काही प्रश्न काही जणांच्या मनात काल उपस्थित झाले.........
आम्ही पूर्ण शाकाहारी आहोत,
आमचा प्रोटीन्सचा सर्वात मोठा पर्याय म्हणून आम्ही दुधाकडेच पहात होतो,
मग आम्ही असे पौष्टिक दूध पिणे बंद करायचे का ?
असे भावनिक होऊन नाही चालणार ! दूध म्हणजे अमृततुल्य आहे, हे जरी सत्य असले तरी व्यवहार पण लक्षात घ्यावा. दूध पचायला जड असते. टिकाऊ नाही. जरा दुसरा हात लागला तरी नासते, एवढे नाजुक आहे.
लहर आली तर प्यावे. उपास असेल तर प्यावे, भूक चांगली असेल तर प्यावे. पण दूध नियम करून पिऊ नये.
आम्ही सकाळी चहा पिणार, त्यात मैद्याची बिस्किटे बुचकळून खाणार, नंतर भरपेट नाश्ता करणार, दुपारी परत जेवणार, मधे एखाद्या औषधांचा डोस अगर टाॅनिक, अॅण्टी ऑक्सीडंटचा डोस घेणार, आणि विसरलोच, सकाळी चहा अगोदरचा एलोवेरा आवळा करेला ज्युस. दुपारी अगदी वेळेत जेवणार. जेवणानंतर तांब्याभर पाणी पिणार. जेवणानंतर घ्यायच्या औषधी. पुनः त्याच्या बरोबर भांडभर पाणी. नंतर तासभर झोपणार. परत तीन चार वाजता फक्त कपभर चहा. अधे मधे चहा होतो तो वेगळाच. त्यावेळी पुनः म्हणे शुगर फ्री मारी नाहीतर एखादी खारी. दर तीन चार तासांनी खाल्ले नाहीतर म्हणे अॅसिडीटीच वाढते, असं डाॅक्टरनीच बजावून सांगितले आहे, म्हणून सायंकाळी सहा वाजता परत काहीतरी लाईट नाश्ता. मधल्या वेळेचा औषधांचा डोस असतोच. पुनः बाजारात गेलो तर एखादा दाट लस्सीचा ग्लास. नशीब या ग्लासबरोबर अजून तरी चकना नाही . भूक लागल्याशिवाय जेवायचे नाही. हा नियम आम्ही हटकून पाळतो, त्यामुळे भूक लागेपर्यंत रात्रीचे दहा वाजलेले असतात. म्हणून जेवण होते दहा वाजता.! आणि आयुर्वेदात रात्री झोपताना म्हणे दूध प्यायला सांगितले आहे. म्हणून परत झोपताना एखादा ग्लास दूध घेतले जाते. सकाळी उठल्यापासून पोटाचे मशीन चालूच. त्यात फळे भरणे, सॅलेडचा कचरा, हाय प्रोटीनच्या नावाखाली गिळलेले मांस, चवीला छान म्हणून मासे, डब्याची सोय म्हणून गव्हाची चपाती, आणि भरपूर पाणी.......
आणि या डब्याच्या मधली जागा भरून काढण्यासाठी पौष्टिक दुध !!!!!??????
किती अत्याचार करायचे ?
तो जागा आहे, म्हणून निदान पचवतोय आणि आपण हिंडतोय फिरतोय ! एखादा दिवस जरी त्याने काम थांबवले की आजार पाठी लागतातच. दूध अत्यंत पौष्टिक आहे. यात वाद नाहीच. पण जे अत्यंत पौष्टिक असते, ते पचवण्यासाठी अग्निदेखील तेवढाच प्रखर लागतो.
आहे उत्तम गुणाचे म्हणून काय सगळं एकदमच खाल्लं पाहिजे काय ?
ग्रंथामधे जे लिहिलेलं असतं, ते अगदी कडक नियम म्हणून नव्हे तर एक आधार म्हणून लिहिले जाते, काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत.
