(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा

    कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस ‘दिवाळी पाडवा’ म्हणूनही ओळखतात, या दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे म्हणतात. शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते. शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे. या शेणाला ‘शुभा’ असे म्हणतात. असा हा लोककल्याणकारी राजा बळी, त्याच्या पूजनाचा दिवस. या दिवशी विक्रम संवत सुरू होतो.

    पाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वहय़ांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. नवीन वहय़ा सुरू करण्यापूर्वी वहय़ांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो.
    नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • देवपूजे विषयी विशिष्ट माहिती

    देव्हार्‍यात एकाच देवतेच्या दोन दोन तिन तिन मूर्ती नसाव्यात, फोटो सुद्धा डबल नसावेत, घरातील देव्हार्‍यामध्ये मृत व्यक्तींचा फोटो ठेवू नये. देव्हारा हा शक्यतो पूर्व भिंतीला असावा म्हणजे पूजा करताना आपले तोंड हे पूर्वेला येईल ,

    देव्हारा नियमित पणे स्वच्छ करावा , देव हे वस्रावर असावेत , आपल्या घरी देव्हाऱ्यात कुलदेवतेची मूर्ती ,
    प्रतिमा असावीच असावी . सर्वात मागे मध्यभागी कुलदेवता प्रतिमा आणि त्या समोर मध्यभागी गणपती
    व गणपतीच्या डाव्या बाजूस देवी मूर्ती म्हणजे लक्ष्मी / अन्नपूर्णा / दुर्गा इत्यादी आणि
    उजव्या बाजूस देव मूर्ती म्हणजे बाळकृष्ण इत्यादी...

    देवघरात शंख असावा , पण तो छोटा पूजेचा शंख असावा , वाजविण्याचा मोठा शंख देव्हाऱ्यात ठेऊ नये , बाजूला ठेवावा .

    देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूला शंख असावा आणि देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस घंटी असावी ..

    पूजेचे साहित्य —

    अक्षता, हळद, कुंकू, गंध, फुले, तुळशी, दूर्व, बेल, उदबत्ती, निरांजन, कापूर,वस्त्र,फळं,नारळ, विडा, नैवेद्य व पंचामृत (दूध, दही, तूप, मध आणि साखर, मध नसेल तर थोडा गूळ)

    वापरती भांडी –

    तांब्या, भांडे,(पंचपात्र),पळी ताम्हण, अभिषेकपात्र,निरांजन, समई ( विषेश प्रसंगी ) घंटा.

    पूजेचे साहित्य कसे असावे ?

    सर्व पूजेची भांडी तांब्या , पितळेची – शक्य तर चांदीची असावी. स्टेनलेस स्टीलची अथवा प्लॅस्टिकची नसावी.

    गंध –

    चंदनाचे उगाळतात. त्यात कधी केशर घालतात. करंगळी जवळच्या बोटाने (अनामिकेने) देवाला गंध लावावे.
    सहाणेवर गंध उगाळून तो प्रथम दुसऱ्या तबकडीत घेऊन गंध लावावा . देवासाठी गंध हातावर उगाळू नये .

    अक्षता -

    धुतलेल्या अखंड तांदुळांना थोडेसेच कुंकु लावून त्या अक्षता वाहाव्या.
    शाळिग्राम आणि शंख यांना अक्षता वाहू नयेत.
    शंख नेहमी पाण्याने भरून ठेवावा , दुसऱ्या दिवशी ते पाणी कृष्णावर / देवांवर स्नान म्हणून अर्पण करावे .

    हळद – कुंकू याखेरीज गुलाल आणि बुक्काही (काळा/ पांढरा अबीर ) पूजा साहित्यात असावा.
    गणपतीला शेंदूर, विठ्ठलाला बुक्का (काळा अबीर ) वाहण्याची वहिवाट आहे.

    फुले –

    ऋतुकालोद्भभव पुष्पे म्हणजे त्या त्या ऋतूत येणारी ताजी आणि सुवासिक फुले देवाला वाहावी.
    जाई, जूई, कण्हेर, मोगरा, जास्वंदी चाफा, कमळे, पारिजातक, बकुळ, तर वगैरे फुले सर्व देवांना चालतात.

    विष्णुला – चाफा, मोगरा, जाई, कुंद वगैरे फुले आवडतात.
    शंकराला – पांढरा कण्हेर, कुंद, धोतरा इ. पांढरी फुले वाहतात.
    गणपतीला – गुलाब, जास्वंद वगैरे तांबडी फुले प्रिय असतात. गणपतीला दूर्वा वाहातात. गणपतीला तुळस वाहण्याची प्रथा नाही.

    गणपतीला रक्तचंदनाचे गंध आणि शेंदूर प्रिय असतो.

    देवीला सर्व सुवासिक फुले चालतात.

    पाने –

    विष्णु, विठ्ठल, शाळिग्राम या देवतांना तुळस, शंकराला बेल तर गणपतीला दूर्वा वाहातात.

    धूप –

    देवाला उदबत्ती ओवाळून तिचा धूप देवावर दरवळेल अशी ठेवावी. सुगंध दरवळावा.
    अगरबत्ती देव्हाऱ्याच्या आत मध्ये ठेवू नये , बाहेर बाजूला ठेवावी .

    दिप –

    निरांजन ओवाळून ते देवाच्या उजव्या बाजूस ठेवावे. देवाजवळील समईंची ज्योत दक्षिणेकडे करू नये.
    समईत एक दोन पाच सात अशा ज्योती (वाती) असाव्या. तीन नसाव्या.
    देवाच्या उजव्या म्हणजे आपल्या डाव्या बाजूस तुपाचा दिवा असावा आणि
    देवाच्या डाव्या म्हणजे आपल्या उजव्या बाजूस तेलाचा दिवा असावा .
    वाती या जोड वाती असाव्यात म्हा जे दोन वाती एकत्र करून केलेली एक वात ..

    नैवैद्य –

    रोजच्या पूजेत देवाना पंचामृताचा नैवैद्य दाखवितात.
    दूध, पेढे, फळे आणि पक्वाने नैवेद्यात सर्व देवांना चालतात.
    विशेष प्रसंगी गणपतीला मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य,
    देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवितात.

    फळे -

    देवाला कच्ची फळें वाहू नयेत.
    पक्व फळाचे देठ देवाकडे करून ठेवावीत.

    तांबूल –

    म्हणजे विड्यांची पाने आणि त्यावर सुपारी खारीक खोबरे बदाम इत्यादी ठेवावे.
    पानाचे देठ देवाकडे करावेत. विड्यावर यथाशक्ती दक्षिणा ठेवावी.
    तसेच ड्रायफ्रुट्स सुद्धा असल्यास उत्तम .

    नमस्कार –

    दोन्ही हात जोडून देवाला नमस्कार करावा. साष्टांग नमस्कार घालावा.

    आरती –

    देवाला आरती ओवाळताना देवावर प्रकाश पडेल अशी ओवाळावी.
    आवाज सौम्य असावा , किंचाळू नये. आर्ततेने म्हंटली जाते ती आरती हे लक्षात घ्यावे .

    प्रदक्षिणा –

    देवाला प्रदक्षिणा घालावी. अथवा स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी.
    गणपतीला एक, सूर्याला दोन , शंकराला तीन, विष्णूल चार, पिंपळाला सात,
    आणि मारुतीला अकरा अशा प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आहे.
    हात जोडून आणि तोंडाने नामघोष करीत प्रदक्षिणा घालव्यात.
    किंवा सर्वाना समान तीन किंवा पाच प्रदक्षिणा कराव्यात ..

    प्रार्थना –

    देवाला नमस्कार करून भक्तिभावाने प्रार्थना करावी. प्रार्थना आणि सर्व पूजा
    एकाग्र चित्ताने शांतपणे मनःपूर्वक करावी. देवाजवळ व्यावहारिक गोष्टी मागू नयेत
    किंवा त्याला सांकडे , नवस घालू नये. फक्त त्याची कृपा मागावी.
    देवाच्या कृपेनेच सर्व गोष्टी यशस्वी होतात.

    देवपूजेचे महत्त्व —

    प्रत्येक माणासाला जीवनात सुख समाधान आणि शांती प्राप्त व्हावी म्हणून देवपूजा हे एक उत्तम साधन आहे.
    हल्लीच्या संघर्षमय व तणावपुर्ण जीवनात आणि आपल्या दैनंदिन कार्यक्रमात देवपूजेसाठी
    आपणाला जास्त वेळ मिळत नाही. तरीही वेळात वेळ काढून देवपूजा करणे आवश्यक आहे.

    यथाशक्ती, यथाज्ञानाने व मिळतील त्या उपचारांनी मनोभावे देवपूजा केली तर मनाला शांती मिळते,
    घरातील वातावरण पवित्र व प्रसन्न होते, आणि आपापली कामे करायला उत्साह मिळतो.

    देवपूजा करणाऱ्यांना एक प्रकारचे विशेष सामर्थ्य येत असते, वाणीला तेज चढते,
    अंगीकृत कार्याला यश येते आणि इतरांचाही उत्साह वाढतो , आनंद होतो.

    देवपूजेमुळे शारीरिक, मानसिक आणि आचरणातील दोष दूर होतात.
    आत्मिक बळ वाढते. आत्मा हाच खरा परमात्मा आहे.
    तो संतुष्ट असला तरच जीवनाचे सार्थक होते.

    आपल्य कुटुंबास देवघरातील देवांची पूजा एकजणच करतो.
    बाकीचे कुटूंबीय स्नानानंतर देवाला फुले, अक्षता वाहून देवाला
    नमस्कार करतात. आपल्या नित्यक्रमातुन थोडासा वेळ काढून
    पूजेनंतर जप करावा. पोथी वाचावी. गीतेचा अध्याय, गुरुचरित्र,
    गजानन विजय यासारख्या आपल्या आराध्य देवतेची कथा,
    पोथी यांचे वाचन करावे. जेवढे शक्य असेल तेवढे करावे …

    अधिकस्य अधीकम् फलम् .. असे म्हटलेच आहे.

    अशा प्रकारे जप, पोथी-वाचन, देवदर्शन आणि व्रते, पूजा, स्तोत्रे,
    प्रार्थना वगैरे उपानसनेचे प्रकार आहेत.
    त्यांच्यामुळे मन प्रसन्न होऊन मनोरथ पूर्ण होतात.

    देवपुजा करण्याचे प्रकार —

    १ मानसपूजा
    २ मुर्तीपूजा

    मुर्तीपुजा करताना म्हणजे नेहमी प्रमाणे पूजा करताना
    देवाची मुर्ती किंवा प्रतीमा किंवा सुपारी , नारळ किंवा टाक ह्यांची पूजा केली जाते.

    ही पूजा करताना दोन प्रकारे करतात

    १ पंचोपचार पूजा

    २ षोडशोपचार पूजा

    १ पंचोपचारी पूजा Panchopchari Puja –

    यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
    (१) गंध (२) पुष्प (३) धूप (४) दीप (५) नैवेद्य

    २ षोडशोपचार पूजा ShodShopchari Puja –

    यामध्ये पुढील उपचारांनी देवाची पूजा केली जाते :
    (१) आवाहन (२) आसन (३) पाद्य (४) अर्ध्य (५) आचमन
    (६) स्नान (७) वस्त्र अथवा यज्ञोपवीत (८) गंध (९) पुष्प
    (१०) धूप (११) दीप (१२) नैवेद्य (१३) फल (१४) तांबूल
    (१५) दक्षिणा (१६) प्रदक्षिणा .

    देवाला वरील सर्व उपचार करताना विशिष्ट मंत्र स्तोत्र येत असल्यास उत्तम ,
    नसेल येत तर निदान त्या त्या देवतेचे नाम मंत्र तरी म्हणावे .

    अभिषेक करताना त्या त्या देवतेचे स्तोत्र , मंत्र म्हणावेत .

    उदा .- गणपती पूजा करताना गणेश स्तोत्र किंवा गणेश मंत्र ,
    विष्णू पूजा करताना विष्णू स्तोत्र / व्यंकटेश स्तोत्र /
    विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र इत्यादी इत्यादी ..

    आणि मानसपूजा हि सश्रद्ध अंतःकरणाने / मनाने करायची असते ..

    वरील सर्व साहित्य व उपचार हे मनानेच देवाला अर्पण करायचे असते .
    मानासपूजेमध्ये एकाग्रचित्त अंतःकरण आणि सश्रद्ध भाव असणे जरूरी आहे .

    मानसपूजा हिच श्रेष्ठ सांगितली गेली आहे ..

    @ संकलित माहिती....

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (अ) /११

    • मोरे यांच्या लेखातील कांहीं statements च्या योग्यायोग्यतेची चर्चा केल्यानंतर, त्या लेखावरील प्रतिक्रियांचा विचार करणेंही आवश्यक आहे. (लोकसत्ता दि. १३ मे, लोकमानस ; १४ मे चा विशेष लेख ; व २० मे आणि २१ मे च्या लोकसत्तामधील प्रतिक्रिया).

    भाग – () – (अ)

    • निखील जोशी, बंगळूरु यांच्या प्रतिक्रियेबद्दल :
    • तमिळनाडु , व आधीचा-काळ :

    निखिल जोशी यांनी जुन्या (इ.स. १००० पर्यंतच्या) काळापूर्वीच्या परिस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्यासंबंधी आपण पाहूं या. अन्य संदर्भांमधून माहिती उपलब्ध असली , तरी आत्तां मी हेतुत: मुख्यत्वें, के. ए. नीलकंठ शास्त्री या दाक्षिणात्य गृहस्थांच्या ‘ The Illustrated History of South India’ या ग्रंथाचा संदर्भ घेऊन माहिती मांडत आहे.

    • दाक्षिणात्य संस्कृतीत अगस्त्य मुनींचें फार महत्व आहे. ऋग्वेदातही अगस्त्य यांचा उल्लेख आहे ; त्यांच्या ऋचा ऋग्वेदामध्ये आहेत. अगस्त्य विंध्य ओलांडून दक्षिणेला आले व तिकडेंच स्थायिक झाले. त्यांचा आश्रम ‘मलय’ पर्वतावर होता, अशी आख्यायिका आहे ( जो सह्याद्रीचा दक्षिणेचा भाग आहे).

    - दाक्षिणात्य परंपरेप्रमाणें, अगस्त्य यांना Father of Tamil मानलें जातें. (आपण याचा अर्थ असा तरी नक्कीच घेऊं शकतो की, अगस्त्य यांनी तमिळच्या बाबतीत कांहींतरी महत्वपूर्ण कार्य केलें आहे. काय, तें आपण पुढे पहाणारच आहोत). ‘मणिमेखलई’ या इ.स. च्या सुरुवातीच्या काळच्या पुरातन ग्रंथाच्या लेखकाला अगस्त्य माहीत आहे.

    - तोळकप्पयन यानें इ.स.च्या सुरुवातीच्या काळात तमिळ भाषेच्या व्याकरणावर ग्रंथ लिहिला आहे. तो अगस्त्य यांचा शिष्य होता, अशी मान्यता आहे.

    - तमिळ व्याकरणाचा सर्व base म्हणजे ‘ऐन्द्र‘ व्याकरण. ऐंद्र हा शब्द ‘इंद्र’पासून निधालेला आहे, हें स्पष्ट आहे. इंद्र ही वैदिक देवता आहे, हें आपल्याला माहीत आहे. इंद्र नांवाचे एक ऋषिही होते. तैतिरीय संहिता सांगते की, इंद्र ऋषि हे प्रथम वैयाकरण होत.

    तमिळमध्ये प्रचलित असलेलें मूळ व्याकरण, ऐन्द्र व्याकरणावरच आधारित आहे, असें म्हणतात. (मूळ ऐन्द्र व्याकरणाचा ग्रंथ आतां उपलब्ध नाहीं, त्यामुळे त्याबद्दल अधिक कांहीं सांगतां येत नाहीं ) .

    - अगस्त्य यांच्या ग्रंथाचें नांव आहे ‘अगत्तीयम्’ ( हा ग्रंथ बहुधा आतां उपलब्ध नाहीं). तमिळमधील ‘संगम’ साहित्याच्या व्याकरणाच्या संदर्भात या ग्रंथाचा संबंध येतो, व या ग्रंथाचा उल्लेखही संगम साहित्यात येतो.

    - जसा ‘प्रथम-संगम’ साहित्याशी अगत्तीयम् चा संबंध आहे, तसाच ‘द्वितीय-संगम’ च्या संदर्भात तोळकप्पियम चा संबंध येतो. संगम साहित्याचा काळ इ.स. ची पहली तीन-चार शतकें असा आहे.

    - संगम साहित्यात संस्कृत शब्द येतात, व त्यांच्यासाठी तमिळमध्ये विशेष अक्षरें आहेत. ती अक्षरें फक्त संस्कृत शब्दांसाठीच वापरली जातात, इतर तमिळ शब्दांसाठी नाहीं.

    • चेर ( Chera) वंशाचा प्रथम राजा (काळ इ.स. १३०) यानें कुरुक्षेत्रावरील युद्धात, दोन्ही बाजूंच्या सैनिकांसाठी भरपूर अन्नधान्य पुरवलें होतें अशी आख्यायिका आहे. श्री. नीलकंठ शास्त्री म्हणतात की, कदाचित तसें त्याच्या पूर्वजानें केलें असेल.

    तें काय असेल तें असो, पण ज्या अर्थी अशा प्रकारची आख्यायिका आहे, त्या अर्थी त्या पुरातन काळींही महाभारत हें, दक्षिण-भारताला चांगलेंच माहीत होतें.

    • पांड्य राजांची राजधानी ‘मदुरा’ ही होती. मदुरा हा शब्द ‘मथुरा’ यावरूनच बनलेला आहे, असें नीलकंठ शास्त्री सांगतात . ( टीप : आपल्याला दिसून येईल की, ‘मदुरा’ हा मथुरा या शब्दाचा दाक्षिणात्य उच्चार आहे ). नीलकंठ शास्त्री हेंही सांगतात की, मथुरा नांवाचें नगर सिलोन (श्रीलंका) तसेंच जावाजवळही होतें.

    ज्या अर्थीं मथुरा हें नांव दक्षिणेत आलें, त्या अर्थी ‘हरिवंश’ हा संस्कृत ग्रंथ, (जो महाभारताचें ‘खिल’, एक परिशिष्ट, एक additional भाग आहे) , दक्षिणेत चांगलाच माहीत असला पाहिजें.

    • इ.स. १००० च्या सुमारास तमिळनाडुमध्ये उत्तरेकडून कांहीं कुटुंबें आणण्यात आली. त्यांचे वंशज अय्यर व अय्यंगार आहेत, ही गोष्ट मला त्यांच्यापैकीच एकानें सांगितलेली आहे.

    हा सांस्कृतिक समन्वयच नाहीं काय ?

    • डॉ. एस्. कल्याणरामन् हे चेन्नईस्थित विद्वान , ( त्यांच्या ‘सरस्वती’ नदीसंबंधीच्या पुस्तकामध्ये ), पी. एस्. एस्. शास्त्री यांच्या तमिळवरील ग्रंथाचा संदर्भ देऊन काय म्हणतात, तें पहा : ‘It would be clear … that during the Sangam Age there had already been intensive infusion of vedic culture in South India’.
    • जैन साहित्यिकांनी आधी साहित्य अर्धमागधीमध्ये निर्माण केलें, व मग महाराष्ट्रीमध्ये. लोकभाषांमधून त्यांना लोकांशी संवाद साधायचा होता हें उघड आहे. म्हणून त्यांनी, ज्या भागात ते प्रसार-प्रचार करत होते, तेथील लोकभाषा वापरली. जेव्हां त्यांना दक्षिण भारतात प्रचार करायचा होता, तेव्हां त्यांनी कन्नडमध्ये रचना केल्या. परंतु, इतर भागांशी समन्वय साधण्यासाठी त्यांनी संस्कृतमध्ये रचना केल्या. ही गोष्ट इ.स. १०५० पासून ते १५५० पर्यंत झालेली दिसते. (एक संदर्भ : Essays on Mahabharata, Edited by Arvind Sharma). याचें कारण स्पष्ट आहे की, त्या भूभागातील लोकांना अर्धमागधी किंवा महाराष्ट्री भाषा उमगली नसती. म्हणून त्यांनी, कन्नडमध्ये ,तसेच संपर्क-भाषा (Link Language) अशी असलेल्या संस्कृतमध्ये रचना केल्या.
    • आपण जर संस्कृत कवि व नाटककार पाहिले तर, त्यांतील कांहीं महत्वाचे कवी दक्षिण भारतातील आहेत.

    - भारविचा उल्लेख चालुक्यांच्या inscriptions मध्ये कालिदासाबरोबर येतो. हा उल्लेख इ.स. ६३२ च्या कर्नाटकातील ऐहोळे येथील शिलालेखात आहे. दंडीनेंही भारविचा उल्लेख केला आहे. भारविचें किरीतार्जुनीय , याला आधार महाभारत आहे.

    - दंडीचा संबंध पल्लवांशी होता. त्याचें दशकुमारचरित व अन्य ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

    - भास याचा उल्लेख कालिदासानेंही केलेला आहे, यावरून तो कालिदास-पूर्वकालीन आहे. त्याचें सर्व साहित्य दक्षिण भारतात सापडलें आहे, यावरून तो दाक्षिणात्य होता, असें म्हणायला हरकत नाहीं. असें माझ्या वाचनात आलेलें आहे की भास हा केरळ भागातील होता. भासाची रामायण व महाभारत यांवर आधारित नाटकें आहेत.

    • तत्वज्ञानाच्या क्षेत्रातील, शंकराचार्य हे केरळ भागातील नंबुद्री होते. रामानुजाचार्य हे तमिळ भागातील होते. मध्वाचार्य हे कर्नाटक भागातील होते. वल्लभाचार्य हे तेलंगण भागातील होते. या सर्वांच्या रचना संस्कृतमध्ये आहेत.
    • रामायण व महाभारत हे ग्रंथ, मध्ययुगात प्रादेशिक भाषांमध्येही लिहिले गेलेले आहेत. कोणी अशी शंका घेऊं शकतो की, याचा संस्कृतशी काय संबंध आहे ? पण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की, त्या-त्या कवींनी संस्कृत काव्य वाचलेले होते, व तें ज्ञात असल्यामुळे ते प्रादेशिक भाषेत रचना करूं शकले. उदा. एकनाथांचें भावार्थ रामायण, तुलसीदासांचें रामचरितमानस. असेंच तमिळमध्ये कंबन रामायण आहे. तेलगूमध्येही असेच आहे. उदा. नान्नपा चें महाभारत.
    • सिंधीमध्येही महाभारताची पुरातन प्रत आहे.
    • भांडारकर इनस्टिट्यूट नें महाभारताची चिकित्सक आवृत्ती सिद्ध करतांना अशा प्रादेशिक प्रती वापरलेल्या आहेत, अगदी जावा प्रतही. त्यांनी महाभारताची दक्षिणेतील ‘कुंभकोणम प्रत’ही वापरलेली आहे.
    • मुख्य म्हणजे श्रीलंका (सिलोन) , जावा, बाली, ब्रह्मदेश (म्यानमार) , इंडिनेशिया, मलाया (मलेशिया), कांपुचिया वगैरे देशांमध्ये रामायण-महाभारताची परंपरा आहे, व त्या-त्या देशांतील भाषांमध्ये ती लिहिली गेलेली आहेत. सगळीकडेच बौद्धांकडून ही परंपरा पोचलेली नाहीं. (त्यातून, बौद्ध साहित्यात रामायण-महाभारत यांचा उल्लेख limited च आहे). ‘अँकोर वॅट’ चा राजा सूर्यवर्मन् हा हिंदू होता. म्हणजेच, संस्कृतमार्फतही/च ही संस्कृती तिकडे पोचलेली आहे.
    • श्रेष्ठ विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी एक महत्वाच्या बाबीचा उल्लेख केलेला आहे. ती गोष्ट अशी : आपला असा अपसमज असतो की संस्कृत साहित्य देवनागरीतच लिहिलेले असेल. पण तसें नाहीं. वेगवेगळ्या प्रदेशातील प्रादेशिक लिप्या दीर्घ काळपर्यंत संस्कृत भाषेचें वाहन ठरलेल्या आहेत. शेकडो शिलालेख संस्कृत भाषेत पण प्रादेशिक लिप्यांमध्ये कोरलेले सर्रास आढळतात. तसेंच, त्या-त्या प्रदेशात प्रादेशिक लिप्यांमधून देवनागरीत व देवनागरीतून प्रादेशिक लिप्यांमध्ये लिप्यंतरही झालेलें आहे.

    यावरून आपल्याला संस्कृत व संस्कृती ही वेगवेगळ्या भारतीय भागात, तेथील प्रादेशिक लोकांशी कशी संबंधित होती, कशी मिसळत होती, हें कळेल.

    • निखिल जोशी यांनी .. १००० च्या कालमर्यादेचा उल्लेख केला आहे. ( त्याच्याच आगेमागे विक्रम संवत् आनी सालिवाहन शक यांचेंही एक सहस्त्रक पूर्ण झालें ) . पण अशी कालमर्यादा ही एक कृत्रिमलक्ष्मणरेषा आहे. त्यावेळी कांहीतरी आगळेवेगळें महत्वपूर्ण झालें असलें, तर गोष्ट वेगळी. (जसें की पुरातन- काळातील कुरुक्षेत्रावरील युद्ध. किंवा नंतरच्या काळातील, महमूद गझनवीचें लुटीसाठी हल्ले, अथवा महंमद घोरीचें आक्रमण, आणि त्या घटनाही इ.स.१००० च्या नंतर एकदोन शतकामधलल्या आहेत ) . विशेषकरून, संस्कृतच्या संदर्भात, किमान , . . च्या सुरुवातीपासून ते अठरावें शतक , या संपूर्ण-कालखंडात काय झाले, हें आपण पहायला हवें. खासकरून, दक्षिण-भारताच्या संदर्भात तर , इ.स १००० अशी ‘लक्ष्मणरेषा’ मानायचें कारणच नाहीं.

    मात्र, वर उल्लेखलेल्या अनेक उदाहरणांवरून, संस्कृत-भाषा व संस्कृती यांचा दक्षिण- भारताशी यांचा स्पष्ट संबंध दिसतो.

    • ‘मॅक्सम्युलर चें मत तमिळ भाषेच्या इतिहासतज्ञांकडून तपासून घ्यावे (इति निखिल जोशी) :

    - मॅक्सम्युलरला त्याचा रिसर्च करण्यासाठी इंग्लंडमधून ग्रँट मिळाली होती. मॅक्सम्युलरनें त्याच्या पत्नीला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केलेलें आहे की, त्याला भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रसार व्हायला हवा होता. तेव्हां, आज मॅक्सम्युलरचचें मत सर्वांनींच तपासून घेतलेलें बरें.

    ( मात्र, हेंही नमूद करायाल हवें की, त्याची कांहींकांही मतें योग्यही आहेत. )

    - हडप्पा व मोहेनजोदारो या स्थळांचें उत्खनन होऊन सिंधु संस्कृतीची माहिती जेव्हां पुढे आली, तेव्हां पाश्चिमात्य विद्वांनांनी ‘आर्य आक्रमणा’चा व ‘आर्य-द्रविड’ हा सिद्धांत पुढे आणला , व त्यामुळे, उत्तर भारतीयांबद्दल (ते ‘आर्य’आहेत असें मानून) दक्षिण-भारतीय, म्हणजे खास करून तमिळभाषियांच्या मनांत दुरावा निर्माण झाला, ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाहीं. तेव्हां तमिळभाषी विद्वान दुसरें काय सांगणार ? [ आजही, सिंधु-सरस्वती संस्कृतीची भाषा संस्कृत की तमिळ , यावर ( ‘साधार’ decipherment वरून) वाद सुरूं आहे ] .

    - पण, आपण वर पाहिलें आहे , त्याप्रमाणें, उत्खननात सापडलेल्या पुरातनकालीन-हाडांच्या जेनेटिकल अभ्यासावरून हें स्पष्ट झालेलें आहे की, भारतात, आर्य किंवा द्रविड असे भिन्न वंश नव्हतेच. आपण हेंही पाहिलें आहे की, दक्षिण भारत, व त्यातील तमिळ प्रदेश , यांचा पुरातन काळीं व मध्य-काळातही संबंध संस्कृत व संस्कृत-संस्कृती यांच्याशी होता.

    - पण , अनैतिहासिक ‘आर्य-द्रविड divide’ सिद्धांतामुळे निर्माण झालेले undue biases जायला वेळ लागेलच.

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
    eMail : vistainfin@yahoo.co.in
    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

    (पुढे चालू )

  • प्रदूषणाचा नरकासूर

    दिवाळी अजून यायची आहे. पण त्यापूर्वीच्या गणपती आणि नवरात्राच्या प्रदूषणाचे दोन बळी माझ्याकडे औषधाला आले. एक पस्तीस वर्षाचा तरुण, दिवसभर गणपतीच्या मंडपात बसला होता. डाव्या बाजूला ढणाणा स्पीकर चालू होता. दुसऱ्या दिवशी कळलं की त्या कानानं ऐकू येत नाहीये. तपासण्या वगैरे झाल्या. डॉक्टरांनी हात टेकलेत. दुसरा तीस वर्षाचा तरुण. देवीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत दहाहजार फटाक्यांची माळ यानंच लावली. दुसऱ्या दिवशी दम लागून थेट ICU मध्ये दाखल झाला. तिथून सुटल्यावर स्टिरॉईड्स च्या जाचातून सुटण्यासाठी माझ्याकडे आला.

    तिसरी एक घटना गावाकडे घडलेली. एक पंचविशीचा परिचित युवक. नुकताच तापातून उठला होता. थोडा अशक्तपणा बाकी होता. सार्वजनिक गणपतीला गेला. तिथे DJ सुरु होता. अर्ध्या तासानं कुणालातरी ‘निघतो’ म्हणून सांगून देवापुढे डोकं टेकलं ते कायमचंच. ‘DJ जन्य हार्ट अॅटॅक’ असं त्याचं निदान तिथल्या डॉक्टरांनी केलं म्हणे.

    मनुष्यकृत वायू आणि ध्वनी प्रदूषणाचा विळखा हा असा वाढत चालला आहे. फटाके, DJ यांचं लोण पूर्वी फक्त शहरात होतं. आता खेड्यातली आरोग्यदायी शांतता नष्ट करत यांनी तिथे देखील धुमाकूळ घातला आहे.

    मुळात प्रदूषण म्हणजे काय तर जीवन नष्ट करू शकतील अथवा विस्कळीत करू शकतील असे घटक वातावरण, जल आणि भूप्रदेशात मिसळणं.

    ध्वनी मोजण्याच्या मापाला “डेसिबल” म्हणतात. साधारणपणे १० – ५० डेसिबल्स चा ध्वनी आपल्याला व्यवस्थित त्रास न होता ऎकु येतो. या मर्यादेवरील आवाज आपल्याला नकोसा वाटतो. ऊदाहरणार्थ जोरात बोलणं – ६० डेसिबल्स; टि.व्ही/ रेडीयोचा मोठा आवाज ७० ते ७५ डेसिबल्स; प्रेशर कुकरची शिट्टी ७५ डेसिबल्स; वाहनांचे होर्न ७५ ते ८० डेसिबल्स; विमान उडताना ११० ते १२० डेसिबल्स आवाज निर्माण करतात. ध्वनिक्षेपकांचा आवाज तर यापेक्षा कितीतरी जास्त असतो. म्हणजे कानांवर किती अत्याचार!
    ध्वनी प्रदुषण करणारे घरातले आवाज, औद्योगिक क्षेत्रातले आवाज, वाहनांचे आवाज- यातले कुठलेही ध्वनी आपल्याला टाळता येत नाहीत कारण ते जीवनावश्यक कामातून निर्माण होतात. पण आपण त्यात फटाके आणि ध्वनिप्रक्षेपक या अनावश्यक/ टाळता येण्यासारख्या गोष्टींची भर घातली आहे. झाडाला मिठी मारून , “झाड मला सोडत नाही” म्हणणाऱ्या शेखचिल्लीसारखी आपली गत झाली आहे.

    ध्वनिप्रदूषणामुळं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य या दोघांवर परिणाम होतो. ध्वनिप्रदूषणामुळं शारीरिक व मानसिक ताण वाढतो, मनुष्य चिडचिडा आणि आक्रमक होतो. त्याला झोप लागत नाही म्हणून त्याचं मानसिक संतुलन बिघडतं, तो भांडखोर होतो. ध्वनिप्रदूषणामुळं रक्तदाब वाढतो. कारखान्यांत मोठ्या आवाजाच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना म्हातारपणी बहिरेपणा येतो. हृदयरोग असलेली व्यक्ती मोठमोठ्या ध्वनिवर्धकाच्या आवाजाने दगावण्याची शक्यता असते. गर्भवती स्त्रीच्या गर्भालाही ध्वनिप्रदूषणामुळे हानी पोहचू शकते. प्राणी आणि पक्षी यांच्या कित्येक प्रजाती मनुष्यकृत मोठ्या आवाजानं नष्ट झाल्या आहेत.

    वायुप्रदूषणाचे सर्वात घातक परिणाम श्वसनसंस्थेवर होतात. विविध प्रदूषक घटक थेट श्वसनव्यस्थेवर हल्ला चढवतात. ओझोन, नायट्रोजन डायॉक्साईड हे फुफ्फुसांवर अतिशय घातक परिणाम करतात. ओझोन फुफ्फुसांमधील पेशींना नष्ट करून फुफ्फुसं कमजोर करतो, त्यामुळे दमा वाढीस लागतो. नायट्रोजन ऑक्साईड श्वसन नलिकेत व फुफ्फुसांत गेल्यानंतर, तो विरघळवण्यासाठी जास्तीजास्त कफाची निर्मिती होते व त्यामुळे कफाचे आजार. हे आजार जुने झाले की जीवाणूंचा संसर्ग होतो व परिस्थिती गंभीर होते. आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन वाहण्याचे काम करणाऱ्या हिमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजनऐवजी; हवेतला वाढलेला . कार्बन मोनॉक्साईड मिसळून जातो व शरीरातील सर्व भागात पोहोचतो. हा वायू अत्यंत विषारी असून काही मिनिटं सातत्यानं संपर्कात आल्यास मृत्यूही ओढवू शकतो.
    कुठल्याही इंद्रियांचा अति वापर हे आयुर्वेदात देखील रोगांचं कारण सांगितलं आहे.

    सर्वात वाईट गोष्ट म्हणजे फटाक्यांचं प्रदूषण झाडं लावून कमी होऊ शकत नाही. फटाके फोडण्यातून निर्माण होणारा धूर कागद, लाकडं वा काडीकचरा यांच्या धुरासारखा साधा नसतो. कागद, लाकडे, काडीकचरा जाळला तर त्यातून फक्त कार्बन डायऑक्साइड निर्माण होतो, जो वायू झाडांचं अन्न आहे. त्यामुळं भरपूर झाडं लावली की हे प्रदूषण कमी होऊ शकतं. प्रत्येक माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत श्वासोच्छवासाच्या प्रक्रियेदरम्यान कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन करतच असतो. या प्रदूषणातून आपल्याला झाडंच सोडवतात.. मात्र फटाक्यांच्या ज्वलनात सल्फर व कार्बन युक्त अनेक विषारी वायू आणि धातू तयार होतात. आवाज न करणारे शोभेचे फटाके तर जास्त विषारी वायू निर्माण करतात. दुर्दैवानं कुठल्याही फटाक्यांनी तयार केलेले विषारी वायू शोषण्याची क्षमता झाडांमध्ये नाही. म्हणूनच फटाक्यांना ‘नाही’ म्हणण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही.

    फटाके अन डीजे, हे नव्हे प्रतिक धर्माचे |
    हे शोध परक्यांचे, ते ही काल परवाचे ||
    धर्म म्हणजे स्मरण नित्य ईश्वराचे |
    ठेवावे ते भान सकलांच्या आरोग्याचे ||

    © वैद्य सुचित्रा कुलकर्णी. M. D. आयुर्वेद, B. अ. योगशास्त्र (सुवर्णपदक)

    लेखिका, व्याख्यात्या, समुपदेशक, संपादक, आयुर्वेद व योग सल्लागार.
    'ओवीआरोग्याची' दैनिक गोमंतक- दिनांक १७ ऑक्टो २०१६

    -- `आरोग्यदूत' WhatsApp ग्रुपवरुन

  • संगीत संशयकल्लोळची १०० वर्षे

    आज २० ऑक्टोबर. आज संगीत संशयकल्लोळ या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला १०० वर्षे झाली.

    संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवलयांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. २० ऑक्टोबर १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला.

    या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्कराचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.पहिल्यांदा गद्य रूपात आलेले हे नाटक संगीत नाटक म्हणून रंगभूमीवर आले तेव्हा त्यात तब्बल तीसेक गाणी होती. एकटय़ा अश्विनशेठ यांच्या वाटय़ाला दहा गाणी होती. मग रेवती या पात्रासाठी दहा गाणी अशा तीस गाण्यांना घेऊन हे नाटक लोकांसमोर आले.

    तेव्हा रात्र रात्रभर नाटक चालत असल्याने तीस गाण्यांचे हे नाटकही त्या वेळी लोकांना खूप आवडले. तेव्हापासून आज शंभर वर्षांत हजारो प्रयोग होऊनही लोकांच्या मनावरची
    ‘संगीत संशयकल्लोळ’ची जादू ओसरलेली नाही आणि यातलं संगीत आणि तसबिरींच्या घोटाळ्यातून निर्माण झालेलं नाट्य एवढं अस्सल आहे की, त्याचे प्रयोग करण्याचा मोह भल्याभल्यांना आवरलेला नाही. शताब्दीच्या निमित्ताने पुन्हा एकदा या नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होत आहेत.संगीत संशयकल्लोळ’ या नाटकाचे २०१६ शतकमहोत्सवी वर्ष असल्याची पर्वणी साधून ‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’ने ते नाटक रंगभूमीवर आणले आहे. नव्या ‘संशयकल्लोळ’मध्ये श्री.राहुल देशपांडे आणि श्री.प्रशांत दामले हे दोघे प्रमुख भूमिकांत आहेत. राहुल देशपांडे हे सध्याचे महाराष्ट्रातील लोकप्रिय रंगभूमी गायक कलाकार. दामले यांनी तर लोकप्रियतेचे अनेक विक्रम केले आहेत. त्यांनी या अगोदर सौभद्र या आणखी एका लोकप्रिय संगीत नाटकाचे प्रयोग केले होते. त्यावेळचे तंत्र वापरूनच संशयकल्लोळ हे नाटक बसवण्यात आले आहे.

    संगीत संशयकल्लोळचे कथानक

    अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.

    फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे.या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते, आणि नाटक, बघणार्‍याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट/विकीपिडीया.

  • गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित ‘लेकुरे उदंड जाली’ ची पन्नाशी

    ३० ऑक्टोबर १९६६ रोजी दि गोवा हिंदू असोसिएशन’ निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मो. ग. रांगणेकर दिग्दर्शित
    ‘लेकुरे उदंड जाली’ या म्युझिकल नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबईच्या रवींद्र नाटय़ मंदिरात सादर झाला.
    या घटनेला ३० ऑक्टोबर रोजी पन्नास वर्षे पूर्ण झाली.

    मराठी रंगभूमीवरील या आगळ्या नाटकाला संगीत पं. जीतेंद्र अभिषेकी यांनी खूप उत्तम प्रकारे नाटकातील सर्व गाण्यांच्या चाली बांधल्या होत्या. ताल, सूर व शब्द सगळे कसे चपखल बसवले होते. या नाटकातील मुक्तछंदातल्या संवादांना आणि छंदाला प्राधान्य असलेल्या गोव्यातल्या किरिस्तावांच्या तियात्रा या नाट्यप्रकारातल्या संगीताचा बाज त्यांनी वापरला होता.

    वसंत कानेटकर यांनी ‘मूल नसलेले दाम्पत्य’ हा गंभीर सामाजिक विषय अतिशय वेगळ्या पद्धतीने हाताळला होता. विषय गंभीर असला तरी त्याची मांडणी हलक्याफुलक्या पद्धतीने करण्यात आली होती. नाटक हलकेफुलके, गाणी असणारे असले तरी त्याचा मूळ विषय प्रेक्षकांपर्यंत सुंदर पणे पोहोचला. मा.श्रीकांत मोघे व मा कल्पना देशपांडे हे मुख्य कलाकार होते.

    ‘लेकुरे उदंड जाली’ या नाटकाचा पुनरुज्जीवित प्रयोग २५ मे १९७३ रोजी झाला. मूळ नाटकातील श्रीकांत मोघे यांच्यासह अन्य काही कलाकार या प्रयोगातही होते. मूळ प्रयोगात ‘मधुराणी’ची भूमिका कल्पना देशपांडे करत होत्या. पुनरुज्जीवित झालेल्या ‘लेकुरे..’मध्ये ही भूमिका मा.दया डोंगरे यांना मिळाली. गिरगावातील साहित्य संघ मंदिरात या पुनरुज्जीवित नाटकाचा पहिला प्रयोग झाला. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’नेच हे नाटक दीर्घकालावधीनंतर पुन्हा एकदा नव्याने रंगभूमीवर सादर केले होते. भोलाराम आठवले (धटिंगण गुरुजी), बाबा महाडिक (डॉ. अष्टपुत्रे), प्रकाश इनामदार (गोरा), प्रवीण पाटील (मारोतराव), मोहनदास सुखटणकर (दासोपंत), कुमुद दामले (सोनुताई), श्रीपाद जोशी (व्यंकटराव), विजया धनेश्वर (तिलोत्तमा) आदी कलाकार नाटकात होते. सुरुवातीच्या प्रयोगात मंदाकिनी भडभडे या ‘सोनुताई’ करत होत्या, तर विठ्ठल पणदूरकर हे ‘दासोपत’ करत होते.

    दया डोंगरे या नाटकाची आठवण सांगताना म्हणतात.

    शिवाजी मंदिरच्या प्रयोगाच्या वेळची एक आठवण आहे. नाटकात –

    ‘मी बोलले तर होते वाईट,
    पण आहे का यांना त्याचे काही,
    तुम्ही माहेरचे म्हणूनच सांगते बाई
    यांना माणसांची पारखच नाही..’
    असे एक गाणे होते. शिवाजी मंदिरच्या त्या प्रयोगाला काहीतरी गडबड झाली आणि गाणे सुरू झाले आणि रेकॉर्डरमधून वायर निघाली. गाणे अचानक थांबले आणि मी क्षणभर ‘ब्लँक’ झाले. पण लगेचच पुढचे शब्द मी म्हणायला सुरुवात केली. त्याच वेळी तिकडे ध्वनिमुद्रित संगीत सुरू झाले. मी त्याचा अंदाज घेऊन पुढचे गाणे त्या ‘ट्रॅक’वर जुळवून घेऊन म्हटले. वसंत कानेटकर, सी. रामचंद्र, पं. जीतेंद्र अभिषेकी, दिलीपकुमार, वैजयंतीमाला अशा मान्यवरांनी आमचा हा ‘लेकुरे’चा प्रयोग पाहिला. नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या नाटकाबाबतची एक विशेष बाब आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, फिलाडेल्फिया, शिकागो, बोस्टन, डेट्रॉईट, टोरांटो या ठिकाणी आमच्या ‘लेकुरे’चे प्रयोग झाले. सातासमुद्रापार गेलेल्या या पहिल्या मराठी नाटकात मी होते याचा मला विशेष अभिमान आणि आनंद आहे. या दौऱ्यासाठी कोणीही प्रायोजक नव्हता. आम्ही सर्व कलाकारांनी स्वत:च्या पदरचे पैसे घालून हा दौरा ठरवला होता. येण्या-जाण्याचा खर्च आम्हीच करणार होतो. प्रयोगाची तांत्रिक व्यवस्था आम्ही कलाकारच सांभाळणार होतो. तेथील काही मराठी मंडळींकडून आमची निवासाची आणि जेवणखाणाची व्यवस्था केली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते. पण तिकडे गेल्यावर हे आश्वासन पूर्ण होऊ शकले नाही आणि आमची भलतीच पंचाईत झाली. ठरल्याप्रमाणे आम्ही पहिला प्रयोग केला आणि पुढचे प्रयोग करायचे की नाही, यावर चर्चा झाली. पण सर्वानुमते प्रयोग करायचे ठरले. आमचा सगळा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रयोगानंतर आम्ही प्रेक्षकांमध्ये ताट फिरवत होतो. त्यात जे पैसे जमा व्हायचे ती रक्कम प्रयोगातील सर्व कलाकारांमध्ये समान वाटप केली जायची. त्यामुळे कमावणे तर सोडाच; पण गमावण्याची वेळ आली होती. प्रयोगादरम्यान एका अमेरिकन महिलेने आम्हा सगळ्या कलाकारांना तिच्या घरी जेवायला बोलावले आणि चक्क श्रीखंड-पुरीचे जेवण करून घातले. हा अपवाद करता आमच्या या अमेरिकन दौऱ्याचा अनुभव विदारक होता.

    नंतर सुयोग’ नाटय़संस्थेतर्फे १९९५-९६ च्या सुमारास ‘लेकुरे उदंड जाली’ हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर सादर केले. यात मा.प्रशांत दामले आणि सुकन्या कुलकर्णी-मोने प्रमुख भूमीका केल्या होत्या.

    प्रशांत दामले यांनी एका मुलाखतीत सांगीतले आहे. त्यात जी गाणी होती ती जुन्या काळची आणि अवघड होती. त्याचबरोबर त्यातले पल्लेदार संवादही महत्त्वाचे होते. त्या नाटकाच्या एका प्रयोगाला पु. ल. देशपांडे आणि पंडित जितेंद्र अभिषेकी आले होते. त्यांच्यासमोर प्रयोग करताना आणि त्यांनी चाल लावलेली गाणी म्हणताना मला दडपण आलं होतं, पण मी प्रयोग नेमकेपणानं केला. पुलं. आणि अभिषेकी बुवांनी प्रयोग संपल्यानंतर माझं कौतुक केलं, तो क्षण मी कधीच विसरणार नाही.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

  • नवरात्र

    आश्विदन शुद्ध प्रतिपदेपासून देवीच्या नवरात्राला सुरवात होते. नवमी हा शेवटचा दिवस. दशमीला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. सुमारे तीन हजार वर्षांपासून देवीचे नवरात्र करीत असल्याचे संदर्भ आढळतात. आश्विेन महिन्याप्रमाणेच चैत्र महिन्यातदेखील देवीचं नवरात्र असून ते चैत्री पौर्णिमेपर्यंत असते. आश्वििनातील नवरात्रात दुर्गापूजा केली जाते. ही तेजस्वरूपाची, शक्तीची उपासना आहे. या पूजेच्या विविध पद्धती विविध ठिकाणी वेगवेगळ्या आढळतात. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. या नऊ दिवसांतील पहिले तीन दिवस महाकालीचे पूजन, नंतरचे तीन दिवस महालक्ष्मीचे पूजन आणि शेवटचे तीन दिवस महासरस्वतीचे पूजन केले जाते. नवरात्रीदरम्यान श्री दुर्गासप्तशती पाठ, कुंजिका स्तोत्र पठण, कुमारी पूजन, श्रीसुक्तपाठ भजन आदि कार्यक्रम केले जातात. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं म्हणतात; परंतु आश्विपन शुद्ध प्रतिपदेपासून महानवमीपर्यंत दुर्गादेवीला उद्देशून करावयाचे पूजन म्हणजे नवरात्र. म्हणून त्याचे दिवस नक्की किती येतात हा प्रश्न नसतो. नवरात्र म्हणजे नऊ दिवस असं आपण बोलतो.

    श्री महालक्ष्मी ही मुख्य देवता असून श्री महाकाली, श्री महासरस्वती ही तिचीच प्रासंगिक रूपं आहेत. आदिशक्तीची उपासना मुख्य आहे. परंतु ज्या-ज्या रूपात, ज्या-ज्या ठिकाणी, ती प्रगट झाली त्या-त्या रूपात त्या-त्या ठिकाणी तिची पूजा केली जाते. चंद्रिका, भगवती, दुर्गा, शर्वी, त्रिपुरा, भुवनेश्व-री, श्यातमा, ललिता, चंडी, चामुंडा, शांतादुर्गा इ. नावांनी या त्रिशक्ती प्रसिद्ध आहेत. बंगालमध्ये दुर्गा आणि कालिमाता विशेष प्रसिद्ध आहे. तिथे दुर्गाउत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते पौर्णिमेपर्यंत साजरा केला जातो.

    या दुर्गादेवीचे नऊ अवतार मानले जातात. १) शैलपुत्री, २) ब्रह्मचारिणी, ३) चंद्रघटा, ४) कुष्मांडा, ५) स्कंदमाता, ६) कात्यायनी, ७) कालरात्री, ८) महागौरी, ९) सिद्धीदात्री. या नऊ अवतारांमुळे तिला नवदुर्गा असेही म्हणतात. या नवदुर्गेची अनेक कुटुंबांत पूजा केली जाते.

    नवरात्रीच्या प्रत्येक दिवसाला स्वत:चे असे महत्त्व असते. पहिला दिवस घटस्थापना, पंचमीला ललितापंचमी म्हणतात. या दिवशी ललिता देवीची पूजा केली जाते. या देवीचे स्तोत्र श्रीमंत आदि शंकराचार्यांनी रचले आहे. अष्टमीच्या दिवशी काही ठिकाणी, विशेषत: देवीक्षेत्रात चंडीहोम करतात. काही कुटुंबांमध्ये अष्टमीला घरीदेखील होम करतात, तसेच देवीसमोर घागरी फुंकणे हादेखील एक पूजाविधी घरी किंवा देवी मंदिरात सामूहिकरीत्या केला जातो. या पूजेला तांदळाच्या पिठीची उकड घेऊन देवीचा मुखवटा तयार करतात. तिची साग्रसंगीत पूजा करतात. नवमीपर्यंत विविध कार्यक्रम नवरात्रात केले जातात. नवमीला खंडेनवमी असेही म्हणतात. या दिवशी अवजारांची, शस्त्रांची पूजा करतात.

    सर्वांत महत्त्वाचा आणि पहिला दिवस म्हणजे घटस्थापना होय. नवरात्राच्या वेगवेगळ्या पूजाविधींमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व आहे. यामध्ये वेदिका स्थापना आणि वरूण स्थापना हे महत्त्वाचे भाग आहेत. वेदिका याचा अर्थ शेत असा होतो. या वेदिकेवरच वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते, म्हणूनच घटस्थापनेपूर्वी वेदिका म्हणजे शेत तयार करावे लागते. याच्यासाठी शेतातील किंवा बागेतील माती आणतात. ती पत्रावळीवर किंवा वेताच्या टोपलीत पसरवितात. "वेदिकाय नम:' या मंत्राने शेताची पूजा करतात. त्यानंतर त्या शेतात सात प्रकारची धान्ये हळदीच्या पाण्याने भिजवून सप्तधान्यभ्यो नम: असे म्हणत पेरतात. नंतर पर्जन्याय नम: हा मंत्र म्हणत पाणी शिंपडतात. (शक्यय असल्यास वैदिक पौराणिक मंत्र म्हणावे.) हे सर्व पुरोहित पूजेच्या वेळी सांगतात. परंतु आजकाल बरेचदा गुरुजी मिळू शकत नाहीत अशावेळी आपण हे करू शकतो. ही वेदी तयार झाल्यावर वरुणस्थापना म्हणजे घटस्थापना केली जाते. हा घट मातीचा, तांब्याचा, चांदीचा वापरता येतो. पूर्वी सुवर्णाचादेखील घट वापरला जात असे, परंतु सर्वांना सोपा आणि सहजरीत्या मिळावा यासाठी मातीच्या घटाला मान्यता आहे. घटाला कलशदेखील म्हणतात, त्यामुळेच की काय नवरात्र आहे; याला घट बसलेत असे म्हणण्याची प्रथा बऱ्याच ठिकाणी आढळते. नऊ, पाच अशा विषम संख्येत घट घेऊन उतरंडीप्रमाणे त्याची रचना करून म्हणजे एकावर एक घट ठेवून, त्यावर स्वस्तिक काढतात. देवीच्या मूर्तीपुढे ठेवून त्याचे पूजन करतात. काही ठिकाणी कलशात ताम्हण ठेवून त्यात देवीचे टाक ठेवून, त्याची पूजा करतात. चांदीच्या पत्र्यावरील देवीच्या प्रतिमेला टाक म्हणतात. देवीच्या प्रतिमेवर किंवा घटावर येईल अशाप्रकारे नवरात्रीचे नऊ दिवस फुलांच्या जोड माळा वाहतात. यासाठी झेंडूची किंवा तिळाची फुले वापरतात. ही माळ जोडमाळ नवव्या दिवशीपर्यंत तशीच ठेवली जाते.

    माळ तयार करताना रेशीम लोकर वापरली जाते. रिळाचा किंवा सुताचा दोरा वापरायचा असल्यास दोऱ्याला थोडी तेलहळद लावतात. घटावर देवीची स्थापना केली जाते. काही ठिकाणी घटावर नारळ ठेवून प्रतिष्ठापना करतात. देवीजवळ अखंड दिवा लावतात. हा नवरात्र पुजेतील महत्त्वाचा भाग आहे. ही तेलवात नऊ दिवस-रात्र तेवत राहावी यासाठी विशेष प्रकारे बनवली जाते. ती जोडवात एक वीत लांब असते. ती कुंकवाने रंगवतात. समईदेखील जाड धातूची वापरतात. दिव्यावर काजळी जमू नये याची काळजी घेतली जाते.

    नवरात्रीच्या दिव्याचे तेलदेखील वेगळ्या भांड्यात दिव्याजवळ ठेवले जाते. या अखंड दिव्याकडे सर्वांचे लक्ष असते. त्या दिव्याचीदेखील पूजा केली जाते.
    देवीच्या पूजेसाठी पुरोहित बोलाविण्याची पद्धत आहे. त्यामागील कारण हेच की देवीस्थापना शास्त्रोक्त, तंत्रोक्त पद्धतीने व्हावी; परंतु पुरोहित न मिळल्यास देवीची षोडशोपचारे पूजा करावी. विड्याची देठासकट पाने घेऊन हळद-कुंकवाने अष्टदल किंवा स्वस्तिक काढून त्यावर देवीचा टाक ठेवावा. पानाचे देठ देवाकडे करावे. देवीचे पाय आपल्याकडे येतील अशी मांडणी करावी. नवरात्राच्या दिवसात देवीचे टाक किंवा मूर्ती जागेवरून न हलविता फुलाने पाणी शिंपडून रोज षोडशोपचारे पूजा करावी.

    नवरात्रात काही ठिकाणी नऊ दिवस उपवास केला जातो, तर काही ठिकाणी धान्य भाजून स्वयंपाक केला जातो. त्याला धान्य फराळ असं म्हणतात. रोज सकाळ-संध्याकाळ देवीची पूजा-आरती केली जाते. नवमीच्या दिवशी देवीला पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवितात. आपापल्या परंपरेप्रमाणे नवमीस किंवा दशमीस नवरात्र समाप्ती करण्याची पद्धत आहे. समाप्तीच्या दिवशी षोडशोपचारे पूजा करतात. माळ बांधतात. "मात: क्षमस्व' किंवा अंबा क्षमस्व म्हणून देवीवरून ईशान्य दिशेस एक फूल वाहतात. पेरलेल्या वेदिका व घट यांचे अक्षता वाहून विसर्जन करतात. उगवलेल्या धान्याचे अंकुर प्रसाद म्हणून घरात ठेवण्याची पद्धत आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ : डॉ. र. रा. घाटे, पुणे / देवी भागवत स्कंध.

  • गणरायाची स्वारी येतेय अवकाशातून

    अतिशय सुंदर दृश्य. गणरायाची स्वारी अवकाशातून धर्तीकडे यायला निघाली आहे याची प्रत्यक्ष प्रचिती येते या दृश्यातून.

  • संस्कृत भाषा व संस्कृती : भाग – (२) – (ब) /११

    भाग – (२) – (ब)

    • ईशान्य भारत :

    निखिल जोशी यांनी ईशान्य भारताचा उल्लेख केलेला आहे. त्यांचा असा समज दिसतो की, या भूभागाशी संस्कृत व संबंधित-संस्कृती यांचा कांहीं संबंध नाहीं. पण प्रत्यक्षात तसें नाहीं.

    (कदाचित, निखिल जोशींना, बोडो, नागा इत्यादी टोळ्या अभिप्रेत असतील. पण, मध्य-भारत व पूर्व-भारतातील ऑस्ट्रो-एशियाटिक , म्हणजे मुंडा ; किंवा ईशान्येकडील इंडो-चायनीज वंशाच्या टोळ्या, हा एक संपूर्णपणें वेगळा विषय आहे. आपण फक्त भूभागांसंदर्भात पाहूं या).

    • इरावती कर्वे यांनी असें analysis केलेलें आहे की, पुरातन कालीं, पूर्वेकडून ब्रह्मदेश (म्यानमार) व चीन भागातून लोकसमूह भारतात आले, व इथें स्थायिक होऊन भारताचा भाग बनून गेले. या वंशाचे लोक आसामपासून बंगालपर्यंत (आणि बंगालच्या थोडे पश्चिमेस व थोडे दक्षिणेस ) पसरलेले आहेत. अर्थात्, इथल्या स्थानिक लोकांशी सांस्कृतिक व लग्नसंबंध आल्यामुळे तेथील लोक mixed वंशाचे झाले. म्हणजेच, जसें शक, कुषाण, हूण व भारतात-वसलेले-ग्रीक यांचें झालें, तसेंच पूर्वेकडेही झालेलें आहे ; ते पूर्णपणें भारतीय संस्कृतीत मिसळून गेले आहेत, तिचा अविभाज्य भाग झालेले आहेत.
    • *बंगालबद्दल सहसा कोणी कांहीं शंका घेत नाहीं, कारण त्याबद्दल आपल्याला कांहीं माहिती असतेच. *इतिहास जाणणार्‍यांना, राजा खारवेल व उडीसाबद्दलही माहिती असते.

    *(तरीही आपण त्या दोन्ही भूभागांबद्दल नंतर पाहूंच).

    • आसाममधील ‘अहोम’ राजवट ही ब्रह्मदेश-सीमेवरील भागातून मध्ययुगात आलेल्या लोकांची आहे. तरीही , त्या काळातही आसाम भागाचा व संस्कृत-संस्कृतीचा संबंध आहे.
    • आसाम, त्रिपुरा व उडीसा या भागांवर बंगालची छाप आहे, हें निश्चित. त्रिपुरा तर अगदी ब्रह्मदेशाच्या सीमावर्ती प्रदेशात आहे, म्हणजे आसामच्याही पलिकडे. तेथें बंगाली चालते. त्यामुळे, जे बंगालला लागू होतें, तेंच भाषा व संस्कृतीच्या संदर्भात त्रिपुरालाही.
    • म्हणजेच, फक्त ईशान्य भारताचाच वेगळा, separate, विचार करून उपयोगी नाहीं; तर, ईशान्य भारत व पूर्व भारत यांचा एकत्रित विचार करायला हवा.
    • आसाम भागाचा महाभारकालीन उल्लेख ‘प्राग्ज्योतिष’ असा आहे ; तर नंतरच्या, गुप्तकालात, आसाम व बंगालचा कांहीं भाग यांचा उल्लेख ‘कामरूप’ असा आहे.

    याचा अर्थ स्पष्ट आहे की, या भूभागाचा संबंध पुरातन ‘मध्यदेश’ (पश्चिम यू.पी.) व मगधाशी होता.

    • आसाममधील हरिहर विप्र यानें रामायण व महाभारत या दोन्हींवर आधारित रचना केलेल्या आहेत. माधव कंदाली यानेंही रामायणावर आधारित रचना केलेली आहे. आसामसाठी एवढी उदाहरणें पुरेशी आहेत.
    • उडियामध्येही, सरल दास यानें महाभारतावर आधारित रचना केलेली आहे. (संदर्भ : ‘The Mahabharata Revisited’, Edited by R.N. Dandekar).
    • जयदेवाचें गीतगोविंद हें सुप्रसिद्ध संस्कृत काव्य आहे. त्याचें जन्मस्थान उडीसात, किंवा बंगालमध्ये, किंवा मिथिला भागात मानले जाते. याचा अर्थ, या भूभागांचा संस्कृतशी व संस्कृत-संस्कृतीशी नक्कीच होता.
    • ब्रह्मवैवर्त पुराण बंगालच्या परिसरात निर्माण झालेलें आहे. (संदर्भ : नरहर कुरुंदकर) . बंगालमधील चंडीदास, चैतन्य महाप्रभू यांच्या रचना संस्कृत-संस्कृतीच्या परंपरेशी जोडलेल्या आहेत. उदा. कुरुंदकर सांगतात की, इ.स. च्या ९व्या शतकात राधेची परंपरा (संस्कृतमधून) आलेली आहे.
    • ‘संस्कृत ही व्यवहारात निरुपयोगी भाषा ( इति निखिल जोशी ) . तसें आहे काय ? -

    मी संस्कृतचा वृथाभिमानी नाहीं, आणि संस्कृत ही भारताची राष्ट्रभाषा ‘व्हायलाच’ हवी असा माझा आग्रह नाहीं. मात्र, निखिल जोशी यांची statement मला योग्य वाटत नाहीं. आज प्रादेशिक भाषा बोलल्या जातात व साहित्यही त्यांच्यात निर्माण होतें, हें खरें. परंतु, संस्कृत निरुपयोगी कशी ?

    • आजच्या काळात बरेच प्रश्न आहेत, व ते सोडवायला हवेत, हें मान्य ; पण पुरातन साहित्य-संस्कृतीच्या अभ्यासानें नक्कीच आपलें व्यक्तिमत्व समृद्ध होतें, mature होतें, व आपण society ला त्याचा फायदा करून देऊं शकतो. आणि, हें समाजातील सगळ्या लोकांनी करायला हवें असें नाहीं. पूर्वीही सगळीच्या सगळी जनता, across-the-board, संस्कृत व संस्कृतीचा विचार व अभ्यास करत नसे, व आजही सर्वांनी तसें करायची आवश्यकता नाहीं.
    • पण त्याहीपेक्षा अधिक महत्वाचे मुद्द्दे पुढे आहेत.
    • पहिलें उदाहरण : बडोद्याचे multi-disciplinary विद्वान प्रा. दिनेश माहुलकर यांच्याकडून मला मिळालेल्या महत्वाचा माहितीचा मी इथें उल्लेख करत आहे.

    माहुलकर हे, इंग्रजी-भाषा, भाषाशास्त्र, संस्कृत, गणित वगैरे विविध विषयाचें ज्ञान असलेले बहुआयामी विद्वान होते. त्यांचे, ‘वृद्धि:’ , ‘Pre-Paninian Grammer’ हे महत्वाचे ग्रंथ आहेत. पाणिनीच्या आधीच्या , म्हणजे आर्ष-संस्कृतबद्दलचा त्यांचा ग्रंथ आधुनिक काळातील एक महत्वाचा ग्रंथ आहे. अगदी उतारवयातही माहुलकर , शिमला / देहरादून येथील एका संस्थेचे consultant म्हणून कार्यरत होते. ही संस्था संस्कृतच्या आधारानें महासंगणकाची आज्ञावली ( software) तयार करूं पहात होती. त्या संस्थेचें व माहुलकारांचेंही म्हणणें असें की, संस्कृत ही अगदी compact भाषा आहे, आणि, महासंगणकाच्या आज्ञावलीसाठी ती ideal आहे. प्रत्यक्ष या आज्ञावलीचें काय झालें / होणार , याची मला कल्पना नाहीं, माहुलकरही आतां हयात नाहींत. पण, वरील गोष्टीवरून, संस्कृतच्या, आजच्या काळातही असलेल्या महत्वाची कल्पना येईल.

    - दुसरें उदाहरण : श्री. द.मा .लेले हे ‘दाते पंचांगा’त पावसाचें भविष्य लिहीत असत. त्यांनी १९८५ मध्ये भरलेल्या हवामान परिषदेत, ‘वृष्टिविचार’ या नांवाचा प्रबंध वाचला होता. त्यात त्यांनी, कृषि-पराशर, वराहमहिराची बृहद्-संहिता इत्यादी पुरातन ग्रंथांचा उपयोग करून, वर्षा-ऋतूत किती व कधी पाऊस पडेल याचें पूर्वानुमान कसें करायचें, हें स्पष्ट केलें होतें. विशेष म्हणजे, इस्रोचे कांहीं शास्त्रज्ञही लेले यांचा पावसाच्या पूर्वानुमानाच्या बाबतीत सल्ला घेत असत. (संदर्भ : ‘कृषिज्ञानकोश’ चे संपादक श्री. अशोक माहदेव जोशी यांचा, २०.३.२०१६ च्या लोकसत्तातील लेख ).

    -तिसरे उदाहरण : आजच्या काळात ऍलोपथीचें खूप महत्व आहे यांत वाद नाहीं. पण कांहीं वेळा, ऍलोपथीपेक्षा, उपचाराच्या अन्य पद्धती अधिक-उपयुक्त व कमी-हानिकारक ठरतात. त्यामुळे हल्ली ‘Alternate Medicine’ या क्षेत्राला पुन्हां महत्व येऊं लागलें आहे ; आणि त्यातील एक महत्वाची पद्धति आहे आयुर्वेद. (तिबेटी चिकित्सापद्धतीतही आयुर्वेद आहेच, कारण तिच्यात आयुर्वेद व चिनी चिकित्सापद्धतीचें मिश्रण आहे ) .आयुर्वेदाचें खरें ज्ञान हवें असेल तर, चरक-सुश्रुत-वाग्भट इत्यादींचे संस्कृत ग्रंथ वाचायलाच हवेत. मला एक केरळीय आयुर्वेदिक प्रॅक्टिशनरनें सांगितलें की, केरळमध्ये, आयुर्वेद शिकणार्‍यांसाठी संस्कृत भाषेचें शिक्षण अनिवार्य होतें / आहे, आणि अर्थातच, संस्कृतमधील आयुर्वेदीय ग्रंथाचा अभ्यासही.

    (पुढे चालू )

    - सुभाष स. नाईक. Subhash S. Naik

    सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.

    Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126

    eMail : vistainfin@yahoo.co.in

    Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com

  • ओळख आपल्या भारतीय संस्कॄतीची

    आपल्या भारतीय संस्कॄतीची ओळख खास करुन आपल्या मुलांना द्या. पाश्चात्यिकरणाच्या या जमान्यात ही माहिती त्यांना होणे आवश्यक आहे

    दोन पक्ष

    कृष्ण पक्ष
    शुक्ल पक्ष

    तीन ऋण

    देव ऋण
    पितृ ऋण
    ऋषि ऋण

    चार युगे

    सतयुग
    त्रेतायुग
    द्वापरयुग
    कलियुग

    चार धाम

    द्वारिका
    बद्रीनाथ
    जगन्नाथ पुरी
    रामेश्वरम धाम

    चार पीठे

    शारदा पीठ ( द्वारिका )
    ज्योतिष पीठ ( जोशीमठ बद्रिधाम )
    गोवर्धन पीठ ( जगन्नाथपुरी )
    शृंगेरीपीठ

    चार वेद

    ऋग्वेद
    अथर्वेद
    यजुर्वेद
    सामवेद

    चार आश्रम

    ब्रह्मचर्य
    गृहस्थ
    वानप्रस्थ
    संन्यास

    चार अंतःकरण

    मन
    बुद्धि
    चित्त
    अहंकार

    पंच गव्य

    गाईचे तूप
    दूध
    दही
    गोमूत्र
    शेण

    पंच देव

    गणेश
    विष्णु
    शिव
    देवी
    सूर्य

    पंच तत्त्व

    पृथ्वी
    जल
    अग्नि
    वायु
    आकाश

    सहा दर्शन

    वैशेषिक
    न्याय
    सांख्य
    योग
    पूर्व मिसांसा
    दक्षिण मिसांसा

    सप्त ऋषि

    विश्वामित्र
    जमदाग्नि
    भारद्वाज
    गौतम
    अत्री
    वशिष्ठ
    कश्यप

    सप्त पुरी

    अयोध्या पुरी
    मथुरा पुरी
    माया पुरी ( हरिद्वार )
    काशी
    कांची
    ( शिन कांची - विष्णु कांची )
    अवंतिका
    द्वारिका पुरी

    आठ योग

    यम
    नियम
    आसन
    प्राणायाम
    प्रत्याहार
    धारणा
    ध्यान
    समाधी

    आठ लक्ष्मी

    आग्घ
    विद्या
    सौभाग्य
    अमृत
    काम
    सत्य
    भोग
    योग लक्ष्मी

    नव दुर्गा

    शैल पुत्री
    ब्रह्मचारिणी
    चंद्रघंटा
    कुष्मांडा
    स्कंदमाता
    कात्यायिनी
    कालरात्रि
    महागौरी
    सिद्धिदात्री

    दहा दिशा

    पूर्व
    पश्चिम
    उत्तर
    दक्षिण
    ईशान्य
    नैऋत्य
    वायव्य
    आग्नेय
    आकाश
    पाताळ

    मुख्य ११ अवतार

    मत्स्य
    कच्छप
    वराह
    नरसिंह
    वामन
    परशुराम
    श्री राम
    कृष्ण
    बलराम
    बुद्ध
    कल्कि

    बारा महिने

    चैत्र
    वैशाख
    ज्येष्ठ
    आषाढ
    श्रावण
    भाद्रपद
    अश्विन
    कार्तिक
    मार्गशीर्ष
    पौष
    माघ
    फागुन

    बारा राशी

    मेष
    वृषभ
    मिथुन
    कर्क
    सिंह
    कन्या
    तुला
    वृश्चिक
    धनु
    मकर
    कुंभ
    कन्या

    बारा ज्योतिर्लिंग

    सोमनाथ
    मल्लिकार्जुन
    महाकाल
    ओमकारेश्वर
    बैजनाथ
    रामेश्वरम
    विश्वनाथ
    त्र्यंबकेश्वर
    केदारनाथ
    घुष्नेश्वर
    भीमाशंकर
    नागेश्वर

    पंधरा तिथि

    प्रतिपदा
    द्वितीया
    तृतीया
    चतुर्थी
    पंचमी
    षष्ठी
    सप्तमी
    अष्टमी
    नवमी
    दशमी
    एकादशी
    द्वादशी
    त्रयोदशी
    चतुर्दशी
    पौर्णिमा
    अमावास्या

    स्मृति

    मनु
    विष्णु,
    अत्री
    हारीत
    याज्ञवल्क्य
    उशना
    अंगीरा
    यम
    आपस्तम्ब
    सर्वत
    कात्यायन
    ब्रहस्पति
    पराशर
    व्यास
    शांख्य
    लिखित
    दक्ष
    शातातप
    वशिष्ठ