(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • भारतीय सेनादले: आवाहन आणि आव्हान

    १९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे 'ठाणे भूषण' आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. 'संडे मिलिटरी स्कूल' चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारताच्या वेगवेगळ्या दलात कार्यरत आहेत.

    भारतीय सेनादलात दरवर्षी हजारो तरुणांना शिपाई ते अधिकारीपदासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत असते. परंतु चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले सैन्यदलाकडे पाठ फिरवताना दिसतात त्याचे मुख्य कारण काही गैरसमजुती, सैन्यदलाविषयी अपुरी माहिती आणि मृत्यूचे भय, तरुण पिढीला मार्गदर्शनपर माहिती मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.

    सैन्यदलात विविध स्तरांवरील प्रवेश

    प्राथमिक स्तर :

    इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सातारा सैनिक स्कूल, बेळगाव मिलिटरी स्कूल, बंगलोर मिलिटरी स्कूल इथे प्रवेश दिला जातो. त्यात मागासवर्गीयांसाठी १० टक्के आरक्षण असते. ऑक्टो. च्या सुमारास ह्या शाळांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. लेखी परीक्षेत पास ल्यानंतर मुलाखत होते. इथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. नंतर बरीचशी मुले नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी निवडली जातात. वायुदल, नौदल आणि सेनादल ह्यांत ऑफिसर्स म्हणून दाखल होतात.

    माध्यमिक स्तर :

    सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, सेक्टर एन १२, सिडको, मौलाना आझाद कॉलेजच्या मागे, औरंगाबाद ह्या पत्त्यावर दहावीत असतानाच अर्ज करायचा असतो. शालान्त परीक्षा संपल्यावर चाचणी परीक्षा होते. दुसऱ्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखतीची चाचणी घेऊन त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना औरंगाबाद इथे ११ वी, १२वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जातो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. पालकांनी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागवून मुलांकडून परीक्षेचा सराव केला तर उत्तम.

    शालान्त परीक्षेनंतर :

    तिन्ही दलांत तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स वगैरे ठिकाणी शिपाईपदावर जाता येते. दहावीत कमीत कमी ४० टक्के मार्क्स असावे लागतात. मागासवर्गीयांसाठी ९वी पास पात्रता चालते. उंची ५ फूट ७ इंच, छाती ३२ इंच व फुगवून ३४ इंच, वजन ५० किलो आणि वय १६ ते २० वर्षे ९ महिने. टेक्निकल पदासाठी १२वी सायन्स, ५० टक्के मार्क्स आवश्यक. क्लार्कसाठी १२ वी पास, टंकलेखन, बेसिक कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. नौदलासाठी उंची कमी चालते. वयोमर्यादा १९ वर्षे, दहावीत ६० टक्के मार्क्स आवश्यक बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., कोस्ट गार्ड त्याचप्रमाणे सी.आर.पी.एफ. साठी उंची जास्त लागते.

    ह्या सर्व जागांसाठीच्या सूचना 'एम्प्लॉयमेंट न्यूज' किंवा 'रोजगार समाचार' ह्या भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होतात.

    बारावीत असताना/उत्तीर्ण झाल्यानंतर:

    बारावीत प्रवेश घेतल्याबरोबर एन.डी.ए. चा फॉर्म भरावा. वयाची अट १८ वर्षे ६ महिने. बारावीत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमेटिक्स घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना नेव्हल इंजिनीअरिंग खडकी, पुणे इथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. रुपयादेखील खर्च न करता ते इंजिनीअरची पदवी प्राप्त करू शकतात. पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेवल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते ऑफिसर्स होतात.

    इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतीय नौदलात आर्टिफिशर ह्या पदावर ज्युनि. कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाता येते. बायोलॉजी हा विषय बारावीत घेतलेला असेल तर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल तर ऑक्टो. मध्ये आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे अर्ज करावा लागतो. मुलीसुद्धा अर्ज करू शकतात. अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.च्या दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव आवश्यक असतो. पुढे एकही पैसा खर्च न करता साडेचार वर्षे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते. ३० वर्षांवरील तरुणींना वरील कॉलेजमध्ये नर्सिंग ऑफिसर्सपदासाठी जाता येते.

    पदवीधरांसाठी :

    दरवर्षी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जाते. त्यात परमनंट आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करता येतो. इंडियन मिलिटरी अकॅडमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी इथे यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांची नेमणूक लेफ्टनंट ह्या हुद्यावर होते.

    इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी :

    इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तरांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. एम.ए.एम.एड., एम.एस.सी. उत्तीर्णांसाठी सैन्यदलात प्राध्यापक तसेच ऑर्डनन्स विभागात शेतकी पदवीधरांना मिलिटरी फार्ममध्ये व पशुविज्ञान शाखेतील पदवीधरांना रिमाऊंड व वेटर्नरी कोअरमध्ये जाता येते. एल.एल.बी. पदवीधारकांना जज्ज, अॅडव्होकेट जनरल बँचमध्ये ऑफिसर होता येते. हवाईदलात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बँचमध्ये फायटर कंट्रोलर, एअर ट्राफिक कंट्रोलर, मेट्रोलॉजिकल ब्रँचमध्ये प्रवेश घेता येतो. एअर ट्राफिक कंट्रोलर व फायटर कंट्रोलरसाठी प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी, अकाउंट बँचसाठी बी.कॉम. प्रथम श्रेणी किंवा एम.कॉम. व एव्हिएशन व मेट्रोलॉजी बँचसाठी एम.एस.सी.फिजिक्स अप्लाईड मॅथमेटिक्स व मेट्रोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत.

    तरुणींसाठी :

    दरवर्षी प्रत्येकी १०० तरुणींना सेनादल, नौदल, वायुदल इथे ऑफिसर्स होण्याची संधी असते. वय २० ते २५ वर्षे, उंची १५२ सेंमी., वजन ४२ किलो अपेक्षित असते आणि पायाची लांबी ९९ सें.मी.पेक्षा अधिक असावी लागते. वैमानिक होण्यासाठी पदवीपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे आवश्यक असते आणि वय २३ वर्षाच्या आत असावे लागते. हवाई व नौदलात जाण्यासाठी फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घेऊन बी.एस.सी. पदवीधर असणे किंवा बी.ई. होणे आवश्यक असते.

    लेखी परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची मुलाखत ह्यातून तरुणींनाही जावे लागते. उत्तीर्ण तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या अकॅडमींमध्ये दिले जाते. त्यांना दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाते. ते वाढवून चौदा वर्षे करता येते. त्यानंतर एका वर्षासाठी सिम्बॉयसिस, पुणे येथून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सरकारी खर्चाने करता येतो. निवृत्त झाल्यानंतरदेखील चांगली नोकरी मिळते. प्रशिक्षणाच्या काळात विवाह मात्र करता येत नाही. ऑफिसर झाल्यावर करता येतो. एम.ए., एम.एस.सी., एम.कॉम., एम.सी.ए., एल.एल.बी. पास झालेल्या तरुणींचे वय २७ वर्षांपर्यंत चालते. सर्व तरुणींनी शारीरिकदृष्ट्या कणखर असावे, तसेच काही तरी खेळ खेळून शारीरिक क्षमता वाढती ठेवावी. आपले सामान्य ज्ञानही वाढवावे.

    सैन्यदलातील फायदे :

    सैन्यदलातील वेतन कदाचित आकर्षक वाटणार नाही पण त्यासोबत मिळणारे जे इतर फायदे आहेत, ते दामदुपटीने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम पौष्टिक आहार, राहायला मोफत घर, कपडे मोफत, वैद्यकीय सेवा मोफत, बायपास सर्जरी/किडनी शस्त्रक्रिया मोफत, प्रवास मोफत. इंडियन एअर लाईन्सच्या प्रवासात निम्मी सवलत. वर्षातून दोन महिने वार्षिक सुट्टी. एक महिना आपत्कालीन सुट्टी. प्रशिक्षण घेतानाही इतर काहीच खर्च नसल्याने जवान भरपूर पैसे घरी पैसे पाठवू शकतो. बटालियन बॉर्डरवर जाते त्यावेळी कुटुंबाला कुठे ठेवावे हा प्रश्न त्याला पडत नाही. मुंबई-पुणे इथे सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित अशी फॅमिली क्वार्टर्स असतात. वीरगती मिळालेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम जवानाला दहा लाख तर ऑफिसरला पंधरा लाख, इतर डेथ कम ग्रॅट्युइटि वगैरे धरून मृत जवानाच्या कुटुंबीयांना १० ते १२ लाख रु. व ऑफिसरच्या कुटुंबाला १५ ते २० लाख रु. मिळतात शिवाय त्याचे पेन्शन चालू होते. हे आकडे (२००८ सालचे आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे.) मृत जवानाच्या पत्नीने आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्या मुलाला रेजिमेंटच्या वसतिगृहात प्रवेश देऊन त्याची सर्व जबाबदारी रेजिमेंट घेते. पुढे त्याला सैन्यातच ऑफिसर, डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी तसे शिक्षण रेजिमेंटतर्फे दिले जाते.

    मित्रांनो, भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणारे 'एम्प्लॉयमेंट न्यूज', 'रोजगार समाचार' दर शनिवारी विकत घ्या. आपल्यामध्ये राष्ट्राभिमान बाळगा. दुर्घटना, बॉम्बस्फोट घडल्यास पाकिस्तानी झेंडे किंवा त्यांच्या नेत्यांचे पुतळे जाळत बसू नका. देशात 'बंद' पाडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करू नका. शत्रूच्या हजारो सैनिकांना ठार मारण्याची क्षमता ठेवा. अभिमानाने म्हणा, 'देशासाठी घेईन प्राण !'

    लक्षात ठेवा, सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो. मरायला नाही! सैन्यात 'हर गोली पर लिखा है खानेवाले का नाम' हे ब्रीद वाक्य. असते. ज्या गोळीवर तुमचे नाव लिहिलेले असेल तीच तुम्हाला लागेल. इथे जितकी माणसे रोज अपघाताने वगैरे मरतात त्यापेक्षा किती तरी कमी जवान लढाईक्षेत्रात शहीद होतात. मरण कधीही येणारच. इथे काय किंवा सीमेवर काय! आपल्या मृतदेहावर असेल स्वस्तातले पांढरे कापड. पण सैन्यात शहीद होणाऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर असतो राष्ट्राचा तिरंगी झेंडा ! अंत्यसंस्काराच्या वेळेस आकाशात रायफल्स किंवा तोफा खणखणतात. म्हणजे यमालासुद्धा वाटते की, कोणी तरी व्हीआयपी स्वर्गात येतो आहे. तोही त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.

    सर्वधर्मसमभाव ठेवा. संघटित व्हा. देशाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हा. आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.

    संदर्भ: ‘लष्कर’च्या भाकऱ्या चवदार-मेजर सुभाष गावंड, व्यास क्रिएशन, डी ४, सामंत ब्लॉक्स, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प), ४००६०२, तिसरी आवृत्ती २०१७.

    -मेजर सुभाष गावंड

  • मी असा का? – महेश झगडे, I.A.S

    मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.

  • रम्य ते बालपण : मोहन वर्दे

    आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.

  • लहानपणाचा ठेवा

    गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली.

  • संतांचे सामाजिक कार्य आणि तुकाराम

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख


    सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत.

    यातील काही विचारवंतांनी, संतांचे कार्य हे मुलभूत, पायाभूत आणि राजकीय चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे आहे असे मांडले. किंबहुना संतविचारांमुळेच समाजाचे वैचारिक उद्बोधन झाले. देव, देश, धर्म याबद्दल आस्था, आदर, प्रेम निर्माण झाले आणि त्यामळेच सामान्य माणूस सुद्धा बलिदान करायला तयार झाला. त्याच्या या वृत्तीतूनच पुढची चळवळ उभी राहिली असा निष्कर्ष काढला.