काही सूत्रांचे भावार्थ, (जसे देव ह्रदयात असतो. )
काहींचे लक्षार्थ, ( आम्ही काही अगदी तसे नाही हो )
काहीचे शब्दार्थ ( मेहनत केल्याशिवाय प्रमेह नत होणार नाही. )
तर काहींचे श्लेष लक्षात घ्यावे लागतात,( माहीतीये किती श्याणा आहेस ते !)
नाहीतर क्लेष होतात.
दिनान्ते पिबेत पयम् हा जो श्लोक सांगितला जातो, तो वैद्यकीय सुभाषितामधला असावा. ग्रंथातला नाही. हा नियम देखील सर्वसाधारण सांगितलेला आहे. सर्वासाठी आहे, असे नाही. त्याचे व्यावहारिक उपयोग वैद्य ठरवित असतो.
आज अॅलोपॅथी डाॅक्टरदेखील, दूध पिताना सायीखालचे दूध प्यावे असे सांगतात. पण या प्रयोगाने शरीरातील सर्व स्निग्धत्व संपून जाते. स्नेह विरहित दूध पिऊन नुसते पोट भरेल, पण पोषण होणारच नाही. मग प्यायचेच कशाला ?
दूध प्यायचेच असेल तर केवळ दूधच पिऊन रहावे. त्यावेळी दुसरे काहीही पदार्थ नको. हे कोजागिरी पौर्णिमेला विशेष लक्षात ठेवावे. भेळ भजी खातखात आटीव मसाला दूध प्यायले तर काय होणार ?
पिताना गोड लागणार, पण पोटात जाऊन नासणार !
मग कसे पचणार ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.01.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्व-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 10
वस्त्र अर्पण केल्यावर यज्ञोपवित किंवा उपवस्त्र घालावे. यज्ञोपवित म्हणजे जानवे . आणि उपवस्त्र म्हणजे मुख्य वस्त्राला पूरक असलेले. सर्वसाधारणपणे खांद्यावरून खाली येणारे उपवस्त्र मानावे. जसे शाल, उपरणे, ओढणी, पदर ज्याने शरीराचा वरील भाग झाकला जाईल. वपु म्हणतात, त्याप्रमाणे बाईला साडी जेवढी भरजरी घ्यावी, तेवढा ब्लाऊजपीस हलक्या प्रतीचा घ्यावा, म्हणजे तो झाकण्यासाठी तरी खांद्यावरून अंगभरून पदर घेतला जातो.
देव देवतांना या वस्त्रांची गरजच काय , या तर निर्जीव मुर्ती ! यांना हे सर्व उपचार कशाला ? हीच तर खरी मेख आहे. जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हेच तर शिकायचं आहे.
वस्त्रांबरोबर वेगवेगळे अलंकारदेखील घातले जातात. आता देवताना अलंकार प्रत्यक्ष घालण्याऐवजी अक्षताम् समर्पयामी... असे म्हणून खरंतर भागवलं जातं. पण देहासाठी भागवाभागवी नाही. खरं अलंकार घातले पाहिजेत.
सोने, चांदी, तांबे, पंचधातु इ. तसेच मोती, हिरा, प्रवाळ, पाचू, माणिक इ. रत्ने तसेच काच, स्फटीक यापासून बनविलेले दागिने परिधान करावेत. अंगठी, वाकी, कंठहार, बांगड्या, पाटल्या, बाजूबंद, कंबरपट्टा, बिलवर, नथ इ. सर्व अलंकार जसे स्त्रिया परिधान करतात, तसे पुरूष देखील गळ्यात वैजयंती किंवा मोत्याच्या माळा, छातीवर कवच, कानात कुंडले, हातामधे कडी, डोक्यावर मुकुट, असे अलंकार धारण करत असत.
या रत्नांचा शरीरावर प्रत्यक्ष परिणाम होत असतो. सूर्य चंद्र अनेक ग्रह यांच्यापासून येणारे किरण या रत्नांवर पडून त्वचेला स्पर्श केल्यावर रक्ताभिसरणावर थेट परिणाम होतो. म्हणून हातातील प्रत्येक बोटामधे वेगवेगळ्या रत्नांच्या अंगठ्या घालत असतात. प्रत्येक ग्रहाचा विशिष्ट रत्नांशी संबंध सांगितलेला आहे. तसेच विशिष्ट रत्नांचा शरीरातील वात पित्त कफ या तीन दोषांवर आणि सातही धातुंवर सूक्ष्म परिणाम होत असतो.
