आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 1
हिंदुधर्माची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. ज्यामधे मूर्तीपूजा, पुनर्जन्म, श्राद्ध, एकत्र कुटुंब व्यवस्था, विवाह, उपनयन, प्रदक्षिणा, ओवाळणी, तेहेतीस कोटी देवता, दशावतार, देवपूजा, इ. अनेक वैशिष्ट्ये सांगता येतील.
या वैशिष्ट्यांमधील एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे कर्मकांड आहे.
कर्मकांडाकडे पहाण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर त्यातून काही गोष्टी शिकता येतात.
त्यातील काही गोष्टींचा आपण विचार जरूर करूया, जे आपण दैनंदिन जीवनामधे आचरणात आणत असतो. ते शोधण्यासाठी काही गोष्टींचा परत अभ्यास करूया.
आपण जे जे काही देवासाठी म्हणून करत असतो, ते खरं तर आपल्यासाठीच, आपल्या आरोग्यासाठीच असते. हा नियम ग्रंथोक्त (म्हणजे ग्रंथात वर्णन केलेला ) नाही. पण काही प्रथा कशा निर्माण झाल्या असतील, याचा घेतलेला हा मागोवा आहे. यात काही चुकत असल्यास जरूर सांगावे.
जसे देवपूजा करणे, देवपूजेसाठी काही उपचार केले जातात. पंचोपचार, षोडशोपचार इ.इ. यांचा काही विशिष्ट आध्यात्मिक अर्थ असणार आहेच, पण आरोग्याच्य दृष्टीने काही छुपे, गर्भित अर्थ आहेत का हे शोधण्याचा प्रयत्न करूया. जे नास्तिक आहेत, त्यांना या कर्मकांडामागील विचार पटला तर पटला.
केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः ते हरये नमः श्रीकृष्णाय नमः पर्यंत ही चौवीस नावे घेतली जातात. ही नावे घेतली असताना ईश्वर प्रणिधान हे एक कर्म असते. नामस्मरण हा महत्त्वाचा हेतू असतो. हे नामस्मरण करत असताना भटजी एक पळीभर पाणी प्यायला सांगतात. याचा अर्थ काय आहे ?
जे जे देवासाठी ते ते देहासाठी. हा विचार पटला की उत्तर मिळत जाईल.
देवपूजेची सुरवात या मंत्रानी होते. तेव्हा हे मंत्र म्हणताना घसा सुका असतो. हे मंत्र केवळ भटजींनी म्हणायचे नसतात, तर यजमानांनी सुद्धा म्हणायचे असतात. हे मंत्रोच्चार उच्चार करत असताना, त्यांच्या उच्चारांनी शरीरात एक उर्जा तयार होत असते. तसे या उच्चारामुळे आरोग्य देखील मिळते, असे मंत्रोच्चाराच्या फलश्रुतीमधे लिहिलेले आहे.
या मंत्राच्या स्पंदनांचा, त्यातून वाढलेल्या उर्जेचा, त्याचा घशाला त्रास होऊ नये, हा एक हेतु. एकुण चौवीस वेळा ही नावे उच्चारली जातात. सत्यनारायणाची तर एक हजार नावे सांगितलेली आहेत. ही नावे कालानुरूप, कार्यानुरूप, गुणवाचक, काही कर्मवाचक आहेत. नावे ( मग त्याला ईश्वर म्हणा, अल्ला म्हणा, आकाशातला बाप म्हणा नाहीतर अन्य काही,) नावे कितीही असली तरी तो एकच आहे. हे त्यातून समजून घ्यायचे असते.
यातील पहिली तीन नावे म्हणत असतानाच एकेक पळी पाणी प्यायला सांगितले जाते. एकेक पळीच का ? तिथे एकेक ग्लास किंवा एकेक पंचपात्री भरून का सांगितले नाही.
जे पाणी तहान नसताना प्यायचे असते, ते पळीभरच प्यायचे असते. केवळ घसा ओला होण्यापुरते ! नाहीतर हे अतिरिक्त पाणी अग्निमांद्य निर्माण करणारे ठरेल, हा आयुर्वेदातील दृष्टीकोन देखील इथे परत एकदा सिद्ध होतो.
............. हरये नमः श्रीकृष्णाय नमः !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
26.05.2017
मधुमेह होऊ नये म्हणून एक सूत्र आहे.
आस्यासुखम् स्वप्नसुखम् दधिनी
ग्राम्यौदक आनूपरसाः पयांसी
नवान्न पानं गुड वैकृतम् च
प्रमेह हेतु कफकृत्तच सर्वम् !!
