धार्मिक कार्यापासून लावणीच्या फडापर्यंत, हा विडा पोचलेला दिसतो. विडा घ्या हो नारायणा या आरतीनंतर म्हणण्याच्या आळवणी पद्यापासून ते अगदी कळीदार कपूरी पान कोवळं छान, घ्या हो मनरमणा, या लावणीपर्यंत या विड्याची रंगत गाजत होती, गाजत आहे, आणि गाजत राहणार आहे.
आपल्या आहारातील काही अत्यंत महत्वाच्या पदार्थाविषयी किंवा प्रमुख सूत्राविषयी आपण आता चर्चा करूया.
आहार हेच औषध आहे. हा आहार जर युक्ती वापरून बनवला तर वेगळ्या औषधांची आपल्याला गरजच पडू नये. शास्त्रीय स्पष्टीकरण देण्यापेक्षा जास्तीतजास्त व्यावहारिक स्तरावरून आहार अभ्यासला पाहिजे.
देशानुसार आहार विचार करावा. म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहातो, त्या प्रदेशात उगवणारे अन्नधान्य आपल्याला हितकर असते. उगाचच कोणत्या तरी कंपनीच्या अहवालानुसार, कोणत्या तरी प्रयोगशाळेचा दाखला देऊन, काही अन्न पदार्थ आपल्या पोटी मारले जातात. आपणही कोणताही विचार न करता ते पदार्थ जणुकाही आपल्यासाठीच बनवले आहेत, अशारितीने त्यांना अंगिकारतो.
एवढं सांगताहेत, ते आधी वापरून तर बघू, पासून सुरू होत जाणारी आमची गुलामगिरी आमच्या रक्तात एवढी भिनते की नंतर ते आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनून जातात, मग त्या पदार्थातील दोष दिसेनासे होतात. पण ते पदार्थ मात्र आपला प्रभाव आतून दाखवतच असतात.
जसे सोयाबीन. मुळात डुकरांना माजवण्यासाठी पाश्चात्य देशात या सोयाचा वापर केला जायचा. याची तशी काही आवश्यकता आहे, असे अजिबात नाही. पण भ्रष्टाचार कोणत्याही स्तरावरून केला जाऊ लागला. आणि भारतातील मोठ्या प्रमाणात असलेल्या कुपोषितांच्या सोईसाठी या सोयाची आयात केली गेली. त्याच्या शेतीसाठी अनुदान देणे सुरू झाले. जिथे सोयाची शेती केली जाते, तिथे अन्य पिके कुपोषित राहातात. तेथील जमिनीतील पाण्याचा स्तर इतर जमिनीपेक्षा अधिक खाली जातो. पण लक्षात घेतो कोण ?
मुळात अभारतीय असलेला हा धान्य प्रकार आमच्या स्वयंपाकघरात असा काही घुसवला गेला आहे, की आमचे पूर्वजांनी हे सोयाबीन आम्हाला न दिल्यामुळे आमचे अतोनात नुकसान झाले आहे, असे काही वेळा वाटते. नेहमीच्या पोळीच्या पीठात एक मुठ करता करता सोयाच्या दुधापर्यंत, आणि चंक्सच्या रूपात, गरीबांचे चिकन इथपर्यंत त्याची घुसखोरी झालेली आहे.
त्याला सक्षमपणे पर्याय असणारे उडीद, मसूर, चवळी, राजमा सारखे भारतीय पर्याय उपलब्ध असताना या सोयाचे मिडीयाने एवढे कौतुक केले की, स्वतःच्या पोटच्या गोळ्यापेक्षा, सवतीचे पोर आम्हाला आमचेच वाटू लागले.
सोयाबीन हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अश्या कितीतरी अभारतीय गोष्टी आम्ही सहजपणे स्विकारल्या आहेत.
मुळात मेकाॅलेच्या विचारसरणीचा आमच्यावर एवढा प्रभाव पडत चालला आहे, की भल्या भल्यांना देखील आपण दिवसेंदिवस अभारतीय होत चाललो आहोत, हे लक्षातही येत नाही. आमच्या मनातील भारतीयत्व पद्धतशीरपणे विसरायला भाग पाडणारा तो दुष्ट मेकाॅले आमच्या शिक्षणपद्धतीतून अजुनही जिवंत आहे.
स्वत्व गमावल्यामुळे सर्वस्व जाण्याची वेळ लवकरच येते, या न्यायाने आपण जर वेळीच जागे होऊन भारतीय पद्धतीने विचार करणे सुरू केले नाही तर आपण कृतीच्या स्तरावर पण अभारतीय होत जाऊ, अशी प्रामाणिक भीती वाटते.
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
17.01.2017
तुरटी कशी ? या प्रश्नाचे उत्तर अनुभुति घेतल्याशिवाय येत नाही. ती तुरट आहे. हे उत्तर तर सर्वांनाच माहिती आहे. कशाप्रमाणे गोड वगैरे वर्णन करता येईल. पण तुरट म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर काय देणार ना ?
त्यासाठी तुरटी चाखून पाहिल्यावर जे लागते त्याला तुरट म्हणतात. असेच सांगावे लागेल.
यालाच अनुभुति म्हणतांत. प्रत्येक गोष्ट सिद्धत्वाच्या कसोटीवर तपासता येत नाही हेच खरे.
तेच प्रत्येक चवींच्या बाबतीत आहे. वापरून बघितली की, अभ्यास केला की, यांची अनुभूती घेता येते.
या सर्व चवींचे ज्ञान जीभ या ज्ञानेंद्रियानी होत असते. हे एकमेव इंद्रीय उभयात्मक आहे. म्हणजे कर्मेंद्रिय पण आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे.
रसना म्हणजे आत चवीची अनुभुति देणे म्हणून रसनेंद्रिय आणि निर्माण झालेला शब्द बाहेर फेकणे म्हणून वागेंद्रीय.
आत बाहेर दोन्ही कामे करते. म्हणून या जीभेवर संयम आणता आला की, सर्व साध्य झाले. ज्याने जिंकीली रसना, त्याने जिंकिली वासना.
सर्व इच्छांवर संयम आणण्यासाठीदेखील ही तुरट चव मदत करेल.
संयमात ठेवणे हा गुण झाला, पण काहीवेळा तो दोषही होतो. जिथून विष बाहेर काढायचे आहे तिथून ही तुरट चव बाहेर पडायलाच देत नाही. स्रोतसांचे आकुंचित झाल्यामुळे बाहेर पडणारे स्राव कमी होतात. न पचलेले अन्न देखील आत मधे पडून राहाते. आम जागचा हलत नाही, तो तुरट चवीच्या याच स्तंभ गुणामुळे ! त्याचा परिणाम म्हणून पोटदुखी, मलावष्टंभ.
रक्तवाहिनीचा गरजेपेक्षा जास्त संकोच झाला तर रस रक्त विक्षेपणात अडथळे येणे, ह्रदयात वेदना होणे, ह्रदयाची ताकद कमी होणे, ही लक्षणे दिसतात.त्याचा परिणाम अन्य अवयवांवर होऊन यकृत, किडनी इ. मधे पण अवरोध जमा होऊ लागतो. म्हणून थकवा येणे, ग्लानी येणे, उत्साह जाणे, रक्तदाब वाढणे, तोंड सुकणे, आवाज बसणे यासारखी लक्षणे निर्माण होतात. चेहेरा वाकडा होणे, एक बाजू लुळी पडणे, हे वाताचे आजार देखील याच तुरट चवीच्या अतिसेवनाने होतात. हे विसरता नये.
पोषण करणाऱ्या नलिकांचा संकोच झाल्यामुळे कमालीचा अशक्तपणा येतो. वजन खूप कमी होते, प्रतिकार करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकदच संपून जाते. याला देखील हीच तुरट चव जबाबदार आहे.
आपणाला कायम एकच बाजू दिसत असते. दुसऱ्याची चुक आणि आपली बरोबर.
दोन्ही बाजूने विचार करण्याची सवय ठेवली तर भूमिकेला योग्य न्याय देता येतो. आपले काय चूक नि काय बरोबर. आणि ते का. हे शोधले की सापडते.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.11.2016
काळ बदलला. तश्या खाण्या पिण्याच्या सवयी बदलत गेल्या. नियमाला अपवाद असलेल्यांची संख्या पण वाढू लागली.
जंगली कुत्रे फक्त मांसाहारी होते, पण कुत्र्यांना माणसाने पाळण्यास सुरवात केली आणि कुत्रा भाकरी पोळी दूध भात खाऊ लागला. मांजर पण तसेच. लहानपणापासून आयते अन्न खायची सवय लावल्याने ते हा आहार निमूटपणे घेतात, एवढेच ! याऊलट पाळलेली शेळी किंवा गाय कितीही ऊपाशी ठेवली तरी मांसाहारी पदार्थांकडे ढुंकूनही पाहत नाही. आणि सर्कशीतल्या पाळलेल्या वाघ सिंहाला कितीही उपाशी ठेवा, ते गवताला तोंडही लावणार नाहीत.
जे फक्त शाकाहारी होते ते पाणघोडेदेखील मांसाहार करू लागले आहेत म्हणे. कदाचित त्यांचे नैसर्गिक अधिवासातील अन्न संपल्यामुळे काही माकडेसुद्धा मांसाहारी बनू लागली आहेत.
पण शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांच्या शारीरिक आणि मानसिक जडणघडणीमधेच निसर्गदत्त मूलभूत फरक असतो असे लक्षात येते.
शाकाहारी प्राणी स्वभावतः शांत असतात. त्यांच्या जवळ जावे, अंगावरून हात फिरवावा, असे वाटते. अगदीच माजावर आलेला बैल किंवा हत्ती सोडला तर इतर प्राण्यांची भीती वाटत नाही.
जन्म घेतल्यावर लगेचच या शाकाहारी मंडळीचे डोळे उघडलेले असतात. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे अकरा दिवसांची वाट पहावी लागत नाही. गाईचे पाडस असो, किंवा हरणाचे, जन्मल्यानंतर लगेच अकरा सेकंदात डोळे ऊघडून या नव्या जगाकडे बघू लागतात.
कुतुहल असते, नव्या दुनियेचे आणि भीती देखील पुनः मृत्युची. आधीचा मृत्यु आठवत असतो. जन्म आणि मृत्यु च्या या फेऱ्यातून मुक्त होण्याची धडपड अव्याहतपणे चालू असते. आधीच्या जन्मातला, जगण्यासाठी आवश्यक असलेला प्रत्येक संस्कार, इथे लक्षात ठेवला जातो. आचरणात आणला जातो. मग तो शाकाहारी असो वा मांसाहारी !
मातेच्या स्तनात पय निर्माण "तो" करतो. आणि त्या पयापर्यंत कसे पोचायचे हे सुद्धा तोच शिकवतो. नुसते पोचणेच नाही तर स्तनापर्यत पोचल्यावर दूध कसे आचूषण करायचे आणि कसे गिळायचे, हे आई शिकवत नाही. ते जन्माआधीपासूनच शिकलेले असते. दूध कसे आणि कुठुन मिळवायचे, हा आधीच्या जन्मी झालेला संस्कार या जन्मातदेखील लक्षात राहील्यामुळे पोट कसे आणि कुठुन भरायचे याची आठवण ठेवलेली असते.
जगण्यासाठी, भूक भागवण्यासाठी खायचे प्यायचे असते, ही आठवण जर त्याने ठेवलीच नसती तर काय झाले असते ?
जगणेच संपले असते.
जगणे आहे म्हणजे निदान गिळले तर पाहिजे ही भावना जन्मापासूनच जागृत असते, ती अगदी मृत्युपर्यंत.....
पुढच्या जन्मात लक्षात ठेवण्यासाठी !
अनंताच्या प्रवासातील, अनंत आठवणींचा ठेवा फक्त आपल्यासाठी !!
"HE" is simply great !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
29.09.2016
माणूस हे रसायनच काही अद्भूत आहे. सगळं कळतंय, पण वळवत नाही. आध्यात्मिक भाषेत यालाच " माया " असे म्हणतात वाटतं.
एकदा या मायेच्या जालात अडकलं की, माया सोडतही नाही, सोडवतही नाही, सोडलं तरी दुःख, सोडलं नाही तरी दुःख.
असो.
