(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मानसशास्त्रज्ञ तुकाराम

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये धनश्री लेले यांनी लिहिलेला हा लेख


    'ग्यानबा-तुकाराम' या दोन शब्दांवर, मंत्रावर, वारकरी संप्रदायाची इमारत उभी आहे. महाराष्ट्र हा असा एकमेव प्रांत असेल, की जेथे देवाच्या आधी त्याच्या भक्तांचा जयघोष होतो. वारकऱ्यांच्या गळ्यातले दोन टाळ जणू ग्यानबा तुकाराम हा मंत्रच गात असतात.

    ज्ञानदेवांनी पाया रचला तर तुकाराम त्याचा कळस झाले. कोणत्याही गोष्टीच्या कळसापर्यंत पोहोचणं ही गोष्ट सोपी नाही. कुठल्याही पोथीचा कळसाध्याय लिहिणं सोपे नाही. कारण त्यात सगळ्या पोथीभर विखुरलेले विषय, विचार यांचं संकलन, एकत्रीकरण करून, सारांश काढून सोप्या भाषेत लोकांसमोर मांडायचे असतात. ज्ञानदेवांपासून जे संत झाले त्यांचा उपदेश जणू साररूपाने, अधिक स्पष्टपणे, पण अधिक सोप्या भाषेत तुकारामांनी मांडला. फक्त एवढंच नाही तर त्याला स्वतःच्या चिंतनाची, मननाची, स्पष्टवक्तेपणाची आणि विनम्र भक्तीची जोड दिली आणि म्हणूनच 'तुकाराम गाथा' हे वारकरी संप्रदायाचं सार आहे.

    तुकोबारायांनी गाथा लिहिल्यालाही तीन-साडेतीन शतकं होऊन गेली पण ती जुनी वाटत नाही. ती शाश्वत आहे कारण त्यातले विचार हे कालौघात पुसले जाणारे नाहीत. 'जे जे उत्तम उदात्त उन्नत' तेच कालप्रवाहात टिकते. तुकारामांची गाथा तर इंद्रायणीत बुडूनही तरलेली आहे. ती काळाच्या नदीत बुडेल का? त्यातले विचार आजच्या आधुनिक म्हणवल्या जाणाऱ्या काळातही लागू पडतात. आधुनिक काळात उलट या गाथेच्या वाचनाची फार जास्त गरज आहे. आजच्या काळात ही गाथा वाचताना तुकाराम महाराज संतापेक्षा मानसशास्त्रज्ञ म्हणून अधिक जाणवतात. माणसाच्या मनाचा त्यांनी किती सूक्ष्म विचार केला होता हे जाणवतं. त्यांची वचने आपल्याला आजही मार्गदर्शक ठरतात. जणू ती त्रिकालाबाधित सुभाषितेच वाटतात.

    तुकाराम महाराजांचं पहिलं १६-१७ वर्षांचं आयुष्य सर्वसामान्य गेलं पण नंतर मात्र संकटांची मालिकाच सुरू झाली. साहजिकच त्यांचं मन संसारातून उडालं आणि परमार्थात जडलं. त्यापेक्षा ज्याने हा प्रपंच घडवलाय त्या पांडुरंगाला शरण जावं. सगळ्या चिंता-काळज्या त्याच्यावर सोपवाव्या आणि आपण आपल्या जीवनकार्याला लागावं हा विचार त्यांच्या मनात आला.

    तुका म्हणे घालू । तयावरी भार ।
    वाहू हा संसार । देवापायी ।।

    हे फक्त तुकोबांच्याच बाबतीत घडतं असं नाही तर आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बाबतीतही घडतं. चिंता फक्त जाळत राहते. काळजी फक्त मन जाळत राहते. किती काळ असं जळायचं त्यापेक्षा तुकोबांचं हे वचन डोळ्यासमोर आणावं. संसार त्याच्या पायी, काळजी त्याच्या माथी सोपवावी आणि आपण प्रयत्नांना, कार्याला लागावं हेच योग्य. मानसशास्त्रज्ञ सांगतात की जी गोष्ट अजून घडलीच नाही त्याचीच काळजी माणसं जास्त करतात. काळजी मनातून काढून टाकावी, चिंता काढून टाकाव्या. पण कुठे? ते मानसशास्त्रज्ञ सांगत नाहीत. ते तुकाराम महाराज सांगतात. जिथे मनाची श्रद्धा आहे तिथे चिंता, काळज्या ठेवाव्यात.

    प्रतिकूल तेच घडेल असा विचार करून काम करायला सुरूवात केली तर अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येत नाही असंही काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. तुकाराम महाराजांनी हेच थोडं वेगळ्या पद्धतीने मांडलंय. ते म्हणतात, 'मी खूप सुखी होईन, सुखाचे पाट माझ्या घरी वाहतील' असा स्वप्नीय विचार करण्यापेक्षा 'सुख पाहता जवाएवढे । दुःख पर्वताएवढे ।' हा विचार मनात ठेवावा. दुःख सुखापेक्षा अधिकवेळा स्वीकारावं लागणार आहे हे वास्तव आधी स्वीकारायला हवं. पण सुखापेक्षा दुःख अधिक का? याचं उत्तर म्हणजे आपलं मन. मनाची सवय असते तक्रारी करत राहण्याची. कितीही चांगले घडले तरी छिद्रान्वेषी मन त्यातली छिद्रच, न्यूनच पाहते. आणि त्यामुळे चांगलं मिळूनही मनाला दुःखच वाटतं. शिवाय आपल्यापेक्षा दुसरा जास्त सुखी आहे असा विचार मनात येतो आणि उगाचच त्याचा हेवा वाटतो.

    आपलं सुख दुसऱ्याच्या सुखातच जडलंय व दडलंय (सुखे दुज्याच्या हिरवत चित्ती । दुःखे डोळा पाणी ही बा. भ. बोरकरांची ओळ नकळत आठवून जाते.) ते ओळखता यायला हवे. शेवटी सुख हे बाहेर शोधण्याची वस्तू नाही. सुख, आनंद आपल्यातच असतो तो मिळवायचा असेल तर मनावर ताबा हवा. कायम मन प्रसन्न ठेवायला हवे. मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धींचे कारण. सुखप्राप्ती ही मोठी सिद्धी आहे ती मनाच्या प्रसन्नतेनेच मिळणार आहे. सुखाची गुरूकिल्लीच एका ओळीत तुकोबांनी दिली.

    पण मन प्रसन्न करावं हे म्हणणं सोपं आहे, करणं अवघड आहे. मन प्रसन्न ठेवता आले तर उत्तमच नाही तर जे सामोरं आलंय, ते चांगलंच आहे असं मानावं. घडतं ते भल्यासाठी. दुःखातही सुख हुडकावं, वाईटातूनही चांगलंच निवडावं, आपत्तीलाच इष्टापत्ती मानावं. जशी तुकोबांनी मानली.

    बरे झाले देवा निघाले दिवाळे ।
    बरी या दुष्काळे पीडा केली ।
    अनुतापे तुझे राहिले चिंतन |
    जाला हो वमन संवत्सरा ।।

    जीवनातला उणेपणा या अशा विचाराने जीवनाला पूर्णत्व देत असतो. ही संताची दृष्टी आहे. जीवनातल्या शिशिरऋतूतही संत वसंतच शोधतात तो असा.

    जीवनातलं सगळ्यात मोठं दुःख कोणतं? असा प्रश्न एका मानसशास्त्रज्ञाना केला तेव्हा त्याने सांगितले ‘आपल्या जगण्याला उद्दिष्ट नसणं, हे जीवनातलं मोठं दुःख आहे. म्हणून प्रथम आपल्या जगण्याचं उद्दिष्ट ओळखलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, 'उजाडावया आलो वाटा'... आमच्या जीवनाचं उद्दिष्ट म्हणजे संतांचे मार्ग स्वच्छ करणं, वाटा उजळणं. या वाटा संतांच्या असतील, दुःखितांच्या असतील, आपल्या स्वतःच्या असतील पण वाटा उजळावयाच्या आहेत. किती अर्थपूर्ण आहे हे वचन. आपण वाटा उजळायच्या आहेत का जाळायच्या आहेत हे आपण प्रथम ठरवायला हवं, गीतेत म्हटलं तसं. आत्मैव आत्मनो बंधुः आत्मैव रिपुरात्मना । आपणच आपले मित्र आहोत नि शत्रूही आहोत. हा विचार मनात ठेवून तुकोबांचे वचन वाचल्यास अधिक स्पष्ट होतं.

    एकदा उद्दिष्ट ठरले की माणूस त्या उद्दिष्टाने प्रेरित होतो. त्याचाच ध्यास, त्याचीच आस, त्याच्यासाठीच खास अशी एकदा अवस्था आली की आपला मोठा शत्रू आळस कुठच्याकुठे दूर पळून जातो. (तुका म्हणे आळस । तोचि कारणांचा नाश ।) आणि लक्षात येतं की जी गोष्ट अवघड वाटत होती ती सहज साध्य झाली आहे. (असाध्य ते साध्य करिता सायास ।) हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी योग्यवेळी योग्य भूमिका घ्यावी लागते. नम्र जाला भूता तेणे कोंडिले अनंता । अशी नम्रत्वाची महती सांगणारे तुकाराम महाराजच या दोन भूमिका सांगतात. मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास । पण दरवेळेला इतकं मऊ राहता येत नाही तेव्हा कठोर व्हावंच लागतं. कठिण वज्रास भेदू ऐसे । नाठाळाच्या माथी हाणू काठी । असे कठोर उद्गार तुकाराम महाराजांचेच. बरेचदा नाठाळ कोण हेच आपल्याला समजत नाही. कोणाच्या बोलण्यावरून एखाद्या व्यक्तीला नाठाळ ठरवायचं! तुकाराम महाराज म्हणतात, स्वतः पडताळून पहावं.

    सत्य असल्याशी मन देते ग्वाही ।
    मानिवले नाही बहुमता ।।

    काठी हाणायची नाठाळाच्या माथी पण इतरांसाठीनम्रपणाच असावा. (व्हावे लहानाहून लहान). एकदा हा नम्रपणा अंगात भिनला की मग हा मोठा तो लहान हा भेदच उरत नाही. सगळे सारखेच वाटतात. (अवघी भूते साम्या आली) (तुका म्हणे जे जे भेटे । ते ते वाटे मी ऐसे ।) हे सगळं जग एकाच तत्त्वापासून बनलंय - विष्णुमय जग । वैष्णवांचा धर्म। भेदाभेद भ्रम । अमंगळ ।। जे माझ्यात तेच तुझ्यात, जे पिंडी ते ब्रह्मांडी हे अध्यात्माचं महत्त्वाचं तत्त्व तुकाराम महाराज किती साध्या शब्दात आपल्यापर्यंत पोहोचवतात. ते तत्त्वचिंतन तर आहेच पण ते तत्त्व लोकांच्या पर्यंत कसं पोहोचवता येईल याचा विचार करणारे, लोकांच्या मनाशी संवाद साधणारे ते द्रष्टे कवी आहेत आणि म्हणूनच त्यांना फक्त संत नाही तर मानसशास्त्रज्ञ तुकाराम असंच म्हणायला हवं.

    वारकरी एकमेकांना भेटल्यावर एकमेकांच्या पाया पडतात. अशा वेळी ज्येष्ठ वारकरीही आपल्यापेक्षा लहान असलेल्या वारकऱ्याच्या पाया पडतो. हे दृश्य मोठं लोभसवाणं दिसतं. पाया पडताना जसा वयाचा विचार केला जात नाही तसंच कुणी कोणत्याही जातीच्या वारकऱ्याच्या पाया पडतो. निदान देवाच्या दारी वारकरी जात पाळीत नाहीत. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात, 'वैष्णवाचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अमंगळ असा भेदाभेद करणं हे अमांगल्याचं समजावं. सर्व प्रकारचा भेदाभेद करणाऱ्यांना तुकोबा बजावतात, 'अहो, देहात अवयव जरी वेगवेगळे असले तरी जीव एकच असतो ना? तुकाराम महाराज आपल्या अभंगात म्हणतात,

    विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म ।
    भेदाभेद भ्रम अमंगळ ||
    कोणाही जिवाचा न घडो मत्सर ।
    वर्म सर्वेश्वर पूजनाचे ।।
    तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
    सुख दुःख जीव मागे पावे ।।

    तीर्थाला गेलं म्हणजे पुण्य लागतं अशी सर्वसामान्य लोकांची समजूत आहे. परंतु संत सावता माळी यांचे गाव पंढरपूरापासून हाकेच्या अंतरावर असूनही ते दरवर्षी इतरांप्रमाणे पंढरपूरच्या वारीला जात नसत. कारण त्यांचे म्हणणेच असायचे, 'कांदा-मूळा-भाजी-अवघी विठाई माझी ।।'

    संत तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थक्षेत्री काय असतं, तर दगड, धोंडे अन् माती! देव तीर्थाच्या ठिकाणी नसतो. तर तो असतो सज्जन लोकांच्या ठायी! म्हणून तुकाराम महाराज म्हणतात,

    तीर्थी धोंडा पाणी । देव रोकडा सज्जनी ।।
    मिळालिया संतसंग । समर्पिता भले अंग ।।
    तीर्थी भाव फळे । येथे अनाड ते वळे ।
    तुका म्हणे पाप । गेले गेल्या कळे ताप ।।

    -- धनश्री लेले

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • वास्तवाच्या पोटात शिरायला हवं

    प्रणव सकदेव सांप्रत काळातील महत्त्वाचे कवी, कथाकार, कादंबरीकार, अनुवादक आहेत. अग्रगण्य मराठी दैनिकात पत्रकार म्हणून ते त्यांनी काम केलं असून एका मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून ते कार्यरत आहेत.

  • संत तुकारामांचा भक्तीभाव व समाजप्रबोधन

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. पद्मावती जावळे यांनी लिहिलेला हा लेख


    वारकरी पंथात संत तुकारामांनी फार मोठे कार्य केले आहे. त्यांची महती तशी सर्वांनाच माहित आहेच. म्हणूनच त्यांच्याबद्दल विद्वतजनांनी याप्रमाणे म्हटले आहे,

    ज्ञानदेवे रचिला पाया । रचिले देवालया । नामा तयाचा किंकर । तेणे केला हा विस्तार । जनार्दन एकनाथ, ध्वज उभारिला भागवत ।। भजन करू सावकाश तुका झालासे कळस ।।

    असे म्हणत. कारण थोडक्यात असे म्हणता येईल की सर्वसामान्यांना गृहस्थाश्रमी लोकांना, ईश्वरप्राप्तीचा मार्ग सर्वांना सहज समजेल असा सोपा करून सांगितला आहे. त्यांच्या काही अभंगांतून त्यांचा भक्तिभावख त्यांचा ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग सहज स्पष्ट दिसतो.

    त्यावरील त्यांचे हे अभंग पहा,
    १) एक भावचि कारण देवा ।
    कासया पाषाण पूजिती पितळ ।।
    अष्ट धातु खळ भावेविण ।
    भावचि कारण, मोक्षाचे साधन बोलियेले।।

    २) युक्ताहार नलगे आणिक साधने,
    अल्प नारायणे दाखविले ।
    कलियुगामाजी करावे किर्तन,
    जतेणे नारायण देईल भेटी ।

    ३) नाम घेता उठाउठी ।
    होय संसारती तुरी,
    नाम संकिर्तन साधन पै सोपे ।
    जळतील पापे जन्मांतरीची ।।

    ४) नलगे सायास जावे वनांतरा ।
    सखे येतो घरा नारायण ।
    ठायीच बैसोनी करा एकाचित्त ।
    आवडी अनंत आळवावा ||

    ५) रामकृष्ण हरि विठ्ठल केशवा ।
    मंत्र हा जपावा सर्वकाळ ।
    पाहुनि आणिक नाही पै साधन ।
    वाहतसे आण विठोबाची ।।

    अशा शकडो वचनात ईश्वरप्राप्तीचा सोपा मार्ग त्यांनी दाखविला आहे. त्यातून त्यांचा भक्तिभावही दिसून येतो.

    भक्तिभावाबरोबरच संसारात राहूनही वैराग्य अंगी आणता येते असे स्वतःच्या उदाहरणाने त्यांनी लोकांना पटवले आहे.

    सर्वसामान्यांना ईश्वरप्राप्तीचा मार्ग दाखवणारे संत तुकाराम जीवनाचा आदर्श मार्गही दाखवतात. त्यांचे अभंग जीवनात कसे वागावे, कसे वागू नये याचे
    मार्गदर्शन जसे त्याकाळी लोकांना होत असे त्याचप्रमाणे आजच्या या विज्ञान युगातही ते जीवनात मार्गदर्शन करीत आहेत. चारशे वर्षांपासून हे कार्य त्यांचे अभंग करीत आहेत. त्याचे कारण त्यांचे साध्या सोप्या भाषेतील हे अभंग ते सर्वसामान्य माणसाला सहज समजतात. तयातील उदाहरणे ही अगदी व्यावहारिक जीवनातली आहेत.

    तसे तुकाराम फारसे शिकलेले नव्हते पण वाचनाच्या छंदाने त्यांना ज्ञानी बनवले होते. वारकरी पंथाचा साध्या सोप्या भाषेत अगदी वारकरी पंथाचे तत्त्वज्ञान ही या अभंगातून लिहिले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्याचा प्रसार करण्याचे काम संत तुकारामांच्या अभंगातून झाले आहे.

    अगदी साध्या सोप्या भाषेतून उपदेश करणाऱ्या तुकारामांचा जन्म देहू सारख्या लहान गावात झाला. याच गावात ते लहानाचे मोठे झाले. सर्वसामान्यांसारखा संसारही केला. तरी त्यांचे जीवन लोकोत्तर होते. कनक आणि कामिनी यांचा त्यांना कधी मोह पडला नाही. शिवाजी महाराजांनी भक्तीभावाने मोठा नजराणा त्यांना पाठविला होता. त्याला न शिवताच तो नजराणा संत तुकारामांनी परत पाठवला होता व म्हणाले,

    मुंगी आणि राव आम्हा सारखाचि जीव,
    गेला मोह आणि आशा ।
    कळीकाळाचा हा फांसा,
    सोने आणि माती
    आम्हा समान रे चित्ती ।
    तुका म्हणे आले घरी वैकुंठ सगळे ।।

    संत नामदेवांच्या सांगण्यावरून त्यांनी चिपळ्यांची साथ घेत अभंग विणेच्या झंकाराबरोबर म्हणायला सुरुवात केली होती. ते म्हणतात,

    नामदेवे केले स्वप्नामाजी जागे ।
    सवे पांडुरंग येऊनिया ।
    सांगितले काम, करावे कवित्व ।
    वाऊगे निमित्य बोलो नये ।।
    माप टाकी सवे धरिली विठ्ठले ।
    थापटोनी केले सावधान |
    प्रमाणांची संख्या सांगे शेतकटी ।
    उरले ते शेवटी लावी तुका ।।

    तुकाराम असे अभंग गात भजन करीत संसारात राहूनही विरक्त होते. तुकारामाचा आवाजही गोड होता. त्यांची लोकप्रियताही वाढली होती.

    तुकोबांची रसाळ वाणी, शास्त्रातली क्लिष्ट तत्त्वे ती सोप्या शब्दात ते उलगडून सांगायचे. सोपे सोपे व्यवहारातले दृष्टान्त द्यायचे. आवाजही मधुर होता. नवनवीन अभंगांतून ते सोपे केलेले तत्त्वज्ञान ते किर्तनातून सांगू लागले. त्यांची लोकप्रियता वाढू लागली. ती मंबाजीबुवांना खटकू लागली. रामेश्वरशास्त्र्यांना त्यांनी आपल्या बाजूला वळवून घेतले व तुकारामांना गाढवावर बसवून त्यांची धींड काढली. तुकारामांना गावाबाहेर हाकलून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तर तुकारामांच्या गाथा त्यांनी इंद्रायणीत टाकल्या. तुकारामांना खूप दुःख झाले परंतु संत तुकारामांच्या भक्तिचा महिमा असा की त्यांचे सर्व अभंग परत मिळाले. त्यामुळे रामेश्वर शास्त्रीही चकित झाले व संत तुकारामांचे शिष्य झाले. त्याआधीही त्यांचे आणखी काही शिष्य झाले होते.

    संत तुकारामांचे अध्यात्म लिखाण व त्यांचे शुद्ध चारित्र्य लोकोत्तर भागवत भक्ति हे पाहून प्रसिद्ध कवी वामन पंडितांनी तुकारामांबद्दल ते म्हणतात,
    'जपावी वद पुर्ण वेदान्तवाणी,
    कसे हो म्हणावे तयालागी वाणी ।'
    संत तुकारामाचे अभंग दोन प्रकारचे आहेत. काही भावपर व काही विचारपर.
    भावपर अभंगात त्यांनी देवाविषयीच्या भावना इतक्या उत्कटपणे गायल्या आहेत की त्यांना तोडच नाही. कधी ते कोपाने, कृतकोपाने तर कधी लोभाने, प्रेमाने तर कधी अगतिकतेने देवाशी बोलतात तर कधी आपली भक्तिभावना आपल्या अभंगातून व्यक्त करतात, कधी म्हणतात,

    हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।
    गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

    अभंग जेव्हा इंद्रायणीतून मिळाले तेव्हा लोकांनी त्यांच्या भक्तीची वाखाणणी केली. तेव्हा ते म्हणतात,

    साळुंकी मंजुळ बोलतसे वाणी ।
    शिकविता धनी वेगळाची ।
    फोडिले भांडार धन्याचा हा माल ।
    मी तो हमाल भारवाही ।।
    तर कधी देवाला म्हणतात,
    जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ।
    चालविशी हाती धरूनिया ।।

    लोभानंतर म्हणतात,
    फुटो हे मस्तक, तुटो हे शरीर ।
    नामाचा गजर सोडू नये ।।

    त्यांचे विचारपर अभंग स्तोत्रासारखे आहेत. प्रत्येक अभंगात एखादा प्रमुख विचार ते मांडतात आणि लौकिकातले, व्यवहारातले दाखले देतात. सामान्य व्यवहारापासून तर अत्युच्च तत्त्वज्ञानापर्यंत त्यात ज्ञान भरलेले आहे. असे अभंग उपदेशपर व सर्वसामान्य माणसाला मार्गदर्शन करणारेही आहेत.

    याचे हे उदाहरण पहा,
    असाध्य ते साध्य करीता सायास ।
    कारण आभ्यास तुका म्हणे ।।

    अगदी विद्यार्थ्यांना हा अभंग किती मार्गदर्शक आहे. जिद्द व प्रयत्न चिकाटीने काय साध्य होणार नाही.

    तर एका अभंगात ते म्हणतात,
    मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचे कारण ।

    चंचल मनावर बंधने हवीतच हे सांगताना ते म्हणतात,

    तका म्हणे मना पाहिजे अंकुश ।
    नित्य नवा दिस जागृतीचा ।।

    यात उपदेश आहेच. त्यांचे विचारपर स्तोत्रासारखे असतात, त्याचेही उदाहरण पाहू या!
    शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी ।।
    अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ ।
    त्याचे गळा माळ, असो नसो ।।
    तसेच

    निंबाचिया झाडा साकरेचे आळे ।
    आपली ती फळे संडिच ।
    तैसे अधमाचे अमंगळ चित्त ।
    वमन ते हित करून सांडी ।।

    तुकारामांच्या अभंगातून कधीतरी त्यांची
    विनोदबुद्धीही दिसून येते. उदाहरणार्थ,

    म्हातारपणी थेटे पडसे खोकला ।
    जातो वाराणसी निरखी गाई घोडे हौशी ।।
    बोलाचिच कढी, बोलाचाच भात ।
    कोणी वंदा कोणी निंदा । आमचा स्वहिताचा धंदा।।
    नाही निर्मळ जीवन । काय करील साबण ।।
    अशा काही अभंगांतून उपरोधही झळकतो.
    आजच्या काळात हा उपयुक्त अभंग तर लोकप्रिय आहेच,

    वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी ।
    पक्षीही सुस्वरे गान गाती ।।
    येणे सुखे रूचे एकांताचा वास ।
    नाही गुणदोष अंगा येत ।।

    शब्दांवरील कवित्वावरील प्रेमाला व्यक्त करताना ते म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने
    शब्दांचीच वस्त्रे यात्न करू ।
    तुका म्हणे पहा शब्दचि हा देव ।
    शब्दचि गौरव पुजा करू ।।

    शब्दांवर त्यांचे प्रेम होते. शब्दांचे सामर्थ्य त्यांना माहित होते म्हणून त्यांनी किर्तन प्रवचनद्वारा भगवतभक्तीचा प्रसार केला. शेवटी वैकुंठात जाण्याची तळमळ लागलेल्या तुकोबांना सगळीकडे परमेश्वरीवास जाणवू लागला. आनंदी आनंद जाणवू लागला आणि
    ते म्हणू लागले,

    आनंदाचे डोही आनंद तरंग ।
    आनंदचि अंग आनंदाचे ।।

    शेवटी तर या आनंदनंदातच ते दिसेनासे झाले
    तेही सदेह वैकुंठात गेले असे म्हटले जाते.

