वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात यावर मी जास्त टीका टिप्पणी करू इच्छित नाही. हे काम आपल्यावरच सोपवतो. अखंड महाराष्ट्रात सर्वाना समान कायदा,सेवा सुविधा सारख्या प्रमाणात मिळाव्यात अशी मागणी केली तर तो परत बटबटीत पणा भडक पणा वाटेल .
May 3, 2010
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने या बटाटा चिप्सवर ‘अनावश्यक खाद्यपदार्थ’ (non essential food) म्हणून बंदी घातली होती. अर्थात या चिप्सच्या उत्पादकांनी ही बंदी मोडून काढली. म्हणून १४ मार्च हा अमेरिकेत नॅशनल पोटॅटो चिप्स डे म्हणून साजरा केला जातो. बटाटा चिप्स हा अमेरिकन मंडळींचा नंबर वन स्नॅक्स आहे. भारतातली परिस्थिती काही वेगळी नाही.
उपवासाचे दिवस आणि काही पदार्थ यांचं समीकरण पक्कं आहे. एक काळ उपवासानिमित्त खास घरी रांधल्या जाणाऱ्या पदार्थाचा होता. त्यानंतर रेडीमेड पदार्थाची मागणी वाढली. या पदार्थात सर्वात जास्त डिमांडमध्ये असणारा पदार्थ म्हणजे बटाटा वेफर्स. उपवासच कशाला, साखरपुडा, पूजा, वाढदिवस, बारसं, छोटी मोठी पार्टी या सर्व ठिकाणी संचारी असलेले बटाटा वेफर्स त्यांच्या सहजपणामुळे आवडीचे असले तरी फारसे गंभीरपणे पाहिले जात नाहीत. मुळात हा पदार्थ गंभीरपणे पाहण्याचा नाहीच. क्षणांचा चस्का किंवा तात्पुरतं खाऊ-पिऊ या वर्गातले वेफर्स बाजारपेठेत मोठी उलाढाल घडवतात.
आज बटाटय़ाशिवाय भारतीय स्वयंपाकघराची कल्पनाच होऊ शकत नाही. पण बटाटा हे कंद आपणा भारतीयांसाठी खूप अलीकडचं आहे. पोर्तुगिजांनी ते स्पॅनिश दर्यावर्दींकडून स्वीकारलं आणि पोर्तुगिजांमार्फत पश्चिम किनाऱ्यावर बटाटा रुजला. त्यानंतर तो भारतभर पसरला. बटाटा हे पोटॅटोचं पोर्तुगीज नाव आपण स्वीकारलं हे मान्य करता येतं पण ब्रिटिशांमार्फत बाकीच्या भारतात पसरताना तो आलू का झाला हे कळत नाही. तर असा हा बटाटा म्हटला तर, खूप अलीकडचा. पण कंद म्हणून त्याने रताळ्याला मागे टाकत उपवासाच्या पदार्थात बाजी मारली.
बटाटा युरोपात नेहमीच लोकप्रिय राहिलेला आहे. १८१७ मध्ये इंग्लंडमधील विल्यम किचनर्सने त्याच्या द कुक ओरॅकल या पाककृती पुस्तकात एक पाककृती छापली. ज्यात बटाटय़ाचे अगदी पातळ काप करून ते तळण्याविषयी लिहिले आहे. त्या अर्थाने बटाटा वेफर्सचा उद्गाता विल्यम किचनर्स ठरावा. मात्र हे नाव फारसे प्रचलित नाही. युरोपीय देशात बटाटा चिप्सच्या शोधाची कृती अनेकजणांनी जॉर्ज क्रम या प्रसिद्ध शेफशी जोडली आहे. या पाककृतीला तितकीच खमंग एका आख्यायिकेची फोडणी आहे. या जॉर्ज क्रमचं न्यूयॉर्क मधल्या Saratoga Spring नामक शहरात मून लेक हाउस नावाचं रेस्टॉरंट होतं. २४ ऑगस्ट १८५३ रोजी एका गिऱ्हाईकाने फ्राइड पोटॅटोची मागणी केली. जॉर्जने त्याला ते सव्र्ह केले मात्र गिऱ्हाईकाने त्या बटाटय़ाच्या जाड-जाड कापांबद्दल नाराजी व्यक्त केली. प्रख्यात शेफ असणाऱ्या जॉर्जला कदाचित हा अपमान वाटला. त्याने खोचकपणे अतिपातळ काप करून ते खूपच जास्त तळले जेणेकरून ते कडक होतील आणि त्यावर मीठ भुरभुरवले. हेतू होता की त्या ग्राहकाला डिवचता यावे, घे लेका! किती पातळ काप हवेत ते खा ! पण परिणाम उलट झाला. ग्राहक खूश झाला. त्याला ते काप तुफान आवडले आणि अशा प्रकारे बटाटा चिप्सच्या पर्वाला सुरुवात झाली.
या दोन्ही जन्मकथांकडे नीट नजर टाकता, क्रमच्या बाबतीत घडलेली गोष्ट अतिरंजित वाटू शकते. याचं पहिलं कारण एखाद्या ग्राहकाला धडा शिकवण्यासाठी कोणताही शेफ चुकीच्या अर्थाने पदार्थ खराब करण्याचा प्रयत्न करणार नाही. हा किस्सा नक्की घडला असावा मात्र ग्राहकाला धडा शिकवणे वगैरे खमंगपणाच्या मिषाने जोडले गेले असावे. आता प्रश्न उरतो, मग या किचनर साहेबांच्या पाककृतीचे काय? यावर असं म्हणता येईल की शेफ खूप सारे प्रयोग करत करत एखादा पदार्थ अजमावून पाहतो. पाककृतींच्या पुस्तकातसुद्धा पाहा चित्रविचित्र नावांच्या हजार पाककृती असतात. पण त्या सगळ्याच लोकप्रिय होतात का? शेफ किचनरने पाककृती दिली आणि शेफ क्रमने ती लोकप्रिय केली असा सुवर्णमध्य काढता येईल.
आपण बटाटा वेफर्स म्हणतो. अमेरिकन मंडळी पोटॅटो चिप्स म्हणतात. तर ब्रिटिशांनी पोटॅटो क्रिस्प हे नाव स्वीकारलं आहे. एक गोष्ट आणखी नमूद करण्यासारखी आहे- ती वॅक्स पेपरच्या वापराची. बटाटा वेफर्सचा प्रचार तर जोरात होत होता, मात्र हवेच्या संपर्कात आल्यावर ते पटकन नरम पडतात हे लक्षात घेऊन लॉरा स्कडर या कॅलिफोर्नियास्थित उद्योजिकेने वॅक्स पेपरबॅग्जमधून वेफर्स विक्री सुरू केली आणि त्यामुळे त्याचा खप वाढला. आज प्लस्टिक बॅग्जमधून हे चिप्स खूप मोठय़ा प्रमाणावर विकले जातात. या चिप्सच्या पाकिटातल्या चिप्सच्या संख्येवर आणि हवेच्या प्रमाणावर होणारे विनोद सुप्रसिद्ध आहेत. वेफर्स कमी आणि हवा जास्त असण्याचं कारण असं की, सध्या या रॅपर्समध्ये वेफर्स, चिप्स जास्त काळ टिकावे याकरता नायट्रोजन गॅस त्या पाकिटात आधी ब्लो केला जातो. त्यामुळे चिप्स मोडत नाहीत व अधिक काळ टिकतात.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ट्रेनमधून घरी जाईपर्यंत पोटाला आधार म्हणून पाच -दहा रुपयांची बटाटा वेफर्सची पाकिटं घेणाऱ्या चाकरमान्यांपासून ते डब्यात बटाटा वेफर्सच हवेत म्हणून हट्ट करणाऱ्या चिल्यापिल्यांपर्यंत आणि उपवास ना उद्या वेफर्स आणा हां ! म्हणणाऱ्या गृहिणीपर्यंत वेफर्स सर्वप्रिय आहेत. तळलेला बटाटा, त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम, वाढती चरबी यावर सगळेच हिरिरीने बोलतील. पण समोर बटाटा वेफर्सचं पाकीट वा डिश आल्यावर मात्र जास्त नको म्हणता म्हणता सगळी डीश कधी संपते कळत नाही. एक वेफर खाऊन गप्प बसणारी मंडळी साधक असावी. सर्वसामान्य पामर मात्र एक, एकसे भले दो, दो से भले तीन म्हणत बॅटिंग करतात, त्यात त्यांचा दोष नाही. हा पदार्थच असा आहे. त्याचा तो केवडय़ासारखा रंग, गोलसर लांबट आकार आणि कुरकुरीत चव कुणालाही प्रेमात पाडणारी. दोन बोटांच्या चिमटीत पकडून वेफरचा तुकडा मोडावा. अगदी सूक्ष्मपणे उडणारे मिठाचे कण चेहऱ्यावर झेलावे. तेलकट तवंग मुखात पसरावा आणि त्या करमकुरम आवाजाने उगाचच उत्साही वाटू लागावे ही भावावस्था आपोआप निर्माण होते. त्या वेफर्ससारखीच कुरकुरीत.
-- रश्मि वारंग.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
March 14, 2022
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं याति क्षयं यौवनं
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः कालो जगदभक्षकः ।
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला विद्युच्चलं जीवितं
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना ॥१५॥
या नश्वर जगातून वाचवण्यासाठी ईश्वर असणाऱ्या भगवंताला आचार्य श्री प्रार्थना करीत आहेत. ते सांगतात,
आयुर्नश्यति पश्यतां प्रतिदिनं - पहा! हे आयुष्य रोज कमी कमी होत चालले आहे. वास्तविक आयुष्यातील एक दिवस कमी होणे म्हणजे ईश्वरी सेवेची एक संधी नष्ट होणे आहे. वाढत्या वयासोबत ही जाणीव वाढली नाही, तर वाढ नेमकी कशाची?
याति क्षयं यौवनं- तारुण्य लयाला जात आहे. पर्यायाने क्षमता नष्ट होत आहेत.
प्रत्यायान्ति गताः पुनर्न दिवसाः - एकदा गेलेला दिवस कधीही परत येत नाही. शेवटी पश्चातापच करावा लागेल.
कालो जगदभक्षकः - काळ हा संपूर्ण विश्वाचे भक्षण करणारा आहे. त्याच्या तावडीतून आजपर्यंत कोणी सुटला नाही. आपणही सुटण्याची शक्यता नाही.
लक्ष्मीस्तोयतरड्गभड्गचपला - ज्या पैशाच्या आधारावर आपण स्वतःला सुरक्षित समजतो तो पैसा पाण्यावरच्या तरंगा प्रमाणे चंचल आहे. कधी, कुठून आणि कसा निघून जाईल सांगता येत नाही. या जगातील मोठमोठी साम्राज्ये, राजसत्ता नष्ट झाल्या मग माझ्या पैशाचा पाड तो किती?
विद्युच्चलं जीवितं - विजे प्रमाणे जीवन चपल आहे. विजे प्रमाणेच त्याला धरून ठेवता येत नाही. अनेकदा ते धक्केच देते.
तस्मान्मां शरणागतं शरणद त्वं रक्ष रक्षाधुना - त्यामुळे शरण आलेल्या माझे, हे शरण देणाऱ्या भगवंता आता आपणच रक्षण करा.
या जगात आपल्या शिवाय सर्व नश्वर आहे. त्यामुळे मी आपल्याला शरण आलो आहे.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
August 3, 2020
गंमत संगणकीकरणामधल्या दिवसांची, अर्थात विसाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ! “पोस्ट ऑफिस उघडं आहे ” ही सोनी मराठी वरील मालिका ९० च्या उत्तर दशकात घेऊन जाते. तेव्हा सरकारी यंत्रणांचे संगणकीकरण फार मोठ्या प्रमाणावर चालू होते. आज प्राजक्ता माळी ची एंट्री बघून मला २००१-०२ च्या दरम्याने घडलेला हा किस्सा मराठीत लिहून काढल्याशिवाय राहवले नाही.
April 6, 2023
हिंदीमध्ये “पंचायत” ही राजकारणावरील वेबसिरीज प्रदर्शित झाली. ४ सीजनद्वारे प्रदर्शित झालेल्या राजकारणा वरील या वेबसिरीजला दर्शकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. राजकीय विषय प्रत्येकाला आवडतातच असे नाही मात्र पंचायत वेब सिरीजमध्ये मांडलेले राजकारण कदाचित तुम्हाला आणि एकत्रित कुटुंबालाही मनातून आवडू शकते.
December 11, 2025
दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणाऱ्या महाराष्ट्र गौरव गीतांमध्ये या गीताचा समावेश असतोच..
July 18, 2016
कर्करोगाची त्यांची ओळख रंगाद्वारे पामेला महिलेने जगाला दिली असे म्हणावयास हरकत नाही.
September 22, 2021
ज्या शक्तीची परमेश्वराने आपल्याला लीला दाखवली, ज्या शक्तीला आपण बाहेरच्या काळोखात शोधत आहोत. ती आपल्या अंतरी सामावलेली आहे, अंतर्मनात लपलेली आहे. फक्त तिला जागृत करता आलं पाहिजे.
July 11, 2021
बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, अटलबिहारी बाजपेयी वगैरेंसारखी माणसं बोलायला लागली की समोरचा जनसमुदाय कान टवकारुन ऐकत रहातो, अक्षरश: मंत्रमुग्ध होतो. या मंडळींच्या बोलण्यात एकप्रकारची जादू असते.
April 21, 2015
एवढा सगळा खटाटोप कशासाठी ?.....
गेली चाळीस पन्नास वर्षे झाली, आमची वाढ होऊन, आत्ता कशाला एवढं बदलायचं ?...
आमची अर्धी लाकडं गेली मसणात.....
काय वाढणारे आयुष्य असं वाढून वाढून....
