(User Level: User is not logged in.)

वैचारिक लेखन

Sort By:

  • एकाकी लढा

    आपला समाज कुटुंबरचनेचा पुरस्कार करतो. सर्वसाधारणपणे दोन-तीन पिढ्या एकत्र रहात असलेली कुटुंबे दिसतात. विस्तारामुळे कुटुंब विभक्त झाली तरी नाती दृढ राहतात. वेळप्रसंगी एक होतात मदतीसाठी, सांत्वनासाठी वा आनंद साजरा करण्यासाठी. असे असले तरी याला अपवाद सापडतात. अशीच एक घटना माझ्या मनाला अस्वस्थ करणारी ठरली.

  • आम्हाला भेडसावणारा एकमेव प्रश्न !

    सध्या अचानक महाराष्ट्राला चांगले दिवस आले आहेत. सगळीकडे सुबत्ता आली आहे. विजेचा प्रश्न मिटलेला आहे. महाराष्ट्र लोडशेडींगमुक्त झाला आहे. शेतकर्‍यांना पाहिजे तितके पाणी उपलब्ध आहे. तीन तीन पिके वर्षभरात घेतली जातायत. शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबल्यात , त्यांच्या घरात एसीपासुन मायक्रोवेवपर्यंत सर्वकाही उपलब्ध आहे. कुपोषणाचा प्रश्न सुटलाय , सगळी लहान मुले एकजात निरोगी दिसतायत . सरकारी नोकरांचे पगार वाढलेत , महागाई कमी झालीये , सर्व वस्तु अत्यंत स्वस्त किमतींना उपलब्ध आहेत. सरकारी कार्यालयातला भ्रष्टाचार थांबलाय , सरकारी कार्यालयातली कामे कशी पटापटा आटोपतायत . सकाळी जा , एक तासात कुठलेही काम करुन परत या . जिकडेतिकडे मुबलक धान्य आहे , सगळीकडील झोपडपट्टया अचानक नाहीशा झाल्यायत , त्याजागी पक्की घरे आहेत , सर्वांना हाताला काम आहे, खायला धान्य आहे , आणि झोपायला निवारा आहे . खुन ,दरोडे , बलात्कार पुर्णपणे बंद झालेत , पोलिसमंडळींना काम उरले नाहिये .सगळीकडे एवढा आनंदीआनंद ,सुखसंपदा नांदत असताना संपुर्ण महाराष्ट्रापुढील एकच प्रश्न मात्र अजुनही सुटला नाहिये , तो म्हणजे माननीय मुख्यमंत्री अमिताभसोबत साहित्य संमेलनात एकत्र जाणार का ?

    आता सगळीकडे एवढा आनंदी आनंद असताना केवळ एकच प्रश्न न सुटलेला असणे यात मोठेसे ते काय ? पण हे म्हणणे तितकेसे बरोबर नाही . आता महाराष्ट्रात हे सर्व प्रश्न असले असते तर त्या प्रश्नांपुढे हा प्रश्न खुपच क्षुल्लक वाटला असता . पण परिस्थिती तशी नाही . हे सगळे प्रश्न सुटलेले असल्यामुळे हल्ली “ मुख्यमंत्री आणि अमिताभ “ हा एकच प्रश्न आम्हाला मोठा दिसतो. जिकडेतिकडे चॅनलवर एकच चर्चा. वर्तमानपत्रात त्याच बातम्या. पण चॅनलवाल्यांचे काय चुकले ? सगळे प्रश्न सुटल्यामुळे वागळेसाहेब आणि खांडेकरसाहेब यांच्यापुढे मोठा प्रश्न उभा राहीलाय. आपण चॅनलवर काय दाखवायचे ? शेवटी त्यांना हा प्रश्न मिळालाय आणि त्यांनी सुटकेचा निश्वास टाकलाय.

    आता वागळेसाहेबांचा प्रश्न जरी सुटला असला तरी सामान्य जनता ही विभागली गेली आहे. कुणाला वाटते , हो जायला पाहिजे .कुणाला वाटते नको जायला . चॅनलवर ओपिनियन पोल्स सुध्दा चालु झालेत. ज्यांना मुख्यमंत्र्यांनी जावे वाटते त्यांनी Y टाइप करुन पाठवावे .ज्यांना नाही जावे वाटत त्यांनी N टाईप करुन पाठवावे. ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जावे असे वाटते. तर उरलेल्यांना नाही जावे असे वाटते. पुन्हा चर्चा चालु. गेले तर काय होणार , नाही गेले तर काय होणार , यावर वेगवेगळ्या तज्ञांची खलबते चालु आहेत. ऊभा महाराष्ट्र आपापली कामे सोडुन चॅनलवर बघतोय. ( सगळीकडे सुबत्ता असल्यामुळे कामे सोडली तरी दुसरे काम लगेच मिळते ) अर्ध्या तासानी पुन्हा ओपिनियन पोल आला. मुख्यमंत्र्यांनी जावे की न जावे ? पुन्हा एसेमेस पाठवा . ( ते पण फ्री . कारण सुबत्ता ) .बघा बघा आता ओपिनियन पोल बदलला . आता ५६ टक्के लोकांना मुख्यमंत्र्यांनी जाउ नये असे वाटते. हा आमच्या चर्चेचा परिणाम . खरोखरच आहे , एवढी परिणामकारक चर्चा जनतेनी कधीही ऐकली नाहीये .

    मुख्यमंत्र्याच्या जाण्याचा दिवस अखेर उजाडला. आमचे वार्ताहर मुख्यमंत्र्याच्या मागावरच आहेत. चढले चढले ते बघा मुख्यमंत्री विमानात चढले .आता विमान कुठल्या दिशेला जातेय याच्याकडे आपण लक्ष ठेवु या .पुण्याकडे जाणार की दिल्लीकडे ? पुण्याकडे गेले तर आपल्याला एक विषय मिळेल . मुख्यमंत्र्यांची खुर्ची जाणार की राहणार ? ते दिल्लीकडे गेले तरीही एक विषय मिळेल . हायकमांडचा दबाव की अजुन काय ? त्यामुळे एकाच विषयातुन आपल्याला अनेक विषय मिळतील . चर्चा होतील , तज्ञ मंडळी आपली मते मांडतील , आपण अजुन ओपिनियन पोल्स ठेवु.

    गुलाबपाकळ्यांनी सजवलेल्या गालिचावरुन चालत असताना अचानक चुकुन राहिलेला काटा पायाला बोचावा ,त्याप्रमाणे महाराष्ट्रातील जनतेला बोचणारा एकमेव प्रश्न समोर आणल्याबद्दल जनता आपणाला अत्यंत धन्यवाद देते आहे.

    -- निखिल मुदगलकर

  • अनंत अमुची ध्येयासक्ती

    आयुष्य हे खर तर मला एखाद्या खवळलेल्या समुद्रा प्रमाणे वाटते.एका पाठोपाठ लाटा या येतच राहतात. अनेकदा या लाटांच्या माऱ्यापुढे मन खिन्न होऊन जाते.अगदी थकल्या सारखे होते. पण अशाच वेळी आठवण होते ती कुसुमाग्रजांच्या 'कोलंबसाचे गर्वगीत' या कवितेची.

    अगदी भीषण वादळात सापडला असतानाही किती खंबीर,धीरगंभीर वाटतो तो आणि त्याचे ते वागणे पाहून वाटते आपण उगाचच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप बाऊ करतो ... हा पठ्या तर सरळ समुद्रालाच सांगतो,
    "अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा किनारा तुला पामराला!"

    मुश्किलोंकी लहरोंको चिरकर मंजील हम पा लेंगे.. ऐ जिंदगी तु बस देखती जा....!

    Anyone can swim with the waves ...but a real person is someone who can tear apart the waves and move ahead.

  • जागो ये मुर्दों का गांव !

    संपूर्ण समाजच बधीर झाला आहे नव्हे जणू मृतप्रायच झाला आहे. येणार्‍या संकटाची जाणीवच नसल्याने त्यावर विचार करून लोकसंख्या नियंत्रणाच्या दृष्टीने काही उपाय योजणे, त्याचबरोबर मूलभूत गरजा भागविण्याच्या दृष्टीने नियोजनाला सुरूवात करणे याविषयी कोणी बोलतानादेखील दिसत नाही. म्हणूनच कबीराने म्हटल्याप्रमाणे ‘जागो ये मुर्दोंका गांव’ असे म्हणायची वेळ आली आहे.

  • ती छडी हरवलीय

    सर्वांनीच आत्मसात करणयासारखा अप्रतिम व उत्कृष्ट लेख....

    ""ती छडी हरवलीय.....""

    पालकसभा संपली.
    मुलाच्या बाईंना प्रत्यक्ष भेटून म्हटलं.........
    गृहपाठ केला नाही वा वर्गात काहीही आगळीक केली तरी त्याला व्यवस्थित शिक्षा करा."
    "कमाल आहे. अहो, साधी एक पट्टी मारली तरी दुसर्‍या दिवशी पालक प्रिन्सिपाॅलना भेटतात. आम्हाला समज दिली जाते. तुम्ही तर शिक्षा करा असं सांगताय !"
    "योग्य वेळी योग्य शिक्षा हा सुध्दा शिक्षणातला भाग आहे असं मला वाटतं. शिक्षकांबद्दल प्रेमाबरोबर धाकही वाटायला हवा."
    मला समर्थ विद्यालयाच्या पहिलीच्या वर्गातली माझी पहिली शिक्षा आठवली. हिशेबाचं उत्तर चोरुन लिहिल्याबद्दल भाटवडेकर बाईंनी केलेली.
    वर्गाबाहेर पायाचे अंगठे धरुन तासभर उभं केलं होतं त्यांनी. अश्रूंची धार लागली होती. शिक्षा संपली न् जवळ घेऊन, थोपटून त्या म्हणाल्या, "अरे, आता हिशेबच काय, कुठलीही चोरी तुझ्या हातून होणार नाही."
    हे आठवलं न् हसू आलं
    '"शिक्षा '" याचा अर्थ फक्त मारहाण, उपासमार, तणावपूर्ण अबोला असा नाही. शिक्षेचे रुपरंगही बदलत जातात. मुळात शिक्षा करणार्‍यामध्ये नैतिकतेचं अधिष्ठान असावं लागतं. तेच नसेल तर त्याच्या शब्दांमध्ये सामर्थ्य प्रकटत नाही.
    शिक्षा म्हणजे क्रोधाचा आविष्कार नव्हे; तर हितचिंतनाचा तो एक प्रकार आहे. आठवतं—अभ्यास सोडून मोठ्यांच्या गप्पा ऐकायच्या नाहीत हा वडीलांनी केलेला उपदेश विसरुन संध्याकाळी पाहुण्या आलेल्या नातेवाईंकाच्या रंगलेल्या गप्पा मी ऐकत असल्याचे पाहताच काही कळायच्या आत त्यांनी गुडघ्याच्या खाली पोटरीवर वेताच्या छडीने विलक्षण वेगाने प्रसाद दिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच ती छडी बंबात टाकण्याची दक्षता मी घेतली.
    पाच—सहा दिवसांनी बाजारपेठेत फिरायला गेल्यावर छडीच्या दुकानाशी वडील थांबले न् म्हणाले, " बघ, तुला कुठली बरी वाटते ती?"
    आज वेळीच झालेल्या त्या शासनाचा वारंवार उपयोग होतो. आज पालकांच्या हातातली ती छडी हरवलेली दिसते. पालक आणि शिक्षक यांच्या पाच बोटांतली चार बोटे मायेची असावीत, पण एक बोट वेळीच कर्तव्यकठोर होणारं असावं. योग्य शिक्षा हेही वात्सल्यच, हे न कळल्याने, काटछाट न केलेल्या झाडासारखी मुलं कशीही वाढतात. तसं झाड सुंदर दिसेलही, पण मुलांना मात्र आकार द्यावाच लागतो.
    मिठाचं प्रमाण बदलल्यावर पदार्थाचं जे होतं तेच शिक्षेचं प्रमाण अती झाल्यानंही होतं. तेव्हा हा विचार सारासार विवेकानंच घ्यावा.
    भिंतीवर नको तो मजकूर लिहिताना सापडलेल्या विद्यार्थ्याला शिक्षा म्हणून 'श्यामची आई ' मधील दहा पानं लिहून आण म्हटल्यावर त्या विद्यार्थ्यानं पंधरा दिवसानं अख्खं पुस्तकच लिहून आणल्याचा प्रसंग आजही आठवतो. 'श्यामची आई ' चं ते हस्तलिखित बाड पाहून मी चक्रावलो. ' सर, तुम्ही दहाच पानं सांगितलीत. पण मला पुस्तक एवढं आवडलं की लिहावंसंच वाटलं.
    श्यामची आई मरण पावल्यावर जेव्हा ती श्यामच्या स्वप्नात येते, तेव्हा सर खूप रडलो मी ! माझ्या चुका कळल्या. आईला यापुढे त्रास द्यायचा नाही, असा मी निश्चय केलाय सर."
    मी म्हटलं, " आता तुझ्या हातून वाईट लिहिलं जाणं शक्यच नाही. कारण साने गुरूजींनी 'श्यामची आई ' लिहिलं, त्यानंतर तूच लिहिलंस "
    काळ बदलतोय. आता प्रत्येक वर्षी नव्या, अधिक निगरगट्ट मुलांची पिढी वर्गात येताना दिसते. प्रसारमाध्यमांमुळे मुलं एका बाजूला चुणचुणीत, 'जनरल नाॅलेज' ने 'करोडपती' झालेली दिसतात ; पण बिनधास्त, आगाऊ, रगेलही झालेली ही मुलं पाहिली की वाटतं— यामध्ये निदान आपलं मूल तरी नसावं.
    मुलांना शिस्त लावताना आपल्या चारित्र्याकडे लक्ष पाहिजे. कारण शब्दात ' चारित्र्य ' नसेल तर धाक निर्माण होत नाही. घरात आपण कसं वावरतो यातूनच मुलं शिकत असतात. अधिकार 'पदा' त तेव्हाच येतो जेव्हा तो स्वत:च्या आचरणात असतो.
    शाळेच्या सहलीला गोव्याला गेलेल्या मुलीला बाबा जेव्हा 'गोव्याची' घेऊन ये, सांगताना आम्ही शिक्षक ऐकतो, तेव्हा त्या मुलीच्या सैरभर आयुष्याची तयारी घरातूनच होते, हे हताशपणे पाहतो.
    घरात सर्व वस्तु आहेत. चैनीच्या, विलासाच्या......,
    देह अगदी पूर्ण सुखात लोळेल याची काळजी आपल्यात आर्थिक अनुकूलतेनं घेतली आहे.
    आपल्या घरात बघा. काय नाही आपल्या घरात?
    सर्व ...... सर्व आहे!
    फक्त दोन गोष्टी आहेत का, बघा?

    कोपर्‍यातली " छडी ''आणि "देवघरातलं निरांजन" !


    -- संकलन : अमित कुलकर्णी
    मला आवडलेले फेसबुक आणि WhatsApp वरचे पोस्ट मी शेअर करत असतो.. बर्‍याचदा या पोस्टमध्ये लेखकाचे नाव नसते. जर कोणा लेखकाचे हे साहित्य असेल तर कृपया मला कळवावे म्हणजे मी नक्की त्यांचे नाव देईन. आपण ही माहिती मला त्या-त्या पोस्टच्या कॉमेंटमध्ये देऊ शकता.

  • बंदोबस्तातलं स्वातंत्र्य..

    या देशाचा प्रत्येक माणुस, प्रत्येक नागरिक हा सैनिक झाला पाहिजे. सैनिक जसा देशाच्या सिमेवर डोळ्यात तेल घालुन उभा असतो, तसे नागरिकांनी देखील डोळ्यात तेल घालुन जागे असले पाहिजे. तेव्हा कुठे बंदोबस्तातले हे स्वातंत्र्य मोकळा श्वास घेऊ शकेल… नाही का…

  • स्वप्नांचा पाठलाग..

    आज प्रत्येकजण स्वप्नांच्या मागेे धावतोय. स्वप्नं, इच्छा, अपेक्षा इ. ची न संपणारी यादी..! आपण इतकं धावतो, इतकं धावतो की आजूबाजूला पहातचं नाही. स्वप्नांच्या मागे धावताना येणारा प्रत्येक दिवस मागे सरत जातो. या प्रत्येक दिवसागणिक आठवणीही मागे पडतात. त्या आठवणी मनातून कधीही पुसल्या जात नाहीत (कडू असो की गोड). एक स्वप्न पूर्ण झालं की, दुसर्‍या स्वप्नांच्या मागे आपण धावत सुटतो. यालाच म्हणतात का आयुष्य..?

  • कृषी मंत्र्यांनी शेतकर्‍यांना बनविले मामा!

    खते, बियाणे, मजूर अशा प्रत्येक बाबतीत शेतकऱ्याला अपंग करणाऱ्या सरकारनेच आता शेतकऱ्यांना आधार देऊन उभे केले पाहिजे, ही सरकारचीच जबाबदारी आहे. ‘मामा’ला पुढे करून सरकार आपल्या जबाबदारीतून पळ काढू शकत नाही. ‘मामा’ पूर्वीही होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे; त्याने कधी शेतकऱ्यांचा जीव घेतला नाही.

  • टिप्पणी : ७ : ये कहाँ जा रहे हम ?

    बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार
    * स्त्रियांचे समाजातील unequal स्थान
    संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या .

    • सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. ( या , प्रवेश नाकारण्याबद्दल, व स्त्री-पुरुष असमानतेबद्दल मी आधी एक लेखही लिहिलेला आहे, जो वेबसाइटवर वाचतां येईल).

    अशा सततच्या बातम्यांमुळे मनात अतिशय अस्वस्थता येते, आली आहे. म्हणून, ही पोटतिडीक, ही टिप्पणी.

    • ध्यानात राहूं द्यावें की, आपण या प्रश्नाचा ऊहापोह, धार्मिक बाब म्हणून करणार नसून, एक महत्वाची सामाजिक बाब या अर्थानेंच करीत आहोत.

    • तथाकथित ‘खालच्या’ जातींना ‘सापत्न’ वागणूक देतांना आपण Dignity of Labour चा विचार करत नाहींच ; पण आपण हाही विचार करत नाहीं की, या लोकांनी शतकानुशतकें समाजाला ज्या ‘सेवा’ (services) दिल्या, त्या जर दिल्या नसत्या, तर समाज सुचारु रूपानें चालूं शकला असता कां ? समाजाच्या एका महत्वाच्या भागाला आपण बाजूला ठेवतो, दूर लोटतो आहोत , याचें भान या समाजाला नाहीं कां ?

    • बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन कां केलें, याचा सखोल विचार आपण कधी करणार ? सुदैवानें त्यांनी बौद्ध धर्मासारखा शांतिपूर्ण धर्म स्वीकारला. बरीच वर्षें मनन-चिंतन करून, राष्ट्राच्या ऐक्याचा विचार करून, त्यांनी हेतुत: हाच धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हें आपले भाग्यच ! पण या घटनेपासून आपण कांहीं शिकलो कां ? आपली ‘दकियानूसी’ वृत्ती बदलायचा प्रयत्न तरी केला कां? की आपले, ‘पहिले पाढे पंचावन्न’ ?

    • आतां , सएमाजातील घटकांच्या असमानतापूर्ण वर्तणुकीला कंटाळून एका गावातील ३०० दलित कुटुंबें धर्मांतर करायचें ठरवत आहेत. त्यांना कसा दोष द्यायचा ? त्यांच्या स्वत:च्या धर्मातील तथाकथित ‘उच्चवर्णी’, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना ‘खालचे’, दुय्यम ठरवून, त्यांचे न्याय्य अधिकार नाकारत आहेत. या ‘सो-कॉल्ड् उच्चवर्णीयांना’ हें कळत नाहीं की, मध्ययुगात असेच अनेक लोक परधर्मात गेले आहेत. दर वेळी त्यांच्यावर कुणी सक्ती केली असेलच असें नाहीं, दर वेळी धर्मांतरासाठी कोणी त्यांना लालूच दिली असेल असेंही नाहीं. शतकानुशतकें झालेल्या या धर्मांतराचें प्रमुख कारण, स्वधर्मांमधील लोकांची वर्तणूकच होती. याची अनेक उदाहरणें देतां येतील. जिना यांचे पूर्वज (आजोबाच) हिंदू होते, पण त्यांनी सुरूं केलेल्या धंद्यावरून त्याना ‘वाळीत’ टाकलें गेलें होतें ; त्यामुळे त्यांनी धर्म बदलला. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला, व स्वधर्मात परत येण्याची त्यांची इच्छा होती ; परंतु समाजानें तें होऊं दिलें नाही. (ही सर्व माहिती, जिना यांच्यावरील पुस्तकात सहज उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती ज़रूर वाचावी ). या धर्मांतराचा, नंतरच्या काळात किती भयंकर राजकीय परिणाम झाला, हें आपण जाणतोच ! मात्र, यांतून आपला समाज कांहींच शिकत नाहीं, ही खेदाची गोष्ट आहे. सगळे परिणाम लगेत घडतही नाहींत, लागलीच दिसूनही येत नाहींत. मात्र, ते घडतात, तेव्हां कधी कधी फाऽर फाऽर उशीर झालेला असूं शकतो.

    • हमीद दलवाई यांनी त्यांच्या लेखनात महत्वाचा मुद्दा मांडला आहे , तो हा की, आज मुस्लिमांमधील अनेक लोक केवळ लहान लहान धंदे करून जेमतेम पोट भरत आहेत. आणि खरं आहे, आपल्या सभोवताली, प्लंबर, विणकर, हातगाडी घेऊन जात असलेला भंगारवाला, फुटलेल्या काचा बसवणारा काचवाला, सायकलीवर चाक बसवून चाकू-सुर्‍यांना धार लावणारा, असे अनेक धंदे करणारे लोक मुस्लिम आहेत. हे सगळे लोक कांहीं इराण, तुर्कस्थान/ टर्की, अफगाणिस्तान वगैरे देशांमधून येथें आलेले नाहींत, तर ते या देशातील हिंदूंमधीलच विशिष्ट जातींचे लोक आहेत, ज्यांनी मध्ययुगात धर्मांतर केलेलें आहे ; आणि याला प्रमुख कारण अर्थातच हिंदूंमधील तत्कालीन लोकांचे वर्तनच आहे, यात संशय नाहीं.

    • पुन्हां एकदा आठवण करून देतो की, येथें आपला दृष्टिकोन धार्मिक नसून फक्त सामाजिक आहे ; धर्माचा उल्लेख केवळ त्या अनुषंगानेंच आहे.

    • धर्म ही गोष्ट असावी वा नसावी, एखाद्यानें धर्म मानावा किंवा मानूं नये, ही एक वेगळीच चर्चा आहे, तिच्यात आपण तुर्तास जात नाहीं आहोत. पण, कुठलाच धर्म perfect नाहीं, नसणारच ! मात्र, मुस्लिम धर्मात हिंदूंपेक्षा अधिक समानता practice केली झाते, हें मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलें आहे. मी शाळेत असतांना स्वत: पाहिलेलें आहे की, कांहीं तत्कालीन प्रसिद्ध फिल्मस्टार्सचे नातेवाईक आणि आमच्या हॉस्टेलमधील साधारण नोकर, हे रमज़ानचा रोज़ा एकाच दस्तरख़्वानवर बसून सोडत होते ! हिंदूंमध्ये, ज्ञानेश्वरकालीन संतमंडळ, संत एकनाथ, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकार, राजर्षि शाहू महाराज, विवध समाजसुधारक , अशा अनेकांनी प्रयत्न करूनही समता establish झालेली नाहीं, हें कटु असलें तरी सत्य आहे.

