(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • माझा गुन्हा एकच होता !

    मराठवाड्याच्या लातूर जिल्ह्यातील उदगीरला आयोजित करण्यात आलेली ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही कार्यशाळा सुरु होण्याआधी सभागृहातील त्या दोघींनी माझं लक्ष वेधून घेतलं. त्या मान खाली घालून बसल्या होत्या व त्यांच्या चेहऱ्यावर अजिबात उत्साह नव्हता. कार्यशाळा सुरु होण्याआधी आयोजकांनी त्यांचा परिचय करून दिला. त्या कर्नाटकातील कृषी शास्त्रज्ञ होत्या व अकरा तासांचा प्रवास करून स्व-खर्चाने तिथे आल्या होत्या. शेतकऱ्यांच्या अत्यंत उत्साही प्रतिसादात सतत चार तास चाललेली कार्यशाळा संपल्यानंतर त्या दोघींना व्यासपीठावर पाचारण करण्यात आले. ज्वारी व कपाशीवर केलेल्या अत्यंत मौलिक संशोधनाची माहिती त्यांनी सादर केल्यानंतर काही क्षण सभागृहात शांतता पसरली आणि त्यानंतर दोघींपैकी एकीने बोलण्यास सुरवात करताच अवघं सभागृह स्तब्ध झालं. तिने केलेलं कथन तिच्याच शब्दात.

    ‘‘मी कर्नाटकातील एका कृषी विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ या पदावर कार्यरत आहे. भारत सरकार कृषी संशोधनावर दर वर्षी कोट्यावधी रुपये खर्च करत असते, पण तरीही बहुराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधित केलेले बियाणे वापरण्याकडेच शेतकऱ्यांचा कल असतो. आपल्या देशात १२७ लाख हेक्टर जमिनीवर कपाशीची लागवड केली जाते. बहुसंख्य शेतकरी बी.टी. कपाशीची लागवड करीत असल्यामुळे बियाण्यांच्या क्षेत्रात मोन्सँटो या कंपनीने केवळ एकाधिकारच नव्हे तर अक्षरशः दादागिरी निर्माण केली आहे. दरवर्षी ४००० कोटी रुपयांचे कपाशीचे बी.टी. बियाणे आपल्या देशात विकले जाते ज्यापैकी तब्बल ७५० कोटी रुपये रॉयल्टीच्या रूपाने मोन्सँटोच्या खिशात जातात ज्याचा असह्य भार भारतातील गरीब शेतकऱ्यांच्या खिशावर पडतो. ही दुर्दैवी परिस्थिती बघून मी प्रचंड अस्वस्थ झाले व कॉटन ट्रान्सजेनिक रिसर्चच्या सहाय्याने आपल्या देशातच बी.टी. तंत्रज्ञान विकसित करण्याचा निश्चय केला. खरं तर सन २००० मध्येच अशा प्रकारच्या संशोधनाला प्रारंभ झाला होता, पण ते संशोधन हा केवळ एक देखावा होता असे २०१२ मध्ये लक्षात आले. एका अमेरिकन कंपनीच्या दबावाखाली ज्या संशोधकांनी संशोधनाचे हे नाटक करून आपल्या देशाची नाचक्की केली त्यांची पदोन्नती करून विद्यापीठाने त्यांना बक्षीस दिले.

    अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मोन्सँटोच्या जीनपेक्षाही प्रभावी व पूर्णतः स्वदेशी जीनचा मी शोध लावला. या संशोधनामुळे आपल्या देशातील शेतकऱ्यांना देशी जातींचे बी.टी. बियाणे अत्यंत माफक दरात मिळण्याची सुवर्णसंधी चालून आली होती. माझ्या संशोधनाचा तपशील विद्यापीठाला सादर करताच माझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरु होतील याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. मी जर एखाद्या प्रगत देशात असते तर ज्यासाठी मला सर्वोच्च सन्मान मिळाला असता त्याच संशोधनासाठी विद्यापीठाने माझा मोठ्या प्रमाणात छळ करण्यास सुरवात केली. कोणतेही कारण न देता माझी बदली करण्यात आली, मला पदोन्नती नाकारण्यात आली, अनेक महिने माझा पगार थांबविण्यात आला व विविध प्रकारे माझा छळ करून विद्यापीठ मला आत्महत्येपर्यंत घेऊन गेले. माझा गुन्हा एकच होता की भारतीय संशोधन मला सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचे होते पण मोन्सँटोने वरपासून खालपर्यंत सर्वांना विकत घेतल्यामुळे विद्यापीठाने मला सुखाने जगू देण्यास नकार दिला. जिथे मी अनेक वर्षे मौलिक संशोधन केले ती प्रयोगशाळाही तोडून फेकण्यात आली.

    या छळवादाला कंटाळून १ ऑक्टोबर,२०१५ रोजी मी पंतप्रधानांकडे दाद मागितली तेव्हा १० मे, २०१६ रोजी मला कळविण्यात आले – ‘CASE CLOSED’ (तुमची केस बंद करण्यात आली आहे.)’’

    सभागृहात स्मशानशांतता पसरली होती. व्यासपीठावर बसलेल्या संशोधक स्त्रीच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला – ''बहुराष्ट्रीय कंपन्या आपल्या देशातील सर्वांना विकत घेऊन एक दिवस या देशातील सर्व शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यास भाग पाडणार आहेत का?''

    श्रीकांत पोहनकर

    संपर्क :

    98226 98100
    shrikantpohankar@gmail.com

  • तुम्हाला काय येत नाही?

    नुकतीच एक छोटीशी कथा माझ्या वाचण्यात आली.

    बर्फाळ प्रदेशात दोन लहान मुले बर्फावर खेळत होती. त्या बर्फाचा पापुद्रा फार पातळ होता. अचानक त्या बर्फाला दडा गेला, एक भोक पडले व त्या भोकातून खेळत असलेल्या मुलांपैकी एक मुलगा घसरून बर्फाखाली असलेल्या थंडगार पाण्यात पडला. दुसर्‍या मुलाने हे पाहीले व लगेच त्याने आपल्या मित्राला वाचवण्यासाठी धाव घेतली. तिथे गर्दी पण जमली व कोणीतरी या अपघाताची खबर पोलीसांना दिली. दरम्यान दुसरा मुलगा धावत आला व पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला बाहेर खेचून काढायचा प्रयत्न करू लागला. पण भोक लहान असल्यामूळे हे त्याला जमेना. त्याला जवळच एक मोठे झाड दिसले. त्याने पळत जाऊन त्या झाडाची एक मोठी फांदी तोडून आणली व त्या फांदिच्या सहाय्याने भोकाचा आकार मोठा करून पाण्यात पडलेल्या आपल्या मित्राला खेचून बाहेर काढले. तेवढ्यात पोलीस व पॅरॅमेडिकलचे लोक तेथे पोचले. त्यांनी पाण्यात पडलेल्या मुलाला योग्य ती वैद्यकीय मदत दिली व त्या मुलाचे प्राण वाचवले. पण तेथे आलेल्या पोलीसांना व पॅरामेडिकलच्या लोकांना एका गोष्टीचे राहुन राहुन आश्चर्य वाटत होते की एका छोट्या मुलाने झाडाची भली मोठी फांदी तोडून आणलीच कशी. त्यांची याच विषयावर चर्चा चालू होती तेव्हा एक वृद्ध म्हातारबुवा तेथे आले वम्हाणाले, ‘मला महीत आहे की या मुलाने ही झाडाची फांदी कशी तोडली ते.’

    ‘अस मग सांगा या मुलाने ही फांदी कशी तोडली? त्याला हे कसे जमले?’ पोलीसांनी उत्सुकतेने विचारले.

    ‘कारण ‘तु हे करू शकत नाहीस किंवा तुला हे जमणार नाही!’ असे सांगणारा कोणी माणूस नव्हता म्हणून!’ म्हातारबुवांनी मिस्कीलपणे उत्तर दिले.

