वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये डॉ. प्रकाश सपकाळे यांनी लिहिलेला हा लेख
संतत्त्वाची परिभाषा मराठी वाङ्मयात सर्वात आधी मुक्ताबाईने केली आहे. संतत्व गुणवत्ता आहे. गुणवत्तेचा अर्क आहे. संस्कृतात 'संत' शब्द आहे, तो साधुसंत, सज्जन, सदाचारी अशा अर्थाने. हिंदीत 'संत' शब्द ढिसाळपणाने वापरला जातो. सज्जन माणूस या अर्थाने, मराठीत वारकरी संतांच्या संदर्भात हा शब्द योजला जातो. महानुभाव संप्रदायात 'महंत' आहेत. 'आचार्य' आहेत. 'संत' नाहीत. दत्त संप्रदायात 'गुरू' आहेत. 'संत' नाहीत. समर्थ संप्रदायात महंत, समर्थ, रामदासी आहेत. खिश्चनांमध्ये saint आहेत, 'संत' नाहीत. खिश्चन धर्मात 'सेंट'- saint ठरवण्यासाठी ठराविक पद्धतीने-चाकोरीने, कागदोपत्री पुरावे जमा करून, चमत्कार नोंदवून तांत्रिक पद्धतीने दिली जाते ती उपाधी म्हणजे saint. ती संबंधिताच्या मृत्यूनंतर दिली जाते. गुणवत्तेशी तिचा संबंध नाही. तांत्रिकतेशी आहे. चर्च ठरवते कोणाला saint म्हणायचे ते! अशी ती औपचारिक व तांत्रिक उपाधी आहे. आपल्याकडे संतत्व ठरते ते त्या व्यक्तीच्या हयातीतच आणि परंपरेने ते ठरते. त्या व्यक्तीच्या चारित्र्याने, गुणवत्तेने, आचार-विचारांनी, कार्यकर्तृत्वाने समाजच ते ठरवत असतो. संतत्वाचे निकष संतांच्या चरित्र-चारित्र्यातूनच ठरत असतात. अंगभूत गुणांचा आदर्श आपल्या आचरणातून संतांनी आविष्कृत केला आहे.
संत जेणे व्हावे । जन बोलणे सोसावे ।...
विश्व जाहलेया वन्ही । संतमुखे व्हावे पावी ।
तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
असा संतत्त्वाचा उद्गार प्रथम मुक्ताबाईने केला.
ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या समकालीन संतांनी-विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा, सोयराबाई इत्यादिकांनी संतत्वाची प्रमाणे आपल्या आचार-विचारातून आविष्कृत केली. एकनाथांनी तेच केले. सर्व बाबतीत कळस ठरलेले तुकाराम यांनी संतांचाच आदर्श समोर ठेवून जीवनक्रम आरंभिला.
झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग ।
करू संती केले ते ।
आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।
अशी त्यांची भूमिका आहे. आपण एका क्रांतिकारक कुळाचे जबाबदार वारस आहोत याचे त्यांना भान होते. आपल्या कुवतीचे, आपल्या कर्तव्याचे त्यांना भान होते. संतांच्याच मार्गाने चालायचे आहे. अवतार, ऋषी, संत यांचे कार्य एकच. साधूंचे रक्षण, दुष्टांच्या दुष्कृत्यांचा विनाश, धर्मसंस्थापना, ऋषींनी सांगितलेले साच भावे वर्तावया, आडरानाने भरलेले जग आचरणाने स्वच्छ करायला आपण आलो आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. शब्दज्ञानाने अर्थाचा नाश केला आहे. भक्तीचा डांगोरा पिटून जगात आनंदी आनंद निर्माण करू. धर्माचे रक्षण करू. तथाकथित धर्माधिकारी अध्यात्माचा खरा मार्ग न दाखवता स्वार्थ बुद्धीने शब्दज्ञान सांगून देवाला, धर्माला, धर्मग्रंथांना साधन मानून लोकांना फसवतात. त्यांना स्वतःला अनुभूती नसतेच. ईशस्पर्श नसतो. संत मात्र ईशस्पर्शाने परीसस्पर्शाने सोने व्हावे, गंगेस मिळाल्याने सरितांचे, ओघळांचे स्वरूप पालटावे, तसे संतपदाने संतमय झालेले असतात. आपपरभाव त्यांच्या ठायी नसतो. रंजल्या गांजलेल्यांना संत आपले म्हणतात. अंतर्बाह्य नवनीतासारखे त्यांचे चित्त असते. निरपराधांना ते आधार असतात. सर्वांवर मुलाप्रमाणे ते प्रेम करतात. संत साक्षात भगवंताच्या मूर्तीच असतात.
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।
तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवतांची मूर्ती ।।
शिक्षक ज्याप्रमाणे लहानग्यांना शिकवतात, तसे संत क्रिया करून जगाला दाखवतात. आचरणाने शिकवतात. 'आधी केले मग सांगितले' असे त्यांचे आचरणातून शिकवणे असते. आई ज्याप्रमाणे बालकाची गती पाहून पाऊल टाकते, तसे संत वागतात. संत लोकांसाठी पाण्यातल्या नावेसारखे असतात. स्वतः तरतात, इतरांना तारतात.
अर्भकाचे सारी । पंते हाती धरली पाटी ।।
तैसे संत जगी । क्रिया करूनी दाविती अंगी ।।
तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ।।
सूर्य, दीप, हिरा हे दृश्य वास्तवतेचे दर्शन घडवतात. संत अदृश्याचे परमेश्वराचे, विठ्ठलाचे दर्शन घडवतात.
रवि, दीप, हिरा दाविती देखणे ।
अदृश्य दर्शनें संतांचे ती ।।१।।
तापली चंदन निववितो कुडी ।
त्रिगुण तो काठी संतसंग ||२
चंदन ताप दूर करते तर संत त्रिविध तापाची बाधा दूर करतात. आईबाप शरीराचे पोषण करतात, संत जन्म मरण यातून सुटका करतात.
संतांच्या अंगभूत गुणांचे गुणवत्तेचे निकषच तुकोबांनी दिलेले आहेत. संत कल्पतरू आहेत. इच्छा पुरवतात. संत कामधेनू आहेत. हितोपदेश करणारे शिक्षक आहेत. माता पिता आहेत. तृषार्तासी उदक, भुकेल्यास मिष्ठान्न आहेत. सज्जन सांगाती सोयरे आहेत. तीर्थांचे आश्रयस्थान, यमदूताचे काळ आहेत.
संत पाऊले साजरी । गंगा आली आम्हावरी ।
स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।।१।।
संत अग्नी, परीस, गंगा, चंदनासारखे आहेत. आपणासारखे तात्काळ करणारे आहेत. सहनशील, व्यापक, विशाल मनोवृत्तीचे आहेत.
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात।
तुका म्हणे संतपण याचि नावे ।
जरी होय जीव सकळांचा ।।
संत अजातशत्रू असतात. त्यांची देवावर माया असते.
वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ।।
संत भेदभाव करीत नाहीत. पाप-पुण्य, सुख- दुःख, हानी-लाभ असा भेद त्याच्या ठिकाणी संपलेला असतो. अधिकार, जात, वर्ण, धर्म, सत्य-असत्य, जन-वन यात अभिन्नता मानतात. आपपरभाव त्यांचा संपलेला असतो.
नाही दुजेपण ठावे त्यासी ।
प्रारब्ध-क्रियामाण- संचित असा काही भेद त्यांना नसतो. सत्त्व-रज-तम यांची बाधा नसते. देवभक्तपण हेही भिन्नत्व नसतो. संत उदार असतात.
संत उदार उदार । भरले अनंत भांडार ।
त्यांचे अंगी नम्रता असते. भाषा प्रेमळ असते.
प्रेमे अमृते रसना ओलावली ।
सकळ इंद्रिये जाली ब्रह्मरूप ।।
संत समदृष्टी असतात.
अवघे सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे।
संत अंतर्बाह्य सद्गुणी असतात.
चंदनाचे हात पायही चंदन ।
परिसा नाही हीन कोणी अंग ।
दीपा नाही पाठी पाठीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ।
तुका म्हणे तैसा सज्जनापासून
पाहता अवगुण मिळेचि ना ।।
संत प्रेमळ असतात, परोपकारी असतात.
संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ ।
संतांचिये गावी वरो भांडवल ।
अवघा विठ्ठल धन वित्त ।
प्रेमसुख सारी घेती देती ।।
संत दुसऱ्याला आपल्या (जिवा) सारखे मानतात.
जीव ऐसे देखे आणिका जीवांसी ।
निखळ चि रासि गुणांचीच ।।
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
संत परिपूर्ण असतात.
तुका म्हणे तैसे जाणा संतजन ।
सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ।।
संत प्रेमळ असले तरी लढाऊ वृत्तीचे असतात.
अभंग हे बाण त्यांचे हाती असतात.
हाती बाण हरिनामाचे ।
वीर गर्जती विठ्ठलाचे ।
जुंजार ते विष्णुदास ।।
क्षमा, दया, शांती ।
बाण अभंग हे हाती ।।
संत धैर्यवंत असतात. 'अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।
संत षडरिपु जिंकलेले असतात.
संसाराचे नवी साधिले निधान ।
मारिले दुर्जन षड्वर्ग ।।
संत मोक्षालाही तुच्छ मानतात. भूतीं भगवंत अनुभवतात.
तये गावी नाही दुःखाची वसती ।
अवघाचि भूतीं नारायण ||
संत विदेही असतात. देही उदास, आशापाश
निवारण केलेले असतात. त्यांचा विषय नारायण हाच झालेला असतो.
तुका म्हणे देही । संत झाले विदेही ।।
संतांचे लक्षण ओळखाया खूण |
दिसती उदासीन देहभावा ।।
विदेही असल्याने, आशापाश निवारलेले असल्याने शुभाशुभ, हर्षामर्ष अंगी नसतो. द्रव्य दारा चित्ती नसतात. जगच जनार्दन असल्याने जगाच्या सुखासाठी जगत असतात.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
देह कष्टविती उपकारे ।।
भूतांची दया हे भांडवल संतां ।
आपुली ममता नाही देही ।।
तुका म्हणे सुख पराविया सुखे ।
अमृत हे मुखे स्रवतसे ।।
त्यामुळे 'संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ' असतो. अशा संतांचे उपकार काय सांगावे? संत निरंतर जागवतात. गाईने वासराला सांभाळावे तसे ते आपल्याला सांभाळतात.
तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
तृषार्ताला उदक, भुकेल्याला मिष्ठान्न लाभावे, बालकाला आई भेटावी, तसा जीवलग संतांचा संग लाभतो. अवघी पुण्ये सानुकूल व्हावी, तेव्हा संतसंग लाभतो. कृतकृत्य व्हावे, असे सोयरे, हरिजन प्राणसखे संत. संत म्हणजे जीवाचे जीवन. संतसंग तोच स्वर्गवास.
संतांचा संग तोचि स्वर्गवास ।।
संत घरा आले तोच खरा दिवाळी दसरा ।
दसरा दिवाळी तोचि आम्हा सण
सखे संतजन भेटतील !
धन्य दिवस आजि जाला सोनियाचा ।।
संतदर्शन घडणे म्हणजे साक्षात् भगवंताचे दर्शन घडणे.
संतदर्शन हा लाभ । पद्मनाभ जोडला ।
संतांच्या चरणस्पर्शाने वासनेचे बीज जळून जात.
सुख वाढते. विश्रांती प्राप्त होते. संतकृपेने काया डवरते.
अलिगणे संतांचिया । दिव्य झाली माझी काया ।
मस्तक ह पायावरी । त्यांच्या ठेविता ।।
संत पाउले साजिरी । गंगा आली आम्हांवरी ।
स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।
तुका म्हणे धन्य झालो । संतसागरी मिळालो ।।
संतांच्या संगतीने आपणही संतांसारखे होऊन
जातो.
अग्निमाजी गेले । अग्नि होऊन ठेले ।।
चंदनाच्या वासे । तरू चंदन झाले स्पर्शे ।।
अग्नीत गेले ते अग्नीरूप झाले. चंदनाच्या वासाने इतर झाडेही सुगंधित होतात. संतांचे आलिंगन मोक्ष, सायुज्जना घडवणारे असते.
अलिंगने घडे । मोक्ष सायुज्जना जोडे ।।
ऐसा संतांचा महिमा |
संतांचा महिमा सांगताना संतत्वाचे अनेक निकष तुकोबा सांगून जातात. संत सज्जन, सोयरे, शिक्षक, मायबाप, प्रेमळ, परोपकारी, सहनशील, विशाल मनोवृत्तीचे, क्षमाशील, आपपरभावरहित, अंतर्बाह्य सदगुणी, प्राणसखे, जीवाचे जीवन, मोक्षालाही तुच्छ मानणारे, मधुर भाषी पण प्रसंगी पाखंड खंडण करताना लढाऊ, झुंजार वृत्तीचे
मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
असे विदेही, षड्रिपु जिंकलेले असे असतात.
मुलाम्याचे नाणे - संतांची सोंगे
संतांविषयी समाजात अतिशय आदर वाटत असतो. लोकांच्या मनात देवासारखी भावना संतांविषयी असते.
संधिसाधू, ढोंगी, दांभिक लोकांच्या हे लक्षात येते की देवाच्या, धर्माच्या आश्रयाने पुष्कळ प्रकारचे भौतिक लाभ होऊ शकतात, तेव्हा असे लोक संतांची बाह्य लक्षणे दाखवून समाजात मिरवू लागतात. भौहे भाबडे लोक त्यांना भुलतात. त्यांनाही संत समजू लागतात.
प्रत्येक काळात असे लोक आढळून येतात. तुकोबा त्यांच्याविषयी स्पष्टपणाने बोलून लोकांना सावध करतात. तुकोबा भावात्मक जितके बोलतात, तितकेच अभावात्मक स्पष्टपणे सांगतात. संत कसे असतात तसेच संत कसे नसतात तेही सांगतात.
'नव्हतो सावचित्त । तेणे अंतरले हित ।। असे होऊ नये म्हणून संतांनाही, संत म्हणून मिरवणाऱ्यानाही कस लावून तपासून पाहावे, असे स्पष्टपणे सांगतात.
शुद्ध कसूनि पाहावे । वरील रंगा न भुलावे ।।
तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले ।
जरी हिंडविते देशोदेशी ।।
हिरीयासारिखा दिसे शिरगोळा ।
पारखी तो डोळा न पाहती ।।
देऊनिया भिंग कानाविले मोती ।
पारखिया हाती न पाहाती ।।
सोन्याचा मुलामा दिलेले नाणे सोन्याच्या मोलाने चालत नाही. शिरगोळ्याला हिऱ्याचे मोल मिळत नाही. रत्नपारखी पारख करतो, तसे संतांना पारखावे.
संतांची सोंगे संतांसारखीच वाटतात. पण दोन्ही दिती सारखी। वर्म जाणे तो पारखी ।। मनाने तटस्थ असणारा आणि आळशी, ध्यानस्थ बसलेला आणि झोप घेणारा, सर्वस्वाचा त्याग केलेला आणि पोटासाठी जोग घेणारा, देवासाठी आर्त असणारा आणि पोटासाठी भक्ती करण्याचे सोंग करणारा असे दोन्ही सारखेच दिसतात. म्हणून वर्म जाणावे.
संतांची सोंगे स्वतःविषयी बढाया मारतात.
डबक्यातल्या बेडकाने सागराचा धिक्कार करावा, कावळ्याने मी राजहंस आहे, असे म्हणावे, गाढवाने मी गजाहून थोर आहे, असं म्हणावे तसे ढोंगी संत मिरवतात.
फुगते काउळे म्हणे मी राजहंस आगळे
मुलाम्माचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ।।
कोल्ह्याच्या गर्जना कुठपर्यंत? सिंह पाहिला नाही तोपर्यंतच. गारा तोपर्यंतच शोभतात, जोपर्यंत हिरा प्रकाशला नाही. ढोंगी संत स्वतःच्या संतपणाच्या गोष्टी कुठपर्यंत करतात? जोपर्यंत तुकारामांसारखा संत भेटला नाही.
तोवरी तोवरी संतांचिया गोष्टी ।
जव नादी भेटी तुक्यासवे ।।
संतांच्या सोंगांची ही संतपणाची लक्षणे दाखवणे म्हणजे वांझेने गरवार लक्षण दाखवणे आहे.
वांझेने दाविले गऱ्हावार लक्षण ।
चिरगुटे घालून वायथाला ।।
गन्हवारे हा विधी । पोट वाढविले चिंधी ।
लावू जाणे विन्हे । तुका साच आणिक कल्हे ।।
अशा ढोंगी संतांच्या नादी लागलो तर परमार्थ साधना दूर, देव भेटणे दूरच. सर्व प्रकारचे शोषण मात्र हमखास होते. चोराच्या संगतीने चोरीची इच्छा व्हावी, व्यभिचाऱ्याच्या संगतीने व्यभिचाराची इच्छा व्हावी, तसे हो. सर्व वाया जाते. समाजात अपकीर्ती होते. अशा ढोंगी संतांकडून, संतांच्या सोंगांकडून उद्धार होऊ शकत नाही.
दगडाची नाव आधीच ते जड
काय ते दगड तारू जाणे ।।
तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी
सोंग संपादणी करती परि ।।
गाढवाने कितीही शृंगार केला तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही.
गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ।।
संतपणाची कितीही बाह्य लक्षणे दाखविली तरी अशा संधिसाधूंचा मूळ धर्म सुटत नाही.
अशी संतांची सोंगे कशी ओळखावीत? याविषयीही निःसंदिग्धपणे तुकोबा मार्गदर्शन करतात.
तरी ते संपादिले सांग कारणावाचुनी व्यंग ।।
भोंदावया मीस घेऊनी संतांचे ।
करी कुटुंबाचे दास्य सदा ।।
पोपटासारखे बोलणारे, लोकरंजन करणारे, द्रव्यासाठी शिकवले तसे बोलणारे, पाठांतर करून ज्ञानी म्हणून मिरवणारे, संतचिन्हे मिरवणारे खरे संत नसतातच.
संताचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरवती जगी ।।
कामक्रोधलोभ चित्ती । वरिवरि दाविती विरक्ती ।।
असे अनेकजण संत म्हणून मिरवताना दिसतात. पण संत म्हणून मिरवणाऱ्यांना कस लावावा. परीक्षा घ्यावी. हिरा म्हणून मिरवणाऱ्या गारांना घणाने ठोकून पाहावे
हिऱ्या ऐशा गारा दिसती दुशेन ।
तुका म्हणे पण न भेटे तो ।।
संत आणि संतांची सोंगे सारखीच दिसतात.
दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे तो पारखी ।
म्हणून संत कोण नाही, याविषयी तुकोबा सांगतात.
अध्यात्मपर कविता करतात, संत आडनाव आहे,
कीर्तन करतात, पुराणे सांगतात, वेद पठण करतात, कर्मकांड करतात, तीर्थाटन करतात, वनात राहतात, अंगाला भस्म लावतात, माळा नुती परिधान करतात, असे सर्व संत नाहीत. ही सगळी बाह्य लक्षणे होत. हे सर्व संसारी लोक आहेत. देह निरसला नाही, ते सर्व संसारी होत. संत नव्हेत. बाह्य लक्षणांना महत्त्व नाही. भगवेपणा लक्षण मानले तर कुत्रा भगवाच असतो, जटा वाढवणे संतांचे लक्षण असते तर अस्वलही संत ठरेल. भूमीत गुहा खोदून राहणारा संत असता तर उंदीरही संतच ठरला असता की! कशासाठी अशी खटपट करावी?
लोकांनी भुलावे म्हणून ही सारी सोंगसंपादणी! कीर्तन करणे, भक्तिगीते गाणे, जडीबुटी देऊन चमत्कार करणे, शिष्यशाखा वाढवणे, आपण अयाचक असल्याची प्रसिद्धी करवणे, मठपती होणे, देवार्चन करणे, देवाचे दुकान मांडणे, वेताळ वगैरे प्रसन्न आहे, असे पसरवणे, पुराण सांगणे, अध्यात्मपर घटापटादींवर वाद घालत चर्चा करणे, पढीक पंडित असणे, आगम जाणणे, स्तंभन विद्या जाणणे, पुरस्कार मिळवून मोठेपणा बिंबवणे असे उपद्व्याप करणारे संत नव्हेत. हे कपटी लोक असतात.
केस वाढवणे, अंगात भुते आणणे, नरनारी जमवून शकून सांगणे ही संतांची लक्षणे नव्हेत. तरी ते नव्हती संत जन । तेथे नाही आत्मखुण ।। अध्यात्मिक, धार्मिक लक्षणे दाखवणारे संत नव्हेत. तंबाखू, भांग सेवन करणारे, गांजा ओढणारे संत नव्हेत. ही सारी संतांची सोंगे आहेत.
ऐसे संत झाले कवी । तोंडी तमाखूची नळी ।।
ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू।।
दावुनी वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ।।
तुका म्हणे सांगे, किती । जळो तयांची संगती ।।
भोंदू संतांची लक्षणे म्हणजे कर्मकांड करणे, वैराग्याची लक्षणे दाखवत भोग घेत राहणे, अशा भोंदूची संगत धरू नये. असे पिंड पोषण करणारे संत नव्हेत. त्यांच्या लेखी जीव हाच देव. भोजन हीच भक्ती. मुक्ती म्हणजे मरण. असे भोंदू पापपुण्याचा विचार न करता आचरण करतात. स्वतः उंच जागी बसून मोठेपणा मिरवतात. टिळा-टोपी अशी सजावट करतात, ध्यान धारणा करण्याचे नाटक करतात.
बक ध्यान करी । सोंग करूनि मासे मारी ।।
असे ढोंगी संत नसतात. हरिकथा सांगणारे संत नव्हेत. अशी अनेक लक्षणे दाखवणारे दुकान मांडे असतात. संत नसतात.
असे मांडिले दुकान ।
कथेमध्ये हलवी ढोंग । संत नव्हे ते बेसंग ।
पाहुनी स्त्रियांचा मेळा । काढी सुस्वर तो गळा ।
तुका म्हणे नव्हे योग । पोटासाठी केले ढोंग ।।
भविष्य सांगणारेही संत नव्हेत.
जगरूढीसाठी घातले दुकान ।
जातो नारायण अंतरुनि ।।
ऋद्धीसिद्धचे साधक, वाचासिद्ध हे संत नव्हेत.
तीर्थस्नान करणारे, उपास करणारे संत नव्हेत.
अंतरीची बुद्धी खोटी । भरले पोटी वाईट ।।
मंदिरातील पुजारी, शब्दज्ञानी, पंडित, जातीचे ब्राह्मण, याज्ञिक, होम हवन करणारे, पूजा सांगणारे हे सारे संत नव्हेत. देवाच्या, धर्माच्या आधारे जगणारे ते पोटभरू होत. शोषक होत. पिंडपोषक होत. वित्त, धन, सभा, कीर्ती, जमीन अशा अनेक गोष्टी प्राप्त करणारे शोषक होत. पाखंडी होत.
पाखंडांचा, पाखंड्यांचा मेरुमणी म्हणजे स्वतःला परमपूज्य म्हणवणारे स्वयंघोषित देव. देव, धर्म यांमुळे सामान्य माणसालाही मान मिळतो. पाखंडी, संतांची सोंगे देवाच्या आश्रयाने समाजात वावरतात. देवाला मिळणारे, देवाच्या नावाने मिळणारे सर्व काही अशा संधिसाधूंना मिळू लागते. दसऱ्यामुळे आपटा, सवंदर अशा रानचाऱ्यालाही महत्त्व प्राप्त होते. पाण्यामुळे मातीच्या घागरीलाही डोक्यावर घेतले जाते. दाण्यामुळे मापाचीही देव घेव होते. तसं 'देवामुळे मान । नाहीतरी पुसे कोण? ।।' देवामुळे आणि संतपदाच्या महात्म्यामुळे मुलाम्याच्या नाण्यांनाही स्थान मिळते. पण हे ढोंगी गुरू, स्वामी, स्वयंघोषित परमपूज्य तर देवाचेच मारेकरी ठरतात. देवाला बाजूला सरकवून स्वतःलाच ते देव, देवाचे अवतार, अवताराचे अवतार इतकेच नाही काही तर अवतार घेणारी सुप्रीम पॉवर आपणच आहोत, असे घोषित करू लागतात. प्रक्षेपित करू लागतात. तुकोबांच्या काळीही असे लोक होतेच. ज्ञानेश्वरांच्याही काळात असे पंथ संस्थापक दिसतात. आपणच परमेश्वराचा शेवटचा अवतार! माझ्यानंतर अवतार नाहीच, असे म्हणणारे. तुकोबा 'देही', 'देव', 'जली' जनार्दन, 'भूती' भगवंत, 'जगी' जगदीश्वर, ‘विश्वी विश्वंभर' असे परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूप स्वानुभवाने सांगतात. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे।' अशी गर्जना करतात. पण हे ढोंगी परमपूज्य केवळ आणि केवळ स्वतःलाच परमपूज्य, परमेश्वर मानतात. तुकोबा म्हणतात,
एक म्हणती आम्ही देवचि पै झालो ।
ऐसे नका बोलो । पडाल पतनी ।।
एक म्हणती आम्ही देवाचि पै रूपे ।
तुमचे नि बापे न चुके जन्म ||
स्वतःला देव घोषित करणे पाखंडीचा अतिरेक आहे.
