वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दातासंबंधीचे जे समज-गैरसमज दातांच्या डॉक्टरांकडे जाण्यापासून बऱ्याचदा आपण या समज-गैरसमजामुळे परावृत्त होतात. दातांच्या बाबतीतला सर्वात लोकप्रिय गैरसमज जर कुठला असेल तर दात काढल्यानंतर नजर कमी होणे किंवा डोळ्यांची बघण्याची क्षमता कमी होणे हा होय. आणि या बाबतीत लहानथोरांपासून सर्व जनमाणसांत एकवाक्यता आहे. खरं म्हणजे दात काढल्यानंतर डोळ्यांवर कुठलाही दुष्परिणाम होत नाही. याला शास्त्रीय आधार आहे.
दाताला आणि डोळ्यांना रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी तसेच संवेदनांचे ज्ञान असणारी चेतातंतू किंवा नसा या वेगवेगळ्या असतात. त्यामुळे दात काढल्यानंतर डोळ्यांवर परिणाम होणे शक्य नाही. हा गैरसमज पसरण्याला काही कारणे आहेत. बऱ्याचदा दातांची समस्या आपण प्रौढ वा चाळिशीत असताना होते. (खरं म्हणजे चाळिशीत सर्वच अवयवांची थोडय़ाफार प्रमाणात कुरकुर चालू होते.) त्यातच दात काढल्यानंतर आपल्या मनात असलेल्या गैरसमजामुळे आपण डोळ्यांच्या डॉक्टरांकडे डोळे तपासायला जातो. या चाळिशीत इतर अवयवांप्रमाणे डोळ्यांचीही क्षमता थोडीफार कमी झालेली असतेच (कदाचित यामुळेच चष्म्याला ‘चाळिशी’ असंही काही ठिकाणी म्हणतात.) त्यामुळे डोळ्यांच्या डॉक्टरांनी चष्मा लावायला सांगताच आपण दातांचा काढण्याचा व डोळ्यांचा खराब होण्याचा संबंध लावतो. परंतु शास्त्रीयदृष्टय़ा हे खरे नाही. अगदी लाखात एखादा पेशंट जो वरच्या दातांवर प्रचंड सूज येऊन ती डोळ्यापर्यंत पोहचेपर्यंत जर डॉक्टरांकडे गेला नाही किंवा त्याचे इन्फेक्शन अनियंत्रित होऊन डोळ्यापर्यंत गेले तरच डोळ्यांना इजा होऊ शकते. परंतु हे प्रमाण लाखात एखादा वा त्याहूनही कमी असते. कारण हल्ली सर्वजण आपल्या आरोग्याबद्दल जागरूक असतात.
दातांबद्दलचा अजून एक लोकप्रिय गैरसमज म्हणजे डेंटिस्टकडे जाऊन क्लिनिंग केल्यानंतर दात हलतात. हा गैरसमज पसरण्यामागची पाश्र्वभूमी आपण समजून घेऊ या. जेव्हा आपण आपल्या डेंटिस्टकडे दात साफ करण्यासाठी जातो किंवा डेंटिस्ट आपल्याला दात साफ करण्याचा सल्ला देतात तेव्हा दातांमध्ये किंवा हिरडय़ांमध्ये अन्नकण अडकून त्याचा ‘प्लाक’ (एक प्रकारचा छोटासा चिवट दगडासारखा घट्ट पदार्थ) तयार झालेला असतो व तो दातांच्या फटीमध्ये व हिरडी व दात यांमध्ये घट्ट चिकटलेला असतो. त्यामुळे हिरडय़ांना इन्फेक्शन होऊन हिरडय़ांतून/दातांतून रक्त वाहते वा मुखदरुगधीचा त्रास संभवतो. ज्यावेळी डेंटिस्ट आपले दात साफ करतो त्यावेळी हा ‘प्लाक’ काढणे गरजेचे असते. हा प्लाक काढल्यानंतर दात व हिरडी येथे एक प्रकारची जागा तयार होते. त्यामुळे काही काळ आपल्याला दात थोडेसे हलल्यासारखे वाटू शकतात. परंतु ही तात्पुरती जाणीव असते. काही तासांत ती जागा भरून येऊन हिरडी व दात एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यामुळे रुग्णांनी घाबरण्याचे मुळीच कारण नाही. उलट दातांच्या व हिरडय़ांच्या आरोग्यासाठी वर्षांतून एकदा तरी आपल्या डेंटिस्टकडे जाऊन दात साफ केल्याने त्यांचे आयुष्य वाढतेच.
प्लाक काढल्यानंतर दातांच्या व हिरडय़ांमध्ये पोकळी भरून येणाऱ्या काळात अति थंड किंवा अति गरम पदार्थ टाळावेत. कारण या काळात दातांच्या व हिरडय़ांच्या मधला भाग संवेदनशील असतो वा जेथे चेतातंतू जास्त उद्दीपित होतात तेथे थंड व गरम पदार्थाने काही काळ दाताला ठणके बसू शकतात. परंतु हाही तात्पुरता बदल असून काही काळाने त्रास जाणवत नाही. शिवाय यात एक फायदा असाही आहे की डेंटिस्टला दात साफ करताना आपला एखादा दात जर किडण्यास सुरुवात झाली असेल तर तो प्राथमिक अवस्थेत ध्यानात येऊन कमी खर्चात व कमी वेळेत तो वाचण्याची शक्यताही असते.
दात साफ करताना एक भीती मनात घर करून असते ती म्हणजे आपले दात झिजतील का किंवा साफ केल्याने पातळ होतील का? हा गैरसमज होण्याचे एक कारण म्हणजे डेंटिस्ट दात अल्ट्रासोनिक स्केलरसारख्या मशीनने साफ करतात.
शिवाय दात साफ केल्यानंतर काही वेळा थंड पाणी व गरम चहा पिताना दात सळसळतात. यातील पहिले कारण प्रथम शोधू. अल्ट्रासोनिक स्केलर हे जरी मशीन असले तरी ते फक्त व्हायब्रेशन या तत्त्वावर काय करते. त्यात दात घासण्याच्या किंवा दात कटिंग करण्याच्या उपकरणाचा समावेश नसतो. फक्त व्हायब्रेशन होऊन दातांमधला फ्लक किंवा डाग काढले जातात. हे अतिशय नाजूक व चांगले मशीन असून यामुळे दातांची व हिरडय़ांची कुठलीही झीज होत नाही. मात्र दुसरे कारण काही प्रमाणात खरे आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मानसिक आजारामधे सुरूवातीला झोपेच्या तक्रारी सुरु होतात. त्यामधे झोप लवकर लागत नाही, पहाटे लवकर जाग येते , मधेमधे सारखी जाग येते, निद्रानाश, नाईट मिअर (यामध्ये त्या व्यक्तीस झोप लागते, परंतु भायानक स्वप्ने पडल्यामुळ ती जागी होते )
२) व्यक्तीच्या कामातील तक्रारी वाढतात. ती व्यक्ती मन लावून काम करत नाही. त्याला कामात गोडीच वाटत नाही , मनावर कसलेतरी दडपण आसलेचे जाणवते, ती व्यक्ती कामावर जाण्याची टाळाटाळ करु लागते , ती व्यक्ती कामामधे एकाग्र होऊ शकत नाही. अशा व्यक्तीचे एकाच कामामध्ये लक्ष न लागल्यामुळ कामामध्ये सतत बदल करण्याची प्रवृत्ती आढळते.
