(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – दही

    दही हा पदार्थ जरी दुधापासूनच बनत असला तरी दुध व दह्याच्या गुणधर्मात बराच फरक आहे.दुधासारखे जर आपण दह्याचे नियमीत सेवन केले तर ते रोगांना आयतेच निमंत्रण दिल्या सारखे होईल.

    दही हा पदार्थ थंड असून तो शरीरात थंडावा निर्माण करतो हा जो समज आपल्या समाजात रूढ झाला आहे तो पुर्णत: चुकीचा आहे.वास्तविक दही हे उष्ण गुणाचे असते.

    आता दह्याचे सामान्य गुणधर्म पाहूया:

    दही हे शरीरात स्निग्धपणा निर्माण करते,पचायला जड असते,तोंडास रूची आणते,शरीरात शुक्रधातू व चरबी वाढविते,वात दोष कमी करून पित्त व कफ दोष वाढविते.

    साधारण पणे दही हे ७ प्रकारचे असते व प्रत्येकाचे गुण वेगळे असतात चला आता ते आपण थोडक्यात पाहू:

    १)ताजे दही:
    रुचिकर,गोड,शरीरात विविध स्त्रावांची उत्पत्ती करणारे व चरबी व कफ वाढविणारे असते.

    २)आंबट दही:
    कफपित्तकर,अंगावर सूज उत्पन्न करणारे व शरीरात स्त्राव उत्पन्न करणारे असते.

    ३)शिळे आंबट दही:
    रक्तधातू विकृत करते,पित्त वाढविते व त्यामुळे रक्ताचे व पित्ताचे अनेक विकार जसे त्वचारोग,डोळे लाल होणे,घशाशी आंबटकडू येणे,झोपेचा अतिरेक असे त्रास होतात.

    ४)अदमुरे दही:
    ह्याचे वारंवार सेवन केल्याने छातीत जळजळ,सर्दी,खोकला,पोट फुगणे,अशा तक्रारी होतात.

    ५)तापविलेल्या दुधाचे दही:
    वातनाशक,तोंडास रूचि आणते,शरीर पुष्ट करते,बलदायक आहे.

    ६)साय काढलेल्या दुधाचे दही:
    तुरट,पचायला साईच्या दह्या पेक्षा हल्के,भुक वाढविणारे,मळ घट्ट बांधुन बाहेर काढणारे,आतड्यांची गती कमी करणारे,ह्याच्या नियमीत सेवनाने पोट फुगते.

    ७)साईचे दही:
    पचायला जड,वातनाशक,कफकर,शुक्रधातू वाढविणारे आहे.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – लोण्याचे औषधी उपयोग

    अ)दूधापासून तयार केलेले लोणी:

    १)वारंवार पातळ भसरट संडास होत असल्यास १० ग्राम लोण्याचा समावेश दोन्ही वेळच्या जेवणात करावा.

    २)ज्यांना वारंवार नाकाचा घोळणा फुटण्याची सवय असते त्यांनी जेवणानंतर १ मोठा चमचा लोणी समभाग साखर घालून खावे व त्यावर तासभर पाणी पिऊ नये.

    ३)डोळ्यांची आग होत असल्यास,वाचताना डोळे दुखत असल्यास,डोळे कोरडे वाटत असल्यास १ चमचा लोणी,१ चमचा मध,व १ चमचा त्रिफळा चुर्ण हे मिश्रण चाटण करून खावे मात्र त्यावर पाणी व इतर खाद्य पदार्थ खाऊ नये.

    (क्रमश:)

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – बटाटा

    हे कंदमुळ सर्वांचेच फार आवडीचे व लाडके.प्रत्येक शाकाहारी पदार्थात घातल्यावर तो त्या पदार्थांची लज्जत अजुनच वाढवितो.बटाट्याचेकाप,भाजी,भजी,रस्साभाजी,आमटी,वेफर्स,चिवडा,समोसा,आणी मुंबई फेम बटाटेवडा,आलुपराठा,असे एक ना अनेक प्रकारे आपण ह्याचा फोडशा पाडत असतो.

    बटाटा हा कंद देखील जमीनीखाली उगवतो.हा खरे पाहता जुनाच वापरावा तसेच हिरवा बटाटा हा विषवत असतो म्हणून तो कधीच खाऊ नये.तसेच डायबेटिस असणा-यांनी,वजन कमी करायचे असल्यास हा खाऊ नये.बटाट्याच्या सालीत जीवनसत्व क असते त्यामुळे बटाटा हा सालीसकटच उकडावा.

