(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • मुस्ता/मुस्तक/नागरमोथा

    ह्याचे ०.३३-१ मी उंचीचे तृण जातीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे काण्ड पातळ,गडद व हिरव्या रंगाचे असते हे भौमिक काण्डापासून उगवते व वरच्या भागात त्रिकोणी असते.पाने लांब व मुळा सारखी असतात.फुले ५-२० सेंमी लांब असतात.काण्डाचा भौमिकभाग सुत्रवत भौमिक काण्डात रूपांतरीत होऊन त्याला १ सेंमी व्यासाचे बाहेरून काळे व आत धुरकट किंवा पांढऱ्या रंगाचे सुगंधी कंद येतात.

    ह्याचे उपयुक्तांग कंद असून मुस्ता चवीला कडू,तुरट व थंड गुणाचा असून हल्का व रूक्ष आहे.हा कफपित्तनाशक व वातवर्धक आहे.

    चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊ:

    १)मुस्ता त्वचा रोगात लेपासाठी उपयुक्त आहे.

    २)मुस्ता आमपाचक असल्याने पोटाच्या विकारात उपयुक्त आहे.

    ३)ताप आल्यामुळे लागणाऱ्या तहाने मध्ये मुस्ता सिद्ध जल देतात.

    ४)मुस्ता हा स्तन्यवर्धक व स्तन्यशोधक आहे म्हणून ह्याचा लेप बाळंतीणीच्या स्तनांवर करतात.

    ५)मस्तिष्क दौर्बल्यामध्ये मुस्ता गोदुग्धासह देतात.
    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    (कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • नमस्कार – भाग २ 

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे - भाग ९६
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक ११
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग ५२

    बायकांनी नमस्कार करायची पद्धत वेगळी. पुरूषांची वेगळी. पुरूषांचा नमस्कार साष्टांग. जमिनीवर पडून आठ अंगांचा स्पर्श जमिनीला करून पुनः उठायचे. नमस्कार जरी देवाला घालत असलो तरी फायदा आपल्यालाच होतो ना ! शरीराला आणि मनाला देखील.

    नमस्कार म्हणजे लीनता. शरणागत भाव. माझ्यापेक्षा ज्ञानाने, तपाने, बुद्धीने, वयाने, सामर्थ्याने, अभ्यासाने, जे अधिक आहेत, त्यांच्या समोर नतमस्तक होताना मनातील दोष निघून जातात.

    ज्याच्याकडे चाकरी करतोय, त्यांना मालक म्हणून केलेला नमस्कार वेगळा. त्यातील भाव वेगळा. मालकाने दिलेल्या पैशामुळे माझा चरितार्थ चालणार आहे, म्हणून याला नमस्कार करायला हवा. मालकाला खुश ठेवण्यासाठी, मालकाचा अहं सुखावण्यासाठी केलेला हा नमस्कार मनापासून केलेला नसतो.

    राजकारणातल्या नमस्काराची रीतच वेगळी. न बोललेलंच बरं. हे नमस्कार म्हणजे नुसती चमचेगिरी ! पक्ष बदलला की व्यक्तीनिष्ठा बदलली. की नमस्कार बदलला.

    नमस्कार करण्याचा आणखी एक प्रकार म्हणजे सॅल्युट. एनएसएसेस चे कॅडेटस, एनसीसी छात्र, स्काऊट गाईडचे कब, बुलबुल्स, मिलीट्रीमधले सैनिक, पोलीस जो नमस्कार करतात, ते सॅल्युट प्रकारामधे येतात. पण नेपाळी गुरखा जो नमस्कार करतो, त्यातला सॅल्युट भाव वेगळा आणि तिरंग्याला जेव्हा कडक सॅल्युट ठोकतो, तो भाव वेगळा. माझा नमस्कार कोणासाठी आहे तेवढा त्यातील भाव वेगळा. काहीवेळा तोंडदेखलेपणा किंवा ड्यूटी म्हणून तर काही वेळा मजबूरी म्हणून ! साहेबाची गाडी येत असते, तेव्हा त्या गाडीला देखील सॅल्युट ठोकावा लागतो.

    राजाला करत असलेला मुजरा हा देखील नमस्काराचाच एक प्रकार. कमरेत नव्वद अंशात वाकत, हात जमिनीपासून आपल्या कपाळापर्यतदोन तीन वेळा वरखाली करणे हा राजाला दिलेला सन्मानाचा नमस्कार आहे.

    गुरूला करत असलेला नमस्कार फारच वेगळा. गुरूच्या उजव्या पायाला आपल्या उजव्या हाताने आणि डाव्या पायाला आपल्या डाव्या हाताने, आपले हात एकमेकांवर स्वस्तिकासारखे करून केलेला नमस्कार जगात दुसरीकडे कुठेच आढळणार नाही. या नमस्कारातील भाव वेगळा.

    एका हाताने कधीही नमस्कार करू नये, असे हिंदु धर्म सांगत असूनही कपाळाला, छातीला आणि दोन्ही खांद्यांना स्पर्श करून नमस्कार करण्याची पद्धत हिंदुमधे आली. हे केवळ हिंदु धर्माचा अभ्यास नसल्यामुळेच. हिंदु पद्धतीने नमस्कार करण्यामधे देखील शास्त्र आहे. पण आमच्या शालेय अभ्यासक्रमातूनच हे डिलीट केल्यामुळे केवळ हिंदु घरात जन्माला आलोय म्हणून हिंदु. पण इतर धर्मातील लहान लहान मुलांना त्यांनी नमस्कार कसा करावा, का करावा, हे त्या त्या धर्मानुसार, प्रत्येक घरात शिकवले जाते.

    आणि बायकांचा नमस्कार कमरेमध्ये वाकून ! नुसतं वाकायचं नाही तर वाकून डाव्या पायाच्या करंगळीपासून उजव्या पायाच्या करंगळीपर्यंत नमस्कार अवस्थेमधे हात वर खाली हलवत अर्धगोलाकार वळायचे ! पोट दाबले जाते, गर्भाशयातील दोष पिळले जातात, कंबर हलवली जाते, खांदे हलवले जातात, पाठीचा कणा, वाकवला जातो, मनगटे सैल करून घेतली जातात, असा नमस्कार केला तर, किती उत्तम व्यायाम आहे हा !

    "एक काम धड नीटपणे करता येत नाही" असं म्हणत दोन्ही हातानी टाळी वाजवत बायकोनं कोपरापासून केलेल्या नमस्काराला काय नाव द्यावं हो ? ही कदाचित जागतिक लेव्हलची शंका असेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    16.07.2017

    आजची आरोग्यटीप

  • किचन क्लिनीक – दालचिनी

    हा देखील गरम मसाल्यातील एक अत्यंत सुगंधी पदार्थ.आपल्यापैकी बरेच जण ह्याचा उपयोग जेवणातील मसालेभात,पुलाव,गरम मसाला ह्या मध्ये तर केला जातोच.पण चहा अथवा काॅफी बनवताना देखील दालचिनी वापरली जाते.

    दालचिनीचा वापर आपण घरगुती औषधामध्ये देखील करू शकतो.वाचून आश्चर्य वाटले का?
    दालचिनीचा व्रुक्ष नेहमी हिरवागार असतो.आणी आपण वापरत असलेली दालचिनी ही त्या झाडाच्या बुंध्याची त्वचा हो.ह्यात एक उडवशील सुवासिक तेल असते ज्याचा बराचसा उपयोग त्याच्या औषधी गुणधर्मामध्ये होतो.

    दालचिनी ही चविला कडू,गोड अशा मिश्र चवीची असते आणी उष्ण असते.ती शरीरातील वात आणी कफ दोष कमी करते आणी पित्त दोष वाढवते.

    आता हिचे घरगुती उपचारात उपयोग पाहूयात:

    १)दात किडून दुखत असल्यास दालचिनीच्या तेलात भिजविलेला कापूस दाता खाली धरावे वेदना कमी होतात.

    २)सर्दी,खोकला ह्या मध्ये सुंठ+दालचिनी+धणे घालून केलेला काढा प्यावा.

    ३)वारंवार पोटात क्रूमी होण्याची सवय असल्यास २ इंच दालचिनी +३० वावडींग दाणे+१ चिमूट हिंग पूड हे मिश्रण दररोज साधारण दहा ते पंधरा दिवस घ्यावे व वर कोमट पाणी प्यावे.हा प्रयोग दर तीन ते सहा महीन्यांनी परत करावा.

    ४)लिंबाच्या रसात दालचिनी उगाळून लावल्यास वांग आणी चामखीळ कमी होतात.

    ५)वाढत्या वया सोबत काहीजणांची लघ्वीची तक्रार वाढते जसे वारंवार थोडी थोडी लघ्वी होणे,लघ्वीवरचा ताबा सुटणे,किंवा झालेली लघ्वी न समजणे ह्यात १/२ चमचा दालचिनी पूड सकाळ संध्याकाळी गरम पाण्यासोबत घ्यावी.

    दालचिनीच्या अतिवापराने एसिडीटी,तोंडात उष्णतेचे फोड येणे,तसेच शरीरातील धातूंना क्षीणता येणे अशा तक्रारी उत्पन्न होऊ शकतात.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २३

    पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या लोकांनी खाल्ले तर पचन बिघडते. आणि क्लेद वाढतो.

    आधीच जमिनीमध्ये, वातावरणात पाण्याचे प्रमाण जास्त अशा प्रदेशातील एखादे फळ आणि तेही रसरशीत असेल तर प्रमेहाला आणखीन पूरक. जसे ऊस. ऊसाचा रस,त्यापासूनची काकवी, गुळ, साखर आणि हे पदार्थ ज्यामधे आहेत, अशा सर्व मिठाया जर खाऊन पचवता आल्या नाहीत तर प्रमेह ठरलेला.

    रसदार फळे नकोतच, त्याचा ज्युस काढून पिणे हे आणखीनच खतरनाक. याविषयी सविस्तर आपण वाचले आहेच.

    आयुर्वेदातील आणखीन एक संकल्पना म्हणजे नवे धान्य आणि जुने धान्य. आजच्या विज्ञानाला कदाचित हे रूचणार नाही, पटणार नाही, पण जेवढे धान्य नवीन तेवढे ते पचायला जड. जेवढे जुने तेवढे पचायला हलके. धान्य सूर्याच्या किरणांनी संरक्षित करून ठेवायची पद्धत भारतीयच ! किमान एक वर्ष जुने तांदुळ वापरले तर भात मोकळा होतो, हे व्यवहारात आपण बघतोच. मोकळा होणे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होणे. दही जसे प्रमेहामधे नको, तसेच दह्याप्रमाणे आंबलेले अन्य पदार्थ देखील क्लेद निर्माण करतात. जसे, आंबोळी, इडली, दहिवडा, मेदूवडा, ढोकळा. या पदार्थांमधे केवळ साखर नाही म्हणजे मधुमेहात चालतील असे नाही. तर आयुर्वेदीय पद्धतीने विचार केला तर चिकटणारे, चिकट असणारे आणि चिकटपणा वाढवणारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व क्लेद वाढवणारे, प्रमेहाचे कारण जाणावे.

    म्हणजे आंबवलेले सर्व पदार्थ बंदच करायचे का ? कधीच खायचे नाही का ?
    नाही. एवढं टोकाला जाऊन अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

    आपल्याला चिकटपणा कमी करायचा आहे. पीठ जरी आंबवलेले असले तरी त्या पीठापासून तयार झालेल्या इडली, दहीवडा, ऑम्लेट, या फुगलेल्या पदार्थापेक्षा, डोसा प्रकार जो खमंग खरपूस भाजलेला असतो, त्यामुळे त्यातील जलीय अंश बऱ्यापैकी कमी करून घेतलेला असतो, त्यातील पोकळपणा तुलनेने कमी असतो, तव्याच्या म्हणजे अग्निच्या जास्ती जवळ असतो, म्हणजेच डोसा, पेपरडोसा, मसाला डोसा, हे पदार्थ इतर आंबवलेल्या पदार्थांच्या तुलनेत, पचायला हलके असतील. जेव्हा आंबवलेलेच पदार्थ खाण्याशिवाय अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा हे डोसा आयटम आपल्याला नक्कीच मदत करतील!!!!

    चिकटपणा युक्तीने कमी करावा, जेवढा चिकटपणा कमी तेवढे पदार्थ पचायला हलके, चिकटपणा म्हणजे क्लेद. ही सर्व साखळी लक्षात ठेवली तर आपणच ठरवू शकतो, क्लेद कशाने कमी करता येतो ते !
    यासाठी शास्त्रकार अनेक प्रकाराने समजावून सांगताहेत, इथे पाणी आहे, इथे चिकटपणा आहे, इथे ओलावा आहे, इथे हवेत आर्द्रता जास्ती आहे, इथे गती कमी आहे, इथे इथे प्रमेहाचा धोका आहे.

    तेवढी दृष्टी तयार झाली की, झाले. प्रमेह गेलाच म्हणून समजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.02.2017

  • आहारसार भाग 7

    गहू कोकणी माणसांनी, कोकणात तर खाऊ नयेच. पण जिथे पिकतो तिथे सुद्धा तो खावा की नाही, अशी परिस्थिती आहे. या संदर्भात काही गोष्टींची माहिती जरूर असावी.

  • आहारातील बदल-शाकाहार भाग ११

    जिथून समुद्र फक्त पन्नाससाठ किमी च्या अंतरावर आहे, तिथे तांदुळ हे मुख्य अन्न आहे, हे कदापि विसरून चालणार नाही. जरी ग्रंथामधे गोधूम म्हणजे गहू, प्रमेह म्हणजे प्रचलीत नावानुसार साखरेच्या आजारात, सांगितला गेला असला तरी, प्रदेश विचारानुसार आणि गुणधर्मांचा विचार करून, गहू अपथ्य (म्हणजे खाऊ नये ), म्हणून सांगायला सुरवात केल्यावर रूग्णांच्या लक्षणामधे खूप फरक पडलेला, मी व्यवहारात पहातोय.

    ज्यांच्या खाण्यात गहू आहेत, त्यांनी भरपूर श्रम करणे अपेक्षित आहे. पचायला जड असलेला गहू श्रम केल्याने पचू शकेल. कष्टकरी वर्गाने गहू खावा आणि कष्टाची कामे करावीत. तर त्यांना आवश्यक असलेली उर्जा पण मिळते आणि काम केल्याने अनावश्यक साखर जाळली पण जाते.

    मेह नत (म्हणजे नाहीसा) होण्यासाठी, मेहनत कर, हा मधुमेहावर उत्तम उपाय आहे.

    पण आम्ही बुद्धिमान वर्ग, बुद्धी गहाण टाकल्याप्रमाणे, सुटबूट घालून, एसीत बसून टेबल खुर्चीवर काम करणार, किबोर्ड वरची चार दोन बटणे बडवणार आणि डब्यातून दिलेली बटाट्याची नाहीतर कोबीची भाजी आणि गव्हाची पोळी खाणार ! आणि ती पचण्यासाठी परत वरून औषधांचा मारा करणार, फरक पडला नाहीतर डाॅक्टरला बोल लावणार, मग कसे जमणार ?

    ज्यांना गहू सोडणे अजिबात जमणारच नाही, त्यांनी गहू दोन वर्षे जुना वापरावा. यासाठी तो सणसणीत उन्हे देऊन वाळवून ठेवावा. सध्याच्या काळात 'वाळवण' करून धान्याची बेगमी करणे हा प्रकारच कालबाह्य झाला आहे.

    जर हे पण शक्य नसेल तर बाजारातून गहू आणून, निवडून, दोन तीन वेळा पाण्याने धुवुन, ऊन्हात वाळवून, लोखंडी कढईत मंद विस्तवावर भाजून साठवून ठेवावा. आणि नंतर दळून आणावा. आणलेले पीठ सुध्दा थोडे गरम करून मग मळायला घ्यावे. पीठात भरपूर तेल घालावे, म्हणजे पीठातील चिकटपणा थोऽडाऽ फार कमी व्हायला मदत होते. एवढे केले तरी गव्हाला, पैकीच्या पैकी मार्क मिळतील, असे नाही.

    ही पळवाट सांगून ठेवतोय.
    मुख्य वाट तांदुळाची धरावी, नाहीतर खिशाला चाट पडेल आणि आरोग्याची वाट लागेल. शंभर वर्षाची वाटचाल करायची असेल तर योग्य वाट ओळखावी लागेल. वाटलं नव्हंत, गहू एवढा वाटलाव्या असेल !

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    27.10.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – तांदुळजा (चवळीचा पाला)

    तांदुळजा (चवळीचा पाला) हि भाजी बारा महिने उगवते. हिची लहान रोपं असतात व पाने बारीक असतात. हि भाजी चवीला गोड व शीतल गुणाची असल्याने शरीरातील वात व पित्तदोष कमी करते.

    हिचे बरेच औषधी उपयोग आहेत ते आपण पाहूयात:

    १)भाजलेल्या जखमेवर तांदुळजाच्या भाजीचा रस लावावा.

    २)डोळे,हातपाय,व लघ्वीची आग होणे ह्यात तांदुळजाच्या भाजीचा १/४ कप रस+ साखर हे मिश्रण उपाशी पोटी घ्यावे.

    ३)चाई अर्थात केसांना लूत लागणे असे बोली भाषेत म्हणतात, त्यांवर तांदुळजाच्या भाजीचा रस+हिंग हे मिश्रण डोक्यावरील केस गेलेल्या भागी जीरवावे.

    ४)वारंवार ताप येणे किंवा तीक्ष्ण औषधे घेतल्याने अशक्तपणा आल्यास ४२ दिवस पाल्याचा रस एक कप घ्यावा.

    ५)संडास साफ होत नसेल तर तांदुळजाचा + पालक घालून केलेला सूप तूप घालून घ्यावा.

    हि भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास शौचास पातळ होते.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • आहाररहस्य १६

    जेवताना लक्ष जेवणाकडेच असावे. मन जर जेवणात नसेल तर अन्न पचत नाही.रसांचा आस्वाद नीट घेता येत नाही. आपण खात असताना लक्ष टीव्ही बघण्यात असेल तर लोणचे खातोय की मीठात बोट जातंय, हेच लक्षात येत नाही. सरळ सरळ एक चव बदलून दुसरी चव तोंडात जातेय. परिणाम बदलणारच.

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी -भाग १

    शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांची वैशिष्ट्ये बघीतली असता काही मुलभूत फरक आपणाला दिसले. अगदीच एकदोन अपवाद सोडले तर कोणीही प्राणी निसर्गदत्त नियम मोडत नाहीत, असे लक्षात येते.

    या दोन प्रकारात माणूस कुठे बसतो ? हा प्रश्न आहे.

    काही जण समजत होते, माणूस शाकाहारी.
    काही जण समजत होते, माणूस मांसाहारी. काही मध्यम मार्गी मिश्राहारी या प्रकाराला चिकटून होते. पण "त्याच्या" नियमानुसार, ना माणूस शाकाहारी ना मांसाहारी ना मिश्राहारी.

    मिश्राहारी ही अगदी सोयीस्कर पळवाट झाली.
    म्हणजे उपवासाच्या दिवशी फळाहार पण करायचा आणि वडे भजी पण खायची. तसे झाले.

    त्याच्या डिक्शनरीमधे मिश्राहारी हा हायब्रीड शब्दच नाही.

    माणसाची वैशिष्ट्ये बघूया. म्हणजे त्याला अपेक्षित असलेले माणसाचे नियम आपोआप समजून येतील. .

    शाकाहारी प्रमाणेच पाणी ओठानेच पितो, जीभेने चाटत बसत नाही.

    समुहाने शांतपणे एकमेकांवर डूक न धरता जेवतो.

    रोज आंघोळ करतो. पाण्याची आवड आहे.

    अंगाला घाम येतो आणि शरीराचे तापमान संतुलीत ठेवायला मदतच होते.

    जेवताना अगदी सावकाश जेवतो. मांसाहारी प्राण्यांप्रमाणे वचावचा किंवा शाकाहारी प्राण्यांप्रमाणे भराभरा जेवत नाही.
    खाल्लेले अन्न पुनः पचनासाठी परत तोंडात आणत नाही. रवंथ करीत नाही.

    तोंडातील लाळेचे रासायनिक पृथक्करण केले असता, शाकाहारी आणि मांसाहारी प्राण्यांपेक्षा वेगळे दिसते. आतड्यांची रचना, लांबी पण वेगळीच असते.

    मांसाहारी प्रमाणे माणसाची नखे आत बाहेर करता येत नाही. शाकाहारी प्रमाणे स्थिर आहेत. धारदार टोकदार नाहीत. त्यामुळे नखांनी शिकार करता येत नाही.
    शिकार करण्यासाठी वेगळ्या साधनांचा वापर करावा लागतो. एवढेच नव्हे तर समोरचे मांस खाण्यासाठी भाजणे, जाळणे, तळणे, शिजवणे इ.इ. वेगळ्या संस्काराची आवश्यकता पडते. खाण्यासाठी सुद्धा काटे चमचे सुऱ्या घेऊन जणुकाही लुटुपुटुचे आभासी युद्ध करावे लागते.

    शिवाजी महाराजांना अफजल्ल्याचे पोट फाडण्यासाठी वेगळी वाघनखे वापरावी लागली, आणि हिरण्यकश्यपूला ठार मारण्यासाठी प्रत्यक्ष भगवंताना देखील सिंहनखे धारण करावी लागली. त्यासाठी मानवरूप सोडून नरसिंह अवतार घ्यावा लागला. पण भगवंतांनी पण नियम नाही मोडला.

    इथे प्रत्येकाचे नियम वेगळे. ज्याला जो नियम घालून दिला आहे, तोच नियम प्रत्येकाने पाळावा.

    आणि नियम मोडला तर शिक्षा ही होणारच.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    1.10.2016

  • किचन क्लिनीक – पालेभाज्या – अळू

    साधारणपणे पावसाळयात अगदी भरपूर उगवणारी हि पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची.अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा,अळुचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिची भाजी ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे(तसे काही महाभाग असतील ज्यांना हि भाजी आवडत हि नसेल पण ती संख्या तशी नगण्यच समझावी).

    अळुचे रोप हे ११/२ -२ फुट लांब उगवते,ह्याची पाने मोठी व पसरट असतात.आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही त्यामुळेच काही क्षणभंगुर गोष्टींना अळवावरचे पाणी ह्या म्हणीने संबोधले जाते.

    ह्याचे काळा,पांढरा,हिरवा,गर्द हिरवा असे अनेक प्रकार असतात.त्यातील फिकट हिरवा पातळ पानांचा प्रकारास तेर असं म्हणतात आणी ह्याच्या पानांची भाजी आंबट चिंचेचा वापर न करता केल्यास भरपूर खाजते.

    खायला काळा व गर्द हिरवा अळु उत्तम.अळुची चव हि तुरट गोड असते आणी हा थंड असतो त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.

    ह्या अळुचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत बरंका ते आता थोडक्यात पाहूयात:

    १)गळु फुटण्यास अळुची पाने व देठ वाटून त्याचा पोटीस गळूवर बांधावा.

    २)बाळंतीणीस दुध वाढायला जेवणामध्ये नियमीत थोडी अळुची भाजी खायला द्यावी.

    ३)जखमेवर अळुच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्त स्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.

    ४)अळुच्या पानांचे देठ मीठासोबत वाटावेत व बंद व सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करावा.

    ५)सर्वांगाची आग होत असल्यास अळुची भाजी,फुल्के व तुप ह्यासोबत खावी.

    अळुची भाजी जास्त खाल्ल्यास पोटात वात धरतो व बद्धकोष्ठाचा त्रास होतो.
    -- वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४