वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
भारतातील जमिनींची मोजणी १० एप्रिल १८०२ रोजी सुरू झाली. त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आपल्याला कधीतरी हे प्रश्न पडले असतील. गुंठा म्हणजे काय? जमीन मोजणीची गुंटूर पद्धत म्हणजे काय? माऊंट एव्हरेस्ट या जगातील सर्वात उंच शिखराचे एव्हरेस्ट नाव कशामुळे पडले?
त्यावेळी गुंटूर नावाचा ब्रिटीश अधिकारी होता. त्याने ३३ गुणिले ३३ अशी जमीन मोजणीची नवी पद्धत रूढ केली. त्यामुळे त्याचे स्मरण म्हणून या क्षेत्रफळाच्या जमिनीला १ गुंठा असे नाव पडले व त्या मोजणीला गुंटूर पद्धत असे म्हणू लागले.
जमीन मोजणीच्या सुरूवातीच्या काळात जॉर्ज एव्हरेस्ट नावाचा अधिकारी होता. त्याने कन्याकुमारी ते काश्मीर हे अंतर मोजले तसेच जगातील सर्वोच्च शिखराची उंची मोजली. त्यात त्याला अतोनात परिश्रम झाले व त्यातच त्याचे निधन झाले. त्याचीच आठवण म्हणून जगातील सर्वोच्च उंच शिखराला त्याचे नाव देण्यात आले.
राज्यकारभार चालविण्यासाठी जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी काही अंश कर म्हणुन घेण्याची पध्दत पुरातन काळापासुन आहे. भारतामध्ये इ.स. पुर्वीच्या राजवटीमध्ये जमीन महसुलाची निश्चित पध्दत होती. भारतात जमिनीचे सर्व्हेक्षण व नकाशे तयार करणेची प्राचीन परंपरा आहे. मनुस्मृती व ब्रम्हांडपुराणातही त्याचा उल्लेख आढळतो. भारतीय इतिहासात सिंधु संस्कृतीला अनन्यसाधारण महत्व आहे. त्याकाळाची नियोजनबध्द संरचना मोहेंजोदडो व हडप्पा येथील उत्खननात मिळालेल्या अवशेषात दिसुन येते. शंखापासुन बनविलेल्या कोनमापक यंत्राचा व ओळंब्याचा वापर माणसाने त्याकाळी केला आहे.
मौर्य साम्राज्यामध्ये जमिनीची मोजणी व नोंदणी ठेवणेसाठी "रज्जूक" नावाचा अधिकारी नेमला जाई. जमीन मोजणीसाठी दोरीचा प्रथम वापर केला गेला. मौर्याच्या काळात संस्कृतमधील "रज्जू" यावरून "रज्जूक" हा शब्द प्रचलित झाला. कौटील्याच्या अर्थशास्त्रामध्ये जमिनीची मोजणी, प्रतवारी, सर्व्हेक्षण करून तिचे कोरडी, बागायत, ओलसर अशा प्रकारे प्रतवारी करून जमिनीचा प्रकार, सिंचन सुविधा व त्यावरील पिकांच्या आधारे तिच्यावरील कराची निश्चिती केली जात असे.
जमिनीची मालकी व कर रचना असणारी महसुल पध्दत दिल्लीचा बादशहा शेरशहाने इ.स.१५४० ते १५४५ दरम्यान अवलंबली. त्याच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक जमीन धारकाची नोंद करणेत आली तसेच प्रत्येक हंगामातील प्रत्येक पिकाची नोंद करणेत आली. हा महसुल काटेकोरपणे गोळा केला जाई. जमीन धारकाचे हक्क व त्याची जबाबदारी याचा स्पष्ट उल्लेख या करारनाम्यात असे.
मोगल बादशहा अकबराने त्याचा मंत्री तोरडमल याचे मदतीने कर पध्दतीची फेर उभारणी केली. त्याने जमीन मोजणीसाठी प्रथमच काठी व साखळीचा वापर केला. क्षेत्रफळासाठी बिघा हे परिमाण ठरविण्यात आले व जमिनीची उत्तम, मध्यम व निकस या तीन प्रकारे विभागणी करणेत आली. जमिनीच्या एकुण उत्पन्नापैकी १/३ हिस्सा कर म्हणुन घेतला जाई. त्याचे चलनामध्ये मुल्यांकन करून मागील १९ वर्षाच्या सरासरी इतके पुढील १० वर्षासाठी करपात्र उत्पन्न ठरविले जात असे. मंत्री तोरडमलची पध्दत दक्षिणेकडे निजामाचा दिवाण अहमदनगरचा वजीर मलीक अंबर यानेही सन १६०५ ते १७२६ या काळात काही सुधारणासह विकसीत केली. त्यांनी जमीन मोजणीच्या वरील पध्दती कायम ठेवल्या. जमीन धारकाचे मालकी हक्क व सत्ता प्रकाराची पध्दत अंमलात आणली.
मराठेशाहीमध्ये इनाम, वतन व मिरास हे शब्द जमिनीच्या महसुल आकारणीशी निगडीत होते. याव्दारे जमिनीची मालकी व महसुल आकारणीचे अधिकार देण्यात येत होते. हे अधिकार वंश परंपरागत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ म्हणजे सन १६७४ पासून जमिन महसुल आकारणीसाठी "खेडे" हे एकक वापरले जात असे. पीक उत्पादन व करणा-यांची क्षमता पाहुन कर आकारणी (शेतसारा) बसविला जाई. या पध्दतीला "कमालधारा" म्हटले जाई. प्रत्येक गावात मामलेदार हे देशमुख, देशपांडे यांचे मदतीने जमीन महसूल गोळा करण्याचे काम करत.
दुसर्या बाजीरावाच्या काळात ही पध्दत बंद झाली. याच काळात मामलेदार या पदाचा लिलाव सुरू झाला. १८ व्या शतकाच्या शेवटी पुण्याच्या उत्तरेस भिमा नदीपासुन तापी नदीकाठच्या बहरानपुर विस्तृत भुप्रदेश प्रथमत: नकाशात बसविला. नकाशामध्ये सातपुडा डोंगररांगा, अजंठा टेकड्या , महत्वाची गावे व नद्या सांकेतिक पध्दतीने दाखविल्या आहेत. याचदरम्यान नाशिक शहराचा नकाशा सर्वप्रथम केला गेला आहे.
ब्रिटीशांनी सन १६००-१७५७ पर्यंत भारतीय भुभागावर वर्चस्व मिळविले. परंतु ब्रिटीश हे व्यापारी म्हणुन भारतात आले होते. त्यांच्या व्यापारी दृष्टीकोनातुन त्यांना भारतामधुन उत्पन्न हवे होते आणि भारतामध्ये जमिन हे उत्पन्नाचे महत्वाचे साधन होते. म्हणुन ब्रिटीशांनी उत्पन्न मिळविण्याकरीता जमिनीची शास्त्रशुद्ध पध्दतीने सर्वेक्षण व कर आकारणी सुरू केली. या दृष्टीकोनातून ब्रिटीशांनी सन १७६७ मध्ये सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना केली व या पदावर सर्व्हेअर जनरल ऑफ इंडिया म्हणून जेम्स रनेल यांची नियुक्ती करण्यात आली. जेम्स रनेल लिखीत '"Bengals Atlas" या पुस्तकात शंकु साखळीने जमिनीची मापे आणि खगोल शास्त्रीय माहिती याचा एकत्रित आधार घेऊन नकाशे तयार केले असा उल्लेख आहे.
सर लॅम्टन यांनी दक्षिण भारतातील केपकामोरिन येथून १० एप्रिल १८०२ मध्ये त्रिकोणमितीय भूमापनाची सुरुवात केली होती. ही सुरवात मद्रास जवळील थॉमस पर्वतापासून केली. भूमापनाच्या कामात सर जॉर्ज एव्हरेस्ट यांनी मोठी मदत केली. सर जॉर्ज एव्हरेस्ट भूमापक प्रमुख व त्रिकोणमीतीय भूमापनाचे अधीक्षक होते. १८३० मध्ये त्यांची भूमापन कामाचे अधीक्षक म्हणून नेमणूक झाली. जॉर्ज एव्हरेस्ट यांना 'सर्व्हेअर जनरल बहादूर' असे संबोधले जाऊ लागले. भारतीय भूखंडाचे मोजणीचे काम चालू असताना कर्नल लॅम्टन यांचा मृत्यू झाला व पुढे हे काम जॉर्ज एव्हरेस्ट यांनी ३३ वर्षात पूर्ण केले. अशा प्रकारे भारतीय भूखंडाचे मोजणी काम एकुण ३७ वर्षात पूर्ण झाले.
सन १८१८ मध्ये जेव्हा ब्रिटीशानी मराठयाकडून सत्ता काबीज केली त्यावेळी दक्षिण विभागाचे राजकारणी कमिशन माउन्टस्टूअर्ट एन्डफिंस्टन यांनी रयतवारी पध्दतीचा पाया घातला. ब्रिटीशांच्या कारकिर्दीत दुसरी महत्वाची गोष्ट करण्यात आली ती म्हणजे शेत जमिनीची शास्त्रशुध्द पध्दतीने गुंटर नांवाच्या अधिका-यांने अंमलात आणलेल्या शंकू साखळीने मोजणी करण्यात आली. म्हणून शंकू साखळीस गुंटर चैन, गुंठा असे म्हणत सदर साखळी ३३ फुट लांबीची असून १६ भागात विभागली आहे. त्या प्रत्येक भागाला आणा म्हणत व गुंटर साहेबांच्या नावावरुन पुढे गुंठा प्रचलित झाला. ४० गुंठयाच्या जमिनीच्या क्षेत्राला एक एकर म्हणत.
जमिन महसूल ठरविण्याचा पहिला मान पुणे जिल्हातील इंदापूर तालुक्यातील भिगवण येथून प्रिंगले नावाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी सन १८२७ मध्ये मिळविला. सध्या अस्तिवात असलेली जमिन महसूल आकारण्याची पध्दत ब्रिटीश राजवटीत ठरवून दिलेल्या पध्दतीनुसार आहे.
सध्या महाराष्ट्राच्या महसूल विभागांतर्गत येणारा भूमी अभिलेख विभाग महसूल विभागाचा पाया आहे. जमिनीच्या मालकीचे हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी जमिनीची पुनर्मोजणी अत्यंत महत्त्वाची आहे. संगणकीकरणाच्या जमान्यात या विभागांतर्गत नियमित कामाव्यतिरिक्त ई-मोजणी, ई-फेरफार, ई- चावडी, ई- अभिलेख, ई-अभिलेख, ई-नकाशा, ई-पुनर्मोजणी, ई-नोंदणी, ई- भूलेख इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण व अभिनव योजना राबविण्यात येतात.
-- निनाद अरविंद प्रधान
सिक्युरिटीज अॅन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात “सेबी (SEBI)” ही भारतातील गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी विविध मार्ग वापरते. सामान्य गुंतवणूकदारांना येणार्या अडचणी दूर करण्यासाठी आणि शेअरबाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांच्या बाबतीत कोणतीही तक्रार करण्यासाठी “सेबी”ने जुन २०११ मध्ये एका वेबसाईटची निर्मिती केली. scores.gov.in या संकेतस्थळावर आता कोणताही सामान्य गुंतवणूकदार आपली तक्रार नोंदवून तिचा पाठपुरावा करु शकतो.
गुंतवणूकदारांकडून आलेल्या तक्रारींचा निपटारा वेगाने होत असल्याचा “सेबी”चा दावा आहे.
बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल
संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६.
आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत.
गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो आहे, (archology, language, ऋग्वेद आणि सिंधु-सरस्वती संस्कृती यांचा परस्पर संबंध, वगैरेंवर) . त्यामुळे, हा लेख वाचून मनात आलेले कांहीं विचार, आणि माहीत असलेली कांहीं माहिती, हें सर्व मांडावे, असें मला वाटलें.
• या सिनेमात ‘सिंधु माँ’ हें गीत आहे. याचें कारण उघड आहे की, या संस्कृतीला पूर्वी ‘सिंधु संस्कृती’ म्हणून ओळखत असत. त्यामुळे, तसें, हें गीत योग्यच आहे. पण, १९४७ नंतर झालेल्या उत्खननांमध्ये राजस्थान, हरियाणा, गंगा खोरे, दिल्ली भाग, वगैरे ठिकाणीही या संस्कृतीची अनेक स्थळें मिळाली आहेत. ( जसें की, धोलावीरा, ज्याचा उल्लेख आशुतोष गोवारीकर यांनी केलेला आहे), लोथल, कालीबंगन, राखीगढी इत्यादी . त्यातील बरीच स्थळें ‘लुप्त’ सरस्वतीच्या तीरांवर आहेत. त्यामुळे आतां संशोधक, हिचा ‘सिंधु-सरस्वती संस्कृती‘ असा उल्लेख करतात.
• राखीगढीमधील अवशेषांचा , IIT Kharagpur व Archeological Survey of India यांनी हल्लीच केलेल्या टेस्टसवरून, या संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ७००० वर्षें इतका आलेला आहे. ( तो याआधी इ.स.पू. ३५०० हजार ते साधारण २००० इतका मानत असत). राखीगढी तर मोहेन जो दारो च्या तिप्पट मोठें आहे.
• या संस्कृतीत ‘देव’ कोणता होता तें माहीत नाहीं, ( म्हणजेच, आराधना कुणाची करीत असत, तें ) , असें आशुतोष गोवारीकर म्हणतात.
पण, एस. आर. राव यांना कालीबंगन येथें यज्ञवेद्या सापडलेल्या आहेत. (आतां अन्यत्रही मिळू लागल्या आहेत). त्यातून, ही संस्कृती व ऋग्वेदीय संस्कृती यांचें एकत्व दिसून येतें. (असें कांहीं संशोधक म्हणतात, व तें योग्य वाटतें).
या संस्कृतीच्या मुद्रांमध्ये ”पशुपती’ची मुद्रा आहे. ती शिवाची प्रतिमा आहे, असें समजलें जातें. ‘आदिनाथ’ म्हणजे शिव असें हिंदू समजतात. परंतु, माझ्या एक जैन स्नेह्यानें सांगितलें की, त्यांच्या अनुसार, ही ’आदिनाथ’ म्हणजे त्यांचा प्रथम तीर्थंकर याची प्रतिमा आहे. जैन धर्म हा बराच पुरातन आहे, हें खरेंच आहे. कारण त्यांचा २४ वा तीर्थंकर महावीर वर्धमान व गौतम बुद्ध हे समकालीन होते.
माझ्या या जैन स्नेह्याला माहीत नाहीं , परंतु, असें आहे की ऋग्वेदीय ऋचेतील कांहीं उल्लेखांत जैन , किंवा पूर्व-जैन (प्री-जैन, प्रोटो-जैन) परंपरा कदाचित असेलही . उदा. ‘स्वस्ति न इंद्रो वुद्धश्रवा:’ या ऋचेत पुढे ‘अरिष्टनेमीचें नांव आहे ; आणि, अरिष्टनेमि हा --- नंतरच्या काळातील कां होईना , पण ---- एक जैन तीर्थंकर होता. तो श्रीकृष्णाचा चुलत भाऊ होता, व जैनइमध्ये त्याला ‘नेमिनाथ’ म्हणतात.
मात्र, पशुपतीची प्रतिमा ही जैनांच्या प्रथम तीर्थंकराची आहे, हें संशोधकांना कितपत मान्य आहे, तें सांगणें कठीण आहे.
पण, मुद्दा विचारणीय आहे, हें खरें. आणि मी अजून तरी कुठल्याही संशोधकाच्या पुस्तकात वा लेखनात हा मुद्दा पाहिलेला नाहीं .
हा पशुपती Yogic Posture मध्ये बसलेला आहे. आतां, या संस्कृतीच्या इतर ठिकाणी योगिक आसनांतील व्यक्ती मुद्रांवर दिसतात. म्हणजेच, योगाचा प्रसार त्या काळीं झालेला असावा.
या संस्कृतीच्या स्थळांवर मिळालेल्या phallus च्या शिल्पांवरून ही पूजासुद्धा त्या काळीं तिथें होती, असें दिसतें. त्यासाठी शिवलिंग सापडायची ज़रूर नाहीं .
समाजशास्त्रीय अभ्यासावरून , त्या काळीं ‘मातृदेवतेची’ पूजा करत असत. मातृदेवता हें प्रॉडक्टिव्हिटीचें प्रतीक आहे.
डी.डी. कोसांबी यांनी दाखवलें आहे की, तत्कालीन समाज विविध Totems वापरत असे, व त्या प्रतिमा त्यांच्या टोटेम्स् वर असत. (जसें रामायणाच्या काळात, सुग्रीव-हुमान यांच्या टोळीचें टॉटेम होतें ‘वानर’ ). यावरूनही, आराध्यांची कांहीं कल्पना येऊं शकते.
सिंधु--सरस्वती संस्कृती व ऋग्वेदाचें एकत्व मान्य केलें तर, ऋग्वेवीय देवतांची (डेइटी) आराधनाही सिंधु-सरस्वती संस्कृतीत होत असली पाहिजें, जसें इंद्र, वरुण, मित्र / सविता/ आदित्य, अश्विनीकुमार इ.
• त्या काळीं चालत असलेल्या देवाणघेवाण व व्यापार, यांचा कितपत वापर आशुतोष गोवारीकर करत आहेत, त्याचा उल्लेख हा लेख करत नाहीं.
मात्र, सिंधु-सरस्वती भाग आणि गंगा खोरें यांच्यात ‘लागवटीयोग्य पिकांच्या माहितीची’ देवाण घेवाण झालेली आहे. कांहीं पिकें सिंधु-सरस्वती मधून गंगा खोर्यात आलेली आहेत, तर कांहीं उलट दिशेनें गेलेली आहेत. ( त्याचा उल्लेख, लवकरच प्रसिद्ध होणार्या माझ्या एका हिंदी लेखात मी केलेला आहे).
लोथलसारख्या स्थलांवरून, हें उघड आहे की, या संस्कृतीचा व्यापार मध्य-पूर्वेतील देशांशी चालत होता. तिकडे या संस्कतीच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. ते लोक या संस्कृतीच्या भागाला ‘मेलुहा’ (Meluhha) म्हणत असत, हें आतां सर्वश्रुत आहे.
भारतीय साहित्यात पणींचा उल्लेख येतो. ते म्हणजे, आफ्रिकेच्या उत्तर किनार्यावर वसत आलेले ‘फिनीशियन्स’.
भारतीय साहित्यात असुरांचा उल्लेख येतो. ते म्हणजे, ‘अहुर(असुर) मज़्द’ चे पूजक इराणी लोक, व असुरीयन्स (असीरियन्स).
या सर्वांवरूनही या संकृतीचा इंटरनॅशनल संबध दिसून येतो. तसेंच , या संस्कृतीचें नौकानयनातील प्राविण्यही दिसून येतें.
• एक महत्वपूर्ण गोष्ट. गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये श्रीकांत तलगेरी यांनी सप्रमाण, ऋग्वेदीय ऋचांच्या सहाय्यानें , असें दाखवून दिलेलें आहे की, या संस्कृतीवा उगम गंगा-खोर्यात झाला, व तेथून ती सिंधु-सरस्वती भाग व अफगाणिस्तान-इराणकडे पसरली.
अर्थात, ’आर्यन परकोलेशन’ची थिअरी मानणार्या हार्वर्ड मधील विट्.झेल व इतर संशोधकांना हें मान्य नाहीं, व त्यावर बराच वादविवाद चालूं आहे.
टीप : ‘आर्यन इन्व्हेजन थियरी’ आतां कालबाह्य झाली आहे, व ‘आर्य हे भारतात बाहेरून, पश्चिमेकडून, आले’ असें मानणारे संशोधक आतां ‘आर्यन परकोलेशन थियरी’ मानतात, म्हणजेच, बाहेरून भारतात आगमन झालेल्या आर्यांचें भारतात हळूंहळूं सम्मीलन झालें. खरें तर, ‘आर्य’ हें कुठल्याही जनसमूहाचें नांव नाहींच. पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
मात्र, ही तलगेरी यांची थियरी महत्वाची आहे. या संस्कृतीला ‘सिंधु-सरस्वती-गंगा संस्कृती’ असें आतां नांव द्यायला हवें.
-- सुभाष स. नाईक.
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
कुटुंब म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक गरजा आल्याच. त्यातील निवार्याची गरज म्हणजे घराची गरज.
घराची म्हणजे चार भिंती, दारं, खिडक्या आणि डोक्यावर छप्पर. खरं तर घराचे किती विविध प्रकार आहेत पण अजूनही घर म्हटलं की बालपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले समोर चौकोनी भिंत, भिंतीला मधे दार, बाजूला दोन खिडक्या, वर दोन्ही बाजूने उतरते छपर असंच घर डोळ्यापुढे उभं राहातं. हा जणू 'घर' या शब्दाचा सिम्बॉलच.
प्रत्येकाला घर हे सुंदरच हवं असतं. आपली परिस्थिती, आपला आवाका यांच्या बेरीज-गुणाकारात बसणार्या स्वत:च्या एका छानशा घराचे स्वप्न प्रत्येकजण जपत असतो. हे स्वप्न तर पूर्ण झाले.. घर तर झाले पण पुढे काय ?
'आपलं घर' , 'माझं घर' शब्द जरी उच्चारले तरी मनाला केवढा विसावा वाटतो. घर म्हणजे आपलं सर्वस्व. आपण कुठेही बाहेर गेलो, परदेशात गेलो, मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून आलो तरी दोन चार दिवस आनंदात जातात पण नंतर कधी एकदा घरी पोहोचतो ही ओढ निर्माण होते.
पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांप्रमाणे घरातील खोली इतकी सुसज्ज आणि सजवलेली नसते पण चार दिवस फिरून आल्यावर गादीवर पाठ टेकवताना जो आराम मिळतो तो प्रचंड सुखावह असतो. कारण त्यामागे स्वत:च्या घराची, त्यातील स्थैर्याची भावना आधार देणारी असते. तुमचं साधं जुन्या बांधकामाचं घर असो, वनरुम किचन फ्लॅट असो किंवा मोठा बंगला असो. प्रत्येकाला शेवटी आपलं घरच सुख देतं.
तुमचं घर तुम्हाला दिवस रात्र इतकं सुख देतं मग त्या घराची तुम्ही किती काळजी घेता? आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात स्वत:कडे पहायला वेळ नसतो. तरीसुद्धा घर झाडून पुसून स्वच्छ ठेवलेलंच असतं. पण इतकं पुरेसं असतं का? त्यावर तुम्ही म्हणाल "अहो दिवसभर कितीही आवरलं ना, तरी घरातला पसारा संपतच नाही." अगदी योग्य आहे तुमचं हे म्हणणं. पण दिवसभर घर आवरायचंच कशाला? रोजचा अर्धा-एक तास खूप झाला. फक्त त्यासाठी नियोजनाची गरज आहे.
प्रत्येकाला आपलं घर खूप सुंदर हवं असतं. आपण बराच खर्च करून घराला आकर्षक इंटिरिअर करून घेतो. अगदी पैसे खर्च करुन इंटिरिअर केले नाही तरीही आपल्या आवडीनुसार घर सजवता येतेच. घर छान सजवलंय पण ते नीटनेटकं ठेवलेलं नाही.... अस्ताव्यस्त पसारा घरभर पसरलेला आहे.. अशा घरात राहताना निश्चितच प्रसन्न वाटणार नाही.
आपल्या घरात आपणच पसारा करतो आणि मग तो पसारा दिवसभर घरातील एकटी स्त्री आवरत असते. स्त्रिया आजकाल कामानिमित्त बाहेर पडतात. मग घर आवरायला वेळ कुठे मिळणार ? घर वेळेवर आवरलं नसलं तर त्या पसार्यात आयत्यावेळेला महत्वाच्या वस्तू सापडत नाहीत. मग गोंधळ, चिडचिड आणि वेळेचा अपव्यय.... पुन्हा अव्यवस्थितपणाचा शिक्का तो वेगळाच.
हे सगळं टाळण्यासाठी घर आवरायला मिळतो सुट्टीचा एकच दिवस.. तो म्हणजे रविवार ! म्हणजे विश्रांती नाहीच ! उलट बाहेरच्या कामापेक्षा त्यादिवशी घरातलीच कामं करुन जीव थकून जातो. "पण काय करणार? बरं कंटाळा आला म्हणून कामं टाळून चालत नाही. कामं तर सगळी होणं गरजेचं आहे.
मग त्याचं जर आपण छानसं नियोजन केलं तर ? रविवार खरा सुट्टीचा वार होईल. घर नेहमीसाठी प्रसन्न राहील.
-- सौ. निलिमा प्रधान
लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या !
पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे.
पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी झालेला ‘सायकस-पिको करार’ ही घटना १९१६ ची आहे. कुबेर यांनी या समयींच्या ब्रिटिश साम्राज्यात अमेरिकेचा उल्लेख केलेला आहे.
अमेरिका एके काळीं ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग होती, हें खरें आहे. पण ती स्थिती १७७५ च्या आधीची होती. त्यानंतर अमेरिकेचें स्वातंत्र्य-युद्ध सुरूं झालें व १७८३ पर्यंत चाललें. म्हणजेच, सायमन-पिको कराराच्या सव्वाशे वर्षें आधीची ही घटना आहे. त्यामुळे तिचा या कराराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष कांहींही संबंध नाहीं.
हा करार झाला तेव्हां केमाल पाशा हा ऑटोमन साम्राज्याचा सम्राट होता, असा उल्लेख कुबेरांनी केला आहे. केमाल पाशा (अतातुर्क) हा पहिल्या महायुद्धात ( १९१४ ते १९१८ ) लढत होता ; तो त्यावेळी सैन्यात होता. लेखात उल्लेख आहे तसा तो ऑटिमन साम्राज्याचा सम्राट नव्हता, कधीच नव्हता. तऑटोमन साम्राज्य हें, पहिलें महायुद्ध संपल्यावर लयाला गेलें. १९१९ ते १९२१-२२ हा, केमाल पाशानें टर्कीमध्ये केलेल्या क्रांतियुद्धाचा काळ आहे. त्यानें टर्कीत ‘रिपब्लिक’ सुरूं केलें.
मात्र, या किरकोळ गफलतीमुळे मुख्य माहितीला कांहीं बाधा पोचत नाहीं.
-- सुभाष नाईक
आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्या मुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.
मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला तिचे नाव स्वराली ठेऊ, तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली असता, गाडीतून उतरून रस्ता ओलांडणे तिला जमत न्हवते. रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले कि येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत न्हवता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात इथे पोहोचेल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.
एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते, इतके कि, सायकल सुद्धा बिल्डिंगच्या आवारात फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेले सुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, या मुळे स्वराली सायकलवरून पडली, किव्वा घरात तिला थोडे हि लागले तरी, जोरजोरात रडते, कारण सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किव्वा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. आपण हि पिढी पंगू तर करत नाही ना? याचा विचार करा.
लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजूक मुले भविष्यात नाऊमेद , किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्ष शक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो, याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते, तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तू सुद्धा काढायला घाबरतात, उंच जागी चढताना आईच्या कडून धीर मिळत नाही तर पडशील, घसरशील, तुला जमणार नाही, उतर कुणालातरी बोलावून करूया, असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया, आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किव्वा वॅन मध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते. सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत याचे नवल वाटते. अशाने नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल, याची भीती या आई वडिलांना का वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे, पडे-झडे माल वाढे, हे खरोखरीच सत्य आहे.
-- विजय लिमये
9326040204
माझ्या घरी टीव्ही आला..
आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो !
माझ्याकडे गाडी आली..
आणि मी चालायचं विसरलो !
माझ्याकडे एअरकंडिशनर आला..
आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो !
मी शहरात रहायला आलो..
आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो !
माझ्याकडे क्रेडिट - डेबिट कार्ड आलं..
आणि मी पैशाची किंमत विसरलो !
माझ्याकडे परफ्यूम आला..
आणि मी फुलांचा सुगंध विसरलो !
मी फास्ट फूड - जंक फूडची चव घेतली..
आणि वरण-भात खायचंच विसरलो !
माझ्या हातात मोबाईल आला..
आणि मी पत्र लिहायचं विसरलो !
माझ्याकडे कॉम्प्युटर आला..
आणि मी व्याकरण आणि स्पेलिंग विसरलो !
माझ्याकडे व्हॉटस-अॅप आलं..
आणि मी गप्पा मारण्यातली मजाच विसरलो !
जगण्यातल्या रोजच्या धावपळीत..
मी......... विश्रांती घ्यायलाच विसरलो !
-- निनाद प्रधान
अंग्रजीत अे पासून झेड् पर्यंत 26 अक्षरे असल्यामुळे आणि त्यांना काना मात्रा वेलांटया नसल्यामुळे अक्षरानुक्रम पाळणे फार सोपे आहे. पण देवनागरीतील कोशवाङमयात बर्याच अडचणी येतात.
देवनागरीतील वेगवेगळे कोश किंवा मराठी पुस्तकांच्या शेवटी असलेली सूची बघितली तर चटकन लक्षात येते की मराठीत अक्षरानुक्रम पाळण्यात अेकसूत्रता नाही. ती आणणे आणि अंग्रजीतून आलेले विज्ञानविषयक किंवा अतर शब्द सामावून घेण्यासाठी नवी स्वरावली स्वीकारणे आवश्यक झाले आहे. अुदा. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं असे तेरा स्वर घ्यावे लागतील. ऋ ऋ लृ लृ आणि अ: हे शुद्ध स्वर नाहीत असे माझे मत आहे. वृद्ध कृष्ण ह्यासारख्या शब्दात ऋ अजून शिल्लक आहे. 'पुन:प्रत्यय' 'दु:ख' सारखे शब्द अजून प्रचारात आहेत ही आनंदाची बाब आहे. व्रूद्ध, क्रूष्ण, दुख्ख पुन्हा असे रूप घेअून ते सामावून घेतले जाअू शकतात. अर्थात त्यांचे अुच्चार सर्वथा सारखे नाहीत हे मान्य आहे.
वा. गो. आपटे ह्यांच्या 'मराठी शब्दरत्नाकर' ( 1956 सालची 4थी आवृत्रि ) ह्या शाब्दकोशात अनुस्वारीत अक्षर हे त्यानंतरच्या व्यंजनाच्या क्रमानुसार घेतले आहे. अुदा. 'पंक' हा शब्द 'पईज' नंतर पण 'पकड' ह्या शब्दाआधी घेतला आहे. 'पंखा' हा शब्द 'पखवाज' नंतर पण 'पखाल' ह्या शब्दाआधी घेतला आहे. ह्यावरून असे दिसते की अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत म्हणजे अ च्या आधी अं आला आहे. आणि तोही सलग आलेला नाही तर पुढील व्यंजनानुसार विखुरला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या 'विश्वकोशात' ही अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत पण ती सलग घेतली आहेत म्हणजेच अंगभूषा, अंतरीक्षविज्ञान, अंबालिका हे शब्द अकुंठित, अखिल वगैरे शब्दांच्या आधी घेतले आहेत.
वरील दोन्ही कोशांत अर्धाक्षरांचा क्रम पूर्णाक्षरानंतर घेतला आहे. शब्दरत्नाकरात व्यंजनांची ओळख करून देतांना असे लिहिले आहे :
क - मराठी व्यंजनातील पहिले व्यंजन
ख - मराठी व्यंजनातील दुसरे व्यंजन वगैरे.
वास्तविक खरी व्यंजने 'क' 'ख्' अशी आहेत. आणि त्यांस अ हा स्वर जोडला म्हणजे क ख वगैरे 'अक्षरे' होतात. म्हणजेच अर्थाक्षरे (व्यंजने) ही पूर्णाक्षराआधीच आली पाहिजेत. म्हणूनच मी म्हाडदळकर हे आडनाव मकाशीर ह्या आडनावाआधी घेतले आहे.
अ आ अि अी ह्या क्रमानुसार अं चा क्रम 11वा घेतला तर फक्त अंकलकोटे किंवा अंकलीकर ह्या आडनावांची सोय होते पण आंग्रे, अंगळे, अुंटवाले, अेंगठे, ओंकार, औंधकर ही आडनावे कोणत्या क्रमाने घेणार? म्हणून अनुस्वारीत अक्षरांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे. 'अ' नंतर 'अं' 'आ' नंतर 'अम' 'अ' नंतर 'अं' वगैरे. ह्यात रूढीक्रम बदलण्याचा प्रश्नच अुद्भवत नाही. ह्याचप्रमाणे कंक, कांग्रळकर, किंजवडेकर, कुंचीकर, केंगे, कोंगरे, कौंदाडे वगैरे आडनावांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे.
कोशकर्त्याने अेक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावयास हवी ती ही की कोणता शब्द नेमका कोठे सापडेल हे संदर्भ घेणार्या व्यक्तिला चटकन अुमगले पाहिजे. अंग्रजीत ही अडचण अजिबात येत नाही. देवनागरीतील कोशवाङमयात सुसूत्रता आणल्यास फार मोठी गैरसोय दूर होण्यासारखी आहे. मी वापरलेला -- प्रथम अर्धाक्षरे नंतर पूर्णाक्षरे व नंतर अनुस्वारीत अक्षरे हा क्रम सर्वथा निर्दोष आहे असा माझा दावा नाही पण त्यामुळे अेकादे आडनाव नेमके कोठे सापडेल हे चटकन अुमगते.
रूढी बदलेल अशी भीति बाळगण्याचे कारण नसावे कारण तत्कालीन समाजाच्या सोयीनुसार रूढी बदलतातच.
-- गजानन वामनाचार्य
लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे !
कर्तृत्व गाथा
१. इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
२. विजयालक्ष्मी पंडीत
संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
३. सी. बी. मुथम्मा
पहिली महिला राजदूत
४ . सरोजिनी नायडू
पहिली महिला राज्यपाल. (उत्तरप्रदेश)
५. सुचेता कृपलानी
पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
६. राजकुमारी अमृत कौर
पहिली महिला केंद्रीय मंत्री
७ . सुलोचना मोदी
पहिली भारतीय महिला महापौर
८. सावित्रीबाई फुले
पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका
९. फातिमाबिबी मिरासाहेब
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)
१०. कार्नेलिया सोराबजी
पहिली भारतीय महिला बॅरिस्टर
११ . हंसाबेन मेहता
भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)
१२. मदर टेरेसा
नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
१३. अरूंधती रॉय
बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)
१४. भानू अथय्या
ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
१५. मंजुळा पद्मनाभन
पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)
१६. डॉ. आनंदी गोपाळ जोशी
विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
१७. कमला सोहोनी
केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
१८. किरण बेदी
पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)
१९ . कल्पना चावला
अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
२० . बच्चेंद्री पाल
एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)
२१. संतोष यादव
दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
२२ . करनाम मल्लेश्वरी
ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
२३ . आरती साहा
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू
२४ . कॅप्टन चंद्रा
पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला
२५. संगीता गुजून सक्सेना
युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
२६. उज्ज्वला पाटील-धर
शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
२७. डॉ. अदिती पंत
अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
२८ . सुरेखा यादव-भोसले
आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
२९. देविकाराणी रौरिच
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)
३०. रिटा फारिया
पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
३१ . सुष्मिता सेन
पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)
३२ . डॉ. इंदिरा हिंदुजा
टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
३३ . इंदिरा चावडा
भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
३४. शीतल महाजन
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला
-- मराठीसृष्टी टिम
Copyright © 2025 | Marathisrushti