    बटाटा हा चवीला गोड,थंड व कफवात वाढविणारा व पित्तनाशक असतो.चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया:

    १)बध्दकोष्ठाचा त्रास असल्यास शेगडीवर अथवा चुलीत बटाटा भाजावा व त्यावर सैंधव,काळेमीठ,जीरे,मिरी घालून खावा.

    २)बटाटा भाजून जिरे,मिरी,सैंधव लावून खाल्ल्याने वारंवार होणारी सर्दी कमी होते.

    ३)लघ्वी कमी होणे,जळजळ होणे,पिवळी लघ्वी होणे ह्या बटाटा उकडून धणे,जीरे व सैंधव लावून खावा.

    ४)नवा बटाटा उकडून बाळंतीण बाईला दिल्यास अंगावरचे दुध वाढते.

    बटाट अतिखाल्ल्यास वात विकार वाढतात व वजन वाढते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • देवपूजेतील अंतिम उपचार – मंत्रपुष्प – भाग १

    वेदामधून घेतलेले, जवळपास सर्वांचेच पाठ असलेले, हे मंत्रपुष्प ही आपली भारतभूची राष्ट्रीय प्रार्थना आहे, हे कोणाला माहिती नसेल. ही जणु काही शपथ आहे. देवाच्या समोर उभे राहून एका सर्व शक्तीमान शक्तीला शरण जाऊन सांगतोय, की हे राष्ट्रदेवते, मी तुला साक्ष ठेऊन ही शपथ घेतोय,

  • प्रमुख आहारसूत्र – आयुर्वेदीय चिकित्सेमागील दृष्टीकोन – भाग बारा

    केवळ आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणूनही पुरणार नाही. भारतीय आयुर्वेदीय दृष्टीकोन म्हणणे आवश्यक आहे. कारण आज आणखी एक प्रकार चिकित्सा करताना विचारात घ्यावा लागतो, तो म्हणजे पाश्चात्य विचाराने अभ्यासलेला आयुर्वेद.

    म्हणजे रोगाचे निदान पाश्चात्य पद्धतीने करायचे आणि चिकित्सा भारतीय पद्धतीने करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे मागे म्हटल्याप्रमाणे घोड्याला गाढवाचे शेपूट लावल्यासारखे होते.
    भारतीय पद्धतीने निदान केले तर भारतीय पद्धतीने चिकित्सा करता येते. भारतीय पद्धतीने पथ्यापथ्य सांगता येते आणि रुग्णाला बरे वाटते. संपूर्णतः भारतीय !

    थोडं आणखीन स्पष्ट करून सांगतो. जसे प्रमेह हा आजार आयुर्वेदात वर्णन केला आहे. मधुमेह हा त्याच्या वीस प्रकारापैकी एक. हा रोग का होतो, कसा होतो, त्याची लक्षणे काय आहेत, हे सर्व ग्रंथात वर्णन केलेले आहे. पण या रोगामधे रक्तातील साखरेचा संबंध आयुर्वेदात कुठेही वर्णन केलेला नाही. आणि असा हट्ट पण असता कामा नये. प्रत्येक शास्त्राचा एखाद्या रोगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो. शेवटी महत्त्वाचे काय आहे, रुग्णाला बरं वाटणं, पॅथी कोणती का असेना.

    हो, आणखी एक. हे माझं वैयक्तिक म्हणणे अजिबात नाही. जे ग्रंथात लिहिलेले आहे ते जसेच्या तसे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय. एखाद्या रोगाचा माझा आयुर्वेद कसा विचार करू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करणे चुकीचे आहे का ? विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल अन्य पॅथी.

    त्या पॅथींचा डायबेटीस कडे पहाण्याचा दृष्टीकोनच वेगळा आहे. तो मान्यच आहे. तो त्यांच्या संशोधनाचा एक भाग असेल. पण त्याला प्रमाण मानून आयुर्वेदानुसार त्या रोगाची चिकित्सा देणे हे मला योग्य वाटत नाही.यात कुणा पॅथीला दुखावण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना अॅलोपॅथीचा अगदी कळवळा येतोय, त्या आयुर्वेद पदवीधारकांनी खुशाल तसा विचार करावा. आम्ही किती वैचारिक गुलामगिरीत वागत आहोत, याचा हा उत्तम नमुना आहे.

    आयुर्वेदातून उत्तरे कशी शोधायची ? आयुर्वेदाची जी पद्धत आहे, त्याचा पूर्णपणे भारतीय पद्धतीनेच विचार केला तर उत्तर मिळेल.

    तर सांगायचेय काय, माझ्या अभ्यासानुसार, प्रमेह म्हणजे डायबेटीस नाही. आणि मधुमेहामधे रक्तातल्या साखरेचा संबंध तपासावा, असे कोणत्याही आयुर्वेदीय ग्रंथात लिहिलेले नाही. ( पुढील वाक्य वैद्यांसाठी आहे - "असल्यास त्याचा पुरावा दाखवावा.")
    त्याच्या तपासणीचे निकष हे पूर्णपणे आयुर्वेदाचेच आहेत. ते तसेच अभ्यासले पाहिजेत.आयुर्वेदिय पद्धतिने रोगनिदान करुन आयुर्वेदिय चिकित्सापद्धति वापरणे,
    यालाच म्हणतात,
    चिकित्सेमागील आयुर्वेदीय दृष्टीकोन.
    भारतीय आयुर्वेदातील भारतीय दृष्टीकोन.
    माझे काही चुकलंय का ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.02.2017

  • शतावरी

    शतावरी ह्या वनस्पती बाबत आपल्या पैकी बऱ्याच जणांना माहीत असेल.आपण सर्वांना शतावरी कल्प तर माहितच असेल जो बाळंतीणीला हमखास दुधातून दिला जातो.चला तर आज आपण ह्या शतावरीची थोडी जास्त ओळख करून घेऊ.

    शतावरीचे काटेरी झुपकेदार वेल असतो.ह्याच्या फांद्यावर उभ्या रेषा असतात.काण्ड त्रिकोण,स्निग्ध असते.ह्याचे काटे ०.५-१ सेंमी लांब व खालच्या बाजुस वळलेले काहीसे बाकदार असतात.शतावरीचे काण्ड हे पानां सारखे भासते.२-६ ह्या संख्येत गुच्छात उगवते.१.२५-२-५ सेंमी लांब पातळ व विळ्या प्रमाणे भासते.फुले मंजिरी स्वरूपात उगवतात जी २.५-५ सेंमी लांब एकेरी किंवा गुच्छ रूपात असतात हि सुगंधी व पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात.फळ वाटाण्याच्या आकाराचे १-२ बीज युक्त असते.मुळ हे मुल स्तंभापासून जाड लांबट गोल व दोन्हीकडे निमुळती व पांढरी अशी मुळे फुटतात.

    शतावरीचे उपयुक्तांग आहे मुळ.ह्याची चव गोड,कडू असून हि थंड गुणाची व जड,स्निग्ध व मृदू असते.हि वातपित्त नाशक व कफ पोषक आहे पण ओली असताना मात्र कफकर असते.

    चला आता आपण हिचे औषधी उपयोग जाणून घेऊ:

    १)वातनाशक व बल्य असल्याने शतावरी सिद्ध तेल अभ्यंगासाठी वापरतात.

    २)सरक्त मल प्रवृत्तीमध्ये शतावरी सिद्ध घृत चांगले कार्य करते.

    ३)बाळंतीणीस चांगले व भरपूर स्तन्य उत्पत्ती साठी शतावरी सिद्ध दुध देतात.

    ४)अधोग रक्तपित्तामध्ये शतावरीचा काढा अथवा स्वरस वापरतात.

    ५)शतावरी शुक्रधातूची वाढ करते तसेच ती गर्भाशय पोषक देखील आहे.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • किचन क्लिनीक – मिरची

    मिरची हि आपल्या स्वयंपाकामधील एक अविभाज्य घटक होय.आपल्या तिखट चवीने भल्या भल्यांची वाट लावू शकणारी हि मिरची हा मसाल्यामधील एक प्रमुख पदार्थ आहे.तिखटाच्या कोणत्याही पदार्थाला हिच्या उपस्थिती शिवाय लज्जत येतच नाहीतर.फोडणी,चटणी,आमटी,लोणचे,पापड,
    गरम मसाला इ अनेक पदार्थांमध्ये हिचा वापर करावाच लागतो.

    लाल असो वा हिरवी हिच्या विशिष्ट झणझणीत चवी मुळे हिची जागा दुसरे कोणतेच पदार्थ घेऊ शकत नाहीत बरे का!आपणा सर्वांना एकून आश्चर्य वाटेल की ह्या मिरचीचा उपयोग देखील घरगुती उपचारांमध्ये होऊ शकतो हो विचित्र जरी वाटत असले तरी हे खरे आहे बरे का,नाहीतर। ब-याच मंडळींना असे वाटेल कि नक्की डाॅक्टरांची तब्येत बरी आहे ना?.मिरची कुणी
    औषध म्हणून कशी वापरू शकते.

