(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मला देव भेटला

    मला त्या सद्गृहस्थाचे आभार मानायचे पण भान राहिले नाही. सुटकेच्या आनंदाने मी भराभर घराकडे निघालो. पण क्षणभर थांबून मागे पाहतो तर काय, तिथे कोणीच नव्हते. आसपास माणसाचा मागमूसही नव्हता. मग कोण होता तो? देवच तर नसेल? खरंच आज मला देव भेटला होता व त्याने मला जीवदान दिले. मनोमन मी त्या अज्ञात देवाचे आभार मानले व मार्गस्थ झालो.

  • मिडिया इंडस्ट्रीची हाक

    मुंबईच्या केसी कॉलेजमधून B.A.FTNMP पदवीधर. संगीत, वाचन, फोटोग्राफी, पर्यटन ह्यांची आवड. वयाच्या अठराव्या वर्षापासून झी, सोनी, कलर्स, अशा विविध चॅनल्सबरोबर प्रॉडक्शन युनिटमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून काम केले.

  • रम्य ते बालपण : मुरलीधर नाले

    बालपणीच्या काही आठवणी सुप्त मनाच्या कोपऱ्यात दडलेल्या असतात आणि या स्मृती वाढत्या वयात कधीतरी तळातून उमलणाऱ्या कळीसारख्या हळुवारपणे उमलतात. बालमन जसं निरागस तसंच त्या आठवणीदेखील. जळगाव जिल्ह्यातील एका ५००० लोकवस्तीच्या गावातून मी आलेला. कुटुंबाचा परीघ मोठा. घर लहान परंतु परस्परांमधील नातं अतिशय जिव्हाळ्याचं. बालपणी गावी असलेल्या शेतकी शाळेत सातवीपर्यंतचे शिक्षण झाले.

  • लहाणपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥

    बालपणाच्या रम्य आठवणीत रमायला कोणाला आवडणार नाही? मध्यंतरी एका शाळेत आरोग्य तपासणीसाठी जाण्याचा योग आला. तपासणीनंतर प्रश्नोत्तरा – दरम्यान काही उत्साही मुलांनी माझ्याच बालपणाविषयी प्रश्न विचारले तेव्हा मात्र माझे बालपण झरझर माझ्या डोळ्यांपुढे सरकू लागले.

  • संतत्त्व आणि तुकाराम

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये डॉ. प्रकाश सपकाळे यांनी लिहिलेला हा लेख


    संतत्त्वाची परिभाषा मराठी वाङ्मयात सर्वात आधी मुक्ताबाईने केली आहे. संतत्व गुणवत्ता आहे. गुणवत्तेचा अर्क आहे. संस्कृतात 'संत' शब्द आहे, तो साधुसंत, सज्जन, सदाचारी अशा अर्थाने. हिंदीत 'संत' शब्द ढिसाळपणाने वापरला जातो. सज्जन माणूस या अर्थाने, मराठीत वारकरी संतांच्या संदर्भात हा शब्द योजला जातो. महानुभाव संप्रदायात 'महंत' आहेत. 'आचार्य' आहेत. 'संत' नाहीत. दत्त संप्रदायात 'गुरू' आहेत. 'संत' नाहीत. समर्थ संप्रदायात महंत, समर्थ, रामदासी आहेत. खिश्चनांमध्ये saint आहेत, 'संत' नाहीत. खिश्चन धर्मात 'सेंट'- saint ठरवण्यासाठी ठराविक पद्धतीने-चाकोरीने, कागदोपत्री पुरावे जमा करून, चमत्कार नोंदवून तांत्रिक पद्धतीने दिली जाते ती उपाधी म्हणजे saint. ती संबंधिताच्या मृत्यूनंतर दिली जाते. गुणवत्तेशी तिचा संबंध नाही. तांत्रिकतेशी आहे. चर्च ठरवते कोणाला saint म्हणायचे ते! अशी ती औपचारिक व तांत्रिक उपाधी आहे. आपल्याकडे संतत्व ठरते ते त्या व्यक्तीच्या हयातीतच आणि परंपरेने ते ठरते. त्या व्यक्तीच्या चारित्र्याने, गुणवत्तेने, आचार-विचारांनी, कार्यकर्तृत्वाने समाजच ते ठरवत असतो. संतत्वाचे निकष संतांच्या चरित्र-चारित्र्यातूनच ठरत असतात. अंगभूत गुणांचा आदर्श आपल्या आचरणातून संतांनी आविष्कृत केला आहे.

    संत जेणे व्हावे । जन बोलणे सोसावे ।...
    विश्व जाहलेया वन्ही । संतमुखे व्हावे पावी ।
    तुम्ही तरुनि विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा।
    असा संतत्त्वाचा उद्गार प्रथम मुक्ताबाईने केला.

    ज्ञानेश्वर, नामदेव आणि त्यांच्या समकालीन संतांनी-विसोबा खेचर, नरहरी सोनार, सेना न्हावी, गोरा कुंभार, जनाबाई, चोखामेळा, सोयराबाई इत्यादिकांनी संतत्वाची प्रमाणे आपल्या आचार-विचारातून आविष्कृत केली. एकनाथांनी तेच केले. सर्व बाबतीत कळस ठरलेले तुकाराम यांनी संतांचाच आदर्श समोर ठेवून जीवनक्रम आरंभिला.

    झाडूं संतांचे मारग । आडराने भरले जग ।
    करू संती केले ते ।
    आम्ही वैकुंठवासी । आलो याचि कारणासी।

    अशी त्यांची भूमिका आहे. आपण एका क्रांतिकारक कुळाचे जबाबदार वारस आहोत याचे त्यांना भान होते. आपल्या कुवतीचे, आपल्या कर्तव्याचे त्यांना भान होते. संतांच्याच मार्गाने चालायचे आहे. अवतार, ऋषी, संत यांचे कार्य एकच. साधूंचे रक्षण, दुष्टांच्या दुष्कृत्यांचा विनाश, धर्मसंस्थापना, ऋषींनी सांगितलेले साच भावे वर्तावया, आडरानाने भरलेले जग आचरणाने स्वच्छ करायला आपण आलो आहोत, अशी त्यांची भूमिका आहे. शब्दज्ञानाने अर्थाचा नाश केला आहे. भक्तीचा डांगोरा पिटून जगात आनंदी आनंद निर्माण करू. धर्माचे रक्षण करू. तथाकथित धर्माधिकारी अध्यात्माचा खरा मार्ग न दाखवता स्वार्थ बुद्धीने शब्दज्ञान सांगून देवाला, धर्माला, धर्मग्रंथांना साधन मानून लोकांना फसवतात. त्यांना स्वतःला अनुभूती नसतेच. ईशस्पर्श नसतो. संत मात्र ईशस्पर्शाने परीसस्पर्शाने सोने व्हावे, गंगेस मिळाल्याने सरितांचे, ओघळांचे स्वरूप पालटावे, तसे संतपदाने संतमय झालेले असतात. आपपरभाव त्यांच्या ठायी नसतो. रंजल्या गांजलेल्यांना संत आपले म्हणतात. अंतर्बाह्य नवनीतासारखे त्यांचे चित्त असते. निरपराधांना ते आधार असतात. सर्वांवर मुलाप्रमाणे ते प्रेम करतात. संत साक्षात भगवंताच्या मूर्तीच असतात.

    दया करणे जे पुत्रासी । तेचि दासा आणि दासी ।
    तुका म्हणे सांगू किती । तोचि भगवतांची मूर्ती ।।

    शिक्षक ज्याप्रमाणे लहानग्यांना शिकवतात, तसे संत क्रिया करून जगाला दाखवतात. आचरणाने शिकवतात. 'आधी केले मग सांगितले' असे त्यांचे आचरणातून शिकवणे असते. आई ज्याप्रमाणे बालकाची गती पाहून पाऊल टाकते, तसे संत वागतात. संत लोकांसाठी पाण्यातल्या नावेसारखे असतात. स्वतः तरतात, इतरांना तारतात.

    अर्भकाचे सारी । पंते हाती धरली पाटी ।।
    तैसे संत जगी । क्रिया करूनी दाविती अंगी ।।
    तुका म्हणे नाव । जनासाठी उदकी ठाव ।।

    सूर्य, दीप, हिरा हे दृश्य वास्तवतेचे दर्शन घडवतात. संत अदृश्याचे परमेश्वराचे, विठ्ठलाचे दर्शन घडवतात.

    रवि, दीप, हिरा दाविती देखणे ।
    अदृश्य दर्शनें संतांचे ती ।।१।।
    तापली चंदन निववितो कुडी ।
    त्रिगुण तो काठी संतसंग ||२

    चंदन ताप दूर करते तर संत त्रिविध तापाची बाधा दूर करतात. आईबाप शरीराचे पोषण करतात, संत जन्म मरण यातून सुटका करतात.