    याच्या अगदी उलट काही विचारवंतांना संतांचा मार्ग हा निष्क्रियतेचा, नेभळटपणाचा वाटला. संत भौतिक, सामाजिक, राजकीय प्रगतीविषयी उदासीन होते, त्यांचे संपूर्ण लक्ष हे आध्यात्मिक, पारलौकिक प्रगतीकडे होते. त्यांनी समाजाला दुबळे बनवले, निवृत्तीपर बनवले. समाज प्रतिकारशक्ती हरवून बसला, पारतंत्र्याचेही त्याला काही वाटेनासे झाले अशी मते मांडली गेली. याच्याही पुढे जावून असेही सांगितले गेले की विषमता मूलक, वर्णवर्चस्ववादी धर्म समाजाच्या माथी मारण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून धुर्ततेने व लबाडीने काही संतांनी आपल्या वाङ्मयीन रचना समाजाच्या गळी उतरवल्या.

    ही इतकी परस्परविरोधी मते वाचल्यावर सामान्यजनांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. विचारी साधकाच्या वा सामान्य माणसाच्या मनातील हा गोंधळ दूर होऊन त्याला योग्य निष्कर्ष काढण्यास मदत व्हावी या हेतूने हा लेख लिहीला आहे. संत चळवळीचा कळस असलेल्या तुकाराम महाराजांच्या साहित्याच्या अनुषंगाने केलेला विचार म्हणून गाथेतील अभंगांचे दाखले देऊन मत मांडणी केली आहे. खरं तर सर्व संतांचे विचार सारखेच आहेत. फक्त सांगण्याची पद्धत व तीव्रता आणि व्याप्ती वेगवेगळी आहे.

    या सर्व विचारांचा अभ्यास करत असताना काही मुलभूत प्रश्न मनात उभे राहिले. जर संत सामाजिक, राजकीय बाबीत इतके उदासीन असते तर मग 'बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणुनी कळवळा संतांचा जगती ।' हे कसे? हे बुडते जन म्हणजे काय? लोक भक्ती विसरले होते, या अशा बुडत्यांना समजावून सांगून परत भक्तीकडे, अध्यात्मिकतेकडे वळवणे इतकेच संतांना हवे होते काय? सर्व लोकांनी भौतिक विचार सोडून देऊन, ऐहिक कर्मे, कर्तव्ये यांचा त्याग करून देव देव करत जगावे अशी संतांची अपेक्षा होती काय? अशा विचारांनी बहुजन समाज संसार सोडून संन्यासमार्गी व्हावा असे त्यांना हवे होते काय? बहुतांशी संसारात रमणारा सामान्य माणूस सर्व आशा, अपेक्षा सोडून, भौतिक, राजकीय आकांक्षांचा त्याग करून वनमार्गी व्हावा असे करण्यातच त्याची प्रगती आहे असा त्याचा आग्रह होता काय? बहुसंख्येने सामान्य माणूस असा निवृत्तीपर होऊ शकतो अशी संतांची धारण होती काय? सर्वसामान्य माणूस इतका निवृत्तीपर होऊच शकत नाही हे त्यांना समजत नव्हते काय? सामान्य माणसाच्या समाज, देश या बद्दलच्या कर्तव्यांना संतांच्या लेखी काहीच किंमत नव्हती काय? कोणाचे का राज्य असेना मग स्वकीयांचे असो की परधर्मियांचे असो आपण आपली भक्ती करावी त्याकडे लक्ष देऊ नये असे संतांचे वागणे, सांगणे होते का? आक्रमकतेने व बळजबरीने लोकांवर आपला धर्म लादणाऱ्या परधर्मियांशी संतांना काही देणे घेणे नव्हते काय? या घातक परधर्मीय विचारसरणीमुळे होणारे दुष्परिणाम संतांना समजत नव्हते आणि त्याचे दूरगामी होणारे विपरीत परिणाम त्यांना दिसत नव्हते काय? आणि जर संतांचे विचार हे इतके निवृत्तीपर आणि व्यक्तीकेंद्रित, समाजहिताच्या विरोधी होते तर मग या संतविचारांचं गारुड इतकी शतके समाजमनावर अधिराज्य कसं गाजवू शकतं? असे अनेक प्रश्न उभे राहतात.

    या प्रश्नाला उत्तर मिळणार कुठे? तर संतसाहित्य आणि इतिहास यांच्यात. म्हणून या दोघांच्या सहाय्याने उत्तरे मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे. गाथेच्या आधारे संतांची भूमिका समजते आणि इतिहास अभ्यासला की तिला पुष्टी मिळते. तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगात संत विचारांचे विविध पैलू नजरेस येतात त्या मुळे संतांबद्दलच्या विविध दृष्टीकमोनांच्या मांडणीत हेच अभंग संदर्भ म्हणून, दाखला म्हणून वापरले जातात आणि पुनरुक्तीचा दोष स्वीकारूनही अनेक लेखांमधून समाविष्ट केलेले दिसतात. खरंतर हा प्रत्येक अभंग हा स्वतंत्र लेखाचा, पुस्तकाचा विषय आहे, मात्र या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन अभंगांचा सारांश अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.

    १) संतांचा जगती येण्याचा उद्देश काय होता?
    आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी ।।
    बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।
    झाडू संतांचे मार्ग। आडराने भरीले जग ।।
    उच्छीष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू ।।
    अर्थ लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञाने ।।
    विषयलोभी मन । साधन ते बुडविले ।।
    पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा ।।
    तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ||(२३६)

    जनसामान्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संत वैकुंठातली त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे ईश्वरसमीपता सोडून आले. खालावलेल्या सामाजिक स्थितीचं भान या अभंगातही दिसतं आणि हे चित्र बदलवण्यासाठी ऋषींचे विचार परत रुजवण्याची गरज आहे हे कळतं. या अभंगातील “आली" आणि “साचभावे" हे शब्द अभ्यासले तर संतांचा कळवळा आणि त्यांची भूमिका स्पष्टपणे समजते.

    २) संतांना मुख्यतः काय करायचे होते?
    धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।।
    हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।
    तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनी बाण फिरे ।।
    नाही भीडभार । तुका म्हणे साना थोर ।।(२०७६)

    संतांनी मुख्य काम धर्मपालन सांगितले, परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की पाखांडखंडण हेही त्यांनी आवश्यक आणि महत्त्वाचे मानले होते. चांगले समोर आणायचे असेल तर वाईट दूर करायलाच लागतं. धर्मपालन म्हणजे काय हे तर समजावलेच पण पाखंडी आणि भोंदू परमपुज्यांकडून सामान्य जनांची केली जाणारी दिशाभूल, शोषण, पिळवणूक तसेच समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, दंभ यावर अत्यंत आक्रमक प्रहार करून जागृती निर्माण केली.

    ३) संतांना निवृत्तीपर, कर्मत्यागप्रधान धर्म हवा होता काय?
    धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आम्हासि ।।
    वाचा बोलो वेदनीती । करू सती केले ते ।।
    न बाणता स्थिति अंगी । कर्म त्यागी लड तो।।
    तुका म्हणे अधम त्यासी । भक्ती दुषी हरीची।।(१३७)

    धर्मरक्षणासाठी सर्वस्व वेचण्यास तयार असलेले संत कर्मत्यागावर कठोरतेने प्रहार करतात, अशी स्थिती न बाणता कर्मत्याग करणाऱ्याला लंड, अधम असे संबोधून त्याची कडक निर्भत्सना करताना दिसतात. संतांना प्रपंचाच वावडे नव्हते, तर अतिरेकी प्रपंचासक्तीला विरोध होता. "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" असा सल्ला ते देतात. पाइकीच्या अभंगातून आणि इतरही अनेक अभंगांतून लढण्याचा संदेश ते देतात, मग हे विचार निवृत्तीपर कसे?

    ४) स्वराज्यपूर्व काळातील परिस्थिती कशी होती आणि संतांना तिचे भान होते का?
    हाती होन दाविती बेणा । करिती लेकीची धारणा।।
    ऐसे धर्म झाले कली । पुण्य रंक पाप बळी ।।
    सांडीले आचार । द्विज चाहाड झाले चोर ।।
    टिळे लपविती पातडी । लेती विजार कातडी ।।
    बैसोनिया तक्ता । अन्योविण पिडिती लोका ।।
    मुदबख लिहिणे । तेल तूप साबण केणे ।।
    नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ।।
    राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।।
    वैश्शूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ।।
    अवघे बाह्य रंग । आत हिरवे तरी सोंग ।।
    तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ।।(१४४)
    या अभंगातून ह स्पष्ट होते की सामाजिक
    परिस्थितीचं भान संतांना होते. अभंगात वर्णन केल्याप्रमाणे चारही वर्णाच्या लोकांच्या त्या काळी झालेल्या नैतिक अवमूल्यनावर ते लक्ष ठेऊन होते. या घसरलेल्या स्थितीमुळे व्यथित होऊन, देवा काय झोपला आहेस का? असा परखड सवाल करण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत.

    ५) परधर्माच्या आक्रमणाचे, त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याचे भान होते का?
    संता नाही मान । देव मानी मुसलमान ।।
    ऐसे पोटाचे मारिले । देवा अशा विटबीले ।।
    घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ।।
    तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम।।(१६१३)
    कोणता धर्म मानावा, कोणास मान द्यावा, कोणास देऊ नये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच मुसलमान देव मानल्यास विटंबना पदरी पडेल हा धोकाही दाखवला आहे. या अभंगांवर तुकोबा कीर्तन करीत असत. म्हणजे जनसामान्यांना त्यातून ते आणखी सविस्तरपणे याबाबत सांगत असले पाहिजे. धर्मपालन म्हणजे कोणता धर्म आणि काय करणे अपेक्षित आहे ते या अभंगातून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. सामान्यांचा वैचारिक गोंधळ दूर करून धर्मसंस्थापना करण्याचे हे काम संतांनी केले.

    ६) संताविचारांमुळे समाज पराक्रमशून्य, पौरुषहीन, नेभळट बनला का?
    मऊ मेणाहुन आम्ही विष्णुदास ।
    कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
    मेले जीत असो निजोनिया जागे ।
    जो जो जे जे मागे ते ते देऊ ।।
    भले तरि देऊ कासेची लंगोटी ।
    नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
    मायाबापाहुनी बजु मायावंत ।
    करू घातपात शत्रूहुनी ।।
    अमृत ते काय गोड आम्हापुढे ।
    विष ते बापुडे कडू किती ।।
    तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी ।
    देवासही आटी जन्म घेणे ।। (१४१)
    या अभंगांमधून संतांची जशास तसे ही वृत्ती स्पष्ट होते. वेळ पडल्यास वार करून किंवा घातपात सुद्धा करून आम्ही आमचे रक्षण करू आणि शत्रूचे निर्दालन करू हे ही स्पष्ट आहे. सर्व शक्तीनिशी रक्षण करावे हे तर सांगितलेच पण यासाठी वेळप्रसंगी देवालाही जन्म घेऊन खटाटोप करावाच लागतो आणि तो त्याने यापूर्वीही केला आहे आणि आताही करेल तसेच अशा खटाटोप करणाऱ्यांनाही देव सहाय्यच करेल असे प्रोत्साहित करणारे आश्वासन देऊन संतांनी जनसामान्यांना लढण्यास प्रवृत्त केले. भ्रामक अहिंसेच्या कल्पनेतून बाहेर काढले.

    ७) पाखांड खंडण करून समाजात योग्यअयोग्यतेची समज कशी निर्माण केली?
    मुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धन आणि मान ।।
    एशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा।।
    पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ।।
    विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी।।(३०९)
    आमची गोसावी अयाचित वृत्ती ।
    करवी शिष्या हाती उपदेश ।।
    दगडाची नाव आधीच ते जड ।
    ते काय दगड तारू जाणे ।।
    तुका म्हणे वेष विटबिला त्यांनी ।
    सोंग संपादणी करिती परी ।।(३३३७)

    जगी कीर्ती व्हावी । म्हणोनि आलासी गोसावी।।
    बहुत केले पाठांतर । वर्म ते राहिलजे दूर ।।
    चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरुप ।।
    तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा।। (३१८२)

    वरील सर्व अभंगांतून दंभ, पाखंड, विषमता यावर प्रहार केले. तथाकथित साधू, मठाधिपती, गोसावी, परमपूज्य यांची ढोंगी कार्यपद्धती समाजाला सांगून सावध केले. यांच्या नादी लागला तर खऱ्या विशुद्ध धर्मापासून समाज दूर जातो आणि भ्रष्ट आचार विचार स्वीकारतो, ज्याचे दूरगामी घातक परिणाम होतात. पिढ्यानपिढ्या भोगायला लागतात. हा धोका ओळखूनच संतांनी पाखंडखंडणाला विशेष महत्त्व दिले.

    नुसत पाखांडखंडण करून न थांबता
    जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले।।
    तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा।।
    मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।
    ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी।।
    दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।।
    तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूती।। (२०४)

    अशा अभंगांतून योग्य काय, खरा कोण ते लोकांना समजावले व नीर क्षीर विवेक उभा केला. (अभंगाच्या शेवटी दिलेला क्रमांक हा श्री देवडीकरकृत श्रीतुकाराममहाराजांची गाथा आवृत्ती सन २००० प्रमाणे घेतलेला आहे.)

    संतविचारांची वैचारिक पार्श्वभूमी बघितली. आता त्यांच्या कार्याचे सामाजिक परिणाम स्पष्टपणे दाखवणाऱ्या दोन ऐतिहासिक दाखल्यांचा विचार करू म्हणजे संतांचे कार्य सप्रमाण सिद्ध होईल.

    सन १२९२ मध्ये देवगिरीवर राजा रामदेवरायाचे राज्य होते. याच्या साधारण १०० वर्षे आधी म्हणजे सन ११९६ च्या सुमारास दिल्लीत सुलतानाची सत्ता प्रस्थापित झाली होती. अफगाणिस्तान मधून धनलालसा, धर्मविस्तार आणि राज्यविस्तार या हेतूने आलेल्या या महत्त्वाकांक्षी सुलतानांनी हा हा म्हणता संपूर्ण उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला होता आणि क्रूर व नृशंस अत्याचारांनी संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. उत्तरेतली ही स्थिती ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी त्यांच्या यात्रेदरम्यान प्रत्यक्ष पाहिली होती, पण त्यांच्या सांगण्याची दखलही घेतली गेली नाही.

    उत्तरेतील सुलतानांच्या अधाशी नजरा देवगिरीच्या अफाट संपत्तीवर खिळल्या होत्या. देवगिरीच्या या बलाढ्य आणि वैभवसंपन्न साम्राज्याचा सम्राट राजा रामदेवराय हा अत्यंत बेजबाबदार, बेसावध आणि विवेकशून्य होता. सुखोपभोगी, संथ, मृदू होता, लढवय्या नव्हता.

    डिसेंबर १२९३ मध्ये फक्त ८००० स्वारांनीशी दिल्लीच्या सुलतानाचा सेनापती अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला. त्या वेळी किल्ल्यात फक्त ४००० सैनिक होते. बाकीचे युवराज शंकरदेवाबरोबर स्वारीस गेलेले होते. उसने अवसान आणून रामदेवराय अल्ला उद्दीनशी लढायला गेला परंतु चुटकीसरशी पराभूत होऊन किल्ल्याकडे पळत सुटला. संपूर्ण देवगिरी शहर वाऱ्यावर सोडून हा राजा किल्ल्यात निघून गेला. किल्ला अभेद्यच होता, त्याच्याआधारे लढत राहू असा विचार होता. पण कसायाच्या हातात गाय सापडावी तशी देवगिरी खिलजीच्या ताब्यात सापडली. त्याने तेथील संपत्तीची, साधनांची, स्त्रियांची यथेच्छ लूट केली. घाबरट रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. शंकरदेव सैन्य घेऊन येईल आणि खिलजीचा पराभव करेल अशी त्याला आशा होती. खिलजीने हुशारीने एक अफवा स्वारीच्या आधीच सर्वत्र पसरवली होती की तो जे सैन्य घेऊन आला आहे ही तर एक छोटी तुकडी आहे, अजून प्रचंड मोठी फौज दिल्लीहून निघाली आहे. याचा परिणाम असा झाला की दक्षिणेतील एकही राजा रामदेवरायाच्या मदतीला आला नाही. तसेही या राज्याचे संबंध मित्रत्वाचे नव्हतेच. ते कायम एकमेकांशी भांडत असत.

    खिलजीने किल्ल्याला वेढा दिला, इतक्यात रामदेवरायाला कळले की ज्या धान्यसाठ्याच्या आधारे लढण्याचे मनसुबे आखले होते त्या धान्याच्या पोत्यात धान्याच्या जागी प्रत्यक्षात मीठ भरलेले आहे. गडावर फक्त २-३ दिवस पुरेल एवढाच जन्नसाठा आहे. सैन्य नाही. अन्न नाही, आणि शौर्य नाही अशा अवस्थेत रामदेवरायाने खिलजीसमोर शरणागती पत्करली व तहाची बोलणी सुरू केली. अल्लाउद्दीनने अव्वाच्या सव्वा खंडणी मागितली ती त्याने कबूल केली.

    दरम्यान शंकरदेव प्रचंड मोठे सैन्य घेऊन खिलजीवर चालू गेला. रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. खिलजी मात्र डगमगला नाही, प्राण पणास लावून लढला आणि त्याने शंकर देवाचाही पराभव केला. अशारीतीने फक्त ८००० स्वारांनीशी आलेल्या लिजीने अवघ्या १५ दिवसात बलाढ्य देवगिरीचा संपूर्ण पराभव केला. रामदेवरायाला मांडलिक बनविले. २४००० किलो (६०० मण) सोने, ४०००० किलो (१००० मण) चांदी, २८० किलो मोती, ८० किलो हिरे माणके आणि रेशीम कापडाचे ४००० ठाण, इतकी प्रचंड खंडणी आणि केलेली लूट खिलजीला मिळाली आणि दक्षिणेत सुलतानी आली. हा इतिहास वाचला की सुन्न व्हायला होतं आणि अनेक प्रश्न उभे राहतात. इतकी प्रचंड खंडणी देऊ शकणारं मोठं आणि वैभवसंपन्न साम्राज्य इतक्या सहजपणे आणि तडकाफडकी पराभूत का झालं? उत्तरेतील विस्तारवादी सुलतानी वृत्तीचा आणि आक्रमणाचा धोका कुणाच्याही लक्षात आला नव्हता का?

    उत्तरेतील अत्याचाराच्या बातम्या यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या का? हा धोका ओळखून प्रतिकारास व संरक्षणास कायम सिद्ध राहिले पाहिजे, उत्तर सीमेवर कडक बंदोबस्त हवा हे सांगणारा एकही मुत्सद्दी, एकही विचारी ब्राह्मण दरबारात नव्हता का? सेनापती, राजगुरू, हेरखाते काय करत होते? खिलजीला सीमेवरच का रोखला नाही? एवढ्या मोठ्या साम्राज्याचा दरबार इतका बेसावध आणि राजा इतका नेभळट कसा? राजावर काही संस्कार झाले नव्हते का? रयतेला शत्रूच्या तावडीत सोडून हा किल्ल्यात कसा काय लपतो? साम्राज्याच्या सीमा उघड्या आणि राजधानीच्या संरक्षणाला इतकी तुटपुंजी फौज कशी? किल्ल्यात येणारी धान्याची पोती कुणी पुरवली? घेताना कोणी तपासली? त्यात मीठ आहे हे कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही? की हा व्यापारी आणि अधिकारी यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार होता? पोती उतरवणाऱ्या हमालांच्या तरी लक्षात आलेच असेल ना, मग ते का गप्प बसले? का पैसे देऊन त्यांचीही तोंडे बंद केली गेली?

    असे अनेक प्रश्न उभे राहतात, यांची उत्तरे द्यायची झाली तर तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. सारांशरूपाने संक्षिप्त स्वरूपात निष्कर्ष काढला तर संपूर्ण राष्ट्रात म्हणजे रयतेपासून ते राजापर्यंत असलेला देव, देश, धर्म यांच्यावरील निष्ठेचा अभाव, सुखासीन, कामचुकार, भ्रष्ट वृत्ती, व्यक्तिगत स्वार्थ आणि लालसा यांचं प्राबल्य यामुळे लयास गेलेली वीरता, क्षात्रतेज आणि राष्ट्रहीत दक्षतेचा अभाव. यातील सर्वांत महत्त्वाची आणि तितकीच क्लेषदायक बाब ही की देवगिरीची ही स्थिती होती ती अफाट वैभव व सुबत्ता असताना आणि तेही स्वधर्मीयांच्याच राज्यात. आता दुसरा दाखला पाहू या.

    सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली आणि अविरत प्रयत्न आणि पराक्रमाने स्वराज्य निर्मिले. सन १६७४ मध्ये शेकडो वर्षांनी एक हिंदू छत्रपती झाला. सुलतानांची त्यांच्यानंतर, अंतर्गत व बाह्य शत्रूवर मात करून संभाजीराजे छत्रपती झाले.

    संपूर्ण भारत इस्लाममय करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या औरंगजेबाच्या डोळ्यात हे हिंदुराष्ट्र काट्यासारखे सलत होते. एका काफीराने स्वराज्य निर्मावे, छत्रपती व्हावे हे त्याला सहन होत नव्हते. औरंगजेबाचं साम्राज्य काबुलपासून मद्रासपर्यंत पसरलेलं होतं तो बादशाह नव्हता तर अतिश्रीमंत, बलाढ्या सत्तेचा शहेनशहा होता. मोगल साम्राज्याच्या तुलनेत स्वराज्याचे क्षेत्र किरकोळ होते. तसेच शस्त्रसामर्थ्य आणि आर्थिकबळ नगण्य होते.

    शिवाजी महाराजांचे निधन आणि मराठ्यांचा अंतर्गत कलह, याचा फायदा घेऊन हे काफिरांचे राज्य संपवण्याच्या हेतूने अफाट सैन्य आणि अपार संपत्तीचं पाठबळ घेऊन शहेनशहा दक्षिणेत उतरला. पहिल्या चार वर्षातच त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही संपविली आणि आपले संपूर्ण लक्ष मराठ्यांवर केंद्रित केले. या विषम लढाईत स्वराज्य चुटकीसरशी पराभूत होईल असेच वाटत होते मात्र झालं याच्या अगदी उलट.

    क्रूरकर्मा औरंगजेबाशी लढण्याच्या नुसत्या कल्पनेने एखादा गर्भगळीत झाला असता, पण 'मोडेन पण वाकणार नाही,' हे शिवशाहीचं तत्त्व. श्रींच्या इच्छेनुसार छत्रपतींनी निर्मिलेले स्वराज्य औरंगजेबाने गिळंकृत करावं हे छत्रपतींइतकेच तेजस्वी तडफदार असणाऱ्या संभाजीराजांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? तत्कालीन जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्याचा सम्राट, शहेनशहाला कडव्या मराठ्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल २५ वर्षे झुंजवला.

    आदिलशाही, कुतुबशाही पत्त्यासारख्या कोसळतात आणि तुलनेने दुबळे मराठे मात्र २५ वर्षे लढतात आणि विजयी होतात हे अद्भुतच होतं. या काळात मराठ्यांना फक्त मुघलांशीच नव्हे तर पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांच्याशीही लढावे लागले. याच काळात धर्मवीर संभाजींचा धर्मवेड्या औरंगजेबाने हालहाल करून केलेला वध मराठ्यांनी पाहिला. परंतु त्यामुळे खचून न जाता ते अधिक त्वेषाने चवताळून उठले आणि घट्ट पाय रोऊन उभे राहिले, लढले.

    छत्रपती संभाजीच्या नंतर मराठे पराभूत होतील असे वाटले होते पण राजाराममहाराज खंबीरपणे उभे राहिले. दुर्दैवाने रायगडाचा पाडाव झाला, महाराणी येसूबाई आणि छोटा शाहू औरंगजेबाच्या ताब्यात सापडले. कैद झाले. जवळजवळ सर्व स्वराज्याचा भूभाग औरंगजेबाच्या ताब्यात आला होता. छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी जिंजीला हलवावी लागली. अशाही परिस्थितीत मराठ्यांनी लढा सुरूच ठेवला. संताजी, धनाजींनी जबरदस्त प्रतीआक्रमणे केली.

