वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सध्या पाऊस जोरदार पडत आहे. दररोज वेगवेगळी धरणे भरल्याच्या आणि वाहून जात असल्याच्या बातम्याही येत आहेत. या बातम्यात अनेकदा काही वेगवेगळे शब्दप्रयोग केलेले दिसतात. ते असतात पाण्याच्या साठ्याच्या मोजमापाचे....
याबद्दलची थोडी माहिती घेउ या ?
1) TMC म्हणजे काय ?
2) Cusec म्हणजे काय ?
3) Cumec म्हणजे काय ?
इतके tmc पाणी जमा झाले, तितके Cusec पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. याचा नेमका अर्थ काय?
आपणास फक्त "लिटर" संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवू यात.
१) 01 tmc म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (०१ अब्ज) इतके घन फूट.
01 tmc = 28,316,846,592 litres
२) 01 Cusec = 01 cubic feet per second = 28.317 litres per second.
३) 01 Cumec =01 cubic meters per second = 1000 litres per second.
उदा.
पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता १.९७ tmc आहे.
म्हणजे त्यात १.९७x२८.३१७ अब्ज लिटर्स पाणी मावते.
याच धरणातून सध्या ५०० क्युसेक पाणी नदीत सोडत आहेत.
म्हणजे ५००x२८.३१७ लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.
महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी ५ धरणे
१) उजनी ११७.२७ tmc
२) कोयना १०५.२७ tmc
३) जायकवाडी ७६.६५ tmc ( पैठण )*
४) पेंच तोतलाडोह ३५.९० tmc
५) पूर्णा येलदरी २८.५६ tmc
वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते हा कृतयुगाचा व काहींच्या मते त्रेतायुगाचा प्रारंभ-दिन आहे. ) यासाठी ही पर्वणी मध्यान-व्यापिनी धरतात. परंतु श्रीपरशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता, म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी अक्षय्य तृतीया.
अक्षय्य तृतीया हे व्रत कसे करावे ?
या दिवशी वर दिलेल्या तीन्ही जयंत्या एकत्र येतात, त्यावेळी व्रत करणार्याने प्रात:काळी स्नान करुन 'ममाखिलपापक्षयपूर्वक सकल-शुभ फलप्राप्तये भगवत्प्रीतिकामनया देवत्रयपूजनमहं करिष्ये' असा संकल्प सोडून परमेश्वराची षोडशोपचारे पूजा करावी. पंचामृतस्नान घालून त्यास सुवासिक फ़ुलांचा हार घालावा.
नरनारायणासाठी भाजलेले जव अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी कोवळी वाळके आणि हयग्रीवासाठी भिजवलेली हरबर्याची डाळ घालून नैवद्य अर्पण करावा. शक्य असल्यास उपवास आणि समुद्रस्नान अथवा गंगास्नान करावे. तसेच जव गहु ,हरबरे , सातु, दहीभात , उसाचा रस दुग्धजन्य पदार्थ ( खवा, मिठाई आदी ) तसेच जलपूर्ण कुंभ ( गन्धॊदकतिलैमिश्रं सान्नं कुंभं फलाचितम् ) घर्मघट, धान्यपदार्थ, सर्व प्रकारचे रस आणि उन्हाळ्यात उपयुक्त अशा वस्तुंचे दान करावे. त्याचप्रमाणे पितृश्राध्द करुन ब्राह्मणभोजन घालावे. हे सर्व यथाशक्ती करण्याने अनंत फल मिळते. या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे, असे श्रीकृष्णांनी सांगितल्याचा उल्लेख 'मदनरत्न' या ग्रंथात आहे. म्हणून या तिथीला अक्षय्य तृतीया हे नाव पडले आहे. या दिवशी पितृतर्पण करण्यास न जमल्यास निदान तिलतर्पण तरी करावे, असे आहे.
उन्हापासून रक्षण करणार्या छ्त्री जोडा इ. वस्तु दान द्यावयाच्या असतात. स्त्रियांना हा दिवस अत्यंत महत्वाचा असतो. चैत्रात बसवलेल्या गौरीचे त्यांना या दिवशी विसर्जन करावयाचे असते. त्या निमित्ताने स्त्रिया हळदीकुंकू करतात
अक्षय्य तृतीया या दिवशी काय खरेदी करावे ?
हा सनातनी धार्मिकांचा उत्सव (सण) आहे.या दिवशी दिलेले दान अगर केलेला जप , होम, स्नान आदी कृत्यांचे फ़ल अनंत असते. सर्वच अक्षय्य (नाश न पावणारे ) होते, यामुळेच या तिथीला अक्षय्य तृतीया म्हणतात. या दिवशी तुम्ही सोने किंवा जड जवाहीर खरेदी करू शकता असे केल्याने त्यात सतत वाढ होत राहते. या दिवशी नवीन वस्त्रे, शस्त्रे, दागदागिने आदि वस्तू तयार करवतात अगर परिधान करतात. तसेच, नवीन जागा , संस्था अगर मंडळे आदी यांची स्थापना , उद्घाटन वगैरेही केली जातात. नवीन वाहन खरेदी केले जाते. नवीन संकल्प केले जातात तसेच नवीन व्यवसाय सुरु केले जातात. थोडक्यात काय तर कोतेही शुभ कर्म या दिवशी चालू केल्यास ते कायम स्वरूपी अक्षय राहते व टिकून राहते.
अक्षय्य तृतीया या दिवशी कोणते दान द्यावे ?
या तिथीस केलेले दान ,हवन आणि पितरांना उद्देशून जे कर्म केले जाते , ते सर्व अक्षय्य म्हणजेच अविनाशी आहे. म्हणून या दिवशी केलेल्या दानाला खूप महत्व आहे. या दिवशी खालील प्रमाणे वस्तू दान केल्यास पुण्य संचय वाढतो. या दिवशी
१) या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोर गरिबांना दान करावेत. ( मुख्य म्हणजे अक्षय तृतीया या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास सुरवात करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
२) या दिवशी आंबे गोर गरिबांना दान करावेत. (मुख्य म्हणजे आंबे खाण्यास सुरवातच अक्षय तृतीया या दिवसापासून करतात त्याने आरोग्य उत्तम राहते. )
३) या दिवशी मिठाई किंवा गोड पदार्थ या दिवशी गोर गरिबांना दान करावेत.
४) या दिवशी वस्त्रे किंवा कापड गोर गरिबांना या दिवशी दान करावेत.
५) या दिवशी विविध प्रकारची झाडांची रोपे खरेदी करून त्यांची आपल्या अंगणात किंवा एखाद्या मंदिरा भोवती किंवा डोंगर माथ्यावर लागवड करावी व पुढे पूर्ण वर्षभर त्यांची निगा राखावी.
६) सर्वात महत्वाचे म्हणजे या दिवशी आपण आपल्या आवडत्या देवतेचे नामस्मरण किंवा मंत्र पठण करावे या दिवशी केलेल्या मंत्र पठणाचे किंवा नाम स्मरणाचे पुण्य अखंड टिकून राहते. मग चला तर या दिवशी आपण मंत्र पठणास किंवा नाम स्मरणास सुरवात करू यात. खालील पैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता.
ओम नमो भगवते वासुदेवाय
सर्व मंगल मांग्लये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते
या दिवशी वरील मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावर राहते व तिचा निवास कायम आपल्या घरात राहतो.
विशेष सूचना = ( या दिवशी कोणत्याही प्रकारचे कर्ज काढू नये कारण ते देखील अक्षय टिकून राहते )
वरील लेख आपणास आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवाव्यात. व हि माहिती आपल्या सर्व मित्रां पर्यंत पोहोचावी या साठी हा लेख सर्वांनी शेअर करावा हि नम्र विनंती !
" भाग्यलिखित परिवारातील प्रत्येकाला अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!!!
तुम्हा सर्वांच्या आयुष्यात अखंड, अक्षय सुख, समृद्धी नांदो... !!! "
(व्हॉटसऍपवरुन..)
आज जगभर ब्रेक्झिटची चर्चा चालू आहे, कारण ग्रेट ब्रिटननें युरोपीय महासंघातून (EU) बाहेर पडण्याचा निर्णय जनमताद्वारें घेतला आहे. आतां, कुणाच्या मनांत हा प्रश्न येऊं शकतो की, याचा राज ठाकरे यांच्याशी संबंध काय ? त्याच्याकडे आपण येणारच आहोत.
ब्रेक्झिटबद्दल सगळ्यांना माहीत आहेच. आपणही ब्रेक्झिटकडे एक नजर टाकूं. ब्रिटन ई.यू. मधुन बाहेर पडलें याचें एक मुख्य कारण आहे परदेशीयांचे लोंढे. आज, सीरिया आदी देशांमधील अस्थैर्यामुळे तेथील लोक बाहेर पडत आहेत व युरोपीय देशांमध्ये त्यांचे लोंढे येत आहेत. पोलंडसारख्या देशांमधील आर्थिक स्थिती बिकट आहे, त्यामुळे तेथील लोक नोकर्यांसाठी इंग्लंडमध्ये येत आहेत. ई.यू. च्या नियमांमुळे या इमिग्रंट्स् बद्दल ब्रिटन कांहींच करूं शकत नाहीं. अशा गोष्टींमुळे, ब्रिटिश नागरिकांना असुरक्षित वाटत होते, व या विषयावरील निर्णय आपल्याच ( म्हणजे, आपल्या देशाच्याच) हातात राहिला पाहिजे, असें त्यांना तीव्रतेनें वाटत होतें. त्याचा परिणाम या निकालानें दिसून आला. अर्थतज्ञ म्हणताहेत की, याचे दुष्परिणाम यू. के. च्या अर्थव्यव्यवस्थेवर होतील ( व ई. यू. च्या ही) , आणि त्याचा अंतत: परिणाम जगभर दिसून येईल. पण साधारण माणसाची प्रायॉरिटी (अग्रक्रम) असते ती म्हणजे नोक मिळणें व ज़गण्यासाठी पैसे मिळण्याची संधी उपलब्ध असणें ; आणि ती संधी परकीयांमुळे गेली, तर मग गहजब होणारच !
स्थानिकांना संधी मिळण्यासाठी परकीयांचें इमिग्रेशन कमी खरा, असें आज अमेरिकेतही डोनाल्ड ट्रंपसारखे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणताहेतच. ( ट्रंप यांच्या अन्य मुद्द्यांच्या योग्यायोग्यतेची चर्चा येथें अभिप्रेत नाहीं ) .
याचा स्पष्ट अर्थ असा की, यू.के. काय , यू.एस्. ए. काय , प्रत्येक ठिकाणीं, स्थानिकांच्या उपजीविकेचा प्रश्न आज महत्वाचा बनलेला आहे, व त्या संधी ‘बाहेरच्या’ लोकांच्या लोंढ्यांमुळे कमी होऊं नयेत, असें तेथील जनतेला , व (कांहीं) राजकीय नेत्यांनाही वाटतें आहे.
राज ठाकरे तरी याहून वेगळें काय बोलताहेत ? राज ठाकरे यांचें असें म्हणणें आहे की, मुंबईत परप्रांतीयाचे लोंढे येत आहेत, आणि त्यामुळे मुंबईवर अनेक प्रकारचा बोजा वाढतोच आहे ; जागेची कमतरता, स्वच्छतेचा, नको-एवढी-गर्दी, वाहतूकीचा बोर्या, नोकर्यांतील संधी, अशा अनेक गोष्टींमुळे राज्य सरकार व महानगरपालिका यांच्यावर नको-तेवढा ताण पडतो. ते असेंही म्हणतात की, क्रेंद्र सरकारनेंही, किमान खालच्या दर्जाच्या नोकर्या तरी स्थानिकांसाठीच राखून ठेवल्या पाहिजेत, नाहींतर त्या नोकर्यांद्वारेंही परप्रांतीयांचा येथें शिरकाव होतो, आणि स्थानिक लोक नोकरीच्या संधी गमावून बसतात. (ममता बॅनर्जी रेल्वेमंत्री असतांना त्यांनीं हें रेल्वेत अमलात आणलें). बंगलादेशी तर परदेशीच आहेत, पण उत्तर-भारतीय राज्यांतूनही अनेक लोंढे नित्य येतच रहाताहेत. स्थानिकांच्या उपजीविकेच्या संधी जर हिरावल्या गेल्या तर त्यांनी जायचें कुठे ? जेथून हे लोंढे येताहेत, तेथील सरकारांनी तेथेंच नोकर्यांच्या संधी वाढवायला हव्यात. तर इथले लोंढे थांबतील, व इथल्या व्यवस्थेवरील बोजा कमी होईल.
एक गोष्ट मला स्पष्ट करायला हवी, ती ही की माझें हायस्कूलचें शिक्षण हिंदीभाषिक प्रदेशात, तर इंजिनियरिंगचें बंगालीभाषिक प्रदेशात झालेलें असल्यामुळें, माझें या भाषांवर, भाषिकांवर आणि त्या भागांमधील संस्कृतीवर प्रेम आहे. पण असें प्रेम असणें वेगळें, आणि इकॉनॉमिक प्रश्नांची जाण असणें वेगळें. त्यामुळे, त्या-त्या भागातील जनांवर प्रेम असूनही, मला राज यांचा मुद्धा पटतो की, स्थानिकांना निदान अनस्किल्ड् नोकर्यांमध्येतरी प्राधान्य मिळायलाच हवें.
इथल्या स्थानिक लोकांना ब्रेक्झिटसारखा पर्याय नाहीं ; पण जर असताच, तर काय झालें असतें, असा एक, हादरवणारा, विचार मनांत येतो. तेथवर पाळी न येवो म्हणजे मिळवली !
-- सुभाष स. नाईक
मोबाईल फोन हातात नसणारा माणूस आजकाल विरळाच ! फोनचे मुख्य काम संवाद आणि संपर्काचे, पण त्याचा आता वापर होऊ लागलाय चक्क खेळण्यासाठीसुद्धा.
अगदी दोन-दोन वर्षानी मोबाईल बदलणारे लोक जसे आहेत तसे अक्षरश: सहा महिन्यातही मोबाईल बदलणारे लोकही आपल्या आसपास दिसतात. नवा फोन घेतला की जुना फोन घरातल्या दुसर्या व्यक्तीला दिला जातो तसाच कधीकधी बच्चेकंपनीला खेळण्यासाठीही दिला जातो.
मोबाइल जसा उपयुक्त आहे, तसाच तो अपायकारकही आहे हे आपण बर्याचदा विसरतो ! शेवटी मोबाईल हेही एक इलेक्ट्रॉनिक गॅझेट असल्यामुळे योग्य काळजी घेतली नाही तर त्याचे दुष्परिणाम अटळ आहेत.
प्रत्येक गोष्टीचा अतिवापर चांगला नसतोच. मोबाइलसुद्धा याला अपवाद नाही. जबाबदारीने मोबाइल वापरला तर आपण व मोबाइल दोघेही सुरक्षित राहूच, पण आजूबाजूच्यांनाही सुरक्षित ठेऊ.
बर्याचदा आपण मोबाइल फोनचा स्फोट झाल्याच्या बातम्या ऐकतो. काय असेल याचं कारण? हे टाळता येईल का? मोबाईल सुरक्षितपणे कसा वापरायचा.. वगैरेचा थोडा आढावा घेऊ आणि मोबाईल वापरताना घ्यायची खबरदारीही बघूया. थोडक्यात काय.. तर मोबाइलबाबतचे हे 'Do' and Dont' Do' बघूया...
शक्यतो ब्रँडेड फोनच विकत घ्या, ज्यावर आयएमईआय (IMEI) नंबर असेल. फोनवरचा आयएमईआय बिलावर आणि बॉक्सवरही एकच आहे याची खात्री करुन घ्या.
बॅटरीवर दिलेल्या सूचनांवर नजर टाका. बॅटरीवरील व्होल्टेज आणि सोबत मिळालेल्या चार्जरवरील व्होल्टेज सारखेच आहे की नाही ते तपासा.
फोन वापरण्यापूर्वी त्याच्या मॅन्युअलमध्ये दिलेल्या सूचना नीट वाचा आणि त्यांचे पालन करा.
मोबाइल फोन चार्जिंगवर असताना एखादा कॉल आला आणि आपण चार्जिंग बंद न करता तसंच चार्जर अनप्लग न करताच बोललो, तर मोबाइल फोनचा स्फोट होण्याची शक्यता असते. चार्जिंग सुरु असताना मोबाइल फोनच्या अंतर्भागावर ताण पडतो. चार्जिगदरम्यान त्याचा वापर केल्यास हा ताण जास्त वाढतो. असा ताण सहन न झाल्याने स्वस्त फोनमधील काही पार्टसचा स्फोट होतो.
अॅंड्र्रॉइड स्मार्टफोनमध्ये मालवेअर, बग्स वगैरेही मोबाईलवरील ताण वाढवतात, त्यामुळेही मोबाइलचा स्फोट होण्याचा धोका असतो.
मोबाईल वापरताना सुरक्षेसाठी कोणती काळजी घ्यावी ?
फोन चार्जिंगवर असताना आलेल्या कॉलवर बोलणं शक्यतो टाळा. गरज असल्यास फोन चार्जिंग बंद करुन प्लग काढून नंतरच बोला.
बॅटरी पूर्ण चार्ज झाली की चार्जिंग बंद करा. फोन जास्त चार्ज करू नका
बॅटरी खराब झाली असल्यास किंवा फुगली असल्यास लगेच बदला
नॉन ब्रँडेड तसेच स्वस्त मोबाईल फोन अनेकदा धोकादायक ठरतात. अशा फोन्समध्ये चिनी बनावटीची बॅटरी तसेच छोटे-मोठे पार्ट वापरलेले असतात.
इंटरनेट सर्फिंग व डाउनलोडिंगच्या वेळी मोबाइल फोनसाठी असलेले अँटीवायरस फारसे प्रभावी नसल्यास स्मार्ट फोनमध्ये मालवेअरचा धोका वाढतो. असा धोका टाळण्यासाठी तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमने दिलेल्या स्टोअरवरुनच अॅप्स इनस्टॉल करा.
असुरक्षित किंवा सार्वजनिक वाय-फायचा वापर टाळा. मॉल वगैरेमध्ये मोफत इंटरनेट मिळत असले तरी याचे पोर्ट सुरक्षित नसल्याने हॅकरला तुमचा मोबाइल डेटा हॅक करणे सहज शक्य असते.
पेट्रोलपंपावर तसेच गॅस फिलिंग स्टेशनवर मोबाईल कधीही वापरु नका.
आरोग्यासाठी सावधगिरीचे काही उपाय
मोबाइलवर बोलताना हँडसेट कानापासून थोडा दूर ठेवा ज्यामुळे रेडिएशनचा धोका कमी होईल. यासाठी सोपा उपाय म्हणजे स्पीकरवर बोला किंवा हेडफोन्स वापरा.
झोपताना उशीखाली किंवा शरिराजवळ मोबाइल फोन घेऊन झोपणं टाळा.
आपण अनेकदा काही लोकांना काम करताना फोन तोंडात घरताना बघतो. हे अत्यंत घातक आहे. असं सतत केल्यास मोबाइलच्या रेडिएशन्समुळे तोंडाचा कॅन्सर किंवा ट्यूमर होण्याचा धोका वाढतो. डोकेदुखी, स्लीप डिस्टर्बन्स, मायग्रेन हे त्रासही होऊ शकतात.
मोबाइल फोन पाण्यात भिजल्यास तो पाण्यातून काढून तो स्विच-ऑफ करा. सिमकार्ड आणि मेमरीकार्ड काढून ठेवा. कपड्याने फोनला कोरडा करा. मात्र हेअरड्रायरचा वापर करू नका. ओला असलेल्या अवस्थेत मोबाईल कधीही वापरु नका.
-- पूजा प्रधान
‘ब्रेक्झिट’साठी जनमत घेतलें गेलें, आणि ब्रिटननें युरोपीय समुदायातून (EU) बाहेर पडायचा निर्णय घेतला. तें होतांच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एक पुकारा करूं लागले. ब्रेक्झिटचा आणि केजरीवाल यांचा संबंध काय, असा प्रश्न मनांत येणें स्वाभाविक आहे .
तो संबंध आहे ‘जनमत’ हा. सध्या दिल्ली हें जरी ‘राज्य’ असलें तरी, तें इतर राज्यांसारखें पूर्णपणें स्वतंत्र राज्य नाहीं ; दिल्लीतील Law & Order हें केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे. दिल्लीच्या राज्य- सरकारला कांहीं गोष्टींसाठी दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरची परवानगी घ्यावी लागते ; दिल्लीचे पोलिस केंद्राच्या गृह-मंत्रालयाच्या एकप्रकारें आधीन आहेत. केजरीवालांचं दिल्ली-पोलिसांच्या मुख्याशी पटत नाहीं ; केजरीवाल यांचें दिल्लीच्या लेफ्टिनंट-गव्हर्नरशी पटत नाहीं, केजरीवाल यांचें केंद्राच्या गृहमंत्रालयाशी पटत नाहीं. नुसतेंच या सर्वांशी पटत नाहीं असें नव्हे, तर संघर्ष आहे. केजरीवाल हे म्हणताहेत की दिल्लीला संपूर्ण statehood मिळालें पाहिजे , म्हणजे सगळें राज्य-सरकारच्या अखत्यारीत येईल. दिल्लीच्या इलेक्शनमध्ये AAP ला मोठें बहुमत मिळालें आहे. त्यामुळे, आतां ‘ब्रेक्झिट’च्या धर्तीवर, दिल्लीला संपूर्ण ‘स्टेटहुड’ मिळावें यासाठी, referendum, जनमत, घ्यायला हवें अस प्रचार केजरीवाल करत आहेत . तसें झाल्यास , आपल्या मताला बहुमत मिळेल, अशी त्यांना कदाचित खात्री वाटत असावी.
अमेरिकेतही (USA) राजधानी वॉशिंग्टन डी.सी. हें शहर क्रेंद्राच्या ( फेडरल सरकारच्या) अखत्यारीत आहे. तेथेंही कांहीं नेते, त्या शहरासाठी ‘स्टेटहुड’ची मागणी करताहेत, पण तेथील फेडरल सरकारनें अजून तरी त्यांना दाद दिलेली दिसत नाहीं. भारत सरकारनेंही ही गोष्ट ध्यानात ठेवावी, आणि दिल्लीची सुरक्षा या विषयावर अजिबात compromise करूं नये.
केजरीवालांची AAP जेव्हां इलेक्शनसाठी उभी होती, तेव्हांही त्यांना दिल्ली राज्याचें ‘स्टेटस’ काय आहे, हें पूर्णपणें ठाऊक असणारच. त्यांनी ‘दिल्लाला संपूर्ण राज्याचा दर्जा हवा’ या प्रश्नावर निवडणूक लढवली असती , व त्या मुद्द्यावर त्यांची पार्टी जर बहुमतानें निवडून आली असती, तर मग , हा प्रश्न धसास लावण्यासाठी केले त्यांचे प्रयत्न , ‘योग्य प्रयत्न’ या सदरात मोडले असते. पण एखाद्या प्रश्नाची आधीच माहिती असणें , व ती प्रत्याप्रक्षरीत्या स्वीकारणें, आणि नंतर जनमताचा आग्रह धरणें कितपत योग्य आहे , खास करून ‘ब्रेक्झिट’चें उदाहरण देऊन ?
मात्र प्रत्येक गोष्टीसाठी जनमत घ्यायलाच हवें, असें नाहीं ; खास करून प्रश्न जेव्हां सुरक्षेशी संबंधित असेल तेव्हां. दिल्ली ही भारताची राजधानी आहे. तेथें आपली पार्लियामेंट आहे, व राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून अनेकानेक महत्वाच्या व्यक्ती तेथें रहातात, परदेशीय वकिलाती तेथें आहेत. म्हणूनच, दिल्लीची सुरक्षा ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतच असली पाहिजे, राज्य सरकारच्या नव्हे. आणि, या गोष्टीचा संबंध केवळ सिक्युरिटीशीच संबंधित आहे, आणि, असायला हवा ; केंद्रात कोणाचें व दिल्लीत कोणाचें सरकार आहे, या प्रश्नाशी तो अजिबात निगडित नाहीं, आणि नसावाही.
केजरीवाल यांचा व माझा कांहींच संबंध नाहीं ; आणि बादरायण संबंध जोडायचा असलाच तर, आम्ही दोघेही आय्. आय्. टी. खरगपुरचे विद्यार्थी आहोत , एवढाच तो आहे. पण मी त्यांना ( आय्. आय्. टी. मधून पास कधी झालो, या निकषावरून) बराच सीनियर आहे ; त्यामुळे त्यांचा माझा तेथेंहीं संबंध येण्याची सुतराम् शक्यता नव्हती. तसेंच, मी AAP चाच काय, कुठल्याही राजकीय पार्टीचा सभासद नाहीं. हे सर्व सांगायचा हेतू इतकाच की, माझें वरील analysis हें केवळ तर्काधिष्ठित आहे, त्याचा संबंध देशाच्या राजधानीच्या सुरक्षेशी आहे, अन्य कशाशीही नाहीं.
‘दिल्लीला संपूर्ण स्वतंत्र राज्याचा दर्जा देणे न देणे’ या प्रश्नाचे राजकीय व अन्य पैलू तपासणें हा या लेखाचा उद्देश नाहीं. मात्र, ब्रिटनमधील ‘ब्रेक्झिट’साठीचें जनमत, हें दिल्लीसाठी योग्य उदाहरण, किंवा precedent, असूंच शकत नाहीं. देशाच्या राजधानीच्या सुरक्षेचा विचार करून, इतकें नक्कीच वाटतें की, केंद्र सरकारनें कोणाच्याही कसल्याच दबावाला बळी पडूं नये, व दिल्लीची सुरक्षा-व्यवस्था स्वत:च्याच हातात ठेवावी.
-- सुभाष स. नाईक.
श्री. साळुंखे यांनी ‘मराठी सृष्टी’वर, ‘मला एक प्रश्न पडलाय’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी ‘छत्रपती’ या शिवाजी महाराजांच्या बिरुदाबद्दल चर्चा केली आहे . प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला शिवरायांच्या ‘छत्रपती’ या अभिधानाबद्दल कुतूहल असतेंच. साळुंखे यांनी तो शब्द ‘क्षेत्रपती’ या शब्दापासून निघाला असावा असें मांडलें आहे. त्यांनी दाखवलेला अर्थ सराहनीय आहेच. शिवराय हे ‘श्रीक्षेत्र महाराष्ट्राचें’ दैवत आहे, यात शंकाच नाहीं.
परंतु, ‘क्षेत्रपती’ या शब्दाचा अपभ्रंश ( त्यातील ‘त्र’ कायम राहिल्यास), खेत्रपती, शेत्रपती किवा छेत्रपती असा झाला असता, ‘छत्रपती’ असा नव्हे. (‘क्षेत्र’ या संस्कृत शब्दाचें मराठीत ‘शेत’ असें रूप होतें, तर हिंदीत ‘खेत’ असें होतें. पंजाबीत ‘क्षेत्रपाल’ चें ‘खेतरपाल’ असें व्यक्तिनाम होतें) . राजस्थानातील, व हिंदीभाषी प्रदेशातील, उच्चाराप्रमाणें , ‘क्ष’ चा ‘छ’ होतो. इतिहासाचार्य राजवाडे यांनी दिलेली कांहीं उदाहरणें अशी : *‘क्षत्रसार’ याचें ‘छत्रसाल’ , *लक्ष्मण चें ‘लछमन’ , *दक्षिण चें ‘दछ्.छिन’ (दच्छिन).
‘छत्रपती’ या शब्दाचा उगम वेगळा आहे, हें राजवाडे यांच्या लेखावरून दिसतें. राजवाडे यांचें इतिहासाच्या क्षेत्रातील महान कार्य सर्वज्ञात आहेच. परंतु, ते भाषाकोविदही होते. त्यांनी भाषा, संस्कृती, व्याकरण, लोकसमूहांचें स्थलांतर, इत्यादी विषयांवरही विपुल लेखन केलेलें आहे. ‘छत्रपती’ शब्दाच्या उगमाबद्दलच्या त्यांच्या लेखाच्या महत्वाच्या भागाचा संक्षेप मी खाली देत आहे. (संदर्भ : राजवाडे लेखसंग्रह, भाग दोन व तीन : संकीर्ण निबंध).
[ टीप : (१) ’छत्रपति’ मधील ‘ति’ हा, संस्कृतमध्ये व तत्सम शब्दांमध्ये र्हस्व असतो. परंतु, आतां मराठीत हा शब्द stand-alone अशाप्रकारें लिहितांना, ‘ती’, ( म्हणजे, ‘छत्रपती’ असा), दीर्घ लिहिला जातो. परंतु, राजवाडे यांनी , तत्कालीन पद्धतीप्रमाणें, ‘ति’ र्हस्व लिहिलेला आहे. या सर्वांचा विचार करूनच, खाली हेतुत: , ति/ती हा, र्हस्व किंवा दीर्घ लिहिलेला आहे, याची नोंद घ्यावी .
(२) शिवरायांचा एकेरी उल्लेख हा केवळ लेखनसोयीसाठीच आहे. राजवाडे यांनीही तो तसाच एकेरी वापरलेला आहे ] .
कवि भूषण याच्या काव्यात छत्रपति हा शब्द येतो. जसें, ‘छटी छत्रपति को जीत्यों’ , ‘सबै छत्रपति छाँडी’ .
ग्रँट डफ लिहितो की, १६६४ पासून, म्हणजे शहाजीच्या मृत्यूनंतर, शिवाजीनें नाणें पाडण्यांस सुरुवात केली, व शिवाजीच्या नाण्यांवर ‘छत्रपति’ ही अक्षरें तेव्हांपासून आहेत.
(टीप : याचा अर्थ असा की, १६७४ ला, राज्याभिषेकानंतरच शिवराय ‘छत्रपति’ हें बिरुद लावूं लागले, असें नसून, वस्तुस्थिती वेगळी आहे).
‘छत्रपति’ हा शब्द पुरातन काळीं जंबुद्वीपात प्रचलित होता; गजपति, छत्रपति, अश्वपति, नरपति, हे राजे जंबुद्वीपाच्या दक्षिण, पश्चिम, उत्तर आणि पूर्व प्रदेशात राज्य करतात अशी पुराणांत कथा आहे ; असा उल्लेख ‘बील’ यानें केलेल्या, ‘सी यू की’ या चिनी पुस्तकाच्या भाषांतरात आलेला आहे. या पुस्तकातील ‘छत्रपति’ हा शब्द ‘क्षत्रपति’ या शब्दाचें रूपांतर होय. (‘क्षत्रपति’बद्दल आपण पुढे पहाणारच आहोत).
‘छत्रपति’ हा शब्द ‘छत्र’ व ‘पति’ या दोन शब्दाच्या समासानें झालेला आहे. छत्राचा जो पति म्हणजे धनी (मालक) तो, छत्रीवाला, म्हणजे छत्रपति . पण असा या शब्दाचा वाच्यार्थ रूढ नाहीं. छत्रीवाला याला ‘छत्रधारी’ असा संस्कृत शब्द आहे.
‘हैम’ (सुवर्णमय, सोन्याचें) छत्राचा जो पति, तो ‘छत्रपति’, हा दुसरा रूढ-अर्थ झाला. छत्रपति, म्हणजे ‘चक्रवर्ती राजा’ , ‘सम्राट’. सम्राट म्हटला की त्याला सोन्याची छत्री ही असायचीच.
[ आपट्यांच्या कोशात, ‘छत्रपति’ याचा अर्थ ‘चक्रवर्ती, सम्राट’ असा ते देतात. जंबुद्वीपातील एका पुरातन राजाचें ‘छत्रपति’ हें नांव होतें, असेंही आपटे सांगतात ] .
छत्रपती म्हणजे सम्राट एवढ्यानेंच या शब्दाची व्याप्ती होत नाहीं. पृथ्वीवर कोणी छत्रपती झाला म्हणजे त्या वेळीं अन्य छत्रपती संभवत नाहीं.
आक्रांता झाली असलेली पृथ्वी छत्रपती राजाच्या शासनानें, एकछत्र होते.
‘एकछत्रा मही यस्य प्रतापाद्.भवत्पुरा’ - महाभारत, शांतिपर्व.
‘छत्रपत तुम शेखदार शिव’ असा शिवाजीला उदेशून ज्या पदात उल्लेख आहे, तो ‘छत्रपत’ , चक्रवर्ती स्वरूपाचा होता. ( शेखदार : पुढारी असलेला ).
‘क्षत्रपति’ हा शब्द फार जुना आहे. ‘क्षत्राणाम् क्षत्रपरिर् असि’ असें तैत्तिरीय संहिता सांगते. ब्राह्मण ग्रंथामध्येही क्षत्रपतिचा उल्लेख आहे : ‘क्षत्राणाम् क्षत्रपतिरसीत्याह । क्षत्राणामेवैन क्षत्रपतिं करोति ।’
(तैत्तिरीय ब्राह्मण संहिता). ‘षोइत्रपैति’ ( Shoitra-Paiti) या रूपानें तो झेंद भाषेत ( म्हणजे अति-पुरातन पर्शियन, झेंद अवेस्थाची भाषा, हिच्यात) सापडतो. ग्रीक भाषेत हा, ‘सत्रप’ (Satrap) या रूपानें अवतरला.
अलेक्झँडरच्या पश्चात जे ग्रीक अधिकारी पंजाबपासून ते आशिया-मायनरपर्यंत झाले, त्यांन ‘सत्रप’ अशी संज्ञा देतात. जुन्नर, कांहीं कोंकण किनारा, अंशत: गुजरात व राजपुताना-माळवा या भागात इ.स.पू. पहिलें शतक ते इ.स. चें तिसरें शतक या काळात राज्य करणार्या कांहीं, भारताबाहेरून आलेल्या, राजांना ‘क्षत्रप’ म्हणत असत. ‘सी-यू-की’ या चिनी ग्रंथातील, ‘क्षत्रपती’च्या, ‘छत्रपती’ या अपभ्रंशाबद्दल आपण आधीच पाहिलें आहे.
‘क्षत्र’ म्हणजे क्षत्रियाचें कुल. त्यांचा पालक, किंवा रक्षण करणारा जो, तो ‘क्षत्रपति’.
संस्कृत ‘छत्रपति’ ; आणि संस्कृतमधील-‘क्षत्रपति’_या_शब्दापासून-अपभ्रंश-झालेला-‘छत्रपति’ ; या दोन शब्दांचा अर्थ भिन्न आहे. संस्कृत ‘छत्रपति’ शब्दाचा अर्थ ‘सम्राट राजा’ असा आहे ; तर ‘क्षत्रपति’ या शब्दापासून अपभ्रष्ट रूप होऊन निर्माण झालेला ‘छत्रपति’ या शब्दाचा अर्थ ‘क्षत्रकुलाचा पुढारी’ असा आहे. अपभ्रष्ट-रूप-असलेला ‘छत्रपति’ हा शब्द ‘सम्राट राजा’ या अर्थानें वापरला जात नाहीं.
मुघल व दक्षिणेतील शाह्यांपुढे भारतातील सर्व क्षत्रकुलें केवळ नम्र होऊन राहिली होती. त्या शत्रूंना, (शहाजीनें, व) शिवाजीनें नरम आणलें. त्यामुळे, नुसत्या महाराष्ट्रातीलच नव्हे, तर सर्व भारतातील क्षत्रकुलें त्या अरींच्या भीतीपासून मुक्त झाली.
शिवाजीच्या वेळी, सोन्याची छत्री व बाकीची साम्राज्याची चिन्हें फक्त दिल्लीश्वरालाच असत ; भारतातील इतर राजांना नसत. त्या पार्श्वभूमीवर, शिवरायांचें ‘छत्रपती’ हें अभिधान विशेष महत्वपूर्ण आहे.
तेव्हां, ‘चक्रवर्ती सम्राट’ व ‘आक्रांतापासून हिंदुस्थानचें रक्षण करणारा’ ; तसेंच ‘क्षत्रकुलाचा पुढारी’ , या दोन्ही अर्थांनी शिवराय हे ‘छत्रपती’ होते, हें नि:संशय. कवि भूषण व समर्थ रामदास हे, शिवरायांना दिल्लीश्वरापेक्षाही जास्त योग्यतेचा समजत. आपणही त्यांच्याशी नक्कीच सहमत होऊं.
+ + +
- सुभाष स. नाईक . मोबाइल : ९८६९००२१२६. ई-मेल : vistainfin@yahoo.co.in
स्वातंत्र्यवीर सावरकर हे महान क्रांतीकारक, साहित्यिक, लेखक होते. त्यांनी कायम हिंदुत्त्ववाद मांडला म्हणून ते कायम दुर्लक्षित राहीले. मात्र खरे म्हणजे सावरकर जरी हिंदुत्त्ववादी होते तरीही त्यांनी इतर धर्मांचा नेहमीच आदर राखला. आजच्या तथाकथित बाजारबुणग्या सेक्युलरवाद्यांसारखे नव्हते. आजचे सेक्युलरवादी म्हणजे केवळ हिंदूविरोधी असतात. आपल्या देशात ज्यांना हिंदूंनी निवडून दिले ते स्वत:ला हिंदू म्हणायला तयार नाहीत.
दिवंगत राजीव गांधी, नेल्सन मंडेला.. अगदी महाराष्ट्रात १०५ हुतात्म्यांचा संहार करणार्या मोरारजी देसाईसारख्या माणसाला भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र देशाला स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतीकारक घडविणारे, देशासाठी दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या सावरकरांना मात्र तो मिळत नाही. त्यांना तो देण्यात यावा म्हणून प्रयत्न करावे लागणे यापेक्षा दुर्दैवी गोष्ट नाही.
राहूल गांधी, सोनिया गांधी आणि त्यांची पलटण यांनी कधीतरी सावरकर काय होते त्याचा अभ्यास केला आहे का? सावरकरांनी ज्या नरकयातना भोगल्या त्या भोगायची कल्पना तरी राहूल गांधी करु शकतात का?
अगदी परवाचेच साधे उदाहरण. राहुल गांधींनी मोठा गाजावाजा करुन मुंबईच्या डम्पींग ग्राऊंडचा दौरा आखला. डम्पींग ग्राऊंडवरच्या दुर्गंधीने त्रासून त्यांनी अक्षरश: पाच मिनिटात त्या ठिकाणाहून पळ काढला. असे हे आमच्या देशाचे “युवराज”. सावरकरांनी अंदमानच्या ज्या सेल्युलर जेलमध्ये उमेदीची वर्षे काढली तिथे आमचे आजचे नेते दोन दिवस तरी राहून दाखवतील का?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न जाहीर करण्याची मागणी अनेकदा सरकारकडे केली गेली. मात्र राजकीय कारणांसाठी कॉंग्रेस सरकारने त्याचा कधीच विचार केला नाही. भाजप सरकार प्रचंड बहुमताने निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी केली खरेतर पंतप्रधानांच्या शिफारसीनंतर भारतरत्न किताब देण्यात कोणतीही इतर औपचारिक शिफारस आवश्यक नसते. त्यामुळे यावर्षी तरी सावरकरांना भारतरत्न मिळतोय का ते बघायचे.
-- मराठीसृष्टी टिम
आज ७ ऑगस्ट, नागपंचमी
1. नाग/साप कधीही दूध पीत नाही, कारण तो सस्तन प्राणी नाही.
2. नाग जिभेने वास घेतो, त्यामुळे तो सारखी जीभ बाहेर कडून आसपास असणाऱ्या प्राण्यांचा अंदाज घेतो.
3. नाग पूर्ण मांसाहारी प्राणी आहे, तो इतर प्राण्यांची अंडी, किंवा लहान प्राणी, जसे उंदीर, बेडूक, सारडा यांना खातो.
4. त्याची स्मरण शक्ती अतिशय अल्प असते, त्या मुळे सिनेमात दाखवतात तसे नागीण बदला घेत नाही.
5. शक्यतो हा प्राणी मनुष्याला घाबरतो व लपून राहण्याचा किव्वा पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही घाबरू नका.
6. नाग कंपनाने (vibrations) सुद्धा जवळपास कोणी आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो. गुरखा म्हणून रात्री काठी वाजवतो, साप व नागाला दूर जाण्यासाठी प्रोत्साहित करतो.
7. नागाला कान नसतात, तसेच त्याची नजर तीक्ष्ण नसते.
8. नागाने 1 बेडूक किव्वा उंदीर खाल्यास त्याला किमान 15 दिवस अन्नाची गरज नसते.
9. नागपंचमीला त्याच्या डोक्यावर हळद किव्वा कुंकू टाकू नका, यामुळे त्याला इजा होऊ शकते.
10. नागाला पुंगीचा आवाज ऐकू येत नाही, गारुडी पुंगी हलवतो, म्हणून नाग ते पाहून झडप घेऊन चावण्यासाठी स्वतः हलतो, ज्याला काही मूर्ख लोक डोलणे समजतात.
थोडक्यात सांगायचे तर हा सण बंद करावा, किव्वा त्या दिवशी सर्व शाळेत सर्प घराण्यातील जीवांची मुलांना माहिती द्यावी ज्यामुळे त्यांच्यातील भीती व गैर समज दूर होण्यास मदत होईल. 21 व्या शतकात आलो आहोत याचे भान ठेवा, श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नको.
आपणास कोणीही नाग सापाचे खेळ दाखवताना दिसल्यास पोलिसांना खबर द्या, त्याच्या जवळचे प्राणी जप्त करा, आणि सुजाण नागरिक आहेत हे उदाहरण देऊन सिद्ध करा.
We were country of snake charmers, now we are country of mouse charmers. Lets now work hard to rule world with mouse in hand.
पूर्ण लेख वाचल्या बद्दल, आभारी आहे
-- विजय लिमये
9326040204
शाळेतल्या मुलांच्या पाण्याच्या बाटल्या घरी जाताना बहुतेकवेळा अर्ध्या भरलेल्या असतात. घरी गेल्यावर हे पाणी बेसीनमध्ये ओतून टाकलं जातं. ते अर्थातच वाया जातं. हजारो मुलांकडून असं हजारो लिटर पाणी वाया जातं... तेही दररोज.
यावर पुण्यातल्या पिंपरीमधल्या एका शाळेने एक नामी शक्कल लढवली. “सिटी प्राईड स्कूल” ही ती शाळा. त्यांनी असा नियम केला की सगळ्या मुलांनी घरी जाताना बाटलीतलं उरलेलं पाणी शाळेतच ठेवलेल्या एका पिंपात जमा करायचं. असं जमा केलेलं पाणी शाळेच्या बागेतल्या झाडांना घातलं जातं.
आतापर्यंत जितकं पाणी जमा केलंय त्यावरुन अंदाज काढलाय की एका वर्षात या एकाच शाळेत किमान १ लाख लिटर्स पाणी जमा होईल.
आता जवळपासच्या इतरही शाळांनी त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केलेय.
अशा शाळांच्या व्यवस्थापनाचे आणि त्यातील मुलांचेही कौतुक केले पाहिजे. पाणी तयार तर करता येत नाही, पण वाचवता तर येते.. वाचवलेला एक-एक थेंब महत्त्वाचा आहे...
Copyright © 2025 | Marathisrushti