आजकाल तरूणांच्या हातात प्लॅस्टिकच्या बांगड्या, रबराची कडी, फ्रेंडशिपचे बेल्ट दिसतात, ज्याचे फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्ती होताना दिसतात.
मला वाटलं म्हणून, मला आवडलं म्हणून, मी हे रत्न हातात घातले, असे करू नये. ग्रहशास्त्रानुसार जे योग्य असेल ते, त्या तज्ञांच्या सल्ल्यानुसार वापरावेत. नाहीतर त्रासही होऊ शकतो.
ज्याला इफेक्ट आहे, त्याला साईड इफेक्ट असणारच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.06.2017
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक नऊ
कामासाठी दिवस, विश्रांतीसाठी रात्र-भाग पाच
सगळे पशुपक्षी आपले पोट भरण्यासाठी दिवसा (खाण्याचे ) काम करतात. रात्रीचा दिवस करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्राण्यांचे आरोग्य चांगले असते. माणसाला मात्र डाॅक्टर लागतो. पूर्वी वैद्यावर काम भागायचे, आता वैद्य पुरत नाही.
रात्रीचे खाल्लेलं पचवायला जास्ती शक्ती संपते. आणि वेळ ही जास्ती लागतो. दिवसा उजेडी सकाळी जेवलो तर अन्न पचायला फक्त आठ तास लागतात. आणि पुनः सायंकाळी चरचरीत भूक लागते. तर रात्रीचे जेवलेले पचायला तब्बल सोळा तास लागतात. रात्री आठ वाजता जेवलो तर पुनः चरचरीत भूक लागते दुपारी बारा वाजता ! म्हणजे जवळपास दुप्पट वेळ लागतो.
रात्री कामही बेताचेच असते. सर्व वेळ झोपेतच असतो, त्यामुळे शरीराच्या हालचाली पण कमीच. श्रम कमी आणि अन्न जास्ती वेळ एकाच ठिकाणी पडून राहते. त्याचा परिणाम म्हणून पोटात चिकटपणा तयार होतो. चरबी वाढते, पोट सुटते, रक्तातील साखर किंवा आम म्हणजे आजच्या भाषेतील चरबीचे अनेक प्रकार म्हणजे ट्रायग्लीसराईड, कोलेस्टेरॉल वगैरे वगैरे, वाढतात.
दिवसा ही चरबी तेवढ्या प्रमाणात वाढत नाही, कारण ही चरबी किंवा चिकटपणा कमी करणारा सूर्य फक्त दिवसाचाच असतो. त्यामुळे दिवसा घेतलेल्या अन्नावर अग्निची प्रक्रिया पटकन होते, शारीरिक हालचाली नीट होत असतात. पोट हलत असते, चिकटपणा कमी निर्माण होतो. शरीर प्रमाणबद्ध रहाते. स्वास्थ्य मिळते.
निसर्गाने दिलेले नियम पाळले तर औषधांची गरजच उरणार नाही. नाहीतर कृत्रिम औषधांचा अक्षरशः बाजार झालाय. एकदा डाॅक्टरांकडे जावे लागले तर एक औषध कायम स्वरूपात सुरू होते. त्यातही आपली मूळ तक्रार राहते बाजूलाच, नवीनच रोग, ज्याचा आपल्याला त्रास काहीच नाही, तो शोधून काढला जातोय. आणि आपण तो अगदी सहज मान्य पण करतोय. त्यासाठी पुनः कृत्रिम औषधे आहेतच. एक नसलेला त्रास कमी होण्यासाठी दुसरे त्रासदायक औषध घेणे हा पर्याय.
असो ! काय करणार ?
आरोग्याच्या मूळ व्याख्याच बदलून गेल्यात.
ते पूर्वीचे फॅमिली डाॅक्टर बदलले, ती आपुलकीही संपून गेली.
ऋतुही बदलले, हवामानही बदलले,
पाच दिवसाची कसोटी आता एका ओव्हरपर्यंत कमी होत आली.