    राजारामाच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य यांनी लढा सुरूच ठेवला. या कडव्या चिवट प्रतिकारामुळे आणि प्रतीआक्रमणामुळे औरंगजेब, त्याचे सैन्य खचले आणि हा शहेनशहा अखेरीस शोकमग्न, निस्तेज, पराभूत अवस्थेत या महाराष्ट्रातच १७०७ साली मरण पावला. त्याच्यासमोर मराठ्यांच्या तीन छत्रपतींचे मृत्यू झाले, स्वराज्याची महाराणी आणि राजपूत्र त्याच्या ताब्यात होते तरीही तो मराठ्यांना हरवू शकला नाही.

    या एकापेक्षा एक कठीण प्रसंगात छत्रपतींच्या वारसांनी, सरदारांनी, सामान्य लोकांनी केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. दैवाने मराठ्यांची अतिशय कठोर परीक्षा पाहिली, आपल्या निष्ठेच्या बळावर मराठेही त्यात खरे उतरले आणि मग दैवाने प्रसन्न होऊन विजयश्रीची माळ मराठ्यांच्या गळ्यात टाकली.

    देवगिरीच्या धक्कादायक पराभवामुळे मराठे खचले आणि त्यांना त्यातून सावरायला साडे तीनशे वर्षे लागली. तसेच औरंगजेबाच्या पराभवामुळे मोगल खचले आणि त्यानंतर दिल्लीच बादशाही कधीच प्रबळ झाली नाही. तिचा झपाट्याने हास होत गेला आणि त्यानंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे मोगलांकडून मराठ्यांच्या हातात आली. इतकेच नव्हे तर नंतरच्या बादशहांना दिल्लीच्या रक्षणासाठी मराठ्यांकडे याचना करावी लागली.

    बलाढ्य देवगिरी १५ दिवसांत खिलजीच्या मोजक्या सैन्याकडून पराभूत होते आणि सर्वशक्तीनिशी दक्षिण दिग्विजयासाठी आलेल्या शहेनशहा औरंगजेबाशी मराठे तुटपुंज्या शक्तीसामर्थ्यानिशी २५ वर्षे संघर्ष करतात आणि शेवटी त्यांचा पराभव करतात. मराठी राज्यकर्ते आणि रयत यांच्यात हा स्तिमित करणारा वैचारिक बदल कशामुळे घडला? एवढे मनोबल, तेज, शौय, हिमत त्यांच्यात कुठून आली? मराठ्यांच्या वृत्तीतला आश्चर्यकारक बदल, स्वराज्यासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी याचं एक प्रमुख कारण म्हणजे संतांचे विचार आणि कार्य.

    देवगिरी ते स्वराज्य या कालखंडात ज्ञानेश्वरांपासून ते समर्थांपर्यंतच्या संत चळवळीमुळे परचक्र पूर्ण भरात असतानाही धर्म, संस्कृती टिकली. या काळात संतांनी अविरत परिश्रमाने आपल्या भक्तीमार्गाद्वारे चारही वर्ण, चारही आश्रम, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञाता अशा चारही स्थितीतील भक्त या सर्वांना आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने ऋषंचे हे विचार सांगत सांगत लोकविचाराच्या केंद्रस्थानी देव, देश, धर्म यांची पुन्हा स्थापना केली. यांच्याबद्दल प्रेम निर्माण केलं. भौतिक कर्तव्यास तत्पर आणि पारमार्थिक प्रगतीबाबत दक्ष असा माणूस उभा केला. अस्मिता, तेज, पौरुष जागृत केले. या वैचारिक परिवर्तनामुळे शैथिल्य, षंढता पळाली आणि समाज मजबुतीने कुठल्याही आव्हानाला न घाबरता पाय रोवून उभा राहिला. आपले गतवैभव मिळवण्यासाठी सिद्ध झाला.

    विजयनगरच्या पराभवानंतर, मुघलशाही विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात संपूर्ण भारतात सर्वात आधी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांनी केली आणि ती यशस्वी झाली याचे मुख्य श्रेय महाराजांच्या सर्वसमावेशक अलौकिक नेतृत्वाला, शहाजीराजे आणि जिजाबाईंच्या संस्कारांना, तसेच धर्मवीर संभाजी, राजाराममहाराज, ताराबाई, सर्व मराठे सरदार आणि रयत यांना असलं तरी त्या चळवळीच्या यशस्वितेत संत विचारांचे योगदान पण महत्त्वाचेच आहे. या श्रेयातील उचित वाटा संतांच्या या कार्याला द्यावाच लागेल. संतांनी भलेही हातात शस्त्र धरले नसेल पण देव, देश, धर्मासाठी हातात शस्त्र घेणारे हजारो हात तयार केले हे नाकारणे, हे कृतघ्नतेचे लक्षण आहे.

    आजच्या तालिबान, अल कायदा, इसीस द्वारे केली जाणारी कृष्णकृत्ये, अत्याचार, दहशतवादी कारवाया बघितल्यावर तर असे वाटते की जर त्या काळी मराठे धर्मांध औरंगजेबाकडून पराभूत झाले असते आणि संपूर्ण हिंदुस्थानभर त्याची निरंकुश सत्ता प्रस्थापित झाली असती तर काय झाले असते, नुसत्या विचारानेही थरकाप उडतो.

    हे या भारतदेशाचे भाग्यच म्हणावे लागेल की, तुकाराममहाराज, शिवाजीमहाराज आणि समर्थ रामदास हे ईश्वरनिष्ठ त्रिकुट एकाच कालखंडात या भूमीवर कार्यरत होते. आज आपण स्वतंत्र आहोत आणि आपला धर्म, देश, देव टिकला तो यांच्यामुळेच. संतांचे हे उपकार विसरून चालणारच नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात हेच सांगितलंय,
    काय सांगो आता संतांचे उपकार ।
    मज निरंतर जागविती ।।
    काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ।
    ठेविता हा पायीं जीव थोडा ।।
    खिलजी आक्रमणापूर्वीची देवगिरीची, औरंगजेब आक्रमण काळातील आणि आजची आपली सामाजिक मानसिकता याची तुलना केल्यास लक्षात येईल की आजची परिस्थिती ही देवगिरीच्या परिस्थितीच्या जवळ जाणारी आहे. काही बाबतीत तर त्यापेक्षाही वाईट आहे.

    १९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध का झालं? त्यात आपला पराभव का झाला? कारगिलच्या वेळेसही शत्रूच्या हालचालींबद्दल आधी बातम्या मिळालेल्या असतानाही त्वरित कृती का केली गेली नाही? चीन सीमेवरील आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आहे का? चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळेस युद्ध करायची वेळ येऊ शकते यासाठी आपली काय तयारी आहे? एकंदरीतच आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आणि कालानुरूप आहे का? या प्रश्नांची उत्तरे अस्वस्थता निर्माण करणारी आहेत.

    ही स्थिती जर बदलायची असेल, धर्म, संस्कृती यांची होणारी घसरण जर थांबवायची असेल तर संतविचार समाजात प्रकर्षाने रुजविण्याची गरज आहे. एक असा समाज घडवण्याची गरज आहे ज्याच्या डोक्यात विठोबा आणि ओठात तुकोबा असेल आणि ज्याच्या बाहूत शिवबा आणि हृदयात ज्ञानोबा असेल.

    आजच्या शास्त्रीय आणि संगणकीय युगात तरुण पिढीला या विचारांकडे आकृष्ट करण्यासाठी संतविचारांची मांडणी तर्कसुसंगत, वास्तववादी आणि वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. एखादे प्रमेय जसे सप्रमाण सिद्ध करतो तसे संतविचारांचे महत्त्व आणि उपयोग सप्रमाण सिद्ध करण्याची गरज वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच. खरं तर मी कोणी ज्ञानी, पंडित, इतिहास संशोधक इ. नाही परंतु एक संस्कृतीप्रेमी म्हणून जे वाचलं, अभ्यासलं ते या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

    संतविचार कालबाह्य झालेले नसूनउलट आजच्या युगातील विषमता, जातीयवाद, दहशतवाद, फुटीरतावाद इ. वाद मिटवण्यासाठी त्यांची प्रामुख्याने गरज आहे असे मला वाटते. हा लेख वाचून वाचकांना ते पटले तर ते मी माझे भाग्य समजेन.

    -- मिलींद सुधाकर जोशी,
    पुणे

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • आतिथ्यशीलता

    मराठी खाद्यसंस्कृती जागतिक पातळीवर लोकप्रिय व्हावी ह्या उद्देशाने रिजनल फूड्सची सुरुवात सनी पावसकर ह्यांनी केली (२०१५). ‘मेतकूट’ आणि ‘काठ अन् घाट’ ह्या नावाची एकूण पाच रेस्टॉरंट्स ते यशस्वीपणे चालवत आहेत.

  • एका शर्तीच्या जीवनाची..

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये दे. ना. चौधरी यांनी लिहिलेला हा लेख


    माझा जन्म जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील भालोद गावचा. घरची परिस्थिती तशी बेताचीच. वडिलांना शेतीच्या उत्पन्नातून चरितार्थ चालवणे जिकीरीचे होऊ लागल्यावर त्यांनी शैक्षणिक साहित्य विक्रीचे दुकान टाकले. जिद्द, चिकाटी व त्याच्या जोडीला सचोटी यामुळे त्यांच्या उद्योगाचा विस्तार वाढला. अशा वातावरणातच माझा १९३० मध्ये जन्म झाला. व्हर्नाक्युलर (म्हणजे सातवीची) परीक्षा पास झाल्यावर वडिलांची अशी इच्छा होती की, जळगावच्या जवळ असलेल्या ममुराबाद येथील शेतकी फार्मवर नोकरीसाठी जावे. त्यांचा तसा आग्रह होता. तसे नोकरीबाबतचे पत्र देखील मला मिळाले होते. परंतु माझी इच्छा पुढे शिक्षण चालू ठेवण्याची होती. म्हणून मी नोकरी न स्विकारता एस.एस.सी. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्या काळात वाहातुकीची साधने उपलब्ध नव्हती.

    त्यामुळे डोक्यावर पेटी घेऊन मी माझ्या गावापासून ८ कि.मी. अंतरावरील भुसावळला पोहोचलो. तिथून जळगावला. एस.एस.सी. च्या परीक्षेसाठी रेल्वेने गेलो. शिक्षणासाठी संघर्षमय जीवनाचा शेवट इथेच संपत नाही. कॉलेजची शिक्षण घेण्याची माझी खूप इच्छा होती. तथापि वडील गावाचे मुलकी पाटील असल्यामुळे व त्यांचा संपर्क महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांशी येत असल्यामुळे त्यांना असे वाटत होते की, आपल्या मुलाने महसूल विभागात नोकरी धरावी. म्हणजे त्याला पुढे परिक्षा देऊन मामलेदार होता येईल व प्रांत ऑफिसरची जागा त्याला मिळू शकेल. कारण मामलेदार व प्रांत ऑफिसर म्हणजेच केवळ 'साहेब' अशी त्यावेळी ग्रामीण भागातील लोकांची समजूत होती. आणि तेच खरे अधिकारी समजले जात होते. कारण ग्रामीण भागातील लोकांचा केवळ या अधिकाऱ्यांशीच संबंध येतो त्यामुळे त्यांना ते देवासमान मानतात. त्यांचे बोलणे म्हणजे जणू देववाणीच समजतात. त्यामुळे वडील कॉलेज शिक्षणाला परवानगी देईनात कर्मधर्मसंयोगाने त्यावेळी श्री. डमरी (नंतर वित्त विभागात सचिव होते.) नाशिकला कलेक्टर होते. त्यांचा व वडिलांचा संबंध येत असे. वडिलांनी त्यांना सल्ला विचारला. त्यांनी मला नाशिकला एच.पी.टी. कॉलेजमध्ये शिकायला ठेवा, असा वडिलांकडे आग्रह धरला. एवढेच नव्हे तर माझे नाशिकमधील ते गार्डियन म्हणून राहणार असे वडिलांना सांगितले. मला पुणे किंवा नाशिकला कॉलेज शिक्षणासाठी जाता आले नाही.

    माझे काका नडियाद (गुजरात) येथे इंजिनियर होते. त्यांनी मला कॉलेज शिक्षणासाठी नडियादला येण्याचा आग्रह धरला. वडिलांचा विरोध सहन करून मी गुजराथ विद्यापीठातून बी. ए. ची पदवी मिळवली. लगेच माझा विवाह झाला. त्यानंतर नोकरी करून एल.एल.बी. ची पदवी मिळवली. अकाऊंटस् मध्ये क्लार्कची नोकरी करीतच माझं वकिली शिक्षण पूर्ण झाले. मी वकिली सुरू केली. वकिलीतून बऱ्यापैकी पैसे मिळू लागलेत. परंतु जळगावसारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहात असल्यामुळे आजारपणासाठी अथवा अन्य कारणासाठी जळगावला येणाऱ्या असंख्य नातेवाईकांमुळे माझे घर रेल्वेचे वेटिंग रूम झाले व माझ्या पत्नीला दवाखान्यात नातेवाईकांना डबे पोहोचविणे, आल्यागेलेल्यांसाठी चहा करीत बसणे हाच मुख्य व्यवसाय झाला. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ लागली. हे मला आवडले नाही. म्हणून मी सरकारी नोकरी स्विकारली व अकोल्यात असिस्टंट चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून रुजू झालो. थोड्याच दिवसात डेप्युटी चॅरिटी कमिशनर म्हणून पुणे व मुंबईत काम केले. त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या असिस्टंट ड्राफ्टसमन कम अवर सचिव व डेप्युटी ड्राफ्टसमन कम डेप्युटी सेक्रेटरी या मंत्रालयातील विधी व न्याय विभागासाठी जाहिरात आली. मी सुरुवातीला अवर सचिव म्हणून रुजू झालो. परंतु लगेच ४ महिन्यात उपसचिव पदासाठी झालेल्या निवडीमुळे उपसचिव झालो. पुढे ४ वर्षांत मला सहसचिवाचे पदी बढती मिळाली. पुन्हा पुढील ४ वर्षांनंतर माझी सचिवपदी पदोन्नती झाली. पुढील दोन वर्षात मी प्रधान सचिव झालो तर त्यापुढील २ वर्षानंतर सेवानिवृत्त झालो. त्यानंतर शासनाने प्रधान सचिव, पार्लमेंटरी अफेअर्स या विभगात माझी प्रधान सचिव म्हणून पुर्ननियुक्ती केली. शासनाने तिथून माझा सेवा कालावधी संपायच्या आतच राज्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त केले. राज्य निवडणूक आयुक्त म्हणून निवृत्त झाल्यावर महाराष्ट्र शासनाने मला महाराष्ट्र राज्य लॉ कमिशनचे चेअरमन म्हणून ३१ मे २००५ पासून नियुक्त केले. मी तिथून निवृत्त झालो. विधि आयोगाचे प्रामुख्याने काम म्हणजे आयोगाने राज्याचे विद्यमान कायदे व संविधानाच्या सातव्या परिशिष्टातील समवर्ती सूचीत मोडणारे कायदे तपासणे, त्याखाली केलेले नियम व अधिनियम हे संविधानातील तरतुदींशी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी सुसंगत आहेत का हे तपासणे, न्यायालयातील खटले वेगाने निकाली काढले जाण्यासाठी न्यायदान पद्धतीत सुधारणा सुचविणे, संपुष्टात आलेले कायदे तपासून आवश्यक असल्यास ते निरसित करणेविषयी सुचविणे, समान विषयासंबंधीचे कायद्यांच्या एकत्रीकरणाबाबत शिफारस करणे, एखाद्या विषयावर नवीन विधिविधान करण्यासाठी शिफारस करणे, वगैरे बाबींचा त्यात समावेश होतो.

    जीवनात वेगवेगळ्या टप्प्यावर माणसं मिळत जातात व ते आपल्या जीवनाला कलाटणी देऊन जातात. शाळेत असताना मी अतिशय व्रात्य होतो परंतु त्यावेळी श्री.एल.एन. सरांच्या मार्गदर्शनाखाली केलेला इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि त्या विषयाबद्दल माझ्यात निर्माण केलेली आवड माझ्या पुढील शिक्षणासाठी उपयुक्त ठरली. त्यांचे मला मार्गदर्शन लाभले नसते तर माझे पुढील शिक्षण घेण्याचे स्वप्न हे पहाटे पडलेले स्वप्न न होता मध्यरात्री पडलेले स्वप्न ठरले असते. त्यांनी मला जीवन कसे जगावे, त्यात प्रामाणिकपण असावा व सतत इतरांना मदत करीत राहावे ही शिकवण दिली व तसे वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला. तर वकिली करीत असताना मला वकील म्हणून घडविण्यात श्री. डी. डी. चौधरी या प्रथितयश वकिलांचा मोठा हात आहे. त्यामुळे मला वकिली करताना खूपच मदत झाली. तर मंत्रालयात विधी व न्याय विभागात रुजू झाल्यावर यशस्वी प्रारूपकार कसे होता येईल याचे धडे व मार्गदर्शन माझे वरिष्ठ अधिकारी श्री. धुरंधर व श्री. धोत्रे यांचे लाभले. त्याचा मला आयुष्यभर उपयोग होत राहिला. एवढंच नव्हे तर शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर विविध नियुक्त्या झाल्यात त्या प्रत्येक ठिकाणी मला त्या प्रेरकच ठरल्यात. माझ्या आयुष्यात मला लोकांचे सतत प्रेमच मिळत राहिले. म्हणूनच मी वयाची ८८ वर्षे आनंदाने पार करून अजूनही उत्साहाने कार्यरत आहे. शासकीय सेवेत असताना विशेषत्वाने बॅ. अंतुले, श्री. शंकरराव चव्हाण, श्री. शरद पवार, श्री. सुधाकरराव नाईक, श्री. विलासराव देशमुख व श्री. सुशीलकुमार शिंदे या मुख्यमंत्र्यांनी प्रोत्साहन दिले व माझा कामातील उत्साह वाढवत ठेवला. तसेच विधी व न्यायमंत्री बॅ. रामराव आदिक यांचेही भरपूर सहकार्य लाभले.

    माझ्या यशस्वी जीवनाचा पाया हा माझ्या पत्नीने रचलेला आहे. तिची मला मिळालेली आयुष्यभराची साथ ही केवळ भावनिकच नसून कणखर व्यक्तिमत्त्वाची लाभली व त्यामुळेच मला माझे शिक्षण पूर्ण करता आले. संस्काराच्या मंदिराला रूप देऊन घर उभं करणारी ही गृहकर्तव्यदक्ष गृहिणी म्हणजे माझी खरी मार्गदर्शिकाच आहे. आपल्यावर बेतलेल्या प्रतिकूल परिस्थितीतही आक्रसून न जाता येणाऱ्या प्रत्येक क्षणाला उत्साहाने सामोरे जाऊन भूतकाळात जास्त न रमता भविष्याकडे नजर ठेवून वर्तमानाला जास्त महत्त्व देणारी ही समयसूचक गृहिणी म्हणजे लेवा परिवारातील एक आदर्श महिला आहे. तिने मुलांवर बालवयात केलेले सुसंस्कार आणि घडविलेला बौद्धिक विकास यामुळेच मी यशस्वी झालो. ती म्हणजे माझ्या यशोदायी जीवनाची प्रेरणा आहे. माझ्या मुलांचा, सूनांचा सहवास हा आनंददायी आहे. कदाचित माझ्या ठणठणीत प्रकृतीचे तेच रहस्य असू शकते.

    या यशस्वी जीवनात शासकीय सेवेत असताना कटु अनुभव देखील आलेत. मला पुर्ननियुक्ती मिळाल्यावर काहींना ते आवडले नाही. मला मात्र वेदना झाल्यात. पण मी मनात काही ठेवीत नसतो. मी विसरलो. कारण आयुष्य हे नदीच्या प्रवाहाप्रमाणे प्रवाही आहे. त्या कटु आठवणी विसरूनच मार्गक्रमणा चालू ठेवली.

    डेप्युटी ड्राफ्टसमन असताना मला शासनाने (केंद्र व राज्य शासनाच्या शिफारशीनंतर) लंडनला 'Course for Govt. Legal Officers from Overseas, London' साठी पाठविण्यात आले. हा अनुभव भावी जीवनात खूप उपयुक्त ठरला. ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ इंटेलक्युअलस् यांच्यामार्फत The great son of the soil हा पुरस्कार मला नवी दिल्लीला A Prominent social worker म्हणून दिला होता.

    आपल्या जीवनाच्या प्रवासात आईवडील, शिक्षक, कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, मंत्री, मुख्यमंत्री यांचा जसा हातभार लागत असतो तसाच मी ज्या लेवा पाटीदार समाजात जन्माला आलो त्या समाजातील धुरीणांचा मी आभारी आहे. आमचा समाज बहुसंख्येने खानदेशात राहात असला तरी नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर विखुरलेला आहे. अशा समाजाला एकत्र आणून सामाजिक जाण निर्माण करून समजा सेवा करण्यास उद्युक्त करण्याच्या दृष्टीने लेवा पाटीदार महासंघ स्थापन केला. त्या महासंघाचा मी पहिला अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. माझ्या या समाजकार्याची जाण ठेवून ठिकठिकाणच्या शाखांनी माझा बहुमान केला व मला 'समाजभूषण' म्हणून गौरविले.

    मी साईबाबांचा निस्सीम भक्त आहे. मी १ डिसेंबर १९५९ पासून दरवर्षी १ डिसेंबरला कायम न चुकता शिर्डीला श्री साईबाबांच्या दर्शन, पूजा व आरतीसाठी जात असतो.

    काळ बदलतो तशा वृत्ती बदलतात आयुष्यात जी मानसिकता जपली तशी आताच्या पिढीत दिसत नाही. शासकीय सेवेत सेवाभावी वृत्ती हरपत चालली आहे. हे बघून मात्र खूप वाईट वाटते.

    -दे. ना. चौधरी

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

  • गटारी आमावस्या…

    पवित्र महिन्याची सुरुवात अशी व्हावी … हे आपल्या संस्कृतीचे दुर्भाग्य आहे…

  • तुकाराम दर्शन माझ्या दृष्टीनं झालेलं

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये अनंत कदम यांनी लिहिलेला हा लेख


    संत तुकाराम महाराज म्हणजे मराठी साहित्यातील एक महान तेजस्वी हिरा, दुःखितांना त्यांच्या अंधकारमय जीवनात वाट दाखवणारा तेजोमय ताराच! तुकारामांचं हृदय आकाशाएवढं. त्यांचं मन पर्वताएवढं उत्तुंग! गरिबांविषयी अफाट कळवळा! अपार उमाळा. गांजलेल्या- रंजलेल्यां विषयी अफाट कळवळा. असा हा थोर कवी मराठी साहित्याला लाभला. हे मराठी साहित्याचे मोठे भाग्यच! मराठी भाषेचे देखील. आणि महाराष्ट्राचे आणि भारताचेही.

    तुकारामांसारखा अफाट काव्य-प्रतिभा असलेला, दुःखितांविषयी, रंजल्या-गांजलेल्यांविषयी सागरा एवढा कळवळा असणारा कवी मराठी साहित्यातच काय पण अखिल जागतिक साहित्यात, जगांतील भाषांमध्ये सापडेल असं वाटत नाही.

    असा कवी प्रत्येक भाषेत एक तरी जन्मावा, असं वाटतं.

    - त्यामुळे माणसाची 'मानव' म्हणून काहीतरी प्रगती होईल, असा विश्वास वाटतो.

    तुकाराम महाराज हे एक वेगळ्या तऱ्हेची ईश्वर-भक्ती करणारे, महान भावभावना असणारे प्रखर विचारवंत, मानवतावादी, निष्ठावंत, वारकरी पंथातले संत कबीर (संत साहित्यिक). जुन्या मराठी साहित्य परंपरेत ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास इत्यादी संतकवी (संत साहित्यिक) होऊन गेले. पण तुकाराम त्या सर्वांपेक्षा पिंडाने, वृत्तीने, विचारांनी अगदी निराळे आहेत. त्यांची अभिव्यक्ती, ईश्वराविषयीची कल्पना, मानवाविषयीचे विचार, इत्यादी गोष्टी इतरांपेक्षा वेगळ्या आहेत. मानवतेविषयी त्यांच्यात जो एक अफाट धो धो वहाणारा उमाळा, कळवळा आहे तो कोणातही नाही.

