(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • श्री शिव नामावल्यष्टकम् – ८

    भगवान विश्वनाथाच्या विश्वव्यापक वैभवाचे विशेष वर्णन करताना जगद्गुरु आदि शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात…

      August 12, 2020


  • ।। सद्गुरु श्री राऊळ महाराज ||

    गुरुतत्त्व मासिकाचा फेब्रुवारी महिन्याचा अंक हा सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित आहे. महाराजांचे चरीत्र वाचन करताना आपल्याला त्याची अनुभूती येईलच. हे सर्व संत माहात्म्ये हे गुरुतत्त्वाचेच अवतार आहेत. जे मनुष्याला अध्यात्मिक प्रगती करून देण्यासाठी स्वतः खडतर असे जीवन जगून कुठल्याही परिस्थितीत साधना करून परमार्थिक उन्नती करुशकतो याचे मार्गदर्शन करीत असतात. सर्व सामान्यपणे जीवन जगत साधे उपदेश देत प्रत्येक जीव आनंदी कसा होईल या साठी प्रयत्न करीत असतात. गुरुतत्त्व हे एक मार्गदर्शक तत्त्व आहे. जे एकाच वेळी वेगवेगळ्या स्वरुपात सर्वत्र कार्यरत असते. मुख्य ईश्वराकडे जाणारे चार मार्ग व त्याचे उप मार्ग या सर्व मार्गाचे जे प्रमुख आहेत ते गुरुतत्त्वाचेच अवतार असतात. ज्या प्रकारे हे विश्व विविध प्रकारच्या प्रकृतीच्या लोकांनी व्याप्त आहे. त्याच प्रकारे गुरुतत्त्व सुद्धा तितक्या मार्गाने कार्यरत आहे. प्रत्येक जीव हा साधना करीत शिवाशी एकरूप व्हावा. यासाठीच हे गुरुतत्त्व पंचमहाभूतांचे शरीर धारण करून मार्गदर्शन करीत आहेत. म्हणून कधीही संत, महात्मे, अवतारी पुरुष याच्यावर टीका टिप्पणी करू नये. त्यानी केलेल्या मार्गदर्शनाचे चिंतन केले तर त्याच्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळून येईल. गुरुतत्त्व मासिका तर्फे दर महिन्याला एक एका संतांची माहिती प्रकाशित करण्यात येत आहे. संतांनि जन्म घेऊन कश्या प्रकारे साधना केली आणि गुरु पदापर्यंत पोहोचून समाजाला कसे मार्गदर्शन केले याविषयी माहिती देतो. तेवढी जरी माहिती आपण वाचली तरी त्यांचे कार्य लक्षात येईल. पुढे त्यांच्या चरित्राचा अभ्यास करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी व गुरूतत्त्व सगळ्यांना कळावे हाच उद्देश आहे.

    दिनांक ३१ जानेवारी २०२१ ला सिंधुदुर्ग जिल्हयातीलपिंगुळी ता. कुडाळ येथे सद्गुरु श्री राऊळ महाराज यांच्या समाधीला ३६ वर्षे पूर्ण होत आहेत. फेब्रुवारी महिन्याचे ३९ वे पुष्प त्यांच्या चरणी समर्पित करीत आहोत.

    करा करा हो जयजयकार राऊळबाबांचा जयजय कार पिंगुळीचा ब्रह्मयांगी हा दत्तांचा अवतार या वरील ओळी शब्दश: सार्थ करणाऱ्या आहेत. सद्गुरुंचा जन्म १६ ऑक्टोबर १९०५ या दिवशी सौ सावित्रीबाई आणि अप्पाजी राऊळ यांच्या पोटी झाला. पाळण्यातील नाव “श्रीकृष्ण" असले तरी पुढे ते "कृष्णाजी" आणि "आबा" या टोपण नावाने ओळखले जाऊ लागले व पुढे श्री राऊळ महाराज याच नावाने त्यांची प्रसिद्धी झाली. पिंगुळी गावचं ग्रामदैवत श्री देव रवळनाथ याचे मानकरी असलेले राऊळ कुटुंब हे अतिशय गरीब शेतकरी कुटूंब. घरामध्ये अठरा विश्वे दारिद्र्य आणि अशा गरीब परंतु ईश्वर भक्तीपरायण कुटूंबात साऱ्या विश्वाचा उद्धार करण्याची क्षमता असलेला हा द्वारकाधीश “कृष्ण" च जणू अवतरला. त्यांचा लहानपणापासूनच परमार्थाकडे ओढा होता. त्यांच शिक्षण तिसरी इयत्तेपर्यंत झालं होते. पण चार भिंतीच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवनाच्या खुल्या विद्यापीठात ते शिकले. कारण त्यांच्या जीवनाचे लक्ष्य “अध्यात्म” हेच होतं. देवाच्या नामस्मरणात ते रंगून जात असत. त्यांना ज्ञानदेव, तुकाराम आदी संतांचे अभंग तोंडपाठ होते. ज्ञानेश्वरीही त्यांना मुखोग्दत होती. लहानपणी गुरे राखताना ते भजनात दंग व्हायचे, तसेच मोठे झाल्यावरही ते खड्या आवाजात अभंग म्हणत असत. अखंड हरिनाम हाच त्यांचा ध्यास होता. या ध्यासापायी त्यांनी मुंबईतील आपल्या नोकरीलाही रामराम ठोकला. सौ. राधाबाई यांच्याशी लग्न झाल्यानंतरही ते संसारात कमलपत्राप्रमाणे अलिप्त राहिले. संसारातील भवताप पचवताना स्थितप्रज्ञ राहिले.

    सद्गुरु राऊळ महाराज म्हणजे प्रखर योगी पुरुष. त्यांनी त्यांनी १९४५ ते १९७२ अशी २७ वर्षे कठोर ध्यानसाधना केली. त्यासाठी ते कुठे हिमालयात किंवा रानावनात गेले नाहीत. तर स्वत:च्या आईच्या दुकानाला लागून असलेल्या लहानशा खोलीत ते ध्यानाला बसत. ध्यान करताना खोलीचा दरवाजा पूर्णपणे बंद करीत. जवळजवळ ६ महिने हे ध्यान सुरु असताना ते हळूहळू खाणे-पिणे कमी करत व नंतर तर काहीच घेत नसत. एवढी प्रखर ध्यानसाधना केलेल्या या योग्याची योग्यता त्यांचे गुरु प. पू.

    बाळकृष्ण महाराजांनी अचूक ओळखली व त्यांनी प पू. राऊळ महाराजांना स्वत:ची अध्यात्मिक गादी चालविण्याची विनंती केली. परंतु जीवनात कशाचीच आसक्ती नसलेल्या श्री राऊळबाबांनी ती नम्रमणे नाकाराली. महाराज हे जरी जन्मत:च संत असले तरी ज्ञानेश्वर महाराजांसारख्या अनेक संतांप्रमाणे त्यांच्याही वाट्याला अनेक दुःख, अवहेलना, जननिंदा आली. पण शेवटी बाबांचीच किर्ती अजरामर झाली. कारण राऊळबाबांसारख्या सत्पुरूषाचा जन्म हा स्वतःपुरता नसून सर्व समाजाच्या उद्धारासाठी होता. त्यांनी आपले समग्र जीवन भाविक भक्तजनांच्या कल्याणासाठी आजन्म व्यतीत केले. त्यांच वागण, बोलण अगम्य व अतर्क्य होतं. सर्वाविषयी त्यांना कळवळा होता. त्यांनी पेट्रोलशिवाय गाडी चालवली. एवढेच नव्हे तर स्वतःच्या आईला तिच्या मृत्युनंतर ९ तासांनी जिवंत करून तिला रात्रभर ज्ञानेश्वरी ऐकवून मग तिची मोक्षाकडे वाटचाल सुरु करून दिली. हे सर्व करताना 'चमत्कार करावा” अशी त्यांची धारणा नव्हती. तर सामान्य मनुष्य जीव या योगे सन्मार्गी लागावा, ही तळमळ त्यामागे असे.

    सद्गुरु राऊळबाबांनी अनेक लोकांना उपदेश, ज्ञानबोध दिला. परंतु त्यांच्याकडून खरा “गुरुप्रबोध” कोणीच संपादन करू शकला नाही. कोणी त्यांची अखंड सेवा करू शकला. सद्गुरु राऊळ महाराजांसारख्या प्रखर अवलिया व जमदग्नीचा अवतार असलेल्या सत्पुरुषांची प्रत्यक्ष सेवा करणे सोपही नव्हतं. हे शिवधनुष्य पेललं प. पू. विनायक अण्णा महाराजांनी. विनायक अण्णा महाराज हे प. पू. राऊळबाबांचे रूढ अर्थाने पुतणे व आध्यात्मिक वारसदार. असं म्हणण्याचं कारण म्हणजे अण्णा महाराज हे गेली ६० वर्षे अखंडपणे आपले गुरू श्रीराऊळ महाराज यांच्या सेवेत आहेत. पहिली २५ वर्षे प्रत्यक्ष गुरुसेवा आणि १९८५ साली प. पू. बाबांनी देह ठेवल्यानंतरची ३५ वर्षे जनसेवेच्या माध्यमातून गुरुसेवा करीत आहेत.

    सद्गुरु राऊळबाबांनी माघ शु. दशमी ३१ जानेवारी १९८५ या दिवशी देह ठेवला. त्यांनतर गेल्या ३५ वर्षामध्ये श्री अण्णांनी रात्रंदिवस अवरित कष्टांनी पिंगुळी या प. पू. राऊळबाबांच्या जन्मभूमी, तपोभूमी आणि कर्मभूमीचे रुपांतर जागतिक कीर्तीच्या तीर्थक्षेत्रमध्ये केले. परमपुज्य राऊळबाबांनी “कृष्ण" रूपाने श्री अण्णांकडून ही सुदाम्याची नगरी आज निर्माण करून घेतली आहे. प. पू. बाबांच्याच आज्ञेने श्री अण्णा महाराज पिंगुळी क्षेत्री आजतागायत अन्नदान करत आहेत. समाधी मंदिर परिसर, पिंगुळी गांव व भाविकांच्या मनावरची जळमटे काढणारे श्री अण्णा महाराज स्वत:चे “झाडुवाला" हे बिरूद सार्थ ठरवत आहेत सद्गुरु राऊळबाबांनी पिंगुळी येथे लावलेले औदुंबराचे लहानसे रोप आज भव्य कल्पवृक्ष बनले आहे. प. पू. बाबांची लाडकी माऊली ही आज मोठ्या मंदिरामध्ये दिमाखात विराजमान झाली आहे. आणि पिंगुळीक्षेत्री असलेली प. पू. राऊळ महाराजांची संजीवन समाधी आज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान बनली आहे. अण्णांनी आपल्या सद्गुरु राऊळबाबांची दिव्य स्पंदने समस्त भक्तांसाठी जणू काही या समाधीमध्ये जतन करून ठेवली आहेत. सद्गुरु राऊळबाबा आजही या समाधीमध्ये, पिंगुळीमध्ये व प्रत्येक भक्ताच्या हृदयात चैतन्याने वास करून आहेत. सद्गुरु राऊळ महाराजांचे जीवनचरीत्र आपल्याला नक्कीच अवडेल यात शंका नाही.

    गुरुतत्त्व प्रतिष्ठान तर्फे गुरुतत्त्वसेवा साधना आनंदकुटी, नेरळ कर्जत येथे गेल्या दत्त जयंती पासून अखंड अग्नी प्रज्वलीत आहे. त्यात गेल्या वर्षभरात अनेक मोठी यज्ञ सामुदाईकरीत्या झालेली आहेत व होत आहेत. यात आपण सुद्धा सहभागी होऊ शकता. यासाठी सेवेकऱ्यांशी संपर्क साधावा.

    ।। जय गुरुदेव ।।

    -– श्री. संतोष शामराव जोशी

    साभार – गुरुतत्व मासिक, वर्ष ४ थे, अंक ०३ रा, (अंक ३९)

      September 8, 2022


  • ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

    ‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो.

      July 11, 2022


  • डॉ. रोनाल्ड रॉस यांच्या जीवनाची यशोगाथा – भाग ५

    १८९५ ते १८९९ यादरम्यान रॉस व मॅन्सन यांच्यामधील १७३ पत्रांच्या माध्यमातून झालेला संवाद मलेरियावरील संशोधनाचा महत्त्वपूर्ण ठेवा आहे. हजारो मैल एकमेकांपासून दूर असलेल्या या दोन संशोधकात पत्रांमधून संशोधनासंबंधीची अनुमाने, त्यावरील टिपणे, डासांची हाताने काढलेली चित्रे व रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतलेल्या काचपट्ट्या या सर्वांची देवाण-घेवाण होत असे. त्या काळात हे सर्व बाड पोहोचण्यास कमीत कमी चार आठवडे लागत, यावरून दोघांच्या चिकाटीची व जिद्दीची कल्पना येते. रॉस व मॅन्सन यांच्यामधील हा सर्व पत्रव्यवहार लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन (London School of Hygine and Tropical Medicine) येथे व्यवस्थित जतन केलेला आहे. इकडे भारतात रॉसच्या मागील सरकारी शुक्लकाष्ट संपत नव्हते. हैदराबाद येथील हॉस्पिटलमध्ये तो संशोधनात बुडून गेलेला असताना उच्च अधिकाऱ्याने त्याची बदली बंगलोर येथे कॉलऱ्याची साथ आटोक्यात आणण्यासाठी केली. कामाचा बोजा इतका होऊ लागला की रॉसला मलेरियावरील संशोधनास वेळ मिळेनासा झाला. रात्री कामावरून आल्यावर त्याच्या डोक्यात डासांबद्दलचे विचार थैमान घालीत. मात्र आता त्याच्या विचारांची दिशा मॅन्सनवर अवलंबून नव्हती. तोपर्यंत रॉसची अशी ठाम खात्री झाली होती की माणसाला चावताना डास त्याच्या शरीरातून काहीतरी द्रवपदार्थ त्या माणसाच्या शरीरात सोडतो ज्या द्रवामधून मलेरियाचे परोपजीवी माणसाच्या रक्तात पसरतात.

    १८९७ मध्ये उटकमंडलम् जवळील सिंगून गावातील तापाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी रॉस त्या रोजच्या कामगिरीवर रुजू झाला. परंतु त्यालाच मलेरियाने बेजार केले. खिडक्या बंद करून व मच्छरदाणीत झोपूनही डासांनी त्याला गाठल्याने तो अशा उद्विग्न मनस्थितीत पलंगावर पहुडला असताना, भिंतीवर ऐेटबाज पद्धतीने बसलेल्या एका गडद पिंगट रंगाच्या डासाने रॉसचे लक्ष वेधून घेतले. डासांच्या वेगवेगळ्या गटांचा अभ्यास करणे आवश्यक आहे असे रॉसच्या मनाने उचलून धरले.

    सिकंदराबाद येथे जून १८९७ मध्ये त्याची बदली झाली. अजूनही रॉसपुढील अडचणी संपता संपत नव्हत्या. कामावर हजर होताच रॉसला स्वतःलाच कॉलर्‍याने गाठले. प्रचंड शक्तिपात झाल्याने कामात लक्ष लागेना. शेवटी एकेका उकळत्या चहाच्या कपाने का होईना, परंतु त्याची तब्येत सुधारू लागली. खंबीर मनाने रॉसने विविध जातीच्या डासांचा शास्त्रोक्त अभ्यास सुरू केला. आता आपल्या प्रयोगात वेगवेगळ्या गटांचे डास वापरताना असे लक्षात आले कि फक्त एकाच गटाच्या डासांमध्ये मलेरियाचे परोपजीवी दिसतात, तेव्हा आत्तापर्यंत आपण कोणत्याही गटाचे डास प्रयोगात वापरीत होतो, ती आपली फार मोठी चूक होती. त्या कारणामुळे रॉसच्या पदरी अपयश येत होते. मादी ऍनॉफेलीस हिच मलेरिया पसरविण्यात जबाबदार आहे या निरीक्षणाचा हळूहळू उलगडा होऊ लागला.

      March 19, 2019


  • आहाररहस्य-बदललेला आहार भाग ७३

    जमिनीवर मांडी घालून जेवायला बसणे आपण विसरून गेलो आहोत आणि टेबलखुर्चीचा वापर करणे प्रेस्टीजीयस वाटू लागले आहे. काहीजणांना खाली बसताच येत नाही, त्यांच्या या सवयी विषयी मला बोलायचेच नाही. पण त्यांच्यावर ही वेळ का आली, ती वेळ आपल्यावर येऊ नये, याचे परिक्षण तरूण पिढीने करावे.

      December 5, 2016


  • बोध कथा – उंदीर आणि बिल्ली मौसी

    स्वामी त्रिकालदर्शी समाधीतून उठले, त्यांनी माझ्याकडे बघितले आणि विचारले बच्चा कुठल्या विचारात आहे. मी म्हणालो स्वामीजी, आज इन्द्रप्रस्थ नगरीच्या गुरुकुलात जे काही घडत आहे, त्याचा मतितार्थ काय? माझ्या सारख्या अल्पबुद्धी व्यक्तीला काहीच उमगत नाही. स्वामीजी म्हणाले, बच्चा तुला मी उंदीर आणि बिल्ली मौसीची गोष्ट सांगतो. फारपूर्वी नंदन वनात जमिनी खाली उन्दिरांची मोठी वसाहत होती. उन्दिरांच्या म्होरक्यांनी, तिथे राहणार्या उन्दिरांच्या सुरक्षेसाठी काही नियम बनविले होते. उदाहरणत: दूर कुठे बिल्ली मौसी दिसतास उन्दिरांनी शीघ्र बिळात आले पाहिजे आणि तत्काळ बिळाचा दरवाजा बंद केला पाहिजे. बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर येऊन कितीही गोड बोलली तरी उन्दिरांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नये. एवढेच नव्हे तर बाहेर जमिनीवर तिच्या विष्ठे जवळ हि उन्दिरांनी फिरकू नये. तिच्या विष्ठेत अशी काही जादू आहे कि एकदा उंदराने तिचा वास घेतला कि तो पुन्हा बिळात परत येत नसे.

    असेच एकदा बिल्ली मौसी उन्दिरांच्या बिळाच्या दरवाज्या समोर आली. गोड स्वरात गाणे म्हणू लागली.
    नंदन वन के सब जानवर
    शेर-बकरी, चूहा बिल्ली
    एक घाटपर पिए पानी.
    चूहों का म्होरक्या मुर्दाबाद
    बिल्ली मौसी जिंदाबाद.
    माझ्या प्रिय उन्दिरांनो, तुम्हाला माहित नाही, तुमच्या म्होरक्यांनी तुम्हाला जमिनीखाली अंधार्या जगात डांबून ठेवले आहे. इथे बाहेर बघा, सूर्य प्रकाश आहे, प्रसन्न वातावरण आहे. माझ्याशी मैत्री करा, तुम्हाला कुणाचेच भय राहणार नाही. मधुर फळांच्या रस आणि गोड फळे तुम्हाला खायला मिळतील. म्होरक्याची पर्वा करू नका, चला बाहेर या, माझ्या सोबत मौज करा, अंधाराच्या राज्याचा नाश करा. उन्दिरांनो बोला बुर्ज्वा म्होरक्या मुर्दाबाद, बिल्ली मौसी जिंदाबाद.
    आजाद नावाच्या उन्दिर, म्होरक्यांच्या जाचक नियमांना त्रासून गेलेला होता. त्याला बिल्ली मौसीचे म्हणणे खरे वाटू लागले. पण बिल्ली मौसीची भीतीही वाटत होती. स्वभावाप्रमाणे बिल्ली मौसी, बिळाबाहेर विष्ठा करून गेली. बिल्ली मौसी दूर जाताच आजाद नावाचा उंदीर बिळाबाहेर आला. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ जाऊ लागला, दुसर्या उन्दिरांनी त्याला मना केले, पण त्याने ऐकले नाही. बिल्ली मौसीच्या विष्ठे जवळ येऊन, त्याने त्या विष्ठेचा वास घेतला. विष्ठेत असलेल्या परजीवींनी लगेच आजादच्या शरीरात प्रवेश केला. त्या परजीवींनी आजादच्या डोक्याचा ताबा घेतला. आजादची विचार शक्ती नष्ट झाली. आता आजाद परजीवींच्या इशार्या वर नाचू लागला. आजादला वाटले, बिल्ली मौसी खरेच म्हणते, नंदनवनातल्या सर्व प्राण्यांनी एकत्र राहिले पाहिजे. अर्धवट आणि अतिशहाणे उन्दिरांचे म्होरके आपल्या स्वार्था साठी बिल्ली मौसी विरुद्ध आमच्या डोक्यात विष कालवितात जेणेकरून त्यांचे राज्य अबाधित राहो. त्याने जोरात नारा लावला, उन्दिरांच्या राज्याचा नाश होवो, बिल्ली मौसी जिंदाबाद म्हणत आजाद बिल्ली मौसीच्या शोधात निघाला. बिल्ली मौसी एका झाडाखाली बसलेली होती, ती आजाद सारख्या मूर्ख उन्दिराचीच वाट पाहत होती. बिल्ली मौसीच्या जवळ येऊन आजाद म्हणाला मौसी मी त्या मूर्खांचे राज्य सोडून आलो आहेत, मूर्ख उन्दिरांचा म्होरक्या म्हणतो बिल्ली मौसी उन्दिरांना खाते, खोटे बोलतो ना तो. बिल्ली मौसी गालात हसली, तिने अलगद आजादला आपल्या पंज्यात पकडले आणि त्याला म्हणाली, मूर्खा तुमचा म्होरक्या खरेच म्हणतो, मी तुझ्या सारख्या कोवळ्या उन्दिराना आनंदाने खाते, असे म्हणत तिने आजादला गटकले.

    स्वामीजी बोलता बोलता थांबले, पुन्हा माझ्याकडे पाहत म्हणाले, बच्चा, ज्याला उंदीर, परजीवी आणि बिल्ली मौसीचा अर्थ कळेल, त्याला आज काय चालले आहे, हे हि कळेल. स्वामीजी पुन्हा समाधीत गेले. मला काही गोष्ट कळली नाही, तुम्हाला कळली का.

    -- विवेक पटाईत

      February 20, 2016


  • स्वातंत्र्य दिवस

    म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे.

      August 15, 2020


  • श्री सिद्धिविनायक मुळ रहस्य व श्रीस्वामी समर्थांचा संबंध

    अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थांचे या स्थानाला आशीर्वाद मिळाले नि स्थानाची जागृतता वाढून भरभराट झाली. तो एकूणच इतिहास मोठा रंजक आहे.

      January 25, 2018


  • फॅण्टासी आणि रोमॅण्टीक बाजी…

    दमदार कथानक आणि संवाद असलेल्या प्रोमोजने एखाद्या चित्रपटाचं मार्केटींग करुन प्रेक्षकांना स्वत:च्या चित्रपटाकडे खेचुन आणायचे आणि “तगडी स्टारकास्ट” च्या बळावर सिनेमात काहीतरी वेगळेपण आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केल्यावर प्रेक्षकांना एनकॅश करायचे हे ट्रेंड आता जुने झालेत. श्रेयस तळपदे, अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, इला भाटे यांची मुख्य भूमिका असलेला बाजी हा चित्रपट मसालेदार आणि स्टारडम झालाय.हे वेगळ्या शब्दात सांगायचे तर कथेत अनोखेपणा नाही; पण फॅण्टासी क्रियेट करुन जुना व सध्याच्या काळाला सांगड घालण्यात काही फरकाने यशस्वी ठरलाय. संवादशैलीलात्या भागातला बाज आहे व मनाला भिडतील असे नाही! रोमॅन्टीक सेन्स बरा असला तरी प्रेमाचा फण्डा अचुकपणे हाताळण्यात आलेला आहे.

    बाजीची कथा घडते कोकणातल्या श्रीरंगपूरच्या छोट्याशा गावामध्ये भारत स्वतंत्र झाल्यावर बारा-चौदा वर्षा नंतरच्या काळातील ही कथा! चिविलदास (श्रेयस तळपदे), हा सामान्य घरातील मुलगा स्वाभावाने बर्‍यापैकी बालीश जो आपल्या आईसोबत (इला भाटे) रहातोय, उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांचं किराणा मालाचं दुकान आहे. त्याच गावात गौरी (अमृता खानविलकर) नावाची मुलगी आहे जी चिदुची बालमैत्रीणं पण आहे; तिच्या स्वपनातला राजकुमार आहे "बाजी"! बाजी हे पात्र म्हणजे श्रीरंगपूरच्या गावकर्‍यांचा रक्षणकर्ता. कोणत्याही आपत्कालिन स्थितीत बाजी हा गावकर्‍यांच्या मदतीला धावून यायचा. हे सर्व चित्रपटाच्या सुरुवातीला कॉमिकच्या चित्रातून निवेदनात्मक पध्दतीने कथन करुन उत्तमरित्या सादरीकरण तर कुठे कलाकारांच्या अभिनयातून आल्यामुळे सुरुवातीचे प्रसंग खिळवून ठेवणारे आहेत. गौरीच्या स्वप्नातला राजकुमार सुध्दा बाजीच आहे कारण लहान असताना आपल्या गावातल्या जत्रेतील “जाइंट व्हील” वरचा तोल सुटल्यावर अडकल्यामुळे ती पडणार तितक्यात बाजी घोड्यावर येऊन तिला वाचवतो आणि म्हणूनच तिचं इतिहासातल्या बाजी वर प्रेम जडलयं. पण सध्याच्या स्थितीत तिचा मित्र चिदु तिच्यावर मनापासून प्रेम करतोय. चिदूचं व्यक्तीमत्त्वा आणि त्याचं स्थान हे आपल्यासाठी केवळ एका उत्तम मित्राप्रमाणे
    आहे. कारण त्याच्या गुणांचा दुरपर्यंतही बाजीशी संबंध नाही. त्यामुळे कथेला “रोमॅण्टीक टच” देखील मिळतो. चिदुच्या भोळेपणाचा गैरफायदा अनेकांनी आत्तापर्यंत घेतला असला तरी तो एक थट्टेचा भाग असतो. याच सुमारास मार्तंड (जितेंद्र जोशी)ची एंट्री होते. सुरुवातीला साधा, सरळ असलेल्या मार्तंडची खलकीवृत्ती कशी जागृत होते आणि चित्रपटाच्या अखेरपर्यंत त्याचा खलनायकी चेहर्‍याची खुनशी रुपं कशी उळघडत जातात हे सुरेखरित्या पडद्यावर साकारण्यात आले आहे. खलनायक बनलेला मार्तंड पुढे चिदुची हत्या करुन समुद्रात ढकलून देतो. पण ज्यासाठी चिदुची हत्या होते आणि जे बाबी मार्तंडच्या विक्षिप्त पणाला ठरतात ती म्हणजे पुरातन खजिना. आणि या दुर्मिळ खजिन्याच्या रक्षणासाठी बाजी त्या गावात वावरत होता. चिदुच्या हत्ये आधी ज्यावेळी त्याला कळते की आपण बाजीचे वंशज आहोत त्या वेळी गौरी ही गोष्ट तो अनेक मार्गाने पटवून देतो.

    shreyas actionपण गौरी चिदुवर प्रेम करत नसल्यामुळे, पुढे ट्विस्ट म्हणून वेगळा प्रसंग साकारण्याचा प्रयत्न दिग्दर्शका कडून केला गेलाय ज्यामुळे चित्रपट शैलिदार बनतो. कारण चिदु नंतर नव्याने नायकाची एंट्री होणार हे कोणत्याही चित्रपटाचा ठरलेला पॅटर्न असतोच. पुढे नायकाची अर्थात श्रेयस तळपदेची नव्याने एंट्री होते आकाश या व्यक्तीरेखेच्या माध्यमातून. आकाश हा हिरे चोर आहे. मुंबईहून हिरे चोरल्यावर थेट समुद्राच्या मार्गाने पोलिसांच्या तावडीतनं निसटत असतानाच त्याची नवका वादळाच्या तडाख्यात उलटते आणि आकाश थेट श्रीरंगपूरच्या समुद्र किनार्‍यावर येऊन आढळतो. चिदुच्या साथीदाराला जेव्हा आकाश बेशुध्द अवस्थेत सापडत़ो त्यावेळी आकाशला चिदुच्या घरी दाखल करण्यात येते. पण आकाश हा खरा चिदु नसून आकाश आहे, हे ज्यावेळी त्याच्या आईलला कळते तेव्हा तिची आई म्हणून झालेली व्याकुळ अवस्था पण त्याचवेळी आकाश श्रीरंगपूर मध्ये असणं ही किती महत्त्वाचं आहे हे ज्यावेळी आकाशला समजतं तेव्हा त्याच्या रुपाने झालेला बाजीचा प्रवेश गावकर्‍यांच्या दृष्टीनेही एकार्थी सुखद अनुभव असतो. इथे मार्तंड व त्याच्या माणसाने अख्खा गाव वेठीस धरलेला असतानाच त्याचा साम्राज्याला सुरुंग लागायला सुरुवात झालेली असते तर दुसरी गौरीच्या स्वप्नातला सुपरहिरो परतल्यामुळे “रोमॅन्स फ्लेव्हर” अनुभवायला मिळतो. पण गुन्हेगार असलेला आकाश ज्यावेळी हे सत्य गौरीला सांगणार तितक्यात मार्तंडच्या गुंडांकडून त्याचावर हल्ला होतो पण या प्रसंगाला ही आकाशने केलेली फाईट यामध्ये नाविन्य नसलं तरी त्यापुढे येणारे ट्विस्ट आणि पोलिस इन्सपेक्टर आकाशचा करत असलेला पाठलाग यातून “बाजी स्टाईल”ने सरकलेला चित्रपटाचा शेवट नक्कीच आपल्याला खिळवून ठेवेल.

    बाजी चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सर्वच कलाकारांचा कसदार अभिनय, सुयोग्य दिग्दर्शन आणि प्रसंग व काळानुसार केलेला वस्तुंचा वापर, वेशभुषा, चित्रपटाच्या तांत्रिक बाजू आणि बाजीची कथा सांगण्यासाठी आकर्षकरित्या केलेलं अॅनिमेशन त्याला जोड म्हणजे सचिन खेडेकरांच कथामय निवेदन. महत्त्वाचं म्हणजे मार्तंडच्या व्यक्तीरेखेला जितेंद्र जोशीचे न्याय दिलायं असंच म्हटलं पाहिजे. पुरस्कारांच्या वेळीही मार्तंडची दखल घ्यावी लागेल. सिनेमाची गाणी सुध्दा कथेच्या प्रसंगाला शोभणारी आहेत.

    या चित्रपटाची खटकणारी बाजू म्हणजे लांबलेलं कथानक; सुरुवातीला खुप इंटरेस्टीग वाटणारी कथा नंतर रटाळवाणे वाटत रहातं. “साऊथ टच” असलेल्या फाईट सीन्स याआधी ही अनेक मराठी सिनेमांमधून पहायला मिळाल्या आहेत. त्याच धाटणीवर आधारीत इथेही काही प्रमाणात बघायला मिळतात. दुसरं म्हणजे शेवटच्या 'सीन' ला आकाश हा मार्तंड पळवून नेत असलेला खजिना सोडवण्यासाठी घोड्यावरुन येताना दाखवण्यात आलाय; पण मुळात प्रश्न असा मनात येतो की घोडा आला कुठून? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाजी चा पोषाख इतक्या वर्षानंतर ही सहीसलामत कसा? न त्याला वाळवी न कुठे छेद? कारण बाजीचा पोषाख हा ज्य ठिकाणी ठेवण्यात आलेला असतो त्यावरुन असा शंका येणं सहाजिक आहे!

    फॅण्टासी, रोमान्स आणि मसालेदार कथा व अभिनयात वरचढ आणि या सर्वांचं कॉम्बीनेशन म्हणजे बाजी हा सिनेमा. जर अश्या चित्रपटांना आपण पसंत करत असाल तसंच श्रेयस तळपदे व अमृता खानविलकर यांच्या पडद्यावरील केमिस्ट्रीला पहाण्यासाठी तरी बाजी एकदा पहायला काहीच हरकत नाही.

      February 9, 2015


  • तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी:

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मध्ये प्राचार्य डॉ. किसन पाटील यांनी लिहिलेला हा लेख


    माझा शैक्षणिक प्रवास तसा खडतरच होता. प्राथमिक शिक्षण जन्मगावी वाघोड ता. रावेर (जळगाव) या माझ्या जन्मभूमीतच घेतलं. माध्यमिक शिक्षणही दहावीपर्यंत गावातच झालं. अकरावी (मॅट्रीक) साठी रावेर या तालुक्याच्या गावी माझे मामा गुरुवर्य ना.भि. वानखेडे यांच्या घरी राहिलो. तेव्हा मला खरी शिक्षणाची गोडी आणि शिक्षणक्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. नंतर दोन वर्षे खिरोदा येथे ओ.टी. डी. (चित्रकला शिक्षक) कोर्स केला. पहिला आलो. रावेरच्याच माझ्या सरदार जी. जी. हाय. ज्यु. कॉलेजात चित्रकला शिक्षक म्हणून रूजू झालो. त्यापुढचं शिक्षण बहि:स्थ पद्धतीने घेणं सुरु ठेवलं. डी.एम. आणि ए. एम. (बहि:स्थ) जे जे स्कूल ऑफ आर्ट मध्ये सुटीत परीक्षा देऊन पूर्ण केलं. इंटर आर्टस (कला) भोपाळ बोर्डामार्फत इंदूरला परीक्षा देऊन केल्यावर पुणे विद्यापीठातून बी.ए. ही पदवी संपादित केली. पुढे अमरावती विद्यापीठाची एम.ए. मराठी आणि बी.ए. मराठी स्पेशल या पदव्या प्राप्त झाल्यात. एम. ए. ला मेरीट मध्ये आलो. त्याठिकाणीच गुरुवर्य डॉ. भाऊसाहेब मांडवकरांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी.

    प्राप्त झाली. १९७३ ते १९९० पर्यंतचा हा प्रवास शिक्षकी पेशा सांभाळून स्वत:च्या उच्चशैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याने पूर्ण झाला. त्यानंतर मूळजी जेठा महाविद्यालयात जळगाव येथे वरिष्ठ महाविद्यालयात मराठीचा प्राध्यापक म्हणून आणि विभाग प्रमुख असा १९९१ ते २०११ पर्यंतचा पल्ला गाठला. २०११ ते २०१४ तीन वर्षे महिला महाविद्यालयात प्राचार्यपदी सेवानिवृत्त झालो. सुमारे ४१ वर्षांचा हा दीर्घ प्रवास कष्ट, जिद्द, चिकाटी आणि विधायक सर्जनशील निर्मितीच्या संदर्भातील आजीवन विद्यार्थी असल्यासारखाच पूर्ण झाला. जगाच्या व्यावहारिक भूमिका, समाजातील गुणवत्तेची चाड असलेला माणसांची सोबत, शिक्षण क्षेत्रात सतत धडपडणाऱ्या वृत्तीतून प्रयोगशील जगण्याची कला आणि विधायक सर्जनशीलतेतून लेखन चिंतन, वाचन, मनन करण्याची प्रेरक शक्ती प्राप्त होत गेली. त्यामुळे "तृप्त मी; अतृप्त मी; तरीही संतृप्त मी!" असा माझा कष्ट-वेदनांवर मात करणारा आनंददायी प्रवास घडला. या काळात अनेकांना योग्य मार्ग दाखवत त्यांच्या पायावर उभं करताना आनंद वाटला. सहकारी मित्रांना मदत करीत त्यांच्या सोबत विविध प्रकल्प उभे करता आले. शैक्षणिक गुणवत्ता आणि दुर्बल घटकांतील मुला-मुलींना प्रवाहात आणता आलं.

    चित्रकला - कलेचा इतिहास आणि रसग्रहण, सौंदर्यशास्त्र या बरोबर साहित्य-संशोधन आणि समीक्षा तसेच साहित्य चळवळीत सक्रीय होऊन नवनव्या वाटा चोखाळता आल्या. पूर्वाधातील कला शिक्षण आणि उत्तरार्धातील साहित्य क्षेत्रातील वाटचाल अशा दोन विश्वात रमताना ललित कला आणि काव्यकला यांचा सुंदर मेळ माझ्या आयुष्यात बसला. प्रत्येक गोष्ट अनुभवाने सिद्ध झाली. स्वयंअभ्यासातून अनुभवविश्व विस्तारत गेलं. जीवाभावाचे मित्र, मार्गदर्शक गुरु आणि सुस्वभावी संस्थाचालकांनी प्रोत्साहन दिलं त्यामुळे माझ्या धडपडणाऱ्या वृत्तीला, अतृप्ततेला यशाची तृप्तता लाभत गेली. आपण एक कर्मशक्तीचे उपासक आणि ही पर्यावरणातली माणसं प्रेमाचं सिंचन करणारे विशाल अंत:करणाचे सुहृद लाभले. त्यातून जे घडत गेलं, ते आज संतृप्त करणारं विश्व मला वाटते. यामध्ये कोणतीही गोष्ट मागच्या दारानं, वशिल्यानं किंवा दुसऱ्याचा हक्क डावलून कधी मिळवली नाही. बुद्धीमत्ता, विवेकपूर्ण विचार, चारित्र्यसंपन्न शिकवण, आणि कर्मभक्तीचा श्रद्धाशील डोळस श्रमसंस्कृतीचा संस्कार यामुळेच ही प्रगतीची वाटचाल घडून आली. यातील अतृप्तता ही नवं करण्याची प्रेरकशक्ती होती, त्यातून जिद्द-चिकाटी आणि महत्त्वाकांक्षा वाढत होती. तृप्ततेच्या वाटेवरून जाता जाता सेवानिवृत्ती नंतरची संतृप्तता आज अनुभवता येते. इतकं सरळमार्गी जीवन जगता आलं. हा योग घडता घडता घडवून आणला त्याला अनुभवला आणि भाग्ययोग म्हणून स्वीकारला.

    मानवी जीवनात 'अतृप्तता' ही नवनव्या वाटा शोधण्याची जननी असते. गरजा आणि नवे प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा यातून कष्टमय प्रवासात, साधनामय अभ्यासात, कर्ममय सेवेत सामावत गेली की यशप्राप्तीचे क्षण येतात. तेच तृप्ततेचा क्षण घेऊन येतात. समृद्ध - संपन्न भावविश्वाला कर्मशील घामाचं सिंचन केलं की, कष्टाची गोंडस फुलं आणि फळं बहरतात. संकल्प करणं आपल्या हातात असतं, त्यासाठी कष्ट झेलणं हे आपल्या रक्तात असतं परंतु सर्वच संकल्प सिद्धीस जातातच असं नसतं. तेव्हा क्षणभर उदासीनता येते. प्रयोग अपूर्ण राहतात. त्यातून अतृप्तीचा भाव उत्पन्न होतो. नव्या वाटा - नवे प्रयोग करण्यास हा भाव बळ देत राहातो. त्यामुळेच निराशेचं मळभ झटकून टाकलं की आशेचा नवा किरण सापडतो. नवा खेळ, नवी विटी, नवा दांडू, नवे मैदान, नव्या दिशा आणि नवे सर्जनशील निर्मितीचे डोहाळे लागतात. अतृप्ततेला तृप्ततेचा गंध लाभला की शेवटी संतृप्तीचा आनंदघन बरसू लागतो.

    या आनंदमय जीवन प्रवाहात काही क्षण असतात वेदनामय, दुःख देणारे किंवा कटुअनुभवांचे धनी. एकदा एकाविद्यापीठात विभाग प्रमुखाची जागा भरायची होती. त्यासाठी रीतसर प्रक्रिया पूर्ण झाली. परंतु सरळमार्गी चालण्याचा माझ्यासारख्या आणखी दोन तीन लोकांना या अनुभवाचे साक्षीदार व्हावे लागले. विद्यापीठीय राजकारण, मा. कुलगुरुंना सल्ला देणारे स्वार्थी लांगूलचालन करणारे आणि एकूण निवडप्रक्रियेचा कब्जा करून स्वतःची वर्णी लावणारे काही कुटील लोक असतात. त्यामुळे अशा व्यक्तीने त्या पदावर स्वत:ची वर्णी लावून घेतली. या चाकोरीबाहेरच्या कोणत्याच प्रक्रियेत सहभागी न होता सरळमार्गी मुलाखत दिली. विषयतज्ञांना आधी न भेटता किंवा कोणतीही सेटींग न लावता सामोरा गेलो. परंतु सहा महिन्याने मा. कुलगुरु महोदयांकडून निरोप आला. “अहो, तुम्ही भेटला पण नाही. आम्हाला कळलं नाही. चांगल्या माणसांवर अन्याय झाला हे आता उशीरा लक्षात आलं. स्वार्थी माणूस ओळखायला वेळ लागला. तुम्ही भेटला नाहीत तर कसं कळेल तुमच्या गुणवत्तेबाबत? " मी शांतपणे ऐकून घेतलं, स्थितप्रज्ञ राहण्याचं कसब अनुभवातून मिळालं होतच. वाईट वाटत नाही पण मनात खंत वाटते. खदखदून येतं. त्या विभागात ॲकॅडॅमिक प्रगती होऊ शकली नाही.

    पदव्युत्तर संशोधन, अभ्यासक्रमांची कालबद्ध मांडणी, उत्तम अध्ययन अध्यापनाचे कौशल्य आणि भाषा-साहित्य, बोली भाषांचे अध्ययन आणि अभ्यास पुढे जाऊ शकला नाही. म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो अशी म्हण आहे. त्याचीच प्रचिती येत राहिली काळ पुढे सरकला. स्वार्थीवृत्तीच्या माणसाने तो विभाग सोडून अन्यत्र जम बसवला. जर मला ही संधी मिळाली असती तर कदाचित काही सातत्यपूर्ण आणि दूरगामी विचारांचे प्रागतिक कार्य उभे राहू शकले असते. परंतु ग्रामीण लोकभाषा, बोलींचे आणि तौलनिक भाषा अभ्यासाचे संदर्भात जे उद्दिष्ट ठेवून विभाग उभारला गेला जे अपूर्ण राहिले. याची खंत वाटणारचं.

    दुसरा अनुभव अशाच एका दुसऱ्या विद्यापीठातील पदभरती संदर्भातला आहे. तिथे ही मी प्राध्यापक पदासाठी पात्र असल्याने अर्ज केला. मला मुलाखतीचे पत्र ही प्राप्त झाले. परंतु एका विद्वान, सेवानिवृत्त प्राध्यापक मित्राकडून निरोप आला. “तुम्ही या पदासाठी मुलाखतीला जाऊ नये. कारण मा. कुलगुरुंनी त्यांचा जवळचा एक मित्र त्यासाठी निश्चित केला आहे. त्याचा बायोडाटा तुमच्यापेक्षा कमी दर्जाचा आहे. तुम्ही गेला तर उगाच अडचण येईल, चर्चा होईल, म्हणून तुम्हास हा निरोप देण्यास मला सांगण्यात आले आहे." मला क्षणभर खिन्न झाले. परंतु दुसऱ्याक्षणी मी विचार केला. जर आपण गेलो, निवड झाली तरी ज्या महाशयांच्या प्रशासनात काम करायचे ते दुखावल्यामुळे आपणास त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा मुलाखतीत न जाण्याचे मी निश्चित केले. नंतर कळले ते अपेक्षित ठरलेल्या व्यक्तीला नेमण्यात आले. गुणवत्तेला डावलून या उच्चशिक्षण क्षेत्रातल्या निवडी, नेमणूका होतात. त्यात राजकारण केलं जातं. गुणवत्ता घसरते. अशी उथळ माणसं, वशिलेबाज व्यक्ती आतून जे गौडबंगाल करतात ते वेगळंच असते. असो. या घटना प्रासंगिक असतात. त्यामुळे फारसं नुकसान होत नाही, अशी स्वतःची समजूत करून घ्यावी लागते. सर्वच क्षेत्रात लागलेला हा भ्रष्ट विचारांचा रोग, आणि वशिलेबाजी याचे समर्थन कोणीच करत नाही. परंतु विरोधही फारसा होत नाही. यामुळे मनात खंत उत्पन्न होणारच! मी याला अन्याय म्हणणार नाही. माझा काही व्यक्तिगत स्वार्थ दुखावला म्हणून मी याचा निषेध ही करणार नाही. परंतु प्रवृत्ती कशा विकृतीमय होतात आणि सुसंस्कृतीचे विकृतीकरण करतात. याची अनुभवरुपी समृद्धी मला अतृप्तीतून तृप्तीकडे वाटचाल करण्यास वाट दाखवते.

    'अनघा दिवाळी अंक २०१८' यांनी आवाहन करीत या संदर्भात लेखनासाठी प्रवृत्त केलं. आपल्या संपन्न आयुष्यातील यशासोबतच 'अपयशाची सल' कशी असते? या संदर्भात हे आत्मनिष्ठ लेखन करायला संधीच दिली. 'यश' ही जशी सापेक्ष संकल्पना तशीच 'अपयश' सुद्धा असते. संधी मिळाली तर यशाचं सोनं होत असते. असा मानवी मनातला विचार असतो. अनेक अनुभव येतात, संधी दार ठोठावून येते. परंतु काही ठिकाणी आपण कमी पडतो. नैतिक मूल्यांचा पिंड आपणास प्रलोभनापासून दूर ठेवतो. आपल्या इच्छा-आकांक्षांचा आपल्यासमक्ष बळी दिला जातो. त्यामुळे तात्कलिक खंत निर्माण होऊ शकते. दीर्घकालीन आणि शाश्वत विचार केला तर आपण ज्याजागी आहोत त्या सेवेतच आपण जे जे उत्तम, उदात्त आणि विधायक करतो ते खूप महत्वाचे असते. त्यातूनच कर्मयोगाची तृप्तता मिळत असते. त्यामुळे आयुष्यात कोणाबाबत कटुता उरत नाही. क्षणैक मतभेद, वाद असले तरी त्यातून अलिप्तता पाळल्यास उत्तम परिणाम उपभोगता येतात. त्याचा उत्तम परिपाक म्हणजे उत्तम आरोग्य, सुदृढ प्रकृती आणि निरामय जीवनाची सुमारे ६६ वर्षे आज पूर्ण करताना कृतार्थ वाटते. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी जोडले गेलेत, शिक्षण आणि कला क्षेत्रात तसेच विविध पातळीवर ते जागतिक स्तरावर कार्यरत आहेत. त्यांचा प्रेमळ ऋणानुबंध हीच अनमोल शिदोरी मी मानतो. १६ विद्यार्थ्यांचे पी.एच.डी., दहा विद्यार्थ्यांचे एम.फील मराठी साहित्य-भाषा आणि लोकसाहित्य या विषयात ALP मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले. आनंदाची ही अनुभूती गाठीशी आहे. प्राचार्य पदी विराजमान झाल्यावर संस्थाचालक, सहकारी प्राध्यापकवृंद यांच्या सहभागाने महिला सक्षमीकरण आणि उच्चशिक्षणात त्यांचा सहभाग वाढत गेला. सावित्रीबाई फुले दत्तक पाल्य योजनेतून आर्थिक दुर्बल मुलींना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे मोठे कार्य संपन्न झाले. ही आत्मिक आनंद देणारी घटनाच आहे.

    साहित्य, समीक्षा, संशोधन आणि शिक्षण तसेच प्रत्रकारिता अशा विविधक्षेत्रात अनेक जीवाभावाची प्रेमळ-सज्जन माणसं भेटलीत. अनेक नवे ग्रामीण-दलित लेखक-कवी यांना प्रोत्साहन देता आले. साहित्यसंमलने, चर्चासत्रे, षदा आणि नियतकलिकातील समीक्षा तसेच शोधनिबंध या दृष्टीने एक मोठा कार्यकर्तृत्वाचा वाटा निर्माण झाला. नव्या हातांना लिहितं करीत, त्यांची खडतर वाट सुकर करण्याची संधी मला मिळाली. महाराष्ट्रात अनेक सेवाभावी संस्था, वाचन चळवळ, वृत्तपत्रे-आकाशवाणी माध्यमे, स्काऊट गाईड चळवळ, सानेगुरुजी कथामाला, बालबोधपीठ इत्यादि ठिकाणी सततकार्य करण्याची संधी मिळाली.

    मराठी बोली साहित्यसंघाचे उपाध्यक्षपद, जनसाहित्यसंमेलनाचे आणि खानदेश साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, बोली साहित्यसंमेलन आणि जिल्हा साहित्य संमेलनांचे आयोजनात सक्रीय सहभाग लाभला. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अ.भा. म. साहित्य महामंडळावर सदस्य म्हणून सातत्याने कार्यरत राहिलो. मासिके, ग्रंथसंपादन समितीवर कार्य केलं. माध्य. उच्च माध्य. शिक्षण मंडळावर मराठी अभ्यासमंडळ सदस्य म्हणून (तज्ज्ञ) कार्य केले. इ. ९वी ते १२वीची आठपाठ्यपुस्तके तयार केली.

    राज्य मराठी विकास संस्था मुंबईच्या अंतर्गत दलित ग्रामीण साहित्य शब्दकोश (तीन खंड) संपादनाच्या समितीवर कार्य केले. विविध विद्यापीठाच्या अभ्यास मंडळ, बहि:स्थ परीक्षक, प्रबंधाचे परीक्षण इत्यादि कार्य अत्यंत निष्ठेने केले. या दीर्घ प्रवासात भेटलेले विद्यार्थी, सहकारी संस्थाचालक आणि प्रशासनातील मान्यवर यांच्या प्रती जिव्हाळा वाढला.

    या सर्वांचा सहवास मला चैतन्यदायी वाटला. निराशा नव्हतीच, आशा पल्लवित होत होत्या. म्हणून आज स्वार्थपणानं म्हणेन की, "तृप्त मी, अतृप्त मी, तरीही संतृप्त मी" अशी भाव विश्वातली सद्भावना आणि लौकिकप्राप्त जगातली मी निर्माण केलेली स्वतःची ओळख, प्रसिद्धी मला लाभली. अहंगंडाचा ऱ्हास आणि न्यूनगंडाचा निरास करीत माझा विजयरथ जीवनाच्या विजयपथावर वाटचाल करीत राहिला. याचे समाधान वाटते.

    -प्राचार्य डॉ. किसन पाटील

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१८ मधून)

      August 11, 2022