद्यावर एक जाहिरात नेहमीच झळकत असते. त्या जाहिरातीचे स्लोगन अतिशय आकर्षक आहे. ‘भांडण चांगल्यासाठी असेल तर भांडण चांगलेच आहे’, अशा आशयाचे ते स्लोगन आहे.
October 28, 2007

भारताने जगाला दोन मोठ्या देणग्या दिल्या. एक आहे बुद्ध आणि दुसरा कृष्ण.
बुद्ध आत्मिक, अंतर्गत स्तरावर आहे तर कृष्ण बाहेरच्या स्तरावर आहे. बुद्ध एक उदाहरण देत असत. मनःशांती कशी असावी याबद्दल त्यांनी म्हटलं होतं की मन हे रथाच्या चाकाच्या मधल्या दांड्यासारखं असावं. चाकाचा परीघ जोरजोरात फिरतो, धावत राहतो पण मधला दांडा फक्त स्वतःभोवती फिरतो. शांत असतो.
March 7, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti