(User Level: User is not logged in.)

आरोग्य

Sort By:

  • स्पेशल एक्स-रे (एच.एस.जी / फिसच्युलोग्राफी)

    स्पेशल एक्स-रे (एच.एस.जी / फिसच्युलोग्राफी)

    या सदरात आपण दोन छोटे स्पेशल तपास पाहणार आहोत. यात एच.एस.जी. अथवा हिस्टेरोसालपिंगोग्राफी ही गर्भाशयाची नलिका तपासणारी चाचणी परीक्षा होय.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग अठ्ठ्याहत्तर

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी - भाग 35

    नैवेद्यम् समर्पयामी - भाग नऊ

    देवाचे जेवण पूर्ण झाल्यावर ताम्हनात तीन पळ्या पाणी सोडायला सांगितले जाते. जर भटजींनी म्हटलेले मंत्र नीट ऐकलेत, तर यातील अर्थ लक्षात येतील. नाहीतर एकाबाजूने भटजी मंत्र म्हणताहेत, आणि दुसऱ्या बाजूला पूजा करताना यजमान मोबाईल वर बोलाताहेत, आणि यजमानीण आपला मेकअप करतेय, असे असेल तर हे केवळ कर्मकांड होते आहे असे समजावे. मग कावळे काव काव करायला टपलेले आहेतच. "अशी कर्मकांडे करण्यात वेळ कशाला घालवा ? जो नाहीच आहे त्याला नैवेद्य तरी कशाला दाखवा." वगैरे वगैरे.

    तर भटजी असं म्हणतात, तीन वेळा ताम्हनात पाणी सोडा.
    नैवेद्यान्तरेण आचमनीयम् समर्पयामि ।
    हस्तप्रक्षालनम् समर्पयामि ।
    मुखप्रक्षालनम् समर्पयामि ।

    जेवणानंतर एक वेळा आचमन करावे. देवाचे नाव घेऊन एक पळी पाणी तळहातावर घेऊन पिणे म्हणजे आचमन करावे.

    खरंतर प्रत्येक घासच देवाचे नाव घेत तोंडात घालायचा असतो. निदान तसा भाव तरी ठेवायचा. "आतले अन्न पचवायला मी आता देवाला सांगितलेले आहे, आता मला काळजी नाही, त्यातील गुणदोष तो बघेल."
    खाताना भीती नसावी आणि खाल्ल्यानंतर आठवण न यावी. या दोन्ही गोष्टी देवाच्या स्मरणाने साध्य होतात. म्हणूनच भगवंत म्हणतात, "तुझा अधिकार फक्त कर्म करण्यापुरता. ( फक्त माझे स्मरण करत अन्न गिळायचे...) म्हणजेच केलेले कर्म तू मला अर्पण करणे. मी तुला त्याचे योग्य ते फळ, वेळ आल्यावर देणार आहे. यावर विश्वास ठेवायचा. म्हणजे पचन सुलभ होते.

    आचमन करण्याने, अन्ननलिकेला आतील बाजूला लागलेले अन्न पुढे ढकलून अन्न नलिका धुतली जाते. एवढंच पळीभर पाणी जेवणानंतर घ्यावे, हा पण एक सोयीस्कर अर्थ.

    जेवणानंतर देवाचे हाय धुवायला पाणी दिले जाते, तोंड धुवायला, चूळ भरायला, त्याच्या हातावर पाणी घातले जाते. केवढी एकरूपता साधली जाते. आपल्याकडे जेवायला आलेल्या प्रत्येक पाहुण्यांना सुद्धा आपण असाच उपचार करावा. ( केवळ व्हीआयपी पाहुण्यांना नको )

    त्याही आधी जेवल्यानंतर हात धुवायचे असतात आणि खळखळून चूळ भरायची असते, एवढे तरी सांगितले गेलंय.? कोणासाठी सांगितले असेल हे कर्मकांड ? देव जो स्वतः निर्लेपी, निर्मोही, निर्गुण निराकार आहे त्याच्यासाठी ???
    जे जे देवासाठी ते ते देहासाठी.

    वीतभर वाटीत बोटं बुचकळली आणि टीचभर पेपरला तोंडं पुसली की झालं हस्तमुख प्रक्षालन ! काय चाललं आहे ? कुठे भारतीय संस्कारातील दोन्ही हात स्वच्छ धुणे, खळखळून चुळा भरणे आणि कुठे पाश्चात्य प्रकारातील वाटीभर पाण्यात फक्त एका हाताची बोटे बुडवणे आणि ओठावरून कागद फिरवणे ?

    नियमितपणे जर पाण्याने खळखळून चुळा भरल्या जात असतील तर दात किडत पण नाहीत, चुळ भरण्याने दातात अडकलेले अन्नकण बाहेर निघून जातात. आणि दाताला किड लागण्यापासून वाचवले जातात, म्हणून काही खाल्ल्यानंतर तोंड धुवावे, हात धुवावेत, हे देवपूजेच्या माध्यमातून दररोज सांगितले जाई.

    पाश्चात्य देशात हस्त, मुख प्रक्षालन कसे करावे हे माहितीच नव्हते, वेळ मिळेल तेव्हा, पावासारखे सुके पदार्थ फिरत फिरत खायचे, आमटी भाजी, चटणी लोणचे असे ओले पदार्थच त्यांच्या ताटात न आल्याने, हाताला अन्न चिकटत नव्हते. त्यामुळे तोंड, हात धुणे हा संस्कार त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हता.

    अन्न हातानी मुरडणे, कालवणे, एका हातानी त्याचे घास करणे, एका हातानीच खाणे, खाल्ल्यानंतर हात उष्टे होतात, म्हणून ते धुणे, हे त्यांच्या संस्कृतीमध्येच नव्हते. त्याचा परिणाम म्हणून या सर्व पाश्चात्य लोकांना दात आणि हिरड्यांच्या मोठ्या समस्या निर्माण होतात. आणि या समस्या निवारणासाठी दंततज्ञ !! आपल्या गावात, तीस वर्षापूर्वी किती डेन्टीस्ट होते, आणि आता गावामधे दंततज्ञ किती आहेत ? ओझरता सर्व्हे केलात तरी, यांची वाढलेली संख्या लक्षात येते. या दातांच्या रोगाची मूळ कारणे कुठे आहेत, कशात आहेत, याचा एकदा शोध घेतला पाहिजे.

    ज्या पाश्चात्य देशात एकेकाळी दात घासणे, चुळ भरणे, गुळण्या करणे कधी माहितीच नव्हतं, त्यादेशातील लोकांनी, ज्या भारत देशातील वयोवृद्धांचे बत्तीस दात स्मशानामधे सुद्धा मोजून घेतले जात... अश्या आमच्या भारत देशातील लोकांचे, "मौखिक आरोग्य कसे चांगले राहील?" यावर चर्चासत्रे घ्यावीत, यापेक्षा मोठा विनोद नाही.

    ........पण आज जमाना बदल गया है। यालाच "कलियुग" असे नाव. दुसरं काय म्हणणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

    02362-223423.
    28.06.2017

  • याला जीवन ऐसे नाव भाग ३५

    निषेधार्ह पाणी भाग तीन

    नाम्बु पेयमशक्त्या वा स्वल्पमग्निगुल्मभिः ।।
    पाण्डूदरातिसारार्शोग्रहणीदोष शोथिभिः ।
    ऋते शरदन्निदाभ्यां पिबेत्स्वस्थोऽपि चाल्पशः ।।

    वैद्यानाम शारदी माता असं ओळखला जाणारा शरद ऋतु आणि अंगाची लाही लाही करणारा ग्रीष्म ऋतु हे दोन ऋतू सोडून स्वस्थ माणसाने देखील पाणी अल्पच प्यावे. असं अगदी स्पष्टपणे वाग्भटजी म्हणत आहेत.

    आता शरद ऋतु आणि ग्रीष्म ऋतु कोणते ते कधी येतात ? ऋतु सहा असतात, हे तरी आठवते आहे का ? "लहानपणी कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय." असे आपण म्हणाल. "शरद पोंक्षे माहिती आहे, हा शरद ऋतु कोण?" असं पोरगं विचारेल. विचारून पहा, गंमत म्हणून आपल्या इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या पोरांना. ऋतु म्हणजे काय हेच माहिती नसेल. शरद ग्रीष्म दूर राहिले.

    आताच्या दिनदर्शिकेनुसार ऑक्टोबर हीट म्हणजे शरद ऋतुचा कालावधी. आणि एप्रिल मे चा सीझन म्हणजे ग्रीष्म ऋतु समजावा.
    जमिनीवर पडलेल्या पावसाच्या पाण्याची सूर्याच्या सरळ आणि तीक्ष्ण किरणांनी परत वाफ व्हायला लागलेली असते. वातावरणात उष्णता वाढलेली असते. तसेच शरीरात देखील पित्ताचा प्रकोप सुरू झालेला असतो. हा काळ म्हणजे रोगांचे माहेरघरच. म्हणूनच सुभाषितकार गंमतीने या शरद ऋतुला वैद्यांची माता म्हणतात. आजच्या भाषेत, अनेक रोगांचा 'सिझन' सुरू होतो. वैद्यांचे आर्थिक भरणपोषण सुरू होते.

    आणि दुसरा उल्लेखित ग्रीष्म ऋतु. भूगर्भातील पाण्याची पातळी खाली नेऊन पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारा, तोंडचे पाणी पळवणारा, अंगातून पाण्याचे लोट घामाच्या रूपात बाहेर काढणारा हा ऋतु अगदी पाऽणीऽ पाणीऽऽ करायला लावतो. यावेळी वाग्भटजी म्हणतात, या दोन ऋतुंखेरीज पिबेत स्वस्थोऽपि अल्पशः

    या दोन ऋतुमधे पण पाणी पिताना जरा काळजी घ्यावी. ग्रीष्मात तर पाण्याची पातळी खूपच कमी झालेली असते. जिथे टॅकरने पाणी पुरवठा होतो, तिथे पाण्यात अनेक अशुद्धी मिसळलेल्या असतात. अन्य भागात देखील पाणी जाड होते. ते शुद्ध केल्याशिवाय वापरू नये.

    जसं वातावरणात उष्णता वाढलेली असते, तशी शरीरातील दोषांची स्थिती बदललेली असते. तिन्ही दोष आपले मूलस्थान सोडून बाहेरच्या दिशेत गेलेले असतात. जठरातील अग्निचे बल देखील प्राकृत नसते. त्यामुळे आधीच व्याधींनी आलेला अशक्तपणा असताना, पाण्यासारखा अग्निविरोधी घटक पोटात ढकलणे म्हणजे आ बैल मुझे मार सारखी अवस्था होते. या रोगग्रस्तांनी तर पाणी पिऊ नयेच. पण ज्यांना आपल्याला रोग होऊ नयेत, अशी इच्छा असणाऱ्यांनी सुद्धा पाणी पिताना साधे पाणी पिऊच नये. उकळलेले पाणी पिताना देखील चार वेळा विचार करून कमीच प्यावे, विचारपूर्वक प्यावे. गरजेपुरते प्यावे. सुसंस्कारीत जल प्यावे. व्याधीनुसार, दोषांच्या अवस्थेनुसार, वैद्य सल्ल्यानुसारच प्यावे. हवेच असेल तर ते सुद्धा काही तरी औषधी घालूनच !

    मनुष्य खूपच अशक्त असेल तर प्राणधारण होईल इतके पाणी थोडे थोडे पाणी जरूर प्यावे, कारण पाणी हे जीवन आहे.

    पण कोणीतरी सांगतो आहे म्हणून, कोणत्या तरी पुस्तकात वाचले म्हणून, अमुक गुरूजींनी सांगितले म्हणून, मला वाटले म्हणून, चॅनेलवर ऐकले म्हणून, वाॅटसमधील मेसेजमधे वाचले म्हणून, आमचे डाॅक्टर सांगतात म्हणून, आईने सांगितले म्हणून, नॅचरोपॅथीचा उपाय म्हणून, या योगतज्ञाने सांगितले म्हणून, जिममधल्या इन्स्ट्रक्टरने सांगितले म्हणून, मैत्रिणीने सांगितले म्हणून, स्कीन हेल्दी रहाण्यासाठी माझ्या ब्युटीशियनने सांगितले म्हणून, मूतखडा होऊ नये म्हणून, वैदूने सांगितले म्हणून, मुळव्याध भगंदरवाल्याने सांगितले म्हणून, अगदी बायकोने सांगितले तरीसुद्धा......
    अ ति
    पा णी
    पि ऊ
    न ये

    वैद्य सुविनय दामले,
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे – भाग बारा

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे क्रमांक चार

    जगण्यासाठी औषध काम करत नाही - भाग तीन

    स्वतः ठरवून स्वतःच उपचार करणे हा आणखीन एक अति घातक प्रकार. कोणीतरी सांगितले म्हणून कुठेही, कोणत्याही नागरमुन्नळी सारख्या गावात सुद्धा स्पेशल गाड्या करून औषधे घेण्यासाठी लोक धावतात, याचे आश्चर्य वाटते. आपण आपल्या गाडीची काळजी घेतो, त्यात योग्य कंपनीचे, ऑईल, पेट्रोल, डिझेल घालतो. काही वेळा दुरुस्तीची वेळ आली तर त्या गाडीच्या स्पेशल मेकॅनिककडे नेतो. पण नशीबाने एकदाच मिळणाऱ्या या शरीरावर असे काही अत्याचारी औषधी प्रयोग करीत बसतो, की जणुकाही आपणाला आपले शरीर संपूर्णपणे कळलेलेच आहे.

    आपण कोणते औषध घेतोय, तो देणारा, तेवढा विश्वासार्ह आहे का, याची कोणतीही खातरजमा न करता, भोंदू वैद्य आणि बोगस डाॅक्टरांच्या मागे अक्षरशः धावतो, यात औषध देणाऱ्याला आपण शास्त्र बदनाम करीत आहोत, याचेही भान नसते. आणि घेणाऱ्याने आपली बुद्धी गहाण टाकलेली असते.

    प्रत्येक राज्याचे एक वैद्यकीय व्यवसाय नियामक मंडळ असते. जसे महाराष्ट्रात एमसीआयएम. महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडीसीन हे सरकारने नेमलेले मंडळ आहे. या मंडळाकडे जेव्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या संबंधित विद्यापीठाचे अधिकृत प्रशस्तीपत्रक सादर केले जाते तेव्हा, असे केल्यानंतर डाॅक्टरना वैद्यकीय व्यवसाय करण्याचा रितसर क्रमांक आणि प्रमाणपत्र मिळते. ते दवाखान्याच्या दर्शनी भागात लावलेच पाहिजे. असा नियम आहे. आपण रूग्ण म्हणून ज्यांच्याकडून औषधे घेणार आहोत, ते योग्य शिक्षण घेतलेले अधिकृत पदवीधर आहेत का, याची खात्री करून नंतरच त्यांची औषधे घ्यायची असतात. नाहीतर औषधांचे जे गंभीर दुष्परिणाम होतात, त्यांना सामोरे जावे लागते.
    आयुर्वेद, होमियोपॅथी, अॅलोपॅथी, योग, निसर्गोपचार, सिद्ध आणि युनानी या किमान पदवीधारकाकडून औषध घ्यावे, असा दंडक आहे.

    केवळ लक्षण सांगून, काही वेळा तर पूर्वीच्या डाॅक्टरनी केलेले निदान ऐकवून, स्वतःच पॅथाॅलाॅजीमधे जाऊन, रिपोर्ट करून, नेट वरून थोडीफार माहिती मिळवून, रोगाचे अचूक नावच सांगून, कोणत्याही पॅथीचे औषध घेणे ही खूप मोठी चूक होऊ शकते. यात मूळ शास्त्र बदनाम तर होतेच पण शरीराची जास्ती हानी होते, बोले तो, पूरी वाट लगती है । तेव्हा सावधान!!

    रुग्णाची अवस्था, रोगाची व्याप्ती, गंभीरपणा, रोगाचे भविष्यातील धोके, औषधांचे डोस, किती कालावधीसाठी औषध घ्यावे, पथ्यापथ्य इ. सर्व तपासल्यानंतर सल्ला अधिक चांगला देता येईल ना ! केवळ वाॅटसपवरचे सल्ले, कुणातरी पुष्पादिदिवर विश्वास ठेवून, आंबट तिखट तेलकट बंद करा आणि आमची अमुक औषधे घ्या, टीव्ही वरील जाहीराती वाचून, शेजाऱ्यांचे ऐकून, घरी आलेल्या एजंटकडून औषधोपचार ठरवणे, हा चक्क मूर्खपणा आहे.

    अनेक वेळा आयुर्वेदीय औषधांमधे अॅलोपॅथीच्या औषधांची भेसळ केली जाते. त्यातही त्वरीत वेदनाशामक म्हणून स्टिराॅईड असलेली औषधे जास्त प्रमाणात दिली जातात, याचे परिणाम न सांगता सुद्धा थोबाडावर दिसतात. कानाखाली सूज येणे, औषध घेतल्यावर लगेचच दुख कमी होणे, औषध थांबवले की परत त्रास सुरू होणे, भूक खूप लागणे, तेच औषध मला परत परत घ्यावेसे वाटणे, ही सर्व स्टिराईड पोटात जात असल्याची लक्षणे आहेत. जी भविष्यात खूप हानीकारक ठरू शकतात.
    किडनी साफ करण्यासाठी लघवी होणारी औषधे, सेक्सची ताकद वाढवणारी, त्वचा विकार कमी करणारी काॅर्टीझाॅन मलमे, आवळा आणि कोरफड ज्युसच्या नावाने मिळणारे पाणी, कफ सिरपच्या नावाने मिळणारा साखरेचा पाक, नोनीचे मार्केटींग, एमेलेमच्या नावाखाली चाललेला टाॅनिकचा धुडगुस, जिममधे सुचवली जाणारी प्रोटीनची खिरापत, कित्ती किती अनावश्यक औषधे म्हणून सांगू...

    औषधांचा काळाबाजार हा प्रथितयश औषधांच्या तुलनेत कदाचित दोन ते तीन पट अधिक असू शकेल. असा अंदाज आहे.

    हे म्हणजे "आधीच मर्कट, त्यात मद्य प्याला" अशी अवस्था होते. आधीच्या चुकीच्या औषधांचे दुष्परिणाम काहीवेळा सहा सहा महिने राहातात, आणि महत्वाच्या औषधाला गुण दिसत नाही, ही अवस्था तर आगीतून फुफाट्यात गेल्यासारखी होते. हे केवळ एकाच पॅथीमधे होत असे नाही तर सर्वच पॅथीमधे हा घोळ दिसतो. यावर सरकारचे लक्ष असेल नसेल, पण एक जबाबदार नागरीक म्हणून आपल्याला, आपल्या कुटुंबियांच्या हितासाठी, अनावश्यक औषधांचा अनावश्यक वापर टाळावा असा सल्ला द्यावासा वाटतो.

    नको त्या माणसाकडून, नको ती औषधे, नको त्या अवस्थेत घेतली की, परिणाम नको तेच दिसणार. आणखी दुसरं काय होणार ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    21.04.2017

  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग एकतीस

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशेसदतीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-भाग बारा
    निरोगी राहाण्यासाठी काय करावे ? -भाग एकतीस

    बाबा सांगतात...

    देव, गाय, ब्राह्मण, वृद्ध, राजा, आणि अतिथी यांची यथायोग्य पूजा करावी. याचकाला काही न देता घालवू नये, त्यांचा अवमान करू नये आणि कठोर शब्दांनी बोलू नये.

    गाय या शब्दाने सर्व गोवंश घ्यावा. पूजा म्हणजे पंचोपचार किंवा षोडशोपचार पूजा नाही. तर त्यांना योग्य तो मान द्यावा. गोवंश हा मानवाच्या आरोग्याची पुरेशी काळजी घेत असतो. केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आध्यात्मिक आणि सामाजिक आरोग्य देखील सांभाळत असतो. म्हणून गोवंश संवर्धन झाले पाहिजे. पूर्वीच्या काळी जो गोवंश राखला जात होता, तो हळूहळू कमी होत जातोय. ही धोक्याची घंटा आहे. म्हणून गोवंश संवर्धनाबरोबरच गोवंश रक्षणदेखील करायला हवे. अस्सल भारतीय गो वंश आज भारतातच उपलब्ध नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. फक्त भारतीय गोवंश हा औषधीगुणांनी युक्त आहे. अन्य हायब्रीड पशू हे फक्त गायींसारखे दिसतात, पण औषधी गुणांनी शून्य. उलट अपाय करणारे अनेक रोग वाढवणारे एक विषारी प्रथिन त्यांच्या दुधामधे दिसते. म्हणून हायब्रीड दूध जसे, जर्सी, हाॅस्टन, एच एफ इ. अजिबात वापरू नये.

    आयुर्वेदात गाईचे दूध आणि दही औषधी म्हणून सांगितले आहे. ते औषध म्हणूनच वापरावे. पण दह्या दुधाचा आहारात समावेश झाला की ते मधुमेहासारख्या आजारांना वाढवते, हे पण लक्षात ठेवावे. अगदी देशी गाईंचे दूध आवर्जुन पिणाऱ्या आणि पोरांना बळेबळे पाजवणाऱ्या माता पिता पालकांनी हे लक्षात घ्यावे, की दूध हे कष्टाचे काम करणाऱ्या श्रमजीवी वर्गासाठी आहे. खुर्चीत बसून, मान खाली घालून, केवळ बटनांशी चाळा करीत, काम करणाऱ्या काटकोनी बुद्धीजीवींना नाही. आहारात जे अत्यंत आवश्यक आहे,असे ताक, लोणी आणि तूप मात्र आम्ही कटाक्षाने टाळू लागलो आहोत. हा बुद्धीभेद कोण करतंय, या विषयी सविस्तरपणे मागे लिहिले होतेच.

    वृद्धांना योग्य तो सन्मान द्यावा. इथेदेखील सर्व जाती धर्माचे वृद्ध असेच अपेक्षित आहे आणि योग्य तो सन्मान करावा हे अनादि कालापासून सांगितले जात आहे, याचे स्मरण करून देतो. पाश्चात्य संस्काराचा परिणाम म्हणून जी मानसिकता बदलत गेली, त्याचा परिणाम म्हणून, वृद्धांचा समावेश असलेली एकत्र कुटुंब व्यवस्था लयाला गेली आणि प्रत्येकाचे छोटेखानी कुटुंब जन्माला आले. ते सुद्धा हम दो हमारा एक. आता तेही नाही. आणि जे वृद्ध आहेत त्यांच्यासाठी स्वतंत्र आश्रम ! भारतीय संस्कृतीला अत्यंत लाजीरवाणे असलेले हे वृद्धाश्रम भारतात झपाट्याने वाढताहेत हे चांगले लक्षण नाही. आता दत्तक वृद्ध घ्यायची नवीन परंपरा सुरू झाली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

    कृपया या वाक्यातून यातून सोयीस्कर अर्थ काढू नये. जेव्हा हे वृद्धाश्रम बंद होतील आणि पुनः एकत्र कुटुंब व्यवस्था सुरू करण्याची भारतीय मानसिकता निर्माण होईल तो सुदिन !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.

  • सांगेन गोष्टी हिताच्याच चार – भाग पाच

    जगण्याची साधी सोपी सूत्रे - एकशे सत्तेचाळीस
    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - भाग तेरा
    सांगेन गोष्टी हिताच्याच चार - भाग पाच

    शक्यतो रात्रीच्या वेळी बाहेर फिरू नये. गरज लागल्यास कोणाला तरी सोबत घेऊन जावे, म्हणजे अपघात, चोर, शत्रू, यांच्यापासून भय राहात नाही. रात्रौ घराबाहेर जाताना डोक्यावर शिरस्त्राण घालूनच बाहेर पडावे. दिवसा तशी आवश्यकता नाही.

    भर दुपारी, सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळी रात्री मध्यरात्री तीन किंवा चार रस्ते जिथे मिळतात, तिथे बसू नये. जिथे पूर्वी कोणाची हत्या (खून) झाली असेल असे जंगल, पडकी घरे, स्मशान इ. ठिकाणी दिवसा पण जाऊ नये.

    अगदी चॅलेंज स्विकारून, कुणीतरी जातीलही, पण जो धक्का मनाला बसलेला असतो, त्यातून सावरणे कठीण होते, हे नक्कीच! अश्या धक्क्याने बनलेले अनेक मानसिक रुग्ण पाहायला मिळतात.

    हे एवढे सगळे सांगण्याचे कारण केवळ भूताटकी नव्हे तर, अशा जागी दिवसा अथवा रात्री गेल्यास एकांतामुळे, निर्जन स्थळी गेल्यावर, आपल्याला काही झालेच तर कोणाला कळणार देखील नाही. यासाठी आपला जाण्याचा ठावठिकाणा सांगून बाहेर पडावे, आपली ओळख पटेल असे काहीतरी आपल्याजवळ असावे, घरच्यांना संपर्क करता येईल, असा फोन नंबर नाव गाव पत्ता खिशात अथवा पर्समधे ठेवावा.

    त्या ठिकाणात भर म्हणून हाॅस्पीटल्सचा उल्लेख देखील करायला हरकत नाही. रूग्णाला बघायला हाॅस्पीटलमधे गेलं नाही तर लोक काय म्हणतील? काही लोकामध्ये यावरुन रागरुसवे पण होतात. पण खरच हाॅस्पीटलमधे गर्दी केली तर तिथल्या व्यवस्थापनेला पण अडचण होते. तिथे बघायला येणाऱ्या मंडळींच्या नकारात्मक चर्चेने बऱ्याचदा रूग्ण आणि त्याचे नातेवाईक यांचे मनोबल कमीच होते.

    शिवाय तेथील वातावरण, वास, रुग्णांचे विव्हळणे, मृत्युनंतरचा आलाप, अपघातात क्षतीग्रस्त रुग्णांचे रक्त, मांस इ. पाहायलादेखील भीती वाटते. चक्कर येते, मग अशा ठिकाणी कमकुवत आणि कोमल भावनाप्रधान मनाच्या मंडळीनी अजिबात जाऊ नये. गर्भिणी, वृद्ध, लहान मुलांना तर अजिबात नेऊ नये.

    वाढ(व)लेल्या रोगामुळे जी भीती मनात निर्माण झाली आहे, त्या भीतीपोटी अनेक वेळा आपले मन कच खाते आणि दोरीला साप समजू लागते. आणि पोटातील गॅसला किंवा वाढलेल्या पित्ताला हार्ट अॅटॅक समजू लागते. मग रात्रीच्या वेळी डोक्यावर पडलेल्या पानाला सुद्धा मन घाबरते. आणि शरीरातील काही हार्मोन्स बदलतात. एकदा हाॅर्मोन्स बदलू लागली की एकाचा परिणाम दुसऱ्या ग्रंथीवर होतो आणि सगळं च बिनसते. जसे सुरू असलेल्या घड्याळातील एकच काटा आपण हलवू शकत नाही, तीन काटे फिरायच्या अगोदर आतील काही चक्रे फिरतात, तेव्हा ते तीन काटे हललेले आपणाला दिसतात, तसंच शरीरात देखील एक हाॅर्मोन बदलवण्याचा प्रयत्न केला की, त्याबरोबर इतर हार्मोन्स देखील आपोआपच बदलतात, जे शरीराला हानीकारक असते.

    हे बदल कोण करतंय तर भीतीयुक्त मन ! म्हणून जिथे भीती उत्पन्न होईल अशा ठिकाणी शक्यतो एकट्याने जाऊ नये. ज्यांची मनं निर्ढावलेली आहेत, त्यांची गोष्ट वेगळी !

    सावध करणे हे आमचे काम आहे, ज्यांना स्मशानात जाऊन झोपावेसे वाटते, त्यांना स्मशानही मोकळे आहेच.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०५.०९.२०१७

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग सदुसष्ट

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 23-धूपं समर्पयामी-अंतिम भाग चार

    कालच्या टीपेवरून एका गटात एक खोचक सूचना सुचवली गेली, "आपण म्हणताय त्याप्रमाणे अग्निहोत्र जर एवढे प्रभावी असेल तर सर्व हाॅस्पीटल्स, सूतिकागृहे, दवाखाने इ. मधे दररोज अग्निहोत्र केले तर डाॅक्टर, औषधे यांची काही गरजच उरणार नाही. अज्ञान दूर सारा, विज्ञान स्विकारा." उगाच नको ते सांगत राहू नका, या अर्थी त्यांना सांगायचे होते. विज्ञानाच्या नावाखाली आज काही पुरूषाधम वेडेकर मंडळींना भारतीय शास्त्रांचा, त्यातील सूत्रांचा खरा अर्थ कधी कळलाच नाही, ज्यांना अज्ञान विज्ञान शब्द सुद्धा, शुद्ध स्वरूपात लिहिता येत नाही, अश्या "ज्ञानी" व्यक्ती केवळ विरोधाला विरोध म्हणून बोलत रहातात. पण असे बोलून आपण आपल्याच अज्ञानी जाती बांधवांचे नुकसान करून घेत आहोत, आणि आपले हसे करून घेत आहोत, हे पण यांच्या लक्षात येत नाही. असो. नुसता धूर काढत असतात झालं. तसा नुसताच धूर उदबत्यांमधून पण येतो.

    उदबत्ती हे धूपन चिकित्सेतील शेवटचे टोक. ही पूर्ण चिकित्सा नाही आणि फायदे देखील पूर्ण नाहीत. तरी पण काही अंशी धूर तयार होतो, म्हणून विचार करायचा.

    अगरबत्ती करायला बांबू वापरला जातो. भारतात बांबू कधीही जाळला जात नाही. तो शाकारणीसाठी, बांधकामासाठी किंवा तिरडी बांधण्यासाठी वापरला जातो. तिरडीवरचा बांबू आणि बांबूच्या कामट्या देखील सरणात जाणार नाही, याची काळजी घेतली जाते. बांबू जाळल्याने जो वायु तयार होतो, तो स्वास्थ्याला हानीकारकही आहे, असेही वाचनात आले होते. अश्या बांबूचा वापर अगरबत्ती करण्यासाठी केला जाणे चुकीचे आहे.

    भारतीय परंपरेमधे केवळ धूप द्रव्य, हवन सामग्री एकत्र करून अग्नीवर अर्पण करायची पद्धत. या धूपद्रव्याला, बांबूच्या काड्यांचा आधार देणे भारतीय नाही, या बांबूच्या काड्यांना दुसरा समर्थ पर्याय निवडावा, असे मला वाटते. अन्य तज्ञांनी, आयुर्वेद वैद्यांनी वा अन्य वनस्पती शास्त्रज्ञांनी यावर आणखी प्रकाश टाकावा.

    अगरबत्ती मधे जी सुगंधी द्रव्ये वापरली जातात, ती पूर्णपणे नैसर्गिक असावीत. पण आज ज्या उदबत्या मिळतात, त्यात कृत्रिम वास येणारी रसायने वापरली जातात, जे योग्य नाही. परिणामी त्यापासून तयार होणारी विभूती ही देखील औषधी ठरत नाही. उदबत्ती अथवा अगरबत्ती मधे मुख्यतः उद अथवा अगर हे दोन पदार्थ वापरलेले असतात. याऐवजी जर गाईचे शेण गोमूत्र आणि गाईचे तूप, धूप, गुग्गुळ आणि नैसर्गिक सुगंध असलेली तेल द्रव्ये वापरली गेली तर त्याचे औषधी गुणधर्म मिळतील, नाहीतर फायद्यापेक्षा तोटेच जास्ती होतील.

    आता तर डाॅक्टर सुद्धा धुराची अॅलर्जी असं सुद्धा सांगायला लागलेत, देवळात जाऊ नका, धुराकडे नेऊ नका, त्यातील काही धूर औषधी आहेत, हे विसरून कसे चालेल ? नको ते धूर सोडायला सुरवात झाल्यावर हवे ते औषधी धूर सुद्धा बदनाम होऊ लागले आहेत.

    जी गोष्ट अगरबत्तीची तीच कछुआ जलाओ मच्छर भगाओ ची ! मग कंपनी कोणती का असेना, त्यात वापरलेल्या रसायनांनी डासांपेक्षा, माणसांचाच जीव गुदमरून जातो. लहान मुलांना तर या डासांच्या काॅईल्स खूपच हानीकारक आहेत. जी गोष्ट काॅईल्सची तीच वाफ निर्माण करणाऱ्या डब्यांची, किंवा कागदाला चिकटवलेल्या विषारी द्रव्यांच्या ठिपक्यांची. एका झटक्यात, फटक्यात प्रतिकारशक्तीच गायब होऊन जाते.

    सिगरेट ओढून स्वतःच्या छातीचा खोका करायचाच, शिवाय जो ओढत नाही, त्यालाही या विषारी धुराचा प्रसाद द्यायचा, डास मारण्यासाठी राॅकेल अर्धवट जाळून केला जाणारा विषारी धूर, गाड्यांमधे चुकीच्या प्रतीचे इंधन वापरून होणारा विषारी धूर, केमिकलचे कारंजे उडवणाऱ्या एमआयडीसीतील चिमण्यांमधील विषारी धूर, यामुळे होणारे प्रदूषण, याकडे कोणाचे लक्षच नाहीये.

    विषारी धुरापासून होणारे हे "स्लो पाॅयझनिंग" आहे, हे कोणाच्या लक्षात येत नाहीये का ? धूपन चिकित्सा बदनाम करणाऱ्या आणि नुसता विषारी धूर ओकणाऱ्या या मंडळींपासून सावधान.

    भारतीय पद्धतीप्रमाणे सर्व रुग्णालयामध्ये जर, सूर्योदय सूर्यास्त या वेळा पाळून अग्निहोत्र सुरू केले तर, रुग्णांची संख्या, आणि वाढते साथीचे रोग निश्चितच कमी होतील.......
    म्हणून तर ही "रिस्क" कोणी घेत नाही ना ! एवढी मोठी सोन्याची कोंबडी देणारी मेडीकल इंडस्ट्री कोणाला नको आहे ?

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    16.06.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग अठरा

    भारतीय दर्शन शास्त्रात अनेक ग्रंथ अभ्यासासाठी आहेत. याविषयी सविस्तर दोन तीन दिवसामधे लिहीन. १८ दिशा विचार मल विसर्जन करताना उत्सर्जित केलेला मळ अथवा मूत्र पुनः आपल्या पायावर येणार नाही, याची काळजी घ्यावी. यासाठी जागेचा उतार नीट पहावा. आता मलविसर्जनावेळी जी भांडी वापरली जातात ती अशा उताराची असावीत.

  • जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकोणपन्नास

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा

    जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 4

    कशासाठी हे अन्न मी सेवणार , हा संकल्प "आत" कळतो आणि तशी तयारी सुरू होते.

    देवपूजेमध्ये सोळा उपचार केले जातात.
    आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान-अभिषेक, वस्त्र-अलंकार, उपवस्त्र-यज्ञोपवित, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, प्रदक्षिणा, नमस्कार आणि मंत्रपुष्प.

    सोळा उपचार कोणते ते माहिती असावेत म्हणून ही पूरक माहिती दिली.
    या उपचारांचा मुख्य उद्देश देवाची आपल्यावर कृपा व्हावी असा आहे. असा भाव, अशी श्रद्धा मनात ठेवावी.
    मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव,
    देव अशानी पावायचा नाऽही रं
    देव बाजारचा भाजीपाला न्हाई रं !

    देवाला आमंत्रण देऊन बोलवावे. आपण एखाद्या पाहुण्यांना कसे एखाद्या कार्यक्रमाला बोलावतो, तसे बोलवावे. उगाच का कोणी कारणाशिवाय येतो ?
    कारण सांगितल्या शिवाय, न सांगता येतो, त्याला आपल्याकडे "अतिथी" म्हटलं आहे, म्हणजे ज्याची येण्याची (आणि जाण्याची सुद्धा ) तिथी निश्चित नाही तो ! देव हा अतिथी नाही. आपल्या शरीरात तो गर्भावस्थेपासूनच स्थापन झालेला आहे. पण आपण त्याच्याशी एवढे "युजर्स फ्रेंडली" होतो, की आपल्याला त्याची किंमतच कळत नाही, किंवा त्याचे तेवढे महत्त्वच वाटत नाही.

    अर्जुनाला कृष्ण सखाच वाटत होता. पण कृष्ण हे भगवंत आहेत, याची जाणीव विराट रूप दर्शन झाल्यावर झाली.

    श्वास आला काय गेला काय, त्याचे महत्त्वच कळत नाही, जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो, तेव्हा या प्राणाचे महत्त्व समजते.

    पूजा करण्याच्या निमित्ताने,
    "हे परमात्म्या, तुझाच अंश असलेला हा आत्मा तुला भेटीला बोलवित आहे. (लग्न झालेल्या मुलीला, बरेच दिवसांनी आई भेटल्यावर जसा आनंद होईल, तशी अनुभुति यावेळी यावी.) तू आणि मी वेगळे नाहीत, मी माझे कर्तव्य करण्यासाठी, तुझ्याच आज्ञेने, या पृथ्वीलोकात आलो आहे. या पृथ्वीतलावरील रज तम गुणांमुळे माझे सत्त्व कमी होत आहे, तुझ्या भेटीमुळे माझे सत्त्व मला परत वाढवता येणार आहे, म्हणून तू मला भेटायला ये !"
    असा भाव या आवाहनामधे असावा. तर आपल्याला आवश्यक असलेला सत्व गुण ( शक्ती, उर्जा, अग्नि, एनर्जी) घेऊन "तो" येईल.

    माझ्यासाठी अमुक वस्तु घेऊन ये, असा निरोप दिल्याशिवाय, काय हवंय ते सांगितल्याशिवाय, नेमकी ती वस्तू कशी आणणार ना ? तसंच आहे.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    29.05.2017

  • आजचा आरोग्य विचार – भाग सत्तावीस

    तेल गेलं तूपही गेलं, हाती धुपाटणं आलं. अशी एक म्हण आपल्याकडे होती. केसांना तेल लावायचं नाही, अंगाला अभ्यंग करायचं नाही, डोळ्यात काजळ घालायचे नाही, नाकात तेल सोडायचे नाही, कानात तेल ओतायचे नाही, आणि पोटासाठी तेल प्यायचे नाही. नाक, कान, डोळा, त्वचा, जीभ या ज्ञानेंद्रियांचे संरक्षण करणारी मुख्य भारतीय यंत्रणा ताब्यात घेऊन, आरोग्यामधे घुसखोरी सुरू झाली.