(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अशी घ्या डोळ्यांची काळजी

    अशी घ्या डोळ्यांची काळजी

    सुंदर जग पाहण्याची किमया आपण फक्त डोळ्यांनीच करू शकतो. म्हणूनच डोळ्यांचे आपल्या जीवनामधील स्थान अनन्यसाधारण असेच आहे. मात्र असे असतानाही आपण डोळ्यांची काळजी घेण्याबाबत तितकेसे सिरिअस नसतो. डोळ्यांची कार्यक्षमता, आरोग्य राखलं तर आपलंच भविष्य सुखकारक होईल म्हणून डोळ्यांची आत्तापासूनच काळजी घ्या... ती कशी यावर नजर टाकुयात...

    पुरेशी झोप घ्यावी यासाठी रात्री जागरण करु नये व दिवसा झोपू नये.

    दिवसातून दोन वेळा गार पाण्याने डोळे स्वच्छ करावेत.

    डोळ्यांवर ताण येऊ देऊ नये. यासाठी अधिक वेळापर्यंत TV, मोबाईल पाहू नये. संगणकावर सलग काम करु नये. मधून-मधून थोडी विश्रांती घ्यावी. वाचण, शिवणकाम करताना डोळ्यांवर ताण येतो आहे असे वाटल्यास थोडा वेळ विश्रांती घ्यावी.

    प्रवासामध्ये वाचू नये.

    अपुऱ्‍या प्रकाशात लिहिणे, वाचणे इ. गोष्टी करणे टाळावे.

    अति प्रखर प्रकाशाकडे अधिक वेळ पाहू नये. सुर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.

    पित्तवर्धक आहार उदा. अतितिखट, खारट, उष्ण, मसालेदार, चमचमीत, तेलकट पदार्थ अधिक खाऊ नयेत.

    डोळ्यांच्या आरोग्यासाठी व्यायामालाही महत्त्व आहे. डोळ्यांचे दोन महत्त्वाचे व्यायाम आपण घरच्या घरीही करू शकतो.

    1) एका पुठ्ठ्यावर काळा ठिपका काढावा. त्याकडे एकटक पाहावे. असे केल्याने दृष्टी सुधारतेच; पण मनही एकाग्र होते.

    2) काळा ठिपका पुठ्ठ्यावर काढून पुठ्ठा गोल फिरवावा व ठिपक्‍याकडे एकटक पाहावे. असे करताना बुबळे फिरतील व डोळ्यांचा व्यायाम चांगला होईल. या व्यायामांच्या माध्यमातून डोळ्यांभोवती असलेल्या आठ स्नायूंची क्षमता वाढवता येते.

  • एक आधुनिक अंधश्रद्धा – calcium supplementary

    आताशा जाहिराती ह्या भावनिक आवाहन करताना दिसतात. बऱ्याचदा कळतच नाही नेमके काय सांगायचेय. नुकतीच एक जाहिरात पाहिली वृद्ध आजी आपल्या नातीला उचलून घेताना अवघडते, आणि मग मुलगी आपल्याला aware करते की वेळीच कॅल्शिअम supplements चालू करा म्हणजे म्हतारपणात आपल्याला सांधेदुखी होणार नाही......हे आणि अशा अनेक प्रकारचे भावनिक आवाहन आणि osteoporosis चा बागुलबुवा आपली बुद्धी गहाण ठेवण्यास मदत करतात.

    हाडांच्या स्वास्थ्यासाठी एकच एक गोष्ट बिंबवली जाते ती म्हणजे calcium!! जन्माला आलेले तान्हे मुल असो अथवा गरोदर बाई ,बाळंत झालेली बाई आणि ४० च्या टप्प्यातील बाई, किंवा साठीच्या घरातील वृद्ध स्त्री या सगळ्यांना calcium supplements साठी अत्यंत गरजू म्हणून ठरवले जाते. Porous म्हणजेच हाडे आतून पोकळ होणे,कोरडी पडणे त्यामुळे सहजच तुटणे अथवा त्यांचे कार्य क्षीण होणे ! हे सगळे कशामुळे फक्त कॅल्शिअम कमतरतेमुळे?? याच्या जोडीला मग कॅल्शिअम शरीरात शोषून घेणारा विटामिन D सुद्धा कमी झालाय म्हणून त्याचेही supplement दिले जाते, अगदी लहान मुलांपासून मोठ्यान पर्यंत !!

    आता वास्तव बघुयात ........

    शरीराची एक खूप समर्पक व्याख्या आहे, झिजते ते शरीर......एका ठराविक वयोमर्यादेनंतर शरीर झिजत जाणारच, निसर्गाचा नियमच आहे तो. या झिजत जाणाऱ्या शरीराची need फक्त कॅल्शिअम च असते का? आणि वाढीच्या महत्वाच्या टप्प्यातही फक्त ca च हवे असते का??? आणि गमतीचा भाग म्हणजे अशा प्रकारची supplements घेऊनही कुणाला काही फायदा होत नाही. सांधे दुखायचे ते दुखतातच आणि हाडे मोडायची ती मोडतातच !!!

    उसने घेतलेले हे ca पोहोचते का हाडांपर्यंत ?? रक्तात त्याची पातळी वाढलेली दिसते फक्त आणि मग आपल्या मनाला समाधान वाटते की वाह वाढले आपले कॅल्शिअम.!!! आयुर्वेदिक कॅल्शिअम वगैरे सुद्धा एक myth आहे. मुळात या शास्त्राचे सिद्धांताच वेगळे आहेत.आमच्या कुठल्याही ग्रंथात कॅलशिअम चा उल्लेख नाही. मग हाडांचे स्वास्थ्य कळलेच नाही आयुर्वेदाला असे वाटू शकेल पण सांध्यांच्या अथवा हाडांच्या तक्रारी एक वैद्य जितक्या जास्त चांगल्या दूर करू शकतो तितके कुणीच नाही !!! कारण आयुर्वेद शास्त्र मुलभूत सिद्धांतांवर काम करणारे शास्त्र आहे......

    नुकत्याच झालेल्या एका American research मध्ये असे निष्कर्षास आले की “theory of Ca supplement improving bone health is a myth “ अमेरिकेने सांगितलेय म्हणजे मग विश्वास ठेवायला हरकत नाही असा ट्रेंड असल्यामुळे मुद्दाम उल्लेख केला . आणि गमतीचा भाग म्हणजे US,CANADA या सारख्या highest calcium supplement घेणाऱ्या देशात Osteoporosis चे प्रमाण सर्वात जास्त आहे ( आहे न गम्मत ,पण हे कटू सत्य आहे).
    तुम्ही जे calcium supplement घेत आहात, ते Coral Ca, Oyster Shell Ca, Calcium Citrate, or Calcium Carbonate यापैकी कुठलेही असो, त्याचे आपल्या शरीरात metabolism नीट होत नाही आणि वेगवेगळ्या soft tissue मध्ये ते साचून राहते ( deposition).असे साचून राहिलेले उसने घेतलेले कॅल्शिअम मग urine stone आणि वेगवेगळे blockages तयार करण्याच्या कामी येते.

    खरी काळजी घ्यायचिये आपल्या हाडांची ??

    या सांगाड्यावर आपला संपूर्ण देह उभा आहे. घेतलेल्या अन्नापासून हाडांचे पोषण टप्प्याटप्प्याने होणार आहे. त्यामुळे अन्नाचे परिणमन योग्य होतेय की नाही हे बघणे आवश्यक आहे. हाडांमध्ये कुठेही कोरडेपणा येणार नाही याची काळजी घ्या.योग्य व्यायाम केल्याने मांस अथवा muscles मजबूत होतात आणि हाडांना मजबूत करतात. त्यामुळे हाडांमध्ये पोकळपणा येत नाही. घरी बनवलेले साजूक तूप, थंडीत आईने केलेले डिंकाचे लाडू असा पोषक आहार हाडांना मजबूत ठेवते. रात्री ची नियमित जागरणे, सतत चिंता करणे, सतत स्ट्रेस खाली राहणे तुमच्या शरीरातील स्निग्धता कमी करतात. स्निग्धता कमी झाल्याने शरीरातील हाडेच नाही तर सर्वच घटकांची झीज होते. अगदीच जागरूकतेने निसर्गाकडे पहिले तर ओले लाकूड सहजासहजी तुटत नाही आणि कोरडे लाकूड मात्र पटकन मोडते.......

    .गर्भिणी मातेने जर परिपूर्ण स्निग्धता युक्त आहार घेतला ,आणि प्रसूती झाल्यानंतर सुद्धा आहारातून डिंक खाणे, साजूक तूप, खाण्यात शुद्ध तिळाचे तेल, नियमित अभ्यंग या गोष्टी तुमच्या ,आणि तुमच्या बाळाच्या हाडांना खऱ्या अर्थाने सुदृढ बनवतात.एकदा का तुम्ही गर्भिणी झालात की आयर्न आणि कॅल्शिअम ९ महिन्याचा सोबती होतो आणि अर्थात बालान्तपणानंतर ही ! आई आणि बाळाच्या शरीरात फक्त हे दोनच घटक असतात??? यांचीच वाढ होणे गरजेचे असते ?? आणि तीही अशीच supplement घेऊन???

    म्हणून Calcium ची तपासणी करून ते कमी झालाय म्हणून उगाचच supplement घेण्यापेक्षा हाडांना सुदृढता द्या. उद्या असेही होईल की इतर प्रगत(?) देशांना अजून काही दिवसानी हाडांचे खरे स्वास्थ्य कळेल आणि आपलीच philosophy ते आपल्यालाच सांगतील आणि तेव्हा तुम्ही म्हणाल हे तर आमचे Ancient Wisdom !!!!!

    So wake up think logically and follow ancient wisdom!!!

    - वैद्य ज्योत्स्ना पेठकर©

  • अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना भांडे कोणते वापरावे ?

    अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात.

    पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते.

    आजचे संशोधन असे सांगते, शरीरातील झिंक कमी होते, म्हणून मधुमेह, ह्रदयविकार होतात.

    काय जमाना आलाय, जी भांडी औषधी गुणांनी युक्त होती, ती मोडीत देऊन टाकली आणि बीकोझिंकच्या गोळ्या खात बसलो. याला म्हणायचा विकास.

    अॅल्युमिनियम, हिंडालीयम हे धातु शरीराला हानीकर आहेत, हे अर्वाच्च विज्ञान सांगते आहे, तरीदेखील शाळेतील पोषण आहार किंवा मंगल कार्यालयातील आहार याच भांड्यात केला जातोय. (सोयीस्कर दुर्लक्ष)

    पूर्वी तुरूंगातील कैद्यांना ( ते लवकर आजारी पडावेत, म्हणून ) हिंडालीयमच्या ताटात जेवण वाढायचे.

    आम्ही आमच्या घरालाच आता तुरुंग बनवलाय. तवा, चहाची किटली, दुधाची पातेली, कढई, अंडी उकडण्याचे पातेली हमखास अॅल्युमिनियम किंवा हिंडालीयमची असतात !

    सर्वात चांगले भांडे मातीचे ! आपले शरीर ज्या अठरा मुलद्रव्यांनी बनले आहे, तीच अठरा मुलद्रव्ये मातीत आहेत. मातीच्या भांड्यात आपण फोडणीपण देऊ शकतो, दूध तापवू शकतो, दही लावू शकतो, पेजसुद्धा शिजवू शकतो. गॅसवरपण ठेवू शकतो.

    मातीची भांडी वापरण्याचा आणखीही एक फायदा म्हणजे घरातला राग भांड्यावर काढला जावू शकत नाही.

    वेळ आली आहे,
    बदल करण्याची...
    वेळ आली आहे,
    बदल स्विकारण्याची...
    वेळ आली आहे,
    जुनं ते सोनं म्हणण्याची....

    -- डॉ. गौरी पाटील
    निसर्गोपचार तज्ज्ञ

  • आहारातील एकरुपतेचा अनुभव

    सुमारे वर्षभरापुर्वीची गोष्ट आहे. मी आणि माझी पत्नी बाबांच्या मित्राकडे शिबीराला जात होतो. माझी तब्येत बिघडली होती. जुलाब होत होते. सकाळपासून पाच सहा झाले होते. तरीही शिबिराला गेलो होतो. सर्व औषधे हाताशी होती पण गुण येत नव्हता. रात्रीचे जेवण आले तेव्हा मनात विचार आला हे खाल्ले तर त्रास होईल पण सर्वांबरोबर आहोत तर न खाणे योग्य नाही म्हणून जेवलो.

    रात्री खूप त्रास झाला. उलट्या झाल्या जुलाब तर किती झाले हे आठवतही नाही. चार वाजे पर्यंत झोप नाही. विकनेस खूप आला होता. डीहायड्रेशनची भिती वाटायला लागली होती. सकाळी साडेसातला काकांना म्हटले मी घरी जातो मला डीहायड्रेशन होण्याची शक्यता वाटतेय. त्यांनी थांबायला सांगितले. आमचेकडील सर्व औषधे हाताशी होतीच तरी अँलोपाथीच्या गोळ्या मागवल्या. पण कोणतेही औषध घेतले नाही. साडेआठला नाष्टा आला. उपीट होते. अगदी थोडे घेतले. आणि प्रत्येक घास खाताना नव्हे तर प्रत्येक घास चावताना एकच विचार करत होतो की या खाण्याचा प्रत्येक कण अन् कण मला एनर्जी देणार आहे. माझा सगळा आजार पुर्ण बरा होणार आहे.

    आणि चमत्कार अनुभवला.

    कोणतेही औषध न घेता साडेनऊ नंतर जुलाब थांबले होते. साडेदहाला मी इतका फ्रेश होतो की कुणी म्हटले असते तर पुण्याहून कोल्हापूरला बाईकवर जाऊन परत येण्याची तयारी होती. (प्रत्यक्षात जायचा योग आला नाही)

    हे कां घडले?

    माझ्या मते कारण एकच पाँझीटीव्ह विचार. जे उपीट खाताना मी करत होतो. कारण उपीट हे काही जुलाब थांबायचे औषध नाही, नक्कीच!

    हा अनुभव आल्यावर रोजच्या जेवताना, काही खाताना आपण काय विचार करतो? हे निरीक्षण केले. बहूतेक वेळा टीव्ही समोर बसून जेवतो. खाण्यावर लक्ष नसते तर सिरियलस् मध्ये चालू असलेले निगेटीव्ह विचार खाण्यातून कॅरी करत असतो. काय परीणाम होणार?

    बस्स ठरवले जेवताना टीव्ही, मोबाईल बंद! पुर्ण लक्ष जेवणाकडे!!

    भूषण जोशी

    आरोग्यदुत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने..

  • पुरण पोळीचा गुणकारी उपवास

    माझे वडील वैद्य अरविंद जोशी यांच्या सांगण्यात असे आले की एका वैद्याने एका दमेकरी पेशंटला १५ दिवस पुरणपोळी खायला सांगितली आणि त्याचा दमा गेला. ह्यावर माझा विश्वास बसत नव्हता.

    माझे म्हणणे होते की डाळीचे पदार्थ खाल्ले की गॅसेस होतात. मग एवढे दिवस फक्त पुरणपोळी खाल्ली तर किती गॅसेस होतील. त्रास होईल. मात्र बाबा त्यांच्या म्हणण्यावर ठाम होते.

    त्यांचे म्हणणे होते की हरबरा डाळीने गॅसेस होत नाहीत तर बाहेर पडतात. आणि आपले पूर्वज काय वेडे होते काय ज्यांनी दिवाळी सोडून इतर सर्व सणांना पुरणपोळी करायची पद्धत पाडली?

    मुद्दा विचार करायला लावणारा होता.

    मी ठरविले १५ दिवस नाही ७ दिवस करून तर बघू. आपल्याला दमा नाही का इतर त्रास ही नाहीत बघूया काय होते ते. दि. २६ जुलै २०१६ पासून मी पुरणपोळीचा उपवास सुरु केला.

    माझे बघून माझ्या पत्नीनेही सुरु केला. तीची कंबर दुखत होती फार वेळ बसवत नव्हते. झोपावे लागत होते.

    नाष्ट्या पासून रात्री झोपे पर्यत जे काही खायचे ते फक्त पुरणपोळीच.

    पहिले दोन दिवस बरेच गॅसेस सुटले. नंतर थोडे अँसिडीक वाटले म्हणून बाबांशी बोललो. ते म्हणाले काकडी खा. म्हणून दुपारचे जेवण व रात्रीचे जेवण झाले की काकडी खायला सुरवात केली. आणि काय गम्मत अँसिडीटी ही नाही आणि गॅसेस ही सुटेनसे झाले.
    दर तीन ते चार तासांनी सडकून भूक लागायला लागली. शरीर मागणीच करत होते.

    दुसर्याच दिवसापासून शरीर अतिशय हलके वाटायला लागले. पोट साफ व्हायला लागले. भूक वाढली. एनर्जी वाढली. रात्री पर्यत फ्रेश रहायला लागलो. खाल्लेले सगळे पचून जाते असे जाणवायला लागले.

    ४ थ्या दिवशी मात्र गोडाचा कंटाळा येऊ लागला. पण शरीर इतके हलके वाटत होते की उपवास सोडायची काही इच्छा होत नव्हती.

    मला गोड पुरणपोळी खायचा कंटाळा आला होता, इतर पदार्थ खावेसे वाटू लागले होते. पण मन मारले. आपण स्वतः वर प्रयोग करत आहोत तर तो पूर्ण करायलाच पाहिजे. पेशंट असतो आणि एखाद्या वैद्याने सांगितले असते तर मध्येच सोडून चालले असते का? आणि सोडले तर गुण आला नसता तर दोष कोणाचा? माझा की वैद्याचा? अजून तीन दिवसच आहेत करू पूर्ण काय होतंय त्यात.

    तिकडे बायाकोने पण पुरणपोळीचा उपवास सुरु केला होता. पण तिचा निग्रह कमी पडला. तिने तिसर्याच दिवशी रात्रीचे जेवण सुरु केले पण ते म्हणजे ज्वारी व डाळीचे पीठ एकत्र करून त्याचे थालीपीठ करून खाऊ लागली . पण तो पर्यत तिलाही फायदा झाला. तीला सहसा गॅसेस सुटत नाहीत. पण तिलाही प्रचंड गॅसेस सुटले. तिची कंबर दुखी ९०% कमी झाली. ती दोनच दिवसांत चार पाच तास बसू लागली. पाच दिवसांनी विचारले तर कंबरदुखी पूर्ण पणे थांबली होती.

    भूषण जोशी

    व्दारा वैद्य अरविंद जोशी,

    ६१५ नारायण पेठ नवश्रीमान सोसायटी लोखंडे तालीम जवळ पुणे ३०
    सोमवार, गुरुवार, शनी वारी संध्याकाळी ४ ते ६

  • मनाचा उपवास

    शस्त्र, शास्त्र आणि पाणी हे घेणार्‍याच्या पात्रतेनुसार गुण आणि दोष उत्पन्न करतात. म्हणून शिकणार्‍याची बुद्धी शुद्ध करून घ्यावी असे वचन आहे.

    खरंच आहे. ब्लेडने पोट फाडू पण शकतो आणि पोटाचे ऑपरशनपण करू शकतो. ब्लेड कुणाच्या हातात आहे, त्यावर परिणाम अवलंबून असतो.

    शास्त्रदेखील तसेच युक्तीने वापरावे लागते. कायदा हा लवचिक असावा. नियम हा पाळण्यासाठी असावा, ठरवून उपास करताना कधीतरी चुकुन, जुन्या सवयीमुळे उपासाला न चालणारा पदार्थ पटकन तोंडात गेला, म्हणून फार मोठे आभाळ कोसळणार नाही, की कोणी फाशी देणार नाही, जिथे चुक लक्षात आली तिथून देवाची क्षमा मागून, पुढे उपास सुरू ठेवावा.

    आपण सोयीस्कर अर्थ काढून, "नाहीतरी आता उपवास मोडलाच आहे, तर आता वडा भजी ऊसळ मिसळ पण खाऊन घेऊया." असा विचार करणे चुकीचे ठरेल.

    उपास कोणासाठी करायचा आहे ? देवासाठी की देहासाठी ?
    खाण्यासाठी की देण्यासाठी ? आणि असे केलेले उपवास काही फलदायी होत नाहीत.

    उपवास करायचा असेल तर एक विशिष्ट मानसिकता बनवावी लागते. मनाला संयमात ठेवावे लागते, मोहाचा त्याग करावाच लागतो.

    जी गोष्ट किंवा वस्तु सोडल्याशिवाय ती मला हितकर होणार नाही, हे आपल्या मनाला आधी पटले पाहिजे.
    म्हणजे वैद्याने सांगितलेले पथ्यपालन करणे, हा देखील एक उपासच झाला ना !

    ज्याचा हव्यास संपत नाही ते सुख ! आणि सुख जिथे संपते तिथे समाधान सुरू होते, हे जर खरे असेल तर उपास म्हणजे उपभोग घेण्याच्या मानसिकतेतून (यालाच माया असेही म्हणतात) बाहेर येणे. प्रपंचात राहून परमार्थाचा विचार करणे म्हणजे उपवास.

    समर्थ म्हणतात,
    आपण खातो अन्नासी
    अन्न खाते आपणासी ।
    सर्व काळ मानसी,
    चिंतातुर ।।

    आज संकष्टी आहे, पण रविवार बुधवार पण आहे, आता काय धरावे की संकष्टी सोडावी असा प्रश्न जरी मनात निर्माण झाला, तरी अशी कष्टाने केलेली संकष्टी कशी पावणार ? त्याने समाधान कसे मिळणार ?

    उपासाला सात्विक अन्न खावे.

    नेमकं सात्विक म्हणजे काय ?
    जरूर असेल तेव्हाच आणि तेवढेच अन्न खाणे म्हणजे सात्विक होय. मुख्य म्हणजे प्रत्येक घासाला भगवंताची (शास्त्रीची वा वैद्याची सुद्धा ) आठवण राहिली पाहिजे.
    नाम घेता ग्रासोग्रासी
    तो जेविता राहिला,
    उपवासी, असं तुकाराम महाराज पण सांगतातच !

    आपल्या प्रकृतीचा विचार न करता, भुकेचा ( अग्निबलाचा ) विचार न करता, आजारांचा विचार न करता, स्वतःच्या मनाने ठरवून केलेला उपास हा फक्त अशक्तपणाच आणतो.

    प.पू. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रापंचिक गोष्टींकरीता उपास ही गोष्टच मला मान्य नाही.
    आपल्या मनामध्ये काहीतरी मिळावे म्हणून कितीही उपासासारखे कष्ट केलेत तरी, ते पाहून लोक फसतील, पण भगवंत फसणार नाही.

    महाराज म्हणतात,
    उपासना करा.
    उपास ना करा.

  • आहारात मनाची एकरूपता हवी

    मी गेली २५ वर्षे जेवताना बरेचवेळा मन अन्नाबरोबर एक करून (म्हणजे जेवताना इतर विचार न करणे, फक्त घास चावण्यावर लक्ष केंद्रित करणे) जेवतो मला याचा खूप फायदा झाला व होत आहे.

  • जेवणाची योग्य वेळ कोणती – भाग 17

    अष्टांग संग्रहातील मात्राशीतीय नावाच्या अध्यायातील हे श्लोक म्हणजे आयुर्वेदातील भौतिकशास्त्रच नव्हे काय ? विज्ञान विज्ञान म्हणजे दुसरे आणि काय ?

    उष्णतेमुळे पदार्थाचे प्रसरण होते आणि शीत स्पर्शाने पदार्थ आकुंचित पावतो, हा भौतिकशास्त्रातील नियम या श्लोकात वर्णन केलेला दिसतो. आपली दृष्टीची कक्षा वाढवली की सगळं स्पष्ट समजायला लागतं.

    सूर्याच्या उष्णतेच्या प्रभावाने स्रोतसांचा विकास होतो. जेवढा पाईप मोठा तेवढा आतून वहाणारे द्रव पदार्थ जास्ती प्रमाणात जाणार. आणि जेवढा पाईप लहान तेवढा द्रव पदार्थ देखील पुढे ढकलायला जास्ती कष्ट पडणार. हे व्यावहारिक सत्य आपण बघतोच. बरं ही स्रोतसे आतून गुळगुळीत असतील तर आतील पदार्थ पटकन पुढे ढकलला असता. पण स्रोतसे आतुन वरखाली असतात. नुसत्या डोंगर आणि दऱ्या. याकरीता या स्रोतसांमधे लाळेसारखा एक बुळबुळीत पदार्थ सतत स्रवत असतो. यामुळेच तर अन्नाचा गोळा हळुहळू पुढे ढकलला जातो. पण स्रोतसांना चिकटणारे पदार्थ आत गेले तर या स्रोतसांच्या हालचाली थोड्या मंदावतात. आतमधे या आम सदृश पदार्थाचे लेपन झाल्यामुळे यांचा आकारदेखील थोडा लहान होतो. त्यामुळे आतील द्रव ज्या वेगाने पुढे सरकला पाहिजे, त्या वेगाने पुढे सरकत नाही.
    दिवसाची मिळालेली सूर्याची उष्णता, या स्रोतसांमधील आतून चिकटलेला कफसदृश द्रवपदार्थ विलयीत करते आणि स्रोतसांचा आकारही वाढवला जातो, आणि अन्न पदार्थ सहजपणे पुढे ढकलायला मदत होते.

    हे सर्व काम दिवसा उजेडी झाले तर बरे ना. म्हणून दिवसा जेवावे.

    आणि रात्री सूर्य नसल्यामुळे स्रोतसांचे आकुंचन सुरू होते. स्रोतसे संकुचित होतात. आतून वाहाणारा द्रवाहार सावकाश जातो. काही वेळा तर अडकूनच रहातो. त्याला मागाहून येणारा रस चिकटत जातो. थरावर थर लागत जातात आणि स्रोतसांचा आकार आणखीनच कमी होतो. स्रोतसांमधे आतून साठण्याची वृत्ती वाढली की गोळा बनत जातो.

    लहान रस्त्यावर ट्रॅफिक स्लो होते, रस्ता मोठा असला तर ट्रॅफिकजामची भीती नसते. म्हणून दिवसाचे अन्न लवकर पुढे सरकते, आणि पचते आणि रात्रीचे उशीरा !

    ही संकोचनाची क्रिया होऊ नये या करीता, गती आणि उष्णता दोन्ही गोष्टी हव्यात. हे चक्क भौतिकशास्त्र सांगितलेले आहे.

    ग्रंथकार एक सूचना अवश्य करीत आहेत. जर सायंकाळी घेतलेले अन्न चांगले पचले नसेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी भूक लागेपर्यंत जेऊ नये. पण दिवसाचे अन्न पचले नसेल तर परत सायंकाळी जेवले तरी ते दिवसभराच्या उष्णतेमुळे पचून जाते.
    याचा दुसरा अर्थ सायंकाळी जेवताना नीट विचार केल्याशिवाय जेऊ नये. एवढे लक्ष सायंकाळच्या जेवणाच्या वेळेवर ठेवावे.
    कारण,
    जंतुंची वाढ देखील रात्रीच्याच वेळी होते.
    कारण त्यांचाही रात्रीस खेळ चाले....
    हे आयुर्वेदातील जीवशास्त्र..

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    12.03.2017

  • पुनः एकदा पीसीओडी

    मी पीसीओडीच्या मानसिक हेतुंबद्दल लिहायला सुरवात केली आणि छान मंथन झाले.
    काही स्तुती करणाऱ्या, तर काही अत्यंत कटू जहाल, तर काही अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया मिळाल्या. काहींचा सूर फक्त स्त्री मुक्तीवादी होता, काहींना यात धार्मिक वास आला, तर काही अगदी गंमतीशीर होत्या. म्हणजे हे तुम्ही आम्हालाच का सांगता, पुरूषांना देखील सांगा ना ! इथपर्यंत !!

    काल मी संप्राप्ती सांगण्याचा प्रयत्न केला, पण ही संप्राप्ती चुकीची / बरोबर असे कुणीही वैद्य बोललेच नाही.

    स्त्रीत्व आणि मासिक पाळी पाळणं हे दोन्ही विषय वेगळे आहेत. आधी बंद होत आलेली मासिक पाळी सुरू तर होऊ देत, मग पाळायची /नाही पाळायची/ कशी पाळायची/ का पाळायची/ आम्हीच का म्हणून, हे विषय घेऊ चर्चेसाठी ! पीसीओडी हा विषय एवढा गंभीर आहे, असं मला म्हणायचंय !

    असो.
    एक विचार मंथन सुरू झाले ही चांगली गोष्ट आहे. काही छान विचार वाचायला मिळाले. ज्ञानात खरंच भर पडली.

    मुळात हा आपल्या आयुर्वेद शास्त्रात अनुक्त प्रकारात बसणारा व्याधी.
    त्याचे हेतु, त्याचे निदान त्याची चिकित्सा, त्याची दोषदूष्य संमूर्च्छना, संप्राप्ती भेद इ. वर आणखी सखोल विचार व्हायला हवाय.
    एक अत्यंत गंभीर आजार ज्याचे उत्तर अॅलोपॅथीमधे आजतरी अंधेरे मे तीर असेच आहे.
    पण आपण आयुर्वेदाचे दृष्टीकोन वापरला तर, हा पीसीओडी रोग थांबवू शकतो का ? त्याचे उत्तर "होय" असेच आहे. एखाद्या रोगाच्या हेतुशोधनापासून अपुनर्भवपर्यंत विचार कसा करावा, याचे प्रात्यक्षिक पहायला मिळेल.

    मी "थांबवू" शकतो का असा शब्द मुद्दामच वापरला, विचारकक्षा आणखी वाढवल्या तर घालवू शकतो का ?, असा शब्दही वापरता येईल.

    हाच विचार अन्य सर्व कधीही बऱ्या न होणाऱ्या व्याधींसाठी करावा लागेल.

    जर रोगाचा हेतु शारीरिक असेल तर चिकित्सा शारीरिक
    जर हेतु मानसिक असेल तर चिकित्सा मानसिक
    जर हेतु आध्यात्मिक असेल तर उपाय आध्यात्मिक करावा लागेल. आणि हेतु सामाजिक असेल तर चिकित्सा देखील सामाजिक करावी लागेल. आणि सर्वच हेतु कारणीभूत असतील तर सगळ्या हेतुंचा विचार एकदम करावा लागेल.

    जर आपले शास्त्र हे तीनही शामाआ. सा सुद्धा. मानत असेल तर त्याच्यापर्यंत पोचले पाहिजे. शारीरिक हेतुंचा विचार केला तर बदललेली जीवनपद्धती, व्यायामाचा अभाव, अतिरिक्त पोषण, हेच शारीरिक हेतु मिळतात. जे सगळ्यांना माहिती आहेत.

    मानसिक हेतुंचा विचार केला तर मी अगोदर म्हटले तसे, स्त्रीत्वापासून लांब जाणे, तिटकारा वाटणे, वाढता ताणतणाव, नोकरी छोकरी या दोन्ही आघाड्यांवर काम करणे, हे हेतु मिळतात.

    आध्यात्मिक हेतुंचा विचारही करावाच लागेल, आध्यात्मिक हा आणखी एक वादाचा मुद्दा होईल, पण जे आहे त्याचा अभ्यास तर करायचाच हवा ना. आईने गर्भावस्थेमधे कुपथ्य करणे, नकोत तेवढ्या गोळ्या खाणे, इ. हेतुंमुळे मुलीला होणारा पीसीओडी हा त्या मुलीसाठी आध्यात्मिक दुष्टीहेतु ठरू शकेल. तिचा काहीही दोष नसताना, तिला पूर्ण आयुष्यभर हा रोग सांभाळत जगावं लागणं, हे तिचं नशीब, असे अनेक रोग आहेत, ज्याची कारणं आध्यात्मिक आहेत.

    आणि नोकरीच्या ठिकाणी असणाऱ्या समस्या, जेवायला पुरेसा वेळ न मिळणे, किवा जेवणाची वेळ नोकरीमुळे पाळता न येणे, जीवनात शांतपणा नसणे, नवरा किंवा बाॅसची हुकुमशाही, घरातील काही कारणाने घ्याव्या लागलेल्या पाळी पुढे जाणाऱ्या गोळ्या, सक्तीने घ्याव्या लागलेल्या ओसी पिल्स, या सामाजिक कारणामुळे पीसीओडी दिसतो.

    पाश्चात्य विचारसरणीच्या तज्ञांनी याचा विचार फक्त शारीरिकपुरता अधिक केला आहे. काही कारणाने होणारा हार्मोन्समधील बदल याचा विचार केला आहे. पण हे हार्मोन्समधील बदल घडवायला, मन, इंद्रिये, कारणीभूत आहेत, हा अधिकचा विचार आपणाला करता येणार आहे. कारण आपण तो शिकलोय. आणि त्याची चिकित्सा आपल्याला आपल्या पद्धतीने चांगली करता येणार आहे.

    ( मी असं म्हटलेलं नाही, की फक्त कुंकु, बांगड्या आणि पैंजण घालून पीसीओडी बरा होईल. पीसीओडीचा एक हेतु मन आहे, हे विसरून चालणारच नाही. आणि स्त्रीयांविषयी माझ्या मनात प्रचंड आदर आहे, हे मी आधी नियमितपणे लिहित असलेल्या आरोग्यटीप मधून आपल्या लक्षात आले असेलच.
    ज्या मुली कुंकू, बांगड्या, पैंजण वापरतात, आणि ज्यांना पीसीओडीची लक्षणे दिसतात, त्यांचे इतर हेतु शोधावेच लागतील. अव्यायाम, रसायनांचा अति वापर, अवेळी जेवण, लवकर वयात येणे, जीवनशैली ही सर्व कारणे आहेतच ना ! त्याची वेगळी चिकित्सा करावी लागणारच !

    मी गेली दहा वर्ष या आजारात जसे कारण (हेतु) तशी चिकित्सा देतोय. माझा संमोहन हा आवडीचा विषय असल्यामुळे मानस हेतु शोधणे, आणि मानस चिकित्सा देणे, त्यामधेही आश्वासन, योगासन, संमोहित अवस्थेत सूचना देणे, नंतर दररोज त्याचा रुग्णाला अभ्यास करायला लावणे, हे मला आवडते. याचा खूप चांगला परिणाम दिसून येतोय. काही रुग्ण मी मुद्दाम फक्त मनोवह स्रोतस शुद्धीचे वेगळे ठेवले आहेत, ज्यांना संमोहनाव्यतिरिक्त फक्त आहारातील पथ्ये आणि योगासने सांगतो. कोणतीही औषधे देत नाही. कुंकु, बांगड्या, पैजण त्याच रुग्णांना सुचवतो, ज्यांनी कधी ते घातलेच नाहीत. त्यांनी हे उपाय केले तरी परिणाम दिसतात. यांची पुढे मासिक पाळी नियमितपणे होताना दिसते.

    शमन औषधांचा आणि शोधन चिकित्सेचा परिणाम सुद्धा दिसतो, पण तो काही काळच टिकतो, पुनः कुपथ्य झाले तर किंवा कालाच्या प्रभावाने पुनः अनुपशय दिसतो. जेवढे आपण सूक्ष्मत्वाकडे जाऊ तेवढी शक्ती वाढत जाते,या न्यायाने, शरीरापेक्षा, मन सूक्ष्म आहे, तिथे केलेली चिकित्सा लवकर परिणाम दर्शवते. आत्मा तर त्याहीपेक्षा सूक्ष्म आहे. त्याचा अभ्यास गुरूकृपा झाल्याशिवाय सुरूच होत नाही. म्हणून मला असे वाटते,
    ( मला असे वाटते, म्हणजे मी अहंकाराने म्हणत नाही हो, ) की, सर्वच व्याधींचे हे तीनही हेतु शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न व्हावा, मी जे काम करतोय ते आपणासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करतोय.

    पूर्वीच्या काळी देखील स्त्रीयांना मानसिक ताणांना जास्त सामोरे जावे लागत होते. पण पीसीओडीचे प्रमाण एवढे नव्हते. कारण, त्यांची शारीरिक कामेदेखील तेवढीच प्रचंड कष्टांची होती. विहिरीतील पाणी ओढून काढणे, ते घागरीतून कमरेवर घेऊन येणे, सरपण गोळा करणे, चुल फुंकणे, इथपासून, सडा सारवण, रांगोळी काढणे, वाकून केर काढणे, जात्यावर दळणे, कांडणे, उकीडवे बसून कपडे धुणे, भांडी घासणे, पाट्या वरवंट्याने वाटणे, गाई गुरांचे करणे, जमिनीवर डावी मांडी दुमडून जेवणे, ओणव्याने वाढणे, पुनः उष्टशेण करणे, हे सग्गळं तिला एकटीलाच करावं लागत होतं. कोणताही पुरूष मदतीला जात नव्हता. त्यात पोरांकडे तिलाच लक्ष द्यायचं होतं.
    तिची करमणूक म्हणजे झिम्मा, फुगड्या, पिंगा, हे सर्व व्यायाम प्रकारच होते. वेगळे योगासनाचे क्लास लावावे लागत नव्हते.

    या सर्व प्रकारात तिचे पोट अक्षरशः पिळले जात होते, पिळवटले जात होते, खऱ्या अर्थाने स्त्रीची "पिळवणूक" होत होती. अशा कामामुळे पीसीओडी कशाला होईल ? आज पीसीओडी वाढलेला दिसतोय कारण ही सर्व कामे बंद झाली. मी पुनः एकदा सांगतोय, स्त्रीला कामाला लावायचा माझा हेतु बिलकुल नाही, पण आपण हेतुंचा विचार करतोय, म्हणून जुन्या भारतीय कामांची फक्त आठवण करून दिली.

    अन्नाचा दर्जाही उत्तम प्रतीचा होता. कमी खाल्ले तरी (आजच्या भाषेतील पोषणमूल्ये पुरेशी होती. मी आयुर्वेदाचा कट्टर पुरस्कर्ता असल्यामुळे मला म्हणे, असे माॅडर्न टर्मिनाॅलाॅजी असलेले शब्द वापरायची सुद्धा बंदी. ) पोटभर नसले तरी पुरेसे होते.

    भरपूर काम करायचं आणि काय खायचं, असा एक जमाना भोगलाय स्त्रीनं. आणि आज हे समीकरण बदलत बदलत, व्यायाम-काम कमी करायचं, आणि काय काय खायचं, असा प्रश्न भरल्या घरात पडतोय. चीज, पनीर, चायनीज, पंजाबी या खाण्याबद्दल मी बोलतच नाही.....
    एकंदरीत आज स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक कमी, आणि मानसिक जास्त असं झालंय.

    म्हणजे पुनः स्त्रीयांची शारीरिक पिळवणूक करा, असं शब्दशः मला म्हणायचं नाहीये.

    आणि मी फक्त स्त्रीयांना म्हणतोय, कारण लेखाचा विषय पीसीओडी आहे. मी पुरूषांच्या बाजूने बोलतोय, असा (गैर) समज कृपया करून घेऊ नये.

    आणि हो, ही सर्व फक्त आपल्या प्रिय भारत देशातलीच वैशिष्ट्य सांगतोय बरं का !

    भारतात पीसीओडीचे थैमान आत्ता वीस पंचवीस वर्षातील. पण पाश्चात्य देशात हा आजार त्यांच्या यांत्रिक (सेडेंटरी) जीवनशैलीमुळे चाळीस पन्नास वर्षे तरी जुना असावा.

    हा आजार भारतातून हद्दपार करणे, आपल्याला शक्य आहे, कारण त्यांचे निदान हेतू आपणाला आयुर्वेदानुसार शोधता येतील, माहिती आहेत.

    गाडी जर चुकीच्या रस्त्याने गेली तर तसंच आणखी पुढे जायचं का ? ज्या रस्त्याचं भविष्य आपणाला माहितीच नाही. तिथून परत मागे फिरणे योग्य नाही का ?

    हेतु सेवन बंद झाल्याशिवाय कायमचा संप्राप्तीभंग कसा होईल ? नाहीतर कायमच्या घ्याव्या लागणाऱ्या व्याधींच्या यादीत आणखी एक नाव अॅड होईल.
    बघा विचार करून..

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ सिंधुदुर्ग.

  • कशासाठी – डोक्यासाठी, मेंदूच्या वाढीसाठी

    हाडे ठिसूळ होऊ लागली की आपण लगेच कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो, कारण हाडांमधील ९०% हिस्सा कॅल्शियमने बनलेला असतो. रक्तातील लोह (हिमोग्लोबिन) कमी झालेले दिसले की लगेच आयर्नच्या गोळ्या घेतो. पण मेंदूचे स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी आपण अशी काहीच काळजी घेत नाही. वास्तविक हाडे किंवा रक्तातील लोहापेक्षा कईक पटीने आपला मेंदू अधिक महत्वाचा आहे.