अहं म्हणे ब्रह्म । नेणे भक्तीचे ते मर्म ।
तुका म्हणे क्षण । नको तयाचे दर्शन ।।
स्वतःला देव समजणाऱ्यांची भक्ती करणे म्हणे आपल्या आयुष्याचे मातेरे करणे होय.
सानुनिया नरा । कोण आयुष्याचा मातेरा ।।
अशांच्या नादी लागणे म्हणे
गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले
तोंड काळ झाले जगामाजी ।।
अशी संतांची सोंगे विदेही नसतात. देहाचे चोचले पुरवणारे इंद्रियभोगी असतात. कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. परमेश्वर षड्गुण संपन्न असतो.
षडगुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंती जाण ।।
यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असे परमेश्वराचे सहा गुण. त्याचप्रमाणे परमेश्वराचे दुसरे सहा गुण म्हणजे सर्वज्ञता, तृप्ती, अनादिज्ञान, स्वातंत्र्य, शक्तिप्रकाशन आणि अनंतशक्तित्व असे गुण ज्या माणसात असतात, त्याच्या मनुष्यपणाचा चिरा पडतो. त्याचे मनुष्यपण संपते. पण हे ढोंगी, दांभिक, इंद्रियभोगी स्वघोषित परमपूज्य तर धन, द्रव्य, दारा, जमिनी, कीर्ती पुरस्कार, मान्यता, मान यांचे आयुष्यभर भुकेले असतात. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या आश्रयाने सर्व सुखोपभोग प्राप्त करतात. मठ, ट्रस्ट यांच्या आड सर्वकाही पचवतात. स्वतः अयाचित असल्याचे पसरवून शिष्यांद्वारा कलेक्शन करतात.
आमचेहि गोसावीयाची अयाचित वृत्ती
देती शिष्याहाती उपदेश ।।
भावपुष्प, भावसमर्पण, अशा गोंडस नावांनी भक्तांकडून नियमितपणे 'देवाचा वाटा' म्हणून धन उपटले जाते. त्यासाठी अध्यात्माची परिभाषा साधन म्हणून वापरली जाते. 'देवाचा वारा देव नाही तो चोर आहे, असे गीतेत सांगितले आहे, असा पण देवाचा वाटा स्वतःच हडप करणारा कोण? महाचोर. असे महाचोर उदंड जाहले आहेत. देवकृषी, देवराई अशा गोंडस नावांनी खाजगी आणि शासकीयही जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यांच्या स्त्रीईषणा, धनईषणा, लोकेषणा, कीर्ती ईषणा, अपत्य ईषणा प्रचंड असतात. अध्यात्माच्या परिभाषेत त्या छान घोळलेल्या असतात. आपल्या स्थैर्याला, प्रतिभेला धक्का लावणाऱ्याच्या मागे ते सर्व प्रकारची झेंगटे लावतात. त्याची बदनामी करतात. पुरता काटा काढतात. आपले पितळ उघडे पाडणाऱ्याला, त्याचे स्वरूप उघडे करणाऱ्याला जगातून नाहीसेही करायला कमी करत नाहीत.
तुकोबा अशा स्वयंघोषित परमपूज्यांपासून, स्वयंघोषित देवांपासून सावध रहायला सांगतात.
देवा धर्माच्या आधारे चालणारे अन्यथा ज्ञान भावनिक शोषण करते. इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. पिंडपोषक पाखंडी, संतांची सोंगे म्हणजे मुलाम्याचे नाणे आर्थिक शोषण करतात. विपरीत ज्ञान पसरवून स्वतःचे महत्त्व वाढवतात, मार्गदर्शन करीत आहोत असे दाखवत आडमार्गाला घेऊन जातात. हे देवाच्या मार्गावरील वाटमारे होत. देवाकडे जाणारे वित्त-जमिनी इत्यादीच नव्हे तर श्रद्धा-भक्ती यांचीही हे वाटमारी करतात. खऱ्या ज्ञानापासून, खऱ्या देवापासून दूर नेतात.
संतांची भावात्मक लक्षणे सांगून तुकोबाअभावात्मक लक्षणेही सांगतात व संतांच्या सोंगांचं पितळ निर्भीडपणे उघडे पाडतात. रोखठोकपणे, स्पष्टपणे सांगतात,
तुका म्हणे सत्य सांगो । येवोत रागे येतील ते ।
सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ।।
अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचे समकालीन सालोमालो, मंबाजी, रामेश्वरभट्ट समाजाचे असे अनेक प्रकारचे शोषण करताना त्यांनी पाहिले असतील. आज तुकोबा असते तर अध्यात्माची दुकाने मांडून बसलेले बाबा, दादा, नाना, ताई आणि बापू अशा अनेक खिसेकापूंवर तुटून पडले असते. तुकोबांचे संतत्त्वाविषयीचे निकष सार्वकालीक असल्याचे प्रत्ययास येते संतांची सोंगे ओळखण्यासाठीही तुकोबांनी दृष्टी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या दृष्टीने पाहू या आणि सावध होऊ या.
-- डॉ. प्रकाश सपकाळे,
जळगाव
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का?
लेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.
काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख
महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची हाक आहे. एकाच वेळी धरणी आणि आकाशावर प्रीत करायची जीवनशैली ही तुकोबा-जीवनशैली आहे. ते म्हणतात 'आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी ।' केवढा व्यापक पैस तुकोबा आपल्यासाठी आखतात. ते स्वतःला अगदी अणुरेणूहूनि थोकडा मानत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते आकाशाएवढे सिद्ध झाले. त्यांच्या मते संतजन ही फार मोठी सिद्धी होती. लब्धी होती. साधु संत ज्या दिनी घरी येतील तो त्यांच्यासाठी दिवाळी दसरा होता. संतजन म्हणजे सर्वत्र पसरलेले गगन आहे असे ते सार्थपणे म्हणतात.
तुकोबांनी वेदनेचा वेद वाचला व प्रेमाचे उपनिषद अभ्यासले. यामुळेच तर त्यांचे अभंग विचार प्रमेय बनलेत. यामुळेच तर ते धरणी-आकाशाच्या नात्याच्या मिलनाची महन्मंगल कथा मांडू शकले. सतराव्या झंझावाती शतकात तुकोबांचा तारा गगनात विलसतो. त्यांचा काळ हा १६०८ ते १६५० असा आहे. ही तुकोबांच्या जगण्याची, झुंजण्याची आणि समर्पित होण्याची बेचाळीस वर्षे आहेत. हा काळ इतिहासाच्या पटलावरचा अत्यंत संक्षिप्त असा काळ आहे पण असाच काळ तर शंकराचार्य काय आणि ज्ञानेश्वर काय यांना लाभला होता. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. तुकोबांची जीवनगाथा साधक, कवी, समाजसुधारक अशा त्रिपदा गायत्रीवर मंडित आहे. तुकोबा या त्रिवेणीवरील जंगम तीर्थ आहेत. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा हे नामदेवांच्या समकालीन होते. ते वारीला नियमितपणे जात असत. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आदेशावरून तुकोबांनी केलेल्या अभंग रचनेचे रहस्य उकलते.
तुकोबा हे नाव फार अद्भुत आहे. तुकणे म्हणजे तोलणे, वजन करणे. तुकणारा तो तुका. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई असून वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. त्यांना दोन भाऊ होते. मोठा सावजी तर धाकटा कान्होबा. दोन बहिणी होत्या. त्यांचे आई-बाबा निवर्तले आणि भाऊ सावजी गोसावी झाले. भावजय वारल्या. पहिली पत्नी रुखमा गेली. पुत्र संतोबा गेले. अन्नान्न दशा झाली आणि घरातल्या परिचित जनांच्या चिता धडधडताना बघाव्या लागल्या होत्या. तुकोबांची मशाल मात्र पेटती राहिली. वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा विवाह करावा लागला. पत्नी जिजाबाई म्हणजे आवली. तुकोबांच्या समोर संघर्षाच्या जळत्या वाटा संतप्त होत्या. दिवाणी दावा अंगावर कोसळला होता. घरादारावर जप्ती आली होती. बहिष्कार होता. गाव सोडून जायचा हुकूम झालेला. अशा प्रकारे तुकोबा निराधार झाले. तुकोबांना दुष्काळाने गाठले. त्यांचे दिवाळे निघाले. एकूणच उद्ध्वस्त जीवनाची ही दशा होती. इतिहासाची पाने फडफडत होती. तिकडे दक्षिणेत भयावह अशांतता होती. बहामनी मोगल संघर्ष वातावरणात दहशत पेरत होता. धाकदपटशा आणि अश्वारोहींच्या धुळीने जनजीवन माखलेले होते.
तुकोबांच्या पारंपरिक गतानुगतिक आयुष्याचा पट हा असा आहे सगळा. त्यांना ना जातीचे पाठबळ, ना गुरुंचा आसरा, ना कुणी मार्गदर्शक, ना हितकर्ता, ना कवडी ना चावडी म्हणजे ना पैसा ना अधिकार. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तिन्हीही स्तरावर उपासमार होती. एक पराभूत आणि लज्जित जीवन वाट्याला आले होते पण तुकोबांनी प्रत्येक संकटावर आंतरिक सामर्थ्याने मात केली. कठोर आत्मपरिक्षणाचा जळता वणवा सभोवती असताना चेहऱ्यावरील स्मितरेखा पुसू दिली नाही. प्रत्ययकारी आत्मसन्मानाची उजळती ज्योत असे त्यांचे जीवन राहिले. आंतरिक प्रतिभेचा स्वच्छ-निर्मळ प्रवाह वहाता होता. त्यांच्या ठायीच्या प्रकाश जाणिवा विरक्तीने झोडपल्या गेल्या पण आंतरिक उजेड मात्र कायम होता. कोवळी भाव संवेदना जळती आणि उजळती होती. ते म्हणत होते 'अंतरी पेटता ज्ञानज्योत धवळेल जगदाकार.'
तुकोबांसाठी जगण्याचा अर्थ झुंजणे होता आणि संदर्भ समर्पित होण्याचा होता. आपल्या जीवनातील कुरुक्षेत्राला त्यांनी धर्मक्षेत्रात परिवर्तित केले. 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन' हे अंतरंगातील सत्य तुकोबांनी परखडपणे मांडले. कुठल्याही परिस्थितीत ना शरणागती स्वीकारली ना परिस्थितीशरण बनले. 'न दैन्यं पलायनं' हा गीताबोध ध्यानी घेऊन ते जळत्या पायवाटेवर अनवाणी प्रवास करत राहिले नि मळलेली पायवाट चालत राहिले. एक अनवट व अवघड वाट चालणारा हा फकीर अक्षरशः पंख मिटून बसलेल्या गरुडासारखा उज्ज्वल उद्याची वाट बघत राहिला होता.
