वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन पीठांपैकी दुसरे व पूर्ण शक्तीपीठ आहे. श्रीमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूर या जिल्ह्याचे ठिकाणी आहे .कोल्हापूरला प्राचीनकाळी गौरवाने दक्षिणकाशी म्हटले जाते असे. महालक्ष्मीचे मंदिर कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती परीसरात पश्चिमाभिमुख आहे या मंदिराचे उल्लेख ईस च्या सुरवाती पासून मिळतात. या मंदिराच्या चारी दिशांना प्रवेश दरवाजे आहेत ईस ११७८ ते १२०९ या काळात शिलाहार राजा जयसिंग व राजा सिंघल यांच्या कारकीर्दीत दक्षिण दरवाजा व येथील अतिबलेश्वर मंदिर यांचे काम झाले.
पश्चिमेकडील प्रवेशद्वाराला ’महाद्वार’ असे म्हणतात ईस 1218 मध्ये यादव तौलम याने हे महाद्वार बांधले. मंदिराबाहेरील खांबांवर केलेलं कोरीव काम अत्यंत रेखीव आहे . मुख्य मंदिरचे काम दगडी असून मंदिर बाहेरुन तारांकित आकाराचे आहे. सध्याच्या मंदिराचा मुख्य भाग इ. स. ६०० ते ७०० या शतका मधील असुन. नवव्या शतकाच्या कालावधीत राजा गंडवादिक्ष याने मंदिराचा जीर्नोधार केला. व येथील महाकालीचे मंदिर बांधले. मुख्य महालक्ष्मी मंदिरास एकूण पाच शिखरे आहेत. मंदिराचे मंडपास अनेक खांब आहेत. मुख्य मंदिराला जोडून गरूड मंडप आहे. मंदिराच्या गर्भगृहात दगडी चबूतऱ्यावर श्रीमहालक्ष्मीची मूर्ती उभी आहे. मूर्ती पश्चिमाभिमुख असून ती चक्रावर उभी आहे, मूर्ती काळ्या रंगाच्या शिलेपासून बनविलेली आहे. मूर्तीची उंची २ फूट ९ इंच असुन मूर्ती चतुर्भुज आहे तिचे वरच्या उजव्या हातात गदा तर डाव्या हातात ढाल आहे. खालच्या उजव्या हातात मातुलिंग व डाव्या हातात पानपात्र आहेत. मस्तकावर मुकुट असून त्यावर शेष नागाने छाया धरली आहे. उत्तराभिमुख योनी व लिंग आहे मागील बाजूस सिंह आहे. मागील बाजूचे चांदीची प्रभावळी वर चंद्रसूर्याच्या दोन आकृत्या आहेत.
महालक्ष्मी विषयी काही कथा प्रचलित आहेंत
गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णू चे भेटीस आले, विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला, बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णू जवळ जावून बसली हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याचे तोंडाची होशील असा शाप दिला.हर ऐकून क्रोधीत झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तू हत्तीण होशील असा शाप दिला. हत्तीण रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्ती साठी तपचर्या सुरु केली. ब्रह्मदेवानी तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले. या स्थाना विषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे.
पुरातनकाळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते. देवही त्याचे पुढे हतबल झाले होते देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्याच्या युद्धाची तयारी केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. शेवटी महालक्ष्मीने बह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं. अश्विन पंचमीस त्याचा वध झाला. मृत्यू समयी त्याने या क्षेत्रास आपले नाव मिळावे असा वर मागितला देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज थेट महालक्ष्मीच्या मुखात शिरलं. त्याचे नावा वरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले.कोल्हासूराच्या वधानंतर आनंदोत्सवात देवदेवता,ऋषीमुनी सर्वजण आले पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले. हे लक्षात आल्यावर महालक्ष्मी इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूवेर्कडच्या टेकडीवर भेटायला गेली. त्र्यंबुली रुसली होती. तिची समजूत काढून तिला येण्याची विनंती केली. तेव्हा तू करवीरक्षेत्री जा. माझा राग गेला, पण मी येणार नाही. असं तिने सांगितलं. व तिने तेथेच वास केला
तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा ही सांगितली जाते.
मंदिराचा प्रदक्षिणेचा मार्ग जवळपास स्वस्तिकाच्या आकाराचा असून सोळा काटकोनातून प्रदक्षिणा घालावी लागते. मुख्य मंदिराच्या दोन्ही
बाजूला श्रीमहाकाली व श्रीमहासरस्वती या देवींची मंदिरे आहेत.
या परिसरात सूमारे २५० देवी-देवतांची मंदिरे आहेत.
अश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापनेपासूनचा नवरात्र उत्सव मोठा असतो. प्रतिपदेला बैठीपूजा, द्वितीयेला खडीपूजा, त्र्यंबोलीपंचमी दिवशी हत्तीच्या अंबारीतील, रथारूढ पूजा, मयुरारूढ पूजा, अष्टमीला महिषासूरमदिर्नी, सिंहवासिनी अशा रूपातील देवीच्या पूजा साकार होतात.
अष्टमीला घागरी फुंकण्या पद्धत आहे मध्यरात्रीपर्यंत धामिर्क सोहळे होतत. नवरात्रीच्या शेवटच्या दिवशीही होमहवन, शस्त्रपूजा होते. तिरुपती मंदिराकडून आलेला शालू त्या दिवशी नेसवला जातो. दसऱ्याच्या दिवशी देवी हत्तीच्या अंबारीत बसते. संध्याकाळी तोफेची सलामी मिळाल्यावर देवीची पालखी निघते. दसरा चौकात शिलंगणाचा होणारा हा सोहळा संपन्न होतो. तिथे सोनं लुटण्याचा कार्यक्रम झाल्यावर देवीची पालखी परत मंदिराकडे निघते. व नवरात्र सोहळा संपन्न होतो.
-- निखिल आघाडे
श्रीदत्त अवतार परंपरेची सविस्तर माहिती…
महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेले माहूरगड हे ठिकाण नांदेड जिल्ह्यात आहे. प्राचीन काळी माहूरचे जंगल ‘ अमलीवन ‘ म्हणून प्रसिद्ध होते .माहूर हे प्राचीन किल्ल्याचे ठिकाण, रेणुकामाता, दत्तात्रेय, अनसूयामाता या तीन डोंगरावरील मंदिरांना सामावणारा माहूरचा हा डोंगरकिल्ला गौंड या आदिवासी राज्याचा एकेकाळी सत्तेचे केंद होता. या परिसराला सुमारे ६ मैल तटबंदी आहे, किल्ल्यावर हत्तीदरवाजा, ब्रह्माकुंड, कारंजी, हौद यांचे अवशेष त्याचे गत वैभवाची साक्ष देत उभे आहेत, १४२७ मध्ये आदिवासी गोंडराजाचा पराभव करून अहमदशहाने माहूरगड जिंकून घेतला . तेव्हा येथील मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली, पुढे किल्लेदार जयसिंग ठाकूर याने रेणुकादेवीचा सभामंडप बांधला .
या सभामंडपवजा मंदिरात प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे पुढे देवीची बैठक असुन देवीच्या बैठकीवर सिंहासन कोरलेले आहे या बैठकीवर ५ फूट उंच व ४ फूट रुंद असा रेणुकादेवीचा तांदळा आहे.
या ठिकाणा विषयी अनेक कथा प्रचलित आहेत.
भागीरथीच्या तीरावार कान्यकुब्ज नावाची नगरी होती. त्या नगरीत इश्वाकू राज्याचा पुत्र रेणू राजा राज्य करीत होता रेणू राजाने कन्याप्राप्तीसाठी. शंकर-पार्वतीला प्रसन्न करून कन्याप्राप्तीसाठी यज्ञ केला. त्या यज्ञकुंडातून रेणुका प्रगटली. यथावकाश भागीरथीच्या तीरावर रेणुकेचे स्वयंवर झाले व ती तपस्वी जमदग्नीची रेणुका भार्या झाली. ते भागीरथी तीरावरील महोदय या नगरीत राहू लागले. त्यांचे सोबत स्वयंवरात इंद्राने दिलेली कामधेनू हि होती, रेणुकेला वसू, विश्वासू, बृहद्भानू, बृहत्कन्न आणि परशुराम ही मुले झाली.