ग्रंथातील या सूत्रातील आनूप या शब्दाकडे लक्ष वेधू इच्छितो. या शब्दाचा अर्थ आहे, पाणथळ प्रदेशातील मांस.
ज्या प्राण्यांच्या हालचाली खूप कमी आहेत, जे प्राणी भरपूर पाणी पितात, ज्यांची प्रकृती कफाची आहे, जे स्वभावतःच जाड आहेत, काहीही व्यायाम करीत नाहीत, मुद्दाम खुराक देऊन वाढवलेले, माजवलेले आहेत, अश्या प्राण्यांचे मांस खाणे हे प्रमेहाचे कारण आहे.
प्रमेह हा मूळ रोग. त्याचे एकुण वीस प्रकार त्यातील कफामुळे होणारे दहा, पित्तामुळे होणारे सहा आणि वातामुळे होणारे चार वेगवेगळे प्रकार आहेत. त्यातील वाताच्या प्रकारातील एक प्रकार म्हणजे मधुमेह.
हा मधुमेह होऊ नये म्हणून काय करावे, काय सावधगिरी बाळगावी, हे सांगताना शास्त्रकारानी खूप छान संकल्पना मांडल्या आहेत. विषय फक्त मांसाशी संबंधीत असल्यामुळे त्याच संकल्पना इथे बघू.
वर वर्णन केल्यापेक्षा वेगळे मांसाहारी प्राणी, म्हणजे जंगली प्राणी. सुक्या कोरड्या जागी रहाणारे, सतत धावणारे, म्हणजे व्यायाम करणारे, गरजेनुसार पाणी पिणारे, अंगावर कमी चरबी असणारे प्राणी. या जंगली प्राण्यांचे मांस आणि आनूप प्रदेशातील प्राण्यांचे मांस यांच्या गुणातील सूक्ष्म फरक द्रष्ट्या शास्त्रकारांनी अभ्यासला होता, निरीक्षण केले होते, कदाचित भविष्यात काय होणार हे त्यांना आधीपासूनच माहीत होते, म्हणूनच एक सावधानतेचा इशाराच जणु त्यांनी देऊन ठेवला होता.
आयुर्वेदात मांसाहार निषिध्द सांगितलेला नाही. हे आपण आगदी पहिल्या लेखात पाहिले होते. मधे मधे पण त्याचा उल्लेख करीतच होतो,
भविष्यात रोग होऊ नयेत, यासाठी कोणते मांस खाऊ नये, हे अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. हे अश्या प्रकारचे मांस खाल्ले की कोणते रोग होणार यांच्या यादीत प्रमेहाचा, मधुमेहाचा क्रमांक वरचा आहे.
त्याकाळी सूत्र सांगून ठेवले, ते आजच्या काळानुसार अभ्यासले की कोणते मांस खावे आणि खाऊ नये हे स्पष्ट होत जाते.
ज्या प्राण्यांना सतत कोंडून ठेवले जाते, तयार अन्न त्यांना सतत दिले जाते, स्वतःचे अन्न स्वतःच शोधायचे असते, हा नियम न पाळणाऱ्या, म्हणजेच खुराड्यात कृत्रिमरीत्या वाढवल्या जाणाऱ्या पशुपक्ष्यांचे मांस आनूप प्रकारात येते. हे मांस सतत खाल्ले की प्रमेह होण्याची शक्यता काही पटीने वाढते, हे लक्षात येते. प्रत्यक्षातही तसेच दिसते.
या खुराड्यात वाढवलेल्या प्राण्यांचे पोषण मुद्दाम मांस खाण्यासाठी केलेले असते. म्हणून त्यांना दिवस रात्र सतत खायला दिले जाते. त्यांना लहान जागेत ठेवले जाते. जेणेकरून ती हालचाली कमी करतील, व्यायाम होणार नाही आणि नंतर त्यांचे वजनही वाढेल.
पशुपक्ष्यांचे वजन वाढवणे, हाच एकमेव बिझनेस असल्यामुळे खुराडे मालकांना तेच करावे लागते, जे त्यांना सांगितले गेले आहे.
मग ती ब्राॅयलर कोंबडी, बदके असोत वा, बकरे डुकरे असोत.
त्यांचे जास्तीतजास्त वजन कसे वाढेल हेच मालक पहाणार.
पण त्याचा परिणाम पुढे खाणाऱ्यांना भोगावाच लागणार. प्रमेह वाढणार.
