(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री दत्तसंप्रदाय – विविध पंथ आणि परंपरा

    श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.

    श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.

    श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.

    निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.

    दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे.

    श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.

    श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश

    कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.

    श्रीनृसिंह सरस्वती स्वामी

    हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते.

    गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे - त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.

    श्री स्वामी समर्थ

    श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.

    श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री

    ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.

    टेंबेस्वामी

    श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.

    श्रीमाणिकप्रभू

    बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.

    दत्तनाथ

    उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन - विष्णू - हसकमलासन - अत्री - दत्तगोपाळ - वेडा नागनाथ - निबंजनाथ - जनार्दन – एकनाथ - दत्तभाऊ - केशवबुवा - अंतोबादादा - दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.

    श्रीनवनाथ

    नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.

    श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा

    समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.

    श्रीमहानुभव

    महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.

    वारकरी

    भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.

    आनंदसंप्रदाय

    सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.

    अन्य परंपरा

    याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत.

  • दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म

    ब्रह्म, विष्णु आणि महेश यांची एकत्रित अभिव्यक्ती असलेले दत्तात्रेय म्हणजे साक्षात परब्रह्म. त्रिगुणात्मक अशा या त्रिमूर्तीला 'परिपूर्ण' म्हणण्यास काहीच हरकत नसावी. ज्यांना अवघे विश्व 'गुरु' म्हणूनच ओळखते ते दत्त म्हणजे साक्षात ज्ञानच!! असे असूनही भागवत पुराणातील एकादश स्कंदात दत्त महाराजांच्या २४ गुरूंचे वर्णन आलेले आहे.

    पृथिवी वायुराकाशमापोऽग्नीश्चन्द्रमा रविः |
    कपोतोऽजगरः सिंधुः पतङ्गो मधुकृद गजः ||
    मधुहा हरिणो मीनः पिङ्गला कुररोऽर्भकाः |
    कुमारी शरकृत्सर्प ऊर्णनाभिः सुपेशकृत ||

    यांत पंचमहाभूतांपासून ते अगदी मासा, हरीण यांसारखे प्राणी आणि पिंगलेसारखी गणिका यांचाही समावेश होतो. स्वतः मूर्तिमंत ज्ञान असूनही अवघ्या चराचर सृष्टीतील प्रत्येक गोष्टीतून काही ना काही शिकण्याचा दत्तगुरूंचा संदेश अत्यंत महत्वाचा वाटतो. 'मला सगळं काही कळतं.' ही भावना निर्माण झाली की त्या व्यक्तीची प्रगती खुंटलीच म्हणून समजा. आपल्या आयुष्यातील प्रत्येक लहान- मोठी गोष्ट, माणसं वा प्रसंग आपल्याला काहीतरी शिकवत असतात. माणसाने शिकण्याची जिज्ञासा बाळगून सतत शिकत मात्र रहायला हवं.

    ।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।

  • गायत्री मंत्र सर्वाक्षर महिमा

    गायत्री मंत्रातील सर्व अक्षरांचा महिमा वाचा....

    ''ॐ'' या अक्षराचा उच्चार केला असता मस्तकातील भाग प्रभावित होतो.

    ''भू:'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या डोळयावरील चार बोटांचा कपाळाचा भाग जागृत होतो.

    ''भूव:'' च्या उच्चारणाने मानवाच्या भृकुटीच्या वरील तीन अंगुलीचा भाग प्रभावित होतो.

    ''स्व:'' या अक्षराच्या उच्चाराने डाव्या डोळयावरील कपाळाचा चार अंगुली इतका भाग जागृत होतो.

    ''तत्'' च्या उच्चाराने आज्ञा चक्रामध्ये असलेली 'तापिनी' ग्रंथीतील सूप्त असलेली 'साफल्य' शक्ति जागृत होते.

    ''स'' च्या उच्चाराने डाव्या डोळयातील सफलता नांवाच्या ग्रंथीमध्ये सुप्त रूपाने असलेली 'पराक्रम' शक्ति प्रभावित होते.

    ''वि'' चे उच्चारण केले असता डाव्या डोळयामधील 'विश्व' ग्रंथीमध्ये स्थित असलेली 'पालन' शक्ति जागृत होते.

    ''तु'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कानात असलेल्या 'तुष्टी' नांवाच्या ग्रंथीतील 'मंगळकर' शक्ति प्रभावित होते.

    ''र्व'' या अक्षराच्या उच्चाराने उजव्या कानात स्थित असलेल्या 'वरदा' ग्रंथीतील 'योग' नावाची शक्ति सिध्द होते.
    'रे'' चा उच्चार केला असता नासिकेच्या मुळाशी स्थित असलेल्या 'रेवती' ग्रंथीतील 'प्रेम' शक्तिची जागृती होते.

    ''णि'' च्या उच्चाराने वरील ओठावर असलेल्या 'सूक्ष्म' ग्रंथीतील सुप्त शक्ति 'धन' संध्य जागृत होते.

    ''यं'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या खालच्या ओठावर असलेल्या 'ज्ञान' ग्रंथीतील 'तेज' शक्तीची सिध्दि होते.

    ''भर'' या अक्षर समुदायाच्या उच्चारणाने कंठत असलेल्या 'भग' ग्रंथीतील 'रक्षणा' शक्ति जागृत होते.

    ''गो'' चा उच्चार केला असता कंठकूपात स्थित असलेल्या 'गोमती' नावाच्या ग्रंथीतील 'बुध्दि' शक्तीची सिध्दि होते.

    ''दे'' च्या उच्चाराने डाव्या छातीच्या वरच्या भागात असलेल्या 'देविका' ग्रंथीतील 'दमन' शक्ति प्रभावित होते.

    ''व'' चा उच्चार उजव्या छातीच्या वरील भागात असलेल्या 'वराही' ग्रंथीतील 'निष्ठा' शक्तीची सिध्दि करतो.

    ''स्य'' याच्या उच्चारणाने पोटाच्या वरील बाजूस (ज्या ठिकाणी बरगडया जुळतात) सिंहिणी नावाची ग्रंथी असते. या ग्रंथीतील 'धारणा' शक्ति प्रभावित होते.

    ''धी'' च्या उच्चारणाने यकृतात असलेल्या 'ध्यान' ग्रंथीतील 'प्राणशक्ति ' सिध्द होते.

    ''म'' या अक्षराच्या उच्चाराने आपल्या प्लिहा मध्ये असलेल्या 'मर्यादा' ग्रंथीतील 'संयम' शक्तिची जागृती होते.

    ''हि'' च्या उच्चाराने नाभीमधील 'स्फुट' ग्रंथीतील 'तपो' शक्ति सिध्द होते.

    ''धी'' या अक्षराच्या उच्चारणाने पाठीच्या मागील करण्याच्या खालील भागात असलेल्या 'मेघा' ग्रंथीतील 'दूरदर्शिता' शक्तीची सिध्दि होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने डाव्या भूजेत स्थित असलेल्या 'योगमाया' ग्रंथीतील 'अंतर्निहित' शक्ति जागृत होते.

    ''यो'' च्या उच्चारणाने उजव्या भुजेमध्ये स्थित असलेल्या 'योगिनी' ग्रंथीतील 'उत्पादन' शक्ति जागृत होते.

    ''न:'' या अक्षराच्या उच्चारणांने उजव्या कोपरामध्ये असलेल्या 'धारीणी' ग्रंथीतील 'सरसता' शक्तीची सिध्दि होते.

    ''प्र'' या अक्षराच्या उच्चारणाने डाव्या कोपरात असलेल्या 'प्रभव' ग्रंथीतील 'आदर्श' नावाच्या शक्तीची जागृती होते.

    ''चो'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या मनगटात स्थित असलेल्या 'उष्मा' ग्रंथीतील 'साहस' शक्तीची सिध्दि होते.

    ''द'' या अक्षराच्या उच्चारणाने उजव्या तळहातावर असलेल्या 'दृश्य' नांवाच्या ग्रंथीतील 'विवेक' शक्तीची जागृती होते.

    ''यात्'' या अक्षर द्वयांच्या उच्चारणाने डाव्या तळहातावरील 'निरंजन' ग्रंथीतील 'सेवा' शक्ति सिध्द होते.

  • बाप्पांचे आलय : पद्मालय

    सर्वव्यापी, सर्वसाक्षी परमेश्‍वराचे वास्तव्य तसे चराचराच्या रोमारोमात आहेच. परंतु भक्तांच्या प्रेमळ आग्रहामुळे त्या जगत्पित्याला देवालयांमध्ये मुर्ती रूपात राहून भक्तांना दर्शनाचा लाभ करून द्यावा लागतो असेच सहस्त्रार्जुन व शेषनाग या दोन परमभक्तांच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगणेश अवतरले ते देवालय जळगाव जिल्हयातील एंरडोल तालुक्यात “ पद्मालय” नावाच्या एक छोट्याश्या गावात आहे. हा परिसर दंड कारण्याचाच एक भाग आहे असे म्हटले जाते. श्री गणेशाच्या साडेतीन शक्तीपिठांपैकी पद्मालय हे अर्ध शक्तीपीठ आहे.या देवालयात मुख्य गाभार्‍यात श्री गणेशाच्या दोन स्वयंभू मुर्ती आहेत. त्यापैकी एक मुर्ती उजव्या सोंडीची व एक डाव्या सोंडेची आहे. एकाच मंदिरात अशा दोन मुर्ती असणारे हे एकमेव स्थान आहे. या मुर्ती काशी व महड येथील श्री गणेशमुर्तींच्या प्रतिकृती आहेत.

    गाभार्‍यातील या दोन गणेशमुर्ती व्यतिरिक्‍त सभामंडपात चार ही बाजूना बाहेरील दिशेस तोंड असलेल्या चार गणेशमुर्ती आहेत. तसेच देवालय परिसरात छोटे मोठे असे एकंदरीत 21 गणपती आहेत. त्यामुळे हे क्षेत्र प्रवाळ क्षेत्र ही म्हटले जाते. या मुर्ती काळ्या पाषाणाच्या आहेत. सन 1885 मध्ये श्री गोविंदशास्त्री बर्वे यांनी या मंदिराचा जिर्णोद‍्धार केला. श्री. धोंडू लक्ष्मण कोळी यांनी वास्तुनिर्माणाचे कार्य केले आहे.

    मंदिराच्या भवताली एक मोठ्ठा तलाव आहे. पूर्वी या तलावात पवाड धातू मोठ्या प्रमाणात मिळत होता म्हणून तेव्हा या तलावास पवाड तळे असे म्हणत. नंतर या तलावात कमळांची उत्पत्ती खूप मोठ्या प्रमाणात होऊ लागली. कधी तर संपूर्ण जलाशय कमळाच्या फुलांनी गच्च भरले असते. इतके की तलावातील पाणी देखील दिसत नाही.

    महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून दरवर्षी हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात व बाप्पाला आपले गार्‍हाणे सांगतात. देवालयात आपल्या ऐपतीप्रमाणे लहान मोठ्या घंटा बांधतात. भाविक श्री गणेशाला नवस करतात व त्यांचा नवस पूर्ण झाला की मंदिरात घंटा बांधतात.

    या देवालयाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असे की येथे विवाह करावयाचा असल्यास मुहुर्त बघावा लागत नाही.वर्षातील 365 दिवसांत कधीही आणि कुठल्याही वेळेत येथे विवाह करू शकतात.
    पद्मालयापासून काही अंतरावर भीमकुंड आहे. पांडव अज्ञातवासात असतांना ते एक चक्रानगरीत ( आजचे एरंडोल ) वास्तव्यास होते. तेथील बकासुर या राक्षसाचा वध महाबली भीमाने याच ठिकाणी केला अशी अख्यायिका आहे. या जागी भीमाने यथेच्छ भोजन केले व नंतर कोपरखळीने हे तळे निर्माण केले. या तळ्याला आजही पाणी आहे. पद्मालयाला येणारे भाविक या ठिकाणीही आवर्जुन भेट देतात.

    जळगाव शहरापासून साधारण दिड तासात पद्मालय येथे जाता येते. बसेस व खाजगी वाहने उपलब्ध आहेत. एका दिवसाची एक संस्मरणीय सहल होते.

    सौ. मीनल कुलकर्णी
    7249822096 

  • श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थान : कडगंची

    श्रीदत्तात्रेयांच्या भक्तांसाठी वेदसम असलेल्या श्रीगुरुचरित्राचं लेखनस्थळ..

  • मनाचं सामर्थ्य

    अध्यात्म-विज्ञाना'नुसार आपल्या मनाचं सामर्थ्य इतकं आहे, की ते आपल्या जीवनाचा उद्धार जसं करू शकतं, तसंच ते आपलं जीवन उद्ध्वस्त देखील करू शकतं. याचाच अर्थ, आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा, की आपलं जीवन उद्ध्वस्त करून घ्यायचं, हे पूर्णपणे आपल्यावरच अवलंबून आहे. या सामर्थ्याची आपल्याला जाणीव नसल्याकारणाने एखादी प्रतिकूल परिस्थिती उद्भवताच आपण खचून जातो. 'मला हे जमणार नाही' असा विचार मनात घर करू लागतो. अशाच एका बिकट प्रसंगात, एका साधकाला स्वामींनी दृष्टांत देऊन जो संदेश दिला होता, तो आपल्या सर्वांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे. तो संदेश असा होता, की "प्रसंगांना सामोरे जाणं, तुझं काम आहे. तुझ्या मागे उभं राहणं, माझं काम आहे".

    प्राप्त परिस्थिती पाहून ज्या ज्या वेळी आपल्या मनात विचार येईल, की 'मला हे जमणार नाही', त्या त्या वेळी हे वचन जर आपल्याला आठवलं, तर आपल्या 'मागे कोण आहे' ह्याची आपल्याला जाणीव होईल आणि त्या प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याचं धैर्य आणि बळ निश्चितच आपल्यात आल्याशिवाय राहणार नाही. 'स्वामी कवच' यात नेमकं हेच तर सांगितलं गेलंय. नाही का ? त्यातही सांगितलं गेलंय, की "निःशंक होई रे मना, निर्भय होईल रे मना, प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना" अशी ही असाधारण शक्ती पाठीशी असता, 'मला हे जमणार नाही' असा विचार येणं याचा अर्थ, त्या शक्तीचा पूर्णपणे विसर पडणं हाच होते.

    आपली श्रद्धा अशी कमी पडता कामा नये. तर यापुढे आपण सर्वांनीच, 'आपण केवळ कर्ता आहोत आणि करविता आपल्या पाठीशी भक्कम उभा आहे' याची कायम जाणीव ठेवून 'मला हे जमणार नाही' हे वाक्य कायमचं विसरून जाऊया.

  • रथसप्तमी

    माघ शुद्ध सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. या दिवशी सूर्याचे विशेष महत्त्व आहे. सूर्याची आराधना केल्यास सर्व रोग बरे होतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळेच सूर्याची आराधना केली जाते. रथसप्तमी याचा अर्थ सूर्याचा सारथी "आरुणी‘ सात घोडे असणाऱ्या रथाचे सारथ्य करीत असतो. मकरसंक्रांतीपासून सूर्य हा तीळ तीळ वाढत जातो. रथसप्तमीनंतर संक्रांतीची समाप्ती मानली जाते.

    रथसप्तमीच्या दिवशी तुळशी वृंदावनाजवळ अंगणात सूर्यप्रकाश असणाऱ्या ठिकाणी पाटावर रांगोळीने सूर्याची प्रतिमा किंवा काही ठिकाणी सूर्याची मंडळे काढली जातात. बारा आणि सात मंडळांचा गोलक असतो. ही संख्या शुभ मानली जाते. यावर विड्याची पाने, सुपारी ठेवून तांबडे गंध, तांबडी फुले वाहिली जातात. या दिवशी नैवद्याच्या खिरीला अत्यंत महत्त्व असते. मातीच्या सुगड्यात दूध, तांदूळ घालून ते भांडे अंगणात गोवऱ्या पेटवून दूध ऊतू जाईपर्यंत तापवितात. त्याचा प्रसाद कुटुंबीय ग्रहण करतात. यालाच "पायस‘ असे म्हणतात. या दिवशी नैवेद्याकरिता गुळाची पोळीदेखील करण्याची परंपरा आहे.

    सकाळी सूर्याला सूर्यफूल टाकून अर्घ्य वाहिले जाते. "तुझ्याप्रमाणे माझे जीवन तेजोमय होऊ दे‘, अशी प्रार्थना सूर्याची 12 नावे घेऊन केली जाते. मात्र, ही पूजा सूर्याच्या साक्षीने अंगणातच करण्याचा दंडक आहे. सूर्याची उपासना आपल्याकडे हजारो वर्षांपासून रथसप्तमीच्या निमित्ताने करण्याचा प्रघात आहे. या दिवशी हळदीकुंकू वाटले जाते व सायंकाळी देवळात जाऊन संपूर्ण दिवस आनंदात घालविला जातो.

    संकलन संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – १

    माझी तत्वसरणी कदाचित कुणालाही सहजासहजी पटणार नाही, याची मला पूर्ण जाणीव आहे. तरीपण ती सर्वाना सांगण्याचा मोह टाळता येत नाही. विचारांची दिशा म्हणजे विचारसरणी....तसेच तत्वांची दिशा म्हणजे तत्वसरणी असा अर्थ समोर ठेअून मी हे लेख लिहिले आहेत.

    जेव्हा मानव भोवतालच्या निसर्गाचं निरीक्षण करू लागला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की, निसर्गातील घटना घडण्यामागं प्रचंड शक्ती आणि कमालीची सुसूत्रता आहे. मानवाचा मेंदू विचार करू लागला तसा, केलेल्या निरीक्षणांचे, त्याच्या मेंदूच्या कुवतीनुसार आणि आधी घेतलेल्या अनुभवांच्या बळावर, स्पष्टीकरणेही देअू लागला.

    पहिला विचार कोणता आला असेल तर तो हा की, हा निसर्ग कुणीतरी शक्तिमान व्यक्तीनं निर्माण केला असावा आणि त्याचं नियंत्रणही तोच अतिशय हुशारीनं करीत आहे. ....ती व्यक्ती म्हणजेच अीश्वर ही संकल्पना रूढ झाली आणि हजारो वर्षांपासून आजही मानवाचं श्रद्धा आणि पूजास्थान आहे. ही श्रद्धाच त्याला जीवनभर तारते आहे, मार्ग दाखविते आहे.

    दुसरा महत्वाचा विचार म्हणजे सजीवांच्या शरीरात कोणतीतरी दिव्य चेतना असली पाहिजे. जोपर्यंत त्याच्या शरीरात ही चेतना जागृत असते, कार्यक्षम असते तोपर्यंत तो सजीव त्याचे सर्व व्यवहार … म्हणजे आहार .. अन्न मिळविणं, त्यासाठी भटकंती, संघर्ष, आक्रमण किंवा प्रतिकार करणं, प्रजोत्पादन करणं वगैरे सुरळीतपणं करता येतात. जेव्हा ही चेतना त्या सजीवाच्या शरीरातून निघून जाते तेव्हा तो सजीव अचेतन होतो, मरतो. याच चेतनेला त्यानं नाव दिलं … आत्मा.

    अीश्वर आणि आत्मा या दोन संकल्पना, मानवाचा मेंदू विचार करू लागला तेव्हापासून रूढ झाल्या आहेत. पुढे अनेक धर्म स्थापन झाले आणि त्या सर्व धर्मात अीश्वर आणि आत्मा या संकल्पना अग्रभागी राहिल्या.

    सोमवार 26 जून 2000 रोजी, अमेरिकेचे अध्यक्ष बिल क्लिंटन आणि अिंग्लंडचे पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी संयुक्तपणे, मानवाच्या जनुकीय नकाशाचं काम पूर्ण झाल्याचं जाहीर केलं. जनुकीय नकाशाचं काम, डॉ. जे. क्रेग व्हेंटर यांनी, खाजगीरित्या पूर्ण केलं. सरकारी यंत्रणेत हे काम 1986 साली, कॅलिफोर्निया विद्यापीठात सुरु होतं आणि ते अेप्रिल 2003 मध्ये पूर्ण झालं.

    ही बातमी वाचून माझ्या मेंदूत आनुवंशिक तत्व, सजीवांचा जन्म आणि सजीवांची शरीरं यासंबंधी, तसंच झाडांच्या बिया आणि अंकुरित झाडं या संबंधी विचार घोळू लागले.

    या विचारांचा गोषवारा मी लिहिलेल्या पुढील चार लेखात आला आहे. हे लेख, मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (सप्टेंबर 2000), शिक्षण संक्रमण पुणे, (ऑक्टोबर 2000), मराठी विज्ञान परिषद पत्रिका, (दिवाळी, नोव्हेंबर 2000), किर्लोस्कर (डिसेंबर 2000) प्रसिध्द झाले. नंतर मुंबअी तरूण भारत, (25 जानेवारी 2002), मुंबअी तरूण भारत, (1 फेब्रुवारी 2002), अमृत (मार्च 2002), अमृत (जुलै 2002), असे चार, जास्त माहिती असलेले माझे लेख प्रसिध्द झाले. त्यानंतर मात्र हा विषय थोडा मागे पडला. तरी पण मेंदूत विचार चालूच होते.

    त्यानंतर नोव्हेंबर 2008 ते मे 2009 या काळात, मी अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यातील ओरलॅन्डो शहरी माझ्या मोठ्या मुलीच्या घरी वास्तव्यास होतो. त्याच सुमारास, अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ह्यूस्टन शहरातून श्री. दिवाकर कारखानीस,www.sawali.org हे संकेतस्थळ चालवीत होते. त्यावर मी दोन अध्यात्मिक निबंध लिहीले. अेक "अध्यात्म आधी की विज्ञान आधी अवतरले?" आणि दुसरा "अीश्वराची संकल्पना".

    ओरलॅन्डो शहरात काही भारतीय व्यक्ती, रोज संध्याकाळी 7 वाजेपासून 8 वाजेपर्यंत अेका रेडियो स्टेशनवर, भारतीयांसाठी, माहितीपर, वैचारिक आणि करमणूकप्रधान कार्यक्रम सादर करीत असत. त्यातील अेक संचालिका, शोभना डॅनियल, माझ्या मुलीची (सौ. पालवी जहागिरदार) मैत्रिण होती. शोभनाजवळ, माझी मुलगी, माझ्या अध्यात्मिक लिखाणाबद्दल बोलली. तिला माझे लेखही वाचायला दिले. ते शोभनाला अितके आवडले की तिनं नजिकच्या मंगळवारी, रेडियोवर माझा कार्यक्रम ठेवला. तो अितका रंगला की नंतरचे तीन मंगळवार असे अेकूण चार कार्यक्रम झाले.

    चौथा कार्यक्रम चार प्रतिनिधींच्या स्वरूपात झाला. सामान्य माणूस म्हणून स्वत: शोभना, विज्ञानीय दृष्टीकोनातून अध्यात्माकडे पाहणारा मी, ओरलँडो, फ्लॉरिडा येथील, हिंदू युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका येथे, हिंदूधर्म आणि अितर धार्मिक ग्रंथांवर संशोधन करणारे आणि तेथे अध्यापन करणारे, मूळचे न्यू यॉर्क विद्यापीठातील संगणक अभियंता डॉ. अभिनव द्विवेदी आणि अमेरिकेत जन्मलेल्या आणि वाढलेल्या तरूण पिढीला अध्यात्माबद्दल काय वाटतं याचा प्रतिनिधी म्हणून 16 वर्षांचा अतीश पटेल या चार व्यक्तीत चर्चा झाली. यातील शोभना आणि मी, रेडियो स्टेशनात, अभिनव द्विवेदी, ओरलॅन्डो शहरापासून 150 मैलावरील टांपा शहरात तर अतीश पटेल त्याच्या घरी होता.

    या कार्यक्रमाच्या निमित्ताने...विज्ञानीय अीश्वर (Science God), आत्मा, आत्म्याचं शरीरातील स्थान, पुनर्जन्म, मागील जन्मातील बरीवाअीट कर्मे आणि त्यांचा वर्तमान जन्मावरील परीणाम, पाप, पुण्य, मोक्ष, जन्ममृत्यूचे फेरे, स्वर्ग, नरक, यम आणि त्याचा मृत्यूफास, जपजाप्य, पोथ्या/मंत्र पठण वगैरे अनेक अध्यात्मिक विषयांवर चर्चा झाली. "आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत" आणि भगवत् गीतेतील काही श्लोकांचा विज्ञानीय अन्वयार्थ लावणं या अुपक्रमाचे बीज
    तेथेच रुजलं.

    या विश्वात, अमूर्त असं काहीही नसतं, सगळे घटक मूर्त स्वरूपातच असले पाहिजेत. अीश्वर आणि आत्मा हे ही अपवाद नाहीत. त्यापैकी आत्म्याचं मूर्तस्वरूप म्हणजे सजीवांच्या शरीरात असलेलं आनुवंशिक तत्व ... जेनेटिक मटेरिअल.

    हाच माझा आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत.

    गजानन वामनाचार्य, मुंबअी.

    शनिवारचा सत्संग - 1
    शनिवार 26 नोव्हेंबर 2016

    पूर्वप्रसिध्दी : आपले जग, किर्लोस्करवाडी -
    27 फेब्रुवारी 2012

  • माझा जन्म… आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत – २

    सजीव, त्यांची पुनरुत्पादन यंत्रणा आणि त्यांचा जन्म, या विषयी विचार करता करता काही कवितां स्फुरल्या. त्यापैकी काही येथे देत आहे. कारण त्या, माझ्या … आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांताशी संबंधीत आहेत.

    माझा जन्म.....
    माझा जन्म हा ….
    माझ्या आअीबाबांचा निर्णय होता.
    या पृथ्वीवर ….
    जन्म घेण्याशिवाय
    मला
    दुसरा पर्यायच नव्हता ....

    प्रत्येक सजीवाच्या बाबतीत हे अगदी खरं आहे. नराचा शुक्राणू आणि मादीचं पक्व बीजांड यांचं संयोग झाला म्हणजे अपत्य पिढीच्या सजीवाचा गर्भपिंड निर्माण होतो, मादीच्या गर्भाशयात त्याची वाढ होते आणि प्रजातीनुसार, ठरलेल्या काळानंतर, अपत्य पिढीचा अेक सजीव, मादीच्या शरीराबाहेर येअून, या पृथ्वीवर स्वतंत्रपणं जगू लागतो. यात, अपत्य पिढीच्या सजीवाला काहीही पर्याय नसतो. निसर्गनियमानुसार त्याचा जन्म होतो.

    वनस्पतींच्या बाबतीतही हे खरं आहे. पुंकेसर आणि स्त्रीकेसर यांचा संयोग होअून, फुलातून, त्या प्रजातीचं फळ निर्माण होत.
    जनक पिढीचा जन्मही याच प्रकारानं झालेला असतो. त्यांना तरी कोणता पर्याय होता? त्यांच्या आअीबाबांनी त्यांना जन्माला घालून या पृथ्वीवर आणलं होतं. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म ……

    ही साखळी अशीच चालू होती.

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे.

    आता कवितेचं दुसरं कडवं वाचा.

    बाबांचा शुक्राणू...
    त्यांच्या मातापित्यांच्या ....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आला ...

    आअीचं बीजांड ...
    तिच्या मातापित्यांच्या .....
    अनेक पूर्वपिढ्यांतील ....
    आनुवंशिक तत्वाचा ठेवा घेअून आलं ...

    बाबांचा शुक्राणू ... आअीचं बीजांड
    ....माझा जन्म
    आणि …
    आअीबाबांच्या आनुवंशिक तत्वाचा ....
    पुनर्जन्म..

    मागच्या अनेक पिढ्यातून माझ्या पिढीपर्यंत अेक चेतना संक्रमीत होत आली हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्‍या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - 2
    शनिवार 3 डिसेंबर 2016 

  • सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व

    मागच्या पिढीशिवाय पुढच्या पिढीचा जन्म होत नाही हे विज्ञानीय सत्य आहे. याची चर्चा आपण मागच्या आठवड्यात केली. मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म, मागच्याच्या मागच्याच्या मागच्या पिढीचा जन्म …… ही साखळी अशीच चालू होती म्हणूनच माझा जन्म होअू शकला.

    मी आणि माझ्या बायकोनं, आमच्या अपत्यांना जन्म दिला. त्या अनुषंगानं केलेली ही कविता वाचा आणि त्यावर मनन करा.

    माझ्या शुक्राणूत होतं
    माझ्या आअीबाबांच्या अनेक
    पूर्वपिढ्यातून संक्रमित
    झालेलं आनुवंशिक तत्व,

    माझ्या बायकोच्या
    पक्व बीजांडात होतं
    तिच्या आअीबाबांच्या अनेक
    पूर्वपिढ्यांतून संक्रमित झालेलं आनुवंशिक तत्व.

    आमच्या अपत्याचा जन्म
    हा आमचा निर्णय होता
    या पृथ्वीवर जन्म घेण्याशिवाय
    अपत्याला दुसरा पर्यायच नव्हता

    माझा शुक्राणू … बायकोचं पक्व बीजांड …
    आमच्या अपत्याचा जन्म ….
    आमच्यातील आनुवंशिक तत्वाचा
    पुनर्जन्म.

    सजीवांच्या ….
    जनक-जननींच्या
    अनेक पूर्वपिढ्यातून
    संक्रमित झालेलं
    आनुवंशिक तत्वंच
    अपत्यरुपानं अनेक
    पुनर्जन्म घेत असतं

    आनुवंशिक तत्व हाच
    सजीवांचा आत्मा आहे.
    तोच अपत्यरुपानं पुढच्या पिढीत
    जन्म घेत असतो

    आनुवंशिक तत्व
    दोन जिवंत शरीरातून
    तिसर्या जिवंत शरीरात
    प्रवेश करतं ….
    अेका मेलेल्या शरीरातून
    दुसर्या जिवंत शरीरात नाही.

    वासांसि जीर्णानि …. ।।गीता :: 2 :: 22।।
    हा श्लोक
    आत्म्याच्या आनुवंशिक सिध्दाताला
    मान्य नाही

    सजीव मेला की संपला
    त्याचा या पृथ्वीवरील जन्म हा
    पहिलाच आणि शेवटचाच असतो.

    प्रेताची प्रत्येक पेशी
    सडते विघटन पावते आणि
    अणूरेणूंच्या स्वरूपात
    पर्यावरणात विलीन होते.

    जन्ममृत्यूचं हे चक्र नसून
    जन्म-पुनर्जन्माची ही साखळी आहे.
    हे ध्यानी घे, मनुजा…मानवा…
    हे ध्यानी घे.

    सजीव, वयात आला … म्हणजे जननक्षम झाला …. म्हणजे तो पुढच्या पिढीला जन्माला घालतो. पुढची पिढी आणखी पुढच्या पिढीला जन्माला घालते, पुढच्याच्या पुढची पिढी, पुढच्याच्या पुढच्याच्या पुढच्याच्या पुढची पिढी ….. ही साखळी, जोपर्यंत या पृथ्वीवर, सजीवांच्या अस्तित्वाला पोषक अशी परिस्थिती आहे तो पर्यंत चालू राहणार आहे आणि तोपर्यंत दोन जिवंत शरीरातून अेक चेतना, तिसर्या जिवंत शरीरात संक्रमित होत राहणार आहे हे ही विज्ञानीय सत्य आहे.

    -- गजानन वामनाचार्य

    शनिवारचा सत्संग - ३
    शनिवार १० डिसेंबर २०१६

    सजीवांच्या शरीरातील आनुवंशिक तत्व
    आत्म्याचा आनुवंशिक तत्व सिध्दांत