(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • छत्रपती संभाजी महाराजांचा ‘झंझावात’

    माझ्या मावळ्यांनो, प्रजाजन हो, गेली ३४३ वर्षे दाबून ठेवलेल्या मनातील काही गोष्टी आज सांगाव्याशा वाटतायत् ! आम्हाला माहित आहे “आत्मा बोलतो” यावर आजच्या बुध्दिवादी लोकांचा विश्वस बसणार नाही.पण जे काही तुम्ही ऐकणार आहात ते ऐकून पूर्ण झाल्यावर तुम्हाला त्यातील सुसूत्रता पटेल आणि लक्षांत येईल की आम्ही जे बोललो तो गेल्या ३९३ वर्षांतील म्हणजेच आमच्या जन्मापासून ते आमच्या शारीरीक निर्वाणा पर्यंतचा घटनाक्रम अर्थात् इतिहास आहे आणि इतिहास कधी खोटा असेल काय हे तुम्हीच ठरवा !
    त्याआधी आम्ही तुम्हांस ३४४ वर्षे मागे नेतो…..

    आज चैत्री पौर्णिमा – रामभक्त हनुमानाची जयंती – म्हणजे तुमच्या आजकालच्या “इंग्रजा”ळलेल्या भाषेत ३-एप्रिल ! गेल्या अकरा दिवसांत आम्ही आसन्नमरण अवस्थेत आहोत आणि आज वैद्यराजांच्या औषधाच्या मात्रा पण पोटात ठरत नाहियेत.अंगाची नुसती काहिली होत्येय.सभोवताली काय चाललंय काही कळत नाही , अंतर्मनात जाणवत्येय ती फक्त गोमाजीबाबा पानसंबळ, महादेव आणि मनोहारी या सेवकांच्या डोळ्यांतील आर्त भाव ! राजाराम तर गेल्या अकरा दिवसांपूर्वीच स्वतःला “पोरका” समजू लागलाय ! शेवटी त्यांनाही महाराणींचे आणि रायगडावरील विषवल्लींचे फुत्कार ऐकू गेले असणारच !

  • प्रदूषणमापक यंत्र

    प्रदूषणमापक यंत्र

    हवा प्रदूषण हे अनेक रोगांना कारण ठरणारे आहे. जागतिक ‘आरोग्य संघटनेच्या मते दरवर्षी २४ लाख लोक त्यामुळे मरतात. वाढत्या औद्योगिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात रसायने, सूक्ष्मकण, जैविक घटक हवेत मिसळतात. प्रदूषकांची हवेतील पातळी मोजून ती हवा श्वसनास योग्य की अयोग्य ते ठरवले जाते.

  • कवीवर्य सुरेश भट

    १९६१ साली सुरेश २९ वर्षांचा असताना नागपूरच्या नागविदर्भ प्रकाशनाकडून त्याचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. रूपगंधा व त्याला दिलीप चित्रे यांच्यासोबत विभागून राज्यशासनाचे दुसरे पारितोषिक मिळाले आणि पहिलं पारितोषिक कुसुमाग्रजांना. यानंतर मात्र दांभिक नातेवाईक, हिणवणारे समकालीन सुरेशला ओळख देऊ लागले.

  • सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

    सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

    सुरेश भट यांच्या गाजलेल्या मराठी गझल

    तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ?
    एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ?
    अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला
    अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ?
    सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ?
    उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ?
    बघ तुला पुसतोच आहे , पश्चिमेचा गार वारा
    रातराणीच्या फुलांचा , गंध तू लुटलास का रे ?
    उसळती हुदयात माझ्या , अमृताच्या धुंद लाटा
    तू किनार्‍यासारखा पण , कोरडा उरलास का रे ?
    (सुरेश भट)


    मालवून टाक दीप , चेतवून अंग अंग
    राजसा किती दिसात , लाभला निवांत संग
    त्या तिथे फुलाफुलात , पेंगते अजून रात
    हाय तू करू नकोस , एवढयात स्वप्नभंग
    दूर दूर तारकांत , बैसली पहाट न्हात
    सावकाश घे टिपून , एक एक रूपरंग
    गार गार या हवेत , घेऊनी मला कवेत
    मोकळे करुन टाक , एकवार अंतरंग
    ते तुला कसे कळेल , कोण एकटे जळेल
    सांग का कधी खरेच , एकटा जळे पतंग
    काय हा तुझाच श्वास , दरवळे इथे सुवास
    बोल रे हळू उठेल , चांदण्यावरी तरंग
    (सुरेश भट)


    आताच अमृताची बरसून रात गेली
    आताच अंग माझे विझवून रात गेली
    मजलाच, हाय, माझे जपता न भान आले
    मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली
    उरले जराजरासे गगनात मंद तारे
    हलकेच कूस माझी बदलून रात गेली
    अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा..
    गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली ?
    (सुरेश भट)


    सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या , तुझेच मी गीत गात आहे
    अजुन ही वाटते मला की , अजुन ही चांद रात आहे
    कळे ना मी पाहते कुणाला , कळे ना हा चेहरा कुणाचा
    पुन्हा पुन्हा भास होत आहे , तुझे हसू आरशात आहे
    सख्या तुला भेटतील माझे , तुझ्या घरी सूर ओळखीचे
    उभा तुझ्या अंगणी स्वरांचा , अबोल हा पारिजात आहे
    उगीच स्वप्नांत सावल्यांची , कशास केलीस आर्जवे तू
    दिलेस का प्रेम तू कुणाला , तुझ्याच जे अंतरात आहे
    (सुरेश भट)


    केव्हातरी पहाटे , उलटून रात गेली
    मिटले चुकून डोळे , हरवून रात गेली
    कळले मला न केव्हा , सुटली मिठी जराशी
    कळले मला न केव्हा , निसटून रात गेली
    सांगू तरी कसे मी , वय कोवळे उन्हाचे ?
    उसवून श्वास माझा ,
    स्मरल्या मला न तेव्हा , माझ्याच गीतपंक्ती
    मग ओळ शेवटाची , सुचवून रात गेली !
    (सुरेश भट)


    रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
    गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
    कोण जाणे कोठुनी ह्या सावल्या आल्या पुढे;
    मी असा की लागती ह्या सावल्यांच्याही झळा!
    राहती माझ्यासवे ही आसवे गीतांपरी;
    हे कशाचे दुःख ज्याला लागला माझा लळा!
    कोणत्या काळी कळेना मी जगाया लागलो
    अन् कुठे आयुष्य गेले कापुनी माझा गळा ?
    सांगती 'तात्पर्य' माझे सारख्या खोट्या दिशा :
    'चालणार पांगळा अन् पाहणारा आंधळा !'
    माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी :
    माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !
    (सुरेश भट)


    मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे
    मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे
    लागुनि थंडी गुलाबी शिरशिरी यावी अशी ही
    राजसा माझ्यात तू अन् मी तुझ्यामाजी भिनावे
    तापल्या माझ्या तनूची तार झंकारुन जावी
    रेशमी संगीत स्पर्शाचे पुन्हा तू पेटवावे
    रे तुला बाहूत माझ्या रुपगंधा जाग यावी
    मी तुला जागे करावे तू मला बिलगून जावे
    (सुरेश भट)


    भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले !
    एवढे मी भोगिले की मज हसावे लागले !
    ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
    पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले !
    लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
    अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले !
    गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
    मी कशी होते मलाही आठवावे लागले !
    एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
    राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले !

  • मंगलाय सुमनो हरि:

    मंडळी सप्रे म नमस्कार !

    शनिवार २० एप्रिल २०२४ रोजी रात्री गडकरी रंगायतन —ठाणे येथे सुमन सुगंध हा सुप्रसिद्ध पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा कार्यक्रम बघण्याचा अभुतपूर्व योग जुळून आला !

    मुळात सुमनजींची गाणी म्हणजे बासुंदी ! त्यात साखर म्हणजे मंगला खाडिलकर यांचं निवेदन ! आणि यावर केशराची अनुभूति म्हणजे स्वत: सुमनताईंची उपस्थिती !असंही आमच्या सद्गुरुमाउली परमपूज्य कलावती आईंच्या यांच्या नात्यातील असल्याने सुमनताईंबद्धल अधिकच आदर व आपुलकी होतीच , काल मंगलाताईंच्या आग्रहामुळे वर वर्णन केलेला केशरयुक्त बासुंदीचा योग जुळून आला आणि म्हणून लेखाचं शीर्षक आहे.

    मंगलाय सुमनो हरि:

    २७ नक्षत्रांप्रमाणे २७ मराठी—हिंदी गाणी सादर केली गेली.मंदार आपटे , विद्या करलगीकर आणि माधुरी करमरकर असे सुरेल गायक असणार होते परंतू माधुरीजींना प्रकृति अस्वास्थ्यामुळे येता आलं नाही म्हणून निवेदक राजेंद्र पाटणकर यांच्या Timely Impact Punch प्रमाणे Impact Player म्हणून संगीतकार बाळ बर्वे यांच्या कन्या सुचित्रा भागवत या मंदार व विद्यासह गायनसेवेला उपस्थित होत्या.....

    मराठीचे वाल्मिकी ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दांना स्नेहल भाटकरजींच्या संगीताने सजलेल्या गणेशस्तुतीने विद्यांनी सुरुवात केली : तुझ्या कांतीसम रक्तपताका पूर्वदिशे फडकती आणि मन पार ४५—५० वर्ष मागे गेले.....माझं माहेर — मुंबईतील एक उपनगर गोरेगांव पूर्व येथील टिळक नगर आणि आसपास चा सार्वजनिक गणेशोत्सव .....नगरातील रहिवाशी दत्त निवासमधील रमेश डेकोरेटर्सचे कदम यांच्या रेकाॅर्डमधे हमखास गणेश चतुर्थीच्या पहाटेला सुरु होणारी ही गणेशस्तुती.....किती वर्षं झाली हा मधाळ स्वर ऐकून , मला तर कधी कधी वाटतं की खरोखरंच गणपतीबाप्पाही एखाद्या रविवारी पार्वतीकडे हटून बसत असावा की सुमन कल्याणपूरचं "तुझ्या कांतीसम रक्तपताका" ऐकव तरंच मी झोपेतून उठून मुखमार्जन करीन! १९६८ सालचं गाणं अब तक ५६ झाले तरी तितकंच सुश्राव्य आहे आणि येणार्‍या कित्येक पिढ्यांमधेही सुखेनैव नांदेल हे निश्चित् !

    यानंतर १९६९ चा कवीवर्य मंगेश पाडगांवकरांचा सल्ला विश्वनाथ मोरे यांनी संगीतबद्ध केला व सुमनजींनी आपल्याला ऐकवला तो शब्द शब्द जपून ठेव बकुळिच्या फुलापरी — बकुळीच्या फुलांसारखाच नाजुक गोड मोहक आवाजात सुचित्रा मय झाला !

    दोन महिलांच्या आवाजाने वातावरण भारलेलं असताना मधुकर जोशींचे शब्द जे दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केले ते आकाश पांघरोनी जग शांत झोपले हे , घेऊन एकतारी गातो कबीर दोहे मंदारजींनी सादर केलं.

    मग जिथ्थे तिथ्थे च्या मंगलाजींच्या गमतीशीर टिपणीनंतर १९६१ च्या पुत्र व्हावा ऐसा मधील जनकवी ठाण्याचे पी.सावळाराम यांचे शब्द वसंत प्रभूंनी अजरामर चालीत बांधले ती सलज्ज तारुण्यातील तरल भावना विद्याजींनी सादर केली जिथ्थे सागरा धरणी मिळते , तिथ्थे तुझी मी वाट पहाते , वाट पहाते! यातल्या Waltz चा ( दादरा ठेका ) मंगलाताईंनी आवर्जून उल्लेख केला.

    यानंतर मजरूह सुलतानपुरींचे शब्द सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले बात एक रात की मधील गाणं देव आनंदच्या जन्मशताब्दीचं निमित्त साधत सुचित्रा मय झाले — न तुम हमें जानों.....

    १९६३ च्या सुभद्राहरण चित्रपटातील शांतारामजींचे शब्द आठवले जे प्रभाकर जोग यांनी संगीतमय केलेले आर्जव बघत राहूदे तुझ्याकडे सुचित्रा व मंदार यांनी सादर केले ! हल्ली नेहमी (लग्नाआधीपासूनंच) गुढगे टेकून अंगठीची लालूच दाखवत पुढे पुढे करणार्‍या ठोंब्या प्रियकराच्या त्या पाश्चात्य नाटकी मागणीपेक्षा प्रियेचं ( तेही जयश्री गडकरसारख्या सौंदर्यवती सुभद्रे चं ! )हे मराठमोळं गोड आर्जव हळुवार मोरपीस फिरवल्यासारखं मनाला स्पर्शून जातं.....

    ज्या काळात काकाचं ( पक्षी : जतिन ऊर्फ राजेश खन्ना ) मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू? गाजत होतं ( १९६९ ) त्याच काळात मराठमोळा रमेश देव सीमा ला पडद्यावर मधुसूदन कालेलकरांच्या शब्दांना एन.दत्तांच्या सुरावटीत विचारता झाला सांग कधी कळणार तुला , भाव माझ्या मनातला? आणि आपलंही प्रेम असल्याची कबुली असलेला पलटवार करते सीमा :रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला? आणि हे भांव जिवंत केले मंदार —विद्या यांनी !

    प्रियेच्या आर्जवाने संमोहित प्रियकर मग मराठी सोडून हिंदीमधे प्रियेला हसरत जयपुरी यांचे शब्द शंकर जयकिशनच्या चालीमधे घोळवत राजकुमार धर्तीवर सांगू लागला तुमने पुकारा और हम चले आए , दिल हथेलीपर ले आए रे आणि हे प्रियकर प्रेयसीचे कबुलीजबाब सादर केले मंदार—सुचित्रा यांनी.

    सूफ़ी संगीतातील एक प्रकार मुनाजात याबद्धल भाष्य करत ( अल्लाह करम करना मौला तू रहम करना — या सुमनमय मधुर गीताचा उल्लेख करत ) मंगलाजींनी जानवर मधील एक अशीच मुनाजात ( पक्षी : प्रार्थना , स्तुति ज्यात स्वत:साठीही काही प्रार्थना असते ) जी मूलत: हसरत जयपुरींची होती व शंकर जयकिशनने त्यात उत्कट रंग भरून सुमनजींकडून गाऊन घेतली होती मेरे संग गा , गुनगुना कोई गीत सुहाना ती सादर केली विद्यांनी ...

    यानंतर मंत्रमुग्ध श्रोत्यांना परत मराठी भावविश्वात आणलं मंगलाताईंनी , अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना नादमय माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर आणि हा गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर सुचित्रा यांनी व्यक्त केला... संचारी या बंगाली संगीत प्रकारावरून हे संगीत आल्याचं मंगलाताईंनी नमूद केलं.....

    समुद्राच्या लाटांवर मनाला तरंगत ठेवणार्‍या अशोक जी. परांजपे यांच्या शब्दांना तितकीच प्रवाही माधुर्यता देणार्‍या अशोक पत्की नामक अवलिया जादुगार संगीतकाराच्या गाण्याने श्रोत्यांना संगीताच्या लाटांवर आरूढ केलं नाविका रे वारा वाहे रे , डौलानं हाक जरा आज नांव रे म्हणत विद्या यांनी. भटियाली संगीत प्रकारापैकी एक संगीत असं मंगलाताईंनी आवर्जून नमूद केलं.....

    यानंतर कलाकारांनी एक दृतगतीतील चौकार खेळला : सुचित्रा — अरे संसार संसार मोलकरीण , विद्या — असावे घरटे अपुले छान, मंदार विद्या — आईसारखे दैवत सार्‍या जगतावर नाही , विद्या या लाडक्या मुलांनो तुम्ही मला आधार विंगेमधे बसलेल्या सुमनताईंना उद्देशून मुंबईचा जावई मधील गदिमा—सुधीर फडके यांचे कशी करू स्वागता? सादर केलं विद्या यांनी.....

    आणि या स्वागतगीतानंतर मंगलाताई रंगमंचावर घेऊन आल्या वात्सल्यमूर्ती , पद्मभूषण , यंदाच्या म.टा.गौरवप्राप्त सु रांचा म नमोहक न जराणा अर्थात् सुमन कल्याणपूर यांना ! वय वर्षे ८७ फक्त ! पण मंगलाताईंनी त्यांना बोलतं केलं आणि त्यांनीही तितक्याच मार्मिक आणि मिश्किलपणे श्रोत्यांशी सुसंवाद साधला ! आनंद मनी माईना , केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर , जिथ्थे सागरा धरणी मिळते..... अशी गाणी गायल्या..... यानंतर ॠतुरंग तर्फे त्यांना एक मानपत्र अर्पण करण्यात आलं ज्याचं वाचन अतिशय छान निवेदन करणार्‍या राजेंद्र पाटणकर यांनी आधी केलं , शाल, श्रीफळ आणि रोख रक्कम एक लक्ष एक हजार एक यासह सुमनताईंचा सत्कार करण्यात आला ! ज्यांनी कित्येक दशकं आपले अष्टौप्रहर सुश्राव्य केले अशा एका थोर व्यक्तीमत्वाचा सत्कार होताना आपण त्याचे साक्षीदार होणं ही एक परमभाग्याची गोष्ट आहे महाराजा !

    यानंतर ( फक्त पाचच मिनिटं सांगून पंधरा मिनिटांचं ! )मध्यंतर झालं.

    मध्यंतरानंतर.....

    १९६३ च्या दिल एक मंदिर मधील जानेवाले कभी नहीं आते या मंदारजींच्या आर्त टाहोनंतर हसरत जयपुरी आणि शंकर जयकिशन यांचं दिल एक मंदिर है ~ असं विद्या यांनी विदित केलं.....

    १९६८ चं रमेश आणावकर यांचं दशरथ पुजारी यांनी संगीतबद्ध केलेलं मृदुल करांनी छेडित तारा ऐकवत विद्या यांनी भाव विभोर केलं.....

    यानंतर मधुकर जोशी यांचं गीत जे मूलत: रिमझिम झरती श्रावणधारा असं होतं , ते सुमनजींनी पावसाच्या झिमझिम झरती श्रावणधारा असतात ना? असं म्हटल्यावर मधुकरजींनी पण "बरं , झिमझिम तर झिमझिम !" असं मान्य केल्याचा किस्सा मंगलाताईंनी सांगितला आणि श्रोत्यांमधे खसखस पिकली आणि त्या पार्श्वभूमीवर दशरथ पुजारींचे नादमय स्वर सुचित्रामय झाले.....

    कुठल्याही स्त्रीच्या ह्रृदयाचा एक कोपरा ज्या माहेराने व्यापलेला असतो , त्या माहेरी जाऊन सुवासाची बरसात करणारे आणि डोळ्यांत पाणी आणणारे कृ.ब निकुंब यांचे शब्द कमलाकर भागवत यांच्या सुमधुर संगीताने नटलेले — घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात हे आर्त भाव सुचित्राजींनी गाऊन श्रोत्यांना हेलावून सोडलं.....

    हे गाणं जसं सुमनजींनी गायलंय तसंच , ए.पी.नारायणगांवकर यांच्या संगीतात कालिंदी केसकर यांनी आणि वसंत देसाई यांच्या संगीतात फैय्याज यांनीही गायलं आहे ! एकाच गाण्याला ३ वेगवेगळ्या संगीतकारांच्या चाली आणि तीन वेगवेगळ्या सुश्राव्य गायिकांनी अजरामर केलेलं हे मराठीतील पहिलंवहिलं भावगीत असावं आणि तेही या जगातील सर्वश्रेष्ठ अशा स्त्री च्या भावनांना वाट करून देणारं ! आपण मराठी असल्याचा अभिमान वाटत ऊर भरून येतो महाराजा !

    १९६५ साली मजरूह सुलतानपुरींचे जादुई आर्जव संगीतकार ख़य्याम यांनी स्वरबद्ध करत मुहब्बत इसको कहते हैं चित्रपटातील माझ्या माहेरच्या गोरेगांवातील छोटा काश्मिर ऊर्फ Observation Post ( O.P. ) येथे चित्रिकरण झालेलं ठहरिये होशमें आ लूँ तो चले जाइयेगा हे गाणं रफ़ी आणि सुमनजींच्या त्या लाडिक ऊँ हूँ सहित मंदार सुचित्रा यांनी सादर केलं.आणि पडद्यावर मास्टर विनायक कन्या नंदा आणि कपूर कुलोत्पन्न तेहेत्तीस दातांचा देखणा शशी कपूर ! एक दात डाव्या बाजूच्या वरच्या जबड्यात अधिक असताना फारच देखणा दिसणारा शशी कपूर हे हिंदी सिनेसृष्टीला पडलेलं ३३ दातांचं पहिलं स्वप्न ( आणि तसंच दुसरं स्वप्न म्हणजे मौशुमी चटर्जी ! )

    यानंतर विद्या यांनी दिल एक मंदिर मधील शैलेंद्र यांचं जूहीकी कली मेरी लाडली हे शंकर जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेलं लडिवाळ नटखट गाणं सादर केलं.....

    १९५१ साली मल्हार चित्रपटात इंदिवर यांच्या शब्दांना रोशन यांनी संगीतबद्ध करत एक गाणं राग गौड मल्हार मधे लताकडून गाऊन घेतलं होतं गरजत बरसत भीजत आईलो पुढे ९ वर्षांनी अब्दुल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांनी लिहिले गाणं रोशन यांनी याच चालीत बरसातकी रात चित्रपटात कमल बारोट आणि सुमन कल्याणपूर यांच्याकडून गाऊन घेतलं गरजत बरसत सावन आयो रे जे विद्या—सुचित्रा यांनी सादर केलं.....

    १९६५ साली एक चित्रपट आला नूरमहल ज्यात एक गूढ वाटणारं गाणं होतं सबा अफ़गाणी यांचं , जे संगीतबद्ध केलं होतं जानी बाबू क़व्वाल यांनी सुमनजींच्या आवाजातील मेरे मेहेबूब न जा ( पडद्यावर चित्रा आणि जगदीप ) — विद्या यांनी सादर केलं.

    १९६५ सालीच ३३ दातांच्या देखण्या शशी कपूरचा नंदासोबत एक सिनेमा आला होता जब जब फूल खिले आणि आनंद बक्षींच्या गीतांना कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध करून अजरामर केलं.यातलं कबूलीजबाब धाटणीचं गाणं सादर केलं मंदार विद्या यांनी : ना ना करते प्यार तुम्हींसे कर बैठे यानंतर १९६८ च्या ब्रह्मचारी मधील हसरत जयपुरी—शंकर जयकिशन यांचं आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर सादर केलं मंदार—सुचित्रा यांनी ! ( अख्ख्या दृष्ट लागण्यासारख्या कार्यक्रमात या गाण्यातील सॅक्सोफोनची धून नीट न वाजण्याची दृष्ट लागलेलं हे एकमेव गाणं महाराजा ! )

    १९६१ च्या माॅडर्न गर्ल मधे आपल्या अजागळ पेहेरावावरून हिंदी सिनेसृष्टीमधे उपाधी लाभलेल्या गुलशन बावरा च्या गीताला स्वरबद्ध केलं रवी यांनी आणि ते ये मौसम रंगीन समाँ सादर केलं मंदार—विद्या यांनी.

    मराठी चित्रपटसृष्टीमधे चंद्राला निंबोणीच्या झाडामागे झोपवण्याची किमया करत अजरामर अंगाईगीत लिहिणार्‍या मधुसूदन कालेलकर यांच्या शब्दांना एन.दत्ता यांनी स्वरबद्ध केलं आणि निंबोणीच्या झाडामागे सादर केलं विद्या यांनी.....

    गदिमा—बाबूजी यांच्या एकटी मधील मातृह्रृदयाने मुलाची काढलेली काल्पनीक दृष्ट सुचित्रा यांनी काढली : लिंबलोण उतरू कशी असशी दूर लांब तू १९६४ च्या साँज और सवेरा मधील नायक—नायिकेची खंत हसरत जयपुरींनी मांडली व शंकर जयकिशन यांनी स्वरबद्ध केली अजहु न आए बालमा , सावन बीता जाय सादर केलं मंदार आणि विद्या यांनी !

    मंडळी , काही काही कार्यक्रम संपूच नयेत असं वाटतं , पण कालमर्यादा असते त्यामुळे साँज और सवेरा ने सुमधुर केलेली बेला सावन बीता जाय या सुरेल तक्रारीवर संपली आणि कार्यक्रम संपला मंगलाय सुमनो हरि: आणि अस्मादिक् आणि सौभाग्यवती संगीताय रमत: घरी: आलो !

    असा "हा सुमन सुगंध आमच्या जीवनात दरवळला तसा येणारी अनेक वर्षे हा लेख वाचणार्‍या रसिक वाचकांच्या जीवनातही दरवळो !" ~ हीच पाचां उत्तराची कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण ! जाणिजे ,

    लेखनालंकार ,
    मर्यादेयं विराजते !
    © उदय गंगाधर सप्रे म—ठाणे
    सोमवार २२ एप्रिल २०२४ दु.१.१७ वा.

  • अपंगांच्या समस्या सुटल्या प्रेरणेतून

    अपंगांच्या समस्या सुटल्या प्रेरणेतून

    अनेक वर्ष दुःखात, दारिद्र्यात, अज्ञानात असलेल्या समाजाला त्या त्यावेळी त्या त्या व्यक्तींनी प्रेरणाची पायवाट निर्माण केल्यामुळेच समाज त्यातून बाहेर येऊ शकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांच्यामुळे आज खितपत पडलेला समाज यशाची मजल गाठू शकलां.

  • शोधा म्हणजे सापडेल

    मुख्य रस्ता आणि रेल्वे स्थानक यांना जोडणारी एक चिंचोळी गल्ली.
    गल्लीच्या दुतर्फा वेगवेगळी दुकानं.
    सुरवातीला वडापाव, दाबेली, सँडविच.
    मग एखादं झेरॉक्सचं दुकान.
    मध्येच एक मेहेंदी काढण्याचं प्रशस्त दालन.
    बाजूला कानातल्या गळ्यातल्याचं दुकान.
    लागून एखादी चहाची टपरी.
    पुढे स्टेशनरीचं दुकान.
    शिवाय पर्स, अत्तर, मोबाईल कव्हर आणि बरंच काही.
    विविध प्रकारची एक से एक दुकानं.
    त्याची नोकरीनिमित्त स्टेशनवर जायची-यायची वेळ ठरलेली.
    सकाळी जाताना नेहमीच ट्रेन पकडायची लगबग असायची.
    त्यामुळे त्या गल्लीतून अक्षरशः पळतच जावं लागायचं.
    तेव्हा दुकानांत सुद्धा सकाळच्या तयारीची, मांडामांडीची गडबड असायची.
    तो संध्याकाळच्या वेळेस परतायचा ती वेळ मात्र धंदा अगदी तेजीत असण्याची.
    त्यामुळे तेव्हा सगळी दुकानं आणि एकूणच गल्ली एकदम गजबजलेली.
    असाच त्याचा आठवड्यातला एक सामान्य दिवस.
    आज नेहमीपेक्षा तास दोन तास लवकर घरी यायचं ठरवलं होतं.
    मस्त काहीतरी चमचमीत खात टीव्ही वगैरे बघत बसायचं निवांतपणे.
    तसं बायकोला सांगूनही ठेवलं होतं.
    खरं तर कोणाचाही वाढदिवस, कुठला कार्यक्रम वगैरे काहीही नव्हतं.
    ठरलेल्या दिनक्रमाचा थोडा कंटाळा आला होता हे नुसतं निमित्त.
    केवळ मनात आलं म्हणून लवकर घरी यायचं होतं हेच खरं.
    एकदम आली लहर केला कहर, मेरी मर्जी.. तसंच काहीसं.
    पण ऑफिसमधून निघणार इतक्यात एका महत्वाच्या मीटिंगचा निरोप आला.
    सगळं मुसळ केरात .. अन् नुसता त्रागा.
    लवकर निघण्याचा मानस असताना झालं मात्र उलटंच.
    मीटिंग लांबली आणि निघायला नेहमीपेक्षा अडीच तास उशीर.
    येतानाच्या ट्रेन प्रवासात फक्त चिडचिड आणि नशिबाला दोष देणं सुरू होतं.
    “ कधी एक दिवस लवकर जाऊ म्हंटलं तर कसलं काय ? “
    “ कसला मनासारखा आनंद म्हणून घेता येत नाही .. नशिबच वाईट “.... वगैरे वगैरे
    त्याच नादात स्टेशनवर उतरून घराच्या दिशेने चालू लागला.
    वाटेत त्या चिंचोळया गल्लीत शिरला.
    आज उशीर झाल्याने ती गल्ली थोडी वेगळी भासत होती.
    नेहमी सारखा गजबजाट, कलकलाट नव्हता.
    काही दुकानं पूर्ण बंद झाली होती तर काही बंद होण्याच्या मार्गावर होती.
    खाण्यापिण्याची दुकानं अजूनही सुरू होती पण तिथलीही गर्दी कमी होती.
    तो एकेक दुकान सहज न्याहाळत चालला होता.
    चालता चालता त्या मेहेंदी काढण्याच्या दुकानापाशी आला.
    तिथलं दृश्य बघून त्याची पावलं आधी रेंगाळली .. मग आपसूक थांबली.
    त्याचं दुकान खरं तर बंद झालं होतं पण तरीही तो मेहेंदी काढत होता.
    समोर २-४ चिमुकल्या मुली बसल्या होत्या.
    हसऱ्या चेहऱ्याच्या आणि गोंडस.
    पण अगदी कळकट मळकट कपड्यातल्या.
    मुलींचे चेहरे ओळखीचे वाटले म्हणून निरखून पाहिल्यावर लक्षात आलं.
    एरव्ही दिवसा त्या मुली स्टेशन जवळच्या सिग्नलवर फुलं-गजरे वगैरे विकायच्या.
    त्यातली एक मुलगी मेहेंदी काढून घेत होती.
    बाकीच्या नंबर लावून , कुतुहलाने बघत तिच्या आजूबाजूला बसल्या होत्या.
    काही क्षण तिथे रेंगाळल्यावर त्याला सगळा अंदाज आला.
    दिवसभर मेहेंदी काढून प्रत्येक कोन मध्ये थोडी थोडी मेहेंदी शिल्लक राहिलेली.
    शेवटच्या कोन मध्ये जरा जास्तच.
    उरल्या सुरल्या मेहेंदीने तो त्या मुलींच्या इवल्याश्या हातावर कलाकुसर करत होता.
    “दुकान बंद झाल्यावर या!” असं त्यानेच कदाचित सांगितलं असेल.
    कुठलेही पैसे न घेता तो मेहेंदी काढत होता हे तर स्पष्टच होतं.
    पण तरीही त्या मुलींना नेहमीच्या इतर ग्राहकांप्रमाणेच वागणूक देत होता.
    त्यांना खाली जमिनीवर बसवलं नव्हतं किंवा दुकानाबाहेर उभं वगैरेही केलं नव्हतं.
    गादी असलेल्या छोट्या सोफा स्टूलावर इतरांप्रमाणेच मानाने बसवलं होतं.
    अतिशय प्रसन्न मनाने आणि तन्मयतेने तो मेहेंदी काढत होता.
    दिवसभराचा कामाचा थकवा आहे म्हणून कुठेही कटकट नाही.
    उशीर झालाय म्हणून उगीच चार फराटे मारून उरकून टाकणं नाही.
    आणि उपकार केल्याचे भाव तर अजिबातच नाहीत.
    उलट, मेहेंदी काढता काढता मजा मस्करी करत त्यांना हसवत सुद्धा होता.
    त्या निरागस लहानग्या सुद्धा तितक्याच उत्साहाने मेहेंदी काढून घेत होत्या.
    गप्पा मारत होत्या. दंगामस्ती, कल्ला करत होत्या.
    कमालीचं अप्रूप, झालेला आनंद आणि मिळालेलं समाधान असा त्रिवेणी संगम त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
    याला त्या दोघांचही खूप कौतुक वाटलं.
    एकीकडे तो मेहेंदी काढणारा…
    त्याच्याकडे जे आहे त्यातून त्याला जितकं देणं शक्य आहे तितकं निःस्पृहपणे वाटून तो दुसऱ्याला आनंद देत होता.
    शिवाय समोरच्यांना झालेला आनंद बघून स्वतःही तितकाच उल्हासित होत होता.
    तर दुसरीकडे त्या चिमुकल्या...
    आपली प्रतिकूल परिस्थिती असूनही जे आहे त्यात आनंद मानत होत्या.
    त्यांच्या चेहऱ्यावर कसलीच तक्रार नव्हती.
    आलेला क्षण अतिशय प्रसन्नतेने जगत होत्या.
    ते सगळं चित्र पाहून त्याच्या मनातला आवाज कानात घुमू लागला.
    “आपल्याला तशी कसली ददात नसूनही आपण गेले काही तास आपल्या नशिबावर आगपाखड करत होतो!”.
    “आयुष्यात मनासारखा आनंद मिळत नाही अशी मुक्ताफळं उधळत होतो!”.
    “अन् इथे हे सगळे कित्येक गोष्टींपासून वंचित असूनही अतिशय समाधानी आहेत!”.
    “सगळ्याचा मनमुराद आनंद घेत आहेत!”.
    त्याची सगळी चिडचिड एका क्षणात संपली.
    एकदम मोकळं, हलकं वाटलं.
    मनात अप्रत्यक्ष आलेल्या नकारात्मकतेवर त्या मेहेंदीने सकरात्मकतेचा रंग चढवला.
    त्याच्यातही आता नवचैतन्य संचारलं.
    प्रसन्न मुद्रेने आणि समाधानी अंतःकरणाने तो त्या गल्लीतून बाहेर पडला.
    गोड शेवट झालेल्या सिनेमाची शेवटची फ्रेम मनात साठवून प्रेक्षक बाहेर पडतो ना?
    अगदी तस्सच.
    आता त्याच्या मनात एकंच विचार घुटमळत होता.
    “आनंद तर सर्वदूर पसरलेला आहे!”.
    “फक्त आपण शोधायला हवा!”.
    “जसा त्या मेहेंदी काढणाऱ्याने शोधला!”.
    “जसा त्या चिमूकल्यांना गवसला!”.
    “आणि आता मलाही मिळाला!”..
    “तसा सगळ्यांनाच सापडेल!”.
    “शोधा म्हणजे सापडेल!!”.
    “शोधा म्हणजे सापडेल!!”

    - क्षितिज दाते , ठाणे

  • अक्कलकोट मध्ये  ४२ एकरांच्या जागेवर साकारला जातोय भव्य अनुभुती प्रकल्प

    अक्कलकोट मध्ये ४२ एकरांच्या जागेवर साकारला जातोय भव्य अनुभुती प्रकल्प

    श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार म्हणून मान्यता पावलेले आणि तमाम मराठी भक्तांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलेले श्री स्वामी समर्थ यांचे अक्कलकोट येथे सुमारे २२ वर्षे वास्तव्य होते.

    तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आलेल्या अक्कलकोटचा सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, आरोग्य सेवा,  पर्यटन असा विविध अंगांनी विकास करणे हे ध्येय ठेवून कार्य करणाऱ्या श्री अक्कलकोट संस्थानतर्फे  ४२ एकरांच्या जागेवर भव्य असा अनुभुती प्रकल्प साकारण्यात येत आहे.

    अनुभूती ही आध्यात्मिक संकल्पना असून या प्रकल्पात ब्रह्मस्थानी श्री स्वामीसमर्थांची पंचधातूमध्ये बनवलेली १०८ फुटी भव्य मूर्ती (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) उभारण्यात येणार असून त्यासोबत  दिव्य दर्शन, बहूउद्देशीय रुग्णालय, प्रसादालय, निवास व्यवस्था, स्टुडिओ अपार्टमेंट, भव्य  पार्किंग व्यवस्था,  पंचकर्मा रिसॉर्ट,  फूड कोर्ट आणि हत्तींच्या मुक्त संचारासाठी कुंजरबन हे जंगल यांचाही समावेश आहे.

    या प्रकल्पाची संकल्पना श्रीमंत मालोजी राजे भोसले (तिसरे) यांची असून त्यासाठी  त्यांनी अक्कलकोट संस्थानची सुमारे २५० कोटीहून जास्त मुल्याची ४२ एकर जागा सेवा स्वरूपात दिलेली आहे. आता सर्व स्वामीभक्तांचा स्वामीसेवा स्वरुपात या प्रकल्पाला हातभार लागावा या उद्देशाने लोकवर्गणीतून हा प्रकल्प उभा रहात आहे.

    सुयोग्य प्रकाश योजना, दिशा दर्शक फलक, भाविकांना मनःशांती प्रदान करणारे भारतीय आध्यात्मिक वृक्ष आणि फुलझाडांदे  नक्षत्रवन हे देखील या प्रकल्पाचे आकर्षण ठरणार आहे. तज्ज्ञ कलाकार आणि अनुभवी कारागीरांच्या कलाविष्कारातून साकारण्यात येणारा हा प्रकल्प देशाच्या धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनात आपला वेगळा ठसा उमटविणारा ठरणार आहे.

    या प्रकल्पाव्दारे पर्यटकांना अक्कलकोटच्या इतिहासाची परिपूर्ण माहिती देण्यात येणार असून अक्कलकोटच्या राजघराण्याची झलक देखील यातून मिळणार आहे.

    प्रकल्पाची विस्तृत माहिती:

    ब्रह्मस्थान (स्ट्याचू ऑफ मिरॅकल) ह्या नावाने श्री स्वामी समर्थ महाराज यांची १०८ फुटी पंचधातूमधील मूर्ती उभारण्यात येणार आहे. येथे चौथऱ्यावर स्थापित श्री स्वामी समर्थाचे भव्य शिल्प शांतता आणि समतोलाची अनुभुती देणारे असणार आहे. सदर १०८ फुटी मूर्तीच्या खाली २२ फुटी कमळ आहे. त्या कमळाच्या खाली भाविकांसाठी ध्यान केंद्र आणि पारायण केंद्र असणार आहे.

    दिव्य दर्शन :- दिव्य दर्शनमधील १८ दिव्य गुंफा आणि दगडावरील कोरीव कामातून पर्यटकांना श्री स्वामी समर्थाच्या जीवन चरित्राचा आस्वाद घेता येणार आहे. येथील प्रत्येक शिल्पामधून भाविक आणि पर्यटकांना एक आगळावेगळा  अनुभव मिळणार आहे.

    बहूउद्देशीय रुग्णालय :- अनुभूती प्रकल्पामधील येणाऱ्या उत्पन्नातून बहुउद्देशीय रुग्णालय उभारण्यात येणार असून त्याद्वारे अक्कलकोटच्या राजघराण्याची समाजप्रती असलेली सेवेची बांधिलकी व्यक्त होत आहे. हे बहूउद्देशीय रुग्णालय अक्कोलकोटवासीयांच्या सेवेसाठी नि शुल्क प्रस्तावित करण्यात आले आहे.

    प्रशस्त पार्किंग :- प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या पार्किंगसाठी ५०० कार, बसेस आणिक इतर वाहने उभी करण्यासाठी वृक्षेच्या छायेखाली जागा उपलब्ध करून देणार आहे. हे पार्किंग वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरापासून साधारण १०० मीटर अंतरावर आहे.

    पार्किंग परिसरात अग्निशामक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे याठिकाणी कॅन्टीन देखील उभारण्यात येणार आहे.

    फूड कोर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या भव्य मूर्तीच्या परिसरात असलेल्या फूड कोर्टमध्ये महाराष्ट्रातील विविध विभाग आणि जिल्ह्यांमधील तसेच भारतातील विविध राज्यांमधील आणि जगातील प्रमुख देशांमधील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी वेगवेगळी उपहारगृहे उभारण्यात येणार असून त्याद्वारे पर्यटकांना अक्ललकोट येथे आकर्षित करण्यात येणार आहे.  अक्कलकोट आणि परिसरातील जनतेसाठीसुद्धा ही एक खाद्य अनुभूती असणार आहे.

    लाईट आणि साऊंड शो :-  प्रकाश, ध्वनी आणि जलाचा मनोहारी सांगीतिक आविष्कार असलेल्या या विभागातून पर्यटकांना अतिउच्च आनंदाचा अनुभव मिळणार आहे.

    प्रसादम् :-  या प्रकल्पाला भेट देणाऱ्या प्रत्येकाला प्रसादम् विभागात सात्विक प्रसादाचा लाभ घेता येणार आहे.

    कुंजर बन :- शाही हत्तींच्या मुक्त संचारासाठी हे वनरुपी  परिपूर्ण निवासस्थान असेल.

    पंचकर्मा रिसॉर्ट :- स्वामी समर्थ महाराजांच्या १०८ फुटी मूर्ती समोर आणि स्वामींच्या सानिध्यात १८ वैशिष्टयपूर्ण बंगल्याचे रिसॉर्ट देखील उभारण्यात येणार आहे. भारतातील तसेच परदेशी पर्यटकांना आयुर्वेदिक उपचार आणि पंचकर्म यासाठीच्या उच्च दर्जाच्या सुविधा देणारे हे रिसॉर्ट अक्लकोट परिसरातील पर्यटनाला चालना देणार आहे.

    स्टुडिओ अपार्टमेंट :- देशभरातून आणि जगभरातून अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना दर्जेदार वास्तव्याची सोय करण्यासाठी विविध सोयी सुविधांनी युक्त स्टुडिओ अपार्टमेंट बांधण्यात येणार असून या निवासस्थानात अतिथींना सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

    या संपूर्ण प्रकल्पाची माहिती  www.swamisamarthanubhuti.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

  • वैभव भागवत : इंदूरी सुपुत्राची वीरगाथा

    हुतात्मा ‘वैभव भागवत’ यांनी यावर्षी वयाची ५० वर्षे पूर्ण केली असती, त्यानिमित्ताने त्यांचे कृतज्ञ स्मृतीरंजन

  • वॉटर हीटर (सोलर)

    वॉटर हीटर (सोलर)

    भारत हा उष्णकटिबंधातील देश असल्याने आपल्याकडे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर बाकीचे दिवस सूर्यप्रकाश असतो. सहस्ररश्मी सूर्याची फुकट मिळणारी ऊर्जा वापरणे हा खरेतर इंधन टंचाईवरचा एक पर्याय आहे. पाणी तापवण्यासाठी आपण घरातील किमान २५ टक्के ऊर्जा खर्च करीत असतो ती वाचवता आली तर विजेचा किंवा गॅसचा वापर टाळल्याने प्रदूषण होणार नाही. सोलर वॉटर हीटर हा असाच एक पर्याय आहे. सोलर वॉटर हीटर तयार करताना जी कार्बनची निर्मिती झालेली असते ती या हीटरच्या वापराने ४-५ वर्षांत भरून निघते