वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
दादरा, नगर हवेली, वापी या भागात मी फिरलो आहे. चर्चगेट पासून ते वापी पर्यंत महाराष्ट्र गिळला गेला आहे. उंबरगाव महाराष्ट्रात सामील करण्याचा लढा संपला.... इतिहास जमा झाला.
बेळगाव, कारवार, निपाणीचे लोक महाराष्ट्रात येण्यासाठी महाराष्ट्राच्या दरवाजावर अनेक वर्षे टक्कर देत आहेत. त्यांचा कपाळमोक्ष झाला. कानडी पोलिसांच्या लाठ्या काठ्या खावून त्यांची हाडे पीचली आहेत पण अजूनही ते लढत आहेत. भविष्य अंधक्कारमय झाले आहे.
मुंबई कोणत्या जोरावर म्हणायची मराठी माणसाची ? कर्जत-कसा-याला गेलेला मराठी माणूस मुंबईत ये जा करतोय म्हणून कुठेतरी मराठी शब्द कानावर पडत आहेत. सर्व ठेकेदार, कंत्राटदार अमराठी, स्थानीय लोकाधिकार समिती सुस्त आहे.
विदर्भात महाराष्ट्र अस्मिता कधीच संपलीय. नाही नाही म्हणता विदर्भ चाललाच आहे हातातून ....
आम्ही मात्र बाजीराव मस्तानीचा नाच पाहत फुशारक्या मारतोय. एकेकाळी मराठी माणसाच्या तलवारीच्या धाकानी हिंदुस्थान ढवळून निघाला होता ना ........ त्याच इतिहासात रमलोय !!!
बोला जय भवानी जय शिवाजी ......!!!!
आवाज फाटे पर्यंत घोषणा द्या !!! तेव्हडेच समाधान ......
-- चिंतामणी कारखानीस
पार्टीमध्ये सुरवातीस चिअर्स, चिअर्स म्हणून ग्लासावर ग्लास आदळायला शिकलो,
पण जेवणापूर्वी 'वदनी कवळ' आणि श्रीरामाचे नाव घ्यायला विसरलो ll१ll
वॉर्मिंग अप साठी सॉफ्ट ड्रिंक, फ्रुटपंच प्यायला शिकलो,
पण आपोष्णी घ्यायला विसरलो, सार-सुधारस विसरलो ll२ll
चायनीज नुडल्स काट्याने गुंडाळून, तोंड वेडेवाकडे करून गिळायला शिकलो,
पण शेवयाची खीर आवडीने खायला विसरलो ll३ll
हाताने वरण भात, ताक भात कालवून खायची लाज वाटू लागली,
आणि काट्या चमच्याने पुलाव्याची शिते गोळा करून तोंडात घालायला शिकलो ll ४ll
पाव भाजीवर अमूलचा जाड लगदा घालायला शिकलो,
पण गरम वरण भातावरची तुपाची धार विसरलो ll५ll
बिर्याणी, फ़्राईड राइस, जिरा राइस खायला शिकलो,
पण मसाले भात, वांगी भात म्हणजे काय..?? ह्या नातवंडांच्या प्रश्नात अडखळलो ll६ll
पुरणपोळी, श्रीखंड, लाडू, जिलबीवर ताव मारायला विसरलो
आणि जेवणानंतर फक्त दोन गुलाबजाम, टीचभर आईस्क्रीम खायला शिकलो ll७ll
दोन्ही हाताने ब्रेड, पावाचे तुकडे करून खायला शिकलो,
पण आईने शिकवलेले, एकाच हाताने जेवण करण्याचे संस्कार विसरलो ll८ll
सँलड या भपकेदार नावाने झाडपाला खायला शिकलो,
पण कोशिंबीर, चटणी, रायते आणि पंचामृत खायचे विसरलो ll९ll
इटालिअन पिझ्झा, पास्ताची चटक लागली,
आणि आळूची पातळ भाजी, भरली वांगी अन् बटाट्याची भाजी बेचव वाटू लागली ll१०ll
मठ्ठा, ताक, सार आवडेनासे झाले
आणि फ्रेश लेमन ज्यूस, सोडा का नाही.?? म्हणून विचारू लागलो ll११ll
साखर भात, गव्हाची खीर, लापशी इतिहास जमा झाली
अन स्वीट, स्वीट म्हणून आईस्क्रीम स्लाईसची गुलामी स्वीकारली ll१२ll
मसाल्याचे वास तसेच ठेवून, पेपर नँपकीनने हात, तोंड पुसायला शिकलो
पण पाण्याने खळखळून तोंड धुवायला मात्र विसरलो ll१३ll
फॉरवर्ड झालो फॉरवर्ड झालो म्हणून जगाला दाखवताना
स्वच्छ, शुद्ध, निर्मळ, निसर्गदत्त भारतीय संस्कृतीला (जाणुन बुजुन) विसरलो...
चैत्र महिना रखरखत्या उन्हात एक नवी बहार घेऊन येतो.पान गळती होऊन आलेली चैत्रपालवी मनाला आल्हाद देते. लाडक्या माहेरवाशिणीच्या रुपाने चैत्र गौरीचे महिन्याभरासाठी घरोघरी आगमन होते. पुजेमधील अन्नपूर्णा निराळ्या आसनावर बसवून तिची मनोभावे पूजा केली जाते. तिला गोड नैवेद्य दाखवून नातेवाईक, आप्तेष्ट, आजुबाजूच्या सुवासिनींना हळदीकुंकवासाठी निमंत्रण केलं जातं.
अन्नपूर्णा म्हणजे साक्षात पार्वतीच असून तिचा वास महिनाभर आपल्या घरी असतो. त्यामुळे तिच्या स्वागतासाठी घरापुढील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढली जाते. त्या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीला चैत्रांगण म्हणतात.
पार्वतीच्या रुपाला शोभेल अशी तिची शस्त्रे म्हणजे शंख, चक्र, गदा, पद्म आणि तिची वाहने म्हणजे गाय, हत्ती, कासव, नाग, गरूड होत.
तिची सौभाग्याची लेणी म्हणजे फणी, करंडा, आरसा, मंगळसूत्र व सुवासिनींच्या ओटीचे ताट असून दारापुढे तुळशी वृंदावन, ॐ, स्वस्तिक, आंबा, श्रीफळ, उंबर- पिंपळ वगैरे पूजनीय वृक्ष ही हिंदू संस्कृतीची प्रतिके म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चैत्रांगण होय.
गौरीचा लाडका पुत्र म्हणजे गणराय! त्याचे पण चित्र काढतात, कारण तो आपल्या आईला घरी नेण्यासाठी आलेला असतो.
अशी ही छान कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागे आहे. ही रांगोळी काढणाऱ्याचे कौशल्य आहे खरे, पण ही रांगोळी काढल्यानंतर अतिशय सुरेख दिसते.
बाजीराव-मस्तानी हा बिग बजेट हिंदी चित्रपट यावर्षीच्या चित्रपटांमधील एक भव्य-दिव्यपणे प्रदर्शित झालेला आहे. यात बाजीराव पेशवे आणि मस्तानी यांच्या प्रेमकथेचे चित्रण केले आहे.
मराठी अलंकार हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आहे. या पेशवेकालीन अलंकारातून त्यावेळच्या संस्कृतीची ओळख होते. या अलंकारांच्या निर्मितीसाठी पुण्याच्या सुप्रसिद्ध “पी एन गाडगीळ अॅन्ड सन्स” यांच्यावर जबाबदारी सोपवली गेली आणि ती त्यांनी सार्थपणे पार पाडली.
“या चित्रपटासाठी दागिन्यांची निर्मिती करण्यासाठी बरेच संशोधन करावे लागले. हे अलंकार घडविण्यासाठी आम्ही जुन्या काळातील साचे आणि ठसे वापरले. २०० वर्षाहून जुने अलंकारही वापरले. त्यामुळे प्रेक्षकांना त्यांनी कधीच बघितले नसतील असे अनेक मराठी अलंकार बघायला मिळाले.” असे पु. ना.गाडगीळ अॅन्ड सन्सचे श्री अजित गाडगीळ सांगतात.
नेकलेस, कंबरपट्टा, बांगड्या, नथ, कानातके डूल, पैंजण, मंगळसूत्रे, नाकी, अंगठ्या हे सर्व दागिने बनवण्यासाठी भारतातील विविध प्रदेशांतील कारागिरांची फौज सुमारे एक वर्षभर मेहेनत घेत होती.
या चित्रपटासाठी खास बाजीरावांच्या शिरावील शिरपेच तसेच कडे आणि अंगठ्या बनवण्यात आल्या.
आता हे सर्व दागिने “पु. ना गाडगीळ अॅन्ड सन्स”च्या विविध ठिकाणांच्या दुकानांमध्येही उपलब्ध होतील.
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
पूर्वीच्या काळी आपल्या सर्वांची जीवनशैली आणि राहणीमान, ही सोपी आणि सुटसुटीत आणि एकसंध अशी होती. एकत्र कुटुंबामध्ये सर्वप्रकारचे सण, कार्ये उत्सव साजरे व्हायचे. शेती, नोकरीधंदा तत्सम उद्योगामध्ये घरची मंडळी व्यस्त असायची. त्यामुळे जगण्याला फारसे पदर नसायचे वा सार्वजनिक वावर हा क्वचित प्रसंगी असायचा. आजच्या गतिमान युगात मात्र बदलत्या वेगवान जीवनशैलीमुळे सर्वांचा सार्वजनिक जीवनातला सहभाग वाढला आहे.
एकेकाळी उल्हासनगरमधील उत्पादनांना त्यांच्या कमी किमतीमुळे फार मोठी बाजारपेठ होती. जगातल्या कुठल्याही ब्रॅंडची कुठलीही वस्तू उल्हासनगरमध्ये बनू शकते याची खात्री अनेकांना असायची. मूळ उत्पादन आणि उल्हासनगरमध्ये बनलेले उत्पादन यातला फरकही कळायचा नाही. किंमत मात्र अत्यंत कमी असायची त्यामुळे उल्हासनगरचा माल खपायचाही लवकर.
लोक गमतीने उल्हासनगरच्या मालाला Made in USA म्हणायचे. म्हणजे Made in Ullhasnagar Sindhi Association. अगदी फिलिप्सचे रेडिओ ते इतर अनेक नावाजलेल्या ब्रॅंडसच्या वस्तू उल्हासनगरमध्ये मिळायच्या. मात्र उल्हासनगरचा माल हा कायमच डुप्लिकेट म्हणून हिणवला गेला. खरंतर त्या उत्पादनांमध्येही एक ताकद होती. उल्हासनगरची ही उत्पादने त्यांच्या नावाने विकली गेली असती तर त्याचवेळी उल्हासनगरची ही बाजारपेठ स्वत:च्या आस्तित्त्वाचा ठसा उमटवू शकली असती. तसे झाले असते तर Made in Ullhasngar च्या ऐवजी हाच माल Made in India म्हणूनच विकला गेला असता. कदाचित त्यामुळे चिनी माल भारतात येण्याऐवजी इथलाच माल देशोदेशी गेला असता.
मात्र कदाचित त्यावेळच्या राज्यकर्त्यांना हे जाणवले असावे आणि त्यांच्या वैयक्तिक स्वार्थाच्या व्यावसायिक गणितात हे बसत नसावे. नाहीतर जी मेक इन इंडियाची घोषणा पंतप्रधान मोदींनी २०१५ मध्ये केली ती इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या भारताच्या दोन महान पंतप्रधानांना करणे सहज शक्य होते. त्यांच्यात ती धमकही होती.
कालांतराने उल्हासनगरचे हे महत्त्व कमी होत गेले आणि चिनी बनावटीचा माल भारतीय बाजारपेठेत स्थिरावायला सुरुवात झाली.
आज भारतात जवळपास सर्वच क्षेत्रात चिनी बनावटीच्या वस्तूंचा सुळसुळाट झालेला आहे. कपडे, खेळणी हे तर सोडाच, पण दिवाळीतले कंदील आणि रोजच्या पूजेतील धूप, अगरबत्तीसारख्या वस्तूही यातून सुटल्या नाहीत. मुंबईत रस्तोरस्ती फूटपाथवर हा चीनी वस्तूंचा बाजार भरलेला असतो. याचे गमक हे चिनी वस्तूंच्या अत्यंत कमी किमतीत आहे.
असे म्हणतात की पश्चिमेकडच्या बाजारात काही नवे उत्पादन आले की लगेच त्याची चिनी आवृत्ती बाजारात येते. ती स्वस्त असते, पण टिकावू किंवा खरोखर उपयोगी असते असे म्हणणे धाडसाचे होईल. बहुसंख्य चिनी उत्पादनांचे आयुष्य जेमतेम सहा महिने ते एक वर्षाचे असते. यातली काही तर दुकानातून घरी घेउन गेल्याबरोबर बंद पडतात. मात्र ती उत्पादने चिनी कंपन्यांच्या नावावर विकली जातात. यामुळे चीन हा जागतिक बाजारपेठेत एक ब्रॅंड बनला.
२०१५ मध्ये प्रचंड आर्थिक मंदीच्या सावटाखाली आल्यावर. चीनने त्यांच्या मुद्रेची किंमत कमी केली. अर्थतज्ज्ञांच्या मतानुसार चीन स्वतःच्या उत्पादनांच्या किमती कमी ठेवून आर्थिक मंदीचा सामनाही करतोय आणि भारतातीलच नाही तर इतरही देशांतल्या बाजारपेठा काबिज करण्याचा प्रयत्न करतो. यामुळे भारतीय आणि इतर देशांच्या बाजारपेठेत चीनी उत्पादने अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होतात. शेवटी गिर्हाईकाला जे स्वस्त मिळेल ते तो घेणारच. .
भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि एकूणच भारताच्या दृष्टीने ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. मात्र दुर्दैवाने यातील गांभीर्य आपण लक्षात घेत नाही आणि दररोज चिनी माल खरेदी करुन चिनची अर्थव्यवस्था बळकट करायला एकप्रकारे मदत करतोय.
चिन हा पाकिस्तानचा मित्र असल्यामुळे पदोपदी पाकिस्तानला मदत करतो हे काही आता लपुन राहिले नाही. भारताच्या पूर्वेकडच्या राज्यांमध्येही चिनच्या कारवाया सुरुच आहेत. एकीकडे आपले वीर जवान सीमेवर पाकिस्तानच्या कारवायांना बळी पडतात, शहिद होतात आणि आपण इकडे चिनी बनावटीच्या वस्तू राजरोसपणे रोज खरेदी करतो. आपण एकदातरी असा विचार केलाय का, की नकळत का होईना आपण आपल्या शूर शहिद जवानांचा अपमान करतोय?
भारत ही चीनची जगातली सर्वात मोठी बाजारपेठ आहे. चीन भारतीय बाजारपेठेत दरवर्षी करोडो रुपयांचा व्यवसाय करतोय. यातील बराचसा माल चोरीच्या मार्गाने येत असावा त्यामुळे अचूक आकडे मिळणे कठीण आहे. मात्र जाणकारांच्या मते जवळपास काही लाख कोटी रुपयांची उलाढाल चीन केवळ भारतात करतो.
सीमेवर शहिद होणार्या भारतीय जवानांना आणि त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याची ही आपल्याला संधी आहे. चिनला एक संदेश देण्याचीही हीच संधी आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेवर थोडाफार तरी परिणाम करण्याची संधी आपल्याला भारतीय नागरिक म्हणून आहे. फक्त एक महिना कोणतीही चीनी बनावटीची म्हणजेच Made in China वस्तू खरेदी न करण्याचे जर भारतीयांनी ठरवलं तर ? चीनी बनावटीची कोणतीही वस्तू न विकण्याचं भारतीय व्यापार्यांनी ठरवलं तर?
बर्याचदा आपल्याकडे No TV Day आयोजित केले जातात. एकाद्या ठराविक दिवशी रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करायचा नाही असे आवाहन केले जाते.
असाच एखादा No Chinese Goods Month पाळायला काय हरकत आहे? विचार करा.. पटलं तर इतरांना पटवा. मेलवरुन, फेसबुकवरुन, WhatsApp वरुन.. कसंही !
नाही पटलं तर खाली मान घालून स्वस्थ बसून रहा. आपल्या स्वस्थ बसण्याने कदाचित येणार्या काळात आपल्याला दूधही चिनमधल्या म्हशींचं प्यायला लागेल !
-- निनाद अरविंद प्रधान
गेले काही दिवस रस्त्यारस्त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावलेली मोठमोठी होर्डिंग बघतो आहे. गुढीपाडव्याचा मनसेचा मेळावा शिवाजी पार्कला होणार आहे आणि त्याचं आमंत्रण देणार्या या होर्डिंग्सवर राजभाषेची आठवण करुन दिलेली आहे.
लवकरच महाराष्ट्र दिवस येत आहे. मोठा गाजावाजा करत तो साजरा होईल. दर वर्षी कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी जागतिक मराठी दिवस पाळला जातो. तोसुद्धा थाटामाटात पार पडतो. कार्यक्रम होतात, घोषणा होतात आणि काही दिवसातच विसरल्याही जातात.
एकेकाळी महाराष्ट्र दिनाला काय गडबड असायची. काहीतरी सण आहे याची जाणीव व्हायची. मात्र गेली काही वर्षे लोक कशा पध्दतीने तो साजरा करतात ते कांही समजत नाही. माझ्या परिसरात तरी कसलाच उत्सव किंवा उत्साह मला कधी दिसला नाही.
मराठीसाठी किंवा एकूणच कोणत्याही मातृभाषेसाठी अशा वेगळ्या दिवसाची गरज तरी कां भासावी हा सुध्दा एक प्रश्न आहे. खरंतर महाराष्ट्रात प्रत्येक दिवस मराठीचाच असायला पाहिजे. पण या बाबतचे एकूणच औदासिन्य बघितले तर कांही लोक मराठी भाषेच्या भविष्याबद्दल जी चिंता व्यक्त करत असतात ती खरी वाटू लागते.
सन १९२२ मध्ये कवी माधव ज्यूलियन यांनी "मराठी असे आमुची मायबोली" या सुप्रसिध्द कवितेत "जरी आज ही राजभाषा नसे"अशी तत्कालिन परिस्थितीनुसार वेगळ्या प्रकारची खंत व्यक्त केली होती. त्याच कवितेत "नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे" अशी आशा व्यक्त केली होती.
त्या काळच्या मानाने आज मराठीला खूपच चांगले दिवस आले आहेत, तरीही त्याबद्दल असंतुष्ट असलेल्या लोकांचे वेगळ्या प्रकारचे गार्हाणे गाणे चालले आहे. एका पत्रलेखकाने माधव ज्यूलियनांची क्षमा मागून "मराठी असो आमुची मायबोली, तरीही खरी राजभाषा नसे। नसे आज ऐश्वर्य या माउलीला, भविष्यात ना शष्प आशा दिसे।।" अशा शब्दात आपल्या वेदना व्यक्त केल्या होत्या.
आज एकूणच मराठी भाषेच्या शुद्धलेखन आणि व्याकरणाबाबत मोठी चर्चा सुरु आहे. नव्या पिढीच्या नव्या संवादमाध्यमांमधली मराठी अशुद्ध आहे अशी ओरड तर नेहमीच ऐकायला मिळते. मोबाईल, व्हॉटसअॅप वगैरेमध्ये मराठी शब्दांचा आणि वाक्यांचही पदोपदी खून होतो असेही म्हटले जाते. काही प्रमानात हे खरे असले तरीही त्याला दुसरी बाजूही आहेच.
आपल्या जीवनशैलीत नियमितपणे होत असलेल्या बदलांमुळे कांही परभाषी शब्द रोजच्या वापरात येतातच. इंग्रजीतही असे अनेक परभाषी शब्द दरवर्षी येत असतात. खरेतर त्यामुळे आपली भाषा अधिक समृध्द होते, ती भ्रष्ट किंवा नष्ट होत नाही. संत ज्ञानेश्वरांच्या काळातली मराठी बोलीभाषा संत तुकारामाच्या काळात नव्हती आणि संत तुकारामांनी वापरलेली भाषा आजकाल प्रचलित असलेल्या व्याकरणाला धरून नाही. काळाबरोबर असे बदल होत जातातच.
माधव ज्यूलियनांची संपूर्ण कविता खाली दिली आहे. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ५६ वर्षांनी तरी त्यातील काही अपेक्षा पूर्ण होतील अशी आसा करुया !!
मराठी असे आमुची मायबोली जरी आज ही राजभाषा नसे ।
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढें दिव्य आशा असे ।।
जरी पंचखंडांतही मान्यता घे स्वसत्ताबळें श्रीमती इंग्रजी ।
मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केवीं त्यजी ।।
जरी मान्यता आज हिंदीस देई उदेलें नवें राष्ट्र हें हिंदवी ।
मनाचे मराठे मराठीस ध्याती हिची जाणुनी योग्यता थोरवी; ।।।
असूं दूर पेशावरीं, उत्तरीं वा असूं दक्षिणीं दूर तंजावरीं, ।
मराठी असे आमुची मायबोली, अहो ज्ञानदेवीच देखा खरी ।।
मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं ।
पुरी बाणली बंधुता अंतरंगी, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं।।
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरी ।
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापे हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं ।।
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा, नका फक्त पाहू हिच्या लक्तरां ।
प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडावी फिकी ज्यापुढे अप्सरा ।।
न घालू जरी वाङ्मयातील उंची हिरे मोतियांचे हिला दगिने ।
’मराठी असे आमुची मायबोली’, वृथा ही बढाई सुकार्याविणें ।।
मराठी असे आमुची मायबोली अहो पारतंत्र्यात ही खंगली ।
हिची थोर संपत्ति गेली उपेक्षेमुळें खोल कालार्णवाच्या तळीं ।।
तरी सिंधु मंथूनि काढूनि रत्नें नियोजूं तयांना हिच्या मंडणी ।
नको रीण, देवोत देतील तेव्हा जगांतील भाषा हिला खंडणी ।।
-- निनाद अरविंद प्रधान
पहिली ते आठवीपर्यंत ढकलगाडी आता थांबण्याची सुचिन्हे दिसत आहेत. परीक्षा पुन्हा सुरू करण्याच्या सातत्याने पुढे येणाऱ्या मागणी मुळे मनुष्यबळ विकास मंत्रालयाने तावडे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमली होती. या समितीत तावडे यांच्यासह राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि तमिळनाडू या राज्यातील प्रतिनिधींचा समावेश होता. या समितीने आपला अहवाल बुधवारी मंत्रालयाला सादर केला. सध्याच्या परीक्षा पद्धतीत बदल करण्याची शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.
पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा सुरू करण्यात यावी. या परीक्षेत विद्यार्थी नापास झाल्यास त्याला एक महिना उजळणीसाठी देऊन त्याची पुन्हा परीक्षा घेण्यात यावी. पुन:परीक्षेत विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यास त्याला पुढील वर्गात प्रवेश द्यावा. मात्र पुन:परीक्षेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना आधीच्याच इयत्तेत ठेवण्यात यावे, अशी शिफारस या अहवालात करण्यात आली आहे. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी या बाबतीत पुढाकार घेतला आहे . या बाबतीत शिक्षण मंत्री विनोद तावडे योग्य दिशेनी जात आहेत . गुणवत्तेला पर्याय असूच शकत नाही हे लक्षात आले हे बरेच झाले. अगदी लहान पणा पासून मुलांना तसेच शिक्षकांना आणि पालकांना परीक्षे बाबत बेदरकार बनवणा-या या धोरणाला तातडीने बदलले पाहिजे अशी मागणी अनेक शिक्षक करत होते .
तावडे योग्य दिशेनी जात आहेत. अभिनंदन !!!!!!
