वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात डोकावले तर अनेक मजेशीर गोष्टी लक्षात येतात. या संमेलनाच्या आयोजनातून अनेक योगायोगही जन्माला येत असतात. अशाच काही योगायोगांचा आढावा.
पहिली पाच संमेलने ग्रंथकार संमेलने या नावाने भरली. या संमेलनांना स्वागताध्यक्ष नव्हता. १९०८ च्या पुणे संमेलनाला प्रथमच स्वागताध्यक्ष लाभले आणि ते होते वा.गो.आपटे.
न्यायमूर्ती म.गो.रानडे १८७८ मध्ये पुण्यात भरलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. ते वयाने लहान असलेलेही पहिलेच अध्यक्ष होते. विश्राम बेडेकर यांना मात्र वयाच्या ऐंशीव्या वर्षी संमेलनाचे अध्यक्षपद लाभले. हे संमेलन भरले १९८६ साली.
१९३६ पूर्वी तीन संमेलनाध्यक्ष हे संस्थानिक होते. मिरज, बडोदा आणि औंध येथील राजांना हा मान मिळाला. सयाजीराव गायकवाड हे कोल्हापूरच्या १९३२ च्या साहित्य संमेलनाला हजरही नव्हते. त्यांचे भाषण विनोदाचार्य चि.वि.जोशी यांना वाचून दाखवावे लागले.
१९३८ चे मुंबई संमेलन दोन बॅरिस्टरांनी गाजविले. या संमेलनाचे अध्यक्ष होते बॅरिस्टर वि.दा.सावरकर. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष बॅरिस्टर मुकुंदराव जयकर होते. लेखण्या मोडा आणि बंदुका हाती घ्या हे सावरकरांचे भाषण फार खळबळजनक ठरले. त्यांनी भाषाशुध्दी आणि लिपीशुध्दीची मीमांसाही केली.
मराठी साहित्य संमेलनांच्या इतिहासात आजवर कुसुमावती देशपांडे, दुर्गा भागवत, शांता शेळके आणि विजया राजाध्यक्ष या चारच महिला अध्यक्ष झाल्या तर स्वागताध्यक्षपदाचा मान तीन महिलांना मिळाला. आनंदीबाई शिकरे या जळगावमधील १९३८ सालच्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या. शशिकला काकोडकर या १९९४ च्या पणजी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या तर खासदार सुमित्रा महाजन या १९९४ च्या इंदोर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष होत्या.
दलित समाजातील शंकरराव खरात आणि केशव मेश्राम हे दोन लेखक आणि मुस्लिम समाजातील यू.म. पठाण यांनी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषविले आहे. .
स्वागताध्यक्ष आणि संमेलनाध्यक्ष होण्याचा मानही अनेकांना मिळाला. वि.मो.महाजनी, चिंतामणराव वैद्य, न.चिं.केळकर, मामा वरेरकर, न.वि.गाडगीळ आणि वि.स.खांडेकर या सात जणांना हे दोन्ही मान मिळाले.
पती-पत्नींना अध्यक्षपद मिळण्याचा दुर्मिळ मान अनिल आणि कुसुमावती देशपांडे यांना मिळालेला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने इतिहास घडवला. पण या समितीची मुळे १९४६ च्या बेळगाव साहित्य संमेलनात होती. त्यात झालेल्या ठरावामुळे आणि कार्यवाहक समितीमुळे हे घडू शकले.
१९०७ ते १९६४ पर्यंतची साहित्य संमेलने पुण्याच्या साहित्य परिषदेने भरवलेली आहेत. त्यानंतर १९६५ च्या हैदराबाद संमेनलापासून पुढील संमेलने अखिल भारतीय साहित्य महामंडळाने भरवली.
महाबळेश्वरला झालेल्या संमेलनाच्या अध्यक्षांनी ऐनवेळी राजीनामा दिल्याने हे संमेलन अध्यक्षांविनाच पार पडले.
-- निनाद अरविंद प्रधान
एक धनाढ्य, श्रीमंत व्यापारी होता. त्याचा भला मोठा बंगला होता. त्याच्या बंगल्याला एक सुरेख टेरेस होता. त्या टेरेसवर एक झोपाळा होता, बरीच फुलझाडे लावलेली होती. विश्रांती घेण्याची ही जागा त्याची अत्यंत आवडती जागा होती.
एके दिवशी तो व्यापारी झोपाळ्यावर विश्रांती घेण्यासाठी पहुडला होता. तेव्हा त्याचे लक्ष एका मुंगीकडे गेले. ती मुंगी झाडाचे एक वाळलेले पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या पानाचा आकार मुंगीच्या शरीराच्या आकाराच्या मानाने बराच मोठा होता. तरी सुद्धा मुंगी ते पान घेऊन तुरु तुरु चालली होती. त्या व्यापार्या ला मजा वाटली व त्याने त्या मुंगीचे निरिक्षण करायला सुरवात केली.
ती मुंगी तिच्या कामामध्ये 'फुल्ली कॉन्सन्ट्रेडेड' होती. ती इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिला तिचा मार्ग अचुक ठाऊक होता. ती उगीचच इकडे तिकडे भरकटत नव्हती किंवा आपला मार्ग चुकत नव्हती. तिच्या मार्गात अनेक अडथळे येत होते. पण ते सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन चालली होती. हे बघून त्या व्यापार्याउला त्या मुंगीचे कौतूक वाटू लागले होते.
पण तिच्या मार्गात एक भला थोरला अडथळा आलाच. ती मुंगी ज्या कॉन्क्रीटच्या स्लॅबवरून चालली होती त्या स्लॅबला मोठी क्रॅक गेली होती. या क्रॅकच्या दोन्ही टोकांमधील अंतर बरेच जास्त होते. मुंगीला पानासकट ते अंतर पार करणे अशक्य होते. फक्त एकटी मुंगीच काय ती जाऊ शकणार होती. आता मुंगी काय करते या विषयी त्या व्यापार्याफच्या मनात उत्सुकता निर्माण झाली होती.
त्या मुंगीने ते झाडाचे पान खाली ठेवले. थोडावेळ इकडे तिकडे भटकली. परिस्थितीचे निरिक्षण केले. मग ते पान एका टोकाकडून उचलले व त्या कॉक्रिटच्या फटीवर अशा रितीने टाकले की त्या पानाचा पुल तयार होईल. मग मुंगी त्या पानाच्या पुलावरून पलीकडे गेली आणि पलीकडच्या भागात पानाचे जे टोक आले होते त्याला धरून ते पान उचलून चालू लागली. मुंगीची ही कल्पकता बघून तो त्यापारी थक्क झाला. मुंगी ती केवढीशी तर तिचा मेंदू तर किती छोटा- बघायला मायक्रोस्कोपच हवा. पण मुंगीच्या या छोट्या मेंदुमध्ये सुद्धा परिस्थितीचे निरिक्षण करण्याची आकलन शक्ती तर होतीच पण आलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी लागणारी कल्पनाशक्ती पण होती.
सर्व अडथळे पार करून ती मुंगी ते पान घेऊन तिच्या वारुळापाशी आली. तिला ते पान आता आत, वारूळात न्यायचे होते. पण वारूळाचे दार म्हणजे एक छोटे छिद्र होते. त्या छोट्या छिद्रातून ते झाडाचे पान काही केल्या आता जाईना. मुंगीने थोडावेळ प्रयत्न केला. पण नंतर तिने तो नाद सोडून तिला व ते पान तेथेच टाकून एकटीच आत निघून गेली. महत्प्रयासाने त्या मुंगीने आणलेले झाडाचे पान काही तिला वारुळात नेता आले नाही. तिची सर्व मेहेनत बेकार गेली याचे त्या व्यापार्या च्या लक्षात आले व याचे त्याला खूप वाईटपण वाटले.
पण त्याच्या लक्षात आले की अरे माणसांचे पण असेच असते.
माणसे आयुष्यभर निरनिराळी पाने गोळा करत असतात, काहीजण तर यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत असतात. मग ही पाने विद्वत्तेची असोत, डिग्री-डिप्लोमा- सर्टिफिकेट सारख्या शैक्षणीक पात्रतेची असोत, धन-दौलत- श्रिमंतीची असोत, मान-सन्मान-प्रतिष्ठेची असोत, ऍवॉर्ड-बक्षीसे- मानाच्या पदव्यांची असोत नाहीतर अजुन कसलीतरी असोत. पण माणुस जेव्हा मृत्युच्या दारात पोचतो तेव्हा त्याला ही पाने मागेच ठेवावी लागतात, त्याला आपल्याबरोबर ही पाने काही नेता येत नाही. मग माणूस ढेर मेहेनत करून ही पाने का गोळा करत बसतो? आणि यातील किती पाने स्वतःसाठी व किती पाने इतरांसाठी दाखवण्यासाठी असतात?
याचा अर्थ माणसाने पाने गोळा करू नयेत असा होत नाही. माणसाने पाने जरूर गोळा करावीत पण त्याचबरोबर जिवनाचा आनंद पण घ्यावा! ती मुंगी पान नेताना इकडे बघत नव्हती की तिकडे बघत नव्हती. तिच्या मार्गात अनेक सुंदर फुलांचे ताटवे येत होते पण त्याकडे तिचे लक्ष नव्हते. त्या फुलांचा सुगंध येत होता तो तीला जाणवत नव्हता. आजुबाजुला अनेक सुंदर दृष्ये होती पण ती तिला दिसत नव्हती. या सर्वांकडे दुर्लक्ष करून वारुळाच्या तोंडापर्यंत नेलेले पान काही तिला वारुणात नेता आले नाही.
आपली अवस्था त्या मुंगीसारखी तर होणार नाही ना याची दक्षता प्रत्येकाने घ्यायला हवी नाही का?
तुम्हाला काय वाटते?
मुंबई-पुण्याहून माथेरानला पर्यटनासाठी जाणार्यांना माथेरानच्या राणीने नेहमीच खुणावले आहे. गेली तब्बल १०९ वर्षे ही राणी दररोज अनेक प्रवाशांना आपल्या कुशीत घेउन माथेरानचा डोंगर चढत-उतरत आहे. दोन-सव्वादोन तासांच्या, २० किलोमीटरच्या प्रवासात गेल्या दोन वर्षात या राणीने जवळपास आठ लाख प्रवासांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचे दर्शन घडवले आहे.
माथेरान हे ठिकाण पर्यावरणीय पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. या गावात प्रदूषण करणार्या वाहनांना प्रवेश नाही. त्यामुळेच येथे जाणार्या पर्यटकांना गावाच्या वेशीबाहेर आपली वाहने उभी करावी लागतात. गावात थेट पोहोचण्यासाठी या माथेरानच्या राणीचाच आधार आबालवृद्धांना असतो.
गेल्या काही आठवड्यात ही माथेरानची राणी एक-दोनदा रुळावरुन घसरली काय आणि तिला कायमची बंद करण्याची चर्चा सुरु झाली काय. खरेतर नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेउन या गाडीला नवीन ताकद देणे गरजेचे आहे. मात्र तशी इच्छाशक्तीच रेल्वेच्या अधिकार्यांमध्ये नाही त्याला कोण काय करणार?
सतत महाराष्ट्राला दुजाभाव देणार्या रेल्वे प्रशासनाला आता या गाडीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जोर आलेला दिसतोय. या गाडीच्या निमित्ताने एका उच्च(?)स्तरीय अभ्यास(?)गटाची स्थापना करण्यात आली. ही गाडी यापुढे चालवू नये असा सल्ला या अभ्यासगटाने आपल्या अहवालात देऊनही टाकला. त्यापुढे जाऊन या गाडीची रचना नव्याने करण्यासाठी आणि त्यानुसार नवा रेल्वेमार्ग बांधण्यासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे लागेल असा सल्ला या दिडशहाण्या अभ्यासगटाने दिला.
संवेदनाशुन्य अधिकारी, स्वत:च्या स्वार्थात मश्गुल असलेले प्रशासन आणि उठसुठ परदेशी सल्लागारांवर अवलंबून रहाण्याची प्रवृत्ती यामुळे आपले किती नुकसान होते आहे हे बघणार कोण?
गंमत बघा.. याच महाराष्ट्राच्या मातीत, कोकणासारख्या दुर्गम भागात, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कोकण रेल्वेचा मार्ग ऊभारणार्या कोकण रेल्वे कॉर्पोरेशनकडे जम्मू-काश्मीरमधील जास्त खडतर परिस्थितीत रेल्वेमार्ग उभारण्याचे काम अतिशय विश्वासाने केंद्र सरकारने दिले आहे. माथेरानच्या रेल्वेमार्गासाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे सहकार्य घ्यावे असे सांगणार्या या दिडशहाण्यांना कोकण रेल्वेचे नाव तरी माहित आहे का हा प्रश्न पडावा.
अर्थात एक गोष्ट सरळपणे दिसतेय ती म्हणजे आता रेल्वेला या मार्गाचे लोढणे आपल्या गळ्यात नकोय. त्यामुळे आता ते पर्यटन विकास महामंडळाच्या गळ्यात टाकण्याचे सूतोवाच काहीजणांकडून सुरुही झाले.
माथेरानच्या राणीला कायमचे बंद करण्याच्या सूचनेत एक मोठी खेळी असण्याचाही संशय घ्यायला जागा आहे. सध्यातरी माथेरानच्या डोंगरावर कॉंक्रिट बांधकामे आली नाहीत. पायथ्याशी नेरळ गावात आणि आसपास बंगले आणि सेकंड होमचा सुळसुळाट झालाय. आता तर दररोज मुंबईला ये-जा करण्यासाठीही नेरळ सोयिस्कर असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत.
मुंबई-पुण्यातल्या मंडळींना आता “सेकंड होम” साठी वेगवेगळ्या ठिकाणांचा पर्याय उपलब्ध झालाय. यातही नेरळ, कर्जत वगैरे परिसरात घरे किंवा बंगले बांधू इच्छिणार्यांची संख्या मोठी आहे. एरवी बाजारात मंदी आल्याची बोंब मारणारे लोक अशी सेकंड होम घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करतात. बिल्डर्सही त्यासाठी मोठ्या प्रमाणावर जाहिराती करतात.
मुंबईत हिरवाई राहिली नाही म्हणून मुंबईबाहेरच्या ठिकाणी ती शोधण्याच्या हव्यासात हा सगळा पसारा मुंबइबाहेर हलतोय. लवकरच तो नेरळ पार करुन वरवर चढायला सुरुवात करेल. या सिमेंटच्या जंगलांनी माथेरानचा श्वास गुदमरायला लागेल. माथेरानच्या या हिरवाईत नवी कॉक्रिट जंगले उभी रहातील.
आत्ताच काही दूरदृष्टीच्या पॉवरबाज नेतेमंडळींनी या डोंगरावरच्या जागा विकत घेऊन ठेवल्या असतील. कुणाला इथे नव्या “लवासा”चा साक्षात्कार होईल. माथेरानच्या डोंगराच्या कुशीत नव्या गृहप्रकल्पांचे प्लॅन बनतील आणि ते पासही होतील. पर्यावरणाचे नियम धुडकावले जातील. कॉक्रिटची जंगले उभी रहातील... त्यात धनिक गुजराती-मारवाडी रहायला येतील... माथेरानचे मूळ रहिवासी त्यांच्याकडे कामाला लागतील....
माथेरानची राणी बंद झाल्यावर रस्ते मोठे करावे लागतील. त्यासाठी नवी कंत्राटे निघतील. त्या रस्त्यावरील वाहतूक वाढेल. नवा रस्ता बनला की टोलची दुकाने सुरु होईल. वाहतूकीची साधने वाढवावी लागतील त्यामुळे टोलची आवक वाढेल.
एक हिलस्टेशन बरबाद झालं तर काय झालं? आमच्या सात पिढ्यांची कमाई तर होईल?
याच विषयावरील “लोकसत्ता”मधील एक लेख वाचा ...
-- निनाद अरविंद प्रधान
• आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं शकत नाहींत.
आज आपण या शिवा काशीदबद्दल थोडासा विचार करूं या. त्यासाठी, आधी पन्हाळगडच्या वेढ्याचा अगदी थोडक्यात आढावा.
• अफझलखानाच्या वधानंतर विजापुर दरबारनें सिद्दी जौहर याला शिवाजीविरुद्ध लढायला धाडलें. सिद्दी किंवा हबशी म्हटले जाणारे हे लोक म्हणजे अबीसीनियन्स (आजचे, इथोपियन्स). जंजीर्याचा सिद्दीही तसाच; आणि, या पन्हाळगडच्या वेढ्याच्या प्रसंगीं शिवाजी राजांकडून ( त्यावेळी ते ‘महाराज’ झालेले नव्हते) लढणारा सिद्दी हिलाल हाही तसाच, हबशी.
सिद्दी जौहर चालून आला त्यावेळी शिवाजी राजे मुद्दाम पन्हाळ्यावर थांबले. ध्यानात घ्या, हा पन्हाळा शिवाजी राजांनी अल्प काळापूर्वीच स्वराज्यात सामील केला होता. याचा अर्थ असा की, या वेळी शिवा काशीद व बाजी प्रभू यांचा शिवाजी राजांशी परिचय होऊन अल्प काळाचाच कालावधी लोटला होता. बाजी प्रभू तरी, बांदलांचे कां होईना, पण सरदार होते. त्यामुळे शिवाजी राजे पन्हाळ्यावर राहिल्यानंतर, बाजींचा शिवाजी राजांशी, अगदी ज़वळचा नसला तरी, खचितच परिचय झालेला होता असणार. पण, शिवा काशीद तर, किल्ल्यावरील ८००० माणसांपैकी एक साधारण माणूस. त्यामुळे, बहुतेक करून, त्याचा शिवाजी राजांशी, आधी (म्हणजे, पन्हाळ्याहून पलायनाचा प्लॅन बनण्याआधी) व्यक्तिगत परिचयही नसणार. शिवाजी राजांसाठी प्राणाची आहुती देणार्या या दोघांच्या संदर्भात ही बाब ध्यानांत ठेवणें आवश्यक आहे ; तरच त्यांच्या प्राणाहुतीचें महत्व ध्यानीं येऊं शकेल.
शिवाजी राजांचा होरा असा होता की, आपण पन्हाळ्यावर थांबल्यानें सिद्दी जौहर पन्हाळ्याजवळच, म्हणजेच स्वराज्याच्या अगदी कडेलाच थांबेल. जौहरनें पन्हाळ्याला वेढा दिला. पावसाळा ज़वळ आलेला होता. शिवाजी राजांचा कयास होता की, पावसाळा सुरूं झाला की जौहर वेढा उठवून चालता होईल. पण तसें झालें नाहीं. वेढा सुरूंच राहिला. अखेरीस, राजांनी निर्णय घेतला की जौहरला गाफील बनवून आपण स्वत: विशाळगडावर पलायन करायचें. त्याप्रमाणें, त्यांनी जौहरशी तहाची बोलणी सुरूं केली.अमुक अमुक दिवशीं राजांनी जौहरच्या छावणीत येऊन त्याला भेटायचें, असें दोन्ही बाजूंच्या चर्चेत ठरलें. त्यामुळे जौहर व त्याची फौज बेसावध झाली. त्याचा फायदा घेऊन, त्या ‘ठरलेल्या’ दिवसाच्या आदल्याच रात्रीं, अगदी अंधारात, थोड्याशा माणसांना बरोबर घेऊन, राजांनी विशाळगडाकडे लपूनछपून प्रयाण केलें. त्यावेळी, त्यांच्या रक्षणाची जबाबदारी बांदलांकडे होती. बाजी प्रभू देशपांडे हे बांदलांचे सरदार असल्याकारणानें शिवाजी राजांच्या बरोबरच होते. सिद्धी जौहरचा वेढा अगदी ‘घट्ट’ होता ; त्यामुळे, त्याच्या माणसांना आपल्या पलायनाचें वृत्त कळूं शकेल, आणि तसें झाल्यास ते आपला पाठलाग करतीलच; म्हणून त्यांची दिशाभूल करायला शिवाजी राजांनी ‘शिवा काशीद’ याला बरोबर घेतले होते. बाजी प्रभू व बांदलांच्या मावळ्यांबरोबर शिवाजी राजे वेगळ्या वाटेनें (जंगलातून) पुढे गेले ; आणि शिवा काशीद एका पालखीत बसून , शिवाजी राजांसारखाच पोषाख करून, अन्य थोड्याशा मावळ्यांसोबत, दुसर्या वाटेनें (मलकापुरकडे जाणार्या हमरस्यानें ) पुढे गेला. ती पालखी जौहरच्या जावयाच्या सैनिकांनी पकडली, व आपण खर्या शिवाजीलाच पकडलें असें समजून ते शिवा काशीदला जौहरकडे घेऊन गेले. तिथें उलगडा झाला की हा तर खरा शिवाजी नाहींच. जौहरनें शिवा-काशिदला ठार मारायाचा हुकूम दिला, आणि तो लागलीच अमलात आणला गेला. पण, या सगळ्या ‘डायव्हरशन’मुळे, शिवाजी राजांना विशाळगडाकडे पोचण्यासाठी अमूल्य वेळ मिळाला. शिवा काशीदचें बलिदान असें कामाला आलें.
• हा शिवा काशीद कोण होता ? त्याबद्दल विविध पुस्तकांमध्ये एवढाच उल्लेख आढळतो की तो एक न्हावी होता, व तो शिवाजी राजांसारखा दिसत होता. ( त्याबद्दल आपण पुढे चर्चा करणारच आहोत) .
या ‘शिवा काशीद’मधील ‘काशीद’ म्हणजे काय ? तें त्याचें आडनांव होतें काय ? आज ‘काशीद’ हें आडनांव महाराष्ट्रात आढळते खरें ; पण काशीद हा शब्द मराठी वाटत नाहीं. शिवकाळात व मराठेशाहीत , आदिलशाही इत्यादींच्या राजकारणात फारसी भाषा चालत असे, व आजूबाजूच्या मिश्र समाजात ‘दखनी हिंदी’ चालत असे. दखनी हिंदी म्हणजेच, फारसी व मराठीचें मिश्रण, ज्यात दक्षिणेतील तेलगू, कन्नड या भाषांचे शब्दही आहेत.
या पार्श्वभूमीमुळे मी असा विचार केला की, काशीद या नांवाचें मूळ फारसीत सापडूं शकेल. (मला उर्दू-फारसीतील ‘क़ासिद’ हा शब्दही परिचित होता ) . त्या अनुषंगानें, आतां आपण ‘शिवा काशीद’ या नांवामध्ये ज़रा खोलात ज़ाऊन पाहूं या.
• फारसीत ‘काशीद’ या शब्दासारखे दोन शब्द आहेत. एक आहे, वर उल्लेखलेला ‘क़ासिद’ हा शब्द. क़ासिद या शब्दाचा अर्थ होतो, ‘पत्रवाहक, संदेशवाहक, दूत’. हा शिवा काशीद, जौहरसाठी ‘दिशाभूल करणारा संदेश’ (की, ‘हाच खरा शिवाजी आहे’) घेऊन जाणारा, एकतर्हेचा ‘दूत’च होता. म्हणून त्याला ‘काशीद’ म्हटलें असावें काय ? शक्य आहे. पण, या निष्कर्षाला अंतिमत: येण्यापूर्वी, आपण ‘काशीद’सारख्याच फारसीतील दुसर्या शब्दाकडेही पाहूं या. हा शब्द आहे ‘कासिद’ .
( ध्यानात घ्या, ‘क़ासिद’ हा शब्द वेगळा व ‘कासिद’ हा वेगळा. फारसीत ‘क़’ आणि ‘क’ या भिन्न उच्चारांसाठी ‘क़ाफ’ आणि ‘काफ’ ही भिन्न अक्षरें आहेत. हिंदीतही ‘नुक़ता’ देऊन हा फरक दाखवता येतो. पण, मराठीत नुक़त्याची पद्धत नसल्यानें , हा फरक स्पष्ट करून सांगणें मला उचित वाटलें).
कासिद या फारसी शब्दाचा अर्थ आहे, ‘ खोटा, नकली’. आणि, हा अर्थ पाहिल्यानंतर, लागलीच आपल्याला ‘शिवा काशीद’ या नांवाचा अर्थ स्पष्ट कळतो. ‘कासिद’ या फारसी शब्दाचें मराठीत झालें ‘काशिद, किंवा काशीद’. म्हणजेंच, ‘शिवा काशीद’ याचा अर्थ होतो ‘ नकली शिवा ’. अर्थातच, त्याला ‘शिवा काशीद’ हें नांव शिवबांनी दिलेलें नसणार ; तर, ‘सिवा कासिद (नकली शिवा) हा उल्लेख, विजापुरच्या सैन्याकडून, कदाचित स्वत: सिद्दी जौहरकडूनसुद्धा , झालेला होता असणार. मग, तेंच नांव इतिहासाकालीन पोवाड्यांमध्ये, व कथाकहाण्यांमध्ये रूढ झालें.
• या ‘शिवा काशीद’ चें खरें नांवही ‘शिवा’च होतें, ही कविकल्पनाच. त्याचें खरें नांव इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त झालेलें आहे. हा ‘शिवा काशीद’ अगदी शिवबांसारखाच दिसत’असे , हें वर्णन तर नक्कीच ‘फक्त एक कविकल्पना’ आहे.
एका टी.व्ही. सीरियलमध्ये तर दाखवलें होतें की शिवा काशीद हा, शिवाजी राजे यांच्यासाखाच पोषाख करून हिंडत असे. हीसुद्धां कविकल्पनाच. पूर्वी राजेलोक आपल्यासारखा दिसणारा ‘डुप्लिकेट’ ठेवत असत, ती गोष्ट वेगळी. त्यासाठी अर्थातच, ‘राजमान्यता’च असे. एक तर शिवा काशीदसारख्या सामान्य माणसाला राजांसारखा भरजरी पोषाख बनवून घेणें परवडलेंच नसतें. आणि, त्यातून, त्यानें स्वत:होऊन, राजाज्ञेशिवाय असा पोषाख केलाच , तर त्याला निश्चितच सज़ा झाली असती (अगदी मृत्यूदंडसुद्धा) . शिवाजी राजे तर या बाबतीत, ( डुप्लिकेटच्या बाबतीत) खचितच फार जागृत असणार.
मात्र, ‘शिवा काशीद’ याची उंची व बांधा आणि वय हे, साधारणपणें शिवबांसारखेच असणार, हें उघड आहे. शिवाजी राजांनी कांहीं काळ आधीपासूनच पलायनाची तयारी ठेवलेली होती; म्हणून त्याप्रमाणें, शिवा काशीदला शिवबांसाख्या दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असेल. किंवा, त्याकाळी, बरेच लोक दाढीमिशा ठेवीत, त्याप्राणें या शिवा काशीदला आधीपासूनच दाढीमिशा असतील, व त्या फक्त ‘शेऽप’ (shape) करून शिबवांसारख्या बनवल्या गेल्या असतील . जर शिवा काशीद खरोखरच न्हावी असेल, तर, हें दाढीमिशांना ‘शेऽप’ ( shape) देण्याचें काम त्यानें स्वत:च केलें असूं शकेल.
आणखी पुढें जाऊन, मला असें वाटतें की, शिवा काशीदला शिवाजी राजांसारख्याच , किंवा त्यांसारख्या shape करतां येण्याजोग्या, दाढीमिशा असण्याची शक्यता कमीच आहे . समजा, त्याला आधीच दाढीमिशा वाढवायला सांगितलें गेलें असलें, तरीही, उपलब्ध वेळेत, त्याच्या दाढीमिशा शिवाजी राजांएवढ्या वाढतील याची शाश्वती काय ? उपलब्ध काळ हें एक महत्वाचें factor आहे. तें अशासाठी की, आधी शिवाजी राजांना वाटत होतें की पावासाळा सुरूं होऊन, मुसळधार पाऊस पडायला लागल्यानंतर विजापुरच्या फौजा वेढा उठवून परत जातील. पण, पावसातही, वेढा न उठवतां, उलट तो अधिकच आवळून, सिद्दी जौहरनें शिवाजी राजांचा होरा चूक ठरवला. त्यानंतरच राजांनी विशाळगडाला पलायन करण्याचा बेत रचला असणार. म्हणजेच, असा बेत ठरवण्याच्या वेळेपासून ते प्रत्यक्ष पलायन करेपर्यंत, मध्ये फारसे दिचस गेलेले नसणार ; आणि एवढा कमी काळ दाढीमिशा व्यवस्थित वाढवायला पुरेसा नाहीं. पण, मुद्दा असा की, शिवा काशीदनें शिवाजी राजांसारख्या दाढीमिशा वाढवायची गरजच काय ? त्याला तशा नकली दाढीमिशा लावतां येऊं शकत होत्या ; आणि अंधारात, त्या खोट्या आहेत हें लगेच कळलेंही नसतें. असा नकली दाढीमिशा फक्त नाटकांतच वापरल्या जाऊं शकतात असें नव्हे. शिवाजीचा गुप्तहेरप्रमुख बहिर्जी हा रूप पालटून हिंडत असे. तो बैरागी, साधू अशी रूपेंही घेतच असणार. अशा लोकांवर तर इतर जन हेरगिरीचा संशयही घेणार नव्हते. या रूपांसाठी बहिर्जी, नकली दाढीमिशा वापरतच असणार. बहुतेक करून, तशा प्रकारच्या खोट्या दाढीमिशा, पलायनाच्या वेळीं शिवा काशीदला लावल्या गेल्या असाव्यात.
तें कांहींही असो ; पण, दाढीमिशा घातलेला, पालखीत बसलेला, शिवाजी राजांप्रमाणें कपडे घातलेला, सोबत रक्षणासाठी पांच-पन्नास मावळे असलेला, हा ‘ शिवा काशीद’ जेव्हां सिद्धी जौहरच्या माणसांना ‘सापडला’ ( ज्याला शोधायला व पकडायलाच तर ते बाहेर पडले होते) , तेव्हां, खास करून रात्रीच्या अंधारात, तो खरा शिवाजी राजाच आहे, असें त्यांना वाटणें साहजिक होतें. आणि, तशीच त्यांची एक्सपेक्टेशन होतीच, त्यामुळे, पकडल्या जागीं अधिक शहानिशा न करतां त्यांनी शिवा काशीदला नेऊन, सिद्दी जौहरच्या पुढे हज़र केलें . (शत्रूला चकवण्यासाठी इतका डीटेल्ड् प्लॅन बनवणारे, व शत्रूच्या मानसशास्त्राची पूर्ण कल्पना असणारे, अशा शिवाजी महाराजांना शतश: प्रणाम).
• मला स्वत:ला, शिवा काशीद हा खरोखरच न्हावी होता काय, याबद्दलही संशय आहे. मला असें वाटतें की, जसें या ‘नकली’ शिवाला आदिलशाही लोकांनी ‘शिवा कासिद’ असें म्हटलें , त्याचप्रमाणें, त्याचें ‘न्हावी’ असें नामाभिधान आपल्या मराठ्यांनीच केलेलें असूं शकेल. (लक्षात असूं द्या, त्याकाळीं ‘न्हावी’ असा उल्लेख करणें हें अपमानास्पद समजलें जात नसे) .
आपण जेव्हां एखादा ‘सीक्रेट प्लॅन’ करतो, त्यावेळी इतरांना त्याचा सुगावा लागूं नये म्हणून आपण ‘कोड् वर्डस्’ वापरतो. शिवाजी राजांच्या पन्हाळगड ते विशाळगड या ‘पलायनाच्या बेता’साठीही एखादा ‘कूट शब्द’ असेल, आणि त्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणार्या ‘काशीद’ या व्यक्तीसाठी ‘न्हावी’ असा ‘गुप्त शब्द’ वापरला जाऊं शकतो. ‘न्हावी’ हा शब्द कां निवडला असेल ? तर, तो सिद्दी जौहरची ‘बिनपाण्यानें हजामत’ करणार आहे ( फजिती करणार आहे) , म्हणून. ‘न्हावी अमुक रस्यानें जाईल’ असा उल्लेख कुणी जरी ऐकला तरी, त्या त्रयस्थाला, (किंवा कुणी एखादा फितूर असलाच, तर त्याला ) काय कळणार आहे ? शिवाजी राजांची कार्यपद्धती, व सावधपणा, पाहतां, हेंच योग्य वाटतें.
• आपल्या सर्वांना बाजीं प्रभूच्या पावनखिंडीतील लढ्याची ब बलिदानाची माहिती आहेच. त्यांच्या बलिदानाचें महत्व यत्किंचितही कमी न लेखतां, आपण शिवा काशीदच्या बलिदानालाही महत्व दिलें पाहिजे. अशा ‘अनाम’, (किंवा ‘कोड् नेऽम’ असल्यामुळे ज्यांचें खरें नांव माहीत नाहीं, अशा ) अनेकांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, त्या पायावरच तर स्वराज्य उभें राहिले. लक्षात घ्या, केवळ कांहीं महिन्यांपूर्वीच ज्या शिवाजी राजांशी त्यांचा प्रत्यक्ष परिचय झालेला होता, ( परंतु, ज्या शिवबांच्या महद्.कार्याची त्यांना आधीपासून माहिती होती असणार), त्या शिवाजी राजांसाठी , व त्याच्या महत्तापूर्ण हेतूच्या पूर्तीसाठी, बाजी प्रभू या शूर सरदारानें आणि ‘शिवा काशीद’ या अगदी सर्वसाधारण माणसानें आपापली अत्यधिक-महत्वाची भूमिका पार पाडली , आपण आपले प्राण गमावणार हें आधीच ठाऊक असूनही ! अशा साधारण-असाधारण व्यक्तींना माझा सलाम.
- - -
१३.०७.२०१६
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..?????
प्रतापगडाच्या पायथ्याशी "पार्वतीपुर" नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे "पार"असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे.
८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा.
कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ मीटर लांब,८ मीटर रुंद असा भक्कम दगडी पुल निर्माण केलेला आहे.पुलाला असणाऱ्या पाच अधारांवर पुलाच्या चार कमानी तयार झाल्या आहेत, त्याची उंची जास्तीत जास्त पंधरा मीटर भरते. पाण्याच्या उगमाकडून येणाऱ्या जोरदार प्रवाहाने पुलाच्या कमानींना धोका पोहचु नये म्हणून कमानी मधील खांबांना काटकोन तिरका आकार दुभागतो. हे सारेच बांधकाम चुन्यात केलेले आहे.
सुमारे साडेतीनशेवर्षां नंतरही हा पुल अद्यापही एकही चिरा न ढासळता शाबूत आहे, दगडांच्या फटीमध्ये साधे झाडही उगवलेले नाही पुलाच्या दोन्ही बाजूंना हातभर उंचीचा ३० सेमी / १ फूटी दगडी कठडा आहे.
पाण्याचा प्रवाहाचा तडाखा सोसत, पाणी झिरपण्याच्या धोक्यावर मात करत, काही शतके देखभाल न करावी लागणं हेच त्या भक्कम बांधकामाचे वैशिष्ट्य आहे.
मराठीतील अक्षरचिन्हे, स्वरमाला आणि व्यंजनमालेविषयी एक विवेचन....
पारंपारिक वर्णमाला : स्वरमाला आणि व्यंजनमाला
पारंपारिक स्वरमाला :
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं (अुच्चार...अनुस्वार) अ: (विसर्ग, नेहमीचा सामान्य अुच्चार.... अहा..), ऋ (र्हस्व आणि दीर्घ. दीर्घ ऋ संगणकावर मला टाअीप करता आला नाही), लृ (र्हस्व आणि दीर्घ) असे अेकूण १६ स्वर आहेत.
पारंपारिक व्यंजनमाला :
कंठ्य (Guttural) :: क ख ग घ ङ
तालव्य (Palatal) :: च छ ज झ ञ
मूर्धन्य (Retroflex) :: ट ठ ड ढ ण
दंत्य (Dental) :: त थ द ध न
ओष्ठ्य (Labial) :: प फ ब भ म
य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ
असे अेकूण 35 व्यंजनं आणि 16 स्वर म्हणजे 51 वर्ण आणि ॐ हे अक्षर घेतले तर 52 वर्ण होतात.
य र ल व श स ह ळ क्ष ज्ञ या व्यंजनांचंही वर्गीकरण केलं आहे. ह (कंठ्य), य आणि श (तालव्य. खरं म्हणजे य आणि श हे अुच्चार थोडे भिन्न आहेत.), र आणि ष (मूर्धन्य), ल आणि स (दंत्य), व (ओष्ठ्य).
ळ, क्ष आणि ज्ञ हे वर्ण आगळेवेगळेच आहेत. संस्कृतात ळ नाही. भगवदगीतेच्या 18 अध्यायांच्या 700 श्लोकात ळ अेकदाही आला नाही. क्ष हा वर्ण क् श् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे तर ज्ञ हा वर्ण ...द् न् आणि अ किंवा य यांचं मिश्रण आहे. लंगडा श् आणि र हे जोडाक्षर लिहीणं जरा कठीणंच होतं म्हणून श्र हा वर्ण घडविणार्या व्यक्तीच्या प्रतिभेला माझे शतश: प्रणाम. श्र हा वर्णदेखील क्ष आणि ज्ञ सारखा स्वतंत्र समजायला हवा.
अ आ इ ई उ ऊ ऋ ए अॅ ऐ ओ ऑ औ ही स्वरमाला, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागानं, 6 नोव्हेंबर 2009 रोजी काढलेल्या अध्यादेशानं प्रमाण झाली. याचा सरळ सरळ अर्थ म्हणजे, सुमारे 200 वर्षानंतर, अॅ आणि ऑ हे स्वर स्वीकारले गेले. 200 वर्षानंतरच हे स्वर शुध्द झाले, तोपर्यंत ते अशुध्द समजले गेले.
आज आपल्या समाजाची अशी अवस्था झाली आहे की, सरकारी कायदा, अध्यादेश...फतवा काढल्याशिवाय, आपण अु्क्रांत बदल स्विकारीत नाही. काही प्रस्ताव, सरकार दरबारी वर्षानुवर्षे कायदा होण्याच्या प्रतिक्षेत खितपत पडलेले असतात. परंतू काही विलक्षण घटना घडली की अेका दिवसातच, त्या प्रस्तावाचं कायद्यात रुपांतर होतं. बव्हंशी हे कायदे कागदावरच राहतात. जनताजनार्दन जेव्हा हे बदल अुस्फुर्तपणे स्वीकारतो तेव्हाच तो खराखुरा बदल असतो.
ज्ञानेश्वर माअुलींनी, सुमारे 700 वर्षापूर्वी ‘भावार्थ दीपिका’ हा, भगवदगीतेवरील निरूपणाचा ग्रंथ लिहीला. या ग्रंथालाच, आज आपण ‘ज्ञानेश्वरी’ म्हणतो. त्यांची मराठी ही त्या काळाची अती शुध्द प्रासादिक मराठी समजतो. त्या मराठीबद्दल आपल्याला आदरही आहे. भाषेची अुत्क्रांती हे वास्तव आहे. त्यानुसार ज्ञानेश्वरी मराठी आता कालबाह्य झाली आहे. हे वास्तव आपण स्वीकारायलाच हवं. हा बदल नैसर्गिकरित्या हळूहळू अुस्फुर्तपणे झालेला आहे. मराठी भाषेची अुत्क्रांती आजही होते आहे.
थोडक्यात म्हणजे अ ची पुढीलप्रमाणे बाराखडी ::: अ अॅ आ ऑ अि अी अु अू अे अै ओ औ आणि मागील लेखात सुचविलेली व्यंजनमाला, जनताजनार्दनानं स्वीकारण्यासाठी सरकारी फतव्याची गरज नसावी.
-- गजानन वामनाचार्य
बुधवार, २६ नोव्हेंबर २०१४
• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल.
• सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं ठेवला. त्या वेढ्यातून सुटका करून घेण्यांसाठी शिवरायांनी एक धाडशी बेत आखला, आणि तो म्हणजे, जौहरला गाफील करून विशाळगडावर पलायन करायचें. शिवाजी राजांतर्फे जौहरशी तहाशी बोलणी केली गेली, आणि अमुक अमुक दिवशीं शिवराय जौहरच्या भेटीला जाणार असें ठरलें. जौहर व त्याची विजापुरी छावणी आनंदून गेली, वेढा कांहींसा ढिला पडला. ठरलेल्या त्या दिवसाच्या आदल्या रात्रींच शिवरायांनी मोजक्या लोकांसह जौहरच्या वेढ्यातून पलायन केलें, परंतु जौहरच्या माणसांना त्याचा पत्ता लागलाच. जौहरनें आपला जावई सिद्दी मसूद याला शिवबांच्या मागावर धाडलें. त्याला चकमा देण्यासाठी ‘शिवा काशीद’ याचा उपयोग करून शिवरायांनी अमूल्य वेळ प्राप्त करून घेतला.
( शिवा काशीद याच्यावरील माझा वेगळा, संशोधनात्मक, लेख, या वेबसाईटवर पहावा ).
जाणुनबुजून शिवरायांनी विशाळगडला जाण्यासाठी जंगलातला आडरस्ता धरला होता. हेतू हा की, आपला पाठलाग करणें जौहरच्या माणसांना कठीण जाईल, व तें सैन्य पाठीवर आलेंच, तर त्या जंगलच्या मुलुखात त्यांच्याशी चकमक करून पुढें पळणें आपल्याला सोपें जाईल. आषाढाचा पावसाळी महिना, सर्वत्र रपरप चिखल, जंगलच्या वाटा, रात्रीचा मिट्ट काळोख. शिवराय पालखीत होते, पण बरोबरचे मावळे पायीं होते, कारण जौहरच्या वेढ्यातून पायींच पळतां येणें शक्य होतें, घोड्यावरून नव्हे. वाटाडे भले वाट दाखवायला असतील, पण तो धावत-धावत-प्रवास तर सोबतीच्या ६०० मावळ्यांना पायींच करायचा होता. त्या दौडीत, पायीं दौडत असतांना, शिबरायांच्या संरक्षणाची जबाबदारी बांदलांवर होती. बाजी प्रभू देशपांडा हा पठ्ठ्या गडी बांदलांचा सरदार होता.
देशपांडे असा उल्लेख न होतां, त्या काळीं ‘देशपांडा’ असा उल्लेख होत असे. अशी इतर उदाहरणेंही पहातां येतील. जसें की, चाकणचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा (नरसाळे) . खुद्द शिवाजी राजांचा उल्लेख ‘शिवाजी भोसला’ असा विजापुरी सरदार करत असल्यास, त्यात कांहीं नवल नव्हे. अशा तर्हेचा उल्लेख अगदी हल्लीहल्लीपर्यंत केला गेलेला मी स्वत: पाहिलेला आहे. खुद्द माझे सासरे ‘गडबोला आला होता’ अशा प्रकारचे उल्लेख करीत. ही २५-३० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आणि अशा एकेरी उल्लेखात (जसें, गोडबोले याच्या ऐवजी गडबोला) कुणाला कमी लेखायचें असा कांहींही प्रकार नसे, तर ती बोलायची पद्धतच होती.
शिवरायांसह मावळे जंगलवाटेनें पायीं दौडत होते, तर सिद्धी मसूद व त्याचे ३०००-५००० सैनिक हमरस्यानें घोड्यावरून दौडत होते.
पावसात चिखल तुडवत, पूर्ण रात्रभर पन्हाळगड ते विशाळगड-पायथ्यापर्यंत धावल्यानंतर, पहाट होण्याच्या सुमाराला, शत्रू जवळ आला असें पाहून, शिवराय ३०० मावळ्यांसह पुढे विशाळगडाकडे धावले; अन् बाजी प्रभू , घोडखिंडीत, फक्त ३०० मावळ्यांसह, सिद्दी जौहरच्या ३०००-५००० सैनिकांना तोंड द्यायला, अडवून धरायला थांबले. खिंडीत कां, तर तिथें शत्रूच्या अगदी थोड्याच माणसांना पुढें सरकतां येणार होते, आणि तेंही पायी, घोड्यांवरून नव्हे. त्यामुळे बाजींना , आपल्या दसपटीहून जास्त शत्रूसैन्याला, लहान लहान तुकड्यांशी लढत, थोपवून धरणें, कांहींसें सोपें होतें. अर्थात्, काम तसें सोपें नव्हतेंच. पन्हाळगडाहून, रात्रीं अंधार झाल्यावर, वेढ्यातील जौहरचे सैनिक झोपल्यानंतर, म्हणजे मध्यरात्रीच्या आगेमागे, ११-१२ च्या सुमारास, हे मावळे पळाले असतील. म्हणजे घोडखिंड येईतो, त्यांचें, ५-६ तास पळणें झालेलें होते. एवढें जंगलवाटेनें अंधारात व चिखलात पळणें, परत शत्रूच्या भीतीचें टेन्शन, या शारीरिक व मानसिक ताणानें, तोंवरच ही माणूसें थकून गेलेली असतील. आणि, खरी परीक्षा तर पुढेंच होती. किती तास असें लढायचें ?
त्यापुढील शिवरायांचेंही काम सोपें नव्हतेंच. केवळ ३०० मावळ्यांसह त्यांना विशाळगड नुसता चढायचा नव्हता, तर तेथील शत्रूशी लढत लढत त्यांना पुढे ज़ायचें होतें ; कारण विशाळगडालाही वेढा पडलेला होता , जौहरनें फास अगदी व्यवस्थित आवळलेला होता.
लढत लढत विशाळगडाभोवतीच्या वेढ्यातून शिवाजी राजांनी मुसंडी मारली व ते गडावर धावले. गडावर पोचेपर्यंत मध्यान्ह झालेली होती. पहाटेपासून ते मध्यान्हीपर्यंत, म्हणजे किमान सातएक तास तरी, बाजींनी व त्यांच्या मावळ्यांनी शत्रूसैन्याला थोपवून धरले. कमाल आहे ! आधीचें ५-६ तास जंगलातून धावणें, आणि त्यानंतर, दसपट शत्रूला सातएक तास सक्सेसफुली थोपवून धरणें, हें ‘खायचें काम नव्हे’. त्यासाठी बाजींचेंच नव्हे, तर त्यांच्याबरोबरच्या सगळ्याच मावळ्यांच्या शारीरिक क्षमतेचें अन् प्रबळ इच्छाशक्तीचें कौतुक करावें तेवढें थोडेंच आहे ! राजे गडावर पोचून तोफांचे आवाज झाले, ते ऐकूं आल्यानंतरच बाजींनी प्राण सोडला, असें म्हटलें जातें. तें कितपत खरें आहे, कल्पना नाहीं. मात्र, इच्छाशक्तीनें आपला प्राण कांहीं काळ रोखून धरला, अशी साध्यासाध्या माणसांचीही उदाहरणें दिसून येतात, त्यामुळे, बाजींनी तसें केलें असल्यास नवल नव्हे. पण, बाजी स्वत: कधी पडले, व किती काळ त्यांनी प्राण रोखून धरला, याहीपेक्षा अधिक महत्वाची आहे त्यांची व त्याच्या अनामिक सहकार्यांची कामगिरी ! आपल्याला मृत्यू येणारच हें आधीपासूनच ठाऊक असूनही ते लढले; आणि आपल्याला मिळालेली कामगिरी त्यांनी फत्ते केली. अशा प्रसिद्ध-अप्रसिद्ध लोकांनी रचलेल्या पायावरच आज आपण सारे अभिमानानें उभे आहोत !
• या अनुषंगानें, मला बाजी प्रभूंवर कविवर्य कुसुमाग्रज यांची, ‘संपेल कधी रण प्रभो तरी । मी कुठवर साहूं घाव शिरीं ।’ ही अत्युत्कृष्ट व सुप्रसिद्ध कविता आठवते. लता मंगेशकरांनी ती गाइलीही आहे अशा उत्कटतेनें, की ती ऐकून आपण विव्हल होऊन जातो. तोफांचे आवाज येईतों बाजी लढले, व आवाज आल्यानंतरच त्यांनी प्राण सोडला, या आख्यायिकेवरच ही कविता आधारलेली आहे.
मात्र, कुसुमाग्रजांबद्दल पूर्ण आदर बाळगूनही, त्यांनी या कवितेत रंगवलेला बाजी प्रभूंचा मनोव्यापार मला पटायला कठीण जातो. ‘लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा न मरो’ असें ठामपणें म्हणून त्यांनी शिवरायांना पुढे गडावर जाण्यासाठी प्रवृत्त केले, व नंतरच्या लढाईत ते स्वत: अतिशय घायाळ होऊनही, अखेरच्या श्वासापर्यंत लढतच राहिले. असे बाजी प्रभू , एक तर , ‘संपेल कधी रण ?’ असा आकुल विचार करतील कां ; आणि दुसरें म्हणजे, हातघाईच्या लढाईच्या धुमश्चक्रीत, त्यांना, तलवार-ढालीव्यतिरिक्त, ‘संपेल कधी रण’ हाच काय पण कुठलाही अन्य विचार करायला निमिषाचीही फुर्सत तरी मिळूं शकली असेल काय ? हां, ‘तोफांचे आवाज येईतों लढत रहा, शत्रूला रोखून धरा, जीव गेला तरी बेहत्तर’ असा संदेश त्यांनी जोशानें लढाईपूर्वी आपल्या साथीदारांना ज़रूर दिला असेल.
पावनखिंडीतल्या लढाईचें विस्तृत वर्णन आपल्यापुढे नाहीं, पण एक अन्य लडाईचें तर निश्चितच आहे. ती म्हणजे जानेवारी १७६१ ची, ( म्हणजे पावनखिंडीच्या १०० वर्षें नंतर झालेली ) , मराठे व अब्दाली यांच्यात झालेली पनिपतची तिसरी लढाई. तिचें वर्णन मराठी बखरीमध्ये आहेच, पण तें किती विश्वसनीय आहे, त्याबद्दल शंका आहे. मात्र, फारसी साधनांमध्येही त्या घटनांचें वर्णन आहे. काशीराज या, लखनौच्या शुजाच्या पदरीं असलेल्या मराठी माणसानें फारसीत लिहिलेलें पुस्तक कदाचित् जास्त विश्वसनीय आहे. तें असो-नसो. पण त्या लढाईत सदाशिवराव भाऊ व पेशव्यांची हुजरात हे लोक गिलच्यांशी लढता असतांना काय झालें, तें विचारणीय आहे. कापाकापी सुरूं होती. एका वीर पुरुषाला चार-पांच गिलच्यांनी घेरले होतें तो दात आवळून त्यांच्याशी लढत होता, ते अर्थातच त्याला ओळखत नव्हते, पण त्याचे उंची कपडे पाहून, हा कुणीतरी मोठा सरदार असावा, असें त्यांना वाटलें. याला जिवंत पकडलें तर आपल्याला बक्षिशी मिळेल, असें त्यांना नक्कीच वाटलें असणार. ‘तुम कौन हो’ असें ते लढतांनाच विचारत राहिले, पण त्यानें उत्तर दिलें नाहीं, तो लढतच राहिला. अखेरीस लढता लढताच त्याचा अंत झाला. फार नंतर समजलें की तो सदाशिवराव भाऊ होता.
वीर पुरुष तलवार-ढाल, तलवार-ढाल असे करत करत लढतच असतात, त्यांना शत्रूला उत्तर द्यायला किंवा तोफांच्या आवाजाची वाट पहात, ‘संपेल कधी रण’ असा व्याकुळ विचार करायला फुर्सतही नसते, आणि तशी त्यांची मनोधारणाही नसते.
• अर्थात्, या चर्चेमुळे, कुसुमाग्रजांच्या कवितेचें, एक साहित्यकृती म्हणून मूल्य अजिबात कमी होत नाहीं.
तसेंच, त्या कवितेत वर्णलेले विचार खरोखर बाजी प्रभूंच्या मनात आले असोत वा नसोत, त्यामुळें त्यांच्या कार्याचें महत्व तिळमात्र कमी होत नाहीं. त्यांच्यापासून स्फूर्ती घेणें, एवढें तर आपल्याला नक्कीच शक्य आहे, आणि तें आपण केलेंच पाहिजे .
- - -
१३.०७.२०१६
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz(W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
दिवसभराचे कामकाज आटोपून आपल्या घरी निघालेल्या एका मध्यमवर्गीय पांढरपेशा वैदर्भीय कर्मचाऱ्याला मी विचारले
– ‘विदर्भाचे स्वतंत्र राज्य व्हायला पाहिजे का?’
एखादा मनोरुग्ण भेटावा अशा तऱ्हेने माझ्याकडे बघत तो म्हणाला
‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ? महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झाला तर नक्की कोणाचे भले होणार भाऊ? केवळ कागदोपत्रीच असणाऱ्या रस्त्यांचे की अस्तित्वात असलेल्या रस्त्यांमधील लोणार सरोवराच्या आकाराशी स्पर्धा करणाऱ्या खड्ड्यांचे? ग्रामीण भागातील जीवघेण्या पाणी टंचाईने हैराण झालेल्या जनतेचे की कर्जाच्या वरवंट्याखाली चिरडल्या जाणाऱ्या शेतकऱ्यांचे? ग्रामपंचायतीपासून तर महाराष्ट्राच्या उपराजधानीपर्यंत बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचे, की त्याला सक्रीय मदत करणाऱ्या पुढाऱ्यांचे? माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाला वेगळ्या विदर्भाशी काहीही देणेघेणे नाही. माझ्यासारख्या असंख्य वैदर्भीयांचे दैनंदिन जीवन सुसह्य व्हावे एवढीच माझी राज्यकर्त्यांकडून माफक अपेक्षा आहे.’’
असं म्हणून काही क्षणातच तो आपल्या घराकडे चालता झाला. त्याने माझ्यावर केलेल्या प्रश्नांच्या भडिमारामुळे मी अंतर्मुख होऊन स्वतःलाच प्रश्न विचारला
‘विदर्भ खरंच स्वतंत्र झाला तर त्यामुळे नक्की कोणाचे भले होईल?’
विदर्भातील जनतेच्या मतांचा अत्यंत प्रामाणिकपणे कौल घेतला तर वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी नाही हे स्पष्ट होईल. असं असताना ‘स्वतंत्र विदर्भ’ ही नक्की कोणाची व कशासाठी मागणी आहे? या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे ही जनतेची नाही तर पराकोटीच्या लोभी, स्वार्थी व अत्यंत सत्तापिपासू नेत्यांची मागणी आहे. वैदर्भीय जनतेच्या दुर्दैवाने महाराष्ट्रापासून विदर्भ जर वेगळा झालाच तर त्याचे काय भवितव्य असेल याची ही छोटीशी झलक.
१. श्रेय घेण्याच्या वादातून मिहान प्रकल्पाच्या प्रगतीत खीळ घालण्यासाठी अहमहमिकेने भांडणारे कर्तृत्वशून्य नेते विदर्भातील एकही प्रकल्प यशस्वी होऊ देणार नाहीत.
२. विदर्भातील गरीब शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपये हडपून साखर कारखाने लिलावात काढणारे दिवाळखोर नेते पुन्हा नविन उत्साहाने साखर कारखाने व सूतगिरण्या उभ्या करून शेतकऱ्यांना पूर्णतः नागवतील व अफाट माया जमवतील.
३. पेन्शनीत निघालेले, अडगळीत पडलेले, व मतदारांनी दूर सारलेले नेते स्वतःची ‘सोय’ लावण्यासाठी राज्यकर्ते बनून वैदर्भीय जनतेच्या उरावर बसतील. अशा नेत्यांना विदर्भाच्या भल्याचे काडीचेही सोयरसूतक नसेल याचा मुद्दाम उल्लेख करण्याची गरज नाहीच!
४. विदर्भातील सर्वसामान्य जनतेला आंदोलने करायला व पोलिसांच्या लाठ्या खायला लावून वेगळ्या विदर्भाचे श्रेय स्वतः लाटत हे लोकप्रतिनिधी राज्य करण्याच्या बहाण्याने अब्जावधी रुपयांचा भ्रष्टाचार करून अफाट संपत्ती गोळा करतील व आधीच अस्तित्वात असलेल्या त्यांच्या साम्राज्याचा मोठ्या प्रमाणात विस्तार करतील.
५. एकूण लोकसंख्येत तब्बल ६५ टक्के वाटा असलेल्या शेतकऱ्यांना वेगळा विदर्भ नव्हे तर सन्मानाचं जीणं हवं आहे याचा स्वार्थी नेत्यांना जेव्हा साक्षात्कार होईल तेव्हा खूप उशीर होऊन गेलेला असेल.
६. ‘एकाही नेत्याला एकही पैसा खर्च करण्याचा अधिकार नाही. स्वतंत्र विदर्भाचा कारभार एखाद्या खाजगी कंपनीसारखा कॉर्पोरेट पद्धतीने चालविल्या जाईल’ असं जर विदर्भातील नेत्यांना स्पष्ट शब्दात बजावलं तर स्वतंत्र विदर्भासाठी अत्यंत उत्साहाने रस्त्यावर उतरणारे हेच अप्पलपोटे नेते सर्व काही विसरून जनतेला विचारतील - ‘‘स्वतंत्र विदर्भ म्हणजे काय रे भाऊ?’’
(शिक्षण,नोकरी,व्यवसाय व समाजकार्याच्या निमित्ताने तब्बल ४५ वर्षे विदर्भात घेतलेल्या अनुभवांवर आधारित.)
श्रीकांत पोहनकर
98226 98100
shrikantpohankar@gmail.com
दरवर्षी महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास वाजणाऱ्या महाराष्ट्र गौरव गीतांमध्ये या गीताचा समावेश असतोच..
बातमी : पारसी समाजात आतां दहनसंस्कार
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती, दि. २५.०६.२०१६.
• कांहीं पारसी ग्रूपस्.नी वरळीला तयार केलेल्या नवीन शवव्यवस्थेद्दलची बातमी, कांहीं दिवसांपूर्वी वाचनात आली. त्यांनी आतां शव-दहनासाठी इलेक्ट्रिक-क्रेमरटोरियम स्थापलें आहे.
• मी यावर धार्मिक दृष्टीकोनातून कांहींही भाष्य करत नाहींये, कारण प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आहे. मी एक प्रकारें सामाजिक दृष्टिकोनातून या गोष्टीकडे पहात आहे.
• अर्थातच, या नवीन व्यवस्थेला बृहन्मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन व सरकारची संमती असणारच, त्याशिवाय हें क्रेमेटोरियम सुरूं झालें नसतें. ऑथॉरिटीज्.ना यासाठी परवानगी द्यायला अडचण येणारच नव्हती, कारण दहन-संस्कार ( हिंदूंमध्ये क होईना, पण ) प्रचलित आहेच, आणि आतां पारंपरिक पद्धतीऐवजी इलेक्ट्रिक-क्रेमरटोरियमचा वापरही अनेकांना जास्त चांगला वाटत आहे.
• पारशांची पारंपरिक पद्धत काय ? ते शवाला त्यांच्या ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये ठेवून देतात. हेतू हा की त्याचा उपयोग scavengers च्या निर्वाहासाठी व्हावा. ( फार पूर्वी कदाचित गांवाबाहेर ठेवत असतील) .
• पारसी धर्म फार जुना आहे. त्याचा संस्थापक झरथ्रुष्ट्र याचा काळ इ.स. पूर्व कांहीं शतकें-सहस्त्रकें आहे. त्याच्या काळात, अशा प्रकारची शव-व्यवस्था खरोखरच स्तुत्य होती , भूतदयेच्या priciple ला धरून होती, मनुष्य-देहाचा सुयोग्य उपयोग व विनियोग मृत्यूनंतरही व्हावा, ही noble भावना, उच्चकोटीची इच्छा त्यामागे होती.
• समाज जेव्हां निसर्गाच्या अधिक जवळ होता, तेव्हांची ही पद्धत आहे , natural balance, निसर्गाचें संतुलन कायम ठेवण्याचा तो एक प्रयत्न समजायला हरकत नाहीं. मानव त्या काळीं, स्वत:ला निसर्गाचा एक भाग मानत असे.
• पारशीधर्मीय आजही तीच पद्धत अवलंबतात.
• अलास्कामधील एस्किमो एकप्रकारें असेच करतात. व्यक्ती अगदी म्हातारी झाली, की ते त्या व्यक्तीला एक आठवडा पुरेल इतकें अन्न देतात , आणि एक छोट्या होडीत घालून सोडून देतात. हेतू असाच, की मृत्यूनंतर त्याच्या देहाचा प्राण्यांना-माशांना उपयोग व्हावा.
• पण बदलत्या काळाबरोबर भोवतालची परिस्थितीही बदलली. पुरातनकालीं जनजीवन खेड्यांमध्ये सामावलेलें होतें. त्याकाळी वर उल्लेखलेल्या व्यवस्थेचें पालन सहज होऊं शकत होतें. आज, म्हणजे त्या काळाच्या अनेकानेक शतक-सहस्त्रकांनंतर, परिसर आणि जनजीवन खूपच बदललें आहे. खेडी-मोठी_ग्रामें-शहरें (Towns)-वाढत्या_आकाराची_शहरें ( towns growing bigger)-महानगरें (metropolis)-mega_cities (महा-महानगरें) असा हा urban प्रवास आहे.
• आज मुंबईसारख्या मेगा-सिटीमध्ये मृतदेहांसाठी scavengers मिळतच नाहींत. मग, शवांची त्यांच्याद्वारें विल्हेवाट लावण्याचें कार्य अधिकाधिक बिकट होत जात असल्यास नवल काय ? त्यामुळे, शव-व्यवस्थापनाचा पुरातन मूळ-हेतू साध्य होणें पारशांना दिवसेदिवस कठीण होत चाललेलें होतें व आहे.
• Traditionalist ना असा बदल मान्य नाहीं (असें वृत्तपत्रात आलेले आहे). याचें प्रमुख कारण म्हणजे, गेली १३ शतकें पारशांनी आपली जुनी परंपरा unchanged पाळूनच तर आपला धर्म जिवंत ठेवला आहे.
• पण , बदलत्या काळाबरोबर कांहीं गोष्टी बदलणें मात्र आवश्यक आहे.आणि, तेंच त्यांच्यामधील एका प्रगतीशील गटानें केले आहे.
• अन्य धर्मांचें पहा. मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माप्रमाणें, शवाला दफन करतात, bury करतात. आज जागेच्या ( स्मशानातील जमिनीच्या ) वाढत्या अडचणींमुळे, shortage मुळे, ख्रिस्ती लोकांना त्यांचे चर्च, coffin ऐवजी shroud मध्ये burial करायची विनंती करत आहे. ( ही बातमीही हल्ली-हल्लीच वृत्तपत्रात आलेली आहे). म्हणजेंच , बदल्या काळाबरोबर बदलण्यांचा त्यांचा विचार आहे.
• हिंदूंना ही जागेची, अथवा scavengers उपलब्ध नसण्याची समस्या भेडसावत नाहीं, कारण दहनाची पद्धत.
• प्रागैतिहासिक काळीं, सर्वत्र शवाला जमिनीखाली मूठमाती देण्याचीच पद्धत होती. पुरातन सिंधु-सरस्वती संस्कृतीच्या स्थळांच्या उत्खननात असे त्याकाळीं पुरलेल्या शवांचे सांगाडे सापडले आहेत. परंतु, नंतर कधीतरी भारतात ही पद्धत बदलली व दहनाची पद्धत सुरूं झाली. महाभारतात उल्लेख आहे की, कुरुक्षेत्राचें युद्ध संपल्यानंतर कुरुवंशीय स्त्रिया रणांगणात आल्या, व त्यांच्या आदेशानुसार, तेथें इतस्तत: विखरलेले रथांचे अवशेष, बाणांचे तुकडे इत्यादी साहित्य गोळा करून मृतांचें दहन केलें गेलें. याचा अर्थ असा की, त्या काळीं दहनाची पद्धत रूढ झालेली होती.
पुरण्यापासून ते दहनापर्यंतचा बदल, हा त्या काळीं फार मोठा, क्रांतिकारी बदल होता.
• पण त्यांतही, हल्ली नवीन काळानुसार कांहीं बदल करणें गरजेचें ठरत आहे. दहनासाठी लाकूड फार खर्च होतें. पुरातनकालीं त्याची अडचण वाटली नाहीं. त्या काळीं वनें-अरण्यें भरपूर होती, त्यामुळे लाकडाच्या कमतरतेचा प्रश्नच नव्हता. उलट, त्या काळीं वनें जाळून ती जमीन वस्तीयोग्य बनवली जात असे; जसें की कृघ्ण व अर्जुन यांनी केलेलें खांडववन-दहन. पुरातन काळातील अशी अन्य उदाहरणेंही आहेत.
आज, लाकडाच्या कमतरतेचा प्रश्न तर आहेच , पण पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही , ( जो आज अति-महत्वाचा आहे ) , शवदहनासाठी लाकूड खर्च करणें योग्य नाहीं. त्यामुळे, इलेक्ट्रिक-क्रेमेटोरियमचाच प्रसार व उपयोगच योग्य आहे, व तो वाढतही आहे. अर्थात्, हें फक्त शहरांमध्येच होत आहे ; खेड्यांमध्ये अजूनही पारंपरिक पद्धतच वापरात आहे. We still have a long long way to go.
• या सर्व पार्श्वभूमीवर, आपण, ( धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे, तर ) , एक सामाजिक बाब म्हणून, शवांचें इलेक्ट्रिक-क्रेमेटोरियममध्ये दहन करायला आरंभ करणार्या, व तें promote करणार्या,पारशी मंडळींचें अभिनंदन करायला हवें.
प्रगतिशील विचारांची मंडळी support-Opposition या विचाराच्या पल्याड असतात. तरीही, कुणीतरी त्यांना हें सांगायला हरकत नाहीं की, समाजातले अन्य प्रगतीशील लोक तुम्हाला support करताहेत.
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Copyright © 2025 | Marathisrushti