वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
योगा व प्राणायाम न करण्यासाठी दिली जाणारी कारणं.......
1) जॉब हेक्टिक आहे
( कुणाचा नसतो ?)
2) वेळच मिळत नाही
( सर्वांनाच 24 तास मिळतात !)
3) खूप काम असते
( रिकामटेकडा कोण असतो ?)
4) अभ्यास खूप असतो कॉलेजात
( काय दिवे लावणार आहात ?)
5) घरी जाऊन पण काम असते
( आम्ही पण कामं करतो !)
6) लग्न झालं आता
( मग काय नाचू ? सर्वांचीच होतात !)
7) मुलांच्या मागे धावण्यात वेळ जातो
( तेवढा योगा - प्राणायाम, व्यायाम पुरेसा वाटतो का ?)
8) आता कोण बघतंय आमच्याकडे ?
( मग घराबाहेर पडूच नका !)
9) मला गरजच नाही योगा-प्रणायाम, व्यायामाची
( सर्वात मोठा गैरसमज ...)
10) हे जिम , व्यायाम योगा-प्रणायाम मोठ्या लोकांची थेरं आहेत
( स्वतःला कमी समजायचंच कशाला ?)
11) योगा प्राणायाम क्लास ची फी परवडत नाही
( घरी करायला किती पैसे लागतात ?)
12) खूप ठरवतो , पण काही ना काही आडवं येतं
( अर्धा एक तास काढता येत नाही स्वतःसाठी ?)
13) घरी आल्यावर आराम करायचा की योगा-प्रणायाम करत बसायचं ?
( एक सिरीयल कमी पाहिलीत तर लगेच जीव जाईल का ?)
हुश्श !!!
यापेक्षा मोठी लिस्ट होईल.
मित्रांनो , कारणं खूप देता येतील. पण आज स्वतःमध्ये गुंतवणूक कराल तर पुढचं आयुष्य निरोगी जगाल. नंतर हा पैसा , मालमत्ता , हुशारी , कशाचाच उपयोग होणार नाहीय. तंदुरुस्त शरीर हीच सर्वात मोठि मालमत्ता आहे तेव्हा आतापासूनच स्वतःची काळजी घ्या.
उन्हाळा सुरु होत आहे, थंडगार आईस्क्रिम खाण्याची मजा काही औरच आहे! गार गार मस्तच! हे आईस्क्रीम युरोप मधून भारतात आले. युरोपमध्ये बाहेर बर्फ पडते आणि हे लोक आईस्क्रीम खातात. ह्याचे कारण आईस्क्रीम हे स्पर्शाने थंड असले तरी गुणांनी उष्ण आहे. त्यामुळे ते उष्णता निर्माण करते व थंडीचा त्रास होत नाही.
आपण उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले की आपल्याला खोकला, घश्याला त्रास, जुलाब होतात. आपण थंडीत आईस्क्रीम खाल्ले तर त्रास होत नाही असा माझा ३० वर्षाचा अनुभव आहे. आम्ही थंडी मध्ये भरपूर आईस्क्रीम खातो. थंडीत दुकानात आईस्क्रीम पटकन मिळत नाही म्हणून मी बासुंदी फ्रिजर मध्ये ठेऊन कुल्फी करून खातो.
ह्या उन्हाळ्यात आईस्क्रीम खाऊच नका असे नाही पण एक पथ्य पाळा. जेवण झाले की लगेच (एक तासाचे आत) खा. म्हणजे त्याची उष्णता अन्न पचायला उपयोगी पडते व बाधत नाही.
अरविंद जोशी
९४२१९४८८९४
रोज वापरले जाणारे खाद्यपदार्थांतील भेसळ ओळखण्यासाठी काही खास टिप्स…
• दुध
दुधातील भेसळीच्या अनेक घटना ठिकठिकाणी घडत असतात. दुधात डिटर्जंट मिसळलं जातं किंवा दुधाच्या नावावर काही जण सिंथेटिक मिल्कही विकतात. ही भेसळ जीवावरही बेतू शकते. म्हणूनच ती ओळखणं अत्यंत गरजेचं आहे. १० मिली. दूध तितक्याच पाण्यात एकत्र करा. त्यात फेस झाल्यास ती डिटर्जेंटची भेसळ आहे. तर, सिंथेटिक दूध चवीला वाईट असतं आणि ते उकळवताना त्याला फिक्कट पिवळा रंग येतो.
• लाल तिखट
रोज भाजी-आमटीला फोडणी देताना वापरल्या जाणाऱ्या लाल तिखटात विटेचा चुरा किंवा मीठ मिसळलं जातं. ही भेसळ ओळखणं अगदीच सोपं आहे. एक चमचाभर लाल तिखट ग्लासभर पाण्यात एकत्र करा. हे पाणी जर रंगीत झालं तर त्यात भेसळ आहे, असं समजा.
• पनीर
पनीरची भाजी आपण अगदी चवीनं, बोटं चाटून-पुसून खातो. पण या पनीरमध्ये स्टार्च मिसळून डेअरीवाले आपल्याला उल्लू बनवू शकतात. अशावेळी, पनीर घरी आणल्यानंतर ते थोड्याशा पाण्यात घालून उकळावं आणि थंड झाल्यावर त्यावर आयोडीन सोल्युशनचे काही थेंब टाकून त्याचा रंग तपासावा. पनीर जर निळं झालं, तर ते टाकून द्यावं किंवा दुकानात नेऊन ‘साभार’ परत करावं.
• मध
आपल्याकडचा मध शुद्ध आहे की नाही, हे तपासून पाहायचं असेल, तर कापसाची वात त्यात भिजवून पेटवून पाहावी. ती जर तेवत राहिली तर मध शुद्ध आहे. भेसळयुक्त मधात भिजवलेली वात सहजासहजी जळत नाही. ती तडतडते.
• खोबरेल तेल
खोबरेल तेलात बऱ्याचदा इतर तेलं मिसळून ग्राहकांची फसवणूक केली जाते. ही भेसळ ओळखण्यासाठी खोबरेल तेलाची छोटी डबी फ्रीजमध्ये ठेवावी. जे गोठेल ते खोबऱ्याचं तेल आणि बाकीची भेसळ.
• धने पावडर
आपल्या जेवणाला चव यावी आणि पोटदुखी वगैरे होऊ नये, म्हणून आपण धने पावडर आवर्जून वापरतो. पण त्यात लाकडाचा भुसा असेल तर? घाबरू नका. थोड्याशा पाण्यात धने पावडर शिंपडा. भुसा असेल तर तो पाण्यावर तरंगेल आणि आपल्या शंकेचं निरसन होईल.
• जिरं
जिऱ्यातील भेसळ ओळखायची असेल, तर थोडंसं जिरं तळहातावर घेऊन ते चोळावं. जर जिरं काळ पडलं तर ते भेसळीचे चिन्ह आहे.
• काळी मिरी
भेसळयुक्त काळी मिरी खूप चमकते आणि त्याला हलकासा रॉकेलसारखा वास येतो.
• सफरचंद
‘अॅन अॅपल ए डे, किप्स डॉक्टर अवे’, हे जरी खरं असलं तरी आपण जे चकचकीत सफरचंद खातोय त्याला मेणाने पॉलिश तर केलेलं नाही ना, हे पाहणं आजकाल अत्यावश्यक झालंय. त्यासाठी इतकंच करा की, ब्लेड किंवा पातळ सुरी हलकेच फळाच्या सालावरून फिरवा. पांढऱ्या रंगाचा काही पदार्थ ब्लेड-सुरीला चिकटला तर ते मेण असेल. असं सफरचंद सालं काढून खा किंवा फळवाल्याला परत करून टाका.
• हळद
आपलं रोजचं जेवण हळदीशिवाय होऊच शकत नाही. पण या हळदीत जर मेटानिल येलो हा घटक असेल तर तो कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतो. म्हणूनच हळद तपासून घेतलेली बरी. हळद पावडरमध्ये पाच थेंब हायड्रोक्लोरिक अॅसिड आणि पाच थेंब पाणी घालावं. त्याला जर वांग्याचा रंग आला, तर ही हळद कॅन्सरला आमंत्रण देऊ शकते.
• हळकुंड
काही जण हळकुंड आणून, ती कुटून घरीच हळद पावडर तयार करतात. अशावेळी, हळकुंड पॉलिश केलेली नाहीत ना, हे तपासणंही सोपं आहे. एका कागदावर हळकुंड ठेवून त्यावर थंड पाणी ओतावं. हळकुंडाचा रंग गेल्यास ते पॉलिश केलेलं आहे, हे सहज कळू शकेल.
• दालचिनी
दालचिनी असली की नकली हे ओळखणंही कठीण नाही. दालचिनी हातावर रगडल्यानंतर जर तुमच्या हाताला रंग लागला, तर ती अस्सल दालचिनी समजावी.
• फ्रोजन मटार
सध्या फ्रोजन मटारची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. ते स्वस्तही पडतात आणि टिकतातही खूप. पण त्यात मेलाकाइट ग्रीन या घटकाचा समावेश असल्यासं पोटाशी संबंधित काही विकार होऊ शकतो. म्हणून आपण खरेदी केलेल्या मटाराचे थोडे दाणे थोड्याशा पाण्यात घालून ते ढवळावे. साधारण अर्ध्या तासानंतर त्याचा रंग पाहावा. पाणी रंगीत झालं, तर हे मटार न खाणंच श्रेयस्कर.
• चहा पावडर
चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर बेमालूमपणे मिसळली जाते किंवा अन्यही भेसळ होते. चहापत्ती थंड पाण्यात घातल्यानंतर रंग सोडत असेल तर त्यात भेसळ आहे, हे निश्चित!
सर्व सहा रसांनीयुक्त ( मधुर, आंबट, खारट, तुरट, तिखट, कडू) असा आहार असावा, परंतू त्यासाठी जठराग्नि चांगला प्रदिप्त असावा. म्हणजे पचन सुलभ होते. यातही म्हातारपणी अडथळे येतात. उदा. दातांचा अभाव, आर्थिक अडचणीमुळे आहार हा सर्व गुणसंपन्न मिळू शकत नाही.
तसेच स्त्रियांना काटकसरी धोरणामुळे शिळे अन्न खाण्याची सवय असते.
म्हातारपणी काय करायचे जिभेचे चोचले, वगैरे विचारधारणेमुळे शरीराकडून आपोआप व्यक्त होणाऱ्या इच्छा दडपल्या जातात.
तसेच म्हातारपणी एकभूक्त म्हणजे एकदाच जेवून राहावे इ. दृढसमज असतात, त्यासाठी आयुर्वेद सांगतो निसर्गाला शरण जा.
जेव्हा भूक लागेल तेव्हाच खा, भूक नसेल तर पाणीसुध्दा पिवू नका.
उच्च रक्तदाब असलल्या मंडळींसाठी काही सूचना
अति सर्वत्र वर्ज्ययेत्।' अशी एक म्हण आहे. एखादी गोष्ट कितीही चांगली असली तरी तिचा अतिरेक वाईटच. याचे उत्तम उदाहरण म्हणजे व्हेगन डायट. १९४४ साली इंग्लंडमध्ये व्हेगन ही संकल्पना जन्माला आली. याचे प्रणेते डोनाल्ड वॉटसन यांच्यावर गांधींच्या अहिंसावादी तत्वज्ञानाचा प्रभाव होता. १९२० साली गांधींनी नैतिकतेच्या बळावर शाकाहाराचा पुरस्कार करायला हवा असे भाषण इंग्लंड येथील 'व्हेजिटेरियन सोसायटी'समोर दिल्यावर वॉटसन फारच प्रभावित झाले आणि शाकाहाराचा हा अतिरेक जन्माला आला. व्हेगन डायट म्हणजे प्राणिज अन्नपदार्थांचा संपूर्ण त्याग. ही आहारशैली पाळणारे लोक दूध, तूप, मध हे पदार्थदेखील खाण्यास वर्ज्य मानतात. हे पदार्थ मिळवताना हिंसा होते असा त्यांचा सिद्धांत.
यामुळे स्वाभाविकपणे वरील पदार्थांचे पर्याय शोधणे क्रमप्राप्त होते. मग दुधाला पर्याय म्हणून सोया, हेम्प, कोकोनट आणि अल्मन्ड मिल्क सुरु झाले तर लोण्याचा पर्याय (तूप ही संकल्पनाच माहिती नसल्याने) म्हणून व्हेगन मेयोनीज आले. चीझ वा पनीरच्या जागी टोफू आणि पोषक आहार म्हणून फळांचे रस पिणे सुरु झाले. आज या आहाराचा इतका बोलबाला आहे की जगातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर त्याची भलामण करताना दिसतात. जागोजागी व्हेगन सोसायटी जन्माला आल्या आहेत. हे लोक केवळ आपल्या आहारापुरते एकत्र आलेले नसून दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या शाकाहारी लोकांवर यथेच्छ घणाघात करत असतात. मांसाहाराबद्दल तर बघायलाच नको!!
नाण्याची दुसरी बाजू.
दूध आणि तूप हे शरीराला पोषण देणारे सर्वोत्तम पदार्थ आहेत असं आयुर्वेद सांगतो. 'घृतं वै आयु:।' अशी श्रुती आहे. आमच्याकडे पूजेचा प्रसाद पंचामृत तीर्थाशिवाय पूर्ण होत नाही याचे हेच कारण आहे. इथे भगवंतांची पूजादेखील 'गोपाल' या नावाने केली जाते. गोशाळांच्या माध्यमातून दूग्ध संकलन केले जात असताना वासरांवर कोणताही अन्याय अत्याचार होत नसून उलट त्यांचा पोटच्या पोराप्रमाणे सांभाळ केला जातो हे तथ्य आहे. मधवरील आक्षेप अंशतः मान्य. म्हणूनच तो केवळ आपद्धर्म म्हणून 'औषधापुरता' वापरावा हा पर्याय असू शकतो.
आहारातून दूध तुपासारख्या शुक्रधातू आणि ओज वाढवणाऱ्या पदार्थाना दूर सारून जे व्हेगन पर्याय वापरले जातात ते प्रामुख्याने कडधान्यांपासून बनलेले असतात. कडधान्ये ही फोडणीशिवाय सतत वापरल्यास शुक्रधातू आणि ओज या दोहोंना घटवतात. यांच्यावरच आपले आरोग्य आणि आयुर्मान अवलंबून आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. याशिवाय व्हेगन आहारातून ज्या पोषणमूल्यांची पूर्तता होत नाही त्यांची पूर्तता करण्यासाठी 'सप्लिमेंट्स'चा सोप्पा मार्ग निवडून आत्मघात केला जातो. (या आधीचा लेख जरूर वाचा.) पाश्चात्यांचे अनुकरण करण्याच्या नादात व्हेगन डायटला आपल्या देशात सध्या प्रसिद्धी मिळू लागली आहे. याबाबत वेळेच सावध होणे गरजेचे आहे. जिथे परमेश्वरालादेखील लाडाने 'माखनचोर' असे म्हटले जाते; त्याच्या हातावर आवर्जून लोण्याचा मऊसर गोळा देण्याची प्रथा आहे. जिथे घराघरांना गोकुळाची उपमा दिली जाते आणि आपल्या तान्ह्या बालकांनाही कौतुकाने दुधातुपाने आणि लोण्याने पोसले जाते. अशा या हिंदुस्थानात व्हेगन डायटसारख्या प्रकारामागे धावणे म्हणजे कमरेचे सोडून डोक्याला गुंडाळणे आहे. प्राणीप्रेम जरूर असावे; भूतदया महत्वाचीच. पण त्याचा हा मार्ग नव्हे हे निश्चित!!
© वैद्य परीक्षित शेवडे; MD (Ayu.)
आयुर्वेदज्ज्ञ- लेखक- व्याख्याते
।। श्रीव्यङ्कटेश आयुर्वेद ।। डोंबिवली
संपर्क: ०२५१-२८६३८३५
कधी बदलत्या ऋतुचक्रामुळे तर कधी धूर,धूळ आणि प्रदूषणामुळे सर्दी खोकल्याचा त्रास वारंवार होतो, अशावेळी बाजारात मिळणारी कफ सिरप्स घेतल्याने शरीरावर घातक परिणामांची शक्यता तर असते आणि त्याने दिवसभर झोपही येते मग अशावेळी तुमच्या स्वयंपाकघरातील काही घटकच कोणताही दुष्परिणाम न करता तुमचा सर्दी खोकला दूर करु शकले तर ?
लसूण:
लसणात एन्टीऑक्सिडन्ट गुणधर्म असून सर्दी खोकल्यावर ते अत्यंत प्रभावशाली आहे. लसुणामधील ‘आलाय्झीन ‘ हा घटक जंतूंचा नाश करतो .
टीप १ -जर तुमचा कान दुखत असेल तर तुम्हाला घश्यात इन्फेक्शन असण्याची शक्यता आहे,ज्यामुळे तुम्हाला कालांतराने सर्दी खोकला होऊ शकतो . अशावेळी काही लसणाच्या पाकळ्या घ्या, त्या ठेचून कापडात बांधा व कानात वरच्यावर ठेवा . त्या कानात खाली जाणार नाहीत याची काळजी घ्या.
टीप २ -लसणाच्या ४-५ पाकळ्या ठेचून त्या तुपात परतून खा. हा सर्दी खोकल्यावरील एक सोपा उपाय आहे. याव्यतिरिक्त ४ लसणाच्या पाकळ्या , २ टोमॅटो व एका लिंबाचा रस काढून तो घेतल्यास इन्फेक्शन दूर होण्यास मदत होते. असेच तुम्ही लसूण व टोमॅटोचे एकत्र सूप बनवून त्यात थोडेसे मीठ टाकून पिऊ शकता .
हळद :
स्वयंपाकघरातील अत्यंत गुणकारी आणि बहुगुणी हळद सर्दी – खोकल्यापासून चटकन आराम देते.
टीप १ -घशाच्या खवखवीवर हळद अत्यंत उपयुक्त आहे. मुळातच हळद जंतुनाशक असल्याने ती संसर्ग वाढू देत नाही. ग्लासभर गरम दुधात चिमुटभर हळद व साखर किंवा मध घालून दुध प्या . हे दुध सर्दी – खोकला दूर करते त्याचबरोबर तुम्हाला दिवसभर उर्जा देते.
टीप २ -हळदीचा चहासुद्धा सर्दी – खोकल्याला प्रतिबंध करतो. या चहासाठी चार कप पाण्यात एक छोटा चमचा हळद टाकून उकळा. १० मिनिटांनंतर तो गळून घ्या व त्यात थोडेसे मध व लिंबू पिळून प्या . यामध्ये उकळताना तुम्ही तुळशीच्या पानांचादेखील वापर करू शकता.
टीप ३-चमचाभर हळद व मध एकत्र करून त्याचे चाटण तुम्ही दिवसातून तीनदा घेतल्यास, तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
आयुर्वेदिक काढा:
हळदीच्या चहाप्रमाणेच गवती चहा , आलं , लवंग , काळामिरी व दालचिनी यांचा एकत्र काढा सर्दी खोकला बरं करतो तसेच शरीरातील प्रतिकारशक्ती वाढवतो.
टीप १ -चार वेलची , काळामिरीचे दाणे, लवंगा , ताजं आलं व दालचिनीचा छोटा तुकडा पातेल्याभर पाण्यात टाकून मंद आचेवर १० -१५ मिनिटे उकळा . उकळताना पातेल्यावर झाकण ठेवा . त्यानंतर मिश्रण गाळून ते गरम गरम प्या. गोडव्यासाठी त्यात थोडेसे मध घाला.
टीप २ -१५-२० तुळशीची पाने दीड कप पाण्यात उकळा . दहा मिनिटांनी हे मिश्रण गाळून त्यात चमचाभर लिंबाचा रस मिक्स करा . यातील व्हिटामिन सी व तुळस तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते .
टीप ३-कडूलिंब व मधाचा वापर करून तुम्ही घरच्या घरी गुळण्या करू शकता. ग्लासभर पाण्यात २-३ कडलिंबाची पाने टाकून उकळा हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात चमचाभर मध घालून त्या पाण्याने गुळण्या करा.
कंठसुधारक वडी
आज काल घशातील खवखव , सर्दी यासाठी अनेक गोळ्या बाजारात उपलब्ध आहेत मात्र आयुर्वेदाचा उगम असलेल्या भारतात पूर्वीपासून अनेक प्रकारच्या कंठसुधारक वड्या ह्या घरीच बनवल्या जात असत. ज्यामुळे सर्दी , खोकला सारख्या आजारांवर घरच्या घरीच सहज विजय मिळवता येत असे
कशी कराल कंठसुधारक वडी ?
आलं बारीक कापून त्याचा रस काढून घ्या त्यात काळामिरीच्या दाण्यांची भाजून केलेली पावडर , थोडे मध व चिमुटभर हळद टाका . हे मिश्रण एकत्र करून त्याचा लहान गोळ्या तयार करा. ह्या गोळ्या १०-१५ मिनिटे चघळा , असे दिवसातून तीनवेळेस केल्यास तुम्हाला सर्दी खोकल्यापासून आराम मिळेल .
कफजन्य खोकला
कफजन्य खोकल्यापासून वेळेत आराम मिळवणे फार गरजेचे आहे . कफजन्य खोकला हा साध्या संसर्गापासून अगदी ब्राँकायटिस , न्यूमोनिया व क्षयरोगासारख्या आजाराचे एक प्रमुख लक्षण आहे. त्यामुळे जर तुमचा खोकला आठवडाभरापेक्षा अधिक काळ टिकला तर डॉक्टरकडे जाणे आवश्यक आहे.
टीप १-चार पाच मिरीचे दाणे , थोडे जिरे व गुळ पाण्यात एकत्र करून हे मिश्रण उकळा . हे मिश्रण एकजीव झाल्यावर गॅस बंद करा व थोडे थंड करून प्या . यामुळे तुमचा खोकला कमी होण्यास मदत होईल .
टीप २-सुपारीची पाने कुटून रस काढून घ्या. या २ चमचे रसात एक चमचा मध घालून रोज दोनदा जेवणानंतर अर्ध्या तासाने घ्या . यामुळे कफाच्या खोकल्यापासून आराम मिळण्यास मदत होइल
औदुंबर अर्थात उंबर ....
नेहमी हिरवागार राहून थंडगार छाया देणारा औदुंबर वृक्ष अनेक दैवी गुणांनी युक्त आहे ...
भारतात सर्वत्र हा महावृक्ष आढळतो, औदुंबर झाडाच्या आसपास जमिनीत पाणी आढळते ....
किंबहुना जिथे पाणी मुबलक असते अशा जमिनीत हा वृक्ष वाढतो ...
या वृक्षाचे काही अदभूत उपयोग पाहूया ...
१. उंबराच्या सालीचा काढा करून तो थंड करावा . त्यात खडीसाखर-वेलची टाकून गुलाबी रंगाचे सरबत करावे . कॅन्सर झाल्यावर जी केमोथेरपी देतात त्यात शरीराची भयानक आग होते . त्यात हे सरबत उत्तम आहे . दिवसातून तीनदा घ्यावे ....
२. अतिसार होऊन त्यातून रक्त पडत आसेल तर सालीचा काढा द्यावा .
३. जखम झाल्यावर ती धुण्यासाठी डेटोल- सेव्लोन च्या ऐवजी सालीच्या काढ्याने धुतली तर जखम वेगाने भरून येते ..
४. तोंड आले असता सालीचा काढा थोडा घट्ट करून तो तोंडाला आतून लावला तर वेगाने त्रास कमी होतो ...
५. गर्भाशयाची सूज कमी करण्यासाठी , रक्तप्रदर , श्वेतप्रदर, मासिक पाळीच्या अति प्रमाणात रक्तस्त्राव होईत असेल तर सालीचा काढा पोटात घ्यायला देतात सोबत योनिमार्गाद्वारे त्याच काढ्याचा उत्तरबस्ती दिला तर उत्तम गुण येतो ...
६. गर्भाचे पोषण व्हावे म्हणून काढा देतात .... सातत्याने गर्भपात होत असेल तर गर्भ धारणेनंतर सालीचे सरबत करून प्यावे ...
७. लहान मुलांना दात येताना जुलाब होतात त्यावेळी उंबराचा चिक बत्ताशासोबत देतात ...
७. भस्मक नावाचा एक व्याधी आहे ज्यात व्यक्ती सारखे काही न काही खात असते . पण त्या व्यक्तीचे पोट भरत नाही काही वेळाने परत भूक लागते . या आजारात उंबराची साल स्त्रीच्या दुधात वाटून दिली असता ही विचित्र लक्षणे कमी होतात ...
८. उचकी थांबत नसेल तर उंबराच्या फळाचा रस प्यावा ...
९.काविळीत उंबराचे पिकलेले अर्धे पान विड्यातून देतात ...
१०. तापात अंगाची आग होत असेल तर पिकलेले उंबराचे फळ खायला द्यावे ...
११. सरते शेवटी एक गोष्ट सांगतो हिरण्यकश्यपूचे पोट फाडल्यावर भगवान नरसिंहाच्या बोटांचा दाह होऊ लागला .. तो कशानेच थांबेना . मग त्यांनी त्यांची बोटे उंबराच्या फळात रोवली आणि त्यांचा दाह क्षणात कमी झाला ...
हृदयविकाराचा झटका येणे आणि पक्षाघात होणे (शरीराचा एक भाग लुळा पडणे) या दोन्ही विकारांचे कारण त्या त्या अवयवाला रक्ताचा पुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यात रक्तपुरवठ्यास निर्माण झालेला अडथळा हे असते. असा अडथळा निर्माण होण्यामागे बरीच कारणे असू शकतात. या कारणांपैकी बरीच कारणे आता शास्त्राला उलगडलेली आहेत. या आजारांचा प्रतिबंध म्हणजे या कारणांचा प्रतिबंध करणे. सर्वच माणसांनी याबाबत जागृत असणे आदर्श आहे. किमान ज्यांच्या घराण्यात या प्रकारचे आजार ज्ञात आहेत, अशा वयाच्या चाळिशीच्या पुढच्या पुरुषांनी आपली तपासणी करून घेऊन योग्य तो जीवनशैलीत बदल करणे आवश्याक आहे. जीवनशैली म्हणजे आपला आहार, आपला व्यायाम, आपली व्यसने (विशेषतः तंबाखूचा वापर), आपली विचारांची पद्धत, आपले मनोरंजनाचे मार्ग आणि आपले जीवनविषयक तत्त्वज्ञान.
आहाराचा शास्त्रशुद्ध विचार नऊ विभागांत केला जातो
१) उष्मांक, २) प्रथिने, ३) स्निग्ध पदार्थ, ४) कर्बोदके, ५) जीवनसत्त्वे, ६) खनिजे, ७) पाणी, ८) चोथा आणि ९) तृप्ती. यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या गरजेनुसार योग्य बदल (वाढ किंवा घट) एक किंवा अधिक अन्नघटकांत करणे इष्ट असते. सर्वसाधारणपणे आपले अन्नघटक पुढील असतात - १) तृणधान्ये (गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका, वरी, नाचणी), २) डाळी व कडधान्ये (मूग, मसूर, मटकी, चवळी, सोयाबीन, तूर इत्यादी), ३) भाज्या (पालेभाज्या, शिरांच्या भाज्या), ४) कोशिंबिरी, ५) दूधदुभते, ६) ऋतुमानाप्रमाणे फळे, ७) अन्नास चव येण्याकरता वापरलेले मीठ, मसाले, तेल, तूप व स्निग्ध पदार्थ, ८) चहा, कॉफी, इतर पेये याखेरीज मांसाहाराचादेखील विचार आवश्य क आहे.
वजन योग्य पातळीवर येण्याच्या दृष्टीने उष्मांकांवर लक्ष हवे. वजन जास्त असले तर ते कमी करण्याकरता आहारातील उष्मांक कमी करून नियमाने व्यायाम करणे आवश्यवक आहे. त्या दृष्टीने मद्यपान (आणि धूम्रपान) कटाक्षाने वर्ज्य करावे. साखर सोडावी. भात, बटाटा, रताळे, साबुदाणादेखील शक्या तेवढा टाळावा किंवा सेवन मर्यादित ठेवावे. तीच योजना तेल, तूप, साय, लोणी, तळलेले पदार्थ यांच्याबद्दल असावे. मिठाचे सेवन चवीपुरतेच असावे. जीवनसत्त्व ब १२ व फोलिक यांचे सेवन आवश्य,क आहे. या दृष्टीने दूध नियमाने घ्यावे व ताज्या कोशिंबिरी सेवने इष्ट आहे. या कोशिंबिरींवर ताजे कापलेले लिंबू पिळून घ्यावे.
संथगतीने सपाटीवर चालण्याचा व्यायाम वजन कमी करण्याच्या दृष्टीने चांगला आहे. दररोज ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी (दिवसाकाठी ८० मिनिटे) पायी चालण्याने दर आठवड्याला दोन हजार उष्मांक वापरले जातात. नऊ हजार उष्मांक वापरले गेले, की एक किलो मेदाचे विघटन होते म्हणजे ४० मिनिटे सकाळी व संध्याकाळी नियमाने संथगतीने सपाटीवर चालण्याने सहा आठवड्यांत एक किलो वजन कमी व्हावे. ही गती चालू ठेवल्यास सहा महिन्यांत निदान तीन किलो वजन घटेल. या प्रमाणात तीन वर्षांत पुरेसे वजन घटेल. कोणत्याही व्यायामाच्या बाबतीत काही मूलभूत नियम पाळावेत. व्यायाम सुरू करण्यापूर्वी आपली वैद्यकीय तपासणी करून घ्यावी. वाढलेला रक्तदाब, त्रास न होणारा हृदयविकार, मधुमेह, गुडघ्यांचे आजार, पायांत दोष इत्यादी नाहीत याची शहानिशा आवश्याक आहे. व्यायामाची सुरवात माफक प्रमाणातच करावी. व्यायाम करून झाल्यावर अतिरेकी प्रमाणात थकवा येऊ नये. व्यायाम नियमित करावा. केवळ शनिवार - रविवार खूप व्यायाम करणे आणि इतर दिवशी व्यायाम न करणे हे अपायकारक ठरते. सुरवातीच्या माफक व्यायामात सावकाश वाढ करावी. कोणता व्यायाम करावा याचे मार्गदर्शन तज्ज्ञांमार्फत करून घ्यावे.
आपल्या जीवनाचे ध्येय ठरविताना व्यवहार्यतेचा आणि वास्तवाचा विचार आवश्याक असतो. आपले विचार कितीही उच्च पातळीवर असले तरी पाय जमिनीवरच ठेवून माणसाने आपले ध्येय ठेवावे. आपली कुवत आणि परिस्थितीची पारख आणि जाणीव वास्तवाला धरून नसल्यास आपण ठरविलेले ध्येय गाठणे अव्यवहार्य ठरेल. त्यातून सतत अपेक्षाभंगाचे अनुभव येत राहतील. त्यातून मनावर विपरीत परिणाम घडेल. अस्वस्थ मनाचा परिणाम शारीरिक व्याधी निर्माण होण्याकडे होतो. रक्तदाब वाढतो, रक्तशर्करा वाढते, रक्तातील कोलेस्टेरॉल व इतर मेदघटक वाढतात. या साऱ्यांचा परिणाम हृदयविकार होण्यात होतो. हृदयविकार टाळणे शक्य् आहे. जेथे या रिस्क फॅक्टकर्सबद्दल समाजाचे प्रबोधन केले गेले आहे आणि बहुसंख्य लोकांनी योग्य आहार, नियमाने व्यायाम, तंबाखूपासून मुक्ती, उच्च रक्तदाबाचा ताबा आणि रक्तातील मेदघटांचे योग्य प्रमाण राखले तेथे हृदयविकार घटलेला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- सकाळ / डॉ. ह. वि. सरदेसाई
माझे 'हे आम्ही का करायचे ?' हे पुस्तक २००२ साली प्रकाशित झाले. त्यातील माहिती खाली देत आहे.
अंगाला भस्म का लावायचे?
गुरुचरित्रात भस्म या विषयी एक अध्याय आहे. म्हणून मी स्वतः अंघोळ झाल्यावर भस्म लावून पाहिले. तेंव्हा माझ्या असे लक्षात आले की, भस्म लावले की थंडीच्या दिवसात थंडी वाजत नाही, उन्हाळ्याच्या दिवसात घाम कमी येतो व घामोळे होत नाही.
भस्म म्हणजे गाणगापूरच्या भस्माच्या डोंगरावरील भस्म नव्हे. उदबत्तीची राख , गाईच्या गोवऱ्या जाळून होणारी राख हे भस्म. भस्म हे उरलेली राख असते त्यामुळे ते निर्जंतुक नक्की असते. शिवाय गाईच्या शेणापासून केलेले भस्म रेडिएशन वेव्ह्ज पासून संरक्षण करते.
कपाळाला -आज्ञाचक्राला हे भस्म लावण्याची प्रथा दक्षिण भारतात आहे . हल्ली उन्हाळ्यात पावडरच्या जाहिराती येतात. त्या पावडरी पांढऱ्या दगडाची पावडर असते. त्यापेक्षा भस्म केव्हाही स्वस्त व उत्तम.
थोडे भस्म (चिमूटभर) हातावर घ्यावे, त्यात थोडे पाणी कालवावे व सर्व अंगाला लावावे. त्यात मांड्या , पोटऱ्या, दंड, छाती, मान, खांदे, कपाळ, कान या महत्वाच्या अवयवांना लावल्यास थंडी वाजत नाही.
-- अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
Copyright © 2025 | Marathisrushti