वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
पृथ्वीतलावर तीन रत्ने आहेत जल, अन्न आणि सुभाषित. परंतू मुर्ख माणसे दगडांच्या तुकड्यांना रत्नांची संज्ञा देतात. असे प्राचीन ग्रंथामध्ये, सुभाषितकारांनी यथायोग्य वर्णन केले आहे. रत्नतुल्य किंबहुना त्यापेक्षा मौल्यवान असलेले पाणी हे सजीवांचे प्राण होय.
सध्या राज्यातील शेतकऱ्यांवर 'येलो जर्नालिझम'च्या माध्यमातून डागण्या ठेवल्या जात आहेत, शेतीचा अभ्यास न करता काहीजण, वड्याचं तेल वांग्याला, वांग्याचं वड्याला लावून लिहितायत, शेतकरी आणि शेती पुढील हे नवं संकट म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ज्या वृत्तपत्रांनी आणीबाणीच्या काळातही कुणासमोर झुकण्याची भूमिका घेतलेली नाही, अशा वृत्तपत्रांच्या माध्यमातून हे लिहलं जातंय. हा हट्टहास का केला जात आहे? हा प्रश्न उपस्थित होतोय.
एखादी परिकथा लिहल्यासारखं, परिस्थितीचं वास्तव समजून न घेता शेतकऱ्यांच्या विरोधात लिहिलं जातंय, यापूर्वी जे लिहिलं... त्याचा उघड विरोध सोशल मीडियावर दिसून आला, मात्र यावर माफी मागण्याचं धाडस दाखवण्यात आलेलं नाही, मग दिलगिरी सारखा गोड-गोड शब्द वापरण्याचंही धाडस आता उरलेलं दिसत नाही.
या उलट आता आपणच लिहलेलं कसं बरोबर होतं, हे घोडं दामटवण्यासाठी आता शेतकरी कसा 'गाडीवान' आहे, तो रोख पैशांनी मर्सिडीज बेन्झ खरेदी करतोय, असा शब्दांचा खेळ करून लिहलं जातंय, यात कुणालाही वाटेल शेतकरी धनवान आहे, त्याला कर्जाची गरजचं नाहीय. सबघोडे बाराटके असं सूत्र शेतकऱ्यांना लावून चालणार नाही.
पुणे जिल्ह्यातील तसेच गुडगावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी एसईझेडमध्ये गेल्या, त्यांना त्याबदल्यात मिळालेल्या पैशातून त्यांनी महागड्या गाड्या खरेदी केल्या. मात्र त्यानंतर त्यातील बहुतेक देशोधडीला लागले, यावर लिहण्याचं धाडस काहींनी तेव्हा का दाखवलं नाही.
जो माणूस फक्त शेतीवर जगतोय, तो शेतकरी, ज्याची आवक फक्त शेतीतून असेल, आणि त्याने रोख पैशातून मर्सिडीज बेन्झ, पजेरो सारख्या ५०-५० लाखाच्या गाड्या खरेदी केल्या असतील, अशा व्यक्तींचं उदाहरण हे नाव, गावासह छापावं, मी देखिल त्यांच्या भेटीला जाईन आणि त्याची शेतीची यशोगाधा जाणून घेईन, तो करतोय तशीच शेती करण्याचा प्रयत्न करेन, मलाही आवडेल माझ्या बापाला जुनाट सायकलीवरून, सुसज्ज मर्सिडीज गाडीत फिरवायला.
मात्र ज्यांचा उद्योग-व्यवसाय असेल, आणि शेती नावाला असेल, तरीही तो स्वत:ला शेतकरी म्हणवून घेत असेल, आणि तुम्ही त्याच्याकडे शेतकरी या नजरेनं पाहत असाल, तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, त्यावरून ते माप सर्वच शेतकऱ्यांना लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही.
खरं तर ज्या न्यूज पेपरमध्ये शेतकरी विरोधात सूर आवळले जात आहेत, अशा न्यूज पेपरचा कागद एखाद्या जत्रेत, किंवा बाजारात भजी बांधून खातांना शेतकऱ्याच्या हाती लागेल, आणि तो हे लिहलेलं वाचेल याची शाश्वती नाही, कारण या न्यूज पेपरचा अवाका त्या शेतकऱ्यांपर्यंत नाही.
मात्र अशा प्रकारच्या लिखाणावरून शेतीविषयी धोरणं ठरवतांना, एखाद्या सरकारचा संभ्रम होऊ शकतो हे नक्की, कारण सर्वच राज्यकर्त्यांनी अशा न्यूज पेपर्सची मतं महत्वाची मानली आहेत, कदाचित यापूर्वी त्या दर्जाचा विचार करणारी, लिहिणारी मंडळी अशा न्यूज पेपर्सना लाभली असावी.
मध्यंतरी बळीराजाची बोगस बोंब या अग्रलेखाचा प्रखर विरोध झाला, कारण शेतकऱ्याला एवढ्या जखमा आहेत, त्यात मेलेल्याला वरून मार दिल्यासारखा हा प्रकार आहे, त्यावर तो बळीराजा काय बोलणार, कदाचित यावर मानव अधिकार आयोगाकडे गाऱ्हाणी मांडल्यावर आयोग तरी बोलू शकतो.
एक खोटं लपवण्यासाठी हजार वेळेस खोटं बोलावं लागतं, त्याचा प्रत्यय इथे येतोय, आणि एकाने बोललेलं खोटं अनेकांच्या तोंडून नकळत वदवून सत्य ठरवण्याचा प्रकार सध्या सुरू आहे. हिंदीत एक म्हण आहे, 'अधजल घगरी छलकत जाएं', घागरीत पाणी नसेल, तर ते पाणी सारखं उचंबळत असतं, सध्या शेतीविषयी ग्रासरूटला जाऊन शहानिशा न करता, त्यावर वाट्टेल ते लिहण्याचा प्रकार यासारखाच असावा.
शेतकरी नेते शरद जोशी यांना देखिल ग्रास रूटची खूप मोठी जाण होती, याची आठवण यावरून पुन्हा-पुन्हा होतेय. कारण शरद जोशी यांनी बागायतदार आणि जिरायती असा भेद निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच केला नाही, त्यांनी नेहमीच अशा घटकांना पुढारी म्हणून संबोधलं आहे. पुढारी हे नेहमीच बोटावर मोजण्यासारखे असतात, पुढारी आणि शेतकरी यांचा उल्लेख वेगवेगळा झाला, तर यापूर्वी झालेला गोंधळ थांबू शकतो, मात्र येलो जर्नालिझम करणारी मंडळी शेतकऱ्यांना उठसूठ डागण्या ठेवतेय.
सध्या टेलिव्हिजनवर वेगवेगळ्या चॅनेलच्या माध्यमातून ज्या मालिका दाखविल्या जातात त्या पाहून खरोखरंच प्रेक्षकांनी त्यातून काही बोध घ्यावां अशा असतात का ? हा प्रश्नांच उत्तर काय द्याव ?
हा प्रश्न या मालिका पाहणार्याअ सर्वांनाच व्यतीत करतो कारण आज बहूसंख्य प्रेक्षक फक्त टाईमपास म्ह्णून या मालिका पाहत असतात. पूर्वीचे प्रेक्षक जेवढ्या आवडीने उत्सूकतेने रामायण महाभारत पाहत होते तितक्या उत्सूकतेने आजचे प्रेक्षक पाहतात का ? पूर्वीच्या त्या मालिकांतील कोणत पात्र कोणी साकारलयं हे शेंबडया पोरांना ही माहित असायचं पण ! आज मालिकात काम करणार्यार काही मोजक्याच कलाकारांची नावे लोकांना माहित असतात. आज लोक कोणत्याही मालिकेत फार गुंतत नाहीत. मी तर एकाच वेळी तीन-तीन मालिकांचा एक-एक तुकडा पाहतो आणि तरीही मला त्या तीनही मालिका पाहिल्याचं मानसिक समाधान मिळतं. एखादी मालिका एक महिना जरी पाहिली नाही तरी आपण फार काही गमावलं असं हल्ली कोणा प्रेक्षकाला बहूदा वाटत नसावं. कोणत्या मालिकेत कोणत कथानक किती खेचावं याला काही मर्यादाच राहिलेली नाही.
एखादा सरडा ही जितके रंग बदलत नाहीत इतके रंग या मालिकेतील पात्र बदलत असतात. मालिका म्हटली की ती श्रीमंतच असायला हवी असा या मालिकांची निर्मिती करणार्यांबनी जणू ठरवूनच टाकलेलं दिसतयं. या मालिकात श्रीमंत लोकांच्या गरीब समस्या दाखविल्या जातात आणि मध्यामवर्गीय माणूस चणे खात त्या पाहात राहतो. या मालिकांतील पात्र क्षणात गरीब आणि क्षणात श्रीमंत होताना दिसतात. प्रत्येक मालिकेत खास करून हिंदीत मालिकेच्या सुरूवातीला सर्व श्रीमंत दाखवायचे सारं इतक भव्यदिव्य दाखवायची की ते पाहून गरीबांचे डोळेच दिपतील, त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले की मग त्या श्रीमंताना गरीब करायचं मग गरीबांच्या भावनानां हात घालून त्यांच्या मनाचं समाधान झालं की त्यांना जादूची कांडी फिरवून पुन्हा श्रीमंत करायचं आणि गरीबाला ही श्रीमंत होता येत असं स्वप्न गरीबांना दाखवायचं. गरीब ते स्वप्न पाहात असतानाच अचानक ती मालिका बंद करायची आणि गरीबांच्या स्वप्नावर पोतेरं फिरवायचं.
टेलिव्हिजनवर आता एक नवीनचं प्रकार सुरू झालेला आहे पुरूष कलाकारांनी बायकांच्या वेशात वावरण्याचा एक विनोदाचा भाग म्ह्णून हे होत होत तो पर्यत ठिक होतं पण आता ते फारचं किळ्सवाण वाटू लागलेलं आहे. एखाद्या भुमिकेची गरज म्ह्णून पुरूषांनी स्त्री वेशात वावरणं ठिक आहे पण हल्ली बायकांना पुरूषांना स्त्री वेशात पाहायला आवडू लागलंय की काय अशी भिती हळूच मनात डोकावू लागते की काहीतरी नवीन करायचं म्ह्णून पुरूष कलाकारांनी स्त्री वेशात वावरायचं अशी काही नवीन प्रथा सुरू झाली असेल तर ते फारचं विचित्र म्ह्णावं लागेल. कॉलेजात जाणारे तरूण फॅशन म्ह्णून साडी नेसून कॉलेजात नाही गेले म्ह्णजे मिळविली असं म्ह्णण्याची वेळ आलेली आहे.
मी मालिकेशी संबंधीत माझ्या एका मित्राला म्ह्णालो ही तुमच्या मालिकेच्या प्रत्येक भागातील अर्धा-अधिक वेळ स्वयंपाक घरात आणि रॅम्पवॉक करण्यातच जातो त्यावर तो म्ह्णाला मलाही याचा कंटाळा आलायं पण काय करणार ? आता बोला !
समाजात जे घटस्फोटाचे आणि विवाह बाहय प्रेमप्रकरणांचे प्रमाण वाढत आहे त्याला हया मालिका तर जबाबदार नाहीत ना ? असा प्रश्न ही मला कधी - कधी सतावू लागतो. माझ्या मित्रांना मी मालिका पाहतो हे ऐकल्यावर फारचं आश्चर्य वाटतं ते वाटण्याचं कारण शोधलं असतात आपल्या देशातील फार कमी पुरूष या मालिका पाहतात. पण मला वाटत पुरूषांनी या मालिका नाक्कीच पाहायला हव्यात म्ह्णजे त्यांना हया मालिका आपल्या घरातील बायकांच्या मेंदूत नक्की काय घुसडतं आहेत हे अगदी सहज लक्षात येईल.
मालिकांतीला पात्रे जे पोषाख परिधान करतात तेच पोषाख परिधान करण्याची हुक्की मध्यमवर्गीय स्त्रियांच्या मनात निर्माण होऊ लागते. मालिकेत सती सावित्री दाखविलेल्या नायिकेला जेंव्हा एखादा पुरूष एका बारमध्ये दारू पिताना पाहतो तेंव्हा तो ती मालिका डोळे फाडून पाह्णे थांबवतो. मालिकांतील पात्रांमध्ये आपल्या कडील प्रेक्षक गुंतून पडतात. मालिकांतील कथानकासोबत ते स्वतः ही वाहत जात राहतात.
एखादया माणसाच्या आयुष्यात किती संकट यावी आणि त्यातून त्याने सहीसलामत बाहेर निघावं किती वेळा यालाही काही मर्यादा राहिलेली नाही. या मालिकातील कोणत्या पात्राची बुध्दी कधी भ्रष्ट होईल अथवा त्याची स्मृती नाहिशी होईल हे तर साक्षात परमेश्वरालाही सांगता येणार नाही मला तर वाटत ती मालिका लिहणार्याहलाही ते नक्की माहित नसावं. माझ्या आतापर्यतच्या आयुष्यात असा स्मृती नाहिशी झालेला मी एक ही माणूस पाहिलेला नाही म्ह्णून मी माझ्या एका डॉक्टर मित्राला उत्सूकतेतून विचारलं हे जे मालिकेतील पात्रांची स्मृती जाताना दाखवितात त्यंना काही गोष्टी कशा काय आठवत असतात ? तेंव्हा तो मला म्ह्णाला आपल्या मेंदूत वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या स्मृती साठविलेल्या असतात त्यामुळे मेंदुचा ज्या भागाला इजा पोहचलली असते फक्त त्या भागातील जमा स्मृतीच नाहीशी होते. मालिकेतील कथानक पुढे जाव म्ह्णून एखाद्या मालिकेतील एखाद्या पात्राची स्मृती जाणे मान्य केले जाऊ शकते पण त्यानंतर आणखी चार-पाच मालाकांतील पात्रांची स्मृती जात असेल तर हा कहरच म्ह्णायला नको का ? माझं तर असं ही निरीक्षण आहे की स्मृती जाण्या सारखे प्रकार मालिकात एखाद्या पात्राच्या मृत्यूच्या बाबतीत ही घडताना दिसतात.
सासू सुनेच नातं हा तर या मालिकांचा जणू प्राणच आहे असा समज करून घ्यायला या मालिकांचे निर्माते ही नाही म्ह्णणार नाहीत. सध्याच्या सासू – सूना यामधील नातं बदलत चाललयं अर्थात सूनेला आता सासूचा धाकच उरलेला नाही याला या मालिकाच जबाबदार आहेत. काही पालक स्वतःहून आपल्या मुलाला लग्न झाल्यावर स्वतत्र राहण्याचा सल्ला देतात. एका मालिकेतील लेखक एक पुस्तक प्रकाशित होताच सिलेब्रेटी होतो आणि दुसरीकडे कविता लिहणार्याा नायिकेला एक कविता लिहल्याबद्द्ल फक्त शंभर रूपयाचे मानधन मिळते आणि त्याचा आनंद तिला करोडो रूपये मिळाल्यासारखा व्यक्त करताना दाखविला आहे.
रोजच्या जीवनात घडणार्या घटना हल्ली मालिकांत डोकावताना दिसतात पण हल्ली वडपोर्णिमेलाही मालिकांत मानाचे स्थान मिळू लागले आहे त्यात कहर म्ह्णजे हे असे सण पुरूषांनी ही साजरे करावेत हा अट्टहास खरोखरंच विचार करायला भाग पाडणारा आहे. आता समाजात कायं घडावं, कोणते सण कसे साजरे व्हावेत, कोणत्या परंपरा बुरसटलेल्या आहेत आणि कोणत्या समाज हिताच्या हे सारे आता हया मालिका ठरविणार का ? सध्याच्या माणसाचा खाजगी आयुष्यात मर्यादेपेक्षा अधिक डोकावताना दिसतात. काही पात्रांच्या प्रत्यक्ष आयुष्या घडणार्या् घडामोडींचा संबंधही या मालिकातील कथानकाशी जोडला जातो.
सध्याच्या मालिकात होणारे अंगप्रदर्शन मालिकेची गरज म्ह्णून कमी आणि टी.आर.पी वाढविण्यासाठी अधिक केले जाते हे सत्य आता कोणीही नाकारणार नाही, आपल्या देशातील बहूसंख्य पुरूष ते पाहण्यासाठीच या मालिका पाहत असतात असं बरेच पुरूष खाजगित मान्य करतात. घटस्फोटानंतर आपल्या आयुष्यात लगेच दुसरी व्यक्ती येऊ शकते आणि आपले जीवन पुन्हा आनंदाने बहरू शकते हा फाजील आत्मविश्वास या मालिका आजच्या पिढीच्या मनात निर्माण करतात आणि काही मालिकात घटस्फोटा घेण्यासाठी दाखविली जाणारी कारणे फारंच शुल्लक असतात. इतकी शुल्लक की ती वास्तवापासून प्रचंड दूरची असतात.
देवांवर असणारी मालिका पाहताना त्या मालिकेतून लोकांच्या मनात त्या देवाबद्द्ल श्रध्दा निर्माण व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर नसतोच उलट त्या पाहणार्यााची डोळ्याची भुक वाढविण्याचे कार्य या मालिका अधिक करताना दिसतात. काही मालिका आहेत ज्या खरोखरच मनोरंजन करतात पण त्यातून बोध घ्यावा असं त्याच्यांत काहीही नसतं.
