(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग बाहात्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 29

    नैवेद्यम् समर्पयामी-भाग तीन

    नैवेद्य करताना सोवळ्यातच करावा, असा दंडक आहे.
    नेमके सोवळे म्हणजे काय हो ? पीतांबर ? रेशमी वस्त्र? की धूतवस्त्र ? की आणखीनच काही ? आणि काय आवश्यकता आहे या सोवळ्याची ? त्याच्यावर काय फक्त ब्राह्मणांचीच मक्तेदारी आहे काय ?
    कधीच नव्हती, कधीच नाही, कधीच नसावी.

    सोवळे म्हणजे शुद्धता. स्वच्छता.
    आपण जे स्वच्छतेचे नियम पाळतो ते जरा कडक केले तर शुद्धता मिळते. नेहेमीच्या वापरातील कपडे आणि सोवळ्यातील कपडे, वेगवेगळे ठेवण्याचे हेच एकमेव कारण. आपण बाहेर हवे तसे फिरतो. बाह्य वातावरणातील जीवजंतु आपल्या अंगाखांद्यावर, हातापायावर बसतात, आपल्याबरोबर ते आपल्या घरात येतात. स्वयंपाकघरात येतात. अन्नापर्यंत पोचतात. आणि अन्नातून आपल्या पोटातही जातात. जीवजंतुंचा, अन्न आणि आहार ते आपले शरीर अवयव, हा प्रवास जेवढा टाळता येईल, तेवढा टाळला जावा, यासाठी हे सोवळे ! काय चूक आहे असे सोवळे पाळण्यात ?

    बाहेरून घरात आल्यावर हात पाय धुवुन कपडे बदलून घरात यावे असा कडक नियम एकेकाळी ब्राह्मण घरात होता. मी जाणीवपूर्वक जातीचा उल्लेख करतोय. काही कर्मठ ब्राह्मण घरात तर बाहेरून आल्यावर कपडेच काय, जे बरोबर आणलेले सामान, वस्तु,भेटी, पिशव्या, भाजी, जेवढे धुता येईल तेवढे सर्व धुवुन घेतले जायचे. का ? कशासाठी? एवढा कर्मठपणा आवश्यक होता का ? उलट गत कालापेक्षा आताच्या कालात असा कर्मठपणा घरात आणला तरी पन्नास टक्के आजार कमी होतील. आमच्या सौभाग्यवती नोटादेखील धुवुन घेतात, कारण विचारले तर सांगतात, "लोक नोटा मोजताना थुंकी लावून मोजतात, या नोटा खाटीकखान्यातून आल्या असतील तर मांस लागलेले असेल, मासळी बाजारातून आल्या असतील तर रक्त लागलेलं असेल, रस्त्यावर ही नोट पडलेली असेल तर तिथली घाण लागलेली असेल, म्हणून मी त्या नोटा धुते." काय चुकले तिचे ? ( मनात म्हटलं दोन हजाराची नोट फक्त धुवु नकोस, रंग जातो म्हणे !जोक अपार्ट,) पण हे सोवळे नव्हे काय ?

    बाजारभर फिरायचे आणि घरात, अगदी स्वयंपाकघरात देखील तसेच त्याच बूटांनी फिरायचे ? बूट काढले तर साॅक्सची घाण म्हणे घरात येते. एवढे सोवळे कळते तर स्वच्छता कोणी ठेवायची ? बूट साॅक्स, बाहेरचे कपडे यावर जी घाण आहे ती घराबाहेर ठेवावी. हातपाय धुवून आत यावे, एवढे सुद्धा समजत नाही ?

    आणि स्वयंपाकघरात तर आंघोळ केल्याशिवाय जायचेच नाही, समजा चुकुन गेलात तर कशालाही स्पर्श करायचा नाही. हे पण सोवळेच. देवघरातील गोष्टच वेगळी!

    देवघरात पूर्वीच्या काळी वर्षाच्या बेगमीची लोणची, सांडगे कुरडया, पापड, मुरांबे, गुलकंद आदि "आयसोलेट " करून ठेवलेले असायचे ! हे पण सोवळेच ! तिथे तर आणखीनच कडक सोवळे. नेहेमीच्या धुतलेल्या वस्त्राने पण तिथे जायचे नाही. आंघोळ झाली की तडक देवघरात जाऊन तिथेच ठेवलेले सोवळे नावाचे वस्त्र नेसायचे. त्यानंतर कश्याकश्यालाही स्पर्श करायचा नाही. आणि देवपूजा नैवेद्य सर्व कर्मकांड पार पडायचे. हे सर्व कर्मकांड ब्राह्मण घरात इमाने इतबारे व्हायचे ! काय ही स्वच्छता, हे सोवळे चुकीचे होते ?

    या देवासाठी नैवेद्याचा स्वयंपाक देखील सोवळ्यातच व्हायला हवा, असा दंडक चुकीचा होता का ? जे जे देवासाठी ते ते देहासाठी या नियमानुसार, जर देवाला शुद्ध आणि सात्विक लागते तेच आपणाला सुद्धा.

    आणि काय हो,
    आज डाॅक्टर मंडळी सांगतात, कुत्रा मांजर या प्राण्यांपासून लांब रहा, त्याना "टच" करू नका, त्यांच्या अंगावरील केसापासून तुम्हाला अॅलर्जी होईल, दमा चाळवेल, तेव्हा तुम्ही मान्यच करता ना कि या प्राण्यांच्या अंगावरील जे काही अदृश्य जीवजंतु, "अॅलर्जिक सबस्टन्स " आपणाला पुढे जाऊन त्रास निर्माण करू शकेल, त्यापासून सावध राहिलेले बरे. ही "प्रिकाॅशन" घेणे म्हणजेच सोवळे.

    ऑपरेशन थिएटरमधे एखाद्याचे शस्त्रकर्म करायचे असेल तर तिथे कोणाला प्रवेश असतो ? नन अदर दॅन डाॅक्टर अॅण्ड सिस्टर्स. फक्त नर्स आणि डाॅक्टरच तिथे जाऊ शकतात. का ? आम्ही का नाही जाऊ शकत ? तर आपण त्या ऑपरेशन थिएटरमधील नर्स आणि डाॅक्टरांसारखा "स्टरलाईझ्ड ऑटोक्लेव्हड" पोशाख घातलेला असत नाही, हे एक कारण असते.

    अरे, म्हणजे आज "ऑपरेशन थिएटर" मधे देखील सर्व डाॅक्टर सोवळ्यातच असतात म्हणा की !

    हो.
    हे सर्व डाॅक्टर्स ऑपरेशन थिएटरमधे सोवळे नेसलेले अगदी कर्मठ ब्राह्मणच असतात, मग त्यांची जात काही का असेना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    22.06.2017

  • किचन क्लिनीक – मेथी

    किचन क्लिनीक – मेथी

    चवीला कडू असली तरी आपल्या कडू चवीने काही पदार्थांना वेगळीच चव आणते.अशी ही मेथी आपण फोडणी मध्ये वापरतो.डाळ शिजवताना त्यात थोडी मेथी घालतात,तसेच गोवा कारवार भागात माशांची अथवा कैरी,अंबाड्यांची उडीदमेथी हि आमटी बनवतात तसेच गोव्यात बारशाला बाळंतीणिकरीता खास उकडे तांदूळ व मेथी घालून खीर बनवितात जिला मेथीची पेज म्हणतात.

    अशी हि मेथी आपल्या प्रत्येकाच्या स्वयंपाक घरात असतेच असते.आपण मसाल्या मध्ये वापरतो त्या मेथीच्या बिया होय.मेथीचे लहान क्षूप असते त्याची पाने भाजी मध्ये वापरतात.

    मेथी चवीला कडू असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणि कफ दोष कमी करते पण पित्त वाढवू शकते.

    हि मेथी देखील ब-याच घरगुती औषधांमध्ये उपयुक्त आहे.

    १)शरीरात वात भरल्याने हाता पायांना कळा येत असल्यास मेथ्या तूपात भाजून पीठ करावे व ह्याचे अगदी लहान लाडू वळावेत आणि रोज एक लाडू खावा साधारण पणे आठ दिवसात फरक पडतो.

    २)संडासातून आव पडत असल्यास १/२ चमचा मेथी चुर्ण दह्यात मिसळून खावे.

    ३)प्रसुतीनंतर अंगातील दुःख कमी होण्यास आणि अंगावरचे दुध वाढण्यासाठी ४ चमचे मेथी रात्री पाण्यात भिजत घालाव्यात आणि सकाळी बारीक वाटून त्यात नारळाचा रस व गूळ घालून शिजवावे आणि थोडे तूप घालून बाळंतीण बाईला रोज खायला द्यावे.

    ४)मधुमेहात रोज सकाळी उपाशी पोटी १ चमचा मेथी चुर्ण गरम पाण्यासह घ्यावे.

    ५)६ महिन्यानंतर लहान मुलांना त्यांच्या तीन वेळच्या खाण्यामध्ये रात्री मेथी भिजत घातलेले पाणी एक एक चमचा घालावे ह्या मुळे कडू चव पोटात जाते आणि बाळाला पोटाच्या तक्रारी देखील वारंवार होत नाहीत.

    मेथी खाण्याचा अतिरेक केल्यास एॅसीडीटी,संडासला पातळ होणे,अंगावर उष्णतेचे फोड येणे अशा तक्रारी होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार-भाग एकतीस

    तुळशीला प्रदक्षिणा घालून तीर्थ म्हणून तुळशीचे पान घातलेले पळीभर पाणी पिणे ही आणखी एक लुप्त होत चाललेली भारतीय परंपरा आहे. आमच्या पिढीने निदान तुळशी वृंदावन तरी पाहिले आहे. नातवाची तिसरी पिढी ते पाहील की नाही याचीच शंका आहे. अर्थात ग्रामीण भारतात अजूनही अंगणात तुळशी वृंदावने आहेत.

  • किचन क्लिनीक – पेरू

    किचन क्लिनीक – पेरू

    हे लोकप्रिय फळ असून सर्वांनाच आवडते त्याला आपला पोपट तरी कसा अपवाद असेल.आपल्या सर्वांना ती बाल कविता आठवत असेलच "पोपट पोपट बोलतोस गोड खाना जराशी पेरूची फोड".

    ह्याचा आता जाम,आयस्क्रीम,सरबत अस,वड्या असे बरेच रूचकर पदार्थ बाजारात उपलब्ध आहेत.

    पेरूचे सदाहरित झाड असते,पाने जाड,गोलसर,कडक,व सुगंधी असतात.कच्चा पेरू हिरवा तर पिकल्यावर पिवळा व आतील गर पांढरा व भरपुर बियांनी भरलेला असतो.

    हा कच्चा असताना तुरट लागतो व पिकल्यावर गोड.कच्चा पेरू खाऊ नये.खायला व औषधासाठी पिकलेला पेरू बियाकाढून त्याचा गर वापरावा.

    पिकलेला पेरू गोड,थंड,पित्त व वात दोष कमी करणारा व कफ दोष वाढविणारा असतो.

    आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)पोटात जळजळ,घसा कोरडा पडणे,हात,पाय,डोळे ह्याची आग ह्यात जेवणानंतर १ तासाने पिकलेला पेरू खावा.

    २)चालल्यावर थकवा येणे,पोटऱ्या दुखणे,घसा कोरडा पडणे ह्यावर सकाळी रिकामी पोटी १ पेरूचा गर+२ चमचे मध+१ चिमूट सैंधव हे मिश्रण घ्यावे.

    ३)संडासला साफ होत नसल्यास महिनाभर रोज रात्री एका पेरूचा गर खावा.

    ४)मोठ्या सर्जरी नंतर थकवा कमी करायला व जखम लवकर भरून यायला रोज १ पेरू+१ चमचा मध+१/२ चमचा साजुक तूप खावे.

    ५)लहान मुलांना पौष्टिक म्हणून खायला १ पेरूचा गर+ मध द्यावा.

    पेरू खायचा अतिरेक केल्यास सर्दी,पडसे होऊ शकते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? भाग पंधरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.

    उतु नको मातू नको
    घेतला वसा टाकू नको.

    चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
    त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.

    उष्टे खाऊ नये.
    एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.

    घटाघट पाणी पिऊ नये.
    पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.

    उगाच आरश्यात पाहू नये.
    नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
    आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?

    परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
    आता याला काय उत्तर देणार. ?
    माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.

    बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.

    केसांना हात लावू नये.
    हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.

    केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.

    आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    १०.०८.२०१७

  • आजचा आरोग्य विचार – भाग नऊ

    भारतातील सर्वसामान्य लोक जसे जगताहेत, त्यांची जीवनशैली कशी होती, याचे निरोगी चित्र डोळ्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करीत आहोत. राजे महाराजे, त्यांचे मंत्री, राजकारणी किंवा आजचे मंत्री यांच्या छानछौकीबद्दल आपण बोलतच नाही.

  • आहारातील बदल भाग ६६ – चवदार आहार -भाग २८

    आपण आहारातील या चवी वेगवेगळ्या अभ्यासल्या. प्रत्यक्षात मात्र अगदी एकाच चवीचे पदार्थ आपण खात नाही. किंवा जे पदार्थ खातो, त्यात अनेक चवी एकत्र झालेल्या असतात. किंवा असेही काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामधे एकापेक्षा जास्ती चवी चाखायला मिळतात, काही पदार्थांचे परिक्षण करून कोणत्या कोणत्या चवी त्यांच्यात चवी मिळतात, हे ऋषींनी अभ्यासून ठेवले आहे.

    जसे लसूण. हिचे संस्कृत नाव रसोन असे आहे. म्हणजे एक रस ऊन म्हणजे कमी. आंबट रस सोडून बाकी सर्व चवी लसणीमधे असतात. म्हणून लसूण आंबट पदार्थाबरोबर घेतली तर सहा चवी एकत्रितरीत्या पोटात जातात. म्हणून ताकाच्या कढीत लसूण हवीच ! किंवा लसणीच्या चटणीत चिंच हवीच. तर तो पदार्थ पूर्ण होतो.

    तसेच आवळ्याची मुख्य चव आंबट. इतर तुरट, गोड इ. चवी देखील कमी अधिक प्रमाणात आवळ्यात असतात. पण आवळ्यात खारट चव मात्र नसते. म्हणून मीठात मुरवलेला, मीठ लावून वाळवलेला, किंवा नुसता आवळा मीठाबरोबर का खातात, ते समजले ?

    नित्यं सर्व रसाभ्यासः ! चरकाचार्यांनी सहाही चवींचा आहार असावा असे स्पष्टपणे सांगितलेले आहे. मग गोड खायचे नाही, आंबट चालत नाही, तिखट तर अजिबात नको असं नाकं मुरडत खाण्याची काही आवश्यकता नाही.

    पहिलं खाल्लेलं पचवायला पुरेसा वेळ दिला तर, कोणताही पारंपारिक, आणि स्वतःला आवडणारा आहार, आपल्याला पचू शकतो. त्याचा उपद्रव न होता, शरीराचे आणि मनाचे उत्तम पोषण आणि प्रीणन होते.

    अगदी थोडक्यात सांगायचे झाले तर
    गोड, आंबट खारट पदार्थ वात कमी करतात. आणि कफ वाढवतात.
    कडू तिखट आणि तुरट चव वाताला वाढवतात आणि कफाला कमी करतात.
    खारट आंबट तिखट चवी पित्ताला वाढवतात.
    गोड कडू तुरट पित्ताला कमी करतात.

    मन प्रसन्न करणारा, शरीर पुष्ट करणारा, एवढा चवदार आहार आपण एवढा बदलून टाकलाय, की या चवीष्ट बलीष्ट आहाराच्या अभावांमुळे नियमितपणे औषधे मात्र घ्यावी लागत आहेत.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    28.11.2016

  • आहारातील बदल भाग ६४ – चवदार आहार -भाग २६

    सहा चवीपैकी शेवटची राहिली तुरट चव.
    तुरट या नावातच तुरटीची चव ज्याला ती तुरट असे लक्षात येते.

    हिरडा, पालेभाज्या, कात, सुपारी, त्रिफळा चूर्ण ही काही तुरट चवीची उदाहरणे आहेत.

    सर्व तुरट पदार्थ वातवर्धक आणि कफ शामक आहेत.

    हिरडा सोडला तर बाकी सर्व तुरट पदार्थ मलविबंध करवतात. (म्हणजे मराठीत काॅन्स्टीपेशन. )

    स्तंभन म्हणजे आकुंचित करणे हे महत्वाचे काम ही चव करते. या एका अति महत्वाच्या गुणामुळे ती वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रिय झाली आहे.

    रक्तवाहिनींचा संकोच करीत असल्यामुळे रक्तस्राव थांबवणारी,त्यामुळे शस्त्रकर्मींना हुकुमी शस्त्रच जणु !

    आतड्यांचे, गुदमार्गाचे आकुंचित करत असल्यामुळे अतिसार कमी करणारी, सहन होत नाही, सांगताही येत नाही वाले सगळे खुश !

    तसेच पित्त वाहिनीचा संकोच झाला तर पित्ताचे स्रवण पण कमी करण्यासाठी वापरली जाणारी, म्हणजेच पित्तशामक गुणाची त्यामुळे गॅस्ट्रोएन्टराॅलीस्टना भक्कम आधार देणारी.

    रोमकुपांचा संकोच झाल्यामुळे घाम कमी करणारी, त्यामुळे त्वचारोग तज्ञांना सावरून घेणारी.

    शुक्रवाहिनीचा संकोच झाल्यामुळे शुक्राच्या बाहेर पडण्यावर बंधन आणणारी, म्हणून शीघ्रस्खलनामधे उपयोगी ठरणारी, म्हणजेच सेक्स स्पेशालिस्टच्या भात्यातील मदनाचा बाणच जणु !

    केस जिथून उगवतात, त्या पेशींना आकुंचित करत असल्यामुळे केस गळणे कमी करण्यासाठी सुद्धा वापरता येते. म्हणजे स्त्रीयांची जीवश्च कंठश्च सखी !

    मूत्रमार्गाचा अवरोध करत असल्यामुळे लघवीचे प्रमाण कमी करवणारी, म्हणून मधुमेह तज्ञांना मदत करणारी

    स्थूलता कमी करण्यासाठी, भूकेवर संयम आणण्यासाठी पण ही तुरट चव वापरता येते. म्हणजे ढेरपोटे, तुंदीलतनु कमी करण्यासाठी धडपडणारे स्लीम सेंटर वाले भी खुश !

    हिरड्यांना बलदायक आहे. म्हणून प्रत्येक दंतमंजनामधे वापरली जातेच जाते. दातांची हलणारी मुळे या संकोच गुणामुळे मजबूत होतात. म्हणजे सर्व दात पाडणारे तज्ञ पण खुश !

    गुणांचा अभ्यास केला की द्रव्य कोणतेही असो, ते कसे काम करेल, याचा अंदाज बांधता येतो आणि इच्छित ठिकाणी जावून औषध काम करते.

    यासाठी युक्ती वापरावी लागते. ही ज्याच्याकडे आहे तो बुद्धिमान यशस्वी होतो.

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

    26.11.2016

  • किचन क्लिनीक – तिळ

    किचन क्लिनीक – तिळ

    आता पुढील गट आहे तैल बियांचा.ह्या गटात ज्या घटकांपासून तेल काढले जाते अशा द्रव्यांचा समावेश केलेला आहे.

    तर सर्वप्रथम आपण आयुर्वेदात अत्यंत महत्त्वाचे व मानाचे स्थान असलेल्या तीळा बद्दल माहिती पाहूया.

    तीळ चवीला गोड,तुरट,तिखट,कडू असून तीळ उष्ण असतात.ते स्निग्ध,पचायला जड असून वातनाशक व कफ पित्त वाढविंणारे असतात.

    तीळ हे दातांना बळकट करतात,बाळंतीण स्त्रीचे दुध वाढवतात व शुक्रवर्धक,बुद्धिवर्धक,केसांचे व हाडांची बळकटी वाढविणारे असतात.

    आता तीळापासून तयार केल्या जाणाऱ्या व्यंजनांचा शरीरावर काय परिणाम होतो ते पाहूया:

    १)चिक्की,तीळगुळ,तिळाचे लाडू:
    चवीलागोड,पचायलाजड,स्निग्ध,बल्य,
    बुद्धिवर्धक,वातनाशक,पित्तनाशक,कफकर,उष्ण,धातुपोषक आहे.

    २)तिळाची चटणी:
    तिखट,गोड,स्निग्ध,पचायलाजड,बलकारक,
    उष्ण,भुक वाढविणारी,रूचकर,पाचक,जखम भरायला मदत करणारे,पित्तकर,वात कफनाशक,लघ्वीचे प्रमाण कमी करणारी,मल बांधून ठेवणारी आहे.

    ३)गुळपोळी:
    चवीला गोड,तुरट,पचायला जड,वात पित्तनाशक,
    कफकर,स्निग्ध,बाळंतीणीचे दुध वाढविणारी,शुक्रधातू वाढविणारी,बुद्धि व कांती वाढविणारी आहे.

    ४)तिळ तेल:
    चवीला गोड,तुरट,कडू,उष्ण,वातकफनाशक,पित्तकर,मेदकमी करायला सहाय्यक,केस व दातांना हितकर,
    बलकारक,जड,त्वचेची कांती वाढविते.

    तिळ अति मात्रेत सेवन केल्यास संडासला घट्ट होऊ शकते.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आजचा आरोग्य विचार – भाग अठरा

    भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.