तो वाढलेला आहेच, असं जागतिक आरोग्य संघटना अगतिकपणे सांगतेय.
पण इथे विचार करायला वेळ कोणाकडे आहे ?
पैसा फेकला की जसे टाॅनिक विकत मिळते, तसे आरोग्यही विकत मिळते, असे वाटणारी मंडळी काही कमी नाहीत.
सगळेच अगतिक...
वेळेला बांधलेले....
आयुष्याची गती कमी केलेले.....
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
5.10.2016
पाण्याची शुद्धाशुद्धता
पाणी जसे मिळते तसेच जर वापरले तर ते प्रमेहाचे कारण आहे, असे सांगितले आहे.
त्यासाठी शास्त्रकार ग्राम्य उदक असा शब्द वापरतात. पावसाचे आकाशातून पडणारे पाणी सोडून अन्य सर्व प्रकारच्या पाण्यात दोष असतात. दोष फक्त नलोदकात असतात, असे नाही.
अनेक आजार अशुद्ध पाणी पिऊन होत असतात, हे केवळ आधुनिक विज्ञान सांगते असे नाही तर, अतिप्राचीन आयुर्वेदात देखील, ज्या काळात दुर्बीणी, सूक्ष्मदर्शित्रे बहुधा नव्हती,( असं आपणाला आज वाटतं. ) त्या काळात आज न सांगितले गेलेले व्याधी पण सांगितले आहेत, हे नवल !
एवढेच नव्हे तर प्रदेशानुसार पाण्याचे गुण आणि दोषही सांगितलेले आहेत. जसे पश्चिमेकडे असणाऱ्या अरबी समुद्राच्या दिशेत वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी हितकर असते, पण पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहाणाऱ्या नद्यांचे पाणी दोषयुक्त असते. ज्या नद्यांचे पाणी खळाळत वाहाणारे, दगडांवर आपटत इकडेतिकडे तुषार उडवित येणारे असते, ते पाणी पचायला हलके असते.
याउलट ज्या प्रदेशातील नद्या संथ वाहातात, पाणी हलताना पण दिसत नाही, अश्या नद्यांचे पाणी पिऊ नये. विषयाची व्याप्ती अधिक होऊ नये यासाठी हे फक्त माहितीसाठी सांगतो.
पाणी शुद्ध आहे की अशुद्ध कसे ओळखावे या विषयी ग्रंथकार म्हणतात, जे पाणी साठवण्यासाठी दगडाचे कुंड किंवा डोणी असेल तर चांगले. किंवा दगडाच्या खोलगट भागात साठलेले पावसाचे पाणी उत्तम असते.
पण पहिल्या पावसाचे पाणी नकोच, असेही शास्त्रकार सांगायला विसरत नाहीत. त्यात वातावरणातील अशुद्धी जास्त प्रमाणात असतात. पहिले एक दोन पाऊस पडून गेल्यावर म्हणजे पाऊस चांगला सुरू झाल्यावर वातावरणातील दोष कमी होत जातात. पाण्यानेच ते धुवुन टाकले जातात.
सकाळी पाणी भरावे. दिवसभर वापरावे आणि सायंकाळी संपवून टाकावे. सूर्य असेपर्यंत पाण्यात दोष निर्माण होण्याचे प्रमाण कमी असते. नंतर मात्र त्यात जंतुसंसर्गामुळे दोष निर्माण होतात.
स्वच्छ वस्त्राने गाळून घेतलेले, सोन्याच्या वा मातीच्या किंवा काचेच्या पात्रात जमवलेले पाणी चांगले. तांब्याच्या किंवा पितळीच्या कल्हई केलेल्या भांड्यात पाणी ठेवलेले असेल तर त्यातील अनेक प्रकारचे सूक्ष्म जीव मरतात, असे आजचे एक संशोधन सांगते.
पण तांब्याच्या भांड्यात रात्री पाणी भरून ठेवणे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी वापरणे चुक आहे. ते पाणी कळकते. पाण्याची चव पण बदलते.त्या पाण्यावर सूर्य किरणे पोचत नाहीत अश्या पाण्याने व्याधी वाढतात.
आजचे वाॅटर प्युरीफायर किती भरवंशाचे आहेत, हे सांगता येत नाही.
आजच्या जाहिरीतीच्या जमान्यात सचीन सांगतोय ते बरोबर कि हेमामालीनी ? कोणावर किती विश्वास ठेवायचा, हा प्रश्नच आहे.