३) व्यक्तिगत संबंधामधे बिघाड निर्माण होतो. त्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असलेले परस्पर संबधामधे बदल झालेला आढ़ळतो, ती व्यक्ती दुस-या व्यक्तीना टाळायला लागते, ती व्यक्ती स्वत: एकटी /एकल कोंड़यासारखी राहू लागते.
४) वर्तन - काही रुग्णाचे स्वत:कडे अजिबात लक्ष नसते , त्यांच्या अंगावरील कपडे अस्वच्छ असतात, ते रहातातही अस्वच्छ, अंघोळ करीत नाहीत , दाढ़ी करत नाहीत. त्यामुळे त्यांचे केस व दाढ़ी वाढलेली असते . याउलट काही रुग्ण अतिभडक मेकअप करतात काही रुग्ण उगाचच विचित्र हातवारे करीत राहतात.
५) भावना - काही रुग्णामध्ये भावना नियंत्रित नसतात. काही गोष्टी व्यक्ती बारीक सारीक आठवाणीनी रडतात किवा हसतात .
६) विचार - व्यक्ती चे विचार हे त्याच्या बोलण्यातून समजतात. व्यक्ती खूप बोलकी असते ,बोलत असतानाच एका कल्पने वरून दुसऱ्या कल्पने वर जात असते. त्या व्यक्ती च्या बोलण्यात सुसंगतपणा नसतो, बोलणे असंबधित असते . त्यातून काहीच अर्थ बोध होत नाही.
७) भ्रम /विचारातील बिघाड - भ्रम हा एक विचित्र खोटा आणि असंभाव्य असा विश्वास असतो . या विश्वासालाच सत्य धरून ते चालत असतात. त्यांना खूप समजावून सांगून ,खरे -खोटे याची समजूत घालून सत्याचा पुरावा त्यांचा समोर ठेवला तरी ते मानत नाहीत .
८) आकलन - यांमध्ये रुग्णाला स्थळ, काळ, व व्यक्ती या तीनही गोष्टीचे आकलन नसते. या आजारामध्ये स्मरणशक्ती कमी होते, स्मृतीवर परिणाम झालेला आढळतो.
Fb -गजानन वैद
whats app-7775871809
चिकित्सक सल्ला घ्यावा....
हा मोठा वृक्ष असतो. हल्ली रस्त्याचे कडेनी बरीच ही झाडे लावलेली असतात. ह्याला एप्रिल, मे, जून व नंतर नोव्हेंबर,डिसेंबर मधे सोनेरी पिवळ्या रंगाची फुले येतात. रस्त्यावर फुलांचा सडा पडतो, रस्ता पिवळा होतो. अख्खे फुल खाली पडते. फुल नाजूक असते फुलाच्या पाकळ्या पिवळ्या असून देठाला विटकरी रंग असतो. ह्या फुलाचा रक्ताभिसरणावर उपयोग होतो असे माझे संशोधनात आले.
2005मधे मला एकदा चक्कर आली म्हणून बी पी बघितले. 85--150 होते. म्हणून ह्या फुलांचा प्रयोग केला. ह्याची 15-20 फुले रात्रभर ग्लासभर पाण्यात ठेवली. सकाळी फुलं बाजूला करून ते पाणी अर्धी अर्धी वाटी चार वेळा घेतले. दुसरे दिवशी बी पी नाॅर्मल होते.
माझे सासूबाईंना सकाळी सहा वाजता उठताना चक्कर येत होती. उठून बसता येत नव्हते. (आॅगस्ट 2006). म्हणून बी पी पाहीले. ते 140--240 इतके होते. सुदैवाने ताम्र शेंगीचे पाणी तयार होते. त्याचे डोस तासातासानी दिले. आठ वाजता चक्कर कमी झाली. व त्या उठल्या. ह्या आधी मी डाॅ.तांबेना फोन केला होता त्यानी एक गोळीचे नाव सांगितले. व दुपारी एक वाजता बी पी घेऊन सांगा. असे सांगितले दहा वाजता केमिस्टचे दुकान उघडते. तो पर्यंत सासूबाई कामाला लागल्या. त्यानी गोळी नको सांगितले. डाॅ. तांबेनी सांगितले होते म्हणून एक वाजता बीपी पाहीले तर 90--140 होते. नंतर दोन दिवसात ताम्रशेंगीचे पाणी देऊन बी पी नाॅर्मल आले. मला आश्चर्याचा धक्काच बसला. साधे रस्त्यावर पायदळी तुडवले जाणारे फुल निसर्गाने किती औषधी बनविले आहे. डाॅक्टरला सहा वाजता बोलावले असते तर अँब्यूलंस करून ICUत चार दिवस ठेवले असते.
आमचे शेजारी राहणारे श्री. गायधनी (वय 70चे पुढे ) याचे बीपी 100--200 झाले म्हणून डाॅ.नी त्याना अॅडमीट होण्यास सांगितले. त्यांची अॅडमीट होणयाची इच्छा नव्हती. त्यांना मी माझेकडील ताम्रशेंगीचे पाणी दिले तीन डोस अर्ध्या, अर्ध्या तासानी दिल्यावर ते शांत झोपले. सकाळी दोन डोस घेतल्यावर बीपी बघीतले ते 85--140 होते
वरील अनुभव अचानक वाढलेल्या बीपीचे आहेत. परंतु ज्यांचे बीपी कायम हाय असते अशांना मी फुले सुकवून पावडर करून रोज अर्धा चमचा पाण्या बरोबर घेण्यास सांगितले. ज्यांनी केले त्याचे बीपी महीना भरात नाॅर्मलवर आले.
ताम्रशेंगी फुलांचे पाणी करणे---एका ग्लासभर पाण्यात 15ते20 फुले रात्रभर किंवा 8--10 तास ठेवावीत.नंतर पाणी गाळून 50 मिलीचा एक डोस असे आवशकते नुसार 4ते 6 डोस घ्यावेत
ताम्रशेंगीच्या फुलांची पावडर करणे--पिशवीभर फुले सावलीत चांगली सुकवावीत.नंतर मिक्सर मधे घालून पावडर करावी. रोज सकाळ संध्याकाळ अर्धा,अर्धा चमचा पाण्याबरोबर घ्यावी.
अरविंद जोशी B.Sc.
गौरव अपार्टमेंट,विश्वमेडीसिन मागे,
सनसिटी रस्ता, आनंदनगर,
सिंहगड रोड, पुणे
फोटो पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लीक करा
https://drive.google.com/file/d/0B_d0-zthRBc1ZEJQVXhMeXhtZVU/view?usp=drivesdk
बाळ उन्हात खेळतंय. खेळू दे की! बाळ खूप दूध पितंय. पिऊ दे की! बाळाच्या हाडांच्या बळकटीसाठी ते आवश्यकच आहे. आपलं बाळ जर सकाळच्या कोवळ्या उन्हात खेळत नसेल, दूथ प्यायचा कंटाळा करीत असेल तर तीच चिंतेची बाब समजा. बाळाला कॅल्शिअमची गरज आहे, हे वेळीच ओळखा.
बाळाला दूध प्यायला आवडत नाही, खूप लवकर दूध पिणं सोडलं आहे बाळानं असं जेव्हा एखादी आई लाडानं सांगते, तेव्हा माझा चेहरा चिंताक्रांत होतो. बाळाच्या भविष्याच्या दृष्टीनं सर्वात वाईट गोष्टच ती आता लाडानं सांगत असते. बाळाची त्वचा गोरीपान राहावी म्हणून त्याला अजिबात उन्हात जाऊ देत नाही, असं जेव्हा एखादी आई प्रेमानं सांगते, तेव्हाही मी असाच हताशपणे तिच्याकडे पाहात राहतो. आपण बाळाची काळजी घेत नाही आहोत, तर त्याच्यासाठी काळजी करावी अशी परिस्थिती निर्माण करीत आहोत, हेच त्या आईला माहित नसतं.
लहान मुलांमध्ये मुडदूस वाढतो आहे. गुडघ्याखालील पायाचा बाक व फ्रॅक्चरचे प्रमाणही वाढत चाललं आहे. याला मुख्यत्वेकरून आपल्या बदललेल्या खाण्याच्या पद्धती, राहण्याच्या पद्धती व गतीमान जीवन कारणीभूत आहे. आपण अकारण व अयोग्य रीतीनं बाळ वाढवत आहोत, हेही त्यामागचं एक कारण आहे. बाळाला त्याच्या वाढत्या वयात कॅल्शिअम पुरेशी मिळत नाहीत, हे यामागचं कारण असतं.
बाळ पोटात असताना व जन्मानंतरही सहा ते नऊ महिन्यांपर्यंत बालकाला आवश्यक असलेलं कॅल्शिअम आईकडून दुधातून मिळतं. त्यानंतर मात्र ही गरज पोषक आहारातून भागवली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी दूध, दही, पनीर, हिरव्या पालेभाज्या, नाचणी, सोया, मासे हे परिपूर्ण असतात. त्यामुळे बाळाला हा वरचा आहार सुरू करणं आवश्यक असतं. बालकाचं वय एक ते तीन वर्षे असताना त्याला दरदिवशी 500 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे कॅल्शिअम दोन कप दुधातून मिळू शकतं. मुलाचं वय चार ते आठ वर्षे असताना त्याला दर दिवशी 800 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे तीन कप दुधातून मिळू शकतं. वय 9 ते 18 वर्षे असताना त्याला दरदिवशी 1300 मिलिग्रॅम कॅल्शिअमची गरज असते व हे चार कप दुधातून मिळू शकतं. एवढं दूध एकाच वेळी घेण्याची गरज नाही. तर दिवसभरात तेवढं दूध घेणं आवश्यक आहे. प्रत्येक जण एवढं दूध दिवसभरात घेईलच असं नाही. जेवढं दूध घेणं शक्य आहे, तेवढं त्यानं घ्यावं. उर्वरित कॅल्शिअम मिळवण्यासाठी त्यानं आपल्या आहारात वर उल्लेखलेल्या इतर गोष्टींचा समावेश करावा. त्यामुळेही योग्य तेवढे कॅल्शिअम मिळू शकतील. कॅल्शिअमच्या गोळ्या घेण्याऐवजी अन्नातून ते मिळवण्याकडे कल असला पाहिजे.
प्रामुख्यानं मुडदूस होण्यामागे "ड‘ जीवनसत्त्वाचा अभाव असतो. "ड‘ जीवनसत्त्वाच्या गोळ्या मिळतात. परंतु नैसर्गिक प्रकारात हे जीवनसत्त्व सूर्याच्या किरणांच्या माध्यमातून त्वचेखाली तयार होतं. त्यासाठी दररोज 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसणं जरुरी आहे. मुलांनीच नव्हे तर मोठ्या माणसांनाही उन्हाचा स्पर्श व्हायला हवा. आपण कार्यालयातून वातानुकूलित वातावरणात दहा-बारा तास काम करतो. व्यायामाचा अभाव आहे. उन्हाची झळा लागू नये यासाठी आपण सकाळीच कडेकोट बंदोबस्तात बाहेर पडतो. असे करू नये. दुपारच्या उन्हाचा तडाखा डोक्याला लागू नये हे ठीक आहे, पण सकाळी कोवळे ऊन अंगावर घ्यायला हवे. सूर्यस्नानाची कल्पना यासाठीच आहे. पूर्वजांनी घातलेल्या रीती आपण किती सहजासहजी विसरून गेलो आहोत! "ड‘ जीवनसत्त्व हेच कॅल्शिअम शोषून घेण्यास व हाडांमध्ये स्थिर करण्यास मुख्यत्वेकरून कारणीभूत असते. त्यामुळे "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता होऊ देऊ नये.
जसं वय वाढतं, तशी हाडांची घनता वाढत जाते. सर्वांत जास्त ती 15 ते 18 या वयात होते व नंतर ती हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे जर लहानपणीच चांगला आहार ठेवून हाडं बळकट बनवली तर मोठ्या वयात फ्रॅक्चर व हाडांच्या ठिसूळपणाचं प्रमाण कमी होऊ शकतं.
मुडदूस हे आहारात कॅल्शिअम व "ड‘ जीवनसत्त्व कमी झाल्यास किंवा मूत्रपिंडाच्या विकारानं होऊ शकते. मुडदूसमध्ये गुडघ्याखालील पायाच्या हाडाला बाक येणं, टाळू उशिरा भरणं, मनगटावर सूज येणं असं होऊ शकतं. असं आढळल्यास आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अशावेळी रक्ततपासणी व एक्सरेद्वारे याचं निदान होऊ शकतं व औषधांनी हे पूर्णपणे बरं होऊ शकतं.
जवळजवळ सर्वच मुलांमध्ये एक वर्षापर्यंत व्ही लेग्ज (पायांमध्ये थोडी कमान) असते, जी दीड वर्षापर्यंत नाहीशी होते. दोन ते चार वर्षे वयोगटात नॉक नीज (गुडघे जवळ येऊन पावलांतील अंतर वाढणे) दिसून येतात. चार ते आठ वर्षांपर्यंत नैसर्गिकरीत्या सरळ होऊन जातात. या वयात, कुठल्याही टप्प्यावर जर कॅल्शिअम अथवा "ड‘ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण झाली तर तो बाक तसाच राहतो. हे टाळायचं असेल तर दुधाला पर्याय नाही. म्हणून मुलांना लहान वयातच दूध पिण्याची चांगली सवय लावा. काही वेळा मुलांना दूध आवडत नाही, अशावेळी मिल्कशेक किंवा लस्सी मुलांना आवडत असेल तर द्या. पण आवश्यक तेवढे कॅल्शिअम त्यांना मिळू द्या.
वार्धक्यातील आजार टाळण्यासाठी दिनचर्या आहार-विहार, नियमितपणा फार महत्वाचा आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठे स्वस्थो रक्षार्थमायुष:
ब्रह्म मुहूर्तावर म्हणजे पहाटे उठावे, बाहेर फिरायला जावे. यावेळी वातावरणात प्रदूषण कमी असते व शरीरातील मलमूत्र इ. अधारणीयवेग निर्माण होण्यास त्याचप्रमाणे मन व शरीर उल्हासित, आनंदी रहायला उपयुक्त आहे. कोमट पाणी तोंडावाटे प्यावे. जमल्यास वातप्रकृती व्यक्तीने तुप व कोष्ण जल प्यावे. तसेच कफ प्रकृतीच्या व्यक्तीने फक्त गरम पाणी प्यावे. मध हा गरम पाणी किंवा गरम पदार्थाबरोबर कधी घेऊ नये.
अभ्यंग- संपूर्ण शरीराला स्निग्ध अशा तेलाने मर्दन करणे, म्हणजे मालिश करणे. आयुर्वेदात प्रत्येकाने रोज न चुकता अभ्यंग केलेच पाहिजे, असे आवर्जून सांगितले आहे. क्षणोक्षणी झिजणाऱ्या शरीरयंत्राला तेल दिल्याने त्या शरीरयंत्राच्या सर्व अवयवरूपी लहान मोठ्या भागाची झीज कमी होते. आयुष्यमान वाढते. शरीराला रोज अभ्यंग करणे शक्य नसल्यास डोके, पाय व कान यांनातरी तेल मर्दन करावे. अभ्यंग साधारणपणे संपूर्ण पाच मिनिटे करावे. अभ्यंगासाठी तिळतेल हे सर्व श्रेष्ठ आहे. ते नसल्यास साधे गोडतेल, खोबरेल तेल वापरावे. त्यानंतर उटण्याने स्नान करावे. साबण शक्यतो टाळावा. त्यामुळे होणाऱ्या त्वचारोगाला आळा बसतो. उटणे नसल्यास डाळीचे पीठ व त्रिफळाचूर्ण वापरावे.
छातीत दुखण्याचे जाणवणे विविध प्रकारचे असू शकते. ते तीव्र किंवा सौम्य असू शकते. एखादा चाकू खुपसल्याप्रमाणे अथवा गुद्दा मारल्यानंतर दुखावे असे असते. सतत अथवा ठोके पडल्याप्रमाणे स्पंदनात्मक प्रवृत्तीचे असते, ते एका बोटाने जागा दाखविता येण्याजोग्या जागेत अथवा तळहात ठेवून अंदाजे जागा आखून दाखविता येते.
हृदयविकाराची वेदना केवळ छातीतच मर्यादित असेल असे नसते. हृदयविकारात दुखणे छातीवर, जबड्यावर, मानेत अगर पाठीत, क्वचित वरच्या पोटात दाब आल्यासारखे दुखते. मळमळ होते, उलटी येते, धाप लागते, अंगाला घाम सुटतो व अकस्मात खूप थकवा जाणवतो. अंजायना पेक्टोतरिस या प्रकारात सहसा श्रमामुळे छातीत किंवा उपरोधित इतर ठिकाणी वेदना येते. ही वेदना विश्रांती घेताच शमते. हृदयविकाराचा झटका विश्रांती घेतानाच येतो.
छातीच्या मध्यभागी दुखण्याचे दुसरे नेहमी आढळणारे कारण म्हणजे अन्ननलिकेचा दाह होणे. असा दाह जठरातील आम्लयुक्त पाचकरस अन्ननलिकेत येण्याने होतो. कधी केवळ सौम्य जळजळ जाणवते, तर कधी हृदयविकाराच्या झटक्याकसारखी तीव्र वेदना होते.
मनाचा शरीरावर मोठा परिणाम होतो, हे तर माहीत आहेच. चिंतातूर व्यक्तीला तणाव निर्माण करणाऱ्या प्रसंगाला तोंड देण्याची वेळ आली, की छातीत, सहसा डाव्या बाजूला धारदार शस्त्र खुपसल्यासारखी जोरात वेदना येते.
काही वेळा शारीरिक श्रमानंतर विशेषतः हाताच्या स्नायूंच्या अतिश्रमाने, छातीच्या स्नायूत गोळा आल्याप्रमाणे वेदना येतात. गोळा गेला तरी वेदना रेंगाळते.
छातीचा फासळ्यांचा पिंजरा दर श्वसनाबरोबर कार्यरत असतो. फासळ्यांचे पुढचे टोक कूर्चेला जोडलेले असते. या कूर्चेतील सूजेमुळे छातीत मध्यभागाच्या डाव्या बाजूला दुखते. ही जागा एका बोटाने दाखविता येते व बोटाने दाब दिल्यास वेदना येते. इतर अनेक कारणांनी छातीत दुखू शकते.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- डॉ. ह. वि. सरदेसाई.
बाहुबली…..भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातला एक भवदिव्य चित्रपट म्हणून अजरामर होईल अशी एक कलाकृती.
चित्रपटाविषयी अधिक लिहिणार नाही. कारण तो माझा प्रांत नाही. पण आयुर्वेद हा केवळ माझा व्यवसाय-साधन इतकाच मर्यादित नसल्याने आणि तो नसानसांत भिनलेला असल्याने जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी दिसतो तो आयुर्वेदच. तसाच तो बाहुबली पाहतानाही दिसला. तुमच्या समोर तो मांडण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.
बाहुबली आणि भल्लालदेव (की बल्लाळदेव?) यांच्यातील द्वंद्वयुद्धाचा प्रसंग आठवा. रक्तबंबाळ बाहुबली शिवाच्या पिंडीवरील भस्म उचलतो आणि आपल्या भळभळत्या जखमांवर लावतो आणि अल्पावधीतच रक्त वाहायचे कमी होऊ लागते. हा शिवाचा चमत्कार म्हणायचा, दाक्षिणात्य तडका म्हणायचा की अन्य काही?! हा चमत्कार नाही; रजनीकांत स्टाईल तडकादेखील नाही. हा आयुर्वेद आहे. आश्चर्य वाटलं ना? पण अगदी आयुर्वेदच आहे हा!
सुश्रुतसंहितेत अतिरिक्त रक्तस्राव थांबवण्यासाठी आलेली ही सूत्रे पहा;
चतुर्विधं यदेतद्धि रुधिरस्य निवारणम् |
सन्धानं स्कन्दनं चैव पाचनं दहनं तथा ||
व्रणं कषायः सन्धत्ते रक्तं स्कन्दयते हिमम् |
तथा सम्पाचयेद्भस्म दाहः सङ्कोचयेत् सिराः ||
(सुश्रुतसंहिता सूत्रस्थान १४/ ३९-४०)
चार प्रकारांनी रक्त वाहणे रोखता येते. संधान, स्कंदन, पाचन आणि दहन. यांतील संधान हे तुरट रसाच्या वनस्पतींच्या काढ्याने, स्कंदन हे थंड गुणाच्या गोष्टींचा वापर करून, पाचन हे भस्म वापरून तर दाह हा तापलेली शलाका वापरून केला जातो. यातील दाह हा प्रकार आजही शस्त्रकर्म करताना वापरतात; त्याला cauterisation असं म्हणतात. हा संदर्भ आयुर्वेदाला कालबाह्य समजणाऱ्या लोकांसाठी सहज नमूद करत आहे. आपल्यासाठी इथे महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे भस्म. रक्त थांबवण्यासाठी वापरण्यात येणारे हे भस्म म्हणजे औषध म्हणून वापरले जाणारे धातूंचे भस्म नसून इथे विशेषतः तुरट रसाच्या वनस्पती वा रेशीम, कापूस इत्यादी जाळून तयार केलेले भस्म अपेक्षित आहे. पूर्वी यज्ञ, होम हवन होत असत. त्यात वापरल्या जाणाऱ्या समिधा बहुतांशी औषधी वनस्पतींच्या असत. या भस्माचा उपयोग संध्यावंदनाच्या वेळी केला जात असे. आपल्याकडे भस्मस्नान हा एक स्नानप्रकारदेखील सांगितला आहे. सुश्रुत संहितेत वर्णन करण्यात आल्याप्रमाणे या भस्माचा वापर करून रक्तस्राव खरोखरच थांबवता येतो हे आम्ही आयुर्वेद शिकताना प्रत्यक्ष करूनदेखील पाहिले आहे. (कृपया आयुर्वेद वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा प्रयोग कोणीही स्वतः करायला जाऊ नये. वैद्यांची देखरेख अत्यावश्यक आहे.) बाहुबलीच्या या एका दृश्यात हा आयुर्वेद अंश सामावला आहे. अन्य काही ठिकाणी नाडी परीक्षणाचे एक दृश्यही आहे. मात्र त्यात दाखवलेला वैद्य अभिनेता चुकीच्या बाजूला नाडी पाहतो आहे; काही चित्रपट वा मालिकांत डॉक्टरची भूमिका करणारे अभिनेते स्टेथोस्कोप उलटा लावत असतात; अगदी तीच गत इथे नाडी परिक्षणाची झाली आहे.
विषयाच्या अनुषंगानेच हेही आवर्जून नमूद करावेसे वाटते की; तलवार, भाला, गदा, मुद्गर, शक्ति आदि एक से बढकर एक घातक आयुधे वापरून ज्या काळात युद्ध होत असे त्यावेळी जखमींना केवळ मलमपट्टी करण्यास नव्हे तर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यासही आयुर्वेदच होता. असे खंडीभर संदर्भ सुश्रुतसंहितेत मिळतील. जिथे ब्रिटिशांनी आमच्याकडच्या विणकारांचीदेखील बोटे छाटली तिथे शस्त्रकर्म आणि मर्मविद्या जाणणाऱ्या व्यक्तींची या परकीय आक्रमकांसमोर काय कथा? यामुळेच एकेकाळी प्रगत असलेल्या आयुर्वेदीय शल्यतंत्राचा आज थेट प्रत्यक्ष वापर फारसा दिसत नाही. कदाचित बाहुबलीच्या आगामी भागात शल्यतंत्रातील एखादा संदर्भ मोठ्या पडद्यावर पहायलादेखील मिळेल. तूर्त बाहुबली-२ पाहताना वर नमूद केलेले दृश्य पाहताना आयुर्वेदाला नक्की आठवा!
जय माहिष्मती!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
यज्ञ- खूप खूप खूप महत्वाचा लेख आहे हा. अवश्य वाचा. संग्रहातठेवा आणि शेअर सुद्धा करा. आणि हो ..... डॉ. प्रमोद मोघे यांचे नाव न काढता शेअर करा .........
यज्ञ हा संस्कार वेदकाळापासून भारतात अस्तित्वात आहे. उष्णता व ध्वनी ही उर्जेची अंगे मानली जातात. ह्या उष्णता व ध्वनीच्या उर्जेचा उपयोग यज्ञाच्या अनेक प्रकारातून सामान्यांच्या जीवनासाठी, आरोग्यासाठी व्हावा ह्यासाठी यज्ञ ही संकल्पना भारतीय संस्कृतीत चपखलपणे बसवण्यात आल्याचे आधुनिक विज्ञानाला आढळून आले आहे. सर्वसामान्य जनतेने ते अंगिकारले म्हणून यज्ञ हा ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी करावा लागतो. त्यासाठी ईश्वराची मंत्राद्वारे स्तुती करावी लागते, निसर्गाने जे जे उपयुक्त आपल्याला दिले ते अग्नीद्वारे ईश्वराला अर्पण करणे इ. गोष्टी प्राचीन परंपरेत आपल्याला सांगितल्या आहेत. आपला जन्म ते मृत्यु ह्या प्रवासात्त त्या समाविष्ट केलेल्या आहेत व त्याकरता अनेक उपक्रम पण शोधले गेले आहेत. उदा. जन्मानंतर नक्षत्रशांत वा आयुष्यहोम हा यज्ञ वा होम मुलाच्या जन्मापासून ते पुढील आयुष्यप्रवास निरोगी व्हावा ह्याकरता करण्यास सांगितलेला आहे. त्यानंतर धन्वंतरी होम, मृत्युंजय होम हे ही चांगल्या प्रकृतीसाठी, दीर्घायुष्यासाठी करतात. मग मुंजीत, लग्नात, मुलीसाठी लज्जाहोम, घरासाठी वास्तूशांत इ. करण्यास सांगितले आहेत.
पण हे झाले छोटे यज्ञ.समाजकल्याण, पर्यावरण, आरोग्य ह्यासाठी शतचंडी, महाचंडी, रुद्रयाग, पर्यावरणासाठी सोमयाग, पर्जन्ययाग ह्यासाठी प्रसंगारूप मोठे यज्ञ केले जातात. छोट्या यज्ञात होमकुंड पात्राचा उपयोग अग्नी प्रज्वलनासाठी केला जातो तर मोठ्या यज्ञात विटांचे अग्निकुंड बऱ्याच भूमिती आकृतीत वापरले जाते. पूर्वी विशिष्ट लाकडांचे घर्षण करून अग्नीप्रज्वलित करत असत. त्या अग्नीत औषधी तत्त्वे असलेल्या अनेक गोष्टींची आहुती म्हणजे गायीचे तूप, सालीच्या लाह्या, तांबडे तीळ, तांदूळ, समिधा म्हणून आंबा, वड, पिंपळ, औदुंबर, मंदार, देवदार इ. वृक्षांच्या खाली पडलेल्या कांड्या, दुर्वा हवन म्हणून अग्नीत अर्पण करत. ह्या आहुत्या देताना मंत्रोपचार विशिष्ट स्वरात म्हणतच त्याचे हवन केले जाते. यज्ञ लहान असल्यास 3 ते 4 तासाचा अवधी व मोठा यज्ञपूर्ण करण्यास 3 ते 7 दिवस अवधी लागतो.आताच्या आधुनिक वैज्ञानिक दृष्टीने जगणार्या जगात ह्यापैकी आपल्याला सहज जमणारा असा कोणता यज्ञ विधी आहे याचा आम्ही शोध घेतला असता 'अग्निहोत्र'ह्या यज्ञविधीने आमचे लक्ष्य वेधले. सर्व यज्ञात जागा, मनुष्यबळ, वेळकाळ, भरपूर यज्ञसामुग्री त्यामुळे खर्च, लागणारा पैसा इ. गोष्टी भरपूर प्रमाणात लागतात. ह्या सर्व यज्ञात मनःशांती, आरोग्य, पर्यावरण रक्षण होते. सामान्यातल्या सामान्य माणसाला तेच सर्व उद्देश "अग्निहोत्र'ने सुद्धा लाभू शकतात हेही आमच्या ध्यानात आल्यावर वैज्ञानिक दृष्टीने त्याची उपयुक्तता सिध्द करण्याचे काम आम्ही गेले 5-6 वर्षे करत आहोत. त्याचे सर्व फायदे पूर्ण वैज्ञानिक छाननी करून आधुनिक वैज्ञानिक कसोट्यांवर पूर्ण यशस्वी करून वैज्ञानिक जगतासमोर यशस्वीपणे मांडण्यात यशस्वी झालो. ती माहिती सर्व सामान्यापर्यंत देण्यासाठी हा लेखनप्रपंच ह्या लेखाद्वारे मी करत आहे.
"अग्निहोत्र' हा रोज केला जाणारा वैदिक संस्कृतीतला एक विधी आहे. अग्निहोत्र इतर यज्ञांच्या तुलनेत अतिशय सोपा यज्ञ आहे जो सामान्यातल्या सामान्य माणूस सहज करू शकतो. त्याला कोणतीही अट नाही. अग्निहोत्र हा विधी घरी, दारी, शेतावर, कार्यालयात अगदी 10 मिनिटात करता येतो.ह्या यज्ञाला जास्तीत जास्त रु. 3/- ते रु. 5/- इतका खर्च येतो.अग्निहोत्रासाठी सुर्योदय व सूर्यास्त ह्या दोन्ही वेळाउपयुक्त आहेत. शक्यतो त्या काटेकोर पाळल्यास त्याचे फायदे प्रचंड आहेत.अग्निहोत्रासाठी खालील गोष्टी लागतात.१. तांब्याचे पिरॅमिड पद्धतीचे हवन पात्र२. गाईच्या दुधाचे शुद्ध तूप २-३ चमचे३. गाईच्या शेणाच्या गोवर्या ४-५ तुकडे४. हातसडीचे अख्खे तांदूळ दाणे ४-५ ग्रॅमसूर्योदयाचेवेळी ह्या तांब्याच्या पात्रात गाईच्या गोवऱ्यांवर थोडे तूप लावून त्या पेटवून त्यामध्ये गाईच्या तुपात भिजवलेले तांदूळ दाणे खालील मंत्र म्हणत हवन म्हणून अर्पावे लागतात. सूर्याय स्वाहाः | सूर्याय इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम् न मम || सूर्यास्तावेळी अग्निहोत्र करावयाचे असल्यास खालील मंत्र म्हणावे लागतात. अग्नये स्वाहाः | अग्नये इदम्नमम || प्रजापतये स्वाहाः | प्रजापतये इदम्नमम || हे सर्व अर्पण केल्यावर पाच मिनिटे शांतपणे अग्नीसमोर बसणे.अग्निहोत्राचे परिणाम पाहण्यासाठी मुद्दाम आम्ही पर्यावरणग्रस्त भाग निवडला जेथे हवेचे प्रदूषण प्रचंड प्रमाणावर आढळते. तो भाग म्हणजे पुण्यातील रमणबाग हायस्कूल, शनिवार पेठ. अग्निहोत्राचे परिणाम जाणून घेण्यासाठी परिसरातील हवेच्या विश्लेषणाचे पूर्वमापन करण्यात आले.
अग्निहोत्र प्रयोगाची खालील उदिष्ट्ये ठरवण्यात आली...१. अग्निहोत्रामुळे होणारे आकाश व उष्णता उर्जेतील बदल२. अग्निहोत्र धुराचा सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर परिणाम३. अग्निहोत्र धुराचा पर्यावरणातील हवेतील प्रदूषणावर होणारा परिणाम४. अग्निहोत्र धूर व राखेचा रोपांच्या/ बी, बियाण वाढीवर होणारा परिणाम५. अग्निहोत्र राखेचे औषधी गुणधर्म६. अग्निहोत्र राखेने पाणी शुद्धीकरण.हे प्रयोग शाळेतील वर्गात करण्यात आले ज्यामध्ये शाळेतील मुलांनी, शिक्षकांनी, शाळेच्या मुख्याध्यापकांनी मनापासून भाग घेऊन उत्तम साथ दिली.माझ्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाकरता फग्युर्सन महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान प्राचार्यांची, तेथील विद्यार्थ्यांची, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्रयोगशाळा व प्राध्यापकांची मदत घेण्यात आली व त्यासाठी प्रज्ञा विकास मंचाच्या 'फ्रॉस्ट' ह्या संस्थेने पुढाकार घेऊन आर्थिक सहाय्य केले. सर्व आधुनिक विज्ञान यंत्राद्वारे अग्निहोत्राचे खालील फायदे जगासमोर मांडण्यात आम्ही यशस्वी ठरलो. अग्निहोत्राने प्रकाश उर्जेतील बदल हा लक्स मीटरच्या साह्याने मोजण्यात आला. अग्निहोत्राच्या धुराचे सभोवतालच्या सूक्ष्मजंतूंवर होणारे परिणाम अभ्यासण्यासाठी यज्ञाच्या आधीच्या व नंतरच्या जंतूची संख्या मोजण्यात आली त्यामुळे जवळजवळ 90% सूक्ष्मजंतूची वाढ अग्निहोत्राने थांबत असल्याचे सिद्ध झाले.प्रयोगासाठी निवडण्यात आलेली जागा रहदारीच्या गजबजलेल्या ठिकाणी असल्याने तेथे हवेचे प्रदूषण प्रचंड असल्याचे आढळले. पण अग्निहोत्र केल्यावर हवेतील घातक सल्फर डाय-ऑक्साईडचे प्रमाण दहा पटीने कमी झाल्याचे आढळून आले. त्यावरून प्रदूषण रोखण्यास अग्निहोत्र मदत करत असल्याचे सिद्ध झाले.रोपांच्या वाढीवर अग्निहोत्राचे परिणाम तपासण्यासाठी मोड आलेल्या बिया अग्निहोत्र खोलीत व शाळेच्या बाहेर परिसरात ठेवण्यात आल्या. इतर परिसरातील बियांपेक्षा अग्निहोत्र वातावरण राख लावून ठेवलेल्या बिया रोपांची वाढ अग्निहोत्र वातावरणात जोमाने व मोठ्या प्रमाणात होते हे आढळून आले. ह्यामुळे शेतीला अग्निहोत्र विधी अत्यंत उपयुक्त आहे हेही सिद्ध झाले.अग्निहोत्राची राख जंतुनाशक असल्याचे आढळून आल्यामुळे जखमा, त्वचारोग ह्यावर ती अत्यंत उपयुक्त ठरते हे ही प्रयोगानिशी सिद्ध झाले. अग्निहोत्र राखेमुळे अशुद्ध पिण्याच्या पाण्यातील जंतू व क्षाराचे प्रमाण ८०% ते ९०% पेक्षा कमी झाल्याचे सर्वसामान्यपणे आढळून आल्यावर अग्निहोत्राचा पाणी शुद्धीकरणासाठीही उपयोग होतो हे सिद्ध झाले.अवघ्या रु. ३/- ते ५/- खर्चात रोज फक्त १० मिनिटे सकाळी वा संध्याकाळी हा अग्निहोत्र विधी करून आपण वरील सर्व फायदे मिळवू शकतो. प्रत्येक घर प्रदूषणविरहीत, जंतू विरहीत करू शकतो, शेतीकरता त्या राखेचाही उपयोग करू शकतो- हे आम्ही जगासमोर सप्रमाण, निष्कर्ष काढून, जागतिक वैज्ञानिक मासिकात प्रसिद्ध करू शकलो व जगात आपल्या पूर्वपारंपारिक विज्ञानाला मानाचे स्थान देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.ह्यापूर्वी मी पाणी शुद्धीकरणावर वेदात वर्णन केलेल्या १५ वनस्पतींचा उपयोग करून पाणी अगदी "मिनरल वॉटर" इतकं शुद्ध करून त्याची जागतिक पेटंटस मिळवली आहेतच पण त्याकरता सर्वानीच आपल्या ज्ञानावर बौद्धिक गुलामगिरी नबाळगता विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
ह्या अभ्यासा दरम्यान जर्मनी, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इंग्लंड, फ्रांस, पोलंड, झेकस्कलोकोव्हीया, जपान, सिंगापूर, पेरू, स्विझर्लंड, स्पेन, कॅनडा इ. ७० देशांनी अग्निहोत्र ह्या भारतीय संकल्पनेचा स्वीकार केला असून त्यांनी विविध विज्ञान मासिकात त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करणे चालू केले आहे. त्यांनी ह्यावरील शेतीला Home Farming Technique असे नावही दिले आहे.दुर्दैवाने भारतीय प्राचीन विज्ञानातील अणुशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, आरोग्यशास्त्र, विमानशास्त्र, धातूशास्त्र, बांधकाम, शिल्पशास्त्र याचा पुरेपूर उपयोग वर विदीत केलेल्या देशांतील शास्त्रज्ञांनी करून घेऊन त्याचीच जागतिक पेटंटस् नोंदवलेली आपला झोपी गेलेल्या, गुलामगिरी मानसिकतेच्या शास्त्रज्ञांना आढळू लागली आहेत.परवाच महालक्ष्मी मूर्तीवरती मूर्ती संवर्धनासाठी कोल्हापूरी लेप चढवण्यात आला. तो लेप आपल्या पूर्वजांनी 'वज्रलेप' म्हणून २००० वर्षापूर्वी तयार केला होता- तोच आपल्या शास्त्रज्ञांनी वापरला आहे. नुकतेच ह्याच महिन्यात इंग्लंडस्थित 'पॅनगयिया' ह्या कंपनीने आपल्या पारंपारिक विज्ञानावरून केस गळतीवरचे औषध निर्माण करून त्याचे जागतिक पेटंट मिळवण्याचा प्रयत्न केला, त्या करताआपल्या देशाला आंतरराष्ट्रीय कोर्टात दाद मिळवून ते रद्द करण्याचा उपद्व्याप करावा लागला.आपल्याच वैभवशाही प्राचीन विज्ञानावर आपल्या शास्त्रज्ञांचा विश्वास नसल्याने तेच ज्ञान गोर्या लेखणीतून बाहेर पडल्यावर धन्य धन्य म्हणणारे मग स्वीकारणारे असे शास्त्रज्ञ पाहिल्यावर हाती असलेल्या सोन्याची किंमतच न कळल्याने आपण 'कथिलाचा वाळा' हाती बाळगून आहोत असे खेदाने म्हणावे लागते.
लेखक - डॉ. प्रमोद प्र. मोघे (निवृत्त ज्येष्ठ शास्त्रज्ञ, NCL)
हायड्रेटिंग फेस पॅक
उन्हाच्या वातावरणात आपली त्वचा नेहमीपेक्षा जास्त तेलकट होते. अशा वेळेस चेह-यावर तजेलदारपणा आणायचा असेल तर आंब्याचा रस घेऊन त्यात मुलतानी माती टाकावी. आंब्याचा रस व मुलतानी माती यांचे उत्तम मिश्रण करून चेह-यावर लावावं. हे मिश्रण चेह-यावर पंधरा मिनिटं ठेवावं. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावं. चेह-यावर तेज येऊन त्वचा सुंदर दिसते.
संवेदनशील त्वचेसाठी
काही तरुणींची त्वचा अत्यंत संवेदनशील असते, त्यामुळे बाहेरील उन्हाचा, हवेचा व वातावरणाचा त्यांच्या चेह-यावर लगेच फरक जाणवतो. अशा वेळेस आमरसमध्ये तीन चमचे मुलतानी माती घेऊन त्यात २ चमचे पाणी आणि १ चमचा दही टाकून मिश्रण तयार करावे. ही पेस्ट तयार करून चेह-यावर व मानेवर हलक्या हाताने लावावी. हा फेस पॅक चेह-यावर जवळपास तीस मिनिटे ठेवावा. अध्र्या तासानंतर चेहरा सुकल्यावर थंड पाण्याने धुवून टाकावा.
ताजे मँगो फिल्टर
संपूर्ण दिवसभर काम केल्यावर शरीरासोबतच आपला चेहराही थकतो. त्यामुळे चेह-यावर आलेला थकवा घालवण्यासाठी व अकालीन आलेलं वृद्धत्व दूर करण्यासाठी ताज्या मँगो फिल्टरचा वापर करावा. ७-८ अक्रोड किसून त्यात ओटचे जाडे भरडे पीठ २-३ चमचे टाकावे, ३ चमचे मुलतानी माती आणि त्यामध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळावे. या सगळ्यांचे योग्य मिश्रण करावे.
तयार झालेले मिश्रण चेह-यावर व मानेवर लावून जवळपास तीन तास तरी सुकवावे. चेहरा पूर्णपणे सुकल्यावर थंड पाण्याने धुवून घ्यावा. जेणेकरून चेह-यावरचा ताण कमी होऊन चेहरा त्राणविरहीत दिसू लागतो. हा उपाय सर्व प्रकारच्या चेह-यासाठी उपयुक्त असून रोज वापर केल्यास चेहरा जास्त खुलून येतो.
मँगो बॉडी स्क्रब
चेह-यासोबतच बाहेरील वातावरणामुळे शरीरावरही परिणाम होतो. आपली त्वचा कोरडी होते तसंच त्वचेतील पेशी मृत पावतात. अशा वेळेस एका भांडयात २ चमचे आंब्याचा रस घ्यावा, त्यात २ चमचे दूध आणि एक चमचा साखर घालून मिश्रण तयार करावं. मिश्रण तयार झाल्यावर ते मिश्रण चेह-यावर व शरीरावर लावून घ्यावं. २० ते २५ मिनिटं शरीरावर मसाज करून कोमट पाण्याने धुवून टाका. साखरेमुळे शरीरावरील मृत पेशी नष्ट होण्यास मदत होते. मृत पेशी नष्ट झाल्यामुळे शरीर व चेहरा टवटवीत दिसतो.
डागविरहीत त्वचेसाठी
आंब्याच्या रसामध्ये हरभ-याचे कूट टाकून त्यात एक चमचा मधाचा टाकावा. हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. चेह-यावर आणि विशेषत: डाग असलेल्या भागावर हे मिश्रण लावावं. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्यावा. हा उपाय रोज केल्यास चेह-यावरील डाग कमी होण्यास मदत होते. चेहरा स्वच्छ होऊन डागविरहीत होतो.
मँगो फेशिअल
चेह-यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी व चेह-याला तेज आणण्यासाठी मँगो फेशिअल नावाचा प्रकार सध्या पार्लरमध्ये प्रचलित आहे. या फेशिअलमध्ये आंब्याच्या रसामध्ये अंडयातील आतील पिवळा द्रवपदार्थ मिसळावा आणि त्यामध्ये मधाचे काही थेंब टाकावेय.
१५ मिनिटांनंतर थंड पाणी व फेस वॉशने चेहरा धुवून घ्यावा. फेस वॉशने चेह-यावर अंडयामुळे आलेली दरुगधी कमी करता येते. साधारण तरुणी महिन्यातून एकदा तरी फेशिअल करतात. त्यामुळे चेह-यावरील सुरकुत्या कमी होतात. मँगो फेशिअलमुळे चेहरा निखळ व तेजस्वी दिसतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
२-३ पिवळा सोनचाफ्याच्या फुलाच्या पाकळ्या काळपट होई पर्यंत अर्धी वाटी तीळाच्या तेलामध्ये तळाव्यात. तेल गार झाल्यावर गाळुन घ्यायचे आहे.
हे सोनचाफ्याचे तेल दररोज गुडघ्यामध्ये लावुन जिरवावे. ह्यामुळे गुडघ्याच्या वेदना कमी होतात.
सप्तरंगी स्वस्तिक थेरपी
लाल स्वस्तिक गुडघ्याला व पिवळे स्वस्तिक माकडहाडाला रात्रभर बांधुन ठेवायचे आहे. दिवसा निकँपमध्ये लाल स्वस्तिक ठेवले तरी चालते.
सूर्य किरण चिकीत्सा
पांढ-या लहान बाटलीला लाल रंगाचा चौपदरी जिलेटीन पेपर सर्व बाजूंनी गुंडाळून त्यामध्ये २०० ग्रँम तीळाचे तेल घ्यावे. ही बाटली सकाळी ९ ते दुपारी ४पर्यंत सुर्यप्रकाशात ठेवावी. ही बाटली सलग १५ दिवस सुर्यप्रकाशात चार्ज करावी. नंतर ते तेल गुडघ्यांना जिरवावे.
--- अरविंद जोशी, BSc.
मोबा. नं. 9421948894
Copyright © 2025 | Marathisrushti