रात्रही बदलली आणि आता दिवसही बदलले.
रोग बदलले, आरोग्यही बदलले !
कामाचे दिवस आणि विश्रांतीची रात्रही बदलली !!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
20.05.2017
आयुषोवेदः आयुर्वेदः
आयु विषयी ज्यात सर्व ज्ञान मिळते ते शास्त्र.
आयुर्वेद म्हणजे जीवन जगण्याचे शास्त्र.
याचाच अर्थ मृत्युविषयीचे संपूर्ण ज्ञान.
आपापल्या कर्मफलानुसार, त्याने नेमून दिलेले ( नियत) आयुष्य जगता यावे, या वेळेअगोदर मृत्यु येऊ नये, यासाठी कोणते नियम आहेत, ते जाणून घेण्यासाठी आयुर्वेद शिकावा.
जगण्यातले हे अडथळे दूर करण्यासाठी हे अडथळे ओळखता येणे महत्वाचे. यातील सर्वात मोठा अडथळा म्हणजे रोग.
हे रोग होऊ नयेत यासाठी स्वस्थवृत्त आणि रोग झाल्यानंतर रोगापासून पूर्ण मुक्ती मिळवणे यासाठी व्याधीमोक्ष असे दोन प्रमुख अभ्यासाचे विषय आहेत. याची योग्य सांगड घालता आली पाहिजे.
या आरोग्यटीप लिहिण्याचे कारणच हे आहे, की सर्वांना हे स्वस्थवृत्त आणि व्याधीमोक्ष समजून द्यावे.
जगण्याचे छोटे छोटे नियम सांगणाऱ्या आरोग्यटीपा म्हणजे स्वस्थवृत्त.
आणि ज्याला त्याला झटपट उपाय हवा असतो. त्यांना जे घरगुती आरोग्य सल्ले दिले जातात, ते व्याधीमोक्ष. ( घरगुती सल्ले म्हणजे परिपूर्ण आयुर्वेद नव्हे हो, उगाच शब्दांचा छळ करू नका. )
नळाला पाणी खराब येते याचे कारण न शोधता, नळच बदलून बघूया असा सल्ला देणारे, आजचे अजब पाश्चात्य वैद्यकीय तंत्र.
हो आणखीन एक मोठ्ठा गैरसमज. आरोग्यटीपेमधे पाश्चात्य तंत्रज्ञानाला, त्यांच्या संशोधक वृत्तीला, काहीही किंमत नाही. असे पण नाही. जे योग्य आहे ते योग्यच ! पण जर आपले मूळ भारतीय आरोग्य शास्त्रच या पाश्चात्य विचाराने घराबाहेर काढले जात असेल आणि जाणीवपूर्वक बदनाम केले जात असेल तर
यात कोण चुक कोण बरोबर असा प्रश्नच नसतो. प्रत्येक जण आपल्या जागी योग्यच असतो. फक्त एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला की सर्वच विकृत आणि चुकीचे दिसू लागते.
आयुर्वेद हे थोतांड आहे. शास्त्रच नाही. फक्त पाळेमुळे. अंधश्रद्धा !
आयुर्वेद हा कुठलाही आजार बरा करू शकत नाही. इन्स्टंट तर नाहीच नाही. ह्यात फक्त दिनचर्या चांगली समजून सांगितली आहे. बाकी सगळं फेकू.
असा सूर येण्यामागे प्रचंड मोठे गैरसमज आहेत. एकतर पूर्वग्रह दूषित असणार किंवा आयुर्वेदात काय सांगितले आहे ह्याचा अभ्यास नसणार किंवा कुणीतरी चुकीच्या पद्धतीने आयुर्वेद समजून घेतला असणार किंवा गुरूविना ज्ञान घेण्याचा प्रयत्न झाला असणार किंवा आयुर्वेदाने यांव होते, त्यांव होते, दहा मिनीटात दमा जातो, पंथरा मिनीटात कॅन्सर गायब, असले काहीतरी 'टाॅल क्लेम' करणारे तथाकथित कुणाला तरी भेटले असणार ! स्वयंघोषीत वैद्यांची काही कमी नाही. जे पारंपारिक वैदू औषधे देतात, त्यांना शरीरशास्त्र माहिती नाही, जे योगतज्ज्ञ आहेत त्यांना औषधांची माहिती नाही. जे डाएटिशीयन आहेत, त्यांच्याकडे फक्त पुस्तकी ज्ञान.