-- चिंतामणी कारखानीस
महाराष्ट्राचा गौरव करणारी अनेक गीते अनेक कवींनी लिहिलेली आहेत. यातली काही निवडक महाराष्ट्र गीते या मालिकेत सादर करत आहोत. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेलं हे एक महाराष्ट्रगीत.
नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र!
गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, "सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने सुभाषचंद्र बोस भारतावर चालून आले, तर ना गांधी ना नेहरु ना काँग्रेस, कुणीही देशाला चुचकारु वा समजावू शकणार नाही"! काय अर्थ निघतो ह्या ओळींचा?
क्रमांक १, सुभाषबाबू १८ ऑगस्ट १९४५ नंतरही जिवंत होते. हे तर उघडच आहे. पण यातून निघणारा दुसरा अर्थ जास्त घातक आहे मित्रांनो. नेताजी जर उद्या भारतावर चालून आले तर सैन्य त्यांना मदत करेल व त्यावेळी देशाला गांधी, नेहरु व काँग्रेस यांच्यापैकी कुणीच समजावू शकणार नाही. काय समजवायचं होतं त्यांना? आणि कुणाच्या बाजूने?
इंग्रजांच्या व्हाईसरॉयला पत्र पाठवलंय, याचा अर्थ इंग्रजांना समजवायचं तर नव्हतंच. तसं पत्रात स्पष्ट लिहिलंय "देशाला समजावू शकणार नाही". यातून ध्वनित होणारा अर्थ उघड आहे की, "मायबाप इंग्रज सरकार काहीतरी करा. आम्ही तुमच्याच बाजूचे आहोत. पण उद्या जर का सुभाषबाबू चालून आले, तर मात्र आम्हीसुद्धा तुम्हाला वाचवू शकणार नाही". आम्ही म्हणजे कोण? तर गांधी, नेहरु व सर्व काँग्रेस! तशी स्पष्ट नावं घेतली आहेत पत्रात. आणि काय समजावणार, तर नेताजी चूक आहेत व इंग्रज सरकारच बरोबर आहे. ते इतके दिवस हेच सांगत आलेले असले पाहिजेत, म्हणूनच तर "नेताजी चालून आल्यावर" समजावून सांगू शकत नाही म्हणताहेत ना!
किती हा नीचपणा! सरळसरळ देशद्रोह आहे हा. आणि ही मंडळी आजवर आमच्या देशाचे नेते म्हणून मिरवत आली. जिथंतिथं विराजमान होत आली. आम्हीच काय तो स्वातंत्र्यलढा लढल्याची फेकाफेक करत आली. प्रत्यक्षात ह्या फाईलवरुन दिसतंय की, ही सगळीच मंडळी इंग्रजांची एजंट होती! एजंट!! ब्रिटीशांना माहिती पुरवणारे आणि योग्य वेळी ब्रिटीश सरकारचं रक्षण करणारे एजंट!!
काँग्रेसला हल्ली ट्विट करताना जो शब्द आवडतो ना, तो होती ही मंडळी - ट्रेटर!! आणि केवळ एवढं एकच पत्र नाहीये बरं का. याच फाईलमध्ये नेताजींनी नभोवाणीवरुन केलेली भाषणेसुद्धा उघड झाली आहेत.
१ जानेवारी १९४६ यादिवशी केलेल्या ह्या भाषणात ते गांधींना टोमणा मारतात, "अहिंसेने कधीच स्वातंत्र्य मिळत नसते"!
२६ डिसेंबर १९४५ यादिवशी नेताजी म्हणतात, "मी परत आलो की, माझ्या लोकांवर खटले भरणाऱ्या सगळ्यांचाच निवाडा करेन". नेताजींचे हे वाक्य उपरोक्त पत्रासंदर्भात वाचले की आपोआप कळते, नेताजींना अज्ञातवासात राहायला इंग्रजांनी भाग नाही पाडलं, तर त्यांच्या जीवावर उठणारे तथाकथित 'आपले'च लोक होते!!
-- विक्रम एडके
© Vikram Edke
Copyright © 2025 | Marathisrushti