पारंपारीक आहार म्हणजे काय रे भाऊ ?
माझी पणजी, आज्जी, आई जो आहार बनवित होती तो परंपरेने आलेला आहार हा परंपरागत आहार.
कोकणातील ब्राह्मणी आहाराचे वाढलेले पान बघणे आणि जेवणे हा एक वेगळाच अनुभव असतो.
(मी मुद्दामच “ब्राह्मणी” असा शब्दप्रयोग वापरतोय.
याचे एक वैशिष्टय़ दिसते म्हणून.
इथे जातीयतावादी चा काही प्रश्नच नाही.
एका वेगळ्या गटातील एका डाॅक्टरना माझे लिखाण जातीयवादी वाटले म्हणून हे वाक्य.)
कोकणातील जेवणाचे पान आणि घाटावरील जेवणाचे पान यात नेमका फरक काय दिसतो हो ?
वांगी खावीत तर कृष्णाकाठचीच. आणि अस्सल नारळाच्या रसातील सोलकढी प्यावी तर कोकणातीलच. हीच वैशिष्ट्ये. हे वेगळेपण. हीच परंपरा. हाच प्रदेशविचार.
फरक अगदी मांसाहारी पानामध्ये देखील दिसतो.
कोल्हापूरी मांसाहारी पानात, मटणाचे प्रकार बघायला मिळतात. तळलेल्या वड्यांबरोबर सुके मटण, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, असलाच पायज्येलाय. आणि त्यावर ही अश्शी लालेलाल तेलाची तर्री.
पण कोकणात असे तेलदार मटन दिसत नाही. आणि कोकणात मटणापेक्षा माश्यांवर जास्ती ताव मारला जातो. त्यात सोलकढीची वाटी ही असतेच असते. आणि त्यात तिरफळांचा स्वाद असतोच.
या परंपरा आहेत. इथल्या मातीतल्या. मातीतही फरक आहेच. घाटावरची काळी माती, कोकणातील लाल माती, भरपूर जरी पाऊस पडला तरी सगळे पाणी समुद्रात, जमिन कोरडी ती कोरडीच. आणि घाटावरचा पाऊस, थोडासा बरसला तरी इथली जमीन पाणी अजिबात सोडणार नाही. या काळ्या मातीतच पाणी साठून राहाण्याची सवय असल्याने, होतो नुस्ता चिखल ! असो.
कोकणातील शाकाहारी पानात वडे असतील पण ते ऊडीद आणि तांदुळाचे ! खुसखुशीत आणि मऊ. दोन प्रकारच्या भाज्या, दोन प्रकारची तोंडीलावणी, एखादी ऊसळ, काळ्या वाटाण्याचे सांबारे आणि हा भला मोठ्ठा सडसडीत भाताचा ढीग. भाताचा प्रत्येक कण दुसर्या पासून फटकून वेगळा झालेला. प्रत्येकजण अपक्ष उमेदवारासारखा ! पण वाढण्याचा आग्रह जेवणारा लाजेल अस्सा !
या कोकणी परंपरेत गव्हाची चपाती या तीस पस्तीस वर्षात आली. त्यापूर्वी नव्हती. होती ती पांढरीशुभ्र तांदळाची भाकरी. इथेच जन्मलेली. सहजपणे पचणारी, पोटात नाही तर तोंडातच विरघळत जाणारी…
सहजसात्म्य.
कोकणात गहू होतच नाही. सह्याद्रीचा पायथा आणि हिमालयाचा पायथा यातील वातावरणाचा परिणाम तेथील शेतीवर होणारच.
समुद्रापासून दूर पन्नास साठ किमी जमिनीचा विचार केला तर अगदी दीव दमण गुजराथ ते केरळ पर्यत गव्हाची शेती होतच नाही. मग ताटात गव्हाची चपाती येणार तरी कुठुन ?
विकतचं आणून खाण्याची सवयसुद्धा नव्हती, गरजही नव्हती.
तोपर्यंत आजारही विशेष नव्हते. विकतचं आणून खायची सवय लागल्यावर, विकतची दुखणी आली आणि विकतची औषधेसुद्धा ! कायमची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
23.08.2016