(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • मंगेश मुंबईकर घोगरे

    ‘फॉर्च्युन’ मासिकाच्या ’40 Under 40′ ह्या सर्वोत्तम उद्योजकांच्या यादीतही मंगेश यांचे नाव समाविष्ट आहे. त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामधील ‘Speaking Tree’ ह्या स्तंभासाठीही लिखाण केले आहे.मंगेश घोगरे यांना लहानपणापासूनच शब्दकोड्यांचे वेड होते. ते शाळेतही वर्गात बसून शब्दकोडी सोडवत असत.

  • दिशा बदलण्याची गरज

    प्रकाशन दिनांक :- 25/01/2004
    देशात सर्वत्र सध्या ‘फिल गुड’ चा बोलबाला आहे. एका मागोमाग एक घोषणांचा सपाटा लावीत सरकार प्रत्येकाला खूष करण्याच्या प्रयत्नात दिसते. तसेही निवडणुकीचे वर्ष असले की, सर्वसामान्य जनता खूष असतेच.

  • कोरडेपणा नव्हे तर व्यवहार्यता!

    प्रकाशन दिनांक :- 19/12/2004

    अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. या गरजा मुलभूत आहेत, याचाच अर्थ त्यांचे महत्त्व केवळ सामान्य पातळीवर, इतर साधारण प्राणी जगतात त्या पातळीवर जगण्यापुरते मर्यादित आहे. परंतु इतर प्राण्यांशी मानवाची तुलना करता येणार नाही. सर्वच बाबतीत मानव इतर प्राण्यांच्या तुलनेत सरस आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याची बौद्धिक, मानसिक क्षमता जशी उच्च कोटीची आहे, तशीच त्याची जगण्याची शैलीही वेगळी आहे. जगण्यासाठी त्याच्या पोटाला ज्याप्रमाणे चार घास आवश्यक आहेत त्याचप्रमाणे त्याच्या संवेदनशील मनाला जगण्याची उभारी येण्यासाठी, ती टिकण्यासाठी मायेची ऊब, निकटवर्तियांची सहानुभूती, प्रेम तितकेच आवश्यक ठरते. खरे तर मायेची ही ऊब, प्रेमाचा ओलावा हाच त्याच्या जगण्याचा आधार आहे. ज्यांना हा आधार मिळत नाही ती माणसं भौतिक सुखाची रेलचेल असूनही मनातून कायमची दु:खी असतात. प्रसंगी प्रचंड कर्तृत्त्ववान माणसांचे आयुष्यदेखील असा आधार न मिळाल्याने कोसळल्याचे दिसून येते. विशेषत: उतारवयात अशा मानसिक आधाराची नितांत गरज असते. हा आधार आई-वडील आपल्या मुलांमध्ये शोधतात. म्हातारपण म्हणजे दुसरे बालपणच असते. आपल्या मुलांची त्यांच्या बालपणी आपण जशी काळजी घेतली, त्यांना जसे प्रेम दिले, तशीच त्यांच्या कडून म्हाताऱ्या आई-वडिलांची अपेक्षा असते. परंतु मोजके भाग्यवान आई-वडील सोडले तर बहुतेकांच्या वाट्याला या संदर्भात निराशाच येते. मुलं आपल्याला विचारीत नाही, हाच बहुतेकांचा अनुभव असतो. ज्यांची मुले विदेशात आहेत, त्यांच्याकडे तर आपले देशी आई-वडील टिकूच शकत नाही. विदेशात मोठ्या पदावर नोकरीला असलेल्या अथवा मोठा उद्योग सांभाळणाऱ्या मुलांकडे आता उर्वरित आयुष्य निवांतपणे घालवावे या विचाराने गेलेले आई-वडील चार-सहा महिन्यातच हिरमुसले होऊन भारतात परततात. त्यांच्या निवांत जगण्याच्या कल्पनेतील मुलभूत गरज असते, ती प्रेमाच्या, सहानुभूतीच्या, आपुलकीच्या ओलाव्याची. नेमकी हीच गरज तिथे पुरविली जात नाही. केवळ विदेशात मुले असणाऱ्या आई-वडिलांनाच हा अनुभव येतो असे नाही. अलिकडील काळात भारतातील मोठ्या शहरात, 'मेट्रो सिटी'तदेखील या 'कोरडेपणाची' मोठ्या प्रमाणात लागण झाल्याचे दिसते.
    माणसं एकमेकांच्या अगदी जवळ राहात असूनही खूप दूर गेलेली दिसत आहेत. आपुलकीचा झरा आटल्यासारखा झाला आहे. प्रेमाच्या ओलाव्याला शहरी माणसांच्या जगात जागाच उरली नाही. माणसांची मने सिमेंट-काँक्रिटसारखीच दगडी झाली आहेत. इथे स्थान उरले आहे ते केवळ कोरड्या, रुक्ष व्यवहाराला. शहरे अशी माणुसकीला, परस्परांच्या आपुलकीला हळूहळू पारखी होत असली तरी ठाामीण भागात मात्र परस्पर सहकार्य, एकमेकांना समजून घेण्याची, सांभाळण्याची भावना अद्यापही बऱ्याच प्रमाणात टिकून आहे. केवळ माणसात आढळणारा माणुसकीचा गुण शहरातून हद्दपार झाला असला तरी खेड्यापाड्याच्या सांदी कोपऱ्यात अद्यापही माणूसकी टिकून आहे. झोपड्यांच्या भिंती सिमेंट काँक्रिटसारख्या दगडी झालेल्या नाहीत. माणुसकीचा ओलावा या भिंतीतून अद्यापही