तुकोबांना आपल्या मूळाचा नेमका शोध लागलेला असल्यामुळेच ते म्हणू शकत होते 'आम्ही मूळचे वैकुंठीचे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते स्वयंभू आहोत केले नव्हे' या प्रमाणे त्यांना आपल्या स्वप्नांना जागरणाचा संदर्भ सहजीच देता येत होता. बाबाजी चैतन्य त्यांच्या अध्यात्म साधनेचे अधिष्ठान होते. आपल्याला संत नामदेवांनी कविता कार्य सोपवले आहे याची खूणगाठ हे त्यांच्या कवित्व साधनेचे बलस्थान होते. तुकोबांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने गीता भाष्य लिहिले एकूणच परंपरा नाकारणारे बंडखोर असे मन त्यांना लाभले होते. हिंदी भाषेत असे मन कबीर यांना तर गुजराती भाषेत असे मन नरसी मेहता यांना लाभले होते. या वैष्णव वीरांनी शास्त्रसत्ता नाकारली. ग्रंथ सत्ता झुगारून दिली. कबीर ठामपणे म्हणाला होता 'तू कहता कागज की लेखी में कहता आँखन को देखी. ' तुकोबा यामुळेच तर केवळ आपण वेदांचा अर्थ जाणतो असे हिंमतीने म्हणू शकत होते. कबीराच्या शैलीत तुकोबा माळा-टिळा-जानवे-ज्योतिष-कर्मकांड नाकारून कर्मयोगाचा स्वीकार करतात. ज्ञानसाधना आचरतात आणि दंभ व अहंकारापासून मुक्त होतात. भक्तिला कधीही विभक्त न होण्याची दीक्षा देत देखावा नाकारतात. पंचांची सत्ता नाकारत असल्यामुळेच ठणकावून सांगतात 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत.' तुकोबांच्या जाणीवांचे असे स्वनिर्मित विश्व आहे. यामुळे ते थोर महाकवी ठरतात. थोर महाकविचे रहस्य समजून घ्यायला हवे. असे कवी खोल मानवी आस्था, गहिरे करुणामूल्य, मानवतेची असहाय आर्तता व दुःखाला काव्यात्म परिमाण देण्याची क्षमता बाळगतात. प्रज्ञासंपन्न कविची शब्दसत्ता ही खरे तर त्याची अर्थसत्ता आहे. शब्दांचा अर्थ त्यांनाच कळतो जे अनुभवाचा ईसार देतात. बाकी लोकांना शब्दांचे पर्याय कळत असतात. शब्द मारतो अर्थ तारतो हे तुकोबांनी मनात जाणून घेतले होते. शब्दांचे शिक्षक असतात पण अर्थाचे आचार्य असतात अशा आचार्यांना हे पुरते ज्ञात असते की शब्द पुस्तकात असून अर्थ जीवनात शोधावा लागतो. तुकोबांच्या कवितेला यामुळे एक दृढता येते. ते म्हणतात 'वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.' शब्द आपल्या जीवाचे जीवन असल्यामुळे आपण जनलोकांसाठी शब्द वाहतो. आपल्या घरी धन शब्दांचीच रत्ने असल्याचा अभिनव साक्षात्कार त्यांना घडतो. तुकोबा यत्नपूर्वक मग शब्दांचीच शस्त्रे करतात. क्रांतिकारक, वैज्ञानिक, जीवन सन्मुख आणि ऋषी या चार लोकांचीच शब्दांवर सत्ता असते. तुकोबा या चारी वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतीक-प्रतिनिधी होते. आपला अनुभव आपले मित्र शत्रू होण्याचा आहे तर तुकोबांना आपले शत्रू मित्र झाल्याचा अनुभव आला. कवितेमुळे जन्मजात वैर विस्मरणात जाण्याची सिर्द्ध लाभते असा संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी दिला आहे. तुकोबांना हा अनुभव प्रत्यक्षात झेलता आला. त्यांचे शत्रू मित्र झाले. धर्मपीठावरून धर्माज्ञा करणाऱ्या रामेश्वर भट यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची आरती रचली.
तुकोबांची कविता समजून घेताना त्यांचे जीवन धडपणे समजून घ्यावे लागते. ते समजून घेण्यात जर गफलत झाली तर मग त्यांची वचने सामान्य बुद्धिच्या माणसांना अहंकार भरली वाटू लागतील. तुकोबा म्हणतात 'आजि म्यां पांडुरंग पाहिला.' आपल्या अध्यात्म अनुभवाचा असा जाहीरपणे डंका मिरवणारे तुकोबा कमालीचे निरलस आणि विनम्र आहेत. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास.' असा आपला परिचय करून देणारे तुकोबा मग 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' अशी संताघरची खूण सांगतात. सकलांच्या पाया दंडवत करतात याचे कारण आपापली चित्ते शुद्ध करा असा त्यांचा आग्रह असतो. तुकोबांचे पाईकाचे अभंग तर सैनिकाची आचारसंहिता आहे. शिवकल्याण राजा मावळतीच्या प्रदेशातील उजळते मावळे सोबत घेऊन एक क्रांती करू जात होता. त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळवताना आणि मिरवताना संत रामदास यांच्या सोबत तुकोबांच्या स्नेहाचे गाठोडे घेऊन चालावे लागते हा चमत्कार केवळ महाराष्ट्र देशीच घडला असे नाही तर एकूणच संत परंपरेत राजसत्ता आणि धर्मदंडाची ही जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते.
तुकोबांचे निवेदन यामुळे अतिशय परखड, स्पष्ट आणि कुणाचीही भीड मुर्वत न ठेवणारे आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही. कधीतरी या धरतीवर शंकराचार्य बोलले होते 'न मे मोक्षस्याकांक्षा' त्याच चालीवर तुकोबा म्हणतात 'नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून वेगळे देईल जो' आणि आपल्या आनंदलोकाचा परिचय या शब्दात करून देतात 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' आणि त्यांनी व्यक्तवलेला 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले' हा समंजस सूर जीवन आणि ईश्वर या दोन संकल्पना मुळातून समजून घेण्याचा परिपाक आहे. मागणे काय तर ते लई नाही असे ते म्हणतात. पोटापुरते मागतात पण तुकोबांचे खरे सांगणे तर हे आहे 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.'
तुकोबांची कविता अमर आत्मतत्त्वासारखी दृढ प्रतिज्ञ आहे. तिचा पोत गीतेच्या आत्मतत्त्वा सारखा आहे. 'नैनं छिदंति शस्त्राणि' अशी ही कविता असल्यामुळे मंबाजीचे शस्त्रास्त्र तिजवर काही परिणाम करू शकत नाहीत. पंडित क्षोभाचे अग्निदिव्य तुकोबा पत्करतात आणि गाथेचे जलदिव्य साधले जाते. इंद्रायणीने तुकोबांची गाथा तारली की नाही हे काही माहित नाही पण लोककंठात ती सुरक्षित राहिली होती हे मात्र खरे. याचे कारण असे होते की ही गाथा कालोचित, कालसंमत आणि काळाला उत्क्रांत करणारी कविता आपल्या काळजाशी वागवून होती. कधी काळी उत्तरेत रामानंद साधुचा डंका वाजला होता 'जातिपाँति पुछे नहीं कोई हरि को भजे सो हरिका होई.' याचा आधार घेत कबीर बोलला होता 'जाति न पूछो साधु की. ' तुकोबांनी या वचनांना मराठी पोशाख देत म्हटले 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ' या वचनांच्या मागे तुकोबांची कळकळ होती. ते म्हणाले होते 'उपदेसी तुका मेघवृष्टिने आईका, 'बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनि. ' तुकोबांनी रोकडा व्यवहार I शिकवला. स्वर्गाचे ना आकर्षण दाखवले ना भय दाखवले. त्यांनी हा ईहलोक भावसमृद्ध केला. ते म्हणाले होते 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार घ्यावे वनांतर भस्म दंड.' ते अंधश्रद्धायुक्त समाज जीवनाला सश्रद्ध जीवनाचा आधार देत राहिले. अगदी सोप्या उदाहरणांनी समजावून सांगितले की बाबांनो 'मंत्राकारणे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ' समाज जीवन ढवळून निघाले. त्यांच्या मते धर्मपालनाचा अर्थ होता पाखंड खंडन. धर्मनीतीचा संकेत होता अखंड सावधान असणे. ते म्हणतात 'तुका सावधान हेचि देवाचे भजन' या विचार मांडणीत कुठेही भोंगळपणा नाही, भोळसटपणा नाही. या उलट अगदी स्पष्टपणे 'नाठाळाचे माथा हाणू काठी' अशी प्रतिज्ञा आहे आणि 'ऐशा नरा द्याव्या पैजारा मोजूनि' असा सल्ला आहे. ते शिवपिंडीवरच्या विंचवाला वहाणेने ठेचावे असे सांगत होते.
तुकोबांनी माणूसपणाची व्याख्या आपल्या अभंगांमधून मांडली. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,' 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. 'साधूची व्याख्या करताना तुकोबा म्हणाले 'अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो.' त्यांना अपेक्षित होता वैष्णव धर्म. सारे जग विष्णुमय व्हावे अशी आशा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यांनी समाज जीवनाचे ऊर्धीकरण मांडले. हा नूतन युगधर्माचा संदेश होता. सामान्य माणूस व देव यांच्यातील दलालीचा हक्क सांगणारा शोधक पुरोहित वर्ग तुकोबांनी नाकारला, थांबवला आणि संपवला. त्यांनी कमालीचे तीक्ष्ण प्रश्न उपस्थित केले. 'कोणे केले बाळा दुधाची उत्पत्ती ऊष्ण काळमासी फुटे तरुवर कोण तयासी जीवन देई.' हे प्रश्न पडले की 'कोण सांगावयासी गेले होते देशोदेश नेले वाऱ्याहाती माप समर्थ तो माझा बाप, ' 'मुंगिचिया घरी कोण धाडी मूळ.
तुकोबा म्हणाले होते 'आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । तुमची आमची भेटी येथूनिया जन्मतुटी. ' या जन्मतुटीबाबत विद्वानांचे मन आणि मत शंकांनी भरलेले आहे. 'तुकोबांचे सदेह वैकुंठगमन की खून' हा श्री. सुदाम सावरकर यांचा ग्रंथ यावर फार भेदक प्रकाश टाकतो. मीरा मुरलीधराच्या मूर्तीत सामावली हे पटत नाही. ती त्या मंदिराच्या मागे लहरणाऱ्या सागरात विलीन झाली असे अधिक तीव्रतेने वाटते. हे असे उदाहरण यापूर्वी नव्हते आणि नंतरही दिसले नाही. तुकोबा गेले निघून हे तर वाईट होतेच पण सर्वांत वाईट हे होते की त्यांची कविता बेपत्ता झाली. इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तिला बुडवता न आल्याचा शोक करणाऱ्यांनी हे पापकृत्य केले. एक शतक लोटले. थोर तुकारामभक्त वारकरी त्रिंबक कासार ४० वर्षे हिंडले आणि त्यांनी विखुरलेली मौखिक कविता गोळा केली. १९६९ साली तुकाराम भक्त इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट याने पुढाकार घेतला आणि ४५०० अभंगांची गाथा सिद्ध केली. ही गाथा पूर्णपणे निर्दोष नसली तरी अधिकृत आहे हे मात्र खरे. एकटा माणूस समाजपुरुष बनतो आणि तुका आकाशाएवढा बनतो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे.
- प्राचार्य डॉ. विश्वास पाटील
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
१९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे 'ठाणे भूषण' आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. 'संडे मिलिटरी स्कूल' चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारताच्या वेगवेगळ्या दलात कार्यरत आहेत.
भारतीय सेनादलात दरवर्षी हजारो तरुणांना शिपाई ते अधिकारीपदासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत असते. परंतु चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले सैन्यदलाकडे पाठ फिरवताना दिसतात त्याचे मुख्य कारण काही गैरसमजुती, सैन्यदलाविषयी अपुरी माहिती आणि मृत्यूचे भय, तरुण पिढीला मार्गदर्शनपर माहिती मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.
सैन्यदलात विविध स्तरांवरील प्रवेश
प्राथमिक स्तर :
इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सातारा सैनिक स्कूल, बेळगाव मिलिटरी स्कूल, बंगलोर मिलिटरी स्कूल इथे प्रवेश दिला जातो. त्यात मागासवर्गीयांसाठी १० टक्के आरक्षण असते. ऑक्टो. च्या सुमारास ह्या शाळांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. लेखी परीक्षेत पास ल्यानंतर मुलाखत होते. इथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. नंतर बरीचशी मुले नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी निवडली जातात. वायुदल, नौदल आणि सेनादल ह्यांत ऑफिसर्स म्हणून दाखल होतात.