    • कदाचित थोडेसें विषयांतर होईल. पण या संबंधात, स्वतंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या पहावी. दुर्दैवानें त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. पण ही व्याख्या मूलत: राजकीय-सामाजिक आहे , धार्मिक नाहीं. त्या दिशेनें समाजानें जर विचार केला असता, तर ‘ही जात - ती जात’ असा भेदभाव संपण्याच्या दिशेनें पाऊल पुढे पडलें असतें.
    (यावरील माझा लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात, हाही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आत्ता, फक्त प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानें त्याचा उल्लेख केलेला आहे, इतकेंच ).

    • आतां तर, ‘इलेक्टेड डेमोक्रेसी’च्या संदर्भात जातपातींच्या राजकारणाचें महत्व वाढतच आहे ! जातीपातींना आज ‘एकगठ्ठा मतांचा समूह’ असेंच बघितलें जात आहे. आणि, सरकारी फायदे मिळवण्यासाठी लोक, अमुक जातीला अमुकअमुक मागासवर्घीय फायदे मिळायला हवेत, यासाठी आंदोलनें करत आहेत. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत, पण - ) याचा अर्थ असा की, ‘मी भारतीय आहे’ ही भावना कमी महत्वाची ठरून, ‘मी अमुक अमुक जातीचा आहे’ ही गोष्ट priority घेते !

    • स्त्रियांच्यावरील अत्याचार ही बाब पुरुषप्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. हेंही मध्ययुगात वाढत्या प्रमाणात झालें. आजही सुशिक्षित स्त्रियांनाही या प्रॉबलेमला सामोरे जावें लागतें आहे (भारतातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येसुद्धा). ज्या लोकांनी हल्लीच, डेमॉक्रेटिक पार्टीच्या ‘नॅशनल कन्हेन्शन’मधील हिलरी क्लिंटन यांचें भाषण ऐकलें-वाचलें असेल, त्यांना हें कळलेंच असेल की, हिलरींनी सुद्धा या मुद्दयाचा, एक महत्वाचा मुद्दा म्हणून, परामर्श घेतलेला आहे. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक हिलरीना अस्वस्थ करते, व त्यासाठी बरेंच कांहीं करण्याचें आश्वासन त्या देतात.

    • स्त्रियांना मंदिर-प्रवेश नाकारणारे लोक, त्यासाठी धर्म व परंपरा यांची ‘दुहाई’ देतात. ज्या परंपरा समाजातल्या ५०% भागाला, म्हणजे स्त्रियांना, असमान वर्तणूक देतात, त्या काय कामाच्या?

    • ज़रा कल्पना करा, या असमानतेच्या सामाजिक वर्तनाला कंटाळून स्त्रियांच्या समूहांनी जर धर्म बदलायचा असें म्हटलें, तर संपूर्ण समाजातल्या घराघरात हाहा:कार उडेल ! समाजाचें नशीब थोर म्हणूनच केवळ, अजूनतरी स्त्रियांच्या ग्रूप्सनीं असला विचार केलेला नाहीं. पण, तसें उद्या घडणारच नाहीं, याची काय गॅरंटी ?

    • दलित असो वा स्त्रिया, त्यांच्यावरील atrocities, समाजाला नुसतें समजावून कमी होतील काय ? तसें जर असतें, तर , समाजसुधारकांच्या प्रयत्नांनंतर संपूर्ण समाजच बदलून गेला नसता कां ? अर्थात, तसें प्रयत्न तर होतच रहायला हवेत, हें खरें आहे ; पण, ‘न-समजून-घेणार्‍यांसाठी’ कांहींतरी strict उपाय सरकारनें योजायला नकोत कां ?

    • दलित, स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलें यांच्यावर अत्याचार करणार्‍यांना कठोर शिक्षेची तरतूद सरकारनें केली पाहिजे. उदा. अमेरिकेत तर, अगदी आईवडीलसुद्धा जर आपल्या अल्पवयीन अपत्यांवर अत्याचार करत असले, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊं शकते.

    • भारतातही, असा शिक्षेची कांहीं तरतूद आहे, उदा. सासू-सासर्‍यांनी सुनेवर केलेले अत्याचार.
    पण, हें जें कांहीं कायदे आहेत, तें कितीसें पुरेसें पडत आहेत ?

    • यासाठी, पार्लमेंटनें नवीन कायदा करून, अशा गोष्टींसाठी –
    - स्पेशल, ‘फास्ट कोर्टस्’ स्थापन करून , च्यातर्फे अशा केसेस चालवल्या जाव्यात
    - नुसत्या atrocities च नाहीं, तर , अगदी मंदिर-प्रवेश नाकारणार्‍यांनासुद्धा सज्जड सज़ा ठेवावी, (जसें की ५ वर्षें सक्तमजुरी). Carrot & stick म्हणतात ना, त्यातील, इथें stick चा प्रयोग, किंवा धाक असल्याशिवाय अशा सामजिक सुधारणा होणारच नाहींत.( म्हणतात ना, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ ).
    - आजही कांहीं देशांमध्ये, हात तोडणें , रस्यात उभें करून दगडधोंडे फेकून मारणें अशा मध्ययुगीन शिक्षा प्रचारात आहेत. अशा मध्ययुगीन शिक्षांचा मी पुरस्कार करत आहे, असें कृपया कुणी समजूं नये. मात्र, अगदी , सक्तमजुरीच्या शिक्षेची भीती सुध्दा मोठें deterant नक्कीच ठरेल.

    • पण, --- आणि , हा मोठा ‘पण’ आहे ---- , असा कायदा केला तर समाजाचा एक भाग सरकारवर खात्रीनें नाराज होणार, हें नक्की. मग, सरकार ही रिस्क घेईल काय ? त्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, असा कायदा आणायला हवा.
    पण आपल्या राजकीय पक्षांची one-up-manship पहातां, असें काहीं घडेल, ही आशा धरावी काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच, अशा atrocities चालूंच रहाणार काय ?
    म्हणे, २१वें शतक !! आपण कुठे आहोत ? अजूनही मध्ययुगातच आहोत ? आपण कुठे चाललो आहोत ? पुढे जाणें दूरच,पण हा समाज मागेमागें जात आहे काय ?
    या प्रश्नांची उत्तरें शोधायला गेलें तर, हातात कांहींच fruitful लागत नाहीं , ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.

    अखेरीस :
    हा असमानतेचा ‘सिलसिला’ शतकानुशतकें चालत आलेला आहे. दुर्दैवानें, लोक अनेकदा short-sightedness च दाखवतात, आपल्या कृतींचे दूरगामी दुष्परिणाम त्याच्या ध्यानातच येत नाहींत; आणि थोडेफार ज़री आलेच, तरी ते त्याकडे दुर्लक्षच करतात.

    पण, आपण हे सत्य विसरूं नये की, इतिहास कुणाला क्षमा करत नाहीं .
    तेव्हां, इतिहासानें धडा शिकवण्यांआधी, आपणच ज़रा आपल्या मनाला विचारूं या ,
    ( एका प्रसिद्ध गीताला poaraphrase करून ), की -
    ‘ये कहाँ जा रहे हम , यूं ही अपनोंको मसलके ?’ ;
    आणि, मनाला ही जाणीव करून देऊं या , की -
    ‘ये ज़माना बढ़ चलेगा , अब हमें ही कुचलके’ .

    चला, कांहींतरी concrete करूं या, अजूनही वेळ गेलेली नाहीं !

    -- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • सत्यनारायण नको जनता जनार्दन प्रसन्न करा

    हे काम सुद्धा भाजपा सरकारनेच केले आहे. या सरकार मध्ये सुद्धा काही कट्टर पंथीय आहेत. पण त्यांचा विरोध जुगारून जर हि कामे होत असतील तर मी या सरकारचे मना पासून अभिनंदन करतोय. अजूनही लोकांना धर्माची खऱ्या अर्थाने जाणीव करून देण्याची गरज आहे. भाजपा सरकारने ती करावी हीच अपेक्षा आहे.