पाझरत आहे. जुन्या काळी गावात एखाद्याच्या घरी पाहुणा आला तर तो केवळ त्या घरापुरता पाहुणा नसायचा, तर तो संपूर्ण गावाचाच पाहुणा असायचा. गावातील एखाद्याचा जावई संपूर्ण गावाचा जावई ठरायचा. आज परिस्थिती अगदी तशी नसली तरी पाहुण्यांचे आदरातिथ्य आजही गावात व्यवस्थित केल्या जाते. माणसा-माणसातील सहबंध शहराच्या तुलनेत आजही गावाकडे टिकून आहेत. गावाकडची माणसं आजही अघळपघळ आहेत. त्यांच्याकडे निवांतपणे गप्पा मारायला वेळ आहे. एकमेकांना सांभाळून घेण्याची त्यांची वृत्ती आहे आणि ती त्यांची गरजसुद्धा आहे. ठाामीण भागातली जीवनशैलीच अशी आहे की खड्यातले प्रत्येक घर एकमेकांशी या ना त्या कारणाने जुळलेले असते. त्यामुळे ही माणसं जेव्हा शहरात येतात तेव्हा शहरी वातावरणाशी, तिथल्या जीवनशैलीशी त्यांना जुळवून घेता येत नाही. ज्याप्रमाणे नव्या आधुनिक पिढीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या आपल्या मुलांशी जुळवून घेणे आई-वडिलांना सहज शक्य होत नाही, त्याचप्रमाणे खेड्यातील लोकांनाही शहरी माणसं अतिशय कृत्रिम आणि कोरडे वाटतात. ही वस्तूस्थिती असली तरी नाण्याची दुसरी बाजूही समजून घेणे आवश्यक आहे.
    आज जग झपाट्याने बदलत आहे. जीवन अतिशय वेगवान झाले आहे. स्पर्धेचे युग आहे आणि ही स्पर्धा केवळ व्यवसाय, उद्योगधंदा किंवा प्रगतीशी संबंधित राहिलेली नाही. प्रत्यक्ष जगण्याची स्पर्धाही तितकीच तीप झाली आहे. शहरी माणसाजवळ निवांतपणा उरलेला नाही. थांबण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नाही. 'जो थांबला तो संपला' अशी परिस्थिती आहे. या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर ऊर फाटेस्तोवर कष्ट करण्याला निदान शहरात तरी पर्याय नाही. याचा अपरिहार्य परिणाम त्याच्या वागणुकीवर आणि जीवनशैलीवर दिसून येतो.
    शहरातली माणसे आज एकलकोंडी, अतिशय आत्मकेंद्रीत झाली असली तरी ती त्यांची अपरिहार्यताच आहे. शहरी संस्कृतीच्या नावाने बोटे मोडणाऱ्या खेड्यातील लोकांना किंवा आपल्या मुलांनी आपल्यासाठी निवांत वेळ द्यावा अशी अपेक्षा बाळगणाऱ्या आई-वडिलांना ही परिस्थिती समजून घ्यावी लागेल. बरेचदा खेड्यावरची एखादी व्यक्ती शहरातील नातेवाईकाकडे येते आणि त्याची अपेक्षा असते ती शहरातल्या या यजमानाने आपले साठासंगीत आदरातिथ्य करावे, आपल्यासाठी भरपूर वेळ द्यावा, हातातली सर्व कामे बाजूला ठेवून आपल्या कामासाठी त्याने धावपळ करावी. ही अपेक्षा अवास्तवच म्हणायला पाहिजे. खेड्यातला निवांतपणा शहरात शक्य नाही, ही वस्तुस्थिती समजून घ्यायला पाहिजे. आज ग्रामीण आणि शहरी असे संस्कृतीचे विभाजन झाले असले तरी हे विभाजन परिस्थितीशी समायोजन साधण्याच्या प्रयत्नातून झालेले आहे. शहरी जीवनाच्या धावपळीचा अपरिहार्य परिणाम हा व्यावहारिक रुक्षपणातून समोर येतो. हा बदल आम्हाला स्वीकारावाच लागेल. प्रत्येक गोष्ट स्वत:ला अनुकूल असण्याचा हट्ट प्राप्त परिस्थितीत तरी योग्य म्हणता येणार नाही. जिथे जिवंत राहणेच हे एक आव्हान ठरले आहे तिथे मानवी भावभावनांच्या अस्तित्वाला अशी कितीशी किंमत मिळणार? नाण्यांच्या या दोन्ही बाजुतून हेच स्पष्ट होते की, परिस्थितीशी झगडत स्वत:चे अस्तित्व टिकविताना अनेक चांगल्या गोष्टींचा बळी जातच असतो. जीवनचक्रात या न टाळता येणाऱ्या बाबी आहेत. त्या समजून घेऊनच त्यातून मार्ग काढता येईल.

    -- प्रकाश पोहरे

  • ध्येयसिध्दी करताना तुम्ही चुका करता का?

    ध्येय असणे हे फार महत्वाचे आहे कारण त्यातूनच तयार होणारा नकाशा तुमच्या आयुष्याला दिशा देतो. ध्येय तुम्हाला तुमच्या संपूर्ण वाढीसाठी विकासासाठी आव्हान तयार करतात. ध्येय तुम्हाला कधी काळी तुम्हाला अशक्य कोटीतील वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यास मदत करतात. स्वतःचे वैयक्तिक ध्येय ठरवणे फार आवश्यक आहे कारण जर तुम्ही तसे नाही केलेत तर बऱ्याचदा तुम्ही तुमचा वेळ व काम इतरांची ध्येय साध्य करण्यासाठी खर्च करता.

  • नसती उठाठेव!

    'सामर्थ्य आहे चळवळीचे' ही समर्थांची उक्ती सर्वज्ञात आहे. निश्चितच चळवळीत सामर्थ्य असते. अशाच एका चळवळीच्या सामर्थ्यातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

  • नवे शुद्र!

    आता आर्थिक आधारावर नवे शूद्र आम्ही निर्माण करीत आहोत. जेव्हा हा आधार जातीगत होता तेव्हाही समाजातील एेंशी टक्के लोकांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आणि आताही समाजातील एेंशी टक्के लोकांना उच्चशिक्षण नाकारले जात आहे. प्राथमिक शिक्षण मात्र सगळ्यांनाच उपलब्ध आहे, कारण प्राथमिक शिक्षणाची सोय सरकारतर्फे केली जाते.

  • पायव्याचे दगड

    भल्या पहाटे फोन खणखणला. बोलणारी व्यक्ती स्त्री होती. बोलतांना तिला भावना आवरणं कठीण जात होतं. बराच वेळ केवळ हुंदके ऐकायला आले. त्यानंतर मोठ्या प्रयासाने अगदी काही शब्दच बोलून तिने भेटण्याची वेळ ठरवली. ठरलेल्या वेळेच्या पाच मिनिटं आधीच येऊन ती खुर्चीवर स्थानापन्न झाली. मार्गदर्शनासाठी येणा-या व्यक्तीसाठी आपली समस्या सांगण्यास कुठून व कशी सुरुवात करावी हे एक अवघड काम असतं. माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेली विवाहित स्त्री बराच वेळ मान खाली घालून बसली होती. बोलण्याऐवजी तिच्या डोळ्यांना धारा लागल्या. थोड्याच वेळात ती ओक्साबोक्शी रडू लागली. स्त्रियांना तणावाच्या व्यवस्थापनाचा किती हमखास उपाय सापडलाय नाही? मला त्या तशा परिस्थितीतही तिचा हेवा वाटला. भावनांचा उद्रेक ओसरल्यानंतर ती शांत झाली. तीन वर्षांपूर्वी तिच्या राहत्या गावातल्या एका महाविद्यालयातील प्राध्यापकाशी तिचा विवाह झाला होता. पहिलं मूल होईस्तोवर ब-यापैकी चाललं होतं. त्यानंतर मात्र गाडी हळूहळू रुळावरून घसरू लागली. नाराजी उघडपणे व्यक्त करण्याची पतीला सवय नसल्यामुळे तिला त्याच्या नाराजीचं कारण प्रयत्न करूनही कळत नव्हतं. घरात कोणत्याही प्रकारे गोंधळ न घालता त्याने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण काहीही उपयोग होत नाही हे कळल्यानंतर मात्र त्या पुरुषाचा संयम संपला. त्याचे तिच्या मैत्रिणीशी अनैतिक संबंध असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती तिला एक दिवस अचानक कळली व ती नखशिखांत हादरली आणि त्याच अवस्थेत मार्गदर्शनासाठी येऊन पोहोचली.

    असे आम्ही कसे? लग्न झाल्यानंतर तीन वर्षांच्या आतच पतीला विवाहबाह्य संबंध ठेवण्याची गरज का भासली असावी? अनैतिक संबंध समर्थनीय नसतात हे जरी खरं असलं तरी पत्नीच्या शरीरसंबंधांबाबतच्या विलक्षण थंडपणाने जर तरुण पतीला ऐन तारुण्यात विवाहबाह्य संबंध ठेवण्यास उद्युक्त केलं तर त्यात दोष कुणाचा? टीव्हीवरील विविध मालिकांचा परिणाम अशी टीका करून या पराकोटीच्या गंभीर व अनेकांचे संसार उद्ध्वस्त करणा-या विषयाकडे अगदी सहजपणे दुर्लक्ष करता येईल? मार्गदर्शनासाठी येणा-या विवाहित स्त्रियांच्या तोंडून ‘पतीने आमच्याशी चांगलं वागावं यातच आम्हाला समाधान वाटतं. आम्हाला शारीरिक संबंधांचं विशेष महत्त्व वाटत नाही,’ किंवा ‘लैंगिक संबंधांना जास्त महत्त्व द्यायचं नसतं,’ असे उद्गार अनेकदा ऐकायला मिळतात तेव्हा मी विलक्षण अस्वस्थ होतो आणि समोर बसलेल्या स्त्रीच्या लवकरच उद्ध्वस्त होणा-या संसाराचं भयाण चित्र माझ्या डोळ्यासमोर तरळू लागतं. पोटाच्या भुकेइतकीच लैंगिक भूकही अत्यंत महत्त्वाची असते हे घराघरातील आईवडील आपल्या उपवर मुलींना का सांगू शकत नाहीत? यशस्वी वैवाहिक जीवनासाठी केवळ पतीचेच नाही तर पत्नीचेही लैंगिक समाधान होणे अत्यावश्यक आहे, हे पुरुषांना कोणी का समजावून सांगत नाही? लैंगिक जीवनाचा पुरेपूर आनंद लुटून संसारात सुखी व समाधानी कसं व्हावं याचं ज्ञान उपजतच प्रत्येक स्त्री-पुरुषाला असतं तर या पृथ्वीवरील असंख्य दांपत्यांचे चेहरे आनंदाने फुलून गेले असते. पण वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. पत्नीने या बाबतीत चतुरपणा कसा दाखवावा हे तिला माहीत नसल्यामुळे विवाहित पुरुषांचे विवाहबाह्य संबंध मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत तर लैंगिक सुख प्राप्त करण्यात किंवा अगदी स्पष्टच बोलायचं तर ‘ओरबाडण्यात’ पुरुषप्रधान संस्कृती तमाम नव-यांच्या मदतीला धावत असल्यामुळे विवाहबाह्य संबंध ठेवणा-या असमाधानी स्त्रियांची संख्याही चिंताजनकरीत्या वाढत चालली आहे. पती-पत्नीमधील निकोप लैंगिक संबंध हे सुखी व समाधानी वैवाहिक जीवनाच्या पायव्याचे दगड असतात ही जाणीव प्रत्येक स्त्री-पुरुषाने ठेवली तर किती बरं होईल नाही?

    श्रीकांत पोहनकर
    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • वध आणि खून : गांधीजी आणि अन्य – भाग २

    दिनांक १३ मार्च २०१६ च्या ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्राच्या पान २ वरील, एका बहुचर्चित विषयाशी संबंधित ‘गांधींचा वध नव्हे, तर खूनच ! : कुलगुरूंचे भाषण मधेच थांबवत शरद पवार यांची सूचना …’ ही ठळक बातमी वाचून त्याबद्दल स्पष्टीकरण मांडावे असे वाटले, म्हणून लिहिलेल्या लेखाचा हा पुढील भाग.

    संस्कृती, पुरातन वाङ्मय, इतिहास वगैरेंच्या आधारने या विषयाची चर्चा करू या.

    पैलू दुसरा : संस्कृती, वाङ्मय, इतिहास :

    संस्कृती, वाङ्मय व इतिहास हे, आपल्या चर्चेच्या अनुषंगाने, परस्परसंबंधी (interdependent) आहेत.

    १) आपल्याला रामायण, महाभारत अशा ग्रंथांमधून रावणवध, शिशुपालवध, अशा प्रकारचे शब्द आढळतात. राम व कृष्ण यांना अवतारी पुरुष मानल्यामुळे, आणि, रावण, शिशुपाल इत्यादी जन हे ‘व्हिलन’ (किंवा व्हिलनिश) होते, असे दाखविलेले असल्याने आपला असा समज होतो की, ‘वध’ हा फक्त खलांचाच होतो.

    पुढील विश्लेषणापूर्वी हे स्पष्ट केलेले बरे की, श्रीराम व श्रीकृष्ण यांचा कुठल्याही प्रकारे अधिक्षेप करण्याचा माझा हेतू नाहीं. ते वंद्य आहेत, हे मान्य. (त्यांना अवतारत्व हे, त्यांच्या स्वत:च्या खूप-नंतरच्या काळात दिले गेले. म्हणजेच, ते महापुरुष होते, पण मानवच होते ). पण, ते महामानव होते याचा अर्थ असा नाहीं की त्यांचे प्रत्येक कृत्य योग्यच होते. किंबहुना, त्यांच्या काळी ते कृत्य योग्य मानले गेले असेलही; पण आज त्याचे विष्लेषण करतांना आपल्याला सद्य परिस्थितीनुसार त्याचा वेगळा संदर्भ दिसतो, भिन्न अर्थ लागतो.

    ( हें स्पष्टीकरण हेतुत: देण्याचे कारण असे आहे की, ‘मूळ चर्चा बाजूला पडून दुसर्‍याच विषयावरील भावनिक उच्चारव टळावा’ ).

    २) रावण, शिशुपालादि वस्तुत: खल होते की नाहीं, ही बाब प्रथमत: गैरलागू आहे. ते, या ग्रंथांच्या सांप्रत उपलब्ध आवृत्यांमध्ये ‘खल’, व्हिलन, दाखविलेले आहेत. या ग्रथांच्या मूळ आवृत्या, या सध्या उपलब्ध असलेल्या आवृत्यांहून शेकडो वर्षे आधीच्या होत्या असणार.

    तेव्हा, त्या मूळ स्वरूपातील ग्रंथामध्ये, रावण शिशुपालादि लोक तसेच ( खल) दाखवलेले होते काय, हा प्रश्नच आहे. हा मुद्दा, म्हणजे काळाचा संदर्भ, आपण ध्यानात ठेवायला हवा.

    ३) पुढे जाण्यापूर्वी, हें ध्यानात घ्यायला हवे की, ‘खून‘ हा शब्द भारतात, व पर्यायानें मराठी, हिंदी इत्यादी ‘आधुनिककालीन’ भाषांमध्ये मध्ययुगात आला. तेव्हा, प्रश्न असा उठतो की, त्याआधी कुठला शब्द वापरला जात असेल ? तर, त्याचे उत्तर स्पष्ट आहे की, अर्थातच, पुरातन संस्कृत ग्रंथामध्ये तर संस्कृत शब्दच असणार ; आणि ‘आधुनिक’ भारतीय भाषांमध्येही तेव्हा, संस्कृत किंवा संस्कृतोद्भव (तत्सम अथवा तद्भव) शब्दच वापरला जात होते.

    ४) आपण ज़रा वेळ रावण, शिशुपाल यांना बाजूला ठेवू. त्यांच्याकडे नंतर वळायचे आहेच. आधी ज़रा दुसरी काही उदाहरणे पाहू या.
    ४.१. रामानें सुग्रीवाचा ज्येष्ठ भाऊ बाली याचा वध केला. असे पहा, रामाची आणि बालीची आधी ओळखच नव्हती. सीताहरण झाल्यानंतर राम-लक्ष्मण तिचा शोध घेत-घेत दंडकारण्यात आले, तेव्हा पंपा सरोवर भागात त्यांना मारुती भेटला ; त्यानें सुग्रीव व बाली यांच्यामधील परिस्थिती वर्णन केली, व सुग्रीवाला सहाय्य करण्याची रामाला विनंती केली. बाली काही व्हिलन नव्हता, तो ‘वा-नरां‘चा बलशाली राजा होता, सुद्रीव हा त्याचा धाकटा भाऊ होता.

    एका द्वंद्व / युद्धातून जेव्हा तो काही काळ परत आला नाही, तेव्हा तो मेला आहे असे समजून त्याचा कनिष्ठ भाऊ सुग्रीव राजा बनला व बालीच्या पत्नीलाही त्यानें तत्कालीन प्रथेनुसार आपली पत्नी बनवले. ( असेंही वाचनात आलेलें आहे की, बाली परत येऊं नये म्हणून, ज्या गुहेत बाली व त्याचा प्रतिद्वंद्वी यांचें द्वंद्व / युद्ध चाललें होते, त्या गुहेच्या मुखावर सुग्रीवानें अन्य वानराच्या - मारुतीच्या - मदतीनें, शिळा बसवली. तसें असेल तर, बाली परतूं नये, असाच सुग्रीवाचा उद्देश होता ; आणि मग, villan कोण, याचें उत्तर स्पष्ट आहे ! ).

    परंतु, त्यानंतर काही काळाने बाली परतला. आपले राज्य व पत्नी यांचा सुग्रीवाने अपहार केला असे दिसून आल्यानें, त्यानें सुग्रीवाला राज्यातून हाकलून दिले व स्वत:चे राज्य पुन्हा ग्रहण केले.

    नंतर, बाली व सुग्रीव यांच्या द्वंद्वाच्यावेळी, कुठला सुग्रीव हे ओळखता यावे म्हणून रामाने तसुग्रीवाला एक पुष्पहार परिधान करायला सांगितले होते. यावरूनही, राम बालीला ओळखत नव्हता हेच सिद्ध होते.

    आता सांगा, कुठल्या तर्काने बालीला व्हिलन म्हणता येईल ? आणि, समजा तसे असते, तर मग, लपून, झाडाच्या मागून बाण मारून बालीवध करायची रामाला काय आवश्यकता होती ? याचे कारण स्पष्ट आहे की, रामानें अनोळखी बालीची, स्वत:शी-संबंधित असे कुठलेही कारण नसतांना, हत्या करणें, हे न्यायसंगतच नव्हते. बालीला मारणें ही रामाची राजकीय गरज होती. म्हणजेच, ज्याचा वध झाला , तो बाली ‘खल’ नव्हता.

    ( गीत रामायणामधील यासंबंधीचे गदिमांचे शब्द पहा : ‘बालीवध ना , खल-निर्दाळण’. यातून स्पष्ट ध्वनित होते की, वध हा खलाचाच होतो, असे नाहीं. नाहींतर गदिमा म्हणाले नसते कां, की ‘बालीवधची खल-निर्दाळण’? आपण गदिमांच्या रचनेत फक्त विरामचिन्हाचा बदल करून, असे म्हणू या की – ‘बालीवध ; ना खल-निर्दाळण’. )

    ४.२. याच प्रभू रामचंद्रानें शंबर याचाही वध केलेला आहे, त्याचे कारण काय तर, जन्मवर्णाने अपात्र असूनही शंबर वेदाध्ययन करत होता. त्याला खरे तर, ऋषीमुनींसमानच मानायला हवे! पुढील स्पष्टीकरणाची खरे तर गरजच नाही. म्हणजेच, हा वधही ‘खला’ची हत्या नव्हेच.

    ४.३. कृष्णाने भीमाकरवी जरासंध याचा वध करविला. जरासंध काही व्हिलन नव्हता. तो होता मगधाचा राजा . आणि त्याने एवढा fair-play केला की, ‘मी-अर्जुन-भीम यांच्यापैकी तू कोणाशीही मल्लयुद्ध कर’, असे श्रीकृष्णाने सांगूनही, जरासंधाने स्वत:ला तुल्यबळ अशा भीमाची निवड केली. त्याने द्वंद्वासाठी कृष्ण किंना अर्जुन यांची निवड केली असती, तर काय झाले असते, याची कल्पना करावी. जरासंध खल नव्हता, त्याचा वध वध राजकीयच होता.

    ५) रावण व शिशुपाल यांच्याकडे नजर टाकण्यापूर्वी, प्रथम हें ध्यानात घ्यायला हवे की –

    * मूळ-रचलेल्या ग्रंथामध्ये बर्‍याच-नंतरच्या काळात पुराणिकांनी हवी-तशी भर घातलेली आहे, आणि हीरोच्या प्रत्येक विरोधकाला व्हिलन बनवलेले आहे. (अर्थातच, त्यामुळे कथानकाची नाटकीयता वाढते; आणि पुराणिकांना निरूपण-कीर्तनाच्यावेळी त्या नाटकीयतेचा नक्कीच उपयोग होत असणार) .

    * हे सांगायला नकोच की, नायकाचे (हीरोचे) महत्व अधोरेखित होते, वाढते, तें व्हिलनमुळे.
    हीरो-अँटीहीरो, नायक-खलनायक अशा जोड्या सर्वच वाङ्मयात सापडतातात. जैन परंपरेतही वासुदेव-प्रतिवासुदेव आहेत. बौद्ध साहित्यात, बुद्धत्व प्राप्त होण्यापूर्वीचा, गौतम व मार यांचा संघर्ष उल्लेखलेला आहे. ख्रिस्चॅनिटीसुद्धा Christ-Antichrist मानते. मध्ययुगीन भविष्यवेत्ता नोस्ट्रॅडेमस यानेही Christ-Antichrist या जोडीचा उल्लेख केलेला आहे. ईश्वर आणि सैतान ही जोडीही प्रसिद्ध आहेच.

    ५.१ रावण दशग्रंथी ब्राह्मण होता. असा माणूस सच्चरित्र असावा अशी अपेक्षा असते. तो एकदम व्हिलन कसा झाला ? आणि, तसा तो असता, तर मग सीतेला अनेक महिने अशोकवनात ठेवायची आवश्यकताच काय ? तो सहज सीतेला आपली पत्नी बनवू शकला असाता, अगदी तिच्या इच्छेविरुद्धही. किंवा, ( आणि, हें लिहायलाही माझ्या मनाला त्रास होतो आहे, की ) रावण सीतेला पत्नी न बनवताही जबरदस्तीने तिचे स्त्रीत्व ‘लुटू’ शकला असता. पण, रावणाने तसे केले नाही ! आपल्याला पती म्हणून स्वीकारण्याची तो सीतेला विनंती करत राहिला, आणि त्याने तिच्या अंगाला हातही लावला नाहीं. अशा माणसाला व्हिलन म्हणता येईल कां? सीता-हरणाला व राम-रावणाचे युद्ध यालाही तत्कालीन राजकीय पदर होते.

    ५.२. शिशुपालानें राजसूय यज्ञाच्या वेळी कृष्णाला अग्रपूजेचा मान द्यायला विरोध केलेला होता. इरावती कर्वे यांनी स्पष्ट केलेले आहे की, कृष्ण तसेच शिशुपाल या दोघांनाही ‘वासुदेव’ व्हायचे होते ( इथे, वासुदेव म्हणजे ‘वसुदेवाचा पुत्र’ असा अर्थ अभिप्रेत नाहीं, तर ‘वासुदेवपण’ ही एक तत्कालीन महत्वाची उपाधि होती, त्यात राजकीय संदर्भ, राजकीय व सांस्कृतिक शक्ती, असा अर्थ भरलेला होता. म्हणजेच, शिशुपाल काही व्हिलन नव्हता, तर तो वासुदेवत्वासाठी श्रीकृष्णाचा प्रतिस्पर्धी होता. म्हणून त्याने राजसूय यज्ञाच्या वेळी हरकत घेतली ; आणि संधीचा फायदा घेऊन कृणानें त्याचा वधच करून टाकला. कृष्णाने शिशुपालाचा असाअचानक वध केलेला पाहून सगळे आश्चर्यचकित आले होते. म्हणजेच, ती कृती अगदी sudden होती, व ती कितपत योग्य होती याबद्दल उपस्थित जनांच्या मनात संदेह होता.

    ६) अशी अनेक उदाहरणे देता देतील. उदा. भीष्मवध, द्रोणवध इत्यादी. भीष्म व द्रोण हे दोघेही कुठल्याही व्याख्येनुसार खल ठरत नाहीत. उलट, दोघांचाही वध कपटाने केला गेला. घटोत्कचाचेंही पहा. तो वीर योद्धा होता. तो खल कसा ? तसेच कर्णवध, दुर्योधनवध यांचेही आहे. दोघांनाही तत्कालीन युद्धनियमांच्या विरुद्ध जाऊन मारले. ते खल होते काय ? त्यांना पुराणिकांनी खल बनविले आहे. ‘सुयोधन’ याचा उल्लेख कथेमध्ये ‘दुर्योधन’ असा करणे, हेही सूत-पुराणिकांचेच काम. (दुर्योधनाचा उल्लेख पुढेही आहे).

    ७) हे महाभारतातील आणखी काही उल्लेख :

    * कर्णानें कुंतीला वचन दिले होते की मी अर्जुनाव्यतिरिक्त कुठल्याही पांडवाचा वध करणार नाही.
    * कुरुक्षेत्रयुद्धाआधी भीष्माने दुर्योधनाला सांगितऋले होते की मी कुठल्याही पांडवाचा वध करणार नाहीं.

    या दोन्हींतील ‘वध’ शब्दावर टिप्पणी करायची आवश्यकताच नाही, कारण पांडव तर महाभारतातील ‘हीरो’च आहेत.

    ८) वस्तुत: कौरव-पांडव युद्ध हें, ‘राज्यावर खरा अधिकार कोणाचा’ या मुद्द्यावरून, चुलत बंधूमध्ये लढले गेलेले युद्ध आहे. (मी कौरवांचा पक्षपाती नाही, पण,) दुर्योधनाचे लॉजिक अयोग्य कसे? तो तर मोठ्या भावाचा मोठा मुलगा होता. युद्धात, पांडवांकडे सात अक्षहौणी तर कौरवांकडे अकरा अक्षहौणी, म्हणजे जवळजवळ दीडपट सेना होती. याचाच अर्थ असा की, त्याकाळातील आर्यावर्तामधील बर्‍याच नृपांना दुर्योधनाचा राज्यावरीळ हक्क योग्य वाटत होता. भीष्म पितामह, गुरु द्रोण, कृपाचार्य , हे खाल्या मिठाला जागले म्हणून नव्हे, तर न्यायाच्या दृष्टीने योग्य वाटले म्हणूनच, पांडवांबद्दल सहानुभूती असूनही, कौरवांच्या बाजूने लढले. कारण, ती बाजू त्यांना अधिक न्याय्य वाटली होती असणार. बलरामालाही हे युद्ध अयोग्यच वाटत होते, म्हणून तर तो तीर्थयात्रेला निघून गेला.
    म्हणजेच, हे स्पष्ट आहे की, ‘राज्यावर अधिकार कोणाचा’ याविषयीच्या युद्धाला विनाकारण, उगाचच ‘सुष्ट विरुद्ध दुष्ट’ असा रंग दिला गेला.

    * सध्याचे महाभारत व्यासशिष्य वैशंपायन याचें आहे व त्याने ते जनमेजयाला यज्ञाच्या वेळी कथन केले होते. त्यात पुढे सूतांनी भर घातली. व्यासांच्या विभिन्न शिष्यांनी व्यासांच्या ‘जय’ या मूळ रचनेवर आधारित वेगवेगळी महाभारतें लिहिली होती असे म्हणतात. ‘जय’ कथेची एक विस्तारित-रचना व्यासशिष्य जैमिनीने केली होती, व त्यात त्याने कौरवांच्या बाजूने लिहिले होते.( म्हणजेच, ते पर्यायी ‘महाभारत’ होते ). अर्थातच, आता त्याची प्रत उपलब्ध नाहीं. कशी असेल? पण ती उपलब्ध असती, तर जैमिनीने या वधांबद्दल काय लिहिले असते, याची कल्पना करणें अवघड नाही.

    (तशा प्रकारचें पुस्तक काही दशकांपूर्वी श्री. आनंद साधले यांनी लिहिलेले आहे, ते वाचून जिज्ञासूंना थोडीशी कल्पना येईल) .

    ९) असुर :

    आता आपण ज़रा वैदिक साहित्यावरही नजर टाकू या. इंद्राने असुरांचा वध केल्याचे उल्लेख वेदांमध्ये आहेत. जसें, वृत्रासुर, त्रिपुरासुर इ. असुर हे खल होते काय ? ते चांगले प्रगत, सुधारलेले होते. त्रिपुरासुराची तर तीन पुरे होती. (महाभारतकाळीही असुर दिसतात. बाणासुराची कन्या उषा ही, श्रीकृष्णाचा पौत्र अनिरुद्ध याच्याशी विवाहबद्ध झालेली होती. असुर प्रगत नसते तर, असे संबंध यादवांना मान्य होऊ शकले असते काय?).

    मुख्य गोष्ट ही की, ऋग्वेदकाळी, ‘देव’ आणि ‘असुर’ या दोन जमातींमध्ये, दोन टोळ्यांमध्ये, दोन संस्कृतींमध्ये, संघर्ष झाला. ( भारतीय ‘आर्य’ हे मूळ भारतातीलच आहेत, की कुठून बाहेरून आले, या वादात तूर्तास आपण शिरण्याचे कारण नाही). मात्र, देव व असुर यांचा संघर्ष झाला याचा अर्थ असा मात्र नाहीं की वध केले गेलेले असुर ‘खल’ होते.

    ‘देव’ सुष्ट’ होते असे म्हटले की मग, त्यांचे शत्रू जे असुर हे ‘दुष्ट’च असायला हवेत, अशी एक धारणा आहे. पण, ते दुष्ट असते तर मग, अनेकदा त्यांनी तप करून शंकराला प्रसन्न करून घेतले, व देवाधिदेव ‘महादेवा’ने त्याना वर दिले, हे कसे ?

    आणखी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी , आणि ती ही की : ‘कोण चांगला व कोण वाईट’, हे अनेकदा बघणार्‍याच्या दृष्टिकोनावर, तो कोणाच्या पक्षाचा आहे यावरही, अवलंबून असते. (ही बाब, आपण जेव्हा या चर्चेचा समारोप करू, तेव्हाही ध्यानात घ्यावी).
    ऋग्वेदाने, देवांना ‘चांगले’ व असुरांना ’वाईट’ ठरवले. पारशी जमातीचा ‘अवेस्ता’ हा ग्रंथही खूपच पुरातन आहे. ऋग्वेद व अवेस्ता यांच्यात भाषिक साम्यही बरेच आहे. मात्र, अवेस्ताच्या ‘पुरातन-पर्शियन’ भाषेत, ‘देव’ याचा अर्थ ‘चोर’ असा होतो. तसेच, पारशांचा परम-ईश्वर (biggest deity) आहे ‘अहुर मज्द’. ऋग्वेदीय ’स‘चा पुरातन-पर्शियन मध्ये ‘ह’ होतो. जसें, सोम - होम , सिंधु – हिंदु . म्हणजेच, पर्शियनमधील ‘अहुर’ हा, ऋग्वेदीय ‘असुर’ आहे. याचाच अर्थ असा की पुरातन-पर्शियन सर्वश्रेष्ठ deity ‘असुर’ ही आहे. मग, त्यांनी देवांना चोर म्हटले, यात काय आश्चर्य ?

    तेव्हा, सुष्ट-दुष्ट, चांगला-वाईट, हीरो-व्हिलन, अशी विभागणी करतांना आपण सावध असायला हवे. मात्र, एक गोष्ट असुरांच्या उदाहरणावरूनही स्पष्ट होते, की, ज्या व्यक्तीचा ‘वध’ होतो, ती व्यक्ती ‘दुष्ट’च असते, असे अजिबात नाही.

    १०) चक्रधरस्वामी व श्रीबसवेश्वर हे दोघेही संतच. पण, चक्रधरांच्या बाबतीत, हेमाद्री पंडितानें त्यांचा वध करविला/हत्या करविली, असा शब्दप्रयोग माझ्या पाहण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे, शिष्यांच्या चुकांचे फळ बसवेश्वरांना भोगावे लागले व त्यांचा वध झाला / हत्या झाली, अशा अर्थाचा उल्लेख मी वाचलेला आहे. (हे उल्लेख असलेल्या पुस्तकांचे संदर्भ तूर्तास, readily माझ्या हाताशी उपलब्ध नाहीत. मात्र, त्यांचा ‘खून’ झाला’ असा उल्लेख नक्कीच झालेला नाहीं, हे निश्चित). आपला मुद्दा स्पष्ट आहे.

    ११) औरंगज़ेबाचा मोठा भाऊ दारा शिकोह हा अतिशय सज्जन होता. त्याला हिंदू धर्माबद्दल आस्था होती. त्याने काही हिंदू ग्रंथांचे फारसीत भाषांतर केले होते अथवा करवून घेतले होते. आपण तूर्तास इथे, हिंदू, मुस्लिम असा धर्मविचार करत नाहीं आहोत; पण असे म्हणायला काहीच हरकत नाहीं की दारा तत्कालीन ‘धर्मसमभाव’ पाळत होता. दारा हा शहाजहानचा ज्येष्ठ पुत्र होता, म्हणजे तत्कालीन प्रथेनुसार, राज्यावरही त्याचाच हक्क होता. औरंगज़ेबाने शहाजहानविरुद्ध बंड केले, तेव्हा दारा त्याच्याशी शहाजहानचा प्रतिनिधी म्हणून लढला. अशा सत्प्रवृत्त दाराला औरंगज़ेबानें मौलवींकरवी दोषी ठरविले व त्याला मारविले, अगदी ऑफिशियली. आतां तुम्ही सांगा, याला दाराचा वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, खून म्हणायचे, सजा म्हणायचे की काय म्हणायचे ?

    १२) येशू ख्रिस्त याच्या मृत्यूला काय म्हणायचे ? (त्याचे ‘रिसरेक्शन’ झाले की नाही, या मुद्द्याने, आपल्या चर्चेत व निष्कर्षात काही फरक पडत नाही). ध्यानात घ्या, येशूला व ख्रिश्चन धर्माला महत्व आले तें इ.स. ३५० नंतरच. येशूच्या स्वत:च्या वेळी तर, त्याला बंडखोरच मानले गेले, व तत्कालीन कायद्यानुसार त्याला क्रूसावर चढवले. आणि, त्याचवेळी, त्याच्याचबरोबर, दोन चोरांनाही क्रूसावर चढवले होते. आता सांगा, येशूला ‘क्रूसावर चढविण्या’च्या कृतीला, आपण वध म्हणायचे, हत्या म्हणायचे, शिक्षा (सजा) म्हणायचें की खून म्हणायचे ?

    समारोप :

    आपण हे पाहिले की ‘वध’ व ‘खून’ (तसेच , ‘हत्या’) हे अनेकांशी समानार्थी शब्द आहेत. हिंदुमहासभा, आर्. एस्. एस्. वगैरे संस्था ‘वध’ हा शब्द वापरतात, कारण त्यांना संस्कृत शब्दांबद्दल, व त्यांच्याशी संबंधित संस्कृतीबद्दल, आपुलकी वाटते, आणि तसे शब्द वापरायचा त्यांचा आग्रह असतो. उदा. ‘जामीन‘ या रूढ शब्दाऐवजी ‘प्रतिभू’ या शब्दाचा वापर. (अर्थात्, अशा वापरात अयोग्य, किंवा चुकीचा-अर्थ directly or indirectly रूढ करण्याचा हेतू , असे काही दिसत तरी नाही. असा, संस्कृत शब्दांचा वापर योग्य आहे कां, किंवा तो अतिरिक्त आहे का, अथवा तो कितपत, कुठल्या level पर्यंत, योग्य आहे, हा एका वेगळ्या चर्चेचा विषय होईल. तूर्तास आपण त्यात शिरायचे कारण नाही.)

    मात्र, गांधीजींचा ‘वध’ की ‘खून’ हा शब्दांचा काथ्याकूट आवश्यक नाहीच. या विषयाला खासकरून लागलेल्या राजकीय वळणामुळे उगीचच घोळ घातला गेलेला आहे, या शब्दाच्छलाला उगीचच अवाजवी महत्व प्राप्त झाले आहे. सूज्ञांस अधिक सांगणे नलगे.

    (१३ मार्च, २०१६)

    - सुभाष स. नाईक .
    दूरध्वनी : (०२२)-२६१०५३६५. भ्रमणध्वनी : ९८६९००२१२६.
    ईमेल : vistainfin@yahoo.co.in.

  • आत्महत्त्या एका संवेदनशील शेतकऱ्याची

    प्रकाशन दिनांक :- 01/06/2003
    गुणवंतरावांच्या मृत्यूने नेहमीच चर्चिल्या जाणाऱ्या आणि केवळ चर्चिल्याच जाणाऱ्या प्रश्नांचे मोहोळ पुन्हा एकदा उठू पाहत आहे. प्रामाणिक आणि संवेदनशील माणसाला कर्तृत्ववान बनण्याचा अधिकार या समाजाने, शासनाने नाकारला आहे काय? यशाचे शिखर गाठणारा एक नंबरचा मार्ग आम्ही बंद केला आहे काय?

  • कसेल त्याची समृध्दी!

    पिकांमध्ये बदल करणे, पीक पद्धतीत बदल करणे, नगदीच्या इतर पिकांचा विचार करणे, उत्पादक आणि विक्रेता या दोन्ही भूमिका स्वत: करून पाहण्याचा प्रयत्न करणे, यावर कधी विचारच झाला नाही. शेवटी कष्ट म्हणजे केवळ ढोर मेहनत नसते. कष्टाच्या व्याख्येत मेहनतीच्या जोडीला बुद्धीची, कल्पकतेची जोड असतेच.