    संतांच्या अंगभूत गुणांचे गुणवत्तेचे निकषच तुकोबांनी दिलेले आहेत. संत कल्पतरू आहेत. इच्छा पुरवतात. संत कामधेनू आहेत. हितोपदेश करणारे शिक्षक आहेत. माता पिता आहेत. तृषार्तासी उदक, भुकेल्यास मिष्ठान्न आहेत. सज्जन सांगाती सोयरे आहेत. तीर्थांचे आश्रयस्थान, यमदूताचे काळ आहेत.

    संत पाऊले साजरी । गंगा आली आम्हावरी ।
    स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।।१।।

    संत अग्नी, परीस, गंगा, चंदनासारखे आहेत. आपणासारखे तात्काळ करणारे आहेत. सहनशील, व्यापक, विशाल मनोवृत्तीचे आहेत.

    तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात।
    तुका म्हणे संतपण याचि नावे ।
    जरी होय जीव सकळांचा ।।

    संत अजातशत्रू असतात. त्यांची देवावर माया असते.

    वैष्णव तो जया । अवघी देवावरी माया ।।

    संत भेदभाव करीत नाहीत. पाप-पुण्य, सुख- दुःख, हानी-लाभ असा भेद त्याच्या ठिकाणी संपलेला असतो. अधिकार, जात, वर्ण, धर्म, सत्य-असत्य, जन-वन यात अभिन्नता मानतात. आपपरभाव त्यांचा संपलेला असतो.

    नाही दुजेपण ठावे त्यासी ।

    प्रारब्ध-क्रियामाण- संचित असा काही भेद त्यांना नसतो. सत्त्व-रज-तम यांची बाधा नसते. देवभक्तपण हेही भिन्नत्व नसतो. संत उदार असतात.

    संत उदार उदार । भरले अनंत भांडार ।
    त्यांचे अंगी नम्रता असते. भाषा प्रेमळ असते.

    प्रेमे अमृते रसना ओलावली ।
    सकळ इंद्रिये जाली ब्रह्मरूप ।।

    संत समदृष्टी असतात.

    अवघे सम ब्रह्म पाहे । सर्वां भूतीं विठ्ठल आहे।
    संत अंतर्बाह्य सद्गुणी असतात.

    चंदनाचे हात पायही चंदन ।
    परिसा नाही हीन कोणी अंग ।

    दीपा नाही पाठी पाठीं अंधकार ।
    सर्वांगे साकर अवघी गोड ।
    तुका म्हणे तैसा सज्जनापासून
    पाहता अवगुण मिळेचि ना ।।

    संत प्रेमळ असतात, परोपकारी असतात.
    संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ ।
    संतांचिये गावी वरो भांडवल ।
    अवघा विठ्ठल धन वित्त ।
    प्रेमसुख सारी घेती देती ।।

    संत दुसऱ्याला आपल्या (जिवा) सारखे मानतात.
    जीव ऐसे देखे आणिका जीवांसी ।
    निखळ चि रासि गुणांचीच ।।
    तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।
    संत परिपूर्ण असतात.
    तुका म्हणे तैसे जाणा संतजन ।
    सर्वत्र संपूर्ण गगन जैसे ।।
    संत प्रेमळ असले तरी लढाऊ वृत्तीचे असतात.
    अभंग हे बाण त्यांचे हाती असतात.
    हाती बाण हरिनामाचे ।
    वीर गर्जती विठ्ठलाचे ।
    जुंजार ते विष्णुदास ।।
    क्षमा, दया, शांती ।
    बाण अभंग हे हाती ।।

    संत धैर्यवंत असतात. 'अभंग प्रसंगी धैर्यवंत ।।
    संत षडरिपु जिंकलेले असतात.
    संसाराचे नवी साधिले निधान ।
    मारिले दुर्जन षड्वर्ग ।।
    संत मोक्षालाही तुच्छ मानतात. भूतीं भगवंत अनुभवतात.

    तये गावी नाही दुःखाची वसती ।
    अवघाचि भूतीं नारायण ||
    संत विदेही असतात. देही उदास, आशापाश

    निवारण केलेले असतात. त्यांचा विषय नारायण हाच झालेला असतो.

    तुका म्हणे देही । संत झाले विदेही ।।
    संतांचे लक्षण ओळखाया खूण |
    दिसती उदासीन देहभावा ।।

    विदेही असल्याने, आशापाश निवारलेले असल्याने शुभाशुभ, हर्षामर्ष अंगी नसतो. द्रव्य दारा चित्ती नसतात. जगच जनार्दन असल्याने जगाच्या सुखासाठी जगत असतात.

    जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती
    देह कष्टविती उपकारे ।।
    भूतांची दया हे भांडवल संतां ।
    आपुली ममता नाही देही ।।
    तुका म्हणे सुख पराविया सुखे ।
    अमृत हे मुखे स्रवतसे ।।

    त्यामुळे 'संतांचिये गावी प्रेमाचा सुकाळ' असतो. अशा संतांचे उपकार काय सांगावे? संत निरंतर जागवतात. गाईने वासराला सांभाळावे तसे ते आपल्याला सांभाळतात.

    तुम्ही संत मायबाप कृपावंत ।।

    तृषार्ताला उदक, भुकेल्याला मिष्ठान्न लाभावे, बालकाला आई भेटावी, तसा जीवलग संतांचा संग लाभतो. अवघी पुण्ये सानुकूल व्हावी, तेव्हा संतसंग लाभतो. कृतकृत्य व्हावे, असे सोयरे, हरिजन प्राणसखे संत. संत म्हणजे जीवाचे जीवन. संतसंग तोच स्वर्गवास.

    संतांचा संग तोचि स्वर्गवास ।।
    संत घरा आले तोच खरा दिवाळी दसरा ।
    दसरा दिवाळी तोचि आम्हा सण
    सखे संतजन भेटतील !
    धन्य दिवस आजि जाला सोनियाचा ।।
    संतदर्शन घडणे म्हणजे साक्षात् भगवंताचे दर्शन घडणे.

    संतदर्शन हा लाभ । पद्मनाभ जोडला ।
    संतांच्या चरणस्पर्शाने वासनेचे बीज जळून जात.
    सुख वाढते. विश्रांती प्राप्त होते. संतकृपेने काया डवरते.

    अलिगणे संतांचिया । दिव्य झाली माझी काया ।
    मस्तक ह पायावरी । त्यांच्या ठेविता ।।
    संत पाउले साजिरी । गंगा आली आम्हांवरी ।
    स्वेतबंद वाराणसी । अवघी तीर्थे पायापासी ।
    तुका म्हणे धन्य झालो । संतसागरी मिळालो ।।
    संतांच्या संगतीने आपणही संतांसारखे होऊन
    जातो.

    अग्निमाजी गेले । अग्नि होऊन ठेले ।।
    चंदनाच्या वासे । तरू चंदन झाले स्पर्शे ।।

    अग्नीत गेले ते अग्नीरूप झाले. चंदनाच्या वासाने इतर झाडेही सुगंधित होतात. संतांचे आलिंगन मोक्ष, सायुज्जना घडवणारे असते.

    अलिंगने घडे । मोक्ष सायुज्जना जोडे ।।
    ऐसा संतांचा महिमा |

    संतांचा महिमा सांगताना संतत्वाचे अनेक निकष तुकोबा सांगून जातात. संत सज्जन, सोयरे, शिक्षक, मायबाप, प्रेमळ, परोपकारी, सहनशील, विशाल मनोवृत्तीचे, क्षमाशील, आपपरभावरहित, अंतर्बाह्य सदगुणी, प्राणसखे, जीवाचे जीवन, मोक्षालाही तुच्छ मानणारे, मधुर भाषी पण प्रसंगी पाखंड खंडण करताना लढाऊ, झुंजार वृत्तीचे

    मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास ।
    कठीण वज्रास भेदू ऐसे ।।

    असे विदेही, षड्रिपु जिंकलेले असे असतात.
    मुलाम्याचे नाणे - संतांची सोंगे

    संतांविषयी समाजात अतिशय आदर वाटत असतो. लोकांच्या मनात देवासारखी भावना संतांविषयी असते.

    संधिसाधू, ढोंगी, दांभिक लोकांच्या हे लक्षात येते की देवाच्या, धर्माच्या आश्रयाने पुष्कळ प्रकारचे भौतिक लाभ होऊ शकतात, तेव्हा असे लोक संतांची बाह्य लक्षणे दाखवून समाजात मिरवू लागतात. भौहे भाबडे लोक त्यांना भुलतात. त्यांनाही संत समजू लागतात.

    प्रत्येक काळात असे लोक आढळून येतात. तुकोबा त्यांच्याविषयी स्पष्टपणाने बोलून लोकांना सावध करतात. तुकोबा भावात्मक जितके बोलतात, तितकेच अभावात्मक स्पष्टपणे सांगतात. संत कसे असतात तसेच संत कसे नसतात तेही सांगतात.

    'नव्हतो सावचित्त । तेणे अंतरले हित ।। असे होऊ नये म्हणून संतांनाही, संत म्हणून मिरवणाऱ्यानाही कस लावून तपासून पाहावे, असे स्पष्टपणे सांगतात.

    शुद्ध कसूनि पाहावे । वरील रंगा न भुलावे ।।
    तांबियाचे नाणे न चले खऱ्या मोले ।
    जरी हिंडविते देशोदेशी ।।
    हिरीयासारिखा दिसे शिरगोळा ।
    पारखी तो डोळा न पाहती ।।
    देऊनिया भिंग कानाविले मोती ।
    पारखिया हाती न पाहाती ।।

    सोन्याचा मुलामा दिलेले नाणे सोन्याच्या मोलाने चालत नाही. शिरगोळ्याला हिऱ्याचे मोल मिळत नाही. रत्नपारखी पारख करतो, तसे संतांना पारखावे.

    संतांची सोंगे संतांसारखीच वाटतात. पण दोन्ही दिती सारखी। वर्म जाणे तो पारखी ।। मनाने तटस्थ असणारा आणि आळशी, ध्यानस्थ बसलेला आणि झोप घेणारा, सर्वस्वाचा त्याग केलेला आणि पोटासाठी जोग घेणारा, देवासाठी आर्त असणारा आणि पोटासाठी भक्ती करण्याचे सोंग करणारा असे दोन्ही सारखेच दिसतात. म्हणून वर्म जाणावे.

    संतांची सोंगे स्वतःविषयी बढाया मारतात.

    डबक्यातल्या बेडकाने सागराचा धिक्कार करावा, कावळ्याने मी राजहंस आहे, असे म्हणावे, गाढवाने मी गजाहून थोर आहे, असं म्हणावे तसे ढोंगी संत मिरवतात.

    फुगते काउळे म्हणे मी राजहंस आगळे
    मुलाम्माचे नाणे । तुका म्हणे नव्हे सोने ।।

    कोल्ह्याच्या गर्जना कुठपर्यंत? सिंह पाहिला नाही तोपर्यंतच. गारा तोपर्यंतच शोभतात, जोपर्यंत हिरा प्रकाशला नाही. ढोंगी संत स्वतःच्या संतपणाच्या गोष्टी कुठपर्यंत करतात? जोपर्यंत तुकारामांसारखा संत भेटला नाही.

    तोवरी तोवरी संतांचिया गोष्टी ।
    जव नादी भेटी तुक्यासवे ।।

    संतांच्या सोंगांची ही संतपणाची लक्षणे दाखवणे म्हणजे वांझेने गरवार लक्षण दाखवणे आहे.

    वांझेने दाविले गऱ्हावार लक्षण ।
    चिरगुटे घालून वायथाला ।।
    गन्हवारे हा विधी । पोट वाढविले चिंधी ।
    लावू जाणे विन्हे । तुका साच आणिक कल्हे ।।

    अशा ढोंगी संतांच्या नादी लागलो तर परमार्थ साधना दूर, देव भेटणे दूरच. सर्व प्रकारचे शोषण मात्र हमखास होते. चोराच्या संगतीने चोरीची इच्छा व्हावी, व्यभिचाऱ्याच्या संगतीने व्यभिचाराची इच्छा व्हावी, तसे हो. सर्व वाया जाते. समाजात अपकीर्ती होते. अशा ढोंगी संतांकडून, संतांच्या सोंगांकडून उद्धार होऊ शकत नाही.

    दगडाची नाव आधीच ते जड
    काय ते दगड तारू जाणे ।।
    तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी
    सोंग संपादणी करती परि ।।

    गाढवाने कितीही शृंगार केला तरी त्याचा घोडा होऊ शकत नाही.

    गाढव शृंगारिले कोडे । काही केल्या नव्हे घोडे ।।
    संतपणाची कितीही बाह्य लक्षणे दाखविली तरी अशा संधिसाधूंचा मूळ धर्म सुटत नाही.

    अशी संतांची सोंगे कशी ओळखावीत? याविषयीही निःसंदिग्धपणे तुकोबा मार्गदर्शन करतात.

    तरी ते संपादिले सांग कारणावाचुनी व्यंग ।।
    भोंदावया मीस घेऊनी संतांचे ।
    करी कुटुंबाचे दास्य सदा ।।

    पोपटासारखे बोलणारे, लोकरंजन करणारे, द्रव्यासाठी शिकवले तसे बोलणारे, पाठांतर करून ज्ञानी म्हणून मिरवणारे, संतचिन्हे मिरवणारे खरे संत नसतातच.

    संताचिन्हे लेउनि अंगी । भूषण मिरवती जगी ।।
    कामक्रोधलोभ चित्ती । वरिवरि दाविती विरक्ती ।।

    असे अनेकजण संत म्हणून मिरवताना दिसतात. पण संत म्हणून मिरवणाऱ्यांना कस लावावा. परीक्षा घ्यावी. हिरा म्हणून मिरवणाऱ्या गारांना घणाने ठोकून पाहावे
    हिऱ्या ऐशा गारा दिसती दुशेन ।
    तुका म्हणे पण न भेटे तो ।।

    संत आणि संतांची सोंगे सारखीच दिसतात.
    दोन्ही दिसती सारखी । वर्म जाणे तो पारखी ।
    म्हणून संत कोण नाही, याविषयी तुकोबा सांगतात.
    अध्यात्मपर कविता करतात, संत आडनाव आहे,
    कीर्तन करतात, पुराणे सांगतात, वेद पठण करतात, कर्मकांड करतात, तीर्थाटन करतात, वनात राहतात, अंगाला भस्म लावतात, माळा नुती परिधान करतात, असे सर्व संत नाहीत. ही सगळी बाह्य लक्षणे होत. हे सर्व संसारी लोक आहेत. देह निरसला नाही, ते सर्व संसारी होत. संत नव्हेत. बाह्य लक्षणांना महत्त्व नाही. भगवेपणा लक्षण मानले तर कुत्रा भगवाच असतो, जटा वाढवणे संतांचे लक्षण असते तर अस्वलही संत ठरेल. भूमीत गुहा खोदून राहणारा संत असता तर उंदीरही संतच ठरला असता की! कशासाठी अशी खटपट करावी?

    लोकांनी भुलावे म्हणून ही सारी सोंगसंपादणी! कीर्तन करणे, भक्तिगीते गाणे, जडीबुटी देऊन चमत्कार करणे, शिष्यशाखा वाढवणे, आपण अयाचक असल्याची प्रसिद्धी करवणे, मठपती होणे, देवार्चन करणे, देवाचे दुकान मांडणे, वेताळ वगैरे प्रसन्न आहे, असे पसरवणे, पुराण सांगणे, अध्यात्मपर घटापटादींवर वाद घालत चर्चा करणे, पढीक पंडित असणे, आगम जाणणे, स्तंभन विद्या जाणणे, पुरस्कार मिळवून मोठेपणा बिंबवणे असे उपद्व्याप करणारे संत नव्हेत. हे कपटी लोक असतात.

    केस वाढवणे, अंगात भुते आणणे, नरनारी जमवून शकून सांगणे ही संतांची लक्षणे नव्हेत. तरी ते नव्हती संत जन । तेथे नाही आत्मखुण ।। अध्यात्मिक, धार्मिक लक्षणे दाखवणारे संत नव्हेत. तंबाखू, भांग सेवन करणारे, गांजा ओढणारे संत नव्हेत. ही सारी संतांची सोंगे आहेत.

    ऐसे संत झाले कवी । तोंडी तमाखूची नळी ।।
    ऐसे कैसे झाले भोंदू । कर्म करोनी म्हणती साधू।।
    दावुनी वैराग्याची कळा । भोगी विषयाचा सोहळा ।।
    तुका म्हणे सांगे, किती । जळो तयांची संगती ।।

    भोंदू संतांची लक्षणे म्हणजे कर्मकांड करणे, वैराग्याची लक्षणे दाखवत भोग घेत राहणे, अशा भोंदूची संगत धरू नये. असे पिंड पोषण करणारे संत नव्हेत. त्यांच्या लेखी जीव हाच देव. भोजन हीच भक्ती. मुक्ती म्हणजे मरण. असे भोंदू पापपुण्याचा विचार न करता आचरण करतात. स्वतः उंच जागी बसून मोठेपणा मिरवतात. टिळा-टोपी अशी सजावट करतात, ध्यान धारणा करण्याचे नाटक करतात.

    बक ध्यान करी । सोंग करूनि मासे मारी ।।
    असे ढोंगी संत नसतात. हरिकथा सांगणारे संत नव्हेत. अशी अनेक लक्षणे दाखवणारे दुकान मांडे असतात. संत नसतात.

    असे मांडिले दुकान ।
    कथेमध्ये हलवी ढोंग । संत नव्हे ते बेसंग ।
    पाहुनी स्त्रियांचा मेळा । काढी सुस्वर तो गळा ।
    तुका म्हणे नव्हे योग । पोटासाठी केले ढोंग ।।

    भविष्य सांगणारेही संत नव्हेत.
    जगरूढीसाठी घातले दुकान ।
    जातो नारायण अंतरुनि ।।

    ऋद्धीसिद्धचे साधक, वाचासिद्ध हे संत नव्हेत.
    तीर्थस्नान करणारे, उपास करणारे संत नव्हेत.

    अंतरीची बुद्धी खोटी । भरले पोटी वाईट ।।
    मंदिरातील पुजारी, शब्दज्ञानी, पंडित, जातीचे ब्राह्मण, याज्ञिक, होम हवन करणारे, पूजा सांगणारे हे सारे संत नव्हेत. देवाच्या, धर्माच्या आधारे जगणारे ते पोटभरू होत. शोषक होत. पिंडपोषक होत. वित्त, धन, सभा, कीर्ती, जमीन अशा अनेक गोष्टी प्राप्त करणारे शोषक होत. पाखंडी होत.

    पाखंडांचा, पाखंड्यांचा मेरुमणी म्हणजे स्वतःला परमपूज्य म्हणवणारे स्वयंघोषित देव. देव, धर्म यांमुळे सामान्य माणसालाही मान मिळतो. पाखंडी, संतांची सोंगे देवाच्या आश्रयाने समाजात वावरतात. देवाला मिळणारे, देवाच्या नावाने मिळणारे सर्व काही अशा संधिसाधूंना मिळू लागते. दसऱ्यामुळे आपटा, सवंदर अशा रानचाऱ्यालाही महत्त्व प्राप्त होते. पाण्यामुळे मातीच्या घागरीलाही डोक्यावर घेतले जाते. दाण्यामुळे मापाचीही देव घेव होते. तसं 'देवामुळे मान । नाहीतरी पुसे कोण? ।।' देवामुळे आणि संतपदाच्या महात्म्यामुळे मुलाम्याच्या नाण्यांनाही स्थान मिळते. पण हे ढोंगी गुरू, स्वामी, स्वयंघोषित परमपूज्य तर देवाचेच मारेकरी ठरतात. देवाला बाजूला सरकवून स्वतःलाच ते देव, देवाचे अवतार, अवताराचे अवतार इतकेच नाही काही तर अवतार घेणारी सुप्रीम पॉवर आपणच आहोत, असे घोषित करू लागतात. प्रक्षेपित करू लागतात. तुकोबांच्या काळीही असे लोक होतेच. ज्ञानेश्वरांच्याही काळात असे पंथ संस्थापक दिसतात. आपणच परमेश्वराचा शेवटचा अवतार! माझ्यानंतर अवतार नाहीच, असे म्हणणारे. तुकोबा 'देही', 'देव', 'जली' जनार्दन, 'भूती' भगवंत, 'जगी' जगदीश्वर, ‘विश्वी विश्वंभर' असे परमेश्वराचे सर्वव्यापक स्वरूप स्वानुभवाने सांगतात. 'वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावे।' अशी गर्जना करतात. पण हे ढोंगी परमपूज्य केवळ आणि केवळ स्वतःलाच परमपूज्य, परमेश्वर मानतात. तुकोबा म्हणतात,

    एक म्हणती आम्ही देवचि पै झालो ।
    ऐसे नका बोलो । पडाल पतनी ।।
    एक म्हणती आम्ही देवाचि पै रूपे ।
    तुमचे नि बापे न चुके जन्म ||
    स्वतःला देव घोषित करणे पाखंडीचा अतिरेक आहे.
    अहं म्हणे ब्रह्म । नेणे भक्तीचे ते मर्म ।
    तुका म्हणे क्षण । नको तयाचे दर्शन ।।
    स्वतःला देव समजणाऱ्यांची भक्ती करणे म्हणे आपल्या आयुष्याचे मातेरे करणे होय.
    सानुनिया नरा । कोण आयुष्याचा मातेरा ।।
    अशांच्या नादी लागणे म्हणे
    गाढवही गेले ब्रह्मचर्य गेले
    तोंड काळ झाले जगामाजी ।।

    अशी संतांची सोंगे विदेही नसतात. देहाचे चोचले पुरवणारे इंद्रियभोगी असतात. कोणत्याही थराला ते जाऊ शकतात. परमेश्वर षड्गुण संपन्न असतो.

    षडगुण ऐश्वर्य संपन्न । एक भगवंती जाण ।।

    यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य असे परमेश्वराचे सहा गुण. त्याचप्रमाणे परमेश्वराचे दुसरे सहा गुण म्हणजे सर्वज्ञता, तृप्ती, अनादिज्ञान, स्वातंत्र्य, शक्तिप्रकाशन आणि अनंतशक्तित्व असे गुण ज्या माणसात असतात, त्याच्या मनुष्यपणाचा चिरा पडतो. त्याचे मनुष्यपण संपते. पण हे ढोंगी, दांभिक, इंद्रियभोगी स्वघोषित परमपूज्य तर धन, द्रव्य, दारा, जमिनी, कीर्ती पुरस्कार, मान्यता, मान यांचे आयुष्यभर भुकेले असतात. वेगवेगळ्या प्रकारे देवाच्या आश्रयाने सर्व सुखोपभोग प्राप्त करतात. मठ, ट्रस्ट यांच्या आड सर्वकाही पचवतात. स्वतः अयाचित असल्याचे पसरवून शिष्यांद्वारा कलेक्शन करतात.

    आमचेहि गोसावीयाची अयाचित वृत्ती
    देती शिष्याहाती उपदेश ।।

    भावपुष्प, भावसमर्पण, अशा गोंडस नावांनी भक्तांकडून नियमितपणे 'देवाचा वाटा' म्हणून धन उपटले जाते. त्यासाठी अध्यात्माची परिभाषा साधन म्हणून वापरली जाते. 'देवाचा वारा देव नाही तो चोर आहे, असे गीतेत सांगितले आहे, असा पण देवाचा वाटा स्वतःच हडप करणारा कोण? महाचोर. असे महाचोर उदंड जाहले आहेत. देवकृषी, देवराई अशा गोंडस नावांनी खाजगी आणि शासकीयही जमिनी हडप केल्या जात आहेत. त्यांच्या स्त्रीईषणा, धनईषणा, लोकेषणा, कीर्ती ईषणा, अपत्य ईषणा प्रचंड असतात. अध्यात्माच्या परिभाषेत त्या छान घोळलेल्या असतात. आपल्या स्थैर्याला, प्रतिभेला धक्का लावणाऱ्याच्या मागे ते सर्व प्रकारची झेंगटे लावतात. त्याची बदनामी करतात. पुरता काटा काढतात. आपले पितळ उघडे पाडणाऱ्याला, त्याचे स्वरूप उघडे करणाऱ्याला जगातून नाहीसेही करायला कमी करत नाहीत.

    तुकोबा अशा स्वयंघोषित परमपूज्यांपासून, स्वयंघोषित देवांपासून सावध रहायला सांगतात.

    देवा धर्माच्या आधारे चालणारे अन्यथा ज्ञान भावनिक शोषण करते. इमोशनल ब्लॅकमेलिंग करते. पिंडपोषक पाखंडी, संतांची सोंगे म्हणजे मुलाम्याचे नाणे आर्थिक शोषण करतात. विपरीत ज्ञान पसरवून स्वतःचे महत्त्व वाढवतात, मार्गदर्शन करीत आहोत असे दाखवत आडमार्गाला घेऊन जातात. हे देवाच्या मार्गावरील वाटमारे होत. देवाकडे जाणारे वित्त-जमिनी इत्यादीच नव्हे तर श्रद्धा-भक्ती यांचीही हे वाटमारी करतात. खऱ्या ज्ञानापासून, खऱ्या देवापासून दूर नेतात.

    संतांची भावात्मक लक्षणे सांगून तुकोबाअभावात्मक लक्षणेही सांगतात व संतांच्या सोंगांचं पितळ निर्भीडपणे उघडे पाडतात. रोखठोकपणे, स्पष्टपणे सांगतात,

    तुका म्हणे सत्य सांगो । येवोत रागे येतील ते ।
    सावध करी तुका । म्हणे निजले हो आइका ।।

    अशी त्यांची भूमिका आहे. त्यांचे समकालीन सालोमालो, मंबाजी, रामेश्वरभट्ट समाजाचे असे अनेक प्रकारचे शोषण करताना त्यांनी पाहिले असतील. आज तुकोबा असते तर अध्यात्माची दुकाने मांडून बसलेले बाबा, दादा, नाना, ताई आणि बापू अशा अनेक खिसेकापूंवर तुटून पडले असते. तुकोबांचे संतत्त्वाविषयीचे निकष सार्वकालीक असल्याचे प्रत्ययास येते संतांची सोंगे ओळखण्यासाठीही तुकोबांनी दृष्टी दिलेली आहे. त्यांनी दिलेल्या दृष्टीने पाहू या आणि सावध होऊ या.

    -- डॉ. प्रकाश सपकाळे,
    जळगाव

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • अजाणतेपणातील वांडपणा

    माझा अजाणतेपणाचा काळ सुखाचा होता की दु:खाचा याचा जमाखर्च मला नाही मांडता यायचा. पुन्हा सुख-दुःखाचे निकष व्यक्तिसापेक्ष आणि आपल्या भावनांचा कस कुणी ऐरणीवर घासून तपासतो का?

  • खेळ मांडियेला

    लेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

  • जोडीदार निवडतांना – भाग १

    काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .

  • तुका आकाशाएवढा

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये प्राचार्य डॉ. विश्वास पाटील यांनी लिहिलेला हा लेख


    महाराष्ट्राच्या संत परंपरेचे रहस्य आपल्या अभंगातून मांडताना बहिणाबाईंनी सार्थपणे असे म्हटले आहे की ज्या वारकरी धर्माचा पाया ज्ञानोबांनी घातला त्याच्या कलश स्थानी तुकोबा आहेत. तुकोबांचा अभ्यास म्हणजे एका महायात्रेच्या प्रस्थानासाठी सिद्ध होणे आहे. ही आंतरिक अशी यात्रा आहे. ही धरणीवरल्या माणसाला आकाशाची हाक आहे. एकाच वेळी धरणी आणि आकाशावर प्रीत करायची जीवनशैली ही तुकोबा-जीवनशैली आहे. ते म्हणतात 'आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी ।' केवढा व्यापक पैस तुकोबा आपल्यासाठी आखतात. ते स्वतःला अगदी अणुरेणूहूनि थोकडा मानत असले तरी प्रत्यक्षात मात्र ते आकाशाएवढे सिद्ध झाले. त्यांच्या मते संतजन ही फार मोठी सिद्धी होती. लब्धी होती. साधु संत ज्या दिनी घरी येतील तो त्यांच्यासाठी दिवाळी दसरा होता. संतजन म्हणजे सर्वत्र पसरलेले गगन आहे असे ते सार्थपणे म्हणतात.

    तुकोबांनी वेदनेचा वेद वाचला व प्रेमाचे उपनिषद अभ्यासले. यामुळेच तर त्यांचे अभंग विचार प्रमेय बनलेत. यामुळेच तर ते धरणी-आकाशाच्या नात्याच्या मिलनाची महन्मंगल कथा मांडू शकले. सतराव्या झंझावाती शतकात तुकोबांचा तारा गगनात विलसतो. त्यांचा काळ हा १६०८ ते १६५० असा आहे. ही तुकोबांच्या जगण्याची, झुंजण्याची आणि समर्पित होण्याची बेचाळीस वर्षे आहेत. हा काळ इतिहासाच्या पटलावरचा अत्यंत संक्षिप्त असा काळ आहे पण असाच काळ तर शंकराचार्य काय आणि ज्ञानेश्वर काय यांना लाभला होता. किती जगलो यापेक्षा कसे जगलो याला महत्त्व आहे. तुकोबांची जीवनगाथा साधक, कवी, समाजसुधारक अशा त्रिपदा गायत्रीवर मंडित आहे. तुकोबा या त्रिवेणीवरील जंगम तीर्थ आहेत. त्यांचे आठवे पूर्वज विश्वंभरबुवा हे नामदेवांच्या समकालीन होते. ते वारीला नियमितपणे जात असत. या ठिकाणी नामदेव महाराजांच्या आदेशावरून तुकोबांनी केलेल्या अभंग रचनेचे रहस्य उकलते.

    तुकोबा हे नाव फार अद्भुत आहे. तुकणे म्हणजे तोलणे, वजन करणे. तुकणारा तो तुका. तुकोबांच्या आईचे नाव कनकाई असून वडिलांचे नाव बोल्होबा असे होते. त्यांना दोन भाऊ होते. मोठा सावजी तर धाकटा कान्होबा. दोन बहिणी होत्या. त्यांचे आई-बाबा निवर्तले आणि भाऊ सावजी गोसावी झाले. भावजय वारल्या. पहिली पत्नी रुखमा गेली. पुत्र संतोबा गेले. अन्नान्न दशा झाली आणि घरातल्या परिचित जनांच्या चिता धडधडताना बघाव्या लागल्या होत्या. तुकोबांची मशाल मात्र पेटती राहिली. वयाच्या तेविसाव्या वर्षी दुसरा विवाह करावा लागला. पत्नी जिजाबाई म्हणजे आवली. तुकोबांच्या समोर संघर्षाच्या जळत्या वाटा संतप्त होत्या. दिवाणी दावा अंगावर कोसळला होता. घरादारावर जप्ती आली होती. बहिष्कार होता. गाव सोडून जायचा हुकूम झालेला. अशा प्रकारे तुकोबा निराधार झाले. तुकोबांना दुष्काळाने गाठले. त्यांचे दिवाळे निघाले. एकूणच उद्ध्वस्त जीवनाची ही दशा होती. इतिहासाची पाने फडफडत होती. तिकडे दक्षिणेत भयावह अशांतता होती. बहामनी मोगल संघर्ष वातावरणात दहशत पेरत होता. धाकदपटशा आणि अश्वारोहींच्या धुळीने जनजीवन माखलेले होते.

    तुकोबांच्या पारंपरिक गतानुगतिक आयुष्याचा पट हा असा आहे सगळा. त्यांना ना जातीचे पाठबळ, ना गुरुंचा आसरा, ना कुणी मार्गदर्शक, ना हितकर्ता, ना कवडी ना चावडी म्हणजे ना पैसा ना अधिकार. वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक तिन्हीही स्तरावर उपासमार होती. एक पराभूत आणि लज्जित जीवन वाट्याला आले होते पण तुकोबांनी प्रत्येक संकटावर आंतरिक सामर्थ्याने मात केली. कठोर आत्मपरिक्षणाचा जळता वणवा सभोवती असताना चेहऱ्यावरील स्मितरेखा पुसू दिली नाही. प्रत्ययकारी आत्मसन्मानाची उजळती ज्योत असे त्यांचे जीवन राहिले. आंतरिक प्रतिभेचा स्वच्छ-निर्मळ प्रवाह वहाता होता. त्यांच्या ठायीच्या प्रकाश जाणिवा विरक्तीने झोडपल्या गेल्या पण आंतरिक उजेड मात्र कायम होता. कोवळी भाव संवेदना जळती आणि उजळती होती. ते म्हणत होते 'अंतरी पेटता ज्ञानज्योत धवळेल जगदाकार.'

    तुकोबांसाठी जगण्याचा अर्थ झुंजणे होता आणि संदर्भ समर्पित होण्याचा होता. आपल्या जीवनातील कुरुक्षेत्राला त्यांनी धर्मक्षेत्रात परिवर्तित केले. 'रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग आंतर्बाह्य जग आणि मन' हे अंतरंगातील सत्य तुकोबांनी परखडपणे मांडले. कुठल्याही परिस्थितीत ना शरणागती स्वीकारली ना परिस्थितीशरण बनले. 'न दैन्यं पलायनं' हा गीताबोध ध्यानी घेऊन ते जळत्या पायवाटेवर अनवाणी प्रवास करत राहिले नि मळलेली पायवाट चालत राहिले. एक अनवट व अवघड वाट चालणारा हा फकीर अक्षरशः पंख मिटून बसलेल्या गरुडासारखा उज्ज्वल उद्याची वाट बघत राहिला होता.

    तुकोबांना आपल्या मूळाचा नेमका शोध लागलेला असल्यामुळेच ते म्हणू शकत होते 'आम्ही मूळचे वैकुंठीचे, तुका म्हणे आम्ही विधीचे जनीते स्वयंभू आहोत केले नव्हे' या प्रमाणे त्यांना आपल्या स्वप्नांना जागरणाचा संदर्भ सहजीच देता येत होता. बाबाजी चैतन्य त्यांच्या अध्यात्म साधनेचे अधिष्ठान होते. आपल्याला संत नामदेवांनी कविता कार्य सोपवले आहे याची खूणगाठ हे त्यांच्या कवित्व साधनेचे बलस्थान होते. तुकोबांनी आपल्या गुरुच्या आज्ञेने गीता भाष्य लिहिले एकूणच परंपरा नाकारणारे बंडखोर असे मन त्यांना लाभले होते. हिंदी भाषेत असे मन कबीर यांना तर गुजराती भाषेत असे मन नरसी मेहता यांना लाभले होते. या वैष्णव वीरांनी शास्त्रसत्ता नाकारली. ग्रंथ सत्ता झुगारून दिली. कबीर ठामपणे म्हणाला होता 'तू कहता कागज की लेखी में कहता आँखन को देखी. ' तुकोबा यामुळेच तर केवळ आपण वेदांचा अर्थ जाणतो असे हिंमतीने म्हणू शकत होते. कबीराच्या शैलीत तुकोबा माळा-टिळा-जानवे-ज्योतिष-कर्मकांड नाकारून कर्मयोगाचा स्वीकार करतात. ज्ञानसाधना आचरतात आणि दंभ व अहंकारापासून मुक्त होतात. भक्तिला कधीही विभक्त न होण्याची दीक्षा देत देखावा नाकारतात. पंचांची सत्ता नाकारत असल्यामुळेच ठणकावून सांगतात 'सत्य असत्यासी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमत.' तुकोबांच्या जाणीवांचे असे स्वनिर्मित विश्व आहे. यामुळे ते थोर महाकवी ठरतात. थोर महाकविचे रहस्य समजून घ्यायला हवे. असे कवी खोल मानवी आस्था, गहिरे करुणामूल्य, मानवतेची असहाय आर्तता व दुःखाला काव्यात्म परिमाण देण्याची क्षमता बाळगतात. प्रज्ञासंपन्न कविची शब्दसत्ता ही खरे तर त्याची अर्थसत्ता आहे. शब्दांचा अर्थ त्यांनाच कळतो जे अनुभवाचा ईसार देतात. बाकी लोकांना शब्दांचे पर्याय कळत असतात. शब्द मारतो अर्थ तारतो हे तुकोबांनी मनात जाणून घेतले होते. शब्दांचे शिक्षक असतात पण अर्थाचे आचार्य असतात अशा आचार्यांना हे पुरते ज्ञात असते की शब्द पुस्तकात असून अर्थ जीवनात शोधावा लागतो. तुकोबांच्या कवितेला यामुळे एक दृढता येते. ते म्हणतात 'वेदांचा अर्थ तो आम्हासीच ठावा येरांनी वहावा भार माथा.' शब्द आपल्या जीवाचे जीवन असल्यामुळे आपण जनलोकांसाठी शब्द वाहतो. आपल्या घरी धन शब्दांचीच रत्ने असल्याचा अभिनव साक्षात्कार त्यांना घडतो. तुकोबा यत्नपूर्वक मग शब्दांचीच शस्त्रे करतात. क्रांतिकारक, वैज्ञानिक, जीवन सन्मुख आणि ऋषी या चार लोकांचीच शब्दांवर सत्ता असते. तुकोबा या चारी वृत्ती-प्रवृत्तीचे प्रतीक-प्रतिनिधी होते. आपला अनुभव आपले मित्र शत्रू होण्याचा आहे तर तुकोबांना आपले शत्रू मित्र झाल्याचा अनुभव आला. कवितेमुळे जन्मजात वैर विस्मरणात जाण्याची सिर्द्ध लाभते असा संकेत गोस्वामी तुलसीदास यांनी दिला आहे. तुकोबांना हा अनुभव प्रत्यक्षात झेलता आला. त्यांचे शत्रू मित्र झाले. धर्मपीठावरून धर्माज्ञा करणाऱ्या रामेश्वर भट यांनी तुकोबांचे शिष्यत्व पत्करले. तुकोबांची आरती रचली.

    तुकोबांची कविता समजून घेताना त्यांचे जीवन धडपणे समजून घ्यावे लागते. ते समजून घेण्यात जर गफलत झाली तर मग त्यांची वचने सामान्य बुद्धिच्या माणसांना अहंकार भरली वाटू लागतील. तुकोबा म्हणतात 'आजि म्यां पांडुरंग पाहिला.' आपल्या अध्यात्म अनुभवाचा असा जाहीरपणे डंका मिरवणारे तुकोबा कमालीचे निरलस आणि विनम्र आहेत. 'मऊ मेणाहुनि आम्ही विष्णुदास.' असा आपला परिचय करून देणारे तुकोबा मग 'लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा' अशी संताघरची खूण सांगतात. सकलांच्या पाया दंडवत करतात याचे कारण आपापली चित्ते शुद्ध करा असा त्यांचा आग्रह असतो. तुकोबांचे पाईकाचे अभंग तर सैनिकाची आचारसंहिता आहे. शिवकल्याण राजा मावळतीच्या प्रदेशातील उजळते मावळे सोबत घेऊन एक क्रांती करू जात होता. त्याला धर्मसत्तेचा आशीर्वाद मिळवताना आणि मिरवताना संत रामदास यांच्या सोबत तुकोबांच्या स्नेहाचे गाठोडे घेऊन चालावे लागते हा चमत्कार केवळ महाराष्ट्र देशीच घडला असे नाही तर एकूणच संत परंपरेत राजसत्ता आणि धर्मदंडाची ही जुगलबंदी आपल्याला बघायला मिळते.

    तुकोबांचे निवेदन यामुळे अतिशय परखड, स्पष्ट आणि कुणाचीही भीड मुर्वत न ठेवणारे आहे. त्यांना मुक्तीची चाड नाही. कधीतरी या धरतीवर शंकराचार्य बोलले होते 'न मे मोक्षस्याकांक्षा' त्याच चालीवर तुकोबा म्हणतात 'नाही देवापाशी मोक्षाचे गाठोडे आणून वेगळे देईल जो' आणि आपल्या आनंदलोकाचा परिचय या शब्दात करून देतात 'तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी' आणि त्यांनी व्यक्तवलेला 'तुका म्हणे आम्ही मृत्युलोकी भले' हा समंजस सूर जीवन आणि ईश्वर या दोन संकल्पना मुळातून समजून घेण्याचा परिपाक आहे. मागणे काय तर ते लई नाही असे ते म्हणतात. पोटापुरते मागतात पण तुकोबांचे खरे सांगणे तर हे आहे 'हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.'

    तुकोबांची कविता अमर आत्मतत्त्वासारखी दृढ प्रतिज्ञ आहे. तिचा पोत गीतेच्या आत्मतत्त्वा सारखा आहे. 'नैनं छिदंति शस्त्राणि' अशी ही कविता असल्यामुळे मंबाजीचे शस्त्रास्त्र तिजवर काही परिणाम करू शकत नाहीत. पंडित क्षोभाचे अग्निदिव्य तुकोबा पत्करतात आणि गाथेचे जलदिव्य साधले जाते. इंद्रायणीने तुकोबांची गाथा तारली की नाही हे काही माहित नाही पण लोककंठात ती सुरक्षित राहिली होती हे मात्र खरे. याचे कारण असे होते की ही गाथा कालोचित, कालसंमत आणि काळाला उत्क्रांत करणारी कविता आपल्या काळजाशी वागवून होती. कधी काळी उत्तरेत रामानंद साधुचा डंका वाजला होता 'जातिपाँति पुछे नहीं कोई हरि को भजे सो हरिका होई.' याचा आधार घेत कबीर बोलला होता 'जाति न पूछो साधु की. ' तुकोबांनी या वचनांना मराठी पोशाख देत म्हटले 'विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. ' या वचनांच्या मागे तुकोबांची कळकळ होती. ते म्हणाले होते 'उपदेसी तुका मेघवृष्टिने आईका, 'बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणऊनि. ' तुकोबांनी रोकडा व्यवहार I शिकवला. स्वर्गाचे ना आकर्षण दाखवले ना भय दाखवले. त्यांनी हा ईहलोक भावसमृद्ध केला. ते म्हणाले होते 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी, न लगे हा लौकिक सांडावा वेव्हार घ्यावे वनांतर भस्म दंड.' ते अंधश्रद्धायुक्त समाज जीवनाला सश्रद्ध जीवनाचा आधार देत राहिले. अगदी सोप्या उदाहरणांनी समजावून सांगितले की बाबांनो 'मंत्राकारणे पुत्र होती तरी का करणे लागे पती. ' समाज जीवन ढवळून निघाले. त्यांच्या मते धर्मपालनाचा अर्थ होता पाखंड खंडन. धर्मनीतीचा संकेत होता अखंड सावधान असणे. ते म्हणतात 'तुका सावधान हेचि देवाचे भजन' या विचार मांडणीत कुठेही भोंगळपणा नाही, भोळसटपणा नाही. या उलट अगदी स्पष्टपणे 'नाठाळाचे माथा हाणू काठी' अशी प्रतिज्ञा आहे आणि 'ऐशा नरा द्याव्या पैजारा मोजूनि' असा सल्ला आहे. ते शिवपिंडीवरच्या विंचवाला वहाणेने ठेचावे असे सांगत होते.

    तुकोबांनी माणूसपणाची व्याख्या आपल्या अभंगांमधून मांडली. 'जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले,' 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. 'साधूची व्याख्या करताना तुकोबा म्हणाले 'अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याचे गळा माळ असो नसो.' त्यांना अपेक्षित होता वैष्णव धर्म. सारे जग विष्णुमय व्हावे अशी आशा त्यांच्या मनाला लागून राहिली होती. त्यांनी समाज जीवनाचे ऊर्धीकरण मांडले. हा नूतन युगधर्माचा संदेश होता. सामान्य माणूस व देव यांच्यातील दलालीचा हक्क सांगणारा शोधक पुरोहित वर्ग तुकोबांनी नाकारला, थांबवला आणि संपवला. त्यांनी कमालीचे तीक्ष्ण प्रश्न उपस्थित केले. 'कोणे केले बाळा दुधाची उत्पत्ती ऊष्ण काळमासी फुटे तरुवर कोण तयासी जीवन देई.' हे प्रश्न पडले की 'कोण सांगावयासी गेले होते देशोदेश नेले वाऱ्याहाती माप समर्थ तो माझा बाप, ' 'मुंगिचिया घरी कोण धाडी मूळ.

    तुकोबा म्हणाले होते 'आम्ही जातो आमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा । तुमची आमची भेटी येथूनिया जन्मतुटी. ' या जन्मतुटीबाबत विद्वानांचे मन आणि मत शंकांनी भरलेले आहे. 'तुकोबांचे सदेह वैकुंठगमन की खून' हा श्री. सुदाम सावरकर यांचा ग्रंथ यावर फार भेदक प्रकाश टाकतो. मीरा मुरलीधराच्या मूर्तीत सामावली हे पटत नाही. ती त्या मंदिराच्या मागे लहरणाऱ्या सागरात विलीन झाली असे अधिक तीव्रतेने वाटते. हे असे उदाहरण यापूर्वी नव्हते आणि नंतरही दिसले नाही. तुकोबा गेले निघून हे तर वाईट होतेच पण सर्वांत वाईट हे होते की त्यांची कविता बेपत्ता झाली. इंद्रायणीच्या डोहात बुडवूनही तिला बुडवता न आल्याचा शोक करणाऱ्यांनी हे पापकृत्य केले. एक शतक लोटले. थोर तुकारामभक्त वारकरी त्रिंबक कासार ४० वर्षे हिंडले आणि त्यांनी विखुरलेली मौखिक कविता गोळा केली. १९६९ साली तुकाराम भक्त इंग्रज अधिकारी सर अलेक्झांडर ग्रांट याने पुढाकार घेतला आणि ४५०० अभंगांची गाथा सिद्ध केली. ही गाथा पूर्णपणे निर्दोष नसली तरी अधिकृत आहे हे मात्र खरे. एकटा माणूस समाजपुरुष बनतो आणि तुका आकाशाएवढा बनतो हा एक आध्यात्मिक प्रवास आहे.

    - प्राचार्य डॉ. विश्वास पाटील

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

  • भारतीय सेनादले: आवाहन आणि आव्हान

    १९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे 'ठाणे भूषण' आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. 'संडे मिलिटरी स्कूल' चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी भारताच्या वेगवेगळ्या दलात कार्यरत आहेत.

    भारतीय सेनादलात दरवर्षी हजारो तरुणांना शिपाई ते अधिकारीपदासाठी सुवर्णसंधी उपलब्ध होत असते. परंतु चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होणारी मुले सैन्यदलाकडे पाठ फिरवताना दिसतात त्याचे मुख्य कारण काही गैरसमजुती, सैन्यदलाविषयी अपुरी माहिती आणि मृत्यूचे भय, तरुण पिढीला मार्गदर्शनपर माहिती मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.

    सैन्यदलात विविध स्तरांवरील प्रवेश

    प्राथमिक स्तर :

    इयत्ता सहावीत असलेल्या विद्यार्थ्यांना सातारा सैनिक स्कूल, बेळगाव मिलिटरी स्कूल, बंगलोर मिलिटरी स्कूल इथे प्रवेश दिला जातो. त्यात मागासवर्गीयांसाठी १० टक्के आरक्षण असते. ऑक्टो. च्या सुमारास ह्या शाळांशी संपर्क साधून अर्ज करावा लागतो. लेखी परीक्षेत पास ल्यानंतर मुलाखत होते. इथे बारावीपर्यंत शिक्षण दिले जाते. नंतर बरीचशी मुले नॅशनल डिफेन्स अकॅडमीसाठी निवडली जातात. वायुदल, नौदल आणि सेनादल ह्यांत ऑफिसर्स म्हणून दाखल होतात.

    माध्यमिक स्तर :

    सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूट, सेक्टर एन १२, सिडको, मौलाना आझाद कॉलेजच्या मागे, औरंगाबाद ह्या पत्त्यावर दहावीत असतानाच अर्ज करायचा असतो. शालान्त परीक्षा संपल्यावर चाचणी परीक्षा होते. दुसऱ्या दिवशी उत्तीर्ण झालेल्या मुलांची मुलाखतीची चाचणी घेऊन त्यातून उत्तीर्ण झालेल्या मुलांना औरंगाबाद इथे ११ वी, १२वी विज्ञान शाखेत प्रवेश दिला जातो. नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या पूर्वपरीक्षेसाठी त्यांना प्रशिक्षित केले जाते. पालकांनी पाच वर्षांच्या प्रश्नपत्रिका मागवून मुलांकडून परीक्षेचा सराव केला तर उत्तम.

    शालान्त परीक्षेनंतर :

    तिन्ही दलांत तसेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, सेंट्रल रिझर्व्ह फोर्स, कोस्ट गार्ड, सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स वगैरे ठिकाणी शिपाईपदावर जाता येते. दहावीत कमीत कमी ४० टक्के मार्क्स असावे लागतात. मागासवर्गीयांसाठी ९वी पास पात्रता चालते. उंची ५ फूट ७ इंच, छाती ३२ इंच व फुगवून ३४ इंच, वजन ५० किलो आणि वय १६ ते २० वर्षे ९ महिने. टेक्निकल पदासाठी १२वी सायन्स, ५० टक्के मार्क्स आवश्यक. क्लार्कसाठी १२ वी पास, टंकलेखन, बेसिक कम्प्युटरचे ज्ञान आवश्यक. नौदलासाठी उंची कमी चालते. वयोमर्यादा १९ वर्षे, दहावीत ६० टक्के मार्क्स आवश्यक बी.एस.एफ., सी.आय.एस.एफ., कोस्ट गार्ड त्याचप्रमाणे सी.आर.पी.एफ. साठी उंची जास्त लागते.

    ह्या सर्व जागांसाठीच्या सूचना 'एम्प्लॉयमेंट न्यूज' किंवा 'रोजगार समाचार' ह्या भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्ध होतात.

    बारावीत असताना/उत्तीर्ण झाल्यानंतर:

    बारावीत प्रवेश घेतल्याबरोबर एन.डी.ए. चा फॉर्म भरावा. वयाची अट १८ वर्षे ६ महिने. बारावीत ७० टक्के गुणांनी उत्तीर्ण झालेल्यांना फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथमेटिक्स घेऊन उत्तीर्ण झालेल्यांना नेव्हल इंजिनीअरिंग खडकी, पुणे इथे प्रवेशासाठी अर्ज करावा लागतो. निवडक विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. रुपयादेखील खर्च न करता ते इंजिनीअरची पदवी प्राप्त करू शकतात. पुढे इंडियन मिलिटरी अकॅडमी किंवा नेवल अकॅडमीमधून प्रशिक्षण घेऊन ते ऑफिसर्स होतात.

    इंजिनीअरिंगमधील डिप्लोमाधारकांना भारतीय नौदलात आर्टिफिशर ह्या पदावर ज्युनि. कमिशन्ड ऑफिसर म्हणून जाता येते. बायोलॉजी हा विषय बारावीत घेतलेला असेल तर आणि वैद्यकीय क्षेत्रात जायचे असेल तर ऑक्टो. मध्ये आर्मड् फोर्सेस मेडिकल कॉलेज, पुणे येथे अर्ज करावा लागतो. मुलीसुद्धा अर्ज करू शकतात. अखिल भारतीय स्तरावर परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेसाठी आय.सी.एस.सी. व सी.बी.एस.च्या दहावीच्या अभ्यासक्रमाचा सराव आवश्यक असतो. पुढे एकही पैसा खर्च न करता साडेचार वर्षे प्रशिक्षण मिळते. त्यानंतर पुणे विश्वविद्यालयातून एम.बी.बी.एस. ही पदवी मिळते. ३० वर्षांवरील तरुणींना वरील कॉलेजमध्ये नर्सिंग ऑफिसर्सपदासाठी जाता येते.

    पदवीधरांसाठी :

    दरवर्षी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन घेतली जाते. त्यात परमनंट आणि शॉर्ट सर्व्हिस कमिशनसाठी अर्ज करता येतो. इंडियन मिलिटरी अकॅडमी व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी इथे यशस्वी उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. पुढे त्यांची नेमणूक लेफ्टनंट ह्या हुद्यावर होते.

    इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी :

    इंजिनीअरिंग पदवीधरांसाठी आणि पदव्युत्तरांसाठी वयोमर्यादा २० ते २७ वर्षे. एम.ए.एम.एड., एम.एस.सी. उत्तीर्णांसाठी सैन्यदलात प्राध्यापक तसेच ऑर्डनन्स विभागात शेतकी पदवीधरांना मिलिटरी फार्ममध्ये व पशुविज्ञान शाखेतील पदवीधरांना रिमाऊंड व वेटर्नरी कोअरमध्ये जाता येते. एल.एल.बी. पदवीधारकांना जज्ज, अॅडव्होकेट जनरल बँचमध्ये ऑफिसर होता येते. हवाईदलात अॅडमिनिस्ट्रेटिव्ह बँचमध्ये फायटर कंट्रोलर, एअर ट्राफिक कंट्रोलर, मेट्रोलॉजिकल ब्रँचमध्ये प्रवेश घेता येतो. एअर ट्राफिक कंट्रोलर व फायटर कंट्रोलरसाठी प्रथम वर्गाची पदव्युत्तर पदवी, अकाउंट बँचसाठी बी.कॉम. प्रथम श्रेणी किंवा एम.कॉम. व एव्हिएशन व मेट्रोलॉजी बँचसाठी एम.एस.सी.फिजिक्स अप्लाईड मॅथमेटिक्स व मेट्रोलॉजी विषयात पदव्युत्तर पदवी आवश्यक असते. वयोमर्यादा २५ वर्षांपर्यंत.

    तरुणींसाठी :

    दरवर्षी प्रत्येकी १०० तरुणींना सेनादल, नौदल, वायुदल इथे ऑफिसर्स होण्याची संधी असते. वय २० ते २५ वर्षे, उंची १५२ सेंमी., वजन ४२ किलो अपेक्षित असते आणि पायाची लांबी ९९ सें.मी.पेक्षा अधिक असावी लागते. वैमानिक होण्यासाठी पदवीपरीक्षा पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणे आवश्यक असते आणि वय २३ वर्षाच्या आत असावे लागते. हवाई व नौदलात जाण्यासाठी फिजिक्स आणि मॅथमेटिक्स घेऊन बी.एस.सी. पदवीधर असणे किंवा बी.ई. होणे आवश्यक असते.

    लेखी परीक्षा, सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डची मुलाखत ह्यातून तरुणींनाही जावे लागते. उत्तीर्ण तरुणींना एका वर्षाचे प्रशिक्षण वेगवेगळ्या अकॅडमींमध्ये दिले जाते. त्यांना दहा वर्षांसाठी शॉर्ट सर्व्हिस कमिशन दिले जाते. ते वाढवून चौदा वर्षे करता येते. त्यानंतर एका वर्षासाठी सिम्बॉयसिस, पुणे येथून मॅनेजमेंटचा अभ्यासक्रम सरकारी खर्चाने करता येतो. निवृत्त झाल्यानंतरदेखील चांगली नोकरी मिळते. प्रशिक्षणाच्या काळात विवाह मात्र करता येत नाही. ऑफिसर झाल्यावर करता येतो. एम.ए., एम.एस.सी., एम.कॉम., एम.सी.ए., एल.एल.बी. पास झालेल्या तरुणींचे वय २७ वर्षांपर्यंत चालते. सर्व तरुणींनी शारीरिकदृष्ट्या कणखर असावे, तसेच काही तरी खेळ खेळून शारीरिक क्षमता वाढती ठेवावी. आपले सामान्य ज्ञानही वाढवावे.

    सैन्यदलातील फायदे :

    सैन्यदलातील वेतन कदाचित आकर्षक वाटणार नाही पण त्यासोबत मिळणारे जे इतर फायदे आहेत, ते दामदुपटीने आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. उत्तम पौष्टिक आहार, राहायला मोफत घर, कपडे मोफत, वैद्यकीय सेवा मोफत, बायपास सर्जरी/किडनी शस्त्रक्रिया मोफत, प्रवास मोफत. इंडियन एअर लाईन्सच्या प्रवासात निम्मी सवलत. वर्षातून दोन महिने वार्षिक सुट्टी. एक महिना आपत्कालीन सुट्टी. प्रशिक्षण घेतानाही इतर काहीच खर्च नसल्याने जवान भरपूर पैसे घरी पैसे पाठवू शकतो. बटालियन बॉर्डरवर जाते त्यावेळी कुटुंबाला कुठे ठेवावे हा प्रश्न त्याला पडत नाही. मुंबई-पुणे इथे सर्व सोयींनी युक्त आणि सुरक्षित अशी फॅमिली क्वार्टर्स असतात. वीरगती मिळालेल्या व्यक्तीची विम्याची रक्कम जवानाला दहा लाख तर ऑफिसरला पंधरा लाख, इतर डेथ कम ग्रॅट्युइटि वगैरे धरून मृत जवानाच्या कुटुंबीयांना १० ते १२ लाख रु. व ऑफिसरच्या कुटुंबाला १५ ते २० लाख रु. मिळतात शिवाय त्याचे पेन्शन चालू होते. हे आकडे (२००८ सालचे आहेत, हे कृपया लक्षात घ्यावे.) मृत जवानाच्या पत्नीने आपल्या लहान मुलाला सांभाळण्यास असमर्थता व्यक्त केली तर त्या मुलाला रेजिमेंटच्या वसतिगृहात प्रवेश देऊन त्याची सर्व जबाबदारी रेजिमेंट घेते. पुढे त्याला सैन्यातच ऑफिसर, डॉक्टर, इंजिनीअर होण्यासाठी तसे शिक्षण रेजिमेंटतर्फे दिले जाते.

    मित्रांनो, भारत सरकारद्वारे प्रसिद्ध होणारे 'एम्प्लॉयमेंट न्यूज', 'रोजगार समाचार' दर शनिवारी विकत घ्या. आपल्यामध्ये राष्ट्राभिमान बाळगा. दुर्घटना, बॉम्बस्फोट घडल्यास पाकिस्तानी झेंडे किंवा त्यांच्या नेत्यांचे पुतळे जाळत बसू नका. देशात 'बंद' पाडून कोट्यवधी रुपयांचे नुकसान करू नका. शत्रूच्या हजारो सैनिकांना ठार मारण्याची क्षमता ठेवा. अभिमानाने म्हणा, 'देशासाठी घेईन प्राण !'

    लक्षात ठेवा, सैन्यात आपण शत्रूला मारायला जातो. मरायला नाही! सैन्यात 'हर गोली पर लिखा है खानेवाले का नाम' हे ब्रीद वाक्य. असते. ज्या गोळीवर तुमचे नाव लिहिलेले असेल तीच तुम्हाला लागेल. इथे जितकी माणसे रोज अपघाताने वगैरे मरतात त्यापेक्षा किती तरी कमी जवान लढाईक्षेत्रात शहीद होतात. मरण कधीही येणारच. इथे काय किंवा सीमेवर काय! आपल्या मृतदेहावर असेल स्वस्तातले पांढरे कापड. पण सैन्यात शहीद होणाऱ्या व्यक्तीच्या मृतदेहावर असतो राष्ट्राचा तिरंगी झेंडा ! अंत्यसंस्काराच्या वेळेस आकाशात रायफल्स किंवा तोफा खणखणतात. म्हणजे यमालासुद्धा वाटते की, कोणी तरी व्हीआयपी स्वर्गात येतो आहे. तोही त्याच्या स्वागतासाठी तयारी करतो.

    सर्वधर्मसमभाव ठेवा. संघटित व्हा. देशाचे रक्षण करण्यासाठी मोठ्या संख्येने सैन्यात दाखल व्हा. आपले आणि देशाचे भवितव्य उज्ज्वल करा.

    संदर्भ: ‘लष्कर’च्या भाकऱ्या चवदार-मेजर सुभाष गावंड, व्यास क्रिएशन, डी ४, सामंत ब्लॉक्स, घंटाळी पथ, नौपाडा, ठाणे (प), ४००६०२, तिसरी आवृत्ती २०१७.

    -मेजर सुभाष गावंड