माध्यमिक स्तर :
सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, सेक्टर एन १२, सिडको, मौलाना आझाद कॉलेजच्या मागे, औरंगाबाद ह्या पत्त्यावर दहावीत असतानाच अर्ज करायचा असतो. शालान्त परीक्षा संपल्यावर चाचणी परीक्षा होते. दुसऱ्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखतीची चाचणी घेऊन त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना औरंगाबाद इथे ११ वी, १२वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जातो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. पालकांनी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागवून मुलांकडून परीक्षेचा सराव केला तर उत्तम.
शालान्त परीक्षेनंतर :
तिन्ही दलांत तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स वगैरे ठिकाणी शिपाईपदावर जाता येते. दहावीत कमीत कमी ४० टक्के मार्क्स असावे लागतात. मागासवर्गीयांसाठी ९वी पास पात्रता चालते. उंची ५ फूट ७ इंच, छाती ३२ इंच व फुगवून ३४ इंच, वजन ५० किलो आणि वय १६ ते २० वर्षे ९ महिने. टेक्निकल पदासाठी १२वी सायन्स, ५० टक्के मार्क्स आवश्यक. क्लार्कसाठी १२ वी पास, टंकलेखन, बेसिक कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. नौदलासाठी उंची कमी चालते. वयोमर्यादा १९ वर्षे, दहावीत ६० टक्के मार्क्स आवश्यक बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., कोस्ट गार्ड त्याचप्रमाणे सी.आर.पी.एफ. साठी उंची जास्त लागते.
ह्या सर्व जागांसाठीच्या सूचना 'एम्प्लॉयमेंट न्यूज' किंवा 'रोजगार समाचार' ह्या भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होतात.
बारावीत असताना/उत्तीर्ण झाल्यानंतर:
बारावीत प्रवेश घेतल्याबरोबर एन.डी.ए. चा फॉर्म भरावा. वयाची अट १८ वर्षे ६ महिने. बारावीत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमेटिक्स घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना नेव्हल इंजिनीअरिंग खडकी, पुणे इथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. रुपयादेखील खर्च न करता ते इंजिनीअरची पदवी प्राप्त करू शकतात. पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेवल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते ऑफिसर्स होतात.
इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतीय नौदलात आर्टिफिशर ह्या पदावर ज्युनि. कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाता येते. बायोलॉजी हा विषय बारावीत घेतलेला असेल तर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल तर ऑक्टो. मध्ये आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे अर्ज करावा लागतो. मुलीसुद्धा अर्ज करू शकतात. अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.च्या दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव आवश्यक असतो. पुढे एकही पैसा खर्च न करता साडेचार वर्षे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते. ३० वर्षांवरील तरुणींना वरील कॉलेजमध्ये नर्सिंग ऑफिसर्सपदासाठी जाता येते.
पदवीधरांसाठी :
दरवर्षी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जाते. त्यात परमनंट आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करता येतो. इंडियन मिलिटरी अकॅडमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी इथे यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांची नेमणूक लेफ्टनंट ह्या हुद्यावर होते.
इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी :
इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तरांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. एम.ए.एम.एड., एम.एस.सी. उत्तीर्णांसाठी सैन्यदलात प्राध्यापक तसेच ऑर्डनन्स विभागात शेतकी पदवीधरांना मिलिटरी फार्ममध्ये व पशुविज्ञान शाखेतील पदवीधरांना रिमाऊंड व वेटर्नरी कोअरमध्ये जाता येते. एल.एल.बी. पदवीधारकांना जज्ज, अॅडव्होकेट जनरल बँचमध्ये ऑफिसर होता येते. हवाईदलात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बँचमध्ये फायटर कंट्रोलर, एअर ट्राफिक कंट्रोलर, मेट्रोलॉजिकल ब्रँचमध्ये प्रवेश घेता येतो. एअर ट्राफिक कंट्रोलर व फायटर कंट्रोलरसाठी प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी, अकाउंट बँचसाठी बी.कॉम. प्रथम श्रेणी किंवा एम.कॉम. व एव्हिएशन व मेट्रोलॉजी बँचसाठी एम.एस.सी.फिजिक्स अप्लाईड मॅथमेटिक्स व मेट्रोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत.
तरुणींसाठी :
दरवर्षी प्रत्येकी १०० तरुणींना सेनादल, नौदल, वायुदल इथे ऑफिसर्स होण्याची संधी असते. वय २० ते २५ वर्षे, उंची १५२ सेंमी., वजन ४२ किलो अपेक्षित असते आणि पायाची लांबी ९९ सें.मी.पेक्षा अधिक असावी लागते. वैमानिक होण्यासाठी पदवीपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे आवश्यक असते आणि वय २३ वर्षाच्या आत असावे लागते. हवाई व नौदलात जाण्यासाठी फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घेऊन बी.एस.सी. पदवीधर असणे किंवा बी.ई. होणे आवश्यक असते.
लेखी परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची मुलाखत ह्यातून तरुणींनाही जावे लागते. उत्तीर्ण तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या अकॅडमींमध्ये दिले जाते. त्यांना दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाते. ते वाढवून चौदा वर्षे करता येते. त्यानंतर एका वर्षासाठी सिम्बॉयसिस, पुणे येथून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सरकारी खर्चाने करता येतो. निवृत्त झाल्यानंतरदेखील चांगली नोकरी मिळते. प्रशिक्षणाच्या काळात विवाह मात्र करता येत नाही. ऑफिसर झाल्यावर करता येतो. एम.ए., एम.एस.सी., एम.कॉम., एम.सी.ए., एल.एल.बी. पास झालेल्या तरुणींचे वय २७ वर्षांपर्यंत चालते. सर्व तरुणींनी शारीरिकदृष्ट्या कणखर असावे, तसेच काही तरी खेळ खेळून शारीरिक क्षमता वाढती ठेवावी. आपले सामान्य ज्ञानही वाढवावे.
सैन्यदलातील फायदे :
सैन्यदलातील वेतन कदाचित आकर्षक वाटणार नाही पण त्यासोबत मिळणारे जे इतर फायदे आहेत, ते दामदुपटीने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम पौष्टिक आहार, राहायला मोफत घर, कपडे मोफत, वैद्यकीय सेवा मोफत, बायपास सर्जरी/किडनी शस्त्रक्रिया मोफत, प्रवास मोफत. इंडियन एअर लाईन्सच्या प्रवासात निम्मी सवलत. वर्षातून दोन महिने वार्षिक सुट्टी. एक महिना आपत्कालीन सुट्टी. प्रशिक्षण घेतानाही इतर काहीच खर्च नसल्याने जवान भरपूर पैसे घरी पैसे पाठवू शकतो. बटालियन बॉर्डरवर जाते त्यावेळी कुटुंबाला कुठे ठेवावे हा प्रश्न त्याला पडत नाही. मुंबई-पुणे इथे सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित अशी फॅमिली क्वार्टर्स असतात. वीरगती मिळालेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम जवानाला दहा लाख तर ऑफिसरला पंधरा लाख, इतर डेथ कम ग्रॅट्युइटि वगैरे धरून मृत जवानाच्या कुटुंबीयांना १० ते १२ लाख रु. व ऑफिसरच्या कुटुंबाला १५ ते २० लाख रु. मिळतात शिवाय त्याचे पेन्शन चालू होते. हे आकडे (२००८ सालचे आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे.) मृत जवानाच्या पत्नीने आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्या मुलाला रेजिमेंटच्या वसतिगृहात प्रवेश देऊन त्याची सर्व जबाबदारी रेजिमेंट घेते. पुढे त्याला सैन्यातच ऑफिसर, डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी तसे शिक्षण रेजिमेंटतर्फे दिले जाते.
मित्रांनो, भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणारे 'एम्प्लॉयमेंट न्यूज', 'रोजगार समाचार' दर शनिवारी विकत घ्या. आपल्यामध्ये राष्ट्राभिमान बाळगा. दुर्घटना, बॉम्बस्फोट घडल्यास पाकिस्तानी झेंडे किंवा त्यांच्या नेत्यांचे पुतळे जाळत बसू नका. देशात 'बंद' पाडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करू नका. शत्रूच्या हजारो सैनिकांना ठार मारण्याची क्षमता ठेवा. अभिमानाने म्हणा, 'देशासाठी घेईन प्राण !'
लक्षात ठेवा, सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो. मरायला नाही! सैन्यात 'हर गोली पर लिखा है खानेवाले का नाम' हे ब्रीद वाक्य. असते. ज्या गोळीवर तुमचे नाव लिहिलेले असेल तीच तुम्हाला लागेल. इथे जितकी माणसे रोज अपघाताने वगैरे मरतात त्यापेक्षा किती तरी कमी जवान लढाईक्षेत्रात शहीद होतात. मरण कधीही येणारच. इथे काय किंवा सीमेवर काय! आपल्या मृतदेहावर असेल स्वस्तातले पांढरे कापड. पण सैन्यात शहीद होणाऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर असतो राष्ट्राचा तिरंगी झेंडा ! अंत्यसंस्काराच्या वेळेस आकाशात रायफल्स किंवा तोफा खणखणतात. म्हणजे यमालासुद्धा वाटते की, कोणी तरी व्हीआयपी स्वर्गात येतो आहे. तोही त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.
सर्वधर्मसमभाव ठेवा. संघटित व्हा. देशाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हा. आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.
संदर्भ: ‘लष्कर’च्या भाकऱ्या चवदार-मेजर सुभाष गावंड, व्यास क्रिएशन, डी ४, सामंत ब्लॉक्स, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प), ४००६०२, तिसरी आवृत्ती २०१७.
-मेजर सुभाष गावंड
मी प्रशासनात चौतीस वर्षे ज्या पद्धतीने वागलो तो तसा का वागलो याचे उत्तर खाजगी कंपनीत घडलेल्या दोन घटनांमध्ये दडले आहे. त्यामध्ये अवैध गोष्टींची मनस्वी चीड, स्पष्टवक्तेपणा, पैशापेक्षा बौद्धिक समाधानाकडे कल आणि प्रत्येक गोष्टीत खोलवर जावून परिपक्व विचार करण्याची सवय. मला अनेक वेळेस अनेक लोक विचारतात की मी माझ्या प्रशासन कारकिर्दीत असा का वागलो, त्याचे हे एक छोटे विवेचन.
आज माझे वय जवळजवळ ८३ आहे.त्यामुळे माझ्या बालपणीची पहिली तीन-चार वर्षे सोडली पाहिजेत. तेव्हाच काही आठवणं शक्यच नाही. तर एकूण ८० वर्षातल्या काही ठळक आठवणी. मी लेखक नाही तेव्हा मला मुद्देसूद वगैरे लिहायची सवय नाही. माझ्या बालपणीचा काळ १९४० ते १९४८ हा होता. आम्ही एकूण पाच भावंडे होतो. मला दोन मोठे भाऊ व दोन मोठ्या बहिणी. मी शेंडेफळ. माझा सर्वांत मोठा भाऊ माझ्यापेक्षा तीसएक वर्षांनी तरी मोठा असेल.
गिरगावमधील समृद्ध आयुष्य अनुभवताना तिथल्या शाळांतून माझ्यावर चांगले संस्कार झाले. माझ्या तीन शाळा झाल्या. चिकित्सक शाळेमध्ये गेल्यावर माझ्या कलागुणांकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. शाळेतल्या काळात नाटक पाहण्यासाठी वडिलांनी आवड लावली.
अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये मिलींद सुधाकर जोशी यांनी लिहिलेला हा लेख
सामाजिक दृष्टीने संतकार्याचे परीक्षण करण्याचे अनेक प्रयत्न आजवर अनेक विचारवंतांनी केलेले आहेत. महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक न. र. फाटक, वि. का. राजवाडे, गं. बा. सरदार, रा. चिं. ढेरे, वि. भि. कोलते, प्रा. सदानंद मोरे यांच्यासारख्या अनेक व्यासंगी विद्वानांनी या बाबत आपली अभ्यासपूर्ण मते मांडली आहेत.
यातील काही विचारवंतांनी, संतांचे कार्य हे मुलभूत, पायाभूत आणि राजकीय चळवळीला प्रेरणा, प्रोत्साहन देणारे आहे असे मांडले. किंबहुना संतविचारांमुळेच समाजाचे वैचारिक उद्बोधन झाले. देव, देश, धर्म याबद्दल आस्था, आदर, प्रेम निर्माण झाले आणि त्यामळेच सामान्य माणूस सुद्धा बलिदान करायला तयार झाला. त्याच्या या वृत्तीतूनच पुढची चळवळ उभी राहिली असा निष्कर्ष काढला.
याच्या अगदी उलट काही विचारवंतांना संतांचा मार्ग हा निष्क्रियतेचा, नेभळटपणाचा वाटला. संत भौतिक, सामाजिक, राजकीय प्रगतीविषयी उदासीन होते, त्यांचे संपूर्ण लक्ष हे आध्यात्मिक, पारलौकिक प्रगतीकडे होते. त्यांनी समाजाला दुबळे बनवले, निवृत्तीपर बनवले. समाज प्रतिकारशक्ती हरवून बसला, पारतंत्र्याचेही त्याला काही वाटेनासे झाले अशी मते मांडली गेली. याच्याही पुढे जावून असेही सांगितले गेले की विषमता मूलक, वर्णवर्चस्ववादी धर्म समाजाच्या माथी मारण्याच्या डावपेचांचा एक भाग म्हणून धुर्ततेने व लबाडीने काही संतांनी आपल्या वाङ्मयीन रचना समाजाच्या गळी उतरवल्या.
ही इतकी परस्परविरोधी मते वाचल्यावर सामान्यजनांचा गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. विचारी साधकाच्या वा सामान्य माणसाच्या मनातील हा गोंधळ दूर होऊन त्याला योग्य निष्कर्ष काढण्यास मदत व्हावी या हेतूने हा लेख लिहीला आहे. संत चळवळीचा कळस असलेल्या तुकाराम महाराजांच्या साहित्याच्या अनुषंगाने केलेला विचार म्हणून गाथेतील अभंगांचे दाखले देऊन मत मांडणी केली आहे. खरं तर सर्व संतांचे विचार सारखेच आहेत. फक्त सांगण्याची पद्धत व तीव्रता आणि व्याप्ती वेगवेगळी आहे.
या सर्व विचारांचा अभ्यास करत असताना काही मुलभूत प्रश्न मनात उभे राहिले. जर संत सामाजिक, राजकीय बाबीत इतके उदासीन असते तर मग 'बुडते हे जन देखवेना डोळा । म्हणुनी कळवळा संतांचा जगती ।' हे कसे? हे बुडते जन म्हणजे काय? लोक भक्ती विसरले होते, या अशा बुडत्यांना समजावून सांगून परत भक्तीकडे, अध्यात्मिकतेकडे वळवणे इतकेच संतांना हवे होते काय? सर्व लोकांनी भौतिक विचार सोडून देऊन, ऐहिक कर्मे, कर्तव्ये यांचा त्याग करून देव देव करत जगावे अशी संतांची अपेक्षा होती काय? अशा विचारांनी बहुजन समाज संसार सोडून संन्यासमार्गी व्हावा असे त्यांना हवे होते काय? बहुतांशी संसारात रमणारा सामान्य माणूस सर्व आशा, अपेक्षा सोडून, भौतिक, राजकीय आकांक्षांचा त्याग करून वनमार्गी व्हावा असे करण्यातच त्याची प्रगती आहे असा त्याचा आग्रह होता काय? बहुसंख्येने सामान्य माणूस असा निवृत्तीपर होऊ शकतो अशी संतांची धारण होती काय? सर्वसामान्य माणूस इतका निवृत्तीपर होऊच शकत नाही हे त्यांना समजत नव्हते काय? सामान्य माणसाच्या समाज, देश या बद्दलच्या कर्तव्यांना संतांच्या लेखी काहीच किंमत नव्हती काय? कोणाचे का राज्य असेना मग स्वकीयांचे असो की परधर्मियांचे असो आपण आपली भक्ती करावी त्याकडे लक्ष देऊ नये असे संतांचे वागणे, सांगणे होते का? आक्रमकतेने व बळजबरीने लोकांवर आपला धर्म लादणाऱ्या परधर्मियांशी संतांना काही देणे घेणे नव्हते काय? या घातक परधर्मीय विचारसरणीमुळे होणारे दुष्परिणाम संतांना समजत नव्हते आणि त्याचे दूरगामी होणारे विपरीत परिणाम त्यांना दिसत नव्हते काय? आणि जर संतांचे विचार हे इतके निवृत्तीपर आणि व्यक्तीकेंद्रित, समाजहिताच्या विरोधी होते तर मग या संतविचारांचं गारुड इतकी शतके समाजमनावर अधिराज्य कसं गाजवू शकतं? असे अनेक प्रश्न उभे राहतात.
या प्रश्नाला उत्तर मिळणार कुठे? तर संतसाहित्य आणि इतिहास यांच्यात. म्हणून या दोघांच्या सहाय्याने उत्तरे मांडण्याचा प्रयत्न इथे केला आहे. गाथेच्या आधारे संतांची भूमिका समजते आणि इतिहास अभ्यासला की तिला पुष्टी मिळते. तुकाराम महाराजांच्या गाथेतील अभंगात संत विचारांचे विविध पैलू नजरेस येतात त्या मुळे संतांबद्दलच्या विविध दृष्टीकमोनांच्या मांडणीत हेच अभंग संदर्भ म्हणून, दाखला म्हणून वापरले जातात आणि पुनरुक्तीचा दोष स्वीकारूनही अनेक लेखांमधून समाविष्ट केलेले दिसतात. खरंतर हा प्रत्येक अभंग हा स्वतंत्र लेखाचा, पुस्तकाचा विषय आहे, मात्र या लेखाची मर्यादा लक्षात घेऊन अभंगांचा सारांश अत्यंत संक्षिप्त स्वरूपात मांडला आहे.
१) संतांचा जगती येण्याचा उद्देश काय होता?
आम्ही वैकुंठवासी । आलो याची कारणासी ।।
बोलिले जे ऋषी । साच भावे वर्ताया ।।
झाडू संतांचे मार्ग। आडराने भरीले जग ।।
उच्छीष्टाचा भाग । शेष उरला तो सेवू ।।
अर्थ लोपली पुराणें । नाश केला शब्दज्ञाने ।।
विषयलोभी मन । साधन ते बुडविले ।।
पिटू भक्तीचा डांगोरा । कळीकाळासी दरारा ।।
तुका म्हणे करा । जयजयकार आनंदे ||(२३६)
जनसामान्यांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी संत वैकुंठातली त्यांची सर्वात आवडती गोष्ट म्हणजे ईश्वरसमीपता सोडून आले. खालावलेल्या सामाजिक स्थितीचं भान या अभंगातही दिसतं आणि हे चित्र बदलवण्यासाठी ऋषींचे विचार परत रुजवण्याची गरज आहे हे कळतं. या अभंगातील “आली" आणि “साचभावे" हे शब्द अभ्यासले तर संतांचा कळवळा आणि त्यांची भूमिका स्पष्टपणे समजते.
२) संतांना मुख्यतः काय करायचे होते?
धर्माचे पाळण । करणे पाखांड खंडण ।।
हेचि आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ।।
तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनी बाण फिरे ।।
नाही भीडभार । तुका म्हणे साना थोर ।।(२०७६)
संतांनी मुख्य काम धर्मपालन सांगितले, परंतु हे लक्षात घेतले पाहिजे की पाखांडखंडण हेही त्यांनी आवश्यक आणि महत्त्वाचे मानले होते. चांगले समोर आणायचे असेल तर वाईट दूर करायलाच लागतं. धर्मपालन म्हणजे काय हे तर समजावलेच पण पाखंडी आणि भोंदू परमपुज्यांकडून सामान्य जनांची केली जाणारी दिशाभूल, शोषण, पिळवणूक तसेच समाजात प्रचलित असलेल्या अनिष्ट रूढी, परंपरा, दंभ यावर अत्यंत आक्रमक प्रहार करून जागृती निर्माण केली.
३) संतांना निवृत्तीपर, कर्मत्यागप्रधान धर्म हवा होता काय?
धर्म रक्षावयासाठी । करणे आटी आम्हासि ।।
वाचा बोलो वेदनीती । करू सती केले ते ।।
न बाणता स्थिति अंगी । कर्म त्यागी लड तो।।
तुका म्हणे अधम त्यासी । भक्ती दुषी हरीची।।(१३७)
धर्मरक्षणासाठी सर्वस्व वेचण्यास तयार असलेले संत कर्मत्यागावर कठोरतेने प्रहार करतात, अशी स्थिती न बाणता कर्मत्याग करणाऱ्याला लंड, अधम असे संबोधून त्याची कडक निर्भत्सना करताना दिसतात. संतांना प्रपंचाच वावडे नव्हते, तर अतिरेकी प्रपंचासक्तीला विरोध होता. "जोडोनिया धन उत्तम व्यवहारे । उदास विचारे वेच करी ।।" असा सल्ला ते देतात. पाइकीच्या अभंगातून आणि इतरही अनेक अभंगांतून लढण्याचा संदेश ते देतात, मग हे विचार निवृत्तीपर कसे?
४) स्वराज्यपूर्व काळातील परिस्थिती कशी होती आणि संतांना तिचे भान होते का?
हाती होन दाविती बेणा । करिती लेकीची धारणा।।
ऐसे धर्म झाले कली । पुण्य रंक पाप बळी ।।
सांडीले आचार । द्विज चाहाड झाले चोर ।।
टिळे लपविती पातडी । लेती विजार कातडी ।।
बैसोनिया तक्ता । अन्योविण पिडिती लोका ।।
मुदबख लिहिणे । तेल तूप साबण केणे ।।
नीचाचे चाकर । चुकलिया खाती मार ।।
राजा प्रजा पीडी । क्षेत्री दुश्चितासी तोडी ।।
वैश्शूद्रादिक । हे तो सहज नीच लोक ।।
अवघे बाह्य रंग । आत हिरवे तरी सोंग ।।
तुका म्हणे देवा । काय निद्रा केली धावा ।।(१४४)
या अभंगातून ह स्पष्ट होते की सामाजिक
परिस्थितीचं भान संतांना होते. अभंगात वर्णन केल्याप्रमाणे चारही वर्णाच्या लोकांच्या त्या काळी झालेल्या नैतिक अवमूल्यनावर ते लक्ष ठेऊन होते. या घसरलेल्या स्थितीमुळे व्यथित होऊन, देवा काय झोपला आहेस का? असा परखड सवाल करण्यासही ते मागेपुढे पहात नाहीत.
५) परधर्माच्या आक्रमणाचे, त्यामुळे निर्माण झालेल्या धोक्याचे भान होते का?
संता नाही मान । देव मानी मुसलमान ।।
ऐसे पोटाचे मारिले । देवा अशा विटबीले ।।
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ।।
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम।।(१६१३)
कोणता धर्म मानावा, कोणास मान द्यावा, कोणास देऊ नये हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच मुसलमान देव मानल्यास विटंबना पदरी पडेल हा धोकाही दाखवला आहे. या अभंगांवर तुकोबा कीर्तन करीत असत. म्हणजे जनसामान्यांना त्यातून ते आणखी सविस्तरपणे याबाबत सांगत असले पाहिजे. धर्मपालन म्हणजे कोणता धर्म आणि काय करणे अपेक्षित आहे ते या अभंगातून सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते. सामान्यांचा वैचारिक गोंधळ दूर करून धर्मसंस्थापना करण्याचे हे काम संतांनी केले.
६) संताविचारांमुळे समाज पराक्रमशून्य, पौरुषहीन, नेभळट बनला का?
मऊ मेणाहुन आम्ही विष्णुदास ।
कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
मेले जीत असो निजोनिया जागे ।
जो जो जे जे मागे ते ते देऊ ।।
भले तरि देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे काठी देऊ माथा ।।
मायाबापाहुनी बजु मायावंत ।
करू घातपात शत्रूहुनी ।।
अमृत ते काय गोड आम्हापुढे ।
विष ते बापुडे कडू किती ।।
तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी ।
देवासही आटी जन्म घेणे ।। (१४१)
या अभंगांमधून संतांची जशास तसे ही वृत्ती स्पष्ट होते. वेळ पडल्यास वार करून किंवा घातपात सुद्धा करून आम्ही आमचे रक्षण करू आणि शत्रूचे निर्दालन करू हे ही स्पष्ट आहे. सर्व शक्तीनिशी रक्षण करावे हे तर सांगितलेच पण यासाठी वेळप्रसंगी देवालाही जन्म घेऊन खटाटोप करावाच लागतो आणि तो त्याने यापूर्वीही केला आहे आणि आताही करेल तसेच अशा खटाटोप करणाऱ्यांनाही देव सहाय्यच करेल असे प्रोत्साहित करणारे आश्वासन देऊन संतांनी जनसामान्यांना लढण्यास प्रवृत्त केले. भ्रामक अहिंसेच्या कल्पनेतून बाहेर काढले.
७) पाखांड खंडण करून समाजात योग्यअयोग्यतेची समज कशी निर्माण केली?
मुखे बोले ब्रह्मज्ञान । मनी धन आणि मान ।।
एशियाची करीता सेवा । काय सुख होय जीवा।।
पोटासाठी संत । झाले कलीत बहुत ।।
विरळा ऐसा कोणी । तुका त्यासि लोटांगणी।।(३०९)
आमची गोसावी अयाचित वृत्ती ।
करवी शिष्या हाती उपदेश ।।
दगडाची नाव आधीच ते जड ।
ते काय दगड तारू जाणे ।।
तुका म्हणे वेष विटबिला त्यांनी ।
सोंग संपादणी करिती परी ।।(३३३७)
जगी कीर्ती व्हावी । म्हणोनि आलासी गोसावी।।
बहुत केले पाठांतर । वर्म ते राहिलजे दूर ।।
चित्ती नाही अनुताप । लटिके भगवे स्वरुप ।।
तुका म्हणे सिंदळीच्या । व्यर्थ श्रमविली वाचा।। (३१८२)
वरील सर्व अभंगांतून दंभ, पाखंड, विषमता यावर प्रहार केले. तथाकथित साधू, मठाधिपती, गोसावी, परमपूज्य यांची ढोंगी कार्यपद्धती समाजाला सांगून सावध केले. यांच्या नादी लागला तर खऱ्या विशुद्ध धर्मापासून समाज दूर जातो आणि भ्रष्ट आचार विचार स्वीकारतो, ज्याचे दूरगामी घातक परिणाम होतात. पिढ्यानपिढ्या भोगायला लागतात. हा धोका ओळखूनच संतांनी पाखंडखंडणाला विशेष महत्त्व दिले.
नुसत पाखांडखंडण करून न थांबता
जे का रंजले गांजले । त्यांसि म्हणे जो आपुले।।
तोचि साधू ओळखावा । देव तेथेची जाणावा।।
मृदू सबाह्य नवनीत । तैसे सज्जनांचे चित्त ।।
ज्यासि अपंगिता नाही । त्यासि धरी जो हृदयी।।
दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी।।
तुका म्हणे सांगू किती । त्याचि भगवंताच्या मूती।। (२०४)
अशा अभंगांतून योग्य काय, खरा कोण ते लोकांना समजावले व नीर क्षीर विवेक उभा केला. (अभंगाच्या शेवटी दिलेला क्रमांक हा श्री देवडीकरकृत श्रीतुकाराममहाराजांची गाथा आवृत्ती सन २००० प्रमाणे घेतलेला आहे.)
संतविचारांची वैचारिक पार्श्वभूमी बघितली. आता त्यांच्या कार्याचे सामाजिक परिणाम स्पष्टपणे दाखवणाऱ्या दोन ऐतिहासिक दाखल्यांचा विचार करू म्हणजे संतांचे कार्य सप्रमाण सिद्ध होईल.
सन १२९२ मध्ये देवगिरीवर राजा रामदेवरायाचे राज्य होते. याच्या साधारण १०० वर्षे आधी म्हणजे सन ११९६ च्या सुमारास दिल्लीत सुलतानाची सत्ता प्रस्थापित झाली होती. अफगाणिस्तान मधून धनलालसा, धर्मविस्तार आणि राज्यविस्तार या हेतूने आलेल्या या महत्त्वाकांक्षी सुलतानांनी हा हा म्हणता संपूर्ण उत्तर भारत आपल्या ताब्यात घेतला होता आणि क्रूर व नृशंस अत्याचारांनी संपूर्ण जनजीवन उद्ध्वस्त करून टाकले होते. उत्तरेतली ही स्थिती ज्ञानदेवांनी आणि नामदेवांनी त्यांच्या यात्रेदरम्यान प्रत्यक्ष पाहिली होती, पण त्यांच्या सांगण्याची दखलही घेतली गेली नाही.
उत्तरेतील सुलतानांच्या अधाशी नजरा देवगिरीच्या अफाट संपत्तीवर खिळल्या होत्या. देवगिरीच्या या बलाढ्य आणि वैभवसंपन्न साम्राज्याचा सम्राट राजा रामदेवराय हा अत्यंत बेजबाबदार, बेसावध आणि विवेकशून्य होता. सुखोपभोगी, संथ, मृदू होता, लढवय्या नव्हता.
डिसेंबर १२९३ मध्ये फक्त ८००० स्वारांनीशी दिल्लीच्या सुलतानाचा सेनापती अल्लाउद्दीन खिलजी देवगिरीवर चालून आला. त्या वेळी किल्ल्यात फक्त ४००० सैनिक होते. बाकीचे युवराज शंकरदेवाबरोबर स्वारीस गेलेले होते. उसने अवसान आणून रामदेवराय अल्ला उद्दीनशी लढायला गेला परंतु चुटकीसरशी पराभूत होऊन किल्ल्याकडे पळत सुटला. संपूर्ण देवगिरी शहर वाऱ्यावर सोडून हा राजा किल्ल्यात निघून गेला. किल्ला अभेद्यच होता, त्याच्याआधारे लढत राहू असा विचार होता. पण कसायाच्या हातात गाय सापडावी तशी देवगिरी खिलजीच्या ताब्यात सापडली. त्याने तेथील संपत्तीची, साधनांची, स्त्रियांची यथेच्छ लूट केली. घाबरट रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. शंकरदेव सैन्य घेऊन येईल आणि खिलजीचा पराभव करेल अशी त्याला आशा होती. खिलजीने हुशारीने एक अफवा स्वारीच्या आधीच सर्वत्र पसरवली होती की तो जे सैन्य घेऊन आला आहे ही तर एक छोटी तुकडी आहे, अजून प्रचंड मोठी फौज दिल्लीहून निघाली आहे. याचा परिणाम असा झाला की दक्षिणेतील एकही राजा रामदेवरायाच्या मदतीला आला नाही. तसेही या राज्याचे संबंध मित्रत्वाचे नव्हतेच. ते कायम एकमेकांशी भांडत असत.
खिलजीने किल्ल्याला वेढा दिला, इतक्यात रामदेवरायाला कळले की ज्या धान्यसाठ्याच्या आधारे लढण्याचे मनसुबे आखले होते त्या धान्याच्या पोत्यात धान्याच्या जागी प्रत्यक्षात मीठ भरलेले आहे. गडावर फक्त २-३ दिवस पुरेल एवढाच जन्नसाठा आहे. सैन्य नाही. अन्न नाही, आणि शौर्य नाही अशा अवस्थेत रामदेवरायाने खिलजीसमोर शरणागती पत्करली व तहाची बोलणी सुरू केली. अल्लाउद्दीनने अव्वाच्या सव्वा खंडणी मागितली ती त्याने कबूल केली.
दरम्यान शंकरदेव प्रचंड मोठे सैन्य घेऊन खिलजीवर चालू गेला. रामदेवराय किल्ल्यातून बाहेर आलाच नाही. खिलजी मात्र डगमगला नाही, प्राण पणास लावून लढला आणि त्याने शंकर देवाचाही पराभव केला. अशारीतीने फक्त ८००० स्वारांनीशी आलेल्या लिजीने अवघ्या १५ दिवसात बलाढ्य देवगिरीचा संपूर्ण पराभव केला. रामदेवरायाला मांडलिक बनविले. २४००० किलो (६०० मण) सोने, ४०००० किलो (१००० मण) चांदी, २८० किलो मोती, ८० किलो हिरे माणके आणि रेशीम कापडाचे ४००० ठाण, इतकी प्रचंड खंडणी आणि केलेली लूट खिलजीला मिळाली आणि दक्षिणेत सुलतानी आली. हा इतिहास वाचला की सुन्न व्हायला होतं आणि अनेक प्रश्न उभे राहतात. इतकी प्रचंड खंडणी देऊ शकणारं मोठं आणि वैभवसंपन्न साम्राज्य इतक्या सहजपणे आणि तडकाफडकी पराभूत का झालं? उत्तरेतील विस्तारवादी सुलतानी वृत्तीचा आणि आक्रमणाचा धोका कुणाच्याही लक्षात आला नव्हता का?
उत्तरेतील अत्याचाराच्या बातम्या यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या का? हा धोका ओळखून प्रतिकारास व संरक्षणास कायम सिद्ध राहिले पाहिजे, उत्तर सीमेवर कडक बंदोबस्त हवा हे सांगणारा एकही मुत्सद्दी, एकही विचारी ब्राह्मण दरबारात नव्हता का? सेनापती, राजगुरू, हेरखाते काय करत होते? खिलजीला सीमेवरच का रोखला नाही? एवढ्या मोठ्या साम्राज्याचा दरबार इतका बेसावध आणि राजा इतका नेभळट कसा? राजावर काही संस्कार झाले नव्हते का? रयतेला शत्रूच्या तावडीत सोडून हा किल्ल्यात कसा काय लपतो? साम्राज्याच्या सीमा उघड्या आणि राजधानीच्या संरक्षणाला इतकी तुटपुंजी फौज कशी? किल्ल्यात येणारी धान्याची पोती कुणी पुरवली? घेताना कोणी तपासली? त्यात मीठ आहे हे कोणाच्याच लक्षात कसं आलं नाही? की हा व्यापारी आणि अधिकारी यांनी संगनमताने केलेला भ्रष्टाचार होता? पोती उतरवणाऱ्या हमालांच्या तरी लक्षात आलेच असेल ना, मग ते का गप्प बसले? का पैसे देऊन त्यांचीही तोंडे बंद केली गेली?
असे अनेक प्रश्न उभे राहतात, यांची उत्तरे द्यायची झाली तर तो स्वतंत्र लेखाचा विषय होईल. सारांशरूपाने संक्षिप्त स्वरूपात निष्कर्ष काढला तर संपूर्ण राष्ट्रात म्हणजे रयतेपासून ते राजापर्यंत असलेला देव, देश, धर्म यांच्यावरील निष्ठेचा अभाव, सुखासीन, कामचुकार, भ्रष्ट वृत्ती, व्यक्तिगत स्वार्थ आणि लालसा यांचं प्राबल्य यामुळे लयास गेलेली वीरता, क्षात्रतेज आणि राष्ट्रहीत दक्षतेचा अभाव. यातील सर्वांत महत्त्वाची आणि तितकीच क्लेषदायक बाब ही की देवगिरीची ही स्थिती होती ती अफाट वैभव व सुबत्ता असताना आणि तेही स्वधर्मीयांच्याच राज्यात. आता दुसरा दाखला पाहू या.
सन १६४५ मध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोविली आणि अविरत प्रयत्न आणि पराक्रमाने स्वराज्य निर्मिले. सन १६७४ मध्ये शेकडो वर्षांनी एक हिंदू छत्रपती झाला. सुलतानांची त्यांच्यानंतर, अंतर्गत व बाह्य शत्रूवर मात करून संभाजीराजे छत्रपती झाले.
संपूर्ण भारत इस्लाममय करण्याच्या ध्येयाने पछाडलेल्या औरंगजेबाच्या डोळ्यात हे हिंदुराष्ट्र काट्यासारखे सलत होते. एका काफीराने स्वराज्य निर्मावे, छत्रपती व्हावे हे त्याला सहन होत नव्हते. औरंगजेबाचं साम्राज्य काबुलपासून मद्रासपर्यंत पसरलेलं होतं तो बादशाह नव्हता तर अतिश्रीमंत, बलाढ्या सत्तेचा शहेनशहा होता. मोगल साम्राज्याच्या तुलनेत स्वराज्याचे क्षेत्र किरकोळ होते. तसेच शस्त्रसामर्थ्य आणि आर्थिकबळ नगण्य होते.
शिवाजी महाराजांचे निधन आणि मराठ्यांचा अंतर्गत कलह, याचा फायदा घेऊन हे काफिरांचे राज्य संपवण्याच्या हेतूने अफाट सैन्य आणि अपार संपत्तीचं पाठबळ घेऊन शहेनशहा दक्षिणेत उतरला. पहिल्या चार वर्षातच त्याने आदिलशाही आणि कुतुबशाही संपविली आणि आपले संपूर्ण लक्ष मराठ्यांवर केंद्रित केले. या विषम लढाईत स्वराज्य चुटकीसरशी पराभूत होईल असेच वाटत होते मात्र झालं याच्या अगदी उलट.
क्रूरकर्मा औरंगजेबाशी लढण्याच्या नुसत्या कल्पनेने एखादा गर्भगळीत झाला असता, पण 'मोडेन पण वाकणार नाही,' हे शिवशाहीचं तत्त्व. श्रींच्या इच्छेनुसार छत्रपतींनी निर्मिलेले स्वराज्य औरंगजेबाने गिळंकृत करावं हे छत्रपतींइतकेच तेजस्वी तडफदार असणाऱ्या संभाजीराजांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? महाराजांवर, स्वराज्यावर, स्वधर्मावर जीवापाड प्रेम करणाऱ्या रयतेला, सरदारांना कसं मान्य होणार? तत्कालीन जगातील सर्वांत मोठ्या साम्राज्याचा सम्राट, शहेनशहाला कडव्या मराठ्यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल २५ वर्षे झुंजवला.
आदिलशाही, कुतुबशाही पत्त्यासारख्या कोसळतात आणि तुलनेने दुबळे मराठे मात्र २५ वर्षे लढतात आणि विजयी होतात हे अद्भुतच होतं. या काळात मराठ्यांना फक्त मुघलांशीच नव्हे तर पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी यांच्याशीही लढावे लागले. याच काळात धर्मवीर संभाजींचा धर्मवेड्या औरंगजेबाने हालहाल करून केलेला वध मराठ्यांनी पाहिला. परंतु त्यामुळे खचून न जाता ते अधिक त्वेषाने चवताळून उठले आणि घट्ट पाय रोऊन उभे राहिले, लढले.
छत्रपती संभाजीच्या नंतर मराठे पराभूत होतील असे वाटले होते पण राजाराममहाराज खंबीरपणे उभे राहिले. दुर्दैवाने रायगडाचा पाडाव झाला, महाराणी येसूबाई आणि छोटा शाहू औरंगजेबाच्या ताब्यात सापडले. कैद झाले. जवळजवळ सर्व स्वराज्याचा भूभाग औरंगजेबाच्या ताब्यात आला होता. छत्रपती राजाराम महाराजांना राजधानी जिंजीला हलवावी लागली. अशाही परिस्थितीत मराठ्यांनी लढा सुरूच ठेवला. संताजी, धनाजींनी जबरदस्त प्रतीआक्रमणे केली.
राजारामाच्या मृत्युनंतर महाराणी ताराबाई, रामचंद्रपंत अमात्य यांनी लढा सुरूच ठेवला. या कडव्या चिवट प्रतिकारामुळे आणि प्रतीआक्रमणामुळे औरंगजेब, त्याचे सैन्य खचले आणि हा शहेनशहा अखेरीस शोकमग्न, निस्तेज, पराभूत अवस्थेत या महाराष्ट्रातच १७०७ साली मरण पावला. त्याच्यासमोर मराठ्यांच्या तीन छत्रपतींचे मृत्यू झाले, स्वराज्याची महाराणी आणि राजपूत्र त्याच्या ताब्यात होते तरीही तो मराठ्यांना हरवू शकला नाही.
या एकापेक्षा एक कठीण प्रसंगात छत्रपतींच्या वारसांनी, सरदारांनी, सामान्य लोकांनी केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. दैवाने मराठ्यांची अतिशय कठोर परीक्षा पाहिली, आपल्या निष्ठेच्या बळावर मराठेही त्यात खरे उतरले आणि मग दैवाने प्रसन्न होऊन विजयश्रीची माळ मराठ्यांच्या गळ्यात टाकली.
देवगिरीच्या धक्कादायक पराभवामुळे मराठे खचले आणि त्यांना त्यातून सावरायला साडे तीनशे वर्षे लागली. तसेच औरंगजेबाच्या पराभवामुळे मोगल खचले आणि त्यानंतर दिल्लीच बादशाही कधीच प्रबळ झाली नाही. तिचा झपाट्याने हास होत गेला आणि त्यानंतर हिंदुस्थानच्या राजकारणाची सूत्रे मोगलांकडून मराठ्यांच्या हातात आली. इतकेच नव्हे तर नंतरच्या बादशहांना दिल्लीच्या रक्षणासाठी मराठ्यांकडे याचना करावी लागली.
बलाढ्य देवगिरी १५ दिवसांत खिलजीच्या मोजक्या सैन्याकडून पराभूत होते आणि सर्वशक्तीनिशी दक्षिण दिग्विजयासाठी आलेल्या शहेनशहा औरंगजेबाशी मराठे तुटपुंज्या शक्तीसामर्थ्यानिशी २५ वर्षे संघर्ष करतात आणि शेवटी त्यांचा पराभव करतात. मराठी राज्यकर्ते आणि रयत यांच्यात हा स्तिमित करणारा वैचारिक बदल कशामुळे घडला? एवढे मनोबल, तेज, शौय, हिमत त्यांच्यात कुठून आली? मराठ्यांच्या वृत्तीतला आश्चर्यकारक बदल, स्वराज्यासाठी सर्वस्व त्यागण्याची तयारी याचं एक प्रमुख कारण म्हणजे संतांचे विचार आणि कार्य.
देवगिरी ते स्वराज्य या कालखंडात ज्ञानेश्वरांपासून ते समर्थांपर्यंतच्या संत चळवळीमुळे परचक्र पूर्ण भरात असतानाही धर्म, संस्कृती टिकली. या काळात संतांनी अविरत परिश्रमाने आपल्या भक्तीमार्गाद्वारे चारही वर्ण, चारही आश्रम, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू व ज्ञाता अशा चारही स्थितीतील भक्त या सर्वांना आवडेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीने ऋषंचे हे विचार सांगत सांगत लोकविचाराच्या केंद्रस्थानी देव, देश, धर्म यांची पुन्हा स्थापना केली. यांच्याबद्दल प्रेम निर्माण केलं. भौतिक कर्तव्यास तत्पर आणि पारमार्थिक प्रगतीबाबत दक्ष असा माणूस उभा केला. अस्मिता, तेज, पौरुष जागृत केले. या वैचारिक परिवर्तनामुळे शैथिल्य, षंढता पळाली आणि समाज मजबुतीने कुठल्याही आव्हानाला न घाबरता पाय रोवून उभा राहिला. आपले गतवैभव मिळवण्यासाठी सिद्ध झाला.
विजयनगरच्या पराभवानंतर, मुघलशाही विरुद्धच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात संपूर्ण भारतात सर्वात आधी या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजीमहाराजांनी केली आणि ती यशस्वी झाली याचे मुख्य श्रेय महाराजांच्या सर्वसमावेशक अलौकिक नेतृत्वाला, शहाजीराजे आणि जिजाबाईंच्या संस्कारांना, तसेच धर्मवीर संभाजी, राजाराममहाराज, ताराबाई, सर्व मराठे सरदार आणि रयत यांना असलं तरी त्या चळवळीच्या यशस्वितेत संत विचारांचे योगदान पण महत्त्वाचेच आहे. या श्रेयातील उचित वाटा संतांच्या या कार्याला द्यावाच लागेल. संतांनी भलेही हातात शस्त्र धरले नसेल पण देव, देश, धर्मासाठी हातात शस्त्र घेणारे हजारो हात तयार केले हे नाकारणे, हे कृतघ्नतेचे लक्षण आहे.
आजच्या तालिबान, अल कायदा, इसीस द्वारे केली जाणारी कृष्णकृत्ये, अत्याचार, दहशतवादी कारवाया बघितल्यावर तर असे वाटते की जर त्या काळी मराठे धर्मांध औरंगजेबाकडून पराभूत झाले असते आणि संपूर्ण हिंदुस्थानभर त्याची निरंकुश सत्ता प्रस्थापित झाली असती तर काय झाले असते, नुसत्या विचारानेही थरकाप उडतो.
हे या भारतदेशाचे भाग्यच म्हणावे लागेल की, तुकाराममहाराज, शिवाजीमहाराज आणि समर्थ रामदास हे ईश्वरनिष्ठ त्रिकुट एकाच कालखंडात या भूमीवर कार्यरत होते. आज आपण स्वतंत्र आहोत आणि आपला धर्म, देश, देव टिकला तो यांच्यामुळेच. संतांचे हे उपकार विसरून चालणारच नाही. तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगात हेच सांगितलंय,
काय सांगो आता संतांचे उपकार ।
मज निरंतर जागविती ।।
काय द्यावे त्यांशी व्हावे उतराई ।
ठेविता हा पायीं जीव थोडा ।।
खिलजी आक्रमणापूर्वीची देवगिरीची, औरंगजेब आक्रमण काळातील आणि आजची आपली सामाजिक मानसिकता याची तुलना केल्यास लक्षात येईल की आजची परिस्थिती ही देवगिरीच्या परिस्थितीच्या जवळ जाणारी आहे. काही बाबतीत तर त्यापेक्षाही वाईट आहे.
१९६२ चे चीन विरुद्धचे युद्ध का झालं? त्यात आपला पराभव का झाला? कारगिलच्या वेळेसही शत्रूच्या हालचालींबद्दल आधी बातम्या मिळालेल्या असतानाही त्वरित कृती का केली गेली नाही? चीन सीमेवरील आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आहे का? चीन आणि पाकिस्तान यांच्याशी एकाच वेळेस युद्ध करायची वेळ येऊ शकते यासाठी आपली काय तयारी आहे? एकंदरीतच आजची आपली शस्त्रसज्जता पुरेशी आणि कालानुरूप आहे का? या प्रश्नांची उत्तरे अस्वस्थता निर्माण करणारी आहेत.
ही स्थिती जर बदलायची असेल, धर्म, संस्कृती यांची होणारी घसरण जर थांबवायची असेल तर संतविचार समाजात प्रकर्षाने रुजविण्याची गरज आहे. एक असा समाज घडवण्याची गरज आहे ज्याच्या डोक्यात विठोबा आणि ओठात तुकोबा असेल आणि ज्याच्या बाहूत शिवबा आणि हृदयात ज्ञानोबा असेल.
आजच्या शास्त्रीय आणि संगणकीय युगात तरुण पिढीला या विचारांकडे आकृष्ट करण्यासाठी संतविचारांची मांडणी तर्कसुसंगत, वास्तववादी आणि वेगळ्या पद्धतीने करण्याची गरज आहे. एखादे प्रमेय जसे सप्रमाण सिद्ध करतो तसे संतविचारांचे महत्त्व आणि उपयोग सप्रमाण सिद्ध करण्याची गरज वाटते. म्हणून हा लेखनप्रपंच. खरं तर मी कोणी ज्ञानी, पंडित, इतिहास संशोधक इ. नाही परंतु एक संस्कृतीप्रेमी म्हणून जे वाचलं, अभ्यासलं ते या लेखाद्वारे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
संतविचार कालबाह्य झालेले नसूनउलट आजच्या युगातील विषमता, जातीयवाद, दहशतवाद, फुटीरतावाद इ. वाद मिटवण्यासाठी त्यांची प्रामुख्याने गरज आहे असे मला वाटते. हा लेख वाचून वाचकांना ते पटले तर ते मी माझे भाग्य समजेन.
-- मिलींद सुधाकर जोशी,
पुणे
(अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)
Copyright © 2025 | Marathisrushti