    “पापाची वासना नको दावू डोळा ।
    त्याहुनि आंधळा बराच ।।
    निंदेचे श्रवण नको माझे कानी ।
    बधिर करोनि ठेवा देवा ।।
    अपवित्र वाणी नको माझ्या मुखा ।
    त्याहुनि मुका बरा बराच मी ।।
    नको मज कधी परस्त्री संगति ।
    जनांतु माती उठता भली ।।"
    भीत नाही आता आपुल्या मरणा ।
    दुःखी होता जना न देखवे ।।
    पराविया नारी रखुमाई समान ।
    हे गेले नेमून ठायींचेचि ।।
    जाई वो तू माते न करी सायास ।
    आम्ही विष्णुदास नव्हे तैसे ।।
    न साहावे मज तुझे हे पतन ।
    नको हे वचन दुष्ट वदो ।।
    तुका म्हणे तुज पाहिजे भ्रतार ।
    तरी काय नर थोडे जाले ।।
    मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास ।
    कठिण वज्रास भेदू ऐसे ।।
    मेली जित असो निजोनिया जागे ।
    जो जो जे जे मागे ते ते देऊ ।।
    भले तरी देऊ गांडीची लंगोटी ।
    नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
    माय बापाहूनि बहु मायावंत ।
    करू घातपात शत्रूहूनि ॥
    अमृत ते काय गोड आम्हांपुढे ।
    विष ते बापुडे कडू किती ।।
    तुका म्हणे आम्ही अवघेचि गोड
    त्याचे पुरे कोड त्याचेपरि ।।

    अशा तऱ्हेचे काव्य (लेखन) जगातील कुठल्या भाषेत सापडेल का? असो.

    तुकारामांचे अभंग म्हणजे दर्जेदार चांगल्या कविताच आहेत. त्या त्यांच्या स्व-तंत्र कविता आहेत. त्या 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरे ना ।।' या जातीच्या आहेत.

    महान विचार-वैभव, भाव-भावनांची श्रीमंती, उच्च नैतिकता, वास्तवाचे भान, व्यवहारात शुद्धता राखण्याचे मार्गदर्शन, कल्पनाविलासाचे भय नाही, थेट खऱ्या वास्तवाचे दर्शन, भावशुद्धीचे मनस्वी आवाहन, मानवी जीवन जगण्याचे उत्तेजन, अशा गोष्टींनी तुकारामांचे अभंग खचून भरलेले आहेत. त्यांची सारी काव्यनिर्मिती मानवतेला फारच उपकारक झालेली आहे. तुकाराम माणसाला जीवनातला एक आधार वाटतात. (आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणे तुकारामांची गाथा उशाला घेऊन झोपत असत!)

    तुकारामांनी ४६०० च्या वर अभंग लिहिले आहेत. त्यांच्या अभंगांची घडण (रचना) अगदी वेगळीच, त्यांचीच स्वतःची अशी आहे. कुणाचं अनुकरण नाही. 'कैवल्या'ची जाण द्यावी, आत्म्याचा लोकांना साक्षात्कार घडवावा, हा उद्देश ज्ञानेश्वरांच्या साहित्यनिर्मितीचा होता. ज्ञानेश्वरांच्या कल्पनाशक्तीने, व्यक्तीमत्त्वाने, प्रतिभेने श्रोता मंत्रमुग्ध होतो. त्या दृष्टीने ज्ञानेश्वर थोरच. पण प्रत्यक्ष वास्तवात माणसाच्या जगण्याचे काय?

    तुकारामांनी आपल्या काव्यातून जे विचार, भाव व्यक्त केले आहेत त्यातून माणसाला जीवनात जगण्यासाठी उभारी मिळते. तुकारामांचे अभंग म्हणजे तीव्र संवेदनाक्षम व चिंतनशील मौलिक अनुभवांचा अर्कच होय! ओतप्रोतपणे भरलेल्या मानव्यातच तुकारामांचं मोठेपण आहे. ज्ञानेश्वरांच्या व्यक्तीमत्त्वाभोवती चमत्कारांचे दैवी वलय आहे. तुकारामांच्या चरित्रात आणि साहित्यात चमत्कारांचा आढळ नाही.

    तुकाराम एक तथाकथित हलक्या जातीत जन्मलेले साधेसुधे प्रापंचिक गृहस्थ होते. संसाराची धुळधाण झालेले, तरी परिस्थितीवर मात करून आपल्या जीवनाला चांगले वळण लावण्याचा मनाचा निर्धार असलेले जिद्दी पुरुष होते.

    अशा स्वभावामुळे तुकाराम सामान्य माणसाला देखील आपलेसे वाटतात. मानवी जीवनातील आशा-निराशा, ताकद-दुबळेपण, सामर्थ्य व विकलता, सत्य-असत्य वागणूक, प्रांजलपणा-ढोंगीपणा, सज्जनपणा-दुर्जनपणा, अशा द्वंद्वांचा तुकारामांच्या अभंगांमध्ये प्रखरपणे, उरस्फोडी जोमदार आविष्कार झालेला आहे.

    तुकारामांना संतपण सहजासहजी मिळाले नाही. संतपण मिळावे, अशी इच्छा किंचित देखील त्यांच्या मनात कधी डोकावली नाही. 'अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी' या वृत्तीने त्यांचा रात्रंदिन संघर्ष चालला होता-स्वतःशी आणि जगाशी! त्यांतून त्यांना संतपद आपोआप प्राप्त झाले.

    अशा या संतकवी तुकारामांचा जन्म पुणे शहराजवळ असलेल्या देहू या खेडेगावी इ.स. १६०८ मध्ये झाला. (मृत्यू १६५०) आडनाव-आंबिले. कुळी-मोरे.

    गावात इतर लोकांच्या परिस्थितीच्या मानाने त्यांचे घराणे काहीसे ऐपतदार, 'पत'दार होते. शेती, सावकारी, व्यापार-उदीम हे त्यांच्या घराण्याचे पिढीजात व्यवसाय होते.

    जातीचे कुणबी (शेतात, मातीत श्रमणारे), पण उद्योगधंद्याने वाणी! त्यामुळे तुकारामांचे कुटुंबीय आपल्याला 'कुणब-वाणी' म्हणवीत असत. त्यात जातीय कमीपणा होता. तो एका व्यवस्थेने आपल्यावर लादलेला आहे, हे तुकाराम पूर्ण जाणून होते. उलट ते मोठ्या स्वाभिमानाने उपहासात्मक भाषेत आपल्या जातीय कमीपणाचा गौरवपूर्ण आविष्कार करतात...

    बरा कुणबी केलो ।
    नाही तर दंभेचि असतो मेलो ।।
    गर्व होता ताठा । जातो यमपंथे वाटा ।।

    तुकारामांना जन्मावरून उच्चनीचपणा ठरवणे मान्य नव्हते. त्यांची चांगल्या कर्मावर निष्ठा होती. ज्याचं कर्म चांगलं, तो 'उच्च' जातीचा, प्रतीचा, अशी त्यांची श्रद्धा होती.

    तथाकथित शूद्राति शूद्रांच्या मूक भावनांना चव्हाट्यावर मांडून त्यांना तुकारामांची बोलकं केलं आहे.

    तुकाराम विठ्ठलभक्त होते. पण 'विठ्ठल' हा त्यांचा देव संकुचित नाही. तो कुठल्या एका जातीचा, धर्माचा, वंशाचा, देशाचा आहे, या भावनेने तुकाराम त्याची पूजा करीत नाहीत. हा देव सर्व मानवतेचा आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. देवाविषयी तुकारामांची एक ठाम कल्पना आहे. ते म्हणतात- 'कुणाही जिवाचा न घडो मत्सर । वर्म सर्वेश्वर पूजनाचे!'
    तुकारामांचा ईश्वर सर्वांचा आहे, अखिल मानवतेचा आहे. तो कुठल्या तथाकथित जातीचा, वंशाचा, देशाचा, धर्माचा नाही.

    तुकाराम म्हणजे सर्व जाती, धर्म, वंश, देश असल्या भेदांना ओलांडून गेलेले एक अफाट 'मन' होते!

    तुकारामांचे आईवडील सत्प्रवृत्तीचे होते. घरच्या विशुद्ध सोज्ज्वळ वातावरणात तुकाराम लहानाचे मोठे झाले.

    'जोडोनिया धन उत्तम वेव्हहारे । उदास विचारे वेच करी,' अशा सत्त्वशील वृत्तीने तुकारामांनी आपल्या वडिलांचा धंदा पुढे चालवला. त्यामुळे समाजात तुकोबांना मान होता. प्रापंचिक जीवनातील त्यांची सुरवातीची वर्षे काहीशी सुखात गेली.

    पण तुकोबांचे सुखाचे दिवस जास्त काळ टिकले नाहीत... एकाएकी दुष्काळ आला. अन्न नाही, लोकांची उपासमार. दैव फिरले.

    एकामागून एक संकटे तुकोबांवर कोसळली.

    जीवनाची घडी पार बिघडली, विस्कटली. वयाच्या सतराव्या वर्षी आई व वडील, त्यानंतर वडील भावजय मरण पावली. त्यामुळे माठा भाऊ संसारत्याग करून घर सोडून तीर्थाटनास निघून गेला. तुकोबांच्या मायेचे घरचे छत्र कायमचे हरपले होते. चार प्रेमाचे शब्द बोलून धीर देणारे कुणी उरले नव्हते. त्यामुळे एकाकीपण, अस्वस्थपण आले. कामधंद्यावरून त्यांचं मन उडालं.

    या त्यांच्या मनःस्थितीचा गावातील स्वार्थी लोकांनी फायदा घेतला. त्यात तुकोबांना गरिबांविषयी अपार अनुकंपा. गरिबांची उपासमार पाहून त्यांचं मन कळवळत असे. गरिबांना दुकानातला माल ते सरळ उचलून देत. दुकान तोट्यात! दोन वेळच्या जेवणाइतपतही आवक राहिली नाही. पोटाला उपास पडू लागले. परोपकार, आत्मा, परमात्मा या गोष्टींचं स्मरण ठीक आहे. पण या पोटाचं काय? त्याला भूक लागते.

    त्याच्यात तीन वेळा अन्न टाकावे लागते. त्याची भूक फारच वाईट. ती पोटाला जाळून काढते. ही भूक जन्मभर माणसाला वणवणायला लावते. या पोटापायी माणसाला आयुष्यभर वणवणावं लागतं, धडपडावं लागतं. तुकोबांना हा अनुभव तीव्रपणे जाणवतो. तो त्वेषपूर्ण प्रत्ययकारक शब्दांत ओसंडून त्यांच्या तोंडावाटे बाहेर पडतो -

    किती येवढेसे पोट । केवढा बोभाट तयाचा ।।
    जळो याची विटंबना । भूक जना नाचवी ।।

    सुमारे दोन वर्षे फारच वाईट गेली. ज्यांच्याकडून येणे होते ते लोक तोंडे लपवायचे. त्यामुळे तुकोबांची परिस्थिती अधिकच बिकट झाली. कर्जाचा बोजा वाढला. सावकारांचे तगादे सुरू झाले.

    काय खावे, आता कोणीकडे जावे ।
    गावात रहावे कोण्या बळे ।।
    कोपला पाटील, गावचे हे लोक ।
    आता घाली भीक कोण मज ।।

    अशी परिस्थिती तुकोबांची झाली. शेवटी त्यांचे दिवाळे निघाले.

    मग काय? गावात कुटाळक्या करणाऱ्या लोकांना चांगलेच फावले. सगळीकडे तुकोबांची छी-थू! अवहेलनेने तुकोबांचे हृदय पिळवटून गेले. हताशपणे अशा वेळी तुकोबांच्या तोंडून शब्द बाहेर पडतात-

    तुका जाला सांडा । विटंबिती पोरे रांडा ।।

    या उद्गारात मोठी वेदना आहे, तरी या शब्दांत वाईट परिस्थितीशी टक्कर देण्याची वृत्ती दिसते, जिद्द दिसते. या शब्दांत 'कुठल्याही परिस्थितीत जगण्याचा प्रयत्न करायचाच,' हा संदेश मिळतो.

