वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
रंगवल्ली या संस्कृत शब्दापासून झालेले रुपांतर म्हणजे रांगोळी होय. भारतीयांचा कोणताही सण अथवा धार्मिक कार्य असो, दारापुढे रांगोळी काढण्याचा प्रघात पूर्वी पासून चालत आलेला आहे. रांगोळी काढल्यानंतर धार्मिक विधीला आरंभ होतो.
दक्षिण भारतात अगदी रोज, तर बर्याच ठिकाणी सणासुदीला अंगणात अथवा दरवाज्यासमोर स्त्रिया रांगोळी काढतात. रांगोळी ही एक कला असून त्यासाठी निरनिराळ्या रंगांचा उपयोग केला जातो. फुलांची व धान्यांचीही रांगोळी काढली जाते.
चैत्र महिन्यात अंगणात एक कोपरा शेणाने सारवून त्यावर विविध प्रकारच्या चिंन्हांनी रांगोळी काढून त्यावर हळद कुंकू व फुले वाहतात. रांगोळी काढल्यामुळे आपल्या वास्तूत सतत लक्ष्मीचा प्रवेश होतो ही त्यामागील भावना असते.
देवाच्या मुर्तीत प्राणप्रतिष्ठेच्या रुपाने मंत्रशक्तीचा वास असतो. यासाठी देवाच्या मस्तकावर वासाची फुले वाहिली जातात. मंत्रशक्तीचे उत्सर्जन त्या फुलांतून होत असते.
देवांना फुले अतिशय प्रिय असतात. गणेशाला तांबडे फूल, शिवाला पांढरे फुल, विष्णूला पिवळे फूल आणि ब्रम्हाला कमळाचे फूल वाहण्याचा प्रघात आहे.
फुलांचे हार करुन ते देवांच्या तसेच संत, महंत व विद्वानांचा गौरव करण्यासाठी त्यांच्या गळ्यात घातले जातात.
स्त्रिया आपल्या केसांच्या वेणीत फुलांचा गजरा करुन माळतात.
फुलांपासून निरनिराळ्या प्रकारची अत्तरे बनवतात. त्या अत्तराचे थेंब कपड्यावर टाकल्यास त्यांच्या वासाने मन प्रसन्न होऊन शरीर उत्तेजित होते.
फुलपुडी
सर्व धान्यामध्ये तांदुळाला महत्त्वाचे स्थान असून तांदुळापासून केलेला भात हे उदर भरणाचे साधन आहे.
क्षत म्हणजे भोक पडणे. ज्या धान्याला भोक पडत नाही ते धान्य म्हणजे तांदूळ असून त्याला अक्षता म्हटले जाते. पूजेच्यावेळी देवांवर आणि लग्नप्रसंगी वधूवरांवर कुंकूमिश्रित अक्षता टाकल्या जातात. याचे कारण असे की देवाने आपल्यावर कृपा करावी व वधूवरांचे जीवन सुखी व्हावे हा त्यामागील हेतू असतो.
मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मूर्तीच्या खाली अक्षता ठेवूनच मूर्तीची स्थापना केली जाते. कारण मूर्तीचा क्षय होऊ नये.
झोपताना उशीच्या खाली चारसहा अक्षता पुडीत बांधून ठेवल्यास झोप शांत लागते. अणि चित्त, मन व बुध्दी स्थिर राहुन त्याला बाधा येत नाही.
ओंकाराच्या आज्ञेनुसार ब्रम्हदेवाने अक्षतांची निर्मिती केली त्यामुळे प्रसन्न होऊन सर्व मंगलकार्यात अक्षतांना प्राधान्य दिले जाईल असा वर ओंकाराने ब्रम्हाला दिला अशी कथा पुराणात असल्यामुळे अक्षतांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
स्त्री-पुरुषांचे भाळी कुंकूम तिलकावरही अक्षता लावल्या जातात ज्यायोगे त्यांना प्रत्येक कार्यात यश प्राप्त व्हावे.
अनेक कायस्थ कुटुंबात अतिशय भक्तीभावानी गायली जाणारी हि श्री म्हाळसाकांताची आरती आपल्या सर्वांच्या माहितीसाठी .... !!!!
पिवळे निशाण तुमचे पिवळे शिखर ..पिवळे शिखर !
पिवळा कांचन पर्वत , पिवळा कांचन पर्वत ...पिवळे नगर
पिवळी तुमची काया पिवळा शृंगार ....पिवळा शृंगार !
पिवळे राजे तुम्ही ...पिवळे राजे तुम्ही राणी सुकुमार !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा
विशाल शंकर ढवळा... विशाल शंकर ढवळा ,त्याहुनी तू पिवळा //१//
पिवळी बाणा बाई धनगरीण बाळ, धनगरीण बाळ
पिवळ्या घोड्यावरी बससी मैराळ !
चारी वाद्ये वाजती देवांच्या सकळा देवांच्या सकळा
दासी झाल्या मुरळ्या ..दासी झाल्या मुरळ्या
भोगिसी त्या सकळा !
जयदेव जयदेव जयशिव मैराळा जयशिव मैराळा ....
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा , त्याहुनी तू पिवळा //२//
चंपाषष्ठी चा कुळधर्म केला ...कुळधर्म केला
पिवळ्या पुरणाची ..पिवळ्या पुरणाची आरती देवाला
रोग्याने सेवा केली त्यावरी सकळा ...त्यावरी सकळा ,
त्यावरी कृपा केली... त्यावरी कृपा केली ...पिवळ्या मैराळा
जयदेव जयदेव ..जयशिव मैराळा ,जयशिव मैराळा
विशाळ शंकर ढवळा , विशाळ शंकर ढवळा ...त्याहुनी तू पिवळा //४//
सदानंदाचा येळकोट !!!
येळकोट येळकोट ...जय मल्हार !!!
-- चिंतामणी कारखानीस
देवपूजेचे वेळी देवापुढे नागवेलीची पाने व त्याच्यावर सुपारी ठेवण्याचा कुलाचार आहे. लग्न, मुंज आदी मंगलकार्यप्रसंगी देखील अतिथींना पान सुपारी देण्याची प्रथा आहे.
नागवेलीच्या पानांना विड्याची पाने व पोफळी झाडाच्या फळाला सुपारी म्हणतात. देठासहित असलेले विड्याचे पान आपल्या हृदयाचे प्रतीक म्हणून समजले जाते. हे पान हिरवेगार असून मनाला अल्हाद देणारे असते. विड्याच्या पानाला त्यात सुपारी व कात टाकून तो विडा भोजनानंतर मुखशुध्दिसाठी खाल्ला जातो. कारण विडा हा वातहारक व जंतनाशक असतो.
सुपारी ही मांगल्याचे व प्रेमभावाचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे अखंड सुपारी ही गणपती देवाची प्रतिमा समजून तिची पूजा करतात.
पत्निचे देहावसान झाले असता पती आपल्या कनवटीला सुपारी लावून धार्मिक कृत्य करतो. कारण सुपारी ही त्याची प्रतिधिनिक स्वरुपातील पत्नी मानली जाते.
सुपारीचे अनेक प्रकार आहेत त्यांपैकी मसालेदार सुपारी ही सर्वांना आवडते. सुपारी चघळण्यामुळे लाळ रस उत्पन्न होतो.
परवा फेस बुक वरील माझ्या एका मित्राने समर्थ रामदास स्वामी यांचा उल्लेख "नारायण ठोसर" असा एकेरी केला. मुद्दा वादाचा जरी होता तरी त्यात समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख अशा प्रकारे आल्याने मी फार व्यथित झालो. समर्थ कुठल्याही जातीच्या पलीकडले व्यक्तिमत्व होते, नव्हे ते तर प्रत्यक्ष हनुमान स्वरूप होते. ते ब्राम्हण जातीत जन्माला आले किंवा त्यांचा उल्लेख शिवरायांचे गुरु म्हणून इतिहासात आला आहे यावर कुणाचाही आक्षेप असू शकतो. परंतु त्यांनी केलेल्या दासबोधाची निर्मिती हि एक दैवी चमत्कार असलेली निर्मिती आहे या बद्दल माझ्या मनात शंका नाही. मी दासबोधाचा नियमित वाचक आणि अभ्यासक आहे. अमृतानुभव जितका मला प्रिय आहे तितकाच दासबोध आणि तुकारामांची गाथा मला प्रिय आहे.
समर्थ जन्मताच "परामानस विद्या" ज्याला इंग्रजीत " Advanced Psychology " असे म्हणतात त्यात पारंगत होते. दासबोध हा त्यांचा ग्रंथ ३५० वर्षापूर्वीचा Advanced Psychology चाच ग्रंथ आहे.
समर्थांनी लिहिलेल्या आरत्या आणि स्त्रोत्र हि आजही घरोघरी गायली जातात. समर्थ देश भर फिरले, निबिड अरण्यात त्यांनी गुहेत बसून तपस्या केली. ग्रंथ निर्मिती केली. समर्थांचे आयुष्य वादातीत होते.
मी काही दिवस समर्थांच्या वर लिहिण्याचे ठरवले आहे. सुरवात करताना त्यांनी लिहिलेल्या "चातुर्य लक्षणा"पासून करणार आहे.
उच्च नीच जातीत जन्मणे हे कुणाच्याही हातात नसते. शरीराचे सुंदर दिसणे अथवा कुरूप पणा हा सुद्धा निसर्गदत्त असतो. पण म्हणून लोकांनी जाणीव पूर्वक काही 'गुण' धारण करावे असे समर्थ म्हणतात. या गुणांना समर्थ "आगंतुक गुण" असे म्हणतात.
समास सहावा : चातुर्यलक्षण || १४.६ ||
॥श्रीराम॥
रूप लावण्य अभ्यासितां नये | सहजगुणास न
चले उपाये | कांहीं तरी धरावी सोये | अगांतुक गुणाची ||१||
काळें माणुंस गोरें होयेना | वनाळास येत्न चालेना |
मुक्यास वाचा फुटेना | हा सहजगुण ||२||
आंधळें डोळस होयेना | बधिर तें ऐकेना |
पांगुळ पाये घेइना | हा सहजगुण ||३||
कुरूपतेचीं लक्षणें | किती म्हणोनि सांगणें |
रूप लावण्य याकारणें | पालटेना ||४||
अवगुण सोडितां जाती | उत्तम गुण अभासितां येती |
कुविद्या सांडून सिकती | शाहाणे विद्या ||५||
मूर्खपण सांडितां जातें | शाहाणपण सिकतां येतें |
कारबार करितां उमजतें | सकळ कांहीं ||६||
मान्यता आवडे जीवीं | तरी कां उपेक्षा करावी |
चातुर्येंविण उंच पदवी | कदापी नाहीं ||७||
ऐसी प्रचित येते मना | तरी कां स्वहित कराना |
सन्मार्गें चालतां जनां | सज्जना माने ||८||
देहे नेटकें श्रुंघारिलें | परी चातुर्येंविण नासलें |
गुणेंविण साजिरें केलें | बाष्कळ जैसें ||९||
अंतर्कळा श्रुंघारावी | नानापरी उमजवावी |
संपदा मेळऊन भोगावी | सावकास ||१०||
प्रेत्न करीना सिकेना | शरीर तेंहि कष्टविना |
उत्तम गुण घेईना | सदाकोपी ||११||
आपण दुसऱ्यास करावें | तें उसिणें सवेंचि
घ्यावें | जना कष्टवितां कष्टावें | लागेल बहु ||१२||
न्यायें वर्तेल तो शाहाणा | अन्याइ तो दैन्यवाणा |
नाना चातुर्याच्या खुणा | चतुर जाणे ||१३||
जें बहुतांस मानलें | तें बहुतीं मान्य केलें |
येर तें वेर्थचि गेलें | जगनिंद्य ||१४||
लोक आपणासि वोळावे | किंवा आवघेच कोंसळावे |
आपणास समाधान फावे | ऐसें करावें ||१५||
समाधानें समाधान वाढे | मित्रिनें मित्रि जोडे |
मोडितां क्षणमात्रें मोडे | बरेपण ||१६||
अहो कांहो अरे कां रे | जनीं ऐकिजेतें किं रे |
कळत असतांच कां रे | निकामीपण ||१७||
चातुर्यें श्रुंघारे अंतर | वस्त्रें श्रुंघारे शरीर |
दोहिमधें कोण थोर | बरें पाहा ||१८||
बाह्याकार श्रुंगारिलें | तेणें लोकांच्या हातासि काये
आलें | चातुर्यें बहुतांसी रक्षिलें | नाना प्रकारें ||१९||
बरें खावें बरें जेवावें | बरें ल्यावें बरें नेसावें |
समस्तीं बरें म्हणावें | ऐसी वासना ||२०||
तनें मनें झिजावें | तेणें भले म्हणोन घ्यावें |
उगेंचि कल्पितां सिणावें | लागेल पुढें ||२१||
लोकीं कार्यभाग आडे | तो कार्यभाग जेथें घडे |
लोक सहजचि वोढे | कामासाठीं ||२२||
म्हणोन दुसर्यास सुखी करावें | तेणें आपण सुखी व्हावें |
दुसऱ्यास कष्टवितां कष्टावें | लागेल स्वयें ||२३||
हें तों प्रगटचि आहे | पाहिल्याविण कामा नये |
समजणें हा उपाये | प्राणीमात्रांसी ||२४||
समजले आणी वर्तले | तेचि भाग्यपुरुष जाले |
यावेगळे उरले | तें करंटे पुरुष ||२५||
जितुका व्याप तितुकें वैभव | वैभवासारिखा हावभाव |
समजले पाहिजे उपाव | प्रगटचि आहे ||२६||
आळसें कार्येभाग नासतो | साक्षेप होत होत होतो |
दिसते गोष्टी कळेना तो | शाहाणा कैसा ||२७||
मैत्रि करितां होतें कृत्य | वैर करितां होतो मृत्य |
बोलिलें हें सत्य किं असत्य | वोळखावें ||२८||
आपणास शाहाणें करूं नेणें | आपलें हित आपण
नेणें | जनीं मित्रि राखों नेणे | वैर करी ||२९||
ऐसे प्रकारीचे जन | त्यास म्हणावें अज्ञान |
तयापासीं समाधान | कोण पावे ||३०||
आपण येकायेकी येकला | सृष्टींत भांडत चालिला |
बहुतांमध्यें येकल्याला | येश कैंचें ||३१||
बहुतांचे मुखी उरावें | बहुतांचे अंतरीं भरावें |
उत्तम गुणीं विवरावें | प्राणीमात्रांसी ||३२||
शाहाणे करावे जन | पतित करावे पावन |
सृष्टिमधें भगवद्भजन | वाढवावें ||३३||
इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे
चातुर्यलक्षणनाम समास सहावा || १४.६ ||
-- चिंतामणी कारखानीस
आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो.....
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात.....
ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे.....
त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे.....
अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे.....
एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात.....
ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ त्यांनी लिहिला ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनीसुध्दा ज्ञानेश्वरी लिहिताना 'व्यासांचा मागोवा घेतू' असे म्हणून सुरुवात केली.....
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ' *ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे*' अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा
आहे.....
आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे.....
आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो.....
अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय.....
महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली, ती आजमितीपर्यंत.....
आपण कोणाचे तरी शिष्य आहोत, या भावनेत एक कृतज्ञता वाटते.....
भारतीय गुरुपरंपरेत गुरु-शिष्यांच्या जोड्या प्रसिद्ध आहेत.....
जनक-याज्ञवल्क्य, शुक्राचार्य-जनक, कृष्ण, सुदामा-सांदिपनी, विश्वामित्र-राम, लक्ष्मण, परशुराम-कर्ण, द्रोणाचार्य-अर्जुन अशी गुरु-शिष्य परंपरा आहे.....
मात्र एकलव्याची गुरुनिष्ठा पाहिली की, सर्वांचेच मस्तक नम्र झाल्याशिवाय राहत नाही.....
भगवान श्रीकृष्णांनी गुरूच्या घरी लाकडे वाहिली. संत ज्ञानेश्वरांनी वडीलबंधू निवृत्तीनाथ यांनाच आपले गुरु मानले, तर संत नामदेव साक्षात विठ्ठलाशी भाष्य करीत असत. त्या नामदेवांचे गुरु होते विसोबा खेचर. भारतीय संस्कृतीत गुरूला नेहमीच पूजनीय मानले आहे.....
गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.....
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही.....
त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. 'गुरु बिन ज्ञान कहासे लाऊ?' हेच खरे आहे.....
गुरूंच्या उपकारांनी आपले मन कृतज्ञतेने भरून येते, तेव्हा आपल्या तोंडून श्लोक बाहेर पडतो -
गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः
अनेक विद्यालयांतून, महाविद्यालयांतून श्रद्धाशील विद्यार्थी आपापल्या गुरुजनांसमोर या दिवशी विनम्र भावनेने नतमस्तक होतात. वेगवेगळ्या पंथोपपंथांतून ईश्वरभक्तीकडे जाण्याचे मार्ग शोधणारे मुमुक्षू-पारमार्थिक या दिवशी आपल्या गुरुंचे भक्तिभावाने पूजन करतात. ज्यांना या ना त्या कारणांमुळे गुरुंचे समक्ष दर्शन वा सहवास घडू शकत नाही ते त्यांच्या प्रतिमेची पूजा करतात.
आपण सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपले मार्गदर्शन, प्रोत्साहन, आशिर्वाद, सुचना देऊन आमच्या आयुष्याला आकार देण्याचे गुरुंचे कार्य करीत असता.
॥ गुरू पौर्णिमेच्या आपणास मनापासून शुभेच्छा॥
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका येथील श्री. गोदड महाराज यांचा जन्म शके १६८१ श्रावण शुद्ध दशमी, गुरुवारी झाला. महाराजांचे जन्मनाव "अमरसिंह" होते
ते स्वभावाने विरक्त , निर्भय अणि शीघ्रकोपी होते ,वडिल भिकाजी हे राजस्थानातील उदयपुर संस्थान येथील पराक्रमी राजवंशातिल होते तर आई चंद्रभागा ही कर्जत येथील तोरडमल कुटुम्बातिल होती. अमरसिंह वयाने सहा सात वर्षाचे असतानाच त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण झाली , मला विट्ठालानेच मुक्त केले असे त्यांना वाटले दगडाचेच टाल करून ते विट्ठल नाम गाऊ लागले, त्याचवेली विट्ठलभक्ति हाच ध्यास त्यांना लागला होता , एके दिवशी अमरसिंह फिरता फिरता त्यांची भेट पैठण चे संत एकनाथ महाराज यांचे शिष्य परंपरेतील शिष्य " नारायणनाथ " यांच्याशी झाली . त्यांनी अमरसिहाला आनंद साम्प्रदयाची दीक्षा दिली व आपल्या जवळची गोधडी अमरसिहाच्या अंगावर टाकुन सांगितले की आता यापुढे तुजे नाव "गोदडनाथ " (गोदड महाराज).
तू यापुढे सातपुडा पर्वतावर जाउन तपश्चर्या करावी तेथेच तुला विट्ठालाचे दर्शन होइल असा आशीर्वाद दिला , त्यानंतर त्यांनी कठोर साधना केली त्यामुले त्यांना विट्ठल रुक्मिनिने दर्शन दिले . त्याच वेळी सातपुडा पर्वतावरील वज्रेश्वरी देवीनेही त्यांना दर्शन दिले व आशीर्वाद दिला .
विविध ठिकाणी भ्रमंती नंतर गोदड महाराज यांची दिंडी पंढरपुर येथे गेली असता तेथे ते भजन किर्तानांत रंगले , त्यावेळी एक ऊच्चकुलीन स्त्री चंद्रभागा नदीवर पाणी भरण्यासाठी घागर घेउन आली असता तिचा पाय महाराजांच्या तम्बुच्या दोरीला अडकून ती पडली त्यामुले ती चिडून गोदड महाराजांना बोलली , हे त्यांना सहन झाले नाही व त्यांनी आपले सर्व साहित्य , रथ , पताका , तम्बू इत्यादि चन्द्रभागेच्या वाळवंट या ठिकाणी अग्नीत पेटून दिले व या आत्मक्लेशामुले स्वतः देहात्यागाची तयारी केली त्या अग्निमधे उडी टाकणार इतक्यात त्या गर्दीतून वाट काढीत प्रत्यक्ष पांडुरंग ब्राह्मणवेशात आले व गोदड महाराजांना म्हणाले आपण आपल्या जन्मगावी कर्नग्राम ( कर्जत) येथे जाउन संजीवन समाधी घ्यावी, आषाढ़ कृष्ण एकादशीस प्रतिवर्षी रथोत्सव साजरा करावा . त्याच दिवशी स्वतः पांडुरंग येउन तुम्हाला भेट देइल असे सांगुन तो ब्राह्मण वेषातील पांडुरंग गुप्त झाला.
दरम्यान विविध ठिकाणी भ्रमंतिनंतर महाराजांनी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत गावी म्हणजेच स्वताच्या आजोळी एक पत्र देऊन तेथील पाट्लास असे लिहिले की कर्जत ही आमची जन्मभूमि आहे जर आपली इच्छा असेल तर आम्ही तेथे येऊ . ते पत्र पाहून कर्जतचे तोरडमल पाटिल यांना अत्यंत आनंद झाला . त्यांनी महाराजांचे वास्तव्य असलेल्या फलटन या गावावरून मोठ्या प्रेरणेने कर्जत येथे आणले कर्जत येथे गोदड महाराज चांगलेच रमले . त्यांनी लोक कल्याणार्थ "योगसिध्धांत " ,"जगतारक", "संतविजय", "योगनिर्माण", "गोदड रामायण" इत्यादि ग्रंथांची रचना केली .
एके दिवशी महासाध्वी उमाबाई शिम्पिनिच्या हस्ते दूध प्राशन करून शके १७५९ माघ कृष्ण चतुर्थी मंगलवार रोजी माधान्य समई कर्जत येथे संजीवन समाधी घेतली .
ज्या जागी सद्गुरु गोदड महाराज तपश्चर्येस बसायचे त्याच जागी त्यांचे भव्य दिव्य असे मंदिर उभे आहे . महाराजांनी आपला अवतार संपवला असला तरी आजही ग्रंथांच्या रुपाने त्यांचे कार्य सुरूच आहे .सालाबाद प्रमाणे सद्गुरु गोदड महाराजांच्या पुन्यतिथिनिम्मित कर्जत येथे भव्य अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो
जीवनी अनेक अशा विभूति असतात की ज्यांचे मोठेपण सर्वांना माहित नसते , कारण आपण मोठे आहोत हे त्या विभूति माहित होउही देत नसतात .त्यांच्या पश्चात् भक्तच त्यांचे मोठेपण जगापर्यंत पोहोचवत असतात , अशाच काही विभुतिपैकी सद्गुरु गोदड महाराज एक होत, त्यांनी कर्जत येथे संजीवन समाधी घेउन कर्जत तालुक्याला अध्यात्मिक दृष्टया पावन केले याची प्रचिती मंदिरात त्यांच्या दर्शनाला गेल्यावर संवेदनशील मनाला झाल्याशिवाय रहाणार नाही...
या महिन्याचे पौर्णिमेच्या आजूबाजूला श्रवण नक्षत्र येत असल्याने या महिन्याला श्रावण असे म्हणतात. या महिन्यापासून वर्षाऋतू सुरू होतो. या महिन्यात दररोज कोणते ना कोणते व्रत सांगितले आहे. त्यामुळे या महिन्याला अत्यंत पवित्र मानले जाते. हा महिना चातुर्मासांत येत असल्याने सध्या अनेक लोक संपूर्ण चार महिने नियम पाळणे शक्य होत नसल्याने या महिन्यापुरते तरी नियम पाळतांना आढळतात. उत्तर भारतात या महिन्यांत झुलन यात्रा, रक्षाबंधन, श्रीकृष्ण जन्माष्टमी, नंदोत्सव वगैरे प्रमुख उत्सव मानतात. तेथे पौर्णिमेचे दिवशी राधा व कृष्ण यांना हिंदोळ्यावर बसवून झोके देतात - हा उत्सव एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत साजरा करतात.
श्रीकृष्ण जन्माच्या दुसऱ्या दिवशी नंदोत्सव साजरा करतात. नंदाला पुत्र झाला या समजुतीने हा उत्सव केला जातो. हा महिना निसर्गदृष्ट्या सुद्धा आल्हाददायक असतो. सर्वत्र हिरवेगार वातावरण असते. अनेक फुलांना बहर आलेला असतो व सुवासाने संपूर्ण वातावरण प्रसन्न झालेले असते. श्रावणमासी हर्ष मानसी... ही कविता सर्वांना ' माहीतच आहे. हे सर्व पाहायला, अनुभवायला घेण्यास शहरात न राहता खेडेगावांत, रानात जाणे आवश्यक आहे. हल्ली हे शहरातील लोकांना पहाण्यास मिळत नसल्याने वर्षा सहलींचे आयोजन केले जाते.
-- विद्याधर करंदीकर
रविवार - श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ति नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे. हे पूजन मौनाने करावे असेही शास्त्रात सांगितले आहे.
सोमवार - श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे. तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुष्ठि नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा -
'नम : शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
शृङ्गभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे । ।'
पहिल्या सोमवारी - तांदूळ, दुसऱ्या - तीळ, तिसऱ्या - मूग, चौथ्या - जवस, पाचव्या - सातू या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात.
मंगळवार - श्रावणातील प्रत्येक मंगळवारी 'मंगलागौरी ' यांचे व्रत केले जाते. हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचेबरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा -
'पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङ्गले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽस्तु ते । । '
पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी.
बुधवार - महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध - बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते. बुध - बृहस्पतीचे (गुरु) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात.
गुरुवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे. यांची देवता बृहस्पती (गुरु) आहे.
शुक्रवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे. ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे -
'जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि ।
रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।'
जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात. व देवीची प्रार्थना करतात - ' अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!' हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणाऱ्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर.
आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवी सुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे .
शनिवार - श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी, व पंचामृती पूजा करावी; शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस,आंबिल, पुऱ्या यांचा नेवैद्य अर्पण करावा.
या व्रताचा पर्याय - प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी. मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी - नृसिंहाप्रीत्यर्थं ब्राम्हण - सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रीत्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात.
-- विद्याधर करंदीकर
Copyright © 2025 | Marathisrushti