वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल
संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६.
आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत.
गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो आहे, (archology, language, ऋग्वेद आणि सिंधु-सरस्वती संस्कृती यांचा परस्पर संबंध, वगैरेंवर) . त्यामुळे, हा लेख वाचून मनात आलेले कांहीं विचार, आणि माहीत असलेली कांहीं माहिती, हें सर्व मांडावे, असें मला वाटलें.
• या सिनेमात ‘सिंधु माँ’ हें गीत आहे. याचें कारण उघड आहे की, या संस्कृतीला पूर्वी ‘सिंधु संस्कृती’ म्हणून ओळखत असत. त्यामुळे, तसें, हें गीत योग्यच आहे. पण, १९४७ नंतर झालेल्या उत्खननांमध्ये राजस्थान, हरियाणा, गंगा खोरे, दिल्ली भाग, वगैरे ठिकाणीही या संस्कृतीची अनेक स्थळें मिळाली आहेत. ( जसें की, धोलावीरा, ज्याचा उल्लेख आशुतोष गोवारीकर यांनी केलेला आहे), लोथल, कालीबंगन, राखीगढी इत्यादी . त्यातील बरीच स्थळें ‘लुप्त’ सरस्वतीच्या तीरांवर आहेत. त्यामुळे आतां संशोधक, हिचा ‘सिंधु-सरस्वती संस्कृती‘ असा उल्लेख करतात.
• राखीगढीमधील अवशेषांचा , IIT Kharagpur व Archeological Survey of India यांनी हल्लीच केलेल्या टेस्टसवरून, या संस्कृतीचा काळ इ.स.पूर्व ७००० वर्षें इतका आलेला आहे. ( तो याआधी इ.स.पू. ३५०० हजार ते साधारण २००० इतका मानत असत). राखीगढी तर मोहेन जो दारो च्या तिप्पट मोठें आहे.
• या संस्कृतीत ‘देव’ कोणता होता तें माहीत नाहीं, ( म्हणजेच, आराधना कुणाची करीत असत, तें ) , असें आशुतोष गोवारीकर म्हणतात.
पण, एस. आर. राव यांना कालीबंगन येथें यज्ञवेद्या सापडलेल्या आहेत. (आतां अन्यत्रही मिळू लागल्या आहेत). त्यातून, ही संस्कृती व ऋग्वेदीय संस्कृती यांचें एकत्व दिसून येतें. (असें कांहीं संशोधक म्हणतात, व तें योग्य वाटतें).
या संस्कृतीच्या मुद्रांमध्ये ”पशुपती’ची मुद्रा आहे. ती शिवाची प्रतिमा आहे, असें समजलें जातें. ‘आदिनाथ’ म्हणजे शिव असें हिंदू समजतात. परंतु, माझ्या एक जैन स्नेह्यानें सांगितलें की, त्यांच्या अनुसार, ही ’आदिनाथ’ म्हणजे त्यांचा प्रथम तीर्थंकर याची प्रतिमा आहे. जैन धर्म हा बराच पुरातन आहे, हें खरेंच आहे. कारण त्यांचा २४ वा तीर्थंकर महावीर वर्धमान व गौतम बुद्ध हे समकालीन होते.
माझ्या या जैन स्नेह्याला माहीत नाहीं , परंतु, असें आहे की ऋग्वेदीय ऋचेतील कांहीं उल्लेखांत जैन , किंवा पूर्व-जैन (प्री-जैन, प्रोटो-जैन) परंपरा कदाचित असेलही . उदा. ‘स्वस्ति न इंद्रो वुद्धश्रवा:’ या ऋचेत पुढे ‘अरिष्टनेमीचें नांव आहे ; आणि, अरिष्टनेमि हा --- नंतरच्या काळातील कां होईना , पण ---- एक जैन तीर्थंकर होता. तो श्रीकृष्णाचा चुलत भाऊ होता, व जैनइमध्ये त्याला ‘नेमिनाथ’ म्हणतात.
मात्र, पशुपतीची प्रतिमा ही जैनांच्या प्रथम तीर्थंकराची आहे, हें संशोधकांना कितपत मान्य आहे, तें सांगणें कठीण आहे.
पण, मुद्दा विचारणीय आहे, हें खरें. आणि मी अजून तरी कुठल्याही संशोधकाच्या पुस्तकात वा लेखनात हा मुद्दा पाहिलेला नाहीं .
हा पशुपती Yogic Posture मध्ये बसलेला आहे. आतां, या संस्कृतीच्या इतर ठिकाणी योगिक आसनांतील व्यक्ती मुद्रांवर दिसतात. म्हणजेच, योगाचा प्रसार त्या काळीं झालेला असावा.
या संस्कृतीच्या स्थळांवर मिळालेल्या phallus च्या शिल्पांवरून ही पूजासुद्धा त्या काळीं तिथें होती, असें दिसतें. त्यासाठी शिवलिंग सापडायची ज़रूर नाहीं .
समाजशास्त्रीय अभ्यासावरून , त्या काळीं ‘मातृदेवतेची’ पूजा करत असत. मातृदेवता हें प्रॉडक्टिव्हिटीचें प्रतीक आहे.
डी.डी. कोसांबी यांनी दाखवलें आहे की, तत्कालीन समाज विविध Totems वापरत असे, व त्या प्रतिमा त्यांच्या टोटेम्स् वर असत. (जसें रामायणाच्या काळात, सुग्रीव-हुमान यांच्या टोळीचें टॉटेम होतें ‘वानर’ ). यावरूनही, आराध्यांची कांहीं कल्पना येऊं शकते.
सिंधु--सरस्वती संस्कृती व ऋग्वेदाचें एकत्व मान्य केलें तर, ऋग्वेवीय देवतांची (डेइटी) आराधनाही सिंधु-सरस्वती संस्कृतीत होत असली पाहिजें, जसें इंद्र, वरुण, मित्र / सविता/ आदित्य, अश्विनीकुमार इ.
• त्या काळीं चालत असलेल्या देवाणघेवाण व व्यापार, यांचा कितपत वापर आशुतोष गोवारीकर करत आहेत, त्याचा उल्लेख हा लेख करत नाहीं.
मात्र, सिंधु-सरस्वती भाग आणि गंगा खोरें यांच्यात ‘लागवटीयोग्य पिकांच्या माहितीची’ देवाण घेवाण झालेली आहे. कांहीं पिकें सिंधु-सरस्वती मधून गंगा खोर्यात आलेली आहेत, तर कांहीं उलट दिशेनें गेलेली आहेत. ( त्याचा उल्लेख, लवकरच प्रसिद्ध होणार्या माझ्या एका हिंदी लेखात मी केलेला आहे).
लोथलसारख्या स्थलांवरून, हें उघड आहे की, या संस्कृतीचा व्यापार मध्य-पूर्वेतील देशांशी चालत होता. तिकडे या संस्कतीच्या मुद्रा सापडलेल्या आहेत. ते लोक या संस्कृतीच्या भागाला ‘मेलुहा’ (Meluhha) म्हणत असत, हें आतां सर्वश्रुत आहे.
भारतीय साहित्यात पणींचा उल्लेख येतो. ते म्हणजे, आफ्रिकेच्या उत्तर किनार्यावर वसत आलेले ‘फिनीशियन्स’.
भारतीय साहित्यात असुरांचा उल्लेख येतो. ते म्हणजे, ‘अहुर(असुर) मज़्द’ चे पूजक इराणी लोक, व असुरीयन्स (असीरियन्स).
या सर्वांवरूनही या संकृतीचा इंटरनॅशनल संबध दिसून येतो. तसेंच , या संस्कृतीचें नौकानयनातील प्राविण्यही दिसून येतें.
• एक महत्वपूर्ण गोष्ट. गेल्या पंधरावीस वर्षांमध्ये श्रीकांत तलगेरी यांनी सप्रमाण, ऋग्वेदीय ऋचांच्या सहाय्यानें , असें दाखवून दिलेलें आहे की, या संस्कृतीवा उगम गंगा-खोर्यात झाला, व तेथून ती सिंधु-सरस्वती भाग व अफगाणिस्तान-इराणकडे पसरली.
अर्थात, ’आर्यन परकोलेशन’ची थिअरी मानणार्या हार्वर्ड मधील विट्.झेल व इतर संशोधकांना हें मान्य नाहीं, व त्यावर बराच वादविवाद चालूं आहे.
टीप : ‘आर्यन इन्व्हेजन थियरी’ आतां कालबाह्य झाली आहे, व ‘आर्य हे भारतात बाहेरून, पश्चिमेकडून, आले’ असें मानणारे संशोधक आतां ‘आर्यन परकोलेशन थियरी’ मानतात, म्हणजेच, बाहेरून भारतात आगमन झालेल्या आर्यांचें भारतात हळूंहळूं सम्मीलन झालें. खरें तर, ‘आर्य’ हें कुठल्याही जनसमूहाचें नांव नाहींच. पण तो एका वेगळ्या लेखाचा विषय आहे.
मात्र, ही तलगेरी यांची थियरी महत्वाची आहे. या संस्कृतीला ‘सिंधु-सरस्वती-गंगा संस्कृती’ असें आतां नांव द्यायला हवें.
-- सुभाष स. नाईक.
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
कुटुंब म्हटले की अन्न, वस्त्र, निवारा या अगदी प्राथमिक गरजा आल्याच. त्यातील निवार्याची गरज म्हणजे घराची गरज.
घराची म्हणजे चार भिंती, दारं, खिडक्या आणि डोक्यावर छप्पर. खरं तर घराचे किती विविध प्रकार आहेत पण अजूनही घर म्हटलं की बालपणी चित्रकलेच्या वहीत काढलेले समोर चौकोनी भिंत, भिंतीला मधे दार, बाजूला दोन खिडक्या, वर दोन्ही बाजूने उतरते छपर असंच घर डोळ्यापुढे उभं राहातं. हा जणू 'घर' या शब्दाचा सिम्बॉलच.
प्रत्येकाला घर हे सुंदरच हवं असतं. आपली परिस्थिती, आपला आवाका यांच्या बेरीज-गुणाकारात बसणार्या स्वत:च्या एका छानशा घराचे स्वप्न प्रत्येकजण जपत असतो. हे स्वप्न तर पूर्ण झाले.. घर तर झाले पण पुढे काय ?
'आपलं घर' , 'माझं घर' शब्द जरी उच्चारले तरी मनाला केवढा विसावा वाटतो. घर म्हणजे आपलं सर्वस्व. आपण कुठेही बाहेर गेलो, परदेशात गेलो, मोठमोठ्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये राहून आलो तरी दोन चार दिवस आनंदात जातात पण नंतर कधी एकदा घरी पोहोचतो ही ओढ निर्माण होते.
पंचतारांकित हॉटेल्सच्या खोल्यांप्रमाणे घरातील खोली इतकी सुसज्ज आणि सजवलेली नसते पण चार दिवस फिरून आल्यावर गादीवर पाठ टेकवताना जो आराम मिळतो तो प्रचंड सुखावह असतो. कारण त्यामागे स्वत:च्या घराची, त्यातील स्थैर्याची भावना आधार देणारी असते. तुमचं साधं जुन्या बांधकामाचं घर असो, वनरुम किचन फ्लॅट असो किंवा मोठा बंगला असो. प्रत्येकाला शेवटी आपलं घरच सुख देतं.
तुमचं घर तुम्हाला दिवस रात्र इतकं सुख देतं मग त्या घराची तुम्ही किती काळजी घेता? आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनक्रमात स्वत:कडे पहायला वेळ नसतो. तरीसुद्धा घर झाडून पुसून स्वच्छ ठेवलेलंच असतं. पण इतकं पुरेसं असतं का? त्यावर तुम्ही म्हणाल "अहो दिवसभर कितीही आवरलं ना, तरी घरातला पसारा संपतच नाही." अगदी योग्य आहे तुमचं हे म्हणणं. पण दिवसभर घर आवरायचंच कशाला? रोजचा अर्धा-एक तास खूप झाला. फक्त त्यासाठी नियोजनाची गरज आहे.
प्रत्येकाला आपलं घर खूप सुंदर हवं असतं. आपण बराच खर्च करून घराला आकर्षक इंटिरिअर करून घेतो. अगदी पैसे खर्च करुन इंटिरिअर केले नाही तरीही आपल्या आवडीनुसार घर सजवता येतेच. घर छान सजवलंय पण ते नीटनेटकं ठेवलेलं नाही.... अस्ताव्यस्त पसारा घरभर पसरलेला आहे.. अशा घरात राहताना निश्चितच प्रसन्न वाटणार नाही.
आपल्या घरात आपणच पसारा करतो आणि मग तो पसारा दिवसभर घरातील एकटी स्त्री आवरत असते. स्त्रिया आजकाल कामानिमित्त बाहेर पडतात. मग घर आवरायला वेळ कुठे मिळणार ? घर वेळेवर आवरलं नसलं तर त्या पसार्यात आयत्यावेळेला महत्वाच्या वस्तू सापडत नाहीत. मग गोंधळ, चिडचिड आणि वेळेचा अपव्यय.... पुन्हा अव्यवस्थितपणाचा शिक्का तो वेगळाच.
हे सगळं टाळण्यासाठी घर आवरायला मिळतो सुट्टीचा एकच दिवस.. तो म्हणजे रविवार ! म्हणजे विश्रांती नाहीच ! उलट बाहेरच्या कामापेक्षा त्यादिवशी घरातलीच कामं करुन जीव थकून जातो. "पण काय करणार? बरं कंटाळा आला म्हणून कामं टाळून चालत नाही. कामं तर सगळी होणं गरजेचं आहे.
मग त्याचं जर आपण छानसं नियोजन केलं तर ? रविवार खरा सुट्टीचा वार होईल. घर नेहमीसाठी प्रसन्न राहील.
-- सौ. निलिमा प्रधान
लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या !
पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे.
पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी झालेला ‘सायकस-पिको करार’ ही घटना १९१६ ची आहे. कुबेर यांनी या समयींच्या ब्रिटिश साम्राज्यात अमेरिकेचा उल्लेख केलेला आहे.
अमेरिका एके काळीं ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग होती, हें खरें आहे. पण ती स्थिती १७७५ च्या आधीची होती. त्यानंतर अमेरिकेचें स्वातंत्र्य-युद्ध सुरूं झालें व १७८३ पर्यंत चाललें. म्हणजेच, सायमन-पिको कराराच्या सव्वाशे वर्षें आधीची ही घटना आहे. त्यामुळे तिचा या कराराशी प्रत्यक्षाप्रत्यक्ष कांहींही संबंध नाहीं.
हा करार झाला तेव्हां केमाल पाशा हा ऑटोमन साम्राज्याचा सम्राट होता, असा उल्लेख कुबेरांनी केला आहे. केमाल पाशा (अतातुर्क) हा पहिल्या महायुद्धात ( १९१४ ते १९१८ ) लढत होता ; तो त्यावेळी सैन्यात होता. लेखात उल्लेख आहे तसा तो ऑटिमन साम्राज्याचा सम्राट नव्हता, कधीच नव्हता. तऑटोमन साम्राज्य हें, पहिलें महायुद्ध संपल्यावर लयाला गेलें. १९१९ ते १९२१-२२ हा, केमाल पाशानें टर्कीमध्ये केलेल्या क्रांतियुद्धाचा काळ आहे. त्यानें टर्कीत ‘रिपब्लिक’ सुरूं केलें.
मात्र, या किरकोळ गफलतीमुळे मुख्य माहितीला कांहीं बाधा पोचत नाहीं.
-- सुभाष नाईक
आज कालच्या आया मुलांच्याबद्दल अतीदक्ष असतात, त्या मुळे मुले छोटे छोटे निर्णय घेण्यास असमर्थ ठरत आहेत. उदाहरण द्यायचे तर सातवी आठवीतील मुलांना सुद्धा आया आज हात धरून रास्ता ओलांडून देतात, त्यात मुलगी असेल तर विचारूच नका. हायवे, किव्वा अती वर्दळीचा रस्ता मी समजू शकतो, पण लहान रस्त्यावर सुद्धा हीच स्थिती दिसते. हि स्थिती साधारण मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय, व श्रीमंत घरात प्रामुख्याने दिसत आहे.
मी माझ्या मुलीच्या मैत्रिणीला तिचे नाव स्वराली ठेऊ, तिच्या घरी सोडण्यासाठी गेलो, गाडी घराच्या विरुद्ध बाजूला उभी केली असता, गाडीतून उतरून रस्ता ओलांडणे तिला जमत न्हवते. रस्ता ओलांडण्यासाठी तिला जवळपास 5-7 मिनिटे लागली. निरीक्षण करताना असे दिसले कि येणाऱ्या दोन चाकी व चार चाकी गाडीचा तिला अंदाज येत न्हवता. दूरवर गाडी असतानाही केवळ येणारी गाडी किती सेकंदात इथे पोहोचेल हा अंदाज न ठरवता आल्यामुळे ती बावचळून आहे त्याच जागी उभी राहिली.
एकुलती एक असल्यामुळे तिची आई तिला खूप जपते, इतके कि, सायकल सुद्धा बिल्डिंगच्या आवारात फिरवायची, तसेच स्वरालीला साधे खरचटलेले सुद्धा आईला चालत नाही, लगेच डॉक्टरकडे घेऊन जाते, या मुळे स्वराली सायकलवरून पडली, किव्वा घरात तिला थोडे हि लागले तरी, जोरजोरात रडते, कारण सहनशीलतेचा अभाव उत्पन्न झाला आहे. पायात काटा गेला, बोटात सुई, किव्वा टाचणी टोचली, हातापायाला खरचटले आणि जरासे रक्त दिसले तरी घरचे वातावरण गंभीर होते. आपण हि पिढी पंगू तर करत नाही ना? याचा विचार करा.
लहानपणी मुले खेळताना पडली पाहिजेत, त्यातून त्यांना सहनशीलता येते, वेदनेचा दाह शमवण्याची सवय होते तसेच संघर्ष करण्याची प्रेरणा मिळते. नाजूक मुले भविष्यात नाऊमेद , किव्वा अपयशी होण्याची शक्यता अधिक. संघर्ष शक्ती कमी राहिल्यास भित्रेपणा वाढतो, याचे पर्यावसन म्हणजे पराधीन, परावलंबी जीवन जगण्याची वेळ येते, तसेच धाडसी निर्णय घेताना मन कचरते.
आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तू सुद्धा काढायला घाबरतात, उंच जागी चढताना आईच्या कडून धीर मिळत नाही तर पडशील, घसरशील, तुला जमणार नाही, उतर कुणालातरी बोलावून करूया, असे शब्द ऐकायला मिळतात. या मुलांच्या आया, आणि बाप मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किव्वा वॅन मध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची कीव येते. सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत याचे नवल वाटते. अशाने नवीन पिढी कमजोर, कर्तृत्वहीन होईल, याची भीती या आई वडिलांना का वाटत नाही याचे आश्चर्य वाटते. पालकांनो तुमचे विचार बदला, आपल्या वडीलधाऱ्यांनी नेहेमी सांगितले आहे, पडे-झडे माल वाढे, हे खरोखरीच सत्य आहे.
-- विजय लिमये
9326040204
माझ्या घरी टीव्ही आला..
आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो !
माझ्याकडे गाडी आली..
आणि मी चालायचं विसरलो !
माझ्याकडे एअरकंडिशनर आला..
आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो !
मी शहरात रहायला आलो..
आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो !
माझ्याकडे क्रेडिट - डेबिट कार्ड आलं..
आणि मी पैशाची किंमत विसरलो !
माझ्याकडे परफ्यूम आला..
आणि मी फुलांचा सुगंध विसरलो !
मी फास्ट फूड - जंक फूडची चव घेतली..
आणि वरण-भात खायचंच विसरलो !
माझ्या हातात मोबाईल आला..
आणि मी पत्र लिहायचं विसरलो !
माझ्याकडे कॉम्प्युटर आला..
आणि मी व्याकरण आणि स्पेलिंग विसरलो !
माझ्याकडे व्हॉटस-अॅप आलं..
आणि मी गप्पा मारण्यातली मजाच विसरलो !
जगण्यातल्या रोजच्या धावपळीत..
मी......... विश्रांती घ्यायलाच विसरलो !
-- निनाद प्रधान
अंग्रजीत अे पासून झेड् पर्यंत 26 अक्षरे असल्यामुळे आणि त्यांना काना मात्रा वेलांटया नसल्यामुळे अक्षरानुक्रम पाळणे फार सोपे आहे. पण देवनागरीतील कोशवाङमयात बर्याच अडचणी येतात.
देवनागरीतील वेगवेगळे कोश किंवा मराठी पुस्तकांच्या शेवटी असलेली सूची बघितली तर चटकन लक्षात येते की मराठीत अक्षरानुक्रम पाळण्यात अेकसूत्रता नाही. ती आणणे आणि अंग्रजीतून आलेले विज्ञानविषयक किंवा अतर शब्द सामावून घेण्यासाठी नवी स्वरावली स्वीकारणे आवश्यक झाले आहे. अुदा. अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ अं असे तेरा स्वर घ्यावे लागतील. ऋ ऋ लृ लृ आणि अ: हे शुद्ध स्वर नाहीत असे माझे मत आहे. वृद्ध कृष्ण ह्यासारख्या शब्दात ऋ अजून शिल्लक आहे. 'पुन:प्रत्यय' 'दु:ख' सारखे शब्द अजून प्रचारात आहेत ही आनंदाची बाब आहे. व्रूद्ध, क्रूष्ण, दुख्ख पुन्हा असे रूप घेअून ते सामावून घेतले जाअू शकतात. अर्थात त्यांचे अुच्चार सर्वथा सारखे नाहीत हे मान्य आहे.
वा. गो. आपटे ह्यांच्या 'मराठी शब्दरत्नाकर' ( 1956 सालची 4थी आवृत्रि ) ह्या शाब्दकोशात अनुस्वारीत अक्षर हे त्यानंतरच्या व्यंजनाच्या क्रमानुसार घेतले आहे. अुदा. 'पंक' हा शब्द 'पईज' नंतर पण 'पकड' ह्या शब्दाआधी घेतला आहे. 'पंखा' हा शब्द 'पखवाज' नंतर पण 'पखाल' ह्या शब्दाआधी घेतला आहे. ह्यावरून असे दिसते की अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत म्हणजे अ च्या आधी अं आला आहे. आणि तोही सलग आलेला नाही तर पुढील व्यंजनानुसार विखुरला आहे.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडळाच्या 'विश्वकोशात' ही अनुस्वारीत अक्षरे अननुस्वारीत अक्षरांच्या आधी घेतली आहेत पण ती सलग घेतली आहेत म्हणजेच अंगभूषा, अंतरीक्षविज्ञान, अंबालिका हे शब्द अकुंठित, अखिल वगैरे शब्दांच्या आधी घेतले आहेत.
वरील दोन्ही कोशांत अर्धाक्षरांचा क्रम पूर्णाक्षरानंतर घेतला आहे. शब्दरत्नाकरात व्यंजनांची ओळख करून देतांना असे लिहिले आहे :
क - मराठी व्यंजनातील पहिले व्यंजन
ख - मराठी व्यंजनातील दुसरे व्यंजन वगैरे.
वास्तविक खरी व्यंजने 'क' 'ख्' अशी आहेत. आणि त्यांस अ हा स्वर जोडला म्हणजे क ख वगैरे 'अक्षरे' होतात. म्हणजेच अर्थाक्षरे (व्यंजने) ही पूर्णाक्षराआधीच आली पाहिजेत. म्हणूनच मी म्हाडदळकर हे आडनाव मकाशीर ह्या आडनावाआधी घेतले आहे.
अ आ अि अी ह्या क्रमानुसार अं चा क्रम 11वा घेतला तर फक्त अंकलकोटे किंवा अंकलीकर ह्या आडनावांची सोय होते पण आंग्रे, अंगळे, अुंटवाले, अेंगठे, ओंकार, औंधकर ही आडनावे कोणत्या क्रमाने घेणार? म्हणून अनुस्वारीत अक्षरांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे. 'अ' नंतर 'अं' 'आ' नंतर 'अम' 'अ' नंतर 'अं' वगैरे. ह्यात रूढीक्रम बदलण्याचा प्रश्नच अुद्भवत नाही. ह्याचप्रमाणे कंक, कांग्रळकर, किंजवडेकर, कुंचीकर, केंगे, कोंगरे, कौंदाडे वगैरे आडनावांचा क्रम अननुस्वारीत अक्षरानंतर घेतला आहे.
कोशकर्त्याने अेक महत्त्वाची बाब लक्षात घ्यावयास हवी ती ही की कोणता शब्द नेमका कोठे सापडेल हे संदर्भ घेणार्या व्यक्तिला चटकन अुमगले पाहिजे. अंग्रजीत ही अडचण अजिबात येत नाही. देवनागरीतील कोशवाङमयात सुसूत्रता आणल्यास फार मोठी गैरसोय दूर होण्यासारखी आहे. मी वापरलेला -- प्रथम अर्धाक्षरे नंतर पूर्णाक्षरे व नंतर अनुस्वारीत अक्षरे हा क्रम सर्वथा निर्दोष आहे असा माझा दावा नाही पण त्यामुळे अेकादे आडनाव नेमके कोठे सापडेल हे चटकन अुमगते.
रूढी बदलेल अशी भीति बाळगण्याचे कारण नसावे कारण तत्कालीन समाजाच्या सोयीनुसार रूढी बदलतातच.
-- गजानन वामनाचार्य
लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे !
कर्तृत्व गाथा
१. इंदिरा गांधी
भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान (1968-77), (1980-84) तसेच भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला
२. विजयालक्ष्मी पंडीत
संयुक्त राष्ट्रसंघ (युनो) आमसभेची पहिली भारतीय आणि जगातील पहिली महिला अध्यक्ष (1954)
३. सी. बी. मुथम्मा
पहिली महिला राजदूत
४ . सरोजिनी नायडू
पहिली महिला राज्यपाल. (उत्तरप्रदेश)
५. सुचेता कृपलानी
पहिली महिला मुख्यमंत्री (उत्तरप्रदेश)
६. राजकुमारी अमृत कौर
पहिली महिला केंद्रीय मंत्री
७ . सुलोचना मोदी
पहिली भारतीय महिला महापौर
८. सावित्रीबाई फुले
पहिली महिला शिक्षक - मुख्याध्यापिका
९. फातिमाबिबी मिरासाहेब
भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील पहिली महिला न्यायाधिश (1989)
१०. कार्नेलिया सोराबजी
पहिली भारतीय महिला बॅरिस्टर
११ . हंसाबेन मेहता
भारतातील पहिली महिला उपकुलगुरू (महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदे 1949)
१२. मदर टेरेसा
नोबेल पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1979)
१३. अरूंधती रॉय
बुकर पारितोषिक विजेती पहिली भारतीय महिला (1997)
१४. भानू अथय्या
ऑस्कर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला
१५. मंजुळा पद्मनाभन
पहिली भारतीय महिला व्यंगचित्रकार, संडे ऑब्जर्व्हर (1982)
१६. डॉ. आनंदी गोपाळ जोशी
विदेशात जाऊन वैद्यकीय पदवी संपादन करणारी पहिली भारतीय महिला डॉक्टर
१७. कमला सोहोनी
केंब्रिज विद्यापीठाची पी.एच.डी. मिळविणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
१८. किरण बेदी
पहिली भारतीय पोलीस सेवा महिला अधिकारी (1972)
१९ . कल्पना चावला
अंतराळ प्रवास करणारी पहिली भारतीय महिला (1997)
२० . बच्चेंद्री पाल
एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक (1984)
२१. संतोष यादव
दोन वेळा एव्हरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला गिर्यारोहक
२२ . करनाम मल्लेश्वरी
ऑलिम्पिक पदक (ब्रांझ) विजेती पहिली भारतीय महिला मल्ल
२३ . आरती साहा
इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली भारतीय महिला जलतरणपटू
२४ . कॅप्टन चंद्रा
पॅराशूटमधून उडी घेणारी पहिली भारतीय महिला
२५. संगीता गुजून सक्सेना
युद्धात प्रत्यक्ष भाग धेणारी पहिली भारतीय महिला फ्लाईंग ऑफिसर
२६. उज्ज्वला पाटील-धर
शिडाच्या नौकेतून पृथ्वीप्रदक्षिणा करणारी पहिली भारतीय महिला
२७. डॉ. अदिती पंत
अंटार्क्टिका खंडावर पाऊल ठेवणारी पहिली भारतीय महिला शास्त्रज्ञ
२८ . सुरेखा यादव-भोसले
आशियातील पहिली भारतीय महिला रेल्वे इंजिन ड्रायव्हर
२९. देविकाराणी रौरिच
दादासाहेब फाळके पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला (1969)
३०. रिटा फारिया
पहिली भारतीय मिस वर्ल्ड (1966)
३१ . सुष्मिता सेन
पहिली भारतीय मिस युनिव्हर्स (1994)
३२ . डॉ. इंदिरा हिंदुजा
टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया करणारी पहिली भारतीय डॉक्टर
३३ . इंदिरा चावडा
भारतात जन्माला आलेली पहिली टेस्ट ट्यूब बेबी
३४. शीतल महाजन
पॅराशूटच्या मदतीने दोन्ही धृवांवर उडी मारणारी पहिली भारतीय महिला
-- मराठीसृष्टी टिम
भारतरत्न हा देशाचा सर्वात मोठा नागरी सन्मान असून जीवनच्या कुठल्याही क्षेत्रातील उत्तुंग कामगिरीसाठी तो दिला जातो. १९५४ मध्ये हा सन्मान सुरू झाला.
वंश, व्यवसाय, लिंगभाव यावर आधारित भेदभावाशिवाय तो पात्र व्यक्तीस दिला जातो. पंतप्रधान भाररत्नसाठी व्यक्तींच्या नावाची शिफारस करतात. इतर औपचारिक शिफारशींची गरज नसते. एका वर्षांत तीन जणांना भारतरत्न देता येते.
भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीला सनद (प्रमाणपत्र) व पदक दिले जाते. राज्यघटनेच्या कलम १८ (१) अनुसार पुरस्कार हा नावापुढे किंवा मागे लावता येत नाही. बायोडाटामध्ये मात्र भारतरत्न उल्लेख केला जाऊ शकतो. लेटरहेड किंवा व्हिजिटिंग कार्डमध्ये त्याचा उल्लेख करता येतो.
भारतरत्न सन्मान राष्ट्रपती प्रदान करतात.
भारतरत्ने:
सर्वपल्ली राधाकृष्णन (१९५४). सी. राजगोपालाचारी (१९५४), सी.व्ही.रमण (१९५४), भगवान दास (१९५५), मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या (१९५५), जवाहरलाल नेहरू (१९५५). गोविंदवल्लभ पंत (१९५७), धोंडो केशव कर्वे (१९५८), बिधानचंद्र रॉय (१९६१), पुरुषोत्तम दास टंडन ( १९६१), डॉ. राजेंद्र प्रसाद (१९६२), डॉ. झाकीर हुसेन (१९६३), पांडुरंग वामन काणे (१९६३), लालबहादूर शास्त्री (१९६६), इंदिरा गांधी ( १९७१), व्ही.व्ही. गिरी (१९७५), के.कामराज (१९७६), मदर तेरेसा (१९८०), आचार्य विनोबा भावे (१९८३), खान अब्दुल गफार खान (१९८७), एम.जी.रामचंद्रन (१९८८), डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९९०), नेल्सन मंडेला (१९९०), राजीव गांधी (१९९१), सरदार वल्लभभाई पटेल ( १९९१), मोराररजी देसाई (१९९१), अबुल कलाम आझाद (१९९२), जे.आर. डी.टाटा (१९९२), सत्यजित रे (१९९२), एपीजे अब्दुल कलाम (१९९७), गुलझारीलाल नंदा (१९९७), अरुणा असफ अली (१९९७), एम.एस. सुब्बुलक्ष्मी (१९९८), चिदंबरम सुब्रह्मण्यम (१९९८), जयप्रकाश नारायण (१९९८), अमर्त्य सेन (१९९९), , गोपीनाथ बोरडोलोई (१९९९), लता मंगेशकर (२००१), बिस्मिल्ला खान (२००१), भीमसेन जोशी (२००८), सी.एन.आर.राव (२०१३), सचिन तेंडुलकर (२०१३), अटलबिहारी वाजपेयी (२०१४), मदनमोहन मालवीय (२०१४)
श्रीमंत बापाच्या पोटची वाया गेलेली 'कारटी' आपण नेहेमीच बघतो, पण......
६००० कोटींची उलाढाल आणि अब्जाधीश असणाऱ्या सावजी ढोलाकीया यांनी शिक्षण सुरु असतानाच आणि भविष्यात स्वतःचा उद्योग सांभाळायाची जबाबदारी येऊन पडणार आहे अश्या आपल्या मुलाला पाठवले कोचीनला, खडतर जगाचा अनुभव घ्यायला आणि काबाडकष्ट करून स्वतःच्या हिकमतीवर पैसे कमवून जगायला....
जगभरातल्या ७१ देशांमध्ये कारोबार असणाऱ्या सुरत येथील हरेकृष्णा डायमंड एक्सपोर्टसचे मालक असलेल्या सावजी यांनी दोनच वर्षांपूर्वी सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले होते आणि कारण होते त्यांच्याकडे काम करणाऱ्या तब्बल १२०० लोकांना त्यांनी दिवाळी निमित्त भेट दिलेली घरे आणि कार्स. आज दोन वर्षानंतर चर्चेत आला श्री सावजी यांचा अमेरिकेत बिझनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेत असलेला आणि भारतात एक महिन्याच्या सुट्टीवर आलेला २१ वर्षीय तरणाबांड मुलगा चि. द्रव्य.
श्री. सावजी यांच्या बिझनेस साम्राज्याची जबाबदारी आता ज्या द्रव्य या त्यांच्या मुलाच्या खांद्यावर थोड्याच दिवसांत पडणार आहे त्या मुलाला सावजी यांनी त्याची ही सुट्टी त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेप्रमाणे केरळ येथील कोचीन येथे त्याच्या स्वतःच्या पायावर आणि जबाबदारीवर घालवण्यास सांगितले.
शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वतःला पूर्णत: अपरिचित अश्या भारताच्या एखाद्या भागात एक महिना जावून राहणे आणि कुणालाही स्वतःची ओळख न सांगता , अत्यंत साधेपणाने कुठल्याही आलिशान जीवनाचा अंगीकार न करता स्वतःचा उदरनिर्वाह चालवणे अशी श्री सावजी यांच्या कुटुंबाची परंपरा आहे.
"एकदा बारा वर्षांपूर्वी लंडन इथल्या एका आलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये आम्ही सर्व कुटुंबीयांनी गुजराथी पारंपारिक जेवण घेतले. बिल आले होते प्रत्येकी घसघशीत १०० पौंडस. इतके जास्त बिल कसे काय आले असे हॉटेल मालकाला सहजच विचारल्यावर हॉटेल मालक म्हणाला कि तुम्ही जेवणाची किंमत न पाहताच जेवण ऑर्डर केले आहे. इथे आमच्या कुटुंबाचे डोळे उघडले. इथेच आमच्या कुटुंबाने ठरवले कि आमच्या कुटुंबातला प्रत्येक पुरुष यापुढे पैशाची किंमत जाणवण्यासाठी एक महिना खडतर आयुष्य जगेल." द्रव्य म्हणाला.
याच प्रथेस अनुसरून आणि हे आव्हान स्वीकारून २१ जून २०१६ रोजी चि. द्रव्य केरळ येथील कोचीन मध्ये वडलांनी दिलेल्या कपड्यांचे तीन सेट्स आणि ७००० रुपये यांसोबत एक महिना रहायला गेला.
"मी माझ्या मुलाला ३ अटी घातल्या," श्री सावजी टाईम्स ऑफ इंडियाला सांगत होते,"एक , तुला तुझे जगण्यासाठीचे पैसे वेगवेगळी कामे करून स्वतःला कमवायला लागतील. दोन, एका कामाच्या ठिकाणी एक आठवड्यापेक्षा जास्त वेळ काम करावयाचे नाही. आणि तीन म्हणजे , तू कुठेही माझे नाव वापरायचे नाहीस, सोबत अगदीच संकटसमयी वापरण्यासाठी दिलेले ७००० रुपये वापरणार नाहीस आणि तुझा मोबाईल फोनही वापरणार नाहीस.
माझ्या मुलाने आयुष्याचे खरे रूप पाहावे, अनुभवावे , गरीब लोकांना आयुष्यात किती खस्ता खाव्या लागतात आणि पैसे कमावण्यासाठी किती खडतर आयुष्य जगावे लागते याची त्याला पुरेपूर कल्पना यावी अशी माझी इच्छा होती. कारण जगातले कुठलेच विद्यापीठ तुम्हाला हे अनुभवांचे जिवंत शिक्षण देऊ शकतच नाही." या एका महिन्याच्या कोचीन येथील वास्तव्यामध्ये द्रव्य याला अनेकानेक आव्हानांचा सामना करावा लागला.
गुजरात मधल्या एका गरीब घरातला बारावीतला मुलगा अशी स्वतःची ओळख देऊन द्रव्य कोचीन येथे राहिला. एका संपूर्णतः अनभीज्ञ अश्या शहरात कुणाच्याही संपर्कावीना असलेला द्रव्य आणि त्यात तेथील मल्याळी भाषाही अजिबातच माहित नसण्याचेही एक मोठे आव्हान त्याच्या समोर उभे होते. "माझे कामही मलाच शोधायचे होते. पहीले पाच दिवस माझ्याकडे काम तर सोडाच राहायला निट अशी जागाही नव्हती आणि त्यामुळे मी भयंकर विमनस्क झालो होतो. काम मिळवण्यासाठी मी जोडे झिझवलेल्या तब्बल ६० ठिकाणाहून मला काम न देताच हाकलून देण्यात आले.
नकार म्हणजे काय चीज आहे आणि या आत्ताच्या दिवसात काम मिळणे आणि त्याहीपेक्षा मिळालेले काम टिकवणे ही किती अवघड गोष्ट आहे हे मला तिथे जवळून अनुभवाला आले. मी माझ्या आयुष्यात आत्तापावेतो कधीच पैशांची चिंता केली नव्हती. वस्तूची किंमत न पाहताच वस्तू खरेदी करणारा मी एका बाजूला आणि कोचीन येथील या वास्तव्यात माझ्या रोजच्या जेवणासाठी ४० रुपये सुद्धा प्रचंड कष्टपूर्वक कमावणारा मी एका बाजूला ही वस्तुस्थिती मी शब्दशः कोचीनला जगलो." अब्जाधीश चि. द्रव्य ढोलाकीया सांगत होता.
चेरनाल्लूर इथे द्रव्यला एका बेकरीमध्ये त्याची पहिली नोकरी मिळाली. पुढच्या आठवड्यात एका कॉल सेंटर मध्ये, त्याच्या पुढच्या आठवड्यात एका चपलांच्या दुकानात आणि सर्वात शेवटी एका मॅकडोनाल्ड आउटलेट मध्ये द्रव्य याने नोकरी केली. या एका महिन्यात चि. द्रव्य कोचीन येथे एका साध्याश्या हॉस्टेलमध्ये यशस्वीपणे राहिला आणि कष्टाची कामे करून त्याने तिथे चार हजार रुपये सुद्धा कमावले.
येत्या ५ ऑगस्टला चि. द्रव्य त्याच्या पुढील शिक्षणासाठी पुन्हा एकदा अमेरिकेतल्या पेस विद्यापीठात दाखल होणार आहे.
(बातमी सौजन्य - टाईम्स ऑफ इंडिया आणि )
Copyright © 2025 | Marathisrushti