मांसाहारी आणि शाकाहारी प्राण्यांच्या आवाजापेक्षा माणसाचा आवाज, त्यातील चढउतार, गोडवा, हीच त्याची देणगी. सात स्वरांचे ज्ञान आहे, म्हणून गाता बोलता येते, भांडताही येते. असं इतर कार्निवोरस, हर्बीवोरस ना नाही करता येत.
नजर रोखून, डूक धरून खाणे हे माणसाला जमत नाही. एखादा पदार्थ आवडला नाही तर नाक मुरडेल, पण मारक्या बैलासारखा, किंवा कुत्र्यामांजरा सारखा दुसऱ्या वर गुरगुरत तर खाणार नाही. बायकोने केलेलं कसं निमूटपणे गिळतो !!! ( म्हणजे तसं करायचं तरी असतं. )
सकाळी दुपारी संध्याकाळी आणि रात्री असं रोज चार वेळा तरी पोटभर जेवतो. तरीदेखील काही जणांना रात्री परत भूक लागतेच. माणूस मांसाहारी प्राण्यांसारखा एकदा पोटभर खाल्ले की पुढे चार दिवस उपास नाही करत.
माणसाची आतडी, मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लांब असतात, तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा लहान असतात.
मांसाहारी प्राण्यांप्रमाणे तोंड उघडे ठेवून, जीभ बाहेर काढून, श्वासोच्छ्वास करीत तापमान संतुलीत राखत नाही, की अंग चाटत बसत नाही. उन्हाळा आला की घाम खूप येतो, थंडी आली की शू शू खूप करतो आणि शरीरातील विषद्रव्ये बाहेर काढतो.
माणसांच्या अंगाला दुर्गंधी नाही. कारण दररोज आंघोळ करतात. अपवादाने काही महाभाग असतीलही. पण ते घरात रहात नाहीत, हाॅस्टेलला रहात असतील कदाचित !
दया, प्रेम, वात्सल्य, लळा माणसांमधे असते.
नरो वा वानरो वा !
मांसाहारी नरांइतके क्रूर नसतात. हे नक्की.
माणसाचे डोळे जन्मतःच उघडलेले असतात. पण मिटून घेऊन झोप आणल्याचं सोंग मात्र उत्तम वठवतो. मला माहित नव्हतं, विसरलो, जमलंच नाही, सहन झालं नाही, झेपत नाही, ही अशी कारणं हर्बीवोरस किंवा कार्निवोरस देत नाहीत. त्याने नियम केलाय तो पाळण्यासाठी. टाळण्यासाठी नाही. बुद्धीचा अतिवापर झाल्यानं, त्यालाच टाळायला, पिटाळायला, रिटायर करायला निघालेल्यांना काय सांगणार आणि कसं समजवणार ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
2.10.2016

ह्याचा उपयुक्तांग कंद आहे.ह्याची चव तिखट,कडू,तुरट असून हि उष्ण गुणाची व हल्की व तीक्ष्ण असते.हि कफ व वातशामक आहे.
ह्या भाजीच्या बाबतीत तशा आपल्या प्रत्येकाच्याच भावना तशा मिश्र कारण हि तसेच आहे म्हणा हि भाजी आपल्या राष्ट्रात तयार होणारी भाजी नसून इंग्रजांनी आपल्या सोबत हिला येताना आणली होती.तशी हि भाजी काही वाईट नाही हं त्याच्या गो-या सायबा सारखी.हो अगदी तुम्ही हिला गच्चीत एखाद्या मोठ्या कुंडीत लावले तरी चांगली किचन गार्डनींगची हौस पुरी करता येईल तुम्हाला.
ह्या कोबीची फुले दिसतात भारी देखणी व चवीला देखील सुरेख लागतात.अगदी सुकी भाजी,भजी,कोशिंबीर,लोणचे सगळेच छान लागते ह्या भाजी पासून बनविलेले.मी तर अगदी झुणका व पराठे सुद्धा बनवून खाते ह्याचे मस्त लागतात.अगदी कांदा नसताना कांदे पोहे खाणे जरा जड जाते ना मग काय कोबी घाला कांद्याच्या बदली व पहा कसे झकास लागतात पोहे ते.