रेणुका एकदा नदीवर गेली असता स्त्रियांसह मदनाचे रूप धारण करणाऱ्या गंधर्वाला पाहून तीचे मनात कामूक भाव येतात ही गोष्ट जमदग्नीला कळते तेव्हा ते क्रोधीत होतात व रेणुकेला मृत्युदंडाची शिक्षा देतात व पुत्रांना तिची हत्या करण्यास सांगतात. एकामागून एक चारही पुत्रांनी रेणुकेचा वध करण्याची पित्याची आज्ञा नाकारताच जमदग्नी त्यांना शाप देऊन ठार करतात.
पाचवा पुत्र परशुरामास आज्ञा करतात,पितृ आज्ञा म्हणून परशुराम तत्काळ आपल्या परशुने रेणुकामातेचे शीर धडावेगळे करतो. जमदग्नी प्रसन्न होतात. पितृवचनाचे पालन केल्यामुळे परशुरामास वर मागण्यास सांगतात. मातृभक्त परशुराम आपल्या मातेला व भावंडांना पुन्हा जिवंत करण्याची विनंती करतात. त्यांना क्रोधाचा पश्चाताप होतो व ते रेणुका व पुत्रांस पुन्हा जिवंत करतात. व आपला क्रोध त्यागतात. पुढे राजा सहस्त्रार्जुन जमदग्नी आश्रमात येतो. त्याला तेथे असणार्या कामधेनू व तिच्या चमत्काराबद्दल कळते. तो जमदग्नीकडे कामधेनूची मागणी करतो; .पण जमदग्नी कामधेनू देण्यास असमर्थता दर्शवितात. तेव्हा राजा आश्रमावर हल्ला करतो. सर्वांची हत्या करून रेणुकेला जखमी करून कामधेनूला घेऊन जातो नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला. घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली . पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पाथिर्व व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले . रानोमाळ भटकत अखेर तो माहूरगडावर पोहचला . तिथे असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरी भूमी दाखवली परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले .या पाण्याने स्नान घालून व तेथेच दत्तात्रेयांचे पौरोहित्या खाली परशुरामाने जमदग्नीवर अंत्यसंस्कार केले. यावेळी माता रेणुका सती गेली. त्यानंतर परशुरामाला रेणुकेची खूप आठवण येऊ लागली . तो शोक करत होता , तोच आकाशवाणी झाली . ‘ तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल .फक्त तू मागे पाहू नकोस .’ परंतु त्याने मागे वळून बघितले . त्यावेळी रेणुकामातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते . तेवढेच परशुरामाला दिसले. त्या तांदळारूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते . परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला ठिकाणाला मातापूर नाव मिळाले पुढे त्याचे माहूर झाले.
या परिसरात महाकाली आणि महालक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. खालील बाजूस परशुराम मंदिर, गणपती मंदिर, पांडवतीर्थ , औदुबर झरा, अमृतकुंड, बोधतीर्थ, मातृतीर्थ, रामतीर्थ , ऋणमोचनतीर्थ ही स्थळे आहेत.
-- निखिल आघाडे
श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.
श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.
निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.
दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे.
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.
श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी
हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते.
गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे - त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
श्री स्वामी समर्थ
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री
ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.
टेंबेस्वामी
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
श्रीमाणिकप्रभू
बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.
दत्तनाथ
उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन - विष्णू - हसकमलासन - अत्री - दत्तगोपाळ - वेडा नागनाथ - निबंजनाथ - जनार्दन – एकनाथ - दत्तभाऊ - केशवबुवा - अंतोबादादा - दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.
श्रीनवनाथ
नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.
श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.
श्रीमहानुभव
महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.
वारकरी
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.
आनंदसंप्रदाय
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.
अन्य परंपरा
याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत.
अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
वाहन : गो माता
दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.
या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.
एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.
सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.
पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.
-- निखिल आघाडे
ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.
पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||
यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.
।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।
आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.
रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा
नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी
मालाबंधन
नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे.
महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.
दीपप्रज्वलन
म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा.
तेल संपल्या मुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.
दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.
फुलोरा
नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.
यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.
हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा.
देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.
पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो.
त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का?
ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे.
त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.
होम
नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्या पासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते.
असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते.
म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.
नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.
महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत.
त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे.
इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.
कुंकूमार्चन
देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदी पासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्री यंत्रावर करतात.
सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.
गाभार्यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.
मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.
महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.
या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.
जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.
सौ. मीनल कुलकर्णी
7249822096
Copyright © 2025 | Marathisrushti