    चला तर मिरचीबद्दल थोडी माहिती पाहूयात.मिरचीचे छोटे क्षूप असते आणि मिरची हे त्याचे फळ होय.चविला तिखट व उष्ण असते.त्यामुळे शरीरातील वात व कफ कमी करते पण पित्त वाढवते.

    अर्वाचीन आहार शास्त्र सांगते मिरची हे क जीवन सत्वाचे अर्थात vitamin C चे उत्तम स्त्रोत आहे.आता लगेच मिरची खाण्याचा सपाटा लावू नका बरे नाकी नऊ येतील??.

    आता हि मिरची आपले आजार कसे बरे करते पाहूयात ना!

    १)थंडी मुळे पोटात दुखत असल्यास लाल मिरचीच्या १/२ चमचे बिया पाण्यासोबत गिळाव्यात आराम वाटतो.

    २)आवाज बसणे,घसा कोरडा पडणे,वारंवार कफ पडणे ह्यात २ हिरव्या मिरच्या न कापता व फोडता १ कप पाण्यात उकळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

    ३)हाता पायांच्या बोटांना वात येत असल्यास चमचाभर मोहरीच्या तेलात हिरवी मिरची तळावी व हे तेल हातापायांना चोळावे फरक पडतो.

    ४)पाच वर्षावरील मुलांना जंत होत असल्यास १/२ चमचा मिरचीपूड गुळात मिसळून गिळायला द्यावी व नंतर तासाभराने २-४ चमचे एरंड तेल प्यायला द्यावे ह्याने मोठे जंत पडतात.

    ५)चार चमचे एरंड तेल+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र शिजवावी व हे तेल सांधेदुखी,मुरगळणे ,लचकणे ह्यामुळे होणा-या वेदनांमध्ये चोळावे.

    ६)अजीर्ण झाल्यामुळे होणा-या जुलाबात १/४ चमचा हिंग+ १/४ चमचा जिरे+ १/४ चमचा कापूर+ १/४ चमचा मिरची पूड एकत्र करून तूपामध्ये घोटावी व त्या मिश्रणाच्या मोहरी एवढ्या गोळ्या कराव्यात व दर पंधरा मिनीटांनी २-२ गोळ्या गरम पाण्यासोबत घ्याव्या.

    मिरचीचा अतिवापर केल्यास एॅसीडीटी,लघ्वी व संडासला जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? – भाग ३

    आपले सगळे अवयव बघा कसे “दाते” आहेत. कोणत्याही अपेक्षांशिवाय आपल्याला आतून आपलेपणाने सतत देत राहातात. रसरक्त, अश्रु, स्तन्य, लाळ इ.इ. काही वेळा तर सर्व अंतस्रावी ग्रंथी आपली परवानगी न घेता सुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे ते, न मागता तयार करून देतात. असा दाता व्हावं.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग दहा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही.

    काही गोष्टी आपण गृहीत धरतो, जसे एकदा रक्तदाब वाढला म्हणजे तो रोग मला झाला, एकदा कधीतरी रक्तात साखर मिळाली म्हणजे मला डायबेटीस झाला, एकदा रिपोर्ट मधे कोलेस्टेरॉल वाढलेले दिसले, आता जेवणातले तेल तूप नारळ शेंगदाणे बंद करायला हवेत. असंही नाही.

    काही जणांना मात्र उगाचच औषधे घेण्याची हौस असते, किंवा मी औषधांशिवाय जगूच शकणार नाही अशी भीतीदेखील असते. आणि औषधे सुरू केली जातात. ही औषधे घेतली की मी बरा राहीन, आता मला काही होणार नाही, अशी भाबडी आशा असते.

    कायमस्वरुपी औषध ही संकल्पना आयुर्वेदात नाही. जेव्हा रोग तेव्हा औषध. नाहीतर कशाला हवंय औषध ? रोग वाढू नये याकरीता औषध, रोग होऊ नये यासाठी औषध, प्रतिकार क्षमता वाढण्यासाठी औषध, रक्तवाढीसाठी औषध, कॅल्शियम सप्लीमेंटसाठी औषध, फूड सप्लीमेंटच्या नावाखाली औषधं हे केवळ बिझनेस फंडे आहेत, हे लक्षात घ्यावे.

    ताप आला तर औषध जरूर घ्यावे. ताप येऊ नये यासाठी औषध घ्यायचे नसते. तसे चक्कर वगैरे येत असेल तर औषधांचा विचार करावा, पण चक्कर येऊ नये यासाठी चक्क औषधे ? रोग वाढला तर, हा भविष्याचा विचार अस्वस्थ करतो आणि भीतीपोटी कायमचे औषध सुरू होते.

    औषध कसे असावे, यासाठी ग्रंथात एक प्रमाण दिले आहे. अल्पमोली बहुगुणी असावे. एका औषधाने दुसरा रोग निर्माण होऊ नये, किंवा एका औषधाचे दुष्परिणाम होऊ नयेत, याकरीता दुसरे, त्यासाठी तिसरे, चौथे औषध घ्यावे लागू नये.

    एखादे औषध डोकेदुखीसाठी जरी घेतले तरी जाते पोटातच ! पोटात गेल्यावर फक्त जिथे डोके दुखते, त्या डोक्यामधेच ते जाते का ? नाही. सर्व रक्तात ते औषध मिसळून जाते. एखाद्या अवयवाला ठीक करण्यासाठी अन्य पाच सहा निरोगी अवयवांना आपण जास्ती कामाला लावत नाही का ?

    ही औषधे शरीरातून बऱ्या बोलाने बाहेर पडतंच नाहीत. येतो तो मुक्कामीच येत असतो. आतडी, किडनी, यकृत, डोळे अशा नाजुक अवयवांना नाहक हा कचरा साठवून ठेवावा लागतो.

    आपले संविधान असे म्हणते, शंभर आरोपी सुटले तरी चालतील, पण एका निरपराध्याला शिक्षा होता नये. इथे तर सगळं उलटंच चाललेलं आहे. एका दोषी अवयवाला निर्दोष करण्यासाठी बाकी सर्व अवयवांना जणु काही वेठीला धरले जातंय, त्यांच्यावर अन्याय करीत, एखाद्या अवयवाला सांभाळण्याची कसरत केली जातेय. बरं इथे जनरली प्रत्येक अवयव प्रत्येक डाॅक्टरने वाटून घेतलेले. प्रत्येक तज्ञ धडपडतोय, माझ्या अवयवाचाच मी विचार करणार ! बाकीचं तुमचं तुम्ही बघा !

    कुणी कुणाचे नाही राजा,
    कुणी कुणाचे नाही.
    लळा जिव्हाळा शब्दच खोटे.

    पण शरीरातील अवयव जन्मापासूनच एकमेकांशी रक्ताने बांधलेले आहेत म्हणून काय कोण जाणे, पण हे सर्व अवयव एकमेकांना स्वतःच जीव धोक्यात घालून, त्यांच्यावरील हा औषधांचा मूक अत्याचार दूर करण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावीत असतात.

    हे डाॅक्टरांचे नशीब !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    19.04.2017

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – मेथी

    ह्या भाजी बाबतीत आपल्याला मिश्र प्रतिक्रिया एकायला व अनुभवायला मिळतात.काहीजणांची अत्यंत आवडती तर काही जणांची अगदीच नावडती अशी हि भाजी(माझी सर्वांत आवडती आहे बुवा). आपण ह्याचे विविध प्रकार बनवून हिला खात असतो जसे मेथीचे पराठे,मेथी मलाई मटर,मेथीचे थेपले,मेथी आलू इ.पण प्रत्येक स्वरूपात हिच्यापासून बनविलेल्या व्यंजनांची लज्जतच काही निराळी आहे.

    अशा ह्या मेथींच्या भाजीचे लहान क्षूप असते.तसेच हि चवीला कडू तुरट आणि थंड असते,त्यामुळे शरीरातील पित्त व कफ कमी करते.

    हिचे देखील घरगुती उपचारांमध्ये बरेच उपयोग आहेत बरं का!चला तर मग आता ते पहायचे ना?

    १)ज्या मंडळींना शौचास साफ होत नाही त्यांनी मेथीची भाजी जेवणात घ्यावी.

    २)गळवांवर हिच्या पानांचा लेप लावावा म्हणजे वेदना व सूज कमी होते.

    ३)संडासला आव पडत असल्यास ५ चमचे पानांचा रस खडीसाखर घालून घ्यावा.

    ४)वारंवार लघ्वीला होत असल्यास १/४ कप मेथी पाल्यांचा रस+१/२ चमचा कात+३ चमचे खडीसाखर हे मिश्रण दिवसातून एकदा घ्यावे.

    ५)डोक्यात कोंडा झाल्यास आंघोळी पुर्वी पाच मिनिटे केसांच्या मुळांना मेथीच्या पानांचा रस लावावा व नंतर साबण न वापरता केस धुवावेत.केस मऊ व चमकदार होतात.

    ६)चेहरा तेलकट होत असल्यास मेथीच्या पाल्याचा लेप चेह-यांवर लावून १/२ तास ठेवावे व कोमट पाण्याने धुवावे.

    मेथीची भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास संडासला पातळ व वारंवार होऊ शकते.

    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४