आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 28-नैवेद्यम् समर्पयामी-भाग दोन
देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.
गणपतीचा नैवेद्य ठरलेला. मोदक.
मोदकच का ?
गणेशांना आवडतो म्हणून !
का आवडतो ?
गणेश हा बुद्धीदाता आहे. आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे. बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो. जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर. हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते. चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ? नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती. टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता. भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.
देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.
पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार...... फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ? घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती. गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.
नागपंचमीला नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते. नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!
वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
21.06.2017
अक्रोडाचे स्वरूप जर आपण पाहिले तर अगदी मानवी कवटी व मेंदूशी साधर्म्य असणारे वाटते.
अक्रोडाचा वापर खायला,तेल काढायला तसेच
अक्रोडाचा वापर स्क्रब म्हणून देखील केला जातो.
अक्रोड चवीला गोड,उष्ण,स्निग्ध,पचायला जड असून वातदोष कमी करणारे व कफपित्त वाढविणारे आहे.हे शुक्रधातू वाढवितात,,वजन वाढायलामदतकरतात.पौष्टीक,बलकारक,
हृदयाला हितकर असतात.
अक्रोड खाल्ल्याने मेंदूची ग्रहण शक्ती वाढते व बुद्धि चांगली होते म्हणूनच लहान मुलांना अक्रोड खायला द्यावा.
अक्रोड अतिप्रमाणात खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.
(ह्या लेखामधील उपचार हे वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे हि विनंती)
वैद्य स्वाती हे.अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:
९९६०६९९७०४
पय म्हणजे पाणी आणि पय म्हणजे दूध देखील !
यांच्यातील काही साम्य.
दोन्ही घटक आहारीय. म्हणजे आहारातील मुख्य. एक बालकांचे एक इतरांचे.
यांच्याशिवाय आहार पूर्ण होतच नाही.
दोघांविषयी जनमानसात प्रचंड गोड गैरसमज.
आणि महत्वाचे म्हणजे मधुमेहाचे हे दोन मोठे मित्र !
मधुमेह होण्यामधे आणि वाढवण्यामधे.
पाणी हे जसे मधुमेह वाढवायला मदत करते तसे ते रक्तदाब वाढवायलाही मदत करते. तसेच दूध हे देखील मधुमेहाला वाढवते.
पाणी आणि दूध दोघे एकमेकामधे असे काही एकजीव होऊन जातात. की पाण्यात दुध की दुधात पाणी समजाणार सुद्धा नाही.
असो.
मोठ्या शहरामधे तर आपल्या घरात येणारे प्लॅस्टिकच्या पिशवीतील दूध, हे दूधच आहे की नाही, हे शोधण्यासाठी फार कष्ट करावे लागतील, अशी परिस्थिती आहे. एकवेळ पाणी शुद्ध करता येईल. पण दूध शुद्ध करणे हे महाकठीण काम. दूध शुद्ध करण्यासाठी गोवंश शुद्ध करण्यापर्यंतचा प्रवास करावा लागेल.
जिथे जिथे दूध असा उल्लेख आयुर्वेदात येतो, तिथे ते गाईचेच वापरावे. हे जेव्हा लिहिले होते त्या काळात गाईमधे "हायब्रीड" हा प्रकार नव्हता. जे दूध उपलब्ध होते, ते सर्व शुद्ध देशी भारतीय वंशाचेच होते.
सरकारी यंत्रणेने दुधाचा महापूर योजने अंतर्गत विदेशी वळू आणून आमच्या अस्सल देशी गाई नासवल्या. खरंतर दुधासाठी नव्हे तर भरपूर मांस मिळवण्यासाठी, विदेशी माजवलेले वळूंचे वीर्य आणले गेले हे खरे सत्य आहे. ( खोटे सत्य असते काय ? हो. भारतात असते. सांगायचे एका कारणासाठी. असते दुसऱ्याच कारणासाठी म्हणजे खोटे सत्य. "सत्य" शब्द देखील असा नासवलाय, की आता तो वापरतानादेखील खुलासा करावा लागतोय. हे दुर्दैव.
आणि आता तर विदेशी गोवंशाचा हैदोसच सुरू आहे. औषधाला देखील देशी गाय उपलब्ध राहिलेली नाही. दूध, दही, लोणी, ताक, तूप या आहारातील सर्वात श्रेष्ठ अश्या दैनंदिन वापरातील पदार्थांविषयी खात्रीने सांगावे असा एकही पदार्थ आज उपलब्ध नाही.
कोणत्या तोंडानी वैद्यांनी सांगावे, दूध प्या म्हणून ? आणि या या अश्या विदेशी गाईचे दूध प्यावे म्हणून? जे अत्यंत विषारी आहे. एकाही मिडीयाने याची दखल घेतलेली नाही. प्रत्येकाचे लागेबांधे कुठेतरी आहेत. दूध हे दुध राहिलेले नाही. जोपर्यंत आपण आपले पूर्ण शुद्धिकरण करत नाही, तोपर्यंत दुधापासून थोडं लांबच राहिलेलं बरं.
नाहीतरी दुध मधुमेहामधे वर्ज्यच सांगितलेले आहे.
एवढं स्पष्ट लिहून देखील काही जण प्रश्न विचारतील, मग आम्ही दूध पण प्यायचे नाही का ?
आता काय सांगावे ?
वैद्य सुविनय दामले,
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
18.01.2017
जसा देश तसा वेश, जशी प्रकृती तसा आहार या सूत्रानुसार, प्रकृतीनुसार आहार घ्यावा, तसा कामाप्रमाणे, आणि प्रदेशानुसार आपला आहार आपण बदलावा.
आपल्या परंपरेप्रमाणे जो आहार आपण लहानपणापासून घेत आलोय, तो आहार शक्यतो, प्रदेश बदलला नाही तर, बदलू नये.
जसे लहानपणी जेव्हा पहिला घास भाकरीचा असेल तर भाकरी पचवण्याची ताकद तेव्हा पासूनच वाढवली जाते.
जर पहिला घास पावाचा असेल, तर पाव सहज पचू लागतो.
जर पहिला घास इडली डोश्याचा असेल तर आंबवलेले पदार्थ सुपाच्य होतात. फार त्रास देणार नाहीत.
तसे पहिल्यापासून मांसाहार करायची सवय असेल तर तो कसा पचवायचा, हे शरीराला माहीत असते.
म्हणजे नाॅनव्हेज खाणे बंद करायची आवश्यकता नाही. आयुर्वेदात मांसाहार करूच नका, असे म्हटलेले नाही. मांसाहाराचे वर्णन करणारा एक स्वतंत्र अध्यायच वर्णन केला आहे.
वेगवेगळ्या प्राण्यांचे मांस पचायला कसे असते, चवीला कसे असते, कच्चे खाल्ले तर काय होईल, शिजवून खाल्ले तर काय होईल, पचले नाही तर काय लक्षणे दिसतील, ते पचवण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, अमुक पदार्थाबरोबर खाल्ले तर काय होईल, कोणत्या पदार्थाबरोबर आवर्जून खावे, अमुक मांस कोणता परिणाम घडवणारे असते, इ. वर्णन केले आहे. तयार केलेल्या नवीन पदार्थांचे गुण काय असतील याचेही वर्णन आहे.
हे पण सांगितले आहे की आहे कि मांसाहार रज आणि तम गुण वाढवतो. जेव्हा रज आणि तम गुण वाढणे आवश्यक असेल तेव्हा तो वाढविण्यासाठी मांसाहार केलाच पाहिजे.
जसे, देशाच्या रक्षणासाठी आपला जीवही अर्पण करणार् या जवानाना, त्यांचे शरीरबल वाढवणे, मनोबल वाढवणे, प्रसंगी शत्रूचा म्हणजे चालत्या बोलत्या, आपल्याच सारख्या एका माणसाचा जीवही घेणे, आवश्यक असते. काही वेळा ही क्रूरता अंगी मुरवावी लागते.
पण कोणाला ?
ज्याच्या हातात सतत बंदुक असते, ज्याला सतत हिंसेसंबंधी विचार करावे लागतात त्याला.
दोन वेळा मस्त जेवून, मोबाईलवर लढाईचा गेम खेळणार् यला, आणि पांघरूण घेऊन, निवांत घरी झोपणार् याला नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग 9673938021.
धूमपान करणे हे आरोग्याच्या दृष्टीने योग्य आहे, हे फक्त आपली संस्कृती सांगते. अर्थात त्यात मद निर्माण करणारा तंबाखू नको, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि नीट लक्ष ठेवून वाचा. धुमपान असं लिहिलं आहे. धुम्रपान नाही. दैनंदिन धुमपान, प्रासंगिक धुमपान, चिकित्सास्वरूप धुमपान असे प्रकारही वर्णन केलेले आहेत.
कोणताही पूर्वग्रह दूषित ठेऊन हे वाचन करू नये. काही जणांच्या श्रद्धा, भावना, इगो, जातीयवाद, धर्मवाद, पंथवाद, परंपरावाद आड येऊ नये. आपल्याला शुद्ध आरोग्य मिळवायचं आहे. त्यासाठी कोणते निकष कसे लावायचे, हे आपले आपणच ठरवायचे आहे. संवाद साधायचे असतील तर पूर्ण विषय समजून घेतल्यावर, जरूर बोलूया.
समर्थ म्हणतात,
पूर्ण ग्रंथ वाचल्यावीण ।
उगाच ठेवी जो दूषण
तो दुरात्मा दुराभिमान
मत्सरे करी ।।
आजच्या काळात शास्त्रीय ज्ञान आणि व्यावहारिक ज्ञान यांची सांगड घालणे जास्त महत्वाचे आहे.
जसे काम तसे तसा आहार.
कष्टाची, अतिकष्टाची कामे करणाऱ्याला, म्हणजे रस्त्यावर दगड फोड करणाऱ्या
लमाणी माणसाला जर सांगितले गेले, की
" तू रोज तुपभात खा, तुझ्या तब्येतीला तो चांगला आहे",
तर तो म्हणेल,
"काय यॅड लागलंय का, म्हणं तूपभात खावा." आमची लसणीची झणझणीत लाल चटणी, कांदा भाकर आणि कोंबडं बोकड लई ब्येस.
आणि प्रत्यक्षात देखील तेच सत्य आहे.
केवळ पुस्तकी ज्ञान उपयोगी ठरत नाही. तर व्यावहारिक स्तरावर काही पर्याय वेगळे असू शकतात.
म्हणजे
काम करून आपोआप फुकटचा घाम येतोय की, जिममधे जाऊन विकतचा आणावा लागतोय.
रोग म्हणून अंगातून घाम येतोय, की आपोआपच येतोय.
ऊन्हात काम आहे की एसी मधे.
ऊद्याची चिंता आहे की नाही.
शारीरिक श्रमाचे काम आहे की बौद्धिक क्षमतेचे.
परंपरेने आलेले, की ओढून ताणून आणलेले.
गरज म्हणून की हौस म्हणून.
जीभेसाठी की पोटासाठी.
जीवासाठी की जातीसाठी.
हट्टआग्रहाने खातोय की सहज बदल म्हणून,
मला हवंय म्हणून की मित्र खातोय म्हणून.
या सर्व गोष्टींचा विचार चांगल्या आणि निरोगी आयुष्यासाठी करावाच लागेल. अगदी एका जातीतल्या, एका धर्मातल्या, एकाच घरातल्या दोन व्यक्तींसाठी सुद्धा !
विचार वेगळा करावा लागेल. लागतो.
इथे मी मुद्दाम नमुद करू इच्छितो की , जातीनुसार मांसाहार मी सांगत नाहीये, तर कर्मानुसार आहार ठरवावा.
मराठी भाषेत एक म्हण आहे, मोर नाचतो म्हणून लांडोर नाचते. असं व्हायला नको. आपण प्रत्येकाने आपल्या सर्व क्षमतांचा विचार करावा आणि आपला विकास करावा. शेवटी मत मांडणे म्हणजे मत लादणं नव्हे,
माऊली म्हणतातच, जो जे वांछील तो ते लाहो,
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
24.09.2016
गॅसनामा
गॅसचे कार्यक्षेत्र म्हणजे फक्त पोटापुरतेच मर्यादित असेल, असं समजणे म्हणजे शुद्ध गैरसमज, अज्ञान आहे. ते कार्य अगदी तळपायापासून सुरू होऊन व्हाया ह्रदय अगदी मेंदूपर्यंत पसरलेले आहे.
फूटबोर्ड पर्यंत खचाखच भरलेली लोकल. आतमधील काहीजण येणाऱ्या स्टेशनवर उतरण्याच्या आवेशात सामान काढताहेत. उठून उभी रहाताहेत. त्यामुळे तिथल्या उभ्या असलेल्या माणसांचीदेखील काहीशी हालचाल होते. त्याचा एक धक्का, त्या धक्क्याची नकळत एक लहर तयार होते. आणि ती धक्क्याची लहर काही क्षणातच अगदी फूटबोर्ड पर्यंत पोचते. आणि बाहेरून अचानक आवाज येतो, "अबे धक्का मत देना, मरवाओगे क्या ! "
हा धक्का जाणून बुजुन दिलेला असत नाही, पण एकाचा दुसऱ्याला, दुसऱ्याचा तिसऱ्याला अश्या रितीने जसा आतून बाहेर संक्रमित केला जातो, तसाच वाताचा, या गॅसचा दाब पुढे पुढे पसरवला जातो. पक्वाशयात तयार झालेला हा वात, आपल्या सूक्ष्म, चल गुणामुळे, वाटेत मिळणाऱ्या सर्व अवयवांना धक्के देत, प्रसंगी स्वतः वाट काढत, मधले अडथळे पार करत पुढे पुढे जात रहातो.
या वातामधे प्रचंड शक्ती असते. या शक्तीचा युक्तीने वापर करून, त्या जेम्स वॅटने रेल्वेचे इंजिन चालवले होते. बुद्धीचा वापर करून, कल्पकतेने, हा शोध लावणे म्हणजेच ज्ञानयोग. आणि जेम्स वॅट म्हणजे ज्ञानयोगी, शास्त्रज्ञ! भगवंतांनी समाजाची गुणकर्मशः विभागणी केलेली, अशी जी वर्णव्यवस्था वर्णन केली आहे, त्यातील हा ब्राह्मण वर्ण ! ( जात नव्हे. ) असो. या ब्राह्मण्याला मनापासून नमस्कार करणे हा भक्ती योग. या व्यवस्थेचे रक्षण करणे हा क्षात्रधर्म आणि या शास्त्रज्ञांना, त्यांच्या कार्यासाठी 'फंडींग' करणे ही वैश्यसाधना ! आणि प्रत्यक्षात मदत करणे हा सेवाभाव. कर्मयोग. असो.
गॅसच्या या शक्तीचा, चालणे, फिरणे, कामे करणे, हालचाली करणे, वजन उचलणे इ. दैनंदिन क्रियात्मक कार्ये करायला, योग्य सकारात्मक, नियंत्रित वापर करून घेता आला तर शरीराला मदत होते. नाहीतर हा वात कुठेही जाऊन अडकला तर जिथे जाईल तिथे वेदना निर्माण करतो. क्वचित प्रसंगी ह्रदयात अडकला तर मृत्युदेखील !
हाच वात पाठीच्या स्नायुंमधे अडकला तर त्याला आपण लचकणे, आखडणे म्हणतो, हाच वात जर मानेत अडकला तर त्याला मान तिरपणे, मुरगळणे म्हणतो. पायात आला तर गोळा येणे, कॅच येणे म्हणतो, आणि पोटातच फिरत राहिला तर पोट फुगणे, पोटात आवाज करीत रहाणे ही लक्षणे निर्माण करतो. याला आध्मान आटोप असे म्हणतात.
वेदना हे याचे प्रमुख लक्षण. मूळ निर्मिती पक्वाशयात आणि कार्यक्षेत्र संपूर्ण शरीरभर ! आधीच चंचल गुणाचा, आणि डोळ्यांनी न दिसणारा, केवळ अनुमानाने जाणून घ्यायचा. याला जर योग्य पथ्याने वेळीच संयमात नाही ठेवला तर असा सुटतो की, काही विचारूच नका. आधीच मर्कट त्यात मद्य प्याला. अशी अवस्था होते. आणि मग या वाताला काबूत आणायला वैद्यांचे अगदी नाकीनऊ येतात.
या विकृत झालेल्या वाताचे म्हणजेच गॅसचे हे रौद्र रूप वेळीच लक्षात आले तर ठीक आहे, नाहीतर कुठे जाऊन कधी आणि कसे तांडव सुरू होईल, याचा काही नेम नाही.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
04.04.2017
जेवणानंतर लगेच झोपल्याने कफ वाढतो. कफ वाढतो, म्हणजे खोकल्यातून बाहेर येतो तो कफ नव्हे हो! हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेलच !
हा कफ म्हणजे विकृतरीत्या वाढलेला कफ दोष. जो प्रमेहाचे मुख्य कारण आहे. मधुमेह हा ज्याचा एक उपप्रकार आहे, त्याला प्रमेह म्हणतात.
ग्रीष्म ऋतु सोडला तर दुपारची झोप वर्ज्य सांगितली आहे. ग्रीष्मात बाहेर उष्णता खूप असते. अग्नि वाढलेला असतो. त्यामुळे दुपारच्या झोपेने वाढणारा कफ कमी व्हायला मदत होते. पण ही झोप आडवे राहून घ्यायची नाही. तर बसल्या बसल्या डुलकी या स्वरूपाची असावी. आणि लवंडताना डाव्या कुशीवर असावे. यालाच वामकुक्षी असे म्हणतात.
वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या बाजुला लवंडून झोपल्याने डावी नाडी, चंद्र नाडी बंद होते. आणि उजवी सूर्यनाडी सुरू होते. सूर्य म्हणजे अग्नि. उजवी नाडी म्हणजे योग शास्त्रानुसार पचन प्रक्रिया वाढवणारी, सुधारणारी नाडी. वामकुक्षीचा हा फायदा होतो.
पोटात या डाव्या बाजूलाच आमाशय असते. त्याच्याखाली ग्रहणी नावाचा अवयव असतो.या ग्रहणी अवयवामधेच पचनाचे म्हणजे अग्निचे काम सुरू असते. आपण आपल्याला जसे हवे तसे खात असतो, ग्रहणी या खाल्लेल्या अन्नाला, त्याला हवे तसे रूपांतरीत करीत असते.
आणि आमाशयाच्या वरच्या बाजुला ह्रदय असते. म्हणजे ही रचना जणुकाही खाली चुल, वर पातेले अशी असते. अग्नि व्यवस्थित असेल तर रूपांतरण नीट होत असते. चुल नीट पेटली असेल तरच अग्नि चांगला प्रज्वलीत असतो.
जेवल्यानंतर लगेचच झोपल्याने ही चुल थंड होते आणि पचन मंदावते. म्हणून जेवणानंतर झोपू नये.
मग आमच्या दुपारच्या झोपेचं काय ?
त्याला एक पळवाट सांगतो. जेवणानंतर झोपू नये हा नियम झाला. पण ज्यांना झोप अनावरच होत नाही किंवा रात्रौचे जागरण करावेच लागते, अशा महाशयांनी जेवणापूर्वी झोप घ्यायला काही हरकत नाही. झोपून उठावे आणि जेवून परत कामाला लागावे.
पण
हे केवळ नियमाला अपवाद म्हणून.
अपवाद हा नियम होऊ नये !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
06.02.2017
मांसाहार करणारे प्राणी रक्ताला थंड ठेवण्यासाठी एक युक्ती करतात. जीभ बाहेर काढून ते श्वसनावाटे शरीरातील आर्द्रता वाढविण्यास मदत करतात. कुत्रा, वाघ, सिंह हे मांसाहारी प्राणी जीभ बाहेर काढून जणुकाही शीतली, सीतकारी (हे पू. हठयोगी निकम गुरूजींनी शिकवल्याप्रमाणे प्राणायामाचे प्रकारच जणु) करत असतात.
मांसाहारी प्राण्यांच्या अंगाला घाम येत नसल्याने त्यांना शरीर थंड राखण्यास अशी जीभेने मदत करावी लागते. त्यामुळे हे प्राणी सतत आपले अंग चाटत असतात. अंग चाटत राहील्यामुळे जो ओलेपणा मिळतो, ती जणुकाही त्यांची आंघोळच असते.
म्हणून त्याचा दुसरा परिणाम असा होतो की, अंगाला खूप ऊग्र दर्प असतो.
वाघ सिंहाच्या पिंजऱ्याच्या जवळपास गेलो तरी हा दुर्गंध लक्षात येतो. कुत्र्यांना कितीही डेली सोप लावा. वास काही जात नाही.
हे प्राणी स्वभावतःच क्रूर असतात. त्यांचे विचकणारे दात बघितले तरी भीती वाटते. बांधलेला कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला, त्याचे ते अक्राळविक्राळ रूप बघीतले तर काय हिंमत पुढे जायची ?
मांसाहारी प्राण्यांची पिल्ले जेव्हा जन्म घेतात, तेव्हा पहिले अकरा दिवस पर्यंत त्यांचे डोळे बंदच असतात. नंतर उघडतात. वाघ असो वा वाघाची मावशी. सिंह असो वा कुत्रा, नियम तोच. पहिले अकरा दिवस जन्मआंधळे !
या मंडळीकडे दया माया प्रेम वात्सल्य अगदी "न" के बराबर ! प्रचंड अहंकार रोम रोम मे समाया हुआ ! गरूड, सिंह यांनी शिकार केल्यावर लगेचच फोटोमधली पोझ आठवतेय का त्यांची ? त्यांच्या डोळ्यातले भाव वाचता आलेत कधी ?
प्रचंड मस्ती, गुर्मीत असल्याप्रमाणे ( आजुबाजुला कोणी नसले तरी ) मान उंचावून पहाताना,
"बघा, अखेर केली की नाही शिकार ! माझ्यासारखा शिकारी मीच ! "
अशी त्यांची देहबोली दिसते. अपवाद असतील पण अगदी क्वचित. मांजराने उंदराला पकडल्यावर, त्याला खाण्यापूर्वी, मांजराच्या चेहेऱ्याकडे बघीतलंय कधी ? आता मुद्दाम लक्ष ठेवा.
हे मांसाहारी प्राणी एवढे क्रूर असतात की, आपला वंश पुढे वाढला पाहिजे, या नैसर्गिक नियमाचाही त्यांना विसर पडतो. आणि....आणि.....त्यांच्या मादीने नुकत्याच जन्म दिलेल्या, आपल्याच रक्तापासून तयार झालेल्या, कोवळ्या जीवांचीच शिकार करून, भविष्यात त्यांच्या कामविश्वात तयार होणारा, त्याच्याच ताकदीचा एक मोठ्ठा शत्रु, आधीच नष्ट करून टाकतात, खाऊन टाकतात. स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी, पुढे निर्माण होणारे आपले हितशत्रु कायमचे संपवून टाकण्याची यांची कंसवृत्ती दिसते. यासाठी त्याच्यातील आईला, तिच्या पिल्लांना, फार जपावे लागते. कारण इथे शत्रु, अपनेवाले, अपनेही घरवाले होते है ! कितीही मांसाहारी असली तरी एक आई, "असं" कधीच करू शकत नाही.
बरं यांचे आणखी एक वैशिष्ट्य दिसते, यांना भूक लागली की, त्यांना शिकार करण्यासाठी दिसतात, ते फक्त शाकाहारी प्राणीच ! पोट भरतात, फक्त शाकाहारी प्राण्यांच्या जीवावरच ! निसर्गाचा नियमच आहे हा ! चुक काहीच नाही.
वाघ सिंह शिकार करतील, हरीण ससे आणि हत्तीचीच ! पण कोल्हे आणि लांडग्यांची नाही.
वरील सर्व नियम मांसाहारी प्राण्यांना लागू होतात की नाही, ते पुनः एकदा तपासून पहा.
या निसर्गदत्त देणग्या, या प्राण्यांना ईश्वराने दिलेल्या आहेत.
मी मांसाहारी आहे, हाच माझा धर्म, एवढंच शिकून तो इथे आलेला असतो. कोणत्याही धर्मग्रंथांचा अभ्यास तो नंतर करत बसत नाही.
जगण्यासाठी, ( आजच्या भाषेत, बाय डिफाॅल्ट प्रोग्रामने आलेले ) हेच ईश्वर निर्मित नियम पाळणे, ही त्यांची गरज आहे. यातील एक गुण जरी कमी पडला तरी त्यांचे जीवन संपूनच जाईल.
म्हणून परत परत म्हणावेसे वाटते,
ईश्वर महान आहे !
यु आर ग्रेट !!
तुस्सी ग्रेट हो !!!
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग
9673938021.
26.09.2016
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सात
निसर्गाचे नियम - सर्वांसाठी सारखेच - भाग पाच !
निसर्ग निसर्ग म्हणजे तरी काय ?
साधे सोपे उत्तर येईल.
व्यवस्था.
निसर्ग म्हणजे व्यवस्था, नियम.
सूर्य उगवतो, अस्ताला जातो. दिवस होतो, रात्र होते, ग्रह विशिष्ट दिशेने फिरतात, उपग्रह फिरतात. त्याच्यामुळे ग्रहणे होतात, वारा वाहातो, झाडे बहरतात, फुल उमलते, फळ बनते, झाडावरून फळ खालीच पडते, बी तयार होते, इकडे तिकडे जाते, पुनः नवीन वृक्ष बनतात.
हे सर्व काय आहे ?
त्याने नेमून दिलेले नियम आहेत. त्रिकालाबाधित सत्य !
कधीही न बदलणारे अंतिम सत्य म्हणजे निसर्ग !
या त्रिकालाबाधित सत्यांचा शोध घेत गेले असता, एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे निसर्गाने बनवलेले नियम निसर्गातील सर्वासाठी सारखेच बनवलेले आहेत. तिथे कुठेही, जात, धर्म, पंथ, गरीब श्रीमंत, राजा रंक, पौर्वात्य पाश्चिमात्य, पशू पक्षी, मानव अमानव, असा भेदभाव दिसत नाही. या नियमात कमालीची शिस्त आहे, या नियमात तसुभरदेखील फरक पडत नाही, आणि जर असा फरक पडला तर खुशाल समजावे, तो नियम निसर्गाचा नाही. बेशिस्त किंवा ढवळाढवळ निसर्गाला अजिबात खपत नाही. जर काही लुडबुड झालीच तर नुकसान होणार हे शंभर टक्के ठरलेले !
हा एक नियम गांभीर्याने समजून घेतला की आरोग्य समजून यायला वेळ लागणार नाही.
मृत्युबद्दलची भीती, मृत्यु येऊ नये यासाठी नियमितपणे आहार, घेतलेला आहार योग्य रितीने पचण्यासाठी पुरेशी विश्रांती, आणि आपण जाताना पुनः "आपणासारखे करिती तात्काळ" या उक्तीला आवश्यक असलेले मैथुन, या चार गोष्टी निसर्गाने वरील सर्वासाठी नेमून दिलेल्या आहेत. आहार, निद्रा, भय आणि मैथुन. या नियमांच्या मर्यादेलाच "धर्म" असेही म्हणतात. मानव आणि अमानव योनीमधे मागे पाहिलेल्या दूष्य देश बल काल या सूत्राप्रमाणे अवस्था बदलत जातील, त्यात योग्य तो बदल प्राप्त परिस्थितीनुसार करावा.
असाच धर्म शरीराचादेखील असतो. याला शरीरधर्म असे म्हणतात. रात्री झोप घेणे, सकाळी आपोआप जाग येणे, भुकेची जाणीव होणे, तहान लागणे, मल मूत्रादि उत्सर्जन क्रिया, (शरीरवेगांच्या संवेदना) कळणे, काम करताना उर्जा निर्माण होणे, त्यातून आनंद निर्माण होणे, याला "निसर्ग" म्हणतात. म्हणजे निसर्गाच्या नियमामधे बिघाड होत नाही. जे घडते ते घडू द्यावे, त्याविरोधात गेलो तर बिघडते.
उलटी होत असेल तर होऊ द्यावी, घाम येत असेल तर येऊ द्यावा, झोप येत असेल तर झोपावे, दमलो तर विश्रांती घ्यावी, भूक लागल्यावर जेवावे, तहान लागल्यावर पाणी प्यावे, निसर्ग असाच वागतो. कुठेही निसर्ग चक्र विस्कळीत झालेले दिसत नाही.
माणसाने जेव्हा यात बदल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा निसर्ग सुद्धा कोपतो.
आम्ही आमच्यासाठी निसर्गाच्या नियमात पालट करण्याचा प्रयत्न केला तर रोग होणारच.
पण आजच्या काळानुसार, ज्यांना आपल्याला निसर्गाचे वेळापत्रक पाळणे अशक्य आहे, त्यांनी काय करावे ?
निसर्गाला जाणून घ्यावे. आणि दूष्य देश बल काल आदि ओळखावे. जेवढ्या शक्य आहेत, तेवढ्या आपल्या कामाच्या खाण्या पिण्याच्या वेळा निसर्गाला अनुकुल होतील अशा करून घ्याव्यात. जर काही बिघाड झालाच तर वैद्यांच्या सल्ल्यानुसार निसर्गदत्त औषधींचाच वापर करावा.
इथे पुनः रक्तघटक एवढेच पाहिजेत, अमुक या लेव्हलच्या वर नको, याच्या खाली नको, असे अभारतीय नियम करून घेऊ नयेत. हे सर्व "मॅनमेड नियम" केवळ शरीराचे ढोबळमान समजून घेण्यासाठी आणि अभ्यासासाठी आहे. हे जरूर शिकावे, पण या शरीर तपासण्या हे अंतिम सत्य नाही, हे पण लक्षात ठेवावे. मानवनिर्मित नियमांचा वापर युक्तीने व्हावा, नियमाने होऊ नये. मानवाने केलेले नियम हे अर्धसत्य असतात, निसर्ग हेच पूर्ण सत्य आहे, हे आपण मागे बघितलेले आहेच !
कृत्रिमपणे केलेला विचार आणि सहजपणाने झालेली कृती यात फरक असतोच ना !
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
10.05.2017
Copyright © 2025 | Marathisrushti