जिच्याकडे अनुभवाचा बटवा आहे, तीला पाठवली वृध्दाश्रमात, ज्यांच्याकडे आयुर्वेदाची पदवी आहे, त्यांना अनुभव नाही.
उरलेल्या सगळ्यांकडे आहे फक्त अहंकार. मी सांगतोय तेवढंच बरोबर. बाकी सब झुठ.
आणि सगळ्यांना हवे आहे, जमाने के साथ चलनेवाला इन्स्टंट !
या सर्वांच्यात कडबोळ झालंय आयुर्वेदाचं !
कुणीही यावे, टिचकी मारून जावे,
काहीही सांगावे, काहीही बोलावे,
मनमानी लिहावे, वाॅटसप करावे,
अतिशहाणे करूनी सोडावे
सकल जन.
असं झालंय सगळं.
यामुळे गैरसमज वाढतात.
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दूराभिमान
मत्सरे करी । असं समर्थांनी उगाच नाही सांगितलेलं.
आयुर्वेदाला बदनाम करण्यामधे हा झटपट दृष्टीकोन कारणीभूत आहे.
गरज आहे फक्त दृष्टीकोन बदलण्याची.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
12.02.2017
पोटाच्या एक्स-रेमध्ये त्यातील इंद्रियांची माहिती फारशी कळत नाही हे आपण मागील सदरामध्ये पाहिले. त्यातल्या त्यात स्वस्त दरात पोटाची सखोल माहिती माहिती मिळवण्यासाठी सोनोग्राफी खूप मोठ्या प्रमाणात उपयोगात आणली जाते.
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणतीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
अंथरूणातून सूर्य बघू नये
अर्थ सरळच आहे. सूर्योदयानंतर अंथरुणात राहू नये. म्हणजेच ग्रंथात सांगितलेला नियम ब्राह्म मुहूर्तावर उठावे. "लवकर निजे लवकर उठे, त्यास धन आरोग्य संपदा मिळे" असं एक सुभाषित शाळेतील लाकडी खांबावर लिहिलेले आठवते.
पण आता जमाना बदल गया है.
आता आम्ही फार उशीर करत नाही, बारा साडेबाराला झोपतो. (झोपतो म्हणजे बाकीच्यासाठी ! डोक्यावरून पांघरूण घेऊन आत माझ्यासकट वाॅटसप जागा असतो. जास्त नाही दीड दोन वाजताच झोपतो. )
लवकर उठायला ज्यांना जमत नाही, त्यांचे पचन बिघडते. लवकर झोपणे होत नाही, याची अनेक कारणे असतील. पण लवकर उठणे होत नाही याला कोणताही युक्तीवाद नको. किमान सहा साडे सहाला उठलेच पाहिजे. रात्रीच्या जागरणाचे संयुक्तिक कारण असेल तर ती झोप दुपारी घ्यावी. पण जेवणानंतर नको. त्याने पुनः आम निर्माण होणार. इथे युक्ती वापरावी. दुपारची झोप आधी घ्यावी आणि उठून नंतर जेवावे. म्हणजे कफ प्रकोप होणार नाही. अर्थात ही पळवाट आहे. नियमाला पळवाट असावी पण पळवाट हा नियम बनू नये.
एवढ्या लवकर उठून करायचे काय, असाही प्रश्न काही जणांना पडेल. काही जण म्हणतील, आम्हाला जाग येते पण उठवत नाही. उठलो तरी ताकद असत नाही. उठायचं असतं, पण पाय दुखतात, पायाची टाच दुखते, गुडघे दुखतात, लवकर उठले तर म्हणे पित्त वाढते, चक्कर येते, डोके दुखते इ. इ. अनेक तक्रारी सक्काळी सकाळी सुरू होतात. या सर्व तक्रारींवर एकच रामबाण उपाय आहे, तो म्हणजे रात्रीचे जेवण सायंकाळी सातला संपलेच पाहिजे. अन्यथा जेवूच नये. जेवण नाहीतर फळ, ज्युस वगैरे वगैरे. नाही चालणार. पोट हलके सैल, रिकामे करूनच तर झोपायचे आहे.