धातुंचा पाण्याबरोबर संयोग होतो. साहचर्याचा परिणाम म्हणून ज्या धातुच्या भांड्यात पाणी ठेवणार, भले पाणी उकळले नसेलही, त्या धातुचे गुण अवगुण पाण्यात उतरणार हे नक्की आहे.
बरं आमच्या घरात लोखंडी नळात रात्रभर साठून रहाणारे आणि प्लॅस्टिकच्या टाकित साठवलेले पाणी तर आम्ही टाळू शकतच नाही.
आता आली का पंचाईत !
वैद्य सुविनय दामले
कुडाळ, सिंधुदुर्ग
9673938021
27.12.2016
विरूद्ध आहार ही संकल्पना फक्त आयुर्वेदात सांगितलेली आहे असे मला वाटते. दोन विरूद्ध गुणाचे पदार्थ एकत्र करून खाऊ नयेत. म्हणजे दूध आणि फळे, दूध आणि मासे, दूध आणि मीठ इ.इ. आता हे बहुतेक सर्वांना माहिती आहे. पण गाडी योग्य मार्गावर वळत नाही. हाच बदललेला आहार.
जिथे जे उपलब्ध आहे, तिथे ते स्वस्त मिळते. ज्यांच्यावर मालकी हक्क आहे, ते विकत घ्यावे लागत नाही.
प्राण्यांना मारण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहून नेले जाते, त्याला खर्च जास्ती येतो. मांसपशुपक्षी तयार करण्यासाठी, प्राण्यांना मारण्यासाठी, मांस टिकवून ठेवण्यासाठी वेगळी रचना करावी लागते, जी खूप महाग होते, निसर्गाच्या विरोधात होते.
भाज्या धान्य उत्पादन करण्यासाठी जी शक्ती वापरावी लागते ती निसर्गाच्या विरोधात नसते, उलट हे निसर्ग पूरक काम असते. अन्नधान्य फळं मिळवण्यासाठी लावलेली झाडे वगैरे आपल्याला प्राणवायुच पुरवतात. कार्बन शोषून घेतात. वातावरणाचे रक्षण करीत असतात. निसर्गाला पूरक कार्य चाललेले असते.
मालकाच्या विरोधात जाऊन केलेले काम आणि मालकाचा फायदा होईल असे केलेले काम. यात मालकाला कोणते काम अधिक आवडेल ?
पोट भरण्यासाठी शाकाहार हा स्वस्त आणि मस्त होतो. आज हाॅटेलमधे मिळणाऱ्या कोणत्याही शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांच्या डिश पहा. जगात कुठेही जाऊन शोधा, मांसाहारी डिश महाग आहेत.
असे का ?
त्यांचे निर्माणमूल्य जास्ती आहे म्हणून !
ज्या वस्तू कोणाचे नुकसान न करता तयार होतात, त्या स्वस्त बनतात.
एक परिक्षण असे सांगते की, एक किलो मांस तयार करण्यासाठी किमान सत्तर किलो चारा वा खाद्य पशुंना खावे लागते. हे खाद्य ज्या जमिनीवर तयार केले जाते, त्याच जमिनीवर जर धान्य उत्पादन केले गेले तर दरदिवशी किमान सत्तर जणांचे एका वेळेस पुरेल एवढे भोजन तयार होऊ शकते.
मांसाहार करायचा असेल तर पूर्णपणे परावलंबी रहावे लागते. निसर्गदत्त मांस देणारे प्राणी कमी होत आले आणि खायला दुसरे अन्न निसर्ग देत नाही, अशा विपरीत स्थितीमधे माणसाला कृत्रिमपणे प्राण्यांची पैदास करावी लागली. निसर्गाच्या विरोधात जाऊन, निसर्गावरच त्यांच्या पोषणाचा अनावश्यक भार टाकून, कृत्रिमपणे तयार केलेल्या प्राण्यांचे मांस माणसाचे पोषण कसे बरे करील ? आज जे मांस उत्पादन कारखाने दिसत आहेत ती केवळ पैसा मिळवण्याचे साधन झाले आहे. पण यातून कधीही शांती मिळत नाही. म्हणून ही शांती अनुभवण्यासाठी भारतामधे येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढत आहे.
मांसाहार करणाऱ्या प्रदेशात शांती कुठुन मिळणार ? आडातच नाही तर पोहोऱ्यात तरी कुठुन येणार ?
त्यांची सुरू असते फक्त धडपड,
जगण्यासाठी.
सतत अस्वस्थपणे....
