वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
मराठी दौलतशाहीची शान असलेल्या आणि अटकेपार झेंडा फडकविणाऱ्या कर्तबगार पुरुषांची मालिका पाहण्याचे भाग्य लाभलेल्या शनिवारवाडय़ाच्या वास्तुशांतीला २२ जानेवारी रोजी २८५ वर्षे पूर्ण झाली.
त्या निमित्ताने शनिवारवाडय़ाची माहिती.
पराक्रमी थोरले बाजीराव पेशवे यांनी माघ शुद्ध तृतीया या तिथीला (शके १६५१) म्हणजेच १० जानेवारी १७३० रोजी भूमिपूजन करून शनिवारवाडय़ाच्या बांधकामाचा प्रारंभ केला. त्या दिवशी शनिवार होता. पहिल्या टप्प्याचे बांधकाम पूर्ण होऊन २२ जानेवारी १७३२ रोजी वाडय़ाची वास्तुशांत झाली, त्या दिवशीही शनिवार होता. वास्तुशांतीला २३३ रुपये आठ आणे खर्च आला होता. तीनशे वैदिकांनी वास्तुशांतीचे धार्मिक विधी केले. हा वाडा शनिवार पेठेमध्ये असल्याने त्याचे नाव शनिवारवाडा असे ठेवले गेले. १७३२ नंतरही या वाड्यात वारंवार नवीन बांधकामे, बदल होत राहिले. बुरुजाचे दरवाजाचे काम होण्यास १७६० हे वर्ष उजाडले. शिवराम कृष्ण लिमये ऊर्फ खासगीवाले यांच्या देखरेखीखाली हे बांधकाम झाले. बाजीरावांचा महाल, सदर, दफ्तरखाना, फडणीस-चिटणीसांचा फड, जवाहिरखाना आणि भुयाराची विहीर असे शनिवारवाडय़ातील पहिल्या टप्प्याचे बांधकाम झाले होते. पूर्वी पेशव्यांचे कुटुंब लहान होते. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या वाढल्यामुळे वाडय़ाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला. नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत वाडय़ाला तटबंदी करण्याचे ठरविले. मात्र, पुण्यामध्ये पेशव्यांनी कोट बांधला तर सिंहगडाला शह बसेल अशी भूमिका घेत सचिवांनी छत्रपती शाहू महाराज यांच्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे तटबंदीचे बांधकाम थांबविण्याचे आदेश आले. मात्र, नानासाहेबांनी छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन वाडय़ावर शत्रूकडून घातपाती कृत्ये तसेच हल्ला होऊ शकतो हे ध्यानात घेऊन तटबंदी उभारण्यात येत आहे, असे स्पष्ट केले. त्यानंतर परवानगी मिळाली आणि पायाच्या दगडकामावर विटांचे बांधकाम करून तटबंदी उभारण्यात आली, शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि तिच्या चारही बाजूने ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. तटबंदीला पाच दरवाजे असून, त्यांना अनुक्रमे दिल्ली, अलीबहाद्दार किंवा मस्तानी, खिडकी, गणेश, नाटकशाळा ऊर्फ जांभूळ दरवाजा ही नावे आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमधे असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठोकून ते भक्कम केलेले आहेत. यांत दिल्ली दरवाज्याची उंची २१ फूट असून रुंदी १४ फूट आहे. हाच सर्वांत मोठा दरवाजा आहे. हा दरवाजा अजून सुस्थितीत आहे. वाड्याच्या सर्व तटांवर मिळून २७५ शिपाई, रात्रंदिवस ५०० स्वार व वाड्यातील अंतर्गत बंदोबस्तासाठी १००० हून अधिक नोकर होते.
१८०८, १८१२, १८१३ या वर्षी छोट्या-मोठ्या आगी लागल्याच्या नोंदी सापडतात, तर १७ नोव्हेंबर १८१७ ला वाड्यावर ब्रिटिशांचे निशाण लागले. त्यानंतर येथे काही काळ पुण्याचा पहिला कलेक्ट र हेन्रीत डंडास रॉबर्टसन राहत होता. त्यानंतर वाड्यात तुरुंग, पंगुगृह, पोलिसांची निवासस्थाने होती. १८२८ मध्ये वाड्यास मोठी आग लागली व आगीत बहुतेक सर्व इमारती जळाल्या. पुढे तब्बल ९० वर्षांनी वाड्याची दुरवस्था संपण्याचा योग आला. १९१९ मध्ये वाडा संरक्षित स्मारक म्हणून जाहीर झाला व वाड्याचे उत्खनन करण्यास सुरुवात झाली. त्या काळी वाड्यात कोर्टासाठी वापरण्यात येणारी इमारत १९२३ पूर्वी उत्खननासाठी पाडण्यात आली. शनिवारवाड्यासंबंधी अनेक घटना, दुर्घटना आहेत. वाड्यातील पेशव्यांच्या कार्यालयात अनेक वीर आणि मुत्सद्दी येत. राजकारणाचे येथे फड रंगत; पेशव्यांचा दरबार येथेच होता. पेशव्यांच्या घरांतील मुलामुलींची लग्ने याच वाड्यात होत. शनिवारवाड्यासमोरील पटांगणात मोहिमेला जाणारे सैन्य जमे. पुढे जाहीर सभा होऊ लागल्या. आचार्य अत्र्यांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ याच पटांगणातून लढवली. वाड्याच्या पटांगणातील मारुतीस सभामंडप होता. हे मंदिर लॉइड्ज पूल (हल्लीचा नवा पूल किंवा शिवाजी पूल) बांधणार्या केंजळ्यांनी बांधले. मंदिरात १९ मार्च १९२४ रोजी मारुतीची मूर्ती बसविण्यात आली. हा मारुती बटाट्या मारुती म्हणून प्रसिद्ध आहे.
शनिवारवाड्याची इमारत २१ फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण ९५० फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरूज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला पाच मोठे दरवाजे व नऊ बुरूज आहेत. येथून जवळच मुठा नदी वाहते. तटाला ९ बुरूज असून सर्वांवर तोफा बसवण्याची सोय केलेली आहे. यांपैकी 'पागेचा बुरूज' आतून पोकळ असून त्याच्या पायथ्याशी मध्यभागी बांधून काढलेला एक गोल खड्डा आहे. त्यात तोफांचे गोळे ठेवत असत. दिल्ली-दरवाज्यावर नगारखाना आहे. आगीच्या प्रलयातून वाचलेला अस्सल पेशवेकालीन शाबूत असलेला भाग हा एवढाच. देवडीच्या भिंतीवर शेषशायी विष्णू, गणपती या दैवतांची चित्रे काढली आहेत. ती आता बरीच खराब झाली आहेत. वाड्याच्या आतल्या भागांमध्ये काय चालले आहे, हे बाहेरच्या माणसांना दिसू नये म्हणून दिल्ली दरवाजा, देवडी आणि आतला चौक नागमोडी रचनेत आहे. शनिवारवाड्यातील गणेश रंगमहाल हा नानासाहेब पेशव्यांनी १७५५मध्ये बनवून घेतला. गणेशोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करता यावा हा त्यामागचा उद्देश होता. येथे एका वेळीशंभर नर्तकी नृत्य करू शकत असत. महालाच्या एका टोकाला सोन्याचा पत्रा असलेली संगमरवरी गणेशमूर्ती होती, तर दुसर्यास टोकाला कारंजी व सुंदर फुलबाग होती. फुलांचा सुगंध व कारंज्यांचा नाद यामुळे महालात बसणे हा सुखद अनुभव असे. पुण्यातील पेशवे दफ्तरात पेशव्यांच्या खजिन्याची मोजदाद दिलेली आहे. या कागदपत्रांनुसार पेशव्यांच्या शनिवारवाड्यातील रत्नशाळेत ५१४०२ हिरे, ११३५२ माणके, २७६४३ पाचू, १७६०११ मोती, ४३५ नीलम, ४३२ वैडुर्य, ४१७ पुष्कराज, ७५ गोमेद, ४४४ पोवळी, ३७८ करड्या, १५६२ पिरोजा, १९१२ करिपोला (कोरल), ४९७ लसण्या असे मौल्यवान खडे होते. यातील बहुतांशी खजिना इंग्रजांनी चोरून नेला. उरलेला खजिना बाजीरावानंतर त्याचा दत्तक पुत्र नानासाहेब याला मिळाला. कानपूर आणि विठूर-ब्रह्मावर्तमध्ये पराभव झाल्यानंतर नानासाहेबांना हा खजिना सोबत नेणे शक्य नव्हते. अतिमौल्यवान जडजवाहीर सोडून राहिलेला खजिना त्यांनी तेथील एका विहिरीत लपवला. इंग्रजांना हेरांकडून त्याची माहिती मिळाली. त्यांनी तो खजिना बाहेर काढला. कर्नल गॉर्डन अलेक्झांडर याने लिहून ठेवलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. त्यात ३० लाख रुपयांची सोन्या-चांदीची नाणी, ताटे, वाट्या, इतर भांडी, कित्येकशे शेर वजनाची चांदीची अंबारी आणि ७० लाख रुपयांचे दागिने, जडजवाहिरे असा एकूण एक कोटी रुपयांचा खजिना त्या वेळी ब्रिटिशांना मिळाला होता.
-- संजीव वेलणकर, पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट
मनुष्याला आपल्या आयुष्यात प्रत्येकक्षणी सतत काहीतरी हवे असते. आणि या हव्यासापोटी तो आपले सामाजिक कर्तव्य विसरत चालला आहे. शिक्षण, व्यवसाय, नोकरी करत असताना सामाजिक बांधीलकीचे भान ठेवणे गरजेचे आहे, आणि काही व्यक्ती ठेवतातही. त्यापैकीच खामगावचे एक कलाशिक्षक संजय गुरव. प्राणीमात्रांची सेवा करून इतरांनाही प्रेरणादायी ठरणारा छंद त्यांनी जोपासला आहे.
आजच्या ग्लोबलायझेशनच्या युगात बहुतांश पालक आपल्या मुलांना घर, शाळा, शिकवणी वर्ग, संगणक, टीव्ही आणि मोबाइल या व्यतिरिक्त इतरत्र डोकावूनसुद्धा पाहू देत नाहीत. जग जवळ आले असले तरी विद्यार्थ्यांना आजूबाजूला आढळणारे प्राणी, पक्षी कोणते? याची माहिती नसते. पूर्वी ‘चिव ये, दाणा खा, पाणी पी अन् भुर्र्र उडून जा’, असे लहानपणी मुले खेळत होती. बालगोपाल चिमण्यांच्या चिवचिव आवाजाचा, भुर्र्र उडण्याचा मनसोक्त आनंद घेत असत. परंतु, आज हा प्रकार अनुभवाला मिळत नाही. तीन वर्षांपूर्वी खामगाव येथील र्शी अ. खि. नॅशनल हायस्कूलमधील कलाशिक्षक संजय माधव गुरव, त्यांची दोन मुले, पत्नी व मित्र विजय खंडागळे यांनी एक प्रयोग करून बघितला. सुरुवातीला अंगणात वृक्षलागवड केली. त्यामुळे विविध पक्षी येऊ लागले. सोबतच खार, मुंगूस, सरडे, हिरवा सरडा, चिमणी, बुलबुल, सूर्यपक्षी, मैना, साळुंकी, चष्मेवाला, शिंपी, पिंगळा, होला, दयाळ, राखी वरवट्या, काळी मैना, ब्राrाणी मैना यांची ओळख छोट्या मुलांना व मित्रांना करून देण्याचा छंद त्यांना जडला. नंतर या पक्ष्यांसाठी अंगणात 22 बाय 33 फूट लांबीचे चार पाणवठे तयार केले. पाणवठय़ाच्या वरच्या बाजूला 12 फूट उंचीवर एक लाकडी घरटे तयार करून लावले. त्या ठिकाणी नियमित अन्न टाकणे सुरू ठेवले. दोन महिन्यांनंतरच त्या घरट्यात ब्राrाणी मैनेने दोन पिलांना जन्म दिला, हे त्यांचा मुलगा संदेशने आनंदाने नाचून सांगितले. हा आनंद पैसे देऊनही विकत मिळत नाही, असे वाटल्याने त्यांनी घरट्यांची संख्या वाढवली. मातीच्या मडक्यांची घरटी तयार केली, परंतु पक्षी येईनात. म्हणून सहा महिन्यांनी मडक्याच्या तोंडावर चिमणीच्या आकाराचे छिद्र पाडले व त्यावर खरड्याचे आवरण लावले. आणि अवघ्या अध्र्या तासातच दोन्ही मडक्यांमध्ये चिमण्यांची ये-जा सुरू झाली. आजपर्यंत या घरट्यात मैना व चिमण्यांनी दहा-बारा वेळा आपल्या पिलांना जन्म दिला. हा अनुभव खरंच आजच्या धकाधकीच्या जीवनात लहानांपासून मोठय़ांपर्यंत सर्वांना सुखदायक ठरणारा आहे.
काल परवा कुणीतरी मराठी भाषा मरणाच्या उंबरठ्यावर...... मराठी मराठी करणारांच्या नाकाला मिरच्या झोम्बाव्यात असे वादग्रस्त विधान करून खरं तर मराठीविषयी परखड मत मांडले. आपल्याला मराठी सही करण्याची देखील लाज वाटणारांनी मराठी भाषा अस्तित्वात राखण्याऐवजी व्यवहारशून्य भाषा अशी अवहेलना करण्याचे धारिष्ट्य दाखविले आहे.
महाराष्ट्र शासन व्यवस्था इंग्रजीच्या आहारी गेलेली आहे. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थीची यादी इंग्रजीतून प्रसिध्द केलेली आहे. पोट भरण्याची मारामार, गरीब, गरजू आणि ग्रामीण भागातील ज्यांना साधं मराठीचं ज्ञान अवगत नाही.त्यांना इंग्रजीचा आधार घेऊनच सुविधा प्राप्त होणार असतील तर आपले सत्ताधारी मराठीच्या नावाने २७ फेब्रुवारीला ज्येष्ठ साहित्यक, नाटककार, व कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्ताने मराठी भाषा दिन साजरा करतील .’जय हो’ चा उद्घोष करीत मराठीचा गुलाल या दिवसापुरता सर्वत्र उधळेल.
आम्ही मराठी माणसे इंग्रजीच्या इतके आहारी गेलेलो आहोत की, मराठी भाषा लिहिणे ,वाचणे, बोलणे वा तिच्या अभ्यासासाठी आणि जीवन व्यवहारासाठी माध्यम म्हणून उपयोग करणे यात आपल्याला अभिमान किंवा गौरवास्पद वाटण्यापेक्षा कमीपणा वाटत आहे. संत ज्ञानेश्वरांनी “ती अमृतालाही जिंकणारी भाषा आहे “ हे मराठीला दिलेले सुवर्ण रत्नजडित प्रशस्ती पत्र.
एखाद्या “शिंपी कामाचे दुकान’ या ऐवजी ज्ञानेश्वर अथवा तुकारामासारख्या संताचे नाव देऊन टेलरिंग फर्म अस्तित्वात येते. इंग्रजी भाषा हि जगातील एक समर्थ, सुंदर, संपन्न,महत्वाची रसाळ भाषा आहे. या बद्दल दुमत नाही. त्या भाषेचा मत्सर करण्याचे कारणही नाही. इग्रजीशिवाय जगात ज्ञान मिळत नाही. इंग्रजी ज्ञानभाषा आहे.हे आपण बहुतेक जन सांगताना आढळतात, इतर सर्व भाषा अज्ञानभाषा आहेत का....? पण अवास्तव महत्व देण्याचे कारण काय....?
कुटुंबातील आईची जागा हि आईचीच आणि मावशीचीच जागा मावशीला हे अलिखित सूत्र आहे त्या प्रमाणे भाषेबाबतही असले पाहिजे. मुंबई शहरात मराठींच्या शाळा ओस पडताहेत. इंग्रजी शाळा अव्वाच्या सव्वा देणगी, फी आकारून गब्बर होत आहे. श्रमजीवी, कष्टकरी समाजाला दोन वेळेच्या अन्नाची भ्रांत तरी देखील पोटाला चिमटा काढून पालक पाल्य इंग्रजीत शिकला पाहिजे हा अट्टाहास का करताहेत...? हि स्पर्धा महाराष्ट्रातील शेतमजुराला,कामगारांना परवडणारी नाही. इंग्रजी शिडीचा आधार घेऊन गरीबांचा फायदा तर नक्की नाही. मुंबई शहरात मराठी शाळा आहेत. त्यामध्ये इंग्रजीचे अध्ययन होत आहे. या शाळांमध्ये गरीब वा अशिक्षित पालकांच्या मुलांना थारा नाही. पाल्याच्या प्रवेशापूर्वी पालकांची मुलाखत घेऊन त्यातून प्रवेश ठरविला जातो. जे पालक मुळात अशिक्षित आहेत त्यानी कधी शाळा कॉलेज पाहिले नसेल त्यांना, त्यांच्या मुलांना उच्चभ्रू वस्तीतील शाळा प्रवेश नाकारून नेमके काय साध्या करतात......? मराठी बरोबर इंग्रजीचा उत्तम अभ्यास आजच्या तरुण पिढीने करावा. पण इंग्रजी माध्यमात मराठीला दुजाभाव देऊन नाही.
कवी सुरेश भट यांच्या खालिल रचनेतून आपणास बरेच काही उमजले असेलच.
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी !
आपुल्या घरात हाल सोसते मराठी !!
मराठीची महती आपण गातो, प्रसार करतो. मराठीचा ठसा सर्वत्र उमटविण्याचा प्रयत्न करतो. पण शासन याबाबत किती उदासीन आहे. महापालिका , नगरपालिका मराठी संदर्भात किती बेफिकीरीने वागतात. मंत्री,आमदार, खासदार, नगरसेवक अन्य लोकप्रतिनिधी चे इंटरनेटवर ईमेल आहेत. किती तरी लोक त्यावर त्यांच्याशी सर्व सामान्य विषयावर मराठीतून हितगुज करू पाहतात. समस्यांचा उहापोह करू इच्छितात . समस्या निवारणाचा हेतू असतो. पण कोणता प्रतिनिधी त्याची दखल घेतो ? आता पर्यंत त्यांनी कुणाला उत्तरे दिली आहेत. आम्ही आपल्या प्रश्नावर कार्यवाही करू ….! कुणी तरी कळवीत आहे का....? संगणक प्रणाली वरून जर लोकप्रतिनिधीना लोकांशी सुसंवाद साधण्याचे साधन उपलब्ध झाले असेल तर काय हरकत आहे. मराठी पत्रे आली तर त्या संगणकांवर त्या प्रकारचा font असावयास हवा. आपण इतके गांभीर्याने का घेत नाही . मंत्रालयातील मुख्यमंत्री असो वा मंत्री साधी पोहच पावती देणे देखील जीवावर येते.
मी मराठी आणि माझा महाराष्ट्र मराठ्यांचा …छे इतके मराठी संदर्भात गंभीरतेने घेतले असते तर मात्र आपण मराठी भाषेच्या प्रगतीत मागासलेले नसतो. “पिकते तेथे विकत नाही” असे म्हणतात . तसेच महाराष्ट्रात राहून मराठी भाषेचे महत्व जाणवत नाही. आई समोर असताना आईचे महत्व जाणवते का...? आपण तिच्या पासून दूर जातो तेव्हा तिचे महत्व कळते. माणसाच्या जीवनात मातेचे स्थान जेवढे परमोच्च असते तेवढेच मातृभाषेचे असावयास हवे. पण आज आपल्या मातृभाषेसंदर्भात जे चित्र दिसत आहे ते दुर्दैवाने फार वेगळे आहे.
आपल्याच प्रांतात आपल्याच भाषेचे वर्चस्व असले तर इतर आपल्याशी नमून वागतील. हेच जर तुम्ही दक्षिणेत तुमच्या मातृभाषेत अथवा राष्ट्रभाषेत विचारले तर ते त्यांचा खाक्या काय असतो ते दाखवितात की नाही. अहो...! सध्या जन्मलेल्या मुलांना आई ऐवजी मम्मीचे ढोस पाजणारे संस्कृतीदर्शन मराठी भाषा संवर्धनासाठी उपयुक्त नाही. मराठी भाषा हे संवाद आणि सांस्कृतिक देवान घेवाणीचे माध्यम. आपल्या मुलांवर आपल्या भाषेचे संस्कार जितके अधिक विकसित करू तितक्या सहजतेने मुले ज्ञान ग्रहण करतील. आपल्या भाषेविषयी आपण मराठी बांधवांचे हित, खऱ्या अर्थाने येथील संस्कृती, भाषा यांचा वारसा जपण्यासाठी, स्वाभिमान दर्शविण्यासाठी माझ्या माय मराठीला सर्वोच्च स्थान मिळविण्यासाठी आग्रह धरला पाहिजे.
जगाच्या कानाकोपरयात मराठीला घेऊन जाणे मुश्किलीचे नाही आणि नसणारही. फक्त इच्छा हवी ती आपल्या राज्यकर्त्याकडे नाही. काही झाले तरी सर्व स्तरावर मराठीचा अभ्यास व्हायला पाहिजे. इंग्रजी प्रमाणे मराठी भाषेची अत्यंत निकड आहे. जेव्हा मातृभाषेवर प्रभुत्व असेल तेव्हाच परकीय भाषेवर प्रभुत्व मिळविता येते. मातृभाषा, राजभाषा हेच खरे राष्ट्राचे मानदंड . लोकभाषा लोकशाहीचा कणा. भाषिक विद्वानांना परिचित आहे. पण शासन प्रणालीला हे कोणी सांगायचे...!
-- श्री अशोक भेके,
घोडपदेव
आपली पृथ्वी कधी निर्माण झाली? तिच्यात कोणकोणती स्थित्यंतरं घडली? तिचं आणि तिच्यावर राहणार्या सजीवांचं अस्तित्व किती काळ टिकणार आहे? आणि शेवटी पृथ्वीचा अंत कधीकाळी आणि कशारितीनं होणार आहे? हे प्रश्न, मानव विचार करू लागला तेव्हापासूनच त्याला सतावीत आहेत आणि तो या प्रश्नांची अुत्तरंही तेव्हापासूनच शोधतो आहे.
सोमवार , २३ जानेवारी २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक जनहीत याचिका फेटाळली आणि १ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१७ - १८ सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर करण्याचा मार्ग मोकळा झाला . केंद्र व राज्य सरकारांच्या संविधानिक आणि प्रशासकीय कार्यकक्शा पूर्णपणे वेगळ्याच असल्याने केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात हरकत असूच शकत नाही हे यावेळी सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे . तसेच त्याच दिवशी निवडणूक आयोगानेही दोन अटींवर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास केंद्र सरकारला परवानगी दिली आहे . याबाबत आपल्या देशातील काही विरोधी पक्षांनी पाच राज्यात फेब्रुवारी २०१७ ; मधे होणाऱ्या विधान - सभान्च्या निवडणुका लक्षात घेता केंद्र सरकारला यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारी ला मांडू देऊ नये अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती . पण आयोगाने ती मागणी पूर्णपणे मान्य केलेली नाही . केंद्र सरकार ला १ फेब्रुवारी २०१७ रोजी २०१७ - १८ सालचा अर्थसंकल्प सादर करता येईल ; मात्र उत्तर प्रदेश , पंजाब , गोवा , उत्तराखंड आणि मणिपुर या विधानसभा निवडणुकांना लगेचच सामोर्या जाणाऱ्या राज्यांत कोणत्याही नवीन योजना - प्रकल्पांची घोषणा अर्थसन्कल्पात असू नये आणि या पाच राज्यातील प्रकल्पाच्न्च्या कामगिरिचा आलेख अर्थसन्कल्पिय भाषणात अधोरेखित केला जाऊ नये या अटींवर अर्थसंकल्प फेब्रुवारी २०१७ सादर करण्याची परवानगी निवडणूक आयोगानेही दिली आहे . त्यामुळे आता १ फेब्रुवारीला २०१७ - १८ साठीचा अर्थसंकल्प सादर होण्याचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे .
निवडणुकांच्या तोंडावर अशा काही गोष्टी होऊ शकतात याची अंदाज असल्याने तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३१ डिसेंबर २०१६ च्या रात्री शेतकरी , महिला , ज्येष्ठ नागरीक , लघु - उद्योग आणि दारिद्र्य - रेशेखालील जनता यांच्याशी संबंधित काही मुद्द्यान्चा समावेश असणारे भाषण राष्ट्राला उद्देशून केले नसावे ना ?
असो .
दरवर्षी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याआधी त्या अर्थसंकल्पकडून काही अपेक्षा बांधताना , काही अंदाज व्यक्त करताना मला विंदा करंदीकर यांची एक कविता नेहमीच आठवत राहाते . त्यात कविवर्य म्हणतात . . . .
" इतिहासाचे अवजड ओझे
डोक्यावर घेऊन ना नाचा
करा पदस्थल त्याचे आणिक
त्यावर चढूनी भविष्य वाचा " .
अर्थसंकल्प संबंधित अंदाज - अपेक्षा हे असंच काहीतरी नसते का ? आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा आकार दोन लाख कोटी डॉलर्स म्हणजेच २ ट्रिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १३६ लाख कोटी रूपये आहे हे लक्षात घेतले की तर जास्तच असॆ वाटायला लागते .
त्यातच मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत कोणताही अंदाज वर्तवण्यात अनेक अडचणी असतात . कारण या सरकारचे याआधीचे दोन्ही अर्थसंकल्प क्रांतिकारी असण्यापेक्षा उत्क्रांती - कारी जास्त होते ( अर्थात अर्थसंकल्प दरवेळी क्रांतिकारी असण्याची मुळात आवश्यकता नसतेच . ) असॆ ग्रुहित धरायचे तर ८ नोव्हेंबर २०१६ चा निशचलनिकरनाचा ( Demonetisation ) निर्णय असा काही भन्नाट होता की काहीच ग्रुहित धरता येऊ नये . शिवाय २०१६ या एका वर्षात या सरकार ने निश्चलनिकरनाव्यतिरिक्तही सर्जिकल स्ट्राइक ते वन रंक - वन पेन्शन , आणि स्वच्छ भारत ते रघुराम राजन यांना न दिलेली मुदतवाढ , लष्कर - प्रमुखान्ची वरिष्ठता डावलून केलेली नियुक्ति ते सरन्याधीशान्ची नियुक्ति , वस्तु आणि सेवा कराची सुरू होणारी अंमलबजावणी अशी केलेली कामगिरी अंदाज बांधणी अवघड करते . ( अगदी अशक्य नसले तरी . )
त्यातच नवीन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष दोनाल्द त्रम्प यांनी केलेल्या घोषणा , brexit सारख्या घटना , आपल्या देशाच्या एकूण आयातीच्या ७० टक्के वाटा असणाऱ्या तेलाच्या आंतरराष्टीय बाजारात गेल्या वर्षभरात baral मागे ३० डॉलर वरून ५५ डॉलर पर्यंत वाढलेल्या किंमती ( २०१७ अखेर पर्यंत या किंमती ६० डॉलर्स आणि २०१८ अखेर पर्यंत याच किंमती ६५ डॉलर्स होतील असा काहींचा अंदाज आहे . ) याही घटकांचा विचार इथे करावाच लागेल .
त्यातही येत्या अर्थसंकल्पाबाबत कोणताही अंदाज बांधण हे काम जास्तच कठीण असण्याचे अजून एक कारण म्हणजे जानेवारी २०१७ च्या सुरूवातीस " इंडिया टुडे " या नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी केलेले एक सूचक विधान . माननीय पंतप्रधान त्या मुलाखतीत असॆ म्हणतात की " नीती " ( Policy ) आणि " रण - नीती " ( Execution Strategy ) यात फरक असलाच पाहीजे . " . आणि अर्थसंकल्प , अगदी कोणत्याही काळातील , कोणत्याही सरकारचा , कोणताही अर्थसंकल्प हा तर नीती आणि रण - नीति यांच मिश्रण च असते .
शिवाय यावर्षी अर्थसंकल्प नेहमीप्रमाणे फेब्रुवारी अखेरीस न येता फेब्रुवारीच्या सुरूवातीसच येत आहे . त्यामुळे व्यावसायिक क्षेत्राच्या डिसेंबर अखेरीस असणाऱ्या कामगिरीची पुरेशी दखल पार्श्वभूमी म्हणून नाही . यंदा पावसाचे प्रमाण समाधान - कारक असले तरी Demonitisation चा नेमका परिणाम जाणून घेण्यास त्याचा उपयोग होऊ शकला असता . प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष करान्पासूनचे उत्पन्न वाढले आहे असॆ सांगण्यात येत असले तरी वाहन - विक्रिच्या प्रमानाने डिसेंबर महिन्यात गेल्या अनेक वर्षांतली सर्वात खालची पातळी गाथल्याची बातमीही आहे . त्यातच येत्या वर्षात वित्तीय तुटीचे प्रमाण तीन टक्के ठेवण्याची घोषणा फार आधीच अर्थमन्त्र्यानी केली आहे . एकंदरीतच जागतिक अर्थकारनाचे तान - मान पाहात आन्तरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या देशाचा आर्थिक वाढीचा दर येत्या वर्षात आधीच्या ७ . ६ टक्क्यांऐवजी ७ . २ टक्केच असेल असा अंदाज व्यक्त केला आहे . त्याशिवाय सर्वात जास्त वेगाने वाढणारया पहिल्या पाच अर्थव्यवस्थेत आपल्या देशाचा समावेश होत नाही असा कुठल्या एका पाहणीचा अलीकडच्या काळातला निष्कर्ष आहे ना !
अर्थातच आपल्या देशाची अर्थ - स्थिति अगदीच कवि यशवंत म्हणतात त्याप्रमाणे
" जूँ बैसले मानेवरी
चाबूक हा पाठीवरी
या कर्दमी मार्गावरी
चौखूर धावावे परी "
अशीही नक्कीच नाहीये .
अशा पार्श्वभूमीवर येणाऱ्या अर्थसन्कल्पात सध्याच्या एप्रिल ते मार्च या आर्थिक वर्शाएवजी जानेवारी ते डिसेंबर असॆ आर्थिक वर्ष जाहीर होण्याची मोठी शक्यता वाटते .
मोदी सरकार सत्तारुढ झाल्यापासून त्यांनी क्रुशी आणि ग्रामीण भागासाथी सातत्याने प्रयत्न केले आहेत . त्यातच २०१४ आणि २०१५ सालच्या तुलनेत २०१६ साली पावसाचे प्रमाण निश्चितच चांगले होते . मात्र Demonitisation ने तात्पुरता का होईना , पण या क्षेत्राबाबत धक्का बसला . त्यामुळे येत्या अर्थसन्कल्पात काही घोषणा नक्कीच असणार .
येत्या अर्थसन्कल्पात कंपनी कर ( कॉपोर्रेट टेक्स ) दरात काही प्रमाणात तरि घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही . तसेच आता वस्तू - सेवा कराची अंमलबजावणी बरीचशी मार्गाला लागल्यामुळे आता Direct Tax Code ( DTC . . . किती काळानंतर हा शब्द ना ! ) म्हणून जरी नाही तरी वैयक्तिक आय - करात काही बदल येत्या अर्थसन्कल्पात होण्यास वाव आहे . करमुक्त उत्पनाच्या प्राथमिक पातळीत वाढ होणे ( भरीव वाढ असेलच असॆ मात्र नाही . ) , करपात्र उत्पनाच्या पातळीत बदल होणे आणि कराचे दर कमी होणे अपेक्षित आहे . या सर्वच गोष्टी सगळ्यांच्याच एकदम मनासारख्या , आणि त्याही एकाच फटक्यांत , एकाच वेळी होतील असॆ नाही हे उघड आहे . पण होतील . अघोषित मालमत्ता , अघोषित उत्पन्न याबाबत मोदी सरकारने गेल्या अडीच - तीन वर्षात अनेक उपाय - योजना अंमलात आणल्या . त्यांना , विशेषतः गेल्या काही महिन्यांत जाहीर केलेल्या योजनांतून सरकारला मिळालेल्या कर - रूपी उत्पनाचा विचार करता अशी शक्यता वाटते .
त्यातही माझा स्वतःचा असा अंदाज आहे की येत्या अर्थसन्कल्पात वैयक्तिक आयकरात असॆ बदल करण्यात येतील की कर भरन्याच्या रकमेत बहुसंख्य करदात्याना लाभ मिळेल ; पण उत्पनाच्या करा पासून सरकारला होणाऱ्या महसुलात फारशी घट होणार नाही .
त्यासंदर्भात अजून एक गोष्ट म्हणजे Demonitisation च्या एका टप्प्यावर पंतप्रधान गरीबी विकास योजना सुरू करण्यात आली . त्यात जमा झालेला पैसा चार वर्षांच्या मुदतीसाथी " ना कर - ना व्याज " तत्वावरच्या रोख्यात गुंतवणूक करण्यात आला . विविध करान्च्या थकबाकिदाराना आणि बन्कान्च्या बुडित - खाती कर्जdaaraanaa One Time Settlement च्या ऐवजी पर्याय म्हणून या मार्गाचा उपाय येत्या अर्थसन्क्ल्पात सुचवला जाऊ शकतो . उदाहरणार्थ , थकित कराची किंवा बुडित कर्जाची रक्कम भरल्यावर दंड भरण्याऐवजी ५ - ७ वर्षे ही रक्कम सरकार विनव्याजी वापरेल आणि त्यानंतर ती थकित रकमेतून वळती करून घेण्यात येईल असा प्रस्ताव असू शकतो .
जन - धन योजना आणि जन - सुरक्षा योजना यांना जितका उत्तम प्रतिसाद मिळाला तितका बन्कान्च्या माध्यमातून राबवन्यात आलेल्या " अटल पेन्शन योजना " ला मिळाला नाही . या योजनेत धारकाला होणारा फायदा चांगला असला तरी त्यात वारंवार केले गेलेले बदल आणि या ना त्या कारणाने अनेक बँकानी दाखवलेली अनास्था यामुळे ही योजना आधीच्या कॉंग्रेस सरकारच्या " राजीव गांधी ईक्वीटी सेविंग्स स्किम " सारखी झाली . पण NPS सारख्या योजनांचा सरकार आणि धारक या दोघांनाही झालेला आणि होणारा फायदा , तसेच अगदी अलीकडेच ६० वर्शावरील व्यक्तिसाठी आयुर्विमा महामंडळाने सुरू केलेली पेन्शन योजना लक्षात घेतात NPS ( नेशनल पेन्शन स्किम ) ला भरीव चालना येत्या अर्थसन्कल्पात मिळू शकते .
सर्वसाधारपणे सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आसपास आपल्या देशाच्या केंद्रीय अर्थसन्कल्पाचा आकार असतो . अशा आकाराच्या येत्या अर्थसन्कल्पात संरक्षण , रस्ते - बांधणी , आरोग्य (विशेषतः जन - औषधि योजना ) , शिक्षण , अपारंपारीक उर्जा या क्षेत्रांवर येत्या अर्थसन्कल्पात विशेष लक्ष पुरवले जाईल असा एक अंदाज आहे .
तसेच Demonitisation च्या नंतर येणाऱ्या या अर्थसन्कल्पात ग्रामीण भागात रोकड - विरहीत अर्थव्यवस्था ( कॅश - लेस एकॉनमी )"रुजवण्याच्या द्रुष्टीने भर देण्यात येईल असॆ वाटते . त्याद्रुश्तिने नाबार्दच्या भान्दवलात वाढ , विविध बँकांच्या याबाबतच्या योजनांना आर्थिक व तांत्रिक साह्य , अशा व्यवहारान्च्या सुरक्षिततेत वाढ होईल अशा उपकरण - निर्मितिला आणि त्याबाबतच्या कंपन्यांना चालना हेही येत्या अर्थसन्कल्पाचे वैशिष्ठ्य असू शकते .
ग्रुहनिर्माण क्षेत्राला प्रोत्साहन म्हणून ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदिजीनी जाहीर केलेल्या योजनाना मुदतवाढ , त्यांचा क्षेत्र - विस्तार , ग्रुह्कर्जावरील व्याजात आजमितिलामिळणाऱ्या कर - सवलत - पात्र दोन लाख रुपयांच्या मर्यादेत वाढ , कमी किंमतीला घरे उपलब्ध करणाऱ्या योजनांना प्रोत्साहन अशाही तरतूदी येत्या अर्थसन्कल्पात असू शकतात .
एकंदरीतच प्रचंड भांडवल , दीर्घकाळ आणि नागरिकांची गरज असॆ घटक असणाऱ्या क्षेत्रांत संबंधित प्रकल्प - निगडीत गुंतवणूक योजना आणि त्याची कर - रचनेशी घातलेली सांगड असा प्रकार अनेक क्षेत्रांत येत्या अर्थसन्कल्पात होऊ शकतात .
त्यातही केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची आजपर्यन्तची कार्यशैली पाहता कराचा दर वाढवला जान्यापेक्शा अधिभार ( सरचार्ज ) ची संख्या आणि प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त वाटते . अधिभार सुरू झाला की तो लगेचच मागे येत नाही ही करदात्यान्च्या द्रुष्टीने एक अडचण असली तरी केंद्र सरकारच्या द्रुष्टीने ती एक चांगली राजकीय व प्रशासकीय सोय असते . कारण अधिभारापासून मिळणारे उत्पन्न राज्य सरकारांच्या बरोबर वाटावे लागत नाही . त्यातून तूटही आटोक्यात ठेवण्यास मदत होईल . शिवाय वस्तु - सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे पहिली पाच वर्षे राज्य - सरकारांना द्याव्या लागणाऱ्या नुकसान - भरपाईसाठी निधी - उभारणी ही होईल . जर माजी अर्थमंत्री श्री . यशवंत सिन्हा यांचे वर्णन " रोल - बॅक सिन्हा " असॆ केले गेले असेल तर श्री . अरुण जेटली यांचे वर्णन " सरचार्ज जेटली " असॆ करावे लागेल ?
सरतेशेवटी , अर्थसंकल्प आणि अर्थमंत्री म्हणले की मला हटकून आर्य चाणक्य यांची आठवण येते . अर्थमंत्र्यांच्या नियुक्ति बाबतचे त्यांनी काही निकष सांगितले आहेत . त्यापैकी पहिला म्हणजे अर्थमंत्र्यांवर राजाचा ( हल्लीच्या परिभाषेत पंतप्रधानांचा पूर्ण विश्वास असला पाहिजे . अर्थमंत्री अरुण जेटली या निकषांवर पूर्ण उतरतात . ( नाहीतर मोदी लाटेत , आणि तेही अम्रुतसर सारख्या लोकसभा मतदार संघात निवडणूक हरूनही अर्थ खात्यासारखे मातब्बर खाते मिळत होय ! सुरूवातीस तर अर्थ आणि संरक्षण अशी दोन महत्वाच्या खात्यांचे मंत्रीपद ! ) . दुसरा निकष म्हणजे अर्थमंत्री नशिबवान असावा . त्याबाबत असणाऱ्या विविध स्वरूपाचे वेगवेगळे घटक याच लेखात आधीच आले आहेत . त्यामुळे आता भारतीय अर्थव्यवस्था आणि भारतीय नागरीक यांच्या नशिबात या अर्थसन्कल्पात काय लिहिले आहे याची १ फेब्रुवारी २०१७ पर्यंत उत्सुकतेने वाट पाहू . ( त्यानंतर त्याची चर्चा स्वतंत्र लेखांनी अनेकजण करतीलच . )
एक आवर्जून लक्षात ठेवण्याजोगी गोष्ट . . . .
अटलजीन्च्या सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याची वेळ बदलली . ( आधी संध्याकाळी पाच वाजता सादर होणारा अर्थसंकल्प तेंव्हापासून सकाळी अकरा वाजता सादर होऊ लागला . ) .
मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर होण्याची तारीख बदलली . ( त्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या दिवशी सादर होणार . )
मोदी सरकारने अर्थसंकल्प सादर करण्याची पध्दतीही बदलली . ("गेली ९२ वर्षे रेलवे अर्थसंकल्प स्वतंत्रपणे सादर व्हायचा . तो आता सर्वसाधारण अर्थसन्कल्पाचाच भाग असेल . )
अजून एका पध्दतीने गेल्या दोन वर्षांत अर्थसंकल्प सादर होण्यात बदल झाला आहे . याआधीची सर्वच अर्थसंकल्प सादर करण्याची भाषणे अर्थमंत्र्यांनी लोकसभेत उभे राहून केली आहेत . मोदी सरकारचे गेले दोन अर्थसंकल्प सादर करताना विद्यमान अर्थमंत्र्यांनी आपले अर्थसन्कल्पिय भाषण प्रक्रुती - अस्वास्थ्यामुळे बहुतांश वेळ खाली बसून केले आहे .
आपल्या पाच वर्षांच्या या कार्यकालापैकि जवळजवळ निम्मा काळ मोदी सरकार आता पूर्ण करत आहे . लोकसभेच्या पुढील निवडणुका २०१९ साली होण्याआधी येता अर्थसंकल्प वगळता अजून एकच अर्थसंकल्प मोदी सरकारच्या हातात आहे . त्यामुळे हा येता अर्थसंकल्प फार महत्वाचा आहे . अंमलबजावणीवर भर देणारा असा येता अर्थसंकल्प असावा अशीच त्यामुळे साहजिकच अपेक्षा आहे . Demonitisation च्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प येत असल्याने तर उत्सुकता जास्तच आहे .
काही अनुभव , काही अंदाज आणि काही अपेक्षा .
-- चंद्रशेखर टिळक
मोबाईल : ९८२०२९२३७६
गणपती......
कोणीतरी मुंबयवाल्यापैकी सक्याच्या म्हातार्याक विचारल्यान...
तात्यानू गणपती म्हणजे नक्की काय वो? जा म्हातार्यान सांगल्यान ता तुमका सांगतय....
अरे गणपती म्हणजे मातयेचो गोळो...प्रत्तेक टायमाक तुमका जाणीव करून देता... तुमकाय मातीच होउचा हा... तेवा माजा नकात.... मालवणी मुलकात ज्या घरात गणपती नाय ता घर सुद्धा हिशोबात धरणत नाय.... हीच घराची मर्यादा.... हीच घराची शोभा... एकच सण वर्षाचो जो घरात मयत झाला तरी होताच.... आमचे जिवय तोचआणी देवय तोच..
पण तुम्ही मुंबयवाल्यानी तेचो निकाल केलाय..... गटारार ... संडासच्या पाईपलायनीर.... गणपती बसवलास.... तेच्यानावान धंदो काडलास... सार्वजनिक गणपतिंचो....
आमच्या शास्त्रात एका देवाचे दोन मुर्ते एका जाग्यार नाय चलनत.... तर एक पुजेक आणी एक शोक ...
आवशीच्या घोवान तरी देवाचो शो केल्लो काय रे?
गटारावरच्या देवाकडे कसला पावित्र येतला रे? थय देवाच्या नावार अक्रीतच कुदतला..... थय दारूच चलतली...... सोमा गोमा बाईच बघुक येतले..... मायझयानु घरात सोवळा लावच्या शिवाय पुजा करून दाखवा रे.... नाय बापाशीन तुमची उत्तरपूजा घातल्यान तर माका इचारा....
आजय मालवणी मुलखात सगऴ्यादेवांका टोपी लावतीत.... पण गणपतीच्या फुड्यात कोण खोटा बोलाचा नाय....
वर्षभर ऩचुकता घेणारेसुद्धा गणपती आसापर्यंत घेणत नाय....
तुमका मतांसाठी देवाचो बाजार मांडणार्यांका ह्या काय समाजतला....
मेल्यानु झपला तर पाळा रे तेचा सगळा.... पण टिंगल करू नको... मातयेचो देव तो... तेका प्लास्टर चो करून पूजू नकात.... मातयेची पूजा करा... तेनिच तुमचा भला जातला....
म्हातारो पोट तिडकीन बोला होतो ... आणि समोरचे मुंबईकर सगऴे गायब झाले होते...
...
...
बापूर्झा
डॉ बापू भोगटे
भारतात बनलेला पहिला संगीतप्रधान बोलपट मुंबईच्या मॅजेस्टिक सिनेमामध्ये १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झाला.
इम्पिरियल मूव्हीटोन निर्मित, आर्देशीर इराणी दिग्दर्शित या हिंदी चित्रपटाचं नाव होतं ‘आलम आरा’! चित्रपटांमध्ये ध्वनीचे महत्त्व समजून इतर बोलपट प्रदर्शित होण्यापूर्वी इराणी यांनी आलम आरा प्रदर्शित केला. हा चित्रपट तेव्हा इतका लोकप्रिय झाला की, प्रेक्षकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी अक्षरश: पोलिसांची मदत घेण्यात आली होती.
‘आलम आरा’मध्ये पृथ्वीराज कपूर, मास्टर विठ्ठल, जुवैदा, जिल्लो आणि सुशीला यांनी भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाची कथा जोसेफ डेव्हिड यांनी लिहिली होती. या पहिल्या बोलपटाची लांबी १२४ मिनिटे इतकी होती. या चित्रपटात संगीताला उत्तम स्थान मिळाले होते. ‘आलम आरा’मध्ये एकूण सात गाणी होती. त्यापैकीच ‘दे दे खुदा के नाम पे’ हे भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खान यांनी गायले होते. ‘बदला दिलवाएगा या रब…, ‘रूठा है आसमान…’, ‘तेरी कातिल निगाहों ने मारा…’, ‘दे दिल को आराम…’, ‘भर भर के जाम पिला जा…’, आणि ‘दरस बिना मारे है…’ ही चित्रपटातील इतर गाणी आहेत.
राजकुमार आणि बंजारनच्या प्रेमकथेवर आधारित असलेला हा चित्रपट एका पारसी नाटकावर आधारित होता. ‘आलम आरा’ पाहण्यासाठी पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी चित्रपटगृहांबाहेर मोठी गर्दी जमली होती. लोकांना आवरण्यासाठी तेव्हा पोलिसांना बोलवावे लागले होते. त्यावेळी जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये पाच रुपयांत खरेदी केल्याचेही म्हटले जाते.
(WhatsApp वरून आलेली रंजक माहिती शेअर करत आहे)
लेखक: श्री. पु. ज्ञा. कुलकर्णी,
निवृत्त विद्युत अभियंता व गणितज्ञ, पुणे
प्राचीन काळातील ऋषीमुनींना सूक्ष्मासह मोठमोठ्या संख्यावाचनासाठीचे आवश्यक तेवढे उत्तम नि सखोल ज्ञान होते, हे रामायणासारख्या ग्रंथातील श्लोकांचा अभ्यास केल्यास ध्यानांत येते. आज रोजी आपण मात्र येवढ्या मोठ्या संख्या वाचण्याच्या फंदातच पडत नाही हेच खरे. लक्षांश, शतांश, दशांश आणि एक, दहा, शंभर, हजार, लाख, कोटी, अब्ज इथपर्यंतच आपली सर्वसाधारण मजल जाते. यापुढील संख्यावाचनाची आपल्याला प्रत्यक्ष जरी गरज भासत नसली तरी जेव्हा केव्हा अशी गरज भासते तेव्हा आपण दहा लाख, शंभर कोटी, हजार कोटी, हजार अब्ज अशा संज्ञा वापरतो. वाल्मीकी रामायणात अशा संख्यांचे नेमक्या शब्दात वर्णन करणारे श्लोक युद्धकांड सर्गात आले आहेत, ते पाहणे व समजून घेणे आपल्याला निश्चितच मनोरंजक वाटेल असे वाटते. कोटीच्या पुढील संख्यांसाठी येथे शंकू, महाशंकू, खर्व,पद्म इ. सारख्या संज्ञांची योजना केली आहे. असो.
रामायणाच्या युद्धकांड सर्गातील श्लोक ३३ ते ४० हे यादृष्टीने जास्त महत्वाचे आहेत. जिज्ञासूंनी हे श्लोक अवश्य अभ्यासावेत. किंबहूना संपूर्ण रामायण या निमित्ताने अभ्यासावे आणि आपला हा ऐतिहासिक ठेवा किती अमोल नि महत्वाचा आहे हे जाणून घ्यावे. आपल्या पूर्वजांचे गणिती ज्ञान किती समृद्ध होते ते जाणून घ्यावे. ’गणित’ या शब्दात इतर सर्व शास्त्रांचा समावेश होतो असे मला वाटते. येथे ते मूळ संस्कृत श्लोक दिले असून त्याखाली त्याचे मराठीत रुपांतर दिले आहे आणि त्याखाली त्या संख्या घातांकासह मुद्दाम आपल्या माहितीसाठी लिहून दाखवल्या आहेत. यादृष्टीने संस्कृत चा अभ्यास किती महत्वाचा आहे हेही ध्यानात येईल. हा अभ्यास आपण स्वतःहून करावा लागणार आहे, हे ध्यानात घेऊया.
डॉ.प्र.न.जोशी संपादित सार्थ वाल्मीकिरामायण भाग-३-युद्धकांड अष्टाविंश सर्गः श्लोक३३-४० पुढे नमूद केल्याप्रमाणे होत.
शतं शतसहस्राणां कोटिमाहुर्मनीषिणः ।
शतं कोटिसहस्राणां शंकुरित्यभिधीयते ॥३३॥
शतं शंकुसहस्राणां महाशंकुरिति स्मृतः। महाशंकुसहस्राणां शतं वृंदमिहोच्यते ॥३४॥
शतं वृंदसहस्राणां महावृंदमितिस्मृतम् महावृंदसहस्राणां शतं पद्ममिहोच्यते ॥३५॥
शतं पद्मसहस्राणां महापद्ममितिस्मृतम्। महापद्मसहस्राणां शतं खर्वमिहोच्यते ॥३६॥
शतं खर्वसहस्राणां महाखर्वमितिस्मृतम् । महाखर्वसहस्राणां समुद्रमभिधीयते।
शतं समुद्रसाहस्रमोघ इत्यभिधीयते ॥३७॥
शतमोघसहस्राणां महौघा इति विश्रुतः ।
एवं कोटिसहस्रेण शंकूणां च शतेन च ।
महाशंकुसहस्रेण तथा वृंदशतेन च ॥३८॥
महावृंदसहस्रेण तथा पद्मशतेन च ।
महापद्मसहस्रेण तथा खर्वशतेन च॥३९॥
समुद्रेण च तेनैव महौघेन तथैव च ।
एष कोटिमहौघेन समुद्रसदृशेन च ॥४०॥
या श्लोकांचे श्लोकनिहाय मराठीत रुपांतर पुढे दिल्यानुसार होते ते याप्रमाणे—
शंभरलाखएककोटि, शंभरसहस्रकोटिएकशंकू; एकलाखशंकूएकमहाशंकू;एकलाखमहाशंकूएकवृंद॥३३-३४॥
एकलाखवृंदएकमहावृंद;एकलाखमहावृंदएकपद्म; एकलाखपद्मएकमहापद्म;एकलाखमहापद्मएकखर्व॥३५-३६॥
एकलाखखर्व एकमहाखर्व; एकसहस्रमहाखर्व एकसमुद्र; एकलाखसमुद्र एकओघ;॥३७॥
एकलाखओघ एक महौघ; १सहस्रकोटि, शंभरशंकू, १सहस्रमहाशंकू, शंभरवृंद,॥३८॥
सहस्रमहावृंद, शंभरपद्म,सहस्रमहापद्म, शंभरखर्व,॥३९॥
शंभरसमुद्र, शंभरमहौघ, समुद्रसमुद्र, शंभरकोटिमहौघ.॥४०॥
असे हे मराठी रुपांतर पाहून त्याचा नेमका बोध होत नाही. कारण हे शब्द आपल्या वापरातील नाहीत, परिचयाचे नाहीत. त्यासाठी त्याचे श्लोकनिहाय नेमक्या गणिती भाषेत रुपांतर करुन ते पुढे नमूद केले आहेत. हे आपल्याला समजण्यास सुलभ वाटेल असे वाटते.
१० चा ७ वा घात =१००लाख=१कोटी,
१० चा १२ वा घात =१०० सहस्रकोटी= १शंकू,
१० चा १७ वा घात =१लक्षशंकू= १महाशंकू,
१० चा २२ वा घात =१लक्षमहाशंकू= १वृंद,[३३-३४]
१० चा २७ वा घात =१लक्षवृंद= १महावृंद,
१० चा ३२ वा घात =१लक्षमहावृंद=१पद्म,
१० चा ३७ वा घात =१लक्षपद्म=१महापद्म,
१० चा ४२ वा घात =१लक्षमहापद्म=१खर्व,[३५-३६]
१० चा ४७ वा घात =१लक्षखर्व=१महाखर्व,
१० चा ५० वा घात =१सहस्रमहाखर्व=१समुद्र,
१० चा ५५ वा घात =१लक्षसमुद्र=१ओघ, [३७]
१० चा ६० वा घात =१लक्षओघ=१महौघ, १०३*१०७= एक सहस्रकोटि,१०२*१०१२=शंभरशंकू,१०३*१०१७=१सहस्रमहाशंकू,१०२*१०२२=शंभरवृंद,[३८]
१०३*१०२७=१सहस्रमहावृंद, १०२*१०३२=शंभरपद्म, १०३*१०३७=सहस्रमहापद्म, १०२*१०४२=शंभर खर्व [३९]
१०२*१०५०=शंभर समुद्र, १०२*१०६०=शंभर महौघ, १०५०*१०५०=१०१००=समुद्रसमुद्र, १०२*१०७*१०६०=शंभरकोटिमहौघ [४०]
वर नमूद केलेला दहाचा ७ वा घात म्हणजे एक कोटी हे आपण समजू शकतो पण, दहाचा १००वा घात म्हणजे ’समुद्रसमुद्र’ होय.
या संख्येची आपण कल्पनाच करुं शकत नाही. पण आमच्या पूर्वजांना हे चांगले ठाऊक होते. हे अभिमान वाटावे असेच आहे, असे वाटत नाही का? आणि म्हणून रामायण, महाभारत, उपनिषदे, वेद यांचा आपण मूळातून अभ्यास करण्याची गरज आहे. त्यासाठी संस्कृत आलेच पाहिजे, जुन्या कागदपत्रांचा अभ्यास करायचा असेल तर मॊडी लिपी माहित करुन घेतलीच पाहिजे. हे सारे राष्ट्रकार्य आहे असे समजून अभ्यासण्याची गरज आहे. हा ठेवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविण्याची गरज आहे. असो.
मोठ्या कालगणनेसाठी पंचागात मोठमोठ्या संख्यांचा विचार जसा केला जाई तसाच सूक्षकालगणनेसाठी लव, निमिष, पल अशा संज्ञांचा वापर केला जात असे. जाता जाता ही माहिती येथे देणे अप्रस्तुत ठरु नये. पंचागाचा उपयोग करणार्यांना या संज्ञा माहित असतात. मला लहानपणापासून पंचाग वाचण्याचा नाद आहे, सवय आहे.
कालगणनेसाठी ’लव’ या संज्ञेचा वापर होत असे. ’लव’ म्हणजे शतपत्रातील एका कमलदलाचा भेद करण्यासाठी लोह शलाकेस लागणारा काळ होय. पण याचा नेमका अर्थ काय ते समजत नाही. येथे प्राचीन कालमापनासाठीच्या संज्ञा आपल्या माहितीसाठी देत आहे.
३०लव=१त्रुटी; ३० त्रुटि=१ कला; ३०कला =१ काष्ठा; ३० काष्ठा =१ निमिष, एक निमिष म्हणजे १ चुटकी वाजते तो वेळ होय. ८ निमिष= १ मात्रा, एका मात्रेत एक श्वास पूर्ण होतो. ३६० निश्वास= १ घटिका, २ घटिका= १ मुहूर्त, ३० मुहूर्त = अहोरात्र व एक अहोरात्र म्हणजे १दिवस = २४ तास होय. ३६० दिवस=१ वर्ष.
हे एक वर्ष म्हणजे देवाचा किंवा ईश्वराचा एक दिवस होय.१२००० ईश्वरी वर्षे म्हणजे एक चतुर्युग. एक हजार चतुर्युगे=ब्रह्माचा एक दिवस. यासच एक कल्प म्हणतात. याविषयी दासबोध दशक ६ समास ४ ओवी २ व ३ मध्ये ”ऐसी चतुर्युगें सहस्र | तो ब्रह्मयाचा येक दिवस ||६.४.२|| असा उल्लेख आलेला आहे.
श्रीसूर्य सिद्धांतानुसार २७ महायुगे संपून २८ वे महायुग सध्या चालू आहे. यासंबंधीचा ” चतुर्युग सहस्त्राणि ब्रह्मणो दिनमुच्यते” हा श्लोक पंचांगात पाहायला मिळतो. ब्रह्मदेवाचे आयुष्य १०० वर्षे समजले आते, यासच एक पर असे म्हणतात. याच्या अर्धा काळ ”परार्ध” होय.
या प्राचीन भारतीय कालमापनाची तुलना सध्याच्या कालमापन पद्धतीशी कशी होते ते समजून घेतल्यास याचे थोडेफार आकलन होण्यास चांगली मदत होते. आंतरजालकावर ही माहिती मिळाली ती खालील प्रमाणे.
१] प्रतिविपल-०.००६ सेकंद;
२] ६० प्रतिविपल -१ विपल--०.४.सेकंद;
३] ६०विपल- १पल-विघटी;
४] ६० पल- १ घटिका- दंडा, नाडी- २४ मिनिटे;
५] ६० घटीका– १ दिवस- दिन, वाट, वासर;
६] १० विपल- १प्राण- ४ सेकंद;
७] ६ प्राण-१पल-२४ सेकंद
याजबरोबर गुरुवार मध्यरात्री १७-१८ फेब्रु ३१०२ बी.सी.ला कलियुग सुरु झाले असे येथे नमूद केले आहे. असो.
कादिनव, टादिनव, पादिपंचक, याद्यष्टक, क्षशून्यम। या सूत्राचा वापर करुन अनेकदा सांकेतिक भाषेत संख्यांचे सादरीकरण केले जात असे. या सूत्रानुसार
कटपय=१,
खठफर=२,
गडबल=३,
घढभव=४,
ङणमश=५,
चत-ष-=६,
छथ-स-=७,जद-ह-=८,
झध-- =९ आणि
क्ष=०
याप्रमाणे प्रत्येक वर्णाक्षरास अंक कल्पून वैदिकगणितात दिलेल्या ”शंकराच्य़ा स्तुतिपर स्तोत्राची” उकल, गोवर्धन पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य भारती तीर्थकृष्ण महाराज यांनी करुन दाखवली. यात ’च’ आणि ’त’ गटातील अनुनासिकांचा वापर केला नसल्याचे दिसून येते. शून्यासाठी ’क्ष’ या वर्णाक्षराचा उपयोग केला आहे. यावरुन संस्कृत भाषेवर प्रभुत्व असणारी पंडित मंडळी या सूत्राचा वापर अत्यंत प्रभावीपणे करत असत असे दिसून येते. अगदी अशाच प्रकारे मराठी भाषेचा वापर करुन श्री समर्थानी गुप्त संदेश दिले असल्याचे अनेक ठिकाणी आढळते.
”गोपीभाग्यमधुव्रात । शृंगिशोदधि संधिग । खल जीवित खाताव । गलहालार संधर ॥
हा श्लोक वरवर पाहाता श्रीशंकराची स्तुति करण्यासाठी योजला आहे, पण प्रत्यक्षात मात्र हा श्लोक म्हणजे पाय या चिन्हाची ३२ अंकी किंमत आहे. वर्तुळाचा परिघ आणि त्याचा व्यास यांचे गुणोत्तर म्हणजे ’पाय’ होय. रोजच्या व्यवहारात आपण त्याची किंमत २२/७ किंवा ३.१४ इतकीच घेतो, पण येथे मात्र ती प्रत्येक चरणात ८ अंक याप्रमाणे ४ चरणात मिळून ३२ अंकी दिलेली आहे.
वर दिलेला मंत्र या श्लोकातील अक्षरांचे अंकात रुपांतर करण्यासाठी उपयोगी पडतो.येथे ’गोपी’ म्हणजे गप=३१, भाग्यम म्हणजे भगम=४३५, धुव्रात= ९४६ यावरुन पहिला चरण ३१४३५९४६ हे अंक दर्शवतो. २रा चरण शृंगि=५३, शोदधि=५८९, संधिग=७९३ म्हणजेच ५३५८९७९३ हे अंक दर्शवतो, ३रा चरण खल=२३, जीवित=८४६, खाताव=२६४ म्हणजेच २३८४६२६४ हे अंक तर ४था चरण ”गल हालार संधर” = ३३८३२७९२ हे अंक दाखवतो. याप्रमाणे चारी चरणाचे सर्व अंक त्या अनुक्रमाने मांडल्यास पाय= ३.१४३५९४६ ५३५८९७९३ २३८४६२६४ ३३८३२७९२ अशी ३२ अंकी मिळते. असो.
याप्रमाणे, भारतीय प्राचीन गणित किती समृद्ध आहे, याची ही नुसती झलक आहे. अजूनही बरेच कांही सांगता येण्यासारखे आहे. परंतु येथे केवळ त्याची तोंड ओळख करुन देणे येव्हढाच उद्देश्य आहे. ही ओळख करुन दिल्यावर आपण सखोल अभ्यासाला प्रवृत्त व्हाल अशी अपेक्षा आहे. निदान या प्राचीन ग्रंथांचा अभ्यास डोळसपणे करण्यासाठी प्रयत्नरत व्हाल तर या लेखाचा तो उद्देश्य सफल झाला असे समजता येईल. इदम् न मम ! जयजय रघुवीर समर्थ! श्रीरामकृष्णार्पणमस्तु !
संदर्भ: १] सार्थ वाल्मीकिरामायण भाग ३- डॉ. प्र.न.जोशी आवृत्ती शके १९०६ २] सार्थ दासबोध-के.वि.बेलसरे ३] प.पू.शंकराचार्य भारति तीर्थकृष्ण महाराज यांच्या वैदिक गणितावर, १९८० दरम्यान स्वतः अभ्यास करुन काढलेल्या टीपांच्या नोंदीवरुन. .
सौ.जयश्री खाडीलकर देशपांडे यांचे भिंती वरुन साभार ......
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात.
हा दिवस साजरा होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत.
इंग्रजी भाषेप्रमाणे सर्व प्रकारचे व्यवहार मराठीतून करणे, त्यासाठी मराठी माध्यमातूनच शिकणे-शिकवणे हे आम्हाला जमणार नाही. आम्हाला स्वत:ची प्रगती करायची आहे; स्वभाषेची नव्हे. अख्ख्या जगाने समृद्ध केलेली इंग्रजी हीच आमच्यासाठी ज्ञानभाषा व उद्याची लोकभाषा आहे.’ अर्थात, हे आपण स्पष्ट बोलून दाखवत नाही.
मराठीसंबंधी आपण सगळयांनी मनावर घ्यायला पाहिजे नाहीतर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
मराठी ही मृत्युपंथाला लागलेली भाषा आहे हे इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी पाऊणशे वर्षांपूर्वी सांगितले होते. १९६० नंतर म्हणजे मराठी भाषेचे राज्य स्थापन झाल्यानंतर ती स्थिती बदलण्याची आपल्याला संधी होती; पण मराठी भाषेला काही झालेले नाही या भ्रमात राहणे आपण पसंत केले. मराठीबाबतचे भ्रम जोपासत आपण येणाऱ्या पिढय़ांचे आणि विशेषत: तळागाळातील समाजाचे अपरिमित नुकसान करीत आहोत.
यापुढे ज्यांना मराठीतून आपली आपली उपजीविका साधायची आहे त्यांना मराठीचे येत्या ३०-४० वर्षांतले चित्र काय असणार हे स्पष्टपणे सांगायला हवे. स्वभाषेच्या वापराचा अलिखित करार आम्ही व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीच मोडला आहे. आपण हे जाहीरपणे स्वीकारायला हवे की मराठी ही कधीच ज्ञानभाषा होऊ शकणार नाही. जी भाषा शिक्षणाची माध्यमभाषा म्हणून टिकू शकत नाही ती ज्ञानभाषा कशी होणार?
शेकडो वर्षांची परंपरा असलेली भाषा मरायला अनेक दशके, शतके लागतात. पण हे लक्षात न घेतल्यामुळे आपली भाषा मृत्युपंथाला लागलेली असतानाही निजभाषकांचा तीवर विश्वास बसत नाही. मराठीचा प्रश्न हा भावनात्मक, सांस्कृतिक प्रश्न आहे आणि तो मराठी भाषेविषयी उत्सवी जनजागरण करून सोडवता येईल ही एक अंधश्रद्धा होती हे एव्हाना सिद्ध झाले आहे.
भाषेचा प्रश्न हा मूलत: आर्थिक प्रश्न आहे. प्रत्येक समाजाला स्वभाषेविषयी प्रेम असते. पण ते प्रेम ती भाषा जगण्याला उपयोगी पडते व भौतिक प्रगतीच्या आड येत नाही तोवरच कार्यरत असते. आपण आपली भाषा सोडतो ती अन्य भाषेविषयी प्रेम वाटते म्हणून नव्हे तर आपली भाषा आपणास आर्थिक संधी पुरवण्यात कमी पडते म्हणून.
चला संकल्प करू या आजपासून मी माझ्या रोजच्या जीवनात मराठीचा वापर करीन. अगदी रोजच्या जीवनात नाही जमले तरी माझ्या सामाजिक जीवनात म्हणजेच व्हॉट्सअप,फेसबुक पासून मी मराठीचा वापराची सुरवात करीन.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
व्हॉट्अपसाठी मराठीतील कळफलक (keyboard)
https://play.google.com/store/apps/details?id=com.klye.ime.latin
या आमच्या आराध्य दैवताची कीर्ती दिगदिगंत “अष्ट्”दिशांना पसरत राहो
Copyright © 2025 | Marathisrushti