लोक सध्या मालिकेंच्या प्रेमात पडून आंधळे झालेले आहेत त्यामुळे त्या डोळसपणे पाहण्याची त्यांची तयारीच नसते.
लेखक – निलेश बामणे
गोरेगांव (पूर्व) मुंबई-65
मो. 8652065375 / 9029338268
नुकताच व्हॉटसऍपवरुन एक लेख वाचायला मिळाला. आपल्या डोळ्यावरील झापडं उघडणारा हा लेख कोणी लिहिलाय ते माहित नाही. मात्र ज्याने कोणी तो लिहिला असेल त्याला तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा असं नक्कीच वाटत असणार. त्यामुळेच आमचाही खारीचा वाटा म्हणून हा लेख मराठीसृष्टीच्या वाचकांसाठी शेअर करतोय.
एक ऑगस्टला आम्ही तुमचे पुण्यस्मरण केले टिळक महाराज!
ती शेंगांच्या टरफलांची गोष्ट पुन्हा आठवली.
सध्या लोक काहीही खातात आणि शेंगा खाल्ल्यावर टरफले इथे तिथे नाही टाकत, तर ती ही खाउनच टाकतात. शेंगा खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे.
संत शब्द तुम्ही तीन प्रकारे लिहिलात.
आता संत शब्द कुठल्याच प्रकारे लिहावा लागत नाही फारसा.
संत व्हायचा प्रयत्न तर कुणीच करत नाही, कुणालाच तेवढी उसंत नसते.
स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक, स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास "उपभोग"ता येतो.
मंडालेहून निघालेला स्वातंत्र्याचा "रोड" आता "आर्थर रोड" पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्याना मिळणार्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या देशप्रेमी, कायदापालक सज्जनांनाही वाटू लागलाय.
तुम्ही लिहिलंत गीतारहस्य.
गीतेतली बरीच रहस्ये आता नव्याने उलगडू लागली आहेत. कौरवपांडव उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत, तर युती करुन सत्ता भोगतात.
"आप्तस्वकीयांशी कसा लढू" हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला.
बाप, भाऊ, मामा, काका, गुरू - कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन.
वस्त्रहरण तर नित्याचंच झालं आहे,
पण कृष्णानं पाठवलेली वस्त्रं कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत.
टिळक, आता "केसरी" शब्दाचा अर्थही कळत नाही कुणाला.
डरकाळ्या फोडणार्या कुठल्याच सिंहाचा आता भरवसा उरला नाही.
सांगता येत नाही कधी कुणाच्या ताटाखालचे मांजर बनून जातील.
चिंतन, मनन आणि हवापालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन रहायचात ना टिळक?
तिथली हवासुद्धा आता खूप पालटली आहे.
गडाच्या पायथ्याशी आता रेव्ह पार्ट्या चालतात.
सिंह तर तेव्हाच गेला, गड राखणंही आता कठीण झालं आहे.
तुम्ही सार्वजनिक केलेला गणपतीउत्सव खूप लोकप्रिय होतो आहे. दिवसेदिवस प्रत्येक गल्लीचे, बोळाचे स्वतंत्र गणपती झालेत.
आता गणपती बुडवायला समुद्रही अपुरे पडणार बहुतेक.
"सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?" असा प्रश्न तुम्ही केला होतात
आता सरकारचे डोकेच काय, सरकारच ठिकाणावर नसते.
सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना.
आठवडी बाजारासारखा घोडेबाजार भरलेला असतो तेजीत.
इंग्रजांना हाकलल्यानंतर आम्ही मुलांना आता इंग्रजी शाळेत घातले आहे.
त्यांना विलायतेला धाडायची खूप धडपड चालली आहे आमची.
एकदा ती विलायतेला गेली की भारतदेश, मराठी भाषा, मराठी आईबाप, सारंच परकं होईल त्यांना.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याची तशी त्यांना फारशी माहितीही नाही,
मग कुठले टिळक, कुठला एक ऑगस्ट आणि कुठलं काय?
एक ऑगस्टला तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटचीच पिढी बहुतेक टिळक. पुन्हा एकदा तुम्हाला विनम्र श्रद्धांजली!
स्त्री -भृण हत्या का होतात याचे उत्तर खर तर समाजाच्या मानसिकतेत दडले आहे. आई – वडिलांना मुलगी नकोशी असते असे नाहीये, पण मुलगी म्हणजे खर्च असे समीकरण कुठेतरी मनात पक्के बसले आहे. जन्माला आल्यापासून तिच्या हुंड्यासाठी तजवीज करावी लागणार असे पालकांना वाटते. स्त्रीला दुय्यम वागणूक द्यायची सुरुवात लहानपणापासून होते. आरोग्य, पुरेसा आहार, उच्च शिक्षण याबाबतीत मुलींना डावलले जाते.
मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत उत्साही प्रतिसादात सतत चार तास चाललेली कार्यशाळा संपल्यानंतर त्या दोघींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. ज्वारी व कपाशीवर केलेल्या अत्यंत मौलिक संशोधनाची माहिती त्यांनी सादर केल्यानंतर काही क्षण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर दोघींपैकी एकीने बोलण्यास सुरवात करताच अवघं सभागृह स्तब्ध झालं. तिने केलेलं कथन तिच्याच शब्दात.
‘‘मी कर्नाटकातील एका कृषी विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. भारत सरकार कृषी संशोधनावर दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करत असते, पण तरीही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधित केलेले बियाणे वापरण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. आपल्या देशात १२७ लाख हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी बी.टी. कपाशीची लागवड करीत असल्यामुळे बियाण्यांच्या क्षेत्रात मोन्सँटो या कंपनीने केवळ एकाधिकारच नव्हे तर अक्षरशः दादागिरी निर्माण केली आहे. दरवर्षी ४००० कोटी रुपयांचे कपाशीचे बी.टी. बियाणे आपल्या देशात विकले जाते ज्यापैकी तब्बल ७५० कोटी रुपये रॉयल्टीच्या रूपाने मोन्सँटोच्या खिशात जातात ज्याचा असह्य भार भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या खिशावर पडतो. ही दुर्दैवी परिस्थिती बघून मी प्रचंड अस्वस्थ झाले व कॉटन ट्रान्सजेनिक रिसर्चच्या सहाय्याने आपल्या देशातच बी.टी. तंत्रज्ञान विकसित करण्याचा निश्चय केला. खरं तर सन २००० मध्येच अशा प्रकारच्या संशोधनाला प्रारंभ झाला होता, पण ते संशोधन हा केवळ एक देखावा होता असे २०१२ मध्ये लक्षात आले. एका अमेरिकन कंपनीच्या दबावाखाली ज्या संशोधकांनी संशोधनाचे हे नाटक करून आपल्या देशाची नाचक्की केली त्यांची पदोन्नती करून विद्यापीठाने त्यांना बक्षीस दिले.
अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मोन्सँटोच्या जीनपेक्षाही प्रभावी व पूर्णतः स्वदेशी जीनचा मी शोध लावला. या संशोधनामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशी जातींचे बी.टी. बियाणे अत्यंत माफक दरात मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. माझ्या संशोधनाचा तपशील विद्यापीठाला सादर करताच माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी जर एखाद्या प्रगत देशात असते तर ज्यासाठी मला सर्वोच्च सन्मान मिळाला असता त्याच संशोधनासाठी विद्यापीठाने माझा मोठ्या प्रमाणात छळ करण्यास सुरवात केली. कोणतेही कारण न देता माझी बदली करण्यात आली, मला पदोन्नती नाकारण्यात आली, अनेक महिने माझा पगार थांबविण्यात आला व विविध प्रकारे माझा छळ करून विद्यापीठ मला आत्महत्येपर्यंत घेऊन गेले. माझा गुन्हा एकच होता की भारतीय संशोधन मला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे होते पण मोन्सँटोने वरपासून खालपर्यंत सर्वांना विकत घेतल्यामुळे विद्यापीठाने मला सुखाने जगू देण्यास नकार दिला. जिथे मी अनेक वर्षे मौलिक संशोधन केले ती प्रयोगशाळाही तोडून फेकण्यात आली.
या छळवादाला कंटाळून १ ऑक्टोबर,२०१५ रोजी मी पंतप्रधानांकडे दाद मागितली तेव्हा १० मे, २०१६ रोजी मला कळविण्यात आले – ‘CASE CLOSED’ (तुमची केस बंद करण्यात आली आहे.)’’
सभागृहात स्मशानशांतता पसरली होती. व्यासपीठावर बसलेल्या संशोधक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला – ''बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशातील सर्वांना विकत घेऊन एक दिवस या देशातील सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहेत का?''
श्रीकांत पोहनकर
संपर्क :
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली.
बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे गर्दी पण जमली व कोणीतरी या अपघाताची खबर पोलीसांना दिली. दरम्यान दुसरा मुलगा धावत आला व पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करू लागला. पण भोक लहान असल्यामूळे हे त्याला जमेना. त्याला जवळच एक मोठे झाड दिसले. त्याने पळत जाऊन त्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली व त्या फांदिच्या सहाय्याने भोकाचा आकार मोठा करून पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. तेवढ्यात पोलीस व पॅरॅमेडिकलचे लोक तेथे पोचले. त्यांनी पाण्यात पडलेल्या मुलाला योग्य ती वैद्यकीय मदत दिली व त्या मुलाचे प्राण वाचवले. पण तेथे आलेल्या पोलीसांना व पॅरामेडिकलच्या लोकांना एका गोष्टीचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते की एका छोट्या मुलाने झाडाची भली मोठी फांदी तोडून आणलीच कशी. त्यांची याच विषयावर चर्चा चालू होती तेव्हा एक वृद्ध म्हातारबुवा तेथे आले वम्हाणाले, ‘मला महीत आहे की या मुलाने ही झाडाची फांदी कशी तोडली ते.’
‘अस मग सांगा या मुलाने ही फांदी कशी तोडली? त्याला हे कसे जमले?’ पोलीसांनी उत्सुकतेने विचारले.
‘कारण ‘तु हे करू शकत नाहीस किंवा तुला हे जमणार नाही!’ असे सांगणारा कोणी माणूस नव्हता म्हणून!’ म्हातारबुवांनी मिस्कीलपणे उत्तर दिले.
आपल्यामधे काहीतरी आगळेवेगळे, अतर्क्य किंवा अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची एक प्रकारची प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. संकटकाळात ही उर्जा बाहेर यावी व त्यामुळे माणसाने संकटावर मात करावी अशी देवाने योजना केलेली असते. प्रत्येकाकडेच ही उर्जा असते व अनेक वेळा याचा वापर करून काहीतरी आगळेवेगळे करून दाखवावे अशी इर्शा प्रत्येकाच्याच मनातकेव्हा ना केव्हातरी निर्माण होत असते. पण ‘तुला हे जमणार नाही. तुला हे शक्य होणार नाही. तुझ्यात तेवढी ताकद नाही. तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्याला करू द्यायचे नाही असा यांचा खाक्या असतो. मला तर लहानपणापासून अशी माणसे सतत भेटत आली आहेत. यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने मराठी समाजात अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत असे मला आढळून आले आहे.
समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे, ‘तरी मी त्याला सांगत होतो की नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरवात आपल्या कुटुंबापासूनच होते.
ज्या समाजात अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसे जास्त प्रमाणात असतील तो समाज जास्त विकास करू शकत नाही. आज जरी मराठी समाजाने प्रगतीच्या कितीही डिंग्या मारल्या तरी अनेक बाबतीत मराठी समाज हा अजुनही‘अत्यंत मागासलेला’च आहे व तो पुढारण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. म्हणुनच गेल्या 400 वर्षांत शिवाजीमहाराजांच्या तोडीचा एकही माणूस या महाराष्ट्रात पैदा होऊ शकला नाही.
अर्थातच आपण ‘सकारात्मक’ रहायचे का‘नकारात्मक’ रहायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतःच ठरवायचे नाही का?
उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
July 26, 2015
६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही संबंध येत नसल्यामुळे ती पोस्ट मी नव्हे तर इतर असंख्य लोकांनी व्हॉट्सऍपवर शेअर केली व अवघ्या काही तासातच ती व्हायरल झाली. गेल्या सात दिवसात असंख्य लोकांनी विविध मार्गांनी माझ्याशी संपर्क साधून ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया व त्यांना माझी उत्तरे.
१. ही घटना खरी आहे का? असल्यास तुम्ही त्या महिलेचे नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख का केला नाही?
– ही घटना १०० टक्के खरी आहे व तिचे सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याजवळ आहेत. ती संशोधक स्त्री गेल्या दोन वर्षांपासून छळ सहन करते आहे. नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख करून मला तिच्या अडचणींमध्ये भर घालायची नाही.
२. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काही करू शकतो का?
– तिला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत उच्च पातळीवरून प्रयत्न सुरु असल्यामुळे सर्वांनी काही दिवस वाट बघावी.
३. तिचे संशोधन आमच्या कंपनीला विकत घेण्याची इच्छा आहे. तिचे नाव व फोन नंबर फक्त आम्हालाच कळवा.
– एका भारतीय संशोधक स्त्रीची नोकरी व जीव जाण्याची वेळ आली असतांना तुम्हाला ‘धंदा’ कसा काय सुचतो?
४. आम्ही संशोधक आहोत व आम्हाला असे अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. पण नोकरी वाचवण्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्हाला सहन करावा लागतो आहे.
– आम्हा भारतीयांचं हेच मोठं दुर्दैव आहे. शास्त्रज्ञांचा छळ केल्यानंतर ते देश सोडून गेले की आम्ही ब्रेनड्रेनच्या नावाने ठणाणा करतो.
५. मी एका न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी बोलतो आहे. मला त्या स्त्रीचा फोन नंबर द्या, मला तिच्यावर एक स्टोरी तयार करायची आहे. तुम्ही काहीही सांगायला तयार नाही याचा अर्थ तुमची अॅटिटयूड चांगली नाही. मी आता एखाद्या दुसऱ्या स्टोरीचा शोध घेतो.
- साहेब, मला सल्ला देण्याऐवजी जरा स्वतःची अॅटिटयूड तपासून बघा. समोरचा माणूस जळत असताना त्याचा जीव वाचवण्याऐवजी स्टोरी तयार करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करणारे तुम्ही लोक आता त्या बिचाऱ्या संशोधक स्त्रीचा जीव घ्यायला निघालात की काय?
वाचकांनो, माझ्या लेखाच्या निमित्ताने मला मनुष्यस्वभावाचे अनेक चित्रविचित्र नमुने बघायला मिळाले. त्या शास्त्रज्ञ स्त्रीला व आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी पुढे येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यात स्वतःचा फायदा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. मी तिचे नाव व फोन नंबर जाहीर करत नाही म्हणून काही महाभागांची मला धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. शास्त्रज्ञांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरु झालेली ही लढाई जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.
श्रीकांत पोहनकर
shrikantpohankar@gmail.com
लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला - "कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो." - म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच कुणी समजावून दिले असते तर आज बिचाऱ्यांमध्ये इतकी कटुता नसती!
कुबेरांना एकच सांगतो.
की सव्वा वर्ष रिकामटेकडा राहून फक्त अभिमानगीत करत राहिलो
- म्हणून रत्नागिरीत ८००० मुलं ते एका सुरात गायली.
-म्हणून अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी घरातल्या मुलांना, ‘आपण हे गीत बसवून आपल्या आईवडिलांना एक सुखद धक्का देऊया’ असं वाटलं.
- रिकामटेकडा राहून हे गीत केलं म्हणून मुंबईच्या खासगी रेडियो वाहिन्यांवर मराठी गाणी लागू लागली आणि व्होडाफोनचे लोक मराठीतून सेवा देऊ लागले
- म्हणूनच चीनमध्ये राहाणाऱ्या Chu San Quek या चायनीज माणसाला वाटलं की भारतात येऊन महाराष्ट्र काय ते पहायला हवं.
- म्हणूनच बिवरली हिल्सच्या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शेखर रहाटे यांनी ऑस्कर ॲवॉर्डपूर्व संध्येला हॉलिवुडच्या मॉडेल्सना घेऊन मराठी अभिमानगीतावर फॅशन शो केला.
- म्हणून अमिताभ बच्चन यांना वाटलं की या गाण्यात मीही गायला हवं होतं.
- म्हणून हे गाणं ऐकून श्रीनिवास खळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.
- आणि म्हणूनच या रिकामटेकड्या संगीतकाराच्या कलात्मक खटपटीची तुमच्या जगविख्यात वर्तमानपत्राला पहिल्या पानावर दखल घ्यावी लागली
कुबेर, अशा अनेक कथा आहेत. कधी रिकामा वेळ मिळाला तर या. ऐकवेन. आणखी एक गोष्ट. माझ्या रिकामटेकडेपणात अनेकांना आनंद देण्याची क्षमता आहे जी तुमच्या ‘कार्यग्रस्ततेत’ जराही नाही.
तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित एक गोष्ट लक्षात आली नसेल ती सांगतो आणि थांबतो.
उद्या तुमचा हा ‘व्यग्रलेख’ रद्दीत जाणार आहे आणि या रिकामटेकड्याने केलेलं गाणं लहान लहान मुलं पुढची शंभर वर्ष गात रहाणार आहेत.
आपला विनीत
कौशल इनामदार
बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा.
Copyright © 2025 | Marathisrushti