    दुष्काळात हजारो माणसे मेली. दुष्काळात तुकारामांची पहिली बायको मरण पावली. तिच्या नंतर त्यांचा मुलगा मृत्यूमुखी पडला. तुकोबांचा संसार कुठे आकाराला येत होता तोच दैवाने घाला घातला. त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं.

    साऱ्या घटनांचा तुकोबांच्या मनावर खोल परिणाम झाला. अवघ्या चार वर्षांच्या कालावधीत आई, वडील, भावजय, बायको, मुलगा ही कुटुंबातली माणसं मृत्यूने ओढून नेली. संपत्ती आली आणि आल्या पावलानेच निघून गेली. व्यवसायाचे मातेरे झाले. मान-प्रतिष्ठा धुळीस मिळाली. सगेसोयरे, गडीमाणसे, गुरेढोरे यांनी गजबजलेल्या घरावर अवकळा पसरली. जीवनातल्या नश्वरतेची, क्षणभंगुरतेची भयाण कल्पना तुकोबांना आली. 'देह मृत्याचे भातुके' हे त्यांना कळून चुकले.
    (भातुके म्हणजे खाऊ, साधे जेवण.)

    पडत्या काळात नातेवाईक, सदिच्छा, प्रेम या गोष्टी किती उथळ असतात, हे त्यांनी अनुभवले.

    बरे जाळीयाचे अवघे सांगाती ।
    वाईटाचे अंती कोणी नाही ।।
    जव मोठा चाले धंदा ।
    तंव बहिण म्हणे दादा ||

    हे वास्तव तुकारामांच्या चांगलंच अनुभवास आलं.

    त्यांना प्रपंचाचा वीट आला. भले भले लोक माणूसकीला पारखे झालेले पाहून ते एकदम वैतागले. प्रपंच, जग, सारं सारं त्यांना निरर्थक वाटले - त्यांच्या तोंडून शब्द ओसंडले

    बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
    वरी या दुष्काळे पीडा केली ।।
    अनुतापे तुझे राहिले चिंतन |
    जाला हा वमन संवसार ।।
    बरे झाले देवा बाईल कर्कशा ।
    बरी हे दुर्दशा जनामध्ये ।।
    बरे जाले जगी पावलो अपमान ।
    बरे गेले धन ढोरे गुरे ।।
    बरे झाले नाही धरिली लोकलाज ।
    बरा आलो तुज शरण देवा ।।
    बरे जाले तुझे केले देवाईल ।
    लेकरे बाईल उपेक्षिली ।।
    तुका म्हणे बरे व्रत एकादशी ।
    केले उपवासी जागरण ||

    तुकोबांनी प्रपंचाकडे पूर्णपणे पाठ फिरवली. त्यांनी हरी भक्तीचा मार्ग निश्चयाने कवटाळला. 'देव उभा उभी भेट,' असा त्यांना विश्वास होता. ते विठ्ठलाचे एकनिष्ठ भक्त झाले. 'केला पाषाणाचा विष्णु । परी पाषाण नव्हे विष्णु । या त्यांच्या उद्गारावरून देवाविषयीची त्यांची कल्पना समजते.

    तुकोबांना आधार हवा होता. त्यांनी आपला भार पांडुरंगावर टाकला.

    ईश्वर भक्तीसाठी चित्तशुद्धी व मूलग्राही दृष्टीची आवश्यकता आहे, असे ठाम मत तुकोबांचं होतं. साधनसामुग्री, कर्मकांडे त्यांना निरर्थक वाटत होती. तुकारामांची आत्मप्राप्तीची, ईश्वर प्राप्तीची साधना स्वतंत्र, स्वतःची अशी, एकाकी होती. त्यांना ईश्वरप्राप्तीसाठी गुरूची जरूरी लागल्याचं दिसत नाही.

    माणसाचं मन हे सर्व गोष्टींचे कारण आहे. मनाचे सामर्थ्य व कमकुवतपणा, मनाचे चांगलेपण व वाईटपण, यांवरच माणसाची उन्नती किंवा अधःपात या गोष्टी अवलंबून आहेत - जोपर्यंत अहंकार सुटत नाही, चित्त शुद्ध झाले नाही, तोपर्यंत ब्रह्मज्ञानाच्या, मोक्षसिद्धीच्या गोष्टी फोल आहेत, या ज्ञानाने त्यांचं मन, हृदय, वृत्ती, सारी प्रकाशित झाली.

    नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे ।
    आणूनि द्यावे निराळे हो ।
    इंद्रियांचा जय साधुनिया मन ।
    निर्विषय कारण असे तेथे ।।
    असे झाले. तुकारामांना ईशज्ञान !

    परमात्म्याच्या शोधासाठी धर्मग्रंथांनी, ईशतत्त्वज्ञांनी, धर्मपंथांनी आपापला प्रपंच थाटला आहे.
    पण परमात्मा आपल्या अंतर्यामीच आहे!- असा तुकोबांचा ठाम विश्वास आहे.

    परमात्म्याशी तादात्म्य पावण्यासाठी आपल्यापाशी मनाखेरीज दुसरे काहीच साधन नाही म्हणून तुकोबांनी सत्यासत्य स्वतः तपासून पाहिलं आणि स्वतःला जे पटलं त्याचाच स्वीकार केला. त्यासाठी त्यांना स्वतःच्या मनाशी व भोवतालच्या जगाशी सततसंघर्ष करावा लागला.

    रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग ।

    अंतर्बाह्य जग आणि मन! - या अभंगातून हा अनुभव प्रकट झाला आहे.

    भक्तीच्या मार्गात निराशेचे प्रसंग आले. पण त्यांनी उपासना अधिक नेटानेच चालविली. ते खचले नाहीत. हा अनुभव त्यांच्या 'ज्याची खरी सेवा । त्याच्या भय काय जीवा ।।' अशा अभंगातून येतो.

    भक्ती म्हणजे लाचारी, दीनवाणेपणा नव्हे, अशा वृत्तीची तुकोबांची भक्ती होती.

    शास्त्रांचं जे सार वेदांची जो मूर्ति ।
    तो माझा सांगाती प्राणसखा ।।
    सगुण निर्गुण जयाची ही अंगे ।
    तोचि आम्हा संगे क्रीडा करी ।।
    तुका म्हणे मी तो सगळाच विरालो ।
    विठ्ठलचि जालो दर्शनाने ।।
    देशकालवस्तू भेद मावळला ।
    आत्मा निर्वाळला विश्वाकार ।। -

    (हे भक्तीमुळे भक्ती प्रेमात बुडाल्यामुळे घडतं!)

    लवण मेळविता जळे । काय उरले निराळे ।
    तैसा समरस जालो । तुज माजी हरपलो ।।
    अग्निकर्पुराच्या मेळी । काय उरली काजळी ।।
    तुका म्हणे होती । तुझी माझी एक ज्योती ।।
    - अशी होती तुकोबांची भक्ती. परमात्माच मिळाला मग काय मागायचे? स्वर्गभोग, इंद्रपद, ऋद्धीसिद्धी, वैकुंठवास वगैरे या सर्व गोष्टी तुकोबांना तुच्छ, फोल वाटतात. ते लौकिक सुखाच्या पलीकडे गेलेले होते.
    ...........

    .............

    तुकाराम वारकरी संप्रदायाचे निष्ठावंत, विचारवंत, संत होते. समाजाच्या धर्म श्रद्धेला तत्त्वचिंतनाची व चित्तशुद्धीची जोड देऊन ईश्वर भक्तीबाबत विवेकशील मार्गदर्शन करणारे विचारवंत म्हणून संतांमध्ये अग्रेसर ठरतात.

    ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास आणि तुकाराम यांच्या जीवन निष्ठा भिन्न नाहीत. माणूसकीविषयी सर्वांना उमाळा. प्रेम, सत्य, चांगलेपण, करुणा इत्यादी गोष्टी सर्वांना मान्य आहेत. पण तुकाराम इतर संतांहून वेगळेवाटतात, वेगळे आहेत, ते त्यांच्या निवेदन शैलीमुळे, वृत्तीमुळे, धडक बाज व्यक्तीत्वामुळे आणि दुःखितांविषयी त्यांच्या हृदयात असलेल्या अफाट कळवळ्यामुळे.

    ज्ञानेश्वरांची, एकनाथांची भाषा सौम्य, शांत आहे. तुकाराम सज्जनांचा गौरव करतात. दुर्जनांचे वाभाडे काढतात. तिथे त्यांची भाषा फार कठोर होते. तुकोबा सत्य कथनाच्या बाबतीत कुणाची भीड मुरवत ठेवत नाहीत. ते नीचतेचा कठोर शब्दांत निषेध करतात. हे येरागबाळ्याचे काम नाही. त्यासाठी पराकाष्ठेची निस्पृहता व निर्भयता हे गुण अंगी लागतात. तिथे नुसते सिद्धान्त सांगून चालत नाही.

    धर्मासारख्या पवित्र गोष्टींचा बाजार मांडून भोळ्याभाबड्या लोकांना फसविणाऱ्या वेषधारी लोकांची तुकोबांना भयंकर चीड होती.

    समाजातील दुष्ट, दुर्जन लोकांविरुद्ध लढण्यासाठी त्यांना मेणाहून मऊ असलेले मन वज्राहून कठीण करावे लागले.

    देव्हाऱ्यावरी विंचू आला । देवपूजा नावडे त्याला ।
    तेथे पैजाराचे काम । अधमाशी तो अधम ।।
    अशी त्यांची रोखठोक विचारसरणी होती.

    निर्वैर बुद्धीची आणि कठोर कर्तव्यनिष्ठेची मनोमन साक्ष त्यांच्या 'देता तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे।' या अभंगातून मिळते.

    योगविद्येच्या श्रेष्ठत्त्वाची, सामर्थ्याची त्यांना कल्पना होती. पण सिद्धी व चमत्कार यांच्या भजनी लागल्याची लोकांची प्रवृत्ती अनर्थकारक वाटत होती.

    शील, सद्गुणी, चांगले आचार-विचार त्यांना हवेसे होते. कर्मठपणाचा बडेजाव त्यांना नकोसा होता.

    ज्ञानेश्वरांच्या सिद्धान्तावर तुकोबांची श्रद्धा होती.

    पण वितंडवाद, विद्वज्जडता, कोरडा वेदान्त, अर्थशून्य पाठांतर, या गोष्टींची त्यांना 'नावड' होती. त्यांच्या बाबतीत ते म्हणतात - "तुका म्हणजे वादे । वाया गेली ब्रह्मवृंदे ।।"

    तुकोबांनी सोंगं ढोंग उघडी पाडून लोकांना जागे करण्याचं काम चांगले केले.

    सर्व संप्रदायातील संकुचितपणा, दुराग्रह, ढोंगीपणा, साचेबंदपणा या गोष्टींवर तुकोबांचा डोळा होता.

    समाजधारणेला आवश्यक, शाश्वत असणाऱ्या अशा नीतीमूल्यांचा पाठपुरावा तुकोबांनी ज्या तळमळीने केला तसा फारच थोड्या सत्पुरुषांनी केला असेल.

    तुकारामांइतका दुःखितांसाठी असलेला डोंगराएवढा उमाळा आणि सागराएवढा कळवळा जगातील कुणाही कवी/लेखकांमध्ये असेल, असं वाटत नाही.

    शेक्सपियर जगातला महान लेखक म्हणून समजला जातो. मुळात तो कवी आहे. त्याने सदतीस नाटके लिहिली आहेत. त्याची सारी नाटके राजे-राण्या, राजपुत्र- राजकन्या यांविषयी, त्यांच्या जीवनाविषयी असली तरी त्या नाटकांमध्ये मानवी भाव-भावनांचंच चित्रण असतं. शेक्सपिअरला अखिल मानवतेचं आकर्षण आहे. त्याचं मानवतेवर प्रेम आहे. साऱ्याच नाटकांतून काव्यमय विचार वाहत असतात. त्याच्या सुनितांमधून उच्च प्रतीचं काव्य वाहतं - प्रेम वाहतं. त्याची "Let me not adm impediments to the marriage of true minds," ही जगातील श्रेष्ठ, अप्रतिम प्रेमकविता (सुनीत) मानली जाते. या कवितेत प्रेम-भावना फारच उदात्त, उत्तुंग आहे. तिच्यात एकनिष्ठ प्रेमाचं अप्रतिम चित्र रेखाटले आहे.

