(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • आल्हाददायक व आरोग्यदायक टॉमेटो

    लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे.

    टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाटय़ाखालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.

    औषधी गुणधर्म
    कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.

    उपयोग
    ० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
    ० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
    ० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
    ० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
    ० रक्ताची कमतरता (अॅयनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
    ० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
    ० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅयसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
    ० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
    टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.

    सावधानता
    टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.डॉ. शारदा महांडुळे

  • आरोग्यदायी कडूलिंब

    आरोग्यदायी कडूलिंब

    भारतात सर्वत्र आढळणारे कडू लिंबाचे झाड निंब व नीम या नावांनी ओळखले जाते. पुरातन काळापासून आयुर्वेद औषधांमध्ये याचा उपयोग होत आला आहे. मेलिएसी (म्हणजे निंब) कुलातील हा वृक्ष असून त्याचे शास्त्रीय नाव अॅझॅडिराक्टा इंडिका असे आहे. द. भारत, कर्नाटक, श्रीलंका, मलेशिया व ब्रह्मदेश या प्रदेशांत म्यानमार हा वृक्ष आढळतो.

    कडू लिंब: पाने वफुलोरा.मध्यम आकाराच्याकडू लिंबाच्या वृक्षाची उंची सु.१५-२० मी. तर विस्तार २-३ मी. असतो. पाने हिरवीगार, एकाआड एक, संयुक्त व विषमदली असून फांद्यांच्या टोकास वाढतात. तसेच ती समोरासमोर, तळाशी तिरपी व भाल्यासारखी दातेरी असतात. फुले लहान व पिवळसर पांढरी असून मार्च ते मे मध्ये गुच्छाने येतात. फळे (लिंबोळ्या) हिरवी-पिवळी व १.५ सेंमी. लांब आठळीयुक्त असून उन्हाळ्याच्या मध्यावर येतात. बिया लंबवर्तुळाकार असून बीजपत्रे जाड आणि तेलकट असतात.

    कडू लिंबाच्या झाडांचे अनेक उपयोग असून त्याचा प्रत्येक भाग उपयोगी आहे. डासांना तसेच कीटकांना पळवून लावण्यासाठी त्याच्या पानांचा उपयोग पूर्वीपासून होत आहे. खोडाची तसेच मुळाची साल कडवट असून रक्तस्त्राव थांबविण्यासाठी उपयुक्त आहे. खोडातून पाझरणारा डिंक औषधी असून त्वचारोगावर वापरतात. याच्या डिंकाचे लाडू बाळंतपणात देण्यात येतात. पाने वातशामक व मूत्रल असून त्यांचा उपयोग श्वासनलिकांमधून स्त्रवणारा कफ कमी करण्यासाठी होतो. पानांचा काढा हिवतापावर उपयोगी असून यकृताचे कार्य सुलभतेने होण्यास मदत करतो. कडू लिंबाची पाने व खोड कुष्ठरोगावर औषध म्हणून वापरतात. पोटिस बांधणे, वाफेने शेकणे, मलम तयार करून वापरणे इत्यादींसाठीही पानांचा उपयोग करतात.

    जखमा, त्वचेचे रोग, व्रण, आतड्यातील जंत, मधुमेह इत्यादींवर कडू लिंबाच्या काढ्यांचा उपयोग केला जातो. त्याच्या खोडाचा व लिंबोळ्यांचा वापर मूळव्याधीसाठी करतात. तसेच डहाळीचा वापर दात घासण्यासाठी पूर्वीपासून केला जात आहे. त्यापासून काढलेला रस दंतधावनाचा (टूथ पेस्टचा) एक घटक म्हणून वापरतात.

    -- सुषमा मोहिते
    ( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )

  • औषधी वनस्पती अडुळसा

    औषधी वनस्पती अडुळसा

    अडुळसा ही अॅकँथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरूपाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते.

    ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात.

    कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.

    पानांत वासिसाईन हे अल्कलॉइड आणि अॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.

    लेखक : नरेंद्र देशमुख

    ( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )

  • शिकेकाई – बहुगुणी वनस्पती

    ही परिचित व उपयुक्त काटेरी वेल भारतात सर्वत्र ओलसर जंगलात (दख्खन, कोकण व उ. कारवार, आंध्र प्रदेश, आसाम व बिहार), तसेच चीन, मलाया व म्यानमार या देशांत आढळते. बाजारात ‘शिकेकाई’ या नावाने तिच्या शेंगा मिळतात.

    ⇨ बाभूळ, ⇨ खैर व ⇨ हिवर इत्यादींशी शिकेकाई समवंशी असल्याने त्यांच्या अनेक शारीरिक लक्षणांत सारखेपणा आढळतो. ह्या वनस्पतींच्याअॅकेशिया ह्या प्रजातीतील एकूण ७०० जातींपैकी भारतात फक्त सु. २५ आढळतात.

    शिकेकाईचे खोड जाडजूड असून फांद्यांवर लहान पांढरट ठिपके [छिद्रे; वल्करंध्र] व टोकास वाकडे लहान काटे असतात. पाने एकाआड एक, संयुक्त व पिसासारखी असून मध्यशिरेवर बारीक वाकडे काटे व देठाच्या मध्यभागी खालच्या बाजूस ग्रंथी असतात.

    दलांच्या ४-८ जोड्या व दलकांच्या १०-२० जोड्या असतात. फुले गोलसर झुपक्यात [स्तबकासारख्या; → पुष्पबंध] येतात. ती लहान व पिवळी असून मार्च ते मे महिन्यांमध्ये येतात.

    फुलांची संरचना व इतर सामान्य शारीरिक लक्षणे ⇨ लेग्युमिनोजी कुलात (अथवा शिंबावंत कुलात) व मिमोजॉइडी अथवा शिरीष उपकुलात वर्णन केल्याप्रमाणे असतात. शुष्क फळ (शेंग) चपटे, जाड, ७·५-१२·५ X २-२·८ सेंमी., लालसर पिंगट, सुरकुतलेले व काहीसे गाठाळ असते. बिया ६-१०, काळ्या व गुळगुळीत असून फळे तडकून त्या बाहेर पडतात.

    शिकेकाईची पूड पाण्यात उकळून स्नानाकरिता वापरतात. केसातील दारुणा व उवा यांचा त्यामुळे नाश होतो आणि केसांची वाढ चांगली होते.

    त्वचा कोरडी पडत नाही. रेशमी व गरम कपडे आणि डाग पडलेली चांदीची भांडी व उपकरणे धुण्यास ती पूड चांगली असते.

    खोडाची साल ही मासे पकडण्याची जाळी व दोर रंगविण्यास आणि त्यांचा टिकाऊपणा वाढविण्यास वापरतात.

    हळद व शिकेकाईची पाने यांपासून हिरवा रंग मिळतो.

    कोवळ्या पानांची चटणी (मीठ, चिंच व तिखट घालून केलेली) अथवा पाने काळ्या मिरीबरोबर खाण्यास काविळीवर चांगली; पानांचा रस आंबट व सौम्य रेचक आणि हिवतापावर गुणकारी असून शेंगांचा काढा पित्तनाशक, कफोत्सारक (कफ पातळ करून पाडून टाकणारा), वांतिकारक (ओकारी करविणारा) व रेचक (जुलाब करविणारा) असतो.

    शिकेकाईची पूड घालून केलेले मलम त्वचारोगांवर लावतात.

    चीनमध्ये व जपानात मूत्रपिंडाच्या व मूत्राशयाच्या विकारांवर शेंगा वापरतात.

    बिया सुलभ प्रसूतीकरिता देतात.

    गुरांना विषबाधा झाल्यास शिकेकाई बियांसह ताकात वाटून पाजावी.

    बाजारात शिकेकाईची सुगंधी पूड मिळते.

    शिकेकाईचे काही गुणधर्म रिठ्याप्रमाणे असतात [→ रिठा], कारण शेंगात सॅपोनीन हे ग्लायकोसाइड ५% असते. शिकेकाईयुक्त साबण बाजारात उपलब्ध आहेत. ‘सप्तला’ ह्या नावाने सुश्रुतसंहितेत शिकेकाईचा निर्देश शाकवर्गात केलेला आढळतो.

    -- सुषमा मोहिते
    ( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )

  • मिठास जागा, मिठावर जगू नका

    श्रीकृष्ण रुक्मिणी एकांतात गप्पा छाटत होते, अचानक रुक्मिणी लाडात येऊन म्हणाली, मी तुम्हाला कशी आहे असे वाटते. श्रीकृष्ण स्मित हास्य करून म्हणाले, रुक्मिणी काय सांगू तुला, तुझे महत्व माझ्यासाठी अनमोल आहे, तू अगदी मिठासारखी आहेस.

    का...........य, मी मिठासारखी खारट वाटते तुम्हाला, आणि मुसमुसून रडायला सुरवात झाली. श्रीकृष्ण तिला सर्वतोपरी समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रुक्मिणी काही केल्या शांत होईना. शेवटी कृतीने दाखविण्याशिवाय पर्याय नाही, हे लक्षात आल्यावर, श्रीकृष्ण पुढे काही न बोलता तिथून निघून गेले.

    ते तडक भटारखान्यात गेले, सर्व आचाऱ्याना सक्त ताकीद दिली, कि आज पासून कोणत्याच खाद्य पदार्थात मीठ टाकायचे नाही, हे ऐकून भटारखान्यातील सर्व कर्मचारी स्तब्ध झाले. दुसऱ्या दिवशी सार्वजनिक जेवण होते, राज्यातील, थोर लोक या खास भोजनास आमंत्रित होते. सर्व पंच पक्वान्ने करण्यात आचाऱ्यांनी कोणतीच कमतरता दाखवली न्हवती.

    श्रीकृष्ण रुक्मिणीला सर्वाना जेवणाचा आग्रह करण्यासाठी विनंती करून दुसऱ्या कक्षात निघून गेले. सर्व पाहुणे जेवायला बसले, परंतु पहिला घास तोंडात घालताच सर्वांची तोंडे वाकडी झाली. साक्षात महाराणी सर्वांच्या समोर जातीने हजार होत्या, पण कुणालाही जेवण घशाखाली उतरत न्हवते. हळूहळू पाहुण्यांनी कुजबुज सुरु केली, व मीठ मागण्यास सुरवात केली. वाढपी सर्व जिन्नस वाढायला तयार होते, पण मीठ कोणीच द्यायला तयार न्हवते. रुक्मिणीच्या काय होतंय समजेना, कुणीही स्पष्ट बोलेना व नीट जेवताना दिसेना.

    शेवटी रुक्मिणी स्वतः भटारखान्यात जाऊन पदार्थांची चव घेऊ लागल्या, तर लक्षात आले, कशातही मीठ न्हवते. मुख्य आचाऱ्याला याचे कारण विचारता, त्यांनी महाराजांची तशी ताकीद आहे असे सांगून, मीठ वाढणार नाही असे स्पष्ट सांगितले.

    रुक्मिणी तडक श्रीकृष्ण बसलेल्या कक्षात गेल्या, व त्यांच्यावर तोंडसुख घेऊ लागल्या. काय हे मिळमिळीत जेवण बनवायला सांगितले आहे, कोणत्याही पदार्थात मीठ नाही, कोणीही आनंदाने जेवत नाही, आणि तुम्ही त्या सर्वांच्या समोर मला धाडून इथे आराम करत आहात. श्रीकृष्ण तिला पाहून गालातल्या गालात हसत होते, म्हणाले कसले जेवण म्हणालीस, परत म्ह......ण. हो......हो मी म्हणत आहे मि...ळ...मि.....ळी....त, चव रहित जेवण का बनवायला सांगितले?

    श्रीकृष्ण म्हणाले मी उत्तम स्वयंपाक बनवायला सांगितला होता, सर्व उच्च प्रतीचे मसाले बनवून स्वयंपाक केला आहे, त्या मुळे स्वयंपाक चांगला झालेला आहेच, यात कोणतीच शंका नाही. हं, मी फक्त कशातही मीठ टाकू नका इतकेच सांगितले, पण त्याने काय फरक पडतो, इतके सुरेख मसाले, उच्च प्रतीचे धान्य, व राज्यातील नामवंत आचारी जर जेवण बनवत असतील तर फक्त मीठ ते हि चिमूटभर न टाकल्यामुळे जेवण का मिळमिळीत होणार आहे?

    आता तुला समजले असेलच मिठाचे महत्व, जेवणात मीठ नसेल तर सर्व मिळमिळीत लागणार यात शंका नाहीच, हे सिद्ध करायचे होते म्हणून हा घाट घातला. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, काल मी तुला मिठासारखी आहेस म्हणालो, तर तू रागावलीस, रुसून बसलीस, मग तुझे माझ्या जीवनातील महत्व काय आहे हे समजविण्यासाठी, मला हे सर्व करावे लागले. माझ्या जीवनात सर्व काही उदात्त आहे, पण तू मिठासारखी असल्यामुळे या जीवनाला एक उत्तम चव आलेली आहे, व त्याचा आनंद मी उपभोगतो आहे. जाऊ...दे, आपले संवाद नंतरही सुरु राहतील, आधी आचाऱ्याना बोलाव, मी सर्व पदार्थात मीठ टाकायला सांगतो, पाहुणे मला नावे ठेऊदेत, पण त्या अन्नाला नको, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे.

    रुक्मिणी आता वरमली, म्हणाली नाथ काल मी जे रागावले ती माझी चूक झाली. असो, मीठ अन्नात हवेच पण ते चवी पुरते... हे मला पूर्ण उमगले..असे म्हणत भटारखान्यात निघून गेली.

    आपल्या जीवनातही आपले वागणे चिमूटभर मिठासारखे असावे, मुलीच्या किव्वा मुलाच्या आई वडिलांनी चवीपुरते मुलांच्या संसारात लक्ष घालावे. आई वडिलांनी मुलांच्या संसारात अती लक्ष घातल्यामुळे ते मोडकळीस आलेले आज दिसून येतात, याचे कारण अती लुडबुड हि मिठाच्या खड्यासारखी खारटपणा आणते, त्याने मुलांचे जीवन बेचव होते, हीच गोष्ट सर्वांच्या जीवनाला लागू होते.

    आता आरोग्याबाबतही मिठाचे महत्व अनन्यसाधारण आहे, अती तिथे माती हे मिठास योग्य तर्हेने लागू होते. अती मीठ सेवन केल्याने उच्च रक्तदाब होतो, हे लक्षात ठेवा, जेवणात वरून मीठ शक्यतो टाळाच.

    मिठास जागा, मिठावर जगू नका.....

    विजय लिमये
    (9326040204)

  • श्रीखंड असे खातात

    वसंताचा गोडवा हळू हळू कमी होत हवेतील उष्णता वाढते आहे. आता होळी व पुढे गुढीपाडवा आहेच. जोडीला लग्नसराई चा सुद्धा हाच 'सिझन' ठरलेला.

    तेव्हा 'कुच मिठा हो जाएं?'

    पूर्वी सणावाराला होणारे परंतु हल्ली डेअरी च्या कृपेने बारमाही खाल्ले जाणारे 'श्रीखंड' हे ह्या उन्हाळ्याच्या मिष्टांनात अव्वल आहे. आज थोड त्याबद्दलच बोलूयात.

    बहुतेक सर्वांना ताक, दही, लस्सी हे थंड आहेत असेच माहित असते. हो हे सर्वच थंड आहेत पण केवळ स्पर्शाला !! म्हणजे ?? म्हणजे हे दुधाचे पदार्थ आंबट आहेत, स्पर्शला गार आहेत ( म्हणून पितांना गार वाटतात) पण त्यांचे शरीरातील परिणाम हे उष्ण आहेत. सतत दही, लस्सी आणि तेही उन्हाळ्यात घेण म्हणजे पित्त व रक्ताचे आजारांना तत्काळ आमंत्रणच. म्हणजेच उन्हाळ्यात हे खाण-पिण व तेही भर उन्हात उभे राहून हे जरा रिस्कीच…. नाही का? ज्यांना पूर्वीच पित्ताचे वा रक्ताचे आजार आहेत त्यांनी ह्यांच्या पासून दोनहात लांबच राहिलेले बर.

    पण, आपल्यला अस्वस्थ करणारी जीभ हे कस सहन करेल ?

    श्रीखंड हा ह्यावर थोडाफार उतारा असू शकतो. ज्यात दह्याचा आंबटपणा व साखरेचा गोडवा देखील आहे. पण तेही असेच कसेही खाऊन नाही चालणार.

    हा पदार्थ काही युरो-अमेरिकन नाही. तेव्हा तो केव्हा, कसा खावा ह्याबद्दल नेमकं मार्गदर्शन आपल्या वैदिक साहित्यात - आयुर्वेदात उपलब्ध आहे.

    आपण जे आज विकतचे श्रीखंड खातो ते खरे तर शास्त्रात वर्णीत रेसिपीच्या अर्धेच आहे. म्हणजे असे की श्रीखंडात चक्का व साखर एक सारख्या प्रमाणात एकत्र करणे ह्यालाच आपण श्रीखंड म्हणतो वा तेच आपण विकत आणतोय. ह्यात आजून महत्वाचे दोन घटक आजमितीस आपण घालत नाही वा ते घालून परिपूर्ण श्रीखंड होते हे आपणास माहितच नाही. त्यामुळे आज खाल्ले जाणारे श्रीखंड अनेकांना बाधते. त्याने कफाचे त्रास वाढतात.

    आपण छोटासा बदल करूयात. विकतच्या (घरी केलेल्या सुद्धा!) श्रीखंडात थोड साजूक तूप व मध मिसळून खाऊयात!!

    ढोबळ मानाने चार चमचे श्रीखंडात ३ (तीन) चमचे तूप व २ (दोन) चमचे मध कालवून हे चांगले ढवळून घ्यावे. त्यावर स्वादानुसार वेलची पूड, दालचिनी पूड , तमाल पत्र पूड वा जायफळ पूड घालून (जमल्यास किंचित कापूर लावून) हे श्रीखंड आपल्या आराध्य देवास नैवेद्य म्हणून दाखवावे आणि आपण प्रसाद म्हणून घ्यावे. (प्रमाण आपल्या रुची नुसार कमी अधिक निश्चित होईल.)

    वरील तूप-मध मिश्रित श्रीखंड सहसा बाधत नाही. त्याने तोंड उगाच चिकट रहात नाही. हे श्रीखंड चांगले पचते. थोड खाऊनही चांगली तृप्ती देते. वजन वाढवते. विशेष म्हणजे जुनाट सर्दी चा त्रास असलेल्या लोकांना सुद्धा हे मानवते. त्यांना ताकद देते. त्यांची सर्दी कमी करते. लहान मुलांना ह्या श्रीखंडाने सहसा कफाचे विकार होणार नाहीत. ( जे विकत च्या श्रीखंड व आईस्क्रीम मुळ हमखास होतात. )

    तेव्हा यापुढे अगदीच जेवतांनाच श्रीखंडाची वाटी समोर आली तर आठवणीने थोड तूप-मध कालवून घ्या. हा उन्हाळा सुखद व उत्तम आरोग्याचा जाईल.

    अधिक माहिती साठी

    वैद्य सौरभ अच्युत जोशी.
    एम डी आयुर्वेद
    नाशिक

    संपर्क - 9423964516

    छोट्या सवयी - मोठे लाभ

  • स्त्रियांनो… आरोग्याकडे लक्ष द्या

    आयुर्वेदाचा उगमच मुळी आपल्या स्वैपाकघरातुन झाला. आणि त्यागाची मुर्ती म्हणुन जिच्याकडे पाहिले जाते ती स्त्रीच्या हातात स्वतः तिचे, तिच्या घरातील माणसांचे आणि अप्रत्यक्षरीत्या ती वावरत असलेल्या समाजाचे भवितव्य अवलंबून असते. जर एखादया स्त्रीनेच जर घरातील माणसांचे आरोग्य सुधारायचे ठरवले तर त्यासाठी पहिल्यांदा तिला स्वतःमध्ये जाणीवपूर्वक बदल हे करायलाच हवेत. (शिळे अन्न न खाणे, सर्वानसोबत आपणपण सकाळ- संध्याकाळी लवकर जेवण घेणे वगैरे वगैरे) दुसर्‍यांना पक्वान्न करुन घालेल, स्वतः मात्र शिळे अन्न खाऊन किंवा प्रसंगी उपाशी राहील. ही वृत्ती आता नको.आपल्याबरोबर आपल्या कुटुंबाला,समाजाला सुदृढ करावयाचे असेल तर प्रथम स्वतःमध्ये ते बदल करुन कृतीत आणणे तितकेच गरजेचे आहे.

    त्याचबरोबर स्वतःच्या आरोग्याच्या दृष्टीने आहार,विहार व विचार हेपण महत्वाचे आहेत.
    निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट ही पूर्णत्वाला पोहचते आणि लयाला जाते हा निसर्गाचा नियमच आहे हे लक्षात घेणे तितकेच गरजेचे आहे.

    आज धावपळीच्या जगात ,पुरूषाच्या खांदयाला खांदा लावून समाजात वावरताना तीने स्वतःच्या आरोग्याकडेपण तितक्याच काळजीने पाहिले पाहिजे. हया ठराविक दिवसात (पाळीच्या वेळी) तिला खुप त्रास होत असतो,एकप्रकारचा थकवा येतो.त्यासाठी हया दिवसातील आपल्या कामाचे नियोजन जाणीवपूर्वक करणे गरजेचे आहे.जमत असेल तर (office च्या नियमांना धरुन/वरिष्ठांशी बोलून)त्या ठराविक दिवशी कामाच्या बाबतीत सवलती घेणे ,रजा घेणे.(आज परदेशातपण काही देशात हया ठराविक दिवशी स्त्रिला हक्काची तिच्या रजा दिली जाते. जेणेकरुन त्या दिवसातील येणारा थकवा कमी होईल.हेच घरातील कामांच्या बाबतीतपण करणे तेवढेच गरजेचे आहे .नाहीतर घरी राहुन घरातील पसारा आवरुया,हे नको.

    जिन्स घातल्याने एकप्रकारचा ताण येतो,office चा ड्रेसकोड जरी असला तरी सुट्टीच्या दिवशी सहसा असा पेहराव टाळावा. एकप्रकारचा ताण येतो. आज्ञ्याचक्राच्या (भुवयांच्या मधोमध) हार्मोन्समध्ये बदल होत असतात,पिट्युटरी ग्रंथी येथुनच गेलेली असते,इथे परमेश्वराचा वास असतो असेपण म्हणतात,पुरुषांनी हया ठिकाणी नेहमी अष्टगंध व बायकांनी कुंकु जरुर लावावे.दिवसभर मनात भक्तिभाव व शांती नांदते,हे करुन पहिल्याशिवाय अनुभवता येत नाही.हवा कधी आपण पहातो का?? नाही ना !!!पण हवा म्हणजे काय असते हे नक्की अनुभवू शकतो.चला हवा येऊ दयाSsssss

    गर्भाशय,असा एकमेव अवयव जो फक्त स्त्रियांच्या शरीरातच असतो आणि हयांच्याशीच संबधित अर्धेअधिक आजार हे तिला होताना दिसतात.

    आपल्या office चा ड्रेसकोड जरी शर्टपॅन्ट असले तरीही सुट्टीच्या दिवशी हा पेहराव नको.एकृप्रकारचा ताण येतो.

    पायांच्या बोटात जोडवी घालावी-हयाचा संबध गर्भाशयाशी संबधित आजार कमी होण्यास मदत करतात,हातात बांगडया,गळयात मंगळसुत्र घालावे.मंगळसुत्राची लांबी लहान अर्थात आपल्या ह्रुदयापाशी असावे.खुप चांगले अनुभव येतात,हयामधील दोन वाटया हया एका अर्थाने जरी सासर-माहेर जोडणा-या असल्या तरी हया पोकळ वाटीत ती विवाहिता आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी साठवून इकडचे तिकडे न करता दोन्ही घरात आनंदाचे वातावरण निर्माण करते.(नाहीतर चुगलेगिरी करुन दोन्ही कुंटुबात कृलह निर्माण होतील.मानसिक स्थैर्य नाहीसे होऊन आजारांना आमंत्रण मिळेल)

    अशा कितीतरी गोष्टी दैनंदिन जिवनात पहावयास मिळतात.

    एका स्रिला जर अशी एखादी गोष्ट पटली तरच ती आपल्या कुटुंबातील माणसांना सुधारु शकते (दिनचर्या,ऋतुचर्या,परिचर्या...),कुटुंबातील सदस्यांनी बदल स्विकारले,आंगिकारले की समाज बदलायला काही वेळ लागत नाही आणि समाज बदलला की.....गाव बदलेल...देश बदलेल.....जग बदलेल.

    जे सुंदर शरीर आपल्याला परमेश्वरांने दिले आहे ते आणखीनच सुदृढ बनविण्याचा प्रयत्न माझ्या सर्वच सुंदर सख्यानी नको का करायला??

    अहो पहाताय काय असे?चला तर मग लागा कामाला.....प्रथम बदल घडवा आपल्या स्वःतःमध्ये....... नंतर आपल्या कुटुंबामध्ये ... समाजामध्ये........

    सौ.कल्पना हडकर.
    आपलीच प्रियसखी....

    आरोग्यदूत या WhatsApp ग्रुपच्या सौजन्याने

  • धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध बेल

    बेल! शिवाची प्रिय गोष्ट ज्याखेरीज शिवपुजा पुर्णच होत नाही.

    अगदी १००% भारतिय असलेला हा मध्यम आकाराचा काटेरी वृक्ष माहित नसलेली व्यक्ती अर्थातच विरळाच. संपुर्ण भारतभर आढळणारं हे मध्यम आकाराचं झाड त्याच्या धार्मिक आणि औषधी गुणधर्मासाठी प्रसिद्ध आहे. "बिल्वे शाण्डिल्यशैलूषौ मलूरश्रीफ़लावपि" अशी वर्णनं अमरकोशात या झाडाची केली आहेत. Rutaceae ह्या लिंबू कुळाचा सदस्य असलेलं हे झाड, वनस्पतीशास्त्रात Aegle marmelos असं नाव धारण करतं. यातल ’एइगल’ हे नाव एका पुरातन ग्रीक निसर्गदेवतेच्या नावावरुन तर ’मारमेलॉस’ हे युरोपातल्या ’क्विन्स’ नावाच्या फ़ळाशी असलेल्या सांम्यावरुन ठेवलं गेलय. आजही, स्वातंत्र्यानंतरही आपण परकियांनी दिलेली नाव वापरण्यातच धन्यता मानत असतो. ईंग्रजीत ' गोल्डन अँपल ' किंवा 'बेंगाल क्विन्स' सारखी रुक्ष नावे मिळालेल्या ह्या भारतिय वृक्षाला गंधफ़ल, सदाफ़ल, शैल, महाकपित्थ, ग्रंथिल, कण्टकी, बिल्वम, बेल अशा सुंदर संस्कृत नावांनी गौरवलं गेलय.

    बेलाचा वृक्ष पानझडी या सदरात गणला जातो. हा वृक्ष मध्यम आकाराचा असतो असं वरच्या ओळीतच मी लिहिलंय. साधारण १०-१२ मिटर उंची गाठणाऱ्या ह्या वृक्षाची पानं आपल्याला सुपरिचीत असतात. त्रिदल म्हणजेच तीन पर्णिकांची असलेली ही पानं हिरवीगार या सदरात मोडतात. जर नीट निरिक्षण केलं तर सहज दिसून येतं की या त्रिदलातली मधली पर्णिका कायम मोठी असते. या पानांचा देठही मोठा म्हणजे साधारण ४/५ सेमी असतो ज्यामुळे हे बेलपान त्याच्या अंगापासून लांब, एकाआड आलेली दिसतात. या बिल्वपत्रांना स्वत:चा एक खास सुगंध असतो जो त्यांना चुरडल्यावर सहज जाणवतो. या सुगंधाचे कारण म्हणजे या पानांवर सुगंधी तैलग्रंथींचे ठिपके असतात. हे ठिपके पान उजेडाकडे धरल्यास सहज दिसुन येतात. या पानांचे शिवपुजेत अनन्यसाधारण महत्व असल्याने वर्षभर यांना प्रचंड मागणी असते. मात्र धार्मिक उपयोगाखेरीज यां पानांचे आयुर्वेदिक उपयोग आहेतच. या पानांचा उपयोग सर्दीवरील काढा करण्यासाठी अजुनही केला जातो. तसेच ताज्या बेलपानांचा वापर लेप करून जखमांसाठीही करताना मी खेड्यांंमधे पाहिला आहे. साधारण हिवाळा संपत आला की या वृक्षाची पानं गळायला सुरुवात होते. अर्थात, वसंताच्या आगमनाबरोबरच येणारी नविन पालवी त्याच्या फ़ुलण्याची जणू नांदीच असते. साधारण एप्रिल मे च्या सुमारास बेलाला २ ते २.५ सेमी आकाराची हिरवट पांढरी सुवासिक फ़ुलं यायला सुरुवात होते. चार पाकळ्यांच हे फ़ुल अगदी मंद रंगाच असतं ज्यातून फ़लधारणा होवुन पुढे पावसाळ्यात बेलफ़ळं दिसायला लागतात.

    पावसाळ्यात बाळसं धरणारी ही बेलफ़ळं बेलाच्या पानापेक्षा जास्त औषधी महत्व बाळगतात. शिवमंदिरांसमोर विकायला ठेवलेली लहानमोठी बेलफ़ळं आपण पाहिलेली असतातच. कठीण सालीचे हे फ़ळ पिकलेल्या स्वरुपापेक्षा कच्चं असतानाच अधीक वापरले जाते. लांबट गोल आकाराची ही फ़ळं पिकायला मात्र पुढचा उन्हाळा यावा लागतो. ही फ़ळं आतून चिक्कट गोडसर असतात. याचा गर चक्क केशरी रंगाचा असतो नी भरपूर बियाळ असतो. बेल मुरंबा खाऊन अनेकांची लहानपणं समृद्ध झाली आहे हे नक्की. याच बेलफ़ळाच्या पिकलेल्या गराचे सरबत तर अगदी अमृततुल्य लागते. याचे अनेक औषधी उपयोग आयुर्वेदात लिहिलेले आहेत. पचनशक्ती सुधारण्यासाठी, पोटाचे आजार दूर व्हायला, मलावरोधावर रेचक, मधुमेहावर साखर कमी करण्यासाठी, काविळीसाठी, वात नाशनासाठी... एक न दोन. अनेकाविध उपयोग ह्या वृक्षाचे आहेत.

    अनेकांनी बेलाची पानं पाहिली असतात पण झाड पाहिले नसते. याचं खोड खडबडीत असतं नी साल करडट, पिवळसर रंगाची असते. या झाडाचे लाकूड पिवळट करडट रंगाचे असते. साधारण आपल्याला माहितच नसतं की बेलाचे लाकूड मजबूत समजले जाते. या लाकडाची गम्मत म्हणजे, कापल्यावरही काही काळ ते सुगंधीत रहातं.या लाकडाचा उपयोग बैलगाड्या, , हत्यारांच्या मुठी, शेतकामाची अवजारं बनवायलाही होतो. उत्तरेकडे, या लाकडाचा वापर कोरीव कामाच्या वस्तू बनवायला होतो. खास सांगायचं म्हणजे, या लाकडाचा लगद्याचा उपयोग आवरणाच्या कागदासाठी केला जातो. या झाडाचा डिंक चांगल्या दर्ज्याचा असून अगदी बाभळीच्या डिंकाइतका दर्जा त्यात असतो. रहाता राहीली याची मुळं! यांचाही वापर औषधांमध्ये केला जातो. प्रसिद्ध दशमुलारिष्टात याची मुळे वापरली जातात...

    आपल्या पुर्वजांना या औषधी वृक्षाचं महत्व कधीच कळलं होतं. म्हणुनच अथर्व वेदात याला जळणासाठी तोडू नये असे लिहिले आहे. आजही संथाल जमातीत या झाडाला देवता म्हणुन पुजण्यात येतं नी प्राणपणाने जपलं जातं. तास पाहायला गेलं तर बेलाबद्दल लिहावं तितक कमीच. मी आयुर्वेदाच्या द्रुष्टीने मला माहीत असलेल्याच गोष्टी इथे लिहिल्या असून या वृक्षाचे अनेक औषधी गुण मला माहित नाही. जाताजाता सांगायची गोष्ट म्हणजे, बेलाचे झाड सर्व प्रकारच्या जमिनीत लागते नी वाढते. ताज्या बियांपासून , मुळांच्या फ़ुटव्यातून नविन रोपं सहज बनतात. ह्यामुळेच शासनाने वनशेतीसाठी हे झाड पुरस्कृत करायला हल्ली सुरुवात केली आहे.

    हे लिखाण थांबवताना बेलाबद्दल सांगायचं वैशिष्ठय म्हणजे, बेल हा एकमेव वृक्ष आहे ज्यावर संस्कृत भाषेत अष्ट्क लिहिलं गेलय.

    -- सुषमा मोहिते
    ( आरोग्यदूत व्हॉट्सअॅप ग्रुपच्या सौजन्याने )

  • बाबू मोशायचा आनंद

    सेहचाळीस वर्षापूर्वी १२ मार्च १९७१ रोजी आनंद हा चित्रपट मुंबईत रिलीज झाला.

    एक संवादच संपूर्ण चित्रपटच आपल्यासमोर उभा करतो. याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे, ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘आनंद’.

    बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं… हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता… हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’

    राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    मा.ऋषिकेश मुखर्जी यांचा "आनंद' चित्रपट लोकप्रिय झाला, तो दुर्धर कर्करोगाशी झुंजणाऱ्या रुग्णाने, "आनंद' ने जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितल्यानेच! त्या चित्रपटात आनंदची भूमिका मा.राजेश खन्ना आणि डॉक्टरची भूमिका मा.अमिताभ बच्चन यांनी केली होती. क्षणाक्षणने मृत्यू आपल्याला गाठत असल्याचे माहिती असूनही, आनंद मात्र व्यथा, वेदनांची पर्वा न करता सहवासातल्या साऱ्यांच भरभरून आनंद वाटतो. कुणालाही आपला त्रास होवू नये, याची काळजी घेतो. शेवटच्या श्वासापर्यंत आनंद द्या आणि आनंदी जगा, हे या चित्रपटाच्या कथेचे सूत्र होते. या चित्रपटातील भावणारी गोष्ट म्हणजे मा.हृषिकेश मुखर्जी ह्यांनी दाखवलेलं साधसं घरगुती वातावरण; माणसासारखी साधी माणसं, चांगली माणसं, भावनिक मानसं आणि शेवटी सगळं ठाउक असूनही फक्त आपल्या माणसाच्या प्रेमापोटी अगतिक होत अतर्क्य गोष्टी करु पाहणारी माणसं हे सारं. हे सर्व वेगळच वातावरण. मा.हृषिकेश मुखर्जींचा हाच साधेपण मनाचा ठाव घेउन जातो. फार मोठा कॅनव्हास, अतिप्रचंड दे दणादण असं काही नाही. चित्रपटात "भावनिक" प्रसंग असले तरी कंटाळ्वाणा "मेलोड्रामाटिक" पिक्चर आपण ह्यास म्हणू शकत नाही. आनंद ची भूमिका मा.राजेश खन्ना यांनी ज्या पद्धतीनं सादर केली; तरी इतरही पात्रं अगदि व्यवस्थित लक्षात राहतात. म्हणजे ती लोकं येताहेत, नुसती दिलेले संवाद बोलताहेत असं होत नाही. अगदि पात्रं जिवंत होउन आल्यासारखी वाटतात. मा.ललिता पवार ह्या एकाच वेळी कडक शिस्तीच्या पण प्रेमळ नर्स आहेत. "ए मुरारीलाल" ह्या बाष्कळ हाकेला विनाकरण "ओ" देणारा गमत्या पण "माणूसपण" जाणणारा मा.जॉनी वॉकर आहेत. काहिसा व्यवहारी, थोडासा बनेल पण मित्रांची काळजी घेणारा डॉक्टर, डॉ. कुलकर्णी म्हणजेच मा.रमेश देव, त्यांची डॉक्टरची पत्नीही म्हणजेच मा.सीमा देव. रमेश देव यांचे मित्र हे तिचेही आप्त बनलेत.असा सारा मामला. बाबु मोशाय्,अजून एक भावनिक, जरा अव्यवहारी म्हणता यावा असा, मनाने सच्चा असा एक डॉक्टर, डॉ. बॅनर्जी आहे. मा.अमिताभ बच्चन त्याकाळातील नवोदित कलाकार होते. ही एक सर्वोत्कृष्ट कलाकृती, निर्मिती होती. 'हिंदी चित्रपटाचा सर्वोच्च बिंदू कोणता होता ?' असे कुणी विचारलं तर उत्तर 'आनंद' हे येऊ शकेल.
    या चित्रपटात भव्य दिव्य असे काहीच नाही. यातील गाणी तर लाजाब .

    "मैने तेरे लिये ही सात रंग के सपने चुने..."
    “ना जिया लागे ना...”
    "जिंदगी कैसी है पहेली हाये...कभी ये हसाये ....कभी ये रुलाये...."
    "कहीं दूर जब दिन ढल जाये..”

    चारही गाणी अप्रतिम
    या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट चित्रपट: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, फिल्मफेअरचा सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, एन.सी. सिप्पी, सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार: राजेश खन्ना, सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता पुरस्कार: अमिताभ बच्चन, सर्वोत्तम संवाद पुरस्कार: गुलझार, सर्वोत्तम संपादन पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी, सर्वोत्तम कथा पुरस्कार: हृषिकेश मुखर्जी.
    आनंद चित्रपट पूर्वी कधी पाहिला नसेल तर आता पहा. खरं तर पाहू नकाच. "अनुभवा" आनंद. सोबत लिंक दिली आहे.

    संजीव वेलणकर
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    आनंद पूर्ण चित्रपट

    https://www.youtube.com/shared?ci=GCgBGXC2yMU

    आनंद चित्रपटातील गाणी

    https://www.youtube.com/shared?ci=1XCWctSWt0Q

  • त्रयोदशगुणी विडा

    विडय़ातील प्रत्येक पदार्थ आपल्या शरीराला आवश्यक असतो.

    १. कात : अतिसार थांबवणे व कंठशुद्धी करणे.

    २. जायफळ : तोंडाची दुर्गंधी दूर करणे.

    ३. ओवा : पोटदुखी थांबणे.

    ४. सुपारी : दात बळकट होतात.

    ५. वेलदोडा : अन्नपचन सुधारते.

    ६. लवंग : दुर्गंधी व कफ कमी होते.

    ७. बडीशेप : वायुहारक, बुद्धिमत्तावर्धक.

    ८-९. सुके /ओले खोबरे : बुद्धिवर्धक, त्वचारोग टाळते व घाम येणे कमी होते.

    १०. ज्येष्ठमध : आवाज सुधारतो.

    ११. कापूर : जंतुनाशक.
    चुना : कफाचा नाश व उलटी थांबते.

    १२. केशर : सर्दी कमी होते.

    १३. नागवेलीची पाने : सुवासिक व दुर्गंधीनाशक.

    अशा या तेरा पदार्थानी व तेरा गुणांनी युक्त असा त्रयोदशगुणी विडा, बहुगुणी विडा सर्वानी अवश्य खावा, पण नीट चावून चावून खावा.
    आता पूर्वीप्रमाणे घरोघरी पानदान दिसत नाही. पण चौकाचौकात पानाचे ठेले दिसतात. तिथे तयार पाने मिळतात. त्यामुळे लोकांना पान, विडा व त्यातील पदार्थ माहितीच नाहीत.

    पूर्वीसारखी एकत्र कुटुंबे नाहीत त्यामुळे आजोबा नाहीत व त्यांचा खलबत्ता, पीकदाणी, चंची, अडकित्ते आणि ते शब्दही काळाबरोबर नाहीसे झाले.

    श्रीधर कुलकर्णी
    ज्ञानामृत मंच ग्रुप