आणि खाव्या लागल्या अॅलोपॅथीच्या गोळ्या म्हणून कुठे बिघडणार आहे ?......
जगात एवढी लोक खातातच आहेत ना या अॅलोपॅथीच्या गोळ्या. ती काय सगळी वेडी आहेत का ?......
विज्ञानावर, त्याच्या नवनवीन शोधांवर, या आयुर्वेदीक वैदूंचा अजिबात विश्वास म्हणून नाही. भोंदूगिरी सगळी.....
असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आत खदखदत आहेत, हे कळतंय....
आजची टीप त्यांच्यासाठी...
आयुर्वेद सांगतो, निरामय जीवन जगावं. औषधांशिवाय जगावं, दिलखुलास जगावं, आपण निरोगी रहावं, इतरांना निरोगी होण्यास मदत करावी.
औषध कसं असावं यावर आयुर्वेद सांगतो, एक औषध घेताना अन्य कोणत्याही स्वरूपाचा बिघाड शरीरावर दिसू नये, आजच्या भाषेत सांगायचे तर कोणतेही साईड इफेक्ट, म्हणजे दुष्परिणाम नकोत. ज्या कारणासाठी औषध घ्यायचं ते कारण नाहीसे झालं की, औषध बंद व्हायला हवं.
पण आज काय होतंय ? आणि काय चाललंय ? हे सर्व आपल्याला दिसतंय.....
जगण्यासाठी, मरेपर्यंत औषधंच औषध!
त्यापेक्षा जीवनशैलीमधेच थोडेफार बदल केले, विचारामधे थोडी सकारात्मकता आणली की झालं.
काही आजार वंशपरंपरेने येतात, असे सांगितले जाते, हे पण अर्धसत्य आहे. जसे घरात एकाला "ह्रदयरोगी" असा शिक्का बसला की, त्याचे अख्खे घराणे वाताचे रोगी बनून जाते.
कारण ?
डाॅक्टरनी सांगितलेले चुकीचे पथ्यापथ्य.
भीतीने असेल किंवा आमच्यासाठी कुठे वेगळं करत रहाणार, या कारणाने असेल, पण, त्या एकाच्या जेवणातले तेल, तूप, नारळ, शेंगदाणे, आदि सर्व स्निग्ध पदार्थ बंद केल्यामुळे, सगळ्याच्याच जेवणातील स्नेह आटून जातो. (जेवणातील आणि जीवनातील सुद्धा !) आणि अख्खं घराणं चुकीच्या आहाराची शिकार होते. हे तसंच्या तसं पुढच्या पिढीत काॅपी पेस्ट होतं आणि नवीन (वंश /देश )परंपरा सुरू होते.
आपल्या घरात तर अशी चुकीची परंपरा सुरू तर होत नाही ना, याकडे लक्ष ठेवावे, यासाठी आपली वंश परंपरा, देश परंपरा नीट तपासून पहायला हवी. इतिहास आणि पुराणे वारंवार नव्याने अभ्यासायला हवीत.
ही नव्याने निर्माण होणारी चुकीची आहार परंपरा आपल्याला थांबवायची, बदलवायची आहे.
आणि मुख्य म्हणजे आपली (दोन किंवा एक) मुले. ज्यांच्या खांद्यावर आपण आपले भविष्य ठेवणार आहोत, ते सक्षम नकोत का व्हायला ? आम्ही ज्या चुका केल्या, किंवा करतोय त्याची चुकीची फळे त्यांना भोगायला लागू नयेत, मधुमेह, ह्रदयरोग, रक्तदाब, संधीवात, स्थौल्य, पीसीओडी, थायराॅईड सारखे पसरत जाणारे आजार आपल्या घरात येऊ नयेत, यासाठी आपणच वेळीच सावध होऊन, बदलायला हवे.
मुलं आपलं अनुकरण करत असतात. काही गोष्टी न शिकवता आपल्याकडून शिकत असतात. याचे भान पालक म्हणून आपण ठेवायलाच हवे. माझ्या आई वडिलांच्या लहानपणी असलेली सकाळी सायंकाळी जेवायची वेळ एका पिढीने बदलली, आणि चुकीच्या रोगांची मालिका सुरू झाली. असे लक्षात येतेय. म्हणून आपणच जर आपल्या घरातील जेवायची वेळ बदलवायचे सकारात्मक नियोजन केले तर (तथाकथित) पिढीजात आजारापासून आपण आपल्या भविष्याला वाचवू शकतो.
अजूनही वेळ गेलेली नाही.
मी बदललो...
माझे घर बदलले....
असंच प्रत्येकाच्या घरी होत राहिलं तर...
लक्षात येईल.....
मेरा देश बदल रहा है..
सारा देश बदल रहा है......
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
08.03.2017
March 8, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti