(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्रीमहालक्ष्मीची कहाणी

    आटपाट नगर होतं. तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढं एके दिवशी काय झालं? भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागल्या. हे त्या ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. आईला सांगितलं, आई, आई, आपल्या घरी गौर आण! आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा-अर्चा केली पाहिजे, घावनघाटल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही तुमच्या वडिलांजवळ जा, बाजारातलं सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौर आणीन! मुलं तिथून उठली, वडिलांकडे आली. बाबा बाबा, बाजारात जा. घावनघाटल्याचं सामान आणा. म्हणजे आई गौर आणेल!

    वडिलांनी घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दु:खी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरविता येत नाही. गरिबांपुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या पाळी गेला. जीव द्यावा म्हणून निश्‍चय केला. अर्ध्या वाटेवर गेला, इतक्यात संध्याकाळ झाली. जवळच एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं त्याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं.

    बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्या बाई कोण आणल्या म्हणून विचारलं. नवर्‍यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि अंबिलाकरता कण्या पाहू लागली. तो मडकं आपलं कण्यांनी भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवर्‍याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेज केली, सगळ्यांनी पोटभर खाल्ली. सगळी जणं आनंदानं निजली.

    सकाळ झाली तशी म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. मुला, मुला मला न्हाऊ घालायला सांग, म्हणून म्हणाली, घावनघाटलं देवाला कर. नाही काही म्हणू नको, रंड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला, घरात गेला बायकोला हाक मारली, अगं, अगं, ऐकलंस का, आजीबाईला न्हाऊ घाल, असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ मिळाली. सपाटून गूळ मिळाला. मग सगळं सामान आणलं. ब्राह्मणाला आनंद झाला. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलंबाळंसुद्धा पोटभर जेवली.

    म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी आजी दूध कोठून आणू? तशी म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नको. आता उठ आणि तुला जितक्या गाईम्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर, तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाईम्हशींची नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील. तुझा गोठा भरेल. त्याचं दूध काढ! ब्राह्मणानं तसं केलं, गाईम्हशींना हाका मारल्या (त्या) वासरांना घेऊन धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाईम्हशींनी भरून गेला. ब्राह्मणाने त्यांचं दूध काढलं. दुसर्‍या दिवशी खीर केली.

    संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली, मुला, मुला मला आता पोचती कर! ब्राह्मण म्हणू लागला, आजी आजी, तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला पोचती कसे करू? तुम्ही गेलात म्हणजे हे सर्व नाहीसे होईल? म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नको. माझ्या आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठागौर म्हणतात ती मीच! मला आज पोचती कर! ब्राह्मण म्हणाला, हे दिलेले असंच वाढावं असा काही उपाय सांग!

    गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती सार्‍या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, पेटीत टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं बरं म्हटलं. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावं. दोन खडे घरी आणावे. ऊन पाण्यानं धुवावे. ज्येष्ठागौर व कनिष्ठागौर म्हणून त्यांची स्थापना करावी. त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावनगोड तिसरे दिवशी खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा. सवाष्णीला जेवू घालावं. तिची ओटी भरावी. संध्याकाळी हळदीकुंकू वाहून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षयसुख मिळेल. संतती, संपत्ती मिळेल. ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण.....

    स्त्रीचं मन नेहमी स्वत:च्या कुटुंबाशी जोडलेलं असतं. घराची भरभराट व्हावी घरात नेहमी सुखसमृद्धी नांदावी, आपल्या माणसांचा उत्कर्ष व्हावा व त्यांना चांगले आरोग्य प्राप्त व्हावे ही इच्छा तिच्या मनात सदैव असते त्यामुळेच हे सणवार, व्रतवैकल्ये ती मोठ्या उत्साहाने, श्रद्धेने व मनोभावे करते.

  • आकाशदीप

    सर्वपित्रीत तृप्त झालेले पितर कोजागिरी ते अष्टमी या काळात पवित्र होऊन कराष्टमीपासून ध्रुवाकडे मार्गस्थ होतात. त्यांना मार्गदर्शनासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून सूर्यास्तानंतर एक प्रहारानंतर ते सुर्योदयापर्यंत घराबाहेर आकाश दिशेने एक तेलदिवा जळता ठेवतात तोच आकाशदीप.

    पृथ्वीपासून ध्रुवापर्यंतचे अंतर कापायला आत्म्यांना दहा दिवस लागतात. सतत प्रकाशाने त्यांचे मार्गक्रमण सुकर व्हावे यासाठी या दिवसापासून दिपोत्सवास (दिपावली) प्रारंभ होतो.

  • माझा जन्म… आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – २

    सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.

    माझा जन्म.....
    माझा जन्म हा ….
    माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
    या पृथ्वीवर ….
    जन्म घेण्याशिवाय
    मला
    दुसरा पर्यायच नव्हता ....

    प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.

    वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
    जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……

    ही साखळी अशीच चालू होती.

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.

    आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.

    बाबांचा शुक्राणू...
    त्यांच्या मातापित्यांच्या ....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...

    आअीचं बीजांड ...
    तिच्या मातापित्यांच्या .....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...

    बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
    ....माझा जन्म
    आणि …
    आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
    पुनर्जन्म..

    मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - 2
    शनिवार 3 डिसेंबर 2016

  • गौरीचे आगमन

    भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरी चे त्यापाठोपाठ आगमन होत आहे.

    पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. श्रावण महिन्यात प्रतिष्ठापना पेलेली ज्येष्ठा व भाद्रपद महिन्यात तिच्या शेजारी बसविण्यात येणारी कनिष्ठा अशा दोघींची जोडीने पूजा होईल. पहिल्या दिवशी आगमन, दुस-या दिवशी गौरी भोजन व तिसर्याज दिवशी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला या गौरी -महालक्ष्मीचे विसर्जन करण्यात येते. या निमित्ताने गौरी रेखाटन कलाही विकसित झाली आहे. मातीच्या सुगडावर पिवडी व चुना यांचा वापर करून गौरीचे मुख रेखाटले जाते तर त्या सभोवती शंख, चक्र, पद्म, गदा, हस्त, गाय वासरु, तुळशी वृंदावन, स्वस्तिक, गौरीची पावले अशी प्रतिक चिन्हेही रेखाटली जातात. गुरवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.

    कुटुंबाला एकत्र आणणाऱ्या या गौरीच्या आगमनाची उत्सुकता लहानथोर सर्वानाच असते. मग काय गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत आणि गौरीसाठी जागविलेल्या रात्री असं खूप काही गौरी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे. गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो.काही ठिकाणी गौरीच्या नैवेद्याला घावन घाटले करण्याची पद्धत आहे. आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं.

  • विकृत दृष्टिकोन

    देहाकडे , संसाराकडे व जीवनाकडे पहाण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळे , आधिभौतिक प्रगतीकडे , सामाजिक जीवनाकडे व राष्ट्रहिताकडे लोकांचे संपुर्ण दुर्लक्ष झाले.

  • सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.

    मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.

    माझ्या शुक्राणूत होतं
    माझ्या आअीबाबांच्या अनेक
    पूर्वपिढ्यातून संक्रमित
    झालेलं आनुवंशिक तत्व,

    माझ्या बायकोच्या
    पक्व बीजांडात होतं
    तिच्या आअीबाबांच्या अनेक
    पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.

    आमच्या अपत्याचा जन्म
    हा आमचा निर्णय होता
    या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
    अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता

    माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
    आमच्या अपत्याचा जन्म ….
    आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
    पुनर्जन्म.

    सजीवांच्या ….
    जनक-जननींच्या
    अनेक पूर्वपिढ्यातून
    संक्रमित झालेलं
    आनुवंशिक तत्वंच
    अपत्यरुपानं अनेक
    पुनर्जन्म घेत असतं

    आनुवंशिक तत्व हाच
    सजीवांचा आत्मा आहे.
    तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
    जन्म घेत असतो

    आनुवंशिक तत्व
    दोन जिवंत शरीरातून
    तिसर्या जिवंत शरीरात
    प्रवेश करतं ….
    अेका मेलेल्या शरीरातून
    दुसर्या जिवंत शरीरात नाही.

    वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
    हा श्लोक
    आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
    मान्य नाही

    सजीव मेला की संपला
    त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
    पहिलाच आणि शेवटचाच असतो.

    प्रेताची प्रत्येक पेशी
    सडते विघटन पावते आणि
    अणूरेणूंच्या स्वरूपात
    पर्यावरणात विलीन होते.

    जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
    जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
    हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
    हे ध्यानी घे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    -- गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - ३
    शनिवार १० डिसेंबर २०१६

    सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
    आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत

  • समर्थ रामदास स्वामींनी लिहिलेली गणपतीची संपूर्ण आरती

    समर्थ रामदास स्वामींनी लिहलेली गणपतीची प्रचलित आरती आपण म्हणतो. ती फ़क्त 2 कड़वी म्हटली जातात. पण मूळ आरती ७ कडव्यांची आहे. ती खालीलप्रमाणे आहे

    सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची ।

    नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ॥

    सर्वांगी सुंदर उटि शेंदुराची ।

    कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥१॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥ध्रु०॥

    रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।

    चंदनाची उटी कुंकुमकेशरा ॥

    हिरेजडीत मुकुुट शोभतो बरा ।

    रुणझुणती नूपरें चरणीं घागरिया ॥ जय० ॥२॥

    माथा मुकुट मणी कानी कुंडले ।

    सोंड दोंदावरी शेंदुर चर्चिले ।।

    नागबंद सोंड-दोंद मिराविले ।

    विश्वरूप तया मोरयाचे देखिले ॥ जय० ॥३॥

    चतुर्भुज गणराज बाही बाहुटे ।

    खाजयाचे लाडू करुनी गोमटे ।।

    सुवर्णाचे ताटी शर्करा घृत ।

    अर्पी तो गणराज विघ्ने वारीतो ॥ जय० ॥४॥

    छत्रे चामरे तुजला मिरविती ।

    उंदीराचे वाहन तुजला गणपती ।।

    ऐसा तु कलीयुगी सकळीक पाहसी ।

    आनंदे भक्तासी प्रसन्न होसी ॥ जय० ॥५॥

    ता ता धि मि किट धि मि किट नाचे गणपती ।

    ईश्वर पार्वती कौतुक पाहती ।।

    ताल मृदंग वीणा घोर उमटती ।

    त्यांचे छंदे करुनी नाचे गणपती ॥ जय० ॥६॥

    लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।

    सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ॥

    दास रामाचा वाट पाहे सदना ।

    संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवर वंदना

    ॥ जय ० ॥ ७ ॥

    जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।

    दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥॥

    !!गणपती बाप्पा मोरया!!

  • भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !

    स्वामींच्या चित्राखाली तुम्हांला एक वाक्य दिसेल,
    "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"

    आता ह्यात शब्द किती तर सहा. आता ह्यातल्या कुठल्याही शब्दामागे "च" हे अक्षर लावा आणि अर्थ बघा कसा होतो.

    "भिऊच नकोस मी तुझ्या पाठीशी आहे"

    "भिऊ नकोसच मी तुझ्या पाठीशी आहे"

    "भिऊ नकोस मीच तुझ्या पाठीशी आहे"

    "भिऊ नकोस मी तुझ्याच पाठीशी आहे"

    "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे"

    "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच"

    ।। श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।

    ‬भि......ती कशाची उरात धरतो

    ऊ.......न सावली नियम जगाचा

    न.......को अंतरू परमात्म्याला

    को.....णी नाही त्याविना तुझला

    स.......तत रहा तू नामस्मरणात

    मी......पण नाही स्वामी चरणी

    तु.......झे न काही माझे न काही

    झ्या....गिरदारी कुणा दाखवतो

    पा......मर जीव हे सारे असती

    ठी......क समजुनी राहे जगती

    शी......घ्र धाव घे स्वामीपाशी

    आ......दरे वंदन करी स्वामीशी

    हे........ची विनवितो मी सर्वांशी

    !! श्रीस्वामी समर्थ !!

    '' भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे !"

    -- अनुराग

  • शनिवारचा सत्संग : ५

    देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
    तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||

    देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.

    येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.

    श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्‍या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.

    श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा...आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्‍या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.

    श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।

    लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्‍यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.

    आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।

    विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
    १. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था

    आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.

    गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्‍या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्‍या पेशींची संख्या, निर्माण होणार्‍या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.

    पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती

    शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,

    सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,

    अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.

    1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य...आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्‍याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्‍या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.

    या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.

    2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू...प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.

    3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्‍या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.

    4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.

    सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे ... त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्‍या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.

    सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला....आत्मा.

    -- गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग :: ५
    शनिवार २४ डिसेंबर २०१६

    सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
    आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
    विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता : अध्याय २ : श्लोक १३

  • स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

    स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

    `दादा' म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले. दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय' परिवाराची स्थापना केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.

    श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव आठवले दलितांना भगवद्गीतेचे पाठ सांगायचे. लहानपणी दादा आपल्या आजोबांबरोबर दलित वस्त्यांमधून फिरत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एखाद्या सवर्णाने दलित वस्तीत जाणं, त्यांच्या घरांत बसणं हे फारच धाडसाचं कार्य होतं.

    आजोबांनी दिलेल्या या संस्कारांमुळे दादा प्रत्येक सजीव शक्तीत देव बघायला लागले. दादांनी हिंदू धर्मातील जाचक चातुर्वर्ण्य पद्धतीचा निषेध केला, त्याग केला. दादांचे वडील वैजनाथ हे संस्कृतचे शिक्षक होते. दादांच्या बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या आजोबांनी हेरली होती. पारंपरिक शालेय शिक्षण दादांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्यास असमर्थ असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यांनी दादांसाठी खास शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले. त्यांनी पदार्थ विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि इंग्रजी अशा चार विषयांचे उत्तमोत्तम प्राध्यापक दादांना शिक्षण देण्यासाठी नेमले. हे सर्व शिक्षण दादांना एकटय़ाला समोर बसून शिकवीत असत. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेवर आधारित असा हा आधुनिक प्रयोग होता. या विषयांशिवाय त्यांनी संस्कृत भाषेवर आणि वेद, उपनिषदे, भगवद्गीता, कालिदासाचे काव्य यांच्यावरही प्रभुत्व मिळवले. हा विशेष अभ्यासक्रम नऊ वर्षं चालला. याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दादांवर उत्तम संस्कार झाले. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली. १९५४ मध्ये जापान येथे झालेल्या दुसर्‍या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले. त्यानंतर त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या अनेक संधी आल्या, पण दादांनी त्या नम्रपणे नाकारल्या. वास्तव जीवन आणि भगवद्गीतेची शिकवण यांची सांगड घालण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना दादांच्या मनात आली. तरुणांनी भगवद्गीतेची तत्त्वे वास्तव जीवनात आचरणात आणावीत, म्हणून त्यांनी या विद्यापीठात दोन अभ्यासक्रम सुरू केले. पहिला अभ्यासक्रम `कला विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, इंग्रजी, तर्कशास्त्र, वेद, गीता, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जात. हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. दुसरा अभ्यासक्रम `प्राचीन विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, तर्कशास्त्र आणि वेद यांच्याबरोबरच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही शिकविले जात होते. या विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. आपल्या क्रांतिकारी `स्वाध्याय' चळवळीची सुरुवात त्यांनी १९५८ साली गुजरातमधील सौराष्ट्र विभागात केली. बघताबघता या चळवळीला एका खूप मोठय़ा `परिवारा'चं स्वरूप प्राप्त झालं. लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गांतील तरुण मुले-मुली आणि स्त्री-पुरुष यात सामील झाले. हे सर्व जण जाती-धर्मांच्या भिंती तोडून ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार घडवू लागले. अध्यात्माच्या शक्तीतून आश्चर्यकारकरीत्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडू लागले. मुख्यत: गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे एक लाख गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली. स्वाध्याय परिवारानं सहकारी तत्त्वावर शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली चळवळ चार दशकांत अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान, पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. `रिलिजस इकॉनॉमिस्ट' असा त्यांचा गौरव झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजेस काढली. भगवद्गीतेतील अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची योग्य सांगड त्यांनी घातली. त्यातूनच मच्छीमारांना एक दिवसांचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी वापरण्याचा `मत्स्यगंधा' उपक्रम जवळजवळ वीस वर्षे यशस्वीपणे चालला. `योगेश्वर कृषी'सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत,साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. याग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्वमानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.

    त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली `इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार' १९८८ साली `महात्मा गांधी पुरस्कार', १९९२ साली `लोकमान्य टिळक सन्मान`, १९९६ साली `रेमॉन मॅगसेसे पुरस्कार' आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे `पद्मविभूषण पुरस्कार' अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

    पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २५ ऑक्टोबर २००३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया/ इंटरनेट