    त्या कवितेतल्या काही ओळी उद्धृत करतो -
    "Let me not to the marriage of true minds Admit impediments. Love is not love which alters when it alteration finds, Or bends with the remover to remove O no! It is an ever-fixed mark, That looks on tempests and is never shake. It is the star to every wandering bank Whose worth's unknown..... Love is not times's fool though rosy lips and cheeks within his bending sickde's compass come; Love alters not with his brief hours and weeks, But bears it out even to the edge of doom."

    - अशा अमर ओळी शेक्सपियरच्या नाटकांतून व कवितांतून सतत वाहत असतात. शेक्सपीयर जगभर पसरला. तो एकट्या इंग्लंडचा राहिला नाही. तो अखिल जगाचा झाला.

    शेक्सपियरच्या काळात त्याचे काही समकालीन स्कॉलर नाटककार, लेखक, समीक्षक त्याला कमी लेखायचे. खूप मोठा काळ उलटून गेला आहे. शेक्सपियरचे ते समकालीन काळाच्या ओघात विस्मृतीत गेले. शेक्सपियर अद्याप जिवंत आहे. त्याची नाटके, कविता वाचकांना अद्याप दंगवित, गुंगवित आहेत.

    तुकारामांचे अभंगांतील विचार अखिल मानवतेसाठी आहेत. तुकारामही अखिल जगाचा कवी आहे. पण तो जगभर पसरला नाही. त्याचे अभंग जगभर पोचवण्याचं काम झालं नाही. काही वर्षांपूर्वी कवी दिलीप चित्रे यांनी तुकारामांच्या काही अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करून, त्यांचा ग्रंथ प्रकाशित करून, तुकारामांना जगभर पसरवण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न किती यशस्वी झाला हे काही सांगता येत नाही.

    सुमारे चारशे वर्षे उलटून गेली. आजही तुकारामाचे अभंग मराठी मनांना दंगवित, गुंगवित असतात. त्यांच्यातील आशय आजच्या काळालाही, आजच्या जीवनालाही लागू पडतो.

    शेक्सपिअर जगातला महान लेखक, कवी तरी तुकारामांमध्ये दुःखितांसाठी, रंजलेल्या-गांजलेल्यांसाठी जो अफाट, सुसाट उमाळा, कळवळा आहे तसा तो शेक्सपियरमध्ये नाही. या बाबतीत तुकारामांना कुणी ओलांडून गेलेला दिसत नाही.

    तुकाराम आणि शेक्सपियर या दोहोंमध्ये एक साम्य आहे. तुकारामांनाही काहींनी कमी लेखलं होतं. पण हे दोघे काळाला पुरून उरले आहेत.
    असो.

    भावशुद्धी, संयम, सत्यनिष्ठा, सदाचरण, भूतदया, समबुद्धी, परोपकार यांतच खरी ईश्वराची पूजा (भक्ती) आहे, असं तुकोबांचं ठाम मत होतं.

    भूतदया जाचे मनी । त्याचे घरी चक्रपाणी ।।
    तोचि देवभक्त । भेदाभेद नाही ज्यात ।।

    'निर्वैर होणे साधनाचे मूळा' इत्यादी अभंगांतून त्यांचं देवभक्तीविषयी मत व्यक्त झालेलं आहे.

    जातपात वगैरे या भेदाभेदाच्या गोष्टी तुकोबांना मुळीच मान्य नव्हत्या. नैतिकतेतच माणसाची खरी थोरवी, हे तुकोबांचं ठाम मत होते. जीवनातील सर्व दुःखांचं मूळ भेदभावनेत आहे, हे ते जाणून होते.

    परमात्मतत्त्व सगुण व निर्गुण, द्वैत व अद्वैत या द्वंद्वांच्या पलीकडचे आहे, अशी तुकोबांची श्रद्धा होती. मोक्षाची कल्पना त्यांना मान्य नव्हती. त्यांना भक्ती महत्त्वाची वाटत होती. ज्ञान, योग वगैरे मार्गांच्या ती तोडीची त्यांना वाटत होती.

    देवाची कल्पना उदात्त असायला हवी. क्षुद्र देवतांच्या पूजनाला त्यांचा विरोध होता. परमार्थ 'याचि देही, याचि डोळा' पहाता आला पाहिजे, असं त्यांचं मत होतं. शरीर आत्म्याचे मंदीर बनावे, हे मनावर अवलंबून आहे. अंतःकरण निर्मळ हवे, मग सर्व काही कल्याणप्रद होते, अशी त्यांची मतं होती. प्रपंच आणि परमार्थ, नीती आणि व्यवहार यांच्यातील विसंवाद त्यांना काढून टाकायचा होता.

    चित्त निर्मळ हवे, उपासतपासांची जरूरी नाही, सदाचारी वागणे हवे, मन निर्वैर हवे, असा त्यांनी भक्तीचा सोपा मार्ग दाखवला.

    कुठल्याही गोष्टीचा योग्य उपयोग करायला हवा, उपकारक गोष्ट अपकारक होऊ न देण्याची काळजी घ्यावी, असं त्यांचे सांगणे होते.

    तुकारामांचं काव्य म्हणजे अकृत्रिम आत्माविष्कार आहे. त्याविषयी ते सांगतात -

    अंतरीचे द्यावे स्वभावे बाहेरी।
    धरिता ही परी आवरेना ।।
    काय मी पामर जाणे अर्थभेद ।
    वदवी गोविंद ते चि वदे ।।
    आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
    शब्दांचीच शस्त्रे यत्ने करुनी ।।
    शब्दचि आमुच्या जीवाचे जीवन ।
    शब्द वाटू धन जनलोका ।।
    तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
    शब्देंचि गौरव पूजा करू ।।

    तुकाराम स्वभावाने तीव्र संवेदनशील व चिंतनशील होते. त्यांच्या वाणीत तत्त्वनिष्ठेचा कस व सहानुभूतीचा ओलावा होता वैयक्तिक हितावर त्यांनी कधीच पाणी सोडलेले होते. त्यामुळे अलिप्तपणा व निस्वार्थीपणा त्यांच्या अंगी बाणवला गेला होता.

    त्यांचा झगडा दुष्ट प्रवृत्तींशी होता. कुणाही व्यक्तीशी नव्हता. त्यांची दृष्टी व्यापक व वस्तुनिष्ठ, वास्तववादी होती. त्या दृष्टीत अंतरीची ओल होती.

    त्यांच्या अनुभवांत उथळपणा व एकांगीपणा नाही. त्यांचे अनुभव संपन्न, सकस आहेत. त्यांचे विचार व भावना एकमेकांना पुरक आहेत. त्यांची भाषा मराठमोळी व दणकट आहे. त्यांच्या भाषेवर 'संस्कृत भाषे'ची अवास्तव छाप नाही! - त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, समर्पक, उठावदार आहेत.

    थोड्या शब्दांत पुष्कळ अर्थ ओतण्याची ताकद तुकोबांमध्ये आहे. त्यांची भाषा काहीशी राकट आहे. रोखठोक आहे. त्यांनी दिलेले दाखले रोजच्या जीवनातले आहेत, मर्मग्राही व परिणामकारक आहेत, त्यांचा वाक्प्रवाह धो धो वाहणारा आहे - शांत, संथ नाही. भाषेत उत्कटता, आवेश आहे. त्वेष व तिरसटपणाही आहे.

    दुर्जनांना दहशत बसेल असं सामर्थ्य सज्जनांनी संपादन केले पाहिजे तरच जगात सत्याचा आणि सद्गुणांचा जय होईल, अशी त्यांची धारणा होती. सौजन्य व सामर्थ्य यांचा संयोग घडवून आणण्याची तळमळ त्यांच्या हृदयात सतत घुसळत होती.

    आकाशाएवढे अफाट हृदय व पर्वताएवढे उत्तुंग मन असलेले संतकवी तुकाराम महाराज यांच्या अभंगांतील अगदी थोड्याश्या ओळी उद्धृत करून मी त्यांच्यावरील लेखाचा शेवट करतो -

    नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।
    जाऊनिया तीर्था काय तुवा केले ।
    चर्म प्रक्षाळिले वरी वरी ।
    दया क्षमा शांति । तेथे देवाची वसति ।।
    दया तिचे नाव भूतांचे पाळण ।
    आणिक निर्दाळण कंटकांचे ।।
    क्षमा शस्त्र जया नराचिया हाती ।
    दुष्ट तया प्रति काय करी ।।
    तृण नाही तेथे पडला अग्नि ।
    जाय तो विझोनि आपसया ।।
    मुंगी आणि राव । आम्हा सारखाची जीव ।।
    बोले तैसा चाले । त्याची वंदीन पाऊले ।।
    चित्त शुद्ध तर शत्रूही मित्र होती ।।
    शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी ।।
    ओले मातीचा भरवसा । का रे धरिशी मानसा ।।
    डोळे चिरीव चांगले । वृद्धपणी सरक्या झाले ।।
    नाक सरळ चांगले । येऊन हनुवटी लागले ।।
    तुका म्हणे आले नाही । तंव हरिला भज रे काही।।
    धन मेळवूनि कोटी । सवे न ये रे लंगोटी ।।
    भाव ज्याचे गाठी । त्यासी लाभ उठाऊठी ।।
    देव आहे अंतर्यामी । व्यर्थ हिंडे तीर्थग्रामी ।।
    दुधी असता नवनीत । नेणे तयाचे मथित ।।
    भोगावरी आम्ही घातला पाषाण ।
    मरणा मरण आणियले ।।
    वृक्ष वल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
    पक्षीही सुस्वरे आळविती ।।
    तुडता हे जन न देखवे डोळा ।
    येतो कळवळा म्हणवुनि ।।
    जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले ।।
    तोचि साधु ओळखावा । देव तेथेचि जाणावा ।
    हिरा ठेविता ऐरणी । वाचे मारिता जो घणी ।।
    तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ।।
    गाईचा जो भक्ष अमंगळ खाय ।
    तिचे दुध काय सेवू नये ।।
    तुका म्हणे काय सल पहासी काज ।
    फणसातील बीज काढुनि घ्यावे ।।
    अर्थेविण पाठांतर कासया करावे ।
    व्यर्थचि मरावे घोकूनिया ।।
    आलिया भोगासी असावे सादर ।
    देवावरी भार घालू नये ।।
    आता तरी पुढे हाच उपदेश ।
    नका करू नाश आयुष्याचा ।।
    सकळांच्या पाया माझे दंडवत ।
    आपुलाले चित्त शुद्ध करा ।।
    भाग्यवंत घेती वेचुनिया मोले ।
    भारवाही मेले वाहता ओझे ।।
    आंधळ्यासि जन अवघेचि आंधळे ।
    आपणासि डोळे दृष्टी नाही ।।
    रोग्या विषतुल्य लागे मिष्टान्न ।
    तोंडासि कारण चवी नाही ।।
    तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण ।
    तया त्रिभुवन अवघे खोटे ।।
    लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।।
    ऐरावा रत्न थोर । तया अंकुशाचा मार ।।
    ज्याचे अंगी मोठेपण; तया यातना कठीण ||
    तुका म्हणे जाण । व्हावे लहानाहुनि लहान ।।
    हालवूनि खुंट। आधी करावा बळकट ।।
    मग तयाच्या आधारे । करणे अवघेचि बरे ।।

    --अनंत कदम,
    वसई रोड

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • रम्य ते बालपण : यजुवेंद्र महाजन

    माझा जन्म जळगावचा. मात्र माझे सारे बालपण आणि शालेय शिक्षण जळगाव जिल्ह्यातील एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी झाले. माझे वडील पेशाने डॉक्टर होते. तरी गावात नर्सरी, पोल्ट्री, फिशरी, गाई-म्हशींचा गोठा व्यावसायिक उपक्रम त्यांनी चालवून पाहिले. बालपणीचा काळ विविध अनुभवांनी समृद्ध ठरला.