    आपल्यामधे काहीतरी आगळेवेगळे, अतर्क्य किंवा अशक्य वाटणारे काम शक्य करून दाखवण्याची एक प्रकारची प्रचंड ताकद किंवा उर्जा दडून बसलेली असते. संकटकाळात ही उर्जा बाहेर यावी व त्यामुळे माणसाने संकटावर मात करावी अशी देवाने योजना केलेली असते. प्रत्येकाकडेच ही उर्जा असते व अनेक वेळा याचा वापर करून काहीतरी आगळेवेगळे करून दाखवावे अशी इर्शा प्रत्येकाच्याच मनातकेव्हा ना केव्हातरी निर्माण होत असते. पण ‘तुला हे जमणार नाही. तुला हे शक्य होणार नाही. तुझ्यात तेवढी ताकद नाही. तुझ्या बुद्धीला हे झेपणार नाही.’ यासारखी‘नकारात्मक’ टिपण्णी करणारेच जास्त भेटतात. ‘तु स्वतःला काय फार शहाणा समजतोस काय? तुला फार अक्कल आली असे वाटले तरी तो तुझा गैरसमज आहे. डोन्ट बी ओव्हरस्मार्ट’अशांसारखी वाक्ये हे लोक सहजरित्या तोंडावर फेकून आपल्याला नामोहरम करत असतात. आपण करायचे नाही व दुसर्‍याला करू द्यायचे नाही असा यांचा खाक्या असतो. मला तर लहानपणापासून अशी माणसे सतत भेटत आली आहेत. यांच्याकडे ‘आपण काय करू शकतो’यापेक्षा ‘आपण काय करू शकत नाही.’ याचीच यादी भलीमोठी असते. दुर्दैवाने मराठी समाजात अशा प्रकारच्या ‘नकारात्मक’ मनोवृत्तीची माणसे मोठ्या प्रमाणावर आहेत असे मला आढळून आले आहे.

    समजा एखाद्याने असे काही ‘अचाट’ काम करण्याचा प्रयत्न केला व त्यात तो अपयशी ठरला तर हीच माणसे, ‘तरी मी त्याला सांगत होतो की नसते धाडस करू नकोस, अंगाशी येईल! तरी मी त्याला सांगत होतो की तु तोंडाघशी पडशील! तरी मी त्याला सांगत होतो की हा असला येडपटपणा करू नकोस!’ असे म्हणत स्वतःच्या शहाणपणाची मिजास मारायला व स्वतःची पाठ थोपटून घ्यायला तयारच बसलेले असतात. ही अशी माणसे एखादी गोष्ट कशी यशस्वी करायची याचे मार्ग शोधत न बसता ही गोष्ट का करू नये याची कारणे शोधत बसतात. बहुतेक वेळा अशा या ‘नकारात्मक’माणसांची सुरवात आपल्या कुटुंबापासूनच होते.

    ज्या समाजात अशी ‘नकारत्मक’ विचारसरणीची माणसे जास्त प्रमाणात असतील तो समाज जास्त विकास करू शकत नाही. आज जरी मराठी समाजाने प्रगतीच्या कितीही डिंग्या मारल्या तरी अनेक बाबतीत मराठी समाज हा अजुनही‘अत्यंत मागासलेला’च आहे व तो पुढारण्याची चिन्हे आज तरी दिसत नाहीत. म्हणुनच गेल्या 400 वर्षांत शिवाजीमहाराजांच्या तोडीचा एकही माणूस या महाराष्ट्रात पैदा होऊ शकला नाही.

    अर्थातच आपण ‘सकारात्मक’ रहायचे का‘नकारात्मक’ रहायचे हे प्रत्येकाने स्वतःचे स्वतःच ठरवायचे नाही का?

    उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631

    July 26, 2015

  • माझा गुन्हा एकच होता ! वरील प्रतिक्रिया

    ६ मे २०१६ रोजी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे एका संस्थेतर्फे ‘स्वयंसिध्द शेतकरी’ ही माझी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

    त्या कार्यशाळेत कर्नाटकातून आलेल्या दोन महिला कृषी संशोधकांशी माझी ओळख करून देण्यात आली. त्यातील एका संशोधकाने कथन केलेली तिची दुर्दैवी कहाणी (कागदोपत्री पुरावे माझ्या हातात आल्यानंतर) १२ मे २०१६ रोजी मी फेसबुकवर पोस्ट केली. व्हॉट्सऍपशी माझा दुरूनही संबंध येत नसल्यामुळे ती पोस्ट मी नव्हे तर इतर असंख्य लोकांनी व्हॉट्सऍपवर शेअर केली व अवघ्या काही तासातच ती व्हायरल झाली. गेल्या सात दिवसात असंख्य लोकांनी विविध मार्गांनी माझ्याशी संपर्क साधून ज्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या त्यातील काही मोजक्या प्रतिक्रिया व त्यांना माझी उत्तरे.

    १. ही घटना खरी आहे का? असल्यास तुम्ही त्या महिलेचे नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख का केला नाही?

    – ही घटना १०० टक्के खरी आहे व तिचे सर्व कागदोपत्री पुरावे माझ्याजवळ आहेत. ती संशोधक स्त्री गेल्या दोन वर्षांपासून छळ सहन करते आहे. नाव, फोन नंबर व ईमेल आयडीचा उल्लेख करून मला तिच्या अडचणींमध्ये भर घालायची नाही.

    २. तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही काही करू शकतो का?

    – तिला न्याय मिळवून देण्यासाठी अत्यंत उच्च पातळीवरून प्रयत्न सुरु असल्यामुळे सर्वांनी काही दिवस वाट बघावी.

    ३. तिचे संशोधन आमच्या कंपनीला विकत घेण्याची इच्छा आहे. तिचे नाव व फोन नंबर फक्त आम्हालाच कळवा.

    – एका भारतीय संशोधक स्त्रीची नोकरी व जीव जाण्याची वेळ आली असतांना तुम्हाला ‘धंदा’ कसा काय सुचतो?

    ४. आम्ही संशोधक आहोत व आम्हाला असे अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून येत आहेत. पण नोकरी वाचवण्यासाठी तोंड दाबून बुक्क्यांचा मार आम्हाला सहन करावा लागतो आहे.

    – आम्हा भारतीयांचं हेच मोठं दुर्दैव आहे. शास्त्रज्ञांचा छळ केल्यानंतर ते देश सोडून गेले की आम्ही ब्रेनड्रेनच्या नावाने ठणाणा करतो.

    ५. मी एका न्यूज चॅनेलचा प्रतिनिधी बोलतो आहे. मला त्या स्त्रीचा फोन नंबर द्या, मला तिच्यावर एक स्टोरी तयार करायची आहे. तुम्ही काहीही सांगायला तयार नाही याचा अर्थ तुमची अॅटिटयूड चांगली नाही. मी आता एखाद्या दुसऱ्या स्टोरीचा शोध घेतो.

    - साहेब, मला सल्ला देण्याऐवजी जरा स्वतःची अॅटिटयूड तपासून बघा. समोरचा माणूस जळत असताना त्याचा जीव वाचवण्याऐवजी स्टोरी तयार करण्यासाठी व्हिडिओ शूटिंग करणारे तुम्ही लोक आता त्या बिचाऱ्या संशोधक स्त्रीचा जीव घ्यायला निघालात की काय?

    वाचकांनो, माझ्या लेखाच्या निमित्ताने मला मनुष्यस्वभावाचे अनेक चित्रविचित्र नमुने बघायला मिळाले. त्या शास्त्रज्ञ स्त्रीला व आपल्या देशातील गरीब शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनेकांनी पुढे येण्याची तयारी दर्शवली असली तरी त्यात स्वतःचा फायदा शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्याही काही कमी नव्हती. मी तिचे नाव व फोन नंबर जाहीर करत नाही म्हणून काही महाभागांची मला धमक्या देण्यापर्यंत मजल गेली. शास्त्रज्ञांना व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरु झालेली ही लढाई जिंकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

    श्रीकांत पोहनकर
    shrikantpohankar@gmail.com

  • लोकसत्ताकारांची वैचारिक दिवाळखोरी….

    लोकसत्ताच्या ८ मार्च २०१६ च्या अग्रलेखात झुंझार पत्रकार श्री गिरीश कुबेर यांनी माझं नाव न घेता मला - "कोणी तरी रिकामटेकडा संगीतकार कलात्मक झटापट आणि माल-विक्रीकौशल्याची खटपट करीत अभिमानगीत गात लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतो." - म्हणून संबोधलंय! कुबेरांना ‘रिकामटेकड्या संगीतकारांवर’ अग्रलेख लिहायची वेळ आली हे पाहून मला त्यांची कीव आली. असंही वाटलं की रिकामटेकडेपणाचे फायदे कुबेरांना लहानपणीच कुणी समजावून दिले असते तर आज बिचाऱ्यांमध्ये इतकी कटुता नसती!

    कुबेरांना एकच सांगतो.
    की सव्वा वर्ष रिकामटेकडा राहून फक्त अभिमानगीत करत राहिलो

    - म्हणून रत्नागिरीत ८००० मुलं ते एका सुरात गायली.

    -म्हणून अमेरिकेत जन्माला आलेल्या मराठी घरातल्या मुलांना, ‘आपण हे गीत बसवून आपल्या आईवडिलांना एक सुखद धक्का देऊया’ असं वाटलं.

    - रिकामटेकडा राहून हे गीत केलं म्हणून मुंबईच्या खासगी रेडियो वाहिन्यांवर मराठी गाणी लागू लागली आणि व्होडाफोनचे लोक मराठीतून सेवा देऊ लागले

    - म्हणूनच चीनमध्ये राहाणाऱ्या Chu San Quek या चायनीज माणसाला वाटलं की भारतात येऊन महाराष्ट्र काय ते पहायला हवं.

    - म्हणूनच बिवरली हिल्सच्या सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर शेखर रहाटे यांनी ऑस्कर ॲवॉर्डपूर्व संध्येला हॉलिवुडच्या मॉडेल्सना घेऊन मराठी अभिमानगीतावर फॅशन शो केला.

    - म्हणून अमिताभ बच्चन यांना वाटलं की या गाण्यात मीही गायला हवं होतं.

    - म्हणून हे गाणं ऐकून श्रीनिवास खळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं.

    - आणि म्हणूनच या रिकामटेकड्या संगीतकाराच्या कलात्मक खटपटीची तुमच्या जगविख्यात वर्तमानपत्राला पहिल्या पानावर दखल घ्यावी लागली

    कुबेर, अशा अनेक कथा आहेत. कधी रिकामा वेळ मिळाला तर या. ऐकवेन. आणखी एक गोष्ट. माझ्या रिकामटेकडेपणात अनेकांना आनंद देण्याची क्षमता आहे जी तुमच्या ‘कार्यग्रस्ततेत’ जराही नाही.

    तुम्हाला तुमच्या कार्यबाहुल्यामुळे कदाचित एक गोष्ट लक्षात आली नसेल ती सांगतो आणि थांबतो.

    उद्या तुमचा हा ‘व्यग्रलेख’ रद्दीत जाणार आहे आणि या रिकामटेकड्याने केलेलं गाणं लहान लहान मुलं पुढची शंभर वर्ष गात रहाणार आहेत.

    आपला विनीत
    कौशल इनामदार

  • बृहन्महाराष्ट्र व महाराष्ट्रीयत्व

    बृहन्महाराष्ट्र हा जो शब्द आजकाल सर्वत्र वापरात आहे, त्याबद्दल प्रथमच एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, ती ही की, ‘महाराष्ट्र’ ही एक भौगोलिक, सांस्कृतिक, आणि आतां राजकीयही, संकल्पना आहे ; परंतु ‘बृहन्महाराष्ट्र’ ही केवळ सांस्कृतिक संज्ञा आहे. भूगोलाच्या दृष्टिकोनातून बघायचें झाल्यास, बृहन्महाराष्ट्रीय म्हणजे, ‘ज्यांनी किंवा ज्यांच्या पूर्वजांनी महाराष्ट्राबाहेरील प्रदेशात स्थलांतर केलेले आहे, असे महाराष्ट्रीय जन’, असें म्हणायला हरकत नाहीं. तेव्हां, बृहन्महाराष्ट्राबद्दल चर्चा करतांना, आधी आपण महाराष्ट्र, महाराष्ट्रीय व महाराष्ट्रीयत्व या शब्दांचा विचार करायला हवा.

  • छत्रपतींच्या काळातील गुप्तहेर खाते

    छत्रपती शिवरायांच्या काळात त्यांचे हेर खाते कसे काम करत होते ते खालील ओव्या दर्शवतात .सदर माहिती मला श्री नरेंद्र नाडकर्णी यांच्या ई मेल वरून मिळाली.

    अफझलखान स्वराज्या वर चाल करून येत आहे हे महाराजांना कळवण्य साठी हि युक्ती वापरली होती. रामदास स्वामींचे शिष्य स्वराज्यात किती महत्वाचे काम करीत होते हे यावरून लक्षांत येते.

    अफझलखान निघाला हे सांगणारे पत्र सन १६५९

    वि वेके करावे कार्य साधन ।
    जा णार नरतनु हे जाणोन ।
    पू ढील भविष्यार्थी मन ।
    र हातोची नये ।।१।।

    चा लू नये असन्मार्गि ।
    स त्यता बाणल्या अंगी ।
    र घुवीर कृपा ते प्रसंगी ।
    दा समहात्म्य वाढवी ।।२।।

    र जनीनाथ आणि दिनकर ।
    नि त्य करिती संचार ।
    घा लिताती येरझार ।
    ला विले भ्रमण जगदिशे ।।३।।

    आ दिमाया मूळभवानी ।
    हे सकल ब्रह्मांडाची स्वामिनी ।
    येकांती विवेक करोनी ।
    इष्ट योजना करावी ।।४।।

    पत्राच्या प्रत्येक ओवीचरण अद्दाक्षर घेतल्यास 'विजापूरचा सरदार निघाला आहे' ही सूचना मिळते.

    Communication च्या अनेक पद्धती त्याकाळात वापरल्या जात होत्या. बहुजन समाजाचे अनेक कलाकार त्यात वाकबगार होते. संबळ,मशालीच्या हालचाली,बोटांनी केलेल्या खुणा,कसरतीच्या प्रकारातून message देणे इत्यादी अनेक प्रकार होते.

    अफजलखान निघाला आहे हेच जर गुप्त हेरांना शिवरायांना सांगायचे असेल तर ? त्याकाळात वासुदेव,गोंधळी,बहुरूपी , रामदासी अशा अनेक प्रकारच्या लोकांना महाराज हेरगिरी करायला सांगायचे.आजही हि मंडळी आपले कार्यक्रम सदर करतात आणि message पाठवण्याचे प्रात्यक्षिक दाखवतात.

    श्री समर्थ रामदास स्वामींना शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीचे महत्व पटले असल्याने आणि त्यांचे शिष्य सतत भ्रमण करीत असल्याने त्यांनी स्वराज्य निर्मितीसाठी हेरगिरी करण्यासाठी त्यांच्या शिष्यांना प्रोत्साहन दिले असण्याची दाट शक्यता आहे. शिवाय समर्थ स्वतः स्वसंरक्षणासाठी गुप्ती बाळगत असत आणि त्यांचे शिष्य सुद्धा बाळगत असत.पण या गोष्टींचे त्यांनी प्रदर्शन केले नाही.

    मला मिळालेल्या माहिती नुसार समर्थांचे शिष्य ज्या सत्ताधीशांच्या सरदार ,जमीनदार यांच्या घरी माधुकरी मागायला जात त्या ठिकाणी ते राजकीय निरोप देत असत .

    -- चिंतामणी कारखानीस

  • मराठी माणसाची संपर्क भाषा मराठीच हवी!

    मराठीसृष्टीने नुकत्याच केलेल्या एका सर्व्हेचे निष्कर्ष आत्ताच आले आहेत. या सर्व्हेचा विषय होता मराठीतून इमेल आणि ऑनलाईन प्रतिक्रिया पाठविण्याविषयी. यात सहभागी झालेल्या व्यक्तींकडून आलेल्या माहितीतून दिसते की अजूनही ७७ टक्क्यांपेक्षा जास्त मराठी माणसे आपल्या आपापसातील संपर्काची भाषा म्हणून इंग्रजीचाच वापर करतात.

  • स्वामी विवेकानंद विचारदर्शन

    स्वामी विवेकानंदांचे मूळचे नांव नरेंद्रनाथ दत्त असे होते. ते बंगालचे रहिवासी होते. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचे ते एकनिष्ठ शिष्य होते. रामकृष्णांचा संदेश जनमानसात पोहचविण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मिशन सुरु केले. आज जगभर त्यांच्या अनेक शाखा आहेत.

  • २०१२ चा दु:खद शेवट…..

    पण प्रश्न खरा हाच आहे की एवढं सगळं झाल्यावरतरी २०१३ मध्ये परिस्थितीत काही फरक पडणार आहे का? की हे असेच निरंतर सुरु रहाणार… नेतेमंडळी, तथाकथित (so called) सामाजिक कार्यकर्ते, मिडिया वगैरे आपल्या पोळ्या भाजून घेणार आणि आपण असेच मूकपणे बघत रहाणार?

  • शुध्द आणि बेशुध्द !

    कोणत्याही ग्राहकोपयोगी वस्तूंची उदा. तेल - साबण, खाद्यपदार्थांची जाहिरात करताना त्या वस्तूच्या शुध्दतेवर नेहमीच भर दिलेला आढळतो. कारण शुध्दतेला आपण नेहमीच अनन्य साधारण महत्त्व देतो. मग ती चारित्र्याची असो, विचारांची असो किंवा वस्तूंची असो. पण एका बाबतीत मात्र हा “शुद्धतेचा नियम” सर्रास धुडकावून लावलेला दिसतो. आणि ती गोष्ट म्हणजे लेखनातील, उच्चारातील शुद्धता. शुद्धलेखन म्हणजे जुन्या पिढीने लादलेले ओझेच आहे असा खेदजनक दृष्टिकोन अनेकदा पहायला मिळतो.

    स्वत:चे कपडे, वेषभूषा, केशभूषा याबाबत काटेकोर दक्षता पाळणारे अनेक महाभाग आपल्या लेखनाबाबत मात्र अशी दक्षता पाळताना दिसत नाहीत. किंबहूना शुध्दलेखनाबाबत बेफिकीरी दाखवणे हे पुढारलेपणाचे लक्षण आहे असा ही गैरसमज काहींचा झालेला दिसतो. वस्तुत: तुमचे लेखन हे तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानले जाते. तुम्ही जर शुध्दलेखनाचे नियम पाळले नाहीत आणि ऱ्हस्व दीर्घाची पर्वा न करता मजकूर लिहीलात तर त्याचा एक अर्थ असाही होतो की तुम्ही कोणतीच बंधने, नियम पाळत नाही.