    तुकोबांनी आमच्या महाराष्ट्रासाठी फार मोठे कार्य केले आहे. वारकरी पंथाचा प्रसार करताना लक्षावधी लोकांना एकत्र करून त्यांना हा भक्तीचा मार्ग दाखवला. वारकऱ्यांनी तो महाराष्ट्रभर पसरवला आहे. आजही तुकोबांचे अभंग हे काम करीत आहेत. संसाराचा त्याग न करता परहित साधून परमेश्वरप्राप्तीचा त्यांनी सांगितलेला मार्ग सर्वसामान्य लोकांना भावला म्हणूनच तुकोबांचे अभंग लोकप्रिय आहेत.

    संत तुकारामांच्या जन्माआधी त्यांच्या आईला, कनकाईला विठ्ठलाचे भजन, कीर्तन करण्याचे डोहाळे लागले होते. त्यांना सारखे साधू-संतांचे दर्शन घ्यावेसे वाटत असे. त्या भक्तीचे तिला फळही तसेच मिळाले. एका निरभ्र दिवशी संत तुकारामांचा तिच्या पोटी जन्म झाला.

    नवविधा भक्ती केली सायास ।
    तेंचि पूर्ण झाले नव मास ।।
    कनकाईचे भाग्य विशेष ।
    विष्णु भक्त उदरासी आला कीं ।।

    प्रपंचाची कथा तुकाराम महाराजांच्या शब्दात

    जोडोनिया धन उत्तम वेव्हारे ।
    उदास विचारें वेच करीं ।।
    उत्तमचि गति तो एक पावेला ।
    उत्तम भोगील जीव खाणी ।।
    परउपकारी नेणें परनिंदा ।
    परस्त्रिया सदा बहिणी माता ।।
    भूतदया गायी पशूंचे पालन ।
    तान्हेल्या जीवन वनामाजी ।।

    तुकारामांनी परमेश्वराचे भामनाथ डोंगरावर चिंतन केले. त्याचे वर्णन त्यांच्या शब्दांत-
    वृक्षवल्ली आम्हां सोयरें वनचरें ।
    पक्षीही सुस्वरे आळविती ।।१।।
    येणे सुखें रुचे एकांताचा वास ।
    नाही गुणदोष अंगा येत ||२||
    आकाश मंडप पृथिवी आसन ।
    रमे तेथे मन क्रीडा करी ।।३।।
    कथा कमंडलु देह उपचारा ।
    जाणवितो वारा अवसरू ।।४।।
    हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
    करोनि प्रकार सेवूं रूची ।।५।।
    तुका म्हणे होय मनासी संवाद ।
    आपुलाचि वारू आपणांसी ।।६।।

    तुकाराम महाराज समाजात साधू संतांचे भरपूर
    पीक आलेले पाहून त्याविषयी ते म्हणतात,
    टिळा टोपी घालुनि माळा । म्हणती आम्ही साधू।।
    दया धर्म नाही चित्ती । ते जाणावे भोंदू ।।
    कलियुगी घरोघरी । संत झाले फार ।।
    वीतिभरी पोटासाठी । हिंडती दारोदार ।।

    तुकाराम महाराजांना समाधीत असताना परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर त्यांना सर्वत्र विठ्ठलाचे अस्तित्व जाणवू लागले. गायी, म्हशी, म्हाताऱ्या-कोताऱ्यांत तसेच रंजल्या-गांजलेल्यात त्यांना देव दिसू लागला. त्यांची तुकाराम महाराज सेवा करू लागले. सगळ्यांना समान वागणूक द्या, असे ते लोकांना उपदेश करू लागले. कारण विठ्ठल सगळ्यात आहे.

    जे का रंजले गांजले ।
    त्यांसि म्हणें जो आपुले ।।
    तोचि साधू ओळखावा ।
    देव तेथेंचि जाणावा ।
    ज्याची अपंगिता नाही ।।
    त्यासी धरी जो हृदयी।
    दया करणें जे पुत्रासी ।
    तेचि दासा आणि दासी ।।
    तुका म्हणे सांगू किती ।
    तोचि भगवंताची मूर्ती ।।

    -– सौ. पद्मावती जावळे,

    डोंबिवली (प.)

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • निश्चयाचे महामेरू : छ. शिवराय व तुकोबा

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये श्रीराम अनंत पुरोहित यांनी लिहिलेला हा लेख


    महाराष्ट्र ही अगदी प्रथमपासूनच संतांची आणि वीरांची भूमी म्हणून सर्वांना सुपरिचित आहे. अठरापगड जातीचे वास्तव्य असलेल्या या भूमीमध्ये प्रत्येक जातीमध्ये संत आणि शूरवीर जन्माला आले असून आजदेखील ते सर्वांना परम वंदनीय ठरलेले आहेत.

    त्यातही वारकरी सांप्रदायाचा पाया रचलेले संत श्री ज्ञानेश्वर माऊली, संतशिरोमणी नामदेव महाराज, संत गोरोबा कुंभार, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा, संत सावता माळी, संत जनाबाई, संत समर्थ रामदास स्वामी आणि जगद्गुरू म्हणून ओळखले जाणारे आणि या वारकरी सांप्रदायाचा कळस म्हणून मानले जाणारे संत तुकाराम महाराज हे अध्यात्म मार्गातील खरेखुरे दीपस्तंभ ठरले आहेत.

    या सर्वांपेक्षा एका अर्थाने भिन्न क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले आणि संपूर्ण महाराष्ट्राचे सर्वार्थाने आराध्य दैवत ठरलेले छत्रपती शिवाजी महाराज हे अध्यात्म क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व नसूनदेखील 'श्रीमंत योगी' या अनोख्या संज्ञेस खऱ्या अर्थाने पात्र ठरलेले एक आगळेवेगळे संत ठरले असे म्हटल्यास ते मुळीच अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

    समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन अनेक समर्पक ओव्यांच्या माध्यमातून केलेले आहे. 'निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू । अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ।।' ही त्यापैकीच एक अत्यंत सार्थ अशी एक ओवी आहे. छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास या ओवीची सार्थकता सहजपणे लक्षात येते.
    विशेष म्हणजे त्याच कालखंडातील आणखी एक संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या जीवनाचे वर्णन करतानादेखील नेमकी हीच ओवी सार्थ ठरते. कदाचित काहींना याचे आश्चर्यही वाटू शकेल. मात्र यासंबंधीचे विवेचन विचारात घेतल्यास यामध्ये कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती मुळीच नाही ही बाब लक्षात येऊ शकेल. प्रस्तुत छोटेखानी लेखाच्या माध्यमातून स्थलमर्यादेचे योग्य ते भान ठेवून नेमके याच मुद्याचे चिंतन करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकाने आपल्या अल्पमतीनुसार केला आहे.

    शिवराय: 'श्रीमंत योगी
    समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णन करण्याकरिता 'श्रीमंत योगी या अतिशय सार्थ आणि समर्पक अशा उपाधीचे उपयोजन केले आहे. छत्रपतींच्या जीवन चरित्राचे आणि त्यांच्या राज्यकारभाराच्या शैलीचे अध्ययन केलेल्या प्रत्येक व्यक्तीला या उपाधीची सार्थकता सहजपणे लक्षात येऊ शकते. रयतेचे दैन्य दूर करणे शक्य व्हावे याकरिता 'श्रीमंत' होणारा आणि या ऐश्वर्याचा अथवा श्रीमंतीचा स्वतःच्या व्यक्तिगत जीवनासाठी कोणत्याही प्रकारचा लाभ करून घेण्याऐवजी: 'एकभुक्त' जीवनशैली अंगिकारणारा व त्यामुळेच 'योगी' या संज्ञेस सर्वार्थाने पात्र ठरणारा हा राजा; म्हणूनच 'श्रीमंत योगी' म्हणवून घेण्यास योग्य होते. पाश्चात्त्यांनादेखील छत्रपतींच्या जीवनशैलीचे तसेच राज्यकारभाराच्या पद्धतीविषयीचे कुतुहल वाटत होते. याआधीच उल्लेख केल्याप्रमाणे शिवाजी महाराज हे 'एकभुक्त' होते. सर्व प्रकारचे वैभव पायाशी लोळण घेत असताना केवळ एकाचवेळी आहार घेणे हे लक्षण केवळ योग्याच्याच ठायी असू शकते.
    केवळ तत्कालीन मुसलमान राज्यकर्त्यांची राज्ये नष्ट करून त्याऐवजी हिंदूंचे राज्य स्थापन करावे हाच काही स्वराज्य स्थापनेमागचा शिवछत्रपतींचा एकमेव हेतू नव्हता. तर आपण स्थापित असलेले स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी ठरावे, रयतेच्या हिताचे संरक्षण करणारे ठरावे, म्हणजेच त्याचे स्वरूप केवळ स्वराज्याचे न राहता ते सुराज्याचे बनावे हा हेतू प्रधान होता. ही बाब शिवचरित्राचा अभ्यास करताना प्रकर्षाने जाणवते. यादृष्टीने विचार केल्यास; सतराव्या शतकात संपूर्ण देशभरात परकीय सत्तांची जुलूम जबरदस्ती सुरू असतानाच शिवछत्रपतींचा हा सुराज्याचा प्रयोग खचितच लक्षणीय ठरतो.

    आपल्या या उदात्त अशा ध्येयाच्या पूर्ततेकरिता छत्रपती शिवाजी महाराजांना 'निश्चयाचा महामेरू बनण्याखेरीज मग अन्य कोणताही पर्यायच शिल्लक राहिलेला नव्हता. कारण जे ध्येय आपण समोर ठेवलेले आहे; ते साध्य करण्याकरिता काही निर्णय हे वेळप्रसंगी अतिशय कठोरपणे अंमलात आणावेच लागतात याची शिवरायांना पुरेपूर कल्पना होती. अशा प्रकारे निश्चयाचा महामेरू' ठरल्याखेरीज 'बहुत जनांसी आधारू' ही बिरुदावली सार्थ ठरू शकत नाही, याचा या 'श्रीमंत योगी' असलेल्या जाणत्या राजाला निश्चितच जाणीव होती.

    तुकोबांचा मनोनिग्रह
    संत तुकाराम महाराज हे समर्थ रामदास स्वामी यांच्याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे समकालीन होते. जगद्गुरू या उपाधीला प्राप्त ठरलेले तुकोबा हेदेखील 'निश्चयाचा महामेरू' या उपाधीला सार्थ ठरविणारे महान संत होते हे त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंगांमधून सहजपणे लक्षात येते. वास्तविक पाहता; तुकोबा हे प्रापंचिक जीवन जगत होते. मात्र प्रपंचामध्ये असूनदेखील वैराग्यशील जीवन हे अगदी सहज स्वाभाविक प्रवृत्ती म्हणून कसे जगावे; याचा जणू वस्तुपाठच तुकोबांनी आमच्यासारख्या समस्त प्रापंचिकांना आपल्या प्रत्यक्ष आचरणाच्या माध्यमातून घालून दिला आहे. त्यासाठी आवश्यक असलेला मनोनिग्रह सहजपणे साध्य केलेले संत तुकाराम महाराज हेदेखील 'निश्चयाचा महामेरू' ठरले होते. याबाबतची केवळ प्रातिनिधिक स्वरूपाची काही उदाहरणे याठिकाणी उद्धृत करणे हे खचितच उपयुक्त ठरू शकेल. एखाद्या सर्वसामान्य प्रापंचिकाप्रमाणेच आपले दैनंदिन आयुष्य व्यतीत करीत असतानाच; तुकोबांना आपल्या या संसारामध्ये आकस्मिकरीत्या असंख्य समस्यांना सामोरे जावे लागले होते. आपले वडील तसेच पहिली पत्नी आणि मुलगा तसेच मातोश्री यांच्याप्रमाणेच आपल्या परिसरातील शेकडो व्यक्तींना दुष्काळामुळे प्राण गमवावे लागले हे त्यांनी पाहिले होते. वास्तविक पाहता: अशा प्रकारच्या प्रसंगांमुळे सर्वसामान्य मनुष्याचा देवावरील विश्वास डळमळीत होऊ लागतो असाच सार्वत्रिक अनुभव आहे. संत तुकाराम महाराज यांच्यासारखे पुण्यात्मे मात्र अशा प्रकारच्या प्रसंगांचे समर्पक विश्लेषण करून; त्याद्वारे मिळत असलेले ईश्वरी संकेत शोधण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत असतात. “जे काही करिशी । ते माझे स्वहित" असेच निर्मल तत्त्व त्यांच्या चित्तामध्ये नित्य वसत असते. वादळामुळे वृक्ष उन्मळून पडतात. पण पर्वत मात्र सदैव स्थिर राहतात. तुकोबांसारखे महात्मे संत अशा परिस्थितीत केवळ अविचलच राहतात असे नाही; तर उलटपक्षी त्यांची ईश्वरावरील निष्ठा अधिकच दृढतर होत जाते.

