(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • किचन क्लिनीक – कंदभाज्या – बीट

    हा प्रकार भारतीय नाही पाश्चात्यांनी ह्यास भारतात आणले व आपण ह्याला सवयी प्रमाणे आपलेसे केले.
    तसा ह्याचा वापर प्रत्यक्ष आमटी,भाजी करायला केला जात नसला तरी देखील सलाड,कोशिंबीर,बीटामृत,बीटताक,घरगुती तिरंगी मीठाई,बाटरूट हलवा तसेच सूप बनवताना ह्याचा वापर सरार्स केला जातो.

    ह्याचे क्षूप असते व बीट हा कंद जमीनी खाली उगवतो.हा बाहेरून मातकट रंगांचा असतो व आत मध्ये लाल भडक असतो.ह्याच्या लाल रंगांचा उपयोग स्वयंपाकात सजावट करायला देखील केला जातो.हा चवीला गोड व थंड असून शरीरातील वात व पित्त दोष कमी करतो व कफ दोष वाढवितो.

    चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूयात:

    १)अपचन,पोट साफ न होणे,मुळव्याध ह्यात बीट उकडून त्यात कोथिंबीर घालून जेवणापुर्वी खावे व १० मिनीटांनी जेवावे.

    २)बीटाचे नियमीत सेवन केल्यास मासिकपाळी व्यवस्थित व नियमीत येते.

    ३)छातीत जळजळ होऊन उल्टी होऊन त्यातून आंबट कडू पित्त पडणे ह्यात बीटाचा रस १ कप+खडीसाखर १ चमचा हे मिश्रण जेवणासोबत प्यावे.बीट उकडून ४-५ काप खावे.३ दिवस दिवसातून २ वेळा हा प्रयोग करावा.

    ४)रक्तदाब वाढून तोल जाणे,डोके जड होणे,चिडचिड ६ चमचे बीटाचा रस +६ चमचे दुधाचा रस +१चमचा मध उपाशीपोटी व रात्री झोपताना घ्यावा.आठवड्यात फरक पडतो.

    ५)अशक्तपणा व रक्ताची कमी ह्यात बीट नियमीत खावा.

    अतिप्रमाणात बीट खाण्याने जुलाब होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहारातील बदल भाग ३

    कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.

    समर्थ म्हणतात,
    पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
    उगाच ठेवी जो दूषण
    तो दुरात्मा दुराभिमान
    मत्सरे करी ।।

    आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.

    जसे काम तसे तसा आहार.
    कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
    लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
    " तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",

    तर तो म्हणेल,
    "काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.

    आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
    केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.

    म्हणजे
    काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
    रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
    ऊन्हात काम आहे की एसी मधे.
    ऊद्याची चिंता आहे की नाही.
    शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
    परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
    गरज म्हणून की हौस म्हणून.
    जीभेसाठी की पोटासाठी.
    जीवासाठी की जातीसाठी.
    हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
    मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
    या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
    विचार वेगळा करावा लागेल. लागतो.

    इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.

    मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
    माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    24.09.2016

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग अकरा

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे त्रेपन्न
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग अकरा

    घराबाहेर गेल्यावर स्नान, भोजन, जलपान आधी वाहनाला द्यावे. म्हणजे पूर्वीच्या काळी प्रवास रथातून असे, त्यांची व्यवस्था आधी पहावी. केवळ सारथीच नव्हे तर घोडे आदि प्राण्यांचे पोटापाण्याचे आधी पहावे. कारण परतीच्या प्रवासामधे हे वाहन, वा चालक पुनः ताजेतवाने व्हायला हवेत, नाहीतर त्याचा त्रास आपल्यालाच भोगावा लागतो.

    अनोळखी ठिकाणी गेल्यावर माहिती नसलेल्या जलाशयात पोहायला अथवा आंघोळीला पण जाऊ नये. मगरीसारखे प्राणी आधी चाहुल लागू न देता हल्ला करतात. बाहुबली करतो, म्हणून बाहुंचे बळ दाखवून, नदीत पोहू नये. उंचसखल वाकड्यातिकड्या पर्वतावर चढू नये, या कड्यावरून त्या कड्यावर माकडासारख्या उड्या मारू नयेत. घसरून पडण्यामुळे, जीवाला धोका संभवू शकतो. पिक्चरमधे दाखवतात, ते सर्व खोटे असते, ब्लु व्हेलसारखे मोबाईल गेम तर प्रत्यक्षात मानसिकताच बदलवून टाकतात, याची जाणीव मुलांना वारंवार करून द्यावी.

    पेटलेल्या अग्निसमोरुन जाऊ नये, अग्निकडे पाठ करून कधी बसू नये, अग्निच्या आणि अग्निच्या जवळ बसलेल्या माणसाच्या मधूनही कधी जाऊ नये. अग्निशी विनाकारण खेळ खेळू नये. आज मंकी जंपिंग, रिव्हर राफ्टींग, व्हॅली क्राॅसिंग सारखे साहसी प्रकार केले जातात, तेव्हा सावधगिरी बाळगली पाहिजे.

    हे साहस करणे देखील एकवेळ परवडेल, पण प्रत्यक्षात कोणतेही साहस न करता, साहस केल्याचा आभास निर्माण करीत स्वतःचा स्वतः फोटो काढणे हे जास्ती खतरनाक असते. आजच्या मराठी भाषेत याला "सेल्फी" म्हणतात. नाकाला हात बोट न लावता, नाकावरची माशी कशी उडवायची याचे प्रात्यक्षिक किंवा नसलेल्या भुवया ताण ताण ताणून त्याची धनुकली करायची, आणि ओठ जेवढे होतील तेवढे डुकराच्या तोंडासारखे करायचे, आणि हे सगळं करताना, एका हाताने अधांतरी राहात, दुसऱ्या हाताच्या तीन बोटानी मोबाईल सांभाळत, करंगळी मागे उचलून एका बोटाने फोटो काढायचा. महाडेंजरस. ग्रंथकार ग्रंथ लिहित होते, त्यावेळी जर हा सेल्फी प्रकार पाहिला असता तर त्याच्यावर तीन चार श्लोक तरी रचले असते.

    हे सर्व आपला जीव सुरक्षित रहावा यासाठी सांगितलेले आहे.

    याचा अर्थ असा नव्हे की, साहस करूच नये, गिर्यारोहण करूच नये, नदीमधे पोहूच नये. हे सर्व करताना आधी आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा. आपल्या सोबत ( नंतर ओरड मारायला तरी ) कुणीतरी असावे. एवढेच. बाकी व्हा बाहुबली !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ११.०९.२०१७

  • आहारातील बदल भाग ४६-चवदार आहार -भाग ७

    आयोडीनयुक्त मीठाची खरंच गरज आहे का ?
    आयोडीन हा एक उडनशील पदार्थ आहे.

    आठ ते दहा रूपये किलो दराने मिळणाऱ्या आयोडीनयुक्त मीठाच्या पिशवीत आयोडीन असते, (असे मानू.) पण पिशवी उघडल्यानंतर त्यातील आयोडिन, फक्त काही मिनीटेच शिल्लक असते, बाकीचे चक्क उडून जाते.
    शिल्लक काय रहाते ?
    जे काही शिल्लक राहाते ते सुद्धा शिजवताना भुर्रर्र उडून जाते.
    मागे साधे मीठच उरते !
    जे खरंतर औषधी आहे.
    आणि आम्हाला ऐशी पैसे किलोने मिळते. !!
    मग आयोडीनयुक्त मीठ खाऊन फायदा कुणाचा ?

    आणि आजचा सर्व्हे असा सांगतो, की भारतात अति उंचावर असणाऱ्या काही डोंगराळ प्रदेशामध्येच आयोडीनची कमतरता भासते. अन्य ठिकाणी आयोडीनची गरजच नाही. अन्य ठिकाणी समुद्रमीठातून, रंगीत फळामधून, रंगीत भाज्यांमधून, कडधान्याच्या वरील सालीतून, मासे,इ. समुद्री प्राण्यांमधून, सर्व प्रकारच्या लाल औषधामधून, कोकम, चिंच, शेंगदाणे, या आहारीय पदार्थातून, आपल्याला रोजच्यारोज आयोडीन मिळतेच. वेगळे आयोडीन घेण्याची तशी गरजच नाही.
    हं, गरज आहे, मल्टीनॅशनल कंपन्यांची !
    या ना त्या मार्गाने पैसे काढण्याचे हे उद्योग आहेत.
    मध्यंतरी काही जागरूक नागरीकांनी या विरोधात आवाज उठवला होता,
    पण पुनः ये रे माझ्या मागल्या....
    मोरारजी आणि जाॅर्ज फर्नांडिस यांच्या काळात...विदेशी, घातक, रसायनयुक्त कोल्ड्रींक्सवर बंदी आणली गेली.
    नंतर ???
    पुनः हातमिळवणी झाली. जाहीराती झाल्या, स्टार मंडळीनी त्यात सहभाग घेतला, राजकीय समीकरणे बदलली, त्यांचे अधिकृत आर्थिक प्रशिक्षण झाले, पहिल्यापेक्षा दुप्पट जोराने विक्री वाढू लागली. तसेच, आयोडीनयुक्त मीठाचे झाले. नंतर काय ? ठेंगा

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    08.11.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग अठ्ठावन्न

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 14-पुष्प दुसरे

    देवाला वहाण्यासाठी आपल्या परसबागेत अनेक फुलझाडे लावली जातात. सर्वसाधारणपणे जास्वंद, गुलाब, मोगरा, जाई जुई सायली याची लागवड आपल्या परसदारी केली जाते.

    काही जणांना आवड नसते, काहींना सवड नसते, वेळच नसतो म्हणून काहीना सगळा बगिचा फुलवता येत नाही. पण ज्यांच्या घरी एकही फुलझाड लावलेले नाही, वा कुंडीपण नाही, असे अगदी क्वचित ! तर काही निसर्गप्रेमींच्या घरी अख्ख जंगलच घरात आणलेलं असतं.

    फुलांची आवड नाही, असं माणूस शोधणं दुर्मिळच. जागाच नाही, भाड्याच्या घरात रहातो, अशा घरात दरवाज्यावर का होईना पण फुलपुडी उगवतेच.

    ज्यांचा देवावर विश्वास नाही, देवपूजा करतच नाहीत, त्यांच्याकडे सुद्धा फुले असतातच. म्हणजे फुले फक्त देवासाठीच असतात असे नाही. आपण युक्तीने त्यांचा वापर देहासाठी करून घ्यायचा असतो.
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी, हे वाक्य काहींसाठी उलट सुद्धा करता येतं. "जे जे देहासाठी ते ते देवासाठी." मलाच कधीतरी ही फुले उपयोगी होतील म्हणून तरी ही फुले माझ्या घरी हवीत.

    निसर्गातील कोणतेही फुल असो, ते औषधी गुणधर्माचे असतेच. पण डाॅक्टरना ते माहितीच नसतात, (त्यांच्या सिलॅबसमधेच नाही.) पण ज्याच्या अभ्यासक्रमात आहे, अशा वैद्यांना पण त्याचे सर्व औषधी उपयोग माहिती असतातच, असे नाहीत. थोडेफार जे माहिती असतात, त्या आधारे काही औषधे बनवली जातात. जसे भाज्या, दुध, फळे, कडधान्ये इ. साठी अख्खे अध्याय ग्रंथामधे लिहिलेले आहेत, तसे वेगळे स्वतंत्र प्रकरण फुलांसाठी लिहिलेले नाही.

    आयुर्वेदात अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील अश्याच काही फुलांचे औषधी गुणधर्म वर्णन केले आहेत. जसे गुलाब, धातकी, केशर, नागकेशर, चाफा इ. म्हणजे बाकीची फुले औषध नाहीत, असे नाहीत, पण त्यांचे औषधी गुणधर्म अनुमानाने शोधावे लागतात. अनुभवातून जाणावे लागतात, किंवा फळांच्या गुणधर्मातून समजून घ्यावे लागतात. अशी अनेक फुले आपल्या अवतीभवती फुलत असतात, त्यांची नावे सुद्धा आम्हाला माहिती नाहीत, किंवा काही गुलमोहराची फुले एवढी अमाप फुलतात, कि त्यांचा कचराच होतो. काही फुले सिझनल असतात. काही फुले घोसांनी लगडतात, तर काही एकेकटीच बहरतात.तर काहींचा सडा पडतो. जणुकाही निसर्गाने जमिनीवर पांघरलेला गालिचाच.

    काहींचा वास औषधी असतो,जसे जाईजुई. तर काहींचा मध जास्ती औषधी असतो जसे जांभूळ. काहींच्या पाकळ्या औषधी असतात,जसे गुलाब. तर काहींचे पुंकेसर औषधी असतात, जसे नागकेशर. तर काहींचे देठ औषधी असतात जसे पारीजातक. काहींच्या कळ्याच औषधी असतात,जसे लवंग. तर काहींचे पूर्ण उमललेले फुलच औषधी असते, जसे कमळ. म्हणजे फुलांचे वेगवेगळे अवयव कमी अधिक प्रमाणात औषधी गुणधर्म दाखवतातच.

    काही फुले ऋतुनुसार फुलतात. काहीं केव्हाही उपलब्ध होतात. काही प्रदेशानुसार मिळतात, तर काही जमिनीवर तर काही पाण्यातच मिळतात. यानुसार त्यांचे औषधी गुणधर्म बदलतात.

    पुण्यातील बीएस्सी झालेला, एक अवली रसायनतज्ञ या फुलांच्या प्रेमात पडला आणि या अज्ञात फुलांच्या बारसे करण्यापासून, औषधी गुणधर्म शोधून काढून त्यांच्या सेफ ह्युमन ट्रायल्स घेण्यापर्यंत, सगळा खटाटोप लिपीबद्ध केला. तब्बल 180 हून अधिक फुलांच्या औषधी गुणांचा चिकित्सेच्या दृष्टीने अभ्यास करणाऱ्या या बेहत्तर अवलीयाला "अरविंद जोशी,बीएस्सी, पुणे " या नावाने आपण वाॅटसपप्रेमी ओळखतो. वय वर्षे फक्त बाहात्तर.

    त्यांच्या फुलावरील प्रेमाला, फुलांनीही साथ दिली आणि फुले त्यांच्यावर प्रसन्न झाली. फुलातील मकरंद शोधण्याचा छंद सगळ्यांना लागो आणि सर्वजण अरविंद होवोत !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    07.06.2017

  • किचन क्लिनीक – अननस

    अननस हे फळ आपल्या सर्वांच्याच आवडीचे.हे एवढे रूचकर लागते कि खायचा मोह आवरत नाही. ह्या पासून आपण सरबत,मुरंबा,जॅम,पाक,रायते,ज्युस आणी गोव्यात प्रत्येक मेजवानीत हल्ली हमखास अननसाचे सासव केलेच जाते.आणी हे सगळेच पदार्थ भयकंर चविष्ट लागतात ह्यात वादच नाही.

    ह्या अननसाचे रोप जमीनी लगत वाढते व ह्याच्या भक्कम बुंध्यास काटेरी पाने फुटतात आणी त्याच्या मधोमध हे फळ उगवते.लहान व कच्चे असताना हे फळ लालसर असते तर पिकल्यावर ते पिवळे होते.फळाच्या डोक्यावर मुकुट शोभावा अशी पाने असतात.

    हे पिकलेले असताना गोड व कच्चे असताना आंबट असते.हे थंड असल्याने वात व पित्त शामक आहे.

    आता आपण ह्याचे घरगुती उपचार पाहूयात:

    १)ज्या स्त्रियांना मासिक पाळी नियमीत येत नाही त्यांनी कच्च्या अननसाचा रस मासिक पाळी येण्याच्या तारखे पुर्वी १/२-१ कप रोज प्यावा.

    २)१ ग्लास अननसाचा रस+१चमचा साखर हे मिश्रण जेवणापुर्वी घ्यावे लघ्वीची जळजळ,लघ्वी कमी होणे,लघ्वीला उग्रवास येणे कमी होते.

    ३)अजीर्ण,उल्ट्या,जुलाब ह्यात उपवास करावा व अननसाचा रस+काळी मिरी+साखर हे मिश्रण थोडे थोडे प्यावे.

    ४)गजकर्ण,खरूज,ह्यात येणारी खाज कमी करायला अननसाचा रस लावावा.

    ५)पोटफुगणे,भुकमंदावणे,नियमीत संडासला न होणे ह्यात जेवणासह अननसांची फोड चावून खावी.

    अननस खायचा अतिरेक केल्यास अम्लपित्त व जुलाब होतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेसदतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? -भाग एकतीस

    बाबा सांगतात...

    देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दांनी बोलू नये.

    गाय या शब्दाने सर्व गोवंश घ्यावा. पूजा म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा नाही. तर त्यांना योग्य तो मान द्यावा. गोवंश हा मानवाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत असतो. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य देखील सांभाळत असतो. म्हणून गोवंश संवर्धन झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जो गोवंश राखला जात होता, तो हळूहळू कमी होत जातोय. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून गोवंश संवर्धनाबरोबरच गोवंश रक्षणदेखील करायला हवे. अस्सल भारतीय गो वंश आज भारतातच उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त भारतीय गोवंश हा औषधीगुणांनी युक्त आहे. अन्य हायब्रीड पशू हे फक्त गायींसारखे दिसतात, पण औषधी गुणांनी शून्य. उलट अपाय करणारे अनेक रोग वाढवणारे एक विषारी प्रथिन त्यांच्या दुधामधे दिसते. म्हणून हायब्रीड दूध जसे, जर्सी, हाॅस्टन, एच एफ इ. अजिबात वापरू नये.

    आयुर्वेदात गाईचे दूध आणि दही औषधी म्हणून सांगितले आहे. ते औषध म्हणूनच वापरावे. पण दह्या दुधाचा आहारात समावेश झाला की ते मधुमेहासारख्या आजारांना वाढवते, हे पण लक्षात ठेवावे. अगदी देशी गाईंचे दूध आवर्जुन पिणाऱ्या आणि पोरांना बळेबळे पाजवणाऱ्या माता पिता पालकांनी हे लक्षात घ्यावे, की दूध हे कष्टाचे काम करणाऱ्या श्रमजीवी वर्गासाठी आहे. खुर्चीत बसून, मान खाली घालून, केवळ बटनांशी चाळा करीत, काम करणाऱ्या काटकोनी बुद्धीजीवींना नाही. आहारात जे अत्यंत आवश्यक आहे,असे ताक, लोणी आणि तूप मात्र आम्ही कटाक्षाने टाळू लागलो आहोत. हा बुद्धीभेद कोण करतंय, या विषयी सविस्तरपणे मागे लिहिले होतेच.

    वृद्धांना योग्य तो सन्मान द्यावा. इथेदेखील सर्व जाती धर्माचे वृद्ध असेच अपेक्षित आहे आणि योग्य तो सन्मान करावा हे अनादि कालापासून सांगितले जात आहे, याचे स्मरण करून देतो. पाश्चात्य संस्काराचा परिणाम म्हणून जी मानसिकता बदलत गेली, त्याचा परिणाम म्हणून, वृद्धांचा समावेश असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली आणि प्रत्येकाचे छोटेखानी कुटुंब जन्माला आले. ते सुद्धा हम दो हमारा एक. आता तेही नाही. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रम ! भारतीय संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे असलेले हे वृद्धाश्रम भारतात झपाट्याने वाढताहेत हे चांगले लक्षण नाही. आता दत्तक वृद्ध घ्यायची नवीन परंपरा सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

    कृपया या वाक्यातून यातून सोयीस्कर अर्थ काढू नये. जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होतील आणि पुनः एकत्र कुटुंब व्यवस्था सुरू करण्याची भारतीय मानसिकता निर्माण होईल तो सुदिन !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • आजचा आरोग्य विचार – भाग तीन

    भारतीय संस्कृती’ असा शब्द उच्चारला की, काही जणांच्या नाकाला अगदी मिरच्या झोंबतात. भारतीय पद्धतीने समजावून सांगायचं म्हणजे कालबाह्य गोष्टी ऐकायच्या, जग चाललं चंद्रावर आणि हे बेणं सांगतंय धोतर नेसाया हवं. असे काहीसे नाराजीचे सूर दिसतात.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३५

    निषेधार्ह पाणी भाग तीन

    नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
    पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
    ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।

    वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.

    आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.

    आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
    जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.

    आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः

    या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.

    जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !

    मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.

    पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
    अ ति
    पा णी
    पि ऊ
    न ये

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

  • बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

    बोन डेन्सिटोमेट्री (हाडांची घनता)

    वयाच्या ३५ नंतर हाडांमधील कॅल्शिअमचे प्रमाण पुरुष-स्त्रियांमध्ये हळूहळू कमी होते; परंतु काही स्त्रियांमध्ये एकदम जोरात घसरु लागते व अशा स्त्रियांना कंरदुखी, पाठदुखी व थोड्याशा दुखापतीमध्ये फ्रॅक्चर होणे असे आजार भेडसावू लागतात. म्हणून साधारण ४० नंतर प्रत्येक व कंबरदुखी असलेल्या सर्व पुरुषांनी बी.डी.एम. हा पास करुन, आपल्या हाडांची घनता कशी आहे, हे अधूनमधून बघितले पाहिजे.