जसा ह्या भाजीचा वापर स्वयंपाकात होतो तसाच घरगुती उपचारात देखील आपण हि भाजी वापरू शकतो.पण प्रथम तिचे गुण पाहूयात.कोबी हा चोवीस गोड थंड व शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करणारा असून वात दोष वाढवितो.
आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)थकवा जाणवणे,दम लागणे,तोंडास कोरड पडणे,छातीत जळजळ ह्या ५० ग्राम कोबी पाणी न घालता कुकर मध्ये वांफवा व त्याचा रस काढा नंतर त्यात १ चमचा मध व १/२ चमचा जिरेपूड घालून सुर्योदयाच्या वेळी तो रस प्यावा व तासभर काही खाऊ नये.ह्या प्रयोगाने ह्रदयात बळ मिळते.
२)पोट बिघडणे,शौचास भसर होणे,छातीत आग होणे,तोंडास पाणी सुटणे,वजन कमी होणे ह्या तक्रारीकडे १/२ कप कोबी रस+ १ चमचा मध+ १ चमचा गाजर रस हे मिश्रण जेवणा सह थोडे थोडे प्यावे.
३)थंडीत त्वचा रूक्ष होणे,फुटणे,खाजते ह्यात कोबीचा रस व कोथिंबीर रस एकत्र करून त्वचेवर लावावा.
४)लघ्वीची आग होणे,लघ्वी थोडी थोडी होणे,कंबर दुखणे ह्यात १ ग्लास कोबीरस +धणे पूड १ चमचा + २ चमचे खडीसाखर २-३ वेळा विभागून घ्यावे.
५)हिरड्यांतून पू रक्त येत असल्यास कोबीचा रस तोंडात धरून गुळण्या कराव्या व नंतर गाल व हिरड्यांना तीळ तेल लावावे.
कोबी खायचा अतिरेक केल्यास पोटात वात धरू शकतो.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
अनेकांच्या मनात नको त्या शंका, नको त्या वेळी उद्भवतात. आणि स्वतःच गुंता वाढवित जातात.
झाडांच्या फळे, फुले, पाने, बीया, इत्यादीमध्ये म्हणे जीव असतो, मग ते शाकाहारी लोक कसे खातात ?
मुळात शब्दामधेच लोचा आहे. वनस्पतीना जीव नाही असं कुठं कोण म्हणतंय ? सजीव निर्जीव माहीत आहेच सर्वांना. प्रचलीत शब्द शाकाहारी आणि मांसाहारी असे आहेत. जीवाहारी असा शब्दच मुळात केलेला नाही. म्हणजे वनस्पतींना खातोय म्हणजे जीवहत्या वगैरे काही नाही. अखिल मानवजातीला योग्य पूरक अशी रचना निसर्गाने केलेली आहे, हे विसरून चालणार नाही.
आता आणखी एक लघुशंका.. प्रण्यांपासून मिळते म्हणून, दूध पण मांसाहारी म्हणे.
वाद घालायचेच ठरवले तर अश्या शंका ठीक आहेत. पण मुळात मांसाहारी या शब्दामधेच त्याची मर्यादा स्पष्ट होते. ज्यामधे मांस आणि त्यातील रक्त असते, तसेच ते मांस ज्याला चिकटलेले असते ते हाड, किंवा अगदी स्वच्छ शब्दात सांगायचे झाल्यास आयुर्वेदात जे धातु म्हणून वर्णन केले आहेत, तत्या रक्तापासून पुढील धातुंचे सेवन करणे म्हणजे मांसाहार ! असा ढोबळ विस्तार करता येईल. यात दूध येत नाही. पण अंडी येतात.
असो.
व्याख्यांच्या मर्यादेच्या जाळ्यात न अडकता, आपण माणसासाठी, आयुष्य वाढण्यासाठी, वाढलेलं आयुष्य संपूर्ण पणे निरोगी निरौषधी जगण्यासाठी काय करायला पाहिजे ते आपण बघतोय ना? मग निरर्थक वादात कशाला शिरा ?
तुटे वाद संवाद तो हितकारी....
आयुर्वेदात हितकर आणि अहितकर या शब्दाचा खूप विस्तृतपणे अर्थ टीकाकारांनी सांगितला आहे.
आयुर्वेदाच्या उपयोगितेचे वर्णन करताना ग्रंथकार म्हणतात,
हिताहितम् सुखं दुःखम् ।
आयुस्तस्य हिताहितम्
मानंच्च तच्च यत्रोक्तं,
आयुर्वेद स उच्चते।।
अखिल मानवजातीला योग्य काय अयोग्य काय, हितकर काय अहितकर काय, सुखकर काय दुःखकर काय, या सर्वांची चर्चा किंवा अभ्यास, विचार ज्या शास्त्रात केला जातो, त्यालाच आयुर्वेद म्हणतात.
पशु खातात केवळ पोट भरण्यासाठी
मूर्ख खातात केवळ चव वाढण्यासाठी
संत खातात साधना करण्यासाठी
आणि बुद्धिमान खातात,
शक्ती, आयु, आरोग्य मिळवण्यासाठी...
आपण जो आहार खातो, त्याचा आपले आचार विचार, चिंतन, मनन, व्यवहार, स्वभाव, यांच्याशी घनिष्ठ संबंध असतो. म्हणूनच जैसे अन्न तैसे मन असे म्हटले जाते.
शरीराचे स्वतःचे एक अर्थशास्त्र असते. अत्यंत आवश्यक असेल त्याची पूर्तता पहिल्यांदा केली जाते. त्यानंतर कमी महत्वाच्या गोष्टींकडे शरीर लक्ष देते.
जसे अत्यंत गरीब व्यक्तीला प्रथम पोट भरण्यासाठी अन्न हवे असते. मग कपडे, घर, मनोरंजन, स्वादिष्ट भोजन वगैरे. शरीराच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यावरच मनाच्या गरजा लक्षात घेतल्या जातात. मन संतुष्ट झाल्यानंतरच आत्मा प्रसन्न होण्यासाठी प्रयत्न सुरू होतात.
शरीराच्या प्राथमिक गरजांच्या पूर्ततेनंतर ऊरलेली उर्जा, मनाच्या संतुष्टीसाठी वापरली जाते. त्यातून शिल्लक असलेल्या उर्जेतून आत्म्याच्या गरजांकडे लक्ष दिले जाते, ज्यांची साधना, उपासना, आराधना योग्य असेल त्यांना या आत्म उर्जेचा लाभ मिळतो. तेव्हाच तो ध्यान समाधी यावर लक्ष केंद्रित करू शकतो.
म्हणजेच ही उर्जा मिळवण्याची सुरवात ही आहारापासून आहे. म्हणून हा आहार जेवढा सात्विक असेल तसे चित्तावरचे संस्कार शुद्ध होत जातात.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
16.10.2016
दूध न देणारी गाय, शेतीसाठी निरूपयोगी ठरलेला बैल, शेरडू न देणारी शेळी, रेस हरणारा घोडा, यांना पोसून काय उपयोग? असा विचार करणारी पिढी भारतात जन्माला येतेय. हे संस्कारवान भारतीय संस्कृतीचे दुर्दैव नव्हे काय ? मग आईबाबांना देखील वृद्धाश्रमात टाकायला यांना लाज वाटेनाशी होतेय....
......आणि यात गैर ते काय ?
.......पोराच्या बोटाला धरून पाळणाघरात नेणाऱ्या आईबाबांना नंतर त्यांचे पोर हाताला धरून वृद्धाश्रमाची वाट दाखवणारच.......
.......त्यात नवीन पिढीचे काय चुकले ?
.......प्रत्येक गोष्ट पैश्यावर मोजणाऱ्यांना हीच शिक्षा योग्य आहे. असे कधीतरी वाटते.
पाश्चात्यांच्या संस्कारांना एवढे डोक्यावर बसवले की, आपले हित कशात आहे हेच कळेनासे झाले आहे.
बरे जे कोणी संस्कृतीचे रक्षण करणारे आहेत, त्यांच्यावर तथाकथित संस्कृतीरक्षक अशी उपहासात्मक पदवी देणारेही भारतीयच आहेत. प्रत्येक गोष्टीत फक्त पैसा आणि पैसाच बघणे ही पाश्चात्य वैश्यवृत्ती आहे. हा भारतीय विचार नाही, हे सुद्धा आता कळेनासे झाले आहे.