केवळ स्वतः जगण्यासाठी !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
9.10.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक दहा
विज्ञान शाप की वरदान-भाग एक
आरोग्य तपासणी करण्यासाठी वेगवेगळी उपकरणे शोधून काढली, कंप्युटर, डिव्हाईस, सोनोग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, इ. उपकरणे विज्ञानानेच दिली आहेत. युक्तीने त्याचा वापर करून घेता यायला हवा. आम्ही यंत्रावर एवढे अवलंबून रहायला लागलो कि, सामान्य बुद्धीचा किमान वापरदेखील करता येईनासा झाला. आणि यंत्र जे सांगेल ते अंतिम सत्य वाटायला लागले. "मला काय होतंय हे सुद्धा मला कळेनासे झालेय."
अंतिम निदान घेऊनच वैद्याकडे रूग्ण येताहेत.
"मला ब्लडप्रेशर आहे,
मला डायबेटीस आहे,
मला दोन वेळा अॅटॅक येऊन गेला आहे,
माझं रक्त सारखं कमीच असतं. कितीही पालक खाल्ला तरी रक्त वाढतंच नाही,
मला थायराॅईड आहे,
किती प्रकारची लेबल लावून रूग्ण येतात. बरं त्यांना विचारावं,
" तुम्हाला काय होतंय ?"
तर, त्यांना प्रश्नच कळत नाही, परत परत खोदून विचारावं लागतं,
"तुम्हाला त्रास काय होतोय?"
तेव्हा खूप आठवून रूग्ण सांगतो,
"मला तर त्रास काहीच होत नाही."
"मग औषध कशासाठी घेताय ?" असं परत विचारलं तर सांगतात, "डाॅक्टरनी रिपोर्ट केले आणि सांगितले म्हणून, रिपोर्ट मधे काहीतरी दोष होता म्हणून औषधे सुरू केली होती."
आम्ही या रिपोर्टच्या एवढे आधीन झालो आहोत की त्रास असला तरच औषधे घ्यायची असतात, हे पण आम्ही विसरून गेलो आहोत.
जितकं शक्य आहे, तितका मला माझा आजार यंत्राशिवाय कळला पाहिजे. मला काय होतंय, हे यंत्राशिवाय मला समजलं पाहिजे. एवढं तरी आरोग्य साक्षर व्हायलाच हवे ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
23.05.2017
जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकवीस
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
नित्यं हिताहारविहारसेवी
समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
दाता समः सत्यपरः क्षमावान
आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।
आईच्या सततच्या नको असलेल्या सूचनांचा अर्थ काय ? त्यामागे नेमके कोणते सूत्र दडलेले आहे, ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. ग्रंथकारांनी जे सूत्र वर दिलेले आहे , त्याच सूत्राचा हा व्यावहारिक विस्तार आहे. बदलत्या काळानुसार त्यात मला जे सुचतंय, ते लिहितोय.
उतु नको मातू नको
घेतला वसा टाकू नको.
चातुर्मासात कहाण्या वाचायची पद्धत आहे. या कहाण्यांची सुरवात, एक आटपाट नगर होते..... अशी असते, मधेच कुठेतरी एखादी देवी किंवा मैत्रिणीच्या तोंडी हे वाक्य असते, उतु नको मातु नको, घेतला वसा टाकू नको... आणि पाचागावची कहाणी पाचा उत्तरी सफल संपूर्ण असा शेवट असतो.
त्यात तुझ्यातील अहंकार सोडून दे. अहंकार हा फार मोठा शत्रू आहे. असा उपदेश केलेला असतो. जे व्रत तु स्विकारलेले आहेस, ते टाकू नकोस. तेच तुझे कर्तव्य आहे. ते पूर्ण करण्यासाठी तू प्रयत्न केला पाहिजे. अशी समज दिलेली असते. म्हणून आई सांगते उतु नको मातू नको. घेतला वसा टाकू नको.
उष्टे खाऊ नये.
एकमेकांच्या उष्टे खाल्ले की, जंतुसंसर्गामुळे होणारे व्याधी वाढतात, असे आधुनिक विज्ञान पण सांगते. पाश्चात्य संस्कारामुळे आणि टीव्ही वर दाखवल्या जाणाऱ्या प्रेमाच्या उदात्तीकरणामुळे, वेगवेगळ्या कुकरी शो मधे केक किंवा अन्य पदार्थ एकमेकांना हाताने भरवणे, किंवा त्याच उष्ट्या चमच्याने इतर सर्वांना भरवणे, या किळसवाण्या प्रकारामुळे, चलता है यार! उष्टे खाणे गैर नाही, असा चुकीचा संस्कार नकळतपणे होत जातो. आज असं चुकीचं का केलं जातं माहिती नाही, पण एकमेकांच्या उष्ट खाण्याची चुकीची प्रथा रूढ होत जातेय. यावेळी आईने किंवा बाबांनी आपल्या मुलामुलींना समजावून सांगितले पाहिजे, की उष्टे खाऊ नये. जंतुसंसर्गाचा पुढे धोका आहे.
घटाघट पाणी पिऊ नये.
पाणी सावकाश प्यावे. नाहीतर ठसका लागण्याचा संभव असतो. उगाचच बाटली लावली तोंडाला आणि संपवूनच तोंडातली काढली असं करू नये. पाणी वरून पिऊ नये. भांड्याला तोंड लावूनच प्यावे किंवा स्वतःच्याच ओंजळीने प्यावे.म्हणून पूर्वीच्या काळी पाणी पिण्याचे स्वतःचे भांडे स्वतःबरोबर नेणारी मंडळी होती.
उगाच आरश्यात पाहू नये.
नटण्या मुरडण्याला पण मर्यादा असतात. सतत आरशासमोर उभे राहाणे, सतत चेहेरा पाहाणे, यात वेळ किती जातो, हे लक्षातच येत नाही. हे ज्या काळात सांगितले गेले, त्यापेक्षा आताचा काळ फार बदलला आहे. इतरांना आपण सुंदर दिसावे, ही विशिष्ट वयातील धडपड चुकीची नाही, पण सतत आरशासमोर उभे राहाणे चुकीचे आहे, हे मुलीला सांगितले तर आईचे काय चुकले ?
आता तर सेल्फीचा जमाना आहे. सेल्फी काढताना तोंडाचे चंबू, गडू करून, ओठांची तोंडली नि आवळे करत, डोळ्यावरच्या भुवयांची धनुष्ये वाकवित, जेवढा विचित्र चेहेरा करता येईल तेवढा विदूषकी चेहेरा करण्याचा फंडा आला आहे. या काळानुसार बदलणाऱ्या फॅशन्स आहेत. हे आयुर्वेदात कुठुन येणार ? पण मूळ सूत्र सांगितलेले आहे, त्यात विस्तार करायला हवाच. जसा भाव चेहेऱ्यावर असतो, तसा तो मनी रूजतो. म्हणून चेहेऱ्यावर कधीही आठ्या नकोत. काही जणांना आठ्या पाडल्याशिवाय बोलताच येत नाही. आठ्या पाडून बोलू नकोस. असं आईने सांगितले आणि चेहरा नीट ठेऊन सेल्फी काढ, असे बाबा ओरडले तर काही चुकले का ?
परवाच एकाने प्रश्न विचारला, माझ्या चेहेऱ्यावर काळे डाग आहेत, मी काय करू ? विचारणाऱ्याने नाव सांगितलेले नाही, वय माहिती नाही, म्हणून सहज त्याचा डीपी पाहिला. तर डीपीवरच एवढा भेसूर चेहेरा ठेवलेला होता. आणि त्या चेहेऱ्यावर काळ्या रंगाचे पट्टे. मी सहज बापाच्या भूमिकेतून त्याला मेसेजलो, "अरे, आधी डीपी बदल. चेहेऱ्यावर काळे पट्टे ओढलेला हा भयानक डिपी कशाला ठेवलायस ?" त्यावर तो उत्तरला, "मी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर द्यायचे तर द्या. नसत्या चौकशा कशाला ? "
आता याला काय उत्तर देणार. ?
माझेच चुकले म्हणा. मी कर्तव्य भावनेने त्याच्या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर द्यायला हवं होतं. पण जळ्ळं बापाचं काळीज बाहेर पडलं. आणि हे असं उत्तर ऐकून घ्यावं लागलं.
बदलत्या काळानुसार पालकांनी पण बदलणं आवश्यक आहे. आपल्या स्वतःच्या मुलाशी संवाद करताना पण त्यांना रूचेल अशा भाषेत बोलायला हवे, हे पालकांनी समजून घ्यायला हवं.
केसांना हात लावू नये.
हे वाक्य म्हणजे सरळ सरळ आरोग्य जपणारा सल्ला आहे. केसांवर धुळ माती, बसत असते. त्यावर अनेक प्रकारचे जंतु चिकटलेले असतात. उगाचच केसातून हात फिरवायची सवय असणारी अनेक मुलगे मुली दिसतात. केसांवरून फिरवलेला हात न धुताच, बर्गर पिझ्झ्याला पण लागतोच. तोही शेयरींग मधे. म्हणजे अर्धा मी अर्धा तू. म्हणजे तिथेही स्वतःबरोबर दुसऱ्यालाही जंतुसंसर्गाचा धोका.
केसांची मुळे नाजूक असतील तर ती सतत हलत रहातात. आणि गळतात. इतरत्र उडतात.
आधी डोक्यावर तेल घालत नाहीत, त्यात स्टाईल म्हणून उडत्या भुरूभुरूत्या केसातून बोटे फिरवीत राहिले, तर लवकरच गाॅन केस व्हायला वेळ लागणार नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
१०.०८.२०१७
काय हा पडवळ्या सारखा दिसतो लांबच लांब असा ठोमणा शरीरयष्टिने कृश व उंच व्यक्तीला मारला जातो.हि भाजी जर रात्री कुणी काळोखात जमिनीवर पाहिली तर साप आहे असे समजून किंचाळल्याशिवाय रहाणार नाही.असे लांबच लांब असे हे पडवळ.
ह्याची चटणी,कोरड,भाजी,भजी असे विविध प्रकार आपण करून खातो.आणि हे सगळेच पदार्थ अगदी चविष्ट लागतात बरं का.
ह्या पडवळाचे वेल असमतोल आपण ज्याची भाजी करून खातो ते पडवळ हे त्या वेलिचे फळ असते.औषधासाठी वापरतात ते पडवळ कडू असते पण स्वयंपाकात आपण गोड पडवळ वापरतो.त्यामुळे आपण गोड पडवळाचे औषधी उपयोग पाहूयात.
पडवळ हे चवीला गोड व थंड असते व हे शरिरातील तिन्ही दोष कमी करते.आता ह्याचे औषधी उपयोग पहायचे ना:
१)भूक न लागल्यास पडवळ उकडून वाटावे व सुप बनवा त्यात १/५ चमचा हिंग+१ चमचा जिरेपूड +१/२ चमचा ओवा घालून ३-४ दिवस प्या.
२)व्यवसाया निमित्त कायम ज्यांचा संपर्क उष्णतेशी येतो त्यांच्या आहारात कायम पडवळाची भाजी असायला हवी.
३)जाडी कमी करायची आहे पण उपाशी राहणे जमत नाही का?पडवळ २०० ग्राम+कुळीथ २० ग्राम एकत्र शिजवून सूप करून त्यात जिरे,दालचिनी,ओवा ह्यांची पूड मिसळून प्यावे.
४)कावीळ झालेल्या व्यक्तींच्या आहारात पडवळाची भाजी नियमीत ठेवावी.
५)अंगात उष्णता,हातापायांची आग होणे,चक्कर येते,संडासला साफ न होणे अशा तक्रारी मध्ये १०० ग्राम पडवळ+१० ग्राम काळ्या मनुका+२० ग्राम आवळकाठी यांचा काढा करून द्यावा.
कोवळा पडवळ खाण्याचा अतिरेक केल्यास जुलाब होऊ शकतात.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
हा प्रश्न एकदा मला पडला. त्याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा विचारांची गाडी सूर्यास्तापाशी येऊन थांबली.
वो हुआ कुछ इस प्रकार...
एकदा समुद्रकिनारी फिरताना, पंधरा वीस कावळे काहीतरी "फिस्ट" चा आनंद मजेत घेत होते. जवळ जाऊन बघितले तर तो एक मेलेला कुत्रा होता. खूप घाणेरडा वास येत होता. बहुतेक तीन चार दिवसापूर्वी मेलेला असावा. किडे पण पडले होते. पण कावळ्यांसाठी ती दावतच होती. निरीक्षणाअंती असे दिसले, सर्वजण मजेत तो मेलेला, कुजलेला कुत्रा खात होते. म्हणजे अस्वच्छ, शिळे, नासलेले, कुजलेले खाऊ नये, हे पथ्य ते पाळत नव्हते. तरीही ते निरोगी दिसत होते. कारण त्यांचा नेहेमीचा आहार पण असलाच असतो. पण सगळे अगदी एकाच आकाराचे दिसत होते. एकही बारीक नाही, एकही जाड नाही.
असे का ? असे स्वतःलाच विचारले, तेव्हा असे लक्षात आले की, कावळे सूर्योदयापुर्वी उठतात, खायला सुरवात करतात, कोणत्याही प्रकारचे पथ्य न पाळता खातात. कोणताही विचार न करता खातात, खाऊन झाल्यावर सुद्धा विचार करत नाहीत, की मी हे का खाल्ले ? हे असे खाऊन सुद्धा सगळे पचवतात. आणि त्यांच्या अंगावर चरबीचा अंशही शिल्लक रहात नाही !
कसा राहील आणि कशाला त्या कावळ्यांचा आकार बदलेल? जर खाल्लेलं सर्व अन्न पचवायला पुरेसा वेळ दिला तर !
कावळ्यांची सूर्योदयाला काव काव सुरू होते ती अगदी सूर्यास्त होईपर्यंत ! मग कावळ्यांच्या पोटात कितीही कावळे ओरडले तरीही...
त्यानंतर खाव खाव अजिबात नाही. अपवादाला पण नाही.
हे सगळे कावळे असे का वागतात, असा प्रश्न स्वतःला विचारल्यावर लक्षात आले, की कावळ्यांच्या शाळेत फक्त त्याचीच सत्ता चालते. त्याचाच नियम सर्वत्र पाळला जातो. त्याच्या शब्दाबाहेर कोणीही जात नाही.
सगळे कावळे फक्त त्याचेच ऐकतात. फक्त कावळेच नाही तर चिमण्या, पोपट, कबूतर आणि सर्व पशुपक्षी हाच एकमेव वैश्विक नियम पाळतात, सुर्योदय ते सुर्यास्त खायचे आणि सुर्यास्त ते सुर्योदय खाल्लेलं पचवायचे !
त्यानेच सांगितले आहे ना, "अहं वैश्वानरो भूत्वां..... " मीच तो जाठराग्नि आहे. तुम्ही चारही प्रकारचे अन्न खाल्लेत तरी ते पचवायचे काम माझे आहे.अन्न खाण्याची जबाबदारी तुमची आणि पचविण्याची चिंता तुम्ही करू नका, ती जबाबदारी पूर्णतः माझी. फक्त प्रत्येक वेळी एकच नियम पाळा, जो वैश्विक नियम मी आखून दिला आहे. तो म्हणजे सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत मनसोक्त खावे. आणि नंतर सुर्यास्त ते सुर्योदय या वेळी खाल्लेलं पचवायला वेळ द्यावा.
या सुर्यास्ताच्या वेळेला येऊन थांबल्यानंतर मला माझ्या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले........
सगळे कावळे एकाच आकाराचे कसे ?
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
28.02.2017
द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच.पण त्या पासून मनुका,बेदाणे,वाईन असे विविध प्रकार बनविले जातात.तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हे देखील बऱ्याच जणांच्या आवडीचे.
हि द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात.त्यातल्यत्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणाना.
हिंदुस्थान भर हि द्राक्षे पिकवीली जातात ह्याच्या पांढरी,हिरवी आणी काळी असे तीन प्रकार असतात.द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून ३ वर्षात त्यास फळे येतात.
द्राक्षाचे फळ कच्चे असताना जड,तुरट आंबट असते तर पिकलेले फळ हे चवीला गोड,थंड व शरीरातील वात,पित्त दोष कमी करते.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१)अशक्तपणा मध्ये द्राक्षे,खडीसाखर,मध व पिंपळी हे मिश्रण खावे तरतरी येते.
२)वारंवार तहान लागत असल्यास काळी द्राक्षे व ज्येष्ठमध काढा हे मिश्रण प्यावे.
३)घसा कोरडा पडणे,तोंड सुकणे,जीभ कोरडी होणे,तोंडास चव नसणे ह्यात द्राक्षा व आवळकाठी हे मिश्रण वाटून तुपात मिसळावे व त्याची गोळी करून तोंडात चघळावी.
४)पित्ताचा त्रास होत असल्यास काळी द्राक्षे रस १/२ ग्लास+१ चमचा जीरे पूड+ १/४ चमचा सैंधव हे मिश्रण १-३ वेळा घ्यावे.
५)१/२ ग्लास द्राक्षाचा रस+१ चमचा बडीशेप हे मिश्रण पित्त वाढून आलेल्या तापात द्यावे त्याने लघ्वीचे प्रमाण वाढून शरीरातील विशाल बाहेर फेकले जातात.
द्राक्षे अतिप्रमाणात खाल्ल्यास कफाचा त्रास व सर्दी होऊ शकते.
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Copyright © 2025 | Marathisrushti