आणि समजा उशीरा झोपणे झाले आणि सकाळी जाग आली तरी
गादीवर जास्त लोळू नये
असे आई सांगते.
मस्त बेड टी प्यावा, बायकोने हातात टीव्ही चा रिमोट आणून द्यावा, तिथूनच योगाचे चॅनेल सुरू करावे. आणि चकली वेफर्स खात खात योगा करणाऱ्यांना बघण्याचा व्यायाम करावा. नाहीतर साखरझोप अनुभवावी, पहाटेची स्वप्न म्हणे खरी होतात, म्हणून आपल्याला हवी तशी सुंदर सुंदर स्वप्ने पहावीत. आणि कानावर गोड हाक यावी,
"मोऽहऽअऽन्ऽ", जागो प्यारेऽऽऽऽऽ"
डोळे उघडून पहावे तर नेहेमीचीच......
सकाळी लवकर उठावे, आह्निक उरकावे, जमल्यास स्नानसंध्या करावी. ज्ञानमार्गाने जाणारे असू तर काहीबाही वाचन करावे, भले ते ज्ञान दै. लोकसत्ता, मटा किंवा वाॅटसप महाराजांकडून आलेले का असेना !
काही लेखन करावे. वाॅटसप वर लेखन करावे.ट्विटरवर टिवटिव करावी. मराठी इंग्लिश अथवा हिंग्लीश भाषा वापरावी. फेसबुकवरील असंख्य मित्रांना तत्वज्ञानाचे डोस पाजावेत. (आपण कोरडे पाषाण रहावे.)
ज्ञान ग्रहणाची आवड नसेल तर कोणतेही आवडीचे काम करावे. बागेत जावे, व्यायम करावा, जेवण बनवावे, टीव्ही मात्र पाहू नये.
कर्ममार्ग पण नको असेल तर सरळ साध्या सोप्या भक्तीमार्गाने जावे. देवळात जावे, तुळशीला, वडा पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात. घरातच राहायचे असेल तर लोटांगणे घालावीत, नाहीतर खुर्चीवर बसून नामस्मरण करीत राहावे, पण झोपून राहू नये. हे झोपणे मधुमेहाकडे नेणारे आहे. हे पक्के लक्षात ठेवावे. ( मी स्वतः रात्री एक वाजेपर्यंत जागा असतो, पण सकाळी सहा साडेसहाला नक्कीच उठतो. आणि रात्रीचे जागरण झाले तरी आम निर्माण होतच नाही, कारण माझे रात्रीचे भोजन सायंकाळी आटपलेले असते. )
आई जे सांगते त्यामधे काहीतरी अर्थ नक्कीच दडलेला असतो, कारण अनुभवाचे चार पावसाळे तिने जास्ती पाहिलेले असतात. भले त्यामागील शास्त्र, विज्ञान तिला माहिती नसेल. कारण तिला तिच्या आईने तसेच सांगितले होते.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१८.०८.२०१७
गाजर हा कंद आपल्या सर्वांच्याच परिचयाचा व फारच आवडीचा.गाजर हे लाल व नारंगी अशा दोन प्रकारची असतात उत्तरेकडचे लालाबुंद गाजर उत्तम प्रतिचे असतात.
गाजराचाहलवा,गाजराची,खीर,कोशिंबीर,
लोणचे असे एक ना अनेकरूचकर पदार्थ आपण ह्या गाजरापासून बनवित असतो.तसेच ह्यात मुबलक प्रमाणात जीवन सत्व अ असल्याने हे त्वचा व डोळे ह्यांचे आरोग्य उत्तम राखते.तसेच कर्करोगाच्या रूग्णांना देखील कच्च्या गाजराचा रस प्यायला दिला जातो.
