(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • मरतुकडी गाय

    नुकतीच एक चिनी लोककथा माझ्या वाचण्यात आली.

    चिनमधले एक विद्वान गुरू आपल्या काही शिष्यांसकट प्रवासाला निघाले. त्यांना एक ओसाड प्रदेश लागला. त्या प्रदेशात पाण्याचे दुर्भीक्ष होते तर गवताचे एक पान पण दिसत नव्हते. त्या प्रदेशातील एका टेकडीवर त्यांना एक जिर्ण झालेली, मोडकळीला आलेली झोपडी दिसली. या अशा ओसाड प्रदेशात कोण रहात असावे या कुतुहलाने ते त्या झोपडीजवळ गेले. तेथे त्यांना एक मध्यमवयीन चिनी जोडपे, त्यांची तीन लहान मुले व एक मरतुकडी गाय दिसली. ‘तुमचे कसे भागते?’ गुरुंनी त्या चिनी माणसाला विचारले. त्याने त्या मरतुकड्या गाईकडे बोट दाखवले व म्हणाला, ‘ही गाय रोज आम्हाला थोडे थोडे दूध देते. यातील काही दूध आम्ही वापरतो. उरलेल्या दूधाचे दही करून त्याचे लोणी तयार करून जवळच्या गावात जाऊन विकतो. त्याचे जे काही थोडेफार पैसे मिळतात त्यातुन इतर गरजेच्या वस्तु आणतो. आमचे कसेतरी भागते.’

    गुरु टेकडी उतरून खाली आले व आपल्या शिष्यांना म्हणाले, ‘ताबडतोब ती मरतुकडी गाय मारून टाका!’ गुरुंची ही आज्ञा ऐकून शिष्य चांगलेच गोंधळले. ज्या गाईवर त्या माणसाचे जिवन चालू आहे, त्या कुटुंबाला रोजी रोटी मिळते आहे ती गाय मारून टाकायची? शिष्यांना वाटले आपले गुरु किती निर्दय व निष्ठूर आहेत. कोणी शिष्य गाय मारायला तयार होईना. शेवटी हे काम गुरुंनी स्वतःच करायचे ठरवले. ‘बोला माझ्याबरोबर कोण येणार आहे?’ त्यांनी शिष्यांना विचारले. कसाबसा एक शिष्य तयार झाला. त्या रात्री गुरु त्या शिष्याला टेकडीवर घेऊन गेले, त्या मरतुकड्या गाईला टेकडीवरून खाली ढकलले व गाय मेल्याची खात्री करून घेऊन परत आले व आपल्या शिष्यांबरोबर पुढच्या प्रवासाला लागले.

    त्यांच्या बरोबर जो शिष्य गेला होता त्याला फार ‘गिल्टी फिलिंग’ येऊ लागले. गुरुंनी जे केले ते पाप होते व त्या पापामध्ये आपण पण भागीदार होतो असे वाटून त्याच्या मनात शरमेची भावना निर्माण झाली. काही वर्षे त्याने ही भावना दाबून ठेवली पण एक दिवस या भावनेचा उद्रेक झाला. त्या कुटुंबाचे काय झाले हे पहाण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण झाली. गुरुला न कळवताच तो त्या झोपडीच्या ठिकाणी आला.

    तेथे आल्यावर त्या शिष्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्या क्षेत्राचा संपूर्णपणे कायापालट झाला होता. झोपडीच्या जागी एक आधूनीक, टोलेजंग बंगला उभा होता. बंगल्याच्या बाहेर अनेक आधुनीक मोटारी उभ्या होत्या. बंगल्याभोवती सुरेख बगीचा केला होता. सगळीकडे हिरवळ होती व काही शेते पण दिसत होती. शिष्याला वाटले आपण चुकीच्या ठिकाणी आलो. त्यांने तिथल्या एका माणसाला विचारले, ‘मा॑फ करा! मी कांही वर्षांपूर्वी येथे आलो होतो तेव्हा हा भाग ओसाड होता. वरती टेकडीवर एक झोपडी होती. आता त्या झोपडीतील माणसे कुठे असतात?’

    ‘तुमचे म्हणणे बरोबर आहे!’ त्या माणसाने उत्तर दिले. ‘त्या झोपडीतील माणसे इथेच म्हणजे त्या बंगल्यात रहातात. हा त्यांचा बंगला आहे. आज त्यांच्याकडे फंक्शन आहे.’

    आश्चर्य वाटून तो शिष्य टेकडी चढून बंगल्यापाशी आला. त्याने पाहीले की तोच चिनी माणूस व त्याची बायको एका भव्य सोफ्यावर बसले आहेत व त्याची तीन तरूण मुले उत्साहाने सगळ्यांचे स्वागत करत आहेत. तो शिष्य त्या बंगल्यात गेला व त्या चिनी माणसाला म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी मी माझ्या गुरुंबरोबर येथे आलो होतो. त्यावेळी तुम्ही एका मोडक्या, जिर्ण झालेल्या झोपडीत तुमच्या तीन मुलांबरोबर रहात होतात. तुमच्याकडे एक हडकूळी गाय पण होती.’

    ‘अगदी बरोबर आहे.’ तो चिनी माणूस उत्तरला ‘एका रात्री आमची गाय टेकडीवरून खाली पडली व मेली. आमचा तर आधारच हरपला. जगायचे कसे हा प्रश्न उभा राहीला. कारण तोपर्यंत आम्हाला गायीच्या दुधावरच जगायची सवय होती. जगण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. हळू हळू आमच्या असे लक्षात येऊ लागले की आमच्याकडे अनेक कौशल्ये आहेत जी आम्हाला ठाऊक नव्हती. आम्ही त्या कौशल्यांचा विकास करायला सुरवात केली, उद्योग व्यवसायात पदार्पण केले. हे तीन तरूण ही माझी मुले आहेत. तुम्ही याचे परिणाम बघताच आहात. जर आमची गाय मेली नसती तर हे घडले नसते!’

    आता त्या शिष्याला कळले की गुरु गाय मारयला का सांगत होते. त्याला आपल्या गुरुंच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले व गुरुविषयींचा आदर कित्येक पटीने वाढला.

    अनेक मराठी माणसांच्या आयुष्यात अशीच एक गाय असते ज्याला ‘नोकरी’ असे म्हणतात. मराठी माणसांची नजर या अशा गायीवरच असते. या गाइचे जे दूध मिळते (म्हणजे पगार मिळतो) त्यावर भागवण्याची सवय लागते. कोणाच्या नशीबात धष्टपुष्ट गाय येते तर कांहीना किरकोळ गाय मिळते तर काहींच्या नशीबात अशी गायच नसते.

    मराठी माणसाचे सगळे कर्तृत्व त्याच्या नोकरीवर व नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ज्याला उत्तम नोकरी मिळते तो जास्त कर्तृत्ववान, ज्याला बरी नोकरी मिळते तो कमी कर्तृत्ववान व ज्याला नेकरीच मिळत नाही त्याला ‘कंडेम’ समजण्यात येते. मराठी माणसाची प्रगती ही त्याच्या नोकरीच्या प्रगतीवर ठरत असते. ‘माझा नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला’ हे एखाद्या गृहीनीचे वाक्य मोठ्या कौतुकाने सांगीतले जाते व ऐकले जाते. जणू काही नवरा क्लार्कचा मॅनेजर झाला म्हणजे त्याने फार मोठा पराक्रम केला असा थाट या वाक्याभोवती असतो. पण किती झाले तरी ‘नोकरी’ ही एक मरतुकडी गायच असते, कारण ही गाय पुरेसे दूध कधीच देत नसते.

    अशीच अजुन एक गाय असते ज्याला ‘जर्सी’ गाय म्हणतात. ही गाय भरपूर दूध देत असते पण ही गाय नेकरीवाल्यांच्या नशीबी नसते तर फक्त ‘उद्योग, धंदा, व्यवसाय’ करणार्याह माणसांच्या नशीबी असते. पण मराठी समाजात या गाईला कोणी फारसे महत्व देत नसते. ‘माझ्या नवर्या चा धंदा एका लाखाचा एक कोटी रुपये झाला.’ हे एखाद्या गृहीणीचे वाक्य फारशा कौतुकाने बोलले पण जात नाही व ऐकले पण जात नाही. ‘माझे वडील बँकेत मॅनेजर आहेत.’ हे वाक्य ज्या अभीमानाने मुलाकडून सांगीतले जाते त्याच अभीमानाने ‘माझ्या वडिलांचे स्टेशनरीचे दुकान आहे’ हे वाक्य सांगीतले जात नाही. लग्न करणार्याा मराठी मुलींना तर फक्त नोकरी करणारीच मुले हवी असतात. मामलेदार कचेरीत शिपायाची किंवा पट्टेवाल्याची नोकरी करणार्या मुलाला हुंड्यासकट मुलगी मिळते. पण वर्षाला 50 लाख रुपये इन्कम असलेल्या पण धंदा करणार्याा मराठी मुलाला लग्नासाठी मुलगी मिळणे कठीण जाते.
    नुकचीच पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी ‘स्टार्ट अप’ साठी अनेक योजना जाहीर करून उद्योग व्यवसायाच्या संधीचे भले मोठे दार उघडून दिले आहे. याचा अर्थ अनेकांना ‘जर्सी गाई’ मिळवण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. पण मराठी माणूस याचा किती फायदा करून घेणार आहे हा कळीचा मुद्दा आहे.

    ‘नोकरी’ च्या मरतुकड्या गाईवर जगायचे का उद्योग व्यवसायाच्या क्षेत्रात शिरून भरपूर दूध देणारी जर्सी गाय मिळवायची हे ज्याचे त्याने ठरवायचे नाही कां?

    तुम्हाला काय वाटते?

    -- उल्हास हरी जोशी, मोः-9226846631

  • आमची माती आमची माणसं

    आमची माती आमची माणसं

    भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र दिल्लीत १९५८ साली सुरू झाले. त्यानंतर २ ऑक्टोबर १९७२ रोजी मुंबईत दूरदर्शन केंद्र सुरू झाले. नंतरच्या काळात आशियाई क्रिडा स्पर्धांच्या वेळी भारतात रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले. तेव्हा अगदी मोजकीच चॅनेल असायची आणि कार्यक्रमसुद्धा अत्यंत दर्जेदार असायचे. या दर्जेदार कार्यक्रमातलाच एक कार्यक्रम म्हणजे शेतकरी बंधूंसाठी असलेला 'आमची माती- आमची माणसं' !

    https://www.youtube.com/watch?v=TFtiDc5GRmU

    खरंतर पहिले केंद्र दिल्लीत सुरू झाल्याने आणि तब्बल १२ वर्षे त्यावर कार्यक्रम करण्याचा अनुभव घेतल्याने दूरदर्शनच्या अधिकार्‍यांना लोकांच्या गरजांसाठी कोणते कार्यक्रम करायला हवेत याची माहिती झाली होती. त्यामुळेच मुंबई केंद्र सुरु झाल्यावर आपण कोणकोणती सदरे सुरू करावीत, याचेही मार्गदर्शन मिळाले.

    सुरुवातीला मुंबई दूरदर्शनवर काम करण्यासाठी दिल्ली केंद्रावरची काही अनुभवी माणूस मागवून घेतली गेली. मात्र बाकीचे सगळे दूरदर्शनचा अनुभव नसलेलेच होते. निदान कार्यक्रम तयार करण्याचा व तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अनुभव असवा या उद्देशान जागोजागच्या आकाशवाणी केंद्रांवरची माणसे दूरदर्शनवर आणली.

    आकाशवाणी आणि दूरदर्शन यात काही साम्ये आहेत तसेच काही फरकही आहेत. लोकांना कोणते कार्यक्रम द्यायचे, त्याचा आराखडा कसा असावा, विविध विषयावरील माहिती देणारे तज्ज्ञ कोण आहेत, या गोष्टी दोन्ही माध्यमांना समान आहेत. पण आकाशवाणीवर चित्रे दाखवता येत नसल्याने तेथे शब्दांना फार मोठे महत्त्व असते.

    आकाशवाणीवरील भाषणावरून श्रोत्यांपुढे त्याचे हुबेहुब चित्र दिसले पाहिजे. प्रत्यक्ष चित्र दाखवता येत नसल्याने जी कमतरता आकाशवाणीच्या माध्यमात आहे तीच दूरदर्शनची ताकद असते कारण दूरदर्शनवर चित्रे दाखवता येतात. यामुळे वक्त्याचा संदेश अधिक स्पष्ट होतो. त्यासाठी दूरदर्शनवर काम करणार्‍या व्यक्तींना अधिक कष्ट ग्यावे लागत. भाषणाला साजेशी चित्रे, दृश्ये, छायाचित्रे मिळवणे हा त्यातला कष्टाचा भाग असे आणि ती चित्रे योग्यवेळी दाखवणे हाही तितकाच महत्त्वाचा भाग असे. त्यावेळी आतासारखा मोठा चित्रसंग्रह किंवा व्हिडिओजचा संग्रह उपलब्ध नव्हता.

    'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमात अनेक कृषी-तज्ज्ञांच्या मुलाखती प्रत्यक्ष शेतावर घेतल्या जात. दृक-श्राव्य माध्यमातून एखादा रोग पडलेले पीक कसे दिसते ते नीट दाखवता येते. सकस फळ आणि रोगट फळ
    यातील फरक चित्राच्या माध्यमातून नीटपणे दाखवता येतो. यामुळे शेतकरी वर्गामध्ये हा कार्यक्रम अल्पावधीतच लोकप्रिय झाला.

    आज दूरदर्शनवर असंख्य खाजगी चॅनेल्स आहेत. त्यातील काही कृषी-शेती या विषयाला वाहिलेली सुद्धा आहेत. मात्र याची पायाभरणी 'आमची माती- आमची माणसं' या कार्यक्रमाने केली असल्याने या कार्यक्रमाचे महत्त्व अबाधित आहे.

    सुप्रसिद्ध कृषीतज्ज्ञ डॉ. यशवंतराव नेने एकदा म्हणाले होते की, मुंबई दूरदर्शनवरील शेतीविषयक कार्यक्रम महाराष्ट्रात ज्या गुणवत्तेचा असतो, तितका इतर राज्यांतील नसतो. यातच हा कार्यक्रम सादर करणार्‍यांचे योग्य कौतुक होते.

    --

  • शहरी माणसाच्या नजरेतून… नागपूर येथील दुसरे मराठी शेतकरी साहित्य संमेलन ….

    प्रती,

    श्री. गंगाधर मुटे,

    कार्याध्याक्ष अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन,

    नमस्कार,

    दुसरे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन दिनांक २०-२१ फेब्रुवारी २०१६ रोजी नागपूर येथे अतिशय झोकात आणि उत्साहात पार पडले ह्यात शंकाच नाही. तुमचे, तसेच सर्व सहकाऱ्यांचे मी रविंद्र कामठे हार्दिक अभिनंदन आणि करावे तितके कौतुक थोडे आहे. सर्वांची नावे घेणे योग्य नसल्यामुळे माझा हा अभिप्राय सर्वांपर्यंत पोहचवावा ही अपेक्षा.

    हा सलग दुसरा साहित्य सोहळा म्हणजे शेतकरीवर्गासाठी व सर्वसामन्य माणसासाठी शेतकरी साहित्याची एक पर्वणीच होती असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

    माझ्यासारख्या शहरी माणसाच्या नजरेतून... हे मराठी शेतकरी साहित्य संमेलन....

    जेष्ठ साहित्यिक, जेष्ठ पत्रकार आणि शेतीतज्ञ ह्यांची अध्यक्ष, प्रमुख अतिथी आणि उद्घाटक लाभणे ह्यातच ह्या संमेलनाचे यश दिसून येते. मान्यवरांनी ह्या निमित्ताने मांडलेले विचार अतिशय प्रगल्भ होते व सर्वसामन्य माणसाला विचार करायला लावणारे तर होतेच तसेच अतिशय मार्गदर्शक असे होते.

    ह्या संमेलनात आपण प्रकाशित केलेली पुस्तके मा. शरद जोशी विशेषांक शेतकऱ्यांचा सूर्य”, गंगाधर मुटे लिखित काव्यसंग्रह – “नागपुरी तडका”, व प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रह – “कणसातील माणसं”, हे सर्वसामान्य माणसासाठी साहित्यक मेजवानीच म्हणावे लागेल. शेतकरी साहित्य चळवळीच्या अथक परिश्रमाचे झालेले हे चीजच आहे. संमेलनाचे बोधचिन्ह नांगराच्या फाळाला लावलेली लेखणी त्याचेच हे फलित आहे असे मला जाणवले.

    ह्या संमेलनाची आणखी एक जमेची बाजू म्हणजे, आपण आयोजित केलेल्या वेगवेगळ्या विषयांवरील परिसंवाद हे होत. उदा. आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि शासकीय धोरण | मराठी साहित्यावर शेतकरी चळवळीचा प्रभाव | शेतकरी आत्महत्या; कारणे व उपाय | शेतकरी आत्महत्या पत्रकारितेच्या नजरेतून | शेतीसाहित्यातील ग्रामीण स्त्रीचे स्थान. सर्वच परिसंवाद उल्लेखनीय झाले. वक्ते, विचारवंत तसेच त्या त्या विषयातील तज्ञांनी मांडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा, त्यांचे प्रश्न, सरकारचे धोरण, निसर्गाचे कालचक्र, शेतकऱ्यांचे अर्थकारण, त्यावर चालणारे राजकारण, विविध कारणे मीमांसा, उपाय व सर्वात कळीचा विषय म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, ह्यावर झालेली चर्चा अगदी संयुक्तिक तर होतीच पण मार्गदर्शक होती व पुढील वाटचालीस प्रेरक अशीच होती.

    शेतीकरी गझल मुशायरा आणि शेतीकरी कवी संमेलन ... हा प्रयोग म्हणजे मनोरंजांतून विचार मंथन असाच वाटला. एका पेक्षा एक उत्तोमोत्तम गझलांचे व कवितांचे सादरीकरण, शेतकरी ह्या विषयवरील साहित्याने घेतलेली दखल खूप काही सांगून जाते. प्रचलित कवी आणि नवोदित कवी ह्याची अतिशय उत्तम सांगड आपण ह्या निमित्ताने घालून एक नवीन पायंडा घालून दिलात त्यासाठी आपले आभार. भविष्यात शेतकरी दुर्लक्षित राहणार नाही ह्याची ग्वाही ही कवी मंडळी देऊन जातात, कारण आजवरचा सिद्धांत आहे की काव्यात जी ताकद आहे ती कुढल्याही शस्त्रात नाही.

    तुला कसला नवरा हवाही नाटिका तर मनोरंजांतून उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घालणारी होती. शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्यांच्यावर चाललेले राजकारण आणि शेतकऱ्यांच्या भावी पिढ्यांच्या मनातली तळमळ ज्या प्रगल्भतेने व्यक्त केली गेली त्या सर्व कलाकारांचे, दिग्दर्शकाचे आणि लेखाचे मन:पूर्वक अभिनंदन. एक अभिनव असा हा प्रयोग. अतिशय संयुंक्तिक वातावरणात आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे विशेष कौतुक आणि आभार.

    आपण मला ह्या संमेलनास आमंत्रित करून जो काही मान-सन्मान दिलात, तसेच मला शेतकरी कवी संमेलनात माझी हक्क जगण्याचे वंचित होतेही कविता सादर करण्याची संधी व त्या कवितेस आंतरजाल स्पर्धेत पद्यकविता सदरात मानपत्र देऊन पुरस्कृत केलेत आणि माझ्या सहा कविता आपण कणसातील माणसं, ह्या प्रातिनिधिक शेतकरी काव्यसंग्रहामध्ये समाविष्ट करून मला साहित्यिक प्रतिष्ठा देऊन उपकृत केलेत, ह्या साठी मी आपला खूप खूप आभारी व ऋणी आहे.

    मला स्वत:ला हे संमेलन खूप काही देऊन आणि शिकवून गेले. खूप सारे शेतकरी, साहित्यिक आणि कवी मित्र मिळाले व शेतकरी साहित्य चळवळीशी स्नेह्बद्ध होऊन धन्य जाहलो.

    खासकरून मुटेसर मला तुमचा खूप अभिमान आहे. मी तुमचे फार कौतुक करतो आहे असे वाटेल पण त्याला इलाज नाही. तुमच्या सारख्या एक शेतकऱ्याने अशी एक साहित्य चळवळ चालवावी आणि भल्या भल्यांना तोंडात बोटे घालयला लावेल अशी त्याची योजना, आखणी, नियोजन व संमेलन, सलग दुसऱ्यांदा घडवून सहज यशस्वी करून दाखवावे ह्याला तोड नाही. निंदक तर असावेतच पण समर्थकही असले की पुढील कार्यास नवे बळ आणि प्रोत्छान मिळते असे मला वाटते. दोन दिवस फक्त शेती, शेतकरी आणि शेतकऱ्यांचे विषय आजवर आयुष्यात कधी अनुभवलेच नव्हते, ते ह्या शेतकरी साहित्य संमेलनामुळे अनुभवले आणि कृतकृत्य झालो. जसा आपला एक घास सीमेवरील जवानांसाठी अडतो तसाच आपल्या ह्या शेतकरी बांधवांसाठीही अडला पाहिजे ह्याची जाणीव प्रकर्षाने आज मला झाली. हीच ह्या संमेलनाची फलश्रुती आहे.

    शेतकरी साहित्य चळवळीच्या पुढील वाटचालीस माझ्या अनंत शुभेछ्या.

    -- रविंद्र कामठे, पुणे.

    भ्रमणध्वनी +९८२२४०४३३३०. ravindrakamthe@gmail.com

  • भारतीय राष्ट्रीय सौर दिनदर्शिका

    भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५ वर्षांनी, म्हणजे १९५२ च्या सुमारास सी.एस्.आय्.आर्. या संस्थेने पंचांग सुधारणा समिती या नावाने एक समिती नेमली. या समितीचे अध्यक्ष डॉ. मेघनाद साह भौतिकशास्त्रज्ञ तर होतेच परंतु ते काही काळ लोकसभेचे खासदारही होते. पंचांग सुधारणा समितीने आपल्या देशासाठी एक दिनदर्शिका सुचवावी असे या समितीला सांगण्यात आले.

    कालगणनेच्या बाबतीत भारतात खूपच विविधता आहे. काही पध्दतीत चांद्रमहिने विचारात घेतात. या महिन्यांची सुरुवातही कोणी पौर्णिमेला करतात तर कोणी अमावस्येला करतात. काही प्रांतात तर सौर महिने विचारात घेतात. आपले सण,वार,धार्मिक उत्सव विशिष्ट ति्थीला असतात, म्हणजेच ते चंद्रभ्रमणावर अवलंबून असतात. तिथी आणि महिन्यांशी सणांची बांधिलकी असते. उदा. दसरा, त्या दिवशी आश्र्विन शुध्द दशमी तिथीच तर गोकुळाष्टमी म्हणजे श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीच असायला हवी.

    महिन्यांची कालगणना चंद्रभ्रमणावरुन केली तर १२ महिन्यांचे वर्ष संपल्यावर होणार्‍या एकूण दिवसांची संख्या ३५४ होते, त्यामुळे चांद्रवर्षाचा ऋतुंशी मेळ राहत नाही. ऋतू हे सूर्यभ्रमणावर अवलंबून आहेत आणि म्हणूनच सूर्याचे वार्षिक भ्रमण विचारात घेणारी दिनदर्शिका व्यवहारात सोयीची पडते. आपले दैनंदिन व्यवहार दिवस व रात्र यांच्या अनुषंगाने घडत असल्यामुळे सरासरी २४ तासांचा दिवस ही कल्पना सोयीची होते. जानेवारी व डिसेंबर ही सध्या प्रचारात असलेली दिनदर्शिका सौर दिनदर्शिकाच आहे. धार्मिक सण आणि उत्सव इत्यादिंसाठी आपण चंद्राची दिनदर्शिका विचारात घेत असलो, तरी दैनंदिन व्यवहारात आपण सूर्याचीच दिनदर्शिका वापरतो.

    राष्ट्रीय दिनदर्शिका :

    डॉ. मेघनाद साहा यांच्या समितीने वरील गोष्टींचा विचार करुन सौर दिनदर्शिकां सुचविली आहे. मात्र ती जानेवारी ते डिसेंबर अशा बारा महिन्यांची नाही. त्यातील महिन्यांची नावे, वर्षारंभाचा दिवस इत्यादी गोष्टी वेगळ्या आहेत आणि वेगळेपण का व कसे ते आपण पाहणार आहोत. राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या १२ महिन्यांची नावे चैत्र ते फाल्गुन अशाच क्रमाने आहेत, फक्त मार्गशीर्ष महिन्याचे नाव 'अग्रहायण' असे आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेचा वर्षाचा पहिला दिवस (लीप वर्ष सोडून) २२ मार्च हा असतो. या तारखेला राष्ट्रीय दिनदर्शिका १ चैत्र या नावाने संबोधते. राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वैशाखापासूनचे महिने पुढील तारखांना सुरु होतात. वैशाख (२१ एप्रिल), ज्येष्ठ (२२ मे), आषाढ (२२ जून), श्रावण (२३ जुलै), भाद्रपद (२३ ऑगस्ट), आश्र्विन (२३ सप्टेंबर), कार्तिक (२३ ऑक्टोबर), अग्रहायण (२२ नोव्हेंबर), पौष (२२ डिसेंबर), माघ (२१ जानेवारी), फाल्गुन (२० फेब्रुवारी).

    वर्षाचा क्रमांक शालिवाहन शकाप्रमाणे घेतात. या महिन्यांचे दिवस एक आड एक ३० किंवा ३१ असे घेत नाहीत. वैशाख ते भाद्रपद या सलग ५ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ असून उरलेल्या ७ महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३० घेतात. अशा तर्‍हेने ३६५ दिवसांचे वर्ष पूर्ण होते. सूर्य उत्तर गोलार्धात असण्याचा काळ त्याच्या दक्षिण गोलार्धातील कालावधीपेक्षा थोडा जास्त आहे, त्यामुळे वैशाख ते भाद्रपद या सलग महिन्यांचे दिवस प्रत्येकी ३१ घेण्याची शिफारस समितीने केली.

    जे इंग्रजी वर्ष लीप वर्ष असते त्या वर्षी सुरु होणारे राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्षही लीप वर्ष घेतात. मात्र त्या वर्षी चैत्र महिन्याचेही ३१ दिवस घेतात आणि अशा लीप वर्षाची सुरुवात २२ मार्चला न होता २१ मार्च रोजी करतात.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेची शास्त्रीय बैठक :
    वरील विवेचनावरुन राष्ट्रीय दिनदर्शिकेची वैशिष्ट्ये आणि त्याची शास्त्रीय बैठक आपल्या लक्षात येईल. चैत्र, आषाढ, आश्र्विन आणि पौष या महिन्यांची सुरुवात सूर्याच्या स्थानांशी निगडीत आहे. चैत्र आणि आश्र्विन महिन्यांच्या सुरुवातीस (अनुक्रमे २२ मार्च आणि २३ सप्टेंबर) सूर्य वैषुविकवृत्तावर असतो. दिवस आणि रात्र समान असतात. आषाढ महिन्याच्या १ दिनांकापासून (२२ जून) दक्षिणायन सुरु होते, तर पौष महिन्याची म्हणजे उत्तरायणाचीही सुरुवात असते. (२२ डिसेंबर) इंग्रजी महिन्याची सुरुवात सूर्याच्या अशा विशिष्ट स्थानांशी निगडीत नाही. वैशाख ते भाद्रपद या महिन्यांचे प्रत्येकी ३१ दिवस घेण्यामागील भूमिकाही आपण पाहिली.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेचे वर्ष २२ मार्चला सुरु होत असल्यामुळे ते आर्थिक वर्षाशीही जुळते आहे. हा त्याचा व्यावहारिक लाभही आहे.