    ईश्वरावरील निष्ठा दृढ झाली
    “बाप मेला न कळता...." या आपल्या अभंगाच्या माध्यमातून तुकोबांनी नेमकी हीच भावना उत्कटपणे व्यक्त केली आहे. “बरे झाले देवा निघाले दिवाळे.... या अभंगातूनदेखील त्यांनी याच भावना व्यक्त केल्या आहेत. या भवसागरातून त्या एका पांडुरंगाखेरीज अन्य कोणीही तारणहार असूच शकत नाही याची अत्यंत दृढ निश्चयभावना या कालखंडात तुकोबांच्या मनामध्ये निर्माण झाली हे सहजपणे लक्षात येते. “संसाराच्या तापे तापलो मी देवा..." या अन्य अभंगातून देखीलत्यांनी देवाचे आभारच मानलेले आहेत. यातूनच “फलकट हा संसार । येथे सार भगवंत" अशी ग्वाही त्यांना स्वानुभवाच्या आधारे देण्याचा अधिकार प्राप्त झाला.

    संसार हा मृत्युग्रस्त तसेच नश्वर आणि दुःखरूप असल्यामुळे त्यासाठी धडपड करणे निव्वळ व्यर्थ ठरते ही बाब म्हणूनच तर तुकोबा आपल्याला अतिशय अधिकारवाणीने सांगू शकले. त्याच भावनेने “तुका म्हणे नाशिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हित।।" असे त्यांनी आमच्यासारख्या प्रापंचिकाच्या मनावर बिंबविले आहे. वैराग्याने तुकोबांचे अंतःकरण अधिकच शुद्ध झाले. हे वैराग्य हाच तर अध्यात्मिक जीवनाचा खरा पाया आहे. असे वैराग्य हे हजासहजी कोणालाही मिळत नाही. त्यासाठी भगवंताचीच कृपा आवश्यक ठरते. ज्याच्यावर कृपा करावी असे भगवंताला वाटते; त्याला सर्वप्रथम तो वैराग्याचे दान देत असतो. खरं तर या वैराग्य भावनेमुळेच तुकोबा हेदेखील 'निश्चयाचा महामेरू' ठरू शकले.

    खतपत्रे डोहात बुडविली
    निश्चयाची भावना ही केवळ हृदयामध्ये असणे पुरेसे ठरू शकत नाही. प्रत्यक्ष आचरणातूनदेखील तिचे प्रकटीकरण होणे हे नितांत गरजेचे असते. तुकोबांच्या जीवनाचे अध्ययन केल्यास त्यांना 'निश्चयाचा महामेरू' असे संबोधणे किती समर्पक ठरते, हे अगदी सहजपणे लक्षात येऊ शकते. वैराग्याची भावना मनामध्ये दृढतर झाल्यानंतर चित्तवृत्ती निवळण्याकरिता तुकोबांनी एकांतवासाचा आसरा घेतला होता. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' या अभंगाच्या माध्यमातून त्यांना या एकांतवासाची महती विशद केली आहे.

    मात्र त्यांना शोधत भामनाथावर आलेल्या कान्होबांनी त्यांना आग्रहाने घरी नेले होते. तेव्हा वडिलांच्या काळापासून ज्यांच्याकडे येणे होते; त्या सर्वांची खतपत्रे इंद्राणीच्या डोहामध्ये बुडविण्याची तयारी तुकोबांनी सुरू केली होती. मात्र कान्होबांनी त्यांना नम्रपणे एक विनंती केली होती. “आता तुम्ही साधू झाला आहात. पण मला बायकापोरांचा प्रपंच चालवायचा आहे. तेव्हा एवढे सर्व पैसे बुडवून माझे कसे चालेल?" असा प्रश्न त्यांनी तुकोबांना विचारला होता. त्यानंतर तुकोबांनी कान्होबांसाठी त्यामधील निम्मी खतपत्रे बाजूला ठेवली आणि स्वतःच्या वाटणीची खतपत्रे तात्काळ इंद्रायणीच्या डोहामध्ये विसर्जित केली होती. “आमचा संपूर्ण भार विठोबावरच आहे. आमच्या भुकेची वेळ पांडुरंगच राखील,” असे उद्गार त्यावेळी या महान संताच्या मुखातून बाहेर पडले होते. एकदा परमेश्वरावर दृढ विश्वास ठेवल्यानंतर अशा प्रकारच्या मोहातून अत्यंत निश्चयानेच बाहेर पडायचे असते हा वस्तुपाठ तुकोबांनी यानिमित्ताने सर्वांना घालून दिला होता.

    तुकोबांनी आपली संपूर्ण चित्तवृत्ती त्या जगन्नियंत्या पांडुरंगाच्याच चरणी निश्चयपूर्वक अर्पण केली होती. त्या निश्चयी वृत्तीला मागे खेचू शकणारी, पायबंद घालणारी अशी दुष्ट दुराशा त्यांना नकोशी झाली होती. "देह जड झाले ऋणाच्या आभारें । केलें संसारें कासावीस ।।” अशा प्रकारचा कर्जाचा अनुभव त्यांना आलेलाच होता. त्यामुळे निदान आता तरी या अशा प्रकारच्या व्यावहारिक देण्याघेण्याच्या कटकटीतून कायमचेच मुक्त व्हावे आणि मग अगदी निर्वेधपणे हरिभजनामध्ये रममाण होता यावे, याचकरिता त्यांनी खतपत्रे इंद्रायणीच्या डोहात बुडविली होती. विशेष म्हणजे त्यानंतर तुकोबांनी कधीही द्रव्याला स्पर्श केला नव्हता. गरिबीचे हाल सहन केले; प्रसंगी भिक्षेवरदेखील ते राहिले. मात्र यावज्जन्म कधीही धनस्पर्श करायचाच नाही असा निश्चय करून आणि तो लौकिक आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत अंमलात आणून; आपण ‘निश्चयाचा महामेरू’ आहोत हेच तुकोबांनी सिद्ध केले होते.

    तुकोबांचा मनोजय
    'निश्चयाचा महामेरू' असे वर्णन सरसकट कोणालाही लागू होत नसते. त्याचे कारण हे नीट लक्षात घ्यावे लागते. यासंदर्भात निवंगत थोर भगवद्भक्त ह.भ.प. वै. ल. ग. पांगारकर यांनी नमूद केलेला एक अभिप्राय याठिकाणी उद्धृत करणे हे खचितच उपयुक्त ठरेल असे वाटते. "मनावर खोगीर ठेवून अंतःशत्रूस जिंकणाऱ्या वीराची योग्यता, ही अश्वारूढ होऊन रणांगणावर रिपुदळे लोळविणाऱ्या शूरापेक्षाही जास्त आहे," असे मत त्यांनी व्यक्त केले होते. ते खरे आहे. "मन एव मनुष्याणा, कारण बंधमोक्षयोः ।।" या श्लोकातूनही मनोजयाची महती विशद करण्यात आलेली आहे. कुमार्गाकडे धावणाऱ्या उच्छृंखल मनापेक्षा या जगामध्ये आपला अन्य कोणीही प्रबळ शत्रू नसतो असे मत भागवतकारांनीदेखील मांडलेले आहे.

    मन हे चंचल आणि दुर्निग्रह असल्याचे सत्य अर्जुनाने कथन केल्यानंतर भगवान गोपालकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायातीलं 'अभ्यासेनतु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते' या पस्तीसाव्या श्लोकाच्या माध्यमातून मनोजयासाठीचा उत्तम मार्ग पार्थाला दाखविला आहे. त्यावर ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीमध्ये संत श्री ज्ञानेश्वर माऊलींनी केलेले भाष्य फारच उदबोधक असे आहे. माऊली म्हणतात,

    परि वैराग्येचेनि आधारें ।
    जरी लाविले अभ्यासचिये मोहरें ।
    तरी केतुलेनि एकें अवसरें ।
    स्थिरावेल || कां जें यया मनाचें एक निकें ।
    जे देखिलें गोडीचिया ठाया सोके ।
    म्हणौनि अनुभवसुखचि कवतिकें ।
    दावीत जाइजे ।। (६/४२०)

    तुकोबांनादेखील या मनाचा नाठाळपणा चागलाच ठाऊक होता. त्यामुळे त्यांनी आपल्या मनाला व्यवस्थितपणे जिंकलेले होते. त्यांच्या जीवनातील असंख्य प्रसंगांमधून नेमकी हीच बाब वारंवार समोर येते. धन, कामिनी आणि प्रतिष्ठा हे परमार्थाच्या मार्गातील तीन प्रमुख खड्डे मानले जातात. मुळात परमार्थमार्गावरील पांथस्थ फारच कमी असतात. जे प्रवास सुरू करतात; त्यापैकी काही जण या पहिल्याच खड्यात पडून गायब होतात. जे त्यातून वाचतात: त्यांच्यापैकी काही जण दुसऱ्या खड्यात पडून गायब होतात. आणि त्यातूनही जे वाचतात ते सर्वाधिक धोकादायक अशा प्रतिष्ठारूपी खड्डयात अडकतात आणि मग त्यांचा त्यापुढील प्रवासच संपुष्टात येतो. केवळ तुकोबांसारखे काही निवडक संत आणि सत्पुरुष हेच या तीनही खड्यांमध्ये जरादेखील न अडकता थेट पुढे जाऊ शकतात आणि म्हणूनच तर ते भगवद्कृपेस खऱ्या अर्थाने पात्र ठरतात.

    तुकोबांनी यापैकी पहिल्या खड्ड्यावर किती सहजतेने मात केली होती ; यासंबंधी याआधीच उहापोह करण्यात आलेला आहे . दुसऱ्या खड्डयात पडण्याचा प्रश्नच तुकोबांच्या जीवनात कधी निर्माण झाला नाही . भगवद्भक्तीपुढे स्वस्त्रीचेच स्मरण ज्या महानुभावाला शिल्लक राहिलेले नव्हते ; त्या तुकोबांच्या मनात परस्त्रीचा साधा विचारदेखील कधी निर्माण होण्याची सुतराम शक्यता नव्हती . संपूर्ण दिवसभर भंडाऱ्यावर ग्रंथाध्ययन आणि नामस्मरण व त्यानंतर कीर्तन याच चक्रात रममाण असलेल्या तुकोबांच्या मनात कामिनीबाबतचा विचारच कधी निर्माण झाला नव्हता .

    आपल्या एका अभंगातील ' तुका म्हणे तैशा दिसतील नारी । रिसाचिया परी आम्हांपुढे ।। ' या चरणाच्या माध्यमातून तुकोबांनी यासंबंधीची आपली मनोभूमिकाच स्पष्ट केली आहे . ' एकांती लोकांती स्त्रियांसी भाषण । प्राण गेल्या जाण करूं नये ।। ' असे त्यांनी का बजावले असावे हे वेगळे विशद करण्याची आवश्यकता नाही . वैराग्याचे मेरुमणी आणि ' निश्चयाचा महामेरू ' असलेल्या तुकोबांची सत्त्वपरीक्षा पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्त्रीला : तुकोबांनी ' माऊली ' आणि चक्क ' रखुमाईदेवी ' असेच संबोधले होते ही बाब याठिकाणी लक्षात घेण्यासारखी आहे ' पराविया नारी रखुमाईसमान । हे गेले नेमून ठायीचेचि ।। ' याच अभंगात , ' जाई वो तू माते , न करी सायास । आम्ही विष्णुदास तैसे नव्हों ।। ' असे तुकोबा निक्षून सांगतात . एकंदरीतच , तुकोबांचा मनोजय सर्वज्ञात होता .

    'आम्ही छत्रपती त्रैलोक्याचे ! '
    खरं तर एकवेळ कामिनीच्या मोहावर मात करणे अथक आणि जाणीवपूर्वक प्रयत्नांच्या साह्याने एखाद्याला शक्य होऊ शकेल . तथापि , धन आणि प्रतिष्ठा यांच्या मोहावर मात करणे हे मात्र भल्याभल्यांना जमू शकत नाही . मात्र खऱ्या अर्थाने ' निश्चयाचा महामेरू ' असलेल्या तुकोबांना मात्र त्यावरदेखील मात करणे हे अगदी सहज शक्य झाले होते . तुकोबांच्या जीवनातील एका प्रसंगाचे स्मरण केल्यास ही बाब सहजपणे स्पष्ट होऊ शकते .

    तुकोबा लोहगाव येथे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या एका कारकुनासोबत पत्र , छत्री , घोडा , उंची वस्त्रे आणि जवाहिरादि भेटवस्तू पाठवून तुकोबांना पुण्याला येण्यासाठीचे निमंत्रण पाठविले होते . मात्र ' निश्चयाचा महामेरू ' असलेल्या महाविरक्त तुकोबांनी : त्या जवाहिरादि उंची भेटवस्तूंकडे साधे पाहिलेदेखील नव्हते . या सर्वच भेटवस्तू त्यांनी शिवरायांकडे परत पाठविताना एकंदर नऊ अभंगांचा समावेश असलेले एक पत्रही पाठविले होते . यापैकी पहिल्या अभंगातून पांडुरंगाला उद्देशून तुकोबा म्हणतात ,

    दिवट्या छत्री घोडे । हे तो बऱ्यांत न पडे ।
    आता येथेपंढरिराया । मज गोविसी कासया ? ।।
    मानदंभचेष्टा । हे तो सूकराची विष्ठा ।
    तुका म्हणे देवा । माझे सोडविणे धावा ।।
    याच वेळच्या दुसऱ्या अभंगात तुकोबा म्हणतात,
    जन धन तन । वाटे लेखावे वमन ।
    तुका म्हणे सत्ता । हाती तुझ्या पंढरिनाथा ।।

    यानंतरच्या आणखी एका अभंगातून तुकोबा सांगतात ,

    मुंगी आणि राव । आम्हा सारखाचि जीव ।
    गेला मोह आणि आशां । कळिकाळाचा हा फासा ।।
    सोने आणि माती । आम्हा समान हे चित्ती ।
    तुका म्हणे आले । घरा वैकुंठ सगळे ।।

    अशाच एका अभंगातून तुकोबांनी धनाची तुलना चक्क गोमांसाशी केली आहे . अशी भावना विचार आणि आचार या दोहोंच्याही माध्यमातून व्यक्त करणारे तुकोबा शिवरायांना सुखासाठीचा मूलमंत्रही देतात .

    आम्ही तेणे सुखी । म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी ।
    तुमचे येर वित्त धर । ते मज मृत्तिकेसमान ।।
    कंठी मिरवा तुळशी | व्रत करा एकादशी ।
    म्हणवा हरिचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।

    खरोखरच तुकोबांची ही मनोवृत्ती सर्वार्थाने आगळीवेगळी होती यात शंकाच नाही . तुझी चाड नाही आम्हा छत्रपती । आम्ही छत्रपती त्रैलोक्याचे ।। असे दृढतेने सांगतानादेखील तुकोबांची त्यागाची आणि वैराग्यवृत्तीच प्रकट झाली होती .

    आपल्या या आचार आणि विचाराद्वारे , आपण खऱ्या अर्थाने ' निश्चयाचा महामेरू ' असल्याचे तुकोबांनी दाखवून दिल्यानंतर त्यांच्याप्रमाणेच ' निश्चयाचा महामेरू ' असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे नंतर स्वतःच तुकोबांच्या दर्शनासाठी लोहगावला गेले होते . तुकोबांच्या कीर्तनाने ते प्रभावित झाले होते . त्यानंतरच्या काळात तुकोबांनी शूर वीर कसा असावा हे विशद करणारे पाइकीचे अभंगदेखील सांगितले होते .

    एकंदरीतच , छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोघांनीही ' निश्चयाचा महामेरू ' ही उपाधी आपल्या विचारांतून तसेच प्रत्यक्ष आचारांतून सातत्यने आणि निर्विवादपणे सिद्ध केली होती . यासंबंधी आणखी सखोल विवेचन करणे शक्य आहे . मात्र प्रस्तुत लेखाच्या प्रारंभीच नमूद केल्याप्रमाणे स्थलमर्यादेचे भान ठेवून या विषयाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखकाने अल्पमतीने केला आहे . छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोघांनीही अतिशय आदरपूर्वक वंदन करूनच या लेखाची सांगता करणे उचित ठरेल . या उभयतांना कोटी कोटी प्रणाम !

    --श्रीराम अनंत पुरोहित
    पत्रकार, कर्जत-रायगड

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • प्रशासन व विकास : निष्कर्ष

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये अनिल गोकाक यांनी लिहिलेला हा लेख


    मी १९६४ साली भारतीय प्रशासन सेवेत प्रवेश केला. खरं पाहता माझी भारतीय परराष्ट्र सेवा आणि भारतीय प्रशासन सेवा या दोन्ही सेवेत निवड झाली होती. परराष्ट्र सेवेत निवड होणं हे अधिक प्रतिष्ठेचं मानलं जातं. पण तो कालखंड देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. पं. जवाहरलाल नेहरूंच्या ध्येयवादी, गतिमान आणि पुरोगामी नेतृत्वाचा माझ्यासारख्या असंख्य तरूणांवर प्रभाव पडला होता. समाजवाद, धर्म निरपेक्ष राज्यव्यवस्था, लोकशाहीप्रधान राष्ट्र या त्रिसूत्रीच्या आधारे भारताच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया भक्कम करण्याचे पं. नेहरूंचे धोरण होते. माझे वडील थोर शिक्षणतज्ञ. ते म्हणाले, 'आपला देश आज सामाजिक, राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील अभूतपूर्व क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. अशा या महत्त्वपूर्ण काळात ध्येयवादी वृत्तीनं प्रशासन सेवेत कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांची देशाला नितांत गरज आहे. मी वडिलांचे विचार स्वीकारले.' कारण माझे वडील देखील हे ध्येयनिष्ठ होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात एम.ए. ला इंग्रजी लिटरेचर हा विषय घेऊन त्यांनी सुवर्णपदक मिळविलेले होते. त्यांना त्या काळात आय. सी. एस. होणं खूपच सोपं होतं. परंतु त्यांनी ठरविलं की स्वतंत्र भारतात विद्यार्थी घडवावेत. आदर्श नागरीक बनविण्याचे त्यांचे ध्येय त्यांनी आयुष्यभर जपून प्राध्यापकी पेशा स्वीकारला होता. अशा ध्येयप्रेरीत वडीलांचा वसा मला लाभलेला असल्यामुळे मी त्यांचे विचार प्रमाण मानले.

    महाराष्ट्रात जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद आणि तालुक्यामध्ये पंचायत समितीद्वारे ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या योजना राबवल्या जात होत्या. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या विविध समस्या कोणत्या हे प्रथम समजलं. जनावरांसाठी वैरण, पिण्याचे पाणी, निरक्षरता, राहाण्यासाठी घरं यासारख्या त्यांच्या निकडीच्या आणि ज्वलंत समस्या होत्या. या गोरगरीब जनतेला सन्मानानं जगण्यासाठी या सर्व सुविधा निर्माण करण्याची गरज होती. पण या प्रगतीच्या वाटेवर समाजात उच्चनीच भाव निर्माण करणाऱ्या दुष्ट जातीव्यवस्थेचे काटे पसरले आहेत याची दुःखद जाणीव अस्वस्थ करीत होती.

    प्रशासन हे उदासीन, अकार्यक्षम व प्रतिसाद न देणारे असते ही सर्वसाधारण धारणा आहे. अर्थात याला पुरावे देखील भरपूर आहेत. तरी देखील मी बदलत्या कार्यशैलीकडे बघतो. माहितीचा अधिकार, तरूण रक्ताला वाव देण्याचा स्वीकार हे चांगलेच आहे. तरी देखील जनतेच्या अपेक्षा व वस्तुस्थिती यात महदंतर दिसून येते. विकसन देशांत बदल करीत असतांना अपेक्षित बदल व प्रगती यांचा मेळ व्यवस्थित घालणे अपेक्षित असते.

    हे खरे आहे की, प्रशासकाला काम करतांना काही मर्यादा पडतात. कारण ते एकतर एखाद्या कंपनीचे अथवा मोठ्या समूहाच्या व्यवस्थापनाचे सदस्य असतात. त्यामुळे त्यांना व्यक्तिगत अडचणी सोडविणे सोपे जाते. परंतु समुहाचे प्रश्न सोडविणे अशक्यप्राय होते. कारण बऱ्याचदा त्याचे स्वरूप आर्थिक गुंतवणुकीचे असते अथवा उच्च पातळीवर निर्णय घेणे अपेक्षित असते. त्यामुळे कृतीमध्ये विलंब होतो. ही दुर्दैवाची गोष्ट आहे की. अशा निर्णय प्रक्रियेत आपले प्रयत्न दुबळे ठरतात. तरी देखील प्रशासक प्रचलित पद्धत न स्वीकारता काही बदल घडवू शकतो. मला अशा काही घटना आठवतात

    की त्यावेळी मी मानवतेच्या दृष्टीकोनातून निर्णय प्रक्रिया बदलली. परदेशातून भारतात येणाऱ्यांना भारतीय विमान तळावरील अधिकाऱ्यांनी देशात प्रवेश करण्यासाठी व्हिसा या परवान्याची गरज भासत असे. एकदा या अधिकाऱ्यांनी एका महिलेच्या कार्डवर असलेल्या तान्हुल्या मुलाचा उल्लेख व्हिसामध्ये नाही म्हणून विमानतळावर त्या महिलेला सहा तास ताटकळत ठेवले. त्यानंतर ती मंत्रालयात माझ्याकडे आली. मला वाटले की, ही कार्यप्रणाली बदलणे गरजेचे आहे. विमानतळावरील इमिग्रेशन अधिकाऱ्याला हा अधिकार देणे आवश्यक आहे. केंद्र शासनाकडे मी तसा प्रस्ताव पाठवून बदल करून घेतला.

    १९९६-१९९८ या दरम्यान मी केंद्र शासनाच्या दूर संचार विभागाचा सचिव होतो. वैश्विक अर्थ व्यवस्थेमुळे हे क्षेत्र कमालीचे स्पर्धात्मक आणि कार्यक्षमतेची अपेक्षा करणारं ठरलं होतं. या स्पर्धात्मक कार्यपद्धतीमध्ये जसे फायदे होते. त्याचप्रमाणे धोके देखील होते. या नव्या व्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्राच्या मक्तेदारीस प्रतिबंध करण्याची आणि परदेशी उद्योगात गुंतवणूक करण्याची गरज आहे आणि असा धोरणात्मक बदल करणं ही काळाची गरज आहे हे मला पटलं. ज्या कंपन्यांनी कंत्राट मिळावे म्हणून मोठी गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती. त्यांनी शेवटी आवश्यक ती लायसेन्सची फी भरण्यासाठी ते तयार नव्हते. मी संबंधित कंपन्यांशी मोकळ्या वातावरणात प्रदीर्घ चर्चा करून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. व त्यातून असा प्रस्ताव तयार केला की, त्यात त्यांना काही सूट व काही सुविधा मिळू शकतील. या प्रस्तावाला मंत्रीमंडळाची मान्यता मिळवली. त्यामुळे दूरसंचार विभागात आवश्यक ते बदल झाल्यानंतर प्रथमत: सात लायसन्स देण्याची संधी मला त्यामुळे मिळाली टेलिकॉम अॅथारिटी ऑफ इंडिया आस्थापनेच्या विरोधात मला हे करता आले. पण त्यामुळे भविष्यात भारतात विदेशी गुंतवणूक होऊ लागली.

    भारत आणि ओमान या देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध आहेत. जियो- राजकीय असा इंडो-ओमान फर्टिलायझर प्रकल्प अनंत अडचणी बाजूला सारून उभा करता आला. यंत्रांच्या सहाय्याने कामे केल्यास भ्रष्टाचाराला आळा बसतो. त्यानुसार नवीन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मनुष्यबळाचा कमीत कमी वापर करण्याचे धोरण सुरू झाले. तरी देखील महत्त्वाचा प्रश्न शिल्लकच राहिला. अजूनही बऱ्याचशा विभागात हा प्रश्न तसाच आ वासून पडून आहे. संगणकाचा अती वापर हे त्याचे उत्तम उदाहरण. संगणकामुळे कामे तत्परतेने होतात हे खरे आहे परंतु या कार्यप्रणालीत मानवी भावना नसते. त्यामुळे घेतले गेलेले निर्णय तांत्रिक दृष्ट्या कितीही योग्य असले तरी मानवतेच्या दृष्टीकोनातून कधी कधी ते चुकीचे ठरतात. कारण माणूस हा कुठल्याही बदलाचा मुख्य घटक असून त्याचा प्रणेता देखील आहे.

    केवळ तंत्रज्ञानात बदल अपेक्षित नसून वैचारिक क्रांतीची खरी गरज आहे. स्वातंत्र्य हे केवळ आर्थिक बाबतीत अपेक्षित नसून मानवी मनाचे स्वातंत्र्य असले पाहिजे आणि आम्ही खरं पाहिले तर इथेच फसतो. आणि अजूनही फसतच आहोत. आमची शिक्षण प्रणाली जुन्या पद्धतीची आहे. बहुतांश नेते मंडळींना नागरिकत्वाची विशालदृष्टी व दूरवर बघण्याची दूरदृष्टी नाही असं वाटतं. मानवी मनाचा खरं म्हणजे त्यामुळेच विकास होऊ शकेल. आणि खरे पाहू केले तर मानवतेच्या विकासाच्या दृष्टीकोनातून काम करण्याची खरी गरज आहे व या सर्व प्रश्नांना हेच खरे उत्तर असु शकेल.

    प्रशासकीय सेवेत काम करीत असतांना विविध अनुभव येतात. राज्य पातळीवर जे निर्णय घेतले जातात ते ग्रामीण भागातील काही ठिकाणी अवास्तव ठरतात. नागरी विभागाचे प्रश्न वेगळे असतात. स्थलपरत्वे, भौगोलिकदृष्ट्या, सांस्कृतिक अनुकरणामुळे मानवी गरजा वेगवेगळ्या असतात. म्हणून नियमांच्या चौकटीत राहून मानवतेच्या दृष्टीकोनातून काहीवेळा निर्णय घ्यावे लागतात. परंतु हे स्वातंत्र्य अधिकाऱ्यांना नसते. नियमबाह्य कृत्य ठरवून ते चौकशीस पात्र ठरू शकतात म्हणून व्यक्तिगत समस्या सोडवितांना आपल्याला नियमांचे उल्लंघन होईल या भीतीपोटी मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करता येत नाही ही सल कायम मनात राहते.

    -अनिल गोकाक (आय.ए.एस. )

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

  • मला अजुन काय करायचे आहे.

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन यांनी लिहिलेला हा लेख


    माझा देश महान करण्यासाठी नागरिकांनी काय करावे, या करता मला जनजागृती करायची आहे.

    सैन्यामधील ट्रेनिंग, कारवाया आणि जबाबदाऱ्या

    मी, इंडियन मिलिटरी अकादमी डेहराडून, मध्ये जुलै १९७३ला रुजू झालो आणि १५ जून १९७५ रोजी “कमिशन्ड ऑफिसर" म्हणून पायदळातील ७-मराठा-लाईट-इन्फन्ट्रीत प्रवेश केला. जम्मू-आणि-काश्मीरच्या सीमावर्ती भागात दहशतवादी क्षेत्रांत, पंजाबात आणि ईशान्य भारतातील दहशतवादी-विरोधी-कारवायीत सविस्तर सेवा केली. तसेच १९७५ पासून लष्कराने हाती घेतलेल्या सर्व महत्त्वाच्या युद्ध/दहशतविरोधी कारवायीमध्ये माझा सहभाग होता.

    १९९५ ते १९९८ मी पूँछ क्षेत्रात काम केले. पूँछ आणि राजौरीच्या सर्वात अवघड क्षेत्रातील सर्वाधिक दहशतवादाच्या काळात, मी "ऑपरेशन रक्षक" मध्ये, ७-मराठा- लाईट- इन्फन्ट्रीचे नेतृत्व केले. माझी बटालियन, पाकिस्तानमधून जम्मू-आणि-काश्मीरमध्ये होणारी घुसखोरी रोखण्यास जबाबदार होती. माझ्या बटालियनला "युनीट सायटेश प्रशस्ती- पारितोषिक आणि १८ शौर्य पदके” प्राप्त झाली. पुन्हा एकदा जम्मू-आणि-काश्मीर मधील पूँछ, कृष्णाघाटी, सुरणकोट आणि राजौरी इलाख्यांतील "ऑपरेशन रक्षक” ह्या कार्यवाहीत मी ब्रिगेडच्या नेतृत्वाची धुरा वाहिली. त्यांच्या एका युनिटला युनीट-गौरव घोषित झाली आणि ब्रिगेडमधील एकाअधिकाऱ्यास २००६ सालचे सर्वोच्च पारितोषिक मरणोत्तर अशोक चक्र प्राप्त झाले.

    फेब्रुवारी २००६ मध्ये मी, “हायर कमांड विंग” चे अध्यापक - डी.एस. म्हणून, आर्मी-वॉर-कॉलेजमध्ये रुजू झालो. हायर कमांड अभ्यासक्रम, भूदल, नौदल व हवाईदलाच्या सर्वोच्च ७० कर्नल व समकक्षांचा असतो. अध्यापक ह्या नात्याने, राष्ट्रीय सुरक्षेचे निरनिराळे पैलू समजून घेण्यासाठी, अधिकारी-विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी माझ्यावर होती. ३१ जानेवारी २००९ ला मी निवृत्त झालो.

    निवृत्ती नंतर

    निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय सुरक्षेवरील माझे देशाच्या सुरक्षेवरचे लेख आघाडीच्या सर्व मराठी वृत्तपत्रांतून नियमितपणे प्रकाशित होतात. त्यांनी २५०० हून अधिक लेख निवृत्ती नंतरच्या ९ वर्षात प्रकाशित झाले आहेत. या शिवाय मी अनेक टीव्ही वाहिनी आणि संस्थांमध्ये देशाच्या सुरक्षेवर बोलून जन जागृती करण्याचा प्रयत्न करत आहे.

    आव्हान अंतर्गत सुरक्षेचे

    अनेक वर्षे भारतीय सैन्यात असतांना आम्ही सीमांचे रक्षण केले. मात्र आता सुरक्षेची आव्हाने बदलत आहेत. आता अंतर्गत सुरक्षेमध्ये प्रचंड हिंसाचार होत आहे. प्रत्येक वर्षी मारले जाणाऱ्या भारतीयांची संख्या ही दोन ते अडीच हजार एवढी होती याशिवाय गंभीर जखमी झालेल्या भारतीयांची संख्या ही चार पट जास्त होती. त्यामुळे देशाची प्रगती सुद्धा कमी होत होती. कारण दहशतवादी/ माओवादी हल्ल्यामुळे आपल्या देशाला खूप नुकसान सहन करावे लागते. हजारो कोटीची संपत्ती प्रत्येक वर्ष बरबाद होते. याशिवाय देशद्रोही तत्व मोठ्या प्रमाणामध्ये शेकडो कोटी रुपयांची खंडणी वसूल करतात. एवढेच नव्हे तर या भागांमध्ये कुठलेही प्रगतीची कामे होऊ देत नाही. त्यामुळे देशाची प्रगती ही अतिशय थंडावली होती.

    प्रत्येक नागरिकाने 'सैनिक', गुप्तहेर सायबर योद्धा बनणे अनिवार्य ! आपले सैनिक देशाचे रक्षण करतच आहेत, पण आज अशी स्थिती आहे की नागरिकांनाही शत्रूसोबत लढण्यास सिद्ध राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहणे अनिवार्य झाले आहे. परिणामी शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. त्यामुळे देशात लपून बसलेले दहशतवादी, माओवादी, पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही तर हे देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे.

    असे म्हटले जाते की, आपल्याला जर लवकर गुप्त माहिती मिळाली तर आपण शस्त्र सिद्ध होऊन येणाऱ्या धोक्यांना जास्त चांगल्या पद्धतीने सामना करु शकतो. देशामध्ये जात, धर्म आणि इतर अनेक कारणांमुळे एकदम उसळणाऱ्या हिंसाचारामध्ये देशाचे प्रचंड नुकसान होते. जसे कोरेगांव भीमा हिंसाचार किंवा औरंगाबादमध्ये झालेल्या जातीय दंगली.

    आपण एक टोल फ्री टेलीफोन तयार करायला पाहिजे ज्यामध्ये कुठलाही सामान्य नागरिक जर त्याच्या आजूबाजूला हिंसाचार होऊ शकतो याची बातमी, या कुठलीही सुरक्षेसंबंधीत माहिती लगेच आपल्या सुरक्षा संस्थांना देईल. त्याचे नाव गुप्त ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवता येईल. सोशल मीडियाचा गैरवापर करून अनेक भडकावू पोस्ट किंवा फिल्मस किंवा लेख टाकले जातात. कुठलेही भडकावू किंवा देशद्रोही लिखाण किंवा व्हिडीयो जर सोशल मीडियावरती असतील तर त्यांना शोधायला नागरिकांनी मदत केली पाहिजे. ज्यांनी अशा पोस्ट टाकल्या आहेत त्यांना सोशल मीडियाच्या मोठ्या कंपनीत म्हणजे याहु, गुगल, यु ट्युब वगैरेंचा उपयोग करून पकडले पाहिजे. म्हणूनच आता भारताच्या देशप्रेमी नागरिकांनी सुरक्षा एजन्सीचे कान आणि डोळे बनून आपल्या भागात कुठले पण चुकीचे काम होत असेल तर त्याची माहिती त्यांना देणे गरजेचे आहे. कारण देशासमोर असलेली आव्हाने एवढी जास्त आहेत की, केवळ पोलिस किंवा अर्धसैनिक दल यांनी मिळून जरी सोडवली तरी कठीण आहेत. म्हणून आपल्याला पूर्णपणे सोडवायची असतील तर प्रत्येक भारतीयाने यावर ती लक्ष ठेवले तर आपण या आव्हानांना जास्त सक्षमपणे तोंड देऊ शकतो. आशा करूया देशभक्त नागरिक आपल्या देशाकरता काहीवेळ नक्कीच खर्च करू शकतील. गेल्या चार वर्षात आपण खूप प्रगती केली आहे. मात्र अजून खूप करायचे बाकी आहे.

    माओवादी ग्रस्त जिल्हे पन्नास टक्के घट

    कारण माओवादी हिंसाचार हा ७०% कमी झालेला आहे. जो भाग माओवाद्यांच्या हाताखालीच होता त्याची व्याप्ती आता ५०% कमी झालेली आहे. माओवादी ग्रस्त जिल्हे आता पन्नास टक्क्यांहून कमी झालेले आहे मात्र माओवाद संपायला अजून खूप वेळ लागणार आहे.

    ईशान्य भारताची बंडखोरी मग ती नागा बंडखोरी असो की मणिपुरी बंडखोरी असो की उल्फा बंडखोरी, जी आसाममध्ये कार्यरत होती ती फारच कमी झाली आहे. बंडखोरीमुळे झालेला हिंसाचार कमी झाल्यामुळे या भागात शांतता प्रस्थापित झालेली आहे आणि पर्यटन आणि आर्थिक कारवायीचा वेग हा वाढलेला आहे.

    आपण जर देशाच्या इतर भागातील दहशतवादाकडे बघत बघितलं तर असे दिसते की पठानकोट हल्ल्यानंतर देशामध्ये कुठलाही दहशतवादी हल्ला हा झालेला नाही. हे खरोखरच सरकारचे यश समजायला पाहिजे. आपली सागरी सुरक्षा ही आता बऱ्यापैकी सुधारलेली आहे. यामुळे समुद्राकडून कुठलाही हल्ला हा झालेला नाही.

    हिंसाचार फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये

    आज आपण काश्मीरकडे बघितले की, असे दिसते की लडाख, आणि जम्मू- उधमपूरच्या भागांमध्ये पूर्णपणे शांतता आहे ही शांतता उद्ध्वस्त करण्याकरता पाकिस्तान एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरती मोठ्या प्रमाणामध्ये तोफांचा व बंदुकीची फायरिंग करतो. काश्मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैन्याला दहशतवाद्यांना मारण्यामध्ये मोठे यश मिळालेले आहे. २०१७ मध्ये २५० हून जास्त दहशतवादी मारले आहेत. मात्र काही युवक अजून काश्मीर खोऱ्यामध्ये दहशतवाद्यांच्या अपप्रचाराला आणि हुरियतच्या अपप्रचाराला बळी पडून अजून सुद्धा दहशतवादाकडे जाण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे या भागांमध्ये गरज आहे अशा वाट चुकलेल्या युवकांना हिंसाचाराच्या रस्त्यावरून इतर भारतीयांप्रमाणे सामान्य आयुष्य जगून देशात होणाऱ्या प्रगतीत सामील व्हायचे. नवीन रोजगार निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. त्यामुळे तिथला हिंसाचार कमी होण्याकरता नक्कीच मदत मिळेल.

    भारताची लोकसंख्या १२५ कोटी आहे, काश्मीरची फक्त दोन कोटी आहे. म्हणजेच भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत काश्मीरची लोकसंख्या ही एक टक्क्याहून कमी आहे. हिंसाचार हा फक्त काश्मीर खोऱ्यामध्ये होतो, जिथे लोकसंख्या फक्त तीस लाखांच्या आसपास आहे. यामध्ये ही काही तरुण हिंसाचारात भाग घेतात.

    म्हणजे देशाच्या लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार अतिशय नगण्य. मात्र मीडियामध्ये हिंसाचाराला विनाकारण महत्व दिले जाते. अनेक चांगल्या घटना काश्मीरमध्ये होत आहेत, जसे की झोजिला मधुन होणारा बोगदा जो श्रीनगर आणि कारगिलचे अंतर अतिशय कमी करेल, ज्यामुळे पर्यटन वाढेल. झेलम नदीवर बांधलेले धरणामुळे काश्मीर खोऱ्यामध्ये विजेचा तुटवडा कायमचा कमी होईल किंवा वैष्णवीदेवी मध्ये बांधलेला रोपवे, यामुळे तेथे मोठ्या संख्येने पर्यटन वाढेल. असा बातम्यांना महत्व द्या, हिंसाचाराला नको.

    बांगलादेशी शोधणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य

    बांगलादेशी घुसखोरी कमी होण्याचे नाव घेत नाही. आज कोट्यावधी बांगलादेशी भारतामध्ये बसलेले आहेत. अनेकांना पोलिसांनी अटक केली आहे. म्हणून गरज आहे की, सामान्य माणसांनी आपल्या पोलिसांचे कान आणि डोळे बनून बांगलादेशी कसे ओळखायचे याचे प्रशिक्षण घ्यायला पाहिजे, ज्यामुळे आपण आपल्या भागामध्ये जर कोणी अवैध बांगलादेशी आलेले असतील तर त्यांना ओळखून ही माहिती आपण आपल्या पोलिसांना दिली पाहिजे तसेच त्यांना पकडण्याकरता मदत करणे गरजेचे आहे. बांगलादेशी आज सुरक्षेला एक मोठा धोका निर्माण झालेला आहे. आशा करूया की नागरिकांच्या मदतीने आपल्याला बांगलादेशींना पकडण्यामध्ये यश मिळेल.

    स्मगलिंग/ तस्करी, बेकायदा व्यापार थांबवा

    नवीन आव्हाने जी देशांसमोर आहेत ती आहेत एक तर देशाच्या जमिनी सीमा आणि समुद्राकडून होणारे स्मगलिंग किंवा तस्करी यामध्ये खोट्या नोटा, अफू, गांजा आणि अनेक वस्तू देशांमध्ये आणल्या जातात. यामुळे देशाचे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान होते. एवढेच नव्हे तर बेकायदा व्यापार सुद्धा केला जातो, जो थांबवणे अतिशय गरजेचे आहे. आपल्या समुद्रामध्ये इतर देशांची जहाजे मासेमारी करतात त्यामुळे आपल्या देशाचे नुकसान होते हे थांबवणे गरजेचे आहे.

    देश महान कसा बनतो

    • देश महान कसा बनतो या विषयावरती संशोधन करण्यात आले होते. देश महान बनतो याला अनेक कारणे आहेत. यामध्ये देशाचे आकारमान, देशामध्ये असलेले वातावरण, देशाचे नेतृत्व, देशाची भौगोलिक परिस्थिती, देशातली सामान्य माणसे असे अनेक पैलू आहेत. स्वामी विवेकानंद १९२० मध्ये चीनमध्ये गेले होते. त्यांनी त्यानंतर भाष्य केले की चीन हा येणाऱ्या काळामध्ये एक महाशक्ती बनणार आहे. कारण असे की, त्या वेळेला चीनला परिस्थिती बिकट होती मात्र तिथे असलेल्या सामान्य नागरिकांची वर्तवणूक किंवा त्यांचे देश देशप्रेम मात्र अबाधित होते, म्हणून स्वामीजींना वाटले की हा देश नक्कीच मोठा होणार आहे आणि आज चीन एक महाशक्ती बनली आहे.
    • देश महान होतो, तेव्हा असे दिसते की त्या देशाचे सामान्य नागरिक आपल्या देशाकरता काहीतरी करण्याची क्षमता ठेवतात, ते देशाला हे विचारत नाही की माझ्याकरता देश काय करेल, या उलट ते असे विचारतात की मी देशाकरता काय करू शकतो, तो देश महान होतो. म्हणजेच माझा देश नेहमीच पहिले आणि मी नेहमीच देशा नंतर.

    जे देश मोठे होतात त्यांच्या नागरिकांमध्ये काही गुण असतात ते खालील प्रमाणे आहेत.

    • या देशाचे नागरिक हे प्रामाणिक असतात, भ्रष्टाचार करत नाही किंवा दुसऱ्यांना सुद्धा करु देत नाही. देशाचे नागरिक आपली जबाबदारी आणि काम अतिशय प्रामाणिकपणे करतात. म्हणजे शिक्षक असतील तर नीट शिकवणे, विद्यार्थी असतील तर नीट अभ्यास करणे, जर नोकरदार असतील तर देशाकरता आपल्याला लागू असलेले सगळे कर भरणे इत्यादी.
    • सगळ्या नागरिकांना आपली कर्तव्ये काय आहेत याची माहिती असते. आपले कर्तव्य म्हणजे रस्त्यावर गाडी चालवतांना नियमांचे पालन करणे.
    • आपल्या देशाच्या नियमांचे, कायद्यांचे पालन करणे, वडिलधाऱ्या मंडळींबद्दल आदर,

    स्त्रियांचे रक्षण करण्याची प्रवृत्ती, मुलांवरती प्रेम असे गुण असतात. नागरिक कुठेही वक्तशीरपणे जातात आणि त्यांची उत्पादन क्षमता ही चांगली असते ते कुठल्याही हिंसाचारामध्ये भाग घेत नाही आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असतात. यामुळे जर तिथे काही कायदा सुव्यवस्था, माओवादी, दहशतवादी यासारखी कुठलीही घटना होणार असेल तर त्यांचे नक्कीच लक्ष असते.

    • काही वर्षापूर्वी जपान मध्ये घडलेली घटना ही सगळ्यांना माहिती असणे महत्त्वाचे आहे.

    तिथे एकदा समुद्रीसुनामीमुळे प्रचंड नुकसान झाले होते. जगभरातून त्यांना मदत पाठवली जात होती. काही मिडियाचे प्रतिनिधी जिथे मदत वाटप सुरू होते तिथे गेले. त्यांना दिसले की तिथे २ लाईन होत्या. एक लाईन ही छोटी होती आणि एक मोठी होती. प्रश्न पडला की मोठी लाईन कशाकरता आणि छोटी कशा करता? विचारल्यावर असे कळाले की, छोटी लाईन ही ज्या जनतेला मदत पाहिजे त्यांच्या करता आहे. मग पुढचा प्रश्न होता की मोठी लाईन कशा करता? तेव्हा असे कळाले की मोठी लाईन अशा लोकांकरता होती की त्यांना मदत ही मिळालेली आहे परंतु त्यांना मिळालेली मदत त्यांच्या गरजेपेक्षा पुष्कळ जास्त आहे म्हणून ते नागरीक लाईन मध्ये उभे राहून आपल्याला मिळालेली जास्तीची मदत परत करण्याकरता उभे होते. त्यामुळे ती मदत जास्त गरजू लोकांकडे पोहोचू शकली असती. असे आपल्या देशात होईल का?

    सर्वसामान्य नागरिकांची जबाबदारी

    लोकशाहीमध्ये माओवाद्यांशी लढणे हे सुरक्षा यंत्रणांचे, प्रशासनाचे, न्याय व्यवस्थांचे आणि राज्यकर्त्यांचे काम आहे. पण याचा अर्थ असा नव्हे की सामान्य माणसाने माओवाद्यांविरुद्ध लढूच नये.

    माओ हिसांचाराच्या मागे उभ्या राहणाऱ्या तथाकथित मानवतावाद्यांचा पर्दाफाश करावा लागेल. वर्तमानपत्रातील बातम्या, लेख आणि अग्रलेख बारकाईने वाचून त्यामधल्या माओपूरक वृत्तीला ठोस उत्तर द्यावे लागेल.

    परिसंवाद, चर्चा, बौद्धिक कार्यक्रमात भाग घेऊन हिंसाचार फुटीरतावादी चर्चेला आक्षेप घ्यावा लागेल. इंटरनेट, फेसबुक, याहू, ग्रुप्स, ई-मेल, ब्लॉग या चळवळीत सक्रीय भाग घेऊन माओवादी हिंसाचाराविरुद्ध आपला आवाज उठवावा लागेल. हे करण्याकरता निश्चयी मानसिकता तयार करावी लागेल. जोपर्यंत आपण हे करत नाही तोपर्यंत आपल्याला व्यवस्थेविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? सामान्य नागरिकांची जबाबदारी

    १. प्रत्येक नागरिकाने देशाच्या सुरक्षेकरिता काही वेळ रोज खर्च करायला हवे.

    २. प्रत्येक नागरिकाने सैनिक आणि गुप्तहेर बनणे जरूरीचे आहे. आपण जर सुरक्षा दलाचे कान आणि डोळे बनलो तर आपला भाग सुरक्षित होऊ शकतो. माओवाद्यांना कसे ओळखावे याचे प्रशिक्षण पोलीस, होमगार्ड नागरिकांना देऊ शकतील.

    ३. आपल्या मुलांना माओग्रस्त भागाच्या बाहेर शिक्षण आणि कामावर पाठवून सुरक्षित ठेवता येईल. हे ज्यांना शक्य असेल त्यांनी केले पाहिजे.

    ४. वनमाफिया वर लक्ष ठेवावे. मिळालेली माहिती गुप्तपणे सुरक्षा दलांकडे पोहचवावी.

    ५. माओ समर्थकांना आपल्या भागात प्रवेश बंदी करावी.

    ६. विधवा आणि अनाथ मुलांची ज्येष्ठ आदिवासी नेत्यांची मदत घेऊन काळजी घ्यावी.

    ७. जास्तीत जास्त तरूणांनी पोलीस होम गार्ड, स्पेशल पोलीस अधिकारी डिझर्जे म्हणून भरती व्हावे.

    ८. वनसंपत्तीचे रक्षण करावे. पर्यावरण साक्षरता महत्वाची.

    ९. अकार्यक्षम सरकारी अधिकाऱ्यांची माहिती वरच्या अधिकारयांना आणि लोक प्रतीनिधींना द्यावी.

    १०. विकास योजनांच्या अंमलबजावणी वर लक्ष ठेवावे. भ्रष्टाचाराची माहिती सरकारी अधिकारी, पोलीस, भ्रष्टाचार विरोधी खाते, पत्रकार आणि नेत्यांना द्यावी.

    ११. माओवाद्यांनी लावलेल्या भुईसुरूंगाची माहिती पोलीसांना गुप्तपणे द्यावी.

    १२. आधुनिक शेतीचा वापर करावा. पिकाची विक्री मोठ्या बाजारपेठेत करावी.

    १३. माओवाद्यांमध्ये सामील असलेल्या आपल्या मुलांना, मित्रांना, नातेवाईकांना शरण येण्यास प्रोत्साहन द्यावे. माओग्रस्त भागाच्या बाहेरचे नाही.

    १४. माओग्रस्त भागाच्या बाहेर असलेल्या नागरिकांनी सरकारला वैचारिक लढाई लढण्यास मदत करावी. माओ विचारवंत आणि समर्थकांशी वैचारिक लढाई आमने सामने, वृत्तपत्रांना पत्रे लिहून, टीव्हीवर चर्चेत भाग घेऊन करावी.

    १५. आपल्या गावात, शहरात माओवाद्यांच्या संघटनांना स्थान देऊ नये.

    १६. आदिवासी कल्याण संस्थांना आर्थिक मदत किंवा स्वयंसेवी मदत करण्यास जाणे.

    १७. माओग्रस्त भागात अनेक रम्य पर्यटन स्थळे आहेत. ती स्थळे विकसित करावी म्हणजे तिथल्या स्थानिक जनतेला आर्थिक फायदा पुरेपूर होईल. मध्यमवर्गीयांनी पर्यटनाकरता उगाच परदेशात चक्कर मारण्यापेक्षा अशा भागात जाऊन पैसे खर्च करावे.

    स्वत:च्या कुटुंबाच्या परिघापलीकडे विचार करण्याची गरज.

    भारतीय घटनेने प्रत्येक भारतीयाला जसे अधिकार दिले आहेत, तशीच काही कर्तव्येसुद्धा दिली आहेत. बऱ्याच वेळेला या कर्तव्यांकडे नागरिक दुर्लक्ष करतात.

    • शेजारीपाजारी, आसपासच्या इमारती जवळचा भाग यावर लक्ष ठेवा. कान व डोळे उघडे ठेवा.
    • सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांत मिसळा. समाजविघातक, देशविघातक प्रचार, हालचाली सुरू असतील तर पोलिसांना कळवा.
    • सार्वजनिक ठिकाणी वावरताना सजग राहा, दक्षता बाळगा. कोणतेही ठिकाण लक्ष्य होऊ शकत असल्याने 'इथे हल्ला होणे शक्यच नाही' असे गृहीत धरू नका.
    • व्यवस्थेविषयी, यंत्रणांविषयी सामान्यांत असंतोष निर्माण करणे हाही या हल्ल्यांचा हेतू असल्याने पोलिस, सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास दाखवू नका, त्यांना सहकार्य करा.
    • सार्वजनिक मंडळे, तरुणांचे गट, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था, विविध कामगार संघटना, धार्मिक-जातनिहाय संघटना, बँक कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या संघटना या मोठ्या समूहाच्या संपर्कात असतात. त्यांनी आसपास होणारे बदल टिपणे आवश्यक.
    • पोलिस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण कमी करणे ही समाजाचीच जबाबदारी समूहगटांनी आपापसांतील वाद शमविणे आवश्यक.
    • तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा घटक (रिक्षा, टॅक्सी, बसचालक, बस-रेल्वे प्रवासी) असाल तर विशेष दक्ष राहा. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली टिपण्यात पोलिसांना तुमची मदत होऊ शकते.
    • सार्वजनिक मालमत्ता ही आपली आहे, तिची जपणूक करणे ही सुद्धा आपलीच जबाबदारी आहे, परिसर स्वच्छ ठेवणे, न थुंकणे ही देखील आपली जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला केराची टोपली बनवू नये.
    • राजकारण्यांना प्रश्न विचारण्यापूर्वी प्रत्येक नागरिकाने आत्मपरीक्षण करण्याची आज खरी गरज आहे.
    • नाल्यांना डम्पिंग ग्राऊंडचे न बनवणे.
    • वाहतुकीचे नियम तोडणे. अस्ताव्यस्त न पार्किंग करणे, चुकीच्या दिशेने ओव्हरटेक न करणे.
    • नियम पाळण्यासाठी गरज कडक कायद्याची नाही, तर गरज आहे सद्सद्विवेकबुद्धीची, पालकांनी मुलांवर उत्तमनागरी संस्कार करण्याची आहे.
    • आपल्या देशामध्ये सुद्धा अनेक महापुरुष जन्माला आलेत. त्यामुळेच आपला देश त्यावेळी फार पुढे गेला. जसे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्वराज्य निर्मिती झाली. मात्र त्याच महाराष्ट्रामध्ये आता आपण केवळ एकमेकाशी भांडणांमध्ये गुंतलेलो आहोत आणि ही राज्याची प्रगती व्हायला पाहिजे याकडे आपले लक्ष नाही.

    म्हणून आज गरज आहे की पुढचे शंभर वर्ष नागरिकांमध्ये असलेले वाद जे जातीमुळे, धर्मामुळे असो की इतर कुठल्याही कारणाकरता असो ते न करणे आणि सगळ्यांचे लक्ष केवळ देशाच्या प्रगतीवर केंद्रित करणे गरजेचे आहे.

    • यामुळेच आपला देशाला महाशक्ती बनण्याकरता नक्कीच मदत मिळेल. म्हणून आज गरज आहे, ती सक्षम राजकीय नेतृत्त्वाची, शिवाय देशभक्त देशप्रेमी नागरिकांची जे देशाकरता काहीही करायला तयार आहे. चला आपण नुसते शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा काहीतरी कृती करू यामुळे देशाच्या प्रगतीला हातभार लागेल. जय हिंद.

    -ब्रिगेडीअर श्री. हेमंत महाजन

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

  • रम्य ते बालपण : धनराज खरटमल

    साठच्या दशकात कुर्ल्यातल्या माळरानावर आम्ही राहायला आलो तेव्हा माझ्या बाबांनी जागा घेऊन तेथे एक चाळ बांधली होती. मुंबईत कधी काळी माळरानेही अस्तित्वात होती हे वाचून खरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. सभोवार उघडे माळरान आणि आसपास काही चाळी.

  • संत तुकारामाची घोंगडी

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये भालचंद्र केशव गन्द्रे यांनी लिहिलेला हा लेख


    श्रीकृष्ण परमात्म्यांनी द्रौपदी वस्त्रहरणांत सातत्याने तिला वस्त्रे पुरवून तिची अब्रू वाचविली. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातही अशाच एका परीक्षेच्या वेळी, तत्सम प्रसंग घडला नि श्रद्धेमुळे ईश्वरी-लीला कशी घडते हे साऱ्यांनाच जाणवले. तुकाराम महाराजांचे गुरुबंधू श्री. गोचर स्वामी! तुकाराम महाराजांवर गुरुकृपेचा वरदहस्त होता. त्यामुळे ते विदेही स्थितीचे सुख अनुभवीत असत. रात्र झाली की ते, क्षुद्राचे घरी जात व तेथेच झोपत. त्यांचा तो जणू नियमच झाला होता. सकाळी घरी जाताना मात्र या क्षुद्राच्या घरचे जे वस्त्र हाती लागेल ते घेऊन ते घरी परतत असत.

    एके रात्री ते एका भंगी समाजाच्या माणसाकडे झोपावयास गेले व सकाळी घरी परत येताना त्याच्या घरची जी घोंगडी हाती लागली ती घेऊन ते गोचर स्वामींकडे गेले. गोचरस्वामी व इतर भक्त जेव्हा जेवायच्या तयारीत होते त्यावेळी स्वामींनी तुकाराम महाराजांस भिक्षा करण्यास सांगितले. ते ऐकून जेवावयास बसलेले ब्राह्मण म्हणाले, "तुकाराम काल रात्री एका भंगी कुटुंबाकडे राहिले होते. त्यांनी त्याच्याकडची ही घोंगडीही बरोबर आणली आहे. त्यामुळे अशा भ्रष्ट माणसास आमच्या बरोबर जेवावयास बसवाल तर आम्ही जेवणार नाही." ते ऐकून दुःखानेच गोचर स्वामी म्हणाले, "तुकाराम महाराज, हे सर्व ब्राह्मण तुम्हाला भ्रष्ट म्हणत आहेत. याकरिता तुम्ही ती घोंगडी टाकून द्या बरे."

    गोचर स्वामींच्या आज्ञेप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अंगावरची घोंगडी टाकून दिली पण काय आश्चर्य लगेच दुसरी घोंगडी त्यांच्या अंगावर आली. असे करता करता घोंगड्यांचा ढीग झाला. पण घोंगडी टाकली की नवी घोंगडी येणे बंद होईना. ते पाहून गोचरस्वामी ब्राह्मणांना म्हणाले, “काय हो, तुकाराम भ्रष्ट झाले आहेत का ते आता सांगा." पण हा अद्भुत प्रकार पाहून तेथे जमलेले सर्व ब्राह्मण लज्जित झाले व तुकाराम महाराजांचा अधिकार किती महान आहे, हे जाणून त्यांनी त्यांना नमस्कार केला व ते सारे क्षमायाचना करू लागले.

    मग गोचर स्वामी सर्वांना उद्देशून म्हणाले, "तुकाराम महाराजांची योग्यता किती महान आहे हे मी जाणतो. म्हणूनच दररोज आम्ही त्यांची भिक्षेकरिता वाट पहात असतो. साधु पुरुषाचे सद्गुण पाहून ते अंगिकारण्याचा प्रयत्न करावा. त्यांच्या कार्याला दोष देऊन त्यांना कलंकित करू नये. त्यांचा देहाभिमान नष्ट झाल्याने, त्यांच्या दृष्टीने देह हा कस्पटासमान आहे. त्यामुळे त्यांच्या देहाने केलेले कोणतेही कर्म दुषित वा कलंकित असू शकत नाही हे यापुढे नीट लक्षात ठेवा. देहाचा अभिमान असलेले जीव खरंच अज्ञानी आहेत. सर्व जीव-प्राणीमात्रांवर दया करणारी माणसे थोर अंतःकरणाची व अतुलनीय आदर्शयुक्त आहेत. मात्र त्यांचा अधिकार कळण्यास सामान्यजनांना खूप वेळ लागतो नि तोपर्यंत अशा असामान्यांचा जनतेकडून वृथा छळ होतो. यासाठी सद्गुरु कृपेच्या छायेत रहा. म्हणजे खरा हिरा कोणता हे तुमच्या आपोआप ध्यानी येईल."

    गोचर स्वामींचे हे अमृतबोल ऐकून मग सर्वांनी तुमाराम महाराजांचा जयजयकार केला व कृष्णाच्या द्वापार युगाप्रमाणे कलियुगातही चमत्कार घडतात हे साऱ्यांच्या ध्यानी आले.

    - भालचंद्र केशव गन्द्रे, ठाणे

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • आठवणींचे शिंपले वेचताना

    बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ असे म्हणतात ते उगाचच नाही. लहानपणी मला गोष्टींचे पुस्तक वाचण्याचे वेड होते. इसापनितीच्या कथा वाचून वाचून पाठ झाल्या होत्या. दहा वर्षांची असताना स्वयंपाकघरातील तांबड्या कोब्यावर मी ‘कविता’ लिहिली होती. तो कोबा म्हणजे माझी ‘पाटी’ असायची. मोठ्ठाली गणिते त्यावर मी सोडवित असे.

  • एक नाणे, दोन बाजू: पर्यटन आणि पर्यावरण

    आपल्या भारतातील पयर्टन क्षेत्राचा आढावा घ्यायचा झाला तर जुन्या काळात आपल्याकडे जी तीर्थाटनाला जायची पद्धत होती तो भारतातील पर्यटनाचा उगम. पुढे ब्रिटिशांच्या काळात गोया साहेबाने इथला उन्हाळा सोसेना म्हणून अगदी माथेरानपासून मसुरीपर्यंत भारतभरातली हिलस्टेशन्स शोधून काढली आणि उन्हाळ्यात तिकडे जाण्याची पद्धत पडली.