जसे हे स्वयंपाकात वापरतात तसेच ह्याचा वापर घरगुती उपचारात देखील केला जातो.गाजराचे रोप हे हातभर उंचीचे होते व गाजर हे जमीनी खाली वाढणारे कंद आहे.
गाजर हे चवीला गोड कडवट असून उष्ण असते त्यामुळे ते शरीरातील वात व कफ दोष कमी करते पण पित्त मात्र वाढविते.
चला आता गाजराचे उपयोग पाहूयात:
१)इसब,गळवे,फोड ह्यात गाजर थोडे मीठ घालून पाणी न घालता वाफवून घ्यावा व त्याचा पोटीस बांधावा.
२)गाजराचे बी हे मासिक पाळी येण्या करिता ५ दिवस पाण्यात वाटून घ्यावे.
३)वारंवार भरपूर गढूळ लघ्वी होत असल्यास १ कप गाजराचा रस +१/२ चमचा जीरे +१चमचा धणे हे मिश्रण सकाळ संध्याकाळी उपाशी पोटी घ्यावे.
४)मधुमेहामुळे झालेली जखम नसेल व ती चिघळली असेल तर गाजराच्या रसाच्या घड्या
दिवसातून ४ वेळा जखमेवर ठेवाव्या.
५)कच्चे गाजर चावून खाल्ल्यास तोंडास रूची येते,जीभ साफ होते व हिरड्या देखील मजबूत होतात.
गाजर खायचा अतिरेक केल्यास पित्त वाढते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
रोग कसा होतो हे कळलं की, रोग घालवणं सोपं होतं. द्राक्षांच्या उदाहरणातील सर्दी होण्याच्या कारणांचा विचार केला तर,
1. तिच्याबरोबर बाजारात जाणे. 2. माझे लक्ष त्या हातगाडीवाल्याच्या द्राक्षांकडे जाणे. 3. ती द्राक्षे खायचा मोह होणे. 4 द्राक्षे खाऊन सर्दी होते, हे पूर्वी अनुभवले असताना देखील, ती उचलणे, 5. खिशात सुटे पैसे ठेवणे. 6. मनाला न विचारता खरेदीची कृती करणे, 7. घरी आणल्यानंतर विचार करायला पुरेसा वेळ असून सुद्धा ती खाणे. ही सर्दी होण्याची मुख्य कारणे आहेत.
कारण नंबर एक आणि दोन हे पूर्वजन्मानुसार किंवा कर्मफलानुसार तिथे जाणे हे अगोदरपासूनच ठरलेले असणे. याला आध्यात्मिक दोष हे कारण असते.
कारण नंबर तीन आणि चार द्राक्षे खायचा मोह होणे, ती स्वतःच्या मनाने खरेदी करणे हे मानस हेतु झाले आणि पाच ते सात ही कारणे, म्हणजे द्राक्षे खरेदी करून आणल्यानंतर ती कृतीतून खाणे हा प्रत्यक्ष हेतु म्हणजे शारिरीक कारण घडले.
यातील एक कारण जरी कमी ताकदीचे असले असते तर संप्राप्ती पूर्ण झाली नसती. आणि सर्दी झालीच नसती.
एखादा रोग होण्यामागे प्रत्येक वेळी शारिरीक, मानसिक आणि आध्यात्मिक कारण असते. ते समजले की तसा उपाय करता येतो. म्हणजे रोग आध्यात्मिक स्तरावर असेल उपाय आध्यात्मिक, कारण मानसिक असेल तर मनापर्यंत पोचता यायला हवे आणि शरीराशी संबंधित व्याधी असेल तेव्हा औषध प्रत्यक्षात द्यावे लागते.
हे प्रमेहाच्या बाबतीतही तसेच लागू होते.
प्रमेह हा मुख्य रोग. त्याचे कफ पित्त वात या क्रमानुसार प्रत्येकी दहा, सहा आणि चार असे प्रकार. त्यातील वाताच्या चार प्रकारापैकी एक मधुमेह आहे. ज्याची भीतीयुक्त ओळख आज सगळ्यांनाच आहे. हा रोग होण्याची कारणे आयुर्वेदानुसार काय आहेत, हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय.