    राष्ट्रीय दिनदर्शिकेची भारतीय नागरिकांकडून उपेक्षा :
    राष्ट्रीय दिनदर्शिका २२ मार्च, १९५७ या दिवसापासून भारत सरकारने अधिकृतपणे स्वीकारली. हा दिवस राष्ट्रीय दिनदर्शिकेप्रमाने १ चैत्र १८७९ असा होता. तेथपासून आजतागायत ही दिनदर्शिका शासकीय स्तरावर अस्तित्वात आहे. वर्तमानपत्रांमध्ये आजचे पंचांग या नावाखाली जी माहिती येते, त्यामध्ये या दिनांकाचा उल्लेख असतो. म्हणजे या दिनदर्शिकेच्या स्वीकृतीला आणि वापराला ५४ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला. सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन व्यवहारात लोकांकडून ही दिनदर्शिका वापरली जात नाही त्यांनी ती स्वीकारली नाही. ही वस्तुस्थिती आहे. कित्येक लोकांना तर अशी काही दिनदर्शिका आहे हे माहीतच नाही. ही भारताची अधिकृत दिनदर्शिका असून सरकारी पातळीवर (अजूनतरी) ती वापरली जाते याचे लोकांना आश्र्चर्य वाटते. राष्ट्रीय दिनदर्शिकेची ही दुर्दशा नव्हे का? राष्ट्रीय दिनदर्शिका समाजात अजूनही रुजू शकते. शासन आणि समाज यांची इच्छाशक्ती तशी असायला हवी.

    राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरली जायला हवी असेल तर पुढील गोष्टी करता येतील :
    कार्यालयीन वेतनपत्रके राष्ट्रीय दिनदर्शिकेच्या महिन्यांप्रमाणे तयार करावीत. उदा. चैत्र पेड इन वैशाख.... वैशाख पेड इन ज्येष्ठ.... याप्रमाणे वेतन मिळाले म्हणजे आपोआपच दिनदर्शिका गरजेची होईल.

    जानेवारी महिन्यात जेव्हा नवीन दिनदर्शिका येतात तेव्हा त्यातील भारतीय महिने व दिनांक ठळक छापण्याची सक्ती करावी. इंग्रजी दिनांक व महिने बारीक अक्षरात छापावेत. संक्रमण अवस्थेच्या एक दोन वर्षात हे करावे लागेल. नंतर चैत्र, वैशाख असेच महिने असलेल्या दिनदर्शिका निघू लागतील.

    केंद्र सरकारने रेल्वेचे तसेच सर्वसामान्य अंदाजपत्रक सादर करताना या दिनांकाचा उल्लेख करुन ते सादर करावे. काही बॅंका, संस्था, कंपन्या आपली स्वत:ची दिनदर्शिका छापतात. त्यांनी राष्ट्रीय कालगणनेप्रमाणे दिनदर्शिका काढाव्यात. धनादेशावर किंवा अन्य ठिकाणी राष्ट्रीय दिनदर्शिकेची तारीख लिहून व्यक्तिगत पातळीवर या दिनदर्शिकेच्या अंमलबजावणीस सुरुवात करावी. राष्ट्रीय दिनदर्शिका अंमलात यावी असे ज्यांना वाटते, अशा लोकांनी इतरांचे याबाबत प्रबोधन करावे.
    आपल्या भागातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार यांच्याशी याबाबत चर्चा करावी आणि हा प्रश्न शासकीय स्तरावर उपस्थित करण्यास सांगावे.

    राष्ट्रीय दिनदर्शिका दैनंदिन जीवनात वापरात येण्यासाठी अशी मनोभूमिका तयार होणे आवश्यक आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेबाबत सर्व पालळ्यांवर एवढे औदासिन्य असल्यामुळेच तिच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. धार्मिक गोष्टी, सण, वार इ. प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे आणि पंचांगाप्रमाणे साजरे करु शकतील. राष्ट्रीय दिनदर्शिकेमुळे या गोष्टींना बाधा येणार नाही.

    राष्ट्रीय दिनदर्शिका आणि इंग्रजी दिनदर्शिका या दोन्ही दिनांकांचा निश्र्चित संबंध असल्यामुळे त्यांचे एकमेकांत रुपांतरण सहज शक्य आहे. थोडक्यात, शास्त्रीय पायावर आधारलेली राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय दिनदर्शिका आपल्या व्यवहारात आणणे राष्ट्रीय अस्मितेला धरुन आहे. उशीर झाला असला तरी हि चूक सुधारता येईल. त्यासाठी कटिबध्द होऊया !

    (इच्छुकांनी व अभ्यासकांनी तसेच राष्ट्रीय वृत्ती जोपासणार्‍यांनी लेखकाशी संपर्क करावा.)

    -- हेमंत मोने

    फोन : ९८२०३१६३१५

    इ-मेल : hvmone@gmail.com

  • खऱ्या शिवथरघळीच्या शोध

    छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

    सिवतर तालुका,मौजे पारमाची,कोंड नलवडा,

    'नलावडे कोंड'बाबतचे दूर्लक्ष वादाचे कारण

    समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत 1 जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या खऱ्या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे. छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक 13 मध्ये पान क्र.22 वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे.

    इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुसऱ्या प्रकरणात पान क्रमांक 11 पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87 नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. 1675 ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक 87) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.

    सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा, मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर फारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके1597 भाद्रपद वद्य 8 रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी 12 वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुसऱ्या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिसऱ्या कारभाऱ्याच्या हातची आहेत.

    या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे 12 वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.

    आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा खऱ्या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

  • मुलांवर निट लक्ष ठेवा.. वेळेपुर्वीच जागृत व्हा

    पालकहो...
    मुलांवर निट लक्ष ठेवा व वेळेपुर्वीच जागृत व्हा..

    आजकाळची पिढी जरा लवकरच हुशार व्हायच पाहतीय... सांगण्याच्या खटाटोप अशासाठी की...

    मी ज्या ज्या वेळेस कामानिमित्त घराबाहेर किंवा वेगवेगळ्या शहरात... गावात असतो.. त्या वेळी काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन चालत नाही... म्हणजे पहा ना... प्रत्येक गोष्टींच वेळापत्रक ठरलेल असत.. भले ठिकाणे वेगवेगळी असु शकतील.. अॉफीस.. कार्यालय... नौकरी... शाळा... टुशन... अस काही...

    पण यातील काही ठिकाणे वगळता... यातील शाळा व टुशन यांच्या वेळा बहुदा सर्वंच ठिकाणी एकसारख्याच असतात...

    पण मंडळींनौ..., या दरम्यान शाळेतील वा टुशनमधील विद्यार्थी खरच नेमक्या ठिकाणी असतात का हो....?

    कदाचित् .... या बद्दल अनेकजण वा नेहमीप्रमाणे (आंधळेप्रेम) आमचा आमच्या मुलामुलीवर भरपुर वा अतोनात विश्वास आहे... अस मनातल्या मनात म्हणाले सुध्दा असतील... छान..हरकत नाही...

    पण मी अशा वेळेतही काही शाळेय मुलामुलींना अशा काही ठिकाणी पाहत असतो की... जेथे सामान्य पणे येणाऱ्या वा जाणाऱ्या जनतेची... लोकांची... नजरच जाऊ शकत नाही... कारण आपण कोणाच्याही नजरेत येऊ नये अशीच भिती या मुलामुलींच्या चेहऱ्यावर असतेच...

    मग ही शाळेच्या पोशाखात, शाळेच्या वेळामध्ये... शाळेत शिकायच सोडुन बाहेर नेमकी का...? कशासाठी...? कोणासोबत...? कशाला...? बाहेर फिरत असतात हेच नेमक कळत नाही... कदाचित् लहान व अपरिपक्व वयामध्ये यांना बहुदा मजा वाटत असेलही... अशावेळी ह्यांची पालकांना व शिक्षकांना वेळप्रसंगी ठामपणे खोट बोलण्याची हिम्मतच वाढत असते.. पण या खोटेपणाचा दुरगामी परिणाम यांना माहीतच नसतो...

    अशावेळी मोठमोठ्या कॉफी शॉप्स... महागड्या हॉटेलमध्ये.... साध्या टॉकीझ मध्ये... मोठ्या मॉल मध्ये... गजबजलेल्या रस्त्याच्या पासुन निर्जन ठिकाणी... मंदिराच्या कोपऱ्यात.... बागेत एकदच गर्दीपासुन लांब... बसस्टॉपवर.... अशा अनेक ठिकठिकाणी ही शाळेय मुलमुली शाळेय गणवेशात वेगळ्याच विश्वात हरवलेली असतात....

    मंडळींनौ .... मी अस म्हणत नाही...की तुमचेच पाल्य असेल...? पण फक्त कळकळीची नम्र विनंती की... तुम्हीपण जागृत रहा.... कारण या लहान कोवळ्या वयामध्ये यांना आयुष्याची फारसी जाणीव नसते हो... याच वयामध्ये थोडीफार एक्साईटमेंट करायला जातात... व काही समाजकंटक अशावेळी नेमका याच अजाणतेचा जाणीवपुर्वक गैरफायदा घेतातच... मग काही विद्यार्थ्यां वाममार्गाला लागताल. (तबांकु... मावा... सिगारेट... नशा...) अशापैकी काहीही... हिरोप्रमाणे वागण हेच यांना माहीती असत... व मुली ..कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतय.. महागड्या हॉटेलमध्ये जेवण वा स्नँक्स खाऊ घालतायत... आलिशान गाड्यातुन सफर करवतात... आपल्या सौंदर्यांयाची मनभरुन तारीफ करातायत... बारिक.. सारिक.... गोष्टींच .. हसण्याच... बोलण्याच... चालण्याच... लाजण्याच... बेधडक स्वभावाच.... आवाजाच... कौतुक करत असत म्हणुनही ह्या कोवळ्या वयात मुली साहजिकच हरळुनच जातात... मग नेमका हाच गैरफायदा समाजकंटकही घेतात...

    पण आपला पाल्य शाळेतच गेलाय... या गोडगैरसमजुतीत असतात.. पण ही टेक्नोसेव्ही पिढी कदाचित् जरा लवकरच पुढे जायच्या घाईत आहेत... या नादात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात व्हायरस घुसु नये... याची काळजी प्रत्येक पालकांनी घ्यायलाच हवीच तेही ॲन्टीव्हायरस होऊन... हीच विनंती....

    आपला हितचिंतक
    --विवेक जोशी

  • वर्तनशैली – बुफे जेवण

    अलिकडे सर्रास लग्न, साखरपुडा, बारसं, वाढदिवस, यासारख्या असंख्य कौटुंबिक समारंभात जेवणावळी वा पंगत या हद्दपार होत असून बुफेने अलगद घुसखोरी केली आहे. बुफेचा उद्देश हा आवडीचं पण नेमकंच खाणं हा असला तरी बरेचदा प्रचंड प्रमाणात उपलब्ध असलेले अनेकविध पदार्थ आणि त्यांची मनमोहक रुपं यांच्या गोतावळ्यात बुफेचा गुंता हा वाढतोच. बुफेसाठी वास्तवात हवेशीर, मोकळी, मुबलक जागा हवी पण प्रत्यक्षात फारच थोड्यावेळी असे हॉल, लॉन उपलब्ध होतात. अपुर्‍या, कोंदट, छोट्या बंदिस्त ठिकाणी कुठेही एक टेबल लावून जेवणाची, ताटांची व्यवस्था करून बुफे म्हणजे या, घ्या अन् भरभर कसरत करून खा अन् फुटा असा काहीसा भाव या बुफे पद्धतीतून व्यक्त होत राहतो. वास्तवात कुठल्याही समारंभाला पाहुण्यांचे अगत्याने स्वागत अन् आग्रहाचे भोजन, आपुलकीने विचारपूस अन् परिचितांशी, हक्कांन ऐसपैस बसत झालेल्या गप्पागोष्टी या अपेक्षित असतात पण येथे नेमके उलटे होते.

    बुफेत जेवणे ही एक कलाच आहे. मुलं, वयोवृद्ध यांची तर फारच पंचाईत हते. एका हातात अवाढव्य पदार्थांची रेलचेल असलेले ताट धरून, मिळेल त्या जागेत, उभ्याने जेवणे ही एक कसरत बनते.

    पाश्चिमात्य जगात एकतर भारतीय जेवणाइतकी विविधता पदार्थात नाही. अन् जे पदार्थ बनतात ते जास्त करून एकाच प्रकारात येतात त्यामुळे ते पदार्थ एकाच डिशमध्ये घेवून खाणे सोपे असते.

    या उलट आपले भारतीय जेवण चटणी, कोशिंबीर, पापड, भात, आमटी, सुकी ओली रस्सा भाजी, स्वीट म्हणून पक्वान्न त्यातही काही घट्ट काही पातळ काही मध्यम जसे श्रीखंड, पुरणपोळी, काला जामुन, गुलाबजाम, बासुंदी, रसमलाई, रसगुल्ला, जिलबी अशा अनेकासाठी ताटली (प्लेट), वाटी (बाऊल) असा सारा मामला एकत्र डिशमधे वाढून खाणं म्हणजे शुद्ध वेडेपणा होय.

    मनुष्यस्वभाव हा अधिरा असतो. घरी प्रत्येक जण नेमकेच जेवतो. पण बाहेर समारंभाला बुफेत मात्र अनेकविध पदार्थांची आकर्षक रेलचेल, तत्सम साउथ इंडियन, पंजाबी तडका, गुजराथी, चाट, बंगाली स्वीट्स, राजस्थानी अशा पदार्थांसाठी स्टॉल लावलेले त्यामुळे त्यातील पाककृती बनताना पाहताच भुरळ पडते. मग काय खाऊ काय नको असं होणं स्वाभाविकच ! पण या ठिकाणी संयम हवा. भले आधी पूर्ण एक चक्कर मारावी. मेनुचा आपल्या आवडीचा ताळमेळ बघावा, मग कुठल्या प्रांताची सैर करायची हे ठरवून त्याप्रमाणे खाद्य मोहीम आखावी.

    बुफे जेवताना आपली वर्तनशैली सुयोग्य हवी. सर्वसामान्यत: आपण भारतीय लग्न असेल वा अन्य समारंभ, यजमानांना भेटून, अभिनंदन करून, भेटवस्तू देऊन मग जेवणाकडे वळतो.

    अशावेळी सर्वप्रथम प्रसाधनगृह वा तत्सम हात धुण्याच्या ठिकाणाचा शोध घेऊन हात स्वच्छ धुवावेत. कारण ते आपल्या हिताचे असते. नियोजित ठिकाणी जाईपर्यंत आपण अनेक ठिकाणी हात टेकवलेले असतात आणि अस्वच्छ हातानी पोटात काही जाणे म्हणजे अनारोग्य होय.

    काही वेळेला आपल्या समवेत वा हॉलमध्ये अनोळखी, अपरिचित अशा अपंग, वयोवृद्ध व्यक्ती असतात. अशावेळी आपण वा अन्य तरुण मंडळींनी पुढाकार घेवून अशांची टेबलखुर्चीसाठी व्यवस्था करावी. टेबल नसेल तर किमान 2 खुर्च्या आमने सामने ठेवून मांडामांड करुन देत त्यांची बसण्याची, पर्यायाने जेवणाची त्यातल्यात्यात सुलभ व्यवस्था करून द्यावी.

    अशा व्यक्तींना हात धरून प्रसाधनगृहात नेऊन वॉशबेसीनवर हात धुवून द्यावेत. अनेकदा चित्रविचित्र नळांमुळे या व्यक्तींचा गोंधळ होत असतो.

    वयोवृद्धांच्या, अपंगांच्या आवडीनुसार पदार्थ वाढून आणावेत. सोबत पाण्याचा पेला ज्यामुळे त्यांना भोजनाचा आनंद घेता येतो.

    त्यांचे भोजन झाल्यावर केटररच्या माणसांना सांगून त्यांचे खरकटे ताट धुण्याच्या टबात ठेवावे वा आपण स्वत: ठेऊन यावे.

    बुफेत जेवतांना, पदार्थ वाढून घेतांना भले अनेकदा जावे लागले तरी चालेल पण एकदम सर्व काही पानात वाढून घेणे टाळावे ज्यामुळे बुफेतील अनेकविध पदार्थांचा मनमुराद आस्वाद सर्वजण सहजतेने घेऊ शकू.

    मर्यादित वाढून घेतलेल्या पदार्थांमुळे तिखटाचे गोडात, भातात सांडलेली बासुंदी, ग्रेव्हीत भिजलेली भजी, पुरी असा सांडलवणपणा न होता एका हातात पेलवेल इतपतच जेवण जेवणे शक्य होईल. पदार्थाचा विचका होणार नाही पोटाला मानवेल आणि हातापायाला झेपेल अन् मानेवरही ताण येणार नाही.

    सर्वात महत्वाचे, हॉलमध्ये फिरताना आपला पोशाख, इतरांचे पोशाख स्वच्छ राहतील. परस्परांच्या अंगाला खेटलो तरी ओशाळी परिस्थिती उद्भवून सॉरी म्हणण्याची तसदी पडणार नाही.

    उन्हाळ्यात बेताने खावे. पदार्थ पानात अधाशाप्रमाणे वाढून न घेता चिमुकला वाढून चाखून बघावा. आवडला, मानवला तर भरपूर घ्यावा. अन्यथा अनेकदा नवनवे पदार्थ आकर्षित वाटले तरी चवीला, आपल्या स्वादाला, न भावणारे असल्याने मग पानात घेतलेत म्हणून खा वा सरळ टाका असा घोळ टाळण्यासाठी आधी थोडासा पदार्थ टेस्ट करा मग पानात घ्या. अन्नाची नासाडी ही टाळायला हवी. आजच्या भारतातील 30% हून अधिक जनता ही अर्धपोटी आहे याची जाणीव ठेवावी.बुफेत लहान मुलांना अनेकदा स्वतंत्र ताट दिलं जातं. वास्तवात त्याची काहीच गरज नाही. आपल्या घरच्याप्रमाणेच आपल्या ताटातून मुलांना भरवता येते. मुलांचे थोडेसे खाणे, त्यांच्या आवडीनिवडी, काही पदार्थांना हातही न लावणे, तिखट गोड आवडी, त्यांचा हट्टीपणा याची मोठ्यांना, त्यांच्या पाल्यांना जाणीव असते. अशावेळी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी आणि यजमानांचा ताटाचा खर्च वाचण्यासाठी जागरुक रहावे.

    बुफेसाठी वापरण्यात येणारी मेलॅमीन भांडी, यात ताटवाटी चमचे हे बहुतकरून ओशट, कळकट असतात त्यातून जेवणे म्हणजे हतबलता. यासाठी केटररला आधीच विश्वासात घेऊन स्वच्छतेची हमी घ्यायला लावावी. स्वादिष्ट, रुचकर पदार्थांचे गुणधर्म कायम राहण्यासाठी वेळप्रसंगी अधिक खर्चाची तरतूद ठेवावी. यासाठी केटररने सहकार्य करावे. स्टीलची ताटे ही पूर्वी पंगतीत असत पण तेव्हा ते ताट हातात धरून जेवायला लागत नसे. आता उभ्याने, मर्यादित जागेत भोजनाचा खटाटोप असल्याने एवढी जड ताटे हातात धरणे अशक्यच पण त्यासाठी तडा गेलेली,रंग उडालेली, मळकी घाणेरडी ताटे हा पर्याय होऊ शकत नाही.

    स्वच्छतेसाठी प्रत्येकानेच आग्रही असायला हवे. खोलगट कप्प्याच्या पत्रावळी हा उत्तम पर्याय होऊ शकतो. यातच पानांच्या वा पातळ प्लॅस्टिकच्या अशा प्रकारांचा स्वीकार झाला तर वापरा आणि टाका अशा सुलभ पद्धतीमुळे सुग्रास भोजनाचा चिंतामुक्त आनंद लुटता येईल. बुफेत सर्वसामान्यत: 'घेशील किती दोन करांनी खात रहा एक तोंडानी'अशी स्थिती असते. अनेकविध पदार्थांची, मनमुराद लूट, 'मर्यादित काही नाहीच अगडबंब सारे' या न्यायाने अनेक बुफे पाटर्यांमधून वाजवीपेक्षा जास्त अन्नपदार्थ तयार होऊन ते अन्नाची नासधुस होण्यासाठी कारणीभूत ठरतात.

    भारतात आजच्या घडीला 23 कोटी लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही.

    एकाच वेळी अनेक पदार्थांचे सेवन म्हणजे अपचन, पर्यायाने आजारपण अन् डॉक्टरला निमंत्रण !

    आपल्या सर्व धर्मांमध्ये अन्नाचे किती आणि काय महत्व आणि सेवन यावर किती अन्न आवश्यक ते कथन केले आहे. वास्तविक आपले दोन तळ हात जोडले की जेवढा आकार होतो तेवढेच पोट असते. जैनमुनी किंवा बौद्ध यांच्या प्रमाणेच शंकराचार्यांनीही 'करतल भिक्षा' म्हणजेच आपण प्रत्येकाने किती खावं हे भाष्य केले आहे. ज्याचे पालन अशा सर्व बुफेच्या सणासमारंभातून सर्वांनी व्यक्तिगत सामुहिक स्तरावर केलं तर ते चांगलं होईल. ज्यामुळे जगातील कोणीही कुपोषित भुकेला न राहता सर्वांसाठी अन्न उपलब्ध राहील. घराबाहेरच्या जगात प्रत्येक माणूस कसा वागतो, राहतो, बोलतो हे महत्वाचे आहे. काही वर्षांपूर्वीच्या अभ्यासक्रमात नागरिक शास्त्र हा एक विषय असायचा. एक नागरिक म्हणून आपली काय कर्तव्ये आहेत, समाजात कसे रहावे, वावरावे याविषयीचे धडे त्यात असायचे. विषय सोपा, चांगले गुण मिळतात म्हणून त्यात प्राविण्य मिळवलं जायचं. कमी अभ्यासाचा पण जास्त फायद्याचा म्हणून त्याचा गवगवा असायचा. वास्तविक हा विषय केवळ अभ्यासापुरता मर्यादित न ठेवता माणूस हा कितीही मोठा झाला तरी आणि जगाच्या पाठीवर कुठेही फिरला तरी या विषयाचे आकलन आणि व्यवहारात त्याचे पालन करणे गरजेचे आहे. कारण शिष्टाचार, तुमची वर्तनशैली यावरच देशाची प्रगति वा अधोगति होत असते. म्हणूनच एक जबाबदार नागरिक म्हणून प्रत्येकाची वर्तणूक सभ्य आणि नियमबद्ध हवी.

    अशा अनेक प्रकारच्या वर्तनशैलीचा आपण सर्वांनी विचार करून ती आत्मसात केली तर सार्वजनिक जीवनातला आपला वावर हा उपद्रवी न होता सुखकर आणि आनंददायी होऊ शकतो.

    समता गंधे
    ५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
    गोरेगांव (पूर्व), मुंबई
    ४०००६३०२२-२८७४५६८१

  • काहीतरी आगळे वेगळे

    उतार वयात ‘काहीतरी आगळे वेगळे’ करण्याचे धाडस करणे म्हणजे एकप्रकारचा मूर्खपणाच असे अनेकांचे मत असते. माझे वय 70 रनींग तर माझ्या सौभाग्यवती अपर्णाचे वय रनींग 64. हे वय खरे म्हणजे आराम करण्याचे, तब्येतीची काळजी घेण्याचे, हरि हरि म्हणत स्वस्थ बसण्याचे. अशा वेळी थायलंडमध्ये बॉंकॉक येथे जाऊन 3 आठवड्यांचा ‘इंग्रजी कसे शिकवायचे’ या सारखा एक कोर्स अटेन्ड करणे म्हणजे येडपटपणाच! ‘वयाच्या 70 व्या वर्षी तुला मास्तरची नोकरी कोण देणार?’ माझ्या एका मित्राने कुचेष्टेने विचारले. ‘तीन आठवडे आणि ते सुद्धा बॉंकॉकला! ते सुद्धा ज्याचा काही उपयोग नाही असा कोर्स करण्यासाठी? भारतामध्ये सुद्धा के कोर्सेस होत असताना थायलंडला कशाला जायचे? ही तर पैशांची उधळपट्टी आहे. तुला जर पैसे जास्त झाले असतील तर दानधर्म कर!’ माझ्या एका मित्राची संतप्त प्रतिक्रीया. पण ‘ऐकावे जनाचे व करावे मनाचे’ या उक्तीप्रमाणे आम्ही दोघांनी हा कोर्स बँकॉकला जाऊनच करायचे ठरवले व त्याबद्धल आम्हाला अजीबात ‘रिग्रेट’ होत नाही.

    15 जानेवारीपासून, म्हणजे मकर संक्रांतीच्या शुभमुहुर्तावर याची सुरवात झाली. आधी आम्हाला या कोर्सला प्रवेश मिळेल की नाही ठाऊक नव्हते. पण या कोर्सला वयाचे, शिक्षणाचे व अनुभवाचे कसलेही बंधन नाही त्यामूळे ऍडमीशन मिळाली. बँकॉकच्या एका उत्तम हॉटेलात तीन आठवडे रहाण्याची सोय, ब्रेकफास्ट व लंचची सोय हे आकर्षण होते. पण तीन आठवडे बँकॉकला रहाणे जमेल की नाही, तेथील ‘फूड’ सोसवेल की नाही असे काही प्रश्न होतेच. तरी सुद्धा आम्ही हे धाडस करायचे ठरवले व एका सुरेख अनुभवाचा आनंद घेऊन परत आलो.

    अमेरिकन टेसॉल इन्स्टीट्युट (ATI)तर्फे ‘टेसॉल’ (TESOL-Teaching English to the speakers of other languages) व ‘टीएफएल’ (TFL- Teaching English as Foreign Language) असा 3 आठवड्यांचा 120 तासांचा कोर्स घेण्यात येतो. दिनांक 7 फेब्रुवारी रोजी आमचे बँकॉकला आगम झाले. जेएल बँकॉक या हॉटेलमध्ये आमची रहायची सोय करण्यात आली होती. प्रथमदर्शनी हे हॉटेल तसे सामान्यच वाटले पण तेथे रहायला सुरवात केल्यावर ते एक उत्कृष्ट हॉटेल असल्याचे लक्षात आले. तेथील रेस्टॉरन्टमध्ये ब्रेकफास्ट व लंचमध्ये अनेक उत्तम उत्तम पदार्थ खायला मिळाले. भरपूर पडथाई चापली. असो.

    दिनांक 8 फेब्रुवारीला आम्ही सर्व हा कोर्स अटेन्ड करणारे पहिल्यांदा भेटलो व ‘हे विश्वची माझे घर’ असल्याचा प्रत्यय आला. आम्ही एकुण 9 जण होतो. त्यामध्ये 4 जण भारतातले (आम्ही दोघे व हॅरी पुण्याचे तर सीमा बंगलोरची), पिटर स्वीझर्लंडचा, अनुम पाकिस्तानची, नाओमी जपानची, केनेथ टर्कीमध्ये सेटल झालेला पण मूळचा अमेरिकेतला, विन्सम मुळची दक्षीण आफ्रेकेतली पण आता चीनमध्ये काम करत असलेली असे निरनिराळ्या देशातले व निरनिराळ्या वयोगटातले होतो. हॅरी सर्वात तरूण म्हणजे 23 वर्षांचा तर मी वयाने सर्वात जास्त 70 वर्षांचा! पण या 21 दिवसांच्या सहवासाने आम्ही सर्व जण जणुकाही उकरूप होऊन गेलो. वयाची व तसेच स्त्री-पुरुष अशी बंधने आपोआप गळून पडली व आम्ही सर्व उकमेकांचे घनिष्ट मित्र झालो. नंतर आम्हाला बेल्जियम मधला फिलिप पण येऊन मिळाला. सर्वजण मला ‘उल्हास’ या एकेरी नावाने बोलवत होते त्यामूळे बरे वाटत होते. (नाहीतर आपल्याकडे ‘उल्हासराव, अपर्णाताई’ व जोशीचे ‘जोशीबुवा’! या ठिकाणी नो राव, नो ताइ, नो बुवा). धमाल मस्तीबरोबरच शिक्षण पण चालुच होते. आमच्यासारख्या वयस्कांना हे तरूण कसे सामावून घेतात याची धास्ती होती पण ती दूर झाली व सर्वांचे छान सहकार्य मिळाले. शिक्षण क्षेत्रात किती आधुनीक बदल होत आहेत याची जाणीव झाली.

    येथील प्रत्येक दिवस हा नवीन असायचा. रोज काहीतरी नवीन शिकायला मिळायचे. वेळ तर इतका बिझी जायचा की श्वास घ्यायला फुरसत नसायची. उतार वयात नवीन गोष्टी शिकणे काहीसे अवघड असते पण अशक्य मात्र नसते याचा प्रत्यय आला. कुहुरिमा बसू ही आमची ट्रेनर होती. उत्तम ट्रेनर कसा असावा याची ती एक आदर्श उदाहरण आहे. अत्यंत शांतपणे, संयमीतपणे, शिस्तबद्ध पद्धतीने व अचूक निरिक्षण या पद्धतीने तिचे ट्रेनींग चालायचे. दुसरी अलौकीक व्यक्ती भेटली म्हणजे पाक ही थाई तरुणी. ती लोकल कोऑर्डीनेटर आहे. पाक म्हणजे उत्साहाचा झराच. सदैव हसणारी म्हणून आम्ही तिचे नांव ‘स्माइलींग पाक’ असेच ठेवले होते. अत्यंत कार्यक्षम व सदैव मदतीला तयार. तिचा 3 वर्षांचा गोड मुलगा बॉम्बे याच्याशी पण आमची दोस्ती झाली.

    आम्हाला एकुण 3 शनीवार व 3 रवीवार सुट्टीचे मिळाले. पहिल्या शनीवारी आमची ‘आयुथ्या’ या ठिकाणी ट्रिप काढण्यात आली. ती अविस्मरणीय ठरली. तर दुसर्याच रवीवारी बँकॉकमधील चॅटु चॅट या आशिया खंडातील, 8000 दुकाने असलेल्या, सर्वात मोठ्या मार्केटला भेट दिली.

    थाई शाळांमध्ये जाऊन प्रत्यक्ष शिकवणे हा एक रोमांचकारी अनुभव होता. वयाच्या 70 व्या वर्षी मी आयुष्यात पहिल्यांदाच मुलांपुढे ‘मास्तर’ म्हणून उभा राहीलो होतो व ती सुद्धा अशी मुले की त्यांची भाषा मला समजत नाही की माझी भाषा त्यांना कळत नाही. पहिल्यांदा 3 री ते 6 विच्या मुलांसाठी दोन लेसन्स घेतले व नंतर एका ज्युनीअर कॉलेजमध्ये 17 वर्षांच्या ‘टिन एजर्स’ साठी दोन लेसन्स घेण्याची संधी मिळाली. आधी खूप दडपण आले होते. पण ‘गुड मॉर्निंग टिचर’ या मुलांच्या उस्पुर्त स्वागताने सगळे दडपण पळून गेले. यावेळी माझे 1ली ते 4 थी पर्यंतचे शिक्षण ज्या शाळेत झाले-पुण्याचे बाल शिक्षण मंदीर- या शाळेची व या शाळेतील चिंचोरे गुरुजी, पेंडसे गुरुजी, जोशी गुरुजी (सुप्रसिद्ध गायक यशवंतबुवा जोशी), खारकर बाई यांची प्रकर्षाने आठवण झाली. या थाई मुलांचा प्रतिसाद अभुतपूर्व असा होता. मी शिकवलेले त्यांना किती कळले ठाऊक नाही पण त्यांचा प्रतिसाद उत्तम होता. ‘मुले म्हणजे देवाघरची फुले’ असे परमपुज्य साने गुरुजींनी म्हणून ठेवले आहे ते किती बरोबर आहे हे कळले. मला वाटते की उतारवयाचे किंवा निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखात घालवायचे असेल तर खुशाल एखाद्या शाळेत जाऊन मुलांना शिकवावे किंवा गोष्टी सांगाव्यात. या सारखा दुसरा आनंद नाही.

    शेवटचा दिवस होता ग्रॅज्युएशन सेरेमनी म्हणजेच सर्टिफिकेट देण्याचा समारंभ. या ठिकाणी धमाल मस्तीबरोबर काही भावूक क्षण पण होते. अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते.

    अशा प्रकारच्या अनेक सुखद आठवणींचा खजीना घेऊन आम्ही परत आलो आहोत. आता आमच्यातील मरगळ संपुष्टात आली आहे. एक नवीन उर्जा निर्माण झाली आहे. एक नवीन दृष्टी मिळाली आहे. इंग्रजी शिकवण्याचे जे नवील कौशल्य आम्ही प्राप्त केले आहे याचा उपयोग करायची संधी मिळेल की नाही सांगता येत नाही. पण ग्रामीण भागातील मुलांचे इंग्रजी सुधारण्यासाठी याचा उपयोग व्हावा अशी इच्छा आहे.

    बघुया पुढे काय घडते ते!

    तुम्हाला काय वाटते?

    (ही पोस्ट म्हणजे ATI-TESOL ची पब्लिसिटी किंवा प्रमोशन करण्यासाठी लिहीली आहे असा गैरसमज कृपया कोणी करून घेऊ नये. कारण हा मुळ उद्देश नाही व ATI त्याची गरज पण नाही. ही पोस्ट फक्त आलेला अनुभव शेअर करण्यापुरतीच मर्यादीत आहे व वाचकांनी ती ‘प्रॉपर स्पिरिट’ मध्ये घ्यावी ही नम्र विनंती आहे.)

    -- उल्हास हरी जोशी

  • सुरक्षित बँकिंग

    //

    बँकिंग व्यवसाय आधुनिक झाला आणि त्याचबरोबर त्यातील फसवाफसवीचे प्रमाण वाढू लागले. याविषयी अधिक माहिती जाणून घ्या. दयानंद नेने यांनी फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट. अतिशय वाचनीय.

  • वर्तनशैली – कचरा अस्वच्छता

    कचरा हा म्हटला तर दुर्लक्षित पण वास्तवात आपल्या दैनंदिन जीवनाशी जोडला गेलेला असा घटक आहे की ज्याच्या अस्तित्वाने स्वच्छतेच्या अनेक बाबींमध्ये अडचण निर्माण होते. रोगराई अनारोग्य निर्माण होते. परिसर हा गलिच्छ दुर्गंधीने हैराण तर होतोच पण प्रत्येकाला लाज वाटावी अशी ओंगळवाणी प्रतिमा जगासमोर होते जी हे 'विश्वची माझे घर' म्हणणार्‍या भारताला निश्चितच भूषणावह नाही. देश म्हटला की त्यात राहाणारे सारे लोक त्यांच्या रीती भाती याचबरोबरीने घरासारखाच देश मानणारी प्रवृत्ती अशा अनेकविध मानवी प्रवृत्तीतून कचरा आणि आपण, स्वच्छता आणि तिचे व्यवस्थापन यांचा व्यापक विचार होणे गरजेचे आहे. भारतीय मनोवृत्तीचे हे एक मोठे लक्षण आहे की त्यांना अमेरिका, सिंगापूर, चीन, जपान अशा अनेक देशांचे अतिशय कौतुक आहे. अनेक गोष्टींचे अनुकरण करण्यात त्यांचा पुढाकार असतो. एवढेच नव्हे तर तिथल्या क्लीन सिटीचे, पद्धतीचे भरभरून कौतुक करताना ते मागे हटत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भारतात किती कचरा, अस्वच्छता हे ते टीका करण्यात या लोकांना काहीच गैर वाटत नाही.

    काही अपवाद वगळता हाच भारतीय माणूस त्याच्या दिनक्रमात बिनदिक्कत रस्त्यावर, बागांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, पर्यटनात भरपूर कचरा करून कुठेही फेकताना दिसतो. यात त्याच्या समोर असलेली लहान मुलं तेच अनुकरण करतात. कारण त्यांच्यापुढे पालकांचे, मोठ्यांचे हेच वागणे असते.

    अशी मंडळी रेल्वे, बस, बगीचे, मैदाने अन्य सार्वजनिक ठिकाणे, स्वत:च्या वाहनातून प्रवास करतांना खिडक्यांतून रस्त्यावर कचरा टाकण्यात अग्रेसर असतात. एवढंच कशाला तोंडातील पानाचा, गुटख्याचा तोबरा रस्त्यांवर टाकणे, थुंकणे, पिचकारी मारणे, कुठल्याही कार्यालयाच्या, भिंतीवर असलेले घाण नक्षीकाम म्हणजे भारतीयांचा वावर ही जगभरात भारतीयांची ओळख ठरते म्हटलं तर चुकीचे ठरू नये.

    सार्वजनिक स्वच्छतागृहाचा शोध न घेता कुठेही लघवी सोडणे अन् परिसर घाण करणे याची लाज का वाटत नाही हा प्रश्न पडतो.स्वच्छतागृहाचा वापर करणारे फारच थोडे अन् तेही पाणी टाकतील, फ्लश ओढतील असे दृश्य विरळच.

    त्यामुळेच बहुतेक ठिकाणी नाकावर रुमाल धरूनच प्रवेश करायला लागतो अन् तेथील अस्वच्छता पाहून मळमळायला लागते. महिलांची तर एवढी कुचंबणा होते की टॉयलेटला जायचं म्हटलंकीच धस्स होतं. प्रवासात वेफर्स, बिस्किट्स, स्नॅक्स, टॉफी अस काहीही खाल्लं की त्याची वेष्टनं, पिशव्या, चांद्या, पाण्याच्या, पेयाच्या रिकाम्या बाटल्या खिडकीतून सरळ बाहेर फेकल्या जातात. काही महाभाग सार्वजनिक वाहनाने प्रवास करतांना बसल्या ठिकाणीच पायाने कचरा सीटखाली ढकलतात. यात फळ खाताना तर बघायलाच नको. केळी, संत्री, चिक्कू, आंबे, जांभळ यांची सालं, बिया कोठेही फेकताना, ढकलताना आपल्या या बेशिस्त वर्तनाने इतरांच्या अपघाताला, अपंगत्वाला या गोष्टी कारणीभूत होतील याची पर्वा न करता कुठेही कसेही खाणे यांचे आपले चालूच. शेंगांची टरफलं तर नेहमीचीच. शेंगा या अशाच खायच्या असतात जणू!

    वास्तवात प्रवास करताना प्रत्येकाने लांब अंतराचा की जवळचा हा विचार करून सरसकट कागदाची, प्लॅस्टिकची कचराबॅग बरोबर घेणे जरूरीचे आहे. व्यक्तिगत वा एकत्र कचरा या पिशवीत टाकावा. जो मुक्कामाच्या ठिकाणी, घरी, अन्यत्र कचराकुंडीत टाकणे सहज शक्य आहे. ज्यामुळे रस्त्यावरचा कचरा कमी होऊन रस्ते, पर्यायाने परिसर स्वच्छ राहील. त्याच बरोबर सफाई कामगारांचे काम कमी होईल. तेही आपल्यासारखीच माणसे आहेत. त्यांच्या स्वच्छतेच्या कामालाही मर्यादा आहेत ही एक माणूस म्हणून सर्वांनी जाणीव ठेवावी.

    मुंबापुरीत खास करून फेरीवाल्यांचे रस्ता आक्रमण आणि त्यावरील विक्री यातून निर्माण झालेला कचरा हा रस्त्यांवरच टाकला जातो. यात भाज्या, फळांमुळे कुबट ओला कचरा तयार होतो जो दुर्गंधीयुक्त अनारोग्य देतो. रस्त्यावरचे खाद्यपदार्थ विक्रेते, या सर्वांनी एक कचरा डबा ठेवून त्यातच दिवसभराचा कचरा जमा करून व्यवसाय बंद झाल्यावर कचराकुंडीत कचरा टाकणे गरजेचे आहे.

    फ्लायओव्हर, पदपथावरच्या झोपड्या यातून जो कचरा निर्माण होतो तो तर वाढता वाढे ढीग स्वरूपात असतो. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून त्यांचे प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांना कचराडबे पुरवण्यात यावे. घंटागाडी या परिसरापर्यंत नेण्यात यावी. कचरा त्यातच टाकण्याची समज द्यावी, तशी सक्ती करावी अन्यथा नाममात्र एक रुपया वा तत्सम दंड आकारावा.

    मुंबापुरीत काही विभागात काहींचे बंगले, बैठी घरं आहेत त्यांनी आवारातील वृक्षांचा पडणारा पालापाचोळा वेळी अवेळी जाळून धूर, प्रदुषण करू नये.त्याऐवजी हा कचरा आवारात खड्डा करून त्यात टाकून कचर्‍यातून खत निर्मिती करावी. वा कचरा गोळा करून घंटागाडीत कचरा डब्यात द्यावा. अनेक सोसायट्या, इमारती, चाळी या दर्शनी भागात पॉश, साफसुफ असतात मात्र यांची मागील पाठची बाजू म्हणजे कचऱ्याचे उकीरडे असतात म्हटलं तर वावगं ठरू नये. ज्यांची सांपत्रिक स्थिती उत्तम, उच्चभ्रू,सुशिक्षित कुटुंबही याला अपवाद नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. अशा बर्‍याच सोसायट्यांच्या सभासदांमध्ये काही सदस्य हे दाराशी येणार्‍या कचर्‍यावाल्याकडे घरातील कचरा न देता मागील बाजूस घरातूनच डस्टबीन उपडी करतात. यात आपल्या खालील मजल्यावरच्या लोकांना त्रास होतोय, हे गैर आहे याची जाण नसेल का? पण जडलेल्या गलिच्छ सवयी. यात सॅनेटरी नॅपकिन्सपासून केसांच्या गुंतवळीपर्यंत सारं, काहीच यांना वर्ज्य नसतं अशा बेतालांना काही दंड वा सजा करण्याची मुभा सर्वांना हवी असे म्हणावे वाटते.

    कचरा उचलणार्‍या सफाई कामगारांचे आरोग्य आणि माणुसकीचा दृष्टीकोन बाळगून सर्व फ्लॅटधारकांनी घराघरात ओला आणि सुका कचरा हा वेगवेगळा करून दोन डस्टबीन कटाक्षाने घरात ठेवाव्यात.

    अलीकडे सण समारंभ हे भरपूर आणि दणक्यात साजरे होतांना फटाके मस्ट् झालेत. पुन्हा हे फटाके अत्यंत जलदगतीने टायमरने उडवले जातात. या फटाक्यांपासून खूपच कागद, कपटे, कचरा रस्त्यांवर पडत राहतो अशावेळी संबंधित उत्सव प्रेमींना संयोजकांनी, सरकारनी तो कचरा त्वरित उचलण्यासाठी आग्रही असावे. एवढ्या भफबाज समारंभात तो कचरा झाडून एकत्र गोळा करण्यासाठी काही माणसं रीतसर त्यांना पैसे/पगार देऊन कामाला लावणे त्यावर खर्च करणे अशक्य नाही. कुठल्याही कामाची, कार्यक्रमाची शोभा ही व्यक्तिगत स्तरावर वा लोकांसाठी करतांना सामाजिक स्वच्छतेची जाण हवीच. हिच गोष्ट सर्व रिअॅलिटी शो, वाढदिवस, बक्षिस समारंभ, कुठलेही इव्हेंट यांच्या झिरमिळ्या सदृश्य रंगीत कागदी पावसाला स्वच्छतेचा अंकुश हवाच जेणेकरून त्या कार्यक्रमानंतर तिथे कचरा कुंडीचे रूप येणार नाही.

    अलीकडे शुभेच्छांपासून श्रद्धांजलीपर्यंत सर्वत्र फ्लेक्सचा जमाना आला आहे. पहिले नेतेमंडळींचे जन्मदिवस वा निधन, उद्घाटन, निवडणुका, स्वागत अशावेळी ब्लॅकबोर्डचा वापर केला जाई जो कार्यक्रम झाल्यानंतर पुसला जाऊन बोर्डवर नवनव्या बातम्यांचे लेखन होई त्या उलट अलिकडे फ्लेक्सचे झालल आगमन यामुळे ठिकठिकाणी समारंभ झाल्यावरही कित्येक दिवस किंबहुना कायमच हा फ्लेक्सचा टांगलेला कचरा सर्वत्र लोंबकळत राहतो. याच धर्तीवर जाहिराती, पोस्टर, बॅनर, स्टिकर यांनी रेल्वे, बस, भिंती विद्रूप तर होतातच पण हा कायमस्वरूपी कचरा ठाम मांडून बसतो. अन् मग कुठेही, कसेही, केव्हाही मसाजापासून बाबा बंगालीपर्यंत सर्वांना अवाजवी महत्व देऊ केले जाते. ज्यातून अनेक भोंदू अनैतिक गोष्टींचे पेव फुटते ते निराळेच. सर्वांचा वाईट, चुकीचा उद्देश नसतो. आकर्षकपणा, सुबकपणा यांचे आकर्षण असावेच पण हा नीटनेटकेपणा समारंभ पूर्ण झाल्यावर गुंडाळून व घडी करून ठेवणे अन् पुढच्या अनेकांसाठी स्वच्छतेचे पालन करणे, त्या अन्यांसाठी या जागेचा सुयोग्य वापर करून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. जेणेकरून आधुनिकतेचा अंत जपतांना या प्रवृत्तीचा सर्वत्र प्रसार होईल अन् कुणीच नेता वा कार्यकर्ता वा सर्वसामान्य नागरिक अस्वच्छता करण्यास धजावणार नाही. पर्यायाने क्लीनसिटीचे स्वप्न साकार होण्यास हातभार लागेल.

    थोडक्यात आपण प्रत्येकाने आपल्या देशाचा सदस्य या नात्याने आपली जबाबदारी समजून वर्तणूक ठेवली पाहिजे. टीका करणे सोपे असते पण आपल्या कल्पनेतील देश जगाच्या पाठीवर साकारताना आपण सर्वांनी केलेले प्रयत्न, वर्तन, आणि देश म्हणजे आपले घरच ही भावना जपायला हवी. आपण आपल्या घरात घरभर फळांच्या साली, खाद्यपदार्थांची वेष्टन अन्य कचरा करतो का? त्यासाठी नियोजित केलेल्या कचऱ्याच्या डब्यात तो टाकणे हे प्रत्येकजण अगदी लहान मुलंही करत त्यामुळेच आपला गाव, शहर, परिसर देश सर्वत्र आपलं घर समजून स्वच्छतेचे सुयोग्य पालन केले तर कचरा समस्या दूर होईल. पर्यायाने भारतात परदेशाकडे बोट दाखवण्याची जरुरी न उरता आपल्या देशाप्रमाणेच सर्वत्र स्वच्छता दिसली अशा आशयाची विधान आपण खुलेआम करून भारताची क्लीन नेशन ही अभिमानास्पद प्रतिमा सन्मानाने मिरवू शकू.

    समता गंधे
    ५८/८, वसंतसृष्टी, पांडुरंगवाडी
    गोरेगांव (पूर्व), मुंबई
    ४०००६३०२२-२८७४५६८१