वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मानव अभिव्यक्तीप्रधान प्राणी आहे. आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी त्याची धडपड असते.ते झाले तर जीवनात सफलता येते. जगण्यात जीवंतपणा येतो. आपली संस्कृती जतन करता येते. भावभावना आणि सृजनाचा मुक्त आविष्कार होत असतो. प्रबोधन होते. संस्कार होतात. समाज घडतो. सामाजिक घडामोडींचे प्रतिबिंब साहित्यात उतरत असते. तद्वतच साहित्य जगण्याचे नवे भान देते. वेदना, आक्रोश, प्रेम, शौर्य, विद्रोह, हर्ष यासम विविध भावभावना साहित्यातून व्यक्त होत असल्याने रंजकतेबरोबरच ज्ञानसंवर्धनाचीही जबाबदारी साहित्याची असते. गद्य आणि पद्य साहित्य परिवर्तन घडवून आणते.साहित्याने क्रांती घडविलेली आहे. हे साहित्य शहरी भागात जसे विकसित पावते तसे खेड्यात, ग्राम्य वातावरणातही निर्माण होते. शहरातील साहित्य निर्मितीवर चर्चा होते.समीक्षणात्मक लेखन होते.लेखकाची नोंद घेतली जाते. पुरस्कार, मानसन्मान, प्रेरणा मिळते. प्रकाशक मिळतात. पुस्तके छापली जातात.लेखक नावारूपास येतात.एकंदरीत काय तर लेखक घडविला आणि घडला जातो.प्रसारमाध्यमे आणि नियतकालिकांचा योग्य वापर करून घेतला जातो. साहित्य संमेलने भरविली जातात. त्यास प्रायोजक व्यक्ती, संस्था मिळतात. त्यामुळे लेखकास मंच मिळतो. हे साहित्य योग्य घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. येथील बालकुमार वाचक , प्रौढ वाचक मोठ्या प्रमाणात साक्षर असतात. घरी विद्या , ज्ञानप्राप्तीचे धडे मिळत असल्याने वाचक ज्ञानी असतो.तेथील समाजाच्या आचार विचारांचा प्रभाव लेखन साहित्यात जाणवतो.नियतकालिके शहरी साहित्य जास्त प्रमाणात स्वीकारतात.कारणही तसेच असते. वाचकाभिमुख साहित्य निर्माण होते. साहित्यात जे विविध प्रवाह आहेत त्यात दलित , ग्रामीण, स्त्रीवादी आणि नागरी साहित्य यांचाही समावेश होतो. मात्र ग्रामीण साहित्याला आता अडथळय़ाची शर्यत पूर्ण करावी लागते.
ग्रामीण भागातही साहित्य संमेलने भरवली जातात. सर्व समूह त्यात सहभागी होत असतात.एकतर साहित्य म्हणजे काय असते याचा परिचय ग्रामस्तरावर खूप कमी लोकांना असतो. ते फक्त मनोरंजन या दृष्टिकोनातून त्याकडे पाहतात. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, नाट्य, यांना डिजिटल युगातील स्थान शोधावे लागते. वाचन संस्कृती ही धार्मिक ग्रंथ वाचन आणि पारायण यापलिकडे जायला तयार नाही. शिक्षणाचा प्रभाव आता जाणवू लागला आहे. परिणामस्वरूप आता काही ठिकाणी साहित्य संमेलने भरत आहेत हे सुचिन्ह आहे. मंगळवारपासून सोयगावमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन होत आहे.हे संमेलन सर्वार्थाने यशस्वी होईल, यात शंका नाही.मराठवाडा साहित्य परिषदेची साहित्य संमेलने ही अधिकाधिक शहरवजा खेड्यातच होत आहेत. अशा साहित्य संस्थांनी पुढाकार घेऊन साहित्याचा ग्रामजागर भरवावा. गावखेड्याची सांस्कृतिक भूक खूप मोठी आहे. ती या व्यवस्थेने पूर्ण करावी.ती त्यांची जबाबदारी आहे. या संमेलनाचा मांडव अनेक मानापमान नाटकांनी रंगतो. साधनांची कमतरता असते. साहित्याचे अंग कमी आणि बिघाडीची हमी जास्त अशी गत असते.
राजकीय पार्श्वभूमीही यास लाभलेली असते.त्यामुळे आयोजनास कुणी धजावत नाही. ज्यांची शाळा, महाविद्यालये आहेत अशी मंडळी राबता असल्यामुळे संमेलन आयोजनाचे धाडस करतात. महागाईच्या काळात साहित्य जोपासणो अवघड होऊन जाते.त्यातच इंग्रजी भाषा आक्रमणाचा हा काळ आहे. इंग्लिश स्कूल नावाचा नवीन व्यवसाय रूळत आहे. त्यांची सेवावृत्ती की मेवावृती हाही एक प्रश्न आहे. त्या मार्गाने मराठी साहित्य संवर्धन होईल का हे येणारा काळच ठरविल.
गावखेड्यात एखादा दुसरा कवी, लेखक असतो.जीवनाशी निगडीत, परिसराचे चित्रण तो मांडत असतो. त्याची धडपड असते ती आपले साहित्य वाचकांपर्यंत जावे ही. पण त्यास आवश्यक त्या संधी मिळत नाहीत.मातीतून उगवलेले साहित्य पीक करपण्याचीच शक्यता अधिक. प्रकाशन संस्था आणि त्यांचे व्यवहार या विषयी अनेक अनुभव आहेत.
कविता, कथा वा कादंबरी लिहिली तरी प्रकाशित करण्यासाठी शहरातच यावे लागते. कितीतरी दज्रेदार लेखन करणारे लेखक असे आहेत की ते त्यांचे पुस्तक प्रकाशित करू शकत नाहीत.काहींनी तर लिहिणो हा छंदच सोडून दिला आहे. काही फेसबूक , व्हॉट्सअँप, हाईक, गुगल, इन्स्टाग्राम अशा माध्यमांपुरतेच र्मयादित असतात. तिथेच अभिव्यक्त होतात.
साहित्य निर्मिती आणि त्यावरील चर्चा, समीक्षा हा विषयच वेगळा आहे.तो दुर्मिळ आहे. असे असले तरी आसाराम लोमटेंच्या आलोकचा साहित्य अकादमी पुरस्कार ही घटना या मातीचेच पीक आहे. तसे कसदार साहित्य निर्माण होते पण त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होणो ही खरी गरज आहे. खेड्यात संमेलनास खूप चांगला प्रतिसाद मिळतो. नाविन्यता असते.
गावपरिसरातील उत्तम परंपरा लोकसाहित्य याचे प्रतिबिंब या संमेलनात उमटावे. नविन लेखकांना लिहीते करणो .म्हणजे प्रस्थापित लेखकांनी नवे लेखक घडवावेत आणि सुजाण वाचकांनी, रसिकांनी वाचक घडवावेत. वाचकांना वाचण्यास प्रेरीत करणो या साठी ग्रामसाहित्य संमेलने महत्वाचे कार्य करतात. मोठय़ा संमेलनापेक्षा छोटे साहित्यिक उपक्रम अधिक भर घालतात. प्रभावी ठरतात. लेखनावर चर्चा होते. भाषिक सौंदर्य अधिक खुलते.
शासन अन्य मराठी साहित्य संमेलनास अनुदान देते. ते अधिकाधिक ग्रामस्तरावर द्यावयास हवे. जिल्हास्तरावर ग्रंथोत्सव जसे होतात तसे तालुकास्तरावर , ग्रामस्तरावर उत्सव आयोजित करावेत. योग्य उपक्रमास, संमेलनास पाठबळ मिळावे. जेणोकरून ग्रामसाहित्य संवर्धनासाठी हातभार लागेल . बालकुमार, महिलांसाठी साहित्यनिर्मितीसह संमेलनाची गरजच आहे. ग्राम साहित्य संमेलनाचा मांडव, वर्हाडी आणि लगीनघर सजले तरच भाषेचे तोरण शोभून दिसेल.
विठ्ठल जाधव
मो - ९४२१४४२९९५
पुण्यनगरीमधील लेख.. लेखकाच्या अनुमतीने पुनर्प्रकाशित
गरमागरम चहाचा आस्वाद घेत असताना पेपरवाल्याने कधी नव्हे तो आज वेळेवर पेपर टाकला. पेपरच्या मुखपृष्ठावर एक मोठ्ठे छायाचित्र छापले होते. त्यात रस्त्याच्या कडेला खडी फोडत बसलेली मजूर स्त्री आणि तिच्या शेजारी नखशिखांत धुळीने माखलेला व रणरणत्या उन्हात मनसोक्त खेळत असलेला तिचा मुलगा दाखवला होता व त्या छायाचित्राखाली लिहिले होते- आज जागतिक महिला दिन ! अशा दिवसाची सर्वांना आठवण करून देण्यासाठी हताश, उदास, गरीब, अत्यंत कष्टप्रद काम करणा-या व नेसत्या वस्त्रांच्या चिंध्या झालेल्या महिलांचे भलेमोठे फोटो प्रसिद्ध करून या वर्तमानपत्रवाल्यांना त्यांच्या वाचकांपर्यंत नक्की कोणता संदेश पोहोचवायचा असतो, हे आजपर्यंत मला कळलेले नाही. आज जर ‘जागतिक महिला दिन’ आहे तर ‘जागतिक पुरुष दिन’ केव्हा साजरा करत असतील?, असा एक विचार विनाकारण मनाला चाळवून गेला. महिलांचे फोटो, त्यांच्या यशोगाथा व मुलाखतींने पेपरची सर्व पाने ओसंडून वाहत होती. टीव्हीवर काही वेगळे बघता येईल म्हणून प्रयत्न केला, तर ए नावाच्या चॅनेलपासून तर झेड नावाच्या चॅनेलपर्यंत एकूण एक वाहिन्या महिलांनी व्यापून टाकल्या होत्या. ‘कसा तुमच्या लक्षात राहत नाही आजचा दिवस तेच बघतो’, असा आज सर्वांनी चंगच बांधला असावा ! या सर्वांपासून दूर जाऊन एखादे आवडीचे पुस्तक वाचावे म्हणून उठणार, एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मी प्रचंड वैतागलो. आजची सुंदर सकाळ आपल्या मनाप्रमाणे घालवता येणार नाही याची खात्री पटल्यामुळे कपाळावर आठ्यांचे जाळे विणत अत्यंत अनिच्छेने दरवाजा उघडला, तर समोर आनंदाने निथळत असलेल्या चेह-याने हातात कसलातरी बॉक्स घेऊन तो उभा होता. दोन वर्षांपूर्वी इमारतीत वास्तव्यासाठी आलेल्या या व्यक्तीने कोणाशीही संबंध न ठेवल्यामुळे आज प्रथमच व अचानक तो स्वत: भेटायला आल्यानंतर माझा चेहरा प्रश्नचिन्हांनी भरून गेला. त्याने एकही क्षण वाया न घालवता तो बॉक्स माझ्या हातात ठेवला व त्याच्या तोंडातून दोन शब्द बाहेर पडले, ‘सर, पेढे !’ ‘अहो, पण कशाबद्दल?’ मीही वेळ वाया न घालवता प्रश्न विचारला. ‘मुलगा !’ त्याचे टेलिग्राफिक उत्तर ऐकून मी जवळपास ओरडलोच- ‘अहो, केव्हा झाला आणि इथे कोणालाच कसे माहीत नाही?’ गेली दोन वर्षे आमच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून त्याची बायको आम्हाला सतत दिसायची व त्या काळात ती गर्भवती असल्याचे एकदाही लक्षण दिसले नव्हते. त्यामुळे त्याच्या तोंडून ‘मुलगा’ हा शब्द ऐकल्याबरोबर मी उडालोच. माझी अवस्था त्याच्या लक्षात आल्यामुळे तो म्हणाला, ‘सर, मुलगा अजून झाला नाही, होणार आहे. डिलिव्हरीला अजून काही महिने वेळ आहे.’ त्याच्या या वक्तव्यावर मी अवाक् होऊन आळीपाळीने एकदा त्याच्याकडे व एकदा त्या पेढ्यांच्या बॉक्सकडे बघू लागलो आणि त्यानंतर हळूहळू माझ्या डोक्यात प्रकाश पडू लागला. माझ्या कोणत्याही प्रश्नाची वाट न बघता त्याने बोलायला सुरवात केली.
‘सर, तुम्हाला तर माहीतच आहे की मला शाळेत जाणारी एक मुलगी आहे. आम्हाला मुलगा नाही म्हणून काही वर्षांपासून आम्ही दोघेही खूप दु:खी होतो. शेवटी मी निर्णय घेतला की, आता आपल्याला मुलगा झालाच पाहिजे. माझी बायको गर्भवती आहे असे कळले, की मी डॉक्टरांकडे जाऊन तिची टेस्ट करून घ्यायचो. मुलगी असल्याचे कळले की लगेच गर्भपात. गेल्या तीन वर्षांत तिचा चारदा गर्भपात केला. पाचव्या खेपेला मुलगा असल्याचे कळले आणि वेळ वाया न घालवता सर्वांना पेढे वाटण्यास सुरुवात केली !’
त्याच्या बोलण्यातली सहजता व न लपवता येणा-या आनंदामुळे मला एका प्रचंड अस्वस्थतेने घेरून टाकले. माझ्याशी बोलत असलेला व स्वत:ला सुशिक्षित समजणारा एक माणूस पराकोटीच्या अशिक्षित व असंस्कृतपणाचे अत्यंत निर्विकारपणे प्रदर्शन करत माझ्यासमोर उभा होता. गप्प बसून ते सर्व सहन करणे अशक्य झाल्यामुळे माझ्या तोंडून नकळत प्रश्न निघून गेला, ‘साहेब, गर्भाचं लिंग ओळखण्याच्या चाचण्यांवर कायद्याने बंदी आहे, हे तुम्हाला माहीत आहे नं?’ तो मोठ्याने हसला व हसताहसता म्हणाला, ‘सर, अहो कुठल्या काळात जगताय तुम्ही? अशी बंदी आणल्याने का कधी काही गोष्टी थांबत असतात आपल्या देशात? तुमच्या दृष्टीने जी बंदी आहे ती अनेकांसाठी सुवर्णसंधी आहे. दारूबंदी असो की गर्भजल परीक्षेवर आणलेली बंदी, त्यात होत असते अनेकांची चांदी ! बंदी येण्याआधी ही चाचणी किती स्वस्त होती? पण बंदी आली आणि तिने अनेकांच्या बंगल्यांवर सोन्याची कौलं चढवली.’ माझ्या चेह-यावरील अविश्वास बघून त्याने नागपूर, औरंगाबाद, नाशिक, पुणे व मुंबईतील चाचण्यांची ‘रेट लिस्ट’च मला ऐकवली. मी सुन्न होऊन त्याच्या चेह-याकडे बघत असताना त्याने माझा केव्हा निरोप घेतला हे माझ्या लक्षातही आले नाही. पुत्रप्राप्तीसाठी चार मुलींचा गर्भावस्थेतच खून पाडणारा एक सुशिक्षित बाप जागतिक महिला दिनाच्या दिवशी बिनदिक्कत सर्वत्र पेढे वाटत फिरत होता !
आपल्या महान देशाच्या उत्तरेकडील राज्यात मुलगी जन्माला येताच तिला दुधात बुडवून ठार मारण्यात येते, हे अनेक वर्षांपूर्वी ऐकल्यानंतर बसलेल्या धक्क्यातून सावरत नाही तोच राजस्थानात नवजात मुलींना मारण्यासाठी त्यांच्या तोंडात जळजळीत कॉस्टिक सोडा टाकण्यात येतो, तर काही स्त्रीलिंगी गर्भांना जन्म होताच यमसदनी पाठवण्यासाठी त्यांना गरम वाळूच्या पोत्यात भरून व त्या पोत्याचे तोंड करकच्च बांधून त्याला कडक उन्हात ठेवण्यात येते, हे वाचल्यानंतर माझा मनुष्यप्राण्यावरील विश्वास उडण्यास सुरुवात झाली. मला कळेना की या जगात सर्वात क्रूर नक्की कोण? या पृथ्वीवरील ज्यूंना नामशेष करण्यासाठी त्यांचा अनन्वित छळ करणारा हिटलर, की मुलीला आईच्या पोटातच संपवणारे किंवा तिचा जन्म होताच अत्यंत क्रूरपणे तिची हत्या करणारे तिचे सख्खे जन्मदाते, की त्या हत्या करण्यासाठी घसघशीत फी आकारून उत्साहाने मदत करणारे पांढ-या डगल्यातील सोफिस्टिकेटेड राक्षस?
पेढे वाटणा-या शेजा-याचा आनंदी चेहरा माझ्या डोळ्यासमोरून हलत नव्हता. जागतिक महिला दिनानिमित्त सकाळपासून वर्तमानपत्रात व टीव्हीवर सावित्रीबाई फुले, मादाम क्यूरी, इंदिरा गांधी, मार्गारेट थॅचर, कल्पना चावला व अनेक जगप्रसिद्ध महिलांचे गायले जात असलेले गोडवे माझ्या कानांमधून मेंदूपर्यंत पोहोचत नव्हते. सतत गर्भपात करणे अत्यंत धोकादायक असते व त्यात स्त्रीला स्वत:चा जीवही गमवावा लागू शकतो, ही माहिती चार गर्भपातांनंतर मुलाला जन्म देण्याच्या तयारीत असलेल्या त्या गर्भवतीपर्यंत पोहोचवण्याचा मी जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तिचे उत्तर होते - ‘माझा जीव गेला असता तरी चाललं असतं, पण मलाही मुलगाच पाहिजे होता !’
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
गुजरात एटीएसने १ मार्चला ‘आयसिस’शी संबंधित दोन तरुणांना अटक केली . गुजरातेतील एका धार्मिक स्थळावर हल्ला करण्याचे त्यांचे नियोजन होते. काही दिवसांपूर्वी ‘एनआयए’ने मोईनुद्दीन नावाच्या केरळचा तरुणाला अटक केली.अबुधाबीमध्ये राहून केरळात इस्लामिक स्टेटची स्थापना करून तिथल्या युवकांना ‘आयसिस’मध्ये सामील करण्याच्या प्रयत्नात तो होता.
आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे.
दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात,
परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते.
दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील क्लेदाचे पाचनही व्यवस्थित होत नाही. अशा अवस्थेत त्या आशयामधे आलेला अन्नरस किंवा पोषकांश देखील दूषित होतो.
जसे नासलेल्या दुधामधे कितीही चांगले शुद्ध सात्विक दूध घातले तर सर्वच दूध नासते.
किती सुंदर उदाहरण ग्रंथकारानी दिले आहे.
दही विरजलेले पातेले आहे, त्यातील सर्व दही चमच्याने खरडून जरी काढून घेतले, पण पातेल्यात, पाणी घालून जर धुतले नाही, जर त्या दह्याचा थोडासा अंश पातेल्यात शिल्लक राहिला तर ? आणि पुनः त्याच पातेल्यात दूध ओतले तर ?
परत सर्व दुधाचे रूपांतर दह्यामधे होईल. तसंच ग्रंथकार सांगत आहेत.
रात्रौच्या वेळी होणारी स्रोतो संकोच ही प्रक्रिया आणि त्याचा पचनावर होणारा परिणाम पचन बिघडवणारा असतो, असे शास्त्रकारांना सांगायचे आहे. म्हणून रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ नंतर जेवू नये.
आप्त मंडळी जे सांगतात, ते ऐकलं तर खूप गैरसमज दूर होत असतात. मी म्हणेन तेच खरं हा मोठ्ठा दोष आहे. आपल्या परंपरा काय सांगताहेत, आपण कुठे रहातोय, आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, याचा विचार आरोग्याच्या रक्षणासाठी व्हायलाच हवा. आप्त म्हणजे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली मंडळी.
त्यांनी अनुभवलेलं, ग्रंथामधे लिहून ठेवलेलं, आम्हाला नको झालंय, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी आजची पिढी, अवांतर वाचन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, कोणी सांगितले तर विश्वास ठेवत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला पुरावा हवा असतो. बुद्धीवादी व्हावं, विज्ञानवादी व्हावं, जरूर व्हावं, पण या करीता आपले पूर्वज जे सांगत होते, त्या मागील कारणांचा आपल्या सकारात्मक बुद्धीने जरा विचार करावा.
आपल्या आजोबांना, वडीलांना विचारावे, त्यांच्या लहानपणी, जेवणाच्या वेळा कोणत्या होत्या, जेवणातले पदार्थ कोणते होते, काही पदार्थ विशिष्ट दिवशीच केले जात होते, मांसाहार विशिष्ट दिवशीच घेतला जात होता, असे का ? हे शोधून काढले पाहिजे.
या प्रश्नांची उत्तरे मिळवली की, आज रोग का वाढताहेत, याचेही उत्तर सहज मिळू लागेल.
या सर्व उदाहरणावरून लक्षात येतंय की रोग वाढायचं मुख्य कारण आमचं उशीरा होत असलेलं जेवण हे आहे. बदलायचं ठरवलं तर आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो.
औषधं कायमची बंदही होऊ शकतात
पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि विश्वास.
आप्तांवर, ग्रंथावर आणि स्वतःवर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.03.2017
दिवसा (सूर्याच्या उष्णतेमुळे) प्राण्यांचे आशय ( म्हणजे ह्रदयादि सर्व अवयव) विकसित अवस्थेत असतात. क्रियाशील असतात. सूर्य उगवला की, कमळ उमलते. सूर्य मावळला की कमळ मावळते.
ग्रंथकारांची सौंदर्य दृष्टी इतकी विलक्षण प्रतिभावान आहे, की शरीरातील अवयवाला ते कमळाची उपमा देतात. त्या अवयवांना ते ह्रदय म्हणतात. सूर्यनारायणांच्या प्रकाश आणि उष्णतेमुळे प्राण्यांचे ह्रत्कमळ प्रफुल्लित अवस्थेत असते. दिवसभरातील उष्णतेने आणखीन विकसीत होत जाते. या ऊर्जेमुळे आणि ह्रदयातील गतीशीलतेचा परिणाम होऊन शरीरातील इतर स्रोतसे पण विकसीत रहातात. तसेच दिवसा आपल्या इतर अनेक शारीरिक हालचाली होत असतात. तसेच चिंतन मनन आदि मानसिक कार्येदेखील होत असतात. यामुळे रस रक्त आदिंचे वहन करणाऱ्या स्रोतसांमधील चिकट अडथळे दूर होत असतात. वेळच्या वेळी हा कफसदृश्य विकृत क्लेद पुढे पुढे सरकत रहातो आणि स्रोतसे आतून शुद्ध रहातात. अशा क्लेद विरहित स्रोतसामधे आलेला अन्नरस, जो पचनातून उत्पन्न झालेला असतो, तो दूषित होत नाही.
पुढे आणखीन एक दृष्टांत ग्रंथकर्ते देतात. जसे शुद्ध, चांगल्या दुधामधे चांगले दूध ओतले तर दुधाचे नुकसान होत नाही.
पचनामधे निर्माण झालेली उष्णता आणि गती या दोन्ही गोष्टी जंतुसंसर्ग व्हायला देत नाहीत.
व्यवहारात पण याच गोष्टी दिसतात. मिक्सरमध्ये नारळ वाटताना जी उष्णता निर्माण होते, त्यातील वाटपाला जी गती असते, त्यामुळे नारळामधे विकृती होत नाही. जंतुनिर्माण होत नाही. (जंतु हा शब्द अॅलोपॅथीमधला नाही. हा शब्द देखील आयुर्वेदातीलच आहे. काही ठिकाणी त्याला भूत असे म्हटले आहे. भूत म्हणजे "ते" नव्हे. जे शोधले तरी मिळत नाही, दुर्बीणीने पण दिसत नाही, म्हणजे अतिसूक्ष्म, पण अस्तित्वात असते, ते भूत. )
पण जिथे गती थांबते आणि उष्णता कमी होऊन दमटपणा वाढतो, तिथे जंतुसंसर्ग वाढतो. अगदी मिक्सरमधे देखील होतो ना. वाटलेला नारळ मिक्सरमध्ये वाटून तसाच ठेवला तर ? जंतुसंसर्ग होणारच. जसं मिक्सरमध्ये तसं पोटातही "इन्फेक्शन" होणारच ना.
हे होऊ नये म्हणून उष्णता आणि गती हवी,
जी आपल्याला सूर्यापासून मिळते.
त्यासाठी जेवण....
सूर्य असेपर्यंतच !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.03.2017
मंगळसूत्र म्हणजे काळ्या मण्यांची माळ व त्याला एक किंवा दोन वाट्या. ह्या वाट्यांना मंगळसूत्रात व स्त्रीच्या आयुष्यात फार महत्व आहे. योग्य मंगळसूत्राची लांबी अशी पाहिजे की जेणे करून ते घातल्यावर वाट्या बरगडी संपून पोट सुरु होते त्या ठिकाणी आल्या पाहिजेत. तेथे अनाहत चक्राचे स्थान असते. अनाहत चक्र मनाशी निगडीत असते. मंगळसुत्रातील वाटी ही गोलाकार घुमट (गोल पिरामिड). वाटीतून येणारी एनर्जी अनाहत चक्राला मिळते त्यामुळे अनाहत चक्राची शक्ती वाढते. त्यामुळे मन शांत राहते व स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. लग्न झाल्यावर स्त्री नवर्याचे घरी (स्वतंत्र अथवा एकत्र कुटुंबात) जाते. जेथे तिला adjust व्हायचे असते. स्त्री व्यवस्थित adjust झाली तरच संसार निट होतो अन्यथा गृहकलह वाढून संसारच मोडण्याचा धोका असतो. मंगळसूत्रातील ही वाटी अनाहत चक्रावर आल्यामुळे स्त्रीची आत्मिक शक्ती वाढते. नवीन घरात गेल्यावर स्त्रीला याची नितांत गरज असते. आत्मिक शक्ती वाढली की तिचा प्रभाव इतरांवर (नवर्यासकट) पडतो. तिच्या इच्छा न सांगताच समजून घेतल्या जातात व पूर्णही केल्या जातात. तशी इच्छा त्यांना आपोआपच होते. हे आत्मिक शक्तीचे बळ आहे. तिला अनेकदा आपल्या इच्छा सांगाव्याही लागत नाहीत.
हे आत्मिक शक्तीचे बळ स्त्रीला मिळावे म्हणून आपल्या पूर्वजांनी मंगळसूत्रात वाटीची प्रथा निर्माण केली.
हे मर्म न समजल्यामुळे हल्ली स्त्रिया मंगळसूत्र वापरत नाहीत. समाजात संसारात कलह वाढले आहेत. घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे.
ज्या स्त्रियांना मंगळसूत्र वापरायची इच्छा नाही त्यांनी आपल्या अनाहत चक्रावर एक इंची पिरामिड कायम ठेवावा. पिरामिड मधील शक्ती सुद्धा त्या स्त्रीचे आत्मिक बळ वाढवेल व संसार सुरळीत व्हायला मदत करेल.
आपल्याकडील प्रथेप्रमाणे स्त्री ही नवर्याच्या घरी जात असल्याने तिला जास्तीतजास्त adjustment करावी लागते मात्र पुरुषांना तिच्या उलट पत्नीला आपल्या घरी आणायचे असल्याने तसेच कामासाठी दिवसातील बराच वेळ घराबाहेर असल्यामुळे त्याला याची गरज स्त्री एवढी नसते.
आपल्या पूर्वजांनी मानसोपचार तज्ञ, कौन्सिलर अशी ऑफिस न थाटता, धंदा न करता, त्याचे पेटंट न घेता सामान्य माणसांचे, स्त्रीचे, तिच्या कुटुंबाचे हित बघितले. त्यामुळे सध्याच्या पैशाच्या युगात त्यांना आपण अडाणी समजतो. मात्र त्यांनी ही प्रथा पडून अनेक पिढ्या, असंख्य कुटुंबांचे कल्याण केले. आणि आपण आधुनिक शास्त्राला अनुसरताना आपले कल्याण करणाऱ्या आपल्या पूर्वजांना आणि त्यांनी निर्माण केलेल्या चांगल्या उपयुक्त प्रथांना कमी लेखतो.
(मंगळसुत्राला वाटी एेवजी पदक/पेंडल लावून वाटीचे फायदे मिळत नाहीत.
अरविंद जोशी
B.Sc.
९४२१९४८८९४
आजच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, फास्ट फूड व बेकरीचे पदार्थ खाण्याचं प्रमाण तरुणांमध्ये व मुलांमध्ये वाढलेले दिसते,बरेच पालक मुलांना टिफीन मध्ये जंक फूड देतात व त्यामुळे काय होते:-
१. लठ पणा वाढतो
२. रक्तदाब वाढू शकतो
३. याचा परिणाम किडनी वर होऊ शकतो
४. आजकल काही तरुण मंडळी व्यायाम करतात,जिममध्ये जातात कारण त्यांना आपली शरीरयष्टी बलदंड करावयाची असते,चांगली गोस्ट आहे.
परंतु डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रोटिन्स सप्लिमेंट व स्टिरॉइड्स चे सेवन करतात.याचा परिणाम किडनी निकामी होण्यावर बेतू शकतो
५. किडनी निकामी होण्याचे मुख्य कारण --- लठ्ठपणा.
६. वजन वाढल्यामुळे किडनीवर ताण पडतो
७. त्यामुळे किडनीविषयक समस्या निर्माण होतात
८. कालांतराने किडनीचे कार्यक्षमता कमी होते
९. मधुमेह आटोक्यात ठेवला नाही तर त्याचा परिणाम किडनीवर होऊ शकतो
१०. गेल्या सात आठ वर्षात लठ्ठपणा व किडनीच्या समस्यांचं प्रमाण दुप्पट झाल्याचे दिसून येते
११. याची प्रमुख कारणे -
व्यायामाचा अभाव
असंतुलित आहार
सुदृढ जीवनशैलीचा अभाव
जंक फूड खाण्याचे वाढलेले प्रमाण
तेव्हा किडनी हा अतिशय महत्वाचा अवयव आहे.किडनी शिवाय आपण जगू शकत नाही.तीला जपा.जपणे तुमच्या हातात आहे.आपल्या किडनिज नॉर्मल आहेत कि नाही त्याची तपासणी करू शकता
प्रा वसंत पाटील
9371629799
९ मार्च,२०१७
आपल्याकडे पूर्वी बांगड्या भराययच्या अशी प्रथा होती. स्त्रियांना दर महिन्याला एम् सी म्हणजे पाळी होते. अँक्युप्रेशरमध्ये मनगटावर अंगठ्याचे बाजूला गर्भाशयाचा पाँईंट येतो आणि करंगळीचे बाजूला बीजांड कोशाचा( ओव्हरीचा) पाँईंट आहे. हे दोन्ही हातावर आहेत बांगड्या घातल्या की हे पाँईंटस अपोआप दाबले जातात.
पाळीचे वेळी पोटात दुखणे, पाळीसाफ न होणे, पाळी रेग्युलर न येणे,टाचा दुखणो ह्या त्रासावर फायदा होतो. म्हणून बायकानी बांगड्या घालाव्यात. हल्ली बांगड्या घालणे सोडले असल्याने बायकाना वर सांगितलेले बरेच त्रास आहेत.
अरविंद जोशी
9421948894
अष्टांग संग्रह सूत्रस्थान या ग्रंथामधे अकराव्या मात्राशीतीय नावाच्या अध्यायात श्लोक क्रमांक 64 ते 68 या मधे काय सांगितले आहे ते पाहूया. फार सुंदर आहे. त्यातील मतीतार्थ सांगतो.
" जसे रेल्वेचं इंजिन धावत असताना, त्याला इंधन जास्ती प्रमाणात लागते. इंजिन सुरू आहे, पण नुसते उभे असेल, तर इंधन कमी प्रमाणात लागते, तसेच शरीराला इंधनाची जास्ती आवश्यकता असते. पण रात्रौच्या वेळी इंधनाची फार आवश्यकता नसते."
व्यवहारातील अत्यंत समर्पक उदाहरण ग्रंथकारांनी दिले आहे. कोणत्याही यंत्राचे असेच असते. जेव्हा काम जास्ती तेव्हा इंधन जास्ती. काम नसेल तर इंधनाची गरज जास्ती रहात नाही.
समजा आपल्याला तीन चारशे किलोमीटरचा प्रवास करायचा असेल तर सुरवातीला गाडीमधे आपण इंधन पूर्ण भरून घेतो. मग लवकर रिझर्व्ह लागणार नाही. दर वीस पंचवीस किलोमीटरला दोन दोन लीटर इंधन घालत पुढे जायचे , असं करतो का आपण ? नाही ना ! मग दर दोन चार तासाने खायचे हा नियम कुठुन काढला ?
एकदा दहा माणसाना पुरेल एवढा चहा करायचा हे ठरलं तर एक एक कप चहा करीत रहायचं की एकदम दहा कप चहा करायचा ? की एक कप चहा उकळला कि त्यातच परत एक कप पाणी घालून पुनः साखर पावडर घालायची ? असं दहा वेळा करायचं ?
एकदा ठरलं की प्रश्नच संपला. तसंच जेवणाचं पण आहे. माझं आजचं काम कसं आहे, किती काम करायचं आहे, त्याला इंधन किती लागणार आहे, हे सुरवातीला (सकाळी) ठरवून घ्यायचं आणि इंधन भरायचं.
एवढं मी जेवलंच पाहिजे, नाहीतर ताकद येणारच नाही, असा नियम करून जेवू नका. कारण प्रत्येकाचं काम वेगवेगळं आहे,
आपली कामे देखील दिवसाचीच खूप असतात. म्हणून सकाळचे जेवण जास्ती प्रमाणात घ्यावे. ज्या दिवशी कामे कमी असतील तेव्हा खाणेही कमी असावे. पण व्यवहारात नेमके उलटे घडते. जेव्हा सुट्टी असते, तेव्हाच पोटावर अत्याचार जास्ती होतात.
अगदी क्वचित रात्रपाळीला प्रश्न येईल, पण नियम तोच जेव्हा काम जास्ती तेव्हा अन्न जास्ती. आणि सूर्यास्तापूर्वी जेवण संपलेच पाहिजे. तरच उर्जा निर्माण होईल. जेव्हा रात्रपाळी असेल तेव्हा सायंकाळी जेवणाचे प्रमाण जास्त आणि सकाळी कमी जेवावे. आणि जेव्हा नियमितपणे दिवसा काम असेल तेव्हा सकाळी जेवण जास्ती प्रमाणात आणि सायंकाळी अगदी कमी जेवावे.
......म्हणजे गाडी ओव्हर लोड होत नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
09.03.2017
Copyright © 2025 | Marathisrushti