(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आहारातील बदल-शाकाहारच ! – भाग ४

    पाला तो पालाच. फक्त एक दिवस जिवंत राहू शकतो. त्यामुळे रोज खावा लागतो. आणि जो स्वतः जिवंत राहू शकत नाही, तो माणसाचे आयुष्य शंभर वर्षे कसे वाढवणार ?

    पालेभाज्या या चोथा जास्त, पचायला जड, पोषणमूल्य कमी आणि जवळपास ऐशी नव्वद टक्के पाणीच अश्या (अव)गुणाच्या आहेत.

    जे काही दहा वीस टक्के चांगले गुण दिसतात, तेही काही कामाचे नाहीत.

    मुंबई सारख्या शहरात पालेभाज्या रेल्वे लाईनच्या बाजुला कसल्या पाण्यावर पिकवतात ते सर्वजण बघतात.

    पालेभाज्या जमिनीलगत वाढतात, म्हणून त्या नीट धुवूनच घ्याव्या लागतात. शहरात तर चक्क गटाराच्या पाण्यात धुवुन मार्केटमधे आणतात. अश्या धुण्याने किती जंतुसंसर्ग वाढेल?
    कधी विचार केलाय याचा ?

    बरं या पालेभाज्या अधिक हिरव्यागार दिसण्यासाठी, अधिक टवटवीत दिसण्यासाठी, अधिक लवकर तयार होण्यासाठी त्यावर रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला जातोय. एका सर्वेक्षणात तर असे आढळले आहे की जंतुनाश होण्यासाठी जे प्रमाण वापरले जायला हवे त्यापेक्षा किमान पाचशेपट अधिक जहाल रसायन या पालेभाज्यांवर फवारले जातेय. ही माहिती खते आणि फवारणीची रसायने विकणाऱ्या एका होलसेल विक्रेत्यानेच एका व्हिडिओ द्वारे सांगितली आहे. तो म्हणतो, "इसी से हमारे मार्केट मे माल जल्दी खतम हो रहा है, हमारा धंदा बढ रहा है ।"

    स्वतःचा व्यवसाय तो वाढवून घेतोच, पण व्यवहारात तो डाॅक्टर मंडळींचा व्यवसाय देखील काही हजार पटीने वाढवित असतो. ते तर पुरस्कार करणारच. त्यांच्या टेक्समधे जे आहे, ते करायलाच हवे ना.

    शुद्ध स्वच्छ निर्जंतुक हे शब्द केवळ पुस्तकात वाचण्यासाठीच शिल्लक राहिले आहेत की काय असे वाटते.

    प्रत्येक जण आपला व्यवसाय कसा वाढेल हेच बघतोय.

    इथे, कुणी कुणाचे नाही राऽजा,
    कुणी कुणाचे नाऽही

    मग काय करायचं ?

    पालेभाज्या खायच्याच असतील तर त्या अगदी खात्रीच्या माणसाकडून विकत घ्याव्यात, ज्याने त्या चांगल्या पाण्यावर वाढवलेल्या आहेत. त्याच्या मुळात कोणतेही रासायनिक खत वापरलेले नाही आणि वरून फवारणीसाठी कोणतेही जहाल विष फवारलेले नाही.

    दुर्दैवाने असा माणूस नाहीच मिळाला तर मार्केटमधील पालेभाज्या नीट पहाव्यात.
    ज्या आकाराने लहान, ज्यांची पाने किडींनी कातरलेली आणि खाल्लेली असतील, ज्यांच्या पानावर भोके पडलेली दिसतील, त्या भाज्या जगायला योग्य वाटल्यामुळे त्या किडींनी खाल्लेली असतात, असा उदात्त विचार करून घरी आणावीत........

    पालेभाज्याविषयी यापूर्वी तीन चार टीपांमधून बराच उहापोह झाला आहे. तरी पण नवीन सदस्यांना हा महत्वाचा विषय कळणे आवश्यक वाटते, म्हणून अजून एखादा भाग पालेभाज्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ.......

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    19.10.2016

  • आहारातील बदल-शाकाहार भाग १०

    गव्हाचा सर्वात जास्त वापर पंजाब हरयाणा मधे होतो. हरियाणाला तर गव्हाचे कोठारच म्हणतात. या राज्यांमधे गव्हाचा अतिवापर व्हायला लागला आणि पंजाबी जाट लोकांचे कोलेस्टेरॉल वाढू लागले असे संशोधन सोलापूरचे सुप्रसिद्ध वैद्य बागेवाडीकर शास्त्रींनी आपल्या एका व्याख्यानात सांगितले होते.

    आणि ते खरेही वाटते. धर्मेंद्रचे आहाराचे डायलॉग कसे होते ?
    "मक्के की रोटी, सरसोंका साग, बैगन का भरता और गाजर का हलुआ, व्वा, मां तूने कैसे पहचान लिया मुझे ये खाना पसंद है ?

    विनोदाचा भाग सोडून देऊया, पण गव्हाचा वापर अति व्हायला लागला आणि त्याच्या चिकटपणामुळे कोलेस्टेरॉल वाढू लागले हे व्यावहारिक सत्य दिसते.
    गहू पचण्यासाठी तापमान पण तसेच थंड लागते. समुद्रसपाटीच्या खाऱ्या हवेत तो कसा पचेल ?
    सध्या चायनीजचे वारे सुरू आहेत. प्रत्येक खेडेगावात सुद्धा जी चायनीज सेंटर गल्लीबोळातून सुरू झाली आहेत. त्यामधे रोटी कुठे मिळते ? केरळमधे रोटी कुठे मिळते ? जिथे जे पिकते तिथेच ते पचते. हा सिद्धांत विसरून चालणारच नाही.

    कोकणातील वाढत्या मधुमेहाचे आणि कमी होत नसलेल्या चरबीचे, एक कारण गहू सुद्धा आहे, हे कटूसत्य पचनी पडणारे नाही. असो.

    गहू न धुता, आपण वापरतो हा आणखीन मोठ्ठा दोष. जे धुवुन वापरतात, ते त्यातल्या त्यात समाधानी. पण न धुता वापरतात त्यांना धोक्याचा इशारा....
    गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन पंजाबमधे होते.
    भारतात सर्वात जास्त रसायने आणि खते गव्हासाठी पंजाबमधे वापरली जातात.
    बाजारात आलेला गहू पंजाबचा असू शकतो.
    भारतात सर्वात जास्त कॅन्सरचे रूग्ण पंजाबमधे आहेत.
    पंजाब मधून राजस्थान मधे आठवड्यातून दोन वेळा जाणारी, एक ट्रेन आहे, तिचे नाव आहे कॅन्सर स्पेशल !!

    या पार्श्वभूमीवर गहू न धुता वापरणे किती धोकादायक आहे याचा विचार करून पहावा.
    नुसता पाण्यात बुचकळून काढला तर हे विषारी केमिकल जात नाही, कारण या गव्हाला जी खाच आहे, त्या खाचेत या खताचा अंश चिकटून रहातो, जो दररोज आपल्या पोटात जातोय.

    भीती निर्माण करण्यासाठी हे सांगतोय, असं नाही तर जागरूकता होण्यासाठी सांगतोय , हे लक्षात घेऊया.

    अन्य काही रोगांचे हेतू ( म्हणजे कारण ) असलेले मूळ कारण जोपर्यंत दूर केले जात नाही, तोपर्यंत विषे दूर करणारी सोन्यासारखी कितीही औषधे वापरा.... काऽऽही फरक पडणार नाही.

    आयुर्वेद सांगतो, रोगाच्या मूळ कारणाचा शोध घ्या आणि ते कारण दूर करा.

    आज रोगांचे प्रमाण ( संतर्पणजन्य व्याधी म्हणजे ) विशेषतः चरबी वाढल्यामुळे होणारे रक्तदाब, ह्रदयरोग, मधुमेह, पोट सुटणे, मासिक पाळीच्या समस्या इ.इ. आजार वाढले आहेत.

    केवळ सणासुदीला वापरला जायचा तो पचायला जड असणारा, मधुर रसाचा, स्निग्ध गुणाचा, जगण्यासाठी पाणी जास्त घेणारा, त्यामुळे कफ दोष वाढवणारा, गहू आपल्याकडे दैनंदिन आहारात येऊन बसल्यावर दुसरे काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021
    26.10.2016

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणचाळीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा

    निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेहेतीस

    बाबा सांगतात...

    आपले नुकसान करणाऱ्या शत्रुवरही प्रायः उपकारच करावा.

    यातील "प्रायः" हा शब्द महत्त्वाचा ! या शब्दाला विशेष महत्त्व आहे. हा शब्द नसता तर अनर्थ झाला असता. आजच्या भाषेत गांधीगिरी करावी.

    महंमद घोरी आणि पृथ्वीराज चौहान यांच्यातील झालेल्या युद्धांचा विचार करता, पहिल्या अनेक युद्धात महंमद हरला. त्याने माफी मागितली आणि पृथ्वीराजने ती माफी दिली. त्याला जिवंत सोडले. शेवटच्या युद्धात मात्र घौरी विजयी झाला आणि त्याने कोणत्याही प्रकारे दयामाया न दाखवता पृथ्वीराज चौहानला ठार केले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, हे सूत्र खरंतर घौरीने आम्हाला शिकवले.

    आणि नंतर शिवरायांनी प्रत्यक्षात अंमलात आणले. प्रचंड ताकदीच्या, धूर्त, कपटी अफजलला कपटानेच ठार मारले. शत्रूवर कधीही दया दाखवू नये, भरवसा ठेवू नये, कधी गाफील राहू नये, आपले आणि आपल्या प्रजेचे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी 'डिप्लोमसी' करावी लागली तरी चालेल. पण शत्रूवर कधीही उपकार करू नयेत. मिडीयाला सांगताना मात्र हेच सांगावे, की कट्यारीचा पहिला वार त्याने केला म्हणून स्वसंरक्षणार्थ मला वाघनखे वापरावी लागली. नाहीतर आम्ही अहिंसेचेच पुजारी आहोत. आम्हाला हिंसा करणे कधीही आवडत नाही. किंबहुना ती आमच्या रक्तातच नाही. म्हणूनच तर स्वतंत्र भारताच्या इतिहासात कोणत्याही युद्धाची सुरवात भारताने केलेली नाही. पण कधीतरी सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही देखील शिवरायांचे वंशज आहोत, हे दाखवलेच पाहिजे. शिवरायांना युद्धनीतीचे आदर्श मानणाऱ्या लढाऊ इस्राईल सारख्या छोट्याश्या देशाकडून, शत्रूशी कसे वागावे, हे आपल्या देशातील राजकीय मंडळीनी शिकण्यासारखे आहे. अशा शिवरायांकडून ""प्रायः" शब्दाचा अर्थ आम्हाला समजला.

    संपत्ती आणि विपत्तीमधे एकच चित्तवृत्ती ठेवावी.

    संपत्तीचा अभिमान जरूर असावा, पण माज असू नये. विपत्ति आली तरी बुद्धी स्थिर रहावी. तिचा तोल ढळू देऊ नये. म्हणजे कितीही श्रीमंत असली तरी अंतिम क्षणी आपल्यासाठी मांजरपाटाचाच तुकडा येणार आहे हे विसरू नये.

    एखाद्याच्या चांगल्या गुणाविषयी इर्षा करावी.
    थोडेसे विपरीत वाटणाऱ्या या वाक्यातील मुळ अर्थ लक्षात घेऊया. इर्षा हा वाईट गुण सुद्धा चांगला बनवण्यासाठी दृष्टीकोन बदलला पाहिजे. इथे इर्षा हा शब्द "स्पर्धा" या अर्थाने वापरलेला आहे. स्पर्धा चांगल्या गुणांची करावी. आपल्यात एखादा चांगला गुण कमी असेल, तर दुसऱ्याकडून तो आत्मसात करावा. शिकून घ्यावा.
    शिकण्याची तयारी असेल तर शत्रूकडूनही शिकता येते. फक्त शिकण्याची आपली तयारी हवी.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३१

    शास्त्रकार स्पष्टपणे सांगत आहेत.

    अतियोगेन सलिलं तृष्यतोऽपि प्रयोजितम
    प्रयाति श्लेष्म पित्तत्वं ज्वरितस्य विशेषतः।
    वर्धति आमतृष्णानिद्रा तंद्रा ध्मानांग गौरवम
    कासाग्निसादह्रल्लासप्रसेक श्वास पीनसम् ।।

    तहान लागली असताना सुद्धा ती ओळखता यायला हवी, तहान लागल्यानंतर पाणी जरूर प्यावे, पण जर का यावेळी देखील पाणी जास्त प्यायले गेले तर कफ आणि पित्त प्रकुपित होतात, म्हणजे वाढतात. विशेषत्वाने ताप आला असताना जर तहान लागली घसा कोरडा पडलाय म्हणून पाणी गरजेपेक्षा जास्ती प्यायले गेले तर शरीराचे नुकसान जास्ती होते.
    तहानेपेक्षा अधिक पाणी प्यायल्याने शरीरात आमाची वृद्धी होते.
    ( आम म्हणजे काय, तो कसा तयार होतो, कुठे असतो, हे आपण मागील अनेक टीपांमधे आधी वाचले असेलच ! हा आम पुढे जाऊन नवीन व्याधींना जन्माला घालतो. )

    यातूनच अधिक तहान लागणे, शरीर जड होणे, आळसावणे, भूक नाहीशी होणे, पोट फुगणे, खोकला, मळमळ वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, दम लागणे, नाक वाहाणे, इ. आजारांची लक्षणे वाढतात.

    याचाच अर्थ असा आहे, ही लक्षणे निर्माण झाली तर समजावे, आपल्या पोटात आम वाढला आहे. या अवस्थेत लंघन किंवा उपवास करायला हवा. अशा अवस्थेत पाणी सुद्धा पिऊन चालणार नाही. तेही पचत नाही. आणि व्याधी उग्र रूप धारण करतो.

    लक्षात एवढेच ठेवायचे की, कधीही अनावश्यक पाणी पिऊ नये. ते नुकसान करणारे आहे.

    पण आज बरोब्बर उलटेच सांगितले जात आहे. साध्या व्हायरल इन्फेक्शन पासून ते डायरीया पर्यंत, पाणी प्या पाणी प्या.!!! ज्या बिचाऱ्यांना आयुर्वेदातील "अ" म्हणजे काय, हे सुद्धा कळत नाही, अश्या ब्युटीशियन पासून एकजात सारे डाएटिशियन, नॅचरोपॅथस् सुद्धा सांगतात, ते एकवेळ मान्य करू. वाॅटसपवर तर आयुर्वेदाचे सल्ले द्यायला उधाणच आलेले असते. सर्व आयुर्वेद म्हणे एकशे चाळीस सूत्रात ??? आयुर्वेद एवढा चीप झालाय ? आयुर्वेदाच्या नावावर काहीऽही खपवले जातेय. तेव्हा सावधान !!!

    कोणाच्या भरवंशावर कोण जाणे, पण अगदी पाश्चात्य वैद्यक तंत्राने शिकलेले तज्ञ, इंटीग्रेटेड व्यवसाय करणारे आयुर्वेद पदवीधारक आणि मिक्स प्रॅक्टीस करणारे होमियोपॅथीचे पदवीधर देखील पाणी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात, आणि लोक फसतात. आपला आजार वाढवतात.

    जो तो उठतोय आणि सांगतोय भरपूर पाणी प्या. नुसता चिखल होतोय, बाकी काही नाही, नंतर सर्व निस्तरायला काही मोजके आयुर्वेदीय वैद्य आहेतच !

    हे असे का सांगितले जातेय ? कोणत्या संहितेनुसार, माॅडर्नच्या कोणत्या सिद्धांतानुसार, होमियोपॅथीच्या कोणत्या तत्वानुसार ? काहींना कळतंय पण व्यावसायिक मौन पाळून आहेत.
    मौनात अर्थ सारे.....
    हे चक्क बाजार वाढवणे आहे. असे वाटले तर काय चुकले ?

    वैद्य सुविनय दामले
    कुडाळ, सिंधुदुर्ग
    9673938021

  • किचन क्लिनीक – अक्रोड

    किचन क्लिनीक – अक्रोड

    अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
    अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
    अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.

    अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
    हृदयाला हितकर असतात.

    अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.

    अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

    (ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:
    ९९६०६९९७०४

  • आहारातील बदल-शाकाहारी की मांसाहारी – भाग १५

    कधी संपणार हे मांसपुराण असे वाटत असेल ना ? पण काय करणार ? आहार हेच औषध असल्याने दुसऱ्या कोणत्याही औषधाशिवाय जगायचे असेल तर मूळ कारण नष्ट व्हायला नको का ? निदान त्याच्यापर्यंत पोचले तर पाहिजे.

    भारतातल्या मानसिकतेचा आणि गरजांचा विचार करणारे पुणे येथील सुप्रसिद्ध डाॅक्टर कल्याण गंगवाल यांचे नाव घेतल्याशिवाय रहावत नाही. शाकाहारच का ? या त्यांनी लिहिलेल्या आणि राजहंस पुणे यांनी प्रकाशित केलेल्या पुस्तकामधे विस्ताराने माहिती आहे. डाॅ. श्रीराम गीत हे त्याचे सहलेखक आहेत.

    त्यांनी फारच सुंदर अभ्यास करून आपले विवेचन दिलेले आहे.

    एखाद्या देशात उपलब्ध असलेली साधनसामुग्री ही प्रत्येक देशाचे बलस्थान असते. अमेरीका, डेन्मार्क न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया इंग्लंड या देशातील लोकसंख्या आणि देशाचा भौगोलिक विस्तार, आर्थिक सुबत्ता यांचा विचार केला तर त्यांना मांसाहार करण्यासाठी लागणारी प्राथमीक पशुंची पैदास आणि पोषण सहज उपलब्ध होते. परवडते. शेती हा त्यांचा मुख्य व्यवसाय होणारच नाही कारण तेथील अत्यंत प्रतिकुल हवामान. तिथे तयार होणारी मका गहू ही मुख्य पिके प्रामुख्याने पशुपालनासाठीच घेतली जातात. देशात उपलब्ध पाण्याचा साठ्यापैकी निम्मा खर्च पशुपालनावर आणि कत्तलखान्यावर होतो.

    तसा खर्च करणे भारताला शक्य नाहीये. भारतातील मांसाहार करणाऱ्या सर्व लोकांनी ठरवले तरी ते या प्रगत देशातील लोकांच्या बरोबरीने मांस खाण्यात कधीही तुलना करू शकत नाही.

    अमेरिकन माणूस दररोज मांसाहार करतो. याउलट भारतीय माणसे आठवड्यातून दोन वेळाच मांसाहार करतात. इतर वेळा भारतीय शाकाहाराचाच विचार करतो.

    आर्थिक गणित पाहिले तरी प्रमाण व्यस्तच आहे. आठवड्यातून दोन वेळा जरी मांसाहार केला तरी देखील दरमहा सात ते साडे सात हजार रूपये खर्च येतो. एवढा खर्च केवळ मांसाहारावर करू शकणारी किती कुटुंब भारतात आहेत ? दारीद्रय रेषेखालील लोकसंख्या आणि तिचे दरमाणशी उत्पन्न पाहिले तर मांसाहार करणे अशक्यप्राय वाटते.

    या सर्व गोष्टींचा विचार करता भारतात
    शाकाहार करणे व सोयीचे झालेले आहे.
    भारतातील शेतजमिनीची कमतरता, त्यावर होणारे शाकाहारी प्राणी आणि माणसाचे पोषण, त्यावर अवलंबून असलेल्या मांसाहारी प्राण्यांची गरज हे सर्व व्यस्त प्रमाणात आहे.

    परंपरा, गरज, उपलब्ध पशुधन, शेतीप्राधान्य आणि आर्थिक कुवत यांचा विचार करता, शाकाहारी बनणे आवश्यक वाटते.

    म्हणून जगा आणि जगू द्या, ही विचारसरणी असणाऱ्या भारतात प्रार्थना म्हटली जाते,
    सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग
    9673938021.
    15.10.2016

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणपन्नास

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4

    कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.

    देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
    आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.

    सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
    या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
    देव अशानी पावायचा नाऽही रं
    देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !

    देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
    कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.

    अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.

    श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.

    पूजा करण्याच्या निमित्ताने,
    "हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
    असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.

    माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.05.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग चौदा

    पचनासाठी कफ, पित्त वात तीनही दोषांची आवश्यकता असते.या दोषांच्या गुणांचा विचार केला तर कफ आणि पित्त यांना स्वतःची गती नाही, हे दोन्ही दोष स्वतःचे काम करण्यासाठी, हालचाली करण्यासाठी, वातावर अवलंबून असतात.

    ग्रंथकार एक उत्तम उदाहरण देतात. जसे आकाशातले काळे पांढरे ढग स्वतः काहीच करू शकत नाहीत, जेव्हा वारा येतो, तेव्हाच हे ढग हालचाली करू शकतात. आणि वारा जिकडे नेईल तिकडे पळतात. तसेच शरीरात कफ आणि पित्त स्वतः अपंग असतात. वात दोष जसे हलवेल तसे त्यांना आपले काम दाखवता येते.

    जेवणानंतर लगेचच कफ दोष वृद्धींगत होतो. (दोष म्हणजे 'फाॅल्ट' नव्हे) हा कालावधी साधारणपणे दीड ते दोन तासांचा असतो. त्यानंतर पित्ताचे काम अधिक जोमाने सुरू होते. आणि नंतर वाताचे कार्य अधिक जोरात सुरू होते.

    आपल्या नकळत चाललेलं हे पचन पूर्ण होईपर्यंत पोटाकडे जरा जास्ती रक्तपुरवठा होत असतो. वात दोष पोटात फिरल्यामुळे बाकी बाहेरील शरीराच्या ठिकाणी वाताचे कार्य मंदावते.

    त्याचा परिणाम म्हणून इतर अवयवांना रक्त थोडे कमी पडते. मेंदू, इंद्रिये यांना सुस्ती येते, आळस भरतो, काम न करता पडून रहावेसे वाटते, झोप आल्यासारखी वाटते. ती येतेच.

    आयुर्वेदात काही गृहीतके आहेत, काही संकल्पना आहेत, काही धारणा आहेत, काही प्रत्यक्ष प्रमाण आहेत, या अमूर्तांचे गुण वर्णन केलेले आहे, या गुणांचा तरतम भावाने विचार केला तरी यांचे गुण केव्हाही बदलत नाहीत, हाच खरा अभ्यास, हे खरे शास्त्र, त्रिकालाबाधीत सत्य. आजही वात पित्त कफाला समजून घ्यायचे असेल तर त्याच्या त्याच गुणांचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यांचे गुण अंशानेही बदललेले नाहीत. हे आयुर्वेदाचे अविनाशित्व !

    हीच पचन प्रक्रिया प्रत्यक्षरीत्या समजून घ्यायची झाल्यास रसायन शास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, फिजीऑलाॅजी, पॅथाॅलाजी, इ. अनेक पद्धतींनी समजून घेता येईल. त्यासाठी अन्नातील घटकद्रव्यांचा स्वतंत्र विचार, एकमेकांत होणाऱ्या जीवरासायनिक प्रक्रिया, इ. सर्व समजून घेण्यासाठी, त्या त्या शास्त्रांचा परत स्वतंत्र अभ्यास करावा लागेल, तरच ते नीट समजून घेता येईल. यापेक्षा आयुर्वेदात काय सांगितलेले आहे ते समजून घेणे हे अगदी सोपे आहे, असे वाटते.

    मायक्रोलेव्हलला आतमधे काय चाललेले आहे हे प्रत्यक्षात पहाण्यापेक्षा, वात पित्त कफाच्या, गुरू मंद आदि वीस गुणांचा अभ्यास करून, अनुमान प्रमाण वापरून, आतील सूक्ष्मातील कार्य समजून घेणे, हे समजायला सोपे नाही का ?
    जे सोपे आहे ते अधिक सोप्पे करून सांगितलं तर समजण्याचं काम सोप्पं होतं ना !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.03.2017

  • इंद्रिये, अवयव आणि आहार – भाग वीस

    गॅसनामा

    गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.

    फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "

    हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.

    या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.

    गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !

    हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.

    वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.

    या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    04.04.2017

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठावीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात

    निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग तीन !

    निसर्ग कोणासाठी थांबत नाही.
    निसर्गाने निर्माण केलेले प्राणी सहसा आजारी पडत नाहीत. कर्मभोगाप्रमाणे जे आजार होत असतात, ते निसर्गच बरे करत असतो. त्यासाठी वापरायची औषधे ही नैसर्गिकच असावीत.
    कृत्रिम औषधे वापरून कृत्रिम आजार वाढविण्यात येत आहेत, असे म्हटले तरी अतिशोयोक्ती होणार नाही.

    निसर्ग शक्तीमान आहे. निसर्गाचे जसे एक मन आहे, तसेच निसर्गाचा एक आत्माही आहे. परम आत्मा! त्याची काही कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रिये पण असतील. या सर्वांच्या आधारे निसर्ग आपला गाडा हाकत असतो.

    मनुष्य ही निसर्गाची छोटी प्रतिकृती आहे. जसे निसर्गामधे घडत असते, अगदी तस्सेच शरीरात देखील घडत असते. जसा निसर्गामधे सूर्य तसा शरीरात अग्नि किंवा पित्त, उष्णता. जसा निसर्गामधे चंद्र तसा शरीरात कफ किंवा थंडावा, ओलावा. जसा निसर्गामधे वारा तसा शरीरात वायु, गती, हालचाल, चंचलता.

    जे बदल निसर्गात होत असतात, त्याचा परिणाम थेट शरीरावर होत असतो. बाहेर उष्णता वाढली की शरीरावर घाम यायला सुरवात होते आणि त्वचा ओली ठेवून आतील रक्त आदि थंड ठेवले जातात. साहाजिकच उन्हाळ्यात लघवीला कमी होते.

    याउलट हिवाळ्यात लघवीला जास्ती वेळा जावे लागते, आणि घाम येतच नाही. त्वचेचे, घर्मछिद्रांचे आकुंचन केले जाते. आतील उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी जणुकाही दरवाजे बंद केले जातात.

    हे सर्व बदल कोण करते ? कोण ठरवतं आता आकुंचन आता प्रसरण ? कोण ठरवतं काय खावे प्यावे ? इच्छा कोण निर्माण करतं ? ह्रदय यकृत मेंदूकडून काम करवून घेणारी एक यंत्रणा समांतरपणे काम करीत असते. याचे नियंत्रण कोणाकडे असते ? या प्रश्नांची उत्तरे आजही अर्वाचीन शास्त्राकडे नाहीत.

    उपनिषदे, वेद, पुराणे यामधे याची उत्तरे दडलेली आहेत. याला आपण निसर्ग म्हणू, ईश्वर म्हणू. अशी एक अत्यंत सूक्ष्म शक्ती की, जिच्या सुप्त इच्छेपुढे आपले विचार कस्पटासमान आहेत. या शक्तीचेच विराट रूपातील दर्शन म्हणजे अर्जुनाला झालेले विश्वरूप दर्शन होय !

    म्हणजे मी अर्जुन झालो तर मला सुद्धा असे दर्शन होईल का ? याचे उत्तर हो. असेच येईल. फक्त अर्जुनाचे सर्वच्या सर्व गुण आपल्यात आले पाहिजेत. ती उत्कट भक्ती, ती शक्ती, ती मैत्री, ती भावविभोरता, ती जिज्ञासा, ते वैराग्य, तो कर्मयोग, ते बंधुप्रेम, त्या प्रतिज्ञा, तो संयम, ते शौर्य, ती वीरता, ते चातुर्य, तो संन्यास, सारं काही असलं की भगवंत ( म्हणजे निसर्ग ) अनुकुल होऊन आपल्या सर्व शक्तींनी युक्त होऊन विराट रूप दर्शनासाठी आपल्यासमोर उभे ठाकतात.

    जाणून घेण्याची शक्ती नसली की काही जणांना तो प्रलय वाटतो तर काही जणांना ते तांडव वाटते.
    अक्राळविक्राळ रूपातील नरसिंहाला शांत करण्यासाठीचा, प्रल्हादाचा एक भक्तीकटाक्ष जरी आपल्यात आणता आला तरी निसर्ग आपल्याला अनुकुल होईल आणि निरामय आरोग्य निश्चितच मिळेल.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.05.2017