वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
डिफेन्स पार्लमेंटरी समितीने सूचना केली आहे की जे सरकारी नोकरीत प्रवेश करतात त्यांच्या नोकरीच्या पहिले पाच वर्षे ही सैन्यात नोकरी करणे अनिवार्य केले जावे. यामुळे सैन्यदलात असलेली मनुष्यबळाची कमतरता पूर्ण होण्यास मदत होईल.
दत्त संप्रदायाची काशि म्हणुन गाणगापूर या तीर्थाचे महत्व सांगितले आहे. श्री नृसिहंसरस्वतीनी आपल्या ८० वर्षाचे कालखंडात १२ वर्षे क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वास्तव्य केले. औदुंबर क्षेत्र (भिल्लवडी) व पंचगंगा संगम नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ही दोन स्थाने म्हणजे नृसिहसरस्वतीची विशेष प्रीति असलेली ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभ व नृसिह सरस्वती दोघेही कृष्णानदीचे भक्त होते. साक्षात हरीतनु कृष्णा नदी म्हणजे विष्णु, शिव व ब्रह्माचे दृष्य स्वरूप आहे. ईश्वर अवताराचा हेतू एक गूढ गोष्ट आहे. अत्यंतप्रीय अशा कृष्णा नदीस सोडुन नृसिंहसरस्वती हे भीमा अमरजा संगमावर गाणगापूर या क्षेत्रावर वीस वर्षाचा कालखंड राहिले. अखेरीस निजानंद गमनास जाताना पुन्हा श्रीशैल्य कर्दळी वनात जाण्यासाठी कृष्णा तीरावर आले.
अत्यंत प्राचीन व पवित्र अशा गाणगापूर क्षेत्राचे महत्व वाढवावे या परिसरातील तीर्थाची शुध्दता करावी. त्याचे पावित्र्य वाढवावे. तसेच या भागातील भक्तांना मुक्ती द्यावी. त्यांची पीडा हरण करावी हा हेतू गाणगापूर क्षेत्री वास्तव्य करण्याचा होता. इतकेच नाही तर
नृसिंहसरस्वती नी भक्तांना वचन दिले आहे. आम्ही नित्य गाणगापुरी असणार आहोत. मठात आमचे वास्तव्य असेल. इष्ट भक्ताना आम्ही दर्शन देउन त्यांच्या कामना पूर्ण करु असा शब्द नृसिंह सरस्वती यानी दिला आहे.
दत्त संप्रदायात गाणगापूर क्षेत्र म्हणजे सर्वस्व आहे. नरसाबाची वाडी व गाणगापूर ही दोन स्थाने वारी सारखी आहेत दत्त भक्त नित्य दर्शनास या ठिकाणी येत असतात.
नृसिंहसरस्वतीनी विचार केला व अमरेश्वराचा (विश्वनाथाचा) निरोप घेवून गुप्त व्हावे असा निर्णय केला. त्या वेळी त्या ठिकाणी असलेल्या ६४ योगिनी प्रकट झाल्या. आम्हाला सोडून कुठे जाता असा प्रश्न त्यांनी केला. नृसिंहसरस्वतीनी त्यांची समजूत काढली व संगितले.
ऐसे स्थान मनोहरु | सहज असे कलपतरु ।
म्हणोनी सांगताती गुरु । चौसष्ट योगिनीसी । । ९४।।
गु.च. अ. १९
ऐसा निरोप देऊन । श्रीगुरु निघाले तेथून ।
जेथे होते गाणगाभुवन । भीमातीरी अनुपम्य । । ९५ ।।
गौप्य राहोनि औदुंबरी । प्रकटरुपे गाणगापुरी ।
राहिले गुरु प्रीतिकरी । प्रख्यात झाले परियेसा ।। ९६ ।।
सरस्वती गंगाधरानी नृसिहंसरस्वती यांचा गाणगापूरचा प्रवास अशा तऱ्हेने वर्णन केला आहे. गुरुरुपानी औदुंबरी असे म्हणत असताना नृसिंहवाडी येथील संगमावरील औदुंबर वृक्ष तसेच औदुंबराचे स्थान पण अभिप्रेत आहे.
नृसिंहसरस्वती प्रथम भीमा अमरजा संगमावर आले. अश्वत्थ वृक्षाजवळ राहिले गाणगापूरचा राजा होता त्यान त्यांना गावात येण्यास सांगितले व मठ बांधून दिला गाणगापूर हे अशाप्रकारे एक मोठे संस्थानच होते. ब्राह्मणाची अनेक घरे होती. नित्यकर्म उपासना होमहवन इत्यादी गोष्टी गाणगापुरात होत असत.
नृसिह सरस्वतीची किर्ति थोड्याच दिवसात पसरली. गाणगापूर मुक्कामी नृसिंह सरस्वती यानी अनेक चमत्कार केले. अनेकांची व्याधी दर केली. स्वत:ला गर्विष्ठ समजण्याऱ्या विप्रांचा त्यानी गर्व हरण करुन मुक्तता केली. भिक्षारनास अनुकुल असे क्षेत्र गाणगापूर होते.
गाणगापूर या क्षेत्राचे वर्णन प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती यानी केले आहे. एकदा नामधारक सिध्दाना विचारतो भूमीवर अनेक प्रख्यात तीर्थे असताना नृसिंहसरस्वती या गाणगापूर क्षेत्रात कां म्हणून राहिले. तेव्हा नृसिंह सरस्वती यानी सर्व भक्ताना दिपवाळीच्या पर्वकाळी त्रिस्थळीचे स्नान करण्यास सांगितले. असे म्हणुन गया, प्रयाग आणि वाराणसी या यात्रेस निघावे अशी आज्ञा केली.
नृसिंहसरस्वतीनी गाणगापूर परिसरातच सर्व तीर्थे आहेत असे सांगून गाणगापूर क्षेत्राची माहिती दिली. सर्व पवित्र तीर्थाचे महत्व सांगितले.
१) भीमा गमरजा संगम:
गाणगापुरातील भीमा व अमरजा या दोन नद्यांचा संगम आहे. या संगमात ठारकूल हे तीर्थ आहे. या ठिकाणी भीमानदी ही उत्तर वाहिनी आहे. भीमा अमरजा या दोन नद्या ह्मणजे गंगा व यमुनाच आहेत. या तीर्थाचे महत्व खूप आहे काशीपेक्षा या ठिकाणी स्नान केल्यास शतपटीने पुण्य प्राप्त होते. असे सांगून नृसिंहसरस्वतीनी अमरजा नदीचे आख्यान भक्तांना सांगितले.
जालंधर पुराणातील ही कथा आहे. जालंधर नावाच्या महापराक्रमी राक्षसाने समस्त पृथ्वी जिंकली. इंद्राचा पराभव करून सर्व देवताना पळवून लावले. देव दैत्या मध्ये घनघोर युध्द झाले. अनेक देवतांचा वध झाला इंद्र शिवाकडे गेला व सर्व वृतांत सांगितला. इंद्र म्हणाला आम्ही दैत्याना मारतो पण त्यांचे रक्त भूमीवर सांडत असताना प्रत्येक रक्त बिंदू मधून राक्षस निर्माण होतात. राक्षस सैन्य वाढतच जाते. तीन ही लोक सर्व राक्षसानी व्याप्त झाले आहेत.
इंद्राचे हे वचन ऐकून महादेव कृध्द झाले. दैत्यांचे निर्दाळन करण्या साठी स्वत: निघाले. इंद्र म्हणाला आपण सर्व दैत्य माराल पण मृत देवाना जीवन प्राप्त करून देण्याची व्यवस्था करावी. महादेव संतुष्ट झाले. अमृत वचन बोलून संजीवन उदकाने भरलेला एक घट इंद्राला दिला. इंद्राने ते उदक देवतांच्या वर शिंपडले. सर्व देवता जाग्या झाल्या. घरात अमृत शिल्लक होते. ते घेवून जात असताना अचानक भूमीवर पडले. अमृताच्या प्रभावाने भूमीवर एक नदी निर्माण झाली. त्या नदीचे नाव संजीवनी असे पडले. मृत्युपासून सुटका करण्याऱ्या या नदीचे नाव अमरजा असे पडले. यामुळे नृसिह सरस्वती म्हणाले या नदीत जे स्नान करतात त्यांना काळ मृत्यू अपमृत्यु होत नाही. स्नान करणारा शतायुषी होतो. त्यांची पातके नष्ट होतात. अशी ही अमृत नदी या संगम स्थानात भीमेशी मिळाली आहे. म्हणून हे तीर्थ प्रयाग तीर्था प्रमाणे आहे. कार्तिक व माघ महिना हा या स्नानास पर्वर्णी काळ आहे. ग्रहण सांगता सोमवती आमावास्या, पुण्य तिथी, एकादशी या वेळी या नदीत स्नान करणे अत्यंत पुण्यप्रद आहे.
२) मनोरथतीर्थ:
सगमाच्या पुढे अश्वत्य वृक्षाचे समोर मनोरथ म्हणून तीर्थ आहे. मनोरथ म्हणजे कामना पूर्ती करणारे असे हे तीर्थ आहे. कल्पवृक्ष समान या तीर्थाचे फल आहे. कारण अश्वत्थ हा कल्पवृक्ष या ठिकाणी आहे. गुरुचरित्रात अश्वत्य महिमा सविस्तर पणे आला आहे. या तीर्थात स्नान करणे हे कामना पूर्ती करणारे असे हे काम्यक तीर्थ मनोहर तीर्थ म्हणुन आहे. गाणगापुर क्षेत्राचा विशेष म्हणून हे तीर्थ आहे. नृसिहसरस्वती सदैव या ठिकाणी वास करून असतात. या तीर्थाची विशेष खूण म्हणजे गरुड तसेच गिधाडे ही या ठिकाण दृष्टीस पडतात.
३) संगमेश्वर:
कल्प वृक्षाची पूजा करून मनोहर तीर्थात स्नान करून संगमेश्वर या ठिकाणी शिवमंदिर आहे. नंदीला नमस्कार करून या शिवाला प्रदक्षिणा करावी. शैल्य पर्वतावरील मल्लीकार्जुन समजून याची अर्चना करावी. त्या योगे इंद्रपदाची प्राप्ती होते. असे महत्व या शिवालयाचे आहे.
४) वाराणसी तीर्थ:
संगमेश्वर पूजा करून १/२ कोस अंतरावर नागेशी म्हणुन एक गाव आहे. या ठिकाणी वाराणसी हे तीर्थ आहे. नृसिंह सरस्वतीनी या संदर्भात एक प्राचीन आख्यान सांगितले.
पूर्वी भारद्वाज गोत्राचा एक ब्राह्मण होता. विरक्त असुन नित्य शिवोपासना करीत होता. सर्व संग त्याग करून देहाची पर्वा न करीता तो हिंडत असे. शिवानी त्याला प्रत्यक्ष दर्शन दिले होते. त्या विप्रास लोक वेडा समजत कारण त्याचे वागणे सामान्य लोका प्रमाणे नव्हते. त्याला दोन भावंडे होती एकाचे नाव ईश्वर तर दुसऱ्याचे नाव पांडुरंगेश्वर असे होते. ते आपल्या या वेडसर भावाला विचारित नसत.
एकदां दोघे काशीला जाण्यास निघाले. त्यानी या वेडसर बंधूला येतोस का म्हणून विचारले. ब्रह्मज्ञानी असा तो वेडसर म्हणाला तुम्ही काशीला जावूं नका विश्वेश्वर माझ्या जवळच आहे. चला मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवितो. असे म्हणून विप्राने स्नान केले.
विश्वेश्वर प्रसन्न झाला. तेव्हां तो विप्र म्हणाला आम्हास आपले नित्य दर्शन व्हावे. इश्वर प्रसन्न झाला. प्रत्यक्ष काशीक्षेत्र प्रकट झाले. मनकर्णिका कुंड तयार झाले. त्यातून विश्वेश्वराची मूर्ती प्रकट झाली. या ठिकाणी भीमा उत्तरवाहिनी आहे. बाण या स्वरूपात शिवलिंग प्रकट झाले. कुंडातून भागिरथी प्रकट झाली. ज्या प्रकारे काशी विश्वेश्वराची लक्षणे वाराणसी मध्ये आहेत, त्या प्रकारे लक्षणे प्रकट झाली. भीमा नदीचा व मनिकर्णिका कुंडातून प्रकट गंगेचा संगम झाला. दोनही बंधूना आपल्या बंधूची महती व समजली . ते त्याला ज्ञानी समजू लागले. तो म्हणाला आता काशीला कां जात आहात. सर्वानी काशी म्हणून या ठिकाणी अर्चना करावी. असे प्रत्यक्ष शिवानी मला सांगितले आहे. मला भ्रांत म्हणा किंवा गोसावी म्हणा. असे म्हणून त्या विप्राने बंधूना पंढरपुरास जाण्यास सांगितले. पुंडलिकाची आराधना करावी असे सांगितले. त्यांचे आराध्ये असे उपनाव झाले. प्रतिवर्षी काशीला न जाता येथेच यावे असे सांगितले.
नृसिंहसरस्वती म्हणतात असे हे काशीतीर्थ तया वाराणसीतीर्थ आहे. तुम्ही कोणताही संशय न धरता या ठिकाणी स्नान करा व मुक्त व्हा.
५) पापविनाशिनितीर्थ:
गाणगापूर क्षेत्रातील हे महान तीर्थ आहे. नावा प्रमाणे या तीर्थात स्नान केले असताना पाप विनाश होतो. नृसिंह सरस्वतीची बहीण रानाईस त्यानी या तीर्थात स्नान करण्यास सांगितले. तिचे कुष्ठ दूर झाले. वैडुर्य (बिदर) नगराचा यवन राजाला पण या तीर्थावर येण्यास नृसिंहसरस्वतीनी सांगितले होते. त्याच्या स्फोटकाची निवृत्ती झाली. तो पुण्य प्रद होवून मुक्त झाला.
रत्नाईचे कुष्ठ निवारण सर्वाना प्रत्यक्ष पाहिले असे हे पाप विनाशिनी तीर्थ गाणगापूर क्षेत्राचे महत्वाचे तीर्थ आहे.
६) कोटीतीर्थ:
जंबूद्वीपी जितकी तीर्थे । एकेक महिमा अपरितितो । तितुकिया वारु कोटीतीर्थे । विस्तार असे सांगता ।। ८७ ।। गु.च. अ. ४८
कोटी तीर्थाचे असे अपार महत्व आहे. पर्वकाळी स्नान करावे. दानादी कार्य करावे असे महत्व या तीर्थाचे आहे. कोटीगुणानी दान फळ प्राप्त होते. असे हे कोटी तीर्थ.
७) रुद्रपादतीर्थ:
कोटी तीर्थापुढे असलेले हे रुद्रपाद तीर्थ आहे. गयातीर्थाचे महत्व चा ठिकाणी आहे. वेणीदान, पितृकर्म आदी गया तीर्थाचे विधिया ठिकाणी केल्यास कोटी गुणाने लाभ होतो व कोटी जन्माचे पाप नष्ट होते. इतके महत्वाचे हे तीर्थ आह.
८) चक्रतीर्थ:
हे चक्र तीर्थ आतिविशेष आहे. या तीर्था जवळ केशवाचे सांनिध्य आहे. या ठिकाणी स्नान केल्याने ज्ञान वृध्दी होते. अस्थि विसर्जन केल्या असतां त्या चक्रांकित होतात. मृताला मोक्ष प्राप्त होतो. द्वारकेच्या गोमती नदी मध्ये अस्थी चक्रांकीत होतात. त्या पेक्षा चौपट गुणानी युक्त असे हे तीर्थ आहे. नृसिंहसरस्वतीनी सर्वाना या तीर्थात स्नान करण्यास सांगितले.
९) मन्मथतीर्थ: -
गाणगापूर क्षेत्राच्या पूर्व भागात कल्लेश्वर म्हणून महादेवाचे स्थान आहे. याचे महात्म्य गोकर्ण महाबळेश्वर या क्षेत्र इतके आहे. मन्मथ तीर्थावर स्नान करून कल्लेश्वराचे दर्शन घ्यावे. त्याची पूजा करावी. प्रजा वृध्दी व अष्ट ऐश्वर्याची प्राप्ती भक्ताला प्राप्त होते. असे हे पुण्यप्रद तीर्थ आहे. श्रावण महीन्यात अभिषेक करावा कार्तिक महिन्यात दीपाराधना करावी अनंत पुण्य प्राप्त होईल अशा प्रकारे संगम व अष्टतीर्थाचे माहात्म्य प्रत्यक्ष नृसिंहसरस्वती, दत्तात्रेय यानी सांगितले आहे. गाणगापूर क्षेत्र हे अशाप्रकारे एक पवित्र स्थान आहे.
गाणगापुरातील मठ तर पवित्राहुन पवित्र स्थान आहे. या ठिकाणी नृसिहसरस्वती २० वर्षाचा प्रदीर्घ काळ वास्तव्य करुन होते. त्यांच्या निर्गुण पादुका या मठा मध्ये आहेत. सरस्वती गंगाधर म्हणतात.
कल्पवृक्षाने पूजोन। यावे आमुचे जेथे स्थान ।
पादुका ठेवितो निर्गुण । पूजा करावी
मनोभावे ।। २९ ।। गु.च. अ. ५१
प्रात: स्नान कृष्णातीरी। पंचनदीसंगम औदुबरी।
अनुष्ठान बरवे त्याक्षेत्री। माध्यानी येतो
भीमातीरी ।।१६ ।। गु.च. अ ५१
नृसिंहसरस्वती निजानंदास जाते वेळी त्यानी सर्वाना सांगितले, आम्ही नित्य मठात वास करून आहोत. दुपारी भीमातटी भिक्षेसाठी नृसिहसरस्वती येत असतात. म्हणुन गाणगापूरला भिक्षेचे अत्यंत महत्व आहे. सर्व भक्त भिक्षा करीत असतात.
आत्मलिंग शाळिग्राम जपमाळा सर्व साधने आजही गाणगापूरला नृसिंहसरस्वतीच्या रूपात मठात ठेवल्या आहेत. निर्गुण पादूका प्रत्यक्ष दत्तचरण आहेत. खरेतर गाणगापूर हे तीर्थ दत्तचरणा साठी प्रख्यात आहे.
संपूर्ण वर्षभर अनेक उत्सव होत असतात. अन्नदान धर्मिक कार्ये, नित्य आरत्या पालखी व इतर कार्यक्रम या तीर्थावर होत असतात.
गाणगापूर या तीर्थाचे आणखी एक विशेष म्हणजे पिशाच्य बाधा, मनारुग्ण, समंध पीडा या परिसरात दत्तात्रेयाच्या संनिध्यामुळे या ठिकाणी अशा शक्ती येत नाहीत पितृदोष, पिशाच दोष याचे निराकरण या ठिकाणी होते. बाराही महिने निरनिराळे उत्सव होत असल्याने गाणगापूर हे क्षेत्र नित्यदर्शन करण्यासाठी प्रसिध्द आहे. पर्व काळ विशेष समारंभ या वेळी विशेष फल असते. तरी केव्हांही गाणगापुरला गेले तरी नित्यमंगल असे हे क्षेत्र आहे. संगमावर नित्य गुरुचरित्र पारायणा साठी दत्तभक्त येत असतात. अश्वत्थ वृक्षा खाली ते पारायण करतात.
गाणगापूरात संगमाजवळ एक टेकडी आहे. भस्माचा डोंगर म्हणून ती प्रसिध्द आहे. भगवान परशुरामाने या ठिकाणी अनेक यज्ञ केले त्या यज्ञभस्माचा हा पर्वत आहे असे सांगितले जाते. गाणगापूरचा प्रसाद म्हणून हे भस्म लोक बरोबर नेत असतात. प्राचीन काळा पासून अनेक विभूतीनी भीमा अमरजा संगमावर तपसाधना केली आहे. म्हणून गाणगापूर हे क्षेत्र तपोभूमी म्हणून पण प्रख्यात आहे. तपोभूमी दत्तभूमी पुण्यभूमी अशी ही भूमी म्हणजेच गाणगापूर क्षेत्र किंवा गंधर्वपूर क्षेत्र हे प्रसिध्द आहे.
एका कानडी आरती मध्ये भीमानदी व गंधर्वपूर याचा उल्लेख आला आहे.
भक्तजनर कल्पवृक्षागे मंगल ।
भक्तिदुं भजिसुव मोक्षागे मंगल ।
भीमा गंधर्वपूर वासगे मंगल ।
भीमा शंकर गुरुवेषागे मंगल ।
स्वामी नृसिह सरस्वतीगे,
गुरु मूर्तिगे यतिवर्यागे मंगल ।
कामीत कामफल तृप्तिगे मंगल ।
श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या चरित्रात गाणगापूर क्षेत्र, गंधर्वपूर या विषयी जी माहिती आली आहे ती पाहण्याचा प्रयत्न करू या.
पीठिकापुरात म्हणजे पीठापूर क्षेत्रांत त्रेता युगात सवितृकाठक चयन यज्ञ (होम) भारद्वाज महर्षीनी केला होता. तेव्हा त्या यज्ञाचे भस्म हे पर्वता सारखे जमून बसले. काही काळाने ते भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. राम अवतारात मारूती द्रोणागीरी पर्वत घेवून जात असताना त्याचा काही भाग गंधर्व पुरात म्हणजे गाणगापूर क्षेत्रात पडला. गाणगापुरातील भस्माच्या टेकडीचा जो उल्लेख आहे त्याचा संदर्भ श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रात अशा प्रकारे आला आहे. भीमा अमरजा संगमाचा उल्लेख जालंदर पुराणात गंधर्वपूर असाच आहे. गंधर्वाचा वास हा हिमालय, कैलास मानस या परिसरात वर्णन केला आहे. रावणाचा भाऊ कुबेर हा कैलास मानस परिसरातच वास्तव्याला आहे पूर्वी हा गंधर्वराज दाक्षिण पंथावर श्री लंके मध्ये होता. रावणाने त्याला पिटाळून लावले. या प्राचीन इतिहासाचा मागोवा घेतला तर काही गंधर्व राजे या तपस्थली मध्ये राहिले व त्या मुळे त्यास गंधर्वपूर असे नाव पडले असे अनुमान काढता येते. अन्यथा गाणगापुर व गंधर्वपूर याचा संदर्भ लागत नाही. पण प्राचीन काळात भरत वर्षामध्ये गंधर्व, सिध्द, साध्य, पण इत्यादी विभूतीचा संचार होता. दत्तात्रेय यांच्या अवताराचा विशेष म्हणजे सर्व प्रकारच्या सिध्द, साध्य, योगी याना दत्तात्रेयानी मार्ग दर्शन केले आहे. दक्षिण पथावरील कर्नाटक राज्यातील हे गंधर्व पूर गाणगापूर क्षेत्र म्हणूनच प्रसिध्द आहे. दत्त संप्रदायाचे प्रमुख असे हे तीर्थ क्षेत्र आहे.
गाणगापूर क्षेत्राच्या संदर्भात विशेष गोष्ट म्हणजे नृसिहसरस्वतीना वासर ब्रह्मेश्वर येथे सायंदेव भेटले होते. नृसिंह सरस्वतीचे ते निजि शिष्य होते. निजानंदगमनाच्या वेळी जी चार प्रसाद पुष्पे पाठविली होती त्या पैकी एक पुष्प सायंदेवाना मिळाले. होते. हे सायंदेव कडगंचीला रहात होते. नृसिंहसरस्वतीनी त्याना १५ वर्षांनी गाणगापुरला भेट सांगितले. त्या प्रमाणे सायंदेव गाणगापुरला म्हणून आले. त्यांच्या कुटूंबावर नृसिंहसरस्वतींची कृपा झाली. त्यांच्या वंशात सरस्वती गंगाधर यांचा जन्म झाला. ज्यानी गुरुचरित्र या ग्रंथाची रचना केली. ते सायंदेव गाणगापूरच्या क्षेत्रातच नृसिंहसरस्वतीच्या सहवासात राहिले. कानडी भाषेत त्यानी रचना केली गाण्गापुरात कानडी भक्तांचा वावर असला तरी महाराष्ट्रातून अनेक भक्त गाणगापुरला जात असतात. अशाप्रकारे कर्नाटक व महाराष्ट्र या दोन राज्यातील दत्त भक्तांना गाणगापूर हे अत्यांत जवळचे व महत्वाचे तीर्थ आहे. कृष्णाकाठ सोडून २० वर्षे गाणगापुरास राहण्याचा श्री नृसिंहसरस्वती यांचा मानस या दोन भाषिक संस्कृतीला एकत्र करण्याचा होता. असे म्हटले तरी चुकीचे होणार नाही. सर्व समावेशक व समन्वय हाच हेतू या अवताराचा होता.
–श्री गणेश हरी कुलकर्णी
साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ३ रे, अंक ८ वा, (अंक ३२)
माझं काही कामानिमित्त फोर्ट-चर्चगेट परिसरात जाणं होतं..हा परिसरच मुळी माझ्यावर गारूड करतो..सीएसटी पासून रमत गमत चालत निघायचं, ते सरळ काळ्या घोड्यापर्यंत.
स्त्रीत्व डोक्यावर घेतलेल्या पदरावर आणि हातभर बाह्या आणि कपाळभर कुंकवावर सुद्धा अवलंबून आहे. हेच स्त्रीत्व आहे, असं कुठं म्हटलंय ?
स्त्रीचा पोशाखावरून ती सुसंस्कृत आहे की नाही कसं ओळखणार ? हे खूपच लांबच सांगितलय,
बाह्य गोष्टीमधून लक्षात येणारं स्त्रीत्व हे लक्षात येईनासं झालंय. आणि हेच पीसीओडीचं कारण आहे, हे मला सुचवायचं होतं. कसं ते आता सविस्तर पाहू.
भारतीय आचार विचार आणि पीसीओडी हा विषय आणि आयडीयल वूमनहूड हे दोन स्वतंत्र विषय आहेत.
पाॅलीसिस्टीक ओव्हेरीयन डिसीज असं नाव धारण करणाऱ्या रोगाचे मूळ स्त्रीत्व नष्ट होत जाण्यामधे आहे. दरमहा जे डिंब तयार होऊन बाहेर पडते, ते बाहेर न पडता, बीजांडामधेच रहाते, म्हणजे पीसीओडी असं वरवर भासते. त्याचे मूळ कारण मात्र बदलत चाललेल्या जीवनशैलीमधे आहेत. त्याच्या काही कारणांचा अभ्यास केला तर, सुखाचा अतिरेक, कफ वाढविणारा आहार, बैठे काम, वाकण्याची सर्व कामे बंद होणे, जेवणाच्या अनियमित वेळा, आणि मुख्य म्हणजे आपण स्त्री आहोत हेच विसरून जाणे.अशी सर्वसाधारण कारणे लक्षात येतात.
याची लक्षणे कोणती ?
दरमहा मासिक पाळी न येणे, जाडी वाढणे, घाम खूप येणे, दाढी मिश्यांच्या ठिकाणी केस येणे, आवाज घोगरा होत जाणे, प्रवृत्ती पुरूषी होत जाणे, स्त्रीयांचे वैशिष्ट्य मानलेल्या, स्त्रीयांच्या मुलभुत गुणात असलेला नाजूकपणा कमी होत जाणे, बोलण्या चालण्यात, हावभावात पुरूषांप्रमाणे आक्रमकपणा येणे, ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत.
यावरून काय लक्षात येते ?
स्त्रीत्व संपत जाणे, म्हणजेच पीसीओडी.
रोग होण्याची तीन प्रमुख कारणे सांगितलेली आहेत. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक. हे आधी लक्षात ठेवले पाहिजे.
दरमहा येणारी मासिक पाळी ही जिला कटकट वाटते, तिला पीसीओडी हा आजार लवकर होतो, भरीत भर म्हणून ती दरमहा येणाऱ्या रजःस्रावाला " प्राॅब्लेम " असे संबोधते. याचा अर्थ कटकट. दरमहा रजःप्रवृत्ती यायलाच हवी अशी भावना तयार झाल्याशिवाय मन, इंद्रिये, विषय, शरीर, अभिव्यक्ती ही साखळी पूर्ण होतच नाही. जर ती "कटकट" या अर्थी डोक्यात गेली असेल तर तिची अभिव्यक्ती कशी होणार ? आणि का व्हावी ?
मुळात हा आजार भारतीय नाही, तर पाश्चात्य विचारसरणीची देणगी आहे, असे मी म्हटले तर माझे काय चुकले ?
भारतीय असा शब्द वापरण्याचे कारण म्हणजे हा आजार भगिनींना केव्हापासून सुरू झाला तर जेव्हा नैसर्गिक मासिक चक्राचा विचार पाश्चात्य पद्धतीने होऊ लागला, तेव्हापासून ना !
भारतीय विचारानुसार याला 'मासिक धर्म' असे संबोधले आहे. केवळ भारतीय धर्मशास्त्रातच नव्हे तर आयुर्वेदात देखील यावेळी शरीरातील टाकावू द्रव्ये बाहेर टाकली जातात. जो आर्तव गर्भधारणा न झाल्याने रज स्वरूप बनला आहे, त्याला शरीरातून बाहेर टाकणे ही अत्यंत नैसर्गिक प्रक्रिया आहे. केवळ गर्भाशयातूनच नव्हे तर घामातूनही ही शुद्धी होत असते. तिचा स्पर्श, घाम, श्वास इ. मधून मलाचे निष्क्रमण होत असते, म्हणून तिने अन्नपदार्थांना स्पर्शू नये असे सांगितले आहे. एवढेच नव्हे तर अशोकासारख्या औषधी झाडांना देखील तिने त्या चार दिवसात स्पर्शही करू नये. असे सांगितलेले आहे. हे काही स्त्रीला कमी लेखण्यासाठी नव्हे तर तिला सक्तीची विश्रांती देण्यासाठी होते, हे लक्षातच घेतले जात नाहीये.
यावेळी तिची शारीरिक आणि मानसिक अवस्था अत्यंत कोमल असते. तिला विश्रांतीची अत्यंत गरज असते. म्हणून तिला "अस्पर्शा" (अस्पृश्य नाही.) सांगितले आहे. हा तिचा सन्मानच आहे. अन्य कोणत्याही देशात अशी विश्रांती स्त्रीला या चार दिवसात देण्यात येत नाही. हा आहे स्त्रीयांकडे आणि तीच्या दरमहा होणाऱ्या शुद्धीकडे पाहाण्याचा शुद्ध भारतीय दृष्टीकोन.
यात काय विकृत मानसिकता दिसते कळतच नाही ?
पाश्चात्य बुद्धीच्या विचारवंतांनी जेव्हा स्त्री पुरूष समानतेचे खुळ डोक्यात भरवले, तेव्हापासून मासिक पाळीकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलला आणि तिटकारा सुरू झाला.
स्त्रीयांनी घराबाहेर पडूच नये, वगैरे वादात मी जातच नाहीये.
स्त्री पुरूष कर्तृत्वाने समानच आहेत, यात कोणालाही शंका नाही.
माझ्यावर स्त्रीत्व लादून, त्या पुरूष देवानेही अन्यायच केला आहे, ( इथे सोयीस्कररीत्या देव आठवतात. एरवी देव म्हणजे अंधश्रद्धा किंवा भोंदुगिरी वाटते, काहीजणांना.) असे म्हणून कसे चालेल ? स्त्रीला पुनर्निर्माण यंत्रणा म्हणजे अख्खं मातृत्व बहाल केलंय, सहनशक्ती दिलीय, हे मातृत्वच धोक्यात येतंय हे लक्षात आणून देण्याचा मी प्रयत्न करतोय. बाकी काही नाही.
पाश्चात्य विचार हा भोगवादी आहे.
पैसे मिळवण्यासाठी स्त्री शरीराचा वापर कोणी सुरू केला ? दाढीच्या जाहिराती मधेदेखील सुंदर ललना दिसू लागल्या. इथे त्यांना सोयीस्कररीत्या स्त्री पुरूष समानता हवी. फक्त नवऱ्याने मिळवलेल्या मिळकतीवर हौस मौज करता येणार नाही, त्यासाठी घरात येणारा पैसा वाढला पाहिजे. पैसे जास्ती मिळतील, तर आणखीन चार सुखाच्या गोष्टीची खरेदी करता येईल, म्हणून घरातील (लक्ष्मी स्वरूप मानलेल्या ) स्त्रीयांनी दुसऱ्यांच्या दारात जाऊन चाकरी करून मिंधेपणा स्विकारण्यात धन्यता मानली. ???
ही काय भारतीय मानसिकता आहे ?
त्याही पुढे जाऊन त्या विशिष्ट दिवसात, हव्या तश्या उड्या मारायच्या, हवे तसे डोंगर चढायचे, सायकली चालवायच्या, टेनिस, बॅडमिंटन, खेळायचे, अशा जाहिरातीतून दाखवली जाणारी स्त्री चालते ? आरोग्याचा विचार करून पहा, हा त्या दिवसात स्त्रीयांवर होत असलेला अत्याचार नाही का ?
हा काय भारतीय विचार आहे ?
स्त्रीत्वाचा पराकोटीचा तिटकारा जेव्हा मनात घर करतो, तेव्हा मनामधे दोष उत्पन्न होतो. वाताचा प्रकोप होतो आणि अवरोध निर्माण होतो.
आयुर्वेदीय भाषेत पीसीओडीची संप्राप्ती वर्णन करायची झाल्यास, चुकीच्या जीवनशैलीमुळे तीनही दोष बिघडतात. कफ आणि वात वाढतो आणि पित्त कमी होते. विकृत कफ दोषामुळे, आम निर्माण आणि अग्निदुष्टी, पित्त क्षय, निरंतर हेतु सेवनाने अपान वायुची दुष्टी, आणि बदललेली मानसिकता यामुळे आणि व्याधी स्वभावामुळे दोष गर्भाशयात संचित होतात. बीजांडामध्ये स्थानसंश्रय करतात. अवरोध निर्माण होतो. अवरोधाने पुनः वातप्रकोप होतो.
या अवरोधामुळे तयार बीज पुढे सरकतच नाही.
एका बाजूने हेतु सेवन सुरू राहिले तर केलेल्या पंचकर्माचा आणि इतर शमन शोधनाचा तसा काहीही परिणाम होत नाही. आणि व्याधी दुष्चिकित्स्य बनतो. झाला तरी तात्पुरता होतो, पुनः ये रे माझ्या मागल्या !
चिकित्सा करताना "हेतुसेवन बंद करणे" ही पहिली लाईन ऑफ ट्रीटमेंट रहाते. या व्याधीतील वर वर्णन केलेल्या अनेक हेतुंमधील एक हेतु, जो मला जास्ती महत्त्वाचा वाटतो तो आहे, विचार बदलवणे.!
"मला दरमहा मासिक पाळी आलीच पाहिजे. त्याने माझी शरीर शुद्धी होत आहे. जे माझ्या स्त्रीत्वाचे वैशिष्ट्य आहे, ते स्त्रीत्व मी जागृत करीत आहे" असा सकारात्मक विचार अंतर्मनात पक्का झाल्याशिवाय, बाहेरून केवळ हार्मोन्स बदलवणारी औषधे घेत रहाणे, हा वरवरचा तात्पुरता उपाय आहे. त्यात मेटफाॅरमिन सारखी मधुमेहावरील औषधे कायम स्वरूपात घेणे, हे किती धोकादायक आहे ? आहे का मान्य हे ?
रोगाच्या मुळापर्यंत जाऊन विचार केला तर कळेल, स्त्रीत्व जागृत करणं किती महत्त्वाचे आहे ते !
स्त्रीत्व जागृत करण्यासाठीच, हातात काचेच्या बांगड्या घालणं, पायात वाजणारे पैंजण घालणे आणि डोक्याला ठसठशीत कुंकु लावणे असा उपाय मी चिकित्सा स्वरूप सुचवतो, यापेक्षा काही ( रूग्णाच्या भाषेत जालीम ) उपाय असल्यास जरूर सांगावा. नक्कीच उपयोगी होईल.
कुंकु लावल्याने काय एनर्जी मिळते हे अनुभवल्याशिवाय कळणार नाही. हे फक्त स्त्रीयांनीच लावायचे असं नाही, स्त्री पुरूष दोघांनीही लावायचे आहे. आमचे विचारच पाश्चात्य होत असल्यामुळे आम्हाला त्याचे महत्त्वच कळेनासे झाले आहे.
हातात काचेच्या बांगड्या घालण्यात कमीपणा कसला ? पण नाजुकपणा नक्कीच येईल. काम करताना, थोडं सांभाळून काम करावं लागेल, बांगडी फुटुन हाताला लागण्याचा धोका असल्यामुळे रागावर संयम येईल, मनावर संयम येईल. मग पुरूषांनी पण हातात बांगड्या का घालू नयेत असाही प्रश्न येईल. पण एक लक्षात ठेवूया. पुरूषी हात नाजुक कामासाठी नाहीतच. ते राकट आहेत.
पायात वाजणारे पैंजण घातल्याने पण तेच होईल, पाय हलला तरी त्यात नाजुकपणा असेल, माझी चाल स्त्रीचीच असली पाहिजे अशी भावना सतत मनात जागृत रहायला हवी, हे महत्त्वाचे !
पुनः एकदा सांगतो, इथे कुठेही स्त्रीला कमी लेखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तिला तर माता, लक्ष्मी, शक्ती रूपात आपण पहातोय !
पण आज आम्ही कशाही वागू, स्वच्छंद जगू, पुरूषी दास्य आम्ही मानत नाही, आम्ही कसेही कपडे घालू, पुरूषांनी आपली दृष्टी बदलणे गरजेचे आणि आवश्यक आहे, हा जो सूर स्त्री मुक्तीवाल्यांचा दिसतो, तो भारतीय नाही.
मुळात स्त्रीला एका रथाची दोन चाके मानणारी आपली संस्कृती, रमन्ते तत्र देवता हे मानाचे सर्वोच्च पद बहाल करणारी आपली संस्कृती,
कुमारी अवस्थेपासून, तारूण्य आणि वृद्धावस्थेपर्यंत पुरूषांनीच तिचे रक्षण केले पाहिजे असे ( खरंतर पुरूषांवर अधिक जबाबदारी ) सांगणारी आपली संस्कृती.
तिचा अनादर होईल असा विचारही आपण कधी करत नाही. स्त्रीकडे वासनामय दृष्टीने पहावे, असं कोणत्या भारतीय धर्म ग्रंथात लिहिलंय सांगा बरं. अगदी मनुस्मृतीमधे देखील स्त्रीयांकडे बघण्याचा दृष्टीकोन अत्यंत पवित्र आहे. (जी मंडळी मनुस्मृतीवर टीका करतात, त्यांनी ती मुळातून वाचलेलीच नसते. कोणत्या तरी श्लोकांची तोडफोड करून आपल्याला हवे असतील तसे सोयीस्कर अर्थ काढून विकृतरीत्या सांगितले गेल्यामुळे आम्हाला आमच्याच ग्रंथाचे मूळ अर्थ समजलेले नाहीत.
मनुस्मृतीचा पूर्वग्रहदूषित न ठेवता अभ्यास करायचा असेल तर स्वामी वरदानंद भारती, ( पूर्वाश्रमीचे वैद्य अनंत दामोदर आठवले ) यांनी मनुस्मृतीवर लिहिलेली टीका, जी राधादामोदर प्रतिष्ठानने प्रकाशित केलेली आहे, ती जरूर वाचावी.)
कुंकु, बांगड्या, पैंजण हे सर्व केल्याने काय होईल ?
आपण भारतीय पद्धतीने विचार करायला सुरवात करू.
आरशात पाहिले तरी, हात हलला तरी, पाय हलवला तरी लगेच लक्षात येईल, की मी स्त्री आहे, मासिक पाळी नियमितपणे होण्यासाठी मला चिकित्सा म्हणून हा उपाय सांगितला आहे. ही मानसिकता जेव्हा लक्षात येईल तेव्हाच कायमस्वरूपी रोग जाईल. रोगाच्या या मानसिक हेतुकडे दुर्लक्ष करून कसे चालेल बरे ?
भारतीयत्वापासून आपण लांब गेल्याने, असे गैरसमज वाढत चालले आहेत, या महिलादिनाच्या निमित्ताने ही माहिती आपल्यापर्यंत पोचवता आली.
ज्यांना समजून घ्यायचं आहे, त्यांनी घ्यावं, सोडून द्यायचंय त्यांनी सोडून द्यावं.
जय नारी शक्ती !
जय भारतीय विचार !!
जय आयुर्वेद !!!
वैद्य सुविनय दामले, कुडाळ सिंधुदुर्ग.
वांगी खावीत तर कृष्णाकाठचीच. आणि अस्सल नारळाच्या रसातील सोलकढी प्यावी तर कोकणातीलच. हीच वैशिष्ट्ये. हे वेगळेपण. हीच परंपरा. हाच प्रदेशविचार.
श्रीदत्तगुरू या भाविकांच्या आवडत्या दैवताची परंपराही मोठी आणि लोकप्रिय आहे. त्यातून सिद्ध झालेले वेगवेगळे पंथ तसंच संतांचा या लेखात सविस्तर आढावा घेण्यात आला आहे.
श्रीदत्त अवताराचा आणि श्रीदत्तात्रेय देवतेचा उद्भव, उगम आणि प्रवास अद्भुत आहे. पहिल्या स्वायंभुव मनूपासून श्रीदत्तात्रेयांचा आविर्भावकाल असून इसवी सनापूर्वी हजारो वर्षांपासून श्रीदत्त अवताराचे चिरंतन अस्तित्व आहे असे मानले जाते. या कालावधीमध्ये श्रीदत्त संप्रदायामध्ये अनेक पंथ आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. त्यांना श्रीदत्त संप्रदायाचे उपसंप्रदाय असेही म्हणता येईल. यातील सर्व परंपरांमध्ये श्रीदत्तात्रेय हे मुख्य दैवत, उपास्य दैवत, सद्गुरुरूप, सिद्धिदाता, अष्टांग योग मार्गदर्शक आहेत.
श्रीदत्तात्रेय अवतार हा उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्ही स्थितींचा निर्देशक आहे. तसेच तो त्रिगुणात्मक म्हणजे सत्त्व, रज आणि तम या तिन्ही गुणांनी युक्त आहे. म्हणूनच ‘त्रिगुणात्मक त्रिमूर्ती श्रीदत्त’ असे म्हटलेले आहे.
निर्गुण आणि निराकार अशा ब्रह्म तत्त्वाची अनुभूती जो करून देतो तो गुरू. अशा गुरूचांही जो गुरू तो श्रीदत्त गुरू. संपूर्ण विश्वाचे गुरूपद श्रीदत्तात्रेयांना बहाल केले गेले आहे. गुरू हा कैवल्याची मूर्ती, मूर्तिमंत ज्ञान आणि सच्चिदानंद रूप असतो. श्रीदत्त संप्रदायामध्ये त्यागाला सर्वोच्च प्राधान्य आहे. सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचे निर्दालन, धर्माचे पुनरुज्जीवन, सामाजिक संतुलन आणि विश्वाचे कल्याण यासाठी परमात्मा अवतार घेतो. परमात्म्याचे आत्म्याशी असलेले एकत्व, अविनाशी गुरुतत्त्व आणि अपरोक्ष अनुभूती हे दत्त संप्रदायाचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. ऐहिक आणि पारमार्थिक सर्व प्रकारच्या प्रगतीसाठी उपास्य दैवत आणि नित्य अवतार म्हणजे श्रीदत्तात्रेय अवतार हा आहे.
दत्त संप्रदाय हा सर्वात प्राचीन, लोकाभिमुख, समन्वयात्मक आणि सर्वाना सामावून घेणारा असा संप्रदाय आहे. तसेच नवनवीन संतांमुळे नित्य नूतन आणि प्रवाही राहिला आहे. दत्त संप्रदाय सर्वाना जवळचा वाटतो. कारण यात प्रपंच, परमार्थ आणि मुक्तीचा यथायोग्य मेळ घातला गेला आहे. प्रापंचिक उन्नती, त्याचबरोबर साधना, उपासना, अनुष्ठाने याद्वारा शारीरिक, मानसिक, भौतिक, कौटुंबिक प्रगती यांची एकत्रित उपाययोजना माणसाला मोक्षाच्या पायवाटेवर अलगद पुढे घेऊन जाते. दत्त संप्रदाय शैव, वैष्णव याचबरोबर शाक्त, गाणपत्य, इ. सर्व पंथांना जवळचा आहे. वारकरी पंथातही दत्तात्रेय अवताराला अतिशय मान आहे. दत्त संप्रदायाचे तत्त्वज्ञान अद्वैत वेदान्ताच्या पायावरच उभे आहे. ‘तत् त्वम् असि’ आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ इ. वेदप्रणीत महावाक्यांच्या आधारानेच दत्त संप्रदायाची भूमिका मांडण्यात आली आहे.
श्रीदत्तात्रेय अवतार निर्गुण आणि निराकार असला तरी श्रीदत्त संप्रदाय सगुणोपासक आणि गुरुभक्तिप्रधान आहे. याचबरोबर योगमार्ग, हटयोग, कठोर अनुष्ठाने आणि आत्मक्लेश याही परंपरा दत्त संप्रदायामध्ये प्रचलित आहेत. सगुण भक्ती आणि उपासना ही दत्त संप्रदायाची मध्यवर्ती भूमिका आहे. गुरुपरंपरेला महत्त्व असूनही दत्त संप्रदायामध्ये श्रीदत्तात्रेयांनाच गुरू मानले आहे. त्यामुळे त्यांच्या किंवा त्यांच्या अवताराच्या मूर्तीचे किंवा पादुकांचे पूजन प्रामुख्याने केले जाते. शुद्ध आचार, सर्वाभूती परमेश्वर, सर्वाविषयी प्रेम, नामस्मरण, योग, ध्यान, नि:स्वार्थी आचरण यातूनच आत्मोन्नत्ती आणि मुक्तीची वाट शोधता येते हे दत्त संप्रदायाचे मत आहे. श्रीदत्त संप्रदायामध्ये विविध पंथ आणि परंपरा प्रचलित आहेत. त्याचबरोबर कलियुगामध्ये अनेक संतांच्या माध्यमातून श्रीदत्तात्रेयांचे कार्य झाले असून अशा संतांचेही शिष्य आणि परंपरा निर्माण झाल्या आहेत. या परंपरांची या माध्यमातून आपण माहिती घेऊ या.
श्रीपाद श्रीवल्लभ, पीठापूर, आंध्रप्रदेश
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती नाहीशी व्हावी, मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
श्रीनृसिंह सरस्वती स्वामी
हा दत्तात्रेयांचा दुसरा अवतार मानला जातो. कारंजा (लाड) जि. अकोला या गावी अंबाभवानी आणि माधव यांच्या पोटी श्रीदत्तात्रेयांनी जन्म घेतला. श्रीपाद श्रीवल्लभ हे ब्रह्मचारी होते व श्रीनृसिंह सरस्वती हे संन्यासी होते.
गुरुचरित्र या दत्त संप्रदायातील प्रासादिक ग्रंथामध्ये श्रीनृसिंह सरस्वती महाराजांच्या जीवनकार्याचे आणि लीलांचे वर्णन केलेले आहे. त्यातील एक कथा पुढीलप्रमाणे - त्यांनी जन्मत:च ॐकाराचा उच्चार केला. परंतु ते एकही शब्द बोलत नसत. अशीच सात वर्षे गेली. त्यांनी आपले उपनयन करावे असे मातापित्यांना सुचविले. उपनयन होताच त्यांच्या मुखातून वेदवाणी बाहेर पडू लागली. तेव्हा सगळ्यांची खात्री झाली की हा बालक अवतारी पुरुष आहे. श्रीपाद श्रीवल्लभांचेच कार्य त्यांनी पुढे चालवले आणि श्रीदत्तभक्तीचा विस्तार केला. त्यांना दीर्घायुष्य लाभले. संपूर्ण भारतामध्ये त्यांनी संचार केला. त्यांच्या भोवती मोठा शिष्यवर्ग तयार झाला. त्यांचे प्रमुख सात शिष्य होते. माधवसरस्वती, कृष्णसरस्वती, बाळकृष्णसरस्वती, उपेंद्रसरस्वती, सदानंदसरस्वती, ज्ञानज्योतीसरस्वती आणि सिद्धसरस्वती. या सर्वानी श्रीदत्त परंपरेचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. श्रीनृसिंह स्वामींनी जिथे जिथे तपश्चर्या केली ती ठिकाणे औदुंबर, नृसिंहवाडी, गाणगापूर ही दत्त संप्रदायातील अतिशय पवित्र स्थाने आहेत. हजारो भाविक तेथे अनुष्ठाने, जप, तप, पारायणे करतात. त्यातून त्यांना ऐहिक आणि पारलौकिक कल्याणाचा लाभ होतो. त्यांची परंपरा अजूनही आपले कार्य पुढे चालवत आहे.
श्री स्वामी समर्थ
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोडय़ा लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते. तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली. निर्भीडता, स्पष्टवक्तेपणा आणि आत्मीयता यामुळे लाखो भक्तांना त्यांनी आपलेसे केले. त्यांच्या कार्यकाळात देशात इंग्रजांचा अंमल होता. इंग्रज शासनाच्या वरवंटय़ामध्ये जनता भरडत होती. तिचा आत्मसन्मान त्यांनी जागृत केला. त्यांच्या भक्तांमध्ये हिंदूप्रमाणेच मुसलमान, ख्रिश्चन इ. धर्माचे लोकही सामील होते. त्यांच्याभोवती मोठा शिष्य परिवार तयार झाला होता. प्रत्येक शिष्याला त्यांनी त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार कार्य दिले आणि परंपरेची पताका दिली. श्रीस्वामी समर्थाच्या विविध शिष्यांद्वारे श्रीस्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठय़ा प्रमाणावर झालेला आहे. यातील प्रमुख शिष्य श्री यशवंत महाराज देवमामलेदार, कोल्हापूरचे कुंभार स्वामी, पुण्याचे बिडकर महाराज, मुंबईचे श्रीतात महाराज, आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती, श्रीशंकरमहाराज श्रीवामनबुवा, श्रीगुलाबराव महाराज, श्री केळकरबुवा, श्रीस्वामीसुत, श्रीआनंदभारती, श्रीगजानन महाराज, श्रीमोरेदादा, श्रीआनंदनाथ महाराज हे आहेत. या शिष्यांनी विविध ठिकाणी श्रीस्वामी समर्थाचे मठ स्थापन केले आहेत. तसेच श्रीस्वामी मंदिरे आणि सेवा केंद्रे सुरू केली आहेत.
श्रीपंतमहाराज बाळेकुंद्री
ही परंपरा अवधूत परंपरा म्हणून ओळखली जाते. श्रीदत्तात्रेयांची प्रेमभक्ती हे या परंपरेचे मुख्य सूत्र आहे. श्रीपंत महाराज हे फार मोठे दत्तभक्त होते. त्यांनी बालावधूत महाराजांकडून अवधूत पंथाची दिक्षा घेतली होती. श्रीपंतमहाराजांनी मराठी आणि कन्नड भाषेमध्ये विपुल लिखाण केले आहे. त्यांनी रचलेली दत्तात्रेयांची शेकडो पदे, भजने, आरत्या उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी भक्तांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध आहेत. श्रीदत्तात्रेयांनी अवधूत रूपामध्ये श्रीरामावधूतांवर कृपा केली. श्रीरामावधूतांनी श्रीबालावधूतांवर कृपा केली. आणि श्रीबालावधूतांनी श्रीपंतमहाराजांवर कृपा केली अशी ही परंपरा आहे. या परंपरेबाबत ‘अनादिसिद्ध श्रृतीसंमत संप्रदाय’ असा उल्लेख श्रीपंतमहाराजांनी केला आहे. श्रीदत्तात्रेयावर आणि अवधूतांवर निरतिशय प्रेम हीच अवधूत परंपरेची साधना आहे. विषयवैराग्य, सहजानुभव, बंधुप्रेम, विधिनिषेध त्याग, नि:स्वार्थ कर्म, संचित, अहंकारनाश, समरसता, सद्गुरुप्रीती, अद्वैतभक्ती इ. अवधूतपंथाची मुख्य वैशिष्टय़े आहेत. अवधूतपंथामध्ये बंधने नाहीत. येथे मुक्तीलाही कमी लेखले आहे. मुक्तीपलीकडची प्रेमभक्ती अशी अवधूत परंपरेची धारणा आहे.
टेंबेस्वामी
श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी श्रीदत्तात्रेयांची शास्त्रशुद्ध उपासना पुन:स्र्थापित करण्याचे श्रेय श्रीवासुदेवानंदसरस्वती टेंबे स्वामी यांच्याकडे जाते. सावंतवाडीजवळील माणगाव येथे त्यांचा जन्म झाला. त्यानंतर ते नृसिंहवाडी येथे आले. त्यांनी संपूर्ण भारतामध्ये प्रवास केला आणि दत्त संप्रदायाची पताका सर्वत्र फडकवली. त्यांनी विपुल लेखन केले असून शंकराचार्यानंतर इतके विपुल साहित्य निर्माण करणारे ते एकमेव संत आहेत. त्यांनी संपूर्ण देशामध्ये २४ चातुर्मास केले. विविध दत्तस्थानांचा त्यांनी मागोवा घेतला. आणि त्यांचे पुनज्जीवन केले. प्रत्यक्ष दत्तात्रेयांनी त्यांना नृसिंहवाडी येथे अनुग्रह दिला, असे मानले जाते. त्यांच्याजवळ एक दत्तमूर्ती होती आणि ती त्यांच्याशी बोलत असे, असे सांगितले जाते. आचरणशुद्धता, कर्म आणि रूढीप्रिय अशी परंपरा त्यांनी निर्माण केली. कारंजा, कुरवपूर, पिठापूर अशी अत्यंत महत्त्वाची श्रीदत्तक्षेत्रे त्यांनी प्रकाशात आणली. ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ हा अद्भुत मंत्र त्यांनी सर्व भक्तांना प्रदान केला. दत्त माहात्म्य, दत्तपुराण इ. अनेक मौलिक ग्रंथांबरोबर त्यांनी सर्वाना आणि विशेषत: महिलांना पारायण करण्यासाठी ‘द्विसाहस्त्री गुरुचरित्र’ आणि ‘सप्तशती गुरुचरित्र’ असे महत्त्वाचे ग्रंथ लिहिले. आबालवृद्धांना प्रापंचिक संकटातून सोडवणाऱ्या घोरकष्टोद्धरण स्तोत्राची रचना त्यांनी केली आहे. त्यांचा शिष्य परिवार खूप मोठा आहे. दीक्षित स्वामी, गांडामहाराज, गुळवणी महाराज, नानामहाराज तराणेकर, सीताराम महाराज इ. अनेक शिष्यांनी टेंबे स्वामींची परंपरा फार मोठय़ा प्रमाणामध्ये वाढवली आहे. श्रीरंगावधूत महाराज या त्यांच्या शिष्याने गुजरात राज्यामध्ये दत्त संप्रदायाचा प्रचार-प्रसार मोठय़ा प्रमाणावर केला आहे.
श्रीमाणिकप्रभू
बिदरजवळील हुमनाबाद येथील श्रीमाणिकप्रभू हे दत्तात्रयांचे अवतार मानले जातात. ते ऐश्वर्यसंपन्न आणि राजयोगी होते. या परंपरेला ‘सकलमत’ परंपरा असे म्हटले जाते. ही एकमेव परंपरा अशी आहे की जिथे गादी परंपरा आहे. या परंपरेमध्ये सर्व धर्माच्या, जातीच्या, पंथाच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. कित्येक मुसलमान, जैन, लिंगायत व्यक्ती या परंपरेच्या आहेत. साधुसंत, बैरागी, शेठ सावकार, राजे, सरदार, संस्थानिक, पंडित शास्त्री, गायक, संगितकार येथे सर्वसामान्य भक्तांबरोबर येत असतात. अत्यंत वैशिष्टय़पूर्ण आणि देदीप्यमान अशी ही दत्तपरंपरा आहे. निजामाच्या राजवटीमध्ये तिचा उगम झाला. अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ श्रीमाणिकप्रभू महाराजांकडे येऊन राहिल्याचे उल्लेख आहेत. श्रीमाणिक प्रभूचे कार्य अत्यंत अलौकिक असे होते. त्यांच्यानंतर श्रीमनोहर माणिकप्रभू, श्रीमरतड माणिकप्रभू यांनी या संप्रदायाचा सर्वत्र प्रचार आणि प्रसार केला. दक्षिण भारतामध्ये मुख्यत: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशामध्ये ही परंपरा मोठय़ा प्रमाणावर पसरली आहे. श्रीदत्तात्रेय यांच्यासमवेत त्यांची शक्ती म्हणजे मधुमती नावाची शक्ती हे या परंपरेचे उपास्य दैवत आहे. ही एक अतिशय समृद्ध अशी दत्त परंपरा आहे.
दत्तनाथ
उज्जयिनी येथील दत्तनाथ ही मध्य प्रदेशातील श्रीदत्त परंपरा आहे. निरंजन - विष्णू - हसकमलासन - अत्री - दत्तगोपाळ - वेडा नागनाथ - निबंजनाथ - जनार्दन – एकनाथ - दत्तभाऊ - केशवबुवा - अंतोबादादा - दत्तनाथ अशी ही परंपरा आहे. याचे मूळ नाथसंप्रदायातील महिपतीनाथांकडे जाते. या परंपरेचे उपास्य दैवत श्रीदत्तात्रेय असून त्यांनी मध्य भारतामध्ये दत्तभक्तीचा प्रचार-प्रसार केला आहे.
श्रीनवनाथ
नाथसंप्रदायिकांच्या श्रद्धेनुसार श्रीदत्तात्रेय ही योगसिद्धी प्राप्त करून देणारी देवता आहे. उपास्य दैवत म्हणून नव्हे, तर सिद्धिदाता गुरू आणि अवधूतावस्थेचा आदर्श म्हणून नाथसंप्रदायात दत्तांचे महिमान गायलेले आहे. नाथपंथाचा महनीय वारसा घेऊन वारकरी संप्रदायाचे संजीवन करणारे श्रीज्ञानेश्वर हे नाथ परंपरेतील संत होत. ज्ञानेश्वरांच्या अभंग गाथेत ‘ज्ञानदेवांच्या अंतरी दत्तात्रेय योगिया’ असा दत्तविषयक एक अभंग आहे. नाथसंप्रदायामध्ये दत्तात्रेयांना फार मोठे स्थान आहे. योगविद्या, मंत्रसिद्धी, सिद्धिसामथ्र्य, वैराग्य, तपश्चर्या आणि अध्यात्मज्ञान यांमध्ये नाथसंप्रदायातील लोक पूर्ण समर्थ होते. या संप्रदायाचा उगम मध्ययुगीन काळात सामान्यत: इसवी सनाच्या आसपास झालेला आहे. नाथसंप्रदायाचे उगमस्थान आदिनाथ भगवान शंकर हेच आहेत. नाथसंप्रदायाच्या उत्तरकालीन ग्रंथात दत्तगोरक्षाच्या अद्भुत कथांचे वर्णन आहे. दत्तप्रबोध या ग्रंथात मत्स्येंद्र व गोरक्षांना दत्तात्रेयाने गिरनार पर्वतावर उपदेश केल्याचा वृत्तांत पाहावयास मिळतो. नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नागनाथ आदि नाथांना दत्तदर्शनाचा लाभ झालेला दिसून येतो. सुमारे सातशे वर्षांपूर्वी दत्त उपासनेचा प्रचार या संप्रदायाने नेपाळपर्यंत पोहोचवला असे इतिहास सांगतो. नवनाथ या नावाने प्रसिद्ध असलेले सर्व सिद्धयोगी हे श्रीदत्तप्रभूंचे अंशावतार आहेत. मत्स्येंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ, रेवणसिद्ध व गहनीनाथ हे नवनाथ आहेत. त्यांच्या स्मरणमात्रानेच शुभफळ सिद्ध होते. श्रीदत्तप्रभूंची कृपा नवनाथांचे स्मरण करणाऱ्यांवर अपार असते.
श्रीरामदासी आणि श्रीधर स्वामी परंपरा
समर्थ रामदास स्वामींनी सुरू केलेली रामदासी परंपरा ही प्रामुख्याने श्रीरामचंद्रांची उपासना करते. यामध्ये श्रीदत्तात्रेय हे सिद्ध पुरुष मानले गेले असून ते विश्वगुरू, सर्वत्र संचारी आणि सिद्धिदाता आहेत असे मानले आहे. श्रीदत्तात्रेयांनी गोरक्षनाथांना अवधूतगीता हा ग्रंथ प्रदान केला असे श्रीरामदास स्वामींनी म्हटले आहे. श्रीदत्तात्रेय हे सर्व प्रिय आणि सर्वाना आवडणारे दैवत आहे अशी रामदासी परंपरेची श्रद्धा आहे. समर्थ रामदासांना श्रीदत्तात्रेयांनी मलंगरूपात दर्शन दिले होते. समर्थ रामदास आणि दत्तसंप्रदाय यांचे नाते अतूट आहे. समर्थ जेव्हा माहूर गडावर गेले होते तेव्हा त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले असा उल्लेख समर्थाच्या घराण्यातील हनुमंत-स्वामींनी आपल्या बखरीत केला आहे. श्रीधर स्वामी हे रामदास स्वामींनी प्रत्यक्ष अनुग्रह दिलेले दत्तावतार होऊन गेले, असे मानले जाते. त्यांनी पहिल्यांदा कर्दळीवनाची परिक्रमा केली. त्यांचेच शिष्य श्रीरामस्वामी यांनी पीठापूर या श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्म ठिकाणाचा जीर्णोद्धार केला आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या तेहतिसाव्या पिढीतील मल्लादी गोविंद दीक्षितलू यांनी काही वर्षांपूर्वी श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र प्रकाशात आणले असून त्यांच्या विलक्षण अनुभूती असल्याचे दत्तभक्त सांगतात.
श्रीमहानुभव
महानुभव परंपरेमध्ये श्रीदत्तात्रेय, श्रीकृष्ण, चक्रपाणी, गोविंदप्रभू आणि चक्रधर हे पाच ईश्वराचे अवतार आहेत असे मानले आहे. चक्रधर स्वामींनी या परंपरेची स्थापना केली आहे. श्रीदत्तात्रेय म्हणजेच सर्वोच्च ब्रह्म अशी या परंपरेची श्रद्धा आहे. श्रीचक्रधरांनी लिहिलेल्या ‘लीळाचरित्र’ या ग्रंथामध्ये दत्तावताराच्या कथा आहेत. तसेच त्यांनी लिहिलेल्या सूत्रपाठामध्ये दत्तात्रेय महिम्याची चार सूत्रे लिहिलेली आहेत. महानुभवांचे सात पवित्र ग्रंथ आहेत. त्यामधील सैहाद्रवर्णन या भागामध्ये श्रीदत्तात्रेयांचा महिमा गायला आहे. महानुभव परंपरेतील चांगदेव राऊळ यांना श्रीदत्तात्रेयांनी वाघाच्या रूपामध्ये दर्शन दिले, अशी श्रद्धा आहे. असे सांगितले जाते की संसाराला कंटाळून ते सर्वसंगत्याग करून माहुरगडावर गेले. श्रीदत्तात्रेय शिखराकडे जात असताना समोरून एक वाघ डरकाळ्या फोडीत आक्रमकपणे त्यांच्याकडे चालत आला. त्यांच्याबरोबरचे सगळे लोक घाबरून पळून गेले. मात्र चांगदेव राऊळ तेथेच थांबले. वाघाने प्रसन्न होऊन त्यांच्या डोक्यावर आपल्या हाताचा पंजा ठेवला आणि त्यांना अनुग्रह दिला. महानुभवांच्या पंचकृष्णामध्ये श्रीदत्तात्रेय आहेत. ‘या मार्गासि श्रीदत्तात्रेयप्रभू आदिकारण’ असे चक्रधरस्वामीनी नोंदवून ठेवले आहे. महानुभव पंथाचे पंचकृष्ण म्हणजे श्रीकृष्ण चक्रवर्ती, श्रीदत्तात्रेयप्रभू, श्री चांगदेव राऊळ, श्रीगुंडम राऊळ आणि श्रीचक्रधर हे आहेत. महानुभव परंपरा हीसुद्धा विविध दत्तपरंपरेतील एक समृद्ध परंपरा आहे.
वारकरी
भारतातील सर्वात मोठी भक्ती परंपरा म्हणजे वारकरी परंपरा ही आहे. अद्वैत वेदांताच्या पायावर आधारलेल्या या परंपरेमध्ये श्रीदत्तगुंरूचे महत्त्व अवर्णनीय आहे. निवृत्तिनाथ, ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, जनाबाई, मुक्ताई, सोपानदेव, गोरोबा, सावता माळी, चांगदेव, कान्होबा, सेना न्हावी, नरहरी सोनार, सोयराबाई, कान्होपात्रा अशा अनेक संतांनी त्यांच्या कार्याने, साहित्य निर्मितीने आणि प्रत्यक्ष जीवनामधून वारकरी पंथाचा प्रचंड विस्तार केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना ‘मेरू शिखरी एक योगी निराकारी’ असे लिहिले आहे. संत एकनाथ महाराज हे तर थोर दत्तउपासक होते. तुकाराम महाराजांनी ‘तीन शिरे, सहा हात, तया माझा दंडवत’ अशी दत्तात्रेयांची स्तुती गायली आहे. संत गुलाबराव महाराज यांनी त्यांच्या ‘प्रियलीला महोत्सव’ या ग्रंथामध्ये श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य वर्णन केले आहे. अशा प्रकारे वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत श्रीपांडुरंग हे असले तरी त्यांनी श्रीदत्तात्रेयांचे माहात्म्य तितकेच मानलेले आहे असे दिसून येते.
आनंदसंप्रदाय
सदानंद नावाच्या ऋषींनी आनंद संप्रदाय सुरू केला आहे. ते दत्तात्रेयांचे शिष्य होते. त्यांचा जन्म जनमेजय राजाने केलेल्या पुत्रकामेष्ठी यज्ञातून झाला होता, असे सांगितले जाते. ते सर्वत्र संचार करीत असताना प्रत्येकी शंभर पावले टाकल्यावर ‘श्रीदत्त’असे उच्चारण करीत असत. कर्नाटकातील बसवकल्याण येथे आनंद संप्रदायाचे मूळ पीठ आहे. या संप्रदायाची गुरुपरंपरा विष्णू-विधी-अत्री-दत्त-सदानंद अशी मानली जाते. संपूर्ण विश्वामध्ये आनंद आणि प्रेमभाव निर्माण व्हावा, माणसाने माणूस म्हणून सर्वाबरोबर व्यवहार करावा आणि संपूर्ण विश्व आनंदमय करावे ही आनंद संप्रदाय परंपरेची श्रद्धा आहे.
अन्य परंपरा
याशिवाय नृसिंहसरस्वती (आळंदी) परंपरा, विदर्भातील देवनाथ परंपरा, श्रीगुरुचरित्राचे लिखाण करणारे सायंदेव परंपरा, निरंजन रघुनाथ परंपरा, प्रकाश परंपरा, स्वरूप संप्रदाय परंपरा, चैतन्य परंपरा इ. अनेक समृद्ध आणि भव्य परंपरा आणि उपसंप्रदाय श्रीदत्तसंप्रदायामध्ये दिसून येतात. विविध नावांनी प्रसिद्ध असलेले आणि विभिन्न प्रकारच्या उपासना पद्धती असलेले हे संप्रदाय आणि परंपरा मूळ दत्त संप्रदायाशी निगडित आहेत.
मुंबईत तरी रस्त्यातून चालताना फुटपाथ शोधणे हा एक संशोधनाचा विषय झाला आहे. फेरीवाले व दुकानदारांचा असा समाज आहे की फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी नसून आपल्यासाठीच बांधण्यात आले आहेत. सर्व भारतीय नागरीकांस व्यवसाय करण्याचा हक्क आहे पण रस्त्यावर व फुटपाथ व्यापून किंवा त्यावर बसून नाही कारण तो कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
आजच आपण पोस्टात फिरकत नाही. पण २०२५ मध्ये पोस्ट ऑफिस अस्तित्वात नसल्याचीही आपल्याला सवय झाली असेल. बँकांचे बरेच व्यवहार ऑनलाईन होत आहेत. आगामी काळात तर धनादेशही इतिहासजमा होतील. ब्रिटनमध्ये २०१८ पर्यंत धनादेशांचा वापर बंद करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.
३१ मे “वर्ल्ड नो टोबॅको डे” ही एका दिवसाची नवलाई न राहता जगातील तंबाखु व्यसनी माणसांनी कायम स्वरूपी रोजच्या जीवनात आमलात आणली तर त्यांची तसेच त्यांच्या कुटुंबाची आर्थिक बचत व आरोग्याची काळजी घेतली जाईल.
भाषांचे, उच्चारांचे, संकरांचे आपापले कप्पे असतात. शेजारची भिंत उडी मारून दुसऱ्या अंगणात पटकन घुसता येते, पण तेथे स्थिरावता येत नाही. आपली गांवे, गावकूस सांभाळणे आणि नंतर शक्य असेल तर उंबरा ओलांडणे हे श्रेयस्कर !
Copyright © 2025 | Marathisrushti