(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • दुर्गेचे पहिले रूप – शैलपुत्री देवी

    अस्त्र-शस्त्र : त्रिशुळ
    वाहन : गो माता

    दुर्गेचे पहिले रूप ' शैलपुत्री' या नावाने ओळखले जाते. ही नवदुर्गांपैकी पहिली दुर्गा आहे. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला 'शैलपुत्री' असे नाव पडले आहे.

    नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. या पहिल्याच दिवशीच्या पूजेत संत-महंत आपल्या मनाला 'मूलाधार' चक्रात स्थिर करतात. या दिवसापासून त्यांच्या योग साधनेला सुरवात होते.

    या दुर्गेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हाता कमळाचे फूल आहे. आपल्या पूर्वजन्मात तीने प्रजापती दक्ष राजाची कन्या म्हणून जन्म घेतला होता. त्यावेळी तिचे नाव 'सती' असे होते. तिचा विवाह शंकराशी झाला होता.

    एकदा राजा प्रजापतीने मोठा यज्ञ केला. या यज्ञासाठी त्याने सर्व देवदेवतांना निमंत्रित केले होते. परंतु, त्याने शंकराला निमंत्रित केले
    नव्हते. आपले वडील मोठा यज्ञ करणार असल्याचे समजल्यावर सतीला तिथे जाण्याची तीव्र इच्छा झाली. तिने आपली इच्छा शंकराजवळ प्रकट केली. तेव्हा शंकराने तिला सांगितले, की प्रजापती दक्ष काही कारणास्तव माझ्यावर नाराज आहेत. त्यांनी सर्व देवदेवतांना यज्ञासाठी बोलावले आहे. परंतु, मला मुद्दाम यज्ञाचे निमंत्रण दिले नाही. अशा परिस्थितीत तू तिथे जाणे मला योग्य वाटत नाही. शंकराने समजावून सांगितले तरीही तिचे समाधान झाले नाही. वडीलांचा यज्ञ पाहणे, तसेच आपली आई आणि बहिणींना
    भेटण्यासाठी तिचे मन व्याकूळ झाले होते. तिचा आग्रह पाहून शंकराने तिला यज्ञासाठी जाण्याची परवानगी दिली.

    सती वडिलांच्या घरी गेल्यावर कुणीही तिचे स्वागत केले नाही. तिला कुणीही आदराची वागणूक दिली नाही. आई आणि बहिणींनी देखील तिला गळाभेट दिली नाही. सर्वजण तिच्याकडे पाहून तोंड फिरवत होते. नातेवाईकांची ही वागणूक पाहून तिला अत्यंत राग आला. तिथे शंकराच्या प्रती तिरस्काराची भावना असल्याचे तिला दिसून आले. दक्षाने शंकराविषयी काही अपमानकारक शब्दही वापरले होते. हे सर्व पाहून ती रागाने संतप्त झाली आणि शंकरानसांगितले तेच योग्य होते, असे तिला वाटले आपण इथे येऊन खूप मोठी चूक केली आहे याची जाणीव होऊन नवर्याचा अपमान सहन न झाल्याने तिने स्वत:ला योगाग्नीत जाळून घेतले. याची माहीती शंकराला मिळाल्यावर त्याने लगेच आपल्या गणांना पाठवून प्रजापतीचा संपूर्ण यज्ञ उध्वस्त केला. सतीने पुढील जन्मात शैलराज हिमालयाच्या कन्येच्या रूपात जन्म घेतला. यावेळी ती 'शैलपुत्री' या नावाने प्रसिद्ध झाली.

    पार्वती, हेमवती हे तिचेच नाव होते. 'शैलपुत्री' देवीचा विवाहदेखील शंकराशी झाला होता. पूर्वजन्माप्रमाणे या जन्मीही ती शंकराची अर्धांगिनी बनली. म्हणून नवदुर्गांपैकी प्रथम शैलपुत्री दुर्गेचे महत्त्व आणि शक्ती अनंत आहे.

    -- निखिल आघाडे

  • दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

    ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.

    पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
    कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
    मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
    कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||

    यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

  • विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २  श्लो १२

    विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवत् गीता – अ. २ श्लो १२

    आपण, म्हणजे वर्तमानकाळातील पिढी आणि महाभारतकाळातीलही पिढी, आपल्या म्हणजे त्यांच्याही पूर्वजांच्या रुपात अस्तित्वात होते, महाभारतकाळातील माणसेही, त्यांच्या वंशजांच्या स्वरूपात आजही अस्तित्वात आहेत आणि आपण सर्वजण, पृथ्वीवर सजीव जगू शकतात तो पर्यंत, आपल्या उत्क्रांत झालेल्या वंशजांच्या स्वरूपात अस्तित्वात असणारच आहोत, हे खर्‍या अर्थाने समजणे कठीण आहे असे मला वाटते. यासंबंधीच या लेखात चर्चा केली अअहे.

  • रावण –  खलनायक की नायक ?

    रावण – खलनायक की नायक ?

    रामायणातील खलनायक म्हणून रावणाला ओळखले जाते. रावणाची ही एक वेगळीच ओळख वाचा

  • खास नवरात्रीसाठी

    नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी

    मालाबंधन

    नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे.

    महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.

    दीपप्रज्वलन

    म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा.
    तेल संपल्या मुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.
    दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.

    फुलोरा

    नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.
    यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.
    हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा.
    देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.
    पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो.
    त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का?
    ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे.
    त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.

    होम

    नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्या पासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते.
    असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते.

    म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.
    नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.

    महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत.

    त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे.
    इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.

    कुंकूमार्चन

    देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदी पासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्री यंत्रावर करतात.

  • श्रावणी (उपाकर्म)

    श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्राचे दिवशी करावयाच्या वैदिक विधीला श्रावणी म्हणतात. यालाच उपाकर्म असेही म्हणतात. श्रवण नक्षत्र श्रावण पौर्णिमेच्या जवळपास येते, त्या दिवशी किंवा पंचमीला, हस्त नक्षत्रावर ऋग्वेदी श्रावणी करावी. श्रावण पौर्णिमा यजुर्वेद्यांचा मुख्य काळ, भाद्रपद महिन्यातले हस्त नक्षत्रावर सामवेदी श्रावणी करावी. हे सामान्य नियम आहेत. यांत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्याचा धर्मशास्त्रानुसार निर्णय करावा लागतो.

    श्रावणी कशाकरिता करावी? सांप्रत या दिवशी यज्ञोपवित फक्त बदलतात. हे योग्य नाही. यज्ञोपवित (जानवे) बदलल्याने श्रावणी होत नाही. जे वेदांचे अध्ययन केले आहे त्याचा शिळेपणा नष्ट करणे, तसेच म्हणताना काही दोष झाले असतील तर ते नाहीसे करण्यासाठी हा विधी आहे. नूतन उपनयन झालेल्यांची प्रथम श्रावणी गुरु-शुक्रास्त, सिंहस्थ गुरु असता, करू नये असा शास्त्र संकेत आहे.

    -- विद्याधर करंदीकर

  • मंदिरात दोष पाहु नयेत

    एकदा श्री टेंबे स्वामी तथा वासुदेवानंद सरस्वती मंदिरात पूजेस बसले असता कुणी तरी मंदिरात नैवेद्यासाठी प्रसादाचे पंचपक्वानांचे ताट आणून दिले.

    प्रसादाचे ताट पाहून तेथील ब्राह्मण पुजा-याचा मोह अनावर झाला. त्याने ते नैवेद्याचे ताट त्वरित खाऊन टाकले. तेंव्हा श्री टेंबे स्वामी फार चिडले. त्याला खूप बडबडले व नंतर पुजेस बसले.

    पुजा संपल्यावर श्रीगुरु दत्ताञेय गाभाऱ्यातून निघून जाताना त्यांनी पाहिले. त्यानंतर तीन दिवस त्यांना श्री गुरु दत्ताञेयांनी दर्शन दिले नाही. ते बैचेन झाले. त्यांना कळले मी पुजा-याला टाकून बोललो म्हणून श्रीगुरु दत्ताञेयांना राग आला असणार.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तसेच त्यांच्या मुखातून करुणा ञिपदीचे बोल बाहेर पडले. 'शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।। शांत हो श्रीगुरु दत्ता, मम चित्ता शमवी आता ।।' करुणा ञिपदीचे हे बोल ऐकून श्रीगुरु दत्ताञेय श्री टेंबे स्वामी सरस्वतींच्या समोर उभे राहिले.

    तेव्हा श्री टेंबे स्वामी म्हणाले, "देवा माझे काही चुकले असे मला वाटत नाही. तुला नैवैद्य दाखवायच्या अगोदर त्या पुजा-याने तो खाऊन टाकला".

    तेव्हा श्री गुरु दत्ताञेयांनी प्रश्न केला, " इथे सत्ता कोणाची ? " ह्या प्रश्नावर श्री टेंबे स्वामी म्हणाले, " देवा इथे सत्ता तुमची आहे. इथे सारे तुमच्या इच्छेने चालते ". त्यावर श्री गुरु दत्ताञेय म्हणाले, "अरे तो पुजारी गेली तीन दिवस उपाशी होता. त्याच्या साठी मी ते ताट पाठवले होते. ते त्याने खाल्ले. त्यात तुझे काय गेले ?" त्यावर श्री टेंबे स्वामी सरस्वतींना आपली चूक कळली व श्री गुरु दत्ताञेय अंतर्धान पावले.

    या अध्यात्मिक मार्गात प्रामाणिक पणे वाटचाल करणाऱ्या माणसाची देवाकडून गुरु कडून क्षणाक्षणाला परीक्षा बघितली जाते. इतका हा मार्ग कठीण आहे.

    टेंबे स्वामी हे अधिकारी पुरुष होते एका रागामुळ्ये त्यांची ही अवस्था झाली. आपण तर सामान्य माणस आपण जर राग आवरु शकलो नाही तर आपली आयुष्यभराची साधना व्यर्थ ठरु शकते.

    ??आपण ज्या मंदिराला जातो तेथे एकच गोष्ट लक्षात ठेवावी, त्या मंदिरात त्या देवाची सत्ता असते. तिथे काय घडते ते पाहू नये. तिथे चालणाऱ्या सर्वच गोष्टींकडे त्या देवतेचे लक्ष असते. मंदिरातील सेवेकरी, पुजारी, विश्वस्त यांचे सर्व कृत्य त्या देवाला माहीत असते.

    ज्या ठिकाणी ईश्वरी शक्तीचे सत्तेचे अधिष्ठान असते तेथे सामान्य माणसाने फक्त ईश्वरी इच्छेचा आदर करावा.............

  • नागपंचमी

    श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा करतात.हे एक व्रतसुद्धा आहे. व्रतामध्ये श्रावण शुद्ध चतुर्थीला एकभुक्त राहून पंचमीचे दिवशी पाच फण्यांच्या नागाचे चित्र काढून त्यांच्यासोबत नागपत्यांचे सुद्धा चित्र काढतात. त्यानंतर संकल्प करून नागाची पूजा करतात. नागाला दूध -लाह्यांचा नैवेद्य दाखवतात.

    नागपंचमीला अखिल भारतीय महत्त्व आहें. भारतात सर्वच भागात नागपंचमीचा सण साजरा केला जातो. काही ठिकाणी प्रत्येक पंचमीला अनंत, वासुकी वगैरे बारा नागांची पूजा करून वर्षभर व्रत करण्याचा प्रघात आहे.

    पौराणिक कथेप्रमाणे नागाची उत्पत्ति कश्यप व कडू यांचेपासून झाली आहे. या दंपतीला जी सर्पसंतती झाली त्यातील प्रमुख आठ सर्प आहेत. अनंत, वासुकी, तक्षक, कर्कोटक ,पद्म, महापद्म, शंख व कुलिक यांनाच उरष्टनाग असे म्हणतात.

    भारतीय संस्कृतीत वृक्ष, वेली, झाडे, प्राणी वगैरे सर्वांनाच देवत्व दिले आहे. याचे कारण या सर्व गोष्टी मानवाला उपकारक आहेत. काही वेळा माणूस भीतीने सुद्धा आपल्यापेक्षा वरचढ असणाऱ्या गोष्टींची पूजा करतो. सर्प हे शेती व्यवसायाला देखील उपकारक ठरतात. (उंदीर वगैरे खाऊन) या दोन्ही कारणांनी नागपूजन आले असावे.

    -- विद्याधर करंदीकर

  • स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले

    `दादा' म्हणजेच मा.पांडुरंग शास्त्री आठवले. दादा एक उत्तम तत्त्वज्ञ आणि समाज सुधारक होते. त्यांनी `स्वाध्याय' परिवाराची स्थापना केली. पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोहे येथे झाला. त्यांचा जन्मदिवस स्वाध्याय परिवार जगभर मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा करतात.

    श्रीमद् भगवद्गीता आणि उपनिषदे यांच्यावर आधारीत तत्त्वज्ञानाच्या आधारे त्यांनी समाजसुधारणेचा ध्यास घेतला आणि कर्मयोगातून सामान्य जनतेला सुखी जीवनाचा मार्ग शोधून दिला. त्यांचे आजोबा लक्ष्मणराव आठवले दलितांना भगवद्गीतेचे पाठ सांगायचे. लहानपणी दादा आपल्या आजोबांबरोबर दलित वस्त्यांमधून फिरत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला एखाद्या सवर्णाने दलित वस्तीत जाणं, त्यांच्या घरांत बसणं हे फारच धाडसाचं कार्य होतं.

    आजोबांनी दिलेल्या या संस्कारांमुळे दादा प्रत्येक सजीव शक्तीत देव बघायला लागले. दादांनी हिंदू धर्मातील जाचक चातुर्वर्ण्य पद्धतीचा निषेध केला, त्याग केला. दादांचे वडील वैजनाथ हे संस्कृतचे शिक्षक होते. दादांच्या बुद्धिमत्तेची जाणीव त्यांच्या आजोबांनी हेरली होती. पारंपरिक शालेय शिक्षण दादांच्या बुद्धिमत्तेला न्याय देण्यास असमर्थ असल्याचं त्यांना वाटत होतं. त्यांनी दादांसाठी खास शिक्षणाची सोय करण्याचे ठरविले. त्यांनी पदार्थ विज्ञान, साहित्य, तत्त्वज्ञान आणि इंग्रजी अशा चार विषयांचे उत्तमोत्तम प्राध्यापक दादांना शिक्षण देण्यासाठी नेमले. हे सर्व शिक्षण दादांना एकटय़ाला समोर बसून शिकवीत असत. प्राचीन गुरु-शिष्य परंपरेवर आधारित असा हा आधुनिक प्रयोग होता. या विषयांशिवाय त्यांनी संस्कृत भाषेवर आणि वेद, उपनिषदे, भगवद्गीता, कालिदासाचे काव्य यांच्यावरही प्रभुत्व मिळवले. हा विशेष अभ्यासक्रम नऊ वर्षं चालला. याचा अतिशय चांगला परिणाम दिसून आला. दादांवर उत्तम संस्कार झाले. त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळाली. वयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली. १९५४ मध्ये जापान येथे झालेल्या दुसर्‍या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले. त्यानंतर त्यांना परदेशात स्थायिक होण्याच्या अनेक संधी आल्या, पण दादांनी त्या नम्रपणे नाकारल्या. वास्तव जीवन आणि भगवद्गीतेची शिकवण यांची सांगड घालण्यासाठी तत्त्वज्ञान विद्यापीठाची कल्पना दादांच्या मनात आली. तरुणांनी भगवद्गीतेची तत्त्वे वास्तव जीवनात आचरणात आणावीत, म्हणून त्यांनी या विद्यापीठात दोन अभ्यासक्रम सुरू केले. पहिला अभ्यासक्रम `कला विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, इंग्रजी, तर्कशास्त्र, वेद, गीता, उपनिषदे आणि तत्त्वज्ञान हे विषय शिकविले जात. हा सहा वर्षांचा अभ्यासक्रम होता. दुसरा अभ्यासक्रम `प्राचीन विभाग' असा होता. ज्यात संस्कृत, तर्कशास्त्र आणि वेद यांच्याबरोबरच पाश्चात्त्य तत्त्वज्ञानही शिकविले जात होते. या विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेतले जात नव्हते. आपल्या क्रांतिकारी `स्वाध्याय' चळवळीची सुरुवात त्यांनी १९५८ साली गुजरातमधील सौराष्ट्र विभागात केली. बघताबघता या चळवळीला एका खूप मोठय़ा `परिवारा'चं स्वरूप प्राप्त झालं. लाखो गरीब, मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्गांतील तरुण मुले-मुली आणि स्त्री-पुरुष यात सामील झाले. हे सर्व जण जाती-धर्मांच्या भिंती तोडून ईश्वरी प्रेमाचा साक्षात्कार घडवू लागले. अध्यात्माच्या शक्तीतून आश्चर्यकारकरीत्या सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडू लागले. मुख्यत: गुजरात आणि महाराष्ट्रातील सुमारे एक लाख गावांपर्यंत ही चळवळ पोहोचली. स्वाध्याय परिवारानं सहकारी तत्त्वावर शेती, मासेमारी आणि वृक्ष लागवड अशा अनेक योजना यशस्वीरीत्या राबविल्या. सुरुवातीला काही गावांमध्ये सुरू झालेली चळवळ चार दशकांत अमेरिका, इंग्लंड, आफ्रिकेपर्यंत पसरली. व्यसनमुक्ती, सामाजिक जबाबदारीचे भान, पर्यावरणसंवर्धन आणि स्वकष्टाने आत्मसन्मान जागवून समानता निर्माण करण्याचा मंत्र या सूत्रांवर त्यांच्या स्वाध्याय चळवळीचा पाया उभा राहिला. `रिलिजस इकॉनॉमिस्ट' असा त्यांचा गौरव झाला. शेतकरी बंधूंच्या मुलांसाठी त्यांनी सहा कॉलेजेस काढली. भगवद्गीतेतील अध्यात्म आणि आधुनिक जीवन यांची योग्य सांगड त्यांनी घातली. त्यातूनच मच्छीमारांना एक दिवसांचे उत्पन्न आपल्या बांधवांच्या कुटुंबीयांसाठी वापरण्याचा `मत्स्यगंधा' उपक्रम जवळजवळ वीस वर्षे यशस्वीपणे चालला. `योगेश्वर कृषी'सारख्या उपक्रमातून सामूहिक शेतीचा मंत्र त्यांनी दिला. पारंपारिक शिक्षणाबरोबर 'सरस्वती संस्कृत पाठशाळेत' संस्कृत व्याकरणाबरोबर न्याय, वेदांत,साहित्य, त्याचबरोबर इंग्लिश भाषा साहित्याचा अभ्यास पांडूरंगशास्त्री यांनी केला. त्यांना रॉयल ऐशियाटिक सोसायटी मुंबई या संस्थेने सन्माननीय सभासद पद देऊन सन्मानीत केले होते. याग्रंथालयात त्यांनी कादंबरी विभाग सोडून सर्वमानव्य शाखेतील प्रमुख लेखकांचे, ग्रंथाचे अध्ययन केले. वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे यावर चिंतन केले. श्रीमद्भगवद्गीता पाठशाळेत (माधवबाग मुंबईत) पांडुरंगशास्त्री यांनी पवित्र व्यासपिठावरुन नियमितपणे न चुकता वैदिकांचा तेजस्वी जीवनवाद, way of life, way of worship & way of thinking याचा विचार सतत दिला.

    त्यांना जगभरातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्यात १९८७ साली `इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कार' १९८८ साली `महात्मा गांधी पुरस्कार', १९९२ साली `लोकमान्य टिळक सन्मान`, १९९६ साली `रेमॉन मॅगसेसे पुरस्कार' आणि १९९९ साली भारत सरकार तर्फे `पद्मविभूषण पुरस्कार' अशा अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचा समावेश आहे.

    पांडुरंगशास्त्री आठवले यांचे २५ ऑक्टोबर २००३ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया/ इंटरनेट

  • मनःस्वास्थ

    जीवनात मन:स्वास्थ्य मिळणे फारच आवश्यक आहे. मन:स्वास्थ्य बिघडले तर जीवनाला काहीच अर्थ उरत नाही.

    मन:स्वास्थ्य बिघडले की जीवनात असंख्य समस्या निर्माण होतात. याच्या उलट मन:स्वास्थ्य असेल तर माणसांना समाधानी जीवन प्राप्त होते.

    मन:स्वास्थ्य आपोआप निर्माण होत नाही किंवा मिळत नाही. भरपूर पैसा मिळविला किंवा मिळाला म्हणजे मन:स्वास्थ्य मिळेल असा बहूसंख्य लोकांचा भ्रम असतो.

    उलट पैसा अधिक मिळू लागला म्हणजे मन:स्वास्थ्य अधिक बिघडत जाते असा बहुसंख्य लोकांचा अनुभव असतो.

    विशिष्ट प्रक्रियेने मनाला स्थिर करता आले तरच मन:स्वास्थ्य मिळू शकते.

    मनासारखे करीत न रहाता मनाला ' सारखे ' केल्याने माणसाला मन:स्वास्थ्य प्राप्त होते.

    -- सदगुरु श्री वामनराव पै