काही गोष्टींची कारणमीमांसा प्रत्यक्षात करता येते, काही गोष्टी तर्काने जाणून घ्यायच्या असतात, तर काही अनुभूतीच्या स्तरावर. मग प्रश्नांची उत्तरे मिळत जातात. आणि दुःख होत नाही....
नाहीतर....
आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात. !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.01.2017
तेरा गुणांचा विडा आपल्या शरीरासाठी आहे.घेतलेला आहार सहजपणे पचून जावा यासाठी हे पान तयार करून खाल्ले जाईल, पचन पूर्ण ही होईल. पण मनोरोगांचे काय ? त्यातील आमाचे पचन कोण करणार ? आत्मरोगांचे काय त्यासाठी हे हिरवे नागवेलीचे पान काऽही उपयोगाचे नाही.
कोणालाही मनापासून न आवडणारी पण, यश, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देत असल्यामुळे वैद्य मंडळीना आवडणारी चव म्हणजे कडू.
खरंच आहे. रोग नावाने कितीही मधुर वाटला तरी, प्रत्येक औषधात दडून बसलेली कडू चव मात्र रूग्णाचे जीवन गोड बनवते. या कडू चवीचा वापर युक्तीने जो वैद्य करतो, तो यशवान, गुणवान आणि परिणामी धनवान बनतो.
जसा कडू रस आपल्याला तो आवडत नाही, तसा पोटातील कृमींनाही तो आवडत नाही. त्यामुळे कृमींना बाहेर काढण्यासाठी कडू चवीची औषधे वापरावी लागतात.
कडू चवीची औषधे आईच्या दुधातील दोष दूर करतात. म्हणजे आईच्या दुधातून बाळाच्या पोटात जाऊन बाळाचे आजार कमी करू शकणारी, एवढी शक्ती असलेली ही कडू चव आहे.
आंबट, तिखट, गोड चवींप्रमाणे चविष्ट नसल्यामुळे खाण्याची इच्छा कमी करणारी असते. त्यामुळे साहाजिकच प्रमेहनाशक परिणाम दाखवते. आणि पचनशक्तीवरचा ताण आपोआपच कमी होत असल्यामुळे पाचन वाढवणारी ठरते.
कफ आणि पित्तनाशक गुणाची ही कडू चव तहान ताप मूर्च्छानाशक आहे. गळा, तोंड घशाची शुद्धी करणारी आहे. तसेच आमातून निर्माण होणारा चिकटपणा (क्लेद ) कमी करणारी, चरबी, मल मूत्र यांचे शोषण करून शुद्धीकरण करणारी, पचायला हलकी, आणि स्वभावाने थंड गुणाची आहे.
विशेषतः तापावर गुणकारी, रक्तदोष कमी करणारी, शरीरातील आजारानंतर राहिलेली उष्णता किंवा औषधांचे दुष्परिणाम कमी करणारी आहे.
व्यवहारात कारले, मेथी, हळद, औषधांमधे कडू किराईत ही जार कडू आहेत.
कडू उपाय तात्कालिक बरा न वाटणारा असला तरी उज्वल आरोग्यासाठी तो आवश्यक आहे.
अतिप्रमाणात वापरल्यास पित्त वाढते, साखर कमी होते, त्यामुळे थरथर होणे, शरीर आतून बाहेरून रूक्ष होणे, घसा कोरडा पडणे, बारीक होणे अशी लक्षणे दिसतात.
कडू म्हटलं तरी चेहेऱ्याच्या सर्व शिरा आखडून घेतल्या जातात. कडू चव, चवीला रूचकर नसली तरी, तोंडाची गेलेली चव परत आणण्यामधे मात्र एक नंबर आहे.
गेलेले धन परत आणण्यासाठी आणि बाहेर जाणारे धन बाहेर जाण्यापासून, वाचवण्यासाठी जसा एखादा कडू निर्णय घ्यावा लागतो, तसे रोग मुळातून घालवण्यासाठी कडू औषध देणे हा जालीम उपाय होतो.
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
21.11.2016
Copyright © 2025 | Marathisrushti