वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
देहिनः अस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा |
तथा देहांतर प्राप्तिः धीरः तत्र न मुह्यति ||२:१३||
देहिन:: देहधारि आत्म्याला, अस्मिन् :: यात, देहे :: शरीरामध्ये, कौमारम् :: बालपण, यौवनं :: तारुण्य, जरा :: म्हातारपण, देहान्तर :: देहाचे स्थित्यंतर, धीर: :: धैयवान पुरूष, न मुह्यति :: मोहित होत नाही.
येथे धैर्यवान माणूस म्हणजे, विवेकी, ज्ञानी माणूस असा घ्यावयाचा आहे.
श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांचं विवेचन :: ज्या प्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात, बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसर्या देहात प्रवेश करतो. अशा स्थित्यंतरामुळे धैर्यवान माणूस गोंधळून जात नाही. थोडक्यात म्हणजे, जन्मानंतर बालपण, नंतर तरूणपण, नंतर म्हातारपण अशा तीनही अवस्थात तोच आत्मा राहतो. मृत्यूनंतर तो दुसर्या शरीरात प्रवेश करून नवीन शरीर धारण करतो.
श्रीस्वामी रामसुखदासजी यांचं विवेचन : ‘शरीर धारण करणार्याच्या शरीरामध्ये’ असं म्हणण्यानं सिध्द होतं की शरीर वेगळं आहे आणि शरीरी (शरीर धारण करणारा...आत्मा, जीव, जीवात्मा) वेगळा आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृष्य आहे. म्हणून बाल्यावस्था, तारुण्य आणि म्हातारपण हे शरीराला आहे, शरीरीला (आत्म्याला) नाही. शरीराच्या अवस्थातील बदलाविषयी कुणी शोक करीत नाही तर मग शरीराच्या मृत्यूनंतर, आत्मा अेका शरीरातून दुसर्या शरीरात जातो त्यासाठी शोक का करावा? ज्ञानी व्यक्तीला सत् आणि असत् याचं पूर्ण ज्ञान असल्यामुळे, आत्म्याच्या स्थानांतराच्या विषयानं तो मोहित होत नाही किंवा त्याला कोणताही संदेह रहात नाही.
श्रीसंत ज्ञानेश्वरांनी दिलेला ओवीबध्द अर्थ : आइके शरीर तरी एक । परी वयसाभेदे (वयपरत्वे) अनेक ।। हे प्रत्यक्षचि देख । प्रमाण तू ।। एथ कौमारत्व दिसे । मग तारुण्यी ते भ्रंशे ।। परी देहचि हा न नाशे । एकेकासवे ।। तैसी चैतन्याच्या ठायी । इये शरीरांतरे होती जाती पाही ।। ऐसे जाणे तया नाही । व्यामोहदु:ख ।।
लोकमान्य टिळकांनी, गीता रहस्यात केलेलं भाष्य :: देह धारण करणार्यास, या देहात ज्याप्रमाणे बालपण, तरूणपण आणि म्हातारपण (प्राप्त होतं) त्या प्रमाणेच (पुढे) दुसरा देह प्राप्त होत असतो. (म्हणून) या बाबतीत ज्ञानी पुरूष मोह पावत नाहीत.
आचार्य विनोबा भावे, गीताअीत सांगतात :: या देही बाल्य तारुण्य जरा वा लाभते जशी । तसा लाभे नवा देह न डगे धीर तो तिथे ।।
विज्ञानीय दृष्टीकोनातून अन्वयार्थ :: विज्ञानीय दृष्टीकोनातून विचार केल्यास असं अनुमान निघतं की, सजीवाच्या तीन नव्हे तर चार अवस्था आहेत.
१. गर्भावस्था २. बाल्यावस्था ३. तारुण्यावस्था आणि ४. वृध्दावस्था
आनुवंशिक तत्व म्हणजे सृजनशील तत्व (जेनेटिक मटेरियल) असल्याशिवाय सजीवांचं शरीर निर्माण होअू शकत नाही. सजीवाच्या जिवंत पेशीत असलेल्या केंद्रकात हे आनुवंशिक तत्व असतं. या अनुवंशिक तत्वाचा संच, गर्भधारणा झाल्यापासून मरेपर्यंत तोच असतो. हाच आत्मा.
गर्भधारणा होते, तीच वेळ अपत्याची जन्मवेळ असते. जन्मापासून मरेपर्यंत, सजीवाच्या अब्जअब्जावधी पेशी मरतात आणि तितक्याच निर्माणही होतात. गर्भावस्थेत आणि बाल्यावस्थेत, मरणार्या पेशींच्या संख्ये पेक्षा निर्माण होणार्या पेशींची संख्या जास्त असते. म्हणून शरीराची वाढ झालेली असते. तारुण्यावस्थेत, ही संख्या सारखीच असते म्हणून शरीराची वाढ स्थिर असते तर वृध्दावस्थेत, मरणार्या पेशींची संख्या, निर्माण होणार्या पेशींच्या संख्येपेक्षा जास्त होअू लागते म्हणून शरीर थकतं. ही संख्या खूपच वाढली तर शरीराचे अवयव काम करीनासे होतात आणि शरीर अचेतन होतं..मरतं.
पूर्वी असा समज होता की, गर्भ, आअीच्या शरीराबाहेर आला आणि नाळ कापली गेली म्हणजे अपत्याचा जन्म झाला. म्हणून गीतेच्या या श्लोकात गर्भावस्थेला स्थान दिलं गेलं नाही. पण आअीच्या गर्भाशयात असतांना देखील, त्याचं नाळेद्वारा, आअीनं घेतलेल्या आहारामुळे, त्याचं पोषण होत असतं याची पुरेपूर कल्पना आपल्या पूर्वज विचारवंतांना होती
शुक्राणू (पित्याकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) आणि बीजांडात (मातेकडील आनुवंशिक तत्वाचा अर्धा संच २३ गुणसूत्रं) अशारितीने पित्याच्या पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील तसेच मातेच्याही पूर्वजांच्या अनेक पिढ्यातील आनुवंशिक तत्व असते. गर्भधारणा झालेल्या गर्भपिंडाच्या आनुवंशिक तत्वात, ४६ गुणसूत्रं, आणि सुमारे ३० हजार जनुकं (पूर्ण संच) असतात आणि तेच,
सजीवांचे आनुवंशिक गुणावगुण पुढच्या पिढीत संक्रमित करतात. मूळ गर्भपेशीचं विभाजन होअून दोन पेशी होतात नंतर दोनाच्या चार, चाराच्या आठ अशा रीतीनं वाढ होअून ३८ आठवड्यात, पूर्ण वाढ झालेलं. सर्व अवयवं आणि इंद्रियं असलेलं मानवाचं बालक जन्माला येतं. त्याची वाढ होत असतांना कुमारावस्था असते,
अपत्य प्रजननक्षम झालं म्हणजे तारुण्यावस्था प्राप्त होते, शरीराची प्रजननक्षमता नाहीशी झाली म्हणजे वृद्धावस्था आली असं मानलं जातं. ही माहिती, शास्त्रज्ञांच्या संशोधनातून, निर्विवादपणं सिध्द झालेली आहे. विज्ञानाची पुस्तकं आणि संगणकीय महाजालावर ती अुपलब्ध आहे, अवश्य वाचावी.
1. गर्भावस्था : म्हणजे लौकिकार्थाने जन्म होण्यापूर्वीची अवस्था. गर्भधारणा होते त्याच क्षणी, शुक्राणू आणि बीजांडाच्या स्वरूपात, गर्भपिंडात आनुवंशिक तत्व म्हणजे चैतन्य...आत्मा आलेला असतो. या अवस्थेत मेंदूत, पंचेन्द्रियांची केन्द्रं तयार झालेली असली तरी त्यात कोणतीही माहिती साठविलेली नसते. पाट्या कोर्याच असतात. स्मृतीकेन्द्रात कोणतीच स्मृती साठविलेली नसल्यामुळे या अवस्थेतला काळ आपल्याला मुळीच आठवत नाही. म्हणूनच कदाचित या अवस्थेची दखल, या श्लोकात घेतली नसावी. तरी तो ’मी’ च होतो याची जाणीव असते. या अवस्थेत, गर्भाचं पोषण, दुसर्या शरीरानं, म्हणजे मातेच्या शरीरानं घेतलेल्या अन्नावर होत असते. तोंड असलं तरी त्यातून अन्न घेतलं न जाता ते नाळेतूनच घेतलं जाअून पोषण होतं. आअी हा वृक्ष, गर्भ हे फळ आणि बेंबी हा देठ अशी स्थिती असते.
या अवस्थेत, आअीवडिलाकडे (जनक पिढी) असलेले आनुवंशिक तत्व अपत्य पिढीत संक्रमित झालेलं असतं. हाच, आअीवडिलात असलेल्या आनुवंशिक तत्वाचा पुनर्जन्म.
2. बाल्यावस्था : गर्भाशयाबाहेर नाळेशिवाय जगण्याची अवस्था. निसर्गातून मिळणारा आहार घेअून शरीराची वाढ होत असते. ही प्रजननक्षमतेपूर्वीची अवस्था आहे. या अवस्थेत जननेन्द्रियं विकसित झालेली नसल्यामुळे, निसर्गाचा मूळ हेतू...प्रजनन…सृजन साध्य होअू शकत नाही.
3. तारुण्यावस्था : म्हणजे प्रजननक्षम असतांनाची अवस्था. ही अवस्था, नैसर्गिक दृष्ट्या अतिशय महत्वाची आहे. कारण या अवस्थेत, पुरूषात शुक्राणू आणि स्त्रीत बीजांडं तयार झालेली असतात. म्हणजेच, आनुवंशिक तत्व, जनक पिढीकडून अपत्यपिढीत संक्रमित होण्याचा निसर्गाचा हेतू साध्य होण्यासारखा असतो.. अपत्य प्रजननक्षम झाले म्हणजे विवाह होतो आणि पुढची पिढी जन्म घेते. प्रजननक्षमता असेपर्यंत त्या जोडप्याला मुलं होत राहतात. अशा रीतीनं दोन जिवंत शरीरातील आनुवंशिक तत्व तिसर्या जिवंत शरीरात प्रवेश करतं. ही क्रिया जिवंतपणीच होते, मेल्यानंतर नाही.
4. वृध्दावस्था : म्हणजे प्रजननक्षमता नाहीशी झालेली अवस्था.
सजीवाचं शरीर अचेतन झालं म्हणजे ... त्याचा मृत्यू झाला म्हणजे, त्यात असलेल्या आनुवंशिक तत्वासकट सगळं शरीर पर्यावरणात विलीन होतं. त्यातलं काहीही दुसर्या कोणत्याही शरीरात प्रवेश करीत नाही की जन्म घेत नाही. वैज्ञानिकांना हे सत्य चांगले माहित असल्यामुळे ते गोंधळून जात नाहीत.
सजीवाच्या या चारही अवस्थात, आनुवंशिक तत्वाचा तोच संच कायम असतो…. तोच या श्लोकात सांगितलेला....आत्मा.
-- गजानन वामनाचार्य
शनिवारचा सत्संग :: ५
शनिवार २४ डिसेंबर २०१६
सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत
विज्ञानीय दृष्टीकोनातून भगवद् गीता : अध्याय २ : श्लोक १३
गणपतीला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. गणपतीची पूजा दूर्वाच्या शिवाय होऊ शकत नाही असे मानले जाते. गणपतीचे स्थान मूलाधार मानले जाते. मूलाधार चक्राशी निगडित अवयव म्हणजे पुरुषांचे प्रोस्टेट व व्रुषण ग्रंथी आणि स्रियांचे गर्भाशय व ओव्हरीज हे होत. जे देवाला प्रिय ते माणसाला उपयुक्त . गणपती प्रिय दूर्वा सेवन केल्याने स्रियांच्या ओव्हरीज वगर्भाशयातील व पुरुषांच्या प्रोस्टेटमधील हीट कमी होते. असा अनुभव आहे. त्यामुळे होणारे त्रास म्हणजे वय वाढल्यावर झोप न लागणे,पायाना सूज येणे, काही प्रमाणात पाय दुखणे, टाचा दुखणे वगैरे त्रास कमी होतात.
पाच दूर्वा रोज खाल्यातर फायदा होतो. हे शहरातील जीवन पध्दतीत शक्य होत नाही. त्यासाठी एकदा एक दूर्वांची जुडी आणून थोडेसेच पाणी घालून मिक्सरमधे चटणी करावी. फडक्यातून पिळून रस काढावा. हा रस नासू नये म्हणून त्यात दीड पट मध घालून ढवळून बाटली मधे भरून ठेवावे. दररोज ह्यतील पाव चमचा मध वाटी भर पाण्यात चांगला विरघळवून ते पाणी प्यावे. असे दिवस भरात दोन वेळा करावे. ह्या मुळे वरील त्रास कमी होतात. मी दूर्वाच्या टिंक्चरपासून साखर करून पेशंटना देऊन टाचा दुखणे, पायावरील सूज, वयस्कमंडळींची चिड चीड, झोप न लागणे हे आजार बरे केले आहेत.
अरविंद जोशी BSc.
9421948894
कृपया लेख फाँरवर्ड करताना त्यात कोणताही बदल करू नये.
गणपती आणि गाणपत्य संप्रदायाचा चालताबोलता विश्वकोश म्हणजे कै. जयंतराव साळगावकर ! त्यांनी हे सुवर्णगणेशाचे सुंदर मंदिर मालवणमध्ये बांधले आहे.
येथे गणपतीचा थाट पूर्णपणे वैभवशाली आहे. गणपतीची मूर्ती विलोभनीय आहे. रिद्धी सिध्दीही नेहेमी पाहायला मिळतात त्यापेक्षा वेगळ्या आहेत . गणपतीच्या दोन्ही बाजूंना मूषक जोडी, दोन बाजूंना लामणदिवे,अत्यंत देखणी प्रभावळ आणि राजेशाही चौरंग ही आणखी काही वैशिठ्ये ! गाभारा प्रशस्त आहे.
त्यामानाने मंडप लहान आहे पण ८ खांब, त्यावरील विविध रूपातील गणेशमूर्ती, विविध दिवे आणि प्रवेशद्वारातील २ हत्ती इत्यादींमुळे तो खूप प्रसन्न आणि आकर्षक वाटतो. भविष्यात येथे येणाऱ्या भक्तांची संख्या अमाप वाढू शकते. त्यादृष्टीने मात्र मोठ्या वाहनांसाठी वाहनथांबा, शिस्तबद्ध दुकाने, प्रसाधनगृहे, थोडे रुंद रस्ते यांचे नियोजन आत्ताच करायला हवे.
गणपतीला दूर्वाच का वाहतात? आणि त्या कशा वहाव्या ?
पुरातन देवळात दर्शन घेण्यास का जावे ? गल्ली बोळातील नाही?
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भोवतालचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भोवताली रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवती मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभागातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानात प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाजविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भोवताली पसरलेली उर्जाही मिळावीम्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हा मोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळात जाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हिच अपेक्षा..
शुभम् भवतू !!
ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात.
आपलं संस्कृत वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. सर्व भाषांचा उगम संस्कृत भाषेतून झाला असा या भाषेचा लौकिकही आहे. या संस्कृत भाषेला 'गीर्वाणभाषा' म्हणजे देवांची भाषा असंही मानलं जातं. संस्कृत साहित्यात स्तोत्र वाङ्मयाचं एक विशेष स्थान आहे. या साऱ्या वाङ्मयात प्रामुख्याने देवदेवतांची स्तुती केलेली आढळते. उदा. 'रामरक्षा स्तोत्र', 'व्यंकटेश स्तोत्र', 'श्री गणपती अथर्वशीर्ष' आदी स्तोत्रांची नावं घेता येतील. आजही ही स्तोत्रं अनेकांच्या पठणत असलेली आपण पाहतो. केवळ काव्य म्हणून वाचणाऱ्या रसिक वाचकांना ती आनंद देतातच पण देवदेवतांवर श्रद्धा बाळगणाऱ्या श्रद्धावंतांनाही अशा स्तोत्रांचा लौकिक व पारमार्थिक अर्थाने लाभ होतो. त्याचबरोबर आपले उच्चारही सुस्पष्ट होतात.
पूर्वी सकाळ-संध्याकाळ घरोघरी स्तोत्रं म्हटली जात. आज तो काळ मागे पडला आहे. स्तोत्रपठणाचं महत्त्व कमी झालं असलं तरी या स्तोत्रांनी मानवी जीवनात एक अलौकिक स्थान मिळवलं आहे. स्तोत्रपठणाचा विशेष काही उपयोग होत नाही, असं म्हणणारे अनेकजण आहेत. परंतु स्तोत्रपठणाचा उद्देश व त्यामागच्या शास्त्रीय बैठकीचं महत्त्व कळल्यास मनामध्ये कोणताही प्रत्यवाय राहणार नाही.
कोणत्याही गोष्टीची अनुभूती ती गोष्ट प्रत्यक्ष कृतीत आणल्यानंतर येते असा नियमच आहे. लग्न, मुंज अशा काही प्रसंगी आता शांतीपाठ करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. सत्यनारायणासारख्या पूजाप्रसंगी मंत्रजागर करण्याचा प्रघात हळूहळू नामशेष होत चालला आहे. रूद्राची आर्वतनं करण्याची किंवा दक्षिणा देऊन ब्राह्मणांकडून 'लघुरूद्र' करण्याची रीत बंद पडत चालली आहे. हे शांतीपाठ किंवा मंत्र पठण हा केवळ भाबडेपणाचा भाग नसून याविषयी परदेशातून सूचित करणारे प्रयोग सिद्ध होत आहेत. त्या प्रयोगांवरून हे सर्व सांस्कृतिक आचार-विचार, व्रतवैकल्यांच्या मागे निश्चित वैज्ञानिक बैठक आहे, असं ध्यानी येईल.
डॉ. दोदो आर दो या एका फ्रेंच डॉक्टरने मानसिक शक्तीमापनाचं एक प्रभावी यंत्र शोधून काढलं. ज्याची मानसिक शक्ती मोजायची असेल त्याला दोन ते चार फूट अंतरावर उभं करून त्या यंत्राकडच्या काट्याकडे बघायला सांगण्यात येतं. त्याची दृष्टी स्थिर झाली की यंत्रावरचा काटा गोल फिरू लागतो आणि कोणत्याही डिग्रीवर स्थिर होतो. प्रत्येकाच्या डोळ्यातून विद्युतलहरी बाहेर पडत असतात आणि म्हणून तो काटा फिरतो असं त्यांचं संशोधन आहे. नेमक्या याच तत्वावर स्तोत्रपठणाचा परिणाम मानवी शरीरावर होत असतो.
ज्याप्रमाणे मनामध्ये विचार येतात त्याप्रमाणे विद्युतशक्ती निर्माण होऊन स्तोत्रांमधले शब्दसुद्धा विचाराने भारलेले असल्यामुळे स्तोत्र म्हणणाऱ्याच्या मनावर त्या शब्दसमूहांचा खूप चांगला परिणाम घडतो. स्तोत्राच्या आवर्तनातून आपल्याला अलौकिक, अद्भुत व गूढ अनुभूती येतात हेच स्तोत्रपठणाचं खरं रहस्य आहे. या विधानाच्या पुष्ट्यर्थ 'रामरक्षा' स्तोत्राचं उदाहरण देता येईल. मंत्रशास्त्राच्या दृष्टीने 'राम' या शब्दाला विशेष महत्त्व आहे. 'र'काराला मंत्रशास्त्रात 'अग्नीबीज' मानतात. 'र' काराच्या उच्चाराने आपल्या शरीरातल्या विद्युतशक्ती जास्त प्रमाणात सुरू होते व त्यामुळे आपल्या शरीरात विद्युतप्रवाह सुरू होतो. 'र'काराची शक्ती अतिशय वेगवान असते हा प्रयोग कोणीही करून पाहण्यासारखा आहे.
आपल्या पूर्वजांनी सांगितलं आहे की, सकाळी अंथरूणातून बाहेर यायच्या आधी कराग्रे वसते लक्ष्मी। करमध्ये सरस्वती। करमूले तू गोविंदम्। प्रभाते कर दर्शनम्। हा श्लोक म्हणून दोन्ही हात चेहऱ्यावरून फिरवून खाली बेंबीपर्यंत फिरवावेत. असं तीन वेळा करावं. चेहऱ्यावरून हात फिरवताना थोडासा दाब द्यावा. 'अॅक्युपंक्चर विदाऊट नीडल्स' या अमेरिकन पुस्तकातल्या 'अॅक्युप्रेशर ब्रेकफास्ट' या प्रकरणात चेहऱ्यावरचे २५ ते ३० पॉइण्टस दिले आहेत. हे पॉइण्टस लक्षात ठेवून दाबण्यापेक्षा चेहऱ्यावरून हात फिरवल्याने त्याचा फायदा होतो. डोळ्यावरची झापड लगेच जाते आणि आपण एकदम फ्रेश होतो. श्लोक म्हटल्याने सकाळी उठल्यावर देवाचं स्मरण होतं.
संत ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी'त म्हटलं आहे की बाराखडी म्हटली की त्यात सर्व मंत्र येऊन गेले. ऋषीमुनी-संतांनी स्तोत्र तसंच मंत्रांची निर्मिती करून सर्वसामान्यांवर फार मोठे उपकार केले आहेत. कोणत्या अक्षरांची कशी मिळवणी केली म्हणजे कसे ध्वनीतरंग निर्माण होतील व त्याचा मानवाला शारिरीक आणि मानसिक लाभ व अंतःकरण शुद्धीसाठी कसा उपयोग होईल हे विज्ञान लक्षात घेऊनच विशिष्ट अक्षरांची मिळवणी करून ज्या विशिष्ट ध्वनीतरंगाची उन्नती केली ते म्हणजे मंत्र व स्तोत्र. स्तोत्रपठणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्तोत्रातल्या वर्ण-अक्षरांच्या साहाय्याने माणसाच्या शरीरातली निरनिराळी चक्रं जागृत होतात. त्यामुळे शरीरातल्या सुप्त शक्ती जागृत होतात. सामान्यतः माणूस त्याच्या एकूण शक्तीच्या १० टक्के शक्ती वापरत असतो. ९० टक्के शक्यतो सुप्तावस्थेच असते. ती शक्ती स्तोत्रपठणाने जागृत करता येते. पण त्यासाठी पद्मासनात बसून एकाच वेळी, एकाच ठिकाणी आणि योग्य उच्चारात स्तोत्रपठण केलं पाहिजे. स्तोत्रपठणाचा ज्यांना खरोखर अनुभव घ्यायचा आहे त्यांना ही सर्व पथ्यं काटेकोरपणाने पाळावीच लागतात. अन्यथा शास्त्रोक्त पद्धतीने स्तोत्रांचं पठण केलं नाही तर मग त्यांची प्रचिती कशी येणार?
आपल्या तोंडात, टाळूवर ८४ रेखावृत्तीचे बिंदू असतात. पूर्वी श्रेष्ठता प्राप्त झालेल्या काही व्यक्ती प्रदीर्घ तपस्येमध्ये मग्न झाल्या. त्या लोकांनी कालांतराने काही ध्वनी निर्माण करण्यास सुरुवात केली व असं करताना त्यांची जीभ टाळूवर असलेल्या रेखावृत्तांच्या बिंदूमधल्या विशिष्ट स्थानी टेकवली व त्यामधून विशिष्ट नादनिर्मिती झाली. आपण बोललेल्या प्रत्येक शब्दांच्या किंवा मंत्राच्या उच्चारामुळे मंत्रातल्या प्रत्येक शब्दाचा आघात शरीराच्या कोणत्याही भागावर होत असतो. योग्य प्रकारचे आघात झाले तर शरीरातले हायपोथॅलम्स, थॅलम्स अथवा पिच्युटरी ग्रंथीवर परिणाम होऊन अत्यानंदाच्या मनःस्थितीत आपण येतो.
ज्या वास्तूमध्ये नेहमी अभद्र बोलणं, वरच्या पट्टीत किंचाळून बोलणं, नकारात्मक बोलणं होत असेल अशा वास्तूमध्ये तुम्ही प्रवेश केल्यावर तिथलं वातावरण मनावर भार निर्माण करणारं व नैराश्यपूर्ण वाटेल. पण त्याऐवजी जिथे गाण्यांचे सूर, स्तोत्रपठण, वैचारिक पातळीची चांगली देवाणघेवाण, मंत्रोच्चार होत असतील, मनाला उल्हासित करणारं संभाषण चालू असतं त्या वास्तूत उत्साहपूर्ण, तणावरहित व मनमोकळे, प्रसन्न वाटेल.
तुम्हाला येणारा अनुभव निर्माण होणाऱ्या भावना यांचा नादशास्त्राशी खूप जवळचा संबंध आहे. आपल्या भावना उल्हासित होतील, नैराश्यातून आनंदाकडे नेतील असे शब्द निवडून प्रत्येक मंत्र, श्लोक, स्तोत्र रचले होते. आपण म्हटलं तर मेंदूच्या काही भागांना उत्तेजन मिळाल्याने मेंदूचं रासायनिक संतुलन बदलतं. ही बदललेली मेंदूची रासायनिक स्थिती आपल्या मनाला अधिक सुखावह, तणावमुक्त व उदार बनवते. मनाचा मोठेपणा वाढवून परिस्थितीबाबत अधिक उदार दृष्टिकोन निर्माण करते.
आज आपण कठीण काळातून जात आहोत. सर्व भौतिक सुखं हात जोडून आपल्यासमोर उभे आहेत. तरीही सध्याचं जीवन अनेक समस्यांनी ग्रासलेलं आहे. नित्यनवीन संकटं त्यात भर घालत आहेत आणि आपलं जीवन तणावपूर्वक बनलं आहे. विज्ञानामुळे मानवाची पावलं चंद्रावर पोहोचली असली तरी त्याच्या मनाला अजूनही शांती लाभलेली नाही.
शांती, समाधान, उत्कर्ष, उन्नतीसाठी कशाची गरज असते तर ती मानसिक समाधानाची. यासाठी रोज १५ ते २० मिनिटं एकाग्र चित्ताने स्तोत्रपठण केलं तर निश्चितच मानसिक समाधान मिळेल व चांगले आरोग्यही प्राप्त होईल।
-- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन
एक चित्रकार होता.गुरूचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता.गुरू व स्वत:च्या कलेवर त्याला प्रचंड विश्वास होता.
पण स्वत:वर त्याचा विश्वास फारसा नसावा.
तीन दिवस परिश्रम करून त्याने एक सुंदर चित्र काढले. पण ‘आपले चित्र चांगले आहे का?’हा प्रश्न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला.
एका गजबजलेल्या रस्त्यावर त्याने त्याचे ते चित्र लावले. त्याखाली एक पाटी लावली,मी हे काढलेले चित्र तुम्हाला कसे वाटले?यात कुठेही चूक वाटली तर त्याजागी एक छोटीशी फुल्ली मारा.’
लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरता संध्याकाळी तो पोहोचला.संपूर्ण चित्र फुल्ल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरले. काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते. चित्रकाराचा जीव तुटला. तो धावत आपल्या गुरूकडे गेला आणि म्हणाला,‘मी हरलो.मी खूप वाईट चित्रकार आहे.मी चित्रकला सोडायला हवी.मी संपलो.’
हे ऐकून गुरूने म्हटले,‘तू व्यर्थ नाहीस.तू फार चांगला चित्रकार आहेस.मी ते सिद्ध करू शकतो.असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये.
तसेच चित्र परत काढून चित्रकार दोन दिवसांनी गुरूकडे आला. गुरू त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर घेऊन आला. ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि खाली एक पाटी लिहिली,‘मी हे चित्र काढले आहे. काही चुका आहेत असे वाटले तर बाजूला ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा.’ ही पाटी लावून ते दोघे निघाले.
संध्याकाळी परत जाऊन त्यांनी पाहिले तर कुणीही त्या चित्राला हातदेखील लावला नव्हता. सहा-आठ दिवस ते चित्र तसेच राहिले.
यावर गुरू म्हणाले,‘फुल्ल्या मारणे सोपे असते,पण दुरुस्ती करणे कठीण असते.’
दुनियेच्या कोर्टात स्वत:ला उभे करू नका. सगळ्यांची मतं ऐका,
पण इतरांच्या मतांनी तुटू नका.
मी कोण आणि कसा हे पहिल्यांदा स्वत:ला विचारा...
आपला आत्मविश्वास सगळयात महत्वाचा...
एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.
तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो... आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...
आणि या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते... माणसाचं आयुष्य हे असंच असतं... त्याच्या हातात काहीच नसतं... आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची... कर्ता करविता असतो तो ईश्वर...एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...
मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'
आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं... कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल? 'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...
त्याला त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं? 'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल? एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...
ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल? त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली? कोण सांगेल? कोण सांगेल कोण?? कुणीच नाही... हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...
ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!
मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. यालाच जीवन म्हणतात.
किती दिवसाचे आयुष्य असते? आजचे अस्तित्व उद्या नसते, मग जगावे ते हसून-खेळून कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...!!
नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... कोणाचा अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....- तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....-कोणी कितीही महान झाला असेल,पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही..स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस..देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं...
-स्वामी विवेकानंद
गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामी समर्थांची एक गोष्ट
जनाबाईचे अभंग दूरदूपर्यंत लोकप्रिय झाले आणि तिची ख्याती कबिरांच्या कानी गेली, इतके सुंदर अभंग रचणारी ही स्त्री आहे तरी कोण या उत्सुकतेपोटी संत कबीर जनाईच्या भेटीसाठी पंढरीस आले. तिथे आल्यावर त्यांना कळाले की ती नामदेवांच्या घरी कामास आहे. तिथे गेल्यावर त्यांना कळाले की ती गोपाळपुरास गोव-या थापायला गेली आहे, तिला येण्यास काही अवधी लागेल. दासीचे घरकाम करणारी, गोव-या थापणारी बाई अभंग लिहिते याचे त्यांना फार अप्रूप वाटले आणि ते तिची वाट बघत तिथे थांबण्याऐवजी गोपाळपुरास गेले.
तिथे नदीकाठावर दोन पोक्तवयीन स्त्रिया एकमेकीशी भांडत असल्याचे दृश्य त्यांना दिसले. त्या दोघींच्या मधे गोव-यांचा मोठा ढीग होता, गोव-या चोरल्याचा एकमेकीवर त्या आरोप करत होत्या.
कबीर काही वेळ त्यांचे भांडण बघत तिथेच उभे राहिले. अन् मग काही वेळाने त्यांनी त्या दोघींना विचारले की, ‘‘इथे जनाबाई नावाची कोणी स्त्री आहे का?’’
त्यांच्या या प्रश्नाने दोघींपैकी एक स्त्री उसळून बोलली -‘‘ही काय, हीच की जनी! चोरटी! माझ्या गोव-या चोरून माझ्याशी भांडण करत्येय! अन् वर तोंड करून मलाच शानपन शिकवत्येय.’’
त्या बाईच्या या उद्गाराने कबिरांना थोडासा धक्का बसला. कारण त्यांच्या मनात जनाईचे वेगळेच चित्र उभे राहिले होते. तरीही त्यांचा त्या बाईच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. ते तिथेच आशाळभूत नजरेने त्यांचे भांडण बघत उभे राहिले. त्यांनी न राहवून दुसरीला विचारले की, ‘‘तूच जनी आहेस का?’’
यावर ती हातातल्या गोव-या खाली टाकून बोलती झाली, ‘‘होय बाबा, मीच ती जनी. तुला काही त्रास आहे का माझा?’’ तिच्या या उत्तराने अन् तिच्या वर्तणुकीने गोंधळून गेलेले कबीर आपली काही तरी चूक झाली असा विचार करून तिथून पाय काढता घेण्याच्या मन:स्थितीत होते.
मात्र जनाईच्या होकाराने दुस-या बाईला अजून बळ आले. ती कबिरांना म्हणाली, ‘‘हे बघा, तुम्ही कोण हायसा मला ठाव न्हाई, पर तुमी एक काम करा. आमच्या दोघींच्या बी गोव-या यात आहेत. तुमी आमच्या आमच्या गोव-या निवडून वेचून द्या. तुमी एव्हढं काम करा अन् मग हिथून जावा.’’
आता गोव-या सारख्याच दिसतात. शेणाच्या, गोल आकाराच्या त्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे कसं ठरवणार याचं कोडं कबीरजींना पडलं. कबीर विचारात पडलेले बघून जनाई म्हणाली, ‘‘त्यात काय इतका विचार करायचा? अगदी सोप्पं काम आहे.’’
आता कबीरजी चकित झाले होते.
सारख्या दिसणा-या शेणाच्या गोव-यात कुठली गोवरी कुणाची हे ओळखता येणं अशक्य होतं, मात्र जनी म्हणतेय की हे सोप्पं आहे. हे कसं काय सोपं असू शकतं किंवा तिच्याकडे या समस्येचं काय उत्तर आहे हे ऐकण्याकरता कबीरजी थोडे आतुर झाले. त्यांची आतुरता त्यांच्या चेह-यावर झळकली.
कबिरांच्या चेह-यावरची उत्सुकता बघून जनाई हसून म्हणाली, ‘‘अहो, महाराज हे अगदी सोपं काम आहे. सर्व गोव-या एके ठिकाणी करा. अन् त्यातल्या प्रत्येक गोवरीला कानी लावा. ज्या गोवरीतून ‘विठ्ठल, विठ्ठल’ आवाज येईल ती गोवरी माझी. अन् ज्यातून आवाज येणार नाही ती गोवरी हिची!’’
जनाईच्या उत्तराने कबीरजींचा चेहरा एकदम फुलून आला. अन् त्या दुस-या बाईचा चेहरा गोरामोरा झाला.
कबीरजी पुढे झाले आणि त्यांनी त्या ढिगातील दोन गोव-या उचलल्या. गोव-या उचलून कानी लावल्या अन् काय आश्चर्य, त्या गोव-यातून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता. आपण इथं येऊन कोणतीही चूक केली नाही. आपण एका महान कवयित्रीला भेटत आहोत. जिच्या विचारात देव वसतो आहे’, हे त्यांच्या लक्षात आलं. कबिरांनी सा-या गोव-यांची वाटणी केली. त्या बाईच्या काही मोजक्याच गोव-या होत्या तर बहुतांश गोव-या जनाबाईच्या होत्या.
जनाईच्या गोव-यांच्या ढिगावर त्या बाईने आपल्या काही गोव-या लावून तो ढीग आपलाच असल्याची खोटी बतावणी केली होती अन् वर जनाईला ती खोटे ठरवत होती.
गोव-यांची वाटणी झाल्यावरही कबिरांच्या चेह-यावर प्रश्नचिन्ह कायम होते.
जनाईने त्यांच्या मनातील शंका ओळखली आणि म्हणाली, ‘‘या गोव-यातून हा आवाज कसा आला याचं तुम्हाला कोडं पडलंय का? एकदम साधी गोष्ट आहे. मी या गोव-या थापताना विठ्ठलाचेच नाव घेते अन् माझ्या ध्यानी मनी पांडुरंग असतो, तोच या गोव-यातसुद्धा असतो.’’
कबीर चकित होऊन जनाबाईकडे पाहत राहिले अन् मग त्यांनी स्वत:ची ओळख करून दिली. कबीरजींचा परिचय ऐकून जनाबाई त्यांना घरी घेऊन गेल्या.
एकाग्रचित्ताने केलेल्या नामस्मरणातील ताकद सांगणारी ही घटना सत्य न समजता केवळ एक आख्यायिका असावी असा जरी विचार केला तरी यातील भावार्थ श्रेष्ठ आणि चिरंतन असाच आहे. भक्ती कशी करावी याचे नियम नाहीत, मात्र ती मनापासूनची असावी, ती सच्ची असली की आपल्यालादेखील ईश्वराचा सर्वत्र प्रत्यय येतो.
-- WhatsApp वरुन
Copyright © 2025 | Marathisrushti