वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
आजकाल संतुलित आहाराचा बोलबाला आहे. याचवेळी अंगावर चरबी वाढण्याची समस्याही साधारण बाब बनली आहे. आरोग्याची योग्य जाण नसल्याने ही समस्या गंभीर बनत चाललीय आणि लठ्ठपणाही वाढतोय.
लठ्ठपणामुळे आपल्याला अनेक घातक आजार होऊ शकतात. लठ्ठपणा कमी करण्यासाठी योगाचा आधार घेणे चांगले. योगशास्त्रातील एक विधी आहे कपालभाती प्राणायाम. या प्राणायामाने लठ्ठपणावर नियंत्रण मिळविणे सहजशक्य आहे. तुम्हाला अद्यापही कपालभाती कसे करावे माहित नसेल तर पुढील विधी पाहा.
चटईवर बसा. बसल्यानंतर पोट सैल सोडा. आता जोरात श्वास बाहेर सोडा आणि पोटाला हिसका देऊन आत खेचा. श्वास बाहेर सोडणे आणि पोट आत खेचणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होणे अपेक्षित आहे. सुरुवातीला ही क्रिया 10 ते 15 वेळा करा. हळू हळू 60 पर्यंत ही क्रिया वाढवू शकता. मधून मधून थोडी विश्रांती घेऊ शकता. या क्रियेमुळे फुफ्फुसाच्या खालील भागातीय हवा आणि कार्बन डाय ऑक्साईड बाहेर निघेल. विज्ञानाने सिद्ध झाले आहे की कपालभातीने शरीरावरील अनावश्यक चरबी नष्ट होते.
श्वाससंबंधी आजार असणार-यांनी कपालभाती करू नये. कपालभाती केवळ रिकाम्या पोटीच करावे. अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली कपालभाती केल्यास अधिक चांगले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 18, 2017
आरोग्याच्या बाबतीत अमुक एक नियम करून चालत नाही. मागे अनेक वेळा सांगितल्या प्रमाणे देश, प्रकृती, सवय, मनाची अवस्था, आवडनिवड, उपलब्धता इ. अनेक गोष्टींवर आरोग्याचे मापदंड बदलत असतात. प्रत्येकाला एकाच तराजूत तोलता येणारे नसते. एखाद्याच्या प्रकृतीतला नेमकेपणा, आवश्यकता, गरज, योग्य पथ्यापथ्य हा जाणकार वैद्यच सांगू शकतो. त्याहीपेक्षा अचूकपणे फॅमिली डाॅक्टर / वैद्य सांगू शकेल. कारण त्या वैद्याला जन्मापासूनच त्याची सर्व माहिती असते. त्यामुळे निदान करायला किंवा अपथ्य, चिकित्सा सांगायला सोपे होते.
मी असं सांगतो, एकच नियम पाळावा, की (वैश्विक नियम सोडून) कोणताच नियम पाळू नये. वैश्विक म्हणजे युनिव्हर्सली अॅक्सेप्टेड. जगन्मान्य !
आपण आता सर्वसामान्य जगन्मान्य नियम काय असतात ते पाहू.
1. पाणी कधी प्यावे ?
तहान लागेल तेव्हा. गरज असेल तेव्हा.
2. पाणी किती प्यावे ?
तहान भागेपर्यंत. गरजेपुरते.
याला म्हणतात, वैश्विक नियम. जगात कुठेही जा. हाच नियम पाळायचा. म्हणजे कोणताही शास्त्राधार शोधण्याची आवश्यकताच पडणार नाही.
एवढे साधे प्रश्न आणि एवढी साधी उत्तरे असताना, आपण नियम करून खूप गोंधळ निर्माण करून ठेवतो. जे सोप्पं आहे ते, अवघड करून सांगितले, तरच ते शास्त्र आणि ते जाणणारा कोणीतरी मोठ्ठा विद्वान वगैरे वाटतं. असं काही जणांना वाटतं म्हणून जरा अघळपघळ करून सांगितले तर ऐकणाऱ्यालाही जरा बरे वाटते ना !
ताप आहे असं सांगण्याऐवजी पायरेक्झिया ऑफ अननोन ओरीजीन, वगैरे भाषेत सांगितले तर रूग्णालापण आपणाला कोणता तरी मस्त मोठा आजार झालाय असे वाटते. मग नंतर बिल भरताना फार कटकट वाटत नाही. असो.
पाणी पिण्याचे हे दोन नियम मोडले नाहीत, तर पाण्यापासून होणारे रोग निकाली निघतील. (आणि हे एवढ्या पटकन, समजले तर ही लेखमाला पण लवकर बंद होईल.)
याला शास्त्राधार काय ? असंही कोणाच्या तरी मनात येईल. त्यालाही उत्तर देतो.
ही गरज कोण ठरवणार ?
तहान लागली की नाही, हे कसं समजणार ?
सोप्प आहे.
यासाठी त्याला काही काळ गृहीत धरावा लागेल. उत्तर मिळेपर्यंत वाट पहावी लागेल. नंतर वाटलं तर विसरून जायचं. गणितामध्ये नाही का आपण एक्स गृहीत धरंत. तसं. एक्सचं उत्तर मिळालं, की त्याला विसरून जायचं.
आपली तहान भूक, झोप, ढेकर,जांभई, अश्रु, मलमूत्र विसर्जन इ. क्रियांची जाणीव आपणाला कोण करून देतो ? जर त्याने ही जाणीव करून दिली नसतीच तर ? म्हणजे तो आतून काहीतरी सांगतोय, हे असं कर. हे तू असं केलंस तर बरं वाटेल, वगैरे.
कोण आहे तो?
तोच तो निर्गुण निराकार...... आत्मा !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
09.12.2016
December 9, 2016
एकविसाव्या शतकात ब्रॉडबॅण्डने माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी क्रांती केली आहे.
इंटरनेट जेव्हा आले, तेव्हा लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन या सिस्टीमच्या मदतीने काही संगणक एकत्र काम करू शकत होते. इंटरनेटवर जेव्हा आपण एखाद्या विषयाचे सर्च देतो तेव्हा जगातील हजारो संगणकांच्या जाळ्यामार्फत आपल्याला हवी ती माहिती मिळते. याचा अर्थ हे संगणक एकमेकांच्या संपर्कात असतात, माहितीची देवाणघेवाण करीत असतात.
टेलिफोनचा शोध लावला, तेव्हा तो माणसांना दुरून एकमेकांशी बोलता यावे हा उद्देश होता, पण नंतर विसाव्या शतकात फॅक्स मशिनने छापील मजकूर एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवता आला. १९७० च्या सुमारास संगणकांचे जाळे तयार करण्यासाठीही टेलिफोनचा वापर होऊ लागला; फक्त हे संगणक टेलिफोनकडून माहिती स्वीकारणार कसे, हा प्रश्न होता कारण टेलिफोन चालतो तो अॅनलॉग माहितीवर पण संगणक चालतो डिजिटल माहितीवर. मग हे गणित जुळत नव्हते त्यासाठी डिजिटल माहिती अॅनलॉगमध्ये तर ॲनलॉग माहिती डिजिटलमध्ये रूपांतरित करणारे मॉडेम (मॉड्युलेटर-डिमॉड्युलेटर) हे उपकरण शोधले गेले.
जेव्हा आपण संगणकावर संदेश पाठवीत असतो किंवा माहिती मिळवीत असतो, तेव्हा दोन संगणकांत किंवा अनेक संगणकांत चक्क संभाषण होत असते असे म्हणायला हरकत नाही. त्यात दुभाषाचे काम हा मॉडेम करीत असतो. डायल अप इंटरनेटमध्ये तुम्हाला सेवा देणाऱ्या कंपनीच्या संगणकाशी तुमचा कॉल जोडला जातो, तुमची सगळी टेलिफोन लाइन व्यस्त राहते शिवाय माहिती मिळण्याचा वेगही कमी म्हणजे सेकंदाला ५६ किलो बाइट्स इतका असतो. त्यामुळे डाऊनलोडला वेग लागतो.
ब्रॉडबॅण्डमध्ये फोनलाइनऐवजी तुमचा संगणक व इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीचा संगणक यांच्या दरम्यान एक अरुंद नळी जोडली जाते, त्यामुळे अनेक मार्गिका तयार होतात. त्याचा फायदा असा होतो की, अनेक पदरी असा माहितीचा महामार्ग तयार होतो. वेगाने माहिती मिळू लागते.
अनेकदा आपण अपलोडपेक्षा डाऊनलोड अधिक करतो. त्यामुळे डाऊनलोडिंगसाठी जास्त मार्गिका असतात. त्यालाच अॅसिमिट्रिक डिजिटल सबस्क्रायबर लाइन म्हणजे (एडीसीएल) म्हणतात. डीएसएल ब्रॉडबॅण्डमध्ये तुम्ही सारख्याच वेगाने डाऊनलोड व अपलोड करू शकता. यात फोन कॉल्ससाठी वेगळी मार्गिका असते व इंटरनेटसाठी वेगळ्या मार्गिका असतात. दोन व्यक्तींमधील टेलिफोन संभाषण हे कमी फ्रीक्वेन्सीवर चालते. संगणकाला जोडलेले मॉडेम हे जास्त फ्रीक्वेन्सीच्या सिग्नलवर चालते त्यामुळे त्यांची सरमिसळ होण्याचा धोकाही नसतो.
September 4, 2023
पदार्थामधील पाणी कमी केले की तो टिकाऊ होतो. द्राक्ष आणि मनुका बेदाणे, ओला अंजीर सुका अंजीर, ताजी फळे आणि सर्व ड्राय फ्रूटस, यात टिकाऊ काय ? कोणते पदार्थ ?
जे सुके आहेत ते. ज्यांच्यात पाणी कमी आहेत ते !
साधा रवा आणि भाजून ठेवलेला रवा. साध्या रव्यात कीड पटकन होते. पण भाजून ठेवल्याने त्यातील पाणी कमी केले जाते. जंतुना जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणी कमी झाल्याने, भाजून ठेवलेल्या रव्यात कीड, टोका पडत नाही. बरोबर ना !
घरात आणलेल्या पालेभाज्यांचं सर्वसाधारण आयुष्य किती ? एक दिवस. जास्ती जास्त दोन दिवस. नंतर त्या चक्क मान टाकतातच ! पाण्याच्या अभावाने त्या मरतात. पालेभाज्या म्हणजे ऐशी नव्वद टक्के पाणीच ना ! पाणी संपले की संपले. हीच पालेभाजी पाणी शिंपडून ओट्यावर ठेवली तर जिथे पाणी साठले आहे, त्या ओट्याला चिकटून राहिलेल्या भागातील भाजी कुसुन लिबलिबीत होते. फुकट जाते.
पाण्याशिवाय जीवन नाही. जंतुचे देखील तसेच आहे. स्थूल आणि सूक्ष्म जीवांना जगण्यासाठी देखील पाणी हवे असते, ते मिळाले नाही तर ते पण मरतात.
झुरळांची पैदास कुठे होते ? बेसिनच्या खाली.
डासांची वाढ कुठे होते ? पाण्यामध्ये.
त्यांचा जन्म, पोषण, वंशवृद्धी पाण्यावर, पाण्याच्या दमटपणावर अवलंबून असते. पाणी नसले की जीवन संपले.
चंद्र मंगळावर जी अंतराळ याने पाठवताहेत, ती कशासाठी? केवळ दगडधोंडे आणि हवामान तपासायला ?
नाही.
त्या दगडातील पाण्याचा अंश शोधायला.
त्या दगडात जरा जरी पाण्याची शक्यता वाटली तर तिथे इतर जीवजंतु नक्कीच असणार. या शक्यतेवरच या मोहिमा चालतात.
म्हणजे जीवांना त्यांचे पोषण करणारे पाणी जिथून मिळेल तिथे हे जीव स्थिरावतात, हा वैश्विक नियम आहे.
याची दुसरी बाजू. जिथे पाणी नाही, तिथे जीव संसर्ग नाही. इन्फेक्शन नाही.
म्हणजेच
शरीरातील पाणी गरजेपेक्षा वाढत गेले तर तिथे जीवांची उत्पत्ती होणारच. आणि अवास्तव पाणी कमी करत गेलो तर जंतुसंसर्गही तेवढाच कमी होत जाणार ! बरोबर ना ?
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
18.12.2016
December 18, 2016


ह्याची जमिनीवर दाट पसरणारे व खुप उंच वाढणारी वेल असते.हिच्या फांद्यांवर पांढरे ठिपके असतात.ह्याची पाने अण्डाकार व दोन्हीकडे निमुळती व दन्तुर कडा असलेली असते.हिचे फुल हिरवं व मधुर सुवासाचे असते.पुष्प दंड ३-४ बोटे लांब असतो.ह्याचे फळ वाटाण्या सारखे दिसते.हे गोल,पिवळे व त्रिखण्ड असलेले असते.ह्याच्या प्रत्येक भागात एक त्रिकोणी केशरी रंगाची बी असते.हिच्या फळांचे घोस लाल,पिवळे व चमकदार असतात.
ज्योतिष्मती चवीला तिखट,कडू असून अतिउष्ण असते.तसेच हि प्रभावाने मेध्य असून तीक्ष्ण व स्निग्ध असते.ज्योतिष्मती चवीला कडू,तिखट व उष्ण तीक्ष्ण असल्याने कफनाशक आहे.तसेच स्निग्ध असल्याने वातनाशक आहे व पित्तकर आहे.
चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)ज्योतिष्मती वातनाशक व वेदना स्थापक असल्याने संधिवात,कंबरदुखी ह्या विकारामध्ये हिच्या तेलाने मालिश करतात.
२)पांढऱ्या कोडा मध्ये डागांवर ज्योतिष्मती तेल लावल्यास त्वचेचा रंग प्राकृत होण्यास मदत होते.
३)ज्योतिष्मती उष्ण गुणाने व प्रभावाने साधक पित्ताची वाढ करून मेध्य कार्य करते त्यामुळे ग्रहणशक्ती व स्मृती वाढते.
४)मासिकपाळी अनियमित असल्यास ज्योतिष्मती तेल दुधासोबत देतात.
५)खरजेवर ज्योतिष्मती बिया गोमुत्रात वाटून लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©️ Dr Swati Anvekar

January 30, 2018
२१ वर्षांच्या खंडानंतर दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय क्रिकेट संघ अधिकृत आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना या दिवशी खेळता झाला. बेसिल डी-ऑलिव्हेरा प्रकरणानंतर दक्षिण आफ्रिकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगताने वाळीत टाकले होते. आफ्रिकी राज्यकर्त्यांच्या वर्णद्वेषी धोरणाचा हा परिपाक होता. दक्षिण आफ्रिकेच्या या पुनरागमनानंतर ९ वर्षांनी बांग्लादेश हा भारताचा शेजारी आंतरराष्ट्रीय कसोटीविश्वात प्रवेश करता झाला.
November 10, 2010
संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.
September 16, 2018
परवा वपुं ची “पेन सलामत तो ..” ऐकत होते. हाताला असलेल्या चाळ्यांनी काय काय गडबड आणि गोंधळ होऊ शकतो याची फारच रंगतदार गोष्ट आहे.
December 19, 2023
आपण नेहमीच दुस-या व्यक्तीचे दुर्गुण बघतो, त्यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.
November 11, 2018
जुलै १९८६ मध्ये भारतीय रेल्वे मंत्रालयाने पहिल्यांदा रेल्वेला आधुनिकतेचा टच दिला. आणि रेल्वेची सर्व माहिती ही सीआरआयएस आणि आयसीआरएस व्दारे करण्यात आली. या संगणकीय जोडीमुळे भारतीय रेल्वेचे पुर्णपणे रुपडेच बदलून गेले. त्यानंतर भारतीय रेल्वेच्या प्रगतिचा आलेख चढतच गेला. भारतीय रेल्वेचा शुभंकर म्हणून भोलू हत्तीला ओळखले जाते. हे एक कार्टून असून ज्याच्या हातात हिरवा कंदील देण्यात आला आहे. या हत्तीच्या प्रतिकास भारतीय रेल्वेच्या १५० वर्षाची पुर्तता झाल्याच्या पार्श्व भूमीवर १६ एप्रिल २००२ मध्ये बंगळूरूमध्ये प्रदर्शित करण्यात आले होते. त्याच्या बरोबर एका वर्षानंतर अर्थात २००३ मध्ये सरकारकडून या भोलू हत्तीला अधिकृतपणे प्रतिक असल्याचे घोषित करण्यात आले.
April 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti