वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते.
जगातील प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य उत्तम असावे अशीच इच्छा मनोमन बाळगून असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरातील मेदाचे म्हणजेच चरबीचे प्रमाण आटोक्यात असणे आवश्यक आहे. व्यक्तीच्या सर्व रोगांचे मूळ अनावश्यक चरबीत आहे, हे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. मधुमेह, रक्तदाब, पक्षाघात, कॅन्सर यांची सुरुवात चरबी जास्त असण्यातून होणे शक्य असते. महिलांमध्ये पी.सी.ओ.डी. (पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसिझ), वंध्यत्व, पाळीचे त्रास, गर्भाशयात गाठी यांचीही सुरुवात मेदाचे प्रमाण जास्त असल्यामुळेच होते असे सप्रमाण सिद्ध झाले आहे. ज्यांचे चरबीचे, मेदाचे प्रमाण पोटाच्या व ओटीपोटाच्या भागात जास्त असते त्यांना जास्त धोका असतो.
पोटाचा घेर किती असावा?
यासाठी थोडी गमतीशीर वाटलीय तरी ही सोपी चाचणी करून पाहा- ‘भिंतीकडे तोंड करून उभे राहा आणि भिंतीला सावकाश धडका! आपला कुठला अवयव पहिल्यांदा भिंतीला लागतो? कपाळ, नाक की ढेरी? जर आपली ढेरी पहिल्यांदा भिंतीला लागत असेल, तर सावधान! खूप काळजी करू नका पण काळजी घ्या!’ ही झाली पोटाच्या घेराची सोपी व्याख्या!
आता शास्त्रीयदृष्टय़ा मान्य असलेले निकष काय आहेत ते पाहू या. पुरुषांमध्ये पोटाचा घेर ९० सेंमी. (३६ इंच) व महिलांमध्ये ८० सेंमी. (३२ इंच) किंवा त्यापेक्षा जास्त असणे धोकादायक आहे.
पोटाच्या घेरासाठीचे हे प्रमाण सरकारने स्थापन केलेल्या अभ्यासगटाने भारतीयांसाठी ठरवून दिले आहे. शहरी भागांत किती व्यक्ती या धोकादायक पातळीच्या खाली असतील? फारच कमी! खूप जण पोटाचा घेर कमी करण्यासाठी धडपडत असतात पण त्यामध्ये यश मिळत नसल्याची त्यांची तक्रार असते.
पोटाचा घेर कमी करावयाचा म्हणजे ‘गुलाबजामच्या थोबडीत मारणार आणि जिलेबी कधीच खाणार नाही!’, अशी दिशा बरेच जण निवडतात. यात ९९ टक्के भर काय खायचे व काय खायचे नाही यावर असतो. ही दिशाच मुळी चुकीची आहे. दिशाच चुकीची असेल तर उद्दिष्ट गाठणे कसे शक्य होणार? त्यामुळे ९९ टक्के भर केव्हा, काय, कसे व किती यावर हवा!
या व्यक्तींकडे वेळेचा अभाव असतो. व्यायाम करायला वेळ मिळत नाही ही सर्वाचीच बोंब! पूर्वी ज्याला व्यायामाला वेळ नाही त्याची ‘वेळ’ जवळ आली आहे’, असे म्हणत असत! आता मात्र या वाक्याचाही काही उपयोग नसल्याचे दिसते.
खरी भूक लागल्यावर हवे ते-
(याला काही पदार्थ नक्कीच अपवाद आहेत.) प्रसन्न चित्ताने, सावकाश खावे!..आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पोट भरावयाच्या आधी थांबावे!
यात वयाच्या पस्तिशीपर्यंत आपण कधीच आणि काहीच व्यायाम केला नसल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार व्यायामास सुरुवात करणे इष्ट. व्यायामात १२ सूर्यनमस्कारांचा समावेश करा. याची सुरुवात दोन सूर्यनमस्कार घालून केलीत तरी चालेल. त्याचप्रमाणे संपूर्ण दिवसभर हालचाल करीत राहा. बसून राहण्याऐवजी उभे राहा, उभे राहण्याऐवजी चालणे शक्य असेल तेव्हा तेव्हा चाला. नेहमीची, जवळच्या अंतरावरची कामे करण्यासाठी चालत जा, सायकल असेल तर ती वापरायला काढा. या हालचालींमुळे आपोआप व्यायाम होत राहील. जितकी शारीरिक हालचाल जास्त तेवढे चांगले. पोटावर झोपून करावयाची आसने शिकून घेऊन ती जरूर करा.
खरी भूक लागल्याशिवाय खाऊ नका. भूक खरी आहे का हे पाहण्यासाठी एक ग्लास पाणी सावकाश पिऊन १० मिनिटे थांबा! जर भूक तशीच राहिली तर जरूर खा! खरी भूक मारू नका. ‘हवे ते खा’ म्हणजे नेमके काय?
शिजवलेले अन्न (रोजचे जेवण) दिवसांतून दोन वेळा. एरवी दोन जेवणांच्या मध्ये फक्त आणि भरपूर मोड आलेली कडधान्ये, कच्च्या पालेभाज्या व फळभाज्या आणि फळे खाणे योग्य. मुद्दाम पोट कमी करण्यासाठी म्हणून कुठलाही पदार्थ वज्र्य नाही. फक्त जे खायचे असेल ते जेवताना आणि योग्य प्रमाणात खा. हातसडीचा तांदूळ वापरणे फारच चांगले. घरात वापरल्या जाणाऱ्या तेलाचे ऑडिट करा. (पूर्ण दिवसात माणशी २० मिली तेलाचा वापर योग्य.) जे काही खाल ते प्रसन्न चित्ताने आणि सावकाश खा. काहीही खाताना, पिताना आधी व्यवस्थित खाली बसा, शांतपणे, प्रसन्न मनाने, सावकाश, पंचेद्रियांनी अन्नाचा आस्वाद घेत खा. जेवणासाठी २०-३० मिनिटे वेळ ठेवा. घाई गडबड टाळा.
एखादा आवडता पदार्थ जेवणात असला, तर पोटात अजून थोडी जागा असतानाच जेवणाला पूर्णविराम देणे जड जाईल. पण हळूहळू हे नक्की जमेल. शक्यतो परत वाढून घेऊ नका म्हणजे याची सवय होत जाईल. पोट भरण्याचा सिग्नल मिळण्यास थोडा वेळ लागतो, हे ध्यानात ठेवा.
ठरवल्या तर वरील सर्व गोष्टी सहजपणे करता येतात. वर्षभरात व्यक्तीला साधारणपणे ४ ते ५ इंच पोटाचा घेर कमी करता येऊ शकतो. स्वत:वर विश्वास ठेवा! पोटाचा घेर नक्की कमी होऊन आपले आरोग्य नक्की सुधारण्यास मदत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
9422301733
संदर्भ.डॉ. शिरिष पटवर्धन
December 22, 2016
भारतीय विद्वानांचा विचार असा आहे कि जर सर्व नियम शिथिल केले पारदर्शकता ठेवली आणि ती लोकां पर्यंत पोहचली, तसेंच शिक्षेची योग्य अंमलबजावणी ह्या गोष्टी केल्या तर भ्रष्टाचार थांबविणे शक्य होईल.
November 15, 2010
अँन्टोनी वॅन लेवेनहूक (Antoni Van Leeuwenhock, 1632-1723) या डच शास्त्रज्ञानं, लाल रक्तपेशी, अन्नपदार्थातील .. प्राण्यांच्या लाळेतील .. मानवी विष्ठेतील … सूक्ष्मजीवजंतू, साठलेल्या पाण्यातील सूक्ष्म प्राणी (protists), नरप्राण्यांच्या वीर्यातील शुक्राणू वगैरे अती लहान घटक प्रथमच पाहिले.
April 19, 2016
गुळवेल ही अनेक वर्षे टिकणारी, एखाद्या झाडाच्या वा दुसर्या कोणत्याही आधाराला धरून वर चढणारी, नेहमी हिरवीगार राहणारी वेल आहे. दोन फांद्यामधून फुटणार्या बारीक दोर्यासारख्या तणावाच्या साहाय्याने आधाराला धरून गुळवेल वर चढते. तिची पाने हृदयाच्या आकाराची असतात आणि फांद्या लांब असतात. याचे फळ साधारण वाटाण्याच्या आकाराचे व लाल रंगाचे असते.
June 6, 2025
ऐन दिवाळीत मराठ्यांनी कल्याण व भिवंडी आदिलशाहीतून स्वतंत्र केले. महाराजांनी कल्याण शहराबाहेर, खाडीशेजारी दुर्गाडीचा किल्ला बांधला. याच दुर्गाडीच्या संरक्षणात स्वराज्याचे पहिले आरमार सजू लागले. कोळी, भंडारी, आगरी, दाल्दी, सारख्या दर्यावर्दी जमातींनी या नूतन आरमाराची धुरा सांभाळली.
October 24, 2021
एकेकाळी शहरांपासून दूर असलेल्या कँटोन्मेंटसना आता अनेक ठिकाणी शहरांनी वेढले आहे. काळानुसार कँटोन्मेंटमधील विकासाचे, लोकवस्तीचे आणि व्यवसायांचे प्रमाण वाढत गेले. त्याबरोबर नागरिकांच्या राहणीमानातही बदल झाला. त्यांच्या अपेक्षा उंचावत गेल्या. रस्त्यांमधील वाहतूक आणि वर्दळीचे प्रमाण वाढले. देशाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या कँटोन्मेंटवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षिततेच्या आव्हानाला आणखी एक गंभीर परिमाण लाभले; लष्करी साधनसुविधा, हत्यारे आणि मालमत्ता यांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता निर्माण झाली.
April 1, 2022
दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे.
May 16, 2017
बातम्या : * दलितांवरील अत्याचार * स्त्रियांवरील अत्याचार
* स्त्रियांचे समाजातील unequal स्थान
संदर्भ : वृत्तपत्रें व इलेक्ट्रॉनिक मीडियांमधील विविध बातम्या .
• सामाजिक असमानतेच्या व अत्याचारांच्या विविध बातम्या वाचल्या-ऐकल्यानंतर , खरंच आपण २१व्या शतकात आहोत कां, असा मनाला प्रश्न पडतो. कुठे दलितांवर अत्याचार होताहेत, तर कुठे स्त्रियांवर ; तर अनेक मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाकारला जातोय. ( या , प्रवेश नाकारण्याबद्दल, व स्त्री-पुरुष असमानतेबद्दल मी आधी एक लेखही लिहिलेला आहे, जो वेबसाइटवर वाचतां येईल).
अशा सततच्या बातम्यांमुळे मनात अतिशय अस्वस्थता येते, आली आहे. म्हणून, ही पोटतिडीक, ही टिप्पणी.
• ध्यानात राहूं द्यावें की, आपण या प्रश्नाचा ऊहापोह, धार्मिक बाब म्हणून करणार नसून, एक महत्वाची सामाजिक बाब या अर्थानेंच करीत आहोत.
• तथाकथित ‘खालच्या’ जातींना ‘सापत्न’ वागणूक देतांना आपण Dignity of Labour चा विचार करत नाहींच ; पण आपण हाही विचार करत नाहीं की, या लोकांनी शतकानुशतकें समाजाला ज्या ‘सेवा’ (services) दिल्या, त्या जर दिल्या नसत्या, तर समाज सुचारु रूपानें चालूं शकला असता कां ? समाजाच्या एका महत्वाच्या भागाला आपण बाजूला ठेवतो, दूर लोटतो आहोत , याचें भान या समाजाला नाहीं कां ?
• बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मपरिवर्तन कां केलें, याचा सखोल विचार आपण कधी करणार ? सुदैवानें त्यांनी बौद्ध धर्मासारखा शांतिपूर्ण धर्म स्वीकारला. बरीच वर्षें मनन-चिंतन करून, राष्ट्राच्या ऐक्याचा विचार करून, त्यांनी हेतुत: हाच धर्म स्वीकारण्याचा निर्णय घेतला, हें आपले भाग्यच ! पण या घटनेपासून आपण कांहीं शिकलो कां ? आपली ‘दकियानूसी’ वृत्ती बदलायचा प्रयत्न तरी केला कां? की आपले, ‘पहिले पाढे पंचावन्न’ ?
• आतां , सएमाजातील घटकांच्या असमानतापूर्ण वर्तणुकीला कंटाळून एका गावातील ३०० दलित कुटुंबें धर्मांतर करायचें ठरवत आहेत. त्यांना कसा दोष द्यायचा ? त्यांच्या स्वत:च्या धर्मातील तथाकथित ‘उच्चवर्णी’, त्यांच्यावर अत्याचार करून, त्यांना ‘खालचे’, दुय्यम ठरवून, त्यांचे न्याय्य अधिकार नाकारत आहेत. या ‘सो-कॉल्ड् उच्चवर्णीयांना’ हें कळत नाहीं की, मध्ययुगात असेच अनेक लोक परधर्मात गेले आहेत. दर वेळी त्यांच्यावर कुणी सक्ती केली असेलच असें नाहीं, दर वेळी धर्मांतरासाठी कोणी त्यांना लालूच दिली असेल असेंही नाहीं. शतकानुशतकें झालेल्या या धर्मांतराचें प्रमुख कारण, स्वधर्मांमधील लोकांची वर्तणूकच होती. याची अनेक उदाहरणें देतां येतील. जिना यांचे पूर्वज (आजोबाच) हिंदू होते, पण त्यांनी सुरूं केलेल्या धंद्यावरून त्याना ‘वाळीत’ टाकलें गेलें होतें ; त्यामुळे त्यांनी धर्म बदलला. नंतर त्यांना पश्चात्ताप झाला, व स्वधर्मात परत येण्याची त्यांची इच्छा होती ; परंतु समाजानें तें होऊं दिलें नाही. (ही सर्व माहिती, जिना यांच्यावरील पुस्तकात सहज उपलब्ध आहे. जिज्ञासूंनी ती ज़रूर वाचावी ). या धर्मांतराचा, नंतरच्या काळात किती भयंकर राजकीय परिणाम झाला, हें आपण जाणतोच ! मात्र, यांतून आपला समाज कांहींच शिकत नाहीं, ही खेदाची गोष्ट आहे. सगळे परिणाम लगेत घडतही नाहींत, लागलीच दिसूनही येत नाहींत. मात्र, ते घडतात, तेव्हां कधी कधी फाऽर फाऽर उशीर झालेला असूं शकतो.
• हमीद दलवाई यांनी त्यांच्या लेखनात महत्वाचा मुद्दा मांडला आहे , तो हा की, आज मुस्लिमांमधील अनेक लोक केवळ लहान लहान धंदे करून जेमतेम पोट भरत आहेत. आणि खरं आहे, आपल्या सभोवताली, प्लंबर, विणकर, हातगाडी घेऊन जात असलेला भंगारवाला, फुटलेल्या काचा बसवणारा काचवाला, सायकलीवर चाक बसवून चाकू-सुर्यांना धार लावणारा, असे अनेक धंदे करणारे लोक मुस्लिम आहेत. हे सगळे लोक कांहीं इराण, तुर्कस्थान/ टर्की, अफगाणिस्तान वगैरे देशांमधून येथें आलेले नाहींत, तर ते या देशातील हिंदूंमधीलच विशिष्ट जातींचे लोक आहेत, ज्यांनी मध्ययुगात धर्मांतर केलेलें आहे ; आणि याला प्रमुख कारण अर्थातच हिंदूंमधील तत्कालीन लोकांचे वर्तनच आहे, यात संशय नाहीं.
• पुन्हां एकदा आठवण करून देतो की, येथें आपला दृष्टिकोन धार्मिक नसून फक्त सामाजिक आहे ; धर्माचा उल्लेख केवळ त्या अनुषंगानेंच आहे.
• धर्म ही गोष्ट असावी वा नसावी, एखाद्यानें धर्म मानावा किंवा मानूं नये, ही एक वेगळीच चर्चा आहे, तिच्यात आपण तुर्तास जात नाहीं आहोत. पण, कुठलाच धर्म perfect नाहीं, नसणारच ! मात्र, मुस्लिम धर्मात हिंदूंपेक्षा अधिक समानता practice केली झाते, हें मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलें आहे. मी शाळेत असतांना स्वत: पाहिलेलें आहे की, कांहीं तत्कालीन प्रसिद्ध फिल्मस्टार्सचे नातेवाईक आणि आमच्या हॉस्टेलमधील साधारण नोकर, हे रमज़ानचा रोज़ा एकाच दस्तरख़्वानवर बसून सोडत होते ! हिंदूंमध्ये, ज्ञानेश्वरकालीन संतमंडळ, संत एकनाथ, विठ्ठल रामजी शिंदे, स्वातंत्र्यवीर सावरकार, राजर्षि शाहू महाराज, विवध समाजसुधारक , अशा अनेकांनी प्रयत्न करूनही समता establish झालेली नाहीं, हें कटु असलें तरी सत्य आहे.
• कदाचित थोडेसें विषयांतर होईल. पण या संबंधात, स्वतंत्र्यवीर सावरकर यांची हिंदुत्वाची व्याख्या पहावी. दुर्दैवानें त्याबद्दल अनेक गैरसमज पसरवले गेले. पण ही व्याख्या मूलत: राजकीय-सामाजिक आहे , धार्मिक नाहीं. त्या दिशेनें समाजानें जर विचार केला असता, तर ‘ही जात - ती जात’ असा भेदभाव संपण्याच्या दिशेनें पाऊल पुढे पडलें असतें.
(यावरील माझा लेख वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्थात, हाही एका वेगळ्या चर्चेचा विषय आहे. आत्ता, फक्त प्रस्तुत विषयाच्या अनुषंगानें त्याचा उल्लेख केलेला आहे, इतकेंच ).
• आतां तर, ‘इलेक्टेड डेमोक्रेसी’च्या संदर्भात जातपातींच्या राजकारणाचें महत्व वाढतच आहे ! जातीपातींना आज ‘एकगठ्ठा मतांचा समूह’ असेंच बघितलें जात आहे. आणि, सरकारी फायदे मिळवण्यासाठी लोक, अमुक जातीला अमुकअमुक मागासवर्घीय फायदे मिळायला हवेत, यासाठी आंदोलनें करत आहेत. (त्याच्या योग्यायोग्यतेची चर्चा आपण तूर्तास करत नाहीं आहोत, पण - ) याचा अर्थ असा की, ‘मी भारतीय आहे’ ही भावना कमी महत्वाची ठरून, ‘मी अमुक अमुक जातीचा आहे’ ही गोष्ट priority घेते !
• स्त्रियांच्यावरील अत्याचार ही बाब पुरुषप्रधान संस्कृतीशी संबंधित आहे. हेंही मध्ययुगात वाढत्या प्रमाणात झालें. आजही सुशिक्षित स्त्रियांनाही या प्रॉबलेमला सामोरे जावें लागतें आहे (भारतातच नव्हे, तर पाश्चिमात्य देशांमध्येसुद्धा). ज्या लोकांनी हल्लीच, डेमॉक्रेटिक पार्टीच्या ‘नॅशनल कन्हेन्शन’मधील हिलरी क्लिंटन यांचें भाषण ऐकलें-वाचलें असेल, त्यांना हें कळलेंच असेल की, हिलरींनी सुद्धा या मुद्दयाचा, एक महत्वाचा मुद्दा म्हणून, परामर्श घेतलेला आहे. स्त्रियांना मिळणारी असमान वागणूक हिलरीना अस्वस्थ करते, व त्यासाठी बरेंच कांहीं करण्याचें आश्वासन त्या देतात.
• स्त्रियांना मंदिर-प्रवेश नाकारणारे लोक, त्यासाठी धर्म व परंपरा यांची ‘दुहाई’ देतात. ज्या परंपरा समाजातल्या ५०% भागाला, म्हणजे स्त्रियांना, असमान वर्तणूक देतात, त्या काय कामाच्या?
• ज़रा कल्पना करा, या असमानतेच्या सामाजिक वर्तनाला कंटाळून स्त्रियांच्या समूहांनी जर धर्म बदलायचा असें म्हटलें, तर संपूर्ण समाजातल्या घराघरात हाहा:कार उडेल ! समाजाचें नशीब थोर म्हणूनच केवळ, अजूनतरी स्त्रियांच्या ग्रूप्सनीं असला विचार केलेला नाहीं. पण, तसें उद्या घडणारच नाहीं, याची काय गॅरंटी ?
• दलित असो वा स्त्रिया, त्यांच्यावरील atrocities, समाजाला नुसतें समजावून कमी होतील काय ? तसें जर असतें, तर , समाजसुधारकांच्या प्रयत्नांनंतर संपूर्ण समाजच बदलून गेला नसता कां ? अर्थात, तसें प्रयत्न तर होतच रहायला हवेत, हें खरें आहे ; पण, ‘न-समजून-घेणार्यांसाठी’ कांहींतरी strict उपाय सरकारनें योजायला नकोत कां ?
• दलित, स्त्रिया किंवा अल्पवयीन मुलें यांच्यावर अत्याचार करणार्यांना कठोर शिक्षेची तरतूद सरकारनें केली पाहिजे. उदा. अमेरिकेत तर, अगदी आईवडीलसुद्धा जर आपल्या अल्पवयीन अपत्यांवर अत्याचार करत असले, तर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा होऊं शकते.
• भारतातही, असा शिक्षेची कांहीं तरतूद आहे, उदा. सासू-सासर्यांनी सुनेवर केलेले अत्याचार.
पण, हें जें कांहीं कायदे आहेत, तें कितीसें पुरेसें पडत आहेत ?
• यासाठी, पार्लमेंटनें नवीन कायदा करून, अशा गोष्टींसाठी –
- स्पेशल, ‘फास्ट कोर्टस्’ स्थापन करून , च्यातर्फे अशा केसेस चालवल्या जाव्यात
- नुसत्या atrocities च नाहीं, तर , अगदी मंदिर-प्रवेश नाकारणार्यांनासुद्धा सज्जड सज़ा ठेवावी, (जसें की ५ वर्षें सक्तमजुरी). Carrot & stick म्हणतात ना, त्यातील, इथें stick चा प्रयोग, किंवा धाक असल्याशिवाय अशा सामजिक सुधारणा होणारच नाहींत.( म्हणतात ना, ‘लातों के भूत बातों से नहीं मानते’ ).
- आजही कांहीं देशांमध्ये, हात तोडणें , रस्यात उभें करून दगडधोंडे फेकून मारणें अशा मध्ययुगीन शिक्षा प्रचारात आहेत. अशा मध्ययुगीन शिक्षांचा मी पुरस्कार करत आहे, असें कृपया कुणी समजूं नये. मात्र, अगदी , सक्तमजुरीच्या शिक्षेची भीती सुध्दा मोठें deterant नक्कीच ठरेल.
• पण, --- आणि , हा मोठा ‘पण’ आहे ---- , असा कायदा केला तर समाजाचा एक भाग सरकारवर खात्रीनें नाराज होणार, हें नक्की. मग, सरकार ही रिस्क घेईल काय ? त्यासाठी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन, असा कायदा आणायला हवा.
पण आपल्या राजकीय पक्षांची one-up-manship पहातां, असें काहीं घडेल, ही आशा धरावी काय, हा मोठा प्रश्न आहे. म्हणजेच, अशा atrocities चालूंच रहाणार काय ?
म्हणे, २१वें शतक !! आपण कुठे आहोत ? अजूनही मध्ययुगातच आहोत ? आपण कुठे चाललो आहोत ? पुढे जाणें दूरच,पण हा समाज मागेमागें जात आहे काय ?
या प्रश्नांची उत्तरें शोधायला गेलें तर, हातात कांहींच fruitful लागत नाहीं , ही अतिशय खेदाची गोष्ट आहे.
• अखेरीस :
हा असमानतेचा ‘सिलसिला’ शतकानुशतकें चालत आलेला आहे. दुर्दैवानें, लोक अनेकदा short-sightedness च दाखवतात, आपल्या कृतींचे दूरगामी दुष्परिणाम त्याच्या ध्यानातच येत नाहींत; आणि थोडेफार ज़री आलेच, तरी ते त्याकडे दुर्लक्षच करतात.
पण, आपण हे सत्य विसरूं नये की, इतिहास कुणाला क्षमा करत नाहीं .
तेव्हां, इतिहासानें धडा शिकवण्यांआधी, आपणच ज़रा आपल्या मनाला विचारूं या ,
( एका प्रसिद्ध गीताला poaraphrase करून ), की -
‘ये कहाँ जा रहे हम , यूं ही अपनोंको मसलके ?’ ;
आणि, मनाला ही जाणीव करून देऊं या , की -
‘ये ज़माना बढ़ चलेगा , अब हमें ही कुचलके’ .
चला, कांहींतरी concrete करूं या, अजूनही वेळ गेलेली नाहीं !
-- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
August 3, 2016

भारताची राज्यघटना, नागरिकांचे कर्तव्य, नागरिकांचे अधिकार आणि लोकशाहीसाठीची आपली कटिबद्धता यांची आठवण करून देणारा हा सण म्हणजे एक प्रकारे येणार्या पिढ्यांवर लोकशाहीचे संस्कार करणारा, लोकशाहीमध्ये पार पाडावयाच्या जबाबदारीबद्दल जागरूक करणारा असा उत्सव आहे.
२६ जानेवारी १९५० रोजी देशाचा पहिला प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. पण हा प्रजासत्ताक दिन राजपथावर नव्हे, तर इर्विन स्टेडियम (सध्याचं नॅशनल स्टेडियम) वर झाला. त्याला आज ‘मे. ध्यानचंद स्टेडियम’ म्हणून ओळखले जाते. त्यादिवशी ध्वजाला ३१ तोफांची सलामी दिली गेली होती, त्यानंतर ध्वज फडकवण्यात आला. पहिला समारोह दुपारनंतर साजरा करण्यात आला. या वेळेस पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद ६ घोड्यांच्या बग्गीतून गव्हर्नमेंट हाउसमधून दुपारी २.३० वाजता निघाले. कॅनॉट प्लेस व ल्यूटेन्स झोन याला फेरी मारत, त्यांची फेरी स्टेडियमच्या आत पोहोचली व ३.४५ वाजता सलामी मंचापर्यंत पोहोचली, तेव्हा तिरंग्याला ३१ तोफांची सलामी देण्यात आली. विशेष म्हणजे, १९५० ते १९५४ पर्यंत प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम इर्विन स्टेडियम, किंग्सवे, लाल किल्ला, रामलीला मैदान आदी ठिकाणी झाला. पण १९५५ पासून प्रजासत्ताक दिन राजपथावर साजरा करण्याची परंपरा सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम राजपथावर मोठ्या उत्साहात होतो. या कार्यक्रमानिमित्त आयोजित करणाऱ्या संचलनाची सुरुवात, रायसीना हिल्सवरुन होते. इथून राजपथ, इंडिया गेट मार्गे लाल किल्ल्यावर येऊन ती संपते. यानिमित्त राजपथावर भारताची ताकद आणि संस्कृतीची झलक पहायला मिळते. या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आशियान शिखर परिषदेच्या नेते हजर राहणार आहेत. या मध्ये सुलतान हसनल बोल्काय (अध्यक्ष, ब्रुनेई), ह्युन सेन (पंतप्रधान, कंबोडिया), जोको विडोडो (राष्ट्राध्यक्ष, इंडोनेशिया), थाँगलून सिसूलिथ (पंतप्रधान, लाओस), नजीब रजाक (पंतप्रधान, मलेशिया), आंग सान सू की (स्टेट कौन्सीलर, म्यानमार), रोड्रिगो रोआ ड्युआर्टे (राष्ट्राध्यक्ष, फिलिपाइन्स), ली ह्यसीन लूंग (पंतप्रधान, सिंगापूर), प्रायुथ चान ओचा (पंतप्रधान, थायलंड), न्ग्युएन झुआन फुक (पंतप्रधान, व्हीएटनाम) समावेश आहे. २०१६ मध्ये देशाच्या इतिहासात पहिल्यांदा प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये भारतीय जवानांसह फ्रान्सच्या सैनिकांनीही सहभाग घेतला. तब्बल ६७ वर्षांनी ही ऐतिहासिक घटना घडली. या कार्यक्रमासाठी फ्रान्सचे राष्ट्रपती फ्रांसवा ओलांदा हे प्रमुख पाहुणे होते.
जगातील विविध देशांच्या प्रमुखांनी आजवर या कार्यक्रमास हजेरी लावलेली आहे. प्रमुख पाहुणे होण्याचा मान इंग्लंड आणि फ्रान्सला पाच वेळा, भूतानला चार वेळा तर रशियाला चार वेळा मिळाला आहे. शेजारील देश, आफ्रिकेतील देश, तसेच युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना ही संधी देण्यात आलेली आहे. २९ जानेवारी रोजी मावळणाऱ्या सूर्याच्या साक्षीने होणाऱ्या कार्यक्रमाने ‘प्रजासत्ताक दिन सोहळा’ अधिकृतरीत्या संपतो. याला बीटिंग द रिट्रिट असे म्हणतात. नॉर्थ आणि साउथ ब्लॉक जवळ होणाऱ्या या कार्यक्रमात विविध बँड्सचा समावेश असतो. या तीन दिवसांमध्ये राष्ट्रपती भवन आणि परिसरास दिव्यांची रोषणाई केली जाते.
-- संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
January 26, 2022
श्रीमद् शंकराचार्यांच्या या भक्तिपूर्ण स्तोत्रात श्रीकृष्णरूपातील श्रीविष्णूची मानसपूजा वर्णिली आहे. शिखरिणी या भावनाप्रद वृत्तात केलेली ही रचना भाविकांच्या मनाला भिडल्याखेरीज रहाणार नाही.
November 1, 2020
Copyright © 2025 | Marathisrushti