दिवसा सूर्य असताना काय होते हे ग्रंथकारांनी सांगितले पुढे ते आणखी स्पष्ट करून सांगतात,
परंतु, रात्रौ ह्रदय ( आशय) म्लान राहाते. आणि रस रक्त वाहून नेणारी स्रोतसे कमी कार्यशील असतात. मुख्य कोष्ठ देखील काहीसे अवरूद्ध असते.
दिवसाच्या हालचाली जशा होतात, तशा हालचाली किंवा व्यायाम रात्रीच्या वेळी होत नाही. त्यामुळे स्रोतसांमधे क्लेदाची उत्त्पत्ती होते. धातूमधील किंवा आशयामधील क्लेदाचे पाचनही व्यवस्थित होत नाही. अशा अवस्थेत त्या आशयामधे आलेला अन्नरस किंवा पोषकांश देखील दूषित होतो.
जसे नासलेल्या दुधामधे कितीही चांगले शुद्ध सात्विक दूध घातले तर सर्वच दूध नासते.
किती सुंदर उदाहरण ग्रंथकारानी दिले आहे.
दही विरजलेले पातेले आहे, त्यातील सर्व दही चमच्याने खरडून जरी काढून घेतले, पण पातेल्यात, पाणी घालून जर धुतले नाही, जर त्या दह्याचा थोडासा अंश पातेल्यात शिल्लक राहिला तर ? आणि पुनः त्याच पातेल्यात दूध ओतले तर ?
परत सर्व दुधाचे रूपांतर दह्यामधे होईल. तसंच ग्रंथकार सांगत आहेत.
रात्रौच्या वेळी होणारी स्रोतो संकोच ही प्रक्रिया आणि त्याचा पचनावर होणारा परिणाम पचन बिघडवणारा असतो, असे शास्त्रकारांना सांगायचे आहे. म्हणून रात्रीच्या वेळी म्हणजे सायंकाळ नंतर जेवू नये.
आप्त मंडळी जे सांगतात, ते ऐकलं तर खूप गैरसमज दूर होत असतात. मी म्हणेन तेच खरं हा मोठ्ठा दोष आहे. आपल्या परंपरा काय सांगताहेत, आपण कुठे रहातोय, आपल्यावर कोणते संस्कार झालेले आहेत, याचा विचार आरोग्याच्या रक्षणासाठी व्हायलाच हवा. आप्त म्हणजे आपल्यापेक्षा चार पावसाळे जास्त बघितलेली मंडळी.
त्यांनी अनुभवलेलं, ग्रंथामधे लिहून ठेवलेलं, आम्हाला नको झालंय, अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी आजची पिढी, अवांतर वाचन नाही, धर्मग्रंथांचा अभ्यास नाही, कोणी सांगितले तर विश्वास ठेवत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीला पुरावा हवा असतो. बुद्धीवादी व्हावं, विज्ञानवादी व्हावं, जरूर व्हावं, पण या करीता आपले पूर्वज जे सांगत होते, त्या मागील कारणांचा आपल्या सकारात्मक बुद्धीने जरा विचार करावा.
आपल्या आजोबांना, वडीलांना विचारावे, त्यांच्या लहानपणी, जेवणाच्या वेळा कोणत्या होत्या, जेवणातले पदार्थ कोणते होते, काही पदार्थ विशिष्ट दिवशीच केले जात होते, मांसाहार विशिष्ट दिवशीच घेतला जात होता, असे का ? हे शोधून काढले पाहिजे.
या प्रश्नांची उत्तरे मिळवली की, आज रोग का वाढताहेत, याचेही उत्तर सहज मिळू लागेल.
या सर्व उदाहरणावरून लक्षात येतंय की रोग वाढायचं मुख्य कारण आमचं उशीरा होत असलेलं जेवण हे आहे. बदलायचं ठरवलं तर आपण आपलं आयुष्य बदलवू शकतो.
औषधं कायमची बंदही होऊ शकतात
पाहिजे फक्त इच्छाशक्ती आणि विश्वास.
आप्तांवर, ग्रंथावर आणि स्वतःवर !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
11.03.2017