    भिन्न भिन्न विचारसरणीच्या, मनोवृत्तीच्या लोकांनी तयार झालेला आपला समाज एकसंध राहण्यासाठी, त्याचे व्यवहार सुरळीतपणे चालण्यासाठी काही बंधने, नियम मग ते कायदेशीर असोत, नैतिक असोत वा धार्मिक आवश्यकच असतात. त्याचप्रमाणे भाषेचे व्यवहार नीटनीटके पार पडण्यासाठी शुध्दलेखन अपरिहार्यच असते. संपर्क, संवाद साधणे हाच भाषेचा मुख्य उद्देश असतो, तो साधला की झाले, त्यासाठी शुध्दलेखनाचा आग्रह कशाला? असा प्रश्न अनेकदा विचारला जातो. मी हा प्रश्न विचारणार्‍यांना इतकेच सांगेन की लज्जा रक्षण करणे हाच कपड्यांचा मुख्य हेतू आहे म्हणून कोणत्याही प्रकारे ते साधले की झाले हा विचार जेवढा चुकीचा व हास्यास्पद आहे तेवढाच तुमचा शुध्दलेखनाबाबतचा प्रश्न ही आहे.

    भाषेत शुध्द- अशुद्ध असे काढीचे नसते ' या विचारात तथ्य असले तरीही बोली भाषा, लेखी भाषा, प्रमाण भाषा अशी व्यवहाराच्या सोयीसाही केलेली वर्गवारी नजरेआड करून चालत नाही. प्रमाणभाषाही केवळ काही मूठभरांची भाषा आहे आणि म्हणून या भाषेचे शुद्धलेखनाचे नियम आम्हाला मान्य नाहीत या युक्तिवादातही काही अर्थ नाही. शेवटी समाजाचे नेतेपद मूठभर मंडळीच्याच हातात असते आणि त्यांनी घालून दिलेले संकेत, नियम, कायदे सर्वांनाच बंधनकारक असतात हे विसरता कामा नये.

    आजच्या विद्यार्थीवर्गामध्ये शुद्धलेखनाबाबतची अनास्था सार्वत्रिकपणे दिसून येते. या अनास्थेला कारण ठरली आहे शिक्षकवर्गाची शुद्धलेखनाबाबतची उदासीनता. अनेक ठिकाणी शिक्षकानाच शुद्धलेखनाचे किमान नियम माहित नसतात. साहजिकच आपले अज्ञान झाकण्यासाठी ते विद्यार्थ्यांच्या अशुद्धलेखनाकडे दुर्लक्ष करतात. लेखनातील ही अशुद्धता विद्यार्थ्यांच्या वर्तनातूनही कळत नकळत परावर्तित होताना दिसते. शालेय जीवनातील सर्वात आवश्यक असा शुद्धलेखनाचा संस्कार विद्यार्थ्यांवर न घडल्याने त्यांचे व्यक्तिमत्व अपुरे रहाते. शुद्धलेखनासारखी लहानशी शिस्तही न पाळणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच उद्याचे कायद्याची पर्वा न करणारे नागरिक जन्माला येतात. म्हणून शालेय जीवनात विद्यार्थ्यांवर शुद्धलेखनाचा संस्कार घडणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी शिक्षकांचे प्रबोधन करणे, त्यांना या संस्काराची महती पटवून देणे व त्यासाठी सक्षम करणे गरजेचे आहे.

    मराठी लेखन कोशकार अरूण फडके सचिवालयापासून ते प्राथमिक शाळांपर्यंत विविध स्तरावर शुद्धलेखन विषयक जागृती करीत आहेत. अशा मोहिमांमधून निश्चितच अपेक्षित परिणाम साधला जाईल. शुद्धलेखनचा आग्रह धरावा लागता कामा नये तर ती सवय बनली पाहिजे. स्वत:चे व्यक्तिमत्व नीटनेटके ठेवणे जितके अंगवळणी पडले आहे, तितकेच शुद्ध लिहिणेही अंगवळणी पडले पाहिजे. तरच समाजात वैचारिक शुद्धता प्रस्थापित होईल व शुद्ध विचारांतून तितकेच शुध्द आचरण घडेल आणि हा समाज सुंदर बनेल.

    -- चिंतामणी कारखानीस