मग आम्ही भारतीय संस्कृतीरक्षक गाईला गोमाता का म्हणतो हे यांच्या कसे लक्षात येणार ? आणि मातेचे संरक्षण करायचे असते, हे यांना कोणत्या स्तरावरून समजावणार ?
उपयोगिता संपली की या जनावरांना क्रूरपणे, निर्दयपणे खाटीकखान्यात पाठवावे ?
काय म्हणावे या वैचारिक गुलामीला ?
"यांना कत्तलखान्याची वाट दाखवली तर यात गैर ते काय, यांचे पोषण करण्याच्या हट्टापायी भारतीय शेतीचे आजवर नुकसान होत आले आहे. अनुत्पादक गोष्टी तात्काळ संपवल्या पाहिजेत," असे आग्रहाने प्रतिपादन करणारे, एक महत्वाची गोष्ट विसरतात, कि भारतीय शेतकऱ्याच्या दृष्टी ने पशुधन ही प्रेमाची गोष्ट आहे. ज्या बैलांबरोबर आयुष्यभर त्याच्या साथीने आपली उपजिवीका वाहिली, कष्ट करवून घेतले, त्यांची उत्पादकता आणि उपयुक्तता यांचा पैशात हिशोब खऱ्या भारतीय शेतकऱ्याला मंजूर नसतो.
मोठ्यामोठ्या बंगल्यात राहून भाकड पशुधनावर, विनाकारण पोषणाचा आळ ठेवत, चर्चासत्रे झोडणारे मात्र, त्यांच्या बंगल्याची राखण करणाऱ्या कुत्र्याला किंवा लळा लावलेल्या मांजराला, ती वयस्कर झाल्याने आता नष्ट करू, ठार मारू असा विचार करताना दिसत नाहीत. असे का ? (अजून तरी कुत्र्यामांजराचे मांस खायला यांनी सुरवात केली नाही म्हणून असेल कदाचित.....)
एक भाकड गाय देखील नीट नियोजन केले तर दोन माणसाचे कुटुंब पोसू शकते, हे व्यावहारिक भारतीय सत्य आहे. याचा अभ्यास आता पाश्चात्य करू लागले आहेत.
तेव्हा पाश्चात्य संस्कारांनी बुद्धी भेद करणाऱ्यांनी एक लक्षात ठेवावे कि, भारतीय संदर्भ, भारतीय ग्रामीण जनतेची मानसिकता, त्यांची निरूपयोगी पशुंकडे पाहाण्याची दृष्टी, एकुण आर्थिक कुवत आणि सरकारी स्तरावरील पशुधनाची पैदास, ही इतर देशातील आकडेवारीपेक्षा, भारतीय आकडेवारीमधे आणि भारतीय मानसिकतेमधे फार वेगळे अंतर ठेवते.
दुर्दैवाने भारतातला एक मोठा वर्ग, जो पूर्णतः शाकाहारी म्हणून ओळखला जाई, त्या कुशाग्र बुद्धीतील काही जणांकडूनच आज मोठ्या प्रमाणात मांसाहाराचे समर्थन होताना दिसत आहे.
हा बुद्धि भेद करणाऱ्यांना लवकरच सद्बुद्धी दे रे परशुरामा !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
13.10.2016
१)शरद ऋतुमध्ये शरीरात पित्त वाढते त्यामुळे ह्या ऋतूत तुप सेवन करावे.
२)उन्हाळ्याच्या दिवसात रात्री तुपाचे सेवन केल्यास फायदा होतो.
३)हिवाळयात तुप दिवसा सेवन करणे चांगले.
४)जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर तूप जेवणा सोबत घ्यावे.
५)अजीर्णाचा त्रास असताना तुप सेवन करू नये.
६)तुपाचा वापर करत असताना नियमीत गरम पाणीच वापरावे.
तुप कोणी खाऊ नये:
स्थूल मेदस्वीव्यक्ती,आमवात,भुकनसणे,
अजीर्ण,जुलाब व कफाचे विकार असल्यास तुप सेवन करू नये.
तूपसेवनाचाअतिरेक केल्यास,मळमळ,
उल्टी,जुलाब व शरीरात अवास्तव चरबी वाढणे अशा तक्रारी उद्भवू शकतात.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti