कोकमाची झाडे आपल्याला कोकण गोवा प्रांतामध्ये पुष्कळ पाहायला मिळतात.असे म्हणणे अतिशयोक्ती ठरू नये कि कोकमा शिवाय कोकणी व गोयंकार माणसाचा स्वयंपाक पुर्ण होऊ शकत नाही.
कोकमाची फळे हि सुकवून त्याची सोले स्वयंपाक व औषधात वापरतात.आमटी,काही भाज्या,तिवळ,नारळाचा रस घालून केलेली सोल कढी,आगळ,कोकम सरबत इ अनेक प्रकारे आपण कोकमाचा वापर करतो.
ह्याचा सदाहरीत,पातळ नाजूक फांद्या असलेला वृक्ष असतो.ह्याची पाने आयताकार अथवा भालाकार असतात वरून गडद हिरवी व खालून फिकट रंगांची असतात.फळ गोलाकार १-१/२ इंच व्यासाचे असते.फळाच्या आत ५-८ मोठ्या बिया असतात.
कोकम चवीला कच्चा असताना आंबट व पिकल्यावर आंबट गोड लागतो हा उष्ण असून कफवातनाशक अाहे.
आता ह्याचे घरगुती उपचारात महत्त्व पाहूया:
१)कोरड्या उल्ट्या,तोंड कडू होणे,तोंडास चव नसणे ह्यात ७-८ आमसुलाचा एका वाडग्यात पाणी घालून भिजत घालावी व कुचकरून ते पाणी गाळावे व त्यात १ चमचा खडीसाखर घालून थोडे थोडे प्यावे.
२)अंगावर पित्त उठत असल्यास अंगाला कोकमाचे पाणी लावावे व पोटात देखील हे पाणी प्यावे.
३)कोकमाच्या बियांपासून काढलेले मेण हे पायांच्या भेगा भरून काढायला उपयोगी आहे.
४)करपट ढेकर येणे,भुक न लागणे,जेवण न पचणे,पाणी सुद्धा प्यावेसे न वाटणे ह्यात कोकमाचे पाणी काळीमिरी व मीठ घालून जेवणानंतर प्यावे त्याने पचन सुधारते.
५)ज्यांना मुळव्याध,अम्लपित्त,भगंदराचा त्रास आहे व त्यांना जेवणामध्ये चिंच वापरतां येत नाही त्यांनी कोकम वापरावा.
६)कोकमाच्या तेलाचा उपयोग जखमभरून काढायला केला जातो.
कोकम खाण्याचा अतिरेक केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार
जगण्यासाठी औषधं काम करत नाही-भाग अकरा
आयुर्वेदीय औषधांना लवकर गुण का येत नाही ?
इंग्लिश औषधांप्रमाणे आयुर्वेदीय औषधांना झटपट गुण दिसत नाही, हा एक मोठ्ठा गैरसमज आहे. आयुर्वेदात सांगितलेल्या वेधन, अग्निकर्म, यासारख्या काही चिकित्सा इतक्या जलद काम करतात, की अॅलोपॅथीमधील, कोणतेही वेदनाशामक वा भूल देणारे द्रव्य देखील एवढ्या जलद काम करत नसावे. आश्चर्य वाटण्याएवढ्या चमत्कारिक चिकित्सा ग्रंथात वर्णन केल्या आहेत. याचा प्रत्यक्ष अनुभव जवळच्या वैद्याकडून घेणे महत्त्वाचे आहे.
आयुर्वेद म्हणजे एक जीवनप्रणाली असल्याने, त्यात औषधांपेक्षा, आहार विहार जास्ती महत्त्वाचा ! तहान लागल्यावर विहीर खणण्यापेक्षा आधीच पाणी शोधून ठेवावे, तसे रोग झाल्यानंतर उपाय शोधत बसण्यापेक्षा, रोग होऊ नये यासाठी काळजी घ्यावी, असे सांगणारे हे शास्त्र !
आयुर्वेद ही कोणतीही 'पॅथी' नाही. हे पुनः एकदा लक्षात घ्यावे. त्यामुळे 'औषधे' हा चिकित्सेतील गौण भाग आहे. औषधे ही पूरक म्हणून वापरली जातात. ( तशी वापरली जावीत. )
जसजसा काळ बदलत गेला तसे आयुर्वेदातील औषधांमधे भर पडत गेली. सुरवातीला केवळ वनौषधींनी समृद्ध असलेली ही संपदा रसौषधींनी आणखीनच बहरत गेली. शरीरातील दोष ( पंचकर्माचा वापर करून ) काढून टाकून नंतर औषधांचा वापर केला गेला तर औषधे कमी पुरतात, हे अभ्यासले गेले. किंवा औषधे पुनः लागतच नाहीत, हे पण लक्षात आले. आणि रोग पुनः उद्भवू नयेत, यासाठी आहारविहारातील पथ्यापथ्य सांगितले गेले. व्यवस्थित पथ्यापथ्य पाळले तर औषधांची गरज कमी होते.
औषधे मग ती कोणत्याही पॅथीची असोत, ती विकतच घ्यावी लागतात, दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागते. पण पथ्यापथ्याचे तसे नसते. माझा माझ्या मनावर विशेषतः जीभेवर संयम आणता आला की, बाहेरील अन्य घटकांवर अवलंबून रहावे लागत नाही. बाहेरील सर्व परिस्थितीवर मनःस्थितीने नियंत्रण आणता येते.
काही वेळा औषधांची मात्र कमी पडते, काही वेळा अनुपान चुकते. अनुपान म्हणजे औषध ज्याच्या बरोबर घ्यायचे ते द्रव्य. अनुपानासोबत जर औषध घेतले की औषधांची क्षमता वाढते. आजच्या भाषेत सांगायचे तर कॅटेलिस्ट. जसे, कफाच्या आजारात मधासोबत, पित्ताच्या आजारात तुपाबरोबर, आणि वाताच्या आजारात तेल हे पूरक औषध म्हणून वापरले तर रोगाची लक्षणे झपाट्याने कमी होताना दिसतात. काही वेळा तर औषधांची गरजच उरत नाही, अनुपान हेच औषध ठरते. पित्तामुळे डोके दुखते, या आजारात केवळ सकाळी रिकाम्या पोटी तूप खाऊन वर दोन घोट गरम पाणी पिणे, हा घरगुती उपाय देखील चमत्कार घडवतो. (तूप म्हणजे गाईचे. आणि गाय म्हणजे भारतीय, हे पण विसरायचे नाय्ये हं. ) प्रकृतीनुसार किती काळपर्यंत हे घृतपान सुरू ठेवावे लागेल, याचा सल्ला अर्थातच वैद्य चांगला देऊ शकेल. { वैद्य म्हणजे सरकारी नोंदणीकृत आयुर्वेद पदवीधारक, ज्याचा अनुभव आणि ग्रंथाचा अभ्यास देखील उत्तम आहे, असा आप्त (आप्त म्हणजे ओळख असलेला, घरचा. पैशासाठी औषधांचा व्यापार न करणारा ) ही व्यक्ती देखील योग्य सल्ला देऊ शकतो. आज हे मुद्दाम सांगावेसे वाटते कारण वाॅटसपच्या माध्यमातून अतिशय महत्त्वाचे असे आरोग्याचे संदेश देणाऱ्या स्वयंघोषित वैद्यांचे पेव खूप आलेले आहे. त्यात विश्वास कसा आणि कोणावर ठेवायचा, असा प्रश्न निर्माण होतो. मग तो नागरमुन्नळीचा असो वा मुरगुडचा, कोल्हापूर सारख्या शहरातला असो वा अन्य कोणत्याही खेड्यातला. }
आपली प्रकृती काय आहे, कोणते औषध, कोणते अनुपान, किती दिवसांसाठी, कधी घ्यायचे आहे, त्याचे पथ्यापथ्य काय आहे, हे हे जाणकार वैद्यच चांगलं सांगू शकेल ना !
नाहीतर घेतलेल्या औषधाचे साईड इफेक्ट कमी करण्यासाठी पुनः दुसरा वैद्य असे व्हायला नको !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
29.04.2017
जमिनीवर जेवायला बसायचे काही फायदे नावाचा एक मेसेज व्हायरल झाला आहे. तेच परत लिहिण्यात वेळ आणि जागा घालवित नाही.
वास्तुतज्ञ सांगतात म्हणून नव्हे, पण वैद्यकीय तज्ञ सांगतात, म्हणून मलविसर्जनाची वास्तु देखील बदलण्यासाठी आता धडपड सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे.
मल विसर्जन करताना पोटावर योग्य तो ताण निर्माण करणार् या स्क्वॅटींग व्यायामावर आज परदेशात संशोधन चालले आहे.
पाश्चात्य लोकांच्या उंचीला साजेशी म्हणजे कमोडवर बसल्यावर सहजपणे पाय टेकतील अशी उंच कमोडची भांडी त्यानी बनवली. पण त्याच उंचीची भांडी, भारतातही बनवली जाऊ लागली. कमोडवर बसल्यावर, जमिनीला पाय टेकतच नसल्याने, कितीतरी भारतीयांना अक्षरशः लोंबकळत बसावे लागते, हे सत्य आहे. पाश्चात्य अनुकरणाची आणखी किती लाचारी करायची ?
असो. ! पाय जमिनीवर, जमिनीला टेकलेले हवेत हे महत्वाचे.
( हो ! माझ्या काॅम्प्लेक्स मधील चिकित्सालयात, मी तपासणीकक्षातील जमिन शेण मातीचीच ठेवली आहे. आणि तपासणीसाठी बैठकपण भारतीयच ठेवली आहे. मस्त खाली बसून रूग्णांना तपासतो. त्यात लाज कसली ? ) मनापासून ठरवलं तर काहीच अशक्य नाही.
दुसरा काही पर्यायच नसेल,आणि जिथे जेवायला टेबलखुर्चीचाच वापर करायचा असेल, तिथे न लाजता, खुशाल खुर्चीवर मांडी ठोकून बसावे.
कोणत्याही खुर्चीवर बसल्यावर पाय अधांतरी रहाता नयेत. टेकलेलेच हवेत. नाहीतर पुढे पाठीला बाक येणे, पीआयडी, चकती सरकणे, असे प्रकार सुरू होतात. हे व्यवहारात दिसते. म्हणून तर पुर्वीच्या मुख्याध्यापकांच्या लाकडी खुर्चीखाली पाय टेकायला, पायपेटीला असते तशी तिरपी फळी ठोकलेली असायची. आता ती पण गेली........
........आणि कंबरेला बांधून ठेवणारे बेल्ट मात्र आले.
जेवताना पण या गोष्टीचे भान हवे.
पायांना भक्कम आधार हवा,
पोट आणि ताटात सुरक्षित अंतर ठेवा
हे वाक्य विसरले जाऊ नये की झाले.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
21.09.2016
तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली.
सुखाच्या कक्षा वाढवित जाणे, सुखाचा हव्यास वाढवित नेणे, हा प्रमेहाचा हेतु आहे. यालाच आस्यासुख असे ग्रंथकार म्हणतात. कुठुनही शरीरातील कफ वाढण्यासाठी मदत करणे हा प्रमेहाचा हेतु आहे. असे ग्रंथकार म्हणतात.
आस्या सुख म्हणजे हालचाली करू नयेत, दोन्ही हात हलवत काम करण्यापेक्षा, एकाच हाताने काम करावे, असे वाटणे, हे आस्यासुखच!
अहो, कंप्युटरचा माऊस एकाच हाताने हलवित बसण्यापेक्षा केवळ डोळ्यानीच तो ऑपरेट करणे, असे अॅप सुद्धा आले आहे, एका हाताचे एक बोटसुद्धा हलवायला नको. फक्त डोळे फिरवायचे की कर्सर हलतो. हे आस्यासुख.!
उभे राहून काम करण्यापेक्षा किंवा फिरत फिरत काम करण्यापेक्षा बसून काम करावे असे वाटणे. बसताना सुद्धा खाली जागा नीट समतल असावी, एखादी बैठक असावी, असे वाटणे. सतरंजी मिळाली की सतरंजीपेक्षा आणखी मऊ आरामशीर आसनावर बसावे, एकदा बसले की उठू नये असे वाटणे, बसलो तर टेकून बसावेसे वाटणे, टेकून बसलो तर टेकायला मऊ तक्क्या असावासा वाटणे, तक्का मिळाला तर उशी हवीशी वाटणे,बसायला जागा मिळतेच आहे तर खुर्ची का नको ? मग ही खुर्ची काटकोनीच कशाला, त्यापेक्षा विशालकोनी बरी. हे आस्यासुख !!
आरामखुर्चीवर बसल्यावर पुढे पाय समांतर टेकण्यासाठी टेबल हवे, असे वाटत रहाणे, पण मागे काय चालले आहे हे समजत नाही, त्यासाठी ही आरामखुर्ची गोल फिरणारी हवी ..... आरामखुर्चीवरच बसायचे मग नुसतीच कापडवाली आरामखुर्ची कशाला, फोमचीच वापरूया..... हे आस्यासुख !
चालण्यापेक्षा सायकल बरी, सायकल पेक्षा स्कूटी बरी, स्कूटीपेक्षा स्कूटर, त्यापेक्षा बाईक, ही बाईक एक पाय झाडून सुरू करण्यापेक्षा एक बोट दाबून सुरू झाली तर बरी !!!!! हे आस्यासुख !!
कमरेत वाकून जमिनीवरचा केर केरसुणीने काढण्यापेक्षा उभे राहून व्हॅक्युम क्लीनरने केर ओढून घेणे, उकीडवे बसून लादी पुसण्यापेक्षा माॅबने किंवा दांडा लावलेल्या स्पंजने लादी अलगद पुसुन घेणे, किंवा आपण काम न करता, चक्क त्या कामासाठी बाई लावणे, हे आस्या सुख !!!
सुख हे केवळ बसण्यामधूनच मिळते. बसण्यामधले पुरेपुर सुख मिळवण्यासाठी धडपड सुरू होणे असाही आस्यासुखचा अर्थ आहे.
सुखार्था सर्व भूतानाम् मताः सर्वा प्रवृत्तयः, असे वाग्भटजी म्हणतात. सर्व प्राणी मात्रांची सुखाकडेच प्रवृत्ती असते, पण प्रमेहामधे, ती जरा जास्तच या कॅटेगरीमधे मोडते.
याचा अर्थ असा नव्हे की सुखाची कामना, इच्छा करूच नये. सुख मिळावेसे वाटणे, ही अगदी नैसर्गिक भावना आहे. पण आणखी आणखी, त्यापेक्षा जास्ती सुख मलाच मिळावे. हा हावरटपणा किंवा सुखाचा अतिरेक हे दुःखाचे कारण ठरू नये.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
01.02.2017
आपण सर्वच जण वाळा ह्या वनस्पतीला ओळखतो.पुर्वीच्या काळी राजे महाराजे ह्यांना वाळ्याच्या पंख्यानी वारा घालत असत. तसेच वाळ्याचे सरबत हे देखील बऱ्याच जणांना आवडते.चला तर आता ह्या वाळ्याची आपण पुर्ण ओळख करून घेऊयात.
वाळ्याचे तृणमूल असून काण्ड १-१.५ मी उंच व सुगंधी असते.ह्याची बेटं असतात.ह्याची पाने २५-५० सेंमी लांब व १ सेंमी रूंद असतात.हि सरळ असून वरच्या भागात गुळगुळीत व पृष्ठ भागी रोमश असतात.फुलाचा देठ १०-३ सेंमी लांब असून मुळ सुगंधी असते ते वाळल्यावर सुगंध वाढतो.
ह्याचे उपयुक्तांग मुळ असून वाळा चवीला कडू,गोड व थंड गुणाचा व हल्का आणी रूक्ष असतो.हा कफपित्तनाशक व वातकर अाहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)त्वचारोग व अतिघाम येणे ह्यात वाळ्याचा लेप करतात.
२)वाळा अतिसारात आमपाचक म्हणून चांगले कार्य करतो.
३)वाळा तापामध्ये देण्यात येणाऱ्या षडंगोदकात वापरतात.
४)वाळा दाहनाशक असल्याने दाहात साखरे सह वापरतात.
५)वाळा मुत्रल असल्याने मुत्रदाह व लघ्वीच्या त्रासात तांदुळाचे धुवण व साखरे सह वापरतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
शाकाहारी जेवणामधे प्रमुख घटक कोणता?
भात किंवा भाकरी.
प्रदेशानुसार ठरते भाकरी किंवा पोळी ते.
ज्या प्रदेशात तांदुळ हे पिक असते, तेथील आहारात भात हा मध्यवर्ती असतो.
बाजुला पोळी असते.
आणि जिथे तांदुळ हे मुख्य पिक नाही, तिथे भात मुख्य नाही. तो नंतर वाढून घेतला जातो. पहिल्या वाढीला भाकरी किंवा रोटी आली तर ती मध्यवर्ती आहार ठरते. ज्वारी बाजरी किंवा मका गहू यापासून बनवलेली रोटी म्हणजे पोळी किंवा भाकरी हा जेवणातील मुख्य पदार्थ होतो.
रोट म्हणजे हातावर किंवा पाटावर थापून, जाडसर केलेले असतात. तव्यावर एकदा आणि तवा उतरवून पुनः थेट अग्निवर, असे दोन वेळा हे रोट भाजले जातात. आकाराने मोठे ते रोट. आकाराने जरा लहान ती रोटी. रोट, रोटी आणि भाकरी यात आणखी एक फरक आहे तो म्हणजे भाकरीला गरम तव्यावर घातले की लगेच पाणी लावले जाते. रोटीला पाणी पण नाही तवा पण नाही. थेट अग्नीच्या संपर्कात.
अग्निचा संस्कार जेवढा जास्त तेवढा पदार्थ पचायला हलका. हे साधे सोपे सूत्र लक्षात ठेवावे.
हे रोट भाजताना जर तंदुर वापरली, म्हणजे अग्नि आणि रोट यामधे तव्याचा कोणताही अडथळा न येता हे जाडेभरडे रोट थेट अग्नीवर खमंग भाजले जातात. त्यातील पाणी लवकर सुकवले जाते. ते फुलतात, फुगतात, पापुद्रा वेगळा होतो. आतपर्यंत उष्णता जाते आणि पचायला हलके होतात. पोटही लवकर भरते.
हे तवे पूर्वी खापराचे किंवा मातीचे असायचे. नंतर लोखंडी किंवा बीडाचे म्हणजे मिश्र धातुचे असायचे. आता हिंडालियमचे. हिंडालियम हा पण एक मिश्र धातु. आजचे विज्ञान सांगते, या धातुची झीज लवकर होते. उष्णता मिळाली की त्याला चरे पडतात, त्यातील धातु अन्नातून पोटात जातात. म्हणून त्याचा वापर नियमितपणे जेवणात असेल तर मूतखडा होण्याचे प्रमाण वाढते. किंवा जो विषारी आहे. इंग्रजांच्या काळात बंदीवान कैद्यांना तुरूंगातील भोजन याच अॅल्युमिनीयम वा हिंडालियमच्या ताटल्यातून दिले जायचे. पिक्चरमधे आपण बघतोच.
आज आम्ही ही अॅल्युमिनीयम हिंडालियमची भांडी, स्वस्त वाटतात म्हणून, पटकन स्वच्छ होतात म्हणून, आमच्या घरात वापरायला सुरवात करून, स्वतःलाच स्वतःच्या घरामधे बंदिस्त कैदी बनवून टाकले आहे.
लवकरच सुटका करून घ्यायला हवी ना !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
24.10.2016

ह्याचा १.५-४ मीटर उंचीचे काटेरी गुल्म असते.पाने बळकट व भोवऱ्याच्या आकाराची अखंड व कडेला काटे असलेली असतात.पुष्पमंजिरी ५-८ सेंमी लांब असून फूल पिवळे व मोठे असते.फळ निळ्या तांबड्या रंगाचे व बेदाण्या प्रमाणे दिसणारे असते.काष्ठ गडद पिवळ्या रंगाचे असून पाण्यात उकळल्यावर ही पिवळेपणा टिकून राहतो.
दारूहळदिचे उपयुक्तांग काण्ड,मुळ,फळ व रसांजन आहे.ह्याची चव कडू,तुरट असून ती उष्ण गुणाची व हल्की व रूक्ष असते.ह्याचे काण्ड मुळ चवीला कडू तुरट असल्याने कफ व पित्तनाशक असून फळ पित्त शामक आहे.
चला आता आपण दारूहळदीचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)दारूहळद दीपन,यकृत्तोत्तेजक व पित्तसारक असून मळ बांधून ठेवते म्हणून भुकन लागणे,आव पडणे ह्यात उपयुक्त आहे.
२)कफनाशक असल्याने दारूहळद खोकल्यात वापरतात.
३)त्वचारोग,खाज,स्त्राव कमी करायला दारूहळद लावायला व पोटात घ्यायला देतात.
४)स्त्रियांच्या अंगावर पांढरे जात असल्यास दारूहळदीचा काढा देतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
©Dr Swati Anvekar
ऐकलेले आणि बघितलेले यात चार बोटांचे अंतर असते, तसे नियम आणि वास्तव यात एक हाताचे अंतर असते.
सोनोग्राफीमध्ये झालेल्या प्रगतीमुळे पोटाचे एक